Did you like the article?

Monday, June 28, 2021

‘सांन जॉव’ São João festival

                                                           


Angelo da Fonseca's 1967 masterpiece painting of St. John the Baptist

पावसाचं आगमन झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस गोव्यातील झरे-ओढे, विहिरी, तलाव आणि तळी पाण्यानं तुडुंब भरतात. सर्व परिसर हिरवाईनं नटतो. या काळात २४ जून रोजी गोव्यात ‘सांन जॉव’ हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. अनेक गावांत तरुण या दिवशी घुमट, गिटार आणि इतर वाद्यांच्या संगीतात धुंद होत ‘सांन जॉव’ अशी आरोळी ठोकत पाण्यात सूर मारून हा सण साजरा करतात.

‘सांन जॉव’ (São João) म्हणजे पोर्तुगीज आणि कोकणी भाषेत ‘सेंट जॉन’. St. John the Baptist... (संत जॉन बाप्तिस्ता) हा ‘बायबल’च्या ‘नव्या करारा’तील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. येशू ख्रिस्ताचा हा जवळचा नातेवाईक. येशूपेक्षा वयानं केवळ सहा महिन्यांनी मोठा. मात्र ‘देवाचा पुत्र असलेल्या येशू ख्रिस्तासाठी वाट तयार करण्यासाठी आपण आलो आहोत, अरण्यात ओरडणारी वाणी मी आहे’ असं सेंट जॉन द बॅप्टिस्टने स्वतःबाबत म्हटलं आहे. त्याने येशूचा जॉर्डन नदीत पाण्यानं बाप्तिस्मा केल्यानंतरच ‘सुताराचा मुलगा’ असलेला येशू आपलं खरंखुरं जिवितकार्य सुरू करतो.
त्याशिवाय सेंट जॉन द बॅप्टिस्ट हा ‘बायबल’च्या ‘नव्या करारा’तील अगदी सुरुवातीचा एक हुतात्मा. नव्या करारातील अगदी पहिले हुतात्मे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या बेथलेहेम येथील जन्माच्यावेळीच त्या परीसरात जन्मलेली इतर अनेक बाळे. आकाशात अचानक अवतरलेल्या ताऱ्याचा माग काढत आलेल्या पूर्वेकडच्या त्या तीन ज्ञानी राजांनी हेरोद राजाला सांगितले कि नुकत्याच जन्मलेल्या एका राजाचे देर्शन घेण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी ते आले आहेत.
आपल्या सिंहासनाला आव्हान देणारा कुणीतरी जन्माला आहे असे वाटून हेरोद राजा मग त्या परीसरात जन्मलेल्या सर्व बाळांची हत्या करण्याचा आदेश देतो. सुदैवाने मारिया आणि जोसेफ यांनी आपल्या येशू बाळासह तेथून पलायन केल्याने ते बाळ वाचते.
बायबलमधली हत्या झालेल्या निरपराध बाळांची ही कथा राजा कंसाच्या तुरुंगातील वसुदेव-देवकीच्या कृष्णाआधीच्या नऊ अपत्यांची आठवण करून देते.
नाताळाच्या २५ डिसेंबरच्या सणानंतर लगेचच म्हणजे २८ डिसेंबरला हत्या झालेल्या निष्पाप बाळांचा (The Holy Innocents) सण साजरा केला जातो.
हेरोदच्या हत्याकांडातून येशू वाचतो, मात्र जॉन द बॅप्टिस्ट नाही. पुढे अनेक वर्षांनंतर आपल्या मुलीच्या नृत्यकौशल्यावर खूष झालेला राजा हेरोद तिला ‘बक्षीस म्हणून काय हवं?’ असं भरलेल्या दरबारात विचारतो. राजकन्या आपल्या आईच्या सुचनेनुसार तुरुंगात खितपत पडलेल्या जॉन द बॅप्टिस्टच्या शिराचा नजराणा आपल्याला ताबडतोब तबकात घालून मिळावा, अशी मागणी करते. अनिच्छेनेच राजा हेरोद ती मागणी पूर्ण करतो.
सेंट जॉन द बॅप्टिस्ट आणि येशू ख्रिस्त आपापल्या आईंच्या उदरांत असताना त्या दोघींची भेट झाली आणि त्या वेळी झालेल्या एका घटनेशी संबंधित या उत्सवाची जन्मकथा आहे. गॅब्रिएल देवदूताने मारियेला भेट देऊन तिच्या पोटी देवपुत्र येशू जन्माला येणार आहे, असं सांगितलं.
त्यापूर्वी सहा महिने आधी याच देवदूताने मारियेची नातलग असलेल्या एलिझाबेथला भेटून तिच्या पोटी सेंट जॉन जन्माला येईल, असं सांगितलेलं असतं.
येशूचा जन्म अपौरुषेय म्हणजे पवित्र आत्म्याच्या संयोगानं झाला अशी श्रद्धा आहे. इस्लाम आणि ज्यू धर्मांप्रमाणेच ख्रिस्ती धर्मातही एकदेवतावाद (मोनोथिझम) असला तरी ख्रिस्ती धर्मात पिता, (येशू) पुत्र आणि पवित्र आत्मा असं एक त्रैक्य मानलं जातं.
‘बायबल’मध्ये मायकल, राफाएल आणि गॅब्रिएल हे तीन देवदूत वेगवेगळ्या प्रसंगांत प्रकट होतात. यापैकी गॅब्रिएल देवदूताचं मुख्य काम म्हणजे देवाचा निरोप मानवापर्यंत सोपवणं. मानवानं त्याबद्दल शंकाप्रदर्शन करायचं नसतं.
गॅब्रिएल देवदूताने झेकरायहाला ‘तुझी पत्नी एलिझाबेथ गर्भवती राहील’ असा निरोप दिला, तेव्हा त्याने देवदूतालाच उलट प्रश्न केला, ‘असं कसं घडेल? कारण मी तर वृद्ध आहे आणि माझ्या बायकोचंही वय झालं आहे.’ याबद्दल झेकरायहाला कडक शिक्षा मिळाली.
गॅब्रिएलने त्याला म्हटलं- ‘माझे शब्द यथाकाळी खरे ठरतील. परंतु तोपर्यंत तुझी वाचा जाईल आणि तू मुका होशील. कारण तू माझ्या वचनावर विश्वास ठेवला नाहीस.’
याउलट मारियेची वागणूक होती. गॅब्रिएल देवदूत मारियेला भेटला आणि म्हणाला- ‘तुझ्या पोटी पवित्र आत्म्याने संयोगाने देवपुत्र जन्मेल आणि त्याचे नाव येशू ठेव.’ असा निरोप देवदूताने सांगितला त्यावर मारियेने ‘जशी प्रभूची इच्छा’ म्हणून नम्रपणे मान तुकवली. म्हणून तर तिला ‘स्त्रीजातीमध्ये तू धन्य’ असा सन्मान मिळाला.
त्यानंतर मारिया तातडीनं आपल्या बहिणीला भेटायला निघते. त्या भेटतात, तो सेंट लुकच्या शुभवर्तमानातील प्रसंग फादर फ्रान्सिस दिब्रिटो-संकलित ‘सुबोध बायबल’ या ग्रंथात पुढील शब्दांत लिहिला आहे –
“त्या वेळी मारिया घाईघाईने ज्युडेयाच्या पहाडी प्रदेशातील एका गावात गेली. तिने झेकरायहाच्या घरी जाऊन एलिझाबेथला अभिवादन केले. मारियेचे अभिवादन ऐकताच एलिझाबेथच्या उदरातील बालकाने उसळी मारली आणि एलिझाबेथ पवित्र आत्म्याने भरून पावली. ती मोठ्या स्वरात म्हणाली, ‘स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या कुशीचे बालक! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्या पायरीवर चढावे, हा माझा किती मोठा सन्मान आहे! पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने आनंदाने उसळी मारली.’ ”
बायबलमधील उदरातील बालकाने आनंदाने उसळी मारण्याच्या प्रसंगानिमित्त याच प्रसंगानिमित्त सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या फेस्ताच्या म्हणजे जन्मदिनाच्या सणाच्या दिवशी खोलवर पाण्यात उडी मारुन गोव्यात हा `सांन जॉव' उत्सव साजरा केला जातो.
जूनअखेरीस गोव्यातील नदीओढे, तलाव, तळे आणि विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात. किरिस्तांव गोंयेंकारांनी आपल्या या निसर्गदत्त देणगीचा हा सण साजरा करण्यासाठी कल्पकतेनं वापर केला आहे.
गोव्यातल्या तुडुंब भरलेल्या विहिरी आणि तळ्यांवरुन आठवले. १९७०च्या दशकात बार्देस तालुक्यातील शिवोली इथल्या बामणवाडो येथे मित्र लेस्टर फर्नांडिस यांच्या घरी महाविद्यालयीन सुट्टीमध्ये काही दिवस राहिलो होतो. त्याच्या आजीने मासळी आणायला सांगितले, तिचा मुलगा म्हणजे लेस्टरचा मामा बाहेर पडला. मीही त्याच्याबरोबर निघालो. त्या वेळी घरामागच्या टेकडीजवळच्या शेतांपाशी असलेल्या तलावात आम्ही दोघं एक सुती कापड धरून जवळजवळ एक तास थांबलो.
वरून पाऊस कोसळत होता आणि तलाव भरून वाहत होता. त्या दिवशी फिश-करीसाठी आणि तळण्यासाठी पुरेसे मासे पकडल्यानंतरच आम्ही घरी परतलो. स्वतःच्या हातांनी पकडलेले मासे खाण्याचा आनंद काही औरच होता !


