Did you like the article?

Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Thursday, February 26, 2026

                                                       मेजर थॉमस कँडी


पुण्यातील विश्रामबागवाड्यातल्या संस्कृत कॉलेजचे प्राचार्य आणि मराठी भाषातज्ज्ञ मेजर थॉमस कँडी यांचे जोतिबा फुले यांच्याशी अत्यंत जवळकीचे संबंध होते.

असे आपुलकीचे संबंध असणे साहजिकच होते.
याचे कारण म्हणजे मेजर कँडी हे मराठी भाषेसाठी महत्त्वाचे योगदान करणारी व्यक्ती तसेच पुण्यातील विश्रामबागवाडा येथील संस्कृत कॉलेजचे (आताचे डेक्कन कॉलेज) प्रमुख तर दलित आणि मुलींसाठी शाळा सुरु करणारे जोतिबा आणि सावित्रीबाई फुले हे पहिलेच एतद्देशीय दाम्पत्य.
त्यामुळेच स्त्रीशिक्षण आणि कनिष्ठ वर्ग यांचा कैवारी असणाऱ्या या कर्तृत्ववान दाम्पत्याला कँडी साहेबांनी वेळोवेळी मदत करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले होते.
त्याकाळच्या विविध मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांनी याबाबत लिहिले आहे.
थॉमस कँडी यांचा जन्म इंग्लंडमध्ये १३ डिसेंबर १८०४ रोजी झाला. ईस्ट इंडिया कंपनीत दुभाषा पदावर त्यांची नेमणूक होऊन १८२२ साली ते भारतात आले आणि नंतर अनेक पदांवर त्यांनी काम केले.
सुरुवातीला प्रकृतीच्या कारणास्तव अल्पसा काळ ते मायदेशी परतले होते, त्यानंतर त्यांनी आयुष्यभर भारतातच कार्य केले आणि मराठी भाषेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले.
थॉमस कँडी यांनी तयार केलेला इंग्रजी मराठी शब्दकोश आणि मराठी भाषेतील शुद्धलेखनाचे नियम यामुळे त्यांचे योगदान विशेष मोलाचे ठरते.
मराठी भाषेत इंग्रजीच्या धर्तीवर विरामचिन्हे रुढ करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. थॉमस कँडी यांचे `विरामचिन्हांची परिभाषा' हे मराठी भाषेतील हे शुद्धलेखनावरील १६ पानांचे पुस्तक सन १८५० मध्ये प्रकाशित झाले होते.
कँडी यांचे महाबळेश्वर येथे २६ फेब्रुवारी १८७७ रोजी निधन झाले. दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ पासून कँडी यांचे १५० स्मृतीवर्ष सुरु होत आहे.
इतिहास संशोधक अनंत काकबा प्रियोळकर यांनी थॉमस कँडी यांच्याबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे :
``कँडींचा इंग्रजी-मराठी कोशही उपयुक्त आहेच; परंतु कँडीने मराठी भाषेला नियमबद्धता व एकरूपता आणून दिली ही त्यांची मोठीच कामगिरी होय.
(दर्पण'कार बाळशास्त्री ) जांभेकर, दादोबा पांडुरंग यांच्यासारख्यांच्याही मराठी लिखाणांतील चुका दाखवून त्यांना कँडीने एकेकाळीं सळो की पळो करून सोडले होते. स्वतः त्यांचे पंडित परशुरामतात्या गोडबोले यांच्या 'मृच्छकटिक' व 'कादंबरीसार' या ग्रंथांतील मराठीचे दोष त्यांनी काढले आहेत.’’
'बालबोध' मासिकाचे संपादक सुप्रसिद्ध मराठी लेखक विनायक कोंडदेव ओक हे 'विविध-ज्ञानविस्तारांत' लिहितात, "मी प्रांजलपणे आणि मोठ्या कृतज्ञभावाने कबूल करतो कि मला मराठी लिहिण्यास मेजर कँडीसाहेबांनी शिकविले, वास्तविक पाहिले असता, त्यांचे प्रत्यक्ष दर्शन मला कधीच झाले नाही. परंतु त्यांचे जे अभिप्राय लेख पाहण्यास शाळाखात्याच्या अधिकाऱ्यांनी मजकडे पाठविले, त्यावरून पुष्कळ चांगल्या चांगल्या सूचना मला मिळाल्या, आणि माझ्या चुका कळल्या."
सरकारी आश्रय मिळविण्याकरिता कँडींची खुषामत म्हणून ओकांनी हा मजकूर लिहिला नसून कँडीच्या निधनानंतर कित्येक वर्षानी हा ऋणनिर्देश केला आहे, हे अवश्य लक्षात ठेविले पाहिजे,'' असे स्पष्ट करून प्रियोळकर पुढे लिहितात कि विष्णुशास्त्री चिपळुणकरांच्या चरित्रात त्यांचे बंधु लक्ष्मणराव यांनी कँडींचा एके ठिकाणीं "महाराष्ट्रभाषागुरु" असा निर्देश केला आहे.
``स्त्रीशिक्षण आणि कनिष्ठ वर्ग यांचा कैवारी म्हणून जोतीबांचे नाव आता सर्व महाराष्ट्रात गर्जू लागले. पुणे संस्कृत पाठशाळेचे प्रमुख मेजर थॉमस कँडी, शिक्षा मंडळीचे अध्यक्ष सर थॉमस अर्स्कीन पेरी, आयुक्त रीव्हज आणि त्यांचे हैद्राबादचे स्नेही कर्नल मेडोज टेलर हे प्रतिष्ठित अधिकारी जोतीबांचे मोठे चाहते होते,'' असे महात्मा जोतिबा फुले यांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिले आहे.
जोतिबांनी शाळा सुरु केल्यानंतर विद्यार्थ्यांची हळूहळू संख्या वाढू लागली. फुले यांच्या या कार्याला हातभार लावण्यासाठी थॉमस कँडी या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके पुरवत असत असे कीर यांनी दिनांक २८ नोव्हेंबर १८५१च्या `द बॉंबे गार्डीयन'चा हवाला देऊन म्हटले आहे.
२९ मे १८५२ च्या अंकात 'पूना ऑब्झर्व्हर' वृत्तपत्र म्हणते, 'आपल्या देशाची प्रगती व्हावी असे ज्यांना वाटते त्यांना, एका दानशूर वृत्तीच्या मानी गृहस्थाने पदरमोड करून पुण्याच्या वेताळ पेठेत महारमांग आणि कुणबी यांना मराठीतून शिक्षण देण्यासाठी शाळा घातली आहे हे ऐकून समाधान वाटेल. या शाळेत मुलांची संख्या बरीच आहे आणि शाळेत ज्या सोयी करण्यात आल्या आहेत, त्या पाहता आम्ही अशी आशा करतो की, या शाळेच्या संस्थापनेमुळे त्या जातींना बराच लाभ होईल. आम्हाला असे कळते की, या मुलींच्या शाळा चालविणाऱ्या कार्यकारी मंडळाने शिक्षा मंडळीकडे ह्या शाळा चालविण्यात मासिक साह्य मिळावे म्हणून अर्ज केला आहे. आम्हांला असा विश्वास वाटतो की, मेजर कँडी आणि दक्षिणा पारितोषिक समिती आपल्या निधीतून या शाळांच्या साह्यासाठी वार्षिक अनुदान देण्याचा विचार करीत आहेत."
