Did you like the article?

Showing posts with label Nashik. Show all posts
Showing posts with label Nashik. Show all posts

Sunday, March 29, 2026

भारतातील आधुनिक शिक्षणपद्धतीचा एक जनक गॉर्डन हॉल

द्विशताब्दी स्मृतीवर्ष २० मार्च २०२६ पासून

दोनशे वर्षांपूर्वी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या कामगिरीवर निघालेल्या तीन व्यक्तींनी १२ फेब्रुवारी १८१३ रोजी मुंबई बंदरात पाय ठेवला. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट  या त्या तीन व्यक्ती होत्या.  त्यांच्या आगमनाने या देशात सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारीक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. ख्रिस्ती धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट्य होते.  

ईस्ट इंडिया कंपनीचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार चालत होता आणि प्रचलीत ब्रिटिश कायद्यानुसार भारतात मिशनरींना येण्यास बंदी होती. त्यामुळेच विल्यम कॅरी यांना डॅनिश वसाहत असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्यांना मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती. ब्रिटिश संसदेने १८१३च्या जुलैत ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण केले आणि त्यानुसार या मिशनरींना भारतात काम करण्याची मुभा देण्यात आली.

गॉर्डन हॉल आणि त्यांच्या सहकारी मिशनरींनी मुंबईत आणि इतरत्र मुलांमुलींसाठी आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडून एक सामाजिक क्रांती घडवली. कॉलऱ्याच्या साथीत रूग्णांना औषधोपचार देताना गॉर्डन हॉल यांचे नाशिकजवळ दोडी दापूर येथे २० मार्च १८२६ रोजी मृत्युमुखी पडले. दिनांक २० मार्च २०२६ पासून त्यांचे द्विशतकी स्मृतीवर्ष सुरु होत आहे.  

श्री. म. पिंगे यांनी `युरोपिअनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' या आपल्या ग्रंथात म्हटले आहे: ``हॉल व नॉट हे मुंबईत राहिल्यानंतर व मराठी शिकल्यानंतर सन १८१५ मध्ये त्यांनी इंग्रजी शाळा काढली. त्यात प्रथम २५ मुले होती. याशिवाय दोन व्हर्नाक्युलर शाळांत ४० मुले होती. पुढील वर्षी शाळांची संख्या वाढली व एकंदर ३०० विद्यार्थी झाले. इ. स. १८१८ मध्ये ११ शाळा व ६०० विद्यार्थी होते. ’’   रेव्हरँड इमॅन्युएल बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या लिहिलेल्या अहवालानुसार १८१५ च्या मे महिन्यात मध्य भारतातील हिंदू मुलांच्या पहिल्याच आणि एकमेव शाळेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या नोंदीनुसार या मिशनरींच्या शाळेत अंदाजे २५ विद्यार्थी होते.  अमेरीकन मिशनच्या शाळांची संख्या १८१८पर्यंत अकरा झाली आणि या शाळांत ६०० विद्यार्थी शिकत होते.

गॉर्डन हॉल यांनी मराठी शिकून नंतर या भाषेत लिहिलेल्या पुस्तकांची विस्तृत माहितीसुद्धा पिंगे यांनी आपल्या ग्रंथात दिली आहे.  ``सामान्य माणसाला लिहितावाचता आले तरच तो बायबल वाचू शकणार होता. त्यासाठी मिशनरी लोकांनी मुद्रणयंत्र आणले, बायबलची छपाई सुरु केली, शाळा सुरु केल्या. अमेरिकन मराठी मिशनच्या या मिशनरींनी आपलया आगमनानंतर केवळ चार वर्षांच्या कालावधीत २५ शाळा सुरु केल्या, त्यात बाराशे मुले होती,’’ असे `अमेरीकन मराठी मिशनची दीडशे वर्षे' या ग्रंथात नमूद केले आहे. 

स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे अशाप्रकारे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती आणि आधुनिक सार्वत्रिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला.

