Did you like the article?

Wednesday, April 27, 2022

नथुराम गोडसे  आणि महात्मा गांधीं

पणजी येथे धेम्पे कॉलेजात माझे पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले आणि माझा मुख्य विषय होता तत्त्वज्ञान. त्यात एक वर्षी फिलॉसॉफी ऑफ रिलीजन म्हणजे चक्क 'विविध धर्मांचे तत्त्वज्ञान" हा एक विषय होता. श्रीरामपूरला दहावीपर्यंत मराठी भाषेत शिकून येसुसंघिय फादर होण्यासाठी सत्तरच्या दशकात मी गोव्यात आलो होतो. कौटुंबिक पार्श्वभूमी कॅथोलिक धार्मिक अशी होती, नाही तर जीवनभर संन्याशी धर्मगुरु होण्याचा कुणी विचारही केला नसता. मँगोलोरियन कॅथोलिक कुटुंबातून आलेले समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस हेसुध्दा शालेय शिक्षणानंतर असेच फादर होण्यासाठी सेमिनिरीत दाखल झाले होते.

पदवीला मी तत्त्वज्ञान हा विषय घेण्याचे एक कारण म्हणजे धर्मगुरु होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तत्वज्ञान आणि ईशज्ञान ( थिऑलोजी ) या विषयांचा अभ्यास करावा लागतोच, नाहीतर फॉर्मेशन टप्प्यालाच गच्छंती होते. धर्मगुरु होण्यासाठी किमान तेव्हढी बौद्धिक पातळी आवश्यक आहे असे जेसुईट संस्था मानते. माझ्या आसपासचे काही जेसुईटस शिक्षण तज्ज्ञ होते काही पीचडी धारक होते आणि एक चक्क व्यवस्थापन (मॅनेजमेंट ) तज्ज्ञ होते.
तर या कॉलेज जीवनात तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात मी यथेच्छ डुंबलो. याकाळात शिक्षणाचा आनंद मी घेतला तितका आधी कधीही घेतला नव्हता. याचे मुख्य कारण होते मिरामारच्या धेम्पे कॉलेजातले माझे तत्त्वज्ञानाचे शिक्षक एन. जी. मिश्रा, आफांसो सिनियर, आणि मुंबई विद्यापीठातील पणजी पदव्युत्तर केंद्रातील दोन शिक्षक डॉ. शि. स. अंतरकर आणि अँग्नेलो आफांसो ज्युनियर.
तत्त्वज्ञानाच्या या चारही शिक्षकांनी धर्मगुरु होण्यासाठी गोव्यात आलेल्या मला जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची आमची पदवी परीक्षा होण्याआधीच मी धर्मगुरु होण्याविषयीचा माझा निर्णय बदलला आणि तसे आमच्या जेसुईट सुपिरियर धर्मगुरुंना कळवलेसुद्धा.
या टप्प्यात शि. स. अंतरकर सरांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला होता. मुळात कट्टर सनातनी पार्श्वभूमी असलेले अंतरकर मुंज झाल्यापासून शेंडी राखत आणि धोतर नेसत, तसेच संस्कृत श्लोकांचे पठण करत असत नंतर मात्र ते पुर्णतः इहवादी, नास्तिक झाले आणि मला शिकवत असताना ते Empiricism किंवा अनुभववाद यातील एक शाखा असलेल्या लॉजिकल पॉझिटिव्हीझम या विचारसरणीचे कट्टर पुरस्कर्ते होते. या विचारसरणीचे प्रणेते असलेल्या सर ए. जे. एयर ( Sir A. J. Ayer ) या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याचे इंग्रजी पुस्तकही त्यांनी मराठीत आणले होते.
तर या अंतरकर सरांशी एकदा संभाषण चालू असताना माझ्या बोलण्यात 'माथेफिरु' नथुराम गोडसे ' असा शब्दप्रयोग आला.
"माथेफिरु ? नथुराम गोडसेला 'माथेफिरु ' कसं म्हणता येईल?" असा अंतरकरांचा सवाल होता.
"नथुराम गोडसेचं डोकं फिरलंIn म्हणून त्यानं गांधीची. हत्या केली नव्हती, त्याचं कृत्य हे विचारपूर्वक केलेलं कृत्य होतं. भले तुम्ही त्याच्या विचारांशी तुम्ही सहमत नसताल पण तुम्ही त्याने केलेल्या हिंसक कृत्यामुळे त्याला 'माथेफिरु' म्हणू शकत नाही, " असा त्यांचा युक्तीवाद होता.
"यामागचे कारण म्हणजे आपण काय केले आणि कशासाठी केले हे नथुरामने नंतर सविस्तरपणे सांगितले होते," असे अंतरकर म्हणाले.
अंतरकर सरांचं ते वक्तव्य ऐकून मी एकदम थक्क झालो. शालेय जीवनापासून नथुराम गोडसे हे नाव कायम ' माथेफिरु' या विशेषणासह वापरले जात होते, बहुधा अगदी पाठ्यपुस्तकांतसुद्धा हाच शब्द असायचा. गुलामगिरी कायद्याने नष्ट करणारे अमेरीकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या सुध्दा एका अज्ञात माथेफिरुने केली असेच वर्णन असायचे.
अंतरकर सर स्वतः आपली सनातनी आणि कर्मठ व्यक्तिपासून ते इहलोकवादी असा प्रवास झाल्याचे त्यांच्या क्लासरुम लेक्चर्समध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांत नेहेमी सांगत असत. मुंबई विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे प्रमुख असलेले मे. पु. रेगे यांना त्यांनी पणजीतल्या आम्हा तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी पाहुणे व्याख्याते म्हणून बोलावले होते. रेगे सरांशी आम्ही संवाद साधला होता.
मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TI S S) मध्ये असलेल्या य. दि. फडके यांच्याशीही त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांशी गाठ घडवून आणली होती. विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची अंतरकरांची नेहेमी धडफड असायची.
पणजीतल्या १८ वा जून रोडवर असलेल्या पदव्युत्तर केंद्राच्या सुशिला बिल्डींगमधला 'माथेफिरु नथुराम' बाबतचा तो संवाद तब्बल चार दशकानंतर मला आजही आठवतो.
डॉ. अंतरकरांच्या तात्त्विक निष्ठांबाबत मला कुठलीही शंका नसली तरी नथुरामला 'माथेफिरु' म्हणून न संबोधण्याबद्दलच्या त्यांच्या भूमिकेने मला खूप संभ्रमात टाकले.
याच दरम्यान पदव्युत्तर शिक्षण चालू असताना मी पणजीला नवहिंद टाइम्सचा क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर होतो. बॉम्बे हायकोर्टाच्या पणजी खंडपीठातील कायद्यासंदर्भात बातम्या देताना अनेक कायदेशीर बाबी कळल्या. त्यापैकी एक म्हणजे मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीला न्यायालय शिक्षा देत नाही तर त्यांची मनोरुग्ण म्हणून एखाद्या पुनर्वसन संस्थेत रवानगी करते.
मुंबईत अनेक लोकांची हत्या करणाऱ्या रामन राघव या खतरनाक माथेफिरु व्यक्तीची याच तत्त्वामुळे फाशी टळली होती. बापुजींचे खुनी असलेल्या नथुराम गोडसेबाबत अंतरकर एका अर्थाने बरोबर होते हे मग मला नंतर कळाले.
Freedom of Will किंवा स्वतंत्र इच्छाशक्ती यास धर्मात, नितीशास्त्रात आणि न्यायशास्त्रात एक अत्यंत आगळेवेगळे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. माथेफिरु किंवा वेडसर व्यक्तीला दोषी ठरवण्याबाबतचे अनेक नियम लागू होत नाहीत ते यामुळेच.
हे संभाषण झाल्यावर मी लवकरच गोवा सोडले. कालांतराने अंतरकर मुंबई विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागप्रमुख बनले आणि हे 'माथेफिरू नथुराम' प्रकरण मी विसरलो. माझ्या विस्मृती पटलात हा विषय कधीच ढकलला गेला होता.
नव्वदच्या दशकात पुण्यातील एका विधानसभा निवडणुकीत गांधीहत्या आणि नथुराम गोडसे हा विषय एक मुद्दा बनला आणि काही लोकांमध्ये नथुराम गोडसे या व्यक्तीविषयी किती आदर आहे याची भयचकित करणारी जाणीव मला तेव्हा झाली.
अंतरकर सरांचा '' माथेफिरु ' या शब्दाला असलेला आक्षेप ऐकून मला बसलेला धक्का अगदी मामुली होता, पुण्यात उघडपणे अनेक नथुराम गोडसेवादी आहेत हे लक्षात येऊन मी थक्क झालो होतो.
हिमानी सावरकर या विनायक दामोदर सावरकर यांच्या धाकट्या भावाच्या सून आणि गांधी खून खटल्यात शिक्षा भोगून परतलेल्या गोपाळ गोडसे यांची त्या कन्या म्हणजे नथुरामच्या पुतणी होत्या. त्यांनी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभेची निवडणुक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
झाले, त्यानंतर नथुराम गोडसे, 'गांधीहत्या आणि मी' हे पुस्तक लिहिणारे नथुरामचे बंधू गोपाळ गोडसे, महात्मा गांधी हत्या खटल्यात अडकलेले सावरकर या सर्वांविषयी पुण्यातील, महाराष्ट्रातील आणि देशातील नियतकालिकांत रकानेच्या रकाने भरुन मजकूर येऊ लागला.
प्रदीप दळवी यांनी लिहिलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नव्वदच्या दशकात आणलेल्या नाटकाने त्यावेळी कितीतरी लोकप्रक्षोभ अनुभवला होता. अशी मांडणी असलेले नाटक रंगभूमीवर यावे, त्यावे प्रयोग करण्यात यावे ही कल्पनाच. त्यावेळी समाजाच्या मोठया घटकास मुळी मान्यच नव्हती. या नाटकाच्या प्रयोगास विरोध करणारे विचारमंथन त्याकाळात झाले होते ते आजही आठवते.
खूप उशिरा या नाटकाच्या सादरीकरणास परवानगी मिळाली. नथुराम गोडसेची भुमिका मांडणारे नाटक मराठी रंगभूमीवर येऊ शकते, थिएटरमध्ये अशा नाटकाला प्रेक्षकांचा उत्फुर्त, भरभरून प्रतिसाद मिळू शकतो यावर विश्वास ठेवायला नंतर खूप जड गेले.
साठ- सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत महाराष्ट्रात याच्या अगदी उलट स्थिती होती ! मी शाळेत असताना साने गुरुजी कथामाला वगैरेंसारखे कार्यक्रम श्रीरामपुरात आणि महाराष्ट्रात गावोगावी राबवले जात. त्याकाळात नव्या दमाच्या, नव्या प्रागतिक विचारांच्या बंडखोर तरुणांनी, संघटनांनी समाजात अगदी रान उठवले होते. या पिढीतील अनेक जण गेल्या दशकात काळाच्या पडद्याआड झाले, अजूनही आहेत ते प्रभावहीन झाले आहेत.
त्यामुळे आता थेट महात्मा गांधींना किंवा त्यांच्या प्रतिमेला गोळ्या घालण्याच्या घटनांविषयी ना कुणाला खेद वा खंत वाटतो. भर सभेत आणि पवित्र संसद सभागृहातसुद्धा अशा धक्कादायक घटना घडतात. बापूंना शिव्या घालणारे, गरळ ओकणारे रातोरात सेलिब्रिटी होतात, हे वलय मग त्यांना कित्येक वर्षे खूप लाभ देऊन जाते.
आणि ही तीनचार वर्षांपूर्वीची घटना. `सुगावा प्रकाशना'च्या विलास वाघ सरांना भेटायला त्यांच्या पुण्यातील कार्यालयात गेलो होतो. वाघ सर कुठे बाहेर गेले तेव्हा सहज समोर डेस्कवर असलेले एक जुने पुस्तक उचलले आणि मी चमकलोच.
गोपाळ गोडसे यांचे 'गांधीहत्या आणि मी' हे ते पुस्तक होते. पटकन मी पुस्तकाची प्रस्तावना वाचायला घेतली आणि झटकन वाचून संपवली. प्रस्तावना वाचून थक्क झालो होतो मी. त्या पुस्तकाच्या कितीतरी आवृत्त्या निघाल्या होत्या आणि त्यावरुन पुस्तकाला मिळणारा प्रतिसाद लक्षात येत होता. वाघ सरांना मी याबाबत बोललो सुद्धा.
``विचारांच्या लढाईत आपण माघार घेता कामा नये, प्रतिवाद सतत चालू ठेवला पाहिजे,'' असे वाघ सर त्यावेळी म्हणाले होते.
या रविवारच्या (February 6, 2022) इंडियन एक्सप्रेसमध्ये अभिनेते नासिरुद्दीन शाह यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नथुराम गोडसेच्या भुमिकेवर लिहिले आहे. ‘एक राजकारणी म्हणून ही भुमिका स्विकारण्याआधी कोल्हे यांनीं खूप खूप विचार करायला हवा होता, असे नासिरुद्दीन यांनी म्हटले आहे. आपल्या पक्षाची भुमिका लोकांपुढे मांडणे हे कुठल्याही राजकारण्याचे पहिले कर्तव्य असते असे नासिरुद्दीन यांनी म्हटले आहे.

