Did you like the article?

Showing posts with label Christians. Show all posts
Showing posts with label Christians. Show all posts

Sunday, January 25, 2026

                                                   अश्विनी लांडगे '

प्रमुख राजकीय पक्षांकडून मुसलमान, ख्रिस्ती आणि शीख लोकांना कुठल्याही पातळीवरच्या निवडणुकीत शक्यतो उमेदवारी दिली जात नाही.

मात्र या लोकांनी तथाकथित निधर्मी पक्षांना बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अपेक्षाही बाळगली जाते.
ओवेसी बंधूंच्या एमआयएम पक्षाने महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळवललेया शंभराहून अधिक जागांबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
एके काळी ख्रिस्ती समाजाचे डॉ लिऑन डिसोझा हे मुंबईचे महापौर होते, नंतर त्यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळात आरोग्य खात्याचे राज्यमंत्रीपद भूषवले होते.
त्याच्याही खूप दशके आधी अत्यंत अल्पसंख्य असलेल्या पारशी समाजाचे मुंबईत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत वर्चस्व होते.
सर फिरोजशाह मेहता हे मुंबईचे पहिले अनभिषिक्त सम्राट, (लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांच्या हातून पराभव चाखणारे स. का. पाटील हे खूप नंतरचे.)
हा आता भूतकाळ झाला आहे.

मुंबई-पुण्यात आणि इतर अनेक ठिकाणी ख्रिस्ती समाजाचे प्रमाण लक्षणीय असले तरी त्यांना प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळत नसते. या कारणामुळे या समाजाला कुठल्याही शहरात आणि राज्यातही राजकीय नेतृत्व असे नाहीच.
गेल्या निवडणुकीत (२०१७) ओवेसींच्या एमआयएमने पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अश्विनी लांडगे या ख्रिस्ती महिलेला तिकीट दिले आणि त्या चक्क निवडून आल्या.

त्याआधी अनेक वर्षे पुणे महापालिकेत ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधीत्वच नव्हते.
यांना यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि महापालिकेत त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.
काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने पुण्यात आणि शेजारच्या पिंपरी चिंचवड येथेही इतरही सात जणांना उमेदवारी दिली होती. पण ते निवडून आले नाहीत.
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसच्या ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांनी वांद्रे पूर्व (वॉर्ड क्र. ९०)मध्ये अत्यंत अटीतटीच्या लढतीत अवघ्या सात मतांच्या फरकाने विजय मिळवला.

                                             ट्यूलिप ब्रायन मिरांडा

ट्यूलिप मिरांडा या वकील असून त्यांनी यापूर्वी महापालिकेत कालिना–वांद्रे पूर्व परिसराचे प्रतिनिधित्व केले होते. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीतही त्यांनी हाच वॉर्ड जिंकला होता. या परीसरात ख्रिस्ती मतदारांचे प्रमाण खूप आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरात काँग्रेस नेतृत्वाने ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांची मुंबई प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
ट्यूलिप मिरांडा यांच्यासह आणखी दोन ख्रिस्ती नगरसेवक मुंबई महापालिकेच्या सदनात असणार आहेत.
ते आहेत काँग्रेस पक्षाचे १०१ वॉर्ड क्रमांकचे कॅरेन डिमेलो आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे धारावीच्या १७८ वॉर्ड क्रमांकचे जोसेफ कोळी
विशेष म्हणजे काँग्रेस पक्षावर यावर्षी मुस्लीम आणि ख्रिस्ती मतदारांनी विश्वास टाकला आहे असे दिसते. मुंबईत आणि पुण्यात या पक्षाने ज्या जागा जिंकल्या आहेत त्यात विजयी मुस्लीम उमेदवारांचे - आणि त्यातही महिलांचे - प्रमाण लक्षणीय आहे.
मागच्या वेळी २०१७ साली पुणे महापालिका निवडणुकांत काँग्रेस पक्षाने फक्त नऊ जागा जिंकल्या होत्या. त्याच्या तुलनेत यावेळी पक्षाने सहा जागांची वाढ केली आहे.
एकूण पंधरा जागा जिंकल्या आहेत. यात मोलाचा वाटा मुसलमान आणि ख्रिस्ती मतदारांचा आहे.




याशिवाय वसई विरार महापालिकेत ख्रिस्ती समाजाचे दहा उमेदवार निवडून आले आहेत.
त्यापैकी एक काँग्रेसचे असून बाकीचे नऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आहेत. बविआने यावेळी वसई विरार महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.

                                                      कॅरेन डिमेलो
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत
१. सॅरल डाबरे (काँग्रेस) - वाघोली मर्देस
2. अरुणा डाबरे (भुईगाव)
3. डॉमणिक रुमाव (नंदाखाल)
4. मार्शल लोपीस (नानभाट)
5. बिना फुट्यार्डो (पापडी)
6. लॉरेल डायस (मर्सेस)
7. अलका गमजा (कोळीवाडा)
8.अजय रॉड्रिग्ज (चुळणा)
9. प्रकाश रॉड्रिग्ज (माणिकपूर) आणि
10. मार्शलिन चाको (स्टेला माणिकपूर)

त्याशिवाय वसईजवळच्या मीरा भाईंदर महापालिकेत पुढील सात ख्रिस्ती उमेदवार निवडून आले आहेत :

                                       शॉन कोलासो, मीरा भाईंदर

मेबल नोएल कोरीया (भाजप)
नीला सोन्स (भाजप)
आयरिन क्वाड्रोस (काँग्रेस)
टॅरेन मेंडोन्सा (काँग्रेस)
फ्रिडा बर्नार्ड डिमेलो (शिंदेसेना)
शॉन कोलासो (काँग्रेस)
शर्मिला विन्सन बागजी (शिंदेसेना)
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये यावेळी मेघाली सचिन खेमा या ख्रिस्ती महिला भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत यापूर्वी त्यांचे पती सचिन खेमा हे भाजपतर्फेच निवडून आले होते.
नाशिक महापालिकेत समीर उर्फ जॉय कांबळे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत. जॉय कांबळे यांचे वडील उत्तमराव कांबळे नाशिक महापालिकेत पूर्वी अनेकदा निवडून आले होते.
नगर शहर हे मराठी ख्रिस्ती जनतेचे येरुशलेम. येथील महापालिकेत मात्र याहीवेळेस एकही ख्रिस्ती नगरसेवक निवडून आलेला नाही.
राज्यातील इतर दोनेक महापालिकेत प्रत्येकी एक ख्रिस्ती नगरसेवक निवडून आले आहेत.

