Did you like the article?

Showing posts with label Pune. Show all posts
Showing posts with label Pune. Show all posts

Saturday, August 9, 2025



याला उत्तुंग ऐसे नाव..

जवळजवळ शंभर वर्षे ही वास्तू पुणे शहराची एक स्काय लाईन, एक ओळख होती. जसे फुले मंडईचा विशिष्ट आकाराची तो मनोरा, पुणे कॅम्पमधले यहुदी किंवा ज्यू लोकांचे ते लाल देऊळ, रेस कोर्सजवळचे जुन्या वानवडीमधले पूर्ण सफेद रंगातले सेंट पेट्रिक केथेड्रल.
.तिकडे पॅरिसमध्ये आजसुद्धा एफेल टॉवरला हे भाग्य लाभले आहे.
आपल्याकडच्या आता गगनचुंबी इमारतींच्या जमान्यात या वास्तूंबाबत तिथेच जवळपास चारपाचदा चौकशी करावी लागते.

त्याच धर्तीवरील पुण्यातील जुन्या वेताळ पेठेतील आणि आताच्या गुरुवार पेठेतील हे पंचहौद चर्च, किंवा पवित्र नाम देवालय.

The Church of The Holy Name

हे ऐतिहासिक चर्च या दिवसांत आपला 140 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

मागे झालेल्या शतकोतोर रौप्य महोत्सवाला मी हजर होतो, तेव्हाही पालकमंत्री असलेले अजित पवार मुख्य पाहुणे होते.

यावेळी दहा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आखला आहे.

याच ऐतिहासिक वास्तूमध्ये बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती म गो रानडे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे प्रभूतीना गोपाळराव जोशी यांनी खेळी करुन आणि सापळ्यात पकडून ते चहा बिस्किट प्रकरण घडवून आणले होते.

भारतीय पत्रकारितेतील पहिलेवहिले आणि अतिशय यशस्वी, खूप गाजलेले स्टिंग ऑपरेशन.

टिळक चरित्रात आणि महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात ग्रामण्य प्रकरण म्हणूनच हे चहाच्या पेल्यातले वादळ प्रसिद्ध आहे.

ख्रिस्ती मिशनरी आणि जोतिबा - सावित्रीबाई फुले यांचे अजोड नाते होते. स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरी यांच्या शाळांत सावित्रीबाई आणि जोतिबा शिकले होते.

तर या पंचहौद चर्चचे - पवित्र नाम देवालयाचे - सचिन मनोज येवलेकर यांना मी लिहीलेले " सावित्रीबाई आणि जोतिबा यांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य " हे पुस्तक दिले.

त्यानंतर हा फोटो घेत असताना काल संध्याकाळच्या सहाच्या ठोक्याला चर्चच्या बेलचा ठण ठण असा घंटानाद चालू होता.

चर्चच्या बेलचा घंटानाद ही काही मला नवलाची बाब नाही.

तरी या त्यावेळी खास इंग्लंडहून मागवल्या गेलेल्या या चर्चबेलच्या ठराविक काळाने होणार्या त्या घंटानादाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

हा घंटानाद खास आहे.

हा घंटानाद या उत्तुंग मनोर्यातील सात मोठ्या घंटांमधून येत असतो. सात घंटा आणि संगीतातले सात सूर.. सा रे ग म किंवा दो रे मी.....

त्यामुळे या घंटानादातून डिसेंबरात नाताळाच्या सणाला मंजुळ स्वरांत Christmas carols म्हणजे नाताळाची ख्रिस्त जन्माची गाणी ऐकवली जातात.

आणि भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्टला " जन गण मन अधिनायक " या राष्ट्रगीताचीही धून या घंटानादातून ऐकवली जाते..

Camil Parkhe August 7, 2025 

Sunday, July 27, 2025

 

Former Union Minister and veteran leader Sharad Pawar released a Marathi book written by me in Pune on July 3, 2025

