Did you like the article?

Showing posts with label Congress. Show all posts
Showing posts with label Congress. Show all posts

Thursday, August 27, 2026

 


पुण्यात बुधवारी नेहा बोरा हिचा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम होता.

त्यापैकी एका - कोथरुडच्या गांधी भवनमधील- कार्यक्रमाला मी हजेरी लावली.
गांधी भवनातील अनेक उपक्रमांना मी जात असतो.
तेथील श्रोते आणि वक्तेही नेहेमीच बुजुर्ग मंडळी असतात. साठी आणि सत्तरी ओलांडलेलेच जास्त.
सभागृह क्षमतेच्या निम्मेही कधी भरलेले नसते.
नेहा बोराच्या कालच्या कार्यक्रमात सभागृहात प्रवेश करताना मला गर्दीत अंग चोरुन जावे लागले, कसेबसे भिंतीला पाठ लावून उभे राहून भाषणे ऐकावी लागली इतकी तिथे गर्दी होती.
मोकळया जागेत अनेकांनी बसकण मारली होती.
सर्वांत विशेष म्हणजे श्रोत्यांमध्ये तरुणाईचा मोठा भरणा होता आणि श्रोत्यांपैकी बहुतांश लोक नेहाला ऐकण्यासाठीच आले होते.
नेहाचे भाषण संपले आणि इतर भाषणे ऐकण्यासाठी सभागृहात बसण्यासाठी लगेचच भरपूर खुर्च्या खाली झाल्या यावरुन ते दिसून आले.
नेहा बोरा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज संध्याकाळी तिचा नागपुरात कार्यक्रम आहे.
महाराष्ट्रात हल्ली मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर झेन झी कार्यक्रमाच्या अग्रस्थानी आहेत.
कुठलाही उत्स्फूर्त सार्वजनिक उठाव वा क्रांती नव्या नेत्यांना जन्म देते असे म्हटले जाते.
नव्या पिढीच्या विविध प्रश्नांच्या निमित्ताने देशाच्या राजधानीत जंतरमंतरवर अवतरलेल्या पोरांपोरींच्या आंदोलनाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
कॉक्रेच जनता पार्टीचे अभिजित दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका, कम्युनिस्ट पक्षप्रणित ऑल इंडिया स्टुडंट्स असोशिएशनची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा या मंडळीने सत्ताधारी किंवा सत्तेच्या बाजूने असणाऱ्या लोकांना अगदी जेरीस आणले आहे.

ज्यांनी अजून वयाची तिशीही ओलांडली नाही अशी मुलंमुली अचानक ऑनलाईन बातम्या, रील्स, छोट्या मुलाखती, मिम्स वगैरे माध्यमांतून गेली अनेक दिवस झळकतायेत आणि त्यांना प्रत्युत्तर देताना देशातील राज्यकर्त्या लोकांची दमछाक उडाली आहे.
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना तरुणाईच्या मागे धावावे लागत आहे, त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे लागत आहे.
झेन झी आंदोलनाने काँग्रेस पक्षाला आणि राहुल पक्षाला संजीवनी मिळवून दिली आहे. दोघेही एकमेकांवर कुरघोडी न करता, परस्परांकडे स्पर्धक म्हणून न पाहता पूरक म्हणून काम करत आहेत.
इतर नेत्यांप्रमाणे राहुल गांधी केस रंगवून आपले वय लपवत नाही तरी तरुणतरुणींमध्ये त्यांच्याबद्दल जाम क्रेझ आहे.
राहुल गांधी यांना मुली सहजगत्या स्पर्श करतात, त्यांना आलिंगन देतात. एक मुलगी तर चक्क गालावर किस करते.
सत्तेची पाठराखण करत तरुणाईला साद घालणाऱ्या नेत्यांसमोर असा काही बाका प्रसंग आला तर त्यापैकी काही जण स्कॅण्डलाईज्ड होऊन सार्वजनिक आयुष्यातून निवृत्तीच पत्करतील.
मुख्य प्रसारमाध्यमे अजून तरी तरुणांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असली तरी नव्या पिढीने या माध्यमांना कधीच अडगळीत टाकले आहे.

Camil Parkhe August 27, 2026
See less

Sunday, January 25, 2026

                                                   अश्विनी लांडगे '

प्रमुख राजकीय पक्षांकडून मुसलमान, ख्रिस्ती आणि शीख लोकांना कुठल्याही पातळीवरच्या निवडणुकीत शक्यतो उमेदवारी दिली जात नाही.

