Did you like the article?

Sunday, March 27, 2022

गोवा  आणि दादरा, नगर हवेली, दमण  येथील पोर्तुगीज संस्कृती  


Our Lady of Piety Church, Silvassa 

मागच्या आठवड्यात मी दादरा, नगर हवेली, दमण आणि दिव केंद्रशासित प्रदेशात होतो. अनेकांना हा प्रदेश किंवा ही शहरे भारताच्या नकाशात कुठे आहेत ते माहितही नसेल, दोनेक वर्षांपूर्वी मलासुद्धा माहित नव्हते. गोव्याचे या दादरा-नगर हवेली दमण आणि दिव या केंद्रशासित प्रदेशाशी खूप जुने म्हणजे पाच शतकांपासूनचे नाते आहे. एकमेकांपासून शेकडो मैल दूर असल्याने बोलीभाषा, पेहराव, संस्कृती भिन्न असली तरी या प्रदेशांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे तेथे साडेचार शतके असलेली पोर्तुगीज सत्ता.

तर मागच्या आठवड्यात या केंद्रशासित प्रदेशात असताना एका मासिक स्मृती म्हणजे `मन्थस माईंड' या विधीसाठी इथल्या चर्चमध्ये अचानक जावे लागले. झटपट तयार होऊन मी त्या चर्चमध्ये पोहोचलो आणि थोडासा शरमिंदा झालो तरी थोडक्यात बचावलो अशीही भावना झाली.
त्या चर्चमध्ये जमलेले सर्व स्त्री-पुरुष हे `मोर्निंग क्लोथ्स' च्या ड्रेस कोडमध्ये म्हणजे सफेद शर्ट किंवा फ्रॉक आणि काळ्या रंगाची पॅन्ट किंवा स्कर्ट, काळ्या रंगाचे पॉलीश केलेले चकाकते बूट किंवा सँडल्स आणि अशाच पद्धतीच्या सुतक दर्शवणाऱ्या पेहेरावात होते. मी स्वतः सफेद शर्ट घातला होता तरी पॅन्ट मात्र करड्या रंगाची होती आणि बुटसुद्धा पूर्णतः काळ्या रंगाचे नव्हते. त्या काँग्रीगेशनमध्ये मी एकटाच अशा पेहेरावात असले तरी हे चालून घेण्यासारखे होते, मी भडक लाल, हिरवा किंवा पिवळा शर्ट घातला नव्हता याबद्दल मी स्वतःलाच मनोमन धन्यवाद दिले.
त्या संध्याकाळी त्या मासिक स्मृतीच्या संपूर्ण मिस्साविधीमध्ये सर्व गायने पोर्तुगीजमध्ये होती ! गिटार, किबोर्ड आणि इतर संगीतवाद्यांच्या साथीत गाणाऱ्या चर्चच्या कॉयर ग्रुपने या गायनासाठी भरपूर मेहनत घेतली होती ते जाणवत होते. त्या पोर्तुगीज गायनाचे शब्द माहित नसल्याने मी लगेचच समोरच्या बाकातल्या शेल्फमधले गायनपुस्तक काढून त्या पोर्तुगीज गायनात सहभागी झालो.
चर्चमधला विधी संपला आणि नंतर त्या दिवशी त्या मिस्साविधीमधली सर्व हिम्स म्हणजे गायने पोर्तुगीज भाषेतली का होती याचा उलगडा झाला.
मागच्या महिन्यात वयाची ऐंशी पार करुन निधन पावलेली महिला त्या चर्चच्या गायकवृदांची सदस्य होती, दमण आणि सिल्व्हासा येथील अनेक ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच पोर्तुगीज बोलणारी होती. त्यामुळॆ त्या महिलेला आदरांजली म्हणून सर्व गायने पोर्तुगीज भाषेतील निवडण्यात आली होती. शक्य असले तर संपूर्ण मिस्साविधी आणि प्रार्थनासुद्धा पोर्तुगीज भाषेत झाल्या असत्या, मात्र तेथे जमलेले फादर आणि सर्व भाविकांना आता पोर्तुगीज येत नसल्याने तसे झालो होते.
भारतातील जनमताच्या रेट्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिणामाची चिंता न करता पंतप्रधान पंडित नेहरू यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी केलेल्या लष्करी कारवाईनंतर गोवा, दमण आणि दीव इथली पोर्तुगीज सत्ता संपली. त्याआधी म्हणजे १९५४मध्ये दादरा-नगर हवेली हे गुजरातच्या सीमेलगतचे चिमुकले प्रदेश भारतात सामिल झाले होते. काश्मीरप्रश्नी चूक केल्याबद्दल पंडित नेहरूंना सतत धारेवर धरले जाते, मात्र गोवा, दमण आणि दीव विना रक्तपात रातोरात पोर्तुगिजांच्या सत्तेतून मुक्त करून भारतात सामिल केल्याबद्दल मात्र त्यांचे कधी कौतुक केले जात नाही.
अलिकडेच म्हणजे २०१९ साली अस्तित्वात आलेल्या या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दमण त्या आहे तर आधीची राजधानी असलेले सिल्व्हासा हे एक मोठे शहर आहे. इथे सांगण्याचे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या केंद्रशासित प्रदेशाचा सर्व भाग साडेचारशे वर्षे पौर्तुगीज वसाहत होती, तर दमण आणि दिव हे १९६१ ते १९८७ पर्यंत गोवा, दमण आणि दिव केंद्रशासित प्रदेशाचा भाग होते.
सिल्व्हासा हे नगर हवेलीमधले मुख्य शहर. पोर्तुगीज काळात दादरा-नगर हवेलीची ती राजधानी होती. विशेष म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले दमण हे समुद्रकाठी असल्याने समुद्रमार्गे पोर्तुगीजांचा या शहराशी थेट संपर्क असे. दादरा-नगर हवेली मात्र समुद्रकिनारी नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय भूमीवरून या पोर्तुगीज प्रदेशात जाणे-येणे भाग असायचे. तरीसुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही, अगदी १९५४पर्यंत दादरा-नगर हवेली हा छोटासा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला, हे विशेषच.
वास्तविक पाहता दमणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेले दादरा-नगर हवेली हे प्रदेशसुद्धा गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे भाग झाले असते, मात्र गोवा मुक्तीआधी केवळ सात वर्षांपूर्वी दादरा-नगर हवेली भारतात सामील झाले आणि गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश लष्करी कारवाईनंतर १९६१ साली.
पणजीतल्या धेम्पे कॉलेजातून मी १९७८ साली बारावीची परीक्षा दिली. त्यामुळे माझ्या बारावीच्या बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आणि प्रमाणपत्रावर गोवा, दमण आणि दीव बोर्डाचे नाव आणि शिक्का आहे. भारताच्या नकाशावर एक नजर टाकून गोव्याचे आणि दमण व दीवचे भौगोलिक स्थान पाहिले तर कुणालाही धक्काच बसेल. गोवा हे एका जिल्ह्याच्या आकाराचे आहे, तर दमण व दीव हे तालुक्याच्या आकाराचे आहेत. हे तीन चिमुकले प्रदेश एकमेकांपासून शेकडो किलोमीटरच्या अंतरावर आहेत.
१२ तालुक्यांचा मिळून एक जिल्हा बनलेल्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे दमण व दीव हे दोन तालुके असायचे. या केंद्रशासित प्रदेशाचे दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेल्या दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर, त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर आणि प्रतापसिंह राणे यांनी मुख्यमंत्री म्हणून कधी या दोन तालुक्यांना भेट दिली असेल, याबद्दल शंका वाटावी इतके ते गोव्यापासून दूर आहेत.
दमण हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यापाशी आणि गुजरातच्या सीमेशेजारी आहे. गोव्याहून रस्तामार्गे दमणला येण्यासाठी १५ तास लागतात, तर दमण येथून दीव येथे जाण्यासाठी आणखी १५ तास लागतात. ते गुजरातच्या दुसऱ्या टोकाला आहे.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे अस्तित्व जेमतेम २५ वर्षांचे म्हणजे डिसेंबर १९६१ ते जून १९८७पर्यंतचे. या काळात माझे गोव्यात उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. माझ्या पत्रकारितेचा पाया तेथेच घातला गेला. त्यामुळे गोवा, दमण आणि दीव माझ्या भूतकाळाचा नव्हे तर आयुष्याचाच एक भाग बनला. गोवा स्वतंत्र राज्य झाल्यावर या केंद्रशासित प्रदेशाचे १९८७ साली विभाजन झाले, हे तीन प्रदेश एकमेकांना परके झाले. त्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी (२०२०) मी दमण येथे पाऊल ठेवले, सिल्व्हासा येथे पोहोचलो, तेव्हा मी भावूक होणे साहजिकच होते.
गोवा आणि दमण येथे खूप जुनी म्हणजे ३००-४०० वर्षांपूर्वी बांधलेली चर्चेस असली तरी सिल्व्हासातले ‘अवर लेडी ऑफ पायटी’ हे त्या मानाने अलीकडच्या काळातले म्हणजे केवळ १२५ वर्षांपूर्वी, १८९७ साली बांधलेले चर्च आहे. पोर्तुगीजांनी दादरा-नगर हवेलीची राजधानी दादराहून सिल्व्हासाला हलवली, त्यानंतर लगेचच हे चर्च बांधण्यात आले.


