Did you like the article?

Showing posts with label Haregaon. Show all posts
Showing posts with label Haregaon. Show all posts

Saturday, September 16, 2023

हरेगावचे स्थान

 महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही. हरेगाव हल्लीच्या हमरस्त्यावर नाही, मात्र याच हरेगावामुळे या परिसरात हमरस्ते आणि रेल्वे स्टेशने तयार झाले, औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला आणि आसपास श्रीरामपूरसारखे त्याकाळात अस्तित्वात नसलेले शहर निर्माण झाले. ही बाबसुद्धा लोकांना माहित नसणार

अहमदनगर जिल्ह्यातच आणि श्रीरामपूरजवळ असलेले शिर्डी हे स्थळ जगाच्या नकाशावर आपली जागा राखून आहे. मात्र शिर्डी हे नावारुपाला आले ते अलीकडच्या काळात, म्हणजे सत्तरच्या दशकात.
त्याकाळात श्रीरामपूरहून मी आणि माझा एक मित्र सायकलने शिर्डीला जायचो, तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मुले आणि इतर भाविक लोक थेट साईबाबांच्या मूर्तीसमोर बसायचो. देवदर्शन झाल्यावर काही क्षण मंदिरात किंवा पायऱ्यांवर स्वस्थ बसायचे असते, हे मी त्यावेळी शिकलो. आजूबाजूला भिंतीही नव्हत्या आणि अजिबात गर्दी नसायची यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. याउलट हरेगाव मात्र फार पूर्वीपासून एक गजबजलेले ठिकाण होते.
समाजमाध्यमावर ``आम्ही हरेगावकर'' या ग्रुपचा गेली काही वर्षे मी सभासद आहे. हरेगावशी माझे जवळचे नाते आहे.
गेल्या शतकात ब्रिटिश काळात भारतात ग्रामीण भागांत ज्या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाली, त्या स्थळांमध्ये हरेगावचे महत्त्वाचे स्थान आहे.
याचे कारण म्हणजे भारतातला पहिलावहिला खासगी साखर कारखाना हरेगावात ब्रिटिश जमान्यात सुरु झाला होता.
हरेगावात ब्रिटीश काळात सुरु झालेली बेलापूर शुगर फॅक्टरी जशी देशातला पहिला खासगी साखर कारखाना तसेच ब्रिटिशांनी भारतात १९२६ साली बांधलेले पहिले धरण अहमदनगर जिल्ह्यातच अकोले तालुक्यात भंडारदरा येथे आहे. आता ११ टीएमसी क्षमता असलेले हे भंडारदरा धरण जिल्ह्याची जीवनदायिनी आहे.
हरेगावच्या या बेलापूर शुगर फॅक्टरी कारखान्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सामाजिक, आर्थिक आणि साधनसुविधांबाबत मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आले.
आमच्या श्रीरामपूर शहराची तर वेगळीच कथा आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातलं एक प्रमुख आणि तालुक्याचं ठिकाण असलेल्या या शहराला शंभर वर्षांचाही इतिहास नाही. बिनवेशीचं आणि अठरापगड जतिजमातीच्या लोकांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराची मुळी निर्मिती झाली ती इथल्या रेल्वेस्थानकामुळं.
आणि हे रेल्वे स्थानक कशामुळे अस्तित्वात आले ? तर हरेगावातल्या या खासगी साखर कारख्यान्यामुळे!
हे ऐकून नव्या पिढीला आज गंमतच वाटणार आणि सद्याच्या श्रीरामपूर आणि हरेगावची परिस्थिती अगदी विरुद्ध टोकांत बदलली आहे.
आज खुद्द श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्यातले एक मोठे शहर आहे आणि हरेगावची ओळख श्रीरामपूर तालुक्यातले गाव अशी करून द्यावी लागते.
ब्रिटिश अमदानीत पुणे-दौंड- मनमाड या मार्गावर रेल्वे धावू लागली आणि श्रीरामपुरात रेल्वेचा एक थांबा सुरु झाला.
ब्रिटिश काळातच श्रीरामपूर इथून बारा-तेरा किलोमिटर अंतरावर असलेल्या हरेगाव येथे देशातला - अन आशिया खंडातलासुद्धा पहिला - साखर कारखाना सुरु झाला.
दी बेलापूर शुगर कंपनी या एका ब्रिटिश कंपनीनं ही शुगर फॅक्टरी १९२४ साली स्थापन केली. सर जोसेफ के हे या साखर कारखान्याचे संस्थापक. सन 1924 ते 1958 या मोठ्या कालखंडात दी बेलापूर शुगर कंपनी या साखर कारखान्याचे ते सलगतेने चेअरमनपद होते. स्वतंत्र भारतामधील म्हणजेच महाराष्ट्रातीलही साखर धंद्याचे जनक असे त्यांना संबोधले जाते.
तेव्हा जवळ असलेल्या बेलापूर गावाचं नाव या कारखान्याला दिलं, बेलापूर शुगर फँक्टरी. या कारखान्याच्या सोयीसाठी या ठिकाणी एक रेल्वे थांबा दिला गेला आणि या रेल्वे स्टेशनची स्थापना झाली.
या रेल्वे स्टेशनला स्थानिक ठिकाणचे नाव हवे म्हणून इथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलापूर गावाचे नाव देण्यात आलं.
श्रीरामपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या रेल्वे स्टेशनचे `बेलापूर स्थानक' हे नाव आजतागायत कायम आहे, आहे कि नाही गंमत ?
``बेलापूर- श्रीरामपूर के लिये यहा उतरीये'' असे फलक फलाटावर जागोजागी असायचे, ते वाचून गंमत वाटायची.
पुण्यामुंबईत, नाशिक, मराठवाड्यात कुठल्याही रेल्वे स्टेशनवर श्रीरामपूरचे तिकीट मागितले कि तिथला क्लार्क झटकन बेलापूरचे तिकीट देतो, महाराष्ट्राबाहेर मात्र असं चालणार नाही. श्रीरामपूर या नावाचं एक मोठे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमध्ये आहे.
तुम्ही महाराष्ट्राबाहेर भारताच्या एखाद्या कोपऱ्यांत असाल आणि तेथून श्रीरामपूर रेल्वे स्टेशनचे तिकीट मागितले तर अडचणीत येऊ शकाल. हा खुद्द माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग.
पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करुन मी रशिया-बल्गेरियातून भारतात परतलो आणि दिल्लीतून रेल्वे प्रवासात श्रीरामपूरचे तिकीट मागितले तेव्हा गडबडगोंधळ होऊन मला भलतेच तिकीट मिळाले होते.
श्रीरामपूरला (बेलापूरला !) `फॉरेन रिटर्न' मी ओव्हरकोट वगैरे खूप सामानासह उतरलो तेव्हा तिकीट चेकरने अडवल्यावर आणि माझे तिकीट पाहून त्याने मला थांबायला सांगितले.
नंतर कोपरगाव ते श्रीरामपूर असा विनातिकीट प्रवास केल्याबद्दल तिकीट रकमेच्या दुप्पट दंड (सहा रुपये) भरावा लागला होता ! ही घटना १९८६ची आहे.
पुण्यात खडकी येथे लष्कराचे मोठे ठाणे आहे, या विविध लष्करी संस्थांतून रणगाडे, तयार केलेला दारुगोळा, जिप्स वगैरे देशभर वाहून नेण्यासाठी रेल्वेचा वापर केले जातो. तर या वस्तू आणि वाहने मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी खडकी येथील या संस्थापर्यंत रेल्वेचे रूळ जोडले आहेत आणि या रुळांचा वापर केवळ लष्करी सेवांसाठी होतो,
अगदी त्याचप्रमाणे केवळ या साखर कारखान्यासाठी तब्बल तेरा किलोमीटर लांबीचे नॅरो गेज रूळ श्रीरामपूर म्हणजे बेलापूर रेल्वे स्टेशनपासून बेलापूर फॅक्टरीपर्यंत जोडण्यात आले होते.
या बेलापूर शुगर फँक्टरीत कच्चा माल असलेल्या ऊसाची आणि नंतर पक्क्या मालाची म्हणजे साखरेची वाहतूक करण्यासाठी या बेलापूर रेल्वे स्टेशन अन हरेगावचा साखर कारखाना यादरम्यान छोट्या रुळांवर - नॅरो गेजवर - इंजिन आणि मालगाडी धावू लागले. या मालगाडीला `लॅडीस' या नावाने ओळखले जात असे.
हरेगावला आणि श्रीरामपूरला मी असताना अनेकदा या ऊसाने भरलेल्या किंवा मोकळ्या लॅडीसने काही मीटर अंतराचा गार्ड्सची नजर चुकवून अनेकदा प्रवास केला आहे.
साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता.
त्याकाळात हरेगावात डी क्वार्टर्स वगैरे साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या बंगलेवजा कॉलनीज होत्या, आजूबाजूला एकवाडी ,दोनवाडी अशा अनेक वाड्या असायच्या, तेथून बैलगाडयांनी ऊस यायचा, दोन-तीन ट्रॉली असलेल्या खूप धिम्या गतीने चालणाऱ्याट्रॅक्टरमार्फतसुद्धा ऊस आणला जायचा, त्या ट्रॉलीमधून ऊस खेचण्यासाठी लहानमोठे सगळेजण प्रयत्न करायचे. हरेगाव असे नुसते गजबजलेले असायचे.
नंतर श्रीरामपूरजवळच दोन किलोमिटर अंतरावर टिळकनगर येथे खासगी मालकीची महाराष्ट्र शुगर फॅक्टरी सुरु झाली आणि या आधुनिक औद्योगिक क्रांतीमुळे श्रीरामपूर हा नवा परिसर बाळसे धरू लागला आणि थोड्याच अवधीत ते अहमदनगर शहराच्या खालोखालचे जिल्ह्यातले एक मोठे शहर बनले.
ऐंशीच्या दशकापर्यंत श्रीरामपूरजवळचे हे दोन्ही खासगी साखर कारखाने नव्याने उदयास आलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे बंद पडले. एकेकाळी बारा तालुके असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात तेरा साखर कारखाने होते.
बंद पडलेल्या या कारखान्यांवर प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या अवलंबून असणाऱ्या पूरक उद्योगांचे, आसपासच्या हजारो लोकांचे आणि कुटुंबांचे रोटी-रोजगार बुडाले आणि श्रीरामपूरच्या वाढत्या आर्थिक वैभवाला खीळ बसली.
शेजारचा अशोक सहकारी कारखाना याबाबतीत फार मदत करू शकला नाही. त्यामानाने शेजारीच असलेल्या लोणी-प्रवरानगर परिसराने -आधी विठ्ठलराव विखे पाटील आणि त्यानंतर बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय नेतृत्वाखाली खूप मोठी मजल मारली.
एकेकाळी बेलापूर शुगर फॅक्टरीसाठी राज्यभर प्रसिद्ध असलेले हरेगाव हल्ली तिथं भरणाऱ्या मतमाऊलीच्या म्हणजे मदर मेरीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे.
तिथल्या सेंट तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगमध्ये १९७०च्या दरम्यान मी दुसरी आणि तिसरीला असताना होतो. या सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी-रविवारी भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून पाच लाखाच्या आसपास ख्रिस्ती समाज आणि इतर लोक जमतात.
या हरेगावच्या मतमाऊली यात्रेबाबत मी विस्तृत लेख लिहिलेला आहे. माझ्या ``क्रुसाभोवतालचा मराठी समाज'' या पुस्तकात तो समाविष्ट केलेला आहे,
या यात्रेनिमित्त उद्या ऑगस्ट २९ रोजी हरेगावच्या गगनचुंबी देवळात मदर मेरी मतमाऊलीच्या दहा दिवसांच्या नोव्हेना प्रार्थना सुरु होतील. इथले संत तेरेजा चर्च उंचच-उंच मनोऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. इतका उंच चर्च मनोरा तुम्हाला पुण्या-मुंबईत किंवा वसईतसुद्धा सापडणार नाही.
हरेगावात प्रवेश केला कि सुरुवातीलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक पूर्णाकृती पुतळा दिसतो. बाबासाहेबांनी हरेगावला भेट दिली होती, या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आला आहे. मतमाऊलीच्या यात्रेला येणारे अनेक लोक भक्तिभावाने बाबासाहेबांच्याही पुतळ्याला हार घालत असतात.
मुंबईच्या बांद्रा येथील मौंट मेरी यात्रेला पर्याय म्हणून जर्मन जेसुईट फादर गेराल्ड बाडर यांनी हरेगावची मतमाऊली यात्रा सुरु केली. मतमाऊलीच्या यात्रेचे हे अमृतमहोत्सवी (७५) वर्ष आहे.
आता हरेगावला या यात्रेनिमित्त गेलं आणि तिथल्या रस्त्यांची आणि गल्लीबोळांची दुर्दशा पाहिली कि माझ्यासारख्या अनेकांना या गावाचे गत वैभव आठवते आणि मन अगदी खिन्न होतं.

Friday, September 1, 2023

हरेगाव प्रकाशझोतात

 सप्टेंबरच्या सुरुवातीला दरवर्षी श्रीरामपूरपाशी असलेले हरेगाव गजबजलेले आणि प्रकाशझोतात असते.

यावेळीसुद्धा आहे. नेहेमीपेक्षा अधिकच.
त्याबाबतचे कारण तसे फारसे अभिमानास्पद नाही.
``आम्ही हरेगावकर'' या समाज माध्यमवरच्या ग्रुपचा मी सभासद आहे.
इकडच्या दैनिकांतसुद्धा त्याबाबत बातम्या किंवा टिकाटिपण्णी होत नाहीये. परवा हरेगावातल्या त्या अमानुष घटनेतील फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना पुण्यात अटक केली तर पुण्यातल्या एका दैनिकात ही बातमी एका आतल्या पानावर संक्षिप्त वृत्तसदरात दोन वाक्यांत दिली होती.
वृत्तवाहिन्या याबाबत बातम्या देताहेत कि नाही हे मला माहित नाही.
आपल्याकडे कुठलीही अभिमानास्पद किंवा लांच्छनास्पद घटना घडली कि आधी त्या घटनेतील व्यक्तींचा आधी धर्म, नंतर जात, त्यानंतर पोटजात पहिली जाते आणि मग त्यानुसार लोक व्यक्त होत असतात.
याबाबतीत सुद्धा तसेच झाले.
प्रत्येक बाबतींत जातीचा आणि धर्माचा संबंध का जोडायचा, असे विचारणे साहजिकच आणि योग्य आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या आणि विशेषतः अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या कोपरगाव लोकसभा मतदारसंघातील सामाजिक परिस्थितीची माहिती असणे त्यासाठी आवश्यक असते.
याचे एक कारण आहे. इथले दलित एकाच कुटुंबातले, नात्यागोत्यातले आणि भाऊबंद असले तरी ते सगळे जण केवळ एकाच धर्मातले असतीलच असे नाही. त्यासाठी अगदी खोलात जाण्याची गरजही नाही.
यांपैकी कुणावरही अन्याय आणि अत्याचार झाला तर आंबेडकरवादी, डाव्या, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी संघटना, कार्यकर्ते आणि पक्ष आणि नेते लगेच धावून येतात, आपले पाठबळ पुरवतात.
यावेळीसुद्धा तसे होत आहे.
पिडीत तरुण दलित आहेत याबाबत अर्थातच शंका किंवा वाद नाही. आपले पोट भरण्यासाठी कोंबडी, शेळी किंवा कबुतर चोरण्याची वेळ वरच्या जातींतील मुलांवर कधीही येणार नाही, तसे त्यांचे संस्कारही नसतात, हे सर्वांनाच मान्य होईल.
दुसरे म्हणजे तसे झाले तरी भर वस्तीत वरच्या जातींतील तरुणांना असे अर्धनग्न अवस्थेत झाडाला टांगून मारण्याची टाप कुणाची कधीही होणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये याच मुद्दा मांडला आहे.
असे दुर्भाग्य केवळ खालच्या जातींतील - काही बाबतीत अल्पसंख्य समाजातील - लोकांसाठी आरक्षित असते.
पिडित व्यक्तींमध्ये दलित आहेत, तसेच मध्यम स्तरांतील जातींतील मात्र दलित पिडीतांसारखाच आर्थिक स्तर असलेले आहेत.
गुन्हयांमधील दोन मुख्य आरोपींसाठी काम करणारे आणि प्रत्यक्ष मारहाणीत सहभागी असणाऱे काही जण दलित आहेत.
आरोपींनी बनवलेल्या व्हिडीओमुळेच घटनेला वाचा फुटली.
हातपाय एकत्र बांधून झाडाला उलटे टांगून ठेवलेल्या त्या तरुणाचा फोटो काल मी पाहिला. कल्पना करा,एक तरुण पोर सकाळी दहापासून संध्याकाळी सहा lपर्यंत त्या टांगलेल्या अवस्थेत अधांतरी लटकून होते. फोटो पाहावत नाही, त्यामुळे इथे शेअर करण्याजोगा नाहीये. इंटरनेटवर चेहेरा झाकून उपलब्ध आहे.
घटनेचा व्हिडीओ नसता तर ही घटना उघडकीस आलीही नसती.
तर सद्या हरेगावला येणाऱ्या लोकांची रांग लागली आहे.
परवाच २९ तारखेला हरेगावच्या मतमाऊलीच्या आगामी यात्रेनिमित्त संत तेरेजा देवळासमोर नोव्हेना प्रार्थनानिमित्त ध्वजउभारणी झाली.
यावर्षी ८ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या या यात्रेचे ७५वे वर्ष आहे. नऊ दिवसांच्या नोव्हेना प्रार्थनेसाठी गावोगावचे भाविक दररोज या तिर्थक्षेत्री येत आहेत.
महाराष्ट्रातील विविध पक्षांतील नेतेमंडळी त्या दुदैवी घटनेसंदर्भात श्रीरामपूर आणि हरेगावला भेट देताहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी श्रीरामपूरला दवाखान्यात जखमी झालेल्या तरुणांना भेट दिली आहे.
माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी हरेगावला भेट दिली आहे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज हरेगावला जाणार आहेत तर प्रकाश आंबेडकर उद्या शुक्रवारी १ सप्टेंबरला तेथे जाणार आहेत अशा बातम्या आहेत.
मतमाऊली यात्रेवर यंदा त्या घटनेचे या चित्रात दिसते तसे गडद सावट असणार आहे.

Sunday, August 28, 2022

 

बैलपोळा - बैलपोळ्याच्या वेगळ्याच आठवणी

 

श्रीरामपूरला आमच्या आजूबाजूला साजरा होणाऱ्या अनेक सणांपैकी काही सण आमच्याही घरात साजरे व्हायचे, बैलपोळा हा त्यापैकी एक. 

 

या सणाच्या काही दिवस आधीच आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानापाशी असलेल्या मेनरोडला मातीपासून बनवलेल्या रंगीबेरंगी बैलांच्या जोड्या विक्रीला ठेवलेल्या असत. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी यापैकी मग पांढऱ्या, उंचच उंच खिलारी बैलांची एक जोडी घरात यायची. त्या बैलांची आमच्या घरात पूजा होत नसायची, मात्र दिवसभर मग या बैलजोड्यांशी माझा खेळ चालायचा. 

 

बैलपोळा संपल्यानंतर अनेक दिवस या बैलजोड्या भिंतीवरच्या फळ्यांवर असायच्या, झावळ्यांचा रविवारी (Palm Sunday) घरी आणलेल्या झावळ्या अनेक दिवस अल्तारापाशी असायच्या, अगदी तसेच. काही दिवसांनी शिंगे मोडलेली किंवा एखादा पाय मोडलेल्या बैलांच्या जोड्या मग आम्हा मुलांच्या नकळत अचानक गायब व्हायच्या.

शहरी वातावरणात वाढलेल्या आमचा बैलांशी वा इतर कुठल्याही प्राण्यांशी यायचा तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या घोगरगावातल्या आमच्या आजोळामुळे. तिथे शिनगारे आडनाव असलेल्या मामांकडे गेले म्हणजे या प्राणिमात्रांशी जवळून संबंध यायचा. 

 

आम्हाला आजोळी नेण्यासाठी घोगरगावाहून शांत्वन मामाची तरणीताठी मुलं शाहू किंवा मार्शल बैलगाडी घेऊन श्रीरामपुरला यायची. शांत्वनमामाकडे खिलाऱ्या बैलांच्या दोनतीन जोड्या होत्या. सर्वांत लहान असलेल्या शिवराममामाकडे लहानखुऱ्या बैलांची एकच जोडी होती. 

 

येताना बैलगाडीत दोन दिवस भरपूर पुरेल इतका ज्वारीचा कडबा आणलेला असायचा. रात्री मुक्काम केल्यावर सकाळी बाई आणि आम्ही काही पोरं बैलगाडीत बसून निघायचो. बरोबर दुपारच्या जेवण्यासाठी कपड्यांत बांधलेल्या भाकरी आणि बेसनाचे कोरडे पिठले असायचे, पिण्याच्या पाण्यासाठी फिरकीचा पितळी तांब्या बरोबर असायचा. 

 

भामाठाणला आलं कि मग बैलगाड्या गंगेच्या उथळ पाण्याच्या खोऱ्यात विसाव्यासाठी थांबायच्या. मामाची मुलं बैलांना पाणी दाखवून यायचे आणि मग बैलांसमोर कडबा टाकायचे. आम्ही पण मग जेवायच्या तयारीला लागायचो. नदीच्या पात्रातली वाळू थोडी वर काढली कि खाली निथळ पाणी लागायचे, तोंड धुवून ते थंड गार पाणी प्यायचे आणि भाकरी पिठल्यावर ताव मारायचा. 

 

शिवराम मामा, शाहू आणि मार्शल यांनी कधी आपल्या बैलांवर चाबूक मारल्याचं आठवत नाही. बैल सावकाश चालले कि त्यांच्या शेपट्या जरा पिरगळल्या कि बैलगाडीच्या प्रवासाची गती वाढायची. कधी हातातल्या काठीने बैलांना ढुशी दिली तरी काम भागायचं. 

 

एक गोष्ट मात्र आजही कित्येक वर्षानंतर स्पष्टपणें आठवते ती म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासातला त्या बैलजोडींचा प्रवास. घोगरगाव जवळ येत आहे याची जणू त्या मुक्या जनावरांना माहित असायचे अशा जलद गतीनं ते बैल चालत असायचे. 

 

घोगरगावात शांत्वनमामा, वामनमामा, शिवराममामा यांच्याकडे बैलांना वर्षभर काही ना काही काम असायचं. शिवराममामा आणि शाहू शेतावरच्या विहिरीवर चार बैल लावून मोट चालवायचे तेव्हा पाणी वर येताना मी आचंबून पाहत राहायचो. 

 

शेतात अनेक ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या थापलेल्या असायच्या, बैलांकडे गेले कि एखादा बैल शिंगं हलवून आगंतुक जवळकीबद्दल नापसंती व्यक्त करायचा. 

 

`हा मारका बैल हाय, फार जवळ जाऊ नकोस,'' असं कुणी म्हणायचं 

 

शेतकऱ्यांना शेतकामांसाठी बैलांची जास्त गरज भासायची, तशी गायांना फारशी मागणी नसायची. एखाददुसरी गाय मात्र प्रत्येकाकडं असायची. त्यामुळं जन्माला आलेलं गोऱ्ह शेतकरी स्वतःजवळ ठेवत, मात्र कालवड कुणाला तरी देत. 

 

एकदा अशीच एक कालवड कुठल्या तरी मामानं श्रीरामपूरला आमच्याकडं बाईला पाठवून दिली होती. कालवड विकायची नसते असा एक संकेत असायचा, जसं दुधाच्या घट्ट मलईतून लोणी काढून झाल्यावर निघालेलं ताकसुद्धा कधी विकायचं नसतं. 

 

श्रीरामपुरला बैलपोळ्याच्या दिवशी रेल्वेस्टेशन आणि बस स्टॅन्डपाशी असलेल्या मारुतीच्या देवळापाशी सजवलेले बैल आणले जात, तिथं मारुतीला वंदन केल्यानंतर गळ्यातल्या घुंगरांचा मोठ्याने आवाज करत या बैलजोड्या जात असत. 

 

हरेगाव येथे संत तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगात मी असताना बैलपोळ्याच्या वेगळ्याच आठवणी आहेत. 

 

बैलपोळ्याच्या संध्याकाळी हरेगावातले आणि आसपास असलेल्या एकवाडी, दोनवाडी अशा नावांच्या वाड्यांतले शेतकरी आपले सजवलेले बैल घेऊन तिथल्या उंच शिखर असलेल्या चर्चकडे येत. 

 

त्याकाळात म्हणजे सत्तरच्या दशकात हरेगावला फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वासरर, फादर फ्रान्सिस झेम्प, फादर बेन्झ अशी युरोपियन धर्मगुरु असत. देवळाच्या पायऱ्यांवर पांढरे झगे आणि गळ्याभोवती स्ट्रोल घालून हे फादर्स उभे राहत आणि भाविक शेतकरी आपल्या बैलांसह आल्यावर हातातले पवित्र पाणी बैलांवर आणि त्या शेतकऱ्यांवर शिंपडवून आशीर्वादित करत. 

 

बैलांना वर्षातून एकदा अशा प्रकारे सन्मानित करणे, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणे धर्मविरोधी किंवा पवित्र शास्त्रविरोधी म्हणजे Sacrilege आहे असं त्यावेळी कुणाला वाटलं नाही. आजही तसं वाटत नाही.

 

आज संध्याकाळी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत बैलपोळ्यानिमित्त बैलांच्या मिरवणुकी अनेक चर्चमध्ये येतील आणि हा सण साजरा होईल.

 

अहमदनगर आणि इतर काही भागात आजच्या श्रावणी अमावास्येला बैलपोळा साजरा करतात, पुण्यासारख्या काही भागात भाद्रपद महिन्यात बैलपोळा साजरा होतो.

 

बैलपोळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा

Tuesday, April 12, 2022

उपवासकाळ किंवा लेन्ट सिझन 

उपवासकाळ म्हटले कि हरेगावला आणि श्रीरामपूरला भर उन्हाळयात रणरणत्या उन्हात वाळू असलेल्या मैदानात गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारच्या भक्ती प्रार्थनेत सहभागी झाल्याची आठवण येते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगल्यानंतर दुपारी तीनला 'हे बापा, मी माझा आत्मा आता तुझ्या स्वाधीन करतो' असे म्हणून त्याने अखेरची मान टाकली, म्हणून भर उन्हात येशूच्या मरणप्राय वेदनांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेच्या प्रार्थना व्हायच्या.

या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवाराने किंवा अँश वेन्सडे या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आधल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हल सुरुवात होते आणि या उत्सवाची भस्म बुधवाराच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते. अर्थांत गोव्याला फादर होण्यासाठी जाईपर्यंत `कार्निव्हल’ हा शब्द माझ्या कधी कानांवरसुद्धा पडला नव्हता.
भारतीय धर्मग्रंथांत सात (सप्त) किंवा पाच (पंच) या संख्या वारंवार येतात, जसे सप्तर्षी, सप्त चिरंजीव, पंचकन्या, त्याप्रमाणे बायबलमध्ये चाळीस ही संख्या अनेकदा येते, जसे नोहाच्या कथेत महाप्रलयाच्या वेळी चाळीस दिवस आणि रात्री सतत पाऊस पडला, मोझेसने देवाबरोबर चाळीस दिवस घालवल्यानंतर तो देवाने दिलेल्या दहा आज्ञांच्या पाट्या घेऊन परतला. पृथ्वीतलावरचे आपले जीवितकार्य सुरु करण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस एकांतवासात उपवास केले, त्यानुसार ख्रिस्ती धर्मपरंपरेत हा चाळीस दिवसांचा उपवासकाळ आणि प्रायश्चितकाळ पाळला जातो.
माझे आईवडील वर्षभर दर शुक्रवारी आणि शनिवारी कडक उपास करत, यापैकी शुक्रवार हा येशू ख्रिस्ताच्या मरणाचा दिवस तर शनिवार हा मारियाबाईचा दिवस म्हणून उपास पाळला जायचा. शुक्रवारी रात्री उपास सोडला जायचा, शनिवारी फक्त दुपारीच जेवण करायचे, उपासाच्या या दोन्ही दिवशी पाणी आणि चहा चालायचा, इतर कुठलेही फराळाचे पदार्थ किंवा फळे वर्ज्य असायची. उपवासकाळात मग बुधवारच्या उपासाची भर पडायची. दादांना ९० वर्षांचे तर बाईला ८० वर्षांचे आयुष्य लाभले.
पूर्ण वर्षभर शुक्रवारी घरात नेहेमी होणारे बिफ कधीही खाल्ले जात नसे, त्याऐवजी ताजे मासे किंवा सुके बोंबील यासारखे कुठलेही सुके मासे चालायचे, उपवासकाळात शनिवारी आणि बुधवारी मात्र बिफचे कालवण वर्ज्य नसायचे यामागचे तार्किक कारण मला कधीच कळाले नाही.
उपवासकाळातील सुरुवातीचा भस्म बुधवार आणि शेवटचा उत्तम शुक्रवार यादिवशी उपास पाळणे करणे हे बंधनकारक होते, कॅथॉलिक चर्चच्या आजच्या रितीनियमांनुसार आजही हे दोन्ही दिवस उपास पाळणे बंधनकारक (ऑब्लिगेटरी) आहे. आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही.
हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात.
उपवासकाळात चर्चमध्ये दररोज मिस्सा साजरी करताना धर्मगुरु जांभळ्या रंगाचे झगे वापरतात, याकाळातल्या रविवारी आणि सणाच्या दिवशी मात्र सफेद वा इतर रंगांचे रंगाचे झगे परिधान केले जातात, ते यामुळेच. चर्चमध्ये धर्मगुरु कुठल्या रंगाचे झगे वापरतात, यावरुन त्या दिवसाचे, त्या मिस्साविधीचे महत्त्व लगेच समजते, उदाहरणार्थ लग्नासारख्या मंगलप्रसंगी लाल किंवा सफेद झगा वापरला जातो, तर अंत्यविधीसाठी सफेद, जांभळ्या किंवा काळ्या रंगाचे झगे असतात.
श्रीरामपूरला घरी असेपर्यंत या उपवासकाळात उपास करण्याची माझ्यावर कधी पाळी आली नाही, कारण सज्ञान होण्याआधीच संन्यासी धर्मगुरु होण्यासाठी मी जेसुईट संस्थेच्या गोव्यातल्या पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. त्यावेळी मला धक्काच बसला. कॅथोलिक चर्चमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या या जेसुईट धर्मगुरुंच्या संस्थेत उपासतापास वगैरेंसारख्या कर्मकांडाला मुळी थाराच नव्हता !
इथे फास्टिंग म्हणजे उपवास अगदी प्रतिमात्मक स्वरुपाचे आणि पूर्णतः व्यक्तिगत पातळीवर ऐच्छिक स्वरुपाचे होते. उदाहरणार्थ, पेनान्स म्हणजे आत्मक्लेश, यासाठी नाश्त्यासाठी नेहेमीप्रमाणे तीनचार पाव खाण्याऐवजी एकदोन पाव कमी खाणे किंवा एखादेवेळेस आवडत्या फळांचे किंवा आवडत्या खाद्यपदार्थाचे सेवन टाळणे. उपासाची आणि आत्मक्लेशाची अशी सोपी, सहजसुलभ व्याख्या मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.
दरदिवशी बेळगावहून पणजी मार्केटमध्ये ट्रँकांनी येणारे बिफ शुक्रवारी नसायचे, त्यामुळे गुरुवारीच शुक्रवारची बेगमी म्हणून दुप्पट बिफ आणून ठेवले जायचे.
माझ्या या धार्मिक जीवनाच्या कालखंडात माझे सुपिरियर असलेल्या कुठल्याही धर्मगुरुने वा परिचयातल्या कुठल्याही धर्मगुरुने लेन्ट सिझनमधील चाळीसच्या चाळीस दिवस उपास पाळला, किंवा मांसाहार वर्ज्य केला असे मला दिसले नाही. त्यांचा हा कित्ता मी त्यानंतर आजतागायत अगदी इमानेइतबारे गिरवला आहे.
त्यामुळे लेन्ट सिझनमध्ये इतरांसारखे कधीही मी उपासतापास केले नाहीत वा या काळात दाढी राखणे, मांसाहार वा पेयपान वर्ज्य करणे किंवा प्रतिकात्मक आत्मक्लेशाचे प्रयोग करणे अशा गोष्टी मी टाळल्या आहेत.
मात्र याबद्दल मला गिल्ट वाटत नाही अथवा मी काही धर्मविरोधी आहे असेही कुणालाही वाटत नाही. निदान याबाबतीत तरी ख्रिस्ती समाज तसा उदारमतवादी किंवा प्रागतिक आहे हे मानायलाच हवे.
मध्ययुगीन इन्क्विझिशनच्या काळात केवळ धर्मद्रोही, पाखंडी असल्याच्या संशयावरुन अनेकांना तुरुंगकोठडीत टाकण्यात आले, अनेकांना सार्वजनिकरित्या जिवंत जाळले गेले होते. त्यामानाने बदलत्या काळात भाविकांच्या कलानुसार आणि त्यांनी निदान धर्मपालन सोडू नये यासाठी कर्मकांड, धार्मिक रितीरिवाज, कौटुंबिक आणि सामाजिक नितीनियम याबाबत कॅथोलिक आणि इतरपंथीयांनी उदारतेची बरीच मजल गाठली आहे हे नक्की.
विवाहाबाबतचे आणि घटस्फोटांबाबतचे कॅथॉलिक चर्चचे जुने कर्मठ कॅनॉन लॉ किंवा धार्मिक नियम शिथिल करणे हे याबाबतीत एक उदाहरण म्हणून सांगता येईल.अगदी काही वर्षांपूर्वी कॅथॉलिक चर्चमध्ये घटस्फोट मंजूर होणे अशक्यप्राय समजले जायचे, आता तसे नाही .
या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली विक किंवा पवित्र सप्ताह किंवा आठवडा. पाम संडे किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर संडे किंवा ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते.
यावेळी १० एप्रिलला झावळ्यांचा रविवार साजरा होऊन या पवित्र सप्ताहाची सुरुवात झाली आहे.
ख्रिस्ती धर्मातील सर्व पंथीय भाविक पवित्र आठवडा भक्तिभावाने पाळतात, ख्रिसमस किंवा नाताळाइतकेच या पवित्र सप्ताहाला आणि विशेषतः गुड फ्रायडे आणि ईस्टरला आहे. ख्रिसमसची तारीख दरवर्षी २५ डिसेंबर हिच असली तरी भस्म बुधवार, गुड फ्रायडे आणि ईस्टर संडेच्या तारखा चर्चच्या कॅलेंडरनुसार मार्च-एप्रिल महिन्यांत थोड्या आगेमागे होत असतात. या प्रायश्चितकाळात शक्यतो लग्नकार्यासारखे कुठलेही मंगलकार्य हाती घेतले जात नाही.
येशू ख्रिस्ताने जेरुसलेम शहरात आपल्या शिष्यांसमवेत प्रवेश केला तेव्हा या नगरवासियांनी त्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले, यास्मरणार्थ झावळ्यांचा रविवार साजरा केला जातो. गाढवीच्या एका शिंगरावर बसून आलेल्या येशूचे लोकांनी त्या मार्गावर आपले कपडे टाकून, नारळाच्या झावळ्यांनी त्याला ओवाळीत 'होसान्ना, होसान्ना ! '' अशा जयजयकाराच्या घोषणा देत स्वागत केले.
विजयी राजाचे स्वागत करण्यासारखे या मिरवणुकीचे स्वरुप होते. येशू स्वतःहून आपल्या मृत्यूच्या मार्गावर प्रवेश करतो आहे याची त्या जयघोष करणाऱ्या लोकांनां कल्पनाही नव्हती. जयघोषाच्या मिरवणुकीतल्या या लोकांपैकी काही जण नंतर खांद्यावर क्रुस घेऊन जाणाऱ्या येशूची टवाळकी, निदानालस्ती करणाऱ्या लोकांमध्येही असणार होते. झावळ्यांचा रविवारी सर्व चर्चेसमध्ये नारळाच्या झावळ्या घेऊन, 'होसान्ना, होसान्ना ! हे गीत म्हणत प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते.
विशेष म्हणजे `होसान्ना' हा मूळ हिब्रू शब्द असलेली गायने जगभर अनेक भाषांत झावळ्यांच्या रविवारी चर्चमध्ये गायली जातात, जयजयकार किंवा जयघोष हे पर्यायी शब्द नंतर येतात. यावेळी झावळ्यांच्या रविवारी आमच्या चर्चमध्ये ,मधुर चालीत गायले गेलेले हे पुढील गीत येशूच्या त्या जल्लोषी मिरवणुकीचे चित्र उभे करते

जेरुसलेमी बाळे जमली,
प्रभुला गाणी गाऊ लागली
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

गाढवावरी येशू स्वार होई
मधू गाण्यांचा नाद होई
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

बालकांचे ते बोल बोबडे
रहिवाश्यांच्या कानी पडे
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

शहरवासी डोकावती
कान देऊन ऐकती
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

पंडितशास्त्री धावून येती
दडपशाही करु लागती
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

बालकांचे जरी तोंडे दाबिली
गाण्याची गती तरी नाही थांबली
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

पवित्र गुरुवारी येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेतले, लिओनार्दो दा व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या `द लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे. गोवन चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांनी भारतीय शैलीत काढलेले `द लास्ट सपर' हे चित्र इथे मी दिले आहे.
याच पवित्र गुरुवारी रात्री त्याच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या ज्युडासने येशूचे ते विश्वासघातकी चुंबन घेऊन त्याला शत्रूंच्या ताब्यात दिले आणि दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेला येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले.
मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे’, याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जाते. मात्र तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने.
चर्चमधल्या रविवारच्या मिस्साविधीचा काळ प्रवचनासह साधारणतः एक तासापुरता असतो , गुड फ्रायडेची प्रार्थना मात्र थोडी अधिक काळ चालते. या दिवसांच्या प्रार्थनाविधीत मला विशेष भावणारा भाग म्हणजे या दिवशी केल्या जाणाऱ्या श्रद्दावंतांच्या प्रार्थना. जगभर या दिवशी नेहेमीच्या इतर प्रार्थनांबरोबरच ज्यांच्या माध्यमातून देव मानवजातीसमोर प्रकटला त्या ज्यू लोकांसाठी, येशू ख्रिस्तावर श्रद्धा नसलेल्या लोकांसाठी आणि हो, देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणाऱ्या नास्तिक लोकांसाठीही प्रार्थना केली जाते.
लेन्ट सिझनची गुडफ्रायडेलाच सांगता होते. बहुसंख्य कॅथोलिक भाविक फक्त रविवारच्या आणि इतर सणांनिमित्त मिस्सासाठी चर्चमध्ये जात असले तरी चर्चमध्ये वर्षभर दररोज सकाळी वा संध्याकाळी मिस्सविधी होत असतोच, यास एकमेव अपवाद असतो गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे यामध्ये येणाऱ्या शनिवारचा..
गुड फ्रायडेच्या दिवशीसुद्धा पूर्ण मिस्साविधी नसतो. ख्रिस्ताच्या दुःखसहनाच्या स्मरणार्थ प्रार्थना झाल्यावर लगेच कम्युनियन दिले जाऊन विधी संपतो. नंतरच्या शनिवारी येशू कबरेत असल्याने चर्चमध्ये दिवसभऱ कुठलाही प्रार्थना वा विधी नसतो, शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भाविक जमतात ते येशूच्या पुनरुत्थानाचा सोहोळा साजरा करण्यासाठीच.
ईस्टरच्या पूर्वसंध्येला शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळीही ईस्टरनिमित्त मिस्साविधी होतो. येशूच्या पुनरुस्थानाचा हा सण आनंदाने साजरा केला जातो.
काळाच्या ओघात या प्रायश्चितकाळाचे स्वरूप बदलत गेले आहे. बायबलच्या जुन्या करारात प्रायश्चित करण्यासाठी लोक जाडेभरडे गोणपाटाचे कपडे घालत, उपवास करत आणि संपूर्ण अंगावर राख चोपडून शोक करत परमेश्वराची दयायाचना करत असत. त्यामुळे देवाला दया येऊन, त्याचा क्रोध कमी होऊन त्याच्या कृपादृष्टीचा प्रायश्चित करणाऱ्यांना लाभ होई. येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या मरणाने नव्या कराराची निर्मिती झाली, नव्या करारातील परमेश्वर क्रोधी नाही तर दयाळू आहे. त्यामुळे प्रायश्चित करण्याचे स्वरुपही आता खूपच सौम्य आणि केवळ प्रतिकात्मक राहिले आहे.
जगभर देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. युरोपात आणि इतर पाश्चिमात्य देशांत चर्चमधील भाविकांची रोडावणारी संख्या याबाबत बरेच काही सांगून जाते. त्यामुळे निदान चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपले नियम बदलण्याची, लवचिक होण्याची तयारी चर्चने दाखविली आहे हेही नसे थोडके.
त्यानुसार आता उपवासाचे आणि आत्मक्लेशाचे स्वरुप बदलले आहे, आता अँश वेन्सडे आणि गुड फ्रायडेचा अपवाद वगळता ते पूर्णतः ऐच्छिक आहे. गुड फ्रायडेच्या प्रार्थना आता भर दुपारी टळटळीत उन्हात न घेता उन्हे कललल्यानंतर संध्याकाळी होतात. हल्ली वाळूच्या मैदानात गुडघे टेकून आत्मक्लेश करत कुणी प्रार्थना करत नाहीत. उलट चर्चमध्ये भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त बाके असतात, मिस्साविधीत अधूनमधून उभे राहावे लागते, गुडघे ही टेकावे लागतात तेव्हा गुडघ्यांना रग लागू नये, म्हणून त्या लाकडी फळ्यांवर मऊमऊ रंगीत कुशन्ससुद्धा असतात !
हल्ली हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूला अनेक पंखे असलेल्या चर्चमध्ये या गालिच्यासारख्या मुलायम असणाऱ्या कुशन्सवर गुडघे टेकताना लहानपणी रणरणत्या उन्हात वाळूवर गुडघे टेकण्याचा प्रसंग अनेकदा आठवतो.

हा बदल त्या कुशन्ससारखाच सुखावह असतो.

Wednesday, September 9, 2020

इतर धर्मांतील, संस्कृतींतील जे मंगल, अनुकरणीय आहे, ते ख्रिस्ती धर्माने स्वीकारले आहे !

इतर धर्मांतील, संस्कृतींतील जे मंगल, अनुकरणीय आहे, ते ख्रिस्ती धर्माने स्वीकारले आहे !
पडघम - सांस्कृतिक

कामिल पारखे 


  • अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगाव येथल्या मतमाऊलीच्या यात्रा
  • Mon , 07 September 2020
  • पडघमसांस्कृतिकख्रिश्चनमराठी ख्रिस्ती समाजमतमाऊली

मराठमोळ्या ख्रिस्ती समाजाचे पारंपरिक आणि आधुनिक रूपांचे दर्शन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथल्या मतमाऊलीच्या यात्रेत दिसते. मदर मेरी किंवा मारियामातेच्या ८ सप्टेंबरच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या मतमाऊलीच्या यात्रेस संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला मराठी ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने जमतो. त्यानिमित्ताने मराठमोळ्या ख्रिस्ती समाजाच्या संस्कृतीविषयी...

“कामिल सर, तुम्ही चांगले मराठी बोलता... मला माहीतच नव्हते हे..” ‘सकाळ टाइम्स’च्या एका बातमीदार सहकारी महिलेने एके दिवशी मला म्हटले.

न्यूज डेस्कवरून माझी बातमीदार कक्षाकडे बदली झाली, तेव्हा काही दिवसांनंतर हे संभाषण झाले.
“अगं सुप्रिया, मला मराठी बोलता येते, कारण माझी ती मातृभाषाच आहे. मराठीत मी काही पुस्तकेही लिहिली  आहेत,” तेव्हा मी तिला सांगितले.

त्याआधी म्हणजे खूप वर्षांपूर्वी यापेक्षा अगदी उलट अनुभवाचा एक प्रसंग घडला होता. माझ्या लग्नाची पत्रिका पाहिल्यावर एक मित्र मला आश्चर्याने म्हणाला-  “चर्चमध्ये लग्न? का?” आता चकित होण्याची माझी पाळी होती. इतकी वर्षे सिगारेट ओढत तासनतास गप्पा मारणारे आम्ही दोघे मित्र असलो तरी मी ख्रिस्तीधर्मीय आहे, याचा त्याला थांगपत्ताच नव्हता.

‘कामिल पारखे’ असे आगळेवेगळे नाव असल्यामुळे असे खूप गंमतीदार प्रसंग घडतात. हो, कामिल पारखे हे नाव आजही जगात एकमेव आहे, हे सर्वज्ञानी गुगलनेच मला सांगितले आहे. त्यात वेगळी धार्मिक पार्श्वभूमी असल्याने अनेक माझ्याबाबतीत अनेक जण चुकीचे आडाखे बांधतात. एखादी व्यक्ती ख्रिस्ती असल्यामुळे मराठी बोलता येत नसावे असा निष्कारण गैरसमज असतो. याचे सर्वांत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे फादर फ्रान्सिस दिब्रिटो, हे उत्तम मराठी बोलतात, छान लिहितात याचे अनेकांना आजही आश्चर्य आणि कौतुक वाटते. पालघर जिल्ह्यातील वसईतला माणूस मराठी बोलणार यात आता आश्चर्याची काय बाब असणार आहे? याचे कारण म्हणजे त्यांचा ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरुपद!

खरे पाहिले तर साडेचारशे वर्षाची पोर्तुगीजांची राजवट असलेल्या गोव्याचा काही बाबतींतला म्हणजे पेहेराव आणि खाद्यसंस्कृती यांचा अपवाद वगळता भारतातील सर्वच प्रदेशांतील ख्रिस्ती समाजाने धर्मांतरानंतरही आपला मूळचा ऐतिहासिक सांकृतिक ठेवा कायम राखला आहे. ‘धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे’ असे मराठी पंचकवींतले एक असलेल्या रेव्हरंड नारायण वामन टिळकांनी असे विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच ठासून सांगितले होते. त्याच्याही तीन शतके आधीच रॉबर्टे डी नोबिली आणि इतर परदेशी मिशनरींनी हे तत्त्व केरळ आणि तामिळनाडूमध्ये अंमलात आणले होते.

१९६०च्या दरम्यान भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेमुळे यात बदल झाला आणि रोमन कॅथोलिक चर्चमध्ये सुधारणावादी वारे वाहू लागले. या परिषदेमुळे सांस्कृतिकीकरणाच्या प्रकियेस आणि आंतरधर्मीय सुसंवादास चालना मिळाली. महाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांत काम करणाऱ्या  जर्मन, फ्रेंच, अमेरिकन आणि इतर परदेशी मिशनरींनी मात्र दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेआधी कितीतरी दशके आधीच येथील नवख्रिस्ती समाजात सांस्कृतिकीकरणाचे (इन्क्लरेशन) धोरण राबवले होते. त्यामुळेच धोतर, सदरा आणि पागोटे घालणारा धोंडीबा यमाजी आढाव आणि नऊवारी पातळ, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, आणि पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे असणारी आणि नाकात जड अशी नथ घालणारी त्याची बायको धुरपदाबाई ख्रिस्ती म्हणून विनासंकोच  वावरू लागले. रेव्ह. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक ही नावे बदलली नाही. त्यांच्या पेहरावात, नावांत वा आडनावांत बदल करण्याची गरज ना त्यांना वाटली ना त्यांना बाप्तिस्मा देणाऱ्या त्या जर्मन, अमेरिकन व स्कॉटिश मिशनरींना. चित्रपट अभिनेते शाहू मोडक आणि क्रिकेटपटू विजय हजारे,  चंदू बोर्डे ही नावे ख्रिस्तीधर्मीयांची आहेच हे अनेकांना माहीतही नसते ! 

गोव्यात १९७८ च्या दरम्यान आई-वडील माझ्याकडे राहण्यास पणजीला आले होते, तेव्हा त्यांना घेऊन मी ओल्ड गोव्याच्या चर्चमध्ये गेलो होतो, तेव्हाचा प्रसंग मला आजही आठवतो. अंगात नऊवारी साडी, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगलसूत्र, पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे आणि मराठमोळी पद्धतीने डोक्यावरून घेतलेला पदर या पोशाखातील माझी आई, मार्थाबाई, जेव्हा बॉम जेजू बॅसिलिकात पवित्र कम्युनियनसाठी रांगेत उभी राहिली होती. त्या वेळी गोव्यातील फादर तिला हिंदू समजून कम्युनियन देण्याचे नाकारतील की, काय या शंकेने मी तिच्यापाठोपाठच रांगेत उभा राहिलो होतो. मात्र ख्रिस्ती धर्माच्या वैश्विक संस्कृतीची जाण असलेल्या त्या धर्मगुरुने डोळे मिटून हात जोडून उभे राहिलेल्या बाईच्या जिभेवर कम्युनियन ठेवले, तेव्हा अशी शंका घेतल्याबद्दल क्षणभर मलाच अपराध्यासारखे वाटले.

धर्मांतरानंतर दोनशे वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतर आजही अहमदनगर, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर आणि नाशिक वगैरे जिल्ह्यांतील खेड्यापाड्यांत हेच चित्र दिसते. जर्मन मिशनरी आर्चबिशप हेन्री डोरींग यांनी अहमदनगर जिल्ह्यात केंदळ या गावात सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू केलेले ‘निरोप्या’ हे मराठी मासिक पुण्यातील स्नेहसदन संस्थेतून आजही प्रसिद्ध होते. त्यातल्या वाढदिवसांच्या, लग्नांच्या वर्धापनदिनाच्या आणि चाळिसाव्याच्या छायाचित्रांसह असलेल्या जाहिराती पाहिल्या म्हणजे मी काय म्हणतो हे लक्षात येईल.

गोव्यात आणि वसईला मात्र धार्मिकदृष्ट्या कर्मठ असलेल्या पोर्तुगीजांनी धर्मांतरित लोकांना स्वतःची पोर्तुगीज (ख्रिस्ती नव्हे!) नावे आणि आडनावे लावण्याचा अट्टाहास धरला आणि त्यामुळे तेथील देशी ख्रिस्ती लोकांनाही फ्रान्सिस, कॅरोलिना, क्लारा, मिंगेल, कामिलो, रोनाल्ड, सॅव्हियो, मार्टिन अशी नावे आणि डिसोझा, रिबेलो, फर्नांडिस अशी पोर्तुगीज धर्तीची आडनावे मिळाली. विशेष म्हणजे यापैकी एकही ख्रिस्ती नाव वा आडनाव नाही. ख्रिस्ती नाव म्हणायची झाल्यास सायमन (शिमोन), मोझेस (मोशे). जोसेफ (योसेफ) पीटर (पेत्र), मेरी (मरियम), जेकब (याकोब), मायकल (मिखाईल) अशी बिबलिकल म्हणजे बायबलमधली नावे. पण ही नावे ज्यू आणि इस्लाम धर्मियांमध्येही असतात! त्यामुळे माझे कामिल हे नावसुद्धा खरे तर ‘ख्रिस्ती’ नाव नाही! आता भारतात ख्रिस्ती कुटुंबात मुलांना भारतीय संस्कृतीतली नावे देण्याची पद्धत सुरू झाली आहे.

पाश्चात्य संस्कृतीत डोक्यावरची हॅट काढून आदर व्यक्त करण्याची आणि प्रार्थनेच्या वेळी हॅट काढण्याची प्रथा आहे. भारतीय परंपरात मात्र असा शिष्टाचार पाळला जात नाही. मुस्लीम वा शीख धर्मस्थानांत याउलट म्हणजे बोडक्या डोक्याने प्रवेश करणे निषिद्ध मानले जाते. महाराष्ट्रातील वा संपूर्ण देशातीलच ख्रिस्ती समाजात भक्तीच्यावेळी पागोटे वा टोपी काढून ठेवण्याची परंपरा कशी सुरू झाली हे कळत नाही. लहानपणी हरेगावच्या मतमाऊलीच्या म्हणजे मारियामातेच्या यात्रेत लांबवरच्या खेड्यांतून थकून आलेले खेडूत आपले सामान सांभाळत टोपी वा पागोट्यासह देवळात बसकण मारत, तेव्हा त्यांच्याशेजारचे चारपाच जण तरी त्यांना त्यांची टोपी वा पागोटे काढून ठेवण्याची आठवण करून देत असे, हे मी अनेकदा पाहिले आहे. बाया मात्र डोक्यावरील आपला पदर देवळात नेहमीपेक्षा अधिक सावरून बसत असतात.

अर्थात सांस्कृतिकीकरणाची ही परंपरा ख्रिस्ती महामंडळाच्या दोन हजार वर्षांइतकीच जुनी आहे. इतर धर्मांतील, संस्कृतींतील जे मंगल, अनुकरणीय आहे, ते या धर्माने अगदी जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांत स्वीकारले आहे. नाताळ सणाच्या बाबतीतही असेच घडले. येशू ख्रिस्ताचा जन्म कोणत्या तारखेला झाला हे कुणालाच ठाऊक नाही. ख्रिस्ती धर्म रोमन साम्राज्यात पसरला तेव्हा त्या काळात रोमन लोक २५ डिसेंबरला सूर्यदेवाचा सण साजरा करत असत. म्हणून ख्रिस्ती लोक या दिवशी  ख्रिस्तजयंतीचा सोहळा साजरा करू लागले. आज जगभर ख्रिस्ती धर्माशी जोडल्या गेलेल्या अनेक प्रथा रीतीरिवाज या अशाच पद्धतीने वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेल्या आहेत. मग तो सांता क्लॉज असो वा नाताळाची भेट कार्डस, ख्रिस्तमस ट्री असो.

‘हिंदुस्थानातील पूर्ण राष्ट्रीय अशा सणांचा आपण (ख्रिस्ती लोकांनी) का त्याग करावा, हे मला समजत नाही’ असे ‘स्मृतिचित्रे’ लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळकांनी नागपुरात १९३३ साली भरलेल्या चौथ्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून  म्हटले होते. दसरा, पोळा, वर्षप्रतिपदा, संक्रांत  वगैरे धर्मभेदातीत ठेवता येण्यासारखे सण ख्रिस्ती लोकांना उचलण्यास काय हरकत आहे असे त्यांनी विचारले होते.

लक्ष्मीबाई  टिळकांच्या या मतात वावगे असे काही नाही. मला आठवते माझ्या लहानपणी आमच्या घरी दिवाळीच्या चारही दिवस अंगण शेणाने सारवून रांगोळी काढली जात असे. घरात दिवाळीशी संबधित कुठलेही धार्मिक रिवाज पाळले जात नसत, भाऊबीज मात्र इतर शेजारच्या घराप्रमाणेच थाटामाटात साजरी व्हायची. पुरणपोळीच्या जेवणानंतर आई आणि बहिणी या वेळी माझ्या वडिलांना आणि आम्हां सर्व भावांना ‘इडा पिडा टळो’ म्हणून ओवाळत असे. प्रत्येकास त्यावेळी कमरेस गुंडाळण्याची लाल गोंडा असलेला काळा कंबरदोटा मिळत असे. ताटात ओवाळणी म्हणून टाकण्यासाठी पाच-दहा पैशांचे नाणे आम्हांला आधीच मिळालेले असायचे.

दसऱ्याच्या आणि संक्रातीच्या दिवशी संध्याकाळी ख्रिस्ती घरातली आम्ही मुलेमुली शेजारीपाजारी सोने देण्यासाठी आणि तिळगूळ घेण्यासाठी जात असू, वडिलधाऱ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत असू. तेव्हा ही परंपरा आपल्या धर्मात नाही असे बाई-दादांनी आम्हांला कधीही ऐकवले नाही. माझी आई पूर्ण अशिक्षित आणि वडील दुसरीपर्यंत शिकलेले असतांनासुद्धा त्यांना हिंदू आणि ख्रिस्ती धर्मातील तत्त्वांची अशी सुंदर सांगड घालण्याचे कसे सुचले, याचे मला आश्चर्य वाटायचे. पण महाराष्ट्रातील सगळ्याच मराठी ख्रिस्ती कुटुंबांत असेच चालते, असे नंतर लक्षात आले. 

ग्रामीण भागातील ख्रिस्ती लोकांनी आपल्या नव्या धर्माची आपल्या पारंपरिक संस्कृतीशी सांगड घातली आहे. हरेगावात तेथील ख्रिस्ती शेतकरी बैल पोळा अगदी उत्साहाने साजरा करत असत. हरेगावच्या खासगी बेलापूर साखर कारखान्याभोवती वसलेल्या एकवाडी, दोनवाडी, आठवाडी वगैरे वाड्यांत राहणारे ख्रिस्ती शेतकरी आपल्या बैलांना रंगवून, शिंगांना बेंडे आणि गोंडे लावून, सजवून पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून त्यांना देवळात आणत असत. देवळाच्या पायऱ्यांवर  सफेद झग्यांत उभे राहिलेले युरोपियन फादर रिचर्ड वासरर, फादर हुबर्ट सिक्स्त व फादर बेंझ या बैलांच्या जोड्यांवर पवित्र पाणी शिंपडून त्यांना आशिर्वादीत करत. आर्शिवादानंतर बैलांचे मालक बैलांना घेऊन देवळाला प्रदक्षिणा घालत आणि आपल्या घरी परतत. संध्याकाळी उशीरापर्यंत बैल पोळ्याचा हा समारंभ आम्ही बोर्डिंगची मुले कुतूहलाने पाहत असू. गेल्या महिन्यात बैलपोळ्यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील माळीघोगरगाव येथल्या शंभर वर्षे जुन्या असलेल्या ख्रिस्तराजा मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी सजवलेले बैल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे फोटो फेसबुकवर पाहिले आणि या आठवणी ताज्या झाल्या.

माझी मुलगी आदिती तीन-चार वर्षांची असल्यापासून तिला मी पिंपरी-चिंचवडमधील आमच्या कॉलनीतल्या बिल्डिंगमधील शेजाऱ्यांकडे दसरा-संक्रांतीनिमित्त सोने वाटण्यासाठी आणि तिळगूळ घेण्यासाठी घेऊन जाऊ लागलो, तेव्हा सर्वांनाच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटले होते. आजही दरवर्षी मला राखी पौर्णिमेच्या वेळी माझ्या बहिणीकठून पोस्टाने राखी येत असते, आणि या राखी सणानंतर एक-दोन दिवस उशीरा मिळाल्या तरी मी त्या घालतोच. या वेळी उशिरापर्यंत पार्किंगमधल्या पोस्टाच्या बॉक्समध्ये राखी दिसली नाही, तेव्हा मन खट्टू झाले होते आणि नंतर लगेचच करोनामुळे चालू असलेल्या लॉकडाऊनची आठवण झाली.  

ख्रिस्ती झाल्यानंतही लक्ष्मीबाई टिळक अनेक वर्षे कुंकू लावत असत व त्याबद्दल रेव्ह. टिळकांनी किंवा कुठल्याही परदेशी मिशनरीने त्याबद्दल नापसंती व्यक्त केली नव्हती. महाराष्ट्रीय प्रोटेस्टंट पंथियांनी मात्र सांस्कृतिकीकरणाबाबत जरा सोवळे धोरण स्वीकारलेले दिसते. या पंथियांमध्ये बहुसंख्य स्त्रियांनी कुंकू लावण्याची प्रथा ख्रिस्ती धर्माशी विसंगत म्हणून बंद केली आहे. कॅथोलिकांमध्ये मात्र स्त्रियांनी सर्व सौभाग्यलेणी - कुंकू, मंगळसूत्र, मुरणी वा नथ, बांगड्या, पायांत चाळ, पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे वापरण्याची प्रथा चालू ठेवली आहे.

आमच्या ख्रिस्ती घरातील भावांच्या आणि बहिणींच्या लग्नांत सुपारी फोडणे, साखरपुडा, हळद लावणे, मुंडळ्या लावलेल्या नवरदेवाची वरात, वरातीतल्या पाहुण्यांसाठी पायघड्या अंथरणे, त्यांची पायधुणी, सोयऱ्याधोयऱ्यांचे आणि भाऊबंदांचे मानपान वगैरे सर्व कार्यक्रम झाले आहेत.

याचे कारण म्हणजे त्याबाबत तडजोड करायला लग्नातील दोन्ही बाजू तयार नसायच्या. परदेशी ख्रिस्ती मिशनरींनीसुद्धा या सांस्कृतिक परंपरांना विरोध केला नाही. त्यामुळेच पांढरीशुभ्र साडी किंवा पाश्चात्य पद्धतीचा वेडिंग गाऊन घातलेली नवरी आणि सुटाबुटांत असलेल्या नवरदेवाच्या सोन्याच्या अंगठ्यांना चर्चमध्ये फादर आशीर्वाद देऊन नंतर नवदाम्पत्य त्या अंगठ्या एकमेकांच्या बोटांत घालतात. धर्मगुरु याच वेळी सोन्याच्या मंगळसूत्रास आशीर्वाद देतात आणि त्यानंतरच नवरदेव नवरीला ते मंगळसूत्र घालतो. एकमेकाला सुखदुःखास साथ देण्याच्याही  आणाभाका या वेळी घेतल्या जातात. पाश्चात्य आणि देशी संस्कृतीचा असा सुंदर मिलाप भारतात खूप वर्षांपूर्वीच  घडला आहे.

याच्याही पुढे जाऊन मराठी ख्रिस्ती समाजाने ‘ओम’ या आपल्या जुन्या संस्कृतीतील पवित्र, मंगल शब्दांचाही ही स्वीकार केला आहे. ‘ओम भगवान, प्रभु ख्रिस्त भगवान’ हा नामजप ख्रिस्ती देवळांत अनेक वर्षांपासून पेटी-तबला वगैरे वाद्यांच्या साथीने गायला जात आहे. यात कुणालाच काही विशेष वाटत नाही.

महाराष्ट्रातील ख्रिस्ती माणसे तर या मातीत जन्मलेली आणि इथल्याच संस्कारांत वाढलेली. मग ती परकी का वाटावीत? तीही आपली बोली बोलणाऱ्यांना, असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अनुपमा उजगरे यांनी विचारला आहे. “अनुभव असा आहे की, प्रत्यक्षात दोन्ही समाजातील व्यक्तींचा एकमेकांशी संबंध आला की, गैरसमज दूर होतात आणि ‘अरे, वाटलंच नाही तुम्ही ख्रिस्ती असाल !’ असे आश्चर्योद्वारे ऐकू येतात,” असे उजगरे यांनी लिहिले आहे.

पुणे, कोल्हापूर, अहमदनगर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक वर्षे इंग्रजी शाळेचे (कॉन्व्हेंट!) प्राचार्य असलेले फादर नेल्सन मच्याडो एकदा बालगंधर्व रंगमंदिरात मराठी नाटक पहायला गेले, तेव्हा तेथे आलेल्या एका विद्यार्थ्याच्या आईने त्यांना नाटकाचे मराठीत भाषांतर करून देण्याची तयारी दर्शवली होती. तेव्हा ‘‘अहो मॅडम, मला मराठी चांगले कळते. मी वसंत कानेटकरांच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकात लाल्याची आणि इतरही खूप नाटकांत भूमिका केलेल्या आहेत’’ असे वसईचे सुपुत्र असलेल्या फादर मच्याडो यांनी त्यांना सांगितले होते. 

अशा या मराठमोळ्या ख्रिस्ती समाजाचे पारंपरिक आणि आधुनिक रूपांचे दर्शन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथल्या मतमाऊलीच्या यात्रेत दिसते. मदर मेरी किंवा मारियामातेच्या ८ सप्टेंबरच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या मतमाऊलीच्या यात्रेस संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला मराठी ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने जमतो. मतमाऊली हा शब्द मुंबईतील बांद्राच्या माऊंट मेरीचा अपभ्रंश! बांद्रा येथील प्रसिद्ध माऊंट मेरी बॅसिलिकायेथे माऊंट मेरीची नऊ दिवसांची नोव्हेना प्रार्थना वा यात्रा आठ सप्टेंबरपासून सुरू होते. तिथे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील बहुसांस्कृतिक आणि मिश्रभाषिक ख्रिस्ती भाविक येतात.

करोनाच्या पार्श्वभूमीवर हरेगाव आणि बांद्रा येथील धार्मिक उत्सवावर बंधने असली तरी या आठवड्यात ख्रिस्ती भाविकांचे या दोन्ही तीर्थक्षेत्रांकडे लक्ष लागून राहिले आहे.