Did you like the article?

Thursday, December 21, 2023

पुणे कॅम्पात  ख्रिसमस फेस्टिव्हल


पुणे कॅम्पात या आठवड्यात जाऊन आलो, शनिवारपासून इथली वर्दळ वेगळ्या कारणाने वाढत जाणार आहे. ख्रिसमस जवळ येऊन ठेपला आहे आणि इथली काही विशिष्ट दुकाने त्यासाठी सज्ज होताना दिसत आहे.
क्वार्टर गेटच्या मध्यवर्ती चौकात असलेल्या यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (YMCA) च्या प्रशस्त आवारात बेसमेंटमध्ये असणारे ओम बुक्स येथे सालाबादप्रमाणे डिसेम्बर २३ पर्यंत ख्रिसमस फेस्टिव्हल सुरु आहे. काही दिवसांआधीच मी इथून नव्या पद्धतीचा रंगीत दिवे असणारा एक स्टार घेतला.
गेले अनेक दिवस येथे आगामी वर्षांचे इंग्रजी, मराठी आणि हिंदी कॅलेंडरची विक्री होत आहे. इथली ही बायबलमधली वचने आणि अतिशय आकर्षक चित्रे असणारी रंगीत कॅलेंडर्स `कालनिर्णय' कॅलेण्डरप्रमाणेच अतिशय लोकप्रिय आहेत. एका कॅलेंडरची किंमत पन्नास रुपये.
दरवर्षी मी दहाबारा निवडक कॅलेंडर्स विकत घेऊन इतरांना ख्रिसमस किंवा न्यू इयर गिफ्ट म्हणून देत असतो. माझ्या लहानपणी याबाबत गुळगुळीत पानांवर रंगीत चित्रे असलेली डॉन बॉस्को संस्थेमार्फत छापलेली कॅलेंडर्सची मक्तेदारी होती.
या `ओम बुक्स' मध्ये मी लिहिलेली आणि सुगावा प्रकाशन, चेतक बुक्सने आणि इतरांनी प्रकाशित केलेली काही इंग्रजी आणि मराठी पुस्तकेसुद्धा विक्रीला ठेवण्यात आली आहेत.
त्याशिवाय पुणे कॅम्पात महात्मा गांधी रोडवर फुर्ट्याडो वगैरे अनेक दुकानांत ख्रिसमससाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू - ख्रिसमस ट्री, सांता क्लॉज ड्रेस, डेकोरेशन साधने - उपलब्ध आहेत.
ख्रिस्तजन्माच्या देखाव्यासाठी म्हणजे cribs साठी सेंट पॉल बुक्स स्टॉल विशेष प्रसिद्ध आहे. या देखाव्यात गायीगुरांच्या गोठ्यात गवताच्या गव्हाणीत पहुडलेला बाळ येशू, मारिया आणि जोसेफ, बाळाच्या भेटीसाठी उंटांवरून प्रवास करून आलेले तीन ज्ञानी किंवा मागी राजे, ग्लोरिया गाणारे देवदूत, गायीगुरे,मेंढरे, वगैरेचा समावेश असतो.
यापैकी कसलीही खरेदी करावयाची नसली तरी पुणे कॅम्पात या दिवसांत नुसते वावरणेसुद्धा आनंदाचे असते, ख्रिसमसच्या फेस्टिव्ह वातावरणाची तयारी करण्यास मदत करते.
आमच्या परिसरात सांता क्लॉजच्या लाल टोपी घालून गिटारच्या सुरांत `जिंगल बेल,जिंगल बेल' गाणारे कॅरोल सिंगर्स येण्यास कधीच सुरुवात झाली आहे.
Camil Parkhe,

 फ्रान्सिस्को लुईस गोम्स

गोव्यात पणजीला तुम्ही गेला तर दयानंद बांदोडकर मार्गावर कला अकादमीजवळ कंपाल गार्डनमध्ये एक पूर्णाकृती पुतळा दिसतो.
पणजीत असे पुतळे फार कमी आहेत, पोर्तुगीज वसाहतीच्या खुणा असलेल्या बहुतेक जुन्या पुतळ्यांची रवानगी खूप वर्षांपूर्वी वस्तूसंग्रहालयात करण्यात आली आहे.
आदिलशहा पॅलेस किंवा जुन्या सेक्रेटरीएटजवळ असलेला ऍबे फरिया यांचा पुतळा त्यातून वाचला, तसाच कंपाल गार्डनमधला हा पुतळासुद्धा.
दोन्हीबाबत कारण एकच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या दोन्ही व्यक्ती `निज गोंयकार' आहेत.
पणजीला नेहेमी येणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तींचे कंपाल गार्डनमधील या पुतळ्याकडे सहसा लक्ष नाही. अनेक वर्षे मी मिरामार बिचजवळ आणि नंतर ताळगावला राहिलो, बसने आणि दुचाकीने येता-जाताना या पुतळ्याविषयी कुतूहल वाटायचे.
अगदी गोव्यातील अनेक लोकांनासुद्धा या फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याविषयी फार माहिती असण्याची शक्य कमीच आहे. हा पुतळा शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९२९ साली पोर्तुगाल राजवटीतच गोम्स यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उभारला गेला होता.
गोव्यात आणि भारताच्या इतर भागांत पोर्तुगालची साडेचारशे वर्षे सत्ता होती. या काळात गोव्यातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क होते.
पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून लिस्बनला दोनदा गेले होते.
त्यानंतर कितीतरी वर्षांनी म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीला दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश संसदेचे सदस्य म्हणून निवडले गेले होते.
नौरोजी हे ब्रिटिश संसदेवर निवडून गेलेले एकमेव भारतीय. त्यानंतर ब्रिटिश भारतात स्थानिक संसदीय मंडळे स्थापन झाली.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स ( `फ्रान्सिश्कु लुईश गॉमीश' असा पोर्तुगीज भाषेत उच्चार) यांच्याप्रमाणेच अनेक गोमंतकियांना पोर्तुगाल संसदेचे सदस्य होण्याचा सन्मान मिळाला, काही जण पोर्तुगीज मंत्रीमंडळात होते.
सद्याचे पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनिओ कोस्टा ( पोर्तुगीज भाषेत आंतोनियु कॉश्ता) तर मूळचे गोंयकार, मडगावचे.
काल पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तिथे ओलिव्हियानो जे एफ गोम्स (ओलीव्हिन्यु गॉमीश) यांनी फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे लिहिलेले, नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले, हे चरित्र दिसले आणि पटकन विकत घेतले.
वाचल्यानंतर लिहिन त्यांच्यावर.
आज डिसेंबर १९ गोवा मुक्तीदिन.. गोंय मुक्ती दिसाची परबीं....
Camil Parkhe

Sunday, December 17, 2023

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक

दिवाळी येण्याआधीच दसऱ्याचा मुहूर्त साधून दिवाळी अंकांचं प्रकाशन केलं जातं. तसं आतापर्यंत डिसेंबरच्या मध्यात कॅरोल सिंगर्स दारापर्यंत पोहोचण्याआधीच दोन नाताळ विशेषांक हाती पडले आहेत.

