विश्रामबागवाडा
पुण्यात विश्रामबागवाडा येथे १८२१ साली संस्कृत (हिंदु) कॉलेज स्थापन झाले तेव्हा पुढील अनेक वर्षे ते केवळ ब्राह्मण लोकांसाठीच होते.
या कॉलेजातील शिक्षक आणि विद्यार्थीदेखील फक्त ब्राह्मणच असतील असा एक नियमच होता.
याचे कारण म्हणजे पुण्यातील पेशवाई नुकतीच - तीन वर्षांपूर्वीच - संपली होती आणि उच्च शिक्षण समाजातील सर्व घटकांना खुले करुन शहरात बहुसंख्य असलेल्या ब्राह्मण समाजाचा राग ओढवून घेण्याची ईस्ट इंडिया कंपनी सरकारची मुळीच इच्छा नव्हती.
त्यावेळी भारतातील विविध प्रांतांत ईस्ट इंडिया कंपनीचा सत्तेचा अंमल हळूहळू वाढत होता. असे असले तरी इथल्या समाजातील सामाजिक चालीरीतींमध्ये ढवळाढवळ करण्याचे कंपनी सरकारने हेतुपुरस्पर टाळले होते.
या देशात आधुनिक शिक्षण पद्धत आणण्यामागे कंपनी सरकारचे विशिष्ट हेतू आणि धोरण होते.
जोतिबा फुले यांच्या काळात स्कॉटिश मिशनरी जॉन मरे मिचेल हे मुंबई-पुण्यात कार्यरत होते. मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' हे त्यांचे आत्मचरित्र १८९८ साली स्कॉटलंडहून प्रकाशित केले.
या आत्मचरित्रात एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाजजीवनाचे, विविध घटनांचे चित्रण केले आहे.
ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याच्या हेतूने ब्रिटिश भारतात आलेल्या या मिशनरीने मायदेशी स्कॉटलंडला परतल्यानंतर हे पुस्तक लिहून पाश्चात्य जगताला संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांची ओळख करून दिली, त्याशिवाय देहू, आळंदी, पंढरपूर आणि जेजुरी या तीर्थक्षेत्रांविषयी लिहिले.
संत तुकारामांविषयी तर रेव्हरंड मरे मिचेल यांनी खूपच कौतुकास्पद लिहिले आहे.
``स्कॉटलंडमध्ये (रॉबर्ट ) बर्न्स इतका लोकप्रिय नसेल जितके तुकाराम ( ते स्वतःला तुका असेच संबोधतात) महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत,'' असे त्यांनी या आत्मचरित्रात लिहिले आहे.
हे जॉन मरे मिचेल तर जोतिबा फुले यांचे वैचारीक मार्गदर्शकसुद्धा होते. जोतिबांविषयी आणि पुण्यातील अनेक नामवंतांविषयी त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे.
विशेष म्हणजे संस्कृत कॉलेजचे प्रमुख मेजर थॉमस कँडी रजा घेऊन युरोपला परतले होते तेव्हा अल्पकाळासाठी जॉन मरे मिचेल संस्कृत कॉलेजचे प्राचार्य (व्हिझिटर) आणि मराठी-संस्कृत विभागाचे प्रमुख होते.
मरे मिचेल यांच्या शाळेत शिकण्यासाठी जोतिबांनी एका महार मुलाला पाठवले होते, त्याची हृदयद्रावक शोकांतिका `चटईचा विटाळ' मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात दिली आहे. धनंजय किर यांनी महात्मा फुले चरित्रात ही घटना सांगितली आहे.
जॉन मरे मिचेल यांनी पुण्यातील संस्कृत कॉलेजच्या ( आजचे डेक्कन कॉलेज ) जन्माची कहाणी पुढील शब्दांत सांगितली आहे:
``भारतात दिवाणी आणि फौजदारी न्यायालये चालवण्यासाठी भारतातील हिंदु आणि मुस्लीम कायदे माहिती असणे आवश्यक असल्याने गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने कोलकात्यात १७८२ला मुस्लीम कॉलेज आणि वाराणशी येथे १७९१ला संस्कृत कॉलेज सुरु केले.
पुण्यात विश्रामबागवाड्यात १८२१ साली संस्कृत कॉलेज सुरु झाले तेव्हा वाराणशी कॉलेजप्रमाणे हेसुद्धा केवळ ब्राह्मण लोकांसाठीच होते. ’’
काही काळानंतर मात्र ही परिस्थिती बदलली.
