Did you like the article?

Tuesday, November 22, 2022

अँजेला त्रिनदाद Nuestra Senora Del Rosario भारतीय रुपात



 आपल्या बाळाला घेऊन दुसऱ्या हातात जपमाळ घेतलेली ही स्त्री आहे मदर मेरी.

गोव्यातल्या चित्रकार अँजेला त्रिनदाद (१९०९ - १९८०) यांनी बाळ येशूसह मारियेला म्हणजे `अवर लेडी ऑफ रोझरी' ( Nuestra Senora Del Rosario ) भारतीय रुपात रेखाटली आहे.

भारतीय रुपात आणि प्रतिकांसह अँजेला त्रिनदाद यांनी ख्रिस्ती धर्मातले इतरही अनेक विषय आणि पात्रे साकारली आहे. ख्रिस्ती धर्मांतील सांस्कृतिकरण (Inculturation) असे या प्रक्रियेला संबोधले जाते.
साठीच्या दशकात भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनुसार सांस्कृतिकरणाला अधिकृत मान्यता मिळाली.
१९७२ पर्यंत श्रीरामपूरला आणि हरेगावसारख्या खेड्यापाड्यांत कॅथोलिक चर्चेसमध्ये मिस्साविधी आणि प्रार्थना लॅटिन भाषेत व्हायच्या, पुस्तकात समोरासमोरच्या पानांवर रोमन आणि देवनागरी लिपींत लिहिलेल्या या लॅटिन प्रार्थना आम्ही म्हणायचो, मराठीचा वापर नंतर सुरु झाला यावर आता कुणाचा विश्वासही बसणार नाही !
असे असले तरी त्याआधीही सांस्कृतिकरणाची प्रक्रिया जगभर वैयक्तिक आणि सामुदायिक पातळीवर अनेक शतकांपासून चालूच होती.
आपल्याकडं सतराव्या शतकात गोव्यात `ख्रिस्तपुराण'कार फादर थॉमस स्टीफन्स आणि मागच्या शतकात रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरेंनीं सांस्कृतिकरणाची ही प्रक्रिया अत्यंत प्रभावीरित्या राबवली
नव्या धर्मातही आपली जुनी संस्कृती, परंपरा चालू ठेवणारा ( नाव, आडनाव, काही विशिष्ट सणवार वगैरे ) महाराष्ट्रातला मराठी ख्रिस्ती समाज हा या सांस्कृतिकरणाचं एक स्थानिक आणि उत्तम उदाहरण.
मीसुद्धा याच समाजाचा एक प्रतिनिधी.

हे चित्र गोव्यातले फेसबुक मित्र Parag Hede यांच्या सौजन्यानं

Camil Parkhe

Wednesday, November 2, 2022

धर्मांतर कशासाठी ? आत्मसन्मानासाठी कि विद्रोहासाठी ?  