 मराठी साहित्य विश्वात दिवाळी अंकांना एक वेगळेच महत्त्व आहे. मोबाईल युग सुरु झाल्यापासून आणि त्यानंतरच्या समाजमाध्यमांचं सार्वत्रिकिकरणामुळं पुस्तकं आणि नियतकालिकं वाचणं कमी झालं असलं तरी याहीवर्षी अनेकांनी उत्साहानं दिवाळी अंक काढलीच.

आणि आता गडबड सुरु आहे ती ख्रिसमस विशेषांकांची.

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक काढण्याची परंपरा तशी खूप जुनी असली तरी याविषयी अनेकांना कदाचित माहिती नसेलही.
`निरोप्या' हे १९०३ साली जर्मन धर्मगुरु हेन्री डोरींग यांनी सुरु केलेले मासिक. पहिल्या महायुद्धाचा काही काळ वगळता आजतागायत प्रसिद्ध होते आहे, गेली काही वर्षे या मासिकाचा नाताळ विशेषांक प्रसिद्ध होतो. `निरोप्या' मासिक पुण्यातल्या स्नेहसदनमधून जेसुईट संस्था प्रसिद्ध करते. फादर भाऊसाहेब संसारे निरोप्याचे संपादक आहेत.
माझ्या लिखाणाची सुरुवातच मुळी 'निरोप्या'तून झाली. श्रीरामपुरात मी शाळेत असताना १९७४ साली.
`निरोप्या' च्या या नाताळ विशेषांकात महात्मा जोतिबा फुले यांना आपल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिकवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचे मी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध झाले आहे. महात्मा फुले अभ्यासकांना हे चरित्र उपयुक्त ठरु शकेल.

`ज्ञानोदय' हे मराठीतील सर्वात दीर्घायुष्य लाभलेलं नियतकालिक. स्थापना १८४२.
मराठीतलं पहिलं नियतकालिक बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली सुरु केलं होतं. डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी `ज्ञानोदया'ची संपादकाची धुरा घेतल्यानंतरचा हा पहिलाच नाताळ विशेषांक. कांतिश प्रभाकर तेलोरे अतिथी संपादक आहेत..

मराठी पत्रकारितेच्या आणि नियतकालिकांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेली मराठीतील सर्वांत जुनी असलेली ही दोन्ही नियतकालिके ही ख्रिस्ती संस्थांमार्फत चालवली जातात हे विशेष.
अर्थात या संस्थांचं पाठबळ हे यामागचे प्रमुख कारण.
यापैकी निदान `निरोप्या' तरी स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे हे या अंकाच्या रंगीत आणि कृष्णधवल जाहिरातींतून दिसते.
वसईतून प्रसिद्ध होणाऱ्या `सुवार्ता' मासिकाचा सुद्धा नाताळ विशेषांक असतो. फादर डॉ अनिल परेरा `सुवार्ता'चे संपादक आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो अनेक वर्षे - जवळजवळ पंचवीस वर्षे - सुवार्ताचे संपादक होते.
इतर नाताळ विशेषांक आणि या नियकालिकांचे संपादक पुढीलप्रमाणे आहेत
*सुवार्ता* (मासिक) - फा. (डॉ.) अनिल परेरा संपादक आहेत
*कादोडी* (वार्षिक) - ख्रिस्तोफर रिबेलो संपादक आहेत
*ख्रिस्तायन* (ऑनलाइन नाताळ अंक) - ख्रिस्तोफर रिबेलो संपादक आहेत
*गीत* (वार्षिक नाताळ अंक) - लेस्ली डायस संपादक आहेत
*जनपरिवार* (साप्ताहिक) - अँड्र्यू कोलासो संपादक आहेत
*कॅथॉलिक* (त्रैमासिक) - स्टीफन आय परेरा संपादक आहेत
*निर्भय आंदोलन* (द्वैमासिक) - मनवेल तुस्कानो संपादक आहेत.
दयानंद ठोंबरे हे नव्वदच्या दशकापासून माझे सहकारी, मी पुण्याला इंडियन एक्सप्रेसमध्ये १९८९ ला रुजू झालो आणि लवकरच ठोंबरेसुद्धा एक्सप्रेस ग्रुपच्या लोकसत्ता दैनिकात आले. माझ्या अनेक मराठी पुस्तकांचे ते पहिले वाचक, ही पुस्तकं त्यांच्या चिकित्सक नजरेखालून गेली आहेत. गेली अकरा वर्षे दयानंद ठोंबरे अलौकिक या नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत. काही वर्षांपूर्वी एका विशेषांकासाठी मी लिहिलेही आहे.
पिंपरी चिंचवड येथील फ्रान्सिस गजभिव गेली सात वर्षे 'शब्द' नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत. या विशेषांकात वैचारीक, ललित, कविता वगैरे विविध साहित्य प्रकार असतात.
नव्या डिजिटल युगात काही ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन असतात.
गेली ११ वर्षे प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) ह्या स्वरुपात वसई येथून ‘कादोडी’ अंकाचे प्रकाशन ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांच्या संपादानाखाली होत आहे. या अंकांची जन्मकथा संपादक ख्रिस्तोफर रिबेलो यांच्याच या शब्दांत: .
``एका फेसबुक ग्रुपवर काही साहित्यप्रेमींची एकत्र येण्याविषयी चर्चा झाली, त्यानंतर “कुपारी कट्टा” या त्यांच्या स्थानिक समाजाच्या नावाने ते महिन्याला एकदा एकत्र भेटू लागले, जमणारे सर्व साहित्यप्रेमी हे एकाच, “कुपारी” समाजाचे आणि “कादोडी” (वसईच्या उत्तर पट्ट्यातील सामवेदी कुपारी समाजाची बोलीभाषा) ही एक भाषा बोलणारे असल्यामुळे ह्या भाषेच्या उद्धारासाठी काहीतरी केले पाहिजे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यातच ह्या भाषेच्या साहित्याला वाव देणारा अंक प्रकाशित करण्याची कल्पना पुढे आली.
“कादोडी” या भाषेला व्याकरण नाही, या भाषेत उत्तम गोडवा आहे, खूप सुंदर अशा कथा आहेत, अनेक प्रकारची गीते आहेत, पण हे सगळे मौखिक स्वरुपात आहेत. नव्या पिढीला हे सगळे अज्ञात आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचविता यावे, तसेच मौखिक स्वरुपात स्वरुपात असलेला साहित्याचा खजिना कुपारी समाजाच्या तळागाळात नेता यावा तसेच तरुण वर्गात आपल्या भाषेत नवीन लिहिण्याची आवड निर्माण व्हावी आणि यादृष्टीने प्रयत्न व्हावेत म्हणून गेली ११ वर्षे प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) ह्या स्वरुपात ‘कादोडी’ अंकाचे प्रकाशन ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांच्या संपादनाखाली होत आहे. ''
यावर्षी काही दिवाळी अंकात मी लिहिलं आहे, तसंच एका नाताळ अंकातही माझा एक लेख असणार आहे.
नेहेमीप्रमाणं इथं मी नंतर तो टाकणार आहेच. लेखाचा विषय अगदी वेगळाच आहे, इथं टाकल्यावर मी काय म्हणतो यावर तुमचंही कदाचित एकमत होईल.
दिवाळी अंकांतून जशा मोठ्या आर्थिक उलाढाली होतात तशाच या नाताळ अंकांतून सुद्धा होतातच.
अपवाद काही हौशी संपादकांचा जे निव्वळ निखळ आनंदासाठी आपलं काम, नोकरी सांभाळून यासाठी वेळ देत असतात. आणि नाताळाच्या सणानिमित्त वैचारिक फराळ पुरवत असतात.
पंचवीस डिसेंबर तोंडावर आला आहे. नाताळची तयारी घरोघरी होत आहेत. काही नाताळ विशेषांक गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले आहेत.
या दिवसांत आणि या क्षणाला यापैकी अनेक नाताळ विशेषांकांचे संपादक अक्षरशः लगीनघाईत असतील. त्यांच्याशी फोनवर संवाद साधताना हे लक्षात आले.
ख्रिसमसबरोबरच या नाताळ विशेषांकांचीही मी वाट पाहत आहे.