संस्कृत आणि मराठी भाषा तज्ज्ञ मेजर थॉमस कँडी यांची १८३७ साली संस्कृत कॉलेजचे प्राचार्य म्हणून नेमणूक झाली आणि वर्षभरातच या कॉलेजात समाजाच्या सर्व जातीधर्माच्या लोकांना शिक्षण खुले करण्याचा निर्णय झाला.
या निर्णयाने अपेक्षेप्रमाणे हाहाकार उडाला. या निर्णयाचा सर्वांत मोठा फ़टका आणि रोष प्राचार्य थॉमस कँडी यांनाच सोसावा लागला.
इंग्लंडमध्ये १३ डिसेंबर १८०४ रोजी जन्म झालेल्या थॉमस कँडी यांची ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात नेमणूक झाली आणि त्यानंतर भारतात त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्य केले.
मराठी भाषातज्ज्ञ म्हणून नाव कमावलेल्या थॉमस कँडी तयार केलेला इंग्रजी मराठी शब्दकोश आणि मराठी भाषेतील शुद्धलेखनाचे नियम यामुळे त्यांचे योगदान विशेष मोलाचे ठरते.
मराठी भाषेत इंग्रजीच्या धर्तीवर विरामचिन्हे रुढ करण्याचे श्रेय कँडी यांना दिले जाते
थॉमस कँडी यांचे `विरामचिन्हांची परिभाषा' हे मराठी भाषेतील हे शुद्धलेखनावरील १६ पानांचे पुस्तक सन १८५० मध्ये प्रकाशित झाले होते.
कँडी यांचे महाबळेश्वर येथे २६ फेब्रुवारी १८७७ रोजी निधन झाले. आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ पासून थॉमस कँडी यांचे १५० वे स्मृतीवर्ष सुरु होत आहे
विश्रामबागवाडा येथील संस्कृत कॉलेजात प्राचार्य थॉमस कँडी आणि कॉलेजातील ब्राह्मण शिक्षकवर्ग यांच्यात सोवळ्याओवळ्याच्या प्रश्नावर अनेक चकमकी उडाल्या.
नारायण विष्णू जोशी यांनी लिहिलेल्या `पुणे शहरचे वर्णन' (प्रकाशन १८६८ साल) या पुस्तकात याबाबत विस्तृत माहिती दिली आहे :
आपल्या या छोटेखानी पुस्तकात नारायण विष्णू जोशी लिहितात:
``मेहरबान मिस्तर चापलेन साहेब चीफ कमिशनर (मुख्य कारभारी ) यांस असे वाटले की काही तरी पुण्यातील लोकांस विद्याधन द्यावे म्हणून त्यांनी सरकारांत असे लिहिले की "हिंदूच्या विद्येचे जे उपयोगी भाग आहेत चांगले वृद्धिंगत करण्याकरिता एक विद्यालय घालावे. त्यास पैसे दक्षिणेसाठी जे ५००,००० रुपये आहेत. त्यांपैकी वीस हजार रुपये निराळे काढून विद्या खात्याकडे द्यावे. "
हे मंजूर होऊन आल्यावर सन १८२१ म्हणजे शा. शके १७४३ येथे पाठशाळा स्थापिली. त्यात न्यायशास्त्र, वेद ऋग्वेद व यजुर्वेद, धर्म शास्त्र व्याकरण, वैद्य, अलंकार इत्यादि विषय शिकविण्याकरितां गुरु व उपगुरु नेमले.
शंभर विद्यार्थी जमवून शाळा वाडा विश्रामबाग येथे स्थापित केली. त्यावर मुक्तसर न्यायशास्त्राचे शाळेचे गुरु रा. राघवाचार्य यांस नेमले. व त्यांनी गुरुचे काम चालवून खेरीज सर्वांवर अधिकाराचें (मुक्तसरीचे) काम त्यांनीच करावे असे ठरविले.
पाठशाळेची देखरेख कमिशनर साहेबच काहीं दिवस पहात होते. पुढे काम कलेक्टर साहेबाकडे आले.तरी काम बरोबर चालेना म्हणून त्यावर एका निराळ्याच मनुष्याची योजना करावी, असे ठरवून सन १८३७ चे फेब्रुवारी महिन्यात मेजर कँडी साहेबाची योजना केली.
यावेळेपासून काम फार सुरळीत रीतीने चालले.
ह्या शाळेत गणपतीच्या उत्साहासही फार खर्च होत असे. कथा, चक्री (ब्राह्मणांचे म्हणणे), खेरीज रोषणाई सर्व मिळून दोनशे रुपये खर्च होता असे सांगतात. दिपवाळीत सर्व विद्यार्थ्यांस तेथे अभ्यंगस्नान, खेरीज फराळास करंज्या, लाडू, अनारसे, कोडबुळी इत्यादि मिळत असे.