``मेजर कँडी यांनी जोतीबांच्या संस्थेला सरकारने अनुदान द्यावे अशी शिफारस केली. सरकारने दक्षिणा पारितोषिक समितीकडून त्या संस्थेला दर महिना ७५ रुपयांचे अनुदान संमत केले. मेजर कँडी यांना त्या संस्थेच्या हिशेबावर लक्ष ठेवण्याचा अधिकार दिला आणि ठरावीक वेळी दक्षिणा पारितोषिक समितीला त्या शाळांच्या कार्याविषयी वृत्तांत पाठविण्यास आज्ञा केली.''
तर हे दक्षिणा पारितोषक प्रकरण काय असावे?
`दक्षिणा निधी' ही पेशवाईच्या काळापासून आलेली एक प्रथा होती. धनंजय कीर यांनी `महात्मा जोतीराव फुले' या चरित्रात लिहिले आहे:
``दक्षिणा म्हणजे ब्राह्मणांना पारितोषिक किंवा दान देणे होय. दक्षिणा वाटली म्हणजे पुण्य मिळते अशी समजूत होती. धार्मिक कार्यासाठी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानण्यात येई. पेशव्यांची सत्ता संपुष्टात आल्यावर, दक्षिणा देण्याची ही पद्धत, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी प्रजेपैकी वजनदार अशा ब्राह्मणवर्गाला अंशतः खूष करण्यासाठी आणि अंशतः विद्वान ब्राह्मणांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने चालू ठेवली होती. रावबाजी (रघुनाथराव पेशवे) प्रतिवर्षी लाखो रुपये ब्राह्मणांच्या दक्षिणेवर खर्च करीत होता तरी एल्फिन्स्टनने ती रकम पन्नास हजार रुपयांपर्यंत खाली आणली होती.’’
मुंबई आणि पुण्यात कार्यरत असलेल्या स्कॉटिश मिशनरी जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' या आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे :
``पेशवाईच्या काळात दरवर्षी पाच लाख रुपये ब्राह्मण जातीच्या लोकांना दक्षिणा म्हणून वाटले जायचे. ब्रिटिश सरकारने ब्राह्मणांसाठी दक्षिणा चालू ठेवली तरी ही रक्कम कमी केली आणि या रकमेतील एक चतुर्शाश भाग संस्कृत कॉलेजसाठी राखून ठेवला. त्यावेळी १२० ब्राह्मण विद्वानांना ही रक्कम वाटली जाई, प्रत्येक ब्राह्मणास दरमहा पाच रुपये दक्षिणा मिळे. ही प्रथा १८३६पर्यंत चालू होती. ‘’
ब्राह्मण समाजाला देण्यात येणाऱ्या या दक्षिणा प्रथेचे मूळ आणि उत्तर पेशवाईत पुण्यात कशा प्रकारे दक्षिणा दिली जात असे याचे विस्तृत रंजक वर्णन इतिहास संशोधक आणि पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख अ. रा. कुलकर्णी यांनी आपल्या ``पुण्याचे पेशवे' (राजहंस प्रकाशन ) या पुस्तकात केले आहे.
कुलकर्णी यांनी दक्षिण फंडाबाबत पुढील शब्दांत लिहिले आहे :
``पुण्यातील ब्राह्मणांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे दक्षणा, श्रावण मासातील दक्षणा हे पुण्याचे मुख्य आकर्षण असल्याने भारताच्या उत्तर-दक्षिण भागांतून, काशीपासून रामेश्वरापर्यंत पुराणिक, वैद्विक, शास्त्री पंडित, भट-भिक्षुक इत्यादीची प्रचंड गर्दी या महिन्यात पुण्यात उडत असे.
ब्राह्मणांना त्यांच्या ज्ञानाच्या तयारीची परीक्षा घेऊन वर्षासन, बक्षीस देण्याची पद्धत शिवकालातही प्रचलित होती. परंतु मध्यंतरीच्या काळात ही बंद पडली असावी. पहिल्या बाजीरावाने या प्रथेचे १७३१ च्या सुमारास पुनरुज्जीवन केले. प्रथम दक्षणा वाटप शनवारवाड्यात होत असे. नंतर बाजीरावाने बांधलेल्या कबुतरखान्यात हे काम चाले. पण पुढे ब्राह्मणांची संख्या वाढल्याने कबुतरखान्याची जागादेखील अपुरी पडू लागली. नंतर हुजुरपागा, रमणबाग या निरनिराळ्या ठिकाणी हे काम सुरू झाले. पण त्या जागाही अपुऱ्या पडल्याने नानासाहेबाने पर्वतीच्या पायथ्याजवळच्या मोकळ्या जागेत दक्षिणावाटप सुरू केले. थोरल्या माधवरावाने १७६५ च्या सुमारास दक्षणा वाटपासाठी पर्वतीच्या पायथ्याच्या दक्षिणेस एक चौबंद पाच फूट उंचीची दगडी तटबंदी चार दरवाजे असलेली एक भक्कम वास्तू उभी केली. त्याचे नाव पर्वतीचा रमणा असे पडले.
बाजीरावाने सुरू केलेल्या आणि नानासाहेब पेशव्याने आकार दिलेल्या 'दक्षणावाटपाला' सवाई माधवराव आणि विशेषतः रावबाजीच्या काळात उधाण आले होते. दक्षणावाटपाची स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती. खुद्द पेशवे यात सहभागी होत असल्याने कारभारी, सरदार, शास्त्रीपंडित यांना भाग घ्यावा लागे. १७७५ साली दक्षिणेसाठी सव्वा लाख रुपये वाटावयाचे ठरले होते. ''
लोकहितवादी गोपाळराव देशमुख यांनी १८४९ च्या जून महिन्यात ही दक्षिणा देण्याची पद्धत बंद करावी, अशी ईस्ट इंडिया कंपनी सरकारला सूचना केली.
``ज्याचा अर्थ कळत नाही ते वाड्मय ब्राह्मणांनी घोकण्यात काही अर्थ नाही,’’ असे लोकहितवादींचे मत होते असे धनंजय कीर यांनी `महात्मा फुले: शैक्षणिक तत्वज्ञान आणि कार्य' या लेखात लिहिले आहे.
कंपनी सरकारने शेवटी निर्णय घेतला कि जे कोणी मराठी भाषेमध्ये उत्तम निबंध लिहितील किंवा इंग्रजी भाषेतील, संस्कृत भाषेतील अथवा दुसऱ्या कोणत्याही परकीय भाषेतील उपयुक्त पुस्तकांचे मराठीत भाषांतर करतील त्यांना दक्षिणा वाटण्यात येईल.