Camil Parkhe 

Wednesday, December 13, 2023

जो बायडेन नवी दिल्लीत

पृथ्वीबाहेर केवळ अवकाशातच नाही तर अगदी चंद्रावर आपले नामोनिशाण असणारी राष्ट्रे एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहेत.

विज्ञानात अशी मोठी प्रगती करणाऱ्या काही राष्ट्रांचे प्रमुख अत्यंत धार्मिकसुद्धा आहेत.
आणि प्रगत विज्ञान आणि धार्मिकता यांचा फारसा संबंध नाही.
जसा आस्तिकता आणि नास्तिकता यांचा नैतिकतेशी दुरान्वयेसुद्धा काहीएक संबंध नसतो.
चंद्रावर आपले वाहन उतरवणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारताचा अलीकडेच समावेश झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती धार्मिक आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
रशियाचे राष्ट्रप्रमुख ब्लादिमीर पुतिन हे सोव्हिएत रशियाच्या राजवटीत खतरनाक केजीबी संघटनेचे प्रमुख होते. त्याकाळात साम्यवादी रशियात देव आणि धर्म हद्दपार करण्यात आले होते.
रशियात सत्तेवर आल्यानंतर पुतिन हे धार्मिक बनले आहेत आणि ख्रिसमसच्या विधीला ते हजर असतात असे वाचण्यात आले होते.
रशियात आणि इतर ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती राष्ट्रांत ख्रिसमस २५ डिसेंबरला नाही तर सहा जानेवारीला असतो. ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती हे ख्रिस्ती धर्मातील कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट या दोन प्रमुख पंथाबाहेरचे.
चीनचे राष्ट्रप्रमुख धार्मिक असणार नाहीत याविषयी शंकाच नको.
चंद्रावर पहिल्यांदा मानवाचे पाऊल ठेवण्याची कामगिरी खूप वर्षांपूर्वी करणाऱ्या अमेरिकेचे सद्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेसुद्धा मोदीजी यांच्याप्रमाणेच धार्मिक आहेत.
अर्थात आपल्या धार्मिकतेचे प्रदर्शन करण्याचा त्यांना सोस नाही आणि गरजपण नाही.
G-20 परिषदेच्या निमित्ताने इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे जो बायडेन नवी दिल्लीत आले आहेत.
दिल्लीत आल्याआल्या त्यांनी या महत्वाच्या परिषदेआधी एक खासगी प्रार्थनाविधी उरकून घेतला. अमेरिकेच्या भारतातील वकिलातीने त्याआधी शिरस्त्याप्रमाणे खूप दिवस पूर्वतयारी केली होती.
बायाडेन यांच्यासाठी शनिवारी खास आयोजित केलेल्या अर्ध्या तासभर चाललेल्या खासगी मिस्साविधी (Holy mass) किंवा Eucharist विषयी आज १० सप्टेंबरच्या अंकात इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी प्रकाशित झाली आहे.
अमेरिका हे एक ख्रिस्ती राष्ट्र आहे असे समजले जाते. आतापर्यंत झालेले सर्व राष्ट्राध्यक्ष जन्माने ख्रिस्ती आहेत. तिथले बहुसंख्य नागरिक प्रॉटेस्टंट पंथीय आहेत, कॅथोलिकपंथीय तुलनेने कमी आहेत.
अलीकडच्या काळातले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झालेले कॅथोलिक पंथीय म्हणजे जे एफ. केनेडी, जिमी (जेम्स) कार्टर आणि आताचे राष्ट्राध्यक्ष जो (जोसेफ) बायडेन.
तर काल आयोजित केलेल्या मिस्साविधीसाठी (Eucharist) दिल्लीतल्या फादर निकोलस डायस यांना खूप आधी पूर्वसूचना देऊन तयारी करण्यात आली होती. फादर डायस हे मूळचे गोव्यातल्या बाणावली इथले.
मिस्साविधी संपल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी फादर डायस यांना आपली भेट (souvenir) म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचा एक अधिकृत शिक्का किंवा राजमुद्रा (नंबर २६१) भेट म्हणून दिला.
या शिक्क्यावर एका बाजूला लिहिले आहे : Joseph R Biden ; 46th President of The United States of America दुसऱ्या बाजूला लिहिले आहे: Seal of the President of the United States
फादर निकोलस डायस यांनी बायडेन यांना `बिबिन्का' या गोव्यातल्या खास खाद्यपदार्थाची भेट दिली.
Camil Parkhe,