अस्पृश्य निग्रो या दोन्ही संबोधनात कालानुसार बदल होत गेला आहे.

 अस्पृश्य हे संबोधन कुणाही व्यक्तीला आवडणार नाही. काळे किंवा निग्रो हे संबोधनही अमेरिकेतील आफ्रिकन - अमेरिकन लोकांना आज आवडणार नाही. या दोन्ही संबोधनात कालानुसार बदल होत गेला आहे. ’अस्पृश्य’ हे नावच फेकून दिले पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. हे नाव गुलामीचे प्रतीक आहे. त्यात अपमान, अन्याय अगतिकता व नष्टचर्य काठोकाठ भरले आहे. अस्पृश्यता ही निकृष्ट स्वरूपाची गुलामगिरी आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते.

पूर्वीच्या काळी अस्पृश्यांची महार, मांग, ढोर, चांभार अशी नावे प्रचलित होती. ती नावे नंतर या दलितांनी फेकून दिली. त्याऐवजी सोमवंशी, रोहिदास किंवा वाल्मिकी अशी नावे धारण केली. महात्मा गांधींनी दलितांना ’हरिजन’ म्हणजे देवाची मुले असे नाव दिले होते, दलितांनी मात्र या नावाचा स्वीकार केला नाही.
गांधीजींनी ’हरिजन’ हा शब्दप्रयोग वापरला याचे कारण दलितांसाठी वापरली जाणारी ‘अस्पृश्य’ ही संज्ञा काहींना खटकली होती. अस्पृश्य शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरला जावा अशी विनंती झाल्याने त्यासाठी पर्यायी असा कोणता शब्द वापरावा यासाठी गांधीजींनी लोकांकडून सूचना मागवल्या. तेव्हा एका दलित पत्रलेखकाने गुजराथी आद्यकवीच्या गीतातील `हरिजन’ हा शब्द वापरावा अशी सूचना केली. गांधींना हा पर्यायी शब्द आवडला आणि तो ते शब्द वापरू लागले.
`हरिजन’ या शब्दाची ही व्युत्पत्ती सांगून गं. बा. सरदार म्हणतात की शब्द बदलल्याने वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही हे खरे आहे.’ आमच्या अनेक दलित मित्रांना हा शब्द आवडत नाही म्हणून मी त्याचा कमीत कमी वापर करतो.
आज ’हरिजन’ हा शब्द भारतीय दलितांना काट्यासारखा रूतत असला तरी इतक्या व्यापक प्रमाणावर अस्पृश्यतेच्या अमानुष रूढीकडे महात्मा गांधींनी लक्ष वेधले ही वस्तुस्थिती अमान्य करून चालणार नाही. ``रोगाचे निदान आणि उपाययोजना बरोबर नसेलही, पण समाजपुरूष एका भयंकर रोगाने पोखरला जातो आहे हे सांगणारा महाभाग योग्य वेळी उभा राहणे आवाश्यक असते,” असे साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी म्हटले आहे.
खुद्द डॉ. आंबेडकरांनीही अस्पृश्यांसाठी प्रोटेस्टंट हिंदू, बहिष्कृत हिंदू वगैरे निरनिराळ्या नावांनी संबोधिले. स्वातंत्र्योत्तर काळात दलित हे नाव रूढ झाले. महार, मांग इत्यादी पारंपरिक जातिवाचक नामे सनातन हिंदूधर्माशी निगडित असल्याने चीड आणणारी आहेत असे म्हणून ती सोडून देण्यात आली.
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी आता ’दलित’ ही संज्ञा रूढ झाली आहे. सरकारी कामकाजासाठी आवश्यक शब्दप्रयोग म्हणून पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाच्या लोकांसाठी सरकारप्रणीत ’अनुसूचित जाती’ हा शब्द वापरला आहे’.
दलित शब्दाच्या वापरावरून चळवळीत तीव्र मतभेद झाले आणि गट-तटही पडले. काहीजणांना हे विशेषण कमीपणाचे वाटले, जे नाहिसे करावयाचे आहे तेच दर्शविणारा हा शब्द आहे असे वाटले. बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ आणि डॉ. म. ना. वानखेडे यांच्यासारख्या लेखकांनी त्या शब्दाला जास्तीत जास्त व्यापक अर्थ दिला. देशातील सर्व ठिकाणचे, कोणत्याही व्यवसाय धंद्यातील पददलित, पीडित म्हणजे ’दलित’ असा अर्थ त्यांनी लावला, तर राजा ढाले व अन्य काहीजणांनी ’बौध्द साहित्य’ नामक वेगळा प्रवाह निर्माण केला आणि ’दलित’ चा शब्दार्थ नवबौध्दांपुरताच मर्यदित ठेवला. त्यांच्या मते ’दलित’ शब्दाची व्याप्ती वाढविणे अवमानकारक व घातक ठरेल.
दलित या शब्दाचा आग्रह करणारे उलट जातीयवादाला आणि वर्णभेदाला खतपाणी घालणारे आहेत असे काहींचे मत आहे. ’दलित’ शब्द मान्य असलेल्यांच्या मते त्याचा अर्थ’सांस्कृतिक अस्मिता’ मिळविणे असा होतो. ’दलित असण्यात’ असणारी कमीपणाची हीनगंडाची भावना आता नाहिशी होत आहे असे एका गटाचे मत आहे..
मात्र दलित या नावाशी भूतकाळ चिकटलेला असल्याने पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातील काही लोकांनी या शब्दाच्या वापरास तीव्र विरोध केला आहे. भारतातील विविध राज्यातील अस्पृश्य समाजातील अनेक लोकांनी गेल्या दोन शतकांत ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. ’ख्रिस्ती महार’ वा ’ख्रिस्ती मांग’ यासारख्या संबोधनाला पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या काही ख्रिस्ती लोकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
मात्र दलित हे संबोधन आपल्या ख्रिस्ती धर्मात आणण्यास या पूर्वाश्रमीच्या काही अस्पृश्य लोकांनी नकार दिला आहे. अस्पृश्य ही जात मागे टाकून, त्यातून आम्ही ख्रिस्ती धर्मात आलो आहेत, आता आम्ही फक्त ख्रिस्ती आहोत, ’दलित’ नाही अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. ’दलित’ या संज्ञेचा कलंक वा स्टिग्मा आम्हाला नको असे या लोकांना वाटते.
ख्रिस्ती समाजातील काही घटकांनी धर्मांतरानंतर मात्र दलित या संबोधनाशी फारकत घेतलेली नाहेी. अस्पृश्य लोकांनी ख्रिस्ती, शीख वा बुद्ध धर्म स्वीकारला म्हणून धर्मांतरानंतर त्यांचे दलितत्व लगेच गळून पडते असे नाही. ते दलितच राहतात. धर्मांतरामुळे त्यांची सामाजिक, ऐतिहासिक आणि आर्थिक पार्श्वभूमी ताबडतोब नाहिशी होत नाही. त्यामुळे ख्रिस्ती झालो तरी आम्ही दलितच आहोत. त्यामुळेच दलितांना मिळणाऱ्या सर्व सवलतींवर आणि आरक्षणावर आमचा हक्क आणि अधिकार शाबूत राहतो, असे ख्रिस्ती समाजातील एका मोठ्या घटकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे भारतातील ख्रिस्ती चर्चनेही या भूमिकेचे पूर्ण समर्थन केले आहे. ख्रिस्ती धर्म जात-पात मानत नसला तरी दलितत्व हे वास्तव आहे, धर्मांतर झाले म्हणून ते नाकारता येणार नाही, अशीच चर्चची भूमिका आहे.
मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुभाष चांदोरीकर म्हणतात. : ’(मी) स्वत: दलितत्वाचे चटके सहन केलेला, अस्पृश्यतेचा अनुभव घेतलेला, जातीय व्यवस्थापनाचे दुष्परिणाम भोगलेला व ख्रिस्ती होऊन व ख्रिस्ती धर्मगुरू होऊनही मूळ दलितत्व न गमावलेला उपेक्षित ख्रिस्ती व्यक्ती आहे.’ 1
अलिकडच्या काळात अनेकांनी आंबेडकरवादी असे संबोधन स्विकारले आहे. समांतर, विद्रोही असे नवनवे प्रवाह निर्माण झाले आहेत, देवाधर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांचे `नास्तिक' हे संबोधनसुद्धा गेल्या काही दिवसांत चर्चेत आले.
काही दिवसांपूर्वी `दलित’ हा शब्दच वापरु नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
नावात काय आहे? असे म्हटले जाते. अमेरिकेत कृष्णवर्णीयांनी त्यांची स्वत:ची अस्मिता दर्शवणारे वेगवेगळे संबोधन स्वत:साठी स्वीकारले आहे. काही काळ या लोकांना ’कलर्ड’ या नावाने ओळखले जाई. त्यानंतर निग्रो हे संबोधन त्यांनी स्वीकारले होते. त्याचबरोबर निग्रो या शब्दाचे आद्याक्षर हे ’कॅपिटल’ असावे असा त्यांचा अनेक वर्षे आग्रह होता. मात्र काही गौरवर्णीय त्यांच्यासाठी ’निगर’ असा शिवीसारखा शब्दप्रयोग वापरू लागले.
काही काळ ’ब्लॅक’ या नावाचाही कृष्णवर्णीयांनी स्वीकार केला होता. ’ब्लॅक इज ब्यूटिफूल’ ही संकल्पना लोकप्रिय झाली, काळे असण्यात कसलीही विद्रुपता नाही असे ठासून सांगण्यात येऊ लागले. पण ब्लॅक हे संबोधनसुध्दा नंतर मागे पडले.
”मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी ’काळा’ या नावाऐवजी ’आफ्रो-आफ्रिकन’ हे नाव कृष्णवर्णीयांना दिले. आपली मुळे आफ्रिकेत आहेत आणि फांद्या आहेत अमेरिकेत. आफ्रो-अमेरिकन या नावाने कृष्णवर्णीयांना नवी ओळख व अस्मिता प्राप्त करून दिली. त्यांचा आत्मविश्वास वाढला.” आता अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना ’आफ्रिकन-अमेरिकन’ असे संबोधले जाते. ब्लॅक वा निग्रो असे त्यांना संबोधणे अपमानास्पद मानले जाते.
दलितांच्या आणि कृष्णवर्णीयांच्या संबोधनात होत गेलेल्या या बदलांविषयी जनार्दन वाघमारे म्हणतात की, ‘नावात किती आशय असतो हे यावरून लक्षात येईल. कुणास ठाऊक, हे नावही उद्या बदलेल. ‘दलित’ हे नाव देखील पुढे कायम राहील हे छातीठोकपणे सांगता येणार नाही.
’दलित’ हे नावदेखील अस्मितेच्या अनिवार्यतेतून धारण करावे लागले आहे. दलितांनी आता आपले ’दलितपण’ सोडून द्यावे असे काही दलित व दलितेतरांना वाटते. दलित समाजात नव्याने अस्तित्वात येणाऱ्या मध्यमवर्गीय मंडळींना ’दलित’ हे नाव नकोसे वाटण्याची शक्यता आहे. दलितपण हे छातीवर लावण्याचा बिल्ला नाही असे बऱ्याच लोकांना वाटते, असे वाघमारे म्हणतात.
``दलित हे नाव जातिवाचक नाही, त्यातून धर्मही सूचित होत नाही. याचे कारण दलित हा शब्द हिंदूप्रमाणेच पूर्वाश्रमीचे अस्पृश्य असलेल्या बौध्द धर्मीय, ख्रिस्ती धर्मीय आणि शीख धर्मीय समाजांसाठीही वापरला जातो ‘दलित या शब्दातून वर्ग मात्र सूचित होतो. दलित हे नाव सध्या भारतभर प्रचलनात आहे. दालित्य संपल्यानंतर दुसरे एखादे नाव शोधावे लागेल. पण संपणार केव्हा?“
------
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद - लेखक कामिल पारखे (सुगावा प्रकाशन- २०१८ मधील एक प्रकरण)

मनोरमा मेधावींना महत्त्वाचे स्थान आहे.


 एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पंडिता रमाबाईंच्या रूपाने महाराष्ट्रात एक वादळ आले होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक, संस्कृती आणि साहित्य या क्षेत्रात हे वादळ चार दशके घोंघावत राहिले. रमाबाई डोंगरे यांचे कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण असलेले कुटुंब कर्नाटकात स्थायिक झाले होते. आई-वडिलांबरोबर मद्रास इलाख्यात गेल्यानंतर बंगाल आणि ओरिसामार्गे हे वादळ महाराष्ट्रात आले तेव्हा आपल्याबरोबर एक छोटीशी पणतीही घेऊन आले होते.