अलीकडच्या काळात धर्मांतर हा कायद्याच्या दृष्टीने फार मोठा गंभीर गुन्हा केला गेला असला आणि धर्मांतर (धाकटपटश्यानं, आमिषानं वगैरे वगैरे .) घडवून आणणाऱ्या व्यक्तीला मोठी शिक्षा होत असली तरी मानवी इतिहासात शतकोनुशतको धर्मांतरे होत आली आहेत. अव्वल इंग्रजी अमदानीत देशभर भल्याभल्या लोकांना ख्रिस्ती धर्माने आकर्षित केलं होतं. धर्मांतरांची कारणं मात्र व्यक्तिगणिक आणि समाजागणिक वेगवेगळी होती. पंडिता रमाबाई आणि नारायण वामन टिळक अशा संस्कृत पंडितांनी ख्रिस्ती धर्म कवटाळला त्यामागची कारणं वेगळी आणि समाजातील बहिष्कृत घटकांनी हा धर्म सामुदायिकरीत्या स्वीकारला यामागची कारणं पूर्णतः वेगळी होती.
केरळमधल्या नाडर समाजाने ख्रिस्ती धर्म का स्वीकारला यामागच्या सामाजिक कारणांची समाजमाध्यमात चर्चा झाली. थोड्याबहुत अशाच कारणांनी महाराष्ट्रात आणि देशातील इतर प्रदेशांत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथे जर्मन जेसुईट फादर ओटो वाईसहौप्ट हे हातात घंटी घेऊन गावातल्या मुलांना आपल्या शाळेत शिकण्यासाठी बोलावत असत. काळ होता १८९२चा. विशेष म्हणजे ही शाळा समाजातल्या सगळ्या घटकातील मुलांमुलींसाठी खुली होती, महार, मांग, चांभार आणि धनगर यांच्यासाठीसुद्धा !
असाच प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात फ्रेंच धर्मगुरु फ्रांसलियन फादर गुरियन जाकियर यांच्या घोगरगावच्या आणि आजूबाजूंच्या शाळांत होता. संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात त्याकाळात हजारो कुटुंबांनी सामुदायिकरीत्या ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला याबद्दल मग आश्चर्य कसले ?
पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात, मराठवाड्याच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत एकोणिसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात सामुदायिक धर्मांतरे झाली. त्यामागे केवळ आध्यात्मिक प्रेरणा होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पंडिता रमाबाई, रेव्ह्. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक, रेव्ह. नीळकंठशास्त्री नेहेम्या गोर्हे, बाबा पदमनजी वगैरे सुशिक्षित व्यक्तींच्या धर्मांतरात अध्यात्मिक परिवर्तन घडले हे नि:संशय. अस्पृश्य जातीजमातींच्या सामुदायिक धर्मांतराबाबत मात्र असे म्हणता येणार नाही.
ज्या लोकांच्या वैयक्तिक वा सामाजिक जीवनात देव-धर्म, देऊळ, धर्मग्रंथ या संकल्पनांना कधीही प्रवेश नव्हता, अशा समाजातून वाळीत टाकलेल्या लोकांनी ख्रिस्ती धर्माचे अध्यात्म आधी समजून घेऊन नंतर हा धर्म स्वीकारला असे म्हणणे वास्तव्यास धरून होणार नाही.
धर्मांतरे का होतात? आपल्या वाडवडिलांपासून आलेला धर्म सोडून दुसरा धर्म कवटाळण्याची पाळी एखाद्या व्यक्तीवर वा समाजावर का येते? व्यक्तीगत धर्मांतर अर्थातच पूर्णत: त्या व्यक्तीशी संबंधीत असलेल्या मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. मात्र जेव्हा एखादा मोठा समूह आपला धर्म सोडून दुसर्या धर्मात जातो, त्यावेळी या धर्मांतरामागची कारणे समजून घेणे आवश्यक ठरते. .
धर्मांतरामागची कारणे आणि प्रेरणा यांचे अविनाश डोळस यांनी पुढील शब्दांत विश्लेषण केले आहे.