मात्र या लोकांनी तथाकथित निधर्मी पक्षांना बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अपेक्षाही बाळगली जाते.
ओवेसी बंधूंच्या एमआयएम पक्षाने महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळवललेया शंभराहून अधिक जागांबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
एके काळी ख्रिस्ती समाजाचे डॉ लिऑन डिसोझा हे मुंबईचे महापौर होते, नंतर त्यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळात आरोग्य खात्याचे राज्यमंत्रीपद भूषवले होते.
त्याच्याही खूप दशके आधी अत्यंत अल्पसंख्य असलेल्या पारशी समाजाचे मुंबईत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत वर्चस्व होते.
सर फिरोजशाह मेहता हे मुंबईचे पहिले अनभिषिक्त सम्राट, (लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांच्या हातून पराभव चाखणारे स. का. पाटील हे खूप नंतरचे.)
हा आता भूतकाळ झाला आहे.

मुंबई-पुण्यात आणि इतर अनेक ठिकाणी ख्रिस्ती समाजाचे प्रमाण लक्षणीय असले तरी त्यांना प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळत नसते. या कारणामुळे या समाजाला कुठल्याही शहरात आणि राज्यातही राजकीय नेतृत्व असे नाहीच.
गेल्या निवडणुकीत (२०१७) ओवेसींच्या एमआयएमने पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अश्विनी लांडगे या ख्रिस्ती महिलेला तिकीट दिले आणि त्या चक्क निवडून आल्या.

त्याआधी अनेक वर्षे पुणे महापालिकेत ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधीत्वच नव्हते.
यांना यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि महापालिकेत त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.
काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने पुण्यात आणि शेजारच्या पिंपरी चिंचवड येथेही इतरही सात जणांना उमेदवारी दिली होती. पण ते निवडून आले नाहीत.
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसच्या ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांनी वांद्रे पूर्व (वॉर्ड क्र. ९०)मध्ये अत्यंत अटीतटीच्या लढतीत अवघ्या सात मतांच्या फरकाने विजय मिळवला.

                                             ट्यूलिप ब्रायन मिरांडा

ट्यूलिप मिरांडा या वकील असून त्यांनी यापूर्वी महापालिकेत कालिना–वांद्रे पूर्व परिसराचे प्रतिनिधित्व केले होते. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीतही त्यांनी हाच वॉर्ड जिंकला होता. या परीसरात ख्रिस्ती मतदारांचे प्रमाण खूप आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरात काँग्रेस नेतृत्वाने ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांची मुंबई प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
ट्यूलिप मिरांडा यांच्यासह आणखी दोन ख्रिस्ती नगरसेवक मुंबई महापालिकेच्या सदनात असणार आहेत.
ते आहेत काँग्रेस पक्षाचे १०१ वॉर्ड क्रमांकचे कॅरेन डिमेलो आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे धारावीच्या १७८ वॉर्ड क्रमांकचे जोसेफ कोळी
विशेष म्हणजे काँग्रेस पक्षावर यावर्षी मुस्लीम आणि ख्रिस्ती मतदारांनी विश्वास टाकला आहे असे दिसते. मुंबईत आणि पुण्यात या पक्षाने ज्या जागा जिंकल्या आहेत त्यात विजयी मुस्लीम उमेदवारांचे - आणि त्यातही महिलांचे - प्रमाण लक्षणीय आहे.
मागच्या वेळी २०१७ साली पुणे महापालिका निवडणुकांत काँग्रेस पक्षाने फक्त नऊ जागा जिंकल्या होत्या. त्याच्या तुलनेत यावेळी पक्षाने सहा जागांची वाढ केली आहे.
एकूण पंधरा जागा जिंकल्या आहेत. यात मोलाचा वाटा मुसलमान आणि ख्रिस्ती मतदारांचा आहे.




याशिवाय वसई विरार महापालिकेत ख्रिस्ती समाजाचे दहा उमेदवार निवडून आले आहेत.
त्यापैकी एक काँग्रेसचे असून बाकीचे नऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आहेत. बविआने यावेळी वसई विरार महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.