``मराठी भाषेचे कैवारी व संस्कृत भाषेचे अभिमानी यांच्यामधील लढ्याचा असा हा कल्याणकारक शेवट झाला’’ अशा शब्दांत कीर यांनी या वादाच्या समाप्तीचे वर्णन केले आहे.
नारायण विष्णू जोशी यांनी लिहिलेल्या `पुणे शहरचे वर्णन' (प्रकाशन १८६८ साल) या पुस्तकात `दक्षिणा प्राईझ कमिटी'बाबत खालील माहिती दिली आहे :
``पूर्वी पुण्यात पेशवे सरकार दरवर्षी सर्व ब्राह्मणांस दक्षिणा वाटीत असे. ती इंग्रज सरकाराने बंद करून माधवराव पेशव्यांच्या चालीप्रमाणे केवळ विद्वान ब्राह्मणास मात्र द्रव्य देण्याचा शिरस्ता ठेविला.
नंतर विद्येची वृद्धि व्हावी म्हणून त्या द्रव्यांतून रुपये शिलक पाडून पुण्यातील संस्कृत पाठशाळा चालू केली आणि बाकीच्या रुपायांत दक्षिणा चालविली. पुढे कित्येक सुधारलेल्या विद्वान व वजनदार एतद्देशीय गृहस्थांच्या उद्योगावरून व सूचनेवरून सरकाराने असा ठराव केला की पूर्वी घेत आलेले विद्वान ब्राह्मणांशिवाय नव्या विद्वानांस दक्षिणा द्यायाची नाही, तर जुने मेल्यावर त्यांच्या द्रव्याची जी शिलक राहील ती ग्रंथ करण्याच्या कामाकडे लावावी.
असा ठराव होण्यास कारण (लोकहितवादी) राव बहादूर गोपाळराव हरी देशमुख यांची खटपट मुख्य होती. त्यांनी त्यावेळी मराठी व इंग्लिश वर्तमानपत्रांतून याविषयीं वारंवार लिहून लोकांचे व सरकारचे डोळे उघडले; व कित्येक सुधरलेल्या गृहस्थांच्या सह्या घेऊन सरकारास एक अर्जीही दिली.
यामुळे पुण्यातील ब्राह्मणांनी त्यावर ग्रामण्य केले, तथापि त्या गृहस्थानी ह्या कामाचा पिच्छा सोडला नाही.
शेवटी सरकारतर्फे त्यांच्या व सर्व विचारी लोकांच्या मनाप्रमाणे ठराव झाला.
ह्या ठरावाबरहुकूम सन १८५१ साली दक्षिणा प्राईझ कमिटीची स्थापना झाली. तिने आजपर्यंत काही पुस्तके त्यांच्या कर्त्यांस बक्षीसे देऊन स्वतः छापविली काहीकास नुसते बक्षीस देऊन छापण्याचे उत्तेजन दिले. ''
कंपनी सरकारने जोतिबांच्या शाळेला दक्षिणा प्राईझ समितीतफे दिलेल्या निधीबाबत आणि त्यांच्या कार्याबाबत केलेल्या सत्काराविषयी धनंजय कीर यांनी विविध नियतकालिकांत आलेले वृत्तांत `महात्मा जोतिबा फुले' चरित्रात दिले आहेत.
'पूना ऑब्झर्व्हर' या इंग्रजी पत्राने २१ ऑगस्ट १८५२ च्या अंकात असे म्हटले की, 'जोती गोविंद फुले यांनी वेताळ पेठेत दोन शाळा काढल्या आहेत. महारमांगधेडचांभार यांच्या मुलींसाठी एक व दुसरी त्याच जातींच्या मुलांसाठी. या दोन्ही शाळांत जोती स्वतःच शिकवितात आणि त्या शाळांची व्यवस्था करतात. ब्राह्मण शिक्षक त्यांना साह्य करीत आहेत. या शाळांचा खर्च जोती स्वतः पदरमोड करून करतात. शिवाय युरोपियन व सुसंस्कृत देशी लोक वर्गणी पाठवितात. या शाळांना महिन्याला २५ रुपयांचे साह्य दक्षिणा पारितोषिक समितीकडून देण्यात येते.'
ह्या अनुदानासंबंधी लिहिताना 'ज्ञानप्रकाश'ने असे म्हटले की, 'शाळेला दक्षिणा पारितोषिक समितीकडून मिळालेली मासिक देणगी पाहून काही लोक कुजबुजू लागले आहेत, तर बहुसंख्य लोकांना ह्या व्यवस्थेमुळे अत्यंत आनंद झाला आहे.
'ज्ञानोदया'ने म्हटले की, 'तथापि ह्या निधीच्या मूळ उद्देशाला लक्षात घेता त्याचा विनियोग ह्याहून अधिक चांगल्या रितीने करता आला नसता. ब्राह्मणांसाठी ठेवलेला पैसा मुलींच्या शिक्षणाकरिता खर्च करावा अशी दुःखकारक परिस्थिती निर्माण व्हावी याविषयी काही सनातनी वृत्तीच्या हिंदूंना दुःख झाले!'
सरकारी शिक्षा मंडळीने जोतीबांच्या कार्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते आणि त्यांनीच. जोतीबांचा असा बहुमान करावा असे सरकारला सुचविले होते. सरकारने ती सूचना आनंदाने मान्य केली. त्याप्रमाणे सरकारने १९३ रुपयांच्या वेग शाली' विकत घेतल्या, आणि आपला प्रतिनिधी म्हणून पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांना, ती महावस्त्रे समारंभपूर्वक अर्पण करण्याची आज्ञा केली.
जोतीबांच्या गौरवार्थ विश्रामबागवाड्यात १६ नोव्हेंबर १८५२ रोजी सरकारने देशी सरदार आणि प्रमुख लोक यांची एक सभा बोलाविली होती.
समारंभाच्या प्रारंभी मेजर कँडी यांनी सरकारी शिक्षा मंडळीचे निवेदन सभेपुढे वाचून दाखविले आणि नंतर सभेचा उद्देश मराठीत कथन केला.
भाषणाच्या शेवटी त्यांनी सरकारच्या वतीने जोतीबांना एक शालजोडी सन्मानपूर्वक अर्पण केली. असा हा सत्कार्याचा त्या सुदिनी सत्कार झाला. ''
'बॉम्बे गार्डियन' ने आपल्या वृत्तांताच्या शेवटी असे म्हटले आहे की, "जुन्या पिढीतील काही ब्राह्मणांनी जोतीबांसारख्या शूद्राला सरकारने शालजोडी अर्पण केली याविषयी नापसंती दर्शविली. कारण जोतीबा पडले जातीने माळी. व्यवसायाने मात्र ते त्यावेळी माळी नव्हते.
ब्राह्मणांच्या मते त्यांना सरकारने महावस्त्र देऊन सन्मान करण्यापेक्षा त्यांना पैशाच्या रूपाने पारितोषिक देऊन त्यांची बोळवण करावयास हवी होती.
'ज्ञानप्रकाश' आपल्या २२ नोव्हेंबर १८५२ च्या अंकात म्हणतो, "तारीख १६ माहे मजकुरी पाठशाळेत मोठा समारंभ होऊन मेजर कँडी यांनी सरकार बोर्ड ऑफ एज्युकेशन यांच्या मार्फतीने राजश्री जोती गोविंद फुले माळी यांस एक शालजोडी बक्षीस दिली. पुण्यात ज्या हल्ली मुलींच्या शाळा आहेत त्यांची आरंभी स्थापना जोतीबा यांनी केली. याकरिता सरकारने या स्तुत्य कामाकरिता त्यांस हे बक्षीस दिले.''
Camil Parkhe