“धर्मांतर हा आपल्या देशातील एक युगा-युगापासून चालत आलेला प्रयोग आहे. हिंदू धर्माच्या जाचाला कंटाळून आपल्या उध्दारासाठी अनेकांनी धर्मांतर केले आहे. मुस्लिम राजवटीत अस्पृश्यांतील बहुसंख्य लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारून समतेकडे धाव घेतली. त्याचप्रमाणे ब्रिटिश राजवटीत अनेकांनी जातीव्यवस्थेने दिलेले नीचपण झुगारून त्यातून मुक्त होण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. अनेक आदिवासी लोकांनीही शिक्षणासाठी, आपुलकीच्या मिळणार्या वागणुकीसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. मिशनरी लोकांनी उपेक्षित, गरीब लोकांसाठी डोंगरदर्यात शाळांची स्थापना करून त्यांच्यापर्यंत शिक्षण नेऊन एक ऐतिहासिक कार्य केले आहे. या सार्यांचा परिणाम म्हणून भारतात अधिकाधिक दलित, आदिवासी मंडळी ख्रिस्ती झाली आहेत. ” 1
दुसर्या एका लेखात डोळस यांनी असे म्हटले आहे: ”वेगवेगळ्या राजवटीतील धर्मांतराचा संदर्भ बदलला तरी त्यामागील धर्मांतरितांची भावना एकसारखीच राहत आली आहे. जातिव्यवस्था, अस्पृश्यता, शूद्र या जोखंडातून मुक्त होण्यासाठी लोकांनी धर्मांतरे केली. कधी ते मुस्लीम झाले, कधी ते ख्रिश्चन झाले. नंतर डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. समतेची शिकवण व वागणूक जेथे मिळेल त्या धर्माला आपलेसे करून या लोकांनी प्रस्थापित धर्माविरुध्दचा आपला निषेध नोंदविला आहे.”2
महाराष्ट्रातील वा इतर कुठल्याही ठिकाणी सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे अद्यात्मिक परिवर्तनाने झाली असा दावा खुद्द ख्रिस्ती धर्मगुरू किंवा चर्चही करत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील प्रेषितकार्याचा इतिहास लिहिणार्या फादर डॉ ख्रिस्तोफर शेळके यांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे:
”कॅथोलिक श्रध्देचा निरनिराळ्या भागात कसा प्रारंभ झाला हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. क्वचित प्रसंगीच अध्यात्म्याने सुरूवात झालेली दिसते असे खुद्द पवित्र शुभसंदेशातही आपल्याला दुसरं दिसत नाही. लोक येशूच्या भोवती गर्दी करू लागले. कारण त्याने आजार्यांना बरे केले, मेलेल्यांना पुन्हा उठविले, अशुध्दांना त्याने शुध्द केले आणि भाकरी वाढविल्या. लोकांचा जमाव त्याच्याकडे आल्यानंतरच त्याने त्यांचे लक्ष शाश्वत मुल्यांकडे ओढून घेतले. ”तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवता म्हणून तुम्ही माझ्याकडे आला असे नाही, तर मी तुम्हांला भाकर दिली म्हणून तुम्ही आलात.” त्यानंतरच मग येशू अध्यात्म्याकडे वळून ’नश्वर अन्नासाठी झटू नका. त्याऐवजी चिरकालीन अन्नासाठी प्रयत्न करा’ असे त्या लोकांना सांगतो.”3 ख्रिस्ती मिशनरींनी सर्वप्रथम भुकेल्या लोकांची भूक भागविली, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले आणि नंतरच ते अध्यात्म्याकडे वळाले. ’आधी पोटोबा, मग विठोबा’ अशी म्हण या भागात प्रचलित आहे. ती म्हण या मिशनरी लोकांनी आपल्या प्रेषितकार्यात प्रत्यक्षात उतरविली.
धर्मांतरामागची कारणमीमांसा स्पष्ट करताना एकोणिसाव्या शतकात सामाजिक अन्यायाचे, छळवणुकीचे बळी ठरलेल्या दलित समाजाच्या दृष्टीने ख्रिस्ती मिशनरी देवदूतच ठरले असे नाशिकच्या फिलोमिना बागूल यांनी म्हटले आहे.
