Did you like the article?

Saturday, August 14, 2021

 

ऑलिम्पिक स्पर्धा, चिमुकले देश आणि आपला बलाढ्य भारत…     एक चमत्कारिक वास्तव  सत्य!
पडघम - क्रीडानामा
कामिल पारखे
‘अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 09 August 2021
  • पडघमक्रीडानामाखाशाबा जाधवKhashaba Jadhavऑलिम्पिकOlympicलियंडर पेसLeander PaesफुटबॉलFootball

युरोपातल्या दीड-दोन महिन्यांच्या वास्तव्यात जाणवले की, आता डोक्यावरचे केस कापण्याची गरज आहे. आमच्या रोजच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाची वेळ संपल्यावर निवासस्थानापासून जवळ असलेल्या बांकिया येथून रेल्वेने राजधानी सोफिया शहरात गेलो आणि एक केशकर्तनालय शोधून काढले. सोफिया शहरात आणि इतरही बल्गेरियन शहरांत दुकानांतील पारदर्शक काचांमुळे बाहेरून आतील सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होते. त्यामुळे मी हबकून गेलो होतो.     

आत सात-आठ खुर्च्यांवर बसलेल्या लोकांचे केस कापले जात होते आणि या केस कापणाऱ्या सर्व व्यक्ती चक्क विविध वयाच्या महिला होत्या!

ही घटना तशी खूप जुनी आहे. सोव्हिएत रशियाचा दौरा आणि त्यानंतर बल्गेरियातील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी भारतातून निवडल्या गेलेल्या तीस पत्रकारांमध्ये ‘गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट’चा सरचिटणीस आणि ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून माझाही समावेश होता. युरोपातील कम्युनिस्ट राजवटींचा डोलारा एकापाठोपाठ वेगाने खाली कोसळण्याआधी केवळ तीन-चार वर्षे आधी म्हणजे १९८६ साली मी या साम्यवादी देशांत वावरत होतो आणि त्यांच्या  आगळ्यावेगळ्या जीवनप्रणालीचा अनुभव घेत होतो. हेअर कटिंग सलून दुकानातला प्रसंग त्यापैकीच. 

थक्क होऊन मी आणि माझ्याबरोबरचा एक पत्रकार सहकारी दाराबाहेरच घुटमुळत होतो. आम्ही आशियाई व्यक्ती अशा प्रकारे दरवाजाबाहेर विचारात पडलेलो असताना कुणीतरी आम्हाला आत येण्याची खूण केली. आम्ही दोघे आत शिरलो. आमच्या डोक्यावरच्या वाढलेल्या केसांकडे पाहून आम्ही त्यांचे ग्राहक आहेत, हे स्पष्ट दिसतच होते. 

दाखवलेल्या एका रिकाम्या खुर्चीवर मी बसलो आणि एका तरुणीने माझे केस कापले. त्या वेळी माझे वय होते अवघे सव्वीस. एक तरुणी आपले केस कापत आहे, या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवणे अवघड जात होते. बल्गेरियन भाषेची रशियन किंवा सिरिलिक लिपी वाचण्यास मी शिकलो होतो, तरी संभाषण करणे शक्य नव्हते. त्यामुळे मुकाट्याने मान व डोके त्या केस कापणाऱ्या तरुणीकडे सोपवून शांत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

दहा-वीस मिनिटांतच केस कापून आम्ही दोघेही बाहेर पडलो, ते अगदी हवेत तरंगतच. त्या वेळी केस कापण्यासाठी मी बल्गेरियन चलन असलेले किती लेव्ह दिले असतील, हे आता स्पष्ट आठवत नाही. यजमान ‘बल्गेरियन युनियन ऑफ जर्नालिस्ट’ने आम्हाला शिष्यवृत्ती म्हणून बाराशे लेव्ह दिले असल्याने त्याबद्दल फारशी चिंता नव्हती.

निवासस्थानी पोहोचल्यावर तर गंमतच झाली. केशकर्तनालयात आमचे केस महिलांनी कापले, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी अनेक जणांनी सोफियाला जाऊन आपले केस कापून घेतले, हे सांगायलाच नको. मात्र ज्यांचे केस मध्यमवयीन किंवा वयस्कर महिलांनी कापले त्यांचा खूप हिरमोड झाला होता, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होते.    

कुठल्याही साम्यवादी देशांत एकही महिला राष्ट्रप्रमुखपदावर कधी आली नव्हती. असे असले तरी या कम्युनिस्ट राष्ट्रांत लिंगाधारित शोषणाचे प्रमाण तसे कमी होते आणि महिला सबलीकरण मोठ्या प्रमाणात झाले होते हे नक्की. त्या केशकर्तनायालयात महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती हे त्याचेच एक द्योतक होते. तिथल्या हॉटेलांत पुरुष आणि महिला वेटर्ससुद्धा असायचे. आम्हा पत्रकारांना विविध ठिकाणी नेण्यासाठी आरामदायी आणि उबदार बसेस होत्या. त्यांच्या ड्रायव्हर महिलाही असत. ते पाहूनही मला धक्का बसला होता.

याचे कारण म्हणजे आपल्याकडे खूप वर्षांपूर्वी सरकारी वाहतूक सेवेत भरपूर गाजावाजा करून सुरू केलेली महिला कंडक्टरांची भरती आजही केवळ प्रतीकात्मक स्वरूपाची राहिलेली आहे. आपल्याला आजही महिला बस ड्रायव्हर ही संकल्पना धक्कादायक वाटते. आमच्या सहा अनुवादकांत पुरुष व महिलांचे प्रमाण समान होते आणि ते सर्व जण आपल्या स्वतःच्या कारने येत असत. त्यावरून त्यांच्या सांपत्तिक स्थितीचा आनंदच येत होता. बल्गेरियात लोकसंख्येचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने अविवाहित मुलींनी गर्भपात टाळावेत म्हणून भरपूर सवलती असायच्या, दाम्पत्यांनी दुसरे व तिसरे  मूल होऊ द्यावे, यासाठीही भरपूर आमिषे असायची.     

