Did you like the article?

Wednesday, December 29, 2021


तमाशाचे फड बंद पाडणारे औरंगाबाद जिल्ह्यातले जाकियरबाबा
पडघम - सांस्कृतिक      'अक्षरनामा' 
कामिल पारखे
  • डावीकडे जाकियरबाबा. उजवीकडील तमाशाविषयीचं छायाचित्र ‘मराठी विश्वकोशा’तून साभार
  • Mon , 27 December 2021
  • पडघमसांस्कृतिकसांता क्लॉजSanta ClausतमाशाTamashaलोककलाFolk Art

‘सांता क्लॉज या विदेशी काल्पनिक पात्राला उत्तेजन देण्याऐवजी वासुदेव यासारखी आपल्या देशी सांस्कृतिक वैभव असलेल्या लोककला जिवंत ठेवायला हवे’, अशी चर्चा या नाताळ सणानिमित्त सोशल मीडियावर झाली आहे. वासुदेवप्रमाणेच तमाशात विविध कामे करणारे तमासगिर लोक, पोतराज, मसणजोगी, नंदीबैलवाले, ग्रहण सुटल्यावर घरोघरी उरलेले अन्न मागणारे लोक, बहिरूपी, थरारक अंगकसरती करणारे डोंबारी लोक, भविष्य सांगणारे कुडमुडे जोशी, वगैरे विविध समाजघटकांनी या लोककला जिवंत ठेवल्या आहेत. पण या लोककला खरेच अभिमानास्पद आहेत काय, असा प्रश्न वासुदेव आणि देशातील इतर अनेक लोककलांबाबत उपस्थित केला जाऊ शकतो.

......................................................

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीत तमाशाप्रधान चित्रपटांची लाट आली होती. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटाचा नायक असलेला आदर्श शिक्षक गावात आलेला तमाशाचा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. डॉ. श्रीराम लागू यांनी साकारलेला हा शाळामास्तर तमाशाशौकिनांच्या विरोधाची फिकिर न करता आपल्या नैतिक बळावर एकट्याने तमाशाचा रंगात आलेला खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. मुळात तमाशा हा एक अनैतिक प्रकार आहे आणि आपल्या गावच्या लोकांना त्यापासून दूर ठेवणे, हे आपले नैतिक कर्तव्य आहे, या समजापोटी हे मास्तर तमाशा बंद पाडण्याची धडपड करत असतात. तमाशातील नर्तकीच्या प्रेमात पडून या मास्तरांचे नंतर नैतिक अध:पतन होते, ही गोष्ट निराळी. मात्र तमाशाविषयी समाजात काय प्रतिमा होती, हे ‘पिंजरा’तील आदर्श मास्तरांच्या भूमिकेतून स्पष्ट होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील घोगरगावात आणि आसपासच्या परिसरातील अस्पृश्‍य लोकांनी तमाशात काम करू नये, तमाशाच्या फडाला हजेरी लावू नये, असा फादर गुरियन जाकियर ( Fr. Gurien Jacquier, MSFS) उर्फ जाकियरबाबा यांचा आग्रह होता. त्यांच्या विरोधास न जुमानता आसपासच्या एखाद्या गावात तमाशाचा फड भरला, तर ऐन रंगात आलेला प्रयोग ते बंद पाडत असत. तमाशा या लोककलेचे जतन करण्यासाठी आज विविध संस्थांतर्फे आणि शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या शतकात या ख्रिस्ती धर्मगुरूने या लोककलेविरुद्ध भूमिका का घेतली होती, हे जाणून घेण्यासाठी तमाशा या लोककलेचे स्वरूप माहिती करून घेतले पाहिजे. 

माझ्या लहानपणी श्रीरामपुरात आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बाजारतळापाशीच तमाशाचे फड भरत असत. आमच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरील मैदानात तमाशाचे तंबू उभारले जात असत. ज्येष्ठ तमाशाकलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, कांताबाई सातारकर आणि गुलाबबाई संगमनेरकर वगैरेंच्या तमाशाच्या फडांची दिवसभर चाललेली जाहिरात आम्ही मुले पाहत असू. मात्र घरातील वा शेजारपाजारातील कुणी प्रौढमंडळी या तमाशाच्या खेळाला जात नसत. आठवड्याच्या बाजाराला येणारे आसपासच्या खेड्यापाड्यातील लोकच प्रामुख्याने या लोककलेचे आश्रयदाते असत. आम्हा मुलांना सिनेमाला जाण्यास परवानगी असे. मात्र एकदा तरी तमाशा हा काय प्रकार असावा, याचा अनुभव घ्यावा असा विचारही कधी मनात आला नाही, याचे कारण तमाशा म्हणजे एक अश्‍लील कार्यक्रम आणि आंबटशौकीन रसिकांचे करमणुकीचे साधन असा सर्वांचाच समज होता.

“तमाशा कलेत चोरपावलांनी येणारी अनैतिकता हा तर चिंतेचा विषय आहे. महार, मांग, आणि कोल्हाट्याची बाई नाचवणं आणि पैसा फेकून तिला नागवणं, ही उच्चवर्णीय सरंजामी मानसिकता बदलली नाही, तर परंपरा म्हणून तमाशा का टिकवायचा, हाही प्रश्‍न आहे,” असे तमाशा-कलेचे एक अभ्यासक डॉ. मिलिंद कसबे यांनी आपल्या ‘तमाशा : कला आणि कलावंत‘ या पुस्तकात लिहिले आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच तमाशा क्षेत्राची अगदी जवळून ओळख असलेले अभिनेते निळू फुले यांनी म्हटले आहे, ‘‘मागास, अस्पृश्‍य समजल्या जाणाऱ्या महार, मांग, कोल्हाटी, गोपाळ आदी जातीचे कलाकार तमाशात जास्त आहेत. त्यांनीच ही कला टिकवली आहे. तमाशा क्षेत्रात कर्ज हा एक मोठा प्रश्‍न आहे. फडमालक सावकाराकडून कर्ज घेतात. तमाशातला कलाकार फडमालकाकडून कर्ज घेतात. अशा प्रकारे फडमालक कर्जबाजारी, कलाकार-कामगार कर्जबाजारी, कर्जावर चालणारा हा व्यवसाय आहे. कर्जामुळे कोणीही सुखी नाही. तमाशाला पैसे पुरवणारे बहुतेक सवर्ण असतात. तमाशातील स्त्री कलाकार कर्जबाजारी असेल आणि कर्ज फिटले नाही तर तिला भांडवलदाराच्या स्वाधीन व्हावे लागते. सतत दारिद्रयात राहूनही हे कलाकार तमाशाला का चिकटून राहिले, असा प्रश्‍न नेहमी माझ्या मनात येत असे.’’ कदाचित तमाशा कलेवरील प्रेमापोटीच हा वसा त्यांनी स्वीकारला असावा, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

स्वातंत्र्यानंतर तमाशावर अश्‍लीलतेचा आरोप झाला. त्यामुळे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी १९४८ साली तमाशावर बंदी घातली गेली. ही बंदी उठावी म्हणून तमाशा कलावंतांनी प्रयत्न केले.