Sunday, August 3, 2025


वसईतील डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी लिहिलेले ‘प्रसादचिन्हे’ हे पुस्तक आज सकाळी हातात पडले. पुण्यात एका बैठकीसाठी आलेल्या लेखिकेने स्वतः ते पुस्तक मला अभिप्रायासाठी दिले.

ही ओझरती भेट अक्षरशः काही क्षणांची आणि एकदोन वाक्यांच्या संवादांपुरती होती.
त्यामुळे पुस्तक आणि लेखिकेबरोबर एक फोटो काढण्याचे राहून गेले, याची नंतर दिवसभर चुटपुट लागली होती.
या पुस्तकाचे उपशीर्षक ‘मराठी भाषक ख्रिस्ती साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा परिचय’ असे आहे त्यामुळे पुस्तकाच्या आतल्या मजकुराविषयी कल्पना येईल.
मराठी ख्रिस्ती साहित्य सुरु होते ते गोव्यात सोळाव्या शतकात ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांनी लिहिलेल्या `क्रिस्तपुराणा’पासून आणि इतर परदेशी मिशनरींनी केलेल्या साहित्यकृतींपासून.
आशिया खंडात अन भारतात पोर्तुगीजांच्या राजवटीतील गोव्यातच पहिल्यांदा आधुनिक पद्धतीची छपाई यंत्रणा होती आणि तिथेच फादर स्टीफन्स यांचे हे मराठी काव्य रोमी लिपीत १६१६ ला छापले गेले.
मराठीच्या मायदेशी महाराष्ट्रात ख्रिस्ती साहित्य परंपरा सुरु होते ती आधी मुंबईत आणि नंतर नगर जिल्ह्यात अमेरिकन मराठी मिशनचे शिक्षणकार्य आणि मिशनकार्य सुरु झाल्यानंतर.
बंगालमधील सेरामपूरला ब्रिटिश मिशनरी विल्यम कॅरे आणि मुंबईत अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल वगैरेंनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी मराठीत पुस्तके लिहिणे आणि छापणे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरु केले.
नगर आणि नाशिक परिसरात स्थायिक झालेल्या या परदेशी मिशनरींनी आणि त्यांच्या पत्नींनी मराठीत विविध पुस्तके लिहिले आहेत. त्या पुस्तकांची नावे, प्रकाशनवर्षे आणि पानांची संख्या याबाबत आज केवळ माहिती उपलब्ध असली तरी ही आता दुर्मिळ झालेली पुस्तके कुठे कुणाच्या संग्रहांत असतील याबाबत काहीच सांगता येत नाही.
रेव्हरंड बाबा पदमनजी यांची `यमुनापर्यटन’ ही मराठीतली पहिली कादंबरी, विविध परदेशी मिशनरींनी लिहिलेले गद्य आणि पद्य वाङमय, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांचे `स्मृतिचित्रे' पंडिता रमाबाई, कविराज कृष्णाजी सांगळे वगैरेंच्या साहित्य कलाकृती खूप नंतरच्या,
न्यायमूर्ती म गो. रानडे यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवून आताच्या मराठी साहित्य संमेलनाचा पाया रचला.
विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे या संमेलनापासून आपली वेगळी चूल मांडण्याचे, सवतासुभा निर्माण करण्याचे पहिले धाडस ख्रिस्ती साहित्यिकांनी शंभर वर्षांपूर्वीच १९२७ साली नाशिकात पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवून केले होते.
आणि त्यावरही कडी म्हणजे या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनापासून फारकत घेऊन वेगळी विद्रोही म्हणजे मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने १९९२ पासून भरवली जात आहेत. आतापर्यंत अशी तब्बल अकरा संमेलने झाली आहेत आणि बाराव्या संमेलनाची तयारीसुद्धा आता चालू आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरल्यानंतर खूप काळानंतर मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहापासून विद्रोही, ग्रामीण, दलित, वेगवेगळी प्रादेशिक, आणि अगदी अलीकडेच नास्तिक संमेलने भरु लागली आहेत.
आतापर्यंत एकूण २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत, लक्ष्मीबाई नारायण टिळक नागपुरात १९३३ ला भरलेल्या चौथ्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
आतापर्यंत दोन्ही प्रकारची मिळून अशी एकूण छत्तीस ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत आणि यामध्ये महिला साहित्य संमेलनाध्यक्षांची संख्या लक्षणीय आहे.
नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे पुण्यात १९९२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. शांता शेळके त्यावेळी स्वागताध्यक्ष होत्या.
या पुस्तकाच्या लेखिका कार्व्हालोसुद्धा नाशिकच्या २००० सालच्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मराठवाड्यात बीड येथे २०२३ ला झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे होते. या पुस्तकात याबद्दल एक परिशिष्ट आहे.
मी स्वतः मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या तसेच मराठी दलित ख्रिस्ती संमेलनाच्या अशा दोन्ही मांडवांत हजेरी लावत आलो आहे. याबाबतीत सोवळे-बिवळे, मंगल किंवा अमंगल असे काही मी मानत नाही.
मराठी ख्रिस्ती साहित्याला अशी खूप जुनी आणि गौरवी परंपरा आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या साहित्यप्रवाहाबद्दल असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांच्या या पुस्तकातील मजकुराविषयी मला भरपूर उत्सुकता .होती.
त्यामुळे पुणे मेट्रोने संघ्याकाळी घरी परत येताना मेट्रोच्या दाराजवळच्या सपोर्ट हॅण्डलशी रेलून आणि नंतर एका बैठकीत मांड ठोकून ३३२ पानांचे, मोठ्या म्हणजे मासिकाच्या आकाराचे हे हार्डबाऊंड पुस्तक मी शेवट्पर्यंत पूर्ण चाळले अन नंतरच खाली ठेवून लगेचच हे लिहायला बसलो.
पुस्तक वाचनीय झाले आहे.
पेशाने शिक्षिका असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांनी भरपूर श्रम घेऊन हा ग्रंथ तयार केला आहे. त्यासाठी किती कठोर परीश्रम घ्यावे लागतात हे मी स्वतः `महाराष्ट्र चरित्रकोश (इ. स. १८00 ते इ. स. २000' तयार करताना अनुभवले आहे.
याआधी अशाच प्रकारे मराठी ख्रिस्ती साहित्याचा संशोधनात्मक वेध घेणारे काही ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. संशोधकांच्या दृष्टीने असे ग्रंथ खूप मौल्यवान असतात. कारण याच ग्रंथमित्रांना वाट पुसत नंतरचे संशोधक आपली पुढची वाटचाल चालू ठेवत असतात.
`युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा', श्री. म. पिंगे, व्हीनस प्रकाशन, पुणे (१९६०) हे त्यापैकी एक दुर्मिळ ग्रंथ.
त्यानंतर गंगाधर मोरजे यांचे `ख्रिस्ती मराठी वाङमय' (१९८४), अनिल दहिवाडकर यांचे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा' (२०२०) आणि फादर टोनी जॉर्ज (येशूसंघ) यांचा `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची' ग्रंथ (२०२१) याच प्रकारचे आहेत.
कार्व्हालो यांचे हे नवे पुस्तक याच जातकुळातले असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे.
सिसिलिया कार्व्हालो यांचे हे संपूर्ण पुस्तक मी अजून वाचले नाही. त्या पुस्तकाचा हा फक्त परिचय किंवा तोंडओळख.
वाचून झाल्यानंतर अधिक सविस्तर लिहीन.
Camil Parkhe July 29, 2025