अमेरिकन मिशनने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडली. गंगाबाई या नावाची एक स्थानिक तरुणी या शाळेत शिकवत असे. दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली. या रोगाच्या साथीने मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने मुलींची ही शाळा बंद करावी लागली``या पहिल्या मुलींच्या शाळेतल्या पहिल्या एतद्देशीय महिला शिक्षिका असलेल्या या गंगाबाईंबद्दल इतर काहीच माहिती उपलब्ध नाही हे सांगायला आम्हाला खूप खेद होतो,’’ असे रेव्हरंड बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईत १८८१ साली साजरा झालेल्या अर्धशतकी वर्धापनावेळी सांगितले गेले.

सरोजिनी बाबर यांनी 'स्त्रीशिक्षणाची वाटचाल' या पुस्तकात लिहिले आहे.  इ स १८२४ मध्ये अमेरिकन मिशनरींनी मुंबईस एतद्देशीय मुलींच्याकरिता म्हणून एक खास अशी स्वतंत्र शाळा स्थापन केली होती. मुंबई इलाख्यातील ही मुलींची पहिलीच शाळा होय.’’

गॉर्डन हॉल यांचा विवाह मुंबईतच १९ डिसेंबर १८१६ रोजी मार्गारेट लुईस यांच्याशी झाला.  परदेशी मिशनरी कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या मृत्यूंचे दुःख सहन करावे लागत असेप्रत्येक घरात एकतरी अपत्याचे निधन झाले होते. १८३२ पर्यंत जन्मलेल्या ३० अपत्यांपैकी १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. इथल्या आरोग्याच्या समस्येमुळे गॉर्डन हॉल यांच्या पत्नीने आपल्या मुलांसह अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या पतीलासुद्धा त्यांनी तसा आग्रह केला, मात्र मायदेशी जाण्यास हॉल यांनी नकार दिला. गॉर्डन हॉल यांचे एक नातू रेव्हरंड जॉर्ज . हॉल हे अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त १९१३ साली मुंबईत मिशनरी म्हणून आले तेव्हा त्यांनी आपली आजी आणि आजोबा यांच्या शेवटचा निरोप घेतेवेळी झालेल्या हृदयद्रावक संभाषणाचे वर्णन केले आहे.

गॉर्डन हॉल हे नियमितपणे रोजनिशी लिहीत असत. हॉल यांनी आपल्या या रोजनिशीत महाबळेश्वर येथील मंदिरे आणि पाच नद्यांचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या झऱ्याविषयी नोंदी केल्या आहेत. तेथील हवामान उत्कृष्ट असल्याचे त्यांना आढळले; मात्र अन्नसामग्री इमारती महाग होत्या, तसेच तेथे पोहोचण्याचे अंतर अडचणी पाहता, एखाद्या मिशनरी कुटुंबाचे तेथे स्थलांतर करणे खर्चिक ठरेल, असे त्यांना वाटले.

मार्च १८२६ मध्ये हॉल आपल्या दोन तरुण सहकाऱ्यांसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे जाण्यास निघाले. तेथे कॉलऱ्याची तीव्र साथ असल्याने ते काही दिवस तेथेच लोकांची सुश्रुषा करण्यासाठी थांबले. त्यांनी आजारी लोकांना औषधे दिली, पुस्तके वाटली आणि उपदेशसुद्धा केला. मुंबईच्या परतीच्या प्रवासात दोडी दापूर या गावात त्यांनाही कॉलऱ्याची लागण झाली आणि २० मार्च १८२६ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या मिशनकार्याचा काळ केवळ १२ वर्षांचा होता.   




