Did you like the article?

Saturday, January 3, 2026

 जोतिबा फुले १८८२ साली सर विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर दिलेल्या जबानीत म्हणतात :

“शैक्षणिक विषयांतील माझा अनुभव प्रामुख्याने पुणे शहर व आसपासच्या गावांपुरताच मर्यादित आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी पुण्यात मिशनरींनी मुलींसाठी एक शाळा सुरू केली होती; परंतु त्या वेळी देशी (स्थानिक) मुलींची एकही शाळा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे मला अशी शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. त्या शाळेत मी व माझी पत्नी अनेक वर्षे एकत्र काम केले.”
आपल्या जबानीत फुले पुढे म्हणतात :
“स्त्री-शाळा सुरू केल्यानंतर एका वर्षाने मी खालच्या वर्गांसाठी—विशेषतः महार व मांग समाजासाठी—एक देशी मिश्र शाळाही सुरू केली. पुढे या वर्गांसाठी आणखी दोन शाळा काढण्यात आल्या.. मी सुमारे नऊ-दहा वर्षे या कार्यात कार्यरत होतो; या स्त्री-शाळा आजही अस्तित्वात आहेत. समितीने त्या शिक्षण खात्याकडे सुपूर्त केल्या असून त्या सध्या मिसेस मिचेल यांच्या व्यवस्थापनाखाली आहेत.”
कोण आहेत या मिसेस मिचेल?
शिक्षणपद्धतीबाबत आपले मत मांडताना, त्याच जबानीतील पुढील परिच्छेदात फुले म्हणतात :
“महार व मांग समाजासाठी एक शाळा आजही अस्तित्वात आहे; मात्र तिची स्थिती समाधानकारक नाही. तसेच काही वर्षे मी एका मिशनरी मुलींच्या निवासी शाळेत शिक्षक म्हणूनही काम केले आहे.”
जोतिबा फुले हे प्रथम जेम्स मिचेल यांच्या मिशनरी शाळेतील विद्यार्थी होते आणि नंतर १८५० च्या दशकात त्याच शाळेत शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यामुळे जेम्स मिचेल व मिसेस मिचेल या मिशनरी दांपत्याचा जोतिबा–सावित्रीबाई फुले या सुधारक दांपत्याशी दीर्घकाळ संबंध राहिला होता.
जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रांत जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांची नावे अनेक ठिकाणी येतात. मात्र या स्कॉटिश मिशनरी दांपत्याने फुले दांपत्याच्या जीवनावर नेमका कसा व किती प्रभाव टाकला, याबाबत फारसा प्रकाश टाकलेला दिसत नाही.
धनंजय कीर यांनी ‘महात्मा जोतिराव फुले – भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक’ या चरित्रात लिहिले आहे :
“जोतिराव आणि त्यांची पत्नी कोणताही मोबदला न घेता निष्ठेने व नि:स्वार्थपणे शाळांमध्ये सेवा देत होते. या कार्यात ते काही वर्षे पूर्णपणे गुंतून राहिले होते. या कामासाठी अखंड लक्ष देणे आवश्यक होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना घरातून हाकलून दिले होते आणि आता त्यांना नोकरीची गरज भासू लागली. म्हणून त्यांनी पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. ही शाळा जुलै १८५४ मध्ये मिशनच्या आवारात सुरू झालेली मुलींची निवासी शाळा होती. या संस्थेत अनाथ व निराधार मुलांसाठी आश्रम तसेच धर्मांतरित पालकांच्या किंवा ज्यांची योग्य काळजी घेता येत नव्हती अशा मुलांसाठी निवासी शाळा होती.”