त्या म्हणतात: ” मिशनरींनी आम्हाला ख्रिस्ताबरोबर ऐहिक सुखाचा मार्ग दाखविला. दोन हजार वर्षापुर्वी प्रभू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, मिशनरींनीही आमच्यासाठी अनेक चमत्कार केले. त्यानी प्रतिकूल परिस्थितीत केलेले कार्य कोणत्याही चमत्कारापेक्षा क़मी नव्हते. प्रभू ख्रिस्ताने लोकांना जेवण देऊन तृप्त केले. त्याचप्रमाणे मिशनरींनी अनेकांना अन्न देऊन तृप्त केले. प्रभू ख्रिस्ताने अंधांना दृष्टी दिली,त्याचप्रमाणे मिशनरींनी ज्ञान देऊन आम्हाला नवदृष्टी दिली. प्रभू ख्रिस्ताने मुक्यांना वाचा दिली, त्याचप्रमाणे मिशनरींनी हजारो वर्षे वाचा बंद असलेल्या आम्हाला वाचा दिली. ख्रिस्ताने दुखणाइतांना बरे केले, तद्वत मिशनरींनी औषधोपचारांनी रोग्यांना बरे केले. प्रभू ख्रिस्ताने मेलेल्यांना जिवंत केले. मिशनरींनी मृत्युपंथास टेकलेल्यांना जीवदान दिले. मिशनरींचे हे कार्य आमच्यासाठी एकाएका मोठ्या चमत्काराप्रमाणेच होते. मिशनरींनी आम्हाला क़ाय दिले नाही? त्यांनी आम्हाला विश्वास दिला, प्रेम दिले, धर्म दिला, भाकर दिली, आत्मविश्वास दिला, स्वाभिमान दिला, आत्मसन्मान दिला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उच्चवर्णिर्याच्या गुलामगिरीतून मुक्त करुन आमचा कोंडलेला श्वास मुक्त केला.”4
उच्चवर्णियांनी पायंदळी तुडवलेल्या, रोजची भाकरी मिळवण्यासाठी धडपडणार्या अस्पृश्य लोकांना परदेशी मिशनरींनी मायेने जवळ केले. दुष्काळाच्या आणि दोन महायुध्दांच्या काळात आणि इतरही वेळी अन्नपाणी, कपडालत्ता पुरवला. गावाच्या वेशीबाहेर हाकललेल्या या दलित लोकांच्या दृष्टीने तर हे मिशनरी देवदूतच ठरले. या मिशनरींनी दाखवलेल्या देवाचा, धर्माचा आणि ग्रंथाचा त्यांनी कुठल्याही शंकाकुशंका न काढता स्वीकार केला. अशाप्रकारे अनेक गावांतील सर्वच्या सर्व महार वा मांग कुटुंबे काही वर्षांच्या काळात ख्रिस्ती झाली.
गोव्यात ज्या पध्दतीने धर्मांतर झाले तसे महाराष्ट्रात झाले नाही असे अनुपमा उजगरे यांनी म्हटले आहे. ” कोणी बाप्तिस्मा द्या म्हटलं तर मिशनरी त्याला आतून पारखून घेत. तसंच, बाहेर काही काळंबेरं तर नाही ना हेही तपासून बघत. जातिभेदाच्या छळापायी जीव मेटाकुटीला आलेल्या तळागाळातल्यांना, मिशनरींनी देऊ केलेल्या जीवनस्तराचा मोह झाला. त्यामुळे सामूहिक धर्मांतरंही झाली.’‘5
’कॅथोलिक मिशनरींकडे लोक प्रथम वळले ते धर्म भावना मनात ठेवून नव्हे’ असे पुण्यातील सेंट विन्सेंट स्कूलचे माजी प्राचार्य फादर केनेथ मिस्किटा आणि फादर थॉमस साळवे यांनीही ’जेसुईट 2005’ या वार्षिक अंकात स्पष्ट म्हटले आहे.
मिशनरींकडे वळण्याचा त्यांचा हेतू पोटापाण्याचा व सामाजिक मानसन्मान हा होता असे या धर्मगुरूंनी म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे ऐहिक आणि सामाजिक प्रश्न हाताळण्याचा मिशनरींनी प्रयत्न केला. अहमदनगर हा कायमचा दुष्काळी जिल्हा. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेसाठी मिझरियोर, कारितास, सीआरएस यासारख्या सेवाभावी संस्थांच्या मदतीने मिशनरींनी विहिरी खोदण्यास, पंप आणि बियाणे खरिदण्यास स्थानिक लोकांना मदत केली. सामाजिक आणि धार्मिक कामांची गल्लत होऊ नये, आध्यात्मिक बाबींकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून सामाजिक कामांसाठी प्रथम श्रीरामपूर येथे आणि नंतर अहमदनगर येथे सोशल सेंटरची स्थापना करण्यात आली.