या चर्चचे युरोपियन गॉथिक शैलीचे बांधकाम अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. चर्चच्या एका लांबलचक आडव्या आणि उघडताना घडी करता येण्यासारख्या पाच-सहा मीटर अंतराच्या धातूच्या दारावर येशू ख्रिस्ताचे आपल्या बारा शिष्यांबरोबरच्या शेवटच्या भोजनाचे म्हणजे ‘द लास्ट सपर’चे अप्रतिम चित्र आहे. या चर्चचे नूतनीकरण आणि विस्तार करण्यात आला, तेव्हा आल्तार म्हणजे वेदी, जुने प्रवेशद्वार आणि इतर काही भाग जसाच्या तसा ठेवण्यात आला. वास्तुशास्त्रीय आणि ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत कॅथोलिक चर्चचा हा सगळीकडे आढळणारा गुण निश्चितच कौतुकास्पद वाटतो.
‘ला पिएता’ हे नाव ऐकल्यावर जगप्रसिद्ध शिल्पकार मायकल अँजेलो यांच्या नावाजलेल्या कलाकृतीची आठवण येते. त्यांच्या खूप गाजलेल्या शिल्पांमध्ये याचा समावेश होतो. ‘पायटी’ (Piety) हा मूळचा लॅटिन शब्द, ‘ला पिएता’ म्हणजे करुणा. ‘अवर लेडी ऑफ पायटी’ या नामाधिनाचे मराठी रूपांतर ‘करुणामय माता’ असे होईल.
रोममधील व्हॅटिकन सिटीच्या सेंट पिटर्स बॅसिलिकामधील तो प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. युरोपच्या सहलीवर असताना व्हॅटिकन सिटीमधल्या सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या भव्य प्रवेशदारात मी पत्नी-मुलीसह पोहोचलो होतो. अनेक वर्षे ज्या ऐतिहासिक वास्तूविषयी खूप काही वाचले-ऐकले होते, तेथे पोहोचल्यावर प्रचंड औत्सुक्य होते. उंच खांब असलेल्या प्रवेशदारातून आत शिरलो, उजव्या बाजूला नजर गेली आणि मी थबकलोच. माझा विश्वासच बसत नव्हता.

जॅकलिनचा हात पकडून तिचेही मी तिकडे लक्ष वेधले. तेथे अँजेलोचे ‘ला पिएता’ हे संगमरवरातले शिल्प होते. आपल्या पुत्राचे, येशू ख्रिस्ताचे कलेवर मांडीवर घेऊन मारियामाता बसली आहे, असे हे शिल्प.
आपल्या पुत्राचे मृतशरीर न्याहाळणाऱ्या आईचे शिल्प म्हणून ‘ला पिएता’ हे त्याचे नाव. वयाच्या २३व्या वर्षी अँजेलोने संगमरवरी दगडातून ही कलाकृती साकारली. आपल्या तरुण पुत्राचे निस्तेज, अचेतन कलेवर मांडीवर घेऊन शोक करणाऱ्या मारियामातेची भावमुद्रा याविषयी खूप काही लिहिले गेले आहे. जगातील सर्वांत सुंदर आणि अत्यंत मौल्यवान असणाऱ्या कलाकृतींमध्ये या शिल्पाचा समावेश होतो. मात्र १९७२ साली एका माथेफिरू इसमाने हातोड्याच्या साहाय्याने हे शिल्प तोडण्याचा प्रयत्न केला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हे शिल्प असलेल्या आल्तारासमोर आता बॅलेटप्रुफ काच बसवण्यात आली आहे.
‘The Last Supper' किंवा येशू ख्रिस्ताचे आपल्या शिष्याबरोबरचे शेवटचे भोजन हा प्रसंग अँजेलोचा समकालीन असलेल्या लिओनार्दो दा व्हिन्सी या चित्रकारानेही रेखाटला आहे. ‘द लास्ट सपर’ या घटनेला अनेक चित्रकारांनी रेखाटले आहे, अनेक ख्रिस्ती कुटुंबांत जेवण्याच्या खोलीत ‘द लास्ट सपर’ हे चित्र असते. त्याचप्रमाणे या घटनेवर आधारित अनेक चित्रे आणि शिल्पे अनेक चर्चेसमध्ये दिसतात. सिल्व्हासामधील चर्चमध्येही आल्तारावर एक वेगळ्या शैलीतले शिल्प आहेच.


