Did you like the article?

Showing posts with label Vasai. Show all posts
Showing posts with label Vasai. Show all posts

Monday, September 22, 2025

 

                                                       सायमन मार्टिन

यंदा फार जुनी परंपरा असलेल्या दोन साहित्य संमेलनांचे बार पुढील वर्षांरंभात लागोपाठ उडणार आहेत.
शतकाच्या उंबरठ्यावरचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर शंभर वर्षांची परंपरा असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला नऊ ते अकरा जानेवारीला होणार आहे.
दोन्ही साहित्य संमेलनांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे.
`पानिपत'कार पाटील यांच्या अलिकडच्या आरक्षणाबाबतच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवडीबद्दल साहजिकच संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
असल्या वादांमुळेच खरे तर मराठी साहित्य संमेलनांत रंगत आणि मजा येते असे म्हटले जाते.
माझ्या आठवणीप्रमाणे वादाची ही गौरवशाली परंपरा घोषित आणीबाणीपर्वात कराड येथे दुर्गाबाई भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पुल देशपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या 1975 सालच्या संमेलनापासून सुरु झाली आहे. असो.
तर मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेने आपल्या घटनेनुसार संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करुन, इच्छूक उमेदवारांकडून रितसर अर्ज मागवून, त्यांच्या मुलाखती वगैरे असे सर्व सोपस्कार पार पाडून संमेलनाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे.
बीड येथे झालेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आणि परिषदेचे विद्यमान अध्यक्ष पौलस वाघमारे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
वसईचे फादर विजय गोन्साल्विस अध्यक्षपदी असलेला नाशिक ख्रिस्ती साहित्य संघ नियोजित सत्ताविसाव्या संमेलनाचा यजमान आहे.
किमान दहा पुस्तके आपल्या नावावर असलेल्या व्यक्तीच यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी पात्र होत्या. याचे कारण एकही साहित्यकृती नसलेले लोक यापूर्वी संमेलनाध्यक्ष झालेले आहेत.
दुसऱ्या एका अलिखित संकेतानुसार यावेळचे साहित्य संमेलनाध्यक्षपद कॅथोलिक व्यक्तीसाठी राखीव होते. दोन वर्षानंतर होणाऱ्या संमेलनासाठी हे पद प्रोटेस्टंट साहित्यिकांसाठी राखीव असेल.
मार्टिन यांच्याव्यतिरिक्त यंदा दोन इतर साहित्यिक रिंगणात होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक हेमंत घोरपडे आणि वसई येथील आणि संध्या नागालँड येथे कार्यरत असलेले सालेशियन किंवा डॉन बॉस्को संस्थेचे फादर नेल्सन फलकाव यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते.
निवड समितीने यापैकी मार्टिन आणि घोरपडे यांच्या मुलाखती घेतल्या, फादर फालकाव मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत येऊ न शकल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता.
मराठी साहित्य परिषदेने फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ जयंत नारळीकर यांच्याबाबतीतला अनुभव लक्षात घेऊन आता धट्टाकट्टा, चालताबोलता आणि हिंडूफिरु शकणारा संमेलनाध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेनेसुद्धा यावेळी असाच निकष घेतला असावा.
ऐंशीच्या उंबरठ्यावरील घोरपडे यांना त्यांचे वय बहुधा प्रतिकूल ठरले. निवडणुकीचा आग्रह त्यांनी टाळल्याने राज्यातील पात्र मतदारांचा मात्र हिरमोड झाला असेल.
मराठी खिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला एक वेगळेच वलय आहे.
सन १९२७ पासून नाशिक येथूनच सुरु झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद याआधी `स्मृतीचित्रे'कार लक्ष्मीबाई टिळक (नागपूर १९३३), प्रा. जयंतकुमार त्रिभुवन (कोल्हापूर १९८६), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे १९९२), डॉ. सिसिलिया कार्व्हालो (नाशिक २०००) आणि डॉ.अनुपमा निरंजन उजगरे (मुंबई २००५) यांनी भूषविले आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचा आणि माझा परिचय अगदी अलिकडचा. काही महिन्यांपूर्वीचा.
मात्र साहित्यविश्वातील त्यांच्या कामगिरीबाबत फार आधीपासून मला माहिती आहे.
सायमन मार्टिन यांच्या निवडीमुळे नाशिकमधील नियोजित संमेलन मोठ्या उत्साहात होईल यात शंका नाही.
ख्रिस्ती साहित्य संमेलनांतील माझा सहभाग तसा मर्यादित राहिला आहे.
तिसेक वर्षांपूर्वी कवि निरंजन उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथे झालेल्या आणि अशोक आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे २०१२ साली झालेल्या संमेलनास मी एक श्रोता म्हणून हजर होतो.
सातारा आणि नाशिक या दोन्ही साहित्य संमेलनांशी निगडीत असलेल्या बातम्या आणि घडामोडींकडे एक साहित्यप्रेमी म्हणून इतरांप्रमाणे माझेही लक्ष असणार आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

Camil Parkhe September 22, 2025

Sunday, August 3, 2025


वसईतील डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी लिहिलेले ‘प्रसादचिन्हे’ हे पुस्तक आज सकाळी हातात पडले. पुण्यात एका बैठकीसाठी आलेल्या लेखिकेने स्वतः ते पुस्तक मला अभिप्रायासाठी दिले.