या शाळांच्या कार्याबाबतच्या अहवालात पुढील निरीक्षण नोंदवले आहे :
“सध्या आमच्याकडे १३ निवासी विद्यार्थिनी आहेत. दिवसा त्यांच्यासोबत ४० दिवसाळू विद्यार्थिनी येतात. पुण्यातील अत्यंत उत्साही व कुशल शिक्षकांपैकी एक—ज्योती गोविंदराव फुले—यांची आम्हाला दररोज सुमारे चार तास अध्यापनासाठी मदत मिळते, याचा आम्हाला आनंद आहे. स्त्रीशिक्षण व खालच्या जातींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले चिकाटीचे प्रयत्न शिक्षण मंडळ व सरकार यांनीही विशेष प्रशंसनीय ठरवले आहेत. आमच्या त्यांच्याबद्दल मोठ्या अपेक्षा आहेत. मुलींची प्रगती अत्यंत समाधानकारक आहे.”
सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांनी स्थापन केलेल्या स्त्री-शिक्षक प्रशिक्षण शाळेत शिक्षण घेतले होते. फुले दांपत्याच्या जीवनाशी संबंधित अनेक दस्तऐवजांत याची नोंद आढळते. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका म्हणून गौरवले जाते.
जेम्स मिचेल यांचा जन्म स्कॉटलंडमधील स्टर्लिंग परिसरात १८०० साली झाला. परदेशात सुवार्ता प्रसारित करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात होती, जरी त्यांच्या नातेवाइकांचा त्याला विरोध होता. पुरेसे शैक्षणिक प्रशिक्षण घेतल्यानंतर ऑगस्ट १८२२ मध्ये भारतासाठी मिशनरी म्हणून त्यांची दीक्षा झाली. त्यांना स्कॉटिश मिशनरी सोसायटीच्या वतीने पश्चिम भारतात पाठवण्यात आले.
जुलै १८२६ मध्ये जॉन कूपर, जॉन स्टीव्हन्सन व अलेक्झांडर क्रॉफर्ड यांच्यासह ते मुंबईत आले. डोनाल्ड मिचेल काही महिने आधी आले होते; परंतु त्यांचा काळ फारच अल्प ठरला.
`पुणे शहरचे वर्णन' या नारायण विष्णू जोशी यांनी १८६८ साली लिहिलेल्या पुस्तकात जोतिबा फुले यांचे शिक्षक असलेल्या स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले हयात असताना हे पुस्तक प्रसिद्ध झालेले असल्याने या पुस्तकातील माहिती अधिक विश्वासार्ह आहे.
ना, वि. जोशी यांनी लिहिलेला हा पुढील मजकूर मुळातून वाचण्यासारखा आहे.
इंग्लिशांची कारकीर्द. (१८३१-१८५४) स्कॉटिश मिशनची स्थापना- मिशन शाळा- मुलांच्या व मुलींच्या-मिशन विद्यालयाची सांप्रतची स्थिति- बोर्डिंग स्कूल- आंधळे, पांगळे, रोगी यासाठीं धर्मशाळा.
या शहरांत इंग्रजी अंमल बसून बरेच दिवस झाल्यावर सन १८३१ या साली स्कॉटिश मिशनाकडून दोन मिशनरीं (पाद्रीं)ची नेमणूक झाली. त्यांचीं नावे रेव्हरंड जेम्स मिचल आणि रेव्हरंड डॉक्टर स्टिविनसन. हे उभयता येथे आल्यावर त्यांनी आपला उपदेश करण्याचा क्रम चालविला.
पण त्यांचा उपदेश ऐकण्यास लोक जमत नसत. जरी कोणी हिंदु त्या वेळेस त्यांच्या धर्मात आला नाही, तरी त्यांनी तसेच दिवस त्यांच्या शास्त्रांतल्या एका ओवीवर नजर देऊन काढले. ती ही की "आपण बरे करितांना थकू नये. न थकलो तर यथा काळी पीक पावू.’’

मिचेल साहेब उपदेशास बाहेर निघाले म्हणजे लोक त्यांचे फार हाल करीत, शिव्या देत, टोपी उडवीत, हुयों हुर्यो करीत, त्यांच्या पाठीस लागत, धोंडे मारीत, कोणी थापट्या मारीत, कोणी शेणमार करीत, तरी ते इतके सहनशील होते की कोणास चकार शब्दही न बोलता उलटे त्यांस चांगल्या गोष्टी सांगत, त्यावर होईल तितकी दया करीत, त्यांचे बरे इच्छीत, त्यांना आपले घरी बोलावीत. त्यांस शास्त्रांतील काही पुस्तके वाचण्यासाठी बक्षीस देत. मिचल साहेबापासून बूक उपटून आणले नाही, असा पुरुष पुण्यात विरळा सापडेल.