आपल्याकडे कल्पनाही करू शकणार नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी मी रशियात आणि बल्गेरियात अनुभवल्या. त्यापैकीच ही पुढील एक घटना.     

पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा भाग आटोपल्यानंतर नंतर काही आठवडे बसने प्रवास करत आम्ही बल्गेरियाच्या विविध शहरांना, योजनांना आणि प्रकल्पांना भेटी देत होते. साम्यवादी राज्यकर्त्यांच्या वैचारिक विचारसरणीच्या प्रचाराचाच तो एक भाग होता, हे उघड होते. या दौऱ्यादरम्यान आएके दिवशी आम्हाला एका शाळेत नेण्यात आले.

त्या शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावरच्या मोठ्या हॉलमध्ये अनेक छोटी छोटी मुले-मुली विविध खेळ खेळत होती, वेगवेगळ्या कसरती करत होती. ती मुले शाळेच्या पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक वर्गांतली म्हणजे तीन ते दहा-बारा वयोगटांतील होती. अ‍ॅथलेटिक खेळाडू घालतात, तसे बिकिनीसारखे कपडे त्यांच्या अंगांवर होते.

हे सर्व मी पहिल्यांदाच पाहत होतो. आपल्याकडे रस्त्यांवर डोंबारी लोक आपल्या बायका-मुलांसह ज्या प्रकारचे थरारक कसरती करतात, आपले शिडशिडीत शरीर रबरासारखे विविध कोनांत वाकवतात, शरीराची अक्षरशः घडी करून दाखवतात, अगदी तशाच पण आधुनिक, अतिशय सफाईदार, शैलीदार शारिरीक करामती  ती मुलं-मुली करत होती.

काही मुली अंगाभोवती रंगीबेरंगी कापडाच्या रिबिनी फिरवून कसरती करत होत्या, काही मुले अडथळ्यांची शर्यंत पार करत होते, काही मुले-मुली रंगीत फुग्यांभोवती आपले शरीर विविध कोनांत वाकवत होती, काही मुले नुसत्याच लांब उड्या मारत होती. कुणी आपल्या हातात असलेले गोल कडे स्वतःभोवती गरागरा फिरवत होते, त्या कड्यांमधून आपले शरीर आत-बाहेर नेत होते. तिथली वेगवेगळी छोटी-मोठी उपकरणे मी पहिल्यांदाच पाहत होतो. एक खेळ झाल्यावर ती मुले दुसऱ्या खेळांकडे वळत होती. त्यांचे प्रशिक्षक त्यांना विविध कसरती करण्याचे शिक्षण देत होते.       

श्रीरामपूरला माझ्या लहानपणी खास मुलांना खेळण्यासाठी, बागडण्यासाठी मैदाने, बगीचे वा जिमन्यॅशियम असायला पाहिजे, असे स्थानिक नगरपालिकेला व राजकीय पुढाऱ्यांना कधीच वाटले नाही. नगरपालिकेची एक तालीमशाळा होती, तिथे तरणीबांड मुले लाल मातीत कुस्ती खेळायची, मल्लखांबावर कसरती करायची. त्यामुळे माझ्या वयाची मुले-मुली क्रिकेट, पतंग उडवणे, सागरगोटे, विट्टी-दांडू, गोट्या खेळणे, दगड की माती किंवा चोर-शिपाई असे खेळ खेळायचे. यात कुठल्याही खेळांत खूप पारंगत व्हावे किंवा प्रावीण्य मिळवावे असे ना आम्हा मुलांना वाटायचे, ना आमच्या पालकांना. 

अभ्यास सोडून याच बाबतीत अधिक गुण उधळले तर कौतुक, प्रोत्साहन होण्याऐवजी फटके मिळण्याची, शिक्षा होण्याचीच शक्यता अधिक असायची.

बल्गेरियातील शाळेतील त्या लहानग्यांचे त्या विविध खेळांतील प्रावीण्य पाहून आम्ही सर्व पत्रकार थक्क झालो होतो. त्यानंतर आम्हा पत्रकारांच्या प्रत्येक भेटीच्या शेवटी जो कार्यक्रम व्हायचा, तो सुरू झाला. हा कार्यक्रम म्हणजे त्या-त्या संस्थेचे प्रमुख किंवा प्रतिनिधींनी संस्थेच्या किंवा प्रकल्पाची माहिती देणे. तिथल्या संस्थेच्या प्रतिनिधींनी आम्हाला जे काही सांगितले, त्यामुळे मी तर थक्कच झालो.

त्या संस्थेत मुला-मुलींना वयाच्या तीन वर्षांपासून ते दहाबारा वर्षांपर्यंत विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते आणि एखाद्या मुलाने किंवा मुलीने विशिष्ट खेळांत असाधारण प्रगती दाखवली तर त्यांना त्याच खेळांत तरबेज बनवले जात होते.

या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता बल्गेरियन देशातर्फे जागतिक पातळीवरच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आणि इतर स्पर्धांसाठी खेळांडूचा चमू पाठवणे. या उद्देशाने कोवळ्या वयापासून या मुला-मुलींना प्रशिक्षण दिले जात होते.

तेव्हापासून प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत रशिया, बल्गेरिया आणि इतर छोट्या युरोपियन राष्ट्रांतील सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदक विजेत्यांची संख्या किती आहे, हे आजपर्यंत आवर्जून पाहतो. या चिमुकल्या राष्ट्रांनी पदकांच्या यादीत मिळवलेले स्थान पाहून बल्गेरियातील ती शाळाभेट आठवते!   