^^^

Camil Parkhe




Sunday, December 8, 2024


श्रीरामपूरला आमच्या आजूबाजूला साजरा होणाऱ्या अनेक सणांपैकी काही सण आमच्याही घरात साजरे व्हायचे, पोळा हा त्यापैकी एक.

या सणाच्या काही दिवस आधीच आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानापाशी असलेल्या मेनरोडला मातीपासून बनवलेल्या रंगीबेरंगी बैलांच्या जोड्या विक्रीला ठेवलेल्या असत.
पोळ्याच्या आदल्या दिवशी यापैकी मग पांढऱ्या, उंचच उंच खिलारी बैलांच्या एकदोन जोडी घरात यायच्या.
त्या बैलांची आमच्या घरात पूजा होत नसायची, मात्र दिवसभर मग या बैलजोड्यांशी माझा खेळ चालायचा.
पोळा संपल्यानंतर अनेक दिवस या बैलजोड्या भिंतीवरच्या फळ्यांवर असायच्या, होली विकमध्ये झावळ्यांचा रविवारी (Palm Sunday) घरी आणलेल्या झावळ्या अनेक दिवस अल्तारापाशी असायच्या, अगदी तसेच.
काही दिवसांनी शिंगे मोडलेली किंवा एखादा पाय मोडलेल्या बैलांच्या जोड्या मग आम्हा मुलांच्या नकळत अचानक गायब व्हायच्या.
श्रीरामपुरात शहरी वातावरणात वाढलेल्या आमचा बैलांशी वा इतर कुठल्याही प्राण्यांशी यायचा तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या घोगरगावातल्या आमच्या आजोळामुळे. तिथे शिनगारे आडनाव असलेल्या मामांकडे गेले म्हणजे या प्राणिमात्रांशी जवळून संबंध यायचा.
आम्हाला आजोळी नेण्यासाठी घोगरगावाहून शांत्वन मामाची तरणीताठी मुलं शाहू, अंतोन किंवा मार्शल बैलगाडी घेऊन श्रीरामपुरला यायची. शांत्वनमामाकडे खिलाऱ्या बैलांच्या दोनतीन जोड्या होत्या. सर्वांत लहान असलेल्या शिवराममामाकडे लहानखुऱ्या बैलांची एकच जोडी होती. येताना बैलगाडीत दोन दिवस भरपूर पुरेल इतका ज्वारीचा कडबा आणलेला असायचा.
रात्री मुक्काम केल्यावर सकाळी बाई आणि आम्ही काही पोरं बैलगाडीत बसून निघायचो. बरोबर दुपारच्या जेवण्यासाठी कपड्यांत बांधलेल्या भाकरी आणि बेसनाचे कोरडे पिठले किंवा बटाट्याची सुकी भाजी असायची. , पिण्याच्या पाण्यासाठी फिरकीचा पितळी तांब्या बरोबर असायचा.
भामाठाणला आले कि मग बैलगाड्या गंगेच्या उथळ पाण्याच्या खोऱ्यात विसाव्यासाठी थांबायच्या. औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरचा हा भाग. मामाची मुले तहानलेल्या बैलांना पाणी दाखवून यायचे आणि मग बैलांसमोर कडबा टाकायचे. आम्ही पण मग जेवायच्या तयारीला लागायचो.
गोदावरीच्या पात्रातली वाळू थोडी वर काढली कि खाली निथळ पाणी लागायचे, तोंड धुवून ते थंड गार पाणी प्यायचे आणि भाकरी पिठल्यावर ताव मारायचा.
शिवराम मामा, शाहू, अंतोन आणि मार्शल यांनी कधी आपल्या बैलांवर चाबूक मारल्याचे आठवत नाही. बैल सावकाश चालले कि त्यांच्या शेपट्या जरा पिरगळल्या कि बैलगाडीच्या प्रवासाची गती वाढायची. कधी हातातल्या काठीने बैलांना ढुशी दिली तरी काम भागायचे .
एक गोष्ट मात्र आजही कित्येक वर्षानंतर स्पष्टपणें आठवते ती म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासातला त्या बैलजोडींचा प्रवास. घोगरगाव जवळ येत आहे याची जणू त्या मुक्या जनावरांना माहित असायचे अशा जलद गतीनं ते बैल चालत असायचे.
घोगरगावात शांत्वनमामा, वामनमामा, शिवराममामा यांच्याकडे बैलांना वर्षभर काही ना काही काम असायचे.
शिवराममामा आणि शाहू शेतावरच्या विहिरीवर चार बैल लावून मोट चालवायचे तेव्हा खळाळते पाणी वर येताना मी अचंबून पाहत राहायचो. विहिरीवर प्रत्यक्ष मोट चालवली जाताना मी पहिल्यांदा आणि शेवटी तिथेच पाहिली.
शेतात अनेक ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या थापलेल्या असायच्या, बैलांकडे गेले कि एखादा बैल शिंगे हलवून आगंतुक जवळकीबद्दल नापसंती व्यक्त करायचा.
`हा मारका बैल हाय, फार जवळ जाऊ नकोस,'' असे कुणी म्हणायचे.
शिवराम मामांकडे एक शेळीसुद्धा होती. त्यामुळे शहरातील आम्ही मुले आजोळी आल्यानंतर त्यांच्याकडे कोरा चहाऐवजी दुधाचा चहा मिळायचा हे मला आजही आठवते.
शेतकऱ्यांना शेतकामांसाठी बैलांची जास्त गरज भासायची, तशी गायांना फारशी मागणी नसायची. एखाददुसरी गाय मात्र प्रत्येकाकडे असायची. त्यामुळं जन्माला आलेलं गोऱ्ह शेतकरी स्वतःजवळ ठेवत, मात्र कालवड कुणाला तरी देत.
एकदा अशीच एक कालवड कुठल्या तरी मामानं श्रीरामपूरला आमच्याकडे बाईला पाठवून दिली होती. कालवड विकायची नसते, असा एक संकेत असायचा, जसं दुधाच्या घट्ट मलईतून लोणी काढून झाल्यावर निघालेलं ताकसुद्धा कधी विकायचे नसते .
श्रीरामपुरला बैलपोळ्याच्या दिवशी रेल्वेस्टेशन आणि बस स्टॅन्डपाशी असलेल्या छोट्याशा मारुतीच्या देवळापाशी सजवलेले बैल आणले जात, तिथे मारुतीला वंदन केल्यानंतर गळ्यातल्या घुंगरांचा मोठ्याने आवाज करत या बैलजोड्या जात असत.
हरेगाव येथे संत तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगात मी असताना बैलपोळ्याच्या वेगळ्याच आठवणी आहेत.
पोळ्याच्या संध्याकाळी हरेगावातले आणि आसपास असलेल्या एकवाडी, दोनवाडी अशा नावांच्या वाड्यांतले शेतकरी आपले सजवलेले बैल घेऊन तिथल्या उंच शिखर असलेल्या चर्चकडे येत.
त्याकाळात म्हणजे सत्तरच्या दशकात हरेगावला फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वासरर, फादर फ्रान्सिस झेम्प, फादर बेन्झ अशी युरोपियन धर्मगुरु असत.
देवळाच्या पायऱ्यांवर पांढरे झगे आणि गळ्याभोवती स्ट्रोल घालून हे फादर लोक उभे राहत आणि ख्रिस्ती भाविक शेतकरी आपल्या बैलांसह आल्यावर हातातले पवित्र पाणी बैलांवर आणि त्या शेतकऱ्यांवर शिंपडवून आशीर्वादित करत.
बैलांना वर्षातून एकदा अशा प्रकारे सन्मानित करणे, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणे धर्मविरोधी किंवा पवित्र शास्त्रविरोधी आहे असे त्यावेळी कुणाला वाटले नाही. आजही तसे वाटत नाही.
आज संध्याकाळी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत बैलांच्या मिरवणुकी अनेक चर्चमध्ये येतील आणि पोळा हा सण साजरा होईल.
भारतातील अनेक सण धर्म आणि जातिनिरपेक्ष आहेत, पोळा, भाऊबीज, रक्षाबंधन, पोंगल, ओणम वगैरे सणांचा धर्माशी संबंध नसतो.
अहमदनगर आणि इतर काही भागात आजच्या श्रावणी अमावास्येला पोळा साजरा करतात, पुण्यासारख्या काही भागात भाद्रपद महिन्यात पोळा साजरा होतो.
पोळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा...
(फोटोओळी : स्व. फादर जेम्स शेळके पोळा सणानिमित्त सजवलेल्या खिलारी बैलजोडीला आशिर्वादित करताना )
Camil Parkhe,