                                                      कॅरेन डिमेलो
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत
१. सॅरल डाबरे (काँग्रेस) - वाघोली मर्देस
2. अरुणा डाबरे (भुईगाव)
3. डॉमणिक रुमाव (नंदाखाल)
4. मार्शल लोपीस (नानभाट)
5. बिना फुट्यार्डो (पापडी)
6. लॉरेल डायस (मर्सेस)
7. अलका गमजा (कोळीवाडा)
8.अजय रॉड्रिग्ज (चुळणा)
9. प्रकाश रॉड्रिग्ज (माणिकपूर) आणि
10. मार्शलिन चाको (स्टेला माणिकपूर)

त्याशिवाय वसईजवळच्या मीरा भाईंदर महापालिकेत पुढील सात ख्रिस्ती उमेदवार निवडून आले आहेत :

                                       शॉन कोलासो, मीरा भाईंदर

मेबल नोएल कोरीया (भाजप)
नीला सोन्स (भाजप)
आयरिन क्वाड्रोस (काँग्रेस)
टॅरेन मेंडोन्सा (काँग्रेस)
फ्रिडा बर्नार्ड डिमेलो (शिंदेसेना)
शॉन कोलासो (काँग्रेस)
शर्मिला विन्सन बागजी (शिंदेसेना)
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये यावेळी मेघाली सचिन खेमा या ख्रिस्ती महिला भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत यापूर्वी त्यांचे पती सचिन खेमा हे भाजपतर्फेच निवडून आले होते.
नाशिक महापालिकेत समीर उर्फ जॉय कांबळे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत. जॉय कांबळे यांचे वडील उत्तमराव कांबळे नाशिक महापालिकेत पूर्वी अनेकदा निवडून आले होते.
नगर शहर हे मराठी ख्रिस्ती जनतेचे येरुशलेम. येथील महापालिकेत मात्र याहीवेळेस एकही ख्रिस्ती नगरसेवक निवडून आलेला नाही.
राज्यातील इतर दोनेक महापालिकेत प्रत्येकी एक ख्रिस्ती नगरसेवक निवडून आले आहेत.

^^^

Camil Parkhe




Monday, October 6, 2025

 

                                                                        राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

आता निर्माण झाले आहे जवळपास अगदी तसेच वातावरण सहासात वर्षांपूर्वी निर्माण झाले होते.
राष्ट्रपती सदनातून नुकतेच पायउतार झालेले महामहिम प्रणवदा मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्विकारले आहे असे वृत्त झळकले तेव्हा आतासारखाच पुरोगामी गटात सन्नाटा पसरला होता आणि प्रतिगामी म्हणा किंवा उजव्या गटात म्हणा आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या.
प्रणवदा यांच्या रुपाने संघाच्या गळाला खूप मोठा देवमासा लागला होता यात शंकाच नव्हती.
इंदिराबाईंच्या हत्येनंतर मॅडमच्या मंत्रिमंडळात दोन क्रमांकाचे स्थान असलेल्या मुखर्जी यांनी लगेच एक क्रमांकाच्या जागेवर आपला हक्क सांगितला होता. त्यामुळे पंतप्रधान पदावर आलेल्या राजीव गांधी यांनी त्यांना सत्तेबाहेर ठेवले होते.
विजनवासाचा तो अल्पकाळ वगळता त्यांची संपूर्ण कारकीर्द सत्तेच्या उबेत गेलेली होती. स्वबळावर आपल्या पश्चिम बंगाल राज्यात कुठल्याही पदावर निवडून येण्याची क्षमता नसतानासुद्धा.
नवलाची बाब म्हणजे नंतर सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आल्या आणि नंतर त्यांनी आपल्या पक्षाला महाराष्ट्रासह विविध राज्यांत पुन्हा सत्तेवर आणले, केंद्रातही सलग दोनदा सत्तेवर आणले.
या काळात प्रणवदा त्यांचे सर्वांत अधिक विश्वासू सहकारी होते. त्यामुळेच मुखर्जी देशाच्या सर्वोच्च म्हणजे राष्ट्रपतीपदावर पोहोचले.
काँग्रेस सत्तेतून पायउतार झाल्यानंतर हेच प्रणव मुखर्जी संघाच्या गळी लागले. प्रणवदा यांनी संघाच्या मंचावर जाण्याचे निमंत्रण स्विकारले यावरुन त्यावेळी मोठे वादंग निर्माण झाले होते.
असे असतानाही मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात हजर राहिले, तेथे त्यांनी भाषणा केले. ही बाब संघाने आपलीच पाठ थोपटून घेण्यासारखी होती यात वादच नव्हता.
नंतर प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या हयातीतच आणि सर्व संवेदना शाबूत असताना भारतरत्न मिळाले.
त्याबद्दलसुद्धा त्यांना अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटले असेल.
हे भाग्य तर भाजपच्या इतर कुठल्याही नेत्याला आजतागायत लाभलेले नाही.
संघाला आणि भाजपला आपले नेते आणि आदर्श नेहेमीच आयात करावे लागतात, हल्ली आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा.
आपल्या घरातील व्यक्तीने - मग ते पंतप्रधान का असेनात - आपले कौतुक करावे यात काय ते विशेष?
आपल्याला कधीकाळी पाण्यात पाहणार्या लोकांनी आपल्या मांडवात येऊन, आपल्या झेंड्याखाली येऊन, आपल्या प्रतिमांना वंदन करणे निश्चितच अभिमानास्पद असते.
त्यामुळेच खासदारबाईंची कार्यक्रमात हजेरी, जुन्या काँग्रेस नेत्यांचे गणवेशातले संचलन आणि झेंड्याला सलामी याला महत्त्व आणि बातमीमुल्य प्राप्त होते.