रमाबाईंनी आपल्या कार्यासाठी पुण्यात स्थायिक होण्याचे ठरविले तेव्हा त्यांच्या लाडक्या कन्येने, मनोरमाने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले होते. आपल्या मायेच्या पंखाखाली या पणतीला घेऊन देशात, परदेशात संचार करताना ही पणती सतत तेवत राहील याची काळजी या वादळाने घेतली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुणे सोडून केडगावात स्थिर झाल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली. त्यानंतर अनाथ महिला, बालविधवा आणि मुलींचे पुनर्वसन, धर्मकार्य आणि बायबलचे मराठीत भाषांतर या कामातच वादळाने आपली सर्व शक्ती पणाला लावली. तोपर्यंत त्यांच्या पंखाखालची पणती मोठी ज्योत बनली होती आणि आपल्या आईच्या बरोबरीने तिने कार्य सुरू केले.
पंडिता रमाबाईंच्या वैयक्तिक जीवनातील घडामोडींमुळे आणि त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यामुळे महाराष्ट्रीय समाजजीवनात वादळे निर्माण झाली, तसे त्यांची कन्या मनोरमा मेधावी यांच्या बाबतीत घडले नाही. मात्र या पणतीला आपल्या व्यक्तिगत जीवनात आणि भावनाविश्वात आपल्या अगदी जन्मापासून विविध वादळांना तोंड द्यावे लागले. सतत घोंघावत राहणाऱ्या वादळाच्या सानिध्यात राहूनही ही पणती तेवत राहिली याचे श्रेय त्या वादळाबरोबरच त्या पणतीच्या चिकाटीला आणि कणखर वृत्तीला द्यावे लागेल. शारीरिक व्याधीमुळे ही पणती नंतर अकाली निमाली तेव्हा पूर्वीप्रमाणेच वादळानेही तिची पाठराखण केली.
परदेशातून भारतात येऊन येथेच स्थायिक होऊन शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या अनेक ख्रिस्ती मिशनरी महिला आहेत. त्यापूर्वी अनेक दशके मराठी समाजात मिशनरी कार्य करणाऱ्या पंडिता रमाबाई, सुंदराबाई पवार, ‘स्मृतिचित्रे’ लिहिणाऱ्या, कीर्तन करणाऱ्या आणि रेव्ह. ना. वा. टिळकांनंतर ‘ख्रिस्तायन’ पूर्ण करणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक या मिशनरी महिलांमध्ये मनोरमा मेधावींना महत्त्वाचे स्थान आहे.
‘भारतातील स्त्रीमुक्तीची पहिली जाहीर उद्गाती असे मृणालिनी जोगळेकर यांनी पंडिता रमाबाईंचे वर्णन केले आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या मोजक्या महिलांपैकी एक, हंटर कमिशनसमोर स्त्रीशिक्षणाची बाजू मांडणारी सामाजिक कार्यकर्ती, बालविधवा आणि अनाथ महिलांसाठी शारदासदन आणि मुक्तिसदन चालविणाऱ्या समाजसुधारक, युरोपात अमेरिकेत व्याख्याने देणाऱ्या विदूषी अशा विविध अंगांनी सर्वांना परिचित असणाऱ्या पंडिता रमाबाई डोंगरे-मेधावी या महिलेच्या आईच्या रूपाची ओळख मनोरमा मेधावींच्या व्यक्तिमत्त्वातून होते.
विविध क्षेत्रात महत्त्वाचे येागदान करणाऱ्या, उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या रमाबाईंचे अल्पसे चरित्रही मनेारमाच्या उल्लेखापासून पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यांच्या कन्येचे चरित्र रमाबाईंच्या उल्लेखावाचून अपूर्ण राहते. पंडिता रमाबाईंचे सार्वजनिक आयुष्य मनोरमाच्या जन्मापासून सुरू होते आणि दोघींच्याही आयुष्याची इतिश्रीही काही महिन्यांच्या काळातच होते.
आपले आई-वडील आणि थोरली बहीण यांचा लागेापाठ मृत्यू झाल्यानंतर नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या रमाबाई आपल्या श्रीनिवासशास्त्री या थोरल्या भावाबरोबर मद्रास इलाख्यातून कलकत्त्यात 1878 साली पोहोचल्या. त्यांच्या विद्वतेने आणि संस्कृतवरील प्रभुत्वाने प्रभावित झालेल्या तेथील विद्वानांनी ‘पंडिता’किताब देऊन रमाबाईंचा सत्कार केला. या सत्कारामुळेच महाराष्ट्रात येण्याआधीच रमाबाईंची कीर्ती येथे पसरली होती.
यानंतर त्यांचा एकमेव आधार असलेल्या त्यांच्या भावाचेही निधन झाले आणि परमुलखात एकाकी पडलेल्या रमाबाईंनी बिपीन बिहारीदास मेधावी या बंगाली गृहस्थाशी विवाह केला. 16 एप्रिल 1881 रोजी ईस्टर सणाच्या आदल्या दिवशी मनेारमाचा आसामातील सिल्चर येथे जन्म झाला.
बिपीनबाबूंनी आपल्या डायरीत आपल्या कन्येच्या जन्माची नोंद केली. "Saturday, April 16th Easter Eve, child born at 10 minutes to 8 p.m.''
वडिलांच्या डायरीतील ते पान मनोरमाने आयुष्यभर जपून ठेवले. याचे कारण म्हणजे तिच्या जन्मानंतर केवळ नऊ महिन्यांनी बिपीनबाबूंचे निधन झाले. डायरीत तिच्याविषयी नेांद असलेले ते पान तिच्या वडिलांची तिच्यासाठी एकमेव स्मृती हेाती.
पती निधनानंतर दोन महिन्यांनी रमाबाई आपल्या कन्येसह आसाममधून महाराष्ट्रात आल्या. पुण्यात स्थायिक होऊन तेथील सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्या सक्रिय भाग घेऊ लागल्या. त्या काळात पुणे हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील सामाजिक आणि राजकीय चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले होते.
न्यायमूर्ती म. गो. रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई या दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी बनल्या. आपल्या सामाजिक कार्यानिमित्त पंडिताबाई सोलापूर, अहमदनगर, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात दौरा करत असत. मनोरमा त्या वेळी एक तान्ही मुलगी हेाती. कुटुंबातील वा नातेवाईकांपैकी कुणाही व्यक्तीचा आधार नसताना रमाबाईंनी आपल्या मुलीला सांभाळून आपले सामाजिक कार्य चालू ठेवले हेोते हे विशेष म्हणावे लागेल.
रमाबाई 1883 साली इंग्लंडला गेल्या तेव्हा दोन वर्षे वयाच्या मनेारमाचीही परदेशवारी झाली. ॲना किंवा अन्नपूर्णा तर्खडकर, डॉ. आनंदीबाई जोशी, पंडिता रमाबाई यांचा परदेशवारी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलांमध्ये समावेश होतो. मात्र दोन वर्षे वयाची असताना परदेशगमनाची संधी मिळालेली मनोरमा ही पहिलीच भारतीय कन्या म्हणावी लागेल.
त्याकाळात युरोप- अमेरिकेत जाण्यासाठी जहाज हे एकमेव प्रवासाचे साधन होते. बोटीचा दीर्घकालीन आणि कष्टाचा प्रवास आपल्या तान्ह्या मुलीला झेपेल की नाही याची काळजी तिच्या आईला नक्कीच वाटली असणार. मात्र त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी कुठला होता?