गोवा, दमण, दीव आणि दादरा, नगर हवेली येथील अल्पसंख्य ख्रिस्ती समाजाचा धर्म, पेहराव, आहारपद्धती, भाषा आणि संस्कृती पोर्तुगीज राजसत्तेचा वारसा आहे. गोव्याचे दमणशी साडेचारशे वर्षे असलेले नाते संपलेले असले तरी त्याचा एक बारीकसा धागा अस्तित्वात आहे. तो म्हणजे गोव्यातील कॅथोलिक चर्च. आजही दमण आणि दादरा, नगर हवेली हे प्रदेश गोवा आर्चडायोसिस म्हणजे महाधर्मप्रांताचा भाग असून गोव्याचे आर्चबिशप व पॅट्रियार्क दमण आणि दादरा, नगर हवेली येथील चर्चमधील धर्मगुरूंची नेमणूक करतात.
गोव्याचे आर्चबिशप यांच्या या प्रदेशात वेळोवेळी भेटी होत असणार. कारण कॅथोलिक पंथामध्ये कन्फर्मेशन किंवा दृढीकरण हा स्नानसंस्कार किंवा सांक्रामेंत या विधीचे पौराहित्य फक्त बिशपच करू शकतात.
कॅथोलिक चर्चअंतर्गत ज्युरिसडिक्शन म्हणजे सीमाहद्द हा नेहमीच गंमतीदार आणि तितकाच वादग्रस्त विषय राहिलेला आहे. यासंदर्भात दुसरे माधवराव पेशवे यांनी दिलेल्या जमिनीवर १७९२ साली बांधण्यात आलेल्या पुण्यातल्या सिटी चर्चचे उदाहरण देता येईल. मराठा सैन्यात असलेल्या गोव्यातल्या पोर्तुगीज किंवा कॅथोलिक सोल्जरांसाठी हे चर्च बांधण्यात आले होते. भारतावर ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतरही पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्यातील चर्चचा या सिटी चर्चवरचा मालकीहक्क कायम राहिला. या चर्चच्या धर्मगुरूंची नेमणूक गोव्यातल्या बिशपांकडून व्हायची. हा प्रकार १९५३पर्यंत चालू होता. त्यानंतरच हे चर्च पुणे धर्मप्रांताचा भाग बनले.
दमण आणि सिल्व्हासा येथील अल्पसंख्य ख्रिस्ती समाज आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक वारसा टिकवून धरण्याचा एक क्षीण, केविलवाणा प्रयत्न या नॉव्हेना प्रार्थनेच्या दरम्यान करत होता. त्या प्रसंगास मी अनपेक्षितपणे साक्षीदार होतो. तो प्रसंग खरे तर खूप आनंददायी होता. तरी पण ऐतिहासिक वारशासंदर्भातला जुना इतिहास, गेल्या काही दशकातील त्याबाबतचा अनुभव आणि भविष्यातले अटळ सत्य यांची जाणीव होऊन माझे मन गलबलून गेले होते.
नॉव्हेनाच्या वेळी दररोज रोझरी प्रार्थना म्हणजे पवित्र माळेची प्रार्थना होते. त्यात येशू आणि आई मारिया यांच्या जीवनासंबंधीच्या पाच घटनांची (रहस्यांची) उजळणी केली जाते. त्यातल्या चार प्रार्थना इंग्रजीत झाल्यानंतर पाचवी प्रार्थना गायनाने सुरू झाली. आणि ती चक्क पोर्तुगीज भाषेत होती.
‘Ave Maria ...’ अशी सुरुवात ऐकताच ती ‘नमो मारीया’ किंवा इंग्रजीतील ‘Hail Mary ’ ही प्रार्थना होती हे माझ्या लक्षात आले. पोर्तुगीज आणि लॅटिन भाषेतील काही शब्द माहीत असल्याने ती मला समजत होती.
पाचही कवने पोर्तुगीज भाषेत म्हणण्याऐवजी केवळ शेवटचे कवन म्हणण्याचे कारण सहज समजण्यासारखे होते, तेथे जमलेल्या सर्वच कॅथोलिक भाविकांना पोर्तुगीज अवगत नव्हती. बहुधा गोव्यातून नेमणूक होणाऱ्या त्या चर्चच्या धर्मगुरूंनासुद्धा पोर्तुगीज येत असेल याचीही मला शंकाच आहे. कारण गोवामुक्तीनंतर १०-१५ वर्षांतच तिथून पोर्तुगीजचे उच्चाटन करण्यात आले. दमण, दादरा आणि नगर हवेली येथे मात्र आजही कॅथोलिक समाजात पोर्तुगीज बोलली जाते. दादरा, नगर हवेली, दीव आणि दमण येथली स्थानिक भाषा गुजराती आहे.
दमणमध्ये पोर्तुगीज भाषा ख्रिस्ती शाळांतून अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे २००५पर्यंत दुसरी भाषा म्हणून शिकवली जायची, आता तेही बंद झाले आहे. नव्या पिढीला ही भाषा लिहिता आणि वाचता यावी यासाठी ही भाषा निदान शाळांत तरी शिकवणे आवश्यक असते. गोव्याप्रमाणेच इथेही पोर्तुगीज भाषा शाळा-कॉलेजांच्या अभ्यासक्रमांतून हद्दपार झाली आहे.
डिसेंबर १९६१च्या आधी दमणमध्ये जन्मलेल्या सर्वांना पोर्तुगीज पासपोर्ट मिळायचा. या सुविधेचा लाभ घेऊन अनेकांनी पोर्तुगालमार्गे युरोपियन राष्ट्रांचे नागरिकत्व मिळवले आहे, आजही त्या प्रयत्नात शेकडो जण असतात. गोव्यातही असाच प्रकार मी अनुभवला आहे. आपण फार वेगाने अल्पसंख्य होत चाललो आहोत आणि काही काळानंतर या प्रदेशातील आपले अस्तित्व व संस्कृती दखल घेण्यासारखी राहणार नाही, अशी भावना गोव्यातील कॅथोलिक लोकांमध्ये आढळते. कारण या समाजातील लोक मोठ्या संख्येने युरोपात आणि इतर पाश्चात्य देशांत स्थायिक झाले आहेत.
दमण आणि दादरा, नगर हवेलीमध्ये नेमणूक झालेल्या फादरांना पोर्तुगीजचे धडे शिकावे लागायचे. कारण येथील कॅथोलिक भाविक पोर्तुगीज बोलणारे, त्यांच्या प्रार्थना आणि इतर धार्मिक व्यवहार पोर्तुगीजमध्येच असायचे. मात्र गोव्यात आता या भाषेचा मागमूसही दिसत नाही. त्यामुळे ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ या न्यायाने गोव्यातून नेमणुकीवर येणाऱ्या धर्मगुरूंना पोर्तुगीजचे ज्ञान नसते. परिणामी दमण आणि सिल्व्हासामधील चर्चमध्ये मिस्सा आणि सर्व प्रार्थनाही इंग्रजीतच होतात.
कुठलीही भाषा नाहीशी होते, तेव्हा ती बोलणाऱ्यांची संस्कृतीही नामशेष होते, असे म्हटले जाते. म्हणूनच काही लोक खानदेशी किंवा अहिराणी भाषा बोलली जावी आणि या भाषेत लिहिले जावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात याविषयी कौतुक वाटते. माझ्या लहानपणी श्रीरामपुरात आमच्या दुकानाच्या मासिक भाड्याची पावती एक म्हातारे `दिवाणजी' मोडी लिपीत देत असत हे आठवते. आज मोडी लिपीचे अस्तित्व नाहिसे झाले आहे.
गोव्यातून पोर्तुगीज भाषा कधीच हद्दपार झाली आहे. पोर्तुगीज संस्कृती आणि इतिहासाचे अनेक अवशेष मात्र गोव्यात आजही आढळतात. दमण आणि दादरा, नगर हवेली येथील परिस्थितीसुद्धा काहीशी अशीच आहे. येथील कॅथोलिक समाजाची संख्या अगदीच कमी असल्याने पोर्तुगीज भाषा आणि इतरही अनेक वारसे येत्या काही वर्षांतच नाहीसे होणार आहेत, असे मला इथे आल्यापासून वाटते आहे.
त्यामुळेच रोझरी माळेचे पोर्तुगीजमधले ते शेवटचे कवन मधुर सुरात गायले जात असताना आणि मासिक स्मृतीनिमित्त पोर्तुगीज गायने गायली जात असताना पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती जपवून ठेवण्याची त्यांची धडपड दाखवत होती. या प्रयत्नांत त्यांना कितपत यश मिळेल याबाबत मात्र मी साशंक आहे.