The book is entitled ‘Savitribai, Jotibanche Shikshak Mitchell Dampatya Aani Stree Shikshanatil Purwasuri ( The Mitchell couple who taught Savitribai and Jotiba Phule and pioneers in female education).
Savitribai and Jotiba Phule had studied in schools run by the American and Scottish missionaries at Ahilyanagar and Pune.
The recently released Hindi film ‘Phule’ has depicted the arrival of the Phule couple in a buggi (horse-ridden cart) at Miss Cynthia Farrar’s school in Ahilyanagar to seek admission for Savitribai at the teachers training school run by the American missionary there.
The first few scenes of the Marathi film “Satyashodhak’ include young Jotiba studying in the Pune-based school run by Scottish missionary James Mitchell (1800-1866).
Incidentally Jotiba Phule in his memorandum to the Sir William Hunter Education Commission in 1882 has described his long association with the Christian missionaries.
Jotiba says the schools run by missionaries inspired him to start schools for girls and untouchables.
He says one of his schools is now run by Mrs (Margaret Shaw) Mitchell, wife of Rev. James Mitchell.
Jotiba also says that he has also been as a teacher in a mission female boarding school.
Let us see this information in Jotiba’s words:
The very first paragraph of the memorandum to the Hunter Commission states:
‘’My experience in educational matters is principally confined to Poona and the surrounding villages.
About 25 years ago, the missionaries had established a female school at Poona, but no indigenous school for girls existed at the time.
I, therefore, was induced, about the year 1851, to establish such a school, and in which I and my wife worked together for many years.
After some time I placed this school under the management of a committee of educated natives. Under their auspices two more schools were opened in different parts of the town.
A year after the institution of the female schools, I also established an indigenous mixed school for the lower classes, especially the Mahars and Mangs.
Two more schools for these classes were subsequently added, Sir Erskine Perry, the president of the late Educational Board, and Mr. Lumsdain, the then Secretary to Government, visited the female schools and were much pleased with the movement set on foot, and presented me with a pair of shawls.
I continued to work in them for nearly 9 to 10 years, but owing to circumstances, which it is needless here to detail, I seceded from the work.
These female schools still exist, having been made over by the committee to the Educational Department under the management of Mrs. Mitchell.
A school for the lower classes, Mahars and Mangs, also exists at the present day, but not in a satisfactory condition.
I have also been a teacher for some years in a mission female boarding school. My principal experience was gained in connection with these schools. ''
However, there is little information on the lives and works of Cynthia Farrar, James Mitchell, his wife Margaret Shaw Mitchell, Principal of the Pune-based Sanskrit College (now Deccan College) John Murray Mitchell who shaped the lives of Savitribai and Jotiba Phule.
My new book throws light on the lives of this great missionaries.
The book, published by Chetak Books, Pune, is available online.
(Photo Caption: Deepak Girme, Sharad Pawar, Camil Parkhe, former Pune Mayor Ankush Kakade, Former MLC Jaideo Gaikwad and senior journalist Arun Khore
Camil Parkhe July 4

Thursday, May 1, 2025

राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन

कोण असतील बरे या वेगवेगळ्या वेशभूषेतील मुली?

पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणाऱ्या त्या शालेय मुलींची उत्सुकता लपत नव्हती.
बुधवारच्या 12 February 2025 नगर येथील ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनातील ग्रंथ दिंडीतील या तीन व्यक्तिरेखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
त्या तीन व्यक्तिरेखा होत्या:
समाजसुधारक, विदुषी पंडिता रमाबाई,
भारतात विशेषतः महाराष्ट्रात मुंबई आणि नगर येथे स्त्रीशिक्षणाची मुहुर्तवेढ रोवणाऱ्या सिंथिया फरार
आणि अर्थातच मदर तेरेसा..