इंग्लंडला मनेारमाला बरोबर घेऊन जाण्याच्या निर्णयाबाबत पंडिता रमाबाईंनी लिहिले आहे, “ मुलीला तिच्या आईने भुईवर ठेवले तर मुंगी चावेल आणि अधांतरी ठेवले तर कावळा नेईल, अशी आशंका करून अगदी नाजूकपणे वाढविले आहे असेही नाही. मुलीचे वय आठ महिन्यांचेही सुरू झाले नाही तोच तिची आई तिला घेऊन ऐन उन्हाळ्यामध्ये हिंदुस्थानच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत प्रवास करून आली आहे. या प्रवासात मुलीच्या प्रकृतीचा बराच परिचय झाला आहे.”
रमाबाईंच्या कणखर स्वभावाचे त्यांच्या आयुष्यातील विविध घटनांमध्ये दर्शन घडते. आपल्या लाडक्या मुलीच्या संदर्भात निरनिराळे निर्णय घेतानाही त्यांचा हा स्वभाव दिसून येतो. पंडिता रमाबाईंनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात खूप सोसले होते. त्यामुळे आपल्या मुलीचे हित लक्षात घेऊन प्रसंगी काळजावर दगड ठेवून मनोरमाच्या बाबतीत त्यांनी अनेक निर्णय घेतले होते असे दिसते.
इंग्लंडला पोहोचल्यानंतर तेथील ऑक्सफर्ड जिल्ह्यातील वाँटेज येथे ‘सिस्टर्स ऑफ दी कम्युनिटी ऑफ सेंट मेरी दी व्हर्जिन’ या संस्थेच्या सिस्टरांच्या मठात त्या राहिल्या. त्या मठातील सिस्टर जेराल्डीन यांचे आणि छोट्या मनोरमाचे एक खास नातेसंबंध निर्माण झाले. सिस्टर जेराल्डीनने मनोरमाचा चांगला सांभाळ केला. मनोरमा या सिस्टरला आजी म्हणत असे. मनोरमा भारतात परतल्यानंतरही या आजी-नातीचे संबंध कायम राहिले. जगाच्या दोन टोकांत वास्तव्य करणाऱ्या त्या दोघींनी पत्रव्यवहारामार्फत हे नाते कायम राखले.
पंडिता रमाबाईंनी आपल्या कन्येसह वाँटेज येथेच 29 सप्टें 1883 रोजी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. वाँटेज येथील मठात छोट्या मनोरमाचे तेथील सिस्टरांबरोबर मायेचे नाते निर्माण झाले. रमाबाई मनोरमास लाडाने ‘बॉबी’ म्हणत असत. वाँटेज कॉन्व्हेंटच्या सिस्टर मनोरमाला ‘मनो’ म्हणत असत. मनोरमा हिंदुस्थानची कन्या म्हणून त्या सिस्टर तिला ‘डॉटर ऑफ दी ईस्ट’ किंवा पौर्वात्य कन्या म्हणत असत.
इंग्लंडमध्ये मनोरमा नव्याने निर्माण झालेल्या मायेच्या नात्यात रुळत असतानाच तिच्या आईला इंग्लंड सोडून अमेरिकेला जाण्याचे वेध लागले. अमेरिकेतील फिलाल्डेफिया येथे आनंदीबाई जोशींच्या वैद्यकीय पदवीदान समारंभास त्या उपस्थित राहणार होत्या. 1886 च्या फेब्रुवारीत आपल्या कन्येसह पुन्हा एकदा रमाबार्ईंनी अमेरिकेला जाण्यासाठी जहाजाचा प्रवास सुरू केला.
पंडिता रमाबाईंचे अमेरिकेत स्वागत करण्यासाठी आनंदीबाई आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी दोन दिवस धक्क्यावर वाट पाहात होते. या भेटीविषयी डॉ. आनंदीबाईंनी लिहिले आहे. ‘पंडिता रमाबाई येथे खुशाल पोहोचल्या. वादळ, नद्या व ओढे यामुळे त्यांना येण्यास वेळ लागला. समुद्राच्या धक्क्यावर मी त्यांची दोन दिवस वाट पाहिली. त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर आहे. ती फार गोजिरवाणी आहे. ती सुस्वरूप व उमलणाऱ्या ताज्या गुलाबाच्या कळीप्रमाणे सुकुमार व मनोहर दिसते. ज्या तिच्या आईने आजपर्यंत दु:ख भोगले आहे त्या आईला तिच्यापासून समाधान वाटत असेल.
अमेरिकेत असताना छोटी मनोरमा खूप आजारी पडली तेव्हा नुकत्याच वैद्यकीय पदवी मिळालेल्या डॉ. आनंदीबाईनीं तिच्यावर उपचार केले. भारतात येण्यापूर्वी डॉ. आनंदीबाईंनी एका अडलेल्या बाळंतिणीला सोडविले होते. परदेशात वैद्यकीय पदवी संपादन करण्याचा बहुमान मिळविणाऱ्या डॉ. आनंदीबाईंची इच्छा मात्र दुर्दैवाने पूर्ण झाली नाही. मायदेशी परतल्यानंतर तीनच महिन्यांनंतर म्हणजे 26 फेब्रुवारी 1887 रोजी त्यांचे निधन झाले.
अमेरिकेतील रमाबाईचे वास्तव्य लांबले तेव्हा आपल्या मुलीच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून मनोरमाला त्यांनी अमेरिकेतून इंग्लंडला परत जहाजाने पाठवून दिले. अत्यंत कष्टाच्या अशा जहाजाच्या प्रवासात त्यांनी आपल्या मुलीची जबाबदारी जहाजाच्या व्यवस्थापिकेवर सोपवून दिली. त्यांच्या या धाडसाचे आजही कौतुक वाटते. याचे कारण म्हणजे अमेरिकेहून जहाजाने एकट्याने प्रवास करणाऱ्या मनोरमाचे त्यावेळी वय केवळ सहा वर्षांचे होते.
अमेरिकेचा दौरा आटोपून रमाबाई पृथ्वीप्रदक्षिणा करत जपानमार्गे भारतात परतल्या आणि पुन्हा एकदा छोटीशी मनोरमा जहाजामार्गे इंग्लंडहून एकट्याने प्रवास करत भारतात परतली. मुंबईत रमाबाईंनी ‘शारदासदन’ हा बालविधवांसाठी आश्रम सुरू केला. तेव्हा मनोरमा आईबरोबर तिथेच राहू लागली. गोदूबाई या शारदासदनातील पहिल्या बालविधवा. या गोदूबाईचा पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह झाला व आनंदीबाई (बाया) कर्वे म्हणून त्या पुढे ओळखल्या जाऊ लागल्या. शारदासदनात असताना आनंदीबाई मनोरमाला सांभाळण्याचे काम करत असत.
शारदासदनचे पुण्यात स्थलांतर झाले तेव्हा पंचहौद मिशनजवळील एपिफनी शाळेत मनोरमा शिकू लागली. याच काळात ती आपली मातृभाषा मराठी शिकली. त्यानंतर पुन्हा एकदा शिक्षणासाठी मनोरमाचे इंग्लंडला आणि नंतर अमेरिकेत स्थलांतर झाले. तेथे उच्चशिक्षण घेत असताना आईची प्रकृती बिघडली म्हणून मनोरमा 1900 साली भारतात परतली आणि त्यानंतर रमाबाईंच्या कामात ती मदत करू लागली. दरम्यानच्या काळात पंडिताबाईंनी शारदासदन पुण्याहून केडगावात हलविले.
केडगावात स्थायिक झाल्यानंतर रमाबाईंच्या आयुष्याचे एक नवे पर्व सुरू झाले. या पर्वातील त्यांचे कार्य करण्यासाठी आता त्यांना कन्येची साथ लाभली होती. शारदासदनातील मुली पंडिता रमाबाईंना ‘आई’ म्हणत असत. त्यामुळे नुकतीच विशीत पदार्पण केलेल्या मनोरमाने केडगावातील शारदासदन, मुक्तिसदन आणि इतर आश्रमांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली.