आज खूप दिवसांनी खरे तर काही महिन्यांनी सुकटाची चटणी नाश्त्याला खाल्ली. ही चटणी तशी घरी काल रात्रीच तयार झाली होती पण तेव्हाच ठरवलं होतं नाश्त्याला खायची म्हणून. सकाळी श्रीधरनगर बागेत फिरायला गेलो तेव्हा छानपैकी कोवळे ऊन पडले होते आणि बॅडमिंटन खेळण्यासाठी एक ताज्या दमाचा पार्टनर गडीसुद्धा मिळाला. छान घामाघूम झालो होतो पण तेव्हाही मनात घरी असलेल्या सुकटाच्या चटणीची आठवण होतीच. मला स्वतःलाच त्याबद्दल हसूही आले होते.
लहानपणापासून माझ्या एक अत्यंत आवडीचा असलेला हा पदार्थ आजही खास आवडीचा आहे. सुकट आणि बोंबलाची चटणी हे दोन्ही पदार्थ बरोबरीने येतात, ज्याला सुकट आवडते त्याला बोंबीलसुद्धा आवडणार असे मला वाटते. इथे मी सुके बोंबीलबद्दल बोलतो आहे, ओले बोंबील हा वेगळा खाद्यपदार्थ आणि वेगळा विषय आहे. आठवड्यातून किमान एकदोनदा आमच्याकडे रात्रीला तळलेले ओले बोंबिल असतातच. त्याबद्दल नंतर कधीतरी स्वतंत्रपणे लिहिता येईल.
चिकनच्या दुकानांच्या मानाने मासळीची दुकाने तुरळक असतात. मात्र आमच्या कॉलनीच्या तोंडालाच मासळीचे मोठे दुकान आहे. तिथे शनिवारी आणि रविवारी लोकांची झुंबड तुम्ही एकदा पाहायला हवी.
तर श्रीरामपुरला शुक्रवारी दुपारी पाचच्या दरम्यान आठवडी बाजारात बाईचे बोट धरून मी जायचो तेव्हा सर्व पदार्थ घेतल्यानंतर सर्वात शेवटी सुकट आणि सुक्या बोंबलाची खरेदी व्हायची. शुक्रवारी आमच्या घरी कधीही मटण शिजत नसायचे वा खाल्ले जात नसे. त्याला कारण म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारचा संबंध. गंमत म्हणजे मात्र मासे किंवा अंडे या पदार्थांना वशटचा दर्जा नसायचा, त्यामुळे हे पदार्थ शुक्रवारी वर्ज्य नसायचे.
घरी आल्यावर सगळा बाजार पिशवीतून बाहेर काढल्यावर बाई सुके बोंबील साफ करायची, काटेरी डोके आणि शेपूट काढून निम्मे बोंबिल वेगळे काढून ठेवायची आणि बाकीच्या बोंबलाचे त्याच रात्री काळा मसाला घालून कालवण करायची. दर शुक्रवारी आणि शनिवारी बाई आणि दादांचा उपास असायचा, या दिवसभराच्या उपवासाला फक्त पाणी आणि चहा चालायचा. तो उपास बोंबलाच्या या चमचमीत कालवणाने सुटायचा.
मग आठवड्यातून एकदा सुक्या बोंबलाची तर दोनदा सुकटाची चटणी नाश्त्याला असायची. या दोन्ही चटण्या करायची ती पध्दत आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. सुके बोंबील आधी पाट्यावर वरवंट्याने टेचून घ्यायचे, ते बारीक चपटे झाल्यावर हिरव्या किंवा लाल मिरच्या, लसूण घालून पाट्यावर वरवंटा फिरवून एकजिनसी बनवायचे आणि मग तव्यावर तेलाने मस्तपैकी परतून घ्यायचे.
सुकट चटणी करायची पध्दत जवळपास अशीच. बाजरीच्या भाकरीबरोबर मग ही बोंबलाची चटणी किंवा सुकटाची मस्त लागायची.
मी तसा काही `फुडी' वा खवय्या या सदरात मोडणारी व्यक्ती नाही. अशा फूडी लोकांना खाद्यपदार्थांची खास चव असते, खास आवडीनिवडी असतात, त्यांच्या जिभेला विशिष्ट पदार्थांची चव लगेच कळते. माझे तसे नाही. तरीसुद्धा सुकटाची चटणी हा माझा एक खास आवडीचा पदार्थ आहे.
मला आवडते म्हणून एकदा मी श्रीरामपूरहून गोव्याला परत जाण्यासाठी निघालो तेव्हा बाईने सुकटाची चटणी आणि बाजरीची भाकर बरोबर दिली होती. त्यावेळी त्याकाळच्या नॅरो-गेज रेल्वेने प्रवास करताना मिरज- लोंढा स्टेशनच्या दरम्यान रात्री नऊच्या आसपास वर बर्थवर बसलेलो असताना जेवणाचा डबा उघडल्यानंतर माझ्यावर काय प्रसंग गुदरला होता तो किस्सा मागे मी इथे सांगितला होता, त्याची पुनरावृत्ती टाळतो.
गोव्यात पावसाळा सुरू झाला की ताजी मासळी फारशी मिळत नाही तेव्हा मग घरात साठवून ठेवलेली सुकी मासळी जेवणात चव आणते. गोंयकरांच्या दररोजच्या जेवणात मासळी असायलाच हवी. मग ही सुकी मासळी - कधी तळलेली कधी नुसतीच भाजलेली - ताटात येते. हे सुके बोंबिल, तार्ली, बांगडा, सुरमई जेवणात आणि जीवनातसुद्धा चव आणतात.
गोव्यात बहुसंख्य सर्व लोकांना - यात सारस्वत मंडळींसुद्धा आलीच - मासे अत्यंत प्रिय असतात. गोव्यातल्या सारस्वत लोकांत सारस्वत ब्राह्मण तसेच सारस्वत ख्रिश्चनांचाही समावेश होतो. पणजी आणि मडगावसारख्या मतदारसंघांत या दोन्ही सारस्वतांची संख्या लक्षणीय आहे. वर्षातून काही ठराविक दिवशी जेवणात ताजे किंवा सुके मासे नसले तर त्यादिवशी शिवराक जेवण खाणारे कसे कडू तोंड करतात हे गोव्यात शिकत असताना मी अनुभवले आहे.
गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत संरक्षणमंत्री होण्यासाठी बोलावून घेतले. केन्द्रात फक्त संरक्षणमंत्रीपदासाठी राज्यातील मुख्यमंत्री बोलावून घेण्याची प्रथा तशी यशवंतराव चव्हाण, शरद पवार आदींपासून आहे.
तर संरक्षणमंत्री पर्रीकरांचे मन राजधानीत कधी रमलेच नाही, याचे एक प्रमुख कारण म्हणजे नवी दिल्लीत ताजे मासे मुळी मिळतच नाही असे खुद्द पर्रीकरांनी सांगितले आहे.
त्यामुळे पहिली संधी मिळताच म्हणजे त्यांच्या अपरोक्ष गोव्यातल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे पानिपत झाल्यानंतर सत्तेचे नवी समीकरणे जुळवण्यासाठी पर्रीकर मायभूमीत परतले होते.
गोव्यातले माझे एक मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू यांनी आपल्या `मनोहर पर्रीकर, ऑफ द रेकॉर्ड' या पुस्तकात दिल्लीत माशाविना कासावीस झालेल्या पर्रीकरांचा एक किस्सा लिहिला आहे.
``दिल्लीत त्यांना ताजे मासे मिळणे मुश्किल झाले होते. ``जलबिन मछली' अशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती.'' गोव्यातून त्यांना भेटण्यासाठी दिल्लीचे येणाऱ्या कोणाही जवळच्या व्यक्तीने विचारणा केली तर `विसवणाची तळलेली पोस्ता' (रवा लावून तव्यावर तळलेली सुरमई ) आणण्यास ते प्रेमाने सांगत असत असे वामन प्रभूंनी लिहिले आहे.
पर्रीकरांप्रमाणेच कालपरवा एका जवळच्या व्यक्तीने सुकट आणि बोंबलाची चटणी करून देण्याचा आग्रह केला म्हणून बाजारातून सुकट आणि सुके बोंबील आणले.
आमचे घर अगदी वरच्या मजल्यावर असल्याने या खाद्यपदार्थांचा घमघमाट संपूर्ण इमारतीत पसरत नाही. ज्यांना हे पदार्थ आवडतात त्यांच्या मात्र तोंडाला पाणी सुटत असते.
Bon Appetit . . .