विहिरी हा गोव्यातल्या जुन्या घरांचा एक अविभाज्य भाग असतात. पणजीजवळच सान्त इनेझपाशी असलेल्या ताळगावात १९८०च्या दशकात मी राहात होतो. त्या घराच्या शेजारी वापरात असलेली विहीर होती. माझ्या भाटकाराच्या (घरमालकाच्या) त्या विहिरीचे पाणी आम्ही सर्व जण पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरायचो. (भाटकार म्हणजे शेतमालक आणि मुंडकार म्हणजे शेती कसणारा, हे खास गोमंतकातले विरुद्धअर्थी शब्द!) या काळात ताळगावच्या या विहिरी जवळ जवळ काठोकाठ भरलेल्या असत.
मला आठवते तेव्हा याकाळात ताळगावच्या या विहिरीत अगदी जमिनीच्या समांतर रेषेत पाणी असायचे ! बादली किंवा कळशी बांधलेला पोहोरा विहिरीत दोनतीन फूट खाली सोडला तरी ती बादली वा कळशी पाण्यात लगेचच बुडायची.
गावांत सगळीकडे विहिरी, ओढे, तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असताना आणि वरून पाऊस कोसळत असताना साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवाची मजा काही वेगळीच असते. उत्तर गोव्यात आणि विशेषतः बार्देस तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.
उत्तर गोव्यातल्या साळगाव, शिवोली वगैरे गावांत या उत्सवादरम्यान तरुण मुलांना ‘सांन जॉव’ असे ओरडत पाण्यात सूर मारताना मी पाहिले आहे. विविध पानेफुले यापासून तयार केलेले कॉपेल (मुकुट) डोक्याला लावून पाण्यात डूब मारली जाते. पारंपरिक संगीताची साथ असतेच.
समुद्रात डुंबणे आणि पोहोणे मला आवडत असले तरी विहिरीत मी कधीही उडी घेतलेली नाही. त्यामुळे या उत्सवात मी प्रेक्षक म्हणूनच सहभागी होत असतो. आजपावेतो तरी ‘सांन जॉव’ हा लोकांचा फेस्त राहिला आहे.
विशेष म्हणजे हा सण जगभरातील ख्रिस्तीविश्वात सगळीकडे चर्चमधील उपासनेत साजरा केला जात असला तरी केवळ गोव्यातच, कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि पोर्तुगीजांच्या राजकीय वसाहतीचा इतिहास असलेल्या गुजरातेजवळील दमण वगैरे परीसरात हा सण अशा प्रकारे साजरा होतो.
या दिवशी गोव्यात सर्वच चर्चमध्ये प्रार्थना होत असल्या तरी या उत्सवात कॅथोलिक चर्चचा कुठल्याही प्रकारचा सक्रिय सहभाग नसतो.
कार्निव्हल हासुद्धा ख्रिस्ती धर्मातील संकल्पनेशी आणि श्रद्धेशी संबंधित असलेला आणखी एक लोकप्रिय उत्सव आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत सुरू होणाऱ्या ‘ऍश वेन्सडे’ किंवा भस्म बुधवारापासून ख्रिस्ती धर्मातील चाळीस दिवसांचा ‘लेन्ट सिझन’ हा उपवासाचा काळ सुरू होतो. या भस्म बुधवाराच्या आधीच्या शनिवारी हा चार दिवसांचा कार्निव्हल फेस्टिव्हल गोव्यात, युरोपातील आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांत सुरू होतो.
अशाच प्रकारे ‘सांन जॉव’ हा उत्सवही अलीकडे गोव्याबाहेर काही ठिकाणी साजरा होऊ लागला आहे. विहिरी-तलावांत डूब मारून नाही तर ‘रेन डान्स’च्या शैलीवर पाण्याच्या कारंजात गाऊन-नाचून तो साजरा केला जातो.
या उत्सवाचे कार्निव्हलसारखे सुदैवाने मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झालेले नाही. गोव्यातील लोकसंस्कृतीचा तो एक भाग राहिला आहे आणि तो तसाच राहावा ही अपेक्षा. गेल्या वर्षाप्रमाणे याहीवर्षी या उत्साहावर करोना महामारीचं सावट, त्यामुळे अनेक बंधनंही होती.
गोव्याप्रमाणेच त्या काळी पोर्तुगिजांची वसाहत असलेल्या आणि गुजरातजवळील दमण येथे जन्म झालेले चित्रकार आणि व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा हे मूळचे दक्षिण गोव्यातील लुथाली या गावचे. मारिओ मिरांडा यांनी गोव्याची संस्कृती दर्शवणारी अनेक चित्रे रेखाटलेली आहेत. ‘सांन जॉव’ या सणाची वैशिष्ट्यं दाखवणारं त्यांचं एक सुंदर चित्र प्रसिद्ध आहे.