ही ओझरती भेट अक्षरशः काही क्षणांची आणि एकदोन वाक्यांच्या संवादांपुरती होती.
त्यामुळे पुस्तक आणि लेखिकेबरोबर एक फोटो काढण्याचे राहून गेले, याची नंतर दिवसभर चुटपुट लागली होती.
या पुस्तकाचे उपशीर्षक ‘मराठी भाषक ख्रिस्ती साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा परिचय’ असे आहे त्यामुळे पुस्तकाच्या आतल्या मजकुराविषयी कल्पना येईल.
मराठी ख्रिस्ती साहित्य सुरु होते ते गोव्यात सोळाव्या शतकात ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांनी लिहिलेल्या `क्रिस्तपुराणा’पासून आणि इतर परदेशी मिशनरींनी केलेल्या साहित्यकृतींपासून.
आशिया खंडात अन भारतात पोर्तुगीजांच्या राजवटीतील गोव्यातच पहिल्यांदा आधुनिक पद्धतीची छपाई यंत्रणा होती आणि तिथेच फादर स्टीफन्स यांचे हे मराठी काव्य रोमी लिपीत १६१६ ला छापले गेले.
मराठीच्या मायदेशी महाराष्ट्रात ख्रिस्ती साहित्य परंपरा सुरु होते ती आधी मुंबईत आणि नंतर नगर जिल्ह्यात अमेरिकन मराठी मिशनचे शिक्षणकार्य आणि मिशनकार्य सुरु झाल्यानंतर.
बंगालमधील सेरामपूरला ब्रिटिश मिशनरी विल्यम कॅरे आणि मुंबईत अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल वगैरेंनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी मराठीत पुस्तके लिहिणे आणि छापणे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरु केले.
नगर आणि नाशिक परिसरात स्थायिक झालेल्या या परदेशी मिशनरींनी आणि त्यांच्या पत्नींनी मराठीत विविध पुस्तके लिहिले आहेत. त्या पुस्तकांची नावे, प्रकाशनवर्षे आणि पानांची संख्या याबाबत आज केवळ माहिती उपलब्ध असली तरी ही आता दुर्मिळ झालेली पुस्तके कुठे कुणाच्या संग्रहांत असतील याबाबत काहीच सांगता येत नाही.
रेव्हरंड बाबा पदमनजी यांची `यमुनापर्यटन’ ही मराठीतली पहिली कादंबरी, विविध परदेशी मिशनरींनी लिहिलेले गद्य आणि पद्य वाङमय, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांचे `स्मृतिचित्रे' पंडिता रमाबाई, कविराज कृष्णाजी सांगळे वगैरेंच्या साहित्य कलाकृती खूप नंतरच्या,
न्यायमूर्ती म गो. रानडे यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवून आताच्या मराठी साहित्य संमेलनाचा पाया रचला.
विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे या संमेलनापासून आपली वेगळी चूल मांडण्याचे, सवतासुभा निर्माण करण्याचे पहिले धाडस ख्रिस्ती साहित्यिकांनी शंभर वर्षांपूर्वीच १९२७ साली नाशिकात पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवून केले होते.
आणि त्यावरही कडी म्हणजे या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनापासून फारकत घेऊन वेगळी विद्रोही म्हणजे मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने १९९२ पासून भरवली जात आहेत. आतापर्यंत अशी तब्बल अकरा संमेलने झाली आहेत आणि बाराव्या संमेलनाची तयारीसुद्धा आता चालू आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरल्यानंतर खूप काळानंतर मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहापासून विद्रोही, ग्रामीण, दलित, वेगवेगळी प्रादेशिक, आणि अगदी अलीकडेच नास्तिक संमेलने भरु लागली आहेत.
आतापर्यंत एकूण २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत, लक्ष्मीबाई नारायण टिळक नागपुरात १९३३ ला भरलेल्या चौथ्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
आतापर्यंत दोन्ही प्रकारची मिळून अशी एकूण छत्तीस ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत आणि यामध्ये महिला साहित्य संमेलनाध्यक्षांची संख्या लक्षणीय आहे.
नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे पुण्यात १९९२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. शांता शेळके त्यावेळी स्वागताध्यक्ष होत्या.
या पुस्तकाच्या लेखिका कार्व्हालोसुद्धा नाशिकच्या २००० सालच्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मराठवाड्यात बीड येथे २०२३ ला झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे होते. या पुस्तकात याबद्दल एक परिशिष्ट आहे.
मी स्वतः मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या तसेच मराठी दलित ख्रिस्ती संमेलनाच्या अशा दोन्ही मांडवांत हजेरी लावत आलो आहे. याबाबतीत सोवळे-बिवळे, मंगल किंवा अमंगल असे काही मी मानत नाही.
मराठी ख्रिस्ती साहित्याला अशी खूप जुनी आणि गौरवी परंपरा आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या साहित्यप्रवाहाबद्दल असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांच्या या पुस्तकातील मजकुराविषयी मला भरपूर उत्सुकता .होती.
त्यामुळे पुणे मेट्रोने संघ्याकाळी घरी परत येताना मेट्रोच्या दाराजवळच्या सपोर्ट हॅण्डलशी रेलून आणि नंतर एका बैठकीत मांड ठोकून ३३२ पानांचे, मोठ्या म्हणजे मासिकाच्या आकाराचे हे हार्डबाऊंड पुस्तक मी शेवट्पर्यंत पूर्ण चाळले अन नंतरच खाली ठेवून लगेचच हे लिहायला बसलो.
पुस्तक वाचनीय झाले आहे.
पेशाने शिक्षिका असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांनी भरपूर श्रम घेऊन हा ग्रंथ तयार केला आहे. त्यासाठी किती कठोर परीश्रम घ्यावे लागतात हे मी स्वतः `महाराष्ट्र चरित्रकोश (इ. स. १८00 ते इ. स. २000' तयार करताना अनुभवले आहे.
याआधी अशाच प्रकारे मराठी ख्रिस्ती साहित्याचा संशोधनात्मक वेध घेणारे काही ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. संशोधकांच्या दृष्टीने असे ग्रंथ खूप मौल्यवान असतात. कारण याच ग्रंथमित्रांना वाट पुसत नंतरचे संशोधक आपली पुढची वाटचाल चालू ठेवत असतात.
`युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा', श्री. म. पिंगे, व्हीनस प्रकाशन, पुणे (१९६०) हे त्यापैकी एक दुर्मिळ ग्रंथ.
त्यानंतर गंगाधर मोरजे यांचे `ख्रिस्ती मराठी वाङमय' (१९८४), अनिल दहिवाडकर यांचे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा' (२०२०) आणि फादर टोनी जॉर्ज (येशूसंघ) यांचा `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची' ग्रंथ (२०२१) याच प्रकारचे आहेत.
कार्व्हालो यांचे हे नवे पुस्तक याच जातकुळातले असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे.
सिसिलिया कार्व्हालो यांचे हे संपूर्ण पुस्तक मी अजून वाचले नाही. त्या पुस्तकाचा हा फक्त परिचय किंवा तोंडओळख.
वाचून झाल्यानंतर अधिक सविस्तर लिहीन.
Camil Parkhe July 29, 2025

Friday, May 2, 2025

 सायमन मार्टिन

वसईची पहिल्यांदा ओळख झाली ती शालेय पाठ्यपुस्तकातून. चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेला अरबी समुद्रकिनारचा वसईचा किल्ला जिंकून घेते असा इतिहासातील तो एक धडा होता.
त्याआधी वसई येथे सत्ता असलेल्या पोर्तुगीजांनी सात बेटांचे मुंबई बंदर ब्रिटिशांना लग्नात चक्क आंदण किंवा हुंडा म्हणून दिले होते आणि या घटनेने कालांतराने भारतीय उपखंडाचा इतिहास बदलला होता.
लहानपणापासून वसई डोक्यात राहिली होती ती अशा पाठ्यपुस्तकातील नोंदीतून.
नंतर `फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची वसई' अशी एक नवी ओळख निर्माण झाली.
तर या वसईशी नंतर माझे घट्ट ऋणानुबंध निर्माण होतील असे कधी वाटलेही नव्हते, मात्र पुण्यातील मॉडेल कॉलनीतील विद्याभवन शाळेचे प्रिंसिपल फादर नेल्सन मच्याडो यांच्यामुळे असे झाले.
त्यामुळे गेली तिसेक वर्षे वर्षातून किमान एकदा माझी वसईला भेट असतेच.
मागच्या महिन्याअखेरीस पुन्हा एकदा वसईला तीन दिवसांचा दौरा झाला. आम्ही दोघेही गेलो होतो.
आणि यावेळचे निमित्त होते सायमन मार्टिन यांच्या " आत्म्याचे संगीत" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि मार्टिन यांनी २३ फेब्रुवारीला आयोजित केलेला तेरावा वसई साहित्य आणि कला उत्सव.
वसई आणि साहित्य व कला यांचे अत्यंत घट्ट नाते आहे.
तसे पाहिले तर पालघर जिल्ह्यात येणारा वसई हा एक तालुकावजा परीसर. मात्र या चिमुकल्या परिसराचा एक आगळावेगळा ऐतिहासिक अन सांस्कृतिक वारसा आहे.
गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश साडेचार शतके पोर्तुगीजांची वसाहत होता.
त्याचप्रमाणे अरबी समुद्राला लागून असलेला वसई परीसरसुद्धा अनेक वर्षे पोर्तुगालची वसाहत होता.
वसईतला एके काळी बहुसंख्येने असलेला कॅथोलीक किंवा ख्रिस्ती समाज या पोर्तुगालच्या राजवटीचा एक परिणाम.
१९६१ च्या गोवा मुक्तीनंतरसुद्धा तिथल्या निज गोंयकारांच्या तीन पिढयांना पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरीकत्व घेता येतो. यासाठी आजही भली मोठी रांग असते.
वसई काही शतकांआधीच पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त झाल्याने वसईतील लोकांना मात्र ही सुविधा नाही. .
मराठी ख्रिस्ती उपासनेत म्हणजे मिस्साविधींत मराठी गायने पेटी, तबला, किबोर्ड आणि गिटार वगैरे वाद्यांच्या सुरांत ऐकावी तर वसई येथेच. रविवारी आणि सणावारी देवळांत फादरांचे मराठीतील प्रवचनसुद्धा.
इथल्या कॅथोलीक समाजाने महाराष्ट्रातील मराठी साहित्य, आणि संस्कृती बहुविध आणि समृद्ध करण्याचे मोठे योगदान दिले आहे.
वर्षभर वसईत जितके साहित्यिक आणि सांस्कृतिक मेळावे आणि उत्सव होत असतात तितके मला वाटते महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही अशा छोट्याशा परिसरात होत नसतील.
सायमन मार्टिन यांच्या साहित्य मेळाव्यास हजर राहून मी परतत होतो तेव्हाच दुसऱ्या एका साहित्य मेळाव्याचे फलक माझ्या नजरेस पडले होते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मराठी साहित्यातील योगदान सर्वश्रुत आहे.
वसईतील इतर ज्येष्ठ साहित्यिकांमध्ये विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो, फादर फ्रान्सिस कोरीया, सिसिलिया कार्व्हालो, फादर मायकल जी. आणि कवी तसेच हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असलेल्या सायमन मार्टिन यांचा समावेश करता येईल.
नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर वसई परिसरातील एका अनोख्या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.
बिल्डरांच्या विळख्यातून हिरवाईने नटलेल्या वसईचे संरक्षण करावे या हेतूने सुवार्ता मासिकाचे संपादक असलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हरीत वसई हे आंदोलन सुरु केले होते तेव्हा या आंदोलनात सायमन मार्टिन खूप सक्रिय होते.
बिल्डर माफियाकडून जिवाला धोका पोहोचण्याची जोखीम पत्करून हे आंदोलन दीर्घकाळ चालू राहिले आणि काही प्रमाणात तरी वसई आजही हरीत राहिली आहे.
वसईच्या विविध गावांत फेरफटका मारताना तिथली हिरवाई आजही मला खूप आनंदीत करते आणि त्यावेळी हरीत वसई आंदोलनाची आपसूक आठवण येते.
सायमन मार्टिन गेली अनेक वर्षे भुईगाव डोंगरी येथील सहयोग केअर सेंटरच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. त्याशिवाय साहित्यिक आणि कार्यकर्ता म्हणून त्यांची लेखणी आणि वाणीसुद्धा परजत असते .
"आत्म्याचं संगीत " हा त्यांचा अकरावा काव्यसंग्रह.
एका बैठकीतून वाचून व्हावा असा हा काव्यसंग्रह आहे आणि त्यातील सर्वच कविता तर फक्त सात आठ ओळींच्या आहेत मात्र या कविता खूप आशयपूर्ण आहेत,
माझ्यासारखा कवितेशी फारसा किंवा काहीही संबंध नसलेला माणूससुद्धा सायमन मार्टिन यांच्या कविता असलेला हा छोटासा संग्रह एकदा हातात घेतल्यानंतर पूर्णतः वाचून मगच खाली ठेवतो.
सायमन मार्टिन यांच्या कवितांची अशी ताकद आहे.
अष्टगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाचे सुरेख मुखपृष्ठ आणि आतील चित्रे प्रदीप म्हापसेकर यांची आहेत.
या वसई भेटीच्या निमित्ताने आतापर्यंत फक्त इथेच नेहेमी भेटणारे सॅबी परेरा, ख्रिस्तोफर रिबेलो, इमेल अल्मेडा, जेरोम सायमन फर्गोज अशा अनेकांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली. साहजिकच फोटो सेशनही झाले.
साहित्य उत्सव संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी निवांतपणे सायमन मार्टिन यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही झाली.
त्या भेटीगाठी आणि चर्चेसंबंधी नंतर कधीतरी.

Tuesday, July 30, 2024

सेंट ॲन्स चर्च

 विविध धर्मांची प्रार्थनास्थळे आणि प्रतिके सामान्य माणसांनासुद्धा ओळखता येतात.

पुणे कॅम्पात पुलगेट बस स्टँडच्याजवळ सोलापूर बझार येथले हे प्रार्थनास्थळ मात्र त्याला अपवाद असेल.
अगदी जवळ आल्यानंतरसुद्धा हे कोडे लवकर सुटत नाही, याचे कारण या वास्तूच्या प्रथमदर्शनी असणारे गोपुर शैलीचे बांधकाम.
त्याशिवाय समोरच्या खालच्या भागात असलेली नक्षीवजा कलाकुसर आणि गोपुराच्या केंद्रस्थानी असलेले कमळाच्या पाकळ्यांवर असलेले शिल्प या कोड्यात भर घालते.
वास्तूच्या कळसाच्या टोकाला असलेला छोटासा लाल रंगाचा क्रूस ही वास्तू म्हणजे एक ख्रिस्ती देऊळ आहे हे सांगत असतो.
पुण्यातील सोलापूर बझार येथील हे सेंट ॲन्स चर्च हे मात्र केवळ आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गोपुर शैलीच्या वास्तुबाबतच प्रसिद्ध नाही.
या रोमन कॅथोलिक चर्चचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे दर रविवारी इंग्रजी भाषेशिवाय तामिळ भाषेतसुद्धा एक मिस्साविधी साजरा केला जातो.
पुणे आणि कोल्हापूर शहरांसह आणि चार महसूल जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे डायोसिस म्हणजे पुणे धर्मप्रांतातील काही अगदी मोजक्या चर्चेसमध्ये तामिळ भाषेत प्रार्थनाविधी होत असतो.
आता या चर्चमधल्या गोपुर बांधकामशैलीविषयी.
पुण्यात पहिले चर्च बांधले गेले ते सवाई माधवराव पेशवे यांनी १७९२ साली दिलेल्या जमिनीवर. पेशव्याच्या सैन्यात असलेल्या पोर्तुगालच्या ताब्यात असलेल्या गोव्यातील पोर्तुगीज अधिकारी आणि सैनिकांसाठी हे चर्च बांधले गेले तेव्हा साहजिकच ते युरोपियन बांधकाम शैलीत होते.
क्वार्टर गेटला सेंट ऑर्नेलाज स्कुलच्या आवारात असलेले हे अवर लेडी ऑफ इम्यॅक्युलेट कन्स्पेशन चर्च हे आज `सिटी चर्च' या छोट्याशा आणि सर्वांना कळेल अशा नावानेच ओळखले जाते.
मुंबई आणि वसई वगळता महाराष्ट्रातील हे सिटी चर्च सर्वात जुने चर्च.
त्यानंतर पुणे शहरात बांधली गेलेली सर्वच विविध रोमन कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट चर्चेस पाश्चात्य गॉथिक बांधकाम शैलीत आहेत.
स्वातंत्र्यानंतर सोलापूर बझार परिसरात नवे चर्च बांधताना मूळचे युरोपियन असलेल्या येशूसंघीय किंवा जेसुईट फादरांनी मात्र भारतीय बांधकाम शैलीचा वापर केला.
गोपुर शैलीतील हे सेंट ॲन्स चर्च नावाचे हे देऊळ अशाप्रकारे १९६२ साली उभे राहिले.
हे चर्च जर्मन फादर जॉन बाप्टिस्ट हॅश (मृत्यू १९८९) यांनी बांधले. या परिसरात त्यांनी तामिळ माध्यमाची प्राथमिक शाळासुद्धा सुरु केली होती.
फादर हॅश स्वतः उत्तम तामिळ बोलत. तामिळ शिकण्यासाठी ते चेन्नई येथे काही वर्षे राहिले होते. पुण्यातच त्यांचे निधन झाले आणि हडपसर येथे त्यांची कबर आहे.
स्थानिक वास्तुपरंपरेनुसार आणि प्रतिकांनुसार प्रार्थनास्थळांचे बांधकाम हा कॅथोलिक चर्चच्या सांस्कृतीकरण किंवा inculturation चा भाग असतो, त्यात विशेष असे काही नाही
सेंट ॲन ही येशू ख्रिस्ताची आजी, मदर मेरी किंवा मारीयाची आई.
या गोपुराच्या प्रथमदर्शनी भागाच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी कमळाच्या पाकळ्यांवर काचेने आच्छादित असलेले एक शिल्प आहे.
सेंट ॲन आपल्या लहानग्या मुलीकडे - मदर मेरीकडे - प्रेमभावनेने पाहत आहे असे हे शिल्प आहे.
आता या चर्चमध्ये तामिळ भाषेत होणारा रविवारचा मिस्साविधी.
पुण्यातल्या या चर्चमध्ये तामिळ लोकांसाठी त्यांच्या तामिळ मातृभाषेत दर रविवारी सकाळी सात वाजता प्रार्थनाविधी होतो.
जगभरातील प्रत्येक चर्चच्या सदस्यांची एक आगळीवेगळी ओळख असते. सेंट ॲन्स चर्चसुद्धा त्याला अपवाद नाही.
या परिसरातील अनेक कॅथोलिक लोक मूळचे तामिळनाडू येथील आहेत. अशीच स्थिती खडकीच्या सेंट इग्नेशियस चर्च आणि इतर काही चर्चेसची आहे.
त्यामुळे येथे दर रविवारी तामिळ भाषेत प्रार्थना होते, त्यासाठी इतर चर्चमध्ये असणारे तामिळ भाषक धर्मगुरु खास बोलावले जातात. फादर रॉक अल्फान्सो हे सेंट ॲन्स चर्चचे धर्मगुरु आहेत.
ख्रिस्ती धर्मात चर्चमध्ये नेहेमीच सामुदायिक प्रार्थना होत असते, कॅथोलिक चर्चमध्ये या उपासनेला Holy Mass किवा मिस्साविधी (प्रभुभोजन) म्हणतात.
Missa हा मूळचा लॅटिन शब्द. रविवारच्या मिस्साविधीला चर्चच्या सर्व सदस्यांनी हजर राहावे अशी अपेक्षा असते. इस्लाम धर्मात जसे शुक्रवारच्या प्रार्थनेला महत्वाचे स्थान आहे तसेच
सेंट ॲन आणि सेंट जोकीम यांचा २६ जुलै रोजी असणारा सण आजीआजोबांचा - ग्रॅन्डपॅरेन्ट्स डे - म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी सोलापूर बझार इथले हे सेंट ॲन्स चर्च पुढील रविवारी, २८ जुलै रोजी, सेंट ॲनचा सण -फेस्त - साजरा करणार आहे.
पुणे धर्मप्रांताचे बिशप जॉन रॉड्रीग्स या सणाच्या मिस्साविधीचे मुख्य पुरोहित असतील.
Camil Parkhe, July 20, 2024

Sunday, December 17, 2023

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक

दिवाळी येण्याआधीच दसऱ्याचा मुहूर्त साधून दिवाळी अंकांचं प्रकाशन केलं जातं. तसं आतापर्यंत डिसेंबरच्या मध्यात कॅरोल सिंगर्स दारापर्यंत पोहोचण्याआधीच दोन नाताळ विशेषांक हाती पडले आहेत.

 मराठी साहित्य विश्वात दिवाळी अंकांना एक वेगळेच महत्त्व आहे. मोबाईल युग सुरु झाल्यापासून आणि त्यानंतरच्या समाजमाध्यमांचं सार्वत्रिकिकरणामुळं पुस्तकं आणि नियतकालिकं वाचणं कमी झालं असलं तरी याहीवर्षी अनेकांनी उत्साहानं दिवाळी अंक काढलीच.

आणि आता गडबड सुरु आहे ती ख्रिसमस विशेषांकांची.

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक काढण्याची परंपरा तशी खूप जुनी असली तरी याविषयी अनेकांना कदाचित माहिती नसेलही.
`निरोप्या' हे १९०३ साली जर्मन धर्मगुरु हेन्री डोरींग यांनी सुरु केलेले मासिक. पहिल्या महायुद्धाचा काही काळ वगळता आजतागायत प्रसिद्ध होते आहे, गेली काही वर्षे या मासिकाचा नाताळ विशेषांक प्रसिद्ध होतो. `निरोप्या' मासिक पुण्यातल्या स्नेहसदनमधून जेसुईट संस्था प्रसिद्ध करते. फादर भाऊसाहेब संसारे निरोप्याचे संपादक आहेत.
माझ्या लिखाणाची सुरुवातच मुळी 'निरोप्या'तून झाली. श्रीरामपुरात मी शाळेत असताना १९७४ साली.
`निरोप्या' च्या या नाताळ विशेषांकात महात्मा जोतिबा फुले यांना आपल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिकवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचे मी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध झाले आहे. महात्मा फुले अभ्यासकांना हे चरित्र उपयुक्त ठरु शकेल.

`ज्ञानोदय' हे मराठीतील सर्वात दीर्घायुष्य लाभलेलं नियतकालिक. स्थापना १८४२.
मराठीतलं पहिलं नियतकालिक बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली सुरु केलं होतं. डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी `ज्ञानोदया'ची संपादकाची धुरा घेतल्यानंतरचा हा पहिलाच नाताळ विशेषांक. कांतिश प्रभाकर तेलोरे अतिथी संपादक आहेत..

मराठी पत्रकारितेच्या आणि नियतकालिकांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेली मराठीतील सर्वांत जुनी असलेली ही दोन्ही नियतकालिके ही ख्रिस्ती संस्थांमार्फत चालवली जातात हे विशेष.
अर्थात या संस्थांचं पाठबळ हे यामागचे प्रमुख कारण.
यापैकी निदान `निरोप्या' तरी स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे हे या अंकाच्या रंगीत आणि कृष्णधवल जाहिरातींतून दिसते.
वसईतून प्रसिद्ध होणाऱ्या `सुवार्ता' मासिकाचा सुद्धा नाताळ विशेषांक असतो. फादर डॉ अनिल परेरा `सुवार्ता'चे संपादक आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो अनेक वर्षे - जवळजवळ पंचवीस वर्षे - सुवार्ताचे संपादक होते.
इतर नाताळ विशेषांक आणि या नियकालिकांचे संपादक पुढीलप्रमाणे आहेत
*सुवार्ता* (मासिक) - फा. (डॉ.) अनिल परेरा संपादक आहेत
*कादोडी* (वार्षिक) - ख्रिस्तोफर रिबेलो संपादक आहेत
*ख्रिस्तायन* (ऑनलाइन नाताळ अंक) - ख्रिस्तोफर रिबेलो संपादक आहेत
*गीत* (वार्षिक नाताळ अंक) - लेस्ली डायस संपादक आहेत
*जनपरिवार* (साप्ताहिक) - अँड्र्यू कोलासो संपादक आहेत
*कॅथॉलिक* (त्रैमासिक) - स्टीफन आय परेरा संपादक आहेत
*निर्भय आंदोलन* (द्वैमासिक) - मनवेल तुस्कानो संपादक आहेत.
दयानंद ठोंबरे हे नव्वदच्या दशकापासून माझे सहकारी, मी पुण्याला इंडियन एक्सप्रेसमध्ये १९८९ ला रुजू झालो आणि लवकरच ठोंबरेसुद्धा एक्सप्रेस ग्रुपच्या लोकसत्ता दैनिकात आले. माझ्या अनेक मराठी पुस्तकांचे ते पहिले वाचक, ही पुस्तकं त्यांच्या चिकित्सक नजरेखालून गेली आहेत. गेली अकरा वर्षे दयानंद ठोंबरे अलौकिक या नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत. काही वर्षांपूर्वी एका विशेषांकासाठी मी लिहिलेही आहे.
पिंपरी चिंचवड येथील फ्रान्सिस गजभिव गेली सात वर्षे 'शब्द' नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत. या विशेषांकात वैचारीक, ललित, कविता वगैरे विविध साहित्य प्रकार असतात.
नव्या डिजिटल युगात काही ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन असतात.
गेली ११ वर्षे प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) ह्या स्वरुपात वसई येथून ‘कादोडी’ अंकाचे प्रकाशन ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांच्या संपादानाखाली होत आहे. या अंकांची जन्मकथा संपादक ख्रिस्तोफर रिबेलो यांच्याच या शब्दांत: .
``एका फेसबुक ग्रुपवर काही साहित्यप्रेमींची एकत्र येण्याविषयी चर्चा झाली, त्यानंतर “कुपारी कट्टा” या त्यांच्या स्थानिक समाजाच्या नावाने ते महिन्याला एकदा एकत्र भेटू लागले, जमणारे सर्व साहित्यप्रेमी हे एकाच, “कुपारी” समाजाचे आणि “कादोडी” (वसईच्या उत्तर पट्ट्यातील सामवेदी कुपारी समाजाची बोलीभाषा) ही एक भाषा बोलणारे असल्यामुळे ह्या भाषेच्या उद्धारासाठी काहीतरी केले पाहिजे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यातच ह्या भाषेच्या साहित्याला वाव देणारा अंक प्रकाशित करण्याची कल्पना पुढे आली.
“कादोडी” या भाषेला व्याकरण नाही, या भाषेत उत्तम गोडवा आहे, खूप सुंदर अशा कथा आहेत, अनेक प्रकारची गीते आहेत, पण हे सगळे मौखिक स्वरुपात आहेत. नव्या पिढीला हे सगळे अज्ञात आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचविता यावे, तसेच मौखिक स्वरुपात स्वरुपात असलेला साहित्याचा खजिना कुपारी समाजाच्या तळागाळात नेता यावा तसेच तरुण वर्गात आपल्या भाषेत नवीन लिहिण्याची आवड निर्माण व्हावी आणि यादृष्टीने प्रयत्न व्हावेत म्हणून गेली ११ वर्षे प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) ह्या स्वरुपात ‘कादोडी’ अंकाचे प्रकाशन ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांच्या संपादनाखाली होत आहे. ''
यावर्षी काही दिवाळी अंकात मी लिहिलं आहे, तसंच एका नाताळ अंकातही माझा एक लेख असणार आहे.
नेहेमीप्रमाणं इथं मी नंतर तो टाकणार आहेच. लेखाचा विषय अगदी वेगळाच आहे, इथं टाकल्यावर मी काय म्हणतो यावर तुमचंही कदाचित एकमत होईल.
दिवाळी अंकांतून जशा मोठ्या आर्थिक उलाढाली होतात तशाच या नाताळ अंकांतून सुद्धा होतातच.
अपवाद काही हौशी संपादकांचा जे निव्वळ निखळ आनंदासाठी आपलं काम, नोकरी सांभाळून यासाठी वेळ देत असतात. आणि नाताळाच्या सणानिमित्त वैचारिक फराळ पुरवत असतात.
पंचवीस डिसेंबर तोंडावर आला आहे. नाताळची तयारी घरोघरी होत आहेत. काही नाताळ विशेषांक गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले आहेत.
या दिवसांत आणि या क्षणाला यापैकी अनेक नाताळ विशेषांकांचे संपादक अक्षरशः लगीनघाईत असतील. त्यांच्याशी फोनवर संवाद साधताना हे लक्षात आले.
ख्रिसमसबरोबरच या नाताळ विशेषांकांचीही मी वाट पाहत आहे.


Camil Parkhe 

Friday, July 14, 2023


Portugal Citizenship: फक्त गोवेकरांनाच नाही इतर भारतीयांना सुद्धा पोर्तुगालच्या नागरीकत्वाची संधी

Portugal citizenship for Indian: गोव्यातल्या, तसेच दमण आणि दीव, दादरा, नगर हवेली इथल्या `काही' नागरिकांना, - सर्वांना नव्हे -  पोर्तुगालचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आजसुद्धा मिळू शकतो. मी वर नमूद केलेले प्रदेश एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती होत्या, पोर्तुगाल इंडियाचे भाग होते.दिनांक १९ डिसेंबर १९६१ ला पोर्तुगालची भारतातली सत्ता   संपृष्टात आली,.       

 मात्र १९६१ पूर्वी या पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना आणि त्यांच्या पुढच्या तीन पिढींतील लोकांना आजही पोर्तुगीज नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळू शकते, पोर्तुगालच्या कायद्यानुसार तो त्यांचा एक हक्क आहे. खूप काळापूर्वी म्हणजे  सतराव्या शतकात पोर्तुगीजांचे राज्य असलेल्या वसईतील किंवा पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या  आणि ब्रिटिशांना लग्नात आंदण म्हणून मिळालेल्या सात बेटांच्या मुंबईतील लोकांना अर्थात ही सुविधा मिळणार नाही .

गोवा आणि पोर्तुगीजांची जुन्या वसाहती असलेल्या भारतातील इतर प्रदेशांतील अनेक लोकांनां माहित नसलेला हा विषय आता चर्चेला  आला आहे. तसे गोव्याबाबत इतर भारतीयांना अनेक गोष्टी माहित नसतात, जसे कि २०२४ च्या निवडणुकीसाठी धार्मिक ध्रुवीकरणाच्या उद्दिष्टाने भाजपतर्फे चर्चेला आणला गेलेला  युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा इथे गेली एक शतकापासून विनातक्रार अंमलात आहे ! 

पोर्तुगालने आपल्या जुन्या वसाहतीतील लोकांना किंवा त्यांच्या वंशजांना  पोर्तुगालचे नागरिकत्व बहाल करण्याचा हा विषय आता चर्चेला येण्यासाठी एक निमित्त घडले आहे. आयरिश रॉड्रिग्स या गोव्यातील कार्यकर्ता आणि वकील असणाऱ्या व्यक्तीने लिस्बन येथील आपल्या भेटीत पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरिकत्व  स्वीकारले आणि गोव्यात आणि भारतात या चर्चेला नव्याने तोंड फुटले.

इंडियन एक्सप्रेसने अलीकडेच म्हणजे २७ जून २०२३ ला  पान एकवर अँकरची बातमी या विषयाला धरुन छापली होती.  बातमीचा मथळा होता :

Of 70,000 surrendered passports in Idia in a decade, 40% were in Goa 

तर हे आयरिश रॉड्रिक्स नक्की आहेत तरी कोण कि ज्यांच्या नागरिकत्व बदलाच्या निमित्ताने या मुद्द्यावर राष्ट्रपातळीवर चर्चा व्हावी?

पणजीतल्या मिरामार समुद्रकिनारी असलेल्या धेम्पे कॉलेजात सत्तरच्या दशकात मी बीए च्या पहिल्या वर्षाला होतो, तेव्हा  एक चष्माधारी,कुरळ्या केसांचा आयरीश बारावीला होता. मी कॉलेजच्या आर्ट सर्कल या भित्तिपत्रकाचा संपादक होतो, कॉलेजच्या स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सक्रिय होतो आणि त्यामुळे कॉलेजच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये  आणि अख्ख्या स्टाफमध्ये  पूर्ण परिचित होतो.  कॉलेजच्या वेगवेगळ्या शाखांतील आणि वर्गातील विद्यार्थ्यांशी/ विद्यार्थिनींशी माझाही संपर्क असायचा.

तर तेव्हा हा बंडखोर स्वभावाचा हा मुलगा लक्षात राहिला. नंतरच्या काळात गोवा आणि द नवहिंद टाइम्स सोडून मी पुण्याला आलो, इथल्या इंग्रजी दैनिकांत कामालालागलो तरी  आयरीशचे  नाव गोव्यातल्या बातम्यांतून वाचत राहिलो.

मागे काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमांवर मी त्याच्यावर लिहिले होते. विषय राष्ट्रपातळीवरचा होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणीयांच्या मुलीच्या संदर्भात गोव्यातल्या एका हॉटेलच्या परमिटबाबत वाद होता आणि सामाजिक कार्यकर्ता तसेच वकील या नात्याने आयरीश रॉड्रीक्सने हा मुद्दा लावून धरला होता.

तर गोव्यात एक परिचित नाव असलेल्या  सामाजिक/  माहिती अधिकार  कार्यकर्ता आयरीश रॉड्रीक्सने पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारावे हा अनेकांना धक्का होता, आणि या घटनेला साहजिकच बातमीचे मूल्य होते. वेगवेगळ्या माध्यमांतून, दैनिकांच्या सदरांतून आयरिश रॉड्रीक्स यांच्या या बदललेल्या नागरिकतत्वावर  आणि भारतातील (आणि इतर जुन्या वसाहतींतीलही) लोकांना पोर्तुगालच्या या नागरिकत्व देण्याबाबत लिहिले जात आहे.

गोव्यात मी द नवहिंद टाईम्सला असताना `गोमंतक’ दैनिकात असलेल्या  वामन प्रभू यांनी ``पोर्तुगीज पासपोर्टचे मायाजाल ! याविषयी लिहिले आहे. 

``ॲड आयरिश रॉड्रिग्ज यांच्यासारखा फायरब्रॅन्ड सामाजिक कार्यकर्ताही नुकताच या मायाजालात अडकल्यानंतर नजिकच्या काळात अजून किती गोमंतकीय नागरिक भारतीय नागरिकत्व आणि मताधिकार डावलून तोच मार्ग स्वीकारतील याचा आताच अंदाज बांधता येणार नाही.

पोर्तुगीज पासपोर्टच्या मायाजालात सापडलेल्या अनेकानी त्या संधीचे सोने करून आपली आणि कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारली असेलही परंतु आज सहा दशकानंतरही गोमंतकीयांचे पोर्तुगीज पासपोर्टचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही वा होणारही नाही हेच स्पष्ट चित्र पुढे येत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून ऊपलब्ध करण्यात आलेल्या एका आकडेवारून दिसून येते. २०११ ते २०२२ दरम्यानच्या अकरा वर्षांच्या काळात सत्तर हजारांहून अधिक भारतीय नागरिकानी आपले पासपोर्ट देशातील वेगवेगळ्या विभागीय पासपोर्ट कार्यालयात 'सरेंडर ' केल्याचे ही आकडेवारी सांगते आणि यामध्ये गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू , दिल्ली आणि चंदिगढ या आठ प्रदेशातील नागरिकांची संख्या ९० टक्क्याहून अधिक भरते आणि त्यातही विशेष असे की भारतीय नागरिकत्व सोडून देऊन पोर्तुगीज पासपोर्ट धारण करणाऱ्यांमध्ये गोमंतकीय नागरिकांची संख्या तब्बल ४0 टक्क्याहून अधिक आहे.

 जगातील जवळपास १८८ देशांचा व्हिसा पोर्तुगीज नागरिकत्व मिळवल्यानंतर आपसूकच विनायासे ऊपलब्ध होतो याच कारणावरून जर भारतीय नागरिकत्व झिडकारून पोर्तुगीज पासपोर्ट त्यानी घेतला असेल तर या पासपोर्टमुळे युरोप वा अन्य काही देशातील मिळणाऱ्या रोजगाराच्या वा अन्य संधी साध्य करून घेण्यासाठी युवा पिढीने पोर्तुगीज पासपोर्ट मिळवला तर त्यांचे चुकतेय असे म्हणता येणार नाही

वंश प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज नागरिक म्हणून आवश्यक प्रमाणपत्रांसह पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी केल्यास लिस्बनमध्ये एक दोन दिवसातच पोर्तुगीज पासपोर्ट कसा ऊपलब्ध होऊ शकतो यावरही आयरिश रॉड्रिग्ज यांनी आपण स्वीकारलेल्या पोर्तुगीज नागरिकत्वाचे समर्थन करताना स्पष्ट केल्याने अनेकांचा ऊत्साह बळावलाही असेल,

पोर्तुगीज पासपोर्ट हा कोणालाही अनेक युरोपियन आणि अन्य ब-याच देशात व्हिसामुक्त प्रवेश देणारा आधार तर आहेच पण त्याचबरोबर पात्रतेच्या वा अफाट गुणवत्तेच्या आधारे कोणीही आपले करियर करायची महत्वाकांक्षा बाळगून योग्य ती संधी साधण्याचा प्रयत्न करत असेल तर पोर्तुगालचे महाद्वार त्यासाठी खूपच ऊपयुक्त ठरू शकते .‘

पोर्तुगालची भारतातली राजवट संपून दहाबारा वर्षे लोटल्यानंतर गोव्यात मी शिकत असताना माझ्या हॉस्टेलमधली काही मुले पोर्तुगीज होती, म्हणजे त्यांचे आईवडील पोर्तुगाल किंवा युरोपात होते आणि या मुलांचे पासपोर्ट्स पोर्तुगीज होते. सज्ञान झाल्यानंतर त्यांना भारतात राहायचे असल्यास पोर्तुगीज पासपोर्टचा त्याग करावा लागणार होता. 

मात्र वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच ही मुले भुर्रकन उडून परदेशात गेली. त्यानंतरही माझ्या बरोबर शिकणारी अनेक मुलेमुली अशाचप्रकारे भारत सोडून पोर्तुगालला आणि नंतर इतरत्र स्थायिक झाली आहेत.  अनेक नातेवाईकांनी पोर्तुगालने दिलेल्या या सुविधेचा वापर करुन युरोपात नागरिकत्व मिळवले आहे.  चारपाच वर्षांनंतर ते गोव्यात, भारतात भेटीगाठीसाठी येत असतात.

कॉमनवेल्थचे सभासद म्हणून किंवा एकेकाळी इंग्लंडची वसाहत असलेल्या भारतातील नागरिकांना युनायटेड किंगडमचे नागरिक  म्हणून हक्क बहाल करण्यात आले तर काय होईल? आपल्या देशातील किती नागरिकांना ब्रिटिश पासपोर्ट म्हणजेच ब्रिटिश नागरीकत्व  घेणे आवडेल?

आमच्या कॉलनीत विसेक इमारती आहेत आणि प्रत्येक इमारतींमध्ये किमान एका  घरातली एक व्यक्ती युरोपात, अमेरिकेत किंवा इतर राष्ट्रांत आहे. यापैकी कुणाचाही कायमस्वरुपी मायदेशी परतण्याचा इरादा नाही. मुंबईत छोट्या घरात राहणारी व्यक्ती ग्रामीण महाराष्ट्रात जेथे पिण्याचे पाणी आठवडातून एकदोनदा येते विजपुरवठ्याबाबत सतत बोंबाबोंब असते  त्या आपल्या गावी परतण्याचा विचारही करत नसतात अगदी तसेच.   

त्याशिवाय अनेक जण या देशांत जाण्याची वाट पाहत आहेत  ते वेगळेच. इकडच्या भेटीत ही मंडळी त्या देशातल्या सार्वजनिक वर्तनाबाबत, शिष्टाचार, सरकारी कामकाज, वगैरेंबाबत कौतुक करत भारतातल्या भ्रष्टाचारावर, सरकारी कामकाजावर आगपापड  करत  असतात.

अशा परिस्थितीत इंग्लंडने भारतीयांसमोर नागरिकत्वाचा प्रस्ताव ठेवला तर काय होईल असे मी विचारले आहे. मला वाटते हे  नागरीकत्व मिळवण्यासाठी रांगच रांगा लागतील, चेंगराचेंगरीही होईल. आयरिश रॉड्रीग्स प्रकरणानंतर हा विषय चर्चेला आला आहे हे खरेच आहे.

 आता पुढच्या गोवा दौऱ्यात आयरिशला मुद्दाम भेटावे असे वाटू लागलेय.  

 https://www.esakal.com/global/portugal-goa-india-citizenship-passport-diu-daman-dadra-dnb8577