Camil Parkhe, 

Saturday, September 16, 2023

हरेगावचे स्थान

 महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही. हरेगाव हल्लीच्या हमरस्त्यावर नाही, मात्र याच हरेगावामुळे या परिसरात हमरस्ते आणि रेल्वे स्टेशने तयार झाले, औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला आणि आसपास श्रीरामपूरसारखे त्याकाळात अस्तित्वात नसलेले शहर निर्माण झाले. ही बाबसुद्धा लोकांना माहित नसणार

अहमदनगर जिल्ह्यातच आणि श्रीरामपूरजवळ असलेले शिर्डी हे स्थळ जगाच्या नकाशावर आपली जागा राखून आहे. मात्र शिर्डी हे नावारुपाला आले ते अलीकडच्या काळात, म्हणजे सत्तरच्या दशकात.
त्याकाळात श्रीरामपूरहून मी आणि माझा एक मित्र सायकलने शिर्डीला जायचो, तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मुले आणि इतर भाविक लोक थेट साईबाबांच्या मूर्तीसमोर बसायचो. देवदर्शन झाल्यावर काही क्षण मंदिरात किंवा पायऱ्यांवर स्वस्थ बसायचे असते, हे मी त्यावेळी शिकलो. आजूबाजूला भिंतीही नव्हत्या आणि अजिबात गर्दी नसायची यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. याउलट हरेगाव मात्र फार पूर्वीपासून एक गजबजलेले ठिकाण होते.
समाजमाध्यमावर ``आम्ही हरेगावकर'' या ग्रुपचा गेली काही वर्षे मी सभासद आहे. हरेगावशी माझे जवळचे नाते आहे.
गेल्या शतकात ब्रिटिश काळात भारतात ग्रामीण भागांत ज्या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाली, त्या स्थळांमध्ये हरेगावचे महत्त्वाचे स्थान आहे.
याचे कारण म्हणजे भारतातला पहिलावहिला खासगी साखर कारखाना हरेगावात ब्रिटिश जमान्यात सुरु झाला होता.
हरेगावात ब्रिटीश काळात सुरु झालेली बेलापूर शुगर फॅक्टरी जशी देशातला पहिला खासगी साखर कारखाना तसेच ब्रिटिशांनी भारतात १९२६ साली बांधलेले पहिले धरण अहमदनगर जिल्ह्यातच अकोले तालुक्यात भंडारदरा येथे आहे. आता ११ टीएमसी क्षमता असलेले हे भंडारदरा धरण जिल्ह्याची जीवनदायिनी आहे.
हरेगावच्या या बेलापूर शुगर फॅक्टरी कारखान्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सामाजिक, आर्थिक आणि साधनसुविधांबाबत मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आले.
आमच्या श्रीरामपूर शहराची तर वेगळीच कथा आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातलं एक प्रमुख आणि तालुक्याचं ठिकाण असलेल्या या शहराला शंभर वर्षांचाही इतिहास नाही. बिनवेशीचं आणि अठरापगड जतिजमातीच्या लोकांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराची मुळी निर्मिती झाली ती इथल्या रेल्वेस्थानकामुळं.
आणि हे रेल्वे स्थानक कशामुळे अस्तित्वात आले ? तर हरेगावातल्या या खासगी साखर कारख्यान्यामुळे!
हे ऐकून नव्या पिढीला आज गंमतच वाटणार आणि सद्याच्या श्रीरामपूर आणि हरेगावची परिस्थिती अगदी विरुद्ध टोकांत बदलली आहे.
आज खुद्द श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्यातले एक मोठे शहर आहे आणि हरेगावची ओळख श्रीरामपूर तालुक्यातले गाव अशी करून द्यावी लागते.
ब्रिटिश अमदानीत पुणे-दौंड- मनमाड या मार्गावर रेल्वे धावू लागली आणि श्रीरामपुरात रेल्वेचा एक थांबा सुरु झाला.
ब्रिटिश काळातच श्रीरामपूर इथून बारा-तेरा किलोमिटर अंतरावर असलेल्या हरेगाव येथे देशातला - अन आशिया खंडातलासुद्धा पहिला - साखर कारखाना सुरु झाला.
दी बेलापूर शुगर कंपनी या एका ब्रिटिश कंपनीनं ही शुगर फॅक्टरी १९२४ साली स्थापन केली. सर जोसेफ के हे या साखर कारखान्याचे संस्थापक. सन 1924 ते 1958 या मोठ्या कालखंडात दी बेलापूर शुगर कंपनी या साखर कारखान्याचे ते सलगतेने चेअरमनपद होते. स्वतंत्र भारतामधील म्हणजेच महाराष्ट्रातीलही साखर धंद्याचे जनक असे त्यांना संबोधले जाते.
तेव्हा जवळ असलेल्या बेलापूर गावाचं नाव या कारखान्याला दिलं, बेलापूर शुगर फँक्टरी. या कारखान्याच्या सोयीसाठी या ठिकाणी एक रेल्वे थांबा दिला गेला आणि या रेल्वे स्टेशनची स्थापना झाली.
या रेल्वे स्टेशनला स्थानिक ठिकाणचे नाव हवे म्हणून इथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलापूर गावाचे नाव देण्यात आलं.
श्रीरामपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या रेल्वे स्टेशनचे `बेलापूर स्थानक' हे नाव आजतागायत कायम आहे, आहे कि नाही गंमत ?
``बेलापूर- श्रीरामपूर के लिये यहा उतरीये'' असे फलक फलाटावर जागोजागी असायचे, ते वाचून गंमत वाटायची.
पुण्यामुंबईत, नाशिक, मराठवाड्यात कुठल्याही रेल्वे स्टेशनवर श्रीरामपूरचे तिकीट मागितले कि तिथला क्लार्क झटकन बेलापूरचे तिकीट देतो, महाराष्ट्राबाहेर मात्र असं चालणार नाही. श्रीरामपूर या नावाचं एक मोठे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमध्ये आहे.
तुम्ही महाराष्ट्राबाहेर भारताच्या एखाद्या कोपऱ्यांत असाल आणि तेथून श्रीरामपूर रेल्वे स्टेशनचे तिकीट मागितले तर अडचणीत येऊ शकाल. हा खुद्द माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग.
पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करुन मी रशिया-बल्गेरियातून भारतात परतलो आणि दिल्लीतून रेल्वे प्रवासात श्रीरामपूरचे तिकीट मागितले तेव्हा गडबडगोंधळ होऊन मला भलतेच तिकीट मिळाले होते.