मिचेल साहेब इतक्या सहनशीलतेने चालले म्हणूनच या वेळेच्या लोकांत त्यांचा टिकाव झाला. त्यांची सहनशीलतेची गोष्ट अशी एक पहाण्यात आहे की ते रस्त्यांत उपदेश करीत असता कोणी टोपी उडविली तर उभे राहून रागावल्यासारखे करून म्हणत की आता वेळ नाहीं, उद्या चार वाजता तुम्ही सर्व लोक येथे जमा, म्हणजे शिपाई येऊन तुम्हास घेऊन जाईल.
आणि तेथून निघून पुढे काही अंतरावर एक जागा पाहून तेथे बसून उपदेश करीत. ते उपदेशास बाहेर निघाले म्हणजे राग हा काय पदार्थ है विसरून जात.
येथले लोग मिशनरीचा इतका द्वेष करणारे होते तरी त्यांच्या मुलांस व मुलींस शिकविण्याच्या त्यांनी अकरा शाळा घातल्या व त्यांस दोन प्रकारची विद्या देऊ लागले. हे साहेब येथे आले तेव्हा इंग्रेजी शाळा येथे नव्हती; ती प्रथम यांनीच स्थापिली. ती थोडेच दिवस त्यांच्या ताब्यांत होती. पुढे सरकाराने त्यापासून मागून घेतली. तेव्हां त्यांनी लष्करांत एक मराठी शाळा घातली ती अद्याप आहे.
नंतर इंग्रेजी शाळा स्थापिली तीही लष्करांतच होती. पुढे शहरांत इंग्रजी शाळा केली व मंगळवार पेठेत एक मुलींची शाळा स्थापिली, मग मराठी तीन चार शाळा घातल्या.
या सर्व शाळा या वेळेस चांगल्या चालत नव्हत्या. मुले व मुली जमत नसत. थोरली जी इंग्रेजी शाळा तेथेही शंभरांहून अधिक मुले नव्हती. अभ्यासही बराबर चालत नसे. कारण शिक्षक चांगले मिळत नसत. ज्यास स्वतः आपल्या शिकण्याची काळजी नाही अशी टवाळखोर पोरे येत. मग काय बिगारीचा घोडा आणि तरवडाचा फोक याप्रमाणे होई.
यांची पुस्तके ही सरकारी शाळेतील नव्हती. शाळेत मुले फुकट घेत. काही मुलांस पगार देत, बुके देत. इतके करीत तरी मुले जमत नसत. पण त्यांनी पिच्छा सोडला नाही. शनै:शनै: आपले काम चालविले, मिशनरींची शाळा म्हटली म्हणजे मुले निघून जात, पंतोजी ओ, ना, म्या, देखील मिळणे कठीण पडे. कारण, त्या वेळचे लोक मिशनरी म्हणजे पोतेऱ्याप्रमाणे समजत असत. त्यांच्या घरी जायाचे नाही. शाळेत जायाचे नाही. त्यांची चाकरी करायाची नाही. त्यांचा उपदेश ऐकावयाचा नाही. जर उपदेश कोठे रस्त्यांत चालला असला तर मात्र तेथे थट्टा करायास काही लोक जमत.’’
नारायण विष्णू जोशी यांनी जेम्स मिचेल यांच्या शाळांविषयी पुढील शब्दांत लिहिले आहे :
``पुण्यात अगदी पहिली अशी इंग्रजी शिकण्याची शाळा रेव्हरंड जेम्स मिचेल साहेब, मिशनरी नेस्बिट स्कॉटिश मिशन यांची होती, ती सरकाराने मागून घेऊन बुधवारच्या वाड्यात घातली. तेथे मूले फार नव्हती व मुलांपासून दरमहा फी घेत नसत, पण योग्यतेच्या मुलांस उत्तेजन येण्यासाठी दरमहा पगार देत. वार्षिक परीक्षेचे वेळेस शेलापागोटे बुके इत्यादि फार चांगली बक्षिसे देत.