Wednesday, May 8, 2024

 

पंडित भीमसेन जोशी

पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या इंडियन एक्सप्रेसला मी रुजू झालो होतो तेव्हाची ही गोष्ट. साल होते १९९०.
गोव्यात पणजीला हायर सेकंडरी, पदवी शिक्षण घेतल्यानंतर तिथेच `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात पत्रकारीतेला सुरुवात केली होती. या दीर्घ कालावधीत महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक घडामोडींशी फारसा संबंध राहिला नव्हता.
पुण्यात तर कधी राहिलोही नव्हतो. या शहरात बातमीदारी करताना हळूहळू येथील लोकजीवनाची आणि विविध क्षेत्रांतली प्रमुख व्यक्तिमत्त्वांची ओळख होत होती.
गोव्याच्या तुलनेत विविध क्षेत्रांत आपापला दबदबा राखून असलेली अशी दिग्गज मंडळी येथे खूप मोठया प्रमाणात होती. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे नरुभाऊ लिमये, पु ल देशपांडे, नानासाहेब गोरे, मोहन धारिया, जयंत नारळीकर, डॉ गोविंद स्वरूप, शकुंतला परांजपे, विद्या बाळ ही त्यापैकी काही ठळक नावे.
त्या एका रविवारच्या संद्याकाळी आम्हा बातमीदाराच्या दैनंदिन डायरीत माझ्या नावावर एक कार्यक्रम लिहिला होता.
पुण्यातल्या आमच्या `इंडियन एक्सप्रेस'मध्ये त्यावेळी मुख्य वार्ताहर नव्हता. आताचे आम्ही सर्व बातमीदार लोक विशीतले होतो, नरेंद्र करुणाकरन, शुभा गडकरी, संगीता जहागिरदार-जैन, अवर्तिन्हो मिरांडा, विश्वनाथ हिरेमठ, माधव गोखले आणि मी स्वतः.
प्रकाश कर्दळे `मास्तर' हे निवासी संपादक होते आणि बातमीदारांची कामकाजाची दैनंदिन डायरी आम्हापैकी एक बातमीदार लिहित असे.
तर शहरातील कन्नड संघ या संस्थेने भरत नाट्य मंडळ येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंडित भीमसेन जोशी होते.
बातमीच्या दृष्टीने भाकड असलेल्या रविवारी शहर आवृत्ती असलेल्या दैनिकांची स्थानिक पाने भरण्यासाठी बातम्या आणि फोटो कमी पडतात, त्यामुळे एक बऱ्यापैकी लांबीची बातमी मिळेल अशा हेतूने मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो होतो.
त्या मोठ्या हॉलमध्ये गर्दी तशी कमीच होती. मला वाटते हॉल निम्मासुद्धा भरला नव्हता, कारण कन्नड संघ या सांस्कृतिक संस्थेची ती सभा होती.
व्यासपीठावर अगदी मोजकीच म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांच्यासह पाचसहा माणसे होती. कन्नड संघाच्या अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेविषयी माहिती दिली, अहवाल वाचले.
कुठल्याही कार्यक्रमाची बातमी घेण्याऱ्या बातमीदाराच्या नशिबी हा रटाळपणा त्याच्या नेहेमीच्या कामकाजाचा भाग असतो, मुख्य वक्ता आपले भाषण सुरू करीपर्यंत बातमीदाराला अशी भाषणे ऐकून घेण्यावाचून इतर काही पर्याय नसतो.
बातमीच्या अनुषंगाने मी मोजकीच टिपणे घेत होतो. रविवार संध्याकाळच्या त्या कार्यक्रमाला बातमीदार असा मी एकटाच होतो. पण अनेक कार्यक्रमांना पुष्कळशी बातमीदार मंडळी फिरकतसुद्धा नसतात असा अनुभव असल्याने त्याबद्दल मला विशेष असे काही वाटले नाही.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य पाहुण्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर पंडित भीमसेन जोशी भाषणासाठी उभे राहिले.
आधी आलेली मरगळ झटकून मी पेन सरसावून मी त्यांच्या संपूर्ण भाषणाचे टिपण काढण्यासाठी सज्ज झालो
खांद्यावर असलेली शाल ठिकठाक करत पंडितजींनी उच्चारलेल्या पहिल्याच वाक्याने मी सर्द झालो.
संगीतातले मला काहीएक कळत नाही. या संस्थेच्या कार्यक्रमात पंडितजी संगीताविषयी बोलतील किंवा श्रोत्यांच्या आवडीचा असलेला एखादा राग किंवा गीत गातील अशी माझी बिलकुल अपेक्षा नव्हती.
त्याआधी पंडितजींची कितीतरी मराठी गीते मी ऐकली होती, त्यापैकी अभंगवाणीसारखी `इंद्रायणीकाठी', `कानडा हो विठ्ठलु', अशी काही लोकप्रिय गायने मला बऱ्यापैकी तोंङपाठसुद्धा होती.
ण तरीसुद्धा पंडितजींनी यावेळी जो राग आळवायला सुरुवात केली होती तो राग खूपच अनपेक्षित होता, एकदम अनोळखी होता. मला आश्चर्याचा धक्काच बसला होता.
पंडितजींनी सुरु केलेल्या त्या रागाने मी वगळता इतर सर्व श्रोते एकदम खुश झाले होते, कान देऊन ते पंडितजींना ऐकत होते.
मोठ्या उत्सुकतेने बातमीसाठी टिपणी घेण्यासाठी पेन सरसावून बसलेलो मी मात्र एकदम दिग्मूढ झालो होतो.
पुढील पाचदहा मिनिटे पंडितजींचा आवाज कानावर पडत होता, काहीच अर्थबोध होत नसल्याने मी चुपचाप होतो.
अर्थात जे काही घडत होते त्यात वावगे असे काहीच नव्हते.
तो कार्यक्रम पुण्यातल्या कन्नड संघाचा होता, पंडितजींसह तिथे हजर असलेली सर्व मंडळी पुणेकर असली तरी मुळची कन्नडभाषिकच होती. त्यामुळेच तर भीमसेनजींनी कन्नड भाषेत बोलणे अगदी सुसंगत होते.
आधीचे सर्व वक्ते स्थानिक मराठी भाषेत बोलले होते तरी पंडितजींना आपल्या मातृभाषेत या कानडी लोकांशी संवाद साधणे उचित वाटले होते.
पुण्यात अनेक वर्षे राहून पुणेकर बनलेल्या कन्नड संघाच्या पदाधिकाऱ्यांना पुण्यातल्या या कार्यक्रमात मराठीतच बोलणे जितके संयुक्तिक वाटले तितकेच कन्नड भाषेत बोलून या लोकांशी असलेली आपली नाळ दाखवणे पंडितजींना संयुक्तिक वाटले असणार.
पंडित भीमसेन जोशी हे मूळचे कर्नाटकातले आणि कन्नडभाषिक आहेत हे मला तोपर्यंत माहित नव्हते आणि गडबड इथेच झाली होती.
पंडितजींचे कन्नड भाषेतले ते भाषण संपताच मी तेथून बाहेर पडलो, रात्रीचे आठ वाजले होते आणि मला पुणे कॅम्पात ऑफिसला जायचे होते.
इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसात परतल्यावर जेमतेम तीनचार परिच्छेदांची एक कॉलमी बातमी मी टाईप केली.
कार्यक्रमाला गेलोच होतो तर निदान तेव्हढी तरी बातमी देणे गरजेचे होते. त्या बातमीत `प्रमुख पाहुणे आणि वक्ते पंडित भीमसेन जोशी होते' असे एक वाक्य होते.
दुसऱ्या दिवशी मी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताच्या बातमीदार सहकाऱ्यांना हा किस्सा सांगितला, माझी कशी फटफजिती झाली हे सांगितले तेव्हा तिथे पिकलेला हंशा आजही माझ्या आठवणीत आहे.