श्रीरामपूरला (बेलापूरला !) `फॉरेन रिटर्न' मी ओव्हरकोट वगैरे खूप सामानासह उतरलो तेव्हा तिकीट चेकरने अडवल्यावर आणि माझे तिकीट पाहून त्याने मला थांबायला सांगितले.
नंतर कोपरगाव ते श्रीरामपूर असा विनातिकीट प्रवास केल्याबद्दल तिकीट रकमेच्या दुप्पट दंड (सहा रुपये) भरावा लागला होता ! ही घटना १९८६ची आहे.
पुण्यात खडकी येथे लष्कराचे मोठे ठाणे आहे, या विविध लष्करी संस्थांतून रणगाडे, तयार केलेला दारुगोळा, जिप्स वगैरे देशभर वाहून नेण्यासाठी रेल्वेचा वापर केले जातो. तर या वस्तू आणि वाहने मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी खडकी येथील या संस्थापर्यंत रेल्वेचे रूळ जोडले आहेत आणि या रुळांचा वापर केवळ लष्करी सेवांसाठी होतो,
अगदी त्याचप्रमाणे केवळ या साखर कारखान्यासाठी तब्बल तेरा किलोमीटर लांबीचे नॅरो गेज रूळ श्रीरामपूर म्हणजे बेलापूर रेल्वे स्टेशनपासून बेलापूर फॅक्टरीपर्यंत जोडण्यात आले होते.
या बेलापूर शुगर फँक्टरीत कच्चा माल असलेल्या ऊसाची आणि नंतर पक्क्या मालाची म्हणजे साखरेची वाहतूक करण्यासाठी या बेलापूर रेल्वे स्टेशन अन हरेगावचा साखर कारखाना यादरम्यान छोट्या रुळांवर - नॅरो गेजवर - इंजिन आणि मालगाडी धावू लागले. या मालगाडीला `लॅडीस' या नावाने ओळखले जात असे.
हरेगावला आणि श्रीरामपूरला मी असताना अनेकदा या ऊसाने भरलेल्या किंवा मोकळ्या लॅडीसने काही मीटर अंतराचा गार्ड्सची नजर चुकवून अनेकदा प्रवास केला आहे.
साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता.
त्याकाळात हरेगावात डी क्वार्टर्स वगैरे साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या बंगलेवजा कॉलनीज होत्या, आजूबाजूला एकवाडी ,दोनवाडी अशा अनेक वाड्या असायच्या, तेथून बैलगाडयांनी ऊस यायचा, दोन-तीन ट्रॉली असलेल्या खूप धिम्या गतीने चालणाऱ्याट्रॅक्टरमार्फतसुद्धा ऊस आणला जायचा, त्या ट्रॉलीमधून ऊस खेचण्यासाठी लहानमोठे सगळेजण प्रयत्न करायचे. हरेगाव असे नुसते गजबजलेले असायचे.
नंतर श्रीरामपूरजवळच दोन किलोमिटर अंतरावर टिळकनगर येथे खासगी मालकीची महाराष्ट्र शुगर फॅक्टरी सुरु झाली आणि या आधुनिक औद्योगिक क्रांतीमुळे श्रीरामपूर हा नवा परिसर बाळसे धरू लागला आणि थोड्याच अवधीत ते अहमदनगर शहराच्या खालोखालचे जिल्ह्यातले एक मोठे शहर बनले.
ऐंशीच्या दशकापर्यंत श्रीरामपूरजवळचे हे दोन्ही खासगी साखर कारखाने नव्याने उदयास आलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे बंद पडले. एकेकाळी बारा तालुके असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात तेरा साखर कारखाने होते.
बंद पडलेल्या या कारखान्यांवर प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या अवलंबून असणाऱ्या पूरक उद्योगांचे, आसपासच्या हजारो लोकांचे आणि कुटुंबांचे रोटी-रोजगार बुडाले आणि श्रीरामपूरच्या वाढत्या आर्थिक वैभवाला खीळ बसली.
शेजारचा अशोक सहकारी कारखाना याबाबतीत फार मदत करू शकला नाही. त्यामानाने शेजारीच असलेल्या लोणी-प्रवरानगर परिसराने -आधी विठ्ठलराव विखे पाटील आणि त्यानंतर बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय नेतृत्वाखाली खूप मोठी मजल मारली.
एकेकाळी बेलापूर शुगर फॅक्टरीसाठी राज्यभर प्रसिद्ध असलेले हरेगाव हल्ली तिथं भरणाऱ्या मतमाऊलीच्या म्हणजे मदर मेरीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे.
तिथल्या सेंट तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगमध्ये १९७०च्या दरम्यान मी दुसरी आणि तिसरीला असताना होतो. या सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी-रविवारी भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून पाच लाखाच्या आसपास ख्रिस्ती समाज आणि इतर लोक जमतात.
या हरेगावच्या मतमाऊली यात्रेबाबत मी विस्तृत लेख लिहिलेला आहे. माझ्या ``क्रुसाभोवतालचा मराठी समाज'' या पुस्तकात तो समाविष्ट केलेला आहे,
या यात्रेनिमित्त उद्या ऑगस्ट २९ रोजी हरेगावच्या गगनचुंबी देवळात मदर मेरी मतमाऊलीच्या दहा दिवसांच्या नोव्हेना प्रार्थना सुरु होतील. इथले संत तेरेजा चर्च उंचच-उंच मनोऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. इतका उंच चर्च मनोरा तुम्हाला पुण्या-मुंबईत किंवा वसईतसुद्धा सापडणार नाही.
हरेगावात प्रवेश केला कि सुरुवातीलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक पूर्णाकृती पुतळा दिसतो. बाबासाहेबांनी हरेगावला भेट दिली होती, या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आला आहे. मतमाऊलीच्या यात्रेला येणारे अनेक लोक भक्तिभावाने बाबासाहेबांच्याही पुतळ्याला हार घालत असतात.
मुंबईच्या बांद्रा येथील मौंट मेरी यात्रेला पर्याय म्हणून जर्मन जेसुईट फादर गेराल्ड बाडर यांनी हरेगावची मतमाऊली यात्रा सुरु केली. मतमाऊलीच्या यात्रेचे हे अमृतमहोत्सवी (७५) वर्ष आहे.
आता हरेगावला या यात्रेनिमित्त गेलं आणि तिथल्या रस्त्यांची आणि गल्लीबोळांची दुर्दशा पाहिली कि माझ्यासारख्या अनेकांना या गावाचे गत वैभव आठवते आणि मन अगदी खिन्न होतं.