पुढे थोडीसी लोकांस शिकण्याची गरज दिसल्यावर दर मुलास आठ आणेप्रमाणें फी बसविली. त्यात मराठी शाळेत शिकून तयार झालेल्या मुलास मात्र फुकट घेत, ही चाल अद्याप चालत आहे. याप्रमाणे विद्येचा प्रसार होत चालला.
या वेळेस या शाळेत ख्रिस्ती शास्त्र शिकवीत असत, परंतु ते बंद करण्याचे कारण असे ऐकण्यात आहे की पापी लोकांच्या हातात पवित्र शास्त्र देणे ही गोष्ट चांगली नाही असे इंग्लिश चर्चच्या एका पाद्रीचे मत होते. सन १८३३ या साली सरकारी इंग्रेजी व मराठी शाळेत भूगोल, खगोल, सिद्धपदार्थविज्ञान इत्यादी विषय शिकवू लागले. याचे अगोदर पुण्यातील लोकांस त्यांच्या ज्योतिषात भास्कराचार्याने केलेले जे खगोलाचे सिद्धांत ते मात्र माहीत होते; तेही सर्वांस माहीत नव्हते, जेवढे जोशी तेवढ्यासच माहीत होते.
भूगोलाविषयीं तर पुराणातील कहाण्या म्हणजे पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे, नऊ खंडें सप्तसमुद्र आहेत येवढी कायती माहिती होती. सिद्धपदार्थविज्ञान म्हणजे काय विद्या आहे, हे तर मुळीच माहित नव्हते.
या शाळेवर इजदेल साहेब प्रोफेसर होते. यांनी फार श्रम घेऊन शाळा चालविली होती. कारण इंग्रजी शिकणे हे यावेळच्या लोकांस अगदी आवडत नसे. इंग्रजी शिकले म्हणजे मोठ्या पगाराच्या जागा मिळतील म्हणून शिकत असत. विद्येची अभिरुची नव्हती. ''

जेम्स मिचेल यांनी १८४५ साली सदर बझार (कॅम्प बझार) आणि शहरातील शाळा तात्पुरत्या एकत्रित केल्या तेव्हा या दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या १२५ पासून ९० पर्यंत घसरली होती. कॅम्प बझार शाळेत १८४९च्या जुलैत ९० विद्यार्थी होते तर शहरातल्या शाळेत ५० विद्यार्थी होते.
स्कॉटिश मिशनच्या पुण्यातल्या या दोन शाळांपैकी कॅम्प (सदर) बझारमधील किंवा मुख्य शहरातील एका इंग्रजी शाळेत जोतिबांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शिक्षण झालेले असणार हे उघड आहे.
जेम्स मिचेल यांचे एक चिरंजिव विल्यम किंनैर्ड मिचेलसुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे धर्मगुरु बनले आणि नंतर स्कॉटिश मिशनच्या पुणे केंद्रात आपल्याबरोबर काम करत होते असे जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' या आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
विल्यम किंनैर्ड मिचेल यांचा पुण्यातल्या स्कॉटिश मिशनस्थानासाठी धर्मगुरु म्हणून १० ऑगस्ट १८५२ रोजी दिक्षाविधी झाला आणि २० जानेवारी १८५३ रोजी आपल्या पत्नीसह त्यांचे पुण्यात आगमन झाले. रेव्हरंड विल्सन किंनैर्ड मिचेल यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार १८५६च्या अखेरीस युरोपला जावे लागले आणि त्यानंतर ते परत भारतात कधी परतले नाहीत.