शीतयुद्धाच्या काळात ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांच्या यादीत अनेक वर्षे अमेरिका आघाडीवर असायची, नंतरच्या काळात सोव्हिएत रशिया असायचा. त्याशिवाय युरोपातील अनेक छोटी छोटी कम्युनिस्ट आणि इतर राष्ट्रे या यादीत चमकायची. या राष्ट्रांची नावे आणि त्यांचे नकाशावरचे स्थान भारतातील लोकांना माहितीही नसायचे. गेल्या काही वर्षांत चीनने पदकांच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे, त्यामागे या देशाचे अनेक वर्षांचे नियोजन असणार हे नक्की. 

अत्यंत प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारत किती मागे आहे, हे देशातील जनतेला सर्वांत पहिल्यांदा समजले १९९६ साली. या वर्षी लियंडर पेसने टेनिस या खेळात आपले पहिले कास्य पदक मिळवले आणि त्या वेळी देशातील खूप जणांना कळाले की, सातारा जिल्ह्यातील खाशाबा दादासाहेब जाधव या तरुणाने चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९५२   साली झालेल्या हेलसिंकी येथील ऑलिम्पिक स्पर्धेत  कुस्तीमध्ये कास्य पदक जिंकून भारताला पहिलेवहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले होते.

१९५२ ते १९९६ या काळात कुणाही भारतीयाला ऑलिम्पिक स्पर्धेत कुठल्याही खेळांत वैयक्तिक पदक मिळू शकले नव्हते. आणि याबद्दल ना कुणाला खंत होती, ना पश्चात्ताप. लियंडर पेसने क्रीडाक्षेत्रातली ही जखम भळभळती केली आणि आपण क्रीडा क्षेत्रात किती मागास आहोत, याची देशाच्या राज्यकर्त्यांना व जनतेलाही जाणीव करून दिली. 

लियंडर पेसमुळे भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांची ओळख झाली. विशेष म्हणजे देशासाठी हा सर्वोच्च सन्मान मिळवून देणारे खाशाबा जाधव हे नंतर सरकारी सेवेत होते आणि अखेरच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती.              

हॉकीपटू ध्यानचंद यांच्यावर आम्हाला शाळेत एक हिंदी भाषेतला धडा होता, पण स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच भारताचे नाव ऑलिम्पिकच्या इतिहासात कोरणाऱ्या इथल्या मातीतल्या आणि त्या वेळी हयात असलेल्या खाशाबा जाधव यांच्यावर मराठीतसुद्धा एकही धडा नव्हता! मी कराडला अकरावीला १९७६ साली शिकत होतो, तेव्हा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव आसपास राहत होते, याची मला कल्पनाही नव्हती. एका दुचाकी अपघातात त्यांचे १९८४ साली निधन झाले. जिवंत असताना त्यांची कुणी दखलही घेतली नाही, मात्र मरणोत्तर त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘छत्रपती शिवाजी पुरस्कार’ मिळाला आणि  २००१ साली ‘अर्जुन पारितोषक’ देण्यात आले.

नव्वदच्या दशकात मी ‘महाराष्ट्र चरित्रकोश’ संकलित करत होतो, तेव्हा खाशाबा जाधव यांच्या चरीत्राविषयी खात्रीशीर माहिती उपलब्ध नव्हती आणि अखेरीस मला वृत्तपत्रांच्या कात्रणांवर अवलंबून राहावे लागले होते.

या आठवड्यात भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली, इतर काही तरुण-तरुणींनी वैयक्तिक स्पर्धेत देशाला पदके मिळवून दिली. याच दरम्यान पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांची पुन्हा आठवण होऊन त्यांच्यावर विविध लेख छापून आले...

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटूंच्या संघांचे प्रायोजकत्व स्वीकारले. त्यामुळे या दोन्ही संघांना ऑलिम्पिक स्पर्धेत ही मजल गाठता आली. नाहीतर क्रिकेट वगळता इतर  क्रीडांना उत्तेजन देण्याविषयी आपल्याकडे आनंदीआनंदच असतो.

शालेय पातळीवर काही संस्था आपल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक स्तरावर अग्रक्रम मिळवावा, अशी अपेक्षा ठेवत असतात, त्यामुळे प्रत्येक शाळांच्या आवारात क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, कबड्डी, बास्केटबॉल वगैरे मैदाने असली पाहिजेत, याबद्दल ना शिक्षणसंस्था जागरूक असतात, ना पालक. ‘कॉन्व्हेंट’ म्हणून गणल्या जाणाऱ्या शाळांत याकडे पूर्वी ध्यान दिले जात असे, आता महागड्या इंटरनॅशनल स्कुलचा जमाना सुरू आहे, पण याही शिक्षणसंस्था मुलांचा क्रीडाक्षेत्रासह सर्वांगीण विकास व्हावा, याविषयी फारशा जागरूक दिसत नाहीत.  

गोव्यात मात्र क्रीडाक्षेत्राविषयी सरकार आणि लोकही खूप वर्षांपासून जागरूक आहेत. अर्थात यास पोर्तुगीज राजवटीचा साडेचारशे वर्षांचा दीर्घ वारसासुद्धा कारणीभूत आहे. गोव्यात तुम्ही खेडोपाडी हिंडताना बारकाईने पाहिले तर शाळा सुटल्यानांतर मुले शाळांच्या मैदानांवर आणि मोकळ्या भाताच्या शेतांत फुटबॉल खेळताना दिसतील. त्यांना शिकवणारा प्रशिक्षकसुद्धा असतो. त्याशिवाय अनेक गावांत स्पोर्ट्स क्लबसुद्धा आहे. त्यांच्या स्वतःच्या इमारती आणि खेळांची मैदानेसुद्धा असतात.  