आपल्याकडे वर्षभराचं पंचाग असतं, तसं कॅथोलिक चर्चचं पूर्ण वर्षाचे (विविध संतांच्या सणांचं, आगमन, ख्रिस्तजन्मसोहळा आणि उपवासकाळ अशा विविध हंगामांचं) कॅलेंडर असते.
जगभरातील ख्रिस्ती समाजाप्रमाणेच जॉन हे महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजातीलसुद्धा एक सर्वसामान्य नाम आहे, जसे फ्रान्सिस, मारिया, एलिझाबेथ, गॅब्रिएल, फातिमा, बेन्यामीन, पौलस. इत्यादी. येशू हे नाव मात्र कधीही कुणाला दिले जात नाही.
ख्रिस्ती धर्मात नामकरणविधी या बाप्तिस्मा स्नानसंस्काराच्यावेळी होत असतो, त्यामुळेच बॅप्टीझम या विधीला ख्रिस्टनिंग समारंभ असेही म्हटले जाते. बाप्तिस्मा विधीचे पौराहित्य धर्मगुरु करत असल्यामुळेच बहुधा येशू हे अतिपवित्र समजले नाव इतर कुणालाही दिले जात नाही.
ख्रिस्ती धर्माच्या कॅलेंडरमध्ये वर्षभर दररोज कुणा न कुणा संतांचा सण असतो, जसे कि तीन डिसेंबर हा संत फ्रान्सिस झेव्हियरचा सण. या दिवशी कुणाचा जन्म झाला तर त्या अपत्याला फ्रान्सिस किंवा फ्रान्सिका ते नाव देण्याची पद्धत असायची. माझा जन्म १७ जुलैचा आणि हा संत कामिल्स याचा सण. म्हणून श्रीरामपूर पॅरिश (धर्मग्राम) चे जर्मन जेसुईट धर्मगुरु फादर आयवो मायर यांनी माझा बाप्तिस्मा करताना माझे नाव कामिल असे ठेवले.
तर जॉन हे माझ्या वडिलांचेही नाव. जून महिन्याअखेरीस ते `माझा सण जवळ आला’ असे ते म्हणत असत. इंदिरा गांधींचा आणि माझा जन्म एकाच सालचा, असेही ते म्हणत असत. दादांच्या जन्मदिवसाचा किंवा शालेय शिक्षणाचा कागदोपत्री कुठलाही पुरावा नसल्याने त्यांचे हे म्हणणे आम्ही हसण्यावारी नेत असू.
पंधरा वर्षांपूर्वी दादांचे नव्वदाव्या वर्षी निधन झाले. त्यानंतर कुठलेसे कागदपत्र शोधत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील घोगरगाव येथील ख्रिस्तराजा चर्चच्या शिक्क्यानिशी त्यांच्या बाप्तिस्म्याचा दाखला अचानक सापडला.
फादर जॉन मेरी बेर्जे (Berger) या फ्रान्सिलियन (MSFS) संस्थेच्या फ्रेंच धर्मगुरुंनी १९१७ साली त्यांचा बाप्तिस्मा करुन त्यांना जॉन असे नाव दिले होते असे त्या जीर्ण कागदपत्रावर लिहिले होते ! आम्ही पारखे मंडळी वाहेगावची, मात्र त्याकाळात तेथे देऊळ आणि फादर नसल्याने तेरा किलोमीटर अंतरावर असलेले घोगरगाव हीच आमची पॅरिश होती.
प्रत्येक व्यक्तीच्या बाप्तिस्म्याची, लग्नाची आणि इतर सांक्रामेंतांची अगदी मृत्यसंस्कारांची त्या त्या चर्चच्या रजिस्टरमध्ये नोंद होत असते. चर्चची या जुन्यापुराण्या नोंदवह्या त्यामुळेच इतिहासाची खाणच असतात. त्या जुन्या सापडलेल्या कागदामुळे आजकाल `सांन जॉव’ फेस्त साजरा करताना दादांचीही आठवण हमखास येतेच.
चर्चच्या या कॅलेंडरमध्ये गॅब्रिएल देवदूताने मारियेला निरोप सांगितला, तो दिवस १४ मार्चला साजरा होतो, म्हणजे नाताळाआधी बरोबर नऊ महिने.
गरोदरपणाचा नऊ महिन्यांचा काळ ध्यानात ठेवून चर्चने या काही सणांची तारीख मुक्रर केली आहे. २४ जूननंतर बरोबर सहा महिन्यांनी म्हणजे २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ख्रिस्तजन्माचा म्हणजे नाताळाचा आनंदमयी उत्सव सुरू होतो.
-------
`सांन जॉव' सणानिमित्त गोव्यातील पत्रकार विवेक मिनिझेस यांनी प्रसिद्ध गोवन चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांनी १९६७ साली भारतीय शैलीत आणि प्रतिमांसह काढलेले संत जॉन बाप्तिस्ता याचे फेसबुकवर शेअर केलेलेे हे चित्र. सोबत मिनिझेस यांनी आपल्या फेसबुक वॉलवर लिहिलेली टिपण्णीही देत आहे. संत जॉन याच्या हातात असलेले कोकरु (The Lamb of God) अर्थातच येशू ख्रिस्ताची एक प्रतिमा आहे.
--------
Writes Vivek Menezes on his Facebook wall
''Shared this last year, but it belongs even better in the privations of our age of contagion. today - 24 June - the feast of St. John the Baptist, is traditionally celebrated in Goa as bacchanalian water carnival, with unmistakable eco-spiritual roots that underlie + pre-date the Konkani Catholic practices.
All that fluid cultural complexity informs this 1967 Angelo da Fonseca masterpiece, where the biblical ascetic is depicted - highly suitably! - as a sadhu in the Hindu/Jain tradition, but with another layer of Buddhist meaning as well. the compelling mystic figure stands under a bodhi/ peepul sacred fig tree with its distinctive heart-shaped leaves, revered symbol of the site where Siddhartha Gautama attained enlightenment after 49 days of immersive meditation. it's something to savour on this unique feast day.

Viva San Joao!''
-
.....

Wednesday, June 23, 2021

 

`Sao Joao’ Festival On June 24 In Goa Is Most Unique

Camil Parkhe

Pune, 23rd June 2021: On June 24 every year, there is a festive atmosphere in Goa, especially in some villages in North Goa. That is because the Sao Joao festival is celebrated on this day, June 24.

This is the time when after the onset of the Monsoon, streams overflow with water, lakes get filled with water and waterfalls come alive in the hilly areas in Goa. The lush greenery in Goa this time is breathtaking.