Camil Parkhe


Tuesday, June 10, 2025

 



छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

सत्तरच्या दशकापासून आधी मुंबईच्या अन नंतर पूर्ण महाराष्ट्रात गेली पन्नासाहून अधिक वर्षे राजकारणात चमकत राहिलेल्या भुजबळ यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेत आपली ताकद दाखवून दिली आहे.
सत्तरच्या दशकात मनोहर जोशी आणि छगन भुजबळ हेच शिवसेनेचे दोन चेहेरे पूर्ण महाराष्ट्राला परिचित होते.
मुंबईचे नगरसेवक, महापौर, आमदार अशा शर्यतीत जोशी आणि भुजबळ असे दोघेही होते आणि शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन्ही नेत्यांना गोंजारत असत.
भुजबळ यांनी नंतर शिवसेनाच सोडली आणि काँग्रेसचा पंजा हाती धरला.
त्यावेळी संतापलेल्या शिवसैनिकांच्या रोषामुळे भुजबळांना अनेक दिवस अज्ञातवासात राहावे लागले होते.
शिवसेनेच्या बाळा नांदगावकर यांनी माझगाव मतरदारसंघात त्यांचा पराभव केला तेव्हा भुजबळ आता संपले असेच चित्र निर्माण झाले होते.
मात्र तसे झाले नाही .
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत भुजबळ कायम सत्तेत होते आणि महत्त्वाची मंत्रीपदे बाळगून होते.
काही काळ तर ते उपमुख्यमंत्रीसुद्धा होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकार आले तेव्हा भुजबळ यांनी त्याच्या आयुष्यातील अत्यंत खडतर काळ अनुभवला.
जवळजवळ अडीच वर्षे त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात ठेवण्यात आले होते.
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील झाली तेव्हा भुजबळसुद्धा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले होते.
महायुती सरकार बहुमताने सत्तेवर आल्यानंतर मात्र गेली काही महिने ते सत्तेबाहेर ताटकळत उभे होते.
सत्त्यात्तर वर्षे वयाच्या छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली.
राज्यातील विविध स्तरांवरच्या सत्तेत सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम करणाऱ्या मोजक्या राजकारणी व्यक्तींमध्ये भुजबळ यांचा समावेश आहे.
Camil Parkhe May 20, 2025



Sunday, June 30, 2024

विरोधी पक्षनेता

 भारतात २०१४ सार्वत्रिक निवडणुकीत खूप दीर्घ कालावधीनंतर जनतेने एकाच पक्षाच्या हाती सत्ता दिली. लोकशाही व्यवस्थेत ही निश्चितच चांगली बाब.