अलीकडे मराठी विश्वात वेगवेगळी संमेलने होताहेत.
काही विश्व संमेलने असतात जिथे विश्वातल्या अतिश्रीमंत लोकांना रक्कम मोजुन येण्यासाठी आवतण दिले जाते.
काही साहित्य संमेलने मराठी नगरीचियेची सीमा पार करुन थेट देशाच्या राजधानीत भरवली जातात.
अशा संमेलनांचा थाट खास असतो आणि यात सहभागी होणाऱ्या निमंत्रित लोकांची खूप चांगली ठेप राखली जाते असे ऐकून आहे.
कालच दिल्लीतल्या साहित्य संमेलनाची लांबलचक कार्यक्रमपत्रिका पाहिली, विविध सत्रांमधल्या निमंत्रित लोकांची नावे वाचली आणि डोळे दिपले.
दोनेक दिवसांपूर्वी मी एका संमेलनाला हजर होते ते मात्र पूर्णतः वेगळ्या स्वरुपाचे होते.
ग्रामीण साहित्य संमेलन असल्याने आपला खास गावरान आब राखून होते.
नगरला १२ फेब्रुवारीला झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाविषयी मी हे सांगतो आहे.
नावातच `ग्रामीण' बिरुद अभिमानाने मिरवत असल्याने या मांडवाखालची सगळीच मंडळी रांगडी होती, `आत एक आणि बाहेर दुसरे' असे काही त्यांचे वागणे नव्हते.
एक उदाहरण देतो.
या ग्रामीण संमेलनाला नगर शहराबाहेरुन आलेल्या लोकांची संख्या बऱ्यापैकी होती तरी त्यापैकी कुणालाही - अगदी विविध सत्रांच्या अध्यक्षांनाही - येण्याजाण्यासाठी मानधन दिले नव्हते.
मला स्वतःलाही आमंत्रण नव्हते.
पण आमच्या मूळ जिल्ह्यात होणाऱ्या संमेलनाची माहिती मिळाल्यावर मी आपणहून आयोजकांशी संपर्क साधला आणि स्वतःसाठी निमंत्रण मिळवले होते.
संमेलनाच्या आदल्या रात्री राहण्यासाठी फक्त दोन रुम्स बुक करण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी एका रूममध्ये मी राहिलो होतो.
बाकी सर्व जण - पुणे, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर वगैरे ठिकाणांहून स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने आले होते.
इथेही काव्यवाचन करायला अनेक हौशी आणि नवोदित कवी होते, त्यापैकी काहींच्या नावांवर एकही काव्यसंग्रह नव्हता.
श्रोत्यांतले रसिक मात्र त्यांना मनापासून दाद देत होते.
या ग्रामीण संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुपारच्या जेवणाला एकच मेन्यू होता.
तो म्हणजे मांसाहारी.
भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खाद्यपदार्थ अर्थातच चिकन बिर्याणी.
या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाला येणाऱ्या सर्वांची खाद्य संस्कृती समान असेल, आणि त्यापैकी प्रत्येकाला चिकन बिर्याणी आणि सोबत खोशिंबर हमखास आवडेल, हे आयोजकांनी गृहीतच धरले होते.
भुकेल्या पोटी चिकन बिर्याणी आणि कोशिंबरीचा आस्वाद घेताना आयोजकांच्या या गृहितकाला मी मनापासून दाद दिली.
इकडच्या ग्रामीण लग्न आणि इतर समारंभांत असणारे इतर खाद्यपदार्थ म्हणजे शिरासुद्धा अर्थातच होता.
बस्स तेव्हढेच, जेवणानंतर आईस्क्रीम किंवा तोंड रंगवण्यासाठी पान वगैरे कुछ नाही.
जेवण्याच्या ठिकाणी हातातल्या पत्रावळीत हे खाद्यपदार्थ घेऊन पाहुणेमंडळी दिसेल तिथे फतकल मारुन किंवा पत्रावळी उंचवट्यावर ठेऊन उभ्याउभ्याने गप्पा मारत जेवत होती.
प्रस्थापित संमेलनादी कार्यक्रमांत मान्यवर व्यासपीठावरचा आपला सहभाग संपला कि ठरलेल्या बिदागीचा चेक घेऊन तत्परतेने तेथून पाय काढत असतात.
इथे मात्र उशिरा संध्याकाळपर्यंत तेथून पाय काढता घेणे नकोसे वाटत होते.
पुण्यात रामवाडी स्टेशनमधली रात्रीची शेवटची मेट्रो चुकेल म्हणून मी तेथून जरा लवकर निघालो होतो.
गावाकडच्या मंडळींनी अशी संमेलने वारंवार घ्यावीत.

Sunday, December 8, 2024

आचारसंहितेचा भंग


पंतप्रधान इंदिरा गांधी यांची रायबरेली मतदारसंघातून १९७१ साली झालेली निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९७५ साली रद्द ठरवली ती निवडणुक प्रचारात त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला म्हणून आणि आचारसंहितेचा भंग झाला होता म्हणून.