Tuesday, March 22, 2022

    भवताल:परिचित आणि तरीही अपरिचित..! 
  • Marathi News
  • Dvm originals
  • Camil Parkhe Rasik Article Divyamarathi   March 13, 2022

  • कामिल पारखे
    camilparkhe@gmail.com

    वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या परीने योगदान देणारे अनेक लोक आपल्याभोवती असतात. बऱ्याचदा त्यांच्या गुणांची, खास वैशिष्ट्यांची आपल्याला खरीखुरी जाणीव होते ती मात्र त्यांनी हे जग सोडल्यावरच. या व्यक्ती हयात असतानाच त्यांचे कौतुक करणारे काही लिहिले गेले असते तर त्यांना किती बरे वाटले असते! त्यामुळे स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या गुणी व्यक्तींचे कौतुक त्यांच्या तोंडावर, समाजमाध्यमांत नेहमी करायला हवे. त्यातून त्यांना हुरूप येईल आणि इतरांनाही आपल्यामध्येच असणाऱ्या अशा लोकांची, त्यांच्या गुणांची ओळख होईल.

    वर्षा उसगावकर या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. एकेकाळी त्या नायिकेच्या भूमिकेत असलेल्या मराठी सिनेमांची एक लाट आली होती आणि त्यापैकी सर्वच सिनेमे यशस्वी ठरले होते. या गाजलेल्या मराठी चित्रपटांशिवाय वर्षा उसगावकरांची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर तुफान लोकप्रिय ठरलेल्या बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतही त्यांची भूमिका होती. ‘शोले’मध्ये छोटी भूमिका असलेले कलाकारही लक्षात राहिले, त्याप्रमाणे ‘महाभारत’मध्ये अगदी छोट्या भूमिका केलेल्या कलाकारांनाही वेगळीच ओळख मिळाली. वर्षा उसगावकर यांनी या मालिकेत अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिची भूमिका केली होती. त्यांच्याविषयी बहुतांश चित्रपट रसिकांना एवढीच माहिती असण्याची शक्यता आहे. 

    मला या गुणी अभिनेत्रीविषयी याहून अधिक माहिती अलीकडेच मिळाली. 

    काही दिवसांपूर्वी वर्षा यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांचे अभीष्टचिंतन करणारा आणि त्यांच्या विविध गुणांची, संपूर्ण कारकीर्दीची माहिती देणारा बायोडेटावजा एक लेख वाचण्यात आला.    त्या लेखात म्हटले होते की, वर्षा उसगावकर या मूळच्या गोव्यातल्या, त्यांचे शिक्षण पणजी शहरात झाले आहे आणि त्या गोवा, दमण आणि दीव विधानसभेचे माजी उपसभापती अच्युत उसगावकर यांच्या कन्या आहेत.  ही माहिती मला खूप वर्षांपासून आहे याचे कारण वर्षा उसगावकर आणि मी स्वतः समवयस्क आणि त्याच काळात मीसुद्धा पणजीला कॉलेज विद्यार्थी होतो.

    शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी केलेल्या भूमिका पाहून ज्येष्ठ दिग्दर्शक दामू केंकरे यांनी त्यांचे गुण हेरले आणि वर्षा यांना अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. गोव्याच्या कला अकादमीची शिष्यवृत्ती मिळवून वर्षा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यक्षेत्राचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतरचा इतिहास आपल्याला माहीत आहेच. या अभिनेत्रीविषयी वाचताना सहज लक्षात आले की, एखादी परिचित व्यक्तीही तशी आपल्याला किती अपरिचित असते!

    वर्षा यांच्या कर्तृत्वाविषयी मला आनंद वाटलाच, पण त्याहून अधिक कौतुक वाटले ते अभीष्टचिंतनाचा हा लेख टाकणाऱ्या त्या व्यक्तीचे. समाजमाध्यमावर प्रवीण कृष्णराव सबनीस हे सद्गृहस्थ दररोज जगातल्या अनेक थोर व्यक्तींविषयी त्यांच्या वाढदिवसाला, जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्यांच्या चरित्राची, कार्याची थोडक्यात माहिती देत असतात. तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विविध देशांचे नेते, चित्रपट कलाकार, गायक, खेळाडू अशा लोकांची माहिती यात असते. अर्थात, ऐतिहासिक लोकांविषयी आपल्याला हवी ती सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध असतेच. मला विशेष अप्रूप वाटले ते याविषयी की, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या आणि अगदी आपल्याला परिचित असणाऱ्या व्यक्तींविषयीसुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सबनीस माहिती देत होते. अनेकदा ही माहिती थक्क करणारी असते. कारण आपल्याला परिचित असलेल्या लोकांविषयीची काही माहिती अगदी नवीनच असते.

    आणखी उदाहरणच द्यायचे तर गेल्या एक-दोन वर्षांच्या काळात गोव्यात माझ्याबरोबर कॉलेजात शिकलेल्या आणि माझे मित्र असलेल्या अनेक लोकांविषयी त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमांवर सबनीस यांनी लिहिलेले हे अभीष्टचिंतनपर लेख मी वाचले आहेत आणि त्या लेखांतून मला माझ्या या अगदी परिचयाच्या स्नेह्यांविषयी वाढीव माहिती मिळाली आहे. 

    नोकरीनिमित्त गोवा सोडून आल्यावर या स्नेह्यांसोबत आता फारसा संपर्क राहिला नाही हे खरे असले तरी त्यांच्या या विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाविषयी आपल्याला काहीच कल्पनाही नव्हती याचे आश्चर्यही वाटत राहते. यापैकी अनेक परिचित लोक मला समवयस्क आहेत, तर काही जण खूप लहान आहेत. तरीही विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्य-कर्तृत्वाविषयी मिळणाऱ्या नव्या माहितीमुळे विस्मय वाटतो.