Friday, September 1, 2023

हरेगाव प्रकाशझोतात

 सप्टेंबरच्या सुरुवातीला दरवर्षी श्रीरामपूरपाशी असलेले हरेगाव गजबजलेले आणि प्रकाशझोतात असते.

यावेळीसुद्धा आहे. नेहेमीपेक्षा अधिकच.
त्याबाबतचे कारण तसे फारसे अभिमानास्पद नाही.
``आम्ही हरेगावकर'' या समाज माध्यमवरच्या ग्रुपचा मी सभासद आहे.
इकडच्या दैनिकांतसुद्धा त्याबाबत बातम्या किंवा टिकाटिपण्णी होत नाहीये. परवा हरेगावातल्या त्या अमानुष घटनेतील फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना पुण्यात अटक केली तर पुण्यातल्या एका दैनिकात ही बातमी एका आतल्या पानावर संक्षिप्त वृत्तसदरात दोन वाक्यांत दिली होती.
वृत्तवाहिन्या याबाबत बातम्या देताहेत कि नाही हे मला माहित नाही.
आपल्याकडे कुठलीही अभिमानास्पद किंवा लांच्छनास्पद घटना घडली कि आधी त्या घटनेतील व्यक्तींचा आधी धर्म, नंतर जात, त्यानंतर पोटजात पहिली जाते आणि मग त्यानुसार लोक व्यक्त होत असतात.
याबाबतीत सुद्धा तसेच झाले.
प्रत्येक बाबतींत जातीचा आणि धर्माचा संबंध का जोडायचा, असे विचारणे साहजिकच आणि योग्य आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या आणि विशेषतः अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या कोपरगाव लोकसभा मतदारसंघातील सामाजिक परिस्थितीची माहिती असणे त्यासाठी आवश्यक असते.
याचे एक कारण आहे. इथले दलित एकाच कुटुंबातले, नात्यागोत्यातले आणि भाऊबंद असले तरी ते सगळे जण केवळ एकाच धर्मातले असतीलच असे नाही. त्यासाठी अगदी खोलात जाण्याची गरजही नाही.
यांपैकी कुणावरही अन्याय आणि अत्याचार झाला तर आंबेडकरवादी, डाव्या, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी संघटना, कार्यकर्ते आणि पक्ष आणि नेते लगेच धावून येतात, आपले पाठबळ पुरवतात.
यावेळीसुद्धा तसे होत आहे.
पिडीत तरुण दलित आहेत याबाबत अर्थातच शंका किंवा वाद नाही. आपले पोट भरण्यासाठी कोंबडी, शेळी किंवा कबुतर चोरण्याची वेळ वरच्या जातींतील मुलांवर कधीही येणार नाही, तसे त्यांचे संस्कारही नसतात, हे सर्वांनाच मान्य होईल.
दुसरे म्हणजे तसे झाले तरी भर वस्तीत वरच्या जातींतील तरुणांना असे अर्धनग्न अवस्थेत झाडाला टांगून मारण्याची टाप कुणाची कधीही होणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये याच मुद्दा मांडला आहे.
असे दुर्भाग्य केवळ खालच्या जातींतील - काही बाबतीत अल्पसंख्य समाजातील - लोकांसाठी आरक्षित असते.
पिडित व्यक्तींमध्ये दलित आहेत, तसेच मध्यम स्तरांतील जातींतील मात्र दलित पिडीतांसारखाच आर्थिक स्तर असलेले आहेत.
गुन्हयांमधील दोन मुख्य आरोपींसाठी काम करणारे आणि प्रत्यक्ष मारहाणीत सहभागी असणाऱे काही जण दलित आहेत.
आरोपींनी बनवलेल्या व्हिडीओमुळेच घटनेला वाचा फुटली.
हातपाय एकत्र बांधून झाडाला उलटे टांगून ठेवलेल्या त्या तरुणाचा फोटो काल मी पाहिला. कल्पना करा,एक तरुण पोर सकाळी दहापासून संध्याकाळी सहा lपर्यंत त्या टांगलेल्या अवस्थेत अधांतरी लटकून होते. फोटो पाहावत नाही, त्यामुळे इथे शेअर करण्याजोगा नाहीये. इंटरनेटवर चेहेरा झाकून उपलब्ध आहे.
घटनेचा व्हिडीओ नसता तर ही घटना उघडकीस आलीही नसती.
तर सद्या हरेगावला येणाऱ्या लोकांची रांग लागली आहे.
परवाच २९ तारखेला हरेगावच्या मतमाऊलीच्या आगामी यात्रेनिमित्त संत तेरेजा देवळासमोर नोव्हेना प्रार्थनानिमित्त ध्वजउभारणी झाली.
यावर्षी ८ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या या यात्रेचे ७५वे वर्ष आहे. नऊ दिवसांच्या नोव्हेना प्रार्थनेसाठी गावोगावचे भाविक दररोज या तिर्थक्षेत्री येत आहेत.
महाराष्ट्रातील विविध पक्षांतील नेतेमंडळी त्या दुदैवी घटनेसंदर्भात श्रीरामपूर आणि हरेगावला भेट देताहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी श्रीरामपूरला दवाखान्यात जखमी झालेल्या तरुणांना भेट दिली आहे.
माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी हरेगावला भेट दिली आहे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज हरेगावला जाणार आहेत तर प्रकाश आंबेडकर उद्या शुक्रवारी १ सप्टेंबरला तेथे जाणार आहेत अशा बातम्या आहेत.
मतमाऊली यात्रेवर यंदा त्या घटनेचे या चित्रात दिसते तसे गडद सावट असणार आहे.