पुणे स्कॉटिश केंद्राच्या मिशनकार्यातली जेम्स मिचेल यांची आपल्या पुत्राबरोबरची अल्पकालीन भागीदारी अशाप्रकारे संपृष्टात आली. जेम्स मिचेल आणि मार्गारेट शॉ मिचेल या दाम्पत्याला सात मुले होती. विल्यम किंनैर्ड मिचेल यांची जागा रेव्हरंड जेम्स वॉर्डरोप गार्डनर यांनी घेतली.
जेम्स मिचेल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात स्कॉटिश शाळांना चांगला प्रतिसाद मिळत होता. मिचेल यांनी १८५५ साली लिहिले कि आता त्यांच्या शाळांत २५० विद्याथी आहेत. मराठी शाळांतील विद्यार्थ्यांसह एकूण संख्या ९०० पर्यंत होती. मात्र या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या इमारती अपुऱ्या पडत होत्या.
जेम्स मिचेल यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना १८६० मध्ये स्कॉटलंडला जावे लागले होते. जेम्स मिचेल यांनी स्कॉटलंडच्या या दौऱ्यात आपल्या मायदेशाचे घेतलेले दर्शन अखेरचेच असणार होते,
जेम्स मिचेल यांचे मदतनीस म्हणून रेव्हरंड जेम्स वॉर्डरोप गार्डनर १८५६ पासून पुण्यात स्कॉटिश मिशनकेंद्रात कार्य करु लागले. जॉन मरे मिचेल आणि रेव्हरंड गार्डनर यांच्याबद्दल नारायण विष्णू जोशी यांनी आपल्या `पुणे शहरचे वर्णन' मध्ये पुढील शब्दांत लिहिले आहे:
``पण पुढे जसजसे लोक सुधारु लागले तसतसी मुले शाळेत जमू लागली, मुले जमतात असे वाटल्यावर त्यासही चांगली व्यवस्था करण्याचे उत्तेजन आले. व जसी दुधात साखर तसे या समयास महाविद्वान डॉक्टर (जॉन) मरे मिचल साहेब यांची नेमणूक येथे झाली. त्यांनी तर मिशनरी शाळा फारच चांगले योग्यतेस आणली. मुले घेणे म्हणजे चांगली, विद्या शिकण्यास दक्ष अशी पाहून घेऊ लागले. उगीच टवाळखोर पोरे घेणे बंद केले. त्यावर थोडीसी फी साडेतीन आणे बसविली. जेव्हा थोडेसे पैसे पडू लागले, तेव्हा अर्थातच मुलांस काळजी लागली. असे काही दिवस चालवून शाळा बरीच उदयास आणली व आठ आणेपर्यंत फी चढविली.
त्यांच्या मागे रेव्हरंड गार्डनर साहेब यांची नेमणूक झाली. हे स्वतः मेहनती, हुशार, ज्यास सर्व विषयांची सारखी माहिती, असल्या विद्वान पुरुषाचे हाती ही शाळा आल्यावर यांनी तर या शाळेचे रुपच बदलून तिला महाविद्यालयाचे रूप आणले; या कारणाने मुलेही फार वाढली, एक वेळ तर या शाळेत सहाशे मुले हजर झाली. त्यास ही जागा पुरेना म्हणून दुसरी जागा घ्यावी लागली. मुलांची भरती इतकी झाली की, मुले घेत नाही, असे म्हणणे या दयाळू साहेबास भाग पडले.
असे कोणी मनात आणू नये की बायबल शिकविणे बंद केले असेल म्हणून मुले येऊ लागली असतील तर असे नाही. ही शाळा घातल्यापासून जो त्यांचा क्रम आहे तोच आहे. किंबहुना जास्ती म्हणण्यास चिंता नाही. आता या विद्यालयात सुमारे पाचशे मुलें आहेत. प्रत्येकापासून आठ आणेप्रमाणे फी घेतात. अभ्यास फारच चांगला चालतो.’’