टेलिव्हिजनचा जमाना तोपर्यंत रुढ झाला होता, लोकसभेच्या सभागृहात तेव्हा घडत असणारी ती घटना मी छोट्या स्क्रीनवर पाहत होतो ते दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे
नवे सभागृह अस्तित्वात येते त्यावेळी सर्वप्रथम निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी शपथ घेतात. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांना राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याकडून आधीच शपथ दिलेली असते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची आसनव्यवस्थासुद्धा निश्चित झालेली असते.
तर २०१४ साली संसदेच्या नवे सभागृह अस्तित्वात आले तेव्हा विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा प्रश्न आला.
तेव्हा कुठल्याही विरोधी पक्षांकडे राज्यघटनेने ठरवून दिलेली लोकसभा खासदारांची संख्या नसल्याने आता विरोधी पक्षनेता हे पद असणार नाही असा निवाडा लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी दिला.
लोकशाही व्यवस्था आणि अधिकृत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता नाही, असे कधी शक्य तरी आहे का?
हो, तसे शक्य आहे कारण आपल्या राज्यघटनेत तशीच तरतूद आहे.
लोकसभेच्या सभासदांच्या संख्येच्या दहा टक्के सभासद असले तरच त्या पक्षाला अधिकृतपणे विरोधी पक्षाचा दर्जा मिळते आणि त्या पक्षाच्या नेत्याला अधिकृतपणे विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता आणि इतर सर्व हक्क आणि अधिकार मिळतात.
काँग्रेस पक्षाला किंवा इतर कुठल्याही पक्षाला लोकसभेत दहा टक्के म्हणजे ५५ जागा मिळू शकल्या नाही म्हणून कुठलाही पक्ष अधिकृतपणे विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळू शकला नाही.
काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्षाच्या विरोधी आघाडीने दहा टक्क्यांहून अधिक जागा मिळवल्या असल्या तरी ते विचारात घेतले गेले नाही
स्वतंत्र भारताच्या इतिहासात या देशात पहिल्यांदाच.
असे घडत होते, असे नव्हते.
यापूर्वीही असे अनेकदा घडलेले आहे. विशेषतः देशात काँग्रेसला सगळीकडे जनाधार असायचा त्याकाळात.
विरोधी पक्षाचे महत्त्व, हक्क आणि अधिकार याबाबत देशातील लोक अधिक जागरुक झाले ते सत्तरच्या दशकातील आणीबाणी पर्वाच्या अनुभवानंतर.
मात्र त्यानंतर सुद्धा इथला विरोधी पक्षाचा आवाज पुर्णतः गायब होईल अशी कुणी कल्पना केली नव्हती. कारण आणीबाणीनंतर प्रत्येक वेळी मतदारांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला योग्य ते स्थान आणि जागा दाखविली होती.
देशात पुन्हा एकदा पूर्ण बहुमताची म्हणजेच निरंकुश सत्ता येण्यासाठी मोठा कालावधी लागला. हे घडले २०१४ ला
पुढल्या २०१९ च्या निवडणुकीत असेच झाले.
तर २०१४ नंतर इथला लोकशाही कारभार तब्बल दहा वर्षे विरोधी पक्षाविना आणि विरोधी पक्षनेत्याशिवाय चालला.
देशातील जनतेचा हा कौल आहे, सत्ताधारी पक्ष किंवा लोकसभा सभापती याबाबत काहीच करु शकत नाही, असे त्यावेळी म्हटले गेले.
कधीकाळी कुणा राजकीय नेत्याने आपण देश काँग्रेसमुक्त करु असे वक्तव्य केले होते, दुसऱ्या एकाने आपला पक्ष देश विरोधी पक्षमुक्त करु असे म्हटले होते.
त्यामुळे देशात आता विरोधी पक्षच नाही, विरोधी पक्षनेता नाही, याबाबत अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
खरे पाहता काँग्रेस आणि इतर पक्षांच्या आघाडीची एकत्रित संख्या मिळून एका पक्षाला विरोधी पक्ष म्हणून आणि पक्षनेता म्हणून मान्यता देणे फार मोठी अवघड बाब नव्हती.
त्यासाठी कायद्यात असलेल्या दहा टक्क्याची अट बदलता येणे सुद्धा सहजशक्य होते.
राज्यघटनाकारांनी या दहा टक्क्याची अट ठेवली तेव्हा या संख्येपर्यंत कुठलाही राजकीय पक्ष मजल गाठू शकणार नाही असा त्यांनी विचारही केलेला नसणार.
काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या 'सकाळ टाइम्स' या इंग्रजी दैनिकाने मला थायलंड येथे एका आंतरराष्ट्रीय औद्योगिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पाठवले होते. माझ्यासह भारतातले सहा आणि जगातून सत्तरच्या आसपास पत्रकार या परिषदेला हजर होते.