सावलीचा शोध' या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नरेंद्र चपळगावकर लिहितात: ``भारतात ज्या परिस्थितीत मिशनरींना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत. प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनरींना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठी भाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली. स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. ’’ 

``तो आवडता शिष्य, उत्कृष्ट मिशनरी आणि एक आद्य कार्यकर्ता होता', अशा शब्दांत अमेरिकन मराठी मिशनने गॉर्डन हॉल यांचे वर्णन केले आले आहे.  दोडी दापूर येथे त्यांचे दफन करण्यात आले, तेथे एक दगडी कबर बांधण्यात आली. मिशनरी ऍलन ग्रेव्ह्ज यांनी या समाधीला भेट दिल्यानंतर तेथे एक स्मृतीफलक उभारण्यात आला. त्यावर पुढील मजकूर कोरलेला होता :  ख्रिस्ताचा सेवक प्रेषित गॉर्डन हॉल येथे पुरला आहे. हा एकट्याच देवाची भक्ती त्याच्या एकल्या अवताराकडून तारण ही सांगायास येथे फिरत होता. या तारणाविषयी तुम्ही शोध करा. तुम्हासही पाहिजे. ''

दोडी दापूर येथील  गॉर्डन हॉल यांची कबर आणि त्यावरील स्मृतीफलक अगदी अलीकडच्या काळापर्यंत अगदी सुस्थितीत होती.  दहाबारा वर्षांपूर्वी तो स्मृतीफलक उखडून टाकला गेला होतानाशिक येथील गिरीश भालतिडक यांनी त्या स्मृतीफलकाचे तीनचार तुकडे मिळवले आणि ते एकत्र जोडून शरणपूर येथील आपल्या घरी ठेवले आहेत.

 Camil Parkhe 

 

 

^^^^^

 

 


Sunday, January 25, 2026

                                                   अश्विनी लांडगे '

प्रमुख राजकीय पक्षांकडून मुसलमान, ख्रिस्ती आणि शीख लोकांना कुठल्याही पातळीवरच्या निवडणुकीत शक्यतो उमेदवारी दिली जात नाही.

मात्र या लोकांनी तथाकथित निधर्मी पक्षांना बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अपेक्षाही बाळगली जाते.
ओवेसी बंधूंच्या एमआयएम पक्षाने महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळवललेया शंभराहून अधिक जागांबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
एके काळी ख्रिस्ती समाजाचे डॉ लिऑन डिसोझा हे मुंबईचे महापौर होते, नंतर त्यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळात आरोग्य खात्याचे राज्यमंत्रीपद भूषवले होते.
त्याच्याही खूप दशके आधी अत्यंत अल्पसंख्य असलेल्या पारशी समाजाचे मुंबईत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत वर्चस्व होते.
सर फिरोजशाह मेहता हे मुंबईचे पहिले अनभिषिक्त सम्राट, (लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांच्या हातून पराभव चाखणारे स. का. पाटील हे खूप नंतरचे.)
हा आता भूतकाळ झाला आहे.

मुंबई-पुण्यात आणि इतर अनेक ठिकाणी ख्रिस्ती समाजाचे प्रमाण लक्षणीय असले तरी त्यांना प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळत नसते. या कारणामुळे या समाजाला कुठल्याही शहरात आणि राज्यातही राजकीय नेतृत्व असे नाहीच.
गेल्या निवडणुकीत (२०१७) ओवेसींच्या एमआयएमने पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अश्विनी लांडगे या ख्रिस्ती महिलेला तिकीट दिले आणि त्या चक्क निवडून आल्या.

त्याआधी अनेक वर्षे पुणे महापालिकेत ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधीत्वच नव्हते.
यांना यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि महापालिकेत त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.
काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने पुण्यात आणि शेजारच्या पिंपरी चिंचवड येथेही इतरही सात जणांना उमेदवारी दिली होती. पण ते निवडून आले नाहीत.
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसच्या ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांनी वांद्रे पूर्व (वॉर्ड क्र. ९०)मध्ये अत्यंत अटीतटीच्या लढतीत अवघ्या सात मतांच्या फरकाने विजय मिळवला.