मनोरमाचे शिक्षण इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेत झाले. भारतात शिक्षणकार्य करताना येथे मान्य असलेल्या शैक्षणिक पदव्या आपल्याकडे असाव्यात या हेतूने पुण्यातील डेक्कन कॉलेजात त्या शिकू लागल्या. केडगावातून रोज त्या स्वत: मोटार चालवत पुण्यात यायच्या, अशाप्रकारे लांब अंतरावर कार चालवत येणारी मनोरमा पहिली भारतीय महिला असावी, पुढे काही दशकानंतर इरावती कर्वे या पुण्यातल्या पेठेंतून स्कुटर चालवाणाऱ्या पहिल्या महिला होत्या,
कॉलेज संपल्यानंतर घरी येऊन केडगावातील शाळेच्या कामाकडे, दैनंदिन हिशोबाकडे त्या लक्ष घालत असत. 1917 साली त्या बी. ए. झाल्या. याचदरम्यान त्यांची प्रकृती ढासळू लागली.
केडगावात स्थायिक झाल्यानंतर मनोरमाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा केला. या दौऱ्याचे स्वरूप प्रामुख्याने धार्मिक होते असे दिसते. या दौऱ्यात त्यांनी अनेक धार्मिक सभांमध्ये व्याख्याने दिली. त्यावेळी त्यांचे वय केवळ बावीस वर्षांचे होते. ‘म्हणजे ज्या वयात त्यांच्या मातेने कलकत्ता व सारा भारत हलविला त्याच वयात त्यांच्या या आवडत्या लेकीने ऑस्ट्रेलिया आणि सारे पाश्चात्य देश हलविले, असे देवदत्त टिळकांनी मनोरमाबाईंच्या या दौऱ्याबाबत लिहिले आहे.
ऑस्ट्रेलियात असताना मनोरमाबाईंनी आपल्या आईवर एक पुस्तकही लिहिले. पंडिता रमाबाई अमेरिकेत असताना त्यांनी 1887 साली ‘हाय कास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. त्यानंतर चौदा वर्षांचा काळ उलटल्यानंतर त्यांच्या कन्येने स्वतःही परदेशात असताना या पुस्तकाचा 95 पानांचा उत्तरार्ध लिहिला. सामाजिक आणि धार्मिक कार्यात गढून गेलेल्या एका कन्येने आपल्या थोर मिशनरी मातेचे चरित्र आणि कार्य या पुस्तकात लिहिले आहे.
एका कन्येने आपल्या हयात असलेल्या मातेच्या कार्याचे चित्रण करणारे हे पुस्तक अपवादात्मक म्हटले पाहिजे. पंडिता रमाबाई अमेरिकेच्या आपल्या पहिल्या दौऱ्यावरून भारतात परतल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याचा कसा विस्तार होत गेला याचे वर्णन या पुस्तकात आहे. आपल्या आईविषयी मनोरमाबाईंना वाटणारा आदर या पुस्तकातून व्यक्त होतो.
केडगावात मनोरमाबाईंनी भारतातील पहिली अंधशाळा सुरू केली. या अंधशाळेच्या कामासाठी मनोरमाकवून त्यांचे अपंगत्व दूर करून त्यांचे पुनर्वसन केले जात असे. मनोरमाबाईंनी परदेशात असताना ब्रेल लिपी शिकून घेतली. या अंधशाळेस ‘बर्थमी सदन’ असे नाव देण्यात आले. बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने एका अंधाला दृष्टी प्राप्त करून दिली अशी कथा आहे. बर्थमी सदनातही अंधांना लिहिणे-वाचणे शिकवून त्यांचे अपंगत्व दूर करून त्यांचे पुनर्वसन केले जात असे.
मनोरमाबाईंनी अंधशाळेतील शिक्षकांना ब्रेल लिपीचे धडे दिले, त्या स्वतःही या शाळेत शिकवित असत. या शाळेतील अंध मुलींना आणि महिलांना वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे शिक्षण दिले जाई. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अंधांसाठी शाळा सुरू करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे मनोरमाबाईंचे कार्य निश्चितच महान होते.
अंधशाळेप्रमाणेच मनोरमाबाईंचे स्वतःचे आगळेवेगळे कार्य म्हणजे कर्नाटकातील गुलबर्ग्यात त्यांनी स्थापन केलेली मुलींची शाळा. 1913 मध्ये तत्कालील निजाम राजवटीतील गुलबर्ग्यात शांतिसदन ही शाळा त्यांनी सुरू केली. या दरम्यानच्या काळात पंडिता रमाबाईंनी आपले सर्व लक्ष बायबलच्या मराठी भाषांतरावर केंद्रित केले. त्यामुळे त्यांच्या सर्व संस्थांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मनोरमाबाईंकडे आली होती.
1918 नंतर मनोरमाची प्रकृती अधिकच ढासळू लागली. त्यांना हृदयविकाराचे दुखणे हेोते. केडगावातून त्यांना मिरजेच्या दवाखान्यात हलविण्यात आले. तेथेच 24 जुलै 1921 रोजी त्यांचे निधन झाले. या काळात पंडिता रमाबाईंच्या बायबलच्या भाषांतराचे काम संपत आले होते. प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. भाषांतराचे काम संपेपर्यंत आपल्याला बोलावू नकोस अशी परमेश्वराकडे त्यांची प्रार्थना चालू होती.
आपल्या मुलीच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी त्यांनी भाषांतराचे काम पूर्ण केले. 4 एप्रिल 1922 रोजी भाषांतराचे शेवटचे प्रूफ तपासून त्यांनी आपल्या छापखान्यात पाठविले आणि त्याच रात्री त्यांनीही या जगाचा निरोप घेतला.
ब्रिटिश आमदानीत निराधार महिलांचे पुनर्वसन करणाऱ्या, त्यांना साक्षर करण्याचे कार्य पंडिता रमाबाई आणि मनोरमा मेधावी यांनी केले. त्याकाळात अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या अगदी मोजक्या स्त्रियांमध्ये या दोघी मायलेकीचा समावेश होतो.
पंडिता रमाबाई त्यांच्या विद्वत्तेमुळे, राजकीय क्षेत्रातील सहभागामुळे आणि त्यांच्या आयुष्यातील काही वादग्रस्त घटनांमुळे अनेक वर्षे प्रकाशझोतात राहिल्या. तसे मनोरमाबाईंचे झाले नाही.
परदेशात अनेक वर्षे राहून नंतर केडगावसारख्या खेड्यात त्यांनी समाजकार्य केले. मनोरमाबाईंच्या जीवनातील अनेक प्रसंग काळजाला चटका लावतात. आईच्या मायेच्या आधाराने या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणे त्यांना शक्य झाले. त्यामुळेच पुढे त्या अनाथ बालिकांच्या दुःखाचे ओझे हलके करू शकल्या.
‘रमाबाईंच्या भोवती विहरणाऱ्या ग्रहतारादिकांत मनोरमा चांदणीसारखी शोभायची,’ असे पंडिता रमाबाईंचे एक चरित्रकार देवदत्त नारायण टिळकांनी त्यांचे वर्णन केले आहे. विशेष म्हणजे पंडित रमाबाईंचे पहिले चरित्र लिहिले आहे ते `प्रबोधन'कार केशव सिताराम ठाकरे यांनी.
मनोरमा बिपिन बिहारी मेधावींना अल्पायुष्य लाभले तरी त्यांच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे ब्रिटिश जमान्यातील महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील महिलांमध्ये त्यांना खास स्थान लाभले आहे.
मनोरमाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी ईस्टर होता, यावर्षीही असाच योग आला आहे
भारतातील या एका आद्य महिला समाजसुधारक असलेल्या मात्र तरीही दुर्लक्षित असलेल्या मनोरमा मेधावी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त (एप्रिल १६) खास अभिवादन.