त्यानिमित्ताने वेगवेगळ्या देशांतील पत्रकारांशी मला संवाद साधता आला, अनेकांशी मैत्रीही झाली.
एकदा असेच बसमधून प्रवास करताना आम्ही एका चीनमधील एका तरुण पत्रकाराशी बोलत होतो. संभाषण अचानक लोकशाही व्यवस्थेकडे वळले.
"तुमच्या चीनमध्ये लोकशाही पद्धत नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?" असे एकाने म्हटले.
"लोकशाही? लोकशाही म्हणजे काय?
I have not experienced what is democracy. And so I don't know what you are talking about!" असे त्या विशीतल्या पत्रकाराने म्हटले होते!
यावर लोकशाही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष वगैरे मुद्दे चर्चेत आले अन् बसप्रवास संपला त्यामुळे आमचे संभाषणसुद्धा थांबले.
त्यानंतर त्या तरुण चिनी पत्रकाराशी पुन्हा बोलण्याची मला संधी मिळाली नाही.
तर विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना सभागृहात आणि बाहेर जाब विचारु शकतो, विरोधी मत मांडू शकतो. विरोधी पक्षनेता हे पद केवळ आणि केवळ अस्सल लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशातच असू शकते.
चीनमध्ये, रशियात किंवा इतर तथाकथित लोकशाही असणाऱ्या देशांत तसेच लष्करशाही, राजेशाही किंवा उघडउघड हुकूमशाही असणाऱ्या देशांत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता असूच शकत नाही.
यापैकी काही देशांत विरोध करणाऱ्या नेत्यांची जागा तुरुंगात किंवा अंधारकोठडीत असते. त्यांची सरळसरळ हत्याही होत असते हे आपण वृत्तपत्रांत वाचत असतो.
खोटेनाटे आरोप करुन या विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबले जाते, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान असलेल्या झुल्फिकार अली भुट्टो यांना तर तडकाफडकी फाशीही दिले जाते.
त्यामुळे लोकशाहीत विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता असणे आणि महत्त्वाचे म्हणजे हे पद सन्मानाचे असणे सुद्धा महत्त्वाचे असते.
एक उदाहरण सांगतो. काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातली पिंपरी चिंचवड महापालिका मी बातमीदार म्हणून कव्हर करत होती. आम्ही काही बातमीदार मंडळी कुठल्याशा कारणाने श्रीरंग बारणे यांना भेटायला त्यांच्या कक्षात गेलो. बारणे त्यावेळी महापालिकेत विरोधी पक्षनेता होते
बारणे मूळचे काँग्रेसचे नगरसेवक, नंतर शिवसेनेत जाऊन दोनदा नगरसेवक झाले. शिवसेनेने त्याकाळात महापालिकेत विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या, त्यामुळे बारणे यांना विरोधी पक्षनेता हे पद मिळाले होते.
तर विरोधी पक्षनेता म्हणून बारणे यांना खूप मोठे कशा आणि दालन मिळाले होते, महापालिकेच्या सभागृहात आणि कामकाजात त्यांचा दबदबा होता.
विरोधी पक्षनेता पद किती महत्त्वाचे आणि आवश्यक असते याची जाणीव यावेळी पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली होती. (श्रीरंग बारणे यावेळी तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत).
हिच परिस्थिती लोकशाही व्यवस्थेत राज्यपातळीवर आणि देशपातळीवर असणे आवश्यक असते. विविध देशांतील प्रमुख आणि राजकीय नेते दुसऱ्या देशांच्या भेटीवर येतात तेव्हा सत्ताधारी नेत्यांना भेटून झाल्यावर ते विरोधी पक्षनेत्यांना भेटण्याचा संकेत जरुर पाळत असतात.
सुदृढ लोकशाहीतली ही एक चांगली परंपरा आहे, कारण आजचा विरोधी पक्ष विरोधी पक्षनेता आगामी काळातला सत्ताधारी असू शकते, ही त्यामागची जाणिव असते.
आपल्या देशात इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, राजीव गांधी, पी व्ही. नरसिंह राव, सुषमा स्वराज, शरद पवार, सोनिया गांधी यांना विरोधी पक्षनेता हे पद सन्मानाने देण्यात आले होते.
महाराष्ट्रात शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस वगैरेंनी विरोधी पक्षनेता या पदाची प्रतिष्ठा वाढवली आहे. यात अतिशयोक्ती मुळीच नाही.
दहा वर्षांच्या काळानंतर भारतात पुन्हा एकदा विरोधी पक्षनेता या पदावर एका व्यक्तीची सन्मानपूर्वक नेमणूक होत आहे, ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे.
Camil Parkhe,