संतोष ट्रॉफी या देशपातळीवरच्या प्रतिष्ठेच्या चषकासाठी गोवा नेहमी स्पर्धेत असतो. मी कॉलेजात असताना ब्रह्मानंद शंकवाळकरच्या नेतृत्वाखाली गोवा संघाने हा चषक जिंकला, तेव्हा पणजीला या संघाचे उत्साहात झालेले स्वागत आजही आठवते. गोव्याच्या या क्रीडाप्रेमामुळे या चिमुकल्या राज्यात पर्यटन खात्याबरोबरच क्रीडाखातेही प्रतिष्ठेचे मानले जाते.          

देशपातळीवर यदाकदाचित फुटबॉल या खेळाची आवड निर्माण झाली, तरच विविध राज्यांमधील खेळाडूंचा तगडा फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांत उतरण्यासाठी पात्र ठरू शकेल, अन्यथा नाही. सध्या या खेळाची लोकप्रियता आणि प्रायोजन गोवा, केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल वगैरे काही राज्यांपुरती मर्यादित आहे. 

हीच बाब इतर सांघिक आणि वैयक्तिक खेळांनाही लागू होते. 

Tuesday, August 3, 2021

 

‘गरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा’ ही तीन व्रते जेसुईट व्रतस्थांना घ्यावी लागतात. 
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • ‘सोसायटी ऑफ जेसुईट’चा लोगो आणि फादर स्टॅन स्वामी
  • Fri , 30 July 2021
  • पडघमसांस्कृतिक‘सोसायटी ऑफ जेसुईटSociety of Jesusफादर स्टॅन स्वामीStan Swamy

ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी म्हटले की, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे, धर्मांतर करणारे लोक अशी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. जेसुईट धर्मगुरू शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, समाजसेवा वगैरे अनेक मिशनकार्यांत गुंतलेले असतात, पण यापैकी अनेकांनी ना कुणाचे धर्मांतर केलेले असते, ना कुणाचा बाप्तिस्मा. ‘गरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा’ ही तीन व्रते जेसुईट व्रतस्थांना घ्यावी लागतात. कुठल्याही जेसुईटाला स्वतःचे घर व मालमत्ता राखता येत नाही. जेसुईट होणे ही प्रक्रिया साधीसुधी नसते. यासाठी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन तत्त्वज्ञान, ईशज्ञान वगैरे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतात. त्यामुळे यात गळतीचे प्रमाण प्रचंड असते.     

..............................................

या महिन्यात ‘सोसायटी ऑफ जेसुईट’ किंवा ‘जेसुईट’ (येशूसंघ) या कॅथॉलिक धर्मगुरूंच्या संस्थेचे नाव अचानक भारतातील आणि जगातील प्रसारमाध्यमांत चर्चेला आले. नजीकच्या काळातही काही संघटनांनी चालू केलेल्या आंदोलनामुळे या संस्थेचे नाव चर्चेत राहील अशीच चिन्हे आहेत. याचे कारण म्हणजे झारखंडमध्ये आदिवासी समाजात काम करणारे आणि ‘दहशतवादी’, ‘अर्बन नक्सल’, ‘माओवादी संघटनां’चे हस्तक वगैरे आरोपांखाली तुरुंगात डांबलेले ८४ वर्षांचे फादर स्टॅन स्वामी न्यायालयाकडून जामिनाची वाट पाहत अखेरीस निधन पावले.

फादर स्टॅन स्वामी या जेसुईट संस्थेचे सदस्य होते.

आताचे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेचे पहिलेच धर्मगुरू आहेत.

सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर आणि इतर सहकाऱ्यांसह  १५४० साली ‘सोसायटी ऑफ जिझस’ या संस्थेची स्थापना केली आणि कॅथोलिक चर्चमध्ये ‘सुधारणा युग’ सुरू केले असे म्हणतात. सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला (१४९१- १५५६) यांचा सण ३१ जुलै रोजी असतो. जेसुईटांच्या सर्व संस्थांत आणि शाळा-कॉलेजांत हा सण नाताळ आणि ईस्टरच्या खालोखाल मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो.   

जुना गोवामध्ये बाँम जेजू बॅसिलिका येथे सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे अवशेष अजूनही जपून ठेवले आहे. तीन डिसेंबरला सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या सणानिमित्त तिथं मोठी यात्रा भरते. या दिवशी गोवा सरकारतर्फे सार्वजनिक सुट्टी दिली जाते.

कॅथोलिक चर्च ही जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. तिचे जाळे जगभर अगदी वरपासून म्हणजे रोमस्थित धर्मप्रमुख पोप यांच्यापासून थेट गावपातळीपर्यंत पोहचलेले असते. चर्च ही संघटना आपल्या डायोसिसन आणि रिलिजियस धर्मगुरूंच्या आणि नन्सच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत असते. कॅथोलिक चर्चसारखे संपर्काचे आणि कार्याचे सर्वदूर जाळे असणारी जगात दुसरी कुठलीही संस्था नसावी.

कॅथोलिक चर्चमध्ये दोन प्रकारचे धर्मगुरू असतात- सेक्युलर आणि रिलिजियस. एका विशिष्ट डायोसिस म्हणजे धर्मप्रांतात काम करणाऱ्या धर्मगुरूंना डायोसिसन किंवा धर्मप्रांतीय धर्मगुरू म्हटले जाते. डायोसिसन धर्मगुरूंना ‘सेक्युलर धर्मगुरू’ असेही म्हटले जाते. प्रत्येक धर्मप्रांताचे प्रमुख बिशप असतात आणि डायोसिसन धर्मगुरू हे या बिशपांच्या अखत्यारीत आणि त्या धर्मप्रांताच्या हद्दीत काम करत असतात. पुणे धर्मप्रांतात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश होतो.   

त्याशिवाय चर्चमध्ये विविध किंवा विशिष्ट कार्यांना स्वतःला वाहून घेणाऱ्या धर्मगुरूंच्या रिलिजियस संस्था-संघटनाही आहेत. त्यांच्या सदस्यांना ‘रिलिजियस धर्मगुरू’ म्हटले जाते. त्यापैकीच इग्नेशियस ऑफ लोयोलाने स्थापन केलेली ‘सोसायटी ऑफ जिझस’ ही संस्था. तिच्या सदस्यांना ‘जेसुईट्स’ असे म्हणतात. त्याशिवाय डॉन बॉस्को यांनी स्थापन केलेली ‘सालेशियन्स ऑफ डॉन बॉस्को’ ही धर्मगुरूंची संस्था प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात काम करते. त्यांची शाळा-महाविद्यालये जगभर नावाजलेली आहेत. ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ही मदर तेरेसा यांनी स्थापन केलेली नन्सची संस्था अनाथांसाठी आणि वृद्धांसाठी काम करते.      

शक्यतो डायोसिसन वा सेक्युलर धर्मगुरूंचीच वरच्या बिशपपदावर नेमणूक होते. आर्चबिशप आणि  कार्डिनल ही त्यावरची पदे. जगातल्या ११०च्या आसपास कार्डिनलांमधून एकाची पोपपदावर निवड होते. रिलिजियस संस्थेने परवानगी दिल्यास रिलिजियस धर्मगुरूसुद्धा बिशप होऊ शकतात आणि पोपसुद्धा, आताच्या पोप फ्रान्सिस यांच्याप्रमाणे. अशा प्रकारे नाशिकचे पहिले बिशप थॉमस भालेराव हे रिलिजियस - जेसुईट- धर्मगुरू होते, तर पुण्याचे बिशप थॉमस डाबरे आणि वसईचे बिशप फेलिक्स मच्याडो हे सेक्युलर - डायोसिसन - धर्मगुरू आहेत.          

मध्ययुगीन ख्रिस्ती धर्मात नवचैतन्य आणण्यात जेसुईट फादरांनी अत्यंत मोलाची कामगिरी पाडली आहे. येशूसंघीयांना त्यामुळेच ‘चर्चचे सैनिक’ असे म्हटले गेले. जेसुईट धर्मगुरू हे अत्यंत पुरोगामी आणि शिक्षण, समाजकार्य, साहित्य वगैरे अनेक क्षेत्रांतील जनक मानले गेलेले आहेत. पृथ्वी सपाट आहे आणि विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी व मानव आहे, असे पूर्वी मानले जायचे. त्याविरुद्ध मत मांडणाऱ्या शास्त्रज्ञांकडे मध्ययुगीन काळात चर्चतर्फे वक्रदृष्टीने पाहिले गेले. या पार्श्वभूमीवर खगोलशास्त्रात गेली काही शतके जेसुईट धर्मगुरूंनी फार मोलाची भर घातली आहे, हे सांगितले तर अनेकांना आश्चर्य वाटू शकते.

सम्राट अकबराने आपल्या दरबारात भिन्न धर्माच्या पंडितांना निमंत्रित केले होते. या पंडितांमध्ये त्या काळी गोव्यात असलेल्या युरोपियन जेसुईट धर्मगुरूंचाही समावेश होता. त्या वेळेस पोर्तुगीजांच्या अमलात असलेल्या गोव्यातून युरोपियन असलेले रुडाल्फ अक्वाविवा आणि त्यांचे इतर सहकारी येशूसंघीय धर्मगुरू मुघल दरबारात गेले. मुघल दरबारात १५८० ते १५८३ या काळात आणि नंतरही उपस्थित राहणारे जेसुईटस पहिल्याच युरोपियन, पाश्चात्य व्यक्ती.

सम्राट अकबराने आपल्या धर्माविषयी जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली म्हणून हे येशूसंघीय धर्मगुरू खूष होते. अकबर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करील असे त्यांना वाटले. मात्र सम्राट जलालुद्दीन अकबराने त्यांची घोर निराशा केली. मुघल सम्राटाने विविध धर्माच्या पंडितांशी चर्चा जरूर केली, मात्र यापैकी कुठलाही धर्म न स्वीकारता त्याने ‘दिने इलाही’ हा स्वतंत्र धर्म स्थापन केला!    

त्यानंतर गोव्यात कुंकोळी या गावात  पाच जेसुईटांसह इतरांच्या केलेल्या हत्येत सम्राट अकबराच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या जेसुईटांचे प्रमुख असलेल्या रुडाल्फ अक्वाविवा यांचाही समावेश होता. 

 जेसुईटांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज किंवा राजकीयदृष्ट्या असुरक्षित होण्याच्या भीतीने युरोपातील काही राष्ट्रांनी म्हणजे पोर्तुगाल, फ्रान्स, स्पेन वगैरेंनी सोसायटी ऑफ जिझसच्या कार्यावर बंदी घातली होती आणि जेसुईटांना आपापल्या देशांतून हद्दपार केले होते. यात पोर्तुगालच्या ताब्यातील गोव्याचाही समावेश होता. खुद्द कॅथोलिक चर्चतर्फे म्हणजे पोप चौदावे क्लेमेंट यांनीही १७७३ साली आदेश काढून धर्मगुरूंच्या या संस्थेवर बंदी घातली. ‘सप्रेशन ऑफ सोसायटी ऑफ जिझस’ या नावाने ही बंदी ओळखली जाते. ती पोप सातवे पायस यांनी १८१४ साली उठवली. 

श्रीरामपूरला दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी स्वतः गोव्याला जेसुईट धर्मगुरू होण्यासाठी गेलो होतो. त्या प्रशिक्षणाच्या पाच वर्षांच्या काळात आणि कॉलेज जीवनात येशूसंघीयांची काम करण्याची तळमळ, धडपड आणि अपार कष्ट घेण्याची, त्रास सहन करण्याची तयारी मी जवळून अनुभवली आहे. जेसुईट जीवन मी जगलो आहे. नंतर मी जेसुईट व्रतस्थ जीवन जगण्याचा निर्णय बदलला तरी ‘वन्स अ जेसुईट, अल्वेज अ जेसुईट’ या म्हणीची काही मित्र मला अजूनही आठवण करून देत असतातच.    

फादर थॉमस स्टीफन्स हे गोव्याच्या भूमीत पाय ठेवणारे पहिले ब्रिटिश जेसुईट. त्यांनी मराठी भाषा शिकून मराठीत ‘ख्रिस्तपुराण’ रचले आणि १६०६ साली ते छापले गेले. गोव्यात सतराव्या शतकाच्या सुरुवातीस रोमन लिपीत छापला गेलेला ‘ख्रिस्तपुराण’ हा मराठी भाषेतला पहिलावहिला ग्रंथ. पोर्तुगीजांनी गोव्यात छापण्याचे यंत्र आणले, तेव्हा देवनागरी लिपीत छापणे शक्य नसल्याने हे ‘ख्रिस्तपुराण’ रोमन लिपीत प्रसिद्ध झाले. पुण्यात प्रसाद प्रकाशनाच्या य. गो. जोशी यांनी अहमदनगरचे शांताराम बंडेलू-संपादित ‘ख्रिस्तपुराण’ १९५६ साली देवनागरी लिपीत प्रसिद्ध केले. 

भारतात शिक्षणक्षेत्रात जेसुईट्स फादरांचे फार मोठे योगदान आहे. मुंबईचे झेव्हियर कॉलेज, जमशेदपूर येथील झेव्हियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट ही भारतातील अग्रगण्य मॅनेजमेंट शैक्षणिक संस्था आहे. पुण्यातल्या लोयोला आणि सेंट व्हिन्सेंट स्कूल या दोन नामवंत शाळा येशूसंघीय धर्मगुरूच चालवतात.  

पुण्यात अहमदनगर रोडवर रामवाडी येथे डी नोबिली कॉलेज यासारखे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे थियॉलॉजी कॉलेज जेसुईट संस्था चालवते. पोप जॉन पॉल दुसरे यांनी आपल्या १९८६च्या भारत भेटीत या संस्थेला भेट दिली होती.

‘गरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा’ ही तीन व्रते जेसुईट व्रतस्थांना घ्यावी लागतात. कुठल्याही जेसुईटाला स्वतःचे घर व मालमत्ता राखता येत नाही. जेसुईट होणे ही प्रक्रिया साधीसुधी नसते, यासाठी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन तत्त्वज्ञान, ईशज्ञान वगैरे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतात. त्यामुळे यात गळतीचे प्रमाण प्रचंड असते.     

महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांत जेसुईट्स धर्मगुरूंच्या कार्यांचा, मिशनरी व्रताचा आणि नि:स्वार्थ सेवापद्धतीचा फार गाढा प्रभाव पडला आहे. जेसुईटाचे अनेक क्षेत्रांत चाललेले काम जवळून पाहिले म्हणजे ‘मिशनरी सेवावृत्तीने काम’ असे का म्हटले जाते, ते कळते.  

महात्मा गांधी यांचे गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना केली तेव्हा या संस्थेच्या घटनेसाठी त्यांनी ‘सोसायटी ऑफ जिझस’ या संस्थेची घटना आधारभूत मानून आपल्या संस्थेसाठी तशी कार्यपद्धती स्वीकारली. पुण्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी आधुनिक शिक्षणसंस्था स्थापन केल्या, त्या जेसुईट मिशनरींच्या मिशनरी कार्याने प्रभावित होऊनच. लोकमान्य टिळकांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये मानधन, पगारी सेवा यांविषयी अनेकदा वाद होई, याचे कारण म्हणजे  संस्थेच्या विश्वस्तांनी संन्याशी असलेल्या जेसुईटांच्या मिशनरी वृत्तीने सेवा करावी, असा टिळकांचा आग्रह असायचा आणि हे विश्वस्त होते प्रापंचिक मंडळी. लोकमान्य टिळकांचे चरित्रकार नरसिंह चिंतामणी केळकर यांनी याविषयी विस्तृतपणे लिहिले आहे.

लोकमान्य टिळक यांच्या एका इंग्रजी चरित्रात टिळक आणि आगरकर यांना ‘इंडियन जेसुइट्स’ असे उल्लेखून त्यावर एक पूर्ण प्रकरणच आहे. हे प्रकरण वाचले म्हणजे जेसुईटांचा महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक  प्रबोधनावर पडलेल्या प्रभावाची कल्पना येते.        

जेसुईट्स संस्थेची कार्यपद्धती, एकत्र भोजन पद्धती आणि अविवाहित राहून नि:स्वार्थपणे सेवा करण्याची पद्धत अनेकांना भावली आहे. त्यामुळे भारतात अनेक संस्था आणि संघटनांनी आपल्या कार्यासाठी जेसुईटांचे अनुकरण केले आहे. 

जेसुईट संस्थेच्या धर्मगुरूंची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे आणि त्या खालोखाल भारतात. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रांत आज अनेक व्यक्ती आघाडीवर काम करत आहेत. त्यापैकी अनेक जण जेसुईट संस्थांत शिकलेले असतील. अशा लोकांच्या नावाची यादी खूप मोठी असेल.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेसुईटांनी अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर, सोनगाव, केंदळ गावांत शाळा उघडल्या, तेव्हा स्पृश्य आणि अस्पृश्य जातींच्या मुलांसाठी पहिल्यांदाच एकत्रितपणे शिक्षण दिले जाऊ लागले होते. जेसुईट धर्मगुरू हातातली घंटी वाजवत गावातल्या मुलांना शाळेत बोलावत असत. त्याआधी खालच्या जातींतील मुलांना शाळेत येण्याचे असे आमंत्रण कुणीच दिले नव्हते.

आज स्वित्झर्लंडमध्ये शंभरीत असलेले जेसुईट फादर हार्मन बाखर यांनी महाराष्ट्रात अहमदनगर  जिल्ह्यात १९६० आणि ७०च्या दशकांत ग्रामविकासाची मुहूर्तमेढ रोवली होती हे विशेष. अण्णा हजारे आणि इतरांचे ग्रामविकास कार्य त्यानंतर कितीतरी वर्षांनंतरचे.        

मराठीत काही मोजक्याच नियतकालिकांनी शंभरी पूर्ण करून आजही प्रकाशन चालू ठेवले आहे. जर्मन जेसुईट धर्मगुरु हेन्री डोरींग यांनी अहमदनगर जिल्ह्यात राहुरीजवळ केंदळ या गावी ‘निरोप्या’ हे मासिक १९०३ साली सुरू केले, ते आजही जेसुईटांतर्फे पुण्यातून ‘स्नेहसदन’ येथून प्रसिद्ध होत आहे. डोरींग १९०७ साली पुण्याचे दुसरे बिशप बनले. रोमला पोप यांच्या भेटीला गेले असताना पहिले महायुद्ध सुरू झाल्याने जर्मन असल्याने त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतात परतणे अशक्य झाले. त्या काळात ‘निरोप्या’चे प्रकाशन खंडित झाले होते. महायुद्ध संपताच तोपर्यंत आर्चबिशप बनलेले डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला परतले आणि ‘निरोप्या’चे प्रकाशन पुन्हा सुरू केले, ते  अलीकडचा करोनाकाळाचा अपवाद वगळता आजतागायत सुरू आहे.   

पुण्यातील स्नेहसदन या आंतरधर्मीय संशोधन केंद्राचे संस्थापक मॅथ्यू लेदर्ले हेसुद्धा जेसुईट होते. पुणे शहराच्या साहित्य, सांस्कृतिक, रंगभूमी, वैचारिक, शैक्षणिक वगैरे अनेक क्षेत्रांत ‘स्नेहसदन’ने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.

जेसुईट संस्थेच्या धर्मगुरूंचे कार्य नेहमीच मूलभूत स्वरूपाचे राहिलेले आहे. ते नेहमी नाविन्याच्या शोधात असतात. त्यासाठी आपण बांधलेली मोठीमोठी मंदिरे, नावाजलेल्या शाळा-संस्था वगैरे सर्व स्थानिक बिशपांच्या धर्मप्रांताकडे, डायोसिसन वा सेक्युलर धर्मगुरूंकडे सोपवून ते नव्या वाटा, नवे आव्हाने स्वीकारण्यासाठी कुठलेही पाश मागे न ठेवता तेथून चक्क निघून जातात, तेथे मालक म्हणून पुन्हा कधीही न येण्यासाठी.

अशा प्रकारची नि:स्वार्थी सेवा आणि मिशनकार्य दुसरीकडे कुठेही सापडणार नाही. पुण्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अनेक चर्चेस आणि शाळा-संस्था जेसुईटांनी स्थापन केल्या आहेत. त्यापैकी बहुतेक सर्व आता डायोसिसन धर्मगुरूंकडे सोपवण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात माझी एक कटू आठवण आहे. हरेगावचे मोठे शिखर असलेले टोलेगंज संत तेरेजा चर्च जर्मन जेसुईट फादर जॉन हाल्दनर यांनी १९६०च्या दशकात बांधले. सप्टेंबर महिन्यात भरणाऱ्या मतमाऊलीच्या यात्रेसाठी हे तीर्थक्षेत्र आज ओळखले जाते. या यात्रेनिमित्त जेसुईटांतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘निरोप्या’च्या स्टॉलला मी अनेकदा मदत करत असतो. हरेगाव धर्मग्राम आता जेसुईटांकडे नाही, तर डायोसिसन धर्मगुरूंकडे आहे. तीर्थक्षेत्र म्हणजे आयोजकांचे उत्पन्नाचे मोठे साधन, हे आता सर्वच धर्मांबाबत झाले आहे. इथेही तो अपवाद नाही.

तर ‘निरोप्या’च्या स्टॉलवर येऊन दीडशे रुपयांची पावती फाडावी, अशी मागणी तेथील स्थानिक डायोसिसन धर्मगुरूने आमच्याकडे केली. चर्चची ती भलीमोठी जागा, तेथील शाळा आणि शेतजमीन ही सर्व जेसुईटांच्या कठोर श्रमांची कमाई… पण जेसुईटांच्या मासिकाच्या दोन दिवसांच्या स्टॉलसाठी फी मागितली जात होती. त्या वेळी मला त्या धर्मगुरूचा राग आणि कीवसुद्धा आली.

ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी म्हटले की, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे, धर्मांतर करणारे लोक अशी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. जेसुईट धर्मगुरू शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, समाजसेवा वगैरे अनेक मिशनकार्यांत गुंतलेले असतात, पण यापैकी अनेकांनी ना कुणाचे धर्मांतर केलेले असते, ना कुणाचा बाप्तिस्मा. बाप्तिस्मा देण्याचे, लग्न लावण्याचे अधिकार फक्त पॅरीश प्रिस्टला म्हणजे चर्चमधील धर्मगुरूंना असतात. 

गेली काही दशके अनेक राष्ट्रांत काम करणारे जेसुईट आणि इतरही कॅथोलिक धर्मगुरू स्थानिक शोषित, पिडीत आणि गांजलेल्या समाजघटकांच्या बाजूने उभे राहत आहेत. लॅटिन अमेरिकेतील तसेच तिसऱ्या जगातील अनेक देशांत ‘मुक्तीचे ईशज्ञान’ (‘लिबरेशन थियॉलॉजी’) या संज्ञेने आणि चळवळीने कॅथॉलिक धर्मगुरूंमध्ये खूप मूळ धरले आहे. सत्ताधारी आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध ‘लिबरेशन थियॉलॉजी’ लढा पुकारते. अनेकदा यापैकी अतिउत्साही, मार्क्सवादाशी जवळीक करणाऱ्या  धर्मगुरूंना वेसण घालणे कॅथोलिक चर्चला भाग पडले आहे.        

मुंबईतील झेव्हियर कॉलेजात इतिहास शिकवणाऱ्या स्पॅनिश धर्मगुरू हेन्री हेरास यांचे प्राच्यविद्याशास्त्र (इंडॉलॉजी) विषयातील संशोधन महत्त्वाचे मानले जाते. फादर कामिल बुल्के हे  बेल्जीयन जेसुईट धर्मगुरू हिंदी भाषेत डॉक्टरेट मिळवणारी पहिली व्यक्ती. अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’  या प्रबंधावर ही पदवी मिळवली. फादर बुल्के यांनी ‘इंग्रजी- हिंदी शब्दकोश’ तयार केला. त्याशिवाय ‘तुलसीरामायणा’वरील त्यांचे संशोधन आजही पायाभूत स्वरूपाचे मानले जाते. 

भारतातील अनेक राज्यांतील, विशेषतः दक्षिणेकडील राज्यांतील अनेक भाषांत जेसुईटफादरांनी मूलभूत स्वरूपाचे योगदान दिले आहे. रॉबर्ट डी नोबिली (१५९७-१६५६) हे जेसुईट धर्मगुरू संस्कृत आणि तामिळ भाषेचे पंडित होते. त्यांनी संस्कृत भाषेतील अभिजात साहित्याची पाश्चात्य जगाला पहिल्यांदाच ओळख करून दिली असे म्हणतात. फादर थॉमस बेस्ची (१६८०-१७४७) यांनी लिहिलेले ‘तंबोवाणी’ काव्य हे तामिळ भाषेतील एक अभिजात साहित्य मानले जाते.      

गेली काही वर्षे अफगाणिस्तानात स्थानिक लोकांना मदत करण्यासाठी तालिबानींच्या दहशतीची पर्वा न करता पुण्यातील फादर स्टॅन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील जेसुईटांची एक तुकडी ‘जेसुईट रेफ्युझी सर्व्हिस’ अंतर्गत तेथे काम करत होती, हेही इथे आवर्जून सांगायला हवे. त्यापैकी एक केरळचे जेसुईट फादर अलेक्सीस प्रेम कुमार यांचे २०१५ साली अपहरण झाले होते आणि भारत सरकारच्या मध्यस्थीने त्यांची नंतर सुटका झाली.

जेसुईटांच्या जगभरच्या कार्याच्या मोठ्या जाळ्यामुळे संस्थेचे प्रमुख असलेले सुपिरियर जनरल यांना चर्चमध्ये पोप यांच्याखालोखाल महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शुभ्रवस्त्रधारी पोप यांच्यासमोर काळा झगा घालणाऱ्या जेसुईट सर्वोच्च अधिकारी सुपिरियर जनरल यांना ‘ब्लॅक पोप’ असेही म्हटले जायचे.

अर्तुरो सोसा हे सोसायटी ऑफ जिझसचे सध्याचे सुपिरियर जनरल आहेत. २०१६ साली व्हेनेझ्युला या देशाच्या सोसा यांची या पदावर निवड झाली तेव्हा `मिशी असलेले' सुपिरियर जनरल म्हणून प्रसारमाध्यमांने त्यांची दखल घेतली. कारण म्हणजे पाश्चात्य देशात दाढीमिशा ठेवण्याची प्रथा असली तरी फक्त मिशा सहसा कुणी ठेवत नाही. मिशाधारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, किंवा पोप अशी कल्पना करुन बघा.

काही वर्षांपूर्वी अडॉल्फो निकोलस हे जेसुईट सुपिरियर जनरल (ब्लॅक पोप) असताना भारतदौऱ्यावर आले, तेव्हा पुण्यात मी त्यांची मुलाखत घेतली होती. 


चर्चच्या इतिहासात आता पहिल्यांदाच पोप आणि ब्लॅक पोप हे दोघेही जेसुईट आहेत!

जेसुईट असलेले सध्याचे पोप फ्रान्सिस आणि जेसुईट संस्थेचे सुपिरियर जनरल यांच्या नाते कसे असेल? जेसुईट संस्थेच्या मेळाव्यात पोप फ्रान्सिस हे आयुष्यभर एक सामान्य जेसुईट असतील, मात्र जेसुईट सुपिरियर जनरल पोप यांना चर्चच्या कारभाराविषयी कुठलाही आदेश देऊ शकत नाही. 


ख्रिस्ती (कॅथोलिक वा प्रोटेस्टंट) धर्मगुरु आपल्या नेहेमीच्या झग्यात नसले कि ते आपल्या कॉलरभोवती पांढऱ्या रंगाची पट्टी अडकवतात. या पट्टीला 'रोमन कॉलर' असे म्हणतात. ख्रिस्ती धर्मगुरुंना ओळखण्याची ही एक खूण. इंग्रजी चित्रपटांत अनेकदा धर्मगुरू असेच दिसतील



या फोटोतील जेसुईट सुपिरियर जनरल सोसा आणि इतर धर्मगुरूंनी रोमन कॉलर लावली आहे.