(ख्रिस्ती मिशनरींचे योगदान - लेखक कामिल पारखे या पुस्तकातील एक प्रकरण )

Tuesday, April 12, 2022

उपवासकाळ किंवा लेन्ट सिझन 

उपवासकाळ म्हटले कि हरेगावला आणि श्रीरामपूरला भर उन्हाळयात रणरणत्या उन्हात वाळू असलेल्या मैदानात गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारच्या भक्ती प्रार्थनेत सहभागी झाल्याची आठवण येते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगल्यानंतर दुपारी तीनला 'हे बापा, मी माझा आत्मा आता तुझ्या स्वाधीन करतो' असे म्हणून त्याने अखेरची मान टाकली, म्हणून भर उन्हात येशूच्या मरणप्राय वेदनांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेच्या प्रार्थना व्हायच्या.

या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवाराने किंवा अँश वेन्सडे या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आधल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हल सुरुवात होते आणि या उत्सवाची भस्म बुधवाराच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते. अर्थांत गोव्याला फादर होण्यासाठी जाईपर्यंत `कार्निव्हल’ हा शब्द माझ्या कधी कानांवरसुद्धा पडला नव्हता.
भारतीय धर्मग्रंथांत सात (सप्त) किंवा पाच (पंच) या संख्या वारंवार येतात, जसे सप्तर्षी, सप्त चिरंजीव, पंचकन्या, त्याप्रमाणे बायबलमध्ये चाळीस ही संख्या अनेकदा येते, जसे नोहाच्या कथेत महाप्रलयाच्या वेळी चाळीस दिवस आणि रात्री सतत पाऊस पडला, मोझेसने देवाबरोबर चाळीस दिवस घालवल्यानंतर तो देवाने दिलेल्या दहा आज्ञांच्या पाट्या घेऊन परतला. पृथ्वीतलावरचे आपले जीवितकार्य सुरु करण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस एकांतवासात उपवास केले, त्यानुसार ख्रिस्ती धर्मपरंपरेत हा चाळीस दिवसांचा उपवासकाळ आणि प्रायश्चितकाळ पाळला जातो.
माझे आईवडील वर्षभर दर शुक्रवारी आणि शनिवारी कडक उपास करत, यापैकी शुक्रवार हा येशू ख्रिस्ताच्या मरणाचा दिवस तर शनिवार हा मारियाबाईचा दिवस म्हणून उपास पाळला जायचा. शुक्रवारी रात्री उपास सोडला जायचा, शनिवारी फक्त दुपारीच जेवण करायचे, उपासाच्या या दोन्ही दिवशी पाणी आणि चहा चालायचा, इतर कुठलेही फराळाचे पदार्थ किंवा फळे वर्ज्य असायची. उपवासकाळात मग बुधवारच्या उपासाची भर पडायची. दादांना ९० वर्षांचे तर बाईला ८० वर्षांचे आयुष्य लाभले.
पूर्ण वर्षभर शुक्रवारी घरात नेहेमी होणारे बिफ कधीही खाल्ले जात नसे, त्याऐवजी ताजे मासे किंवा सुके बोंबील यासारखे कुठलेही सुके मासे चालायचे, उपवासकाळात शनिवारी आणि बुधवारी मात्र बिफचे कालवण वर्ज्य नसायचे यामागचे तार्किक कारण मला कधीच कळाले नाही.
उपवासकाळातील सुरुवातीचा भस्म बुधवार आणि शेवटचा उत्तम शुक्रवार यादिवशी उपास पाळणे करणे हे बंधनकारक होते, कॅथॉलिक चर्चच्या आजच्या रितीनियमांनुसार आजही हे दोन्ही दिवस उपास पाळणे बंधनकारक (ऑब्लिगेटरी) आहे. आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही.
हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात.
उपवासकाळात चर्चमध्ये दररोज मिस्सा साजरी करताना धर्मगुरु जांभळ्या रंगाचे झगे वापरतात, याकाळातल्या रविवारी आणि सणाच्या दिवशी मात्र सफेद वा इतर रंगांचे रंगाचे झगे परिधान केले जातात, ते यामुळेच. चर्चमध्ये धर्मगुरु कुठल्या रंगाचे झगे वापरतात, यावरुन त्या दिवसाचे, त्या मिस्साविधीचे महत्त्व लगेच समजते, उदाहरणार्थ लग्नासारख्या मंगलप्रसंगी लाल किंवा सफेद झगा वापरला जातो, तर अंत्यविधीसाठी सफेद, जांभळ्या किंवा काळ्या रंगाचे झगे असतात.
श्रीरामपूरला घरी असेपर्यंत या उपवासकाळात उपास करण्याची माझ्यावर कधी पाळी आली नाही, कारण सज्ञान होण्याआधीच संन्यासी धर्मगुरु होण्यासाठी मी जेसुईट संस्थेच्या गोव्यातल्या पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. त्यावेळी मला धक्काच बसला. कॅथोलिक चर्चमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या या जेसुईट धर्मगुरुंच्या संस्थेत उपासतापास वगैरेंसारख्या कर्मकांडाला मुळी थाराच नव्हता !
इथे फास्टिंग म्हणजे उपवास अगदी प्रतिमात्मक स्वरुपाचे आणि पूर्णतः व्यक्तिगत पातळीवर ऐच्छिक स्वरुपाचे होते. उदाहरणार्थ, पेनान्स म्हणजे आत्मक्लेश, यासाठी नाश्त्यासाठी नेहेमीप्रमाणे तीनचार पाव खाण्याऐवजी एकदोन पाव कमी खाणे किंवा एखादेवेळेस आवडत्या फळांचे किंवा आवडत्या खाद्यपदार्थाचे सेवन टाळणे. उपासाची आणि आत्मक्लेशाची अशी सोपी, सहजसुलभ व्याख्या मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.
दरदिवशी बेळगावहून पणजी मार्केटमध्ये ट्रँकांनी येणारे बिफ शुक्रवारी नसायचे, त्यामुळे गुरुवारीच शुक्रवारची बेगमी म्हणून दुप्पट बिफ आणून ठेवले जायचे.
माझ्या या धार्मिक जीवनाच्या कालखंडात माझे सुपिरियर असलेल्या कुठल्याही धर्मगुरुने वा परिचयातल्या कुठल्याही धर्मगुरुने लेन्ट सिझनमधील चाळीसच्या चाळीस दिवस उपास पाळला, किंवा मांसाहार वर्ज्य केला असे मला दिसले नाही. त्यांचा हा कित्ता मी त्यानंतर आजतागायत अगदी इमानेइतबारे गिरवला आहे.
त्यामुळे लेन्ट सिझनमध्ये इतरांसारखे कधीही मी उपासतापास केले नाहीत वा या काळात दाढी राखणे, मांसाहार वा पेयपान वर्ज्य करणे किंवा प्रतिकात्मक आत्मक्लेशाचे प्रयोग करणे अशा गोष्टी मी टाळल्या आहेत.
मात्र याबद्दल मला गिल्ट वाटत नाही अथवा मी काही धर्मविरोधी आहे असेही कुणालाही वाटत नाही. निदान याबाबतीत तरी ख्रिस्ती समाज तसा उदारमतवादी किंवा प्रागतिक आहे हे मानायलाच हवे.
मध्ययुगीन इन्क्विझिशनच्या काळात केवळ धर्मद्रोही, पाखंडी असल्याच्या संशयावरुन अनेकांना तुरुंगकोठडीत टाकण्यात आले, अनेकांना सार्वजनिकरित्या जिवंत जाळले गेले होते. त्यामानाने बदलत्या काळात भाविकांच्या कलानुसार आणि त्यांनी निदान धर्मपालन सोडू नये यासाठी कर्मकांड, धार्मिक रितीरिवाज, कौटुंबिक आणि सामाजिक नितीनियम याबाबत कॅथोलिक आणि इतरपंथीयांनी उदारतेची बरीच मजल गाठली आहे हे नक्की.
विवाहाबाबतचे आणि घटस्फोटांबाबतचे कॅथॉलिक चर्चचे जुने कर्मठ कॅनॉन लॉ किंवा धार्मिक नियम शिथिल करणे हे याबाबतीत एक उदाहरण म्हणून सांगता येईल.अगदी काही वर्षांपूर्वी कॅथॉलिक चर्चमध्ये घटस्फोट मंजूर होणे अशक्यप्राय समजले जायचे, आता तसे नाही .
या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली विक किंवा पवित्र सप्ताह किंवा आठवडा. पाम संडे किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर संडे किंवा ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते.
यावेळी १० एप्रिलला झावळ्यांचा रविवार साजरा होऊन या पवित्र सप्ताहाची सुरुवात झाली आहे.
ख्रिस्ती धर्मातील सर्व पंथीय भाविक पवित्र आठवडा भक्तिभावाने पाळतात, ख्रिसमस किंवा नाताळाइतकेच या पवित्र सप्ताहाला आणि विशेषतः गुड फ्रायडे आणि ईस्टरला आहे. ख्रिसमसची तारीख दरवर्षी २५ डिसेंबर हिच असली तरी भस्म बुधवार, गुड फ्रायडे आणि ईस्टर संडेच्या तारखा चर्चच्या कॅलेंडरनुसार मार्च-एप्रिल महिन्यांत थोड्या आगेमागे होत असतात. या प्रायश्चितकाळात शक्यतो लग्नकार्यासारखे कुठलेही मंगलकार्य हाती घेतले जात नाही.
येशू ख्रिस्ताने जेरुसलेम शहरात आपल्या शिष्यांसमवेत प्रवेश केला तेव्हा या नगरवासियांनी त्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले, यास्मरणार्थ झावळ्यांचा रविवार साजरा केला जातो. गाढवीच्या एका शिंगरावर बसून आलेल्या येशूचे लोकांनी त्या मार्गावर आपले कपडे टाकून, नारळाच्या झावळ्यांनी त्याला ओवाळीत 'होसान्ना, होसान्ना ! '' अशा जयजयकाराच्या घोषणा देत स्वागत केले.
विजयी राजाचे स्वागत करण्यासारखे या मिरवणुकीचे स्वरुप होते. येशू स्वतःहून आपल्या मृत्यूच्या मार्गावर प्रवेश करतो आहे याची त्या जयघोष करणाऱ्या लोकांनां कल्पनाही नव्हती. जयघोषाच्या मिरवणुकीतल्या या लोकांपैकी काही जण नंतर खांद्यावर क्रुस घेऊन जाणाऱ्या येशूची टवाळकी, निदानालस्ती करणाऱ्या लोकांमध्येही असणार होते. झावळ्यांचा रविवारी सर्व चर्चेसमध्ये नारळाच्या झावळ्या घेऊन, 'होसान्ना, होसान्ना ! हे गीत म्हणत प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते.
विशेष म्हणजे `होसान्ना' हा मूळ हिब्रू शब्द असलेली गायने जगभर अनेक भाषांत झावळ्यांच्या रविवारी चर्चमध्ये गायली जातात, जयजयकार किंवा जयघोष हे पर्यायी शब्द नंतर येतात. यावेळी झावळ्यांच्या रविवारी आमच्या चर्चमध्ये ,मधुर चालीत गायले गेलेले हे पुढील गीत येशूच्या त्या जल्लोषी मिरवणुकीचे चित्र उभे करते