Monday, April 1, 2024

 

लेंट सिझन : ख्रिस्ती धर्मियांमधील उपवासाचे चाळीस दिवस

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 10 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मियांचा वर्षांतला पवित्र काळ म्हणजे उपवासाचे दिवस सध्या सुरु आहेत. ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ-लेंट सिझन-दरवर्षी मार्च-एप्रिल याच काळात येतो. मुस्लीम कॅलेंडर चांद्रवर्षीय असल्याने रमजान महिना सौरवर्षीय ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सतत बदलत असतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात, माझ्याही डोक्यात ते अजून बसले नाही. तर या होली लेन्ट सिझनमधला अतिपवित्र आठवडा सध्या सुरु आहे. पाम संडेपासून सुरु झालेला आणि ईस्टर संडेला संपणारा. 

खरे पाहता हा होली विक अध्यात्मिकदृष्ट्या अगदी ख्रिसमसपेक्षाही महत्वाचा. याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचे अवतारकार्य म्हणजे खुप वेदना सहन करून क्रुसावर मरणे आणि तीन दिवसांनंतर इस्टर रविवारी मृत्यूतून पुनरुज्जीत होणे. वर्षभर रविवारी देवळाकडे न फिरकणारे अनेक ख्रिस्ती जण ख्रिसमसप्रमाणेच या पवित्र आठवड्यातल्या सर्व प्रार्थनाविधींना आवर्जून हजर असतात. मौंडी थर्सडे किंवा पवित्र गुरुवार. याच दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्या बारा प्रेषितांबरोबर शेवटचे भोजन केले, शतकोनुशतके वेगवेगळ्या चित्रकारांनी या `लास्ट सपर'ला आपल्या खास शैलीत रेखाटले आहे. या जेवणाआधी येशू आपल्या बारा शिष्यांचे चक्क पाय धुतो! कुणीही लहानथोर नाही, असा संदेश या कृतीतून देतो. 

या लास्ट सपरच्या वेळी ख्रिस्ताने धर्मगुरु संस्थेची स्थापना केली असे म्हणतात. "हे माझ्या आठवणीसाठी करत जा,'' असे येशू म्हणाला आणि अशाप्रकारे चर्चमध्ये दरदिवशी आणि रविवारी मिस्साविधी होतो आणि 'लास्ट सपर'ची उजळणी होते. हे शेवटचे भोजन झाल्यावर या भोजनात सहभागी झालेला यहूदा किंवा ज्युडास मग आपल्या प्रभूचे चुंबन घेऊन त्याला त्याच्या मारेकऱ्यांच्या हवाली करतो. रात्रभर येशूचा छळ होऊन दुसऱ्या दिवशी रोमन साम्राज्याचा प्रतिनिधी पिलात येशूला रोमन रिवाजानुसार क्रुसावर खिळण्याची सजा फर्मावतो. क्रुसावर शेवटचा श्वास घेण्याआधी येशू म्हणतो : "हे बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत हे त्यांना माहीत नाही.'' हा दिवस म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार.