Tuesday, February 20, 2024

 

जॉन मरे मिचेल

``स्कॉटलंडमध्ये (रॉबर्ट ) बर्न्स इतका लोकप्रिय नसेल जितके तुकाराम ( ते स्वतःला तुका असेच संबोधतात) महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.'' इति जॉन मरे मिचेल

संत तुकाराम यांचे अभंग इंग्रजीत भाषांतर करणारे, संत ज्ञानेश्वर यांची आणि तुकोबांची एकोणिसाव्या शतकात पाश्चात्य जगाला ओळख करून देणारे जॉन मरे मिचेल बहुधा पहिलीच युरोपियन व्यक्ती.
महाराष्ट्राचा एकोणिसाव्या शतकाचा इतिहास जॉन मरे मिचेल यांना डावलून पूर्ण होणार नाही इतके या स्कॉटिश मिशनरीने सुरुवातीला मुंबई-पुण्यात आणि नंतर काही वर्षे कोलकात्यात विविध क्षेत्रांत कार्य केले आणि विपुल प्रमाणात विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत.
असे असले तरी जॉन मरे मिचेल हे नाव तसे महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांचे अभ्यासक आणि संशोधक असलेल्या तज्ज्ञांनासुद्धा फारसे परिचित नाही.
खरे सांगायचे झाल्यास मीसुद्धा हे नाव एक वर्षांपूर्वी ऐकलेसुद्धा नव्हते.
जॉन मरे मिचेल यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे महात्मा जोतिबा फुले हे पुण्यातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत १८४१ ते १८४७ या काळात शिकले तेव्हा काही काळ मरे मिचेल या शाळेत शिक्षक होते.
अर्थार्जनासाठी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत जोतिबा १८५२ नंतर काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी करत असत.
पुण्यात मरे मिचेल यांनी १८६२च्या सुमारास केवळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा चालवली.
जॉन मरे मिचेल यांना टाळून महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याचे जीवनचरित्र पूर्ण होऊ शकत नाही
एक संदर्भ म्हणून जॉन मरे मिचेल यांनी आपल्या विविध पुस्तकांत लिहिलेल्या या नोंदींना अतोनात महत्त्व आहे.
ही सर्व इंग्रजी पुस्तके अर्थातच स्कॉटलंडमध्ये प्रकाशित झाली होती. त्यामुळेच बहुधा स्थानिक अभ्यासकांचे या मौल्यवान ग्रंथांकडे दुर्लक्ष झाले असावे. .
जॉन मरे मिचेल (१८१५ ते १९०४) असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते.
जोतिबांचे दत्तकपुत्र यशवंत फुले यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या अल्पचरित्रात म्हटले आहे :
``जोतीराव यांचे तीर्थरूप वारल्यामुळे त्यांस बरीच दीनावस्था प्राप्त झाली. इतक्यात त्यांची ही भरभराटी पाहून पुण्यातील काही मिशनरी लोकांनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलींस शिक्षण देण्याच्या कामावर नेमले. या कामावर असता परोपकारी मरे मिचेल वगैरे युरोपियन सद्गृहस्थाच्या सूचनेवरून जोतीराव यांनी आपले लक्ष ख्रिस्तीधर्माकडे विशेष पुरविले.’’
पुण्यात १८२१ साली स्थापन झालेल्या संस्कृत कॉलेजचे मरे मिचेल हे या संस्कृत कॉलेजचे (नंतरच्या पुना कॉलेजचे आणि आजच्या डेक्कन कॉलेजचे ) काही काळ प्राचार्य (व्हिजिटर) आणि संस्कृत-मराठी विभागांचे प्रमुख होते.
रेव्हरंड जॉन मरे मिचेल हे १८३८ च्या नोव्हेंबर भारतात आले. मुंबईत आल्यावर त्यांनी कृष्णशास्त्री यांच्या हाताखाली मराठीचा अभ्यास केला. रेव्ह. जॉन स्टिव्हन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतचा अभ्यास केला.
प्राचीन मराठी वाड्यमयाचा अभ्यास करून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली. बायबलचे मराठी भाषांतर सुधारण्यात त्यानीं मोठे योगदान दिले.
स्कॉटिश मिशनरी अलेक्झांडर डफ १८३५ ला विश्रांतीसाठी मायदेशी परतले त्यावेळी एडिनबर्ग कॉलेजात शिकत असलेल्या जॉन मरे मिचेल त्यांना भेटले.
या तरुणाला मिशनकार्याची आवड आहे हे पाहून `आता लगेच माझ्याबरोबर भारतात ये' असे रेव्ह. डफ मरे मिचेल यांना म्हणाले. मात्र मरे मिचेल यांनीं एडिनबर्ग येथील आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर तीन वर्षांनी मरे मिचेल यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर स्कॉटलंडच्या मिशन अधिकाऱयांनी मरे मिचेल यांना कोलकात्याऐवजी मुंबईत मिशनकार्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. कोलकात्यात रेव्हरंड अलेक्झांडर डफ यांच्याबरोबर काम करण्याची आपली इच्छा पूर्ण होणार नाही हे कळून मरे मिचेल काहीसे नाराज झाले होते.
मात्र भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कधी कुणाला कल्पना असते?
स्कॉटलंडमध्ये कॉलेजात शिकत असताना आलेल्या एका अनुभवाचे जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' या आपल्या आत्मचरित्रात पुढील शब्दांत वर्णन केले आहे :
``माझ्या या ईशज्ञानाच्या चौथ्या किंवा अखेरच्या वर्षाला मी ग्रामर स्कुलच्या एका वर्गाला शिकवले. शाळेतल्या एका शिक्षकाने अचानक काम सोडले होते आणि दुसऱ्या शिक्षकाची लगेच नेमणूक करणे नव्हते. रेक्टर डॉ. मेल्विन यांनी मला एक वर्षासाठी त्या एका वर्गात शिकवण्याची मला विनंती केली.. मला ते काम खूपच आवडले आणि त्या वर्गात मला कधीही कुणाही व्रात्य विद्यार्थ्याला बडवण्याची वेळ आली नाही याचा मला विशेष अभिमान वाटला. वर्गातल्या त्या छोट्या मुलांना हाताळणे मला सहज शक्य झाले.''