    उदाहरणार्थ, यापैकी माझ्याबरोबर कॉलेजात असलेली एक मैत्रिण अल्बर्टीन्हा अल्मेडा आता महिलांच्या विविध प्रश्नांत लक्ष घालून पिडित महिलांच्या वतीने संघर्ष करते आहे हे ऐकून खूप बरे वाटले तिच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख वाचेपर्यंत अल्बर्टीन्हाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्याविषयी मला काहीच कल्पना नव्हती.

     ‘अतिपरिचयात अवज्ञा’ ही उक्ती परिचित व्यक्तींबद्दलचा आपला दृष्टिकोन स्पष्ट करत असतेच.

    शैलेंद्र  मेहता हा कॉलेजमधलाअसाच एक मित्र मोबाइल आणि समाजमाध्यमांमुळे आता पुन्हा नियमित संपर्कात आला आहे. गेल्या वर्षी या मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयी लेख वाचला आणि मी अक्षरशः उडालोच. हा मित्र लिंगविस्ट म्हणजे बहुभाषिक आहे. मला अवगत असलेल्या कोकणी, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांव्यतिरिक्त त्याला स्पॅनिश, पोर्तुगीज, संस्कृत भाषांचेही ज्ञान आहे हे मला माहीतच नव्हते. हे वाचल्यावर त्याच्याशी फोनवर बोलताना हा विषय मी काढला, तर शैलेंद्र नुसताच हसला. यात मुद्दामहून सांगण्यासारखे काय आहे? असे त्याचे म्हणणे होते.
     सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते अव्हर्टिन्हो मिरांडा, दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणारे पत्रकार प्रकाश वा. कामत, अलीकडेच पद्मश्री मिळवणारे फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवालकर, चित्रकार सुबोध केळकर, इंग्रजीच्या शिक्षिका असलेल्या आणि नाट्यक्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या इझाबेला सांतारिटा वाझ, कवी धर्मानंद वेर्णेकर कला दिग्दर्शक सुशांत तारी, माझे कॉलेजमधील सहाध्यायी आणि दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सतिश सोनक वगैरेंची नवी रूपे समाजमाध्यमांवरच्या अभीष्टचिंतनपर लेखांमुळे मला ज्ञात झाली आणि या स्नेह्यांविषयीचा किंवा अशा परिचितांविषयी आदर कितीतरी पटीने वाढला आहे. 
    कुठल्याही दैनिकात संपादकीय पानांवरील स्फुटांत कुणाविषयीचा लेख आणि फोटो आला कि एकदम दचकायला होते, याचे कारण ` मन चिंती ते वैरी न चिंती'. तो लेख त्या व्यक्तीच्या नव्या इनिंगबद्दल किंवा एखाद्या नव्या कर्तुत्वाबद्दलही असू शकतो हे अशावेळेस पटकन लक्षात येत नाही. त्याचे कारण म्हणजे एखाद्याविषयीचे कौतुक वा सन्मान त्यांच्या हयातीत करायचा नसतो, उगाचच स्तुतीसुमने उधळायची नसतात हे आपल्या मनात पक्के असते.
    गेल्या काही दिवसांत प्रवीण सबनीस यांनी वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनानिमित्त लेख लिहिलेल्या काही व्यक्तींची नाव सांगितले म्हणजे मी काय म्हणतो हे लक्षात येईल. रँग्लर परांजपे यांच्या \नात आणि शकुंतलाबाई परांजपे यांच्या कन्या ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, बॅडमिंटनपटू सैना नेहवाल, एकेकाळचे प्रसिद्ध क्विझ मास्टर आणि आता तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओ'ब्रायन, तबलापटू उत्साद झाकिर हुसेन, दैनिक `गोमंतक'चे ग्रुप संपादक राजू नायक, वगैरे वगैरे...
    काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी दैनिकात काम करताना `वर्षाच्या आज या दिवशी' या शिर्षकाच्या सदरासाठी मजकूर पुरवण्याचे काम माझ्याकडे होते. वर्षाच्या त्या दिवशी जगातल्या कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तीच्या जन्मदिन किंवा पुण्यतिथीनिमित्त अथवा एखाद्या गौरवास्पद कामगिरीनिमित्त संबंधित मजकूर प्रसिद्ध केला जायचा. मात्र या सदरात कधीही एखाद्या हयात असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींविषयी माहिती दिली जात नसायची.


    गेल्या आठवड्यात क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे आकस्मिक निधन झाले आणि ‘क्रिकेट जगतातील चमत्कार’, ‘जादूगार’ असे त्याचे वर्णन करणारे अनेक लेख प्रसिद्ध झाले. ‘महात्मा गांधी यांच्यासारखी व्यक्ती या भूतलावर वावरली होती, यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही’ असे उद्गार अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी काढले होते. 
    बापू तर महान होतेच. पण, वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या परीने योगदान देणारे अनेक लोक आपल्याभोवती असतात. त्यांच्या गुणांची, खास वैशिष्ट्यांची आपल्याला अनेकदा खरीखुरी जाणीव होते, ती मात्र त्यांनी हे जग सोडल्यावरच. या व्यक्ती हयात असतानाच त्यांचे कौतुक करणारी माहिती लिहिली गेली असती, तर त्यांना किती बरे वाटले असते! त्याशिवाय या लोकांचे मोठेपण इतरांनाही वेळीच समजले असते.

    एखाद्या व्यक्तीचे अकाली निधन झाले की समाजमाध्यमांवर त्या व्यक्तीचे कार्य, स्वभाव, व्यक्तिमत्त्वाबद्दल भरभरून लिहिले जाते. अशा वेळी ती व्यक्ती ज्यांना पूर्णतः अपरिचित असते, त्यांनासुद्धा हळहळ वाटत राहते. मागे एकदा असेच सामाजिक कार्यात खूप सक्रिय असलेल्या, मित्रमंडळींचा मोठा गोतावळा असलेल्या तिशीतल्या तरुणाचे निधन झाले आणि त्याच्या विविध गुणांबद्दल समाजमाध्यमांवर खूप लिहिले गेले. अशा वेळी एकाने ‘अरे, जिवंत असताना अशा गुणी लोकांबद्दल लिहा ना!’ अशी अगदी उद्वेगाने केलेली टिप्पणी आठवली. किती संवेदना अन् जाणीव दडलीय या एका ओळीत! आसपासच्या गर्दीमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण करणाऱ्या अशा गुणी व्यक्तींचे कौतुक त्यांच्या तोंडावर, समाजमाध्यमांत नेहमी करायला हवे. त्यामुळे त्यांना अधिक हुरूप येईल आणि इतरांनाही आपल्यामध्येच असणाऱ्या अशा लोकांची, त्यांच्या कर्तृत्वाची आणि गुणांची ओळखही होईल.