``गार्डनर साहेबांच्या वेळीच प्रथम मुले मुंबईत युनिव्हर्सिटीमध्ये पसार (उत्तीर्ण) होऊ लागली. एक वेळ तर या विद्यालयांतील अकरा असामी परीक्षेस गेले होते त्यापैकी दहा पास झाले. या मानाने त्या वर्षी सरकारी कोणतेही विद्यालयांतील विद्यार्थी पसार (म्हणजे उत्तीर्ण) झाले नाहीत. गार्डनर साहेब इतकी मेहनत घेत होते की शाळेत मुलांस शिकविण्यास वेळ मिळेना म्हणून एक वर्ग घरी केला होता. अशी मेहनत चालवून ही शाळा उदयास आणली. याच वेळेस तिला सरकारी मदत मिळाली.’’
``याच मिशनचे एक अनाथ मुलींचे बोर्डिंग स्कुल आहे, हे (जेम्स) मिचेल साहेब यांनी स्थापून सुमारे पंधरा वर्षे झाली. या शाळेत सर्व जातीच्या मुली घेतात. या शाळेत सर्व जातीच्या मुली घेतात. पोरक्या मुली व ज्यांस आईबाप आहेत अशा मुलींसही घेतात. त्यास दरमहा तीन रुपये द्यावे लागतात. या शाळेत सुमारे पन्नास मुली आहेत. त्यास अन्नवस्त्र तेथे मिळते. त्यास राहाण्यासाठी एक जागा रेव्हरंड गार्डनर साहेबांनी बांधली आहे. तेथे त्यास घरी गेल्यावर उपयोगी पडणारी कामे शिकवितात; खेरीज इंग्रेजी व मराठी या दोन्ही विद्या शिकवितात; आणखी शिवण, जाळ्या, नाना त-हेचे कशिदे, टोप्या, मोजे इत्यादि कामे फारच चांगली शिकवितात व त्यास सुंदर व मनोरंजक असी भक्तिपर व इतर प्रकारची गाणी शिकवितात.
येथे देखरेख करण्यास एक मॅडम नेमली आहे. व विद्या शिकविण्यास शिक्षक आहेत व याखेरीज मुख्य मिशनरीची व त्यांच्या मॅडमेची वरचेवर देखरेख आहेच.

ह्या बोर्डिंग स्कुलाचे कायदे फारच चांगले आहेत. सकाळी मुलींस मराठी व इंग्रजी शिकवितात. नंतर जेवण झाल्यावर एक शिक्षक ख्रिस्ती शास्त्र त्याजकडून वाचवून त्याचा अर्थ सांगतो व गीत गाऊन ईश्वराची प्रार्थना करितो. नंतर दुपारी त्यास शिवण काम देतात. संध्याकाळीं त्यास खेळायास व फिरायास पुष्कळ वेळ मिळतो. रात्री निजण्यापूर्वी सकाळच्याप्रमाणें ईश्वरभजन होतें,
मोठ्या मुलींच्या दिमतीस लहान मुली दिल्या असतात. त्या त्याची वेणी फणी करितात, व त्यांची साडीचोळी करतात. मुलीच स्वतः आपला स्वैपाक करितात.
अशा विद्यालयापासून देशास केवढे फायदे आहेत हे उघडच आहे. पोरकी मुले यात धर्म, नीती व विद्या मिळून त्या फार चांगल्या स्थितीत येतात. याच मुली जर मोकार राहिल्या असत्या तर कोणी भ्रष्ट बायकांनीं त्यास घेऊन आपला दुष्ट धंदा शिकविला असता, किंवा त्या रस्तोरस्ती हिंडून भामटेगिरी करू लागल्या असत्या. तर त्याच मुली इथल्या शिक्षणाने सगुणी, नम्र, नीतिमान, प्रामाणिक, उद्योगी आणि विद्वान होतात. पुढे त्या घरचारिणी झाल्यावर त्यांच्या कुटुंबाकडून देशास लाभ होणार नाहीं असे कोणाच्याने म्हणवेल ?
याशिवाय शहरांत मुलींच्या व मुलांच्या मराठी शाळा आहेत. व हिंदुस्थानी मुलींची व मुलांची शाळा सन १८५४ साली मिस्टर वझीर बेग नामक एका ख्रिस्ती उपदेशकाने नानाच्या पेठेत घातली ती आता नुकतीच मोडून टाकली.