Tuesday, October 11, 2022

 
सोनिया गांधी


पुण्यात केदारी ग्राऊंडवर काँग्रेसच्या प्रचारसभेत सोनिया गांधी बोलणार होत्या , सभेची जोरात तयारी चालू होती आणि माझी तगमग होत होती. प्रचार सभेला जाण्याची, सोनिया यांना पाहण्याची आणि ऐकण्याची तीव्र इच्छा होती, मात्र आता मी न्यूज डेस्कवर असल्याने आणि बातमीदार नसल्याने मला जाणे शक्य नव्हते. सोनिया यांना प्रत्यक्ष पाहण्याची, त्यांचे बोलणं ऐकण्याची संधी मला आजपर्यंत मिळाली नाही याची खंत आजही आहे.

पंतप्रधानपदावर असलेल्या किंवा या पदावर नंतर आलेल्या इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, पी व्ही नरसिंह राव, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्र शेखर यांच्याबरोबर हस्तांदोलन करण्याची, त्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांत सहभागी होण्याची, त्यांच्या कार्यक्रमाला हजार राहण्याची संधी गोव्यात आणि पुण्यात मला बातमीदार म्हणून मिळाली आहे. कुणाही व्यक्तीला प्रत्यक्ष पाहण्याचा, भेटण्याचा अनुभव काही औरच असतो.
वृत्तपत्र कामगार चळवळीत पदाधिकारी या नात्याने मी सक्रिय असताना एकेकाळी साथी जॉर्ज फर्नांडिस माझे आणि कामगार चळवळीतल्या अनेकांचे दैवत होते. पत्रकारितेत मी चार दशके असूनही एकदाही जॉर्ज यांना पाहण्याची, त्यांच्याशी बोलण्याची मला संधी मिळाली नाही अशी खंत आहे.
गेली दोन दशके देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या सोनिया गांधी यांच्याविषयीसुद्धा अशीच भावना आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनांनंतर पंतप्रधान म्हणून कामराज,.निजलिंगप्पा वगैरे काँग्रेसच्या दृढाचार्यांनीं इंदिरा गांधी यांची निवड केली कारण त्या `गुंगी गुडिया' आहेत असा त्यांचा समज होता.
मूळच्या इटालियन, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी त्यांच्या बरोबर पंतप्रधान निवासात अनेक वर्षे राहूनसुद्धा सार्वजनिक जीवनापासून चार हात राखून असणाऱ्या सोनिया गांधी यांच्याविषयी असाच समाज प्रचलित होता. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे घेण्यास बराच काळ ठाम नकार दिला होता.
मात्र पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात काँग्रेसला परत सत्तेपासून दूर जावं लागले आणि पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांच्या काळात या पक्षाची पार वाट लागते आहे हे पाहिल्यावर सोनिया यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळेस लोकसभेत त्या आपले हिंदी भाषण वाचून करत असत त्यावेळी त्यांची किती तरी टर उडवली जात असे.
त्याकाळात आजच्या सारखी आयटी सेल्स आणि ट्रोल्स नव्हते तरी सोनिया यांना प्रचंड मानहानी सहन करावी लागली.
विशेषतः समाजवादी पक्षाचे मुलायम सिंग यादव यांचा पाठिंबा गृहीत धरुन त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने १९९९ साली पंतप्रधानपदावर दावा केला आणि मुलायम यांनी नकार दिल्यावर त्या तोंडघशी पडल्या होत्या.
सोनिया राजकारणात सक्रिय झाल्या आणि लगेचच संसदेत त्यांच्या पक्षाचे नेते असलेल्या शरद पवार यांनी सोनियांच्या विदेशी असण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी चूल मांडली.
हा सोनियांना मोठा धक्का होता. मात्र केवळ सहा महिन्यातच पवारांच्या पक्षाने काँग्रेसचा हात जवळ केला, महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांच्या आघाडीनं सत्ता स्थापन केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसचा साथीदार बनला तो आजतागायत.
त्यानंतर खंबीरपणे लढून सोनिया यांनी एकामागे एकेक राज्यांत पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यात सुरुवात केली तेव्हा मग त्यांच्या विरोधकांची वाचा काही प्रमाणात बंद झाली.
विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात `शायनिंग इंडिया' आणि लाल कृष्ण अडवाणी यांच्या शब्दांत `फिल गुड' वातावरण असल्याने २००४ साली सहा महिने आधीच लोकसभेच्या निवडणूक घेण्यात आल्या आणि सर्वांना - राजकीय निरीक्षकांनासुद्धां - धक्का देत काँग्रेसने केंद्रात सत्तेवर पुनरागमन केले.
नंतर २००९ ला सोनिया यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पुन्हा आणि अधिक जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्ता मिळवली.
या काळात सोनिया गांधी यांच्या कर्तृत्वाने शिखर गाठले. दीडशे वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासात त्या सर्वाधिक काळ पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत,
दोनदा पंतप्रधानपदी आणि दोनदा राष्ट्रपतिपदी एखाद्या व्यक्तींची निवड करण्याची त्यांना संधी लाभली. विशेष म्हणजे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या दोन मुदतीच्या कालखंडात त्यांचे आणि सोनिया यांचे अत्यंत सौहार्दाचे संबंध राहिले आणि आजही तसेच आहेत हे आपण पाहतो आहेच.
काही वर्षांपूर्वी `मौत का सौदागर' असं त्यांनी विशेषण वापरलं तेव्हा सोनिया यांच्या विरोधात केवढी मोठी राळ उडवण्यात आली होती. याच सोनिया यांना `पांढऱ्या चामडीची' आणि `काँग्रेसची विधवा' असं विशेषण भर सभेत लावलं गेलं तेव्हा मात्र सूचक मौन राखले गेले होते.
गेल्या वीस वर्षांच्या काळात सोनिया यांच्याबद्दल प्रचंड विषारी प्रचार झालेला असला तरी त्यांची जनमानसातली प्रतिमा आजही आदराची राहिलेली आहे हे अनेकदा दिसून आले आहे.
गेली काही वर्षे आजाराशी सामना करत असलेल्या सोनिया खूप दिवसांनी जाहीर कार्यक्रमात सामील झाल्या. देशात प्रेमाचे, सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी बाहेर पडलेल्या आपल्या मुलाला राहुल गांधी यांना नैतिक बळ देण्यासाठी त्या पायी चालल्या.
वृत्तपत्रांत, मुख्य प्रसारमाध्यमांत या भारत जोडो यात्रेची दखल घेत जात नसली तरी सोशल मिडियावर सोनिया आणि राहुल गांधी यांचे कौतुक होत आहे हे स्पष्ट जाणवते.