उपवासकाळ म्हटले की हरेगावला आणि श्रीरामपूरला भर उन्हाळयात रणरणत्या उन्हात वाळू असलेल्या मैदानात गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारच्या भक्ती प्रार्थनेत सहभागी झाल्याची आठवण येते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगल्यानंतर दुपारी तीनला 'हे बापा, मी माझा आत्मा आता तुझ्या स्वाधीन करतो,' असे म्हणून त्याने अखेरची मान टाकली, म्हणून भर उन्हात येशूच्या मरणप्राय वेदनांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेच्या प्रार्थना व्हायच्या. या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या 'भस्म बुधवारा'ने किंवा 'अँश वेन्सडे' या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आदल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हलला सुरुवात होते आणि या उत्सवाची 'भस्म बुधवारा'च्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते. अर्थांत गोव्याला फादर होण्यासाठी जाईपर्यंत `कार्निव्हल’ हा शब्द माझ्या कधी कानांवरसुद्धा पडला नव्हता. 

भारतीय धर्मग्रंथांत सात (सप्त) किंवा पाच (पंच) या संख्या वारंवार येतात, जसे सप्तर्षी, सप्त चिरंजीव, पंचकन्या, त्याप्रमाणे बायबलमध्ये चाळीस ही संख्या अनेकदा येते, जसे नोहाच्या कथेत महाप्रलयाच्या वेळी चाळीस दिवस आणि रात्री सतत पाऊस पडला, मोझेसने देवाबरोबर चाळीस दिवस घालवल्यानंतर तो देवाने दिलेल्या दहा आज्ञांच्या पाट्या घेऊन परतला. पृथ्वीतलावरचे आपले जीवितकार्य सुरु करण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस एकांतवासात उपवास केले, त्यानुसार ख्रिस्ती धर्मपरंपरेत हा चाळीस दिवसांचा उपवासकाळ आणि प्रायश्चितकाळ पाळला जातो. 

माझे आईवडील वर्षभर दर शुक्रवारी आणि शनिवारी कडक उपास करत, यापैकी शुक्रवार हा येशू ख्रिस्ताच्या मरणाचा दिवस तर शनिवार हा मारियाबाईचा दिवस म्हणून उपास पाळला जायचा. शुक्रवारी रात्री उपास सोडला जायचा, शनिवारी फक्त दुपारीच जेवण करायचे, उपासाच्या या दोन्ही दिवशी पाणी आणि चहा चालायचा, इतर कुठलेही फराळाचे पदार्थ किंवा फळे वर्ज्य असायची. उपवासकाळात मग बुधवारच्या उपासाची भर पडायची. दादांना ९० वर्षांचे तर बाईला ८० वर्षांचे आयुष्य लाभले. उपवासकाळातील सुरुवातीचा भस्म बुधवार आणि शेवटचा उत्तम शुक्रवार यादिवशी उपास पाळणे करणे हे बंधनकारक होते, कॅथॉलिक चर्चच्या आजच्या रितीनियमांनुसार आजही हे दोन्ही दिवस उपास पाळणे बंधनकारक आहे. आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही. 

हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात. उपवासकाळात चर्चमध्ये दररोज मिस्सा साजरी करताना धर्मगुरु जांभळ्या रंगाचे झगे वापरतात, या काळातल्या रविवारी आणि सणाच्या दिवशी मात्र सफेद वा इतर रंगांचे झगे परिधान केले जातात, ते यामुळेच. चर्चमध्ये धर्मगुरु कुठल्या रंगाचे झगे वापरतात, यावरुन त्या दिवसाचे, त्या मिस्साविधीचे महत्त्व लगेच समजते, उदाहरणार्थ लग्नासारख्या मंगलप्रसंगी लाल किंवा सफेद झगा वापरला जातो, तर अंत्यविधीसाठी सफेद, जांभळ्या किंवा काळ्या रंगाचे झगे असतात. श्रीरामपूरला घरी असेपर्यंत या उपवासकाळात उपास करण्याची माझ्यावर कधी पाळी आली नाही, कारण सज्ञान होण्याआधीच संन्यासी धर्मगुरु होण्यासाठी मी जेसुईट संस्थेच्या गोव्यातल्या पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. त्यावेळी मला धक्काच बसला. 
 
कॅथोलिक चर्चमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या या जेसुईट धर्मगुरुंच्या संस्थेत उपासतापास वगैरेंसारख्या कर्मकांडाला मुळी थाराच नव्हता! इथे फास्टिंग म्हणजे उपवास अगदी प्रतिकात्मक स्वरुपाचे आणि पूर्णतः व्यक्तिगत पातळीवर ऐच्छिक स्वरुपाचे होते. उदाहरणार्थ, 'पेनान्स' म्हणजे आत्मक्लेश, यासाठी नाश्त्यासाठी नेहमीप्रमाणे तीनचार पाव खाण्याऐवजी एकदोन पाव कमी खाणे किंवा एखादवेळेस आवडत्या फळांचे किंवा आवडत्या खाद्यपदार्थाचे सेवन टाळणे. उपासाची आणि आत्मक्लेशाची अशी सोपी, सहजसुलभ व्याख्या मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. दरदिवशी बेळगावहून पणजी मार्केटमध्ये ट्रँकांनी येणारे बिफ शुक्रवारी नसायचे, त्यामुळे गुरुवारीच शुक्रवारची बेगमी म्हणून दुप्पट बिफ आणून ठेवले जायचे. 

माझ्या या धार्मिक जीवनाच्या कालखंडात माझे सुपिरियर असलेल्या कुठल्याही धर्मगुरुने वा परिचयातल्या कुठल्याही धर्मगुरुने लेन्ट सिझनमधील चाळीसच्या चाळीस दिवस उपास पाळला, किंवा मांसाहार वर्ज्य केला असे मला दिसले नाही. त्यांचा हा कित्ता मी त्यानंतर आजतागायत अगदी इमानेइतबारे गिरवला आहे. त्यामुळे लेन्ट सिझनमध्ये इतरांसारखे कधीही मी उपासतापास केले नाहीत वा या काळात दाढी राखणे, मांसाहार वा पेयपान वर्ज्य करणे किंवा प्रतिकात्मक आत्मक्लेशाचे प्रयोग करणे अशा गोष्टी मी टाळल्या आहेत. 
 