त्यानंतर मोठा गदारोळ झाला, त्याचीच परिणती आणीबाणी लादण्यात झाली हे सर्वांना माहिती आहेच.
त्यानंतर इंदिराबाईंचा निवडणुकीत पराभव झाला पण त्या हिरीरीने परत जनतेकडे गेल्या.
त्यावेळी १९७९च्या डिसेंबरात या खवळलेल्या जखमी वाघिणीला गोव्यात पणजीतल्या हॉटेल मांडवीपाशी मी खूप जवळून पाहिले.
नंतर मिरामार बिचजवळच्या कंपाल ग्राऊंडवर त्यांचे भाषण ऐकले.
आजी आणि माजी पंतप्रधान असलेल्या इंदिराबाई यांच्यासह राजीव गांधी, व्ही पी सिंग, चंद्रशेखर, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी हस्तांदोलन करण्याची, पत्रकार परिषदेत संवाद साधण्याची आणि सभेत त्यांचे भाषण ऐकण्याची मला संधी मिळाली आहे.
मात्र पंतप्रधानपदी असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याबरोबर अर्धा पाऊण तास पुणे विमानतळावरच्या एका छोट्याशा केबिनमध्ये बोलण्याची संधी मला मिळाली.
बरोबर फक्त ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम होते, आणि पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्र जनता दलाच्या अध्यक्ष मृणाल गोरे होत्या.
साल होते १९९०.
पंतप्रधान व्ही. पी. सिंग एअर इंडियाच्या प्रवाशी विमानाने पुण्याला आले होते.
निवडणुक आचार संहितेचा भंग होऊ नये म्हणून.
सोलापूर जवळ कर्नाटकमधील एका पोटनिवडणुकीच्या आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी ते आले होते. पंतप्रधान म्हणून सरकारी विमानाचा वापर त्यांनी टाळला होता.
दिल्लीचे विमान संध्याकाळी होते म्हणून पंतप्रधान विमानतळावर ताटकळत बसले होते.
पंतप्रधान आपल्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी आले असल्याने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) पत्रकारांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी वाहन व्यवस्थाही केली नव्हती.
त्यावेळी मी इंडीयन एक्स्प्रेसला होतो. मुकुंद संगोराम यांच्या स्कूटर वर बसून त्या रविवारी दुपारी एकच्या आसपास घाईघाईत मी विमानतळावर पोहोचलो होतो.
बोफोर्स प्रकरण उचलून धरणारे सिंग हे त्याकाळी `मिस्टर क्लीन' म्हणून प्रसिद्ध होते.
प्रवाशी विमानाने प्रवास करून पंतप्रधानांनी आपला वेळ वाया घालवू नये असे त्यावेळी काही वृत्तपत्रांनी म्हटले होते.
लोकशाही प्रथेत निवडणुक आचार संहिता हा तसा एक खूप मोठा प्रभावी वचक आहे..
Camil Parkhe

Friday, December 6, 2024

 

हे. ऐंशीच्या दशकातली. आधीची नगर परिषद जाऊन महापालिका बनलेले पिंपरी चिंचवड शहर नव्याने आकार घेत होते.
मुंबई-पुणे हमरस्त्यावर चिंचवडमध्ये असलेल्या कॅथोलिक चर्चच्या कल्याण केंद्राने या परिसरातील लोकांसाठी एमआयडीसी परीसरात एका शेडमध्ये नवी शाळा सुरु केली होती. उद्योगनगरीत स्थायिक होणाऱ्या लोकांसाठी शाळा सुरु करणे आवश्यक होते.
नव्यानेच सुरु केलेल्या या शाळेसाठी खोल्या बांधण्याची परवानगी महापालिकेकडून घेणे गरजेचे होते. कल्याण केंद्रात नेमणूक झालेले तरुण फादर साल्वादोर उर्फ सालू पिंटो त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यालयात नियमितपणे जात होते. मात्र महापालिकेचे अधिकारी मात्र त्यांना तशी परवानगी देण्यास टाळाटाळ करत होते.
असे अनेक दिवस गेले. फादर साल्वादोर पिंटो महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांना भेटून शाळेसाठी बांधकाम करण्यासाठी वेगवेगळे अर्ज देत होते. त्यांच्या फायलीत अर्जांचा आणि इतर कागदपत्रांचा गठ्ठा वाढत चालला होता. मात्र शाळेसाठी बांधकाम करण्याची परवानगी मिळेल अशी काही चिन्हे दिसत नव्हती.
फादर पिंटो यांनी मात्र आपला धीर आणि संयम सोडला नव्हता. चिकाटीने ते महापालिकेच्या इमारतीतील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना भेटत राहिले. आपल्या शाळेतील मुलांमुलींना शाळेत सुरक्षित छत असणे आवश्यक आहे हे अधिकाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न फादर सालू करत होते.
शाळेच्या बांधकामासाठी परवानगी मिळवण्यासाठी महापालिकेच्या कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याला लाच देण्यास मात्र फादर सालू पिंटो तयार नव्हते.
एक दिवस मात्र फादर सालू पिंटो यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वोच्च अधिकारी असलेल्या आयुक्तांची यासाठी भेट घेण्याचे ठरवले. त्यांना यासाठी थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात प्रवेश सुद्धा मिळाला.
त्यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त होते श्रीनिवास पाटील.