Sunday, July 30, 2023

 



दिड-दोन महिन्यांआधी शंभर किंवा दिडशे रुपये किलो असणारे ओले बोंबील काल साडेतीनशे रुपये किलो होते, माझा आवडीचा `ऑल टाइम फेवरेट' असलेला बांगडा मे महिन्याअखेरीस शंभर रुपये किलो होता, त्याची किंमत सुद्धा आता साडेतीनशेच्या आसपास होती.सहज म्हणून चौकशी केली. सुरमई, रावस प्रत्येकी हजार रूपये किलो. नदीतले काही मासे होते, काळेकुट्ट रंगाचे काही खेकडेपण होती पण त्याबद्दल मी काही चौकशी केली नाही.

जिथे जायचे नाही त्या गावाच्या वाटेची कशाला चौकशी करायची ?

ज्याच्याकडून मी नेहेमी (रविवार सोडून- त्यादिवशी केवळ चिकन ) मासे घेतो तो आमच्या घराशेजारचा मासळी दुकानदार पक्का व्यवहारी, धोरणी आहे. दर सोमवारी आणि महिन्यातील काही विशिष्ट तिथी -सणावारी तो दुकान बंद ठेवतो. अनायसे त्याला आणि कामगारांना सुट्टी मिळते आणि धंद्यातला तोटाही वाचतो.कालचीच गोष्ट पाहा ना.

संध्याकाळी घरी तळण्यासाठी काही न्यावे म्हणून दुकानात गेलो तर 'पुढील आठ दिवस अमुकअमुक तारखेपर्यंत दुकान बंद राहील' अशी पाटी होती.खूप हिरमोड झाला. वर्षातून याच काळात जेव्हा मालाची आणि गिऱ्हाईकांचीही आवक कमी असते नेमके तेव्हाच हा दुकानदार धार्मिक पर्यटन, भटकंती अशी विविध कामे उरकून घेत असतो.


र हमरस्त्यावरच्या या दुसऱ्या दुकानात मी गेलो, तिथे प्रत्येक माशांच्या प्रकारांची किंमत त्या-त्या कंटेनरवर लिहिली होती. मॉलमध्ये असते तशी.आणि मासळीची किंमत काहीही असली तरी अनेक बायापुरुष रांगा लावून, हातांत ट्रे घेऊन आपल्याला हवी ती मासे घेत होती, वजन करायला आणि पैसे द्यायला गल्ल्याकडे जात होती.मासे आणायला गेलो की मला हमखास गोव्यातल्या पणजी फिश मार्केटची आठवण येते.

पणजीतल्या आमच्या The Navhid Times इंग्रजी  दैनिकाचे मुख्य वार्ताहर दुपारी साडेबाराच्या आसपास अगदी शेजारीच असलेल्या या फिश मार्केटमध्ये जायचे. त्याआधी शिपायाकडून प्रतिस्पर्धी असलेल्या इंग्रजी किंवा मराठी दैनिकांच्या अंकाची प्रत  मागवायचे आणि त्यात फिश मार्केटमधून मासळी गुंडाळून घेऊन यायचे. स्कुटरच्या डिकीमध्ये ही मासळी ठेवून पर्वरीला ते आपल्या घरी जेवायला आणि दुपारच्या सिएस्ता म्हणजे वामकुक्षीसाठी जायचे.

काही वर्षांनंतर आधी प्रतिस्पर्धी असलेल्या Gomantak Times या दैनिकात ते रुजू झाल्यानंतर मासळी नेण्यासाठी ते काय करायचे हे मला माहित नाही.ताळगावला घरी जाण्याआधी फिश मार्केट मध्ये संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मी जायचो. तिथे बांगडा आणि इतर काही मासळीचे वाटे पसरुन ठेवलेले असायचे. एका वाट्यामध्ये सात आठ बांगडे असायचे. दहा रुपयाला एक वाटा.  बांगडे करी करायला, तळायला सोपे, त्याशिवाय एकच सरळ, मोठा काटा.

हल्ली दहा रुपयाला वाट्यामध्ये मिळणाऱ्या सात-आठ बांगडे माशांची आठवण तशी सुखद वाटते.आणि दुसरे एक.  गोव्यात जसा समान नागरी कायदा शंभर वर्षांपासून, पोर्तुगीज राजवट असल्यापासून, अंमलात आहे, त्याचप्रमाणे तिथे जवळजवळ बहुसंख्य लोक अगदी प्रेमाने, आवडीने मासळी खात असतात. मासळीबाबत अलिखित समान खाद्य संस्कृती ! बंगाली लोकांप्रमाणेच.

अर्थात काही दिवसांचा आणि सणावारांचा तिथेही अपवाद असतोच.काल नेहमीपेक्षा तिपटीने अधिक मासळीची किंमत देऊन मी आलो आणि सहज लक्षात आले.सद्या टमाटे खूप महाग झाले याविषयी सगळीकडे चर्चा झाली, होत आहे, तशी मासळीच्या तात्पुरत्या वाढलेल्या किंमतीची झालेली नाही. 

बहुधा होणारही नाही.

Esakal link 

https://www.esakal.com/blog/price-hike-in-fish-bangda-tomato-inflation-goa-fish-market-kbn00