स्कॉटलंडमधील हा अनुभव मरे मिचेल यांना पुण्यात आणि शेजारच्या परिसरांत ख्रिस्ती धर्माची लोकांना शिकवण देण्याच्या कामात फायदेशीर ठरला असावा.
मरे मिचेल आणि इतर ख्रिस्ती मिशनरी प्रवचनासाठी बाहेर पडत असत तेव्हा त्यांची टिंगलटवाळी होत असे.
भारतात आल्यानंतर आपण खिस्ती धर्मप्रसार करण्यासाठी कायकाय प्रयोग केले याचे वर्णन जॉन मरे मिचेल यांनी केले आहे :
``आपल्या स्वतःच्या घराच्या आवारात इतरांना आपला धर्म शिकवताना आपण आपले स्वतःचे नियम आणि अटी लागू करू शकता. अशावेळी तुम्हाला कुणी व्यक्ती त्रास देण्याची शक्यता नसते. मात्र आपल्या घरापासून दूर, परक्या स्थळी आणि रस्त्यांवर ख्रिस्ती धर्माची शिकवण देण्यासाठी इतरांना न दुखावण्याचे खास कसब, अमर्याद सहनशीलता आणि खूप संयम असणे अत्यावश्यक असते.
यासाठी मी एक मार्ग निवडला होता. समुद्रकिनाऱ्यावर सकाळी लोक जमलेले असताना घोड्यावर बसून मी तेथे जात असे आणि त्या लोकांना प्रवचन देत असे. जोपर्यंत तो जमाव शांतपणे माझे बोलणे ऐकत असे तोपर्यंत माझे प्रवचन चालू असायचे. त्या लोकांनी गोंधळ करायला सुरु केले तर मी लगेच माझा घोडा दुसरीकडे नेऊन तेथे पुन्हा नव्याने प्रवचन सुरु करत असे.
प्रवचनाच्या दरम्यान अधेमध्ये एखाददुसरा प्रश्न आला तरी काही बिघडत नसे. मात्र हे लोकसुद्धा गडबडगोंधळ करू लागले कि मी माझा घोडा पुन्हा एकदा नव्या दिशेने नेत असे. ‘’
भारतात लोकांचा मुलींच्या शिक्षणाबाबत असलेल्या दृष्टिकोनाबाबत आणि स्कॉटिश मिशनच्या मुस्लीम मुलींसाठी चालवलेल्या स्वतंत्र शाळेबाबत जॉन मरे मिचेल लिहितात :
``मिशनरींच्या आणि स्टुडंट्स सोसायटी ऑफ बॉम्बेच्या उदाहरणामुळे स्थानिक लोकांनी याबाबत पुढारी घेतला आणि सरकारने त्यांना सर्व प्रकारचे उत्तेजन दिले. यासाठी सरकारने दक्षिणा फंडातून दरवर्षी सहाशे रुपयांची रक्कम पुरवली. मात्र या शाळांत मुलींची संख्या फक्त दिडशे होती. सरकारने आमच्या मिशनला रक्कम दिली नव्हती तरी आमच्या शाळेत १८६२ च्या मे महिन्यात मुलींची संख्या तिनशेपर्यंत वाढली होती.
सर्वांत खास बाब म्हणजे आमच्या मिशनची एक मुस्लिम मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा होती आणि या शाळेचा संपूर्ण खर्च या विद्यार्थिनींनी दिलेल्या फिमधून चालवला जात होता. या शाळेत विद्यार्थिनींची संख्या सत्तर होती.
त्याकाळात केवळ मुस्लिम मुलींसाठी चालवली जाणारी पुण्यातील ही एकमेव शाळा होती, ‘’ असे जॉन मरे मिचेल यांनी म्हटले आहे.
मात्र केवळ मुस्लीम मुलींसाठी पुण्यात चालवली जाणारी ही तशी अगदी पहिलीवहिली शाळा नव्हती. रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी १८३०ला पुण्यात स्कॉटिश मिशनचे काम सुरु केले. त्यानंतर स्कॉटिश मिशनच्या सुरुवातीच्या काळात पुण्यात रेव्हरंड वजिर बेग यांनी मुस्लीम मुलींसाठी एक शाळा सुरु केली होती.
पुना कॉलेजचे प्राचार्य असलेले मेजर थॉमस कँडी काही काळासाठी आपल्या मायदेशी जाणार होते, कँडी यांच्या गैरहजेरीत यांनी या कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारण्याची ईस्ट इंडिया कंपनी सरकारने त्यांना विनंती केली.
आपल्या आत्मचरित्रात जॉन मरे मिचेल लिहितात:
``हो-ना असे करत अखेरीस करत मी ते पद स्वीकारण्याचे ठरवले. कॉलेजच्या इंग्रजी विभागात मी आठवड्यातून दोनदा नैतिक तत्त्वज्ञान शिकवत असे. माझ्या या वर्गांत हजेरी ऐच्छिक होती. असे असले तरी प्रगतशील असलेले तीस लोक या व्याख्यानाला नियमितपणे उपस्थित राहत असत आणि ते सर्वच जण खूपच .चांगले वागत असत.
मी असे ऐकले होते कि पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा या संस्कृत कॉलेजचे प्रिंसिपल म्हणून एक युरोपियन (मेजर थॉमस कँडी) व्यक्तीची नेमणूक करण्यात आली तेव्हा त्यांच्या आगमनाच्यावेळी प्रवेशद्वारात अडथळे उभारण्यात आले होते. आणि आता माझी म्हणजे एका मिशनरीची अधिकृत व्हिझिटर म्हणून नेमणूक झाली असताना या लोकांचा प्रतिसाद वेगळा असा काय असणार होता?
मात्र या संस्कृत कॉलेजातील पंडित माझ्याशी खूपच अगत्याने वागले आणि या अगत्याचा प्रतिसाद अगत्यानेच द्यायचा असेच माझे धोरण होते. ‘’ .
महात्मा जोतिबा फुले यांनी रेव्ह. जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत एक महार मुलगा पाठवला होत्या, त्या अस्पृश्य मुलाची हृदयदावक कहाणी मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे.
जोतिबा आणि जॉन मरे मिचेल यांच्या संदर्भातील ``चटईचाही विटाळ’ ही घटना धनंजय कीर यांनी महात्मा फुले चरित्रात पुढील शब्दांत सांगितली आहे:
``माझे स्नेही जोतीराव गोविंदराव फुले ही एक मोठी उल्लेखनीय अशी व्यक्ती होती. महारांचे हित व्हावे म्हणून ते अत्यंत परिश्रम घेत असत. महार हे हीन जातीचे.
जोतीरावांनी एकदा त्या जातीचा मुलगा आमच्याकडे पाठविला. त्याला इंग्रजीच्या प्रारंभीच्या वर्गात घालण्याइतका त्याचा देशी अभ्यास झालेला होता.
त्याला शाळेत प्रवेश देताच ब्राह्मण मुलांचे एक शिष्टमंडळ माझ्याकडे आले. त्या मुलांचे काळेभोर डोळे चकाकत होते आणि त्यांचे हावभाव मनातील हेतू प्रदर्शित करीत होते.
ते म्हणाले, "तुमच्या शाळेत महार मुले असल्यामुळे आम्ही शाळा सोडणार आहोत.'
मी म्हणालो, "अरे, मला वाटते एकच मुलगा आहे."