    कामिल पारखे
    camilparkhe@gmail.com


    Sunday, March 20, 2022

     

    पत्रकारिता कशी कशी बदलत गेली, हे सांगणारा एक अंत:प्रवाह या लेखनातून राजापूरच्या गंगेसारखा सुप्तपणाने वाहताना दिसतो !
    ग्रंथनामा - झलक
    मुकेश माचकर
    • ‘बदलती पत्रकारिता’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
    • Fri , 20 March 2020
    • ग्रंथनामाझलकबदलती पत्रकारिताकामिल पारखे

    ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांचे ‘बदलती पत्रकारिता’ हे पुस्तक नुकतेच सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. बदलत्या पत्रकारितेतील काही वाटा-वळणं या पुस्तकात पारखे यांनी टिपली आहेत. या पुस्तकाला पत्रकार, संपादक आणि स्तंभलेखक मुकेश माचकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

    .............................................................................................................................................

    ‘बिगुल’ या मतपोर्टलचा संपादक म्हणून काम पाहात असताना गेल्या वर्षी २८ मे रोजी मित्र आणि पत्रकार कामिल पारखे यांचा मॅसेंजरवर निरोप आला. त्यांच्या मितभाषी स्वभावाला अनुसरून एवढंच लिहिलं होतं, ‘माझ्याकडे मराठीत एक लेख आहे, तुझा ई-मेल आयडी कळव. तुला पाठवायचाय.’

    ‘पत्रकारितेतील राशीभविष्य आणि मटक्याचे आकडे’ हा तो लेख वाचला आणि खाली कामिल पारखे हे नाव वाचून उडालोच... मी पत्रकारितेचं प्रशिक्षण घेत असताना कामिल पुण्यात इंग्रजी दैनिकात पत्रकारितेत नाव कमावून असलेले वार्ताहर होते. ते मराठी बोलतात हे पाहिलं होतं, पण त्यांचा त्याआधीचा पत्रकारितेतला प्रवास ज्ञात नव्हता. त्यामुळे ते मराठी लिहितात याची कल्पना नव्हती. अतिशय सुगम आणि थेट भाषेत लिहिलेला हा रसाळ लेख पाहून कामिल यांची मराठी भाषेवरही उत्तम पकड आहे, याचा माझ्यापुरता साक्षात्कार झाला आणि त्यांना ‘मराठीत आणखी लिहा,’ असं कळवलं. छापील पत्रकारितेध्ये ९०च्या दशकापर्यंत वावरलेल्या पत्रकारांना अतिशय परिचयाचा असलेला दैनंदिन राशीभविष्याच्या दैनंदिन फिरवाफिरवीचा आणि कल्याण बाजार, सोने-चांदी, शुभांक अशा सांकेतिक शीर्षकांखाली दिले जाणारे मटक्याचे आकडे यांचा अतिशय खुमासदार आणि नाट्यमय आढावा त्या लेखात घेतला होता. त्या काळात पुण्यातल्या एका प्रख्यात, ऐतिहासिक दैनिकामध्ये आदल्या रात्रीच्या अंकात थोडा फेरफार करून सकाळी ११ वाजता एक आवृत्ती टपालाने बाहेरगावी रवाना केली जायची. तिला ‘एम’ एडिशन म्हणायचे, म्हणजे ‘मेल एडिशन-टपाल आवृत्ती’. प्रत्यक्षात तिच्यातला ‘एम’ हा मटक्यातला होता, हे गुपित सर्वांनाच ठाऊक होतं- त्याची आठवण करून दिली या लेखाने.

    हा लेख ‘बिगुल’वर प्रसिद्ध झाला आणि त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. छापील माध्यमांच्या, खासकरून वर्तमानपत्रांच्या सुवर्णकाळात वाचकांचं वृत्तपत्रांशी एक खास नातं जडलेलं होतं. सकाळच्या चहाला किंवा इतर आन्हिकांना ताज्या वर्तानपत्राची जोड नसली तर दिवस सुरूच व्हायचा नाही अनेकांचा. त्या काळातल्या वर्तमानपत्रसृष्टीविषयी, तिच्यातल्या माणसांविषयी, पत्रकारांविषयी आदरयुक्त कुतूहल असायचं वाचकांमध्ये. कामिल यांच्या लेखाने त्या वाचकांना त्या काळात नेलं, पत्रकारांना त्यांच्या उमेदवारीच्या दिवसांतल्या अनेक मजेशीर गोष्टींची आठवण करून दिली आणि या काळाची काहीही माहिती नसलेल्या नव्या पिढीच्या पत्रकारांना जुन्या काळाची ओळख करून दिली.

    या लेखाच्या प्रतिसादानंतर कामिल यांनी उत्तमोत्तम लेखांचा धडाकाच लावला. मॅसेंजरवर ‘मुकेश प्लीज चेक मेल,’ असा संदेश यायचा. ते मेल तत्काळ उघडून आधी लेख वाचून काढायचा, कामिल यांच्यासोबत त्या काळाची, त्या गावाची फेरी मारायची, त्यांच्या लेखातल्या व्यक्तिरेखांना भेटायचं आणि मग तो पुढच्या सोपस्कारांसाठी पाठवायचा, असा नित्यक्रम होऊन बसला. ‘आमची कॉम्रेडगिरी’, ‘अनुभवलेले पु.ल.’, ‘तीन दशकांतले अण्णा’, ‘पत्रकारितेतील स्त्रिया’ असे अनेक लेख ‘बिगुल’वर छापले गेले आणि सुजाण वाचक त्यांच्या लेखांची वाट पाहू लागले, तसं कळवू लागले.

    त्यांनी वेळोवेळी बिगुलवर आणि अन्यत्र लिहिलेल्या, ब्लॉगवर संग्रहित केलेल्या माहितीपूर्ण आणि रसाळ लेखांपैकी काही वेचक लेखांचा हा संग्रह आहे.

    कामिल हे खरंतर मिशनरी सेवाव्रती होण्यासाठी महाराष्ट्रातून गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी कालौघात वेगळाच एक धर्म आत्मसात केला, पत्रकारितेचा- आणि त्यात ते मिशनरी वृत्तीनेच वावरले आहेत. संवादसाधनांची कमतरता असलेल्या आणि टीव्ही पत्रकारितेच्या कल्पनेचाही जन्म होण्याच्या आधीच्या काळात वर्तानपत्रांचे बातमीदार प्रत्यक्ष घटनास्थळीही जात असत. आजकाल काही ठिकाणी वर्तमानपत्राचा बातमीदार दिसला, तर लोक आपत्ती विसरून आणि वेळात वेळ काढून त्याचा सत्कार करतील, इतकी मोबाइल आणि व्हॉट्सअ‍ॅप पत्रकारिता बोकाळलेली आहे.

    टीव्हीवर बातमी पाहून त्यावरून लिहून काढणे किंवा सरळ इतर वर्तमानपत्रांच्या वेबसाइटवरून बातम्या उचलून त्यांची चतुर फिरवाफिरव करणे, हे आजकाल वार्ताहर आणि उपसंपादकांचं काम होऊन बसलेलं आहे.