फादर साल्वादोर पिंटो यांनी आपले मत आयुक्तांसमोर थोडक्यात आणि स्पष्टपणे मांडले.
त्यांनी आयुक्तांना सांगितले कि या क्षणाला कल्याण केंद्राच्या या शाळेसाठी इमारत बांधण्यासाठी परवानगी देणे शक्य नसल्यास निदान शाळेतील विद्यार्थिनीसाठी स्वच्छतागृह बांधण्याची परवानगी देण्यात यावी.
मुलींसाठी शाळेत स्वच्छतागृह असणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी सहानुभूतीची भूमिका ठेवून त्यासाठी बांधकामास परवानगी देण्यास यावी असे फादर पिंटो यांनी महापालिका आयुक्त पाटील यांना विनंती केली.
महापालिका आयुक्तांनी फादरांना विचारले कि यासंदर्भात आवश्यक अर्ज आणि कागदपत्रे देण्यात आली आहेत काय?
फादर सालू यांनी तत्क्षणी आपल्या जवळ असलेली अर्जाची आणि कागदपत्रांची जाडजूड फाईल आयुक्तांना दाखवली.
``मी संबधित अधिकाऱ्यांशी याबाबत बोलतो आणि योग्य तो निर्णय घेतो'' असे आयुक्तांनी फादरांना आश्वासन दिले आणि लगेचच संबंधित सर्व विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बैठकीसाठी बोलावले.
फादर साल्वादोर अर्थातच या बैठकीला होते.
बैठक सुरु होताच कल्याण केंद्राच्या या शाळेसाठी परवानगी मागणाऱ्या अर्जाचे काय झाले असा थेट प्रश्न आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांना विचारला. या बैठकीत नगर अभियंता (सिटी इंजिनियर), आरोग्य, बांधकाम, वगैरे खात्यांचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.
या सर्व विभागांत जाऊन या अधिकाऱ्यांना फादर पिंटो अनेकदा भेटले होते.
आयुक्तांनी या अर्जाबाबत जाब मागितल्याने सर्वच अधिकऱ्यांची गाळण उडाली होती.
परवानगी का दिली जात नाही असे विचारल्यावर आयुक्तांना थातुरमातुर उत्तर देणे त्यांना शक्यच नव्हते. सर्व कागदपत्रे असल्याने बांधकामास परवानगी देण्यास तशी काहीच अडचण नव्हती.
``शाळेसाठी बांधकाम करण्याची परवानगी देण्यास काही अडचण नाही असे दिसते. त्यामुळे आज संद्याकाळपर्यंत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी फादरांना आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी देणारी पत्रे द्यावीत,'' असा आदेश महापालिका आयुक्त श्रीनिवास पाटील यांनी दिला आणि बैठक संपली.
शाळेच्या खोल्यांच्या बांधकामासाठी अंतिम परवानगी मिळण्यास मात्र एक मोठी अडचण .होती.
सकाळी झालेल्या महापालिका आयुक्तांच्या बैठकीत सिटी इंजिनीयर नव्हते आणि त्यांच्या विभागाची परवानगी यासाठी सर्वात आवश्यक होती.
मात्र यावर लगेचच तोडगा निघालासुद्धा.
इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी सिटी इंजिनियर साहेबांना सांगितले कि महापालिका आयुक्तांनी शाळेच्या बांधकामासाठी आज संद्याकाळपर्यँत सर्व परवानग्या देण्याचे आदेश दिले आहेत.
अशी परवानगी देण्यास काही कायदेशीर आणि इतर अडचणी असल्यास सिटी इंजिनियर याबाबत खुद्द आयुक्तांना तसे सांगू शकतील असेही सिटी इंजिनियरांना सांगण्यात आले.
ही मात्रा लगेच लागू पडली आणि शाळेसाठी बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानगीचे कागदपत्र सही आणि शिक्क्यांसह फादर साल्वादोर पिंटो यांच्या हातात त्या दिवशी संघ्याकाळीच पडली.
नागरिकांच्या हितांसाठी आवश्यक ते निर्णय धडाडीने घेणारे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीनिवास पाटील यांनी त्यानंतर राज्य प्रशासनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या,
श्रीनिवास पाटील यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यांचे हरहुन्नरी व्यत्क्तिमत्व अनुभवण्याची मला संधी मिळाली ती १९९१ लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणींच्या वेळी.
त्यावेळीही आपल्या झुबकेदार मिशीने ते सर्वांचे लक्ष वेधून घेत असत.
त्या जमान्यात आजचे वादग्रस्त ठरलेले इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन किंवा ईव्हीएम नव्हते. प्रत्यक्ष मतदान पत्रिका मोजल्या जायच्या आणि हे काम दिवसभर आणि क्वचित रात्रभर सुद्धा चालायचे.
त्यावेळी मी इंडियन एक्सप्रेसला बातमीदार होतो. पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ आणि भाजपचे लक्ष्मण सोनोपंत तथा अण्णा जोशी उमेदवार होते. त्याविषयी सविस्तर नंतर कधीतरी.
तर त्यावेळी जिल्हाधिकारी या नात्याने श्रीनिवास पाटील निवडणूक अधिकारी होते आणि माईकवर सतत बोलून आपल्या प्रगल्भ आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची आम्हा पत्रकाराना आणि मतमोजणी केंद्रात हजर असलेल्या लोकांना अनुभूती देत होते.
लोकप्रिय कविता आणि शेरोशायरी.. चपखल टिपण्णी वगैरे..आजही मतमोजणी केंद्रातील ते दहाबारा तास माझ्या नजरेसमोर आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले श्रीनिवास पाटील पुढे लोकसभेवर सुद्धा निवडले गेले आणि नंतर सिक्कीमचे राज्यपाल बनले.
तो अलीकडचा इतिहास सर्वांना ठाऊक आहेच.
चिंचवडच्या कल्याण केंद्रातर्फे सुरु करण्यात आलेली मुलांमुलींची शाळा आज सेंट अँड्रयूज स्कुल म्हणून नावारूपास आली आहे.
कल्याण केंद्र आज मुंबई-पुणे हायवेवर जयश्री टॉकीजच्या दुसऱ्या टोकाला असलेले सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्च या नावाने ओळखले जाते.
फादर साल्वादोर पिंटो यांनी आता वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली आहेत.
पुण्याचे बिशप आणि शनिवारीच मुंबईचे आर्चबिशप ओसवाल्ड ग्रेशियस यांचे वारसदार म्हणून नेमणूक झालेले पुण्याचे बिशप जॉन रॉड्रिग्स यांच्या हस्ते त्यांचा यानिमित्त रविवारी संध्याकाळी सत्कार झाला. पुणेरी पगडीसह !!
फादर सालू पिंटो याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
Camil Parkhe December 2, 2024