मात्र याबद्दल मला गिल्ट वाटत नाही अथवा मी काही धर्मविरोधी आहे असेही कुणालाही वाटत नाही. निदान याबाबतीत तरी ख्रिस्ती समाज तसा उदारमतवादी किंवा प्रागतिक आहे हे मानायलाच हवे. मध्ययुगीन 'इन्क्विझिशन'च्या काळात केवळ धर्मद्रोही, पाखंडी असल्याच्या संशयावरुन अनेकांना तुरुंगकोठडीत टाकण्यात आले, अनेकांना सार्वजनिकरित्या जिवंत जाळले गेले होते. त्यामानाने बदलत्या काळात भाविकांच्या कलानुसार आणि त्यांनी निदान धर्मपालन सोडू नये यासाठी कर्मकांड, धार्मिक रितीरिवाज, कौटुंबिक आणि सामाजिक नितीनियम याबाबत कॅथोलिक आणि इतरपंथीयांनी उदारतेची बरीच मजल गाठली आहे हे नक्की. 

विवाहाबाबतचे आणि घटस्फोटांबाबतचे कॅथॉलिक चर्चचे जुने कर्मठ कॅनॉन लॉ किंवा धार्मिक नियम शिथिल करणे हे याबाबतीत एक उदाहरण म्हणून सांगता येईल. अगदी काही वर्षांपूर्वी कॅथॉलिक चर्चमध्ये घटस्फोट मंजूर होणे अशक्यप्राय समजले जायचे, आता तसे नाही. या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली विक किंवा पवित्र सप्ताह किंवा आठवडा. पाम संडे किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर संडे किंवा ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते. यावेळी २४ मार्चला झावळ्यांचा रविवार साजरा होऊन या पवित्र सप्ताहाची सुरुवात झाली. २९ मार्चला गुड ३१ मार्चला ईस्टर संडे आहे.

ख्रिस्ती धर्मातील सर्वपंथीय भाविक पवित्र आठवडा भक्तिभावाने पाळतात. ख्रिसमस किंवा नाताळाइतकेच या पवित्र सप्ताहाला आणि विशेषतः गुड फ्रायडे आणि ईस्टरला महत्व आहे. ख्रिसमसची तारीख दरवर्षी २५ डिसेंबर हिच असली तरी 'भस्म बुधवार', गुड फ्रायडे आणि ईस्टर संडेच्या तारखा चर्चच्या कॅलेंडरनुसार मार्च-एप्रिल महिन्यांत थोड्या आगेमागे होत असतात. या प्रायश्चितकाळात शक्यतो लग्नकार्यासारखे कुठलेही मंगलकार्य हाती घेतले जात नाही. येशू ख्रिस्ताने जेरुसलेम शहरात आपल्या शिष्यांसमवेत प्रवेश केला तेव्हा या नगरवासियांनी त्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. या स्मरणार्थ झावळ्यांचा रविवार साजरा केला जातो. गाढवीच्या एका शिंगरावर बसून आलेल्या येशूचे लोकांनी त्या मार्गावर आपले कपडे टाकून, नारळाच्या झावळ्यांनी त्याला ओवाळीत 'होसान्ना, होसान्ना!' अशा जयजयकाराच्या घोषणा देत स्वागत केले. 

विजयी राजाचे स्वागत करण्यासारखे या मिरवणुकीचे स्वरुप होते. येशू स्वतःहून आपल्या मृत्यूच्या मार्गावर प्रवेश करतो आहे याची त्या जयघोष करणाऱ्या लोकांनां कल्पनाही नव्हती. जयघोषाच्या मिरवणुकीतल्या या लोकांपैकी काही जण नंतर खांद्यावर क्रुस घेऊन जाणाऱ्या येशूची टवाळकी, निदानालस्ती करणाऱ्या लोकांमध्येही असणार होते. झावळ्यांचा रविवारी सर्व चर्चेसमध्ये नारळाच्या झावळ्या घेऊन, 'होसान्ना, होसान्ना!' हे गीत म्हणत प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते. विशेष म्हणजे `होसान्ना' हा मूळ हिब्रू शब्द असलेली गायने जगभर अनेक भाषांत झावळ्यांच्या रविवारी चर्चमध्ये गायली जातात. जयजयकार किंवा जयघोष हे पर्यायी शब्द नंतर येतात. यावेळी झावळ्यांच्या रविवारी आमच्या चर्चमध्ये, मधुर चालीत गायले गेलेले हे पुढील गीत येशूच्या त्या जल्लोषी मिरवणुकीचे चित्र उभे करते.

जेरुसलेमी बाळे जमली, 
प्रभुला गाणी गाऊ लागली 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

गाढवावरी येशू स्वार होई 
मधू गाण्यांचा नाद होई 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

बालकांचे ते बोल बोबडे 
रहिवाश्यांच्या कानी पडे 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

शहरवासी डोकावती 
कान देऊन ऐकती 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

पंडितशास्त्री धावून येती 
दडपशाही करु लागती 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

बालकांचे जरी तोंडे दाबिली 
गाण्याची गती तरी नाही थांबली 
होसान्ना होसान्ना होसान्ना

पवित्र गुरुवारी येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेतले, लिओनार्दो द व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या `द लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे. गोवन चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांनी भारतीय शैलीत काढलेले 'द लास्ट सपर' हे चित्र आहे. या 'लास्ट सपर' चित्रात येशूला तीस मोहरांसाठी ज्याने विकले तो ज्युडास त्या पैशाची थैली घेऊन बसलेला दाखवला आहे. पावित्र्याचे प्रतीक असलेली आणि इतर सर्वांच्या चेहेऱ्याभोवती असलेली प्रभावळ मात्र ज्युडासच्या चेहेऱ्याभोवती नाही! 