असा पेशवाईथाट त्यावेळेस या पाठशाळेत चालला होता. काही विद्यार्थ्यास दरमाहा पगार मिळत असे.
या पाठशाळेवर ज्या (कॅंडी ) साहेबाची नेमणूक झाली होती त्यास वाड्यात येण्याची परवानगी नसे.
दरवाजाच्या बाहेरून एक रस्ता पुढले दिवाणखान्यात जातो त्या वाटेने त्याने येऊन त्या दरवाज्यावरील दिवाणखान्यात बसावे. कोणास साहेबाचा विटाळ झाला असता त्याने घरी जाऊन सचैल स्नान करून यावे.
असे सांगतात की एक वेळ साहेब वाड्यात गेला म्हणून उदकशांति केली.
याप्रमाणे पूर्वी या शाळेत सोवळ्याचे माहात्म्य होते.
पुढे साहेबास शिवल्याशिवाय अथवा वाड्यात येऊ दिल्याशिवाय गत्यंतर नाहीं असे पाहून वस्त्रांतर करू लागले. पुढे राजास विटाळ मुळीच नाही, साहेबाने वाड्यात यावे पण बैठकीवर मात्र येऊ नये असे शास्त्रार्थ काढले.
या वर सांगितलेल्या गोष्टी म्हणजे गणपतीचा उत्साह (उत्सव), दिपवाळीचा थाट, सोवळ्या ओवळ्याचा बेत इत्यादि गोष्टींवरून आताच्या सर्व लोकांस आश्चर्य वाटेल.
त्या वेळेस हे जे सरकाराने केले ते मोठे शहाणपणाचे काम होते. जर या वेळेस इंग्रज लोक शास्त्री पंडित यांच्या मताप्रमाणे न वागते तर त्यांस सुधारायास फार दुःखे सोसावी लागती. त्याअर्थी त्यांनी या गोष्टी या वेळेस सहन केल्या म्हणून आता आपण आनंदाचीं फळे खाऊन सुख भोगीत आहो.
या वेळेस दयाळू कॅंडी साहेबांस किती बरे दुःखे सोसावी लागली असतील व किती सहनशिलता धरावी लागली असेल.
शास्त्र्यांनी सांगितले की आपण बूट घालून आमचे जाजमावर येऊ नये, वाड्यात नाष्टा करू नये, तर त्यानी त्यांचे ऐकावे.
आता जे विद्येचे सुख पुण्यातील लोक भोगितात त्यांचे मूळ हे साहेबच आहेत. त्यांनीच लोकांस गुलवून गुलवून त्यांची वेडीं मते इतकी फिरविली की, जे शास्त्री कॅंडी साहेबास शिवले असता स्नान करीत, त्यांचेच वंशजांस त्यांच्या डोक्यांतील वेडी मते काढून महारास शास्त्रे शिकविण्यास लाविले.
एतदर्थ ब्राह्मणांनी व विशेषेकरून अन्य जातीच्या लोकांनी ह्या दयाळू प्रामाणिक साहेबाचे उपकार कधीही विसरू नयेत.
येवढंच नव्हे, तर त्यांची स्मारक मूर्त्ति करून पुण्यात प्रसिद्ध स्थली उभी करावी.‘’
संस्कृत कॉलेजात यावेळी निर्माण झालेल्या वादळाविषयी धनंजय कीर यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या चरित्रात पुढील शब्दांत लिहिले आहे :
`` चॅप्लिन नावाच्या इंग्रज आयुक्ताने स्थापन केलेल्या पुणे संस्कृत पाठशाळेत फक्त ब्राह्मणांनाच प्रवेश मिळे. इतर जातींच्या हिंदूंना तीत प्रवेश नसे. ती पाठशाळा निरुपयोगी आहे असे १८३८ साली ठरले.
बराच विचारविनिमय करून आणि ब्राह्मणांची संमती घेऊन, पुढे १८५१ साली तिचे रूपांतर पुणे महाविद्यालयात करून, ते महाविद्यालय सर्व हिंदूंना खुले करण्यात आले. त्यामुळे पुणे शहरातील ब्राह्मणांचा संताप अनावर झाला.
त्याविषयी लिहिताना ``ज्ञानोदयाने असे म्हटले आहे की, ``ब्राह्मण भूदेव हे शिक्षणाचे दरवाजे सर्वांना सारखे उघडे झाले आहेत असे पाहून अत्यंत नाखूष झाले आहेत’’.
पुण्यातील ब्राह्मण पंडित भीतीने आणि रागाने थरथरत होते. त्यांनी सरकारच्या या धोरणाला कसून विरोध करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केला.