Wednesday, May 8, 2024

 


इम्तियाझ जलील सईद
ही तशी अगदी अलीकडची बाब, म्हणजे आता मध्यम वयातील लोकांना नक्की माहित असणार.
नगरपालिका आणि महापालिका निवडणुका पार पडल्या, निकाल जाहीर झाले की पुढील काही दिवस आम्ही पत्रकार मंडळी प्रस्थापित लोकांच्या बातम्या छापायचो त्याचप्रमाणे काही एखाद्या एकदम सामान्य व्यक्ती निवडून येत असत, त्यांच्याही बातम्या करत असू.
प्रत्येक गावागावांत आणि शहराशहरांत असे काही धक्कादायक निवडणूक निकाल असायचेच.
एखाद दुसरा/दुसरी जायंट किलर म्हणून नाव कमवायचे.
तिसेक वर्षांपूर्वी गावांत आणि शहरांत एखाद्या प्रमुख ठिकाणी पानटपरी असलेल्या व्यक्तीचे तिथल्या स्थानिक लोकांशी प्रचंड जनसंपर्क असायचा.
तीच गोष्ट चौकात दुचाकींचे पंक्चर काढणाऱ्या, गॅरेज असणाऱ्या व्यक्तींचे असायचे.
यापैकी कुणी एकाने लोकाग्रहास्तव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अर्ज भरला तर तिरंगी, चौरंगी किंवा बहुरंगी आणि त्यामुळे अटीतटीच्या या निवडणुकीत अशा सामान्य लोकांना आजूबाजूचे लोक मत द्यायचे आणि हे अतिसामान्य लोक चक्क निवडूनसुध्दा यायचे.
राज्यात आणि देशात असे जायंट किलर्स आजही परिचित आहेत.
मुंबईत स. का. पाटील यांना १९६७च्या लोक सभा निवडणुकीत हरवणारे समाजवादी, कामगार नेते जॉर्जे फर्नांडिस.
रायबरेलीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना १९७७ साली हरवणारे राज नारायण.
आमच्या शहरात महापालिका निवडणुकीत काही वर्षांपूर्वी असेच एक नाव गाजले. मारुती भापकर.
अण्णा हजारे, अरविंद हजारे, किरण बेदी प्रभुतींनी नवी दिल्लीत २०१४ सालापूर्वी लोक आंदोलन चालवले तेव्हा लोकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
सामान्य लोकांचे खरेखुरे नेते पुढील निवडणुकीत निवडून येऊ शकतील असे वातावरण तेव्हा निर्माण झाले होते.
याच भावनेतून मुंबईत मेधा पाटकर यांनी २०१४ लोकसभेची निवडणूक लढवली,
पुण्यात सुभाष वारे आणि मावळ मतदारसंघात मारुती भापकर यांनी निवडणूक लढवली.
या तिन्हीपैकी कुणीही करोडपती नव्हते.
मात्र हे तिघेही पराभूत झाले होते.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवणारे आणि जिंकणारे बहुतेक जणांनी पोटापाण्यासाठी कधीही नोकरी केलेली नसते, तशी गरज त्यांना कधी भासलेली नसते.
त्यामुळे पत्रकार म्हणून पुण्यात आणि इतरत्र नोकरी केलेल्या इम्तियाझ जलील सईद यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून २०१९ला अत्यंत अटीतटीच्या चौरंगी लढ्यात चार हजारांच्या मतांच्या फरकाने विजय मिळवला तेव्हा ती राष्ट्रीय पातळीवरची बातमी बनली होती.
यंदाच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत असे जायंट किलर्स कुणी असू शकतील काय?
Camil Parkhe,

 

पंडित भीमसेन जोशी

पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या इंडियन एक्सप्रेसला मी रुजू झालो होतो तेव्हाची ही गोष्ट. साल होते १९९०.
गोव्यात पणजीला हायर सेकंडरी, पदवी शिक्षण घेतल्यानंतर तिथेच `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात पत्रकारीतेला सुरुवात केली होती. या दीर्घ कालावधीत महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक घडामोडींशी फारसा संबंध राहिला नव्हता.
पुण्यात तर कधी राहिलोही नव्हतो. या शहरात बातमीदारी करताना हळूहळू येथील लोकजीवनाची आणि विविध क्षेत्रांतली प्रमुख व्यक्तिमत्त्वांची ओळख होत होती.
गोव्याच्या तुलनेत विविध क्षेत्रांत आपापला दबदबा राखून असलेली अशी दिग्गज मंडळी येथे खूप मोठया प्रमाणात होती. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे नरुभाऊ लिमये, पु ल देशपांडे, नानासाहेब गोरे, मोहन धारिया, जयंत नारळीकर, डॉ गोविंद स्वरूप, शकुंतला परांजपे, विद्या बाळ ही त्यापैकी काही ठळक नावे.
त्या एका रविवारच्या संद्याकाळी आम्हा बातमीदाराच्या दैनंदिन डायरीत माझ्या नावावर एक कार्यक्रम लिहिला होता.
पुण्यातल्या आमच्या `इंडियन एक्सप्रेस'मध्ये त्यावेळी मुख्य वार्ताहर नव्हता. आताचे आम्ही सर्व बातमीदार लोक विशीतले होतो, नरेंद्र करुणाकरन, शुभा गडकरी, संगीता जहागिरदार-जैन, अवर्तिन्हो मिरांडा, विश्वनाथ हिरेमठ, माधव गोखले आणि मी स्वतः.
प्रकाश कर्दळे `मास्तर' हे निवासी संपादक होते आणि बातमीदारांची कामकाजाची दैनंदिन डायरी आम्हापैकी एक बातमीदार लिहित असे.
तर शहरातील कन्नड संघ या संस्थेने भरत नाट्य मंडळ येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंडित भीमसेन जोशी होते.
बातमीच्या दृष्टीने भाकड असलेल्या रविवारी शहर आवृत्ती असलेल्या दैनिकांची स्थानिक पाने भरण्यासाठी बातम्या आणि फोटो कमी पडतात, त्यामुळे एक बऱ्यापैकी लांबीची बातमी मिळेल अशा हेतूने मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो होतो.
त्या मोठ्या हॉलमध्ये गर्दी तशी कमीच होती. मला वाटते हॉल निम्मासुद्धा भरला नव्हता, कारण कन्नड संघ या सांस्कृतिक संस्थेची ती सभा होती.
व्यासपीठावर अगदी मोजकीच म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांच्यासह पाचसहा माणसे होती. कन्नड संघाच्या अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेविषयी माहिती दिली, अहवाल वाचले.
कुठल्याही कार्यक्रमाची बातमी घेण्याऱ्या बातमीदाराच्या नशिबी हा रटाळपणा त्याच्या नेहेमीच्या कामकाजाचा भाग असतो, मुख्य वक्ता आपले भाषण सुरू करीपर्यंत बातमीदाराला अशी भाषणे ऐकून घेण्यावाचून इतर काही पर्याय नसतो.
बातमीच्या अनुषंगाने मी मोजकीच टिपणे घेत होतो. रविवार संध्याकाळच्या त्या कार्यक्रमाला बातमीदार असा मी एकटाच होतो. पण अनेक कार्यक्रमांना पुष्कळशी बातमीदार मंडळी फिरकतसुद्धा नसतात असा अनुभव असल्याने त्याबद्दल मला विशेष असे काही वाटले नाही.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य पाहुण्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर पंडित भीमसेन जोशी भाषणासाठी उभे राहिले.