The Sao Joao festival celebrated on June 24 is in a way a festival of fertility in Mother Nature. The festival as it is related to the Christian calendar also commemorates Biblical incidents connected to two famous nativities, the nativity of St. John the Baptist and the Nativity of his close relative who is none other than Jesus Christ, his birth now celebrated all over the world as the Christmas.

I vividly remember the days when as a higher secondary student in the 1970s, I visited a village near Mapusa in Bardez taluka, to spend holidays with my friends during the monsoon days. I would not like to reveal the name of the village for the fear of exposing it to the threat of visiting tourists. The place where we landed for the picnic was at the foot of a hillock. Water crashed from the hilltop as we joyously soaked ourselves on the rocky ground. Even then it was an understanding among all of us gathered there that we would not reveal the name of our picnic site to anyone else, a promise I have kept for four decades up to this date.

So, the Monsoon season or the days immediately after that are the best days to visit Goa. By June end, the tiny state of Goa is filled with water and this sets the stage for the celebration of Sao Joao fest or festival.

Sao Joao in Portuguese and Konkani means St John the Baptist, a relative and contemporary of Jesus Christ. On this days, the revellers – the youth and others – move in procession to the tune of traditional musical instruments including the ghumat to nearby water bodies – well, overflowing streams, lakes and rivers. There, shouting `Sao Joao’, the revellers jump into the wells or the lakes.

The Sao Joao festival is celebrated on the occasion of the feast of St. John the Baptist which falls on June 24. The Catholic Church has its calendar of feasts of various saints and various seasons like Advent, Lent, Christmas, etc.

The Sao Joao festival celebrations – the jumping into the well and other water bodies – is related to an incident mentioned in the Bible. This refers to the meeting of Mother Mary who was pregnant with Jesus Christ and her elderly relative, Elizabeth who was pregnant with St. John the Baptist.

St. John the Baptist is an important figure in the New Testament of the Bible. It was St. John the Baptist who baptised Jesus Christ with water in the Jordan River. After this baptism, Jesus launches his mission of preaching to the people. St. John the Baptist is also among the first martyrs in the New Testament.

One needs to know the sequence narrated in the St. Luke’s Gospel in the Bible to understand the Sao Joao festivities in Goa.

Archangel Gabriel appeared before Mary with a message that she will be conceived with the power of the Holy Spirit and the baby will be named Jesus.

In the same appearance, the angel also told Mary that her relative, Elizabeth – although very old- had also conceived six months back.

As per St. Luke’s account, the story goes thus:

‘’Soon afterwards, Mary got ready and hurried off to a town in the hill-country of Judea. She went into Zechariah’s house and greeted Elizabeth. When Elizabeth heard Mary’s greetings, the baby moved within her. Elizabeth was filled with the Holy Spirit and said in a loud voice: You are the most blessed woman in the world and blessed is the child you will bear. Why should this great thing happen to me, that my Lord’s mother comes to visit me? For as soon as I heard your greeting, the baby within me jumped with gladness.‘’

The Sao Joao festival celebration revolves around this theme of the ‘Baby (St John the Baptist) in the womb jumping with gladness.’

Incidentally, it is only in Goa that the feast of St. John the Baptist or the Sao Joao festival is celebrated in this manner.

Carnival celebrated in February-March in Goa in India, and also in Portugal, Spain in Europe and various countries in Latin America, is another festival linked to the Church’s annual calendar. The Carnival celebration which consists of King Momo leading his team of revellers starts on Saturday, preceding Ash Wednesday marking the beginning of the 40-day Lent or fasting Season. The Church however has long ago disassociated itself from the Carnival festivities described as not in keeping with Christian values.

The prevailing Covid-19 situation in Goa this year has indeed dampened the spirit of the Sao Joao festival revellers for the second consecutive year. The festival will be celebrated with a limited number of participants and with the observation of the pandemic regulations.

Veteran artist and cartoonist Mario Miranda who hailed from Loutolim village in south Goa has drawn numerous pictures related to Goan culture. One of his famous paintings is based on Sao Joao festival and truly describes the spirit behind this unique celebration.

Exactly six months after the June 24 Sao Joao festival, follows the celebration of the Nativity of Jesus Christ, the Christmas festival, on December 24th at midnight.

(Camil Parkhe is a senior journalist based in Pune. He started his journalism career in Goa and has worked in various newspapers in different capacities.)

Follow Punekar News:

Tuesday, June 22, 2021

 

आज कुठल्याही वृत्तपत्रांत वेतन आयोगाची पूर्णतः अंमलबजावणी होत असेल, असे मला वाटत नाही !
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 23 June 2020
  • पडघममाध्यमनामापत्रकारितापत्रकारवेतन आयोगकामगार कपात

गोव्यातील ‘नवहिंद टाइम्स’मध्ये बातमीदार म्हणून माझी १९८२ ला रितसर नेमणूक झाली, तेव्हा पालेकर वेतन आयोगानुसार मला ५३० रुपये मासिक पगार मिळायचा. तीन-चार वर्षांनंतर वार्षिक उलाढाल वाढल्याने डेम्पो वृत्तपत्रसमूह वरच्या उत्पन्न गटात गेल्याने व्यवस्थापनाने युनियनशी नवा वेतन करार केला, तेव्हा आमच्या सर्वांच्या वेतनश्रेणीत घसघशीत वाढ झाली होती. माझा मासिक पगार ५३० रुपयांवरून एकदम १८०० रुपयांपर्यंत पोहोचला. कामगारांच्या ऐक्यामुळे आणि वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे हे शक्य झाले होते. यामुळे वृत्तपत्र कामगार चळवळीकडे मी आकर्षित झालो.

गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा (गुज)चा मी १९८५मध्ये सरचिटणीस झालो, तेव्हा पत्रकारांची आणि एकूण वृत्तपत्र कर्मचाऱ्यांची देशभरातील कामगार संघटना मजबूत होती. वृत्तपत्र कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच स्वतःसाठी एक खास कायदा संसदेकडून मंजूर करून घेतला होता. यावरून या ताकदीची कल्पना यावी. १९५६ साली मंजूर झालेल्या या पत्रकार आणि पत्रकारेतर वृत्तपत्र कर्मचारी कायद्यानुसार सरकारतर्फे वृत्तपत्र कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग नेमण्याची तरतूद आहे. राजीव गांधी सरकारच्या काळात देशात ऑटोमेशनचे वा संगणकाचे युग आले आणि संगणकामुळे व छपाईतंत्रातील क्रांतीमुळे वृत्तपत्रांत काम करणाऱ्या अनेकांसमोर बेकारीचे संकट उभे राहिले.