                                             ट्यूलिप ब्रायन मिरांडा

ट्यूलिप मिरांडा या वकील असून त्यांनी यापूर्वी महापालिकेत कालिना–वांद्रे पूर्व परिसराचे प्रतिनिधित्व केले होते. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीतही त्यांनी हाच वॉर्ड जिंकला होता. या परीसरात ख्रिस्ती मतदारांचे प्रमाण खूप आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरात काँग्रेस नेतृत्वाने ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांची मुंबई प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
ट्यूलिप मिरांडा यांच्यासह आणखी दोन ख्रिस्ती नगरसेवक मुंबई महापालिकेच्या सदनात असणार आहेत.
ते आहेत काँग्रेस पक्षाचे १०१ वॉर्ड क्रमांकचे कॅरेन डिमेलो आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे धारावीच्या १७८ वॉर्ड क्रमांकचे जोसेफ कोळी
विशेष म्हणजे काँग्रेस पक्षावर यावर्षी मुस्लीम आणि ख्रिस्ती मतदारांनी विश्वास टाकला आहे असे दिसते. मुंबईत आणि पुण्यात या पक्षाने ज्या जागा जिंकल्या आहेत त्यात विजयी मुस्लीम उमेदवारांचे - आणि त्यातही महिलांचे - प्रमाण लक्षणीय आहे.
मागच्या वेळी २०१७ साली पुणे महापालिका निवडणुकांत काँग्रेस पक्षाने फक्त नऊ जागा जिंकल्या होत्या. त्याच्या तुलनेत यावेळी पक्षाने सहा जागांची वाढ केली आहे.
एकूण पंधरा जागा जिंकल्या आहेत. यात मोलाचा वाटा मुसलमान आणि ख्रिस्ती मतदारांचा आहे.




याशिवाय वसई विरार महापालिकेत ख्रिस्ती समाजाचे दहा उमेदवार निवडून आले आहेत.
त्यापैकी एक काँग्रेसचे असून बाकीचे नऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आहेत. बविआने यावेळी वसई विरार महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.

                                                      कॅरेन डिमेलो
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत
१. सॅरल डाबरे (काँग्रेस) - वाघोली मर्देस
2. अरुणा डाबरे (भुईगाव)
3. डॉमणिक रुमाव (नंदाखाल)
4. मार्शल लोपीस (नानभाट)
5. बिना फुट्यार्डो (पापडी)
6. लॉरेल डायस (मर्सेस)
7. अलका गमजा (कोळीवाडा)
8.अजय रॉड्रिग्ज (चुळणा)
9. प्रकाश रॉड्रिग्ज (माणिकपूर) आणि
10. मार्शलिन चाको (स्टेला माणिकपूर)

त्याशिवाय वसईजवळच्या मीरा भाईंदर महापालिकेत पुढील सात ख्रिस्ती उमेदवार निवडून आले आहेत :

                                       शॉन कोलासो, मीरा भाईंदर

मेबल नोएल कोरीया (भाजप)
नीला सोन्स (भाजप)
आयरिन क्वाड्रोस (काँग्रेस)
टॅरेन मेंडोन्सा (काँग्रेस)
फ्रिडा बर्नार्ड डिमेलो (शिंदेसेना)
शॉन कोलासो (काँग्रेस)
शर्मिला विन्सन बागजी (शिंदेसेना)
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये यावेळी मेघाली सचिन खेमा या ख्रिस्ती महिला भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत यापूर्वी त्यांचे पती सचिन खेमा हे भाजपतर्फेच निवडून आले होते.
नाशिक महापालिकेत समीर उर्फ जॉय कांबळे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत. जॉय कांबळे यांचे वडील उत्तमराव कांबळे नाशिक महापालिकेत पूर्वी अनेकदा निवडून आले होते.
नगर शहर हे मराठी ख्रिस्ती जनतेचे येरुशलेम. येथील महापालिकेत मात्र याहीवेळेस एकही ख्रिस्ती नगरसेवक निवडून आलेला नाही.
राज्यातील इतर दोनेक महापालिकेत प्रत्येकी एक ख्रिस्ती नगरसेवक निवडून आले आहेत.

^^^

Camil Parkhe