त्या वेळी खेर यांनी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली ‘तमाशा सुधार समिती’ नेमली होती. या समितीने तमाशाचे संहिता लेखन आणि सादरीकरणाबाबतीत काही अटी घातल्यानंतर तमाशावरील ही बंदी उठवण्यात आली. तमाशात अश्‍लील संवाद नसावेत, दौलतजादा करताना तमासगीर नटीला हात लावू नये वगैरे अटी घालण्यात आल्या.

पुणे विद्यापीठाच्या पवळा पठ्ठेराव बापूराव साहित्य, संगीत, लोककला अकॅडेमी आणि पाथफाइंडर इंटरनॅशनल या संस्थांच्या वतीने पुण्यात २००७च्या ऑक्टोबरात तमाशा महोत्सव व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या कार्यक्रमपत्रिकेत तमाशाबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार ‘तमाशा’ शब्द हा फारशीतून उर्दूत आणि उर्दूतून मराठीत आला आहे, असे दिसते. तमाशा हा प्रकार ज्या शाहिरांनी रूढ केला, तो शाहीर (शाईर हा मूळ शब्द) अरबी भाषेतून मराठीत आला आहे. त्यामुळे तमाशा हा कलाप्रकार मुसलमानांच्या प्रभावातून उदयास आला असावा, असे काही संशोधकांचे मत आहे.

महाराष्ट्रातील जागरण, गोंधळ, भारुड, लळिते आणि दशावतार या लोककलांचाही अर्थातच तमाशावर प्रभाव आहे. साधारणत: तमाशा ही लोककला महाराष्ट्रात महार, मांग, गोंधळी, कोल्हाटी, डोंबारी यांच्याच हाती राहिली, असे या पत्रिकेतही स्पष्ट म्हटले आहे. उल्लेख केलेल्या या सर्व जाती अस्पृश्‍य, गावकुसाबाहेरच्या जातीजमाती. अर्थात या लोककलेचा आस्वाद घेणारे व पर्यायाने या कलाकारांचे विविध प्रकारे लैंगिक शोषण करणारे रसिकजन अर्थातच उच्चवर्णीय होते. तमाशातील स्त्रीकलाकारांचे लैंगिक शोषण करताना मात्र या कलावंतांची अस्पृश्‍यता तेवढ्यापुरती नजरेआड केली जात असे, हे विशेष.

आपल्या देशांत सर्वच पारंपरिक व्यवसाय जातींवर आधारित आहेत आणि सर्व लोककलांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. तमाशा ही लोककला प्रामुख्याने महार आणि मातंग जातीतील लोकांनी विकसित केली. या अस्पृश्‍य जातीतील महिला तमाशात नाचत आणि गात असत, तर पुरुषमंडळी ढोलकी, तुणतुणे, मंजिरा, डफ, हलगी, कड आणि पेटी ही संगीतवाद्ये वाजवत असत. त्यावरून या लोककलेला आणि तिच्याशी संबंधित असलेल्या कलाकारांना उच्चवर्णीयांत काय प्रतिष्ठा असे, याची कल्पना करता येते. तमाशाचा हंगाम पावसाळा आणि शेतीचे कामे संपल्यानंतर दसरा ते अक्षयतृतीया या काळात असतो. लग्नसराईत वाजंत्री काम, यात्रेच्या हंगामात तमाशे इत्यादींतही महार प्रामुख्याने आढळतात. 

मी लहान असताना घोगरगावात माझे मामेभाऊ लग्नसराईत पिपाणी, ढोलकी वगैरे वाद्ये वाजवत असत हे मला आठवते. यामागची कारणमीमांसा वरील संदर्भ वाचल्यानंतरच मला समजली. याचा अर्थ वाद्ये वाजवण्याची कला ते घरातील कुणाकडून किंवा नातेवाईकांकडून शिकले असणार. कुणी सांगावे, कदाचित माझ्या आजोळातील माझे काही नातेवाईकही त्यांच्या तरुणपणात म्हणजे फादर जाकियर यांच्या काळात तमाशातही झीलकरी वा इतर कामे करत असतील.

ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावरील १९६९ साली लिहिलेल्या एका लेखात तमाशाविषयी केलेली टिपण्णीही या संदर्भात पाहता येईल. सुर्वे म्हणतात, “पंचवीस वर्षांपूर्वी तमाशा हा शब्द एखाद्या अस्पृश्‍यासारखा वापरला जाई. तमाशा म्हणजे सभ्य लोकांनी, शिष्ट लोकांनी, अगर पोळीबाळींनी न पाहावा, असा नाटकाचा एक प्रकार. त्यात नाच्यापोऱ्या असतो, तो घाणेरडे व अश्‍लील हावभाव करतो. शृंगारिक व चावट गाणी म्हणतो, त्याने सुसंस्कृत माणसांची अभिरुची बिघडते. तमाशा करणारे अस्पृश्‍य असतात व तो पाहणे पाप आहे, ही प्रचलित भावना त्या काळात होती.”

तमाशा या लोककलेचे लोकनाट्यात रूपांतर होण्याआधी पारंपरिक तमाशातील कलाकारांची जातीविषयक पार्श्‍वभूमी, स्त्रिकलाकारांचे लैंगिक शोषण आणि या लोककलेतील प्रयोगांतील संवाद आणि नाचगाण्यांतील अश्‍लीलता वगैरे संदर्भ ध्यानात घेतले म्हणजे जाकियरबाबांनी तमाशाला का विरोध केला हे समजते.

‘पिंजरा’ चित्रपटातील आदर्श मास्तरही नैतिक दृष्टीकोनातूनच तमाशाच्या खेळास विरोध करत असतात. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन राज्यात बियरबारमध्ये महिलांच्या नाचगाण्यांवर बंदी घातली आहे. त्यामागेही स्त्रियांच्या लैंगिक शोषणास आणि अश्‍लीलतेस विरोध अशीच त्यांची भूमिका आहे.

वैजापूर तालुक्यातले घोगरगाव माझे आजोळ. माझ्या आईवडिलांनी जाकियरबाबांना जवळून पाहिले. ''घोगरगावचे जाकियरबाबा (मराठवाड्यातील ख्रिस्ती मिशनकार्य इ. स. १८९२ पासून ) हे मी लिहिलेले जाकियरबाबांचे चरित्र उषाताई आणि विलास वाघ यांच्या सुगावा प्रकाशनाने २००८ साली प्रसिद्ध केले
मिशनरीज ऑफ सेंट फ्रान्सिस डी सेल्स (MSFS) किंवा फ्रान्सलीन या धर्मगुरूंच्या संस्थेचे सदस्य असलेल्या जाकियरबाबांनी १८९२ पासून आपल्या मृत्यूपर्यंत (१९४७) घोगरगावात मिशनकार्य केले. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सरकारने जर्मन शत्रूराष्ट्राचे नागरीक असलेल्या जेसुईट आणि इतर फादरांची हकालपट्टी केली तेव्हा शिर्डीजवळच्या राहाता येथे फादर जाकियर यांनी येशूसंघीय धर्मगुरुंचे काम चालू ठेवले होते. घोगरगावात त्यांची समाधी आहे.
जाकियरबाबांचे या परिसरातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्य पाहून कॅथोलिक चर्चने त्यांना संत म्हणून जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु करावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे.

फादर जाकियर यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या कुठल्याही लिखाणात त्यांनी तमाशाला केलेल्या विरोधाचा उल्लेख माझ्या वाचनात कधी आला नाही. माझ्या आई-वडिलांनी आणि घोगरगावातील माझ्या मामांच्या संभाषणात मात्र याबाबतची चर्चा मी अनेकदा ऐकली आहे. शांत्वन आणि वामन शिनगारे या माझ्या दोन मामांनी जाकियरबाबांच्या छकड्यावर गाडीवान म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेली माहिती, याबाबत विश्‍वासार्ह मानता येईल. जाकियरबाबांविषयी घोगरगाव परिसरात अस्पृश्‍य ख्रिस्ती समाजात तसेच उच्चवर्णीय वगैरे मंडळीत मोठा आदर होता.



सरकारदरबारी कलेक्टर आणि तहसीलदार यासारख्या अधिकाऱ्यांशी आणि शेजारपाजारच्या गावांच्या पाटील वगैरे मंडळींशी त्यांचे खूप चांगले संबंध होते. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील अनेक गावांतील त्यांच्या कामांमुळे, त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे त्यांच्याविषयीचा एक प्रकारचा दराराही असे. उच्चशिक्षित आणि युरोपियन असल्याने ब्रिटिश जमान्यात सरकारदरबारीसुद्धा त्यांचा वचक असे. त्यामुळे जाकियरबाबांनी अस्पृश्‍यतापालनासारख्या एखाद्या अनिष्ट वा अनैतिक सामाजिक रूढीस विरोध केला, तर अशा प्रसंगी त्यांच्या विरोधास जाण्याची कुणाची हिंमत नसायची. जाकियरबाबांनी तमाशाच्या प्रथेस विरोध केला, तेव्हाही असेच झाले असणार.

घोगरगाव आणि आसपासच्या परिसरातील महार समाजातील अनेक ख्रिस्ती स्त्री-पुरुषही त्या काळात तमाशात कलाकार म्हणून काम करत असतील, याविषयी शंकाच नाही. तमाशात नाच्या किंवा मावशीची भूमिका करणाऱ्या पुरुष नटाला लांब केस राखावे लागत. या ग्रामीण भागात अनेक वर्षे राहून या लोककलेचे एकूण स्वरूप समजल्यानंतर कुठल्याही ख्रिस्ती धर्मगुरूने आपल्या धर्मग्रामातील ख्रिस्ती महिलांस तमाशात नाचण्यागाण्यापासून परावृत्त केले असते. ख्रिस्ती पुरुष मंडळींनी तमाशात अश्‍लील स्वरूपाची नाचगाणी म्हणू नये, नाच्याचे काम करू नये, यासाठी त्यांच्यावरही दबाव आणला असता.

जाकियरबाबांनी तर घोगरगाव परिसरात आपल्या आयुष्याची चार दशके घालवली. या फ्रेंच धर्मगुरूने घोगरगावात आल्यानंतर इंग्रजी आणि मराठी भाषांवर चांगले प्रभुत्व मिळवले होते. घोगरगावातील ख्रिस्तराजा मंदिरात त्यांनी अनेक वर्षे नवख्रिस्ती लोकांना मराठी भजने, गायने शिकवली. तमाशाला त्यांनी विरोध करण्याआधी त्यांनी या लोककलेच्या विविध अंगांचा अभ्यास नक्कीच केला असणार.

फादर जाकियर यांचा तमाशाला असलेला कडवा विरोध पाहता ते घोगरगावात असताना या लोककलेचे प्रयोग या गावात झाले असतील, याविषयी दाट शंकाच आहे. मात्र आसपासच्या खेड्यांत तमाशाचे खेळ होतच असत. यात्रेच्या वा इतर कुठल्याही निमित्ताने तमाशाचे प्रयोग असले म्हणजे त्या गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील पुरुषमंडळी तेथे आवर्जून हजर राहत असत. तमाशाचे हे प्रयोग रात्रीच रंगत असत. ढोलकीच्या आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर तमासगीर महिला आणि पुरुष गात आणि नाचत असत.

अशा वेळी फादर जाकियर आपली घोडागाडी बाहेर काढून त्या आवाजाच्या दिशेने निघत. रात्रीच्या वेळी नदी किंवा ओढे ओलांडून तमाशाच्या जागी ते पोहोचत असत. त्या अस्पृश्‍य स्त्री-पुरुष कलाकारांनी तमाशाच्या माध्यमातून होणारे त्यांचे स्वत:चे लैंगिक शोषण रोखावे म्हणून त्यांना उपदेश करत असत. अनेकदा उपदेशाऐवजी त्या लोकांची कानउघाडणीच केली जात असणार. तमाशापथक मोगलाई परिसरातील असले तर त्यातील बहुतेक तमासगीर जाकियरबाबांच्या धर्मग्रामातील ख्रिस्ती लोकच असत.

तमाशाचा ऐन रंगात आलेला प्रयोग अशा प्रकारे बंद पाडल्यानंतरही हे तमासगीर दुसरीकडे कुठेतरी तमाशाचे खेळ चालूच ठेवतील म्हणून फादर जाकियर त्यांची ढोलकी, तुणतुणी, डफ वगैरे वाद्ये आपल्या ताब्यात घेत असत. कलावंतिणीच्या पायातील चार-पाच किलो वजनाचे घुंगरूही काढून घेत. त्याशिवाय पुरुष कलाकारांनी नाच्याची किंवा मावशीची भूमिका करू नये, म्हणून त्यांनी लांब वाढवलेल्या केसांनाही कात्री लावत असत.



जाकियरबाबांच्या आठवणींना माझे आईवडील, मामा आणि इतर जुनी मंडळी उजाळा देत, तेव्हा हे फादर तमाशा कसे बंद पाडत असत, हे याविषयी हमखास बोलले जाई. जाकियरबाबांनी तमासगिरांकडून ताब्यात घेतलेल्या आणि आपल्या घोडागाडीतून घोगरगावात आणलेल्या ढोलकी, तमासगीर कलावंतिणींचे घुंगरू, तुणतुणे, डफ वगैरे संगीतवाद्यांनी मिशन कंपाऊंडमधल्या दोन खोल्या भरल्या होत्या, हे माझी आई आजही आवर्जून सांगत असते.

मागे घोगरगावला मी भेट दिली, तेव्हा तेथील मुख्य धर्मगुरू फादर स्टीफन अल्मेडा यांनीही यास दुजोरा दिला. तमासगिरांची ती संगीतवाद्ये दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत मिशन कंपाऊंडमधील काही खोल्यांत सांभाळून ठेवण्यात आली होती, असे त्यांनी ऐकले आहे, असे त्यांनी मला सांगितले.

महार-मांग या अस्पृश्‍य जातीतील लोकांसाठी तमाशा ही लोककला तर उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. समाजातील या सर्वाधिक उपेक्षित घटकांचा तोंडचा घास हिरावून घेण्याचा फादर जाकियर यांचा मुळीच उद्देश नव्हता. तमाशाबाबत जाकियरबाबांची भूमिका समाजसुधारकाची होती. आपल्या धर्मग्रामातील अस्पृश्‍य लोकांच्या आर्थिक आणि उन्नतीसाठी फादर जाकियर यांनी आणि मोगलाईतील किंवा अहमदनगर जिल्ह्यातील इतर मिशनरींनी अनेक प्रकल्प राबवले होते. लोकांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी ते धावून जात असत. आपल्या धर्मग्रामातील खेड्यांतील मुलांनी साक्षर व्हावे म्हणून जाकियरबाबांनी अनेक गावांत शाळा सुरू केल्या होत्या.

या शाळांत सर्व जाती-धर्मांच्या मुलांना फुकट शिक्षण दिले जात असे. या शाळांच्या मास्तरांच्या निवासस्थानांचा आणि पगाराचा खर्चही फादर स्वत: उचलत असत. तमाशातील काम सोडले तर या लोकांसाठी उदरनिर्वाहाची दुसरे पर्यायही त्यांनी उपलब्ध करून दिले होते.

घोगरगावात सध्या उभ्या असलेल्या उंच शिखरवजा ख्रिस्तराजा मंदिराचे काम एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात वीस वर्षे चालू होते. या बांधकामामुळे आसपासच्या अनेक सुतार, गवंडी अशा कुशल कारागिरांना तसेच इतर अनेक अकुशल कामगारांना अनेक वर्षे रोजगार उपलब्ध झाला होता. जाकियरबाबांचा तमाशाला असलेला विरोध आणि या लोककलेचे प्रयोग बंद पाडण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा याला अर्थातच शंभर वर्षांपूर्वीच्या काळाचा संदर्भ आहे. त्या काळात स्त्रियांनी नाटकांत वा चित्रपटांत काम करणेसुद्धा अनैतिक समजले जाई आणि त्यामुळे अगदी बालगंधर्वांच्या काळापर्यंत पुरुषच स्त्रियांच्या भूमिका करत असत.

आज शासन आणि विविध संस्था-संघटना तमाशासारख्या लोककलांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तमाशा या लोककलेने सातासमुद्रापार, पाश्‍चिमात्य देशापर्यंत मजल मारली आहे. मात्र अजूनही या लोककलेचा जातीय संदर्भ नाहीसा झालेला नाही. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतर, अस्पृश्‍यता कायद्याने बंद झाल्यानंतर आजही सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयांत सफाई कामगार, भंगी, शिपाई वगैरे कामे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्‍य समाजातीलच लोक करतात. तसेच खेड्यापाड्यांत होणाऱ्या तमाशातील बहुसंख्य स्त्री-पुरुष कलाकार आजही महार, मांग, कोल्हाटी या समाजातीलच आहेत.

‘आजही तमाशात गायक म्हणून महार कलावंताची संख्या जास्त प्रमाणात आहे’, असे डॉ. कसबे यांनी म्हटले आहे. या लोककलेशी निगडित असलेले दलित जातींविषयक संदर्भ अजूनही पुसले गेलेले नाहीत. ‘ब्राह्मणाघरी लिव्हनं, महाराघरी गाणं आणि मांगाघरी वाजवणं’ किंवा ‘महाराचं गाणं आणि मांगाचं डफडं‘ अशा म्हणी प्रचलित आहेत. या जातींविषयक संदर्भांमुळे आणि इतरही काही कारणांमुळे चित्रपटसृष्टीतील आणि रंगभूमीवरील स्त्री-पुरुष कलाकारांना हल्ली मिळणारी प्रतिष्ठा, धनप्राप्ती आणि ग्लॅमरचे वलय तमासगिरांच्या नशिबी अजून तरी नाही.

तमासगीर कलावंतांचे होणारे लैंगिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण आजही पूर्णत: बंद झालेले नाही. हे शोषण बंद करण्यासाठी तमाशाचे प्रयोग बंद करण्याची मुळीच जरुरी नाही. मात्र तोंडाला रंग फासून रंगमंचावरून, छोट्या वा मोठ्या पडद्यांवरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांच्या वाट्याला येणारे आर्थिक आणि इतर लाभ दलित समाजातील या लोककलाकारांनाही मिळावेत, अशी माफक अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

आपल्या मुलांनी आपला व्यवसाय पुढे चालू ठेवावा असे प्रथितयश डॉक्टरांना, राजकीय पुढाऱ्यांना आणि इतर काही क्षेत्रांतील लोकांना वाटत असते. तमाशा ही लोककला म्हणून टिकून राहायला हवी, असे म्हणणाऱ्या आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या लोकांनाही आपल्या मुलाबाळांनी या क्षेत्रात पैसा आणि नाव कमवावे असे मनापासून वाटले, तरच या लोककलेला समाजमान्यता आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली असे म्हणता येईल.

नजिकच्या काळात तमासगिरांच्या नशिबी ही प्रतिष्ठा आणि सुख मिळण्याची शक्यता नसेल तर हे कलाकार तमाशाला का चिकटून राहिले, असा अभिनेते निळू फुले यांना पडलेला प्रश्‍न इतर कुणालाही पडू शकेल.

पण या लोककला खरेच अभिमानास्पद आहेत काय, असा प्रश्न वासुदेव आणि देशातील इतर अनेक लोककलांबाबत उपस्थित केला जाऊ शकतो.

Tuesday, December 21, 2021

 

घसरत्या मूल्यांमुळे मुद्रित माध्यमांवरचा आणि एकूण प्रसारमाध्यमांवरचा लोकांचा विश्वास ढळत असेल तर त्यात आश्चर्य नाही…
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे

  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 20 December 2021
  • पडघममाध्यमनामापत्रकारिताJournalismसंपादकEditorवर्तमानपत्रNewspaperगोविंद तळवलकरGovind Talwalkarमाधव गडकरीMadhav Gadkariअरुण शौरीArun Shourie

मी पत्रकारितेची सुरुवात केली त्या पणजीतल्या ‘द नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात परस्परविरोधी स्वभावप्रकृतीची दोन सत्ताकेंद्रे होती. ‘द इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’ या तेव्हाच्या गाजलेल्या साप्ताहिकात खुशवंत सिंग यांच्या तालमीत तयार झालेले आणि त्यामुळे पत्रकारितेतल्या अनेक रूढ परंपरा मोडीत काढणारे जेमतेम तिशीचे संपादक बिक्रम व्होरा आणि त्यांच्या अगदी उलट म्हणजे नेहमीच मध्यममार्ग स्वीकारणारे मध्यमवयाचे वृत्तसंपादक एम.एम. मुदलियार.

मात्र ते दोघे प्रतिस्पर्धी मुळीच नव्हते. देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले बिक्रम व्होरा पत्रकारितेत वेगवेगळे प्रयोग करत असायचे. अधूनमधून ते आमच्या दैनिकात ‘नाईन्थ कॉलम’ म्हणजे नववा कलम या नावाच्या सदराखाली खुसखुशीत शैलीतले लेख लिहायचे. वृत्तपत्रात आठच कॉलम असतात. त्यामुळे या नवव्या कॉलम सदरातील मजकूर त्याच्या नावाला साजेल असा वेगळ्या धाटणीचा असायचा. नंतर आखाती देशात ‘खलीज टाइम्स’ वगैरे दैनिकांत काम केलेल्या बिक्रम व्होरा यांचे अशाच शैलीचे लेख हल्ली ‘टाइम्स ऑफ इंडिया’त प्रसिद्ध होत असतात.

याउलट गंभीर प्रकृतीचे, चिरुट पिणारे मुदलियारसाहेब दररोज संपादकीय लिहायचे. त्या काळच्या परंपरेनुसार हे संपादकीय सत्ताधारी पक्षाविरुद्ध बोचरे अजिबात नसायचे. तर ‘तळ्यात-मळ्यात’ करत  आणि ‘असे असले तरी’ असा शब्दप्रयोग करून संपादकियाचा शेवट व्हायचा. ‘नवहिंद टाइम्स’ने कुठल्याही ज्वलंत किंवा भावनिक विषयावर कधी ठाम भूमिका घेतली नाही. मग ते गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याबाबतचे सार्वमत असो की, गोव्यातल्या मराठी आणि कोकणी वादावर असो की, मच्छीमारांचे आंदोलन असो. हां, काही स्थानिक वा नागरी प्रश्नांवर लिहिताना म्हणजे गोंयकाराच्या दररोजच्या जेवणात असलेल्या पावांची किंवा त्यासाठी आवश्यक असलेल्या मैद्याची वाढलेली किंमत किंवा विजेची अनियमितता वगैरे प्रश्नांवर संपादकीय लिहिताना लेखणीला अगदी धार यायची.  

या अगदी उलट गोव्यातल्या मराठी आणि इतर दैनिकांची रीत वा परंपरा होती. भारतीय लष्कराने डिसेंबर १९६१मध्ये गोव्याला तसेच दमण आणि दीवला पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केले. त्यानंतर अस्तित्वात आलेल्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशातल्या गोव्याचे महाराष्ट्रात आणि दमण व दीवचे गुजरातमध्ये विलीनीकरण करण्यात यावे की, नाही या प्रश्नावर १९६७च्या जानेवारीत येथे सार्वमत घेण्यात आले. या वेळी चौगुले उद्योग समूहातर्फे चालवल्या जाणाऱ्या दैनिक ‘गोमंतक’ने गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे, असा हिरीरीने प्रचार केला होता. मडगावातल्या ‘राष्ट्रमत’ या मराठी दैनिकाने मात्र याविरुद्ध भूमिका घेऊन स्वतंत्र गोवा राज्याचा पुरस्कार केला. या मराठी दैनिकाचे संपादक चंद्रकांत केणी कट्टर कोकणीवादी होते आणि मराठी बोलणाऱ्या-वाचणाऱ्या गोव्यातील हिंदू वाचकांना आपली भूमिका पटवून देण्यासाठी, या मराठी दैनिकाच्या माध्यमाचा वापर करत होते! याच मराठी दैनिकात ‘ब्रह्मास्त्र’ या नावाचे सदर चालवून कोकणी लेखक उदय भेम्ब्रे यांनी विलीनीकरणाच्या विरोधी प्रचार केला होता. संपादक चंद्रकांत केणी यांच्या स्मरणार्थ आता गोंयकार पत्रकारांना पुरस्कार दिला जातो.

सत्तरच्या दशकात ‘गोमंतक’चे संपादक असलेले माधव गडकरी असेच चळवळ्ये आणि भूमिका घेणारे संपादक होते. आपल्या संपादकपदाच्या कारकिर्दीत आपली भूमिका आणि धोरण लोकांना पटावे, यासाठी त्यांनी केवळ अग्रलेखाची जागा वापरली नाही, तर जाहीर सभा-संमेलनेही गाजवली. एक फर्डा वक्ता म्हणून नाव कमावलेल्या गडकरी यांनी आपल्या भूमिकेचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासारख्या राजकीय पक्षाचे व्यासपीठसुद्धा कधी वर्ज्य मानले नाही.

‘गोमंतक’च्या संपादकपदी नंतर आलेले नारायण आठवले (साहित्यिक नाव अनिरुद्ध पुनर्वसु) हेसुद्धा गडकरींच्याच पठडीतले. गोव्याची राज्यभाषा कोकणी की, मराठी असावी हा वाद ऐंशींच्या दशकात चिघळला, तेव्हा आठवले यांनी आपल्या दैनिकाचा वापर अत्यंत आक्रमकतेने आणि हिरीरीने मराठी भाषेच्या समर्थनार्थ केला होता. त्याचा परिणाम म्हणून कोकणी भाषेला गोव्याची अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता मिळाली, तरी मराठीला समान वागणूक मिळेल, अशा आशयाचा ठराव विधानसभेत मंजूर झाला होता.

गोव्यात राज्यभाषा म्हणून मराठी भाषेची बाजू मांडण्यासाठी ‘गोमंतक’चे संपादक नारायण आठवले खिंड लढवत होते, त्याच वेळी विरोधी गटातर्फे कोकणी भाषेचा पुरस्कार करण्यासाठी गोव्यातील ‘हेराल्ड’ या इंग्रजी दैनिकाचे संपादक राजन नारायन आपली लेखणी वापरत होते. आपल्या नावांत नारायण असलेले दोन संपादक अशा प्रकारे परस्परविरोधी गटांच्या मोहिमा लढवत होते. गोव्यात मराठी समजणारा, या भाषेत लिहिणारा आणि बोलणारा बहुसंख्य समाज हिंदूधर्मीय, तर केवळ रोमन लिपीत कोकणी लिहिणारा, वाचणारा आणि इंग्रजी भाषेचा वापर करणारा ख्रिस्तीधर्मीय, यामुळे या कोकणी-मराठी भाषावादात धार्मिक ध्रुवीकरण होणे साहजिकच होते. या मराठी आणि इंग्रजी दैनिकांच्या संपादकांनी आपल्या वाचकांना अनुकूल अशा भूमिका घेऊन या चळवळींचे एकप्रकारे नेतृत्वही केले. (यापैकी नारायण आठवले १९९८ साली शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईतून लोकसभेवर निवडूनही गेले.)  

मराठी वृत्तपत्रसृष्टीत अनेक दैनिके आणि इतर नियतकालिके त्यांच्या संपादकांच्या नावानेच ओळखली गेली, असेच  या संपादकांचे  कर्तृत्व होते. उदाहरणार्थ, आचार्य अत्रे यांचा 'मराठा'., शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्रांना वाहून घेतलेले साप्ताहिक 'मार्मिक', अनंतराव भालेराव यांचा 'मराठवाडा',    

`नवाकाळ' चे  अग्रलेखांचा बादशाह म्हणून ओळखले गेलेले निळकंठ खाडिलकर, `लोकसत्ता'चे संपादक माधव गडकरी आणि अरुण टिकेकर तर` महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक गोविंद तळवलकर आणि कुमार केतकर अशी कितीतरी मोठी यादी देता येईल. 

इंग्रजी वृत्तपत्रजगातसुद्धा अशी काही नावे त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि वकुबामुळे प्रसिद्ध झाली, उदाहरणार्थ  `इंडियन  एक्सप्रेस'चे अरुण शौरी, `टाइम्स ऑफ इंडिया'चे गिरीलाल जैन आणि नंतरच्या काळातले दिलीप पाडगावकर, ` इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया'चे खुशवंत सिंग, त्याशिवाय अनेक नियतकालिकांचे संपादक असलेले विनोद मेहता वगैरे नावे सांगता येतील. 

संपादक म्हणून काही व्यक्तींनीं तर  इतिहास घडवला आहे. `केसरी' आणि  `सुधारक' नियतकालिकांचे संपादक लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर, `हरीजन' नियतकालिकाचे संपादक महात्मा गांधी, `बहिष्कृत भारत' आणि `मूकनायक'चे संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर  आणि `समाजस्वास्थ' मासिकाचे संपादक रघुनाथ धोंडो कर्वे ही त्या संपादकांपैकी काही अत्यंत अभिमानास्पद नावे

यापैकी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या संपादकीयामुळे तुरुंगवास भोगावा लागला. कामजीवनाविषयी आणि संततिनियमनाविषयी प्रबोधन करणाऱ्या  रघुनाथ धोंडो कर्वे यांना अश्लीलतेच्या आरोपाखाली अनेक कोर्ट-कचेऱ्यांना तोंड द्यावे लागले. न्यायालयात दोषी ठरल्यामुळे शिक्षा म्हणून त्यांना  दंडही भरावा लागला होता. यापैकी एका खटल्यात तर डॉ. आंबेडकरांनी `समाजस्वास्थ'कार कर्वे यांचे वकीलपत्र घेतले होते !

अर्थात ही  उल्लेख केलेली नावे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या नियतकालिकांचे संस्थापकसंपादक आणि मालक होते, पगारी संपादक नव्हते. आपापली नियतकालिके हे लोक  एक मिशन, ध्येयकार्य म्हणून चालवत असत.    

मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा समजणाऱ्या आणि या दोन्ही  भाषांत लिहिणाऱ्या काही मोजक्या पत्रकारांमध्ये मी आहे.  प्रादेशिक पत्रकारिता आणि इंग्रजी पत्रकारिता यात बराचसा फरक आहे. या दोन भाषांतील पत्रकार एकाच वृत्तपत्रसमूहात असल्याने एकाच ऑफिसात अगदी शेजारीशेजारी बसून काम करत असले तरी हा फरक जाणवतो.

‘नवहिंद टाइम्स’चे मराठी जुळे भावंड असलेल्या दैनिक ‘नवप्रभा’चे ऑफिस मांडवीच्या तिरावर पणजी मार्केटशेजारी त्या एकमजली टुमदार बंगलीवजा कौलारू इमारतीत शेजारी शेजारीच होते. दोन्ही दैनिकांच्या संपादकांना किंवा वार्ताहरांना भेटायला येणारी मंडळी मात्र वेगळी असायची. मराठी साहित्य, कला आणि संस्कृती वगैरे क्षेत्रांतील लोक बिनदिक्कतपणे मराठी दैनिकांच्या संपादकांना भेटायला यायची, हेच लोक शेजारच्या इंग्रजी दैनिकाच्या ऑफिसात डोकायलाही बुजायचे. आमच्या इंग्रजी दैनिकाच्या संपादकांना भेटायला येणारे लोक वेगळ्या आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीची असायची.

गोवा सोडून मी औरंगाबादला ‘लोकमत टाइम्स’ला रुजू झालो, त्यानंतर पुण्याला येऊन ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये, ‘टाइम्स ऑफ इंडिया’त आणि दीडेक दशक सकाळ समूहाच्या ‘महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स’मध्ये काम केले. पत्रकारितेच्या माझ्या चार दशकांच्या कारकिर्दीत माझी स्वतःची धाव ट्रेनी रिपोर्टरपासून सुरू होऊन सरतेशेवटी केवळ असिस्टंट एडिटर किंवा सहाय्य्क संपादक या पदापर्यंत पोहोचली होती. या सर्व इंग्रजी दैनिकांची मराठी भावंडे - लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळ - होती. इंग्रजी आणि मराठी दैनिकांच्या ऑफिसांत भेटायला येणाऱ्या लोकांचा गोव्यात मला जसा अनुभव आला होता, अगदी तस्साच अनुभव मला या दैनिकांत काम करतानाही आला.

मराठी वृत्तपत्रांतील संपादक आणि बातमीदार हे सामान्य जनतेला आणि भेटायला येणाऱ्या वाचकांना आपल्या केबिनचा दरवाजा सदा खुला ठेवतात, तर इंग्रजी दैनिकांचे संपादक स्वतःला सामान्य वाचकांपासून दूर ठेवतात. मराठी दैनिकांच्या कार्यालयात संपादकांना भेटण्यासाठी विविध क्षेत्रांतील लोकांची रांग असे, तसे इंग्रजी दैनिकांबाबत नसायचे. त्यामुळेच इंग्रजी पत्रकारिता हस्तिदंती बुरुजांत म्हणजेच जमिनीपासून दोन अंगुळे वर तरंगत राहून काम करत असते, असे म्हटले जाते, यात बरेचसे तथ्य असायचे, असते.

संपादक व्यासपीठावर असलेल्या कार्यक्रमासंबंधी कुठलीही बातमी वा छायाचित्र त्या दैनिकात छापली जाणार नाही, हा एक अलिखित नियम इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत खूप वर्षांपासून आहे. मात्र हा नियम त्याच वृत्तपत्रसमूहातील मराठी दैनिकांना लागू नसतो. उलट याबाबत अगदी विरुद्ध नियम पाळला जातो. संपादक ज्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा, अध्यक्ष वा वक्ता असतो, त्याची बातमी छायाचित्रासह पान एकवर नाहीतर निदान आतल्या पानांत ठळकपणे वापरली जाते. यामुळेच अनेक मराठी दैनिकांच्या संपादकांना ते या पदावर असेपर्यंत कार्यक्रमांसाठी आवर्जून बोलावले जाते.  

संपादकांविषयी पत्रकारांमध्ये आणि इतर लोकांमधे जी परम आदराची भावना असते, त्यांना या पदाबरोबर येणाऱ्या अनिश्चितत्तेची, असुरक्षिततेची बिलकुल कल्पना नसते. एका रविवारच्या संध्याकाळी पुणे कॅम्पातील ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ऑफिसात असताना पहिल्यांदा याची मला जाणीव झाली. ही घटना मी कधीच विसरणार नाही. साल १९९०. ‘इंडियन एक्सप्रेस’चे तत्कालीन संपादक अरुण शौरी कुठली तरी एक स्फोटक लेखमालिका लिहीत होते. ते स्वतः संपादक असल्याने या लेखांत कानामात्राचाही फेरफार न करता पान एकवर ते वापरले जावे, असे फर्मानच होते.

तर त्या संध्याकाळी मी ऑफिसात असताना ज्या टेलिप्रिंटरवर ‘इंडियन एक्सप्रेस’च्या सर्व बातम्या, लेख आणि निरोप मिळायचे, त्या यंत्रावर तो धक्कादायक एक ओळीचा निरोप टाईप होऊन आला होता. त्या निरोपाचा आदेश अर्थातच ‘इंडियन एक्सप्रेस’चे संस्थापक-मालक रामनाथ गोयंका यांनी काढला होता.

तो निरोप असा होता – 

‘Editor Arun Shourie has been sacked with immediate effect. Guard against publication of his article in tomorrow's edition.''

नंतर काही वेळ हाच निरोप टेलिप्रिंटरवर पुन्हा पुन्हा येत राहिला होता. संपादकांबाबत असे अनुभव नंतर मी अनेकदा घेतले. काही खूपच वेदनादायक होते. ‘वृत्तपत्र संपादकांचे शेल्फ लाईफ दोन ते तीन वर्षे असते’, अशी एक म्हण वृत्तपत्र उद्योगात प्रचलित आहे, ती यामुळेच..

‘लोकसत्ता’चे संपादक माधव गडकरी आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंद तळवलकर हे दोन समकालीन संपादक काही बाबतीत अगदी दोन विरुद्ध टोके होते. गडकरी हे चळवळ्ये, फर्डे वक्ते सभा-संमेलने गाजवणारे, तर तळवलकर हे कमालीचे माणूसघाणे, केबिनमध्ये बसून सर्व जगाबद्दलचे चिंतन लिहिणारे, अशी या दोघांची ख्याती. एका कुठल्या तरी गाजलेल्या राजकीय स्तंभलेखात वाचलेले आठवते की, त्या वेळीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेले शरद पवार यांच्याकडे माधव गडकरी आणि गोविंद तळवलकर या दोन्ही तळपत्या तलवारींना एकाच वेळी आपल्या म्यानात राखण्याचे कसब होते. ‘कुठल्या वेळी कुठली तलवार बाहेर काढायची अन कुठली म्यान करायची हे केवळ शरद पवार हेच जाणोत’ असे त्या स्तंभलेखकाने म्हटले होते.  

भारतात पंतप्रधान या पदानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे संपादकपद सर्वाधिक सामर्थ्यवान आहे, असे सत्तरीच्या किंवा ऐशींच्या दशकात म्हटले गेले होते. यात काही प्रमाणात तथ्यही असावे, कारण गोव्यात ज्या वेळी ‘नवहिंद टाइम्स’ हे एकमेव इंग्रजी दैनिक होते, त्या काळात या दैनिकाचे संपादक बिक्रम व्होरा अशाच प्रकारे गोवा, दमण आणि दिव या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल आणि तिथली उच्चपदस्थ सनदी अधिकारी यांच्याशी असे अत्यंत जवळचे संबंध राखून असायचे, हे मी अनुभवले आहे.

कुठल्याही देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा पोप हे दुसऱ्या देशांच्या दौऱ्यांवर जातात, तेव्हा त्यांच्याबरोबर काही निवडक राष्ट्रीय, प्रादेशिक दैनिकांचे बातमीदार असतात. एका दैनिकात नव्यानेच मी रुजू झालो होतो, तेव्हा आमच्या वृत्तपत्रसमूहाचे स्वतः मालकच अशा दौऱ्यावर गेले आहेत, हे ऐकून मला धक्काच बसला होता. तेव्हा मला कळले की, संपादकांना मिळणारा मानसन्मान आपल्यालाच मिळावा, यासाठी त्या वृत्तपत्रसमूहाच्या मालकांनी व्यवस्थापकीय संपादक म्हणजे मॅनेजिंग एडिटर असे पद धारण केले आहे. याच कारणासाठी हल्ली हे पद जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांच्या मालकांनी धारण केले आहे, असे दिसते. गेल्या काही दशकांत दैनिकांच्या संपादकपदाचे कमालीचे अवमूल्यन झाले आहे.    

एकेकाळी संपादकीय आणि संपादकीय पान हे कुठल्याही दैनिकाचा आत्मा समजले जाई. संपादकीय सदर असल्याशिवाय नियतकालिकांना सरकारी जाहिराती मिळत नाहीत, असेही म्हटले जायचे. काही वर्षांपूर्वी आमच्या इंग्रजी दैनिकात नव्यानेच रुजू झालेल्या संपादकांनी संपादकीय सदर बंद करण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हा आम्हा सर्व पत्रकार सहकाऱ्यांना भयंकर धक्का बसला होता. ते धर्मद्रोह म्हणजे पत्रकारितेच्या धर्माशी ते द्रोह करत आहेत, अशीच त्या वेळी आमच्यापैकी अनेकांची भावना होती. हल्ली संपादकीय मुळी कुणी वाचतच नाही, असा पवित्रा घेत संपादकांनी आपल्या त्या निर्णयाचे समर्थन केले होते.

दैनिकातील संपादकीय सदर बंद करण्याच्या या निर्णयात वावगे काही नव्हते, असे आता मलाही वाटते. याचे कारण हल्ली दैनिके आणि नियतकालिकांना संपादकाचा चेहराच राहिलेला नाही. अलीकडच्या काळात माझ्या घरी फक्त एक इंग्रजी आणि एक मराठी वृत्तपत्र येते. त्यातील संपादकीय मी कधी वाचले होते, ते मलाही आठवत नाही.

पूर्वी एखाद्या महत्त्वाच्या घटनांवर भाष्य करण्यासाठी संपादक वेळोवेळी पहिल्या पानावर आपल्या नावानिशी म्हणजे ‘साईन्ड आर्टिकल’ लिहीत असत. त्यामुळे संपादकाची वेगळी अशी ओळख निर्माण व्हायची. हल्ली दैनिकांचे निवासी संपादक वा मुख्य संपादक अशी भूमिका घेण्यास कचरतात. त्यामुळे अनेक नावाजलेल्या इंग्रजी आणि इतर भाषांतील राष्ट्रीय आणि प्रादेशिक दैनिकांचे संपादक कोण आहेत, हे त्या दैनिकांच्या वाचकांनासुद्धा माहीत नसते. काही संपादक आणि पत्रकार  येनकेनप्रकारे सदैव चर्चेत असतात, ते मात्र भलत्याच काही कारणांमुळे. पत्रकारितेतील अशा घसरत्या मूल्यांमुळे मुद्रित माध्यमांवरचा आणि एकूण प्रसारमाध्यमांवरचा लोकांचा विश्वास ढळत असेल तर त्यात आश्चर्य नाही.

..

Saturday, December 18, 2021

 Our Lady of Immaculate Conception  मारियेच्या निष्कलंक गर्भसंभवाचा सण किंवा फेस्त


 आज ८ डिसेम्बर आवर लेडी ऑफ इम्यॅकुलेट कन्सेप्शन (मारियेच्या निष्कलंक गर्भसंभवाचा) सण किंवा फेस्त.

पुण्यातल्या सिटी चर्चचे ` आवर लेडी ऑफ इम्यॅकुलेट कन्सेप्शन चर्च' हे अधिकृत नाव. माधवराव पेशवे यांनी १७९२साली दिलेल्या जमिनीवर क्वार्टर गेट येथे बांधण्यात आलेले हे चर्च पुण्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले सर्वात जुने चर्च.
गोव्यात पणजीतले चर्चसुद्धा आवर लेडी ऑफ इम्यॅकुलेट कन्सेप्शन चर्च' आहे. गोव्यात पणजीला आलेल्या कुठल्याही व्यक्तीने टेकडीवरचे हे चर्च पाहिलेले असतेच.
या दोन्ही चर्चचा आज सण.
अँजेलो डी फोन्सेका यांनी भारतीय शैलीतील १९५४ साली रेखाटलेले मदर मेरी किंवा मारियामातेचे हे आणखी एक सुंदर चित्र. सौजन्य पुन्हा एकदा गोव्यातले पत्रकार मित्र Vivek Menezes
Boas Festas ! Happy feast to all !!