लोकांच्या गरजा भागवून, त्यांच्याविषयी आस्था दाखवून जर्मन आणि एतद्देशीय येशूसंघीय व्रतस्थांनी येथील लोकांची श्रध्दा जोपासली. ’प्रारंभी शाळेसाठी एकही विद्यार्थी मिळत नसे. पण आज नगर जिल्ह्यातील येशूसंघीयांच्या व धर्मप्रांतियांच्या शाळात हजारो काथोलिक व अख्रिस्ती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.पहिल्या महायुध्दाच्या सुरुवातीस नगर जिल्ह्यात 10,000 ख्रिस्ती होते व फक्त चार मिशन स्टेशन होती. आज वीस मिशन स्टेशन आहेत व 60,000 ख्रिस्ती लोकांची व अख्रिस्ती जनतेची आध्यात्मिक व ऐहिक गरज भागविली जाते,” असे फादर मिस्किटा आणि साळवे यांनी या लेखात म्हटले आहे.6
धर्मांतरामागची कारणे काहीही असोत, ही सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक मोठी सामाजिक क्रांती होती. प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्दचा तो एक मोठा विद्रोह होता. त्यावेळच्या अन्याय्य स्थितीतून सुटका करून घेण्याचा धर्मांतर एक मार्ग होता.
विशेष म्हणजे या दलितांना मुक्तीचा हा मार्ग दाखविणारा त्यांच्यामध्ये कुणीही मोझेस नव्हता. एका गावात एक धर्मांतर झाले आणि त्या धर्मांतराचे ऐहिक, सामाजिक आणि आर्थिकही फायदे त्याच्या नातेवाईकांना, भाऊबंदांना लक्षात आले आणि त्यांनीही तोच मार्ग पत्करला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतराची ही लाट महाराष्ट्रात वर नमूद केलेल्या जिल्ह्यांत चालू राहिली.
खेड्यापाड्यांत, आडवळणाच्या छोट्याशा वस्तींवर अहिंसेच्या मार्गाने अगदी संथपणे झालेल्या या क्रांतीची त्यावेळच्या उ?वर्णियांनी साधी दखलही घेतली नाही. या सामाजिक क्रांतीमागची बहुविविध कारणे, त्याचा समाजाच्या इतर घटकांवर झालेला परिणाम आणि वरच्या जातींच्या अरेरावीस आणि सर्वच क्षेत्रांतील मक्तेदारीस अनेक शतकांनंतर पहिल्यांदाच मिळालेले आव्हान याचे समाजशास्त्रज्ञांनी व इतर संशोधकांनी आतापर्यंत विश्लेषण केलेले नाही.
हे धर्मांतर रोखण्यासाठी त्या अस्पृश्य जातींना त्यांना हवा तो आत्मसन्मान द्यावा किंवा अन्याय्य समाजव्यवस्था बदलावी असेही त्यावेळच्या समाजधुरिणांना वाटले नाही.
त्यानंतर काही वर्षांनंतर येवल्यात 1935 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची गर्जना केली तेव्हाही हे सामुदायिक धर्मांतर रोखण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीच. धर्मांतराच्या घोषणेनंतर अखेरीस दोन दशकांनंतर बुध्द धर्माचा स्वीकार करून डॉ आंबेडकरांनी आणि त्यांच्या अनुयायांनी एक अभिनव सामाजिक स्थित्यंतर घडवून आणले.
संदर्भ:
1) अविनाश डोळस, ”आंबेडकरी चळवळ: परिवर्तनाचे संदर्भ” , सुगावा प्रकाशन( पान 46), 2) उपरोक्तप्रमाणे, (पान 136)
3) फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके, ’ निरोप्या’ मासिक, ऑक्टोवर 1977 (पान क्रमांक 33)
4) फिलोमिना बागूल, ’मिशन कार्य 150 वर्षे: सामाजिक विकास’, नाशिक कॅथोलिक धर्मप्रांत स्मरणिका (1878-2003), पान 23)
5) डॉ. अनुपमा उजगरे, ’मराठी प्रोटेस्टंट ख्रिस्ती समाज’, प्रकाशक: ग्रंथाली ज्ञानयज्ञ, , (पान 22)
6) ’जेसुईटस 2005’, इयर बुक ऑफ द सोसायटी ऑफ जिझस, प्रकाशक : सोसायटी ऑफ जिझस, (पान 135), आणि ’ निरोप्या’ मासिक, फेब्रुवारी 2005 (पान 26)
^^^
(गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज - लेखक कामिल पारखे , चेतक बुक्स, पुणे मधील एक प्रकरण _