    अशा वेळी गोव्यासारख्या सुशेगाद राज्याची पेंग उडवणारी ‘चार्ल्स सोबराजला अटक’ ही घडामोड सर्वांच्या आधी टिपण्यासाठी कामिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आटापिटा वाचताना वाचकाला धाप लागते. दहावी-बारावीचे निकालही जेव्हा वर्तमानपत्रांध्ये छापून येत आणि राज्यात कोण पहिला आलाय, हे त्या विद्यार्थ्याच्या आधी वार्ताहरांना कळत असे. त्या काळात गुणवान विद्यार्थ्यांना भेटून, ‘अरे तू पहिला आला आहेस’, असं आपणच सांगून त्यांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव कामिल यांनी झकास रंगवला आहे. त्यात वार्ताहरांची सरबराई काही वेळा थंडगार बियर आणि केकने होत असे, हे वाचून मराठी वार्ताहरांना गोव्यातल्या वार्ताहरांचा हेवा वाटेल.

    ज्या काळात आजच्या घटनेचा फोटो दोन दिवसांनी छापून यायचा, त्या काळात प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांच्या विवाहाचे फोटो तत्काळ मिळवण्यासाठी ‘नवहिंद टाइम्स’चे तत्कालीन संपादक बिक्रम व्होरा यांनी ते टीव्हीवरून टिपण्यासाठी लढवलेली युक्ती, सुप्रिया सुळेंच्या लग्नाच्या फोटोसाठी आवश्यक यंत्रणाच बारामतीला नेण्याची ‘इंडियन एक्स्प्रेस’ने लढवलेली युक्ती यांसारख्या प्रकरणांधून पत्रकारितेतल्या वाचकांना स्मरणरंजनाचा आनंद मिळेल आणि अन्य वाचकांना थरारक रंजनाचा.

    अशीच गंमत पत्रकारितेतल्या बदलत्या तंत्रज्ञानाचा माहितीपूर्ण आढावा घेणारा लेख वाचतानाही येते. पत्रकारितेचा बाकीचा प्रवास कुठून कुठे झाला आहे, हे सुजाण वाचक जाणतातच. तांत्रिक प्रवास मात्र अज्ञात असतो. त्यावर हा लेख प्रकाश टाकतो. पत्रकारितेतल्या महिला सहकाऱ्यांविषयी त्यांनी कौतुकपूर्ण आदराने लिहिले आहे.

    पत्रकारांविषयी, खासकरून वार्ताहरांविषयी समाजात फार कुतूहल असतं, ते त्यांना थोरामोठ्यांचा सहवास सतत लाभत असतो म्हणून. राजकीय नेत्यांमध्ये सगळ्या बातमीदारांची उठबस असते, त्यांचा व्यक्तिगत परिचय असतो, याचं वाचकांना फार अप्रूप असतं. राजकीय-सामाजिक नेत्यांची मुलाखत घेण्याची, त्यांच्याबरोबर काही काळ व्यतीत करण्याची आणि त्यांचा प्रवास टिपण्याची संधी कामिल यांनाही मिळालेली आहे. त्यातून त्यांनी पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून निवडणूक लढवणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची विमानतळापर्यंतच्या प्रवासात मिळवलेली मुलाखत, तत्कालीन पंतप्रधान विेशनाथ प्रताप सिंह यांची विमानतळावरच्या कक्षात मिळालेली एक्स्क्लुझिव मुलाखत, अण्णा हजारेंच्या राजकीय प्रवासावरचं टिपण (त्यात अण्णा हे पहिल्यापासून कसे ‘मीडिया सॅव्ही’ आहेत, हे कामिल यांना कसं लक्षात आलं तो प्रसंग मुळातून वाचण्यासारखा) आणि किरण बेदींच्या आग्रहामुळे पत्रकारितेचे संकेत बाजूला ठेवून एकच बातमी तीन दिवस लावण्याचा प्रसंग ही प्रकरणं आकाराला आली आहेत.

    अनौपचारिक गप्पांध्ये, ऑफ दी रेकॉर्ड व्यक्त केलेल्या मताची बातमी झाल्यामुळे अतिशय प्रतिष्ठित आणि विद्वान राजकारणी असलेले नेते सी. सुब्रम्हण्यम यांच्या कारकिर्दीची दुर्दैवी अखेर कशी ओढवली, ही हकीकतही धक्कादायक आणि रोचक आहे. कामिल यांनी काही निवडणुकांमधल्या वार्तांकनाच्याही आठवणी मांडल्या आहेत.

    महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांचं गोयंकरांवर केवढं गारुड होतं, याचं दर्शन कामिल यांनी दूरस्थपणे घडवलं आहे. मात्र, पुलंच्या निधनाची बातमी पहिल्या पानावर न छापण्याच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या निर्णयामागे त्या वर्तमानपत्राचे मराठी संपादक दिलीप पाडगावकर यांचाच आग्रह कसा होता, ही माहिती वाचकांना थक्क करून सोडते. लोकांना रोज ‘गूडमॉर्निंग न्यूज’ द्यायची, नकारात्मक बातम्यांनी त्यांचा सकाळचा चहा खराब करायचा नाही, अशा व्यापारी कल्पनांधून निघालेल्या टाइम्सच्या नवपत्रकारितेच्या नियमांनुसार नामवंत व्यक्तीच्या निधनाची बातमी आत छापायची, बाहेर आठवणींना उजाळा देणारा एखाद्या सेलिब्रिटीचा लेख छापायचा, हा नियम तयार झाला होता. त्यात पुलंसाठी अपवाद करण्याची पाडगावकरांची तयारी नव्हती.

    आता हे औद्धत्य म्हणायचं की शुद्ध व्यावसायिक पत्रकारितेचं ब्रीद, हे सांगणं अवघड आहे. असाच एक नैतिक पेच दैनंदिन राशीभविष्य नावाची फेकाफेक आणि मटक्याचे आकडे छापण्याच्या संदर्भात पडतो, पण पगाराचं काम म्हटल्यावर ते केलंच पाहिजे, अशा सोयीने तो सुटतो. वर्तमानपत्राच्या छापील किमतीला काही व्यावहारिक ‘किंमत’ असण्याचा काळ संपत गेला,

    पत्रकारिता जसजशी जाहिरातदारांच्या कह्यात गेली आणि नंतर सर्वांत मोठा जाहिरातदार बनलेल्या सरकारच्या हातात गेली, तसतसे पत्रकारितेच्या ब्रीदात काय बदल घडत गेले असतील, त्याचं दिशादिग्दर्शन या लेखातून होतं.

    या लेखनप्रपंचात कामिल यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीच्याच नव्हे, तर जन्माच्याही खूप आधी घडलेल्या पंचहौद मिशनच्या चहापानाची अर्थात ग्रामण्यवादाची रंजक आणि बोधपूर्ण हकीकत सांगितली आहे. गोपाळराव जोशी या उपद्वपी गृहस्थाने लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे यांच्यासह पुण्यातल्या मान्यवर नागरिकांना पंचहौद मिशनमध्ये व्याख्यानाच्या मिषाने बोलावून चहा-बिस्कीटं खायला लावली आणि नंतर त्याची बोंब मारून लोकमान्यांवर प्रायश्चित्त घेण्याची वेळ आणली, ही गोष्ट त्यांनी पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून मांडली आहे. आणीबाणीच्याही काळात कामिल सक्रिय पत्रकारितेत नसले तरी देशात काय घडतं आहे, हे टिपण्याच्या वयाचे होतेच.