आधी आलेली मरगळ झटकून मी पेन सरसावून मी त्यांच्या संपूर्ण भाषणाचे टिपण काढण्यासाठी सज्ज झालो
खांद्यावर असलेली शाल ठिकठाक करत पंडितजींनी उच्चारलेल्या पहिल्याच वाक्याने मी सर्द झालो.
संगीतातले मला काहीएक कळत नाही. या संस्थेच्या कार्यक्रमात पंडितजी संगीताविषयी बोलतील किंवा श्रोत्यांच्या आवडीचा असलेला एखादा राग किंवा गीत गातील अशी माझी बिलकुल अपेक्षा नव्हती.
त्याआधी पंडितजींची कितीतरी मराठी गीते मी ऐकली होती, त्यापैकी अभंगवाणीसारखी `इंद्रायणीकाठी', `कानडा हो विठ्ठलु', अशी काही लोकप्रिय गायने मला बऱ्यापैकी तोंङपाठसुद्धा होती.
ण तरीसुद्धा पंडितजींनी यावेळी जो राग आळवायला सुरुवात केली होती तो राग खूपच अनपेक्षित होता, एकदम अनोळखी होता. मला आश्चर्याचा धक्काच बसला होता.
पंडितजींनी सुरु केलेल्या त्या रागाने मी वगळता इतर सर्व श्रोते एकदम खुश झाले होते, कान देऊन ते पंडितजींना ऐकत होते.
मोठ्या उत्सुकतेने बातमीसाठी टिपणी घेण्यासाठी पेन सरसावून बसलेलो मी मात्र एकदम दिग्मूढ झालो होतो.
पुढील पाचदहा मिनिटे पंडितजींचा आवाज कानावर पडत होता, काहीच अर्थबोध होत नसल्याने मी चुपचाप होतो.
अर्थात जे काही घडत होते त्यात वावगे असे काहीच नव्हते.
तो कार्यक्रम पुण्यातल्या कन्नड संघाचा होता, पंडितजींसह तिथे हजर असलेली सर्व मंडळी पुणेकर असली तरी मुळची कन्नडभाषिकच होती. त्यामुळेच तर भीमसेनजींनी कन्नड भाषेत बोलणे अगदी सुसंगत होते.
आधीचे सर्व वक्ते स्थानिक मराठी भाषेत बोलले होते तरी पंडितजींना आपल्या मातृभाषेत या कानडी लोकांशी संवाद साधणे उचित वाटले होते.
पुण्यात अनेक वर्षे राहून पुणेकर बनलेल्या कन्नड संघाच्या पदाधिकाऱ्यांना पुण्यातल्या या कार्यक्रमात मराठीतच बोलणे जितके संयुक्तिक वाटले तितकेच कन्नड भाषेत बोलून या लोकांशी असलेली आपली नाळ दाखवणे पंडितजींना संयुक्तिक वाटले असणार.
पंडित भीमसेन जोशी हे मूळचे कर्नाटकातले आणि कन्नडभाषिक आहेत हे मला तोपर्यंत माहित नव्हते आणि गडबड इथेच झाली होती.
पंडितजींचे कन्नड भाषेतले ते भाषण संपताच मी तेथून बाहेर पडलो, रात्रीचे आठ वाजले होते आणि मला पुणे कॅम्पात ऑफिसला जायचे होते.
इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसात परतल्यावर जेमतेम तीनचार परिच्छेदांची एक कॉलमी बातमी मी टाईप केली.
कार्यक्रमाला गेलोच होतो तर निदान तेव्हढी तरी बातमी देणे गरजेचे होते. त्या बातमीत `प्रमुख पाहुणे आणि वक्ते पंडित भीमसेन जोशी होते' असे एक वाक्य होते.
दुसऱ्या दिवशी मी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताच्या बातमीदार सहकाऱ्यांना हा किस्सा सांगितला, माझी कशी फटफजिती झाली हे सांगितले तेव्हा तिथे पिकलेला हंशा आजही माझ्या आठवणीत आहे.