याच पवित्र गुरुवारी रात्री त्याच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या ज्युडासने येशूचे ते विश्वासघातकी चुंबन घेऊन त्याला शत्रूंच्या ताब्यात दिले आणि दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेला येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले. मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे’ म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जाते. मात्र तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने. 

चर्चमधल्या रविवारच्या मिस्साविधीचा काळ प्रवचनासह साधारणतः एक तासापुरता असतो, गुड फ्रायडेची प्रार्थना मात्र थोडी अधिक काळ चालते. या दिवसांच्या प्रार्थनाविधीत मला विशेष भावणारा भाग म्हणजे या दिवशी केल्या जाणाऱ्या श्रद्दावंतांच्या प्रार्थना. जगभर या दिवशी नेहमीच्या इतर प्रार्थनांबरोबरच ज्यांच्या माध्यमातून देव मानवजातीसमोर प्रकटला त्या ज्यू लोकांसाठी, येशू ख्रिस्तावर श्रद्धा नसलेल्या लोकांसाठी आणि हो, देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणाऱ्या नास्तिक लोकांसाठीही प्रार्थना केली जाते. लेन्ट सिझनची गुडफ्रायडेलाच सांगता होते. बहुसंख्य कॅथोलिक भाविक फक्त रविवारच्या आणि इतर सणांनिमित्त मिस्सासाठी चर्चमध्ये जात असले तरी चर्चमध्ये वर्षभर दररोज सकाळी वा संध्याकाळी मिस्सविधी होत असतोच, यास एकमेव अपवाद असतो गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे यामध्ये येणाऱ्या शनिवारचा.

गुड फ्रायडेच्या दिवशीसुद्धा पूर्ण मिस्साविधी नसतो. ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या स्मरणार्थ प्रार्थना झाल्यावर लगेच कम्युनियन दिले जाऊन विधी संपतो. नंतरच्या शनिवारी येशू कबरेत असल्याने चर्चमध्ये दिवसभर कुठलाही प्रार्थना वा विधी नसतो, शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भाविक जमतात ते येशूच्या पुनरुत्थानाचा सोहळा साजरा करण्यासाठीच. ईस्टरच्या पूर्वसंध्येला शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळीही ईस्टरनिमित्त मिस्साविधी होतो. येशूच्या पुनरुस्थानाचा हा सण आनंदाने साजरा केला जातो. काळाच्या ओघात या प्रायश्चितकाळाचे स्वरूप बदलत गेले आहे. बायबलच्या जुन्या करारात प्रायश्चित करण्यासाठी लोक जाडेभरडे गोणपाटाचे कपडे घालत, उपवास करत आणि संपूर्ण अंगावर राख चोपडून शोक करत परमेश्वराची दया याचना करत असत. त्यामुळे देवाला दया येऊन, त्याचा क्रोध कमी होऊन त्याच्या कृपादृष्टीचा प्रायश्चित करणाऱ्यांना लाभ होई. 

येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या मरणाने नव्या कराराची निर्मिती झाली, नव्या करारातील परमेश्वर क्रोधी नाही तर दयाळू आहे. त्यामुळे प्रायश्चित करण्याचे स्वरुपही आता खूपच सौम्य आणि केवळ प्रतिकात्मक राहिले आहे. जगभर देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. युरोपात आणि इतर पाश्चिमात्य देशांत चर्चमधील भाविकांची रोडावणारी संख्या याबाबत बरेच काही सांगून जाते. त्यामुळे निदान चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपले नियम बदलण्याची, लवचिक होण्याची तयारी चर्चने दाखविली आहे हेही नसे थोडके. 

त्यानुसार आता उपवासाचे आणि आत्मक्लेशाचे स्वरुप बदलले आहे. आता 'अँश वेन्सडेआणि गुड फ्रायडेचा अपवाद वगळता ते पूर्णतः ऐच्छिक आहे. गुड फ्रायडेच्या प्रार्थना आता भर दुपारी टळटळीत उन्हात न घेता उन्हे कललल्यानंतर संध्याकाळी होतात. हल्ली वाळूच्या मैदानात गुडघे टेकून आत्मक्लेश करत कुणी प्रार्थना करत नाहीत. उलट चर्चमध्ये भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त बाके असतात, मिस्साविधीत अधूनमधून उभे राहावे लागते, गुडघे ही टेकावे लागतात तेव्हा गुडघ्यांना रग लागू नये, म्हणून त्या लाकडी फळ्यांवर मऊमऊ रंगीत कुशन्ससुद्धा असतात. हल्ली हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूला अनेक पंखे असलेल्या चर्चमध्ये या गालिच्यासारख्या मुलायम असणाऱ्या कुशन्सवर गुडघे टेकताना लहानपणी रणरणत्या उन्हात वाळूवर गुडघे टेकण्याचा प्रसंग अनेकदा आठवतो. हा बदल त्या कुशन्ससारखाच सुखावह असतो.
 
- कामिल पारखे 
(लेखक पत्रकार असून ख्रिस्ती समाज आणि संस्कृती यांवरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.) 

Friday, March 22, 2024

Muslim Christians fasting seasons 




 मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मियांचा वर्षांतला पवित्र काळ म्हणजे उपवासाचे दिवस सद्या चालू आहेत.

ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन - दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात.