जेरुसलेमी बाळे जमली,
प्रभुला गाणी गाऊ लागली
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

गाढवावरी येशू स्वार होई
मधू गाण्यांचा नाद होई
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

बालकांचे ते बोल बोबडे
रहिवाश्यांच्या कानी पडे
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

शहरवासी डोकावती
कान देऊन ऐकती
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

पंडितशास्त्री धावून येती
दडपशाही करु लागती
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

बालकांचे जरी तोंडे दाबिली
गाण्याची गती तरी नाही थांबली
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

पवित्र गुरुवारी येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेतले, लिओनार्दो दा व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या `द लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे. गोवन चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांनी भारतीय शैलीत काढलेले `द लास्ट सपर' हे चित्र इथे मी दिले आहे.
याच पवित्र गुरुवारी रात्री त्याच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या ज्युडासने येशूचे ते विश्वासघातकी चुंबन घेऊन त्याला शत्रूंच्या ताब्यात दिले आणि दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेला येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले.
मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे’, याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जाते. मात्र तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने.
चर्चमधल्या रविवारच्या मिस्साविधीचा काळ प्रवचनासह साधारणतः एक तासापुरता असतो , गुड फ्रायडेची प्रार्थना मात्र थोडी अधिक काळ चालते. या दिवसांच्या प्रार्थनाविधीत मला विशेष भावणारा भाग म्हणजे या दिवशी केल्या जाणाऱ्या श्रद्दावंतांच्या प्रार्थना. जगभर या दिवशी नेहेमीच्या इतर प्रार्थनांबरोबरच ज्यांच्या माध्यमातून देव मानवजातीसमोर प्रकटला त्या ज्यू लोकांसाठी, येशू ख्रिस्तावर श्रद्धा नसलेल्या लोकांसाठी आणि हो, देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणाऱ्या नास्तिक लोकांसाठीही प्रार्थना केली जाते.
लेन्ट सिझनची गुडफ्रायडेलाच सांगता होते. बहुसंख्य कॅथोलिक भाविक फक्त रविवारच्या आणि इतर सणांनिमित्त मिस्सासाठी चर्चमध्ये जात असले तरी चर्चमध्ये वर्षभर दररोज सकाळी वा संध्याकाळी मिस्सविधी होत असतोच, यास एकमेव अपवाद असतो गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे यामध्ये येणाऱ्या शनिवारचा..
गुड फ्रायडेच्या दिवशीसुद्धा पूर्ण मिस्साविधी नसतो. ख्रिस्ताच्या दुःखसहनाच्या स्मरणार्थ प्रार्थना झाल्यावर लगेच कम्युनियन दिले जाऊन विधी संपतो. नंतरच्या शनिवारी येशू कबरेत असल्याने चर्चमध्ये दिवसभऱ कुठलाही प्रार्थना वा विधी नसतो, शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भाविक जमतात ते येशूच्या पुनरुत्थानाचा सोहोळा साजरा करण्यासाठीच.
ईस्टरच्या पूर्वसंध्येला शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळीही ईस्टरनिमित्त मिस्साविधी होतो. येशूच्या पुनरुस्थानाचा हा सण आनंदाने साजरा केला जातो.
काळाच्या ओघात या प्रायश्चितकाळाचे स्वरूप बदलत गेले आहे. बायबलच्या जुन्या करारात प्रायश्चित करण्यासाठी लोक जाडेभरडे गोणपाटाचे कपडे घालत, उपवास करत आणि संपूर्ण अंगावर राख चोपडून शोक करत परमेश्वराची दयायाचना करत असत. त्यामुळे देवाला दया येऊन, त्याचा क्रोध कमी होऊन त्याच्या कृपादृष्टीचा प्रायश्चित करणाऱ्यांना लाभ होई. येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या मरणाने नव्या कराराची निर्मिती झाली, नव्या करारातील परमेश्वर क्रोधी नाही तर दयाळू आहे. त्यामुळे प्रायश्चित करण्याचे स्वरुपही आता खूपच सौम्य आणि केवळ प्रतिकात्मक राहिले आहे.
जगभर देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. युरोपात आणि इतर पाश्चिमात्य देशांत चर्चमधील भाविकांची रोडावणारी संख्या याबाबत बरेच काही सांगून जाते. त्यामुळे निदान चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपले नियम बदलण्याची, लवचिक होण्याची तयारी चर्चने दाखविली आहे हेही नसे थोडके.
त्यानुसार आता उपवासाचे आणि आत्मक्लेशाचे स्वरुप बदलले आहे, आता अँश वेन्सडे आणि गुड फ्रायडेचा अपवाद वगळता ते पूर्णतः ऐच्छिक आहे. गुड फ्रायडेच्या प्रार्थना आता भर दुपारी टळटळीत उन्हात न घेता उन्हे कललल्यानंतर संध्याकाळी होतात. हल्ली वाळूच्या मैदानात गुडघे टेकून आत्मक्लेश करत कुणी प्रार्थना करत नाहीत. उलट चर्चमध्ये भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त बाके असतात, मिस्साविधीत अधूनमधून उभे राहावे लागते, गुडघे ही टेकावे लागतात तेव्हा गुडघ्यांना रग लागू नये, म्हणून त्या लाकडी फळ्यांवर मऊमऊ रंगीत कुशन्ससुद्धा असतात !
हल्ली हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूला अनेक पंखे असलेल्या चर्चमध्ये या गालिच्यासारख्या मुलायम असणाऱ्या कुशन्सवर गुडघे टेकताना लहानपणी रणरणत्या उन्हात वाळूवर गुडघे टेकण्याचा प्रसंग अनेकदा आठवतो.

हा बदल त्या कुशन्ससारखाच सुखावह असतो.

Wednesday, April 6, 2022

 `टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती.

टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा.
अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो.
तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यूज डेस्ककडे सोपवून झाल्यावर ''पान दोनसाठी एडिटिंग करण्यासाठी अजूनही काहीच स्टोऱ्या नाही'' असे आपले दोन्ही हात वर उंचावून उपसंपादक संजय पेंडसे याने मोठ्याने सांगितले. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता माझा तो मजकूर आतल्या पानासाठी नसून पान एकच्या अँकरची ती बातमी आहे असे तो म्हणाला.
''बातमीचा पहिला पॅरा वाचताच ती पान एकचे मॅटर आहे हे कळाले , इट इज अ पेज वन मटेरियल ! पण एडिट मिटिंगमध्ये काय होते ते पाहू,'' असे तो म्ह्टल्यावर पान दोनसाठी मी दुसरे मजकूर तयार करू लागलो.
पत्रकारितेत तोपर्यंत दोन तपांहून अधिक काळ घातलेले असल्याने मी मनातल्या मनात संजय पेंडसेच्या न्यूज सेन्सबद्दल कौतुक केले.
आणि अखेर संजय म्हणाला होता तसेच झाले. 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये दाखल झाल्यानंतर पान एकवर प्रसिद्ध झालेली माझी ती पहिली बातमी.
त्याकाळात टाइम्स ऑफ इंडियात डेस्कवर काम करणाऱ्या उपसंपादकाने व इतरांनी पान एकसाठी बायलाईनची बातमी लिहिल्यास उत्तेजनार्थ वाढिव दिडशे रुपये पगारासोबत मिळायचे. शिवाय फोटोसाठी पन्नास रुपये वेगळे ! या वाढिव मानधनाऐवजी टाइम्स ऑफ इंडिया'च्या पान एकवर बायलाईनची बातमी छापून येण्याचे अधिक अप्रूप होते.
काय होती ती पान एकची बातमी ?
Marathi monthly Niropya enters 100th year
Camil Parkhe,TNN | Dec 26, 2002
''पुणे: एका जर्मन जेसुईट फादरांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका आडवळणाच्या खेड्यात - राहुरीजवळच्या वळण या गावात - १९०३ साली सुरु केलेल्या मराठी मासिकाने 'निरोप्या'ने आज मराठी नियतकालिकांत एक वैशिष्ठपूर्ण स्थान मिळविले आहे. पुणे शहरातून प्रकाशित होत असलेले हे मासिक शतक पूर्ण केलेल्या मराठीतील काही अगदी मोजक्या नियतकालिकांपैकी आहे.
या मासिकाचे संस्थापक-संपादक फादर हेन्री डोरींग यांची नंतर पुण्याचे बिशप आणि काही काळ जपानमधील हिरोशिमा शहरात व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली होती.''
टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत २६ डिसेंबर २००२च्या अंकात म्हणजे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी प्रसिद्ध झाली. टाइम्सच्या आर्किव्हमधून आजही ही बातमी वाचता येते.
या बातमीबरोबर बिशपमहोदयांचा अर्धा कॉलम रंगीत फोटोही छापण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडियाने पान एक आणि शेवटचे पान रंगीत छापण्यास त्यावेळी नुकतीच सुरुवात केली होती.
( माझ्या इतर बायलाईनच्या अनेक बातम्यांप्रमाणे याही बातमीचे कात्रण मी आजही जपून ठेवले आहे. इतरांच्या दृष्टीने ही जीर्ण झालेली कात्रणे तद्दन रद्दी असली तरी फ्लॅटच्या माळ्यावर मी ती ठेवली आहेत. )
वृत्तपत्रीय जगतात विविध पानांच्या पानांच्या वेगवेगळ्या ढंगात लिहिल्या जातात. त्यातही कुठली बातमी आपल्या वाचकांना आवडेल याचे काही खास निकष असतात. उदाहरणार्थ, व्हॅलेंटाईन डे निमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात होणाऱ्या गुलाबाच्या उत्पादनाची आणि युरोपला निर्यात होणाऱ्या फुलांच्या मी दिलेल्या बातम्या दरवर्षी महाराष्ट्र हेराल्ड- नंतर सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकात कायम पान एकवर अँकर म्हणून वापरल्या जातात. या काळात दैनिकाचे संपादक बदलले तरी व्हॅलेंटाईन डे च्या विशिष्ट शैलीत लिहिलेल्या ह्या बातम्या पान एकवरच अँकरच्या जागा पटकावत असत !
टाइम्स ऑफ इंडिया'त त्या दिवशी पान एकवर छापून आलेल्या माझ्या त्या पहिल्या बायलाईनचे कारण म्हणजे जर्मन असलेल्या बिशप डोरींग यांचे मराठी पत्रकारितेतील आणि मराठी भाषेतील महत्त्वाचे योगदान.
'निरोप्या' या मासिकाने मराठीतल्या अजूनही हयात असलेल्या नियतकालिकांत अगदी वरचा क्रमांक मिळवलेला आहे.
मराठी पत्रकारितेचा इतिहास १८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलेल्या `दर्पण' पासून सुरु होतो. त्यानंतर सुरु झालेली अनेक मराठी नियतकालिके अल्पजीवी ठरली. शतकायुषी असून आजही प्रसिद्ध होणाऱ्या काही मोजक्या मराठी नियतकालिकांत १८८१ सालापासून लोकमान्य टिळकांच्या 'केसरी' चा समावेश होतो. मात्र यापैकी बहुतेक नियतकालिके ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरवर तग धरुन आहेत.
या एप्रिल २०२२ महिन्यात निरोप्याने ११९ वर्षे पूर्ण करुन १२० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. या मासिकाच्या रंगीत पानभर जाहिराती पाहून या नियतकालिकाने आर्थिकदृष्ट्या चांगलेच बाळसे धरले आहे येऊ लक्षात येते.
स्थापनेपासून म्हणजे १९०३ पासून 'निरोप्या' हे मासिक सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट्स) वा येशूसंघीय फादरांच्या संस्थेतर्फे चालविले जाते. पुण्याचे दुसरे बिशप म्हणून डोरींग यांची १९०७ साली नेमणूक झाल्यावर हे मासिक पुण्यातून प्रसिद्ध होऊ लागले. पोपमहाशयांना भेटण्यासाठी बिशप डोरींग रोमला गेले आणि पहिले महायुद्ध सुरु झाले. ते जर्मन असल्यामुळे ब्रिटिश भारतात त्यांचे परतणे अवघड झाले. कारण जर्मनी व इंग्लंड ही शत्रुराष्ट्रे होती. याकाळात डोरींग यांची जपानमध्ये हिरोशिमाचे आर्चबिशप पदावर व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली. आता त्यांना आर्चबिशप पदावर बढती मिळाली होती. त्यांच्या अनुपस्थितीत `निरोप्या'चे प्रकाशन थांबले.
महायुद्धाच्या समाप्तीनंतर डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला १९२६ साली परतले. पुणे धर्मप्रांत मुंबई-नागपूरप्रमाणे आर्चडायोसिस नसला तरी त्यांचे आर्चबिशप हे वैयक्तिक सन्मानपद म्हणून कायम राहिले. वसईचे सद्याचे प्रमुख आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांच्याबाबतीत असेच आहे, नाशिक धर्मप्रांताचें बिशप म्हणून नेमणूक होण्याआधीच व्हॅटिकन सिटीत असताना त्यांना आर्चबिशप पद मिळाले होते, ते पद आता कायम राहिले आहे
आर्चबिशप डोरींग यांनी याकाळात बंद पडलेल्या आणि आपले अपत्य असलेल्या ‘निरोप्या’ मासिकाचे १९२७ साली पुनरुज्जीवन केलं. तेव्हापासून आजतागायत ‘निरोप्या’चं प्रकाशन (अलिकडचा कोरोना काळाचा अपवाद वगळता) अखंडितपणे चालू आहे.
पुण्यातल्या रामवाडी इथल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पेपल सेमिनरीचे रेक्टर असलेले फादर भाऊसाहेब संसारे हे जेसुईट धर्मगुरु निरोप्याचे आताचे संपादक आहेत. नारायण पेठेत स्नेहसदन येथे निरोप्याचे कार्यालय आहे.
.
ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स लिखित महाकाव्य 'ख्रिस्तपुराण' हे मराठीतील पहिलेवहिले मुद्रित साहित्य. हे मराठी महाकाव्य पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात १६०४ साली रोमन लिपीत छापले गेले, कारण त्यावेळी देवनागरी छपाई साठी लागणारे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या 'ख्रिस्तपुराणा'तील काही भाग रोमन लिपीतून देवनागरी लिपीत छापण्याचे श्रेय आर्चबिशप डोरींग यांच्याकडेच जाते.
मात्र संपूर्ण ख्रिस्तपुराण रोमन लिपीतून देवनागरीत आणण्यास १९५६ साल उजाडले. लिप्यांतराचे हे महत्त्वाचे काम अहमदनगरच्या प्राध्यापक शांताराम बंडेलू यांनी आणि पुण्याच्या य. गो. जोशींच्या `प्रसाद प्रकाशना'ने केले.
निवृत्त आर्चबिशप डोरींग यांचे १९५१ साली वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांची कबर वा समाधी पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी आजही आहे. चर्च किंवा कॅथेड्रल मध्ये समाधीचा हा मान हा फक्त बिशप, कार्डिनल अशा वरीष्ठ धर्माचार्यांनाच मिळतो.
व्हॅटिकन सिटीतले सेंट पिटर्स बॅसिलिका ही पहिले पोप आणि येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या सेंट पिटर याच्या कबरीवर बांधली आहे. या चर्चच्या भव्य संग्रहालयातच अनेक पोप चिरनिद्रा घेत आहेत,. या भव्यदिव्य सेंट पिटर्स बॅसिलिकाला भेट देण्याचा मला योग आला याचा आजही आनंद वाटतो
आर्चबिशप डोरींग यांच्या समाधीवरील शिलालेख आर्चबिशपांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी माहिती देतोो. परंतु,`निरोप्या'चे संस्थापक-संपादक म्हणून अथवा मराठी पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्द्ल ह्या शिलालेखात उल्लेख नाही.
मी लिहिलेल्या `ख्रिस्ती मिशनरीचे योगदान' या मराठी (सुगावा प्रकाशन ) आणि इंग्रजी (गुजरात साहित्य प्रकाश - २००३) या पुस्तकात आर्चबिशप हेन्री डोरींग यांच्यावर एक प्रकरण आहे.
आणि आता ही मन कि बात .
निरोप्या'विषयी मला विशेष आत्मियता असण्याचे एक कारण म्हणजे माझा पहिला लेख आणि पहिली बायलाईन याच मासिकात १९७० च्या दशकात मी श्रीरामपुरात शाळेत शिकत असताना प्रसिद्ध झाली. वि स. खांडेकरांच्या 'ययाती' कादंबरीच्या रुपाने मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्याविषयी १९७४ साली `निरोप्या'त माझा पन्नासेक शब्दांचा लेख प्रसिद्ध झाला, ती माझी पहिली बायलाईन.
त्यावेळी भविष्यात पत्रकार म्हणून लिखाण हाच माझा पोटापाण्याचा व्यवसाय असेल याची मी कल्पनाही केली नव्हती.