ब्राह्मण शिक्षकांनी ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकविण्यास नकार दिला; कारण त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्याचा अधिकार नव्हता. ती पडली देवभाषा, पवित्र वेदाची. ती अब्राह्मणांच्या जिव्हांनी विटाळविण्यास त्यांचा विरोध होता.
सनातनी हिंदूंनी पुणे महाविद्यालयाच्या चालकांस धमकी दिल्यावर त्या महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांनी त्या प्रकरणासंबंधी विचार करण्यासाठी ब्राह्मण पंडितांना काही दिवस सवड दिली. त्यामुळे सोनार, प्रभू, आणि इतर ब्राह्मणेतर जातींतील विद्यार्थी ह्यांना ते स्वतःच संस्कृत शिकवू लागले.
ब्राह्मण पंडित मात्र ब्राह्मण विद्यार्थ्यांना शिकवीत असत. बहुतेक ब्राह्मण पंडितांनी ``;ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत ही पवित्र भाषा शिकविण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊ,’’ अशी सरकारला धमकी दिली.
त्यावर ``ज्ञानोदया’ने असे लिहिले की, या प्रश्नाचा निर्णय भारतातील भागांत केव्हाच होऊन गेला आहे. कलकत्ता महाविद्यालयात सर्व जातींच्या मुलांना प्रवेश मिळतो, असे सांगून ज्ञानोदयाने पुढे म्हटले की, ब्राह्मणांनी अशा विचित्र कल्पनेत रममाण होण्याचे दिवस आता गेले आहेत. सार्वजनिक पैशातून आपली स्वतंत्र शिक्षणव्यवस्था व्हावी, आपणच देवाचे मोठे लाडके आहोत, नव्हे भूदेव आहोत असे म्हणणे, अशा कल्पनेत त्यांनी दंग होण्याचे दिवस आता राहिले नाहीत.
जर त्यांनी स्वत:च्या खर्चाने अशा शाळा चालविल्या तर आपल्या इच्छेप्रमाणे आणि भावनेप्रमाणे वागण्यास अर्थातच ते मोकळे आहेत. परंतु सरकारने या पोकळ मानापमानाच्या कल्पनेचे लाड करण्यासाठी आपल्या उत्पन्नातून पैसे खर्च करावे हे अयोग्य आहे. सार्वजनिक संस्था या सर्व वर्गाना खुल्या असल्याच पाहिजेत. ’’
धनंजय कीर पुढे लिहितात: ``ब्राह्मणांच्या ह्या स्वार्थपरायण अन् असहिष्णू वृत्तीचा धिक्कार करून, मुंबईतील 'प्रभाकर' साप्ताहिकाने असे म्हटले की, 'पुण्यातील ब्राह्मण पंडितांचे हे वर्तन अयोग्य आणि मूर्खपणाचे आहे. मुंबईत शेकडो ब्राह्मण पंडित प्रभूच्या, सोनारांच्या आणि तसेच युरोपियनांच्या घरी संस्कृत शिकवितात व वेदपठणही करतात,
पुण्यातील ब्राह्मण पंडितांनी ऋग्वेदाची प्रत सुधारून देऊन ती इंग्लंडमध्ये छापण्याकरिता सरकारकडे पाठविली याची आठवण 'प्रभाकर' साप्ताहिकाने ब्राह्मणांना करून दिली.
शेवटी 'प्रभाकर'ने पुण्यातील ब्राह्मण पंडितांना असा इशारा दिला की, 'त्यांच्या जागा दुसऱ्या विद्वान पंडितांकडून भरल्या जातील आणि ते कमी पगारावर काम करण्यास तयार आहेत.''
या घडामोडींबाबत धनंजय कीर यांनी यावर शेवटी पुढील शब्दांत टिपण्णी केली आहे:
``गंमत कशी आहे पाहा. याच सनातनी ब्राह्मण पंडितांनी गोमांस खाणाऱ्या मेजर थॉमस कँडींच्या हाताखाली संस्कृत शिकविण्यासाठी नोकरी धरली.
परंतु आपल्या धर्मबंधूंना संस्कृत शिकविले, तर धर्मच बुडेल अशी त्यांची समजूत होती.
त्यांच्या अडाणी समजुतीमुळे मेजर कँडींदेखील जेरीस आले. मेजर कँडीं हे परम दयाळू आणि अत्यंत शांत वृत्तीचे अधिकारी होते. परंतु त्याचा अर्थ ते मूर्ख किंवा अर्धवट आहेत, असा हे शहाणे करीत असत.’’
Camil Parkhe
No comments:
Post a Comment