"होय. एक काय आणि दहा काय, सारखेच."
"मग काय त्या मुलाला हाकलून देऊ?"
"ते आम्हाला काय सांगता? आमचे म्हणणे एवढेच की, तो राहिला तर आम्ही जाणार!"
"तुमची इच्छा नसेल तर त्याला तुम्ही शिवू नका. तुम्ही वर्गातील हुशार मुले आहात, तुमचा क्रमांक नेहमी वरच असणार, तो वेगळ्या बाकावर बसतो.'
"ते खरे, परंतु चटई जमिनीवर असते ना? तिचा विटाळ आम्हांस होतो. आता सर्वांना विटाळ झाला आहे. आता घरी जेवणापूर्वी स्नान करून हा विटाळ घालविला पाहिजे."
"मी ती चटई काढून टाकावी अशी तुमची इच्छा आहे का ?"
"आम्ही वर्गातच नसतो तर बरे झाले असते."
"ठीक तर. काही झाले तरी मी त्या मुलाला वर्गाबाहेर हाकलून देऊ शकत नाही."
मी अगदी गोंधळून गेलो. एक तर ब्राह्मण मुलांना हाकलून देण्याची माझी इच्छा नव्हती आणि माझ्या सदसदविवेकबुद्धीप्रमाणे मी त्या महार मुलालाही शाळेतून बाहेर काढू शकत नव्हतो.
मी म्हणालो, "उद्यापर्यंत थांबा. वर्गांची उद्या फेररचना करू आणि तशातही तुम्ही आता वरच्या वर्गात उत्तीर्ण होऊन जाणार."
हा ना करता ब्राह्मण मुले दुर्मुखलेल्या चेहेऱ्यांनी निघून गेली.
तो महार मुलगा शाळेत फिरून आलाच नाही.
पाण्याच्या बाहेर माशाची जशी स्थिती होते तशीच त्याची हया शाळेत झाली. इतर उच्चवर्णीय व मध्यमवर्गीय मुलगे या बाबतीत अचल राहिले. ’’
जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्रातली दुसरी एक घटना धनंजय कीर यांनी आपल्या जोतिबा फुले यांच्या चरित्रात सांगितली आहे. कीर यांनी लिहिले आहे :
``कनिष्ठ वर्गाच्या उद्धाराविषयी उदासीनवृत्ती दिसून येत होती, तरी त्या वर्गातील काही मुलांनी त्या काळी शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांना ब्राह्मणांनी अत्यंत निर्दयपणे वागवून त्यांचा छळ केला.. रेव्हरंड आदम व्हाईट यांनी एकदा पुण्याजवळील सरकारी शाळेला भेट दिली.
त्या शाळेतील ब्राह्मण पंतोजीजवळ एक वेताची छडी होती. तिचा उपयोग ते पंतोजी अधूनमधून चांगलाच करीत.
आदम व्हाईट यांनी त्या ब्राह्मण पंतोजीला विचारले की, 'ही ढेकळं तुमच्याजवळ कशाकरिता ठेवली आहेत?"
पंतोजी उत्तरले, "स्पृश्य मुलांच्याबाबतीत मी छडी वापरतो. जर मी छडीने महार मुलास मारले तर तो अस्पृश्य असल्यामुळे काठीबरोबर विटाळ येईल आणि माझे सर्व शरीर विटाळेल. म्हणून जेव्हा महार मुलगा मूर्खपणाने वागतो तेव्हा मी एक ढेकूळ घेतो आणि त्याच्याकडे फेकतो. जर चुकलं तर दुसरं मारतो."
मरे मिचेल १८६३ साली कोलकात्याला अलेक्झांडर डफ यांच्याबरोबर मिशनकार्य करण्यासाठी गेले होते. आता खूप वर्षानंतर मरे मिचेल यांना आपली मनिषा पूर्ण करण्याची संधी मिळाली होती.
भारतातील म्हणजे मुंबई, पुणे आणि नंतर कोलकाता येथील आपल्या मिशनकार्यांची समाप्ती करुन जॉन मरे मिचेल आपल्या पत्नीसह मायदेशी स्कॉटलंडला परतले. त्यानंतरसुद्धा भारतातील अनेक व्यक्तींशी आणि जोतिबा फुले यांच्याशी त्यांनी संपर्क ठेवला होता.
आपल्या आयुष्याच्या अखेरीस जोतिबा अर्धांगवायुने बिछान्याला खिळले तेव्हाही मरे मिचेल यांनी त्यांना स्कॉटलंडहून पत्र लिहिले होते.
जोतिबा, जेम्स मिचेल आणि मरे मिचेल या तिघांचेही स्नेही असलेल्या बाबा पद्मनजी यांनी जोतिबांवर लिहिलेल्या मृत्युलेखात जोतीरावांचे जेम्स मिचेल आणि मरे मिचेल यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाविषयी पुढील शब्दांत लिहिले आहे :
``त्यास (जोतिबा फुले यांना) ख्रिस्ती धर्माविषयी पुष्कळ ज्ञान होते, ते त्यास त्यांचे जुने मित्र रे. जेम्स मिचेल व डॉ.मरे मिचेल व त्यांची पत्नी हयांपासून प्राप्त झाले होते. डॉ.मिचेलसाहेब हयांनी तर थोडया महिन्यामागे स्कॉटलंडांतून त्यांस पत्र पाठवून त्यात त्यांच्या आत्म्याच्या कल्याणाची कळकळ दर्शविली होती. ‘’
रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांना ८९ वर्षे इतके दीर्घायुष्य लाभले. मायदेशी परतल्यावरही त्यांनी भारताविषयी पुस्तके लिहिणे चालू ठेवले.
एका पुस्तकाच्या अखेरीस ताजा कलम म्हणून काही शब्द..
``ताजा कलम''
या पुस्तकात वर्णन केलेल्या लोकांपैकी हारमदजी पेस्तनजी आणि डॉ नारायण शेषाद्री यांचे त्यांच्या श्रद्धापूर्वक परिश्रमानंतर निधन झाले आहे. सन १८३९ साली ज्यांचा बाप्तिस्मा झाला होता ते धनजीभाई नौरोजी ते आजही हयात असून ज्येष्ठ मिशनरींमध्ये त्यांच्या समावेश होतो, सगळीकडे त्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली जात असते.
बाबा पद्मनजी आज खूप वयोवृद्ध झालेले असले तरी त्यांची लेखणी आजही थकलेली नाही. मराठी बायबलच्या सुधारित आवृती आणण्यासाठी ते कार्य करत आहेत.
आमच्या शाळेचे दुसरे एक विद्यार्थी गणपतराव आर नवलकर यांनी भरपूर आणि उत्तम साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेले मराठीचे व्याकरण खूप विस्तृत स्वरूपाचे आणि चांगल्या दर्जाचे आहे.
माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तींचे निधन होऊन मी मात्र अजूनही हयात आहे याबद्दल कधीकधी मला आश्चर्य वाटते. उदाहरणार्थ, गार्डनर, स्टोथर्ट आणि स्मॉल हे खूपच आदरणीय मिशनरी होते.
पुण्यात मी दुसऱ्यांदा राहायला आलो तेव्हा श्रीयुत गार्डनर हे खूप जवळच्या नात्याचे माझे सहकारी होते.''
एडिनबर्ग, स्कॉटलंड १८९९
^^^^
Camil Parkhe,