या वर्षी सोनिया गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या इतिहासात एक महत्त्वाची घटना घडली. पंचवीस वर्षांनंतर लोकसभेतील सदस्यत्व सोडून त्या राज्यसभेच्या सभासद बनल्या. यामागे एक दुःखाचीही आणि खेदाची किनार होती. उत्तर भारतात आणि विशेषतः उत्तर प्रदेशात काँग्रेसची मोठी पिछेहाट होत होती आणि त्यामुळे राहुल गांधींना केरळमधून लोकसभेत होते आणि सोनिया यांच्या रायबरेलीतील जागेचेही भवितव्य अधांतरी होते. पण यावर्षी काँग्रेसच्या नशिबाचे पारडे अचानक फिरले. काँग्रेसच्या जागा दुप्पट वाढल्या, पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळाले आणि प्रियांका गांधीसुद्धा लोकसभेत आल्या. गेल्या सात दशकाच्या काळात नेहरु-गांधी कुटुंबातील किमान एक व्यक्ती सतत संसदेत प्रतिनिधित्व करत आलेली आहे. मोतीलाल नेहरु यांच्यापासून या कुटुंबाने देशासाठी केलेला त्याग - तुरुंगवास आणि प्राणाहुती - तर सर्वांना माहित आहेच. सोनिया गांधींना त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा


^^^^
Camil Parkhe, October 7. 2022