मुस्लीम कॅलेंडर चांद्रवर्षीय असल्याने रमझान महिना सौरवर्षिय ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सतत बदलत असतो.
ज्यु, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म यांचे एकमेकांशी नक्की काय नाते आहे हे या धर्मांतील लोकांनाच माहिती नसते, तर या तिन्ही धर्मांचे नसलेल्या लोकांबद्दल काय बोलायचे ?
विशेष म्हणजे येशू ख्रिस्त आणि त्याचे बारा शिष्य अन सुरुवातीचे बहुतेक सर्व ख्रिस्तीजन हे यहुदी, ज्यू, होते याकडे दुर्लक्ष होते.
ज्यू हा सुरुवातीचा धर्म, त्यानंतर ख्रिस्ती धर्म आणि त्यानंतर इस्लाम धर्म असा क्रम आहे.
ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांचे उगमस्थान एकच आहे, ते म्हणजे पश्चिम आशिया. या तिन्ही धर्माची पवित्र भूमी एकच आहे आणि अनेक पवित्र स्थळे एकतर समान आहेत किंवा शेजारी लागून आहेत.
या होली लॅडच्या धार्मिक पर्यटनावर जाणाऱ्या लोकांनी हे चांगले अनुभवलेले असते.
या तिन्ही धर्मांच्या लोकांनी एकदुसऱ्याकडे कुठल्या नजरेने पाहिले आहे, काय वागणूक दिले हे मध्ययुगीन इतिहासातून दिसून येते.
या तिर्थक्षेत्रांवर हक्क सांगण्यासाठी आणि कब्जा मिळवण्यासाठी मध्ययुगात क्रुसेड्स किंवा धर्मयुद्धे झालेली आहेत. .
मध आणि दुधाचा सुपीक प्रदेश देवाने अब्राहामाच्या वंशजांना म्हणजे आपल्याला देऊ केला, ती ही वचनभूमी The Promised Land, असा ज्युंचा दावा आहे.
ज्युंचे या प्रदेशातून झालेले विस्थापन, गेल्या शतकातील इस्राएलची निर्मिती, स्थानिकांची हकालपट्टी आणि त्यातून निर्माण झालेले सद्याचे प्रश्न या अगदी अलीकडच्या घटना.
संपूर्ण जग या संघर्षाच्या आगीचे चटके अधूनमधून भोगत असते.
या तिन्ही धर्मांच्या धर्मग्रंथांत अनेक प्रसंग आणि पात्रे समान आहेत.
उदाहरणार्थ, अब्राहामाने - इब्राहिमने - आपल्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी तयारी करणे.
या तिन्ही धर्मांचे भौगोलिक उगमनस्थान एकच असल्याने या तिन्ही धर्मातील नावे समान आढळतात. अब्राहम - इब्राहिम, ,
`जे; J या रोमन लिपीतील अक्षराचा हिब्रू आणि लॅटिन भाषांत उच्चार य असा होतो, त्यामुळे जिझस - येशू, जोसेफ- युसुफ, जेकब- याकुब
किंग डेव्हिड, दाविद राजा, हा ज्यूंच्या इतिहासातील सर्वांत मोठा, वंदनीय राजा. डेव्हिड.म्हणजेच दाऊद. गॅब्रिएल- गिब्राईल, मायकल- मिखाईल, मारिया- मिरियम, फातिमा अशी काही इतर समान नावे आहेत.
अब्राहाम- इब्राहिम , मोझेस- मोशे, वगैरे व्यक्ती ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या तिन्ही धर्मांत वंदनीय आहेत. इतकेच नव्हे तर इसा किंवा येशूला इस्लाम धर्मियांतसुद्धा प्रेषित म्हणून मान्यता आहे, मात्र देव म्हणून नाही.
कॅथोलिक चर्चच्या गुड फ्रायडेच्या उपासनेत अब्राहाम यांचा खास उल्लेख `Abraham, Our Father in Faith' ' म्हणजे ``अब्राहाम, श्रद्धेत आमचे पिता' असा होतो.
या संज्ञेतून अप्रत्यक्षरीत्या ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांना जोडणारा एक समान दुवा म्हणून अब्राहामाकडे पाहिले जाते.
गुड फ्रायडेची ही एक छोटीशी प्रार्थना कॅथोलिक चर्चमध्ये खास महत्त्वाची आहे.
या गुड फ्रायडेच्या प्रार्थनेत ज्या लोकांच्या माध्यमातून मानवजातीपुढे देव प्रकटला त्या ज्यू लोकांसाठीही खास प्रार्थना केली जाते,
इतर धर्मियांसाठी आणि अगदी नास्तिकांसाठी, देवधर्म न मानणाऱ्यांसाठीसुद्धा प्रार्थना केली जाते.
या होली लेन्ट सिझनमधला अतिपवित्र आठवडा या रविवारपासून २४ मार्चपासून चालू होईल. २९ मार्चला गुड फ्रायडेला उपवास काळ संपतो,
त्यानंतर ईस्टर संडेला आनंदोत्सव.
एम एफ हुसेन यांनी चित्रित केलेले हे `लास्ट सपर' किंवा येशूचे शेवटचे भोजन चित्र
Camil Parkhe, March 22, 2024

Sunday, August 28, 2022

 

बैलपोळा - बैलपोळ्याच्या वेगळ्याच आठवणी

 

श्रीरामपूरला आमच्या आजूबाजूला साजरा होणाऱ्या अनेक सणांपैकी काही सण आमच्याही घरात साजरे व्हायचे, बैलपोळा हा त्यापैकी एक. 

 

या सणाच्या काही दिवस आधीच आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानापाशी असलेल्या मेनरोडला मातीपासून बनवलेल्या रंगीबेरंगी बैलांच्या जोड्या विक्रीला ठेवलेल्या असत. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी यापैकी मग पांढऱ्या, उंचच उंच खिलारी बैलांची एक जोडी घरात यायची. त्या बैलांची आमच्या घरात पूजा होत नसायची, मात्र दिवसभर मग या बैलजोड्यांशी माझा खेळ चालायचा. 

 

बैलपोळा संपल्यानंतर अनेक दिवस या बैलजोड्या भिंतीवरच्या फळ्यांवर असायच्या, झावळ्यांचा रविवारी (Palm Sunday) घरी आणलेल्या झावळ्या अनेक दिवस अल्तारापाशी असायच्या, अगदी तसेच. काही दिवसांनी शिंगे मोडलेली किंवा एखादा पाय मोडलेल्या बैलांच्या जोड्या मग आम्हा मुलांच्या नकळत अचानक गायब व्हायच्या.

शहरी वातावरणात वाढलेल्या आमचा बैलांशी वा इतर कुठल्याही प्राण्यांशी यायचा तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या घोगरगावातल्या आमच्या आजोळामुळे. तिथे शिनगारे आडनाव असलेल्या मामांकडे गेले म्हणजे या प्राणिमात्रांशी जवळून संबंध यायचा. 