    वाचनातून, मोठ्या माणसांच्या बोलण्यातून त्यांनी आणीबाणीची तुलनेने अपरिचित बाजू पुढे आणली आहे. आणीबाणीमुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला, बाबूशाहीच्या वरवंट्याचा अतिरेक झाला, हे तर खरेच- त्यातूनच इंदिरा गांधींना निवडणुकीत भुईसपाट व्हावं लागलं, पण आणीबाणीत सरकारी कार्यालयं वक्तशीरपणे चालू लागली, लाच न देता कामं होऊ लागली. अशा प्रकारच्या सामान्यजनांना सुखावणाऱ्या बदलांच्या ‘अनुशासनपर्वा’ची दखल फारशी घेतली जात नाही. ती कामिल यांनी घेतली आहे. आणीबाणीमुळे लोकांच्या तिरस्काराच्या धनी झालेल्या आणि आर्थिक बळाविना निवडणूक लढवणाऱ्या इंदिरा गांधींनी हिमतीच्या बळावर आणि जनता पक्षाच्या नादानीमुळे कसा जोरदार कमबॅक केला, हेही त्यांनी एका प्रकरणात नमूद केलं आहे.

    साधारणपणे पत्रकारांना दीर्घलेखनाचा कंटाळा असतो आणि त्यांची पुस्तकं प्रकाशित होतात ती आधी वर्तानपत्रात लिहिलेल्या लेखांच्या, सदरांच्या संग्रहाच्या स्वरूपातली असतात. खरं तर अनेक वार्ताहर वर्षानुवर्ष एकेका बीटवर काम करतात म्हणजे एकेका क्षेत्रातल्या बातम्या गोळा करतात. त्या कार्यकाळात त्यांच्याकडे अनुभवांचं, किश्शांचं भांडार जमा होतं, काहीएक अंतर्दृष्टी तयार होते. त्यातला ७० टक्के भाग हा बातम्यांबाहेरचा असतो. त्या खजिन्यातल्या ऐवजाची थोडी लक्षपूर्वक मांडणी केली, तर त्यातून त्या त्या क्षेत्रावर क्ष-किरण टाकणारी उत्तम ग्रंथसंपदा तयार होऊ शकते, पण तसं फारसं होताना दिसत नाही. माहितीचं अद्ययावतीकरण, दीर्घ लेखन, बैठक मारून, मांड जमवून पुस्तकाचा दमसास अवगत करून लिहिणं, या सगळ्याचा कंटाळा, हे याचं कारण असावं.

    पत्रकारांचं अनुभवकथन, हा जो दुसरा प्रकार आहे, त्यात कामिल यांच्या या पुस्तकाचा समावेश करावा लागेल. अशा पुस्तकांच्या बाबतीत ‘मी’पणाची लांबण आणि पाल्हाळिक तपशिलांची भरमार होण्याचा धोका संभवतो. शिवाय अशा लेखनात समकालीनता हरवण्याचीही शक्यता असतेच. कामिल यांनी आजवरच्या प्रवासातल्या अनुभवांनाच शब्दरूप दिलं असलं तरी इंग्रजी पत्रकारितेच्या नेमकेपणाच्या, नेटकेपणाच्या अट्टहासामुळे त्यांनी या अवगुणांची बाधा त्यांच्या लेखनाला होऊ दिलेली नाही.

    या पुस्तकात त्यांनी काही व्यक्तिरेखांच्या अंगाने लिहिलेले लेख आहेत, काही घटनाप्रधान आहेत आणि काही पत्रकारितेच्या तांत्रिक-आशयात्मक प्रवासाचा आढावा घेणारे लेख आहेत. त्यातल्या अनेकांमध्ये साक्षीदार म्हणून किंवा त्या प्रसंगात सहभागी असलेले पत्रकार म्हणून खुद्द कामिल यांची उपस्थिती आहे, पण ती जाणवतही नाही तिथे खुपेल कशी? चांगला बातमीदार बातमीत दिसत नाही, वाचक आणि बातमीचा आशय यांच्यामध्ये लुडबूड करत नाही, असा संस्कार कटाक्षाने पाळण्याच्या काळातले ते पत्रकार आहेत. या काळात लेखांध्येही अनावश्यक ‘मी’ आला असेल, तर उपसंपादकांची कात्री त्यावर चालायची. त्यामुळे या लेखांध्ये कामिल ‘नायक’ बनून येत नाहीत, ते ऐतिहासिक प्रसंगाचे तटस्थ निरीक्षक ही खऱ्या पत्रकाराची भूमिका या व्यक्तिगत स्वरूपाच्या लेखांध्येही सोडत नाहीत, हे त्यांच्या लेखनाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

    त्याने हा ऐवज चघळगप्पा आणि किस्सेबाजीच्या पलीकडे जातो. वाचकांना एकेका काळाचं आणि माणसांचं सुस्पष्ट दर्शन घडवतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पत्रकारिता कशी कशी बदलत गेली, हे सांगणारा एक अंत:प्रवाह या लेखनातून राजापूरच्या गंगेसारखा सुप्तपणाने वाहताना दिसतो.

    कामिल यांनी उकळत्या शिशापासून बातमीच्या ओळी घडवणारं लायनो टायपिंग आणि फोटो छापण्याचं ब्लॉकमेकिंग तंत्र यापासून ते आताच्या पोर्टल पत्रकारितेपर्यंतचा अतिशय कमी काळात घडून आलेल्या प्रचंड बदलांचा काळ पाहिला आहे. हे बदल काही फक्त तांत्रिक नाहीत, पत्रकारितेचा आत्माही आता बदलला आहे, अनेक ठिकाणी गहाण पडला आहे. कामिल यांनी आता या आशयात्मक बदलाचाही साक्षेपी आढावा घ्यावा, असा आग्रह त्यांच्याकडे धरावासा वाटतो. तो एक महत्त्वाचा दस्तावेज ठरेल.

    एकेकाळी चळवळींमध्ये ‘कॉम्रेड’गिरी केलेले कामिल काही काळ पत्रकारितेतल्या सहकाऱ्यांनाही कॉम्रेड म्हणत, आता अनेक वर्षांत त्यांनी तसं कुणाला म्हटलेलं नाही, असं त्यांनी एका आत्मपर लेखात म्हटलं आहे... पण, पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांशी परिचय असलेल्या आणि त्यांच्या मुशीत पिंड घडलेल्या हाडाच्या पत्रकारांना आणि तशाच तयारीच्या वाचकांना या पुस्तकातल्या लेखांधून ‘कॉम्रेड’ या शब्दामध्ये अंतर्भूत भ्रातृभाव, सहानुभाव जाणवेल.

    मी पत्रकारितेध्ये अनुभवाने आणि अधिकाराने कामिल यांना सर्वार्थाने ‘ज्युनियर’ असताना त्यांनी अतीव स्नेहाने या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवून माझा मोठाच सन्मान केला आहे. त्याबद्दल आभारी आहे, ‘कॉम्रेड कामिल’!