पणजीतील आमच्या ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी आणि ‘नवप्रभा’ या मराठी दैनिकांतील अनेक कामगार संगणकाच्या होऊ घातलेल्या आगमनामुळे सरप्लस ठरणार होते. सुदैवाने अशाच परिस्थितीत पुण्यातील ‘सकाळ’ या दैनिकाने तोडगा काढून अतिरिक्त कामगारांना नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी कायम ठेवली होती असे आम्हाला कळले. ‘नवहिंद टाइम्स’ आणि ‘नवप्रभा’ दैनिकांच्या युनियनचे नेते रमेश नाईक यांनी ‘सकाळ’चे कामगार नेते गोविंद क्षीरसागर यांची पुण्यात गाठ घेऊन याबाबत माहिती घेतली. हे ‘सकाळ’ मॉडेल वापरून आम्ही मराठी छपाईयंत्रणेत अक्षरजुळारी, इंग्रजी दैनिकात लायनो टाईपसेट मशीनवर ऑपरेटर असणाऱ्या तरुणांना काही आठवड्यांचे संगणकाचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे दररोज अक्षराचे खिळे, शाई वापरत हात काळे करणारे हे ब्ल्यू कॉलर कामगार लवकरच मऊ गालीचे असणाऱ्या वातानुकुलित कक्षात काम करणारे व्हाईट कॉलर कर्मचारी बनले! कामगार चळवळीतला हा माझा अगदी पहिला सुखद अनुभव!

वसंतराव डेम्पो यांच्या वृत्तपत्रसमूहात संगणकयुग येऊनही आमच्या कामगार युनियनने कामगार कपात रोखली. मात्र उद्योगपती विश्वासराव चौगुले यांच्या मालकीच्या ‘गोमंतक’ या मराठी दैनिकात १९ कामगारांना नोकरीतून काढून टाकण्यात आले होते. त्यांना कायद्यानुसार नोकरी झालेल्या प्रत्येक वर्षांसाठी केवळ पंधरा दिवसांची ग्रॅच्युइटी देऊन त्या सर्वांची बोळवण करण्यात आली होती. ‘गुज’कडे या कामगारांनी तक्रार केली, तेव्हा सरचिटणीस म्हणून मी लगेच गोवा कामगार आयुक्तांकडे दावा दाखल केला. या औद्योगिक वादाची कौन्सिलिएशन प्रोसिडींगची सुनावणी सुरू झाली, तेव्हा ही रुक्ष आणि औपचारिक स्वरूपाची प्राथमिक बैठक अचानक खूप खेळीमेळीची झाली, याचा मला सुखद धक्का बसला होता .

यामागे एक कारण होते. चौगुले उद्योगसमूहाचे कामगार प्रमुख (त्या काळात ‘एचआर’ हा शब्द रूढ नव्हता.) म्हणून चर्चेसाठी तेथे आलेली व्यक्ती काही महिन्यांपूर्वी गोव्याची कामगार आयुक्त होती, असे आमच्या लक्षात आले. साहजिकच त्यांची आणि  गुजचे अध्यक्ष गुरुदास सिंगबाळ, इतर ज्येष्ठ पत्रकार प्रमोद खांडेपारकर, गुरुदास सावळ यांची चांगली ओळख होती. बैठकीच्या सुरुवातीलाच आपल्या नेहमीच्या शैलीत सिगारेट शिलगावत हसतहसत गुजचे अध्यक्ष गुरुदास सिंगबाळ यांनी विचारले, “हा सांग मरे, कसलो प्रॉब्लेम हा?” गोमंतकच्या कामगार प्रमुखांनी उत्तर दिले, “गुरु, माका प्रॉब्लेम काय ना, तु सांग, तुका काय जाय ते.” या संवादाने तिथला तणाव लगेचच नाहीसा झाला. चहा आणि बिस्किटाचा आस्वाद घेत मग नोकरीतून काढलेल्या कामगारांना अधिकाधिक किती नुकसानभरपाई देता येईल याची तेथे चर्चा सुरू झाली. या कामगारांना नोकरीत ठेवणे अशक्य आहे, हे आम्हाला सुरुवातीलाच सांगण्यात आले होते.

काही आठवड्यानंतर या कामगारांना आधी देऊ केलेल्या रकमेपेक्षा जवळजवळ दुप्पट नुकसानभरपाई मिळवून देण्यात गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टला यश आले. या त्रिपक्षीय करारावर आम्ही सर्वांनी सह्या केला, तेव्हा खूप समाधान वाटले. या वाटाघाटीबद्दल नाराज असलेल्या दोन कामगारांनी मात्र कामगार न्यायालयात धाव घेतली होती.

पणजीतल्या १८ वा जून रोडवरच्या जुन्ता हाऊस या सरकारी इमारतीत गुजचे कार्यालय होते, मात्र युनियनचे माझे काम मांडवीच्या तीरावर असलेल्या सचिवालयाच्या प्रेस रूममधूनच चालायचे. येथेच खांडेपारकर, बालाजी गावणेकर यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांबरोबर होणाऱ्या चर्चेतून मला वृत्तपत्र कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पालेकर वेतन आयोगाची, वर्किंग जर्नालिस्टस अॅक्टची आणि कामगारविषयक वेगवेगळ्या कायद्यांची माहिती झाली. साथी जॉर्ज फर्नांडिस हे त्या काळी कामगार चळवळीतील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे  दैवत होते. पालेकर वेतन आयोगाच्या शिफारसी पत्रकारांना आणि वृत्तपत्रांतील इतर  कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावात, यासाठी १९८०च्या दशकात झालेल्या विविध आंदोलनात आणि चळवळीत आम्ही सामिल होतो. एकदा तर कुठल्यातरी आंदोलनात आम्ही वृत्तपत्र कामगारांनी पणजीत न्यायालयाकडून अटकसुद्धा करवून घेतली होती.

केंद्र सरकारने वृत्तपत्र कर्मचाऱ्यांसाठी नव्या बच्छावत वेतन आयोगाची नेमणूक केली, तेव्हा या आयोगाने देशात विविध शहरांत सुनावणी घेतल्या. मुंबईत झालेल्या सुनावणीत या आयोगासमोर गुजच्या वतीने मी पत्रकारांची बाजू मांडली. या अकरा-सदस्यीय वेतन आयोगात वृत्तपत्र कर्मचाऱ्यांचे आणि सिटूचे नेते कॉम्रेड एस. वाय. कोल्हटकर होते, वृत्तपत्र मालकांच्या वतीने एक्सप्रेस ग्रुपच्या सरोज गोयंका (रामनाथ गोयंका यांच्या सून) होत्या. दोन स्वतंत्र सदस्य होते. अशा आयोगासमोर कुणाचीही बाजू मांडणाऱ्या व्यक्ती व्यावसायिक वकील असतात, पत्रकार म्हणून पत्रकारांच्या संघटनेची बाजू स्वतः मांडणारा मी अपवादच ठरलो होतो.  

बच्छावत वेतन आयोगासमोर बाजू मांडण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी ‘नवहिंद टाइम्स’चे वृत्तसंपादक एम.एम. मुदलियार यांच्याकडे मी रजेचा अर्ज दिला, तेव्हा ‘तू सर्व कर्मचाऱ्यांसाठी हे करतो आहेस, तर तुझ्यासाठी मी ऑन ड्युटी रजा मंजूर करतो’ असे त्यांनी सांगितले! ‘इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट’च्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीसाठी दिल्ली आणि बेंगलोर येथे जाण्यासाठीसुद्धा त्यांनी मला ‘ऑन ड्युटी’ रजा दिल्या होत्या. आज यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. प्रवासाचा येण्याजाण्याचा आणि इतर खर्च अर्थात संघटनेतर्फे मिळत असे.  

१९८०च्या दशकात म्हणजे शीतयुद्धाच्या अखेरच्या काळापर्यंत भारतातील आणि इतर अनेक राष्ट्रांत कामगार संघटना अतिशय ताकदवान होत्या. आंदोलने आणि संप धडवून मालकवर्गाला त्या जेरीस आणू शकत असत. वृत्तपत्र कामगारांच्या संघटनाही तितक्याच ताकदीच्या होत्या. मला आठवते १९८५च्या दरम्यान वृत्तपत्र कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनवाढीच्या मागणीसाठी दोनदा राष्ट्रपातळीवर बंद घडवून आणला होता. दरवर्षी कामगार दिनानिमित्त एक मेला आम्ही पत्रकार आणि इतर वृत्तपत्र कर्मचारी पणजी शहरात मोर्चा आयोजित करत होतो. लाल बावटा फडकावत ‘सोडचे ना रे, सोडचे ना, जिकल्याबिगर सोडचे ना!’ अशा घोषणा आम्ही देत असू. समाजवादी आणि  डाव्यांचा वरचष्मा असलेल्या पत्रकार आणि वृत्तपत्र चळवळीत देशपातळीवर आम्ही एकमेकांना ‘कॉम्रेड’ असेच संबोधित असायचो.

१९८०च्या दशकात इंडियन फेडरेशन ऑफ वर्कींग जर्नालिस्टस आणि इंटरनॅशनल जर्नालिस्टस ऑर्गनायझेशन (आयजेओ) यांच्यातील समन्वयाने दरवर्षी भारतातील २०-३० पत्रकारांना पूर्व युरोपातील देशांत म्हणजे मित्रराष्ट्रे असलेल्या पूर्व जर्मनी, झेकोस्लाव्हाकिया, रुमानिया वगैरे कम्युनिस्ट देशांत दोन-तीन महिन्यांसाठी दौऱ्यावर वा प्रशिक्षणासाठी नेत असत.

अशा प्रकारे या काळात भारतातील विविध राज्यांत अनेक भाषांतील दैनिकांत काम करणाऱ्या सुमारे ३०० पत्रकारांना पूर्व युरोप पाहता आला. १९८५- ८६ साली मलासुद्धा पत्रकारितेच्या सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी  प्रथम लखनौला आणि नंतर रशिया-बल्गेरिया येथे जाण्याची संधी मिळाली होती.

कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या या ताकदीमुळे त्या काळात देशातील सर्वच मोठ्या राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरच्या सर्वच वृत्तपत्रसमूहांत पत्रकार आणि पत्रकारेतर वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या कायद्याची आणि वेतन आयोगाच्या शिफारशींची बऱ्यापैकी अंमलबजावणी होत असे.

सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर जगभर कामगार चळवळीची पिछेहाट झाली आणि व्यवस्थापनांचे आणि मालकांचे फावले. आज भारतातील कुठल्याही मोठ्या वा छोट्या वृत्तपत्रांत वेतन आयोगाची  किंवा वर्किग जर्नालिस्टस अॅक्टची पूर्णतः अंमलबजावणी होत असेल, असे मला वाटत नाही.

कोविड-१९ मुळे बसलेल्या आर्थिक फटक्याचे कारण पुढे करत देशांतील अनेक वृत्तपत्रांनी आपल्या काही आवृत्त्या बंद केल्या आहेत, अनेक पत्रकारांना आणि इतर कर्मचाऱ्यांना तडकाफडकी घरी पाठवले आहे. अशा बिकट परिस्थितीत ज्यांनी कामगारांना मदत करावी, त्या कामगार संघटनाच नामशेष झाल्या आहेत. काही राज्यांत तर सरकारतर्फेच कामगारांच्या हितांना आणि हक्कांना पूर्ण तिलांजली दिली जात आहे.  

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

Tuesday, June 1, 2021

 डॉ. बाबा आढाव



नव्या शहरात आले कि तिथल्या परिसराची, लोकांची ओळख करुन घ्यावी लागते. गोव्यातल्या दीर्घ वास्तव्यानंतर आणि नंतर औरंगाबादमधल्या एक वर्षांच्या पत्रकारितेनंतर मी पुण्यात १९८९ ला इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो. पुण्यात नव्यानेच सुरु झालेल्या इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताच्या आवृतींचे ऑफिस त्यावेळी पुणे कॅम्पात हॉटेल `महानाज’समोर अरोरा टॉवर्समध्ये होते. तेव्हा इथल्या अनेक क्षेत्रांतील मोठ्या लोकांची भेटगाठ झाली ती पुणेकर असलेले लोकसत्तातील ज्येष्ठ सहकारी अरुण खोरे यांचे बोट धरुन. नानासाहेब गोरे, दया पवार, लक्ष्मण माने, भाई वैद्य, डॉ. नीलम गोऱ्हे अशा अनेक व्यक्तींची प्रत्यक्ष भेट आणि ओळख खोरे यांच्यामुळेच झाली.
एकदा असेच खोरे यांनी मला टिम्बर मार्केटला नेले आणि तिथे डॉ. बाबा आढाव यांना पहिल्यांदा भेटलो, बोललो आणि नंतर डॉ आढाव यांना मी अनेकदा भेटलो.
एक सांगायला हवे, इतर अनेक सामाजिक कार्यांत असणाऱ्या नेत्यांप्रमाणे बाबा आढाव हे मिडिया सॅव्ही नाहीत. शिवाय पुण्यातील रिक्षावाल्यांच्या संघटनेचे ते नेते असल्याने पुणेरी रिक्षावाल्यांविषयी अत्यंत वाईट मत असलेल्या मध्यमवर्गिय लोकांची त्यांनी नाराजीही ओढवून घेतली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या विनिता देशमुख यांच्या संपादकत्वाखाली नव्यानेच सुरु झालेल्या `सिटीझन' या इंग्रजी मासिकासाठी मी डॉ बाबा आढाव, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष सय्यदभाई (यांचा अलीकडेच मोदी सरकारने पद्मश्री देऊन सत्कार केला) आणि बोहरी समाजाचे ताहेर पूनावाला यांच्यांवर लेख लिहिले होते.
नंतर औरंगाबादच्या मराठवाडा आणि गोव्यातल्या `गोमंतक' दैनिकांतही मी डॉ बाबा आढाव यांच्यावर लेख लिहिला. संजय सोनवणी यांनी प्रकाशित केलेल्या `उत्तुंग' (1993) या माझ्या व्यक्तिचित्रसंग्रहात बाबा आढाव यांच्यावर एक लेख आहे. त्या
पुस्तकाच्या कव्हर वरचा हा बाबांचा फोटो
मी श्रीरामपूरला शाळेत शिकताना डॉ बाबा आढाव यांचे `एक गाव, एक पाणवठा' हे सदर दैनिक `सकाळ' मधून प्रसिद्ध होत होते, ते मी वाचत असे. नंतर हे लेख त्याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाले. ' गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज' (सुगावा प्रकाशन) या माझ्या पुस्तकात मी डॉ आढाव यांच्या या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे.
मागे टाइम्स ऑफ इंडियाने त्यांना आपले पहिले Social Impact Award for Lifetime Contribution देऊन त्यांचा सन्मान केला. `द वीक' साप्ताहिकाने त्यांना २०१३ च्या मॅन ऑफ द इयर पुरस्काराने गौरविले होते.
आज महाराष्ट्रात एक अग्रणी समाजसुधारक, कार्यकर्ते असणाऱ्या डॉ बाबा आढाव यांना साधी पद्मश्रीही मिळालेली नाही, मग प्रतिष्ठेचे असलेले `महाराष्ट्र भूषण' अवॉर्ड तर फारच दूर राहिले.
डॉ बाबा आढाव १ जून ला ९१ व्या वर्षांत प्रवेश करत आहेत. त्यानिमित्त तीस (हो, तीस ! ) वर्षांपूर्वी मी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख :
00 --
`सामाजिक चळवळीतील डॉ. बाबा आढावांचे योगदान
डॉ. बाबा आढाव म्हणजे समाजातील दुर्बल आणि शोषित घटकांचा अन्यायाविरुद्धचा लढा असे जवळजवळ समीकरणच बनले आहे. साठी उलटलेल्या पण कुठेही अन्याय घडून आल्यास त्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी तरुणाच्या उमेदीने उभ्या राहणाऱ्या बाबाची कामगिरीही तशीच आहे.
सडपातळ बांध्याच्या, जाड्याभरड्या खादीचे कपडे वापरणाऱ्या आणि पुण्यातील महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या छोटेखानी कार्यालयात हमाल पंचायतीच्या सदश्यांशी बोलताना बाबाना पहिले म्हणजे महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळीत एक भरीव योगदान करणारी व्यक्ती ती हीच यावर विश्वास बसत नाही.
समोर बोलणारी व्यक्ती मग टिम्बर मार्केटमध्ये काम करणारी हमाल असो वा समाजातील एखादी मान्यवर व्यक्ती असो बाबांच्या चेहऱ्यावर बोलताना नेहमीच स्मितहास्य खेळत असते.
१९५२ साली अन्नधान्य भाववाढीविरोधी सत्याग्रहात बाबानी भाग घेतल्याबद्दल त्यांना तीन आठवड्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यावेळी हा तरुण अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून टाकील याची कल्पना कुणालाही आली नसणार.
त्यानंतर म्हणजे गेल्या चार दशकात प्रभाव असणाऱ्या डॉ. बाबा आढावांनी अन्यायाविरुद्धच्या संघर्षात कोणतेही क्षेत्र वर्ज्य मानलेले नाही. `एक गाव, एक पाणवठा’ सारखी अस्पृश्यता निर्मूलन मोहीम, देवदासींच्या पुनर्वसनाची मोहीम हमाल - माथाडी आणि फूटपाथवर माल विकून पॉट भरणारे कष्टकरी घटकांचे संघटीकारण, मुस्लिम आणि दाऊदी बोहरी समाज यांचे प्रश्न वगैरे.
पंढरपूर येथे शासकीय खर्चाने दरवर्षी होणारी विठोबाची पूजा १९७१ साली बंद पडण्यास बाबानी शासनाला भाग पडले होते. `भारताच्या निधर्मी धोरणाशी ही शासकीय पूजा सुसंगत नाही’ असं बाबांचे म्हणणे. मात्र पुढे श्री. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ही प्रथा पुन्हा सुरु करण्यात येऊन पुरोगामी चळवळीची काही प्रमाणात पीछेहाट झाली याचे बाबाना अजूनही वैषम्य वाटते.
संतांनी समतेची पताका उभारून सर्व समाजास एकसंघ बनविण्याचा प्रयत्न केला असतानासुद्धा विठोबाच्या दर्शनास जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यामध्ये अस्पृश्यांसाठी वेगळे पथक ठेवण्याच्या प्रथेसही बाबानी तीव्र विरोध केला.
बाबांच्या पुढाकाराने १९७४ साली कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे पहिली देवदासी परिषद भरविण्यात आली. तेव्हापासून धर्माच्या नावावर चालणाऱ्या या अमानुष प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी बाबांनी मोलाची कामगिरी पार पाडली आहे. एक धार्मिक प्रथा या गोंडस नावाखाली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमाभागातील बालिकांना वेश्या व्यवसायास लावणाऱ्या या प्रथेस दोन्ही राज्य सरकारांनी पूर्णतः आळा घालून या प्रथेचे बळी ठरलेल्या महिलांचे पुनर्वसन करावे.
त्यांच्या होणाऱ्या मानहानीचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी बाबा गडहिंग्लज परिषदेतील एका देवदासींच्या छोट्याश्या भाषणाचा दाखल देतात.
गौराबाई ही देवदासी या परिषदेत बोलण्यासाठी दोन्ही हात जोडून उभी राहिली, पण तिचे भाषण दोन-तीन वाक्यापुरतेच मर्यादित राहिले.
``बाबांनो तुम्ही आम्हाला `माय-बहिणी’ म्हणून संबोधले आणि यातच आम्हाला सर्व काही मिळाले,’’ असे म्हणून ही देवदासी मटकन खाली बसली.
पुरुषांच्या फक्त कामुक अथवा हेटाळणीच्या नजरेची सवय झालेल्या या देवदासींना समाजाचा एक घटक आपल्याला सन्मानाने जगता यावे म्हणून पुढे येतो या जाणिवेनेच अपार आनंद झाला होता.
``देवदासी प्रथा निर्मूलनाच्या चळवळीच्या निमित्ताने अनेक सभा-संमेलनातून मी या प्रथेवर कडक हल्ले चढविले आहेत. पण यापैकी एकही भाषण गौराबाईच्या त्या छोट्याश्या भाषणाइतके परिणामकारक नव्हते’’ असे बाबा म्हणतात.
काही काळापुरता बाबांनी पक्षीय राजकारणातही वावर केला. १९६७ साली खेड मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्याआधी म्हणजे १९६३ साली ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले होते परंतु आपल्या समाजवादी विचारसरणीशी तडजोड करण्याचे त्यांनी स्वीकारले नाही. त्यामुळे अंदाजपत्रकात झोपडपट्टी विकासासाठी पुरेशी आर्थिक तरतूद नाही या कारणावरून त्यांनी १९७१ मध्ये नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.
आणीबाणीच्या काळात लोकशाही पद्धतीने विरोध करण्याच्या सर्व पद्धतींवर देशात बंदी घालण्यात आली होती. या काळात दडपशाहीच्या भीतीमुळे सर्वच चळवळी एकदम थंडावल्या होत्या. त्यापैकी बाबांनी पुण्यात झोपडपट्टी परिषद आयोजित केली.
यावेळी भूमिगत असलेले व बाबांचे समाजवादी पक्षातील एकेकाळचे सहकारी श्री. जॉर्जे फर्नांडिस यांनी बाबांना ``आता सर्व जबाबदारी तुमच्या खांद्यावर’’ असा संदेश पाठवला होता.
झाले. त्याच रात्री बाबांना अटक करण्यात आली व येरवड्याच्या कारागृहात त्यांना दीड वर्षे ठेवण्यात आले.
आणीबाणी उठविण्यात आल्यानंतर इतर नेत्यांबरोबरच बाबांचीही तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या जनता पक्षात विलीनीकरण करण्यात आले.
पण बाबा जनता पक्षात गेले नाहीत. पक्षविरहित राहून समाजकार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. जनता पक्ष सत्तेवर असतानासुद्धा झोपडपट्टीच्या प्रश्नावर बाबांनी सत्याग्रह केला व तुरुंगवास पत्करला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी आणीबाणीनंतर आपली जातीयवादी भूमिका बदलली, संघाचे परिवर्तन झाले अशी प्रकारचा प्रचार जनता राजवटीच्या काळात करण्यात येत होता. त्यावेळी बाबांनी ``संघाचे ढोंगबाजी आणि संघापासून सावध’’ या पुस्तिका लिहून संघाचे पितळ उघडे पडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन पुस्तिकांनी त्यावेळेस सगळीकडे प्रचंड खळबळ उडवून दिली होती.
आयुर्वेद वैद्यकशास्त्राची पदवी असणाऱ्या बाबा आढावांनी गोवा मुक्ती आंदोलनातही सहभाग घेतला. १९५५ साली त्यांच्या नेतृत्वाखाली एक शुश्रूषा पथक गोव्याच्या सीमेवर गेले होते.
मराठवाडा विद्यापीठास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातही ते अग्रस्थानी होते. १९७९ साली नामांतरप्रकरणी त्यांनी सत्याग्रहींचा लॉन्ग मार्च आयोजित केला होते. त्यावेळी त्यांना व इतर सत्याग्रहींना शासनाने रस्त्यावरच अडवून वीस दिवस तुरुंगात ठेवले होते.
महाराष्ट्र राज्य माथाडी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने राज्यातील बाजारपेठ वाहतूक व्यवसाय सरकारी बसस्थानके येथे काम करणाऱ्या हमालांना संघटित करून त्यांचा न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्याचे कार्य बाबा करत आहेत. पुण्यातील हमाल कामगारांशी तर त्यांचे नाते जवळजवळ चार दशकांचे आहे. पुण्यातील हमाल पंचायतीचे हमाल भवन हे आज परिवर्तनाच्या आणि कष्टकरी जनतेच्या लढ्याचे एक प्रतीकच बनले आहे.
हमालांना संघटित करून बाबानी समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली आहे. प्रश्न महागाईचा असो अथवा सामाजिक न्यायाच्या हक्कासंबंधीचा असो, पुण्यातील हमाल व इतर कष्टकरी त्यासंबंधी आपले मत मांडण्यासाठी नेहमीच रस्त्यावर आलेले आहेत.
हमाल कामगार आणि इतर कष्टकरी जनतेपैकी बहुतेक जण निरक्षर असतात आणि त्यांना सामाजिक न्याय, स्वतःचे हक्क व आर्थिक पिळवणूक वगैरे संकल्पनांचे मुळीच ज्ञान नसते. त्यामुळे मोर्चा, निदर्शने वगैरे लढ्याच्या भाषेतूनच त्याने त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची आणि त्यांच्या स्वतःच्या हक्काची जाणीव करून देता येते, असे बाबा म्हणतात.
स्वतःचे श्रम विकून आपले पोट भरणाऱ्या एका फार मोठ्या घटकास समाजात मनाचे स्थान, पत नाही, याचे बाबांना फार वैषम्य वाटते. वाहतूक व्यवसायातील व्यापाज्यानी स्वतःच्या वाहनांना ठेवण्यासाठी गॅरेज नाही म्हणून ही वाहने भर रस्त्यावर उभी केली तर कुणीच आक्षेप घेत नाही. मात्र एखाद्या गरीब पोटभरू व्यक्तीने ह्याच रस्त्यावर फळभाज्या व इतर वस्तू विकावयास सुरुवात केली तर पोलीस, नगरपालिका आणि इतर खात्यातील अधिकारी लगेच त्यांच्याविरुद्ध कारवाई करावयास पुढे येतात, यामधील पक्षपाताची त्यांनी नेहमीच चीड व्यक्त केली आहे.
एखाद्या गरीब आणि नाडलेल्या कष्टकरी व्यक्तीने छोट्याश्या वस्तूची चोरी केली तर तो एक मोठा गुन्हा मानला जातो. मात्र या कष्टकऱ्यास त्यांच्या सेवेबद्दल अत्यंत कमी मोबदला देऊन त्यांच्या श्रमाची राजरोसपणे होणाऱ्या चोरीची कुणीच का दखल घेऊ नये असा त्यांचा सवाल आहे.
मी स्वतः फुलेवादी माणूस आहे. महात्मा फुल्यांनी स्वतःच्या सामाजिक कार्याची स्रियांपासून सुरुवात केली. पण अजून स्रियांना अर्थव्यवस्थेत पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळालेले नाही. स्त्रीमुक्ती चळवळ आज फोफावते आहे. पण आजपावेतो तरी ही चळवळ कष्टकरी आणि दलित महिलांपर्यंत पोहोचली नाही याची खंत वाटते. असे बाबा म्हणतात.
सामाजिक न्याय आणि समता या तत्वांचे एक कट्टर पुरस्कर्ते बाबा आढाव गेले एक दशकभर मंडळ आयोगाचे समर्थन करत आहेत. सद्य अस्तित्वात असलेल्या सामाजिक असमतेचे निर्मूलन केल्याशिवाय सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे शक्य नाही व यासाठी सामाजिक दुर्बल घटकांना राखीव जागांचे संरक्षण मिळालेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशी उच्च वर्गातील मंडळी राखीव जागांच्या धोरणास विरोध करतात. ``बसमध्ये जागा मिळालेल्या सर्व व्यक्तींना वाटते कि, कंडक्टरने ताबडतोब `डबल बेल’ वाजवून बस बसस्थानकावरून निघावी, बसमध्ये जागा न मिळाल्याने स्थानकावरील रांगेतच ताटकळलेया व्यक्तींचा या मंडळींपैकी कुणीच विचार करत नाही. मंडळ आयोगास विरोध करणाऱ्या व्यक्तीची असलीच मनोवृत्ती आहे,’’ असे बाबा म्हणतात.''
Camil Parkhe 31 May 2021