 

आम्हाला आजोळी नेण्यासाठी घोगरगावाहून शांत्वन मामाची तरणीताठी मुलं शाहू किंवा मार्शल बैलगाडी घेऊन श्रीरामपुरला यायची. शांत्वनमामाकडे खिलाऱ्या बैलांच्या दोनतीन जोड्या होत्या. सर्वांत लहान असलेल्या शिवराममामाकडे लहानखुऱ्या बैलांची एकच जोडी होती. 

 

येताना बैलगाडीत दोन दिवस भरपूर पुरेल इतका ज्वारीचा कडबा आणलेला असायचा. रात्री मुक्काम केल्यावर सकाळी बाई आणि आम्ही काही पोरं बैलगाडीत बसून निघायचो. बरोबर दुपारच्या जेवण्यासाठी कपड्यांत बांधलेल्या भाकरी आणि बेसनाचे कोरडे पिठले असायचे, पिण्याच्या पाण्यासाठी फिरकीचा पितळी तांब्या बरोबर असायचा. 

 

भामाठाणला आलं कि मग बैलगाड्या गंगेच्या उथळ पाण्याच्या खोऱ्यात विसाव्यासाठी थांबायच्या. मामाची मुलं बैलांना पाणी दाखवून यायचे आणि मग बैलांसमोर कडबा टाकायचे. आम्ही पण मग जेवायच्या तयारीला लागायचो. नदीच्या पात्रातली वाळू थोडी वर काढली कि खाली निथळ पाणी लागायचे, तोंड धुवून ते थंड गार पाणी प्यायचे आणि भाकरी पिठल्यावर ताव मारायचा. 

 

शिवराम मामा, शाहू आणि मार्शल यांनी कधी आपल्या बैलांवर चाबूक मारल्याचं आठवत नाही. बैल सावकाश चालले कि त्यांच्या शेपट्या जरा पिरगळल्या कि बैलगाडीच्या प्रवासाची गती वाढायची. कधी हातातल्या काठीने बैलांना ढुशी दिली तरी काम भागायचं. 

 

एक गोष्ट मात्र आजही कित्येक वर्षानंतर स्पष्टपणें आठवते ती म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासातला त्या बैलजोडींचा प्रवास. घोगरगाव जवळ येत आहे याची जणू त्या मुक्या जनावरांना माहित असायचे अशा जलद गतीनं ते बैल चालत असायचे. 

 

घोगरगावात शांत्वनमामा, वामनमामा, शिवराममामा यांच्याकडे बैलांना वर्षभर काही ना काही काम असायचं. शिवराममामा आणि शाहू शेतावरच्या विहिरीवर चार बैल लावून मोट चालवायचे तेव्हा पाणी वर येताना मी आचंबून पाहत राहायचो. 

 

शेतात अनेक ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या थापलेल्या असायच्या, बैलांकडे गेले कि एखादा बैल शिंगं हलवून आगंतुक जवळकीबद्दल नापसंती व्यक्त करायचा. 

 

`हा मारका बैल हाय, फार जवळ जाऊ नकोस,'' असं कुणी म्हणायचं 

 

शेतकऱ्यांना शेतकामांसाठी बैलांची जास्त गरज भासायची, तशी गायांना फारशी मागणी नसायची. एखाददुसरी गाय मात्र प्रत्येकाकडं असायची. त्यामुळं जन्माला आलेलं गोऱ्ह शेतकरी स्वतःजवळ ठेवत, मात्र कालवड कुणाला तरी देत. 

 

एकदा अशीच एक कालवड कुठल्या तरी मामानं श्रीरामपूरला आमच्याकडं बाईला पाठवून दिली होती. कालवड विकायची नसते असा एक संकेत असायचा, जसं दुधाच्या घट्ट मलईतून लोणी काढून झाल्यावर निघालेलं ताकसुद्धा कधी विकायचं नसतं. 

 

श्रीरामपुरला बैलपोळ्याच्या दिवशी रेल्वेस्टेशन आणि बस स्टॅन्डपाशी असलेल्या मारुतीच्या देवळापाशी सजवलेले बैल आणले जात, तिथं मारुतीला वंदन केल्यानंतर गळ्यातल्या घुंगरांचा मोठ्याने आवाज करत या बैलजोड्या जात असत. 

 

हरेगाव येथे संत तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगात मी असताना बैलपोळ्याच्या वेगळ्याच आठवणी आहेत. 

 

बैलपोळ्याच्या संध्याकाळी हरेगावातले आणि आसपास असलेल्या एकवाडी, दोनवाडी अशा नावांच्या वाड्यांतले शेतकरी आपले सजवलेले बैल घेऊन तिथल्या उंच शिखर असलेल्या चर्चकडे येत. 

 

त्याकाळात म्हणजे सत्तरच्या दशकात हरेगावला फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वासरर, फादर फ्रान्सिस झेम्प, फादर बेन्झ अशी युरोपियन धर्मगुरु असत. देवळाच्या पायऱ्यांवर पांढरे झगे आणि गळ्याभोवती स्ट्रोल घालून हे फादर्स उभे राहत आणि भाविक शेतकरी आपल्या बैलांसह आल्यावर हातातले पवित्र पाणी बैलांवर आणि त्या शेतकऱ्यांवर शिंपडवून आशीर्वादित करत. 

 

बैलांना वर्षातून एकदा अशा प्रकारे सन्मानित करणे, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणे धर्मविरोधी किंवा पवित्र शास्त्रविरोधी म्हणजे Sacrilege आहे असं त्यावेळी कुणाला वाटलं नाही. आजही तसं वाटत नाही.

 

आज संध्याकाळी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत बैलपोळ्यानिमित्त बैलांच्या मिरवणुकी अनेक चर्चमध्ये येतील आणि हा सण साजरा होईल.

 

अहमदनगर आणि इतर काही भागात आजच्या श्रावणी अमावास्येला बैलपोळा साजरा करतात, पुण्यासारख्या काही भागात भाद्रपद महिन्यात बैलपोळा साजरा होतो.

 

बैलपोळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा