Did you like the article?

Tuesday, April 28, 2020

‘रामायणा’तल्या कुब्जा मंथराची जागा ‘श्री ४२०’मधली मायाळू केळेवाली गंगामाईने घेतली होती!



मुलाखत संपली तेव्हा ‘रामायणा’तल्या कुब्जा मंथराची जागा ‘श्री ४२०’मधली मायाळू केळेवाली गंगामाईने घेतली होती!

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार
  • Sat , 25 April 2020
  • पडघममाध्यमनामाललिता पवारLalita Pawar
मुलाखत संपली तेव्हा ‘रामायणा’तल्या कुब्जा मंथराची जागा ‘श्री ४२०’मधली मायाळू केळेवाली गंगामाईने घेतली होती!
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे


त्या दिवशी मुलाखत घेण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा खरे म्हटले तर मला धडकीच भरली होती. मुलाखत घेण्यासाठी वा पत्रकार परिषदेला जाताना असे सहसा कधी होत नाही. पत्रकार परिषद घेणारी एखादी व्यक्ती खवचट असते. एखादा अडचणीचा प्रश्न विचारला तर उत्तर देण्याऐवजी प्रश्नकर्त्याचा अपमान करण्याची तिची सवय असते. पण त्यामुळे पत्रकारांनी घाबरून जाण्याचे कारण नसते. त्या दिवशी मी ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार होतो, त्या व्यक्तीच्या माझ्या आणि एकूण समाजमानसात असलेल्या प्रतिमेमुळे ही भीती निर्माण झाली होती. कारण युनिक फीचर्ससाठी मी ज्यांची मुलाखत घेण्यासाठी चाललो होती, ती व्यक्ती होती ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार.
ही घटना असेल १९९२च्या दरम्यानची. आदल्या दिवशी मी ललिता पवार यांच्याशी फोनवर बोलून मुलाखतीची वेळ ठरवली होती. त्या वेळी बोलताना त्यांनी त्यांच्या घराचा पत्ता सांगितला होता. माझा फ्लॅट तळमजल्यावरच आहे, शोधायला अडचण पडणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले होते. त्यांच्याशी एव्हढे बोलूनसुद्धा माझी धाकधूक काही कमी झाली नव्हती.
मराठी-हिंदी चित्रपटात शेकडो म्हणजे जवळपास सातशे चित्रपटांत काम करून देशातील लोकामंध्ये आपली एक खास प्रतिमा निर्माण करणाऱ्या एका प्रतिभावंत अभिनेत्रीची मुलाखत मी घेणार होतो. खरे म्हणजे सिनेमे पाहणाऱ्या लाखो लोकांमध्ये असणारी त्यांची प्रतिमा हीच माझ्या मनात त्यांच्याविषयी भीती निर्माण होण्याचे कारण होते.
खलनायकांच्या भूमिका अगदी जीव ओतून करणाऱ्या जीवन, प्रेम चोप्रा, प्राण किंवा मदन पुरी यांसारख्या नटांनी ७०-८०-९०च्या दशकांत प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. विशेष म्हणजे हे खलनायक फक्त चित्रपटांतच नाही तर खऱ्या जीवनातही असेच वागत असतील असेच लोकांना वाटायचे, इतकी ते आपली भूमिका नैसर्गिकपणे वठवत असत. गब्बरची भूमिका करणारा अमजाद खान हा बहुदा हिंदी चित्रपटातला पहिला खलनायक असावा, ज्याच्याविषयी प्रेक्षकांमध्ये चीड वा संताप निर्माण होण्याऐवजी पसंतीची वा अनुकूल भावना निर्माण झाली.
मी आता भेटायला जाणाऱ्या ललिता पवार यांची जातकुळी प्रामुख्याने जीवन, प्रेम चोप्रा आणि प्राण यांच्यासारखी खलनायकी प्रवृत्तीची होती. मराठी आणि हिंदी चित्रपटांत त्यांनी कजाग सासूच्या वा इतर खलनायिकेच्या अनेक भूमिका वठवल्या होत्या.
अपघातामुळे एका डोळ्याची बदललेली ठेवण त्यांना या खलनायकी भूमिका करण्यास पूरक ठरली. रामानंद सागरांच्या ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी कैकेयी राणीची दासी कुब्जा मंथराची भूमिका केली होती. तिने तर त्यांना घराघरांत नेले.
बॉक्स हिट ठरलेल्या अनेक हिंदी चित्रपटांत काम केलेल्या कलावंतांना छोटीशी भूमिका असूनही ‘शोले’ या लोकप्रिय चित्रपटाने आणि ‘रामायण’ या मालिकेने अक्षरश चिरस्मरणीय बनवले. रामायणाबाबतच बोलायचे झाल्यास कौसल्या राणीची भूमिका करणाऱ्या जयश्री गडकर, कैकेयीची भूमिका करणाऱ्या पद्मा खन्ना वा वा महाभारतात
अभिमन्यूची पत्नी उत्तराची भूमिका साकारणाऱ्या वर्षा उसगावकर यांचे उदाहरण देता येईल. 
तर आता मंथरासारख्या कजाग, दुष्ट प्रवृत्तीची प्रतिमा असणाऱ्या व्यक्तीच्या म्हणजे ललिता पवारांच्या घरी मी चाललो होतो. माझ्या मनाची धाकधूक होण्याचे ते कारण होते.
तळमजल्याच्या त्यांच्या फ्लॅटची बेल वाजवली, तेव्हा सकाळ अकरा किंवा साडेअकराचा सुमार असावा. काही क्षणांतच ललिता पवार यांनीच दार उघडले. मी पाहतच राहिलो. कित्येक चित्रपटांत पाहिले अगदी तसेच व्यक्तिमत्त्व. तो अर्धवट झाकलेला डोळा, पदर ओढून घेण्याची खास लकब आणि हालचालीत तो नेहमीचा चपळपणा. माझे स्वागत करून, बसायला सांगून त्या लगबगीने आता गेल्या आणि थंड लिंबू सरबत घेऊन आल्या. बहुधा तो मार्च वा एप्रिल महिना असावा. तेवढ्यात मी त्या वन बेडरूम फ्लॅटचे निरीक्षण करून घेतले होते. हॉलमध्ये मोजकेच आणि साधेच फर्निचर होते. मुंबईहून त्यांनी अलिकडेच पुण्याला आपला मुक्काम हलवला होत्या. या फ्लॅटमध्ये त्या एकट्याच राहत होत्या. 
सरबताचा आस्वाद घेताना माझी भीड चेपली होती. मला पहिला धक्का बसला, जेव्हा त्यांनी मला थेट ‘अरेतुरे’ करून बोलायला सुरुवात केली. मी नुकतीच तिशी ओलांडली असली आणि ललिताजींनी ऐंशी पार केली असली तरी मी एक पत्रकार म्हणून असे एकदम ‘अरेतुरे’चे संबोधन मला नक्कीच अपेक्षित नव्हते. नंतर लक्षात आले की, एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांना त्या त्यांच्यावर कॅमेरा रोखलेला नसताना अशी ‘अरेतुरे’च करत असणार. 
मुलाखतीसाठी बॅगमधून मी नोटपॅड काढले, तसे त्या आपल्याविषयी, आपल्या चित्रपट कारकिर्दीविषयी भरभरून बोलू लागल्या. आमच्या संभाषणाने मुलाखतीचे औपचारिक स्वरूप घेण्याआधीच स्वयंपाकघरात जाऊन चकल्या, लाडू, शेव असलेली एक गच्च भरलेली प्लेट त्यांनी माझ्यासमोर ठेवली होती. पुण्यात डेक्कन जिमखान्यावर बॅचलर म्हणून मंथली कॉट बेसिसवर राहत असल्याने ललिताजींचा हा पाहुणचार सुखावणारा होता. माझ्या मनात साठलेल्या एका खाष्ट, खडूस व्यक्तीची प्रतिमा या भेटीने बदलत होती.
जवळजवळ एक तास लांबलेल्या या मुलाखतीत ललितादींनी चित्रपटक्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अनेक आठवणी जागवल्या. आपल्या सात दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी तब्बल सातशे चित्रपटांत नायिका आणि नंतर चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले होते.
अमिताभ बच्चन नायक असलेल्या आणि अरुणा इराणी नायिका असलेल्या बॉंबे टू गोवा या विनोदी चित्रपटातील आपल्या टोपलीत कोंबडी घेऊन बसमध्ये प्रवास करणाऱ्या त्या रागीट महिलेची भुमिका करणाऱ्या ललिता पवार यांना कोण विसरेल 
मी चित्रपट समीक्षक म्हणून कधी लिहिले नव्हते; चित्रपटांविषयीही मला विशेष माहितीही नव्हती. मात्र या मुलाखतीत ललितादींनी राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’, ‘अनाडी’ या चित्रपटांत काम करताना आलेले अनेक अनुभव सांगितले. ‘श्री ४२०’मध्ये बेघर असलेल्या राज कपूरवर माया करणाऱ्या केळेवाली गंगामाईच्या भूमिकेसाठी साजेलशी नऊवारी साडी मिळवण्यासाठी आपण किती हिंडलो, हे त्यांनी मला सांगितले.
मुलाखत चालू असताना समोरच्या प्लेटमध्ये असलेले लाडू, चकली आणि इतर खाद्यपदार्थ मी संपवावे असा त्यांचा आग्रह चालूच होता. ‘अरे, मी स्वतः सगळे बनवले आहेत. लाजू नकोस.’, ‘अरे, तरुण आहेस तू. टाक खाऊन सगळे.’ असे सारख्या त्या म्हणत होत्या. 
पत्रकारितेच्या कारकिर्दीत ‘अरे, तरुण आहेस तू, टाक खाऊन सगळे’ असे दोन व्हीआयपी व्यक्तींनी  मला उद्देशून म्हटलेली वाक्ये माझ्या कायम स्मरणात आहेत. ऐंशीच्या दशकात गोव्यात आपल्या सत्तरी येथील बंगल्यात आम्हा पत्रकारांचा पाहुणचार करणारे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि पुण्यातील लोहगाव विमानतळावर व्हीआयपी केबिनमध्ये मला चहा-बिस्कीटांचा आग्रह करणारे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह. चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्ती असलेल्या ललिता पवार यांच्याकडूनही मला असाच स्मरणीय पाहुणचार लाभला. 
मुलाखत संपवून मी त्यांचा निरोप घेतला, तेव्हा ललिता पवार यांच्याविषयीची माझ्या मनातली आधीची नकारात्मक प्रतिमा साफ बदलली होती. ‘रामायणा’तल्या कुब्जा मंथराची प्रतिमा जाऊन तेथे आता ‘श्री ४२०’मधली मायाळू केळेवाली गंगामाईची प्रतिमा बसली होती!
.............

Sunday, April 19, 2020

Ragging news पत्रकारितेतील ‘त्या’ अनुचित घटनेचा सल आजही माझ्या मनात आहे!









त्रकारितेतील ‘त्या’ अनुचित आणि सहज टाळता येण्यासारख्या घटनेचा सल आजही माझ्या मनात आहे!
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
पणजीच्या ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून १९८१ ला रुजू झाल्यावर सहा महिन्यांनी माझा बी.ए.चा निकाल आला आणि मी त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या एम.ए.साठी नोंदणी केली. मी अजून शिकत असल्याने संपादकांनी मला पूर्णवेळ कॅम्पस आणि क्राईम-कोर्ट रिपोर्टरची बीट दिली होती. डेंटल कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंगबाबत बातमी देण्यासाठी म्हणूनच संपादकांनी त्या मुलीच्या घराकडे मला पाठवले होते.
आता मला अधुंक आठवते की, त्या मुलीचे घर म्हापशाला अल्तिनो (पोर्तुगीज भाषेत टेकडी )च्या पायथ्याला होते. मी घरी पोहोचलो तेव्हा मुलीच्या वडलांनी माझे स्वागत केले. घराच्या दिवाणखान्यात नजर टाकताच ते कुटुंब सुखवस्तू नव्हे तर अतिश्रीमंत होते, हे पटकन लक्षात येत होते. मी माझे व्हिजिटिंग कार्ड देताच मुलीच्या वडलांनी आपली ओळख करून दिली आणि स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड दिले. पेटकर या नावाचे ते गृहस्थ केंद्र सरकारचे ‘स्टँडिंग कौन्सिल’ होते. म्हणजे केंद्र सरकारसंबंधी कुठलीही केस असली तर वकील म्हणून बाजू मांडण्याचे त्यांना अधिकार होते, असे त्यांनी लगेचच मला स्पष्टीकरणही दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात क्राईम-कोर्ट रिपोर्टर म्हणून मी नियमितपणे हजेरी लावत असलो तरी हे पद मी पहिल्यांदाच ऐकत होतो. त्या संपूर्ण हॉलमधल्या भिंतीतल्या काचेच्या कपाटातील पुस्तके कसली असतील, हे मला आता समजले.
चहा बिस्किटे टेबलावर येईपर्यंत वकीलसाहेबांनी केसची मला थोडक्यात माहिती दिली. पणजीपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर बांबोळीतील गोवा डेंटल कॉलेज (डीएमसी) मध्ये पहिल्या वर्षाला असलेल्या त्यांच्या मुलीवर गेले काही दिवस रॅगिंग होत होते आणि त्याबाबत ती स्वतः वार्ताहराशी म्हणजे माझ्याशी बोलायला तयार आहे असे त्यांनी सांगितले. एक वकील म्हणून या प्रकरणातील सर्व कायदेकानूंबाबत ते खबरदारी घेत होते, हेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर लगेचच ती रॅगिंग पीडित मुलगी आतल्या खोलीतून बाहेर येऊन माझ्यासमोर आपल्या वडलांशेजारी सोफ्यावर बसली. बातमीदार म्हणून आता माझी मुलाखत सुरू झाली होती.
माझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. कोण रॅगिंग करते, कशा प्रकारचे रॅगिंग आणि किती दिवस हा त्रास चालू वगैरे प्रश्न होते. ही घटना ऐंशीच्या दशकातील आहे, तोपर्यंत रॅगिंगविषयी स्वतंत्र कायदे वा नियमावली बनवण्यात आली नव्हती. रॅगिंगविषयी तक्रार व वृत्तपत्रात बातमी आल्याचे मी कधी ऐकले नव्हते. तरी एक बातमीदार आणि क्राईम रिपोर्टर या दृष्टिकोनातून मी माझे प्रश्न विचारत होते. प्रश्नाचे उत्तर देताना ती मुलगी अडखळत होती आणि आपल्या वडलांकडे मदतीसाठी पाहत होती. पेटकरही आपल्या अशिलाच्या मदतीला यावे, तसे मुलीचे अर्धवट वाक्ये स्वतः पूर्ण करत होते. अतिरिक्त माहिती पुरवत होते. मी माझ्या प्रश्नांचा रोख पुन्हा त्या मुलीकडे वळवत असे आणि पुन्हा पेटकर वकील होणाऱ्या रॅगिंगबद्दल अधिक तपशील पुरवून आपल्या मुलीची बाजू बळकट करत होते.
त्या मुलीने आणि तिच्या वडिलांनी दिलेल्या रॅगिंगच्या तपशीलाच्या नोटस घेऊन मी ‘नवहिंद टाइम्स’च्या ऑफिसात पोहोचलो, तेव्हा संपादकांनी लगेचच मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. त्या दिवसाची ती सर्वांत मोठी (‘ब्रेकिंग न्यूज’ हा शब्द तोपर्यंत रूढ झाला नव्हता.) बातमी होती, हे मला लगेचच लक्षात आले.
‘येस कामिल, टेल मी व्हॉट इज द स्टोरी’, आमच्या संपादकांनी मला विचारले. त्यांचे वय अवघे अठ्ठावीस वर्षे असले तरी बिक्रम व्होरा हे एक अनुभवी पत्रकार होते. ‘इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’ या सर्वाधिक खपाच्या इंग्रजी साप्ताहिकात संपादक खुशवंत सिंग यांच्या तालमीत ते तयार झाले होते. शिवाय टेलीव्हिजन घराघरांत पोहोचण्याआधीच ‘क्विझ मास्टर’ म्हणून त्यांची छबी टेलिव्हिजनवर झळकली होती.  
मी माझे ब्रिफिंग सुरू केले. त्या मुलीवर तिच्या वर्गातील आणि वरच्या वर्गातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे रॅगिंग करत होते. डेंटल कॉलेजमध्ये कृत्रिम दात तयार करण्याच्या साच्यांसाठी वापरले जाणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिससारखे पदार्थ तिच्या तोंडात कोंबले जात होते, बांबोळीहून पणजीला सांता क्रुझ पाटो कॉलनीमार्गे डीएमसीच्या बसने येता-जाताना तिला मुद्दाम सीट दिली जात नव्हती आणि चालत्या बसमध्ये धक्के देऊन पाडले जात होते. क्लासमध्ये आणि कॉलेजमध्ये सगळीकडे तिला वेगळे पाडून तिच्याशी कुणाला बोलू दिले जात नव्हते. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी होत्या. ३५ वर्षांपूर्वीच्या त्या रॅगिंगबाबतच्या अधिक तक्रारी आता आठवत नाहीत. मात्र दखल घेतली जावी, असे त्या आरोपांचे स्वरूप गंभीर होते हे निश्चित.
ही बातमी मी टाइपरायटरवर मंद गतीने टाईप करणार, त्यानंतर उपसंपादक वा मुख्य उपसंपादक त्या न्यूज कॉपीतील स्पेलिंग करेक्ट करणार. वाक्यरचना बदलणार आणि नंतरच  तळमजल्यावर लायनोटाइप मशिनवर टाइप करायला पाठवणार या प्रक्रियेत वेळ घालवण्याइतका संयम संपादकसाहेबांना नव्हता. झटकन त्यांनी समोरचा पॅड पुढे ओढला आणि पेन स्टँडमधला एक पेन घेऊन मान तिरकी करून डाव्या हाताने ते स्टोरी लिहू लागले. अध्येमध्ये ते मला एखादा तपशील विचारत होते. पाचदहा मिनिटांत दीड पानांची बातमी लिहून त्यांनी ती माझ्यासमोर ठेवली. बायलाईनमधील माझ्या आडनावातील ‘पारखे’ऐवजी ‘पारके’ ही चुकीची स्पेलिंग वगळता त्या कॉपीत मला कुठलाही विपर्यस्त शब्द आढळला नाही. ‘डन?’ असा प्रश्न विचारून माझा होकार येताच व्होरासाहेब खुर्चीतून उठून गॅलरीत गेले.
संपादकांनी लिहिलेली ती स्टोरी त्यांच्या पर्सनल असिस्टंटने टाईप करून न्यूज डेस्ककडे सोपवली. दुसऱ्या दिवशी पान एकवर अँकर म्हणून जाणाऱ्या त्या स्टोरीवर न्यूज डेस्कला काही काम करण्याची गरज नव्हती. व्होरासाहेबांनी बातमीला हेडिंगसुद्धा दिले होते.  
दुसऱ्या दिवशी रविवारी ती बातमी प्रसिद्ध झाली. गोव्याची राजधानी असली तरी रविवारी पणजी अगदी शांत असते. त्या दिवशी संपादक, मुख्य वार्ताहर आणि इतर ज्येष्ठ मंडळी सुट्टीवर असायची. सोमवारी माझी साप्ताहिक सुट्टी म्हणून ताळेगावात मी  घरीच राहिलो. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीत आमच्या ऑफिसात काय गोंधळ उडाला, याची मला मंगळवार सकाळपर्यंत काही कल्पनाही नव्हती.
त्या सोमवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान गोवा डेंटल कॉलेजच्या दोन बसेस ‘नवहिंद टाइम्स’च्या ऑफिससमोर येऊन उभ्या राहिल्या. त्यातून पांढरे अॅप्रन घातलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी उतरले आणि आमच्या ऑफिसात घुसले. त्या काळात दैनिकाच्या ऑफीससमोर गुरखा वा वॉचमन ठेवण्याची पद्धत रूढ झाली नव्हती. आमच्या दैनिकाच्या एकमजली कौलारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या संपादकीय विभागात त्यांच्या नेत्यांनी संपादक व्होरा यांच्यासमोर आपली बाजू मांडली. आम्ही रॅगिंगची जी बातमी छापली, त्यात अजिबात तथ्य नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्या मुलीचे किंवा इतर कुणाचेही कुठल्याही प्रकारचे रॅगिंग झाले नाही. तुमच्या बातमीमुळे निष्कारण डेंटल कॉलेजची आणि विद्यार्थ्यांची बदनामी झाली, असे त्यांचे म्हणणे होते.
संपादक बिक्रम व्होरा यांनी कशा प्रकारे त्या संतप्त विद्यार्थ्यांची समजूत घातली, याची मला कल्पना नाही. मात्र दुसऱ्या दिवशीच्या ‘नवहिंद टाइम्स’मध्ये तिसऱ्या पानावर पहिल्या कॉलममध्ये अगदी तळाशी ‘क्लॅरिफिकेशन’ या हेडिंगखाली त्या विद्यार्थ्यांना कोट करून रॅगिंगचा प्रकार झालाच नाही असे लिहिले होते. या चुकीच्या बातमीबद्दल संपादक दिलगीर आहेत, असे त्या त्यात शेवटी म्हटले होते.
मंगळवारच्या अंकात हा खुलासा पाहून आणि नंतर इतर सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर माझ्या अनुपस्थितीत आदल्या दिवशी ऑफिसात काय गदारोळ उडाला होता हे मला कळाले. रॅगिंगची ही सनसनाटी बातमी देण्याआधी कॉलेजच्या डीन आणि इतर अधिकाऱ्यांशी, तसेच संबंधित विद्यार्थ्यांशी बोलून दोन्ही बाजू प्रसिद्ध करण्याचे तारतम्य मी आणि माझ्या संपादकांनी पाळले नव्हते. मात्र विद्यार्थ्यांशी बोलणे झाल्यानंतर तातडीने छोट्या स्वरूपात का होईना दिलगिरी व्यक्त करून आमच्या संपादकांनी पत्रकारितेचे एक साधेसुधे तत्त्व विनातक्रार पाळले होते. विशेष म्हणजे माझी या बातमीच्या संदर्भात चूक झाली असे म्हणत एका शब्दानेही ते दुसऱ्या दिवशी माझ्यावर रागावले नाहीत. कारण या बातमीतील एकूण एक शब्द त्यांनी स्वतःच लिहिला होता. त्याशिवाय या पूर्ण चुकीच्या बातमीबाबत ‘नवहिंद टाइम्स’ने छोटीशी का होईना, पण दिलगिरी व्यक्त केल्याने डीएमसीच्या विद्यार्थ्यांचेही पूर्ण समाधान झाले होते.
त्या कथित रॅगिंग झालेल्या त्या ‘पीडित’ मुलीने वा प्रस्थापित वकील असलेल्या तिच्या वडिलांनीही आपली बाजू मांडण्यासाठी नंतर माझ्याशी वा आमच्या दैनिकाशी कधीही संपर्क साधला नाही, यातून त्यांची लंगडी बाजू स्पष्ट झाली. त्या मुलीनेच कुठल्यातरी कारणास्तव रॅगिंगचा बनाव केला होता. वकिलीची चांगली प्रॅक्टिस असलेले तिचे वडील आपल्या लाडक्या, एकुलत्या एक लेकीच्या बनावाला बळी पडले होते. आणि क्राईम कोर्ट बीटचा बातमीदार म्हणून मीसुद्धा.
पत्रकारितेत वा कुठल्याही व्यवसायात आणि क्षेत्रांत अशा अक्षम्य मानवी चुका घडू शकतात. पुष्कळदा त्या हेतुपूर्वक नसतात. त्यामुळे  त्या चुका वेळीच स्वीकारून, डॅमेज कंटोल करून परिस्थिती नियंत्रणात आणणे, सुज्ञपणाचे असते. संपाद्क बिक्रम व्होरा यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा न बनवता तात्काळ माघार घेतली आणि या विषयावर लगेच पडदा पडला. हे बिक्रम व्होरा एक-दोन वर्षांतच बेटर प्रॉस्पेक्टसाठी आखाती देशांत गेले आणि तेथे त्यांनी तीन दशके ‘गल्फ न्यूज’ आणि ‘खलीज टाइम्स’ या आंतरराष्ट्रीय पातळीच्या वृत्तपत्रांत संपादक म्हणून काम केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’त त्यांचे खुमासदार शैलीचे लेख हल्ली अधूनमधून प्रसिद्ध होत असतात.
या काळात बांबोळी येथे वा डेंटल कॉलेजशेजारी असलेल्या इमारतीत नव्यानेच स्थापन झालेल्या गोवा विद्यापीठाचे कार्यालय तात्पुरते उघडण्यात आले होते. डीएमसीच्या विद्यार्थ्यांची आणि माझी या प्रकरणात कधीही प्रत्यक्ष गाठभेट झालेली नव्हती, तरीही या वादग्रस्त बातमीनंतर गोवा विद्यापीठाच्या कार्यालयात बातमीसाठी जाण्याचे धाडस मला अनेक दिवस झाले नाही. त्या दिलगिरीनंतर याबाबतीत संबंध असलेल्या सर्व लोकांच्या दृष्टीने हे प्रकरण एकाच दिवसात निकाली निघाले. 
१९७४ पासून माझे छापील नाव वा बायलाईन असलेली शेकडो कात्रणे मी आजपर्यंत जपून ठेवली आहेत. त्यामध्ये पान एक वरच्या या वादग्रस्त बातमीचे कात्रण अर्थातच नाही. इंग्रजी भाषेतील पत्रकारितेच्या दीर्घ कारकिर्दीत अनवधानाने, हलगर्जीमुळे वा क्वचित मुर्खपणामुळे विपर्यस्त, चुकीच्या बातम्या देण्याच्या इतरही अनेक घटना माझ्या हातून झाल्या आहेत. मात्र न झालेल्या रॅगिंगची ही बातमी आणि त्यामुळे आमच्या दैनिकावर आलेला विद्यार्थ्यांचा मोर्चा, ही त्यातली सर्वांत मोठी घटना म्हणावी लागेल. पत्रकारितेतील या एका अनुचित आणि सहज टाळता येण्यासारख्या घटनेचा सल साडेतीन दशकांच्या कालावधीनंतर माझ्या मनात आजही आहे.
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com

Wednesday, April 1, 2020

ख्रिस्ती घरात वाढलेली शिवसेना अर्थात मार्शल अखेरपर्यंत सामान्य ‘शिवसैनिक’च राहिला!


ख्रिस्ती घरात वाढलेली शिवसेना 
अर्थात मार्शल अखेरपर्यंत सामान्य ‘शिवसैनिक’च राहिला!

पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
कामिल पारखे
  • बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मार्शन जॉन पारखे
  • Thu , 23 January 2020
  • पडघमकोमविपशिवसेनाShiv Senaबाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackerayमार्शल पारखेMarshal Parkhe
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात श्रीरामपूरला आमच्या घरात ‘जय भवानी, जय शिवाजी’चे गजर घुमायला लागले. माझा थोरला भाऊ, मार्शल मॉडर्न स्कूलमध्ये मॅट्रिकला म्हणजे अकरावीला शिकत होता. त्याला एका विद्यार्थीप्रिय शिक्षकाच्या प्रभावाने शिवसेनेच्या ज्वराची लागण झाली आणि आमच्या घरातले वातावरण शिवसेनामय बनले. त्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच मार्शल पहिल्यांदा आपल्या शाळेच्या आणि नंतर बोरावके कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर आणि इतर मित्रांबरोबर लेझीम खेळू लागला. या खेळाच्या माध्यमातून शिवसेनेचा आमच्या घरात प्रवेश झाला.
मार्शल दररोज भल्या पहाटे तालमीत जायचा, तेथे लंगोट लावून घाम घाळायचा, आपल्या मित्रांबरोबर मल्लखांबावर कसरती करायचा. रात्री भिजवून ठेवलेली हरबऱ्याची डाळ सकाळी खायचा आणि दररोज संध्याकाळी आपल्या वयाच्या तरुणांना घेऊन मैदानावर ढोल-ताशांच्या गजरात ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे गर्जत लेझीम खेळायचा. संगमनेरला येशूसंघीय धर्मगुरूंच्या ज्ञानमाता शाळेच्या बोर्डिंगमध्ये असताना मार्शलने आपल्या नेतृत्वगुणांची झलक दाखवून दिली होती. या गुणांचा विकास या काळात होत गेला. आमच्या घरात लोखंडी पलंगांखाली अनेक लेझीम आणि ताशे असायचे. तेव्हा मार्शल आणि त्याच्या सहकाऱ्यांबरोबर मैदानावर या मर्दानी खेळाचा एक-दोनदा अनुभव घेतल्याचे आठवते. यादरम्यान मार्शलने शिवसेनेचा तो खास पटका आपल्या गळ्याभोवती कधी गुंडाळला आणि भगवा टिळा कपाळावर कधी लावला, हे माझ्या लक्षातही आले नाही. 
याच काळात वयाच्या पंधराव्या वर्षी फादर म्हणजे कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी मी घर आणि कुटुंब सोडले होते. गोव्यात मिरामार येथे प्री-नोव्हिशिएट वा पूर्व-सेमिनरीत राहून हायर सेकंडरीचे आणि नंतर पदवीचे शिक्षण घेताना सुट्टीवर श्रीरामपूरला आलो म्हणजे मार्शलचे ते भगवे रूप मला अचंबित करून जायचे. मार्शल माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा. माझ्याहून धाकट्या दोन बहिणी त्याला ‘आप्पा’ म्हणायच्या आणि मग हळूहळू घरातले सर्वच जण त्याला ‘आप्पा’ म्हणू लागले.  
कॉलेजच्या सुट्टीत गोव्याहून घरी परतलो की, मार्शल आणि त्याच्या मित्रांकडून मुंबईच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या अनेक चुरस आठवणी ऐकवल्या जायच्या. शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा उत्सवानिमित्त होणारे भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिक मुंबईला येत असत. दसऱ्याआधी महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे थवेच्या थवे मुंबईच्या दिशेने रेल्वेने निघायचे. या काळात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांत खच्चून गर्दी असे. “मात्र या दिसांत कुठल्या बी रेल्वे स्टेशनच्या एकाही टिकेट कलेक्टर (टीसी)ची रेल्वे डब्यात चढण्याची वा प्रवाश्यांना तिकीट विचारायची टाप नसते. परतीच्या प्रवासात बी अशीच स्थिती असते!” अशी वाक्ये मी त्या वेळी अनेकदा ऐकत असे.
या वार्षिक मुंबई दौऱ्यात शिवसैनिकांना रोमांचित करणारा एक खास अनुभव असे, तो म्हणजे दसऱ्यानंतर मातोश्रीवर होणारी खुद्द बाळासाहेबांची भेट! दसरा मेळाव्याच्या मुंबईच्या वारीत राज्यातील शिवसैनिकांना आपल्या दैवताला भेटण्यासाठी मातोश्रीत मुक्त प्रवेश असे. बाळासाहेबांचे भाषण ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटण्यासाठी, त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी मार्शल आणि त्याच्याबरोबर आलेले त्याचे इतर शिवसैनिक अगदी आतुर असायचे. शिवसेनेची मुंबई महापलिकेत सत्ता येण्यास अजून बराच काळ होता. त्यामुळे त्या काळात मातोश्रीवर आजच्यासारखे सुरक्षेचे अवडंबर नसायचे. बाळासाहेबांना मुंबईबाहेर दौरे करण्याची तोपर्यंत गरज भासली नव्हती. शिवसेनेचा विस्तार तोपर्यंत औरंगाबाद सोडा, ठाण्यातसुद्धा झाला नव्हता. मात्र बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने तेव्हाच्या शहरी आणि गावगाड्यांतील तरुणांमध्ये गारूड निर्माण केले होते. तोपर्यंत शिवसेनेने पूर्ण वेळ राजकारण करण्याचा निर्णय घेतला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जसे आजही स्वत:ला पूर्णत: सांस्कृतिक संघटना म्हणवून घेतो, तसेच शिवसेना त्याकाळी स्वत:ला केवळ एक सामाजिक संघटना, लुंगीवाल्या मद्राशी (दाक्षिणात्र) लोकांविरुद्ध लढणाऱ्या मराठी माणसांची संघटना असे म्हणवून घेत असे. तोपर्यंत शिवसेनेने अधिकृतरित्या हिंदुत्वाचा गंडा स्वत:ला बांधून घेतला नव्हता.
दसरा मेळाव्यानंतरचा सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा मातोश्रीतील दरबार हा एक खास सोहळा असायचा. शिवसैनिकांची त्या वेळी मातोश्रीत अगदी रीघ लागत असे. गेली अनेक वर्षे दिवाळीच्या सणात शरद पवार आपल्या मित्रमंडळीला, पक्ष कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना बारामतीला  आपल्या घरी भेटत असतात. तसलाच हा मातोश्रीवरचा त्या काळातला एक सोहळा होता. मार्शल हा श्रीरामपूरचा म्हणजे एका शहराचा शाखाप्रमुख असल्याने दरवर्षी त्याला आपल्या जोडीदारांबरोबर आपल्या ‘विठ्ठला’चे दर्शन घेण्याची संधी मिळायची. आपल्या आसनावर बसलेल्या बाळासाहेबांना मुजरा करून आम्ही मागे चालत जातो, ही भेट काही क्षणांचीच असते, पण स्मरणीय असते, असे मार्शल म्हणायचा. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीच्या त्या जमान्यात आपली छायाचित्रे काढणे वा इतरांकडून काढून घेणे खूप अशक्यप्राय असायचे. पुढे कलर फोटोग्राफीच्या काळात काही मोजक्या लोकांच्या हातात कॅमेरे आले आणि विशेष घटना कॅमेऱ्यात बंदिस्त करणे शक्य होऊ लागले. याच काळात मार्शलने बाळासाहेबांची मातोश्रीवर घेतलेल्या भेटीचे छायाचित्रे घेण्यात आले. ते त्यानंतर मार्शलच्या जीवनातील एक मोठ्या घटनेचा ऐवज म्हणून जपून ठेवण्यात आले होते.
सत्तरच्या दशकात मुंबईत ‘दलित पँथर’ने दलित तरुणांमध्ये नवे वारे निर्माण केले होते, तसेच त्या नंतरच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेनेचे वारे तयार झाले होते. गावोगावी वेशीपाशी शिवसेनेच्या नव्या शाखांचे बोर्ड लावले जात होते. शिवसेनेच्या शाखा बनवणाऱ्या या तरणाबांड पोरांपैकी बहुसंख्य जण मार्शलसारखेच सुशिक्षित बेरोजगार असायचे. आक्रमकता आणि बेडरपणा हा त्यांचा जणू स्थायीभावच असायचा.
‘घाशीराम कोतवाल’ हे विजय तेंडुलकरांचे नाटक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंबंधित रामायणातील ‘रीडल्स’चा वाद आणि त्यानंतरचे मराठवाडा विद्यापीठ नामांतर, यांबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिका वादग्रस्त ठरल्या. बाळासाहेबांविषयीचा कमालीचा आदर असल्याने त्यांचा आदेश पाळणे हे शिवसैनिकांचे कर्तव्यच असायचे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेच्या धोरणास पाठिंबा देण्याबाबत मार्शलही अगदी ठाम असायचा! त्याबाबत कधीही मतांतरे वा दुमत नसायचे. या प्रकरणासंबंधींचे काही वाद अनेक महिने, काही वर्षे चालले होते. एका ख्रिस्ती कुटुंबातील व्यक्तीला शिवसैनिक या नात्याने स्वत:च्या विचारसरणीच्या वा हिताच्या अगदी विरुद्ध भूमिका का घ्यावी, असा माझा त्याला सवाल असायचा. याबाबत आमच्या दोघांच्या नेहमी खडाजंगी व्हायच्या.
सत्तरच्या दशकात ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाविरोधात सनातनी मंडळींनी आवाज उठवला होता. या नाटकावर बंदी घालण्यात यावी यासाठी दबाव आणण्यात आला, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या नाटकाविरोधी भूमिका घेतली. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठे वादळ उभे राहिले होते. शिवसेनेच्या या भूमिकेबाबत मार्शलशी माझा झालेला वाद मला आजही आठवतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अप्रकाशित साहित्यातील ‘रामायणातील रीडल्स’ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करू नये, अशी जोरदार मागणी त्या वेळी करण्यात आली होती. याही वादात उडी घेत शिवसेनेने ‘रीडल्स’विरोधी भूमिका घेतली होती. दीर्घकाळ चाललेल्या मराठवाडा नामांतर आंदोलनातही शिवसेनेने नामांतरविरोधी भूमिका घेऊन दलित संघटनांचा रोष ओढवून घेतला होता. दलित संघटना आणि शिवसेना त्या काळात आमनेसामने उभ्या राहिल्या होत्या.
कॉलेजच्या सुट्टीत आणि नंतर नोकरी लागल्यावर रजा काढून पणजीहून मी श्रीरामपूरला येई, तेव्हा या आंदोलनांच्या काळात दरवेळी मार्शलशी आणि इतर शिवसैनिकांशी माझे खटके उडत असत. आपण स्वत: दलित असताना अशा सरसकट दलितविरोधी भूमिकांचे समर्थन कसे करता येईल, असा माझा मार्शलला सवाल असे. पण मार्शलने नेहमीच बाळासाहेबांच्या भूमिकेची पाठराखण केली. “(शिवाजी) महाराजांनी कधी जाती-धर्माचा बागुलबुवा केला नाही. त्यांच्या मावळ्यांत सगळ्या जातींचे आणि मुसलमान लोकही होते. तसेच साहेब पण (बाळासाहेब ठाकरे) जाती-धर्माचा असा संकुचित विचार करत नाहीत!,” असे मार्शलचे म्हणणे असायचे. शिवरायांच्या अंगरक्षकांमध्ये आणि सैन्यातसुद्धा मुसलमान होते, तसेच शिवसेनेतही आमदार साबिर शेख आहेत, असा तो नेहमी दाखला द्यायचा.
एकदा नाताळाच्या सुट्टीत मी घरी आलो होतो, तेव्हा ओट्यापाशी रस्त्याला लागून खांबावर उंच जागी नेहमीप्रमाणे ख्रिस्तजन्माची शुभवार्ता देणारा तारा लावलेला होता. सारवलेल्या अंगणात  ‘नाताळाच्या शुभेच्छा’ असे रंगीत रांगोळीने लिहिले होते आणि घराच्या पत्र्यावर टांगलेल्या उंच बांबूवर भगवा झेंडाही फडकावलेला होता. मला आठवते- घरावर फडकावलेला तो भगवा झेंडा पाहिल्यावर मी चांगलाच चरफडलो होतो. ओट्यावर थंडीत ऊन खात बसलेल्या दादांना मी त्याबद्दल विचारले, तर हाताच्या दोन्ही मुठी तोंडापाशी धरून हताशपणे ते गप्प राहिले होते. ऐन सणासुदीला मार्शलबरोबर वाद नको म्हणून मीही तेव्हा गप्प राहिलो.
त्या काळात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या दलित पँथर आणि शिवसेनेच्या अनेक सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांना जे काही भोगावे लागले, ते सर्व मार्शलच्याही वाट्याला आले. मोर्चे, दमदाटी, सरकारी कामकाजामध्ये आडकाठी वगैरे अनेक आरोपांत तो अनेकदा गुंतला गेला. पोलिसचौकशा आणि कोर्टकचेऱ्यांचा त्याच्यामागे ससेमिरा सुरू झाला. मी गोव्यात असल्याने सटी-सहामाही श्रीरामपूरला आल्यावर यासंबंधीची अगदी तुरळक माहिती बाईकडून मला मिळायची. (अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आईला ‘बाई’ हेच संबोधन असते!) डोळ्यातील पाणी पदराने टिपत बाई मला ही माहिती सांगायची, तेव्हा माझाही थरकाप उडायचा. त्या काळात मार्शलच्या तुरुंगाच्या किती वाऱ्या झाल्या असतील, याची मला आजही कल्पना नाही. त्याला ताबडतोब जामीन मिळवून त्याची सुटका करणारे शिवसेनेचे इतर नेते, त्या वेळी आजच्याइतके प्रस्थापित झालेले नव्हते.
मार्शलचे शिवसेनेचे हे प्रकरण कुठल्या पातळीवर पोहोचले असेल याची अंधुकशी कल्पना मला त्या दिवशी आली. यादरम्यान पणजीत ब्रदर म्हणून प्राथमिक दीक्षाविधी होऊन सफेद झगा मिळण्याआधीच फादर होण्याचा निर्णय मी बदलला होता. मात्र मी गोव्यातच स्थायिक झालो होतो. पणजीतील ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात मी त्या वेळी बातमीदार होतो. “इथल्या पोलिसांनी जारी केलेली तडीपार नोटीस रद्द करण्यासाठी तू काही करू शकशील काय?” असे मार्शलने मला विचारले होते. गोव्यात मी क्राईम रिपोर्टर असलो तरी अहमदनगर जिल्ह्यात पोलीस खात्यात मला कोण ओळखणार किंवा कोण माझे ऐकणार होते? मी त्याला अहमदनगरचे शिवसेना नेते अनिल राठोड यांना याबाबत भेट असे सांगितले. यावर मार्शल नुसताच हसला. त्यानंतर मार्शलच्याच एका सहकाऱ्याने मला सांगितले की, मार्शल आणि राठोड या दोघांची चांगली ओळख आहे. 
एकदा बाई सांगत होती. बहुधा १९८४ला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर श्रीरामपुरात बाजारपेठेत झालेल्या जाळपोळ आणि लुटालुटीनंतरची ही घटना असावी. “गेल्या महिन्यात ऐन मध्यरात्री घराच्या मागल्या आणि पुढच्या दारांवर जोरदार थापा पडल्या, काठ्यांचे आवाज आले... पोलिसांची पुन्हा एकदा धाड पडली होती. उघडलेल्या दोन्ही दारांतून काठ्यांचा आवाज करत पोलिसांनी झोपलेल्या सर्वांच्या अंगावरच्या गोधड्या आणि चादरी दूर केल्या होत्या. मोठी बाया-माणसं आवाजानं जागी झाली तरी पोरंसुरं झोपलेलीच होती. पोलिसांनी मग दोन्ही-तिन्ही खोल्यांतील पलंगांखाली वाकून, तिथल्या सामानांत आणि भरलेल्या बोचक्यांत काठ्या फिरवल्या. मग परत जाताना त्या पोलिसांचा सायब तुझ्या दादांकडे वळून म्हणाला, ‘पारखे टेलर, माफ करा, घरातल्या तुम्हा सगळ्यांना रात्री-अपरात्री हा तरास होतो. पन यावेळी आम्हाला मार्शलला पकडायचेच आहे!’ ते पुलिस गेल्यानंतर एक तास उलटला तरी पलंगाखाली गोवऱ्या आणि ऊसांच्या खोडक्यांच्या पोत्यांमागे लपलेला मार्शल बाहेर आला नाही. पहाटे बाहेर आला आणि काही दिवस पुन्ना गायबच झाला.” असे प्रकार अनेकदा होत असत, असे बाईच्या बोलण्यावरून लक्षात आले.
सुरुवातीच्या काळात शिवसेनेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असे प्रमाण होते. मुंबईत केवळ छगन भुजबळ आणि मनोहर जोशी हे या संघटनेचे प्रमुख राजकीय चेहरे होते.  हळूहळू शिवसेनेचा राज्यभर विस्तार होत गेला. मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या आणि राजकारण वर्ज्य मानणाऱ्या या संघटनेने राजकीय पक्ष म्हणून वावर सुरू केला, तेव्हा मार्शलनेसुद्धा राजकारणात उडी घेतली. श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तो उभा राहिला. ‘मार्शल जॉन पारखे’ या नावाचा युवक बहुसंख्य हिंदू असलेल्या वार्डातून खुल्या वर्गातून उमेदवार म्हणून उभा राहिला होता. दलित असला तरी ख्रिस्ती धर्मीय असल्याने त्याला आरक्षण नव्हते. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. मार्शलचा पराभव झाला. आमच्याच चाळीतील एक उमेदवार निवडून आला आणि त्यानंतर तो प्रस्थापित नगरसेवक बनला.
या निवडणुकीचा धडा घेऊन पुढच्या पालिका निवडणुकीत जर्मन दवाखान्याच्या परिसरातील वार्डातून मार्शल उभा राहिला. जर्मन मिशनरींनी उभारलेला तो दवाखाना, तेथील ख्रिस्ती देऊळ, येशूसंघीय फादरांतर्फे चालवल्या जाणाऱ्या आरटीआर, सोशल सेंटर वगैरे संस्थांच्या आसपासच्या त्या परिसरातील ख्रिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय होती. पण येथेही माशी शिंकली. मार्शल हा त्या परिसरातील सर्वांना परिचित असणाऱ्या पारखे टेलरांचा मुलगा होता, त्यालाही बहुतेक सर्व ख्रिस्ती मतदार ओळखत होते. मात्र या ख्रिस्ती तरुणाने शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या वार्डात मते मागावीत, हे त्या लोकांच्या पचनी पडले नाही. ‘ना घरका, ना घाटका’ असे बनलेल्या मार्शलचा त्या निवडणुकीतही पराभव झाला. 
त्यानंतर मार्शल निवडणुकीच्या फंदात पडलाच नाही. या क्षेत्रात आपल्याला फार मजल मारता येणार नाही, हे त्याच्या लक्षात आले होते. पैशाचे आणि आपापल्या ज्ञातबांधवांचे पाठबळ असलेल्या शिवसेनेतील त्याच्या बरोबरीच्या इतरांना मात्र हे शक्य झाले. श्रीरामपूर शहरातला शिवसेनेचा एक संस्थापक सभासद असलेला मार्शल अखेरपर्यंत सामान्य शिवसैनिकच राहिला. त्याच्याबरोबर असलेल्या आणि त्याच्यानंतर या संघटनेत आलेल्या अनेक जणांनी नंतर राजकारणात जम बसवला, काहीजण तर आमदार आणि मंत्रीही झाले. मार्शलने स्वत: कुठलीही नोकरी केली नाही, कुठल्याही व्यवसायात त्याला कधी यश आले नाही. आयुष्यभर त्याच्या वाटेला परवडच आली, कुटुंबाला तो आर्थिक स्थैर्य देऊ शकला नाही.
दहा-बारा वर्षांपूर्वी प्रदीर्घ आजाराने मार्शलचे निधन झाले, तेव्हा श्रीरामपूर आणि अहमदनगरहून प्रसिद्ध होणाऱ्या विविध दैनिकांत छोट्याशा एक कॉलममध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांत ‘एक जुने, कट्टर शिवसैनिक’ म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्याच्या चाळीसाव्यानिमित्त कबरीपाशी प्रार्थना झाल्या, फुले वाहण्यात आली. यानिमित्त जमलेल्या लोकांना बसण्यासाठी मार्शलच्या घराभोवती छोटासा मांडव घालण्यात आला होता. घराच्या पहिल्याच खोलीत दोन्ही हात जोडून आपल्या दैवताला - बाळासाहेब ठाकरेंना - दंडवत घालणाऱ्या मार्शलचे ‘ते’ छायाचित्र होते. मांडवात जेवणासाठी मांडी घालून बसल्यावर घराच्या पत्र्यांवर उंचावर उभारलेल्या त्या भगव्या झेंड्याकडे माझे सहज लक्ष गेले. खूप दिवसांपूर्वी उभारलेल्या त्या भगव्या झेंड्याचा रंग आता मूळ रंग ओळखू न यावा इतका फिका पडला होता.
................................................................................................................
.....................................................................................