याच मिशनाच्या ताब्यात आंधळे, पांगळे, महारोगी, जखड ह्यातारे, व ज्या कोणास काम करण्याची शक्ती नाही, अशा लोकांसाठीं एक धर्मशाळा आहे. ही स्थापून सुमारे पंचवीस वर्षे झाली. यातही पाहिजेल त्या जातीचे मनुष्यास घेतात. त्यास येथे दर आठवड्यास शिघा ५। शेर बाजरी, जोंधळे किंवा गहू व अदपावकम शेर डाळ व १८ पैसे इतका देतात, सहा महिन्यांनी कपडे देतात. यावर एक मनुष्य नेमलेला असतो, तो तेथील लोकांस नेमाने नित्य उपदेश करतो. खेरीज धर्मशाळेच्या कारकुनाचेही काम पाहतो. ही जागा लष्करात सदर बाजारात आहे. व येथे सुमारे तीसपासून चाळीसपर्यंत मनुष्ये असतात. हिचा सर्व खर्च लष्करांत राहणारे परोपकारी साहेब लोक व क्वचित इतर लोक पुरवितात.
आता एकंदरींत विचार करून पाहिले असता, असे सहज ध्यानात येते की, पुण्यात प्रथम इंग्रजी शाळा स्थापक मिशनरी, मुलींची शाळा स्थापक मिशनरीच, मराठी शाळा स्थापक मिशनरीच, हिंदुस्थानी शाळा स्थापक मिशनरीच, गरीब लोकांसाठी धर्मशाळा स्थापक मिशनरीच. मिळून सुधारणुकेची व लोककल्याणाची कामे करण्यास हेच मूळ. यावरून असे दिसते की मिशनरी हे पुण्यांतील लोकांचे कल्याण करण्याकरिता ईश्वराने पाठविले आहेत.
पुणे शहरात सरकारी व लोकांची आणि मिशनरींची कल्याणाचीं कामे सारखीच आहेत. म्हणून याविषयीं सरकारापेक्षा मिशनरींस हे अधिक भूषण आहे. सरकारी इंग्रजी शाळा, मिशनरी इंग्रजी शाळा; सरकारी मराठी शाळा, यांची मराठी शाळा. कमेटीची मुलींची शाळा, यांची मुलींची शाळा; कमेटीची महारांची शाळा, यांची महारांची एक व भंग्यांची एक शाळा, त्यांची आंधळे लोकांसाठीं धर्मशाळा, यांची धर्मशाळा; त्यांचे बोर्डिंग स्कूल, यांचे बोर्डिंग स्कूल; यांच्या सभा, त्यांच्या सभा, हे धर्मार्थ पैसा देतात, ते देतात. यांची वाचण्याची पुस्तके, त्यांची पुस्तके; त्यांचे सरकारी इतिहास, यांचे इतिहास; त्यांचे गणित, यांचे गणित; जितकी सरकारी शाळेत चालणारी पुस्तके आहेत, तितकी त्यांची आहेत.
सरकार वर्षास शाळाची परीक्षा घेतात, मिशनरी हे घेतात. सरकार बक्षिसे देते. मिशनरीही देतात, सरकारच्या शाळेत फी घेतात, हेही घेतात, सरकारच्या शाळेतील विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत पसार होतात, यांच्या शाळेतील पसार होतात, खेरीज सरकार व कमेटी यांपेक्षा अधिक हे ईश्वरी ज्ञान शिकवितात, ही तर सर्वांत मोठी गोष्ट आहे.''
``स्कॉटिश मिशनच्या एका मिशनरीचे शैक्षणिक प्रशिक्षण असे फारसे झालेले नव्हते. तरी हा मिशनरी खूप चांगल्या मनाचा, सद्गृहस्थ होता. त्यांनी खूप दीर्घकाळ आपले मिशनकार्य अत्यंत तळमळीने पार पाडले. या मिशनरीबद्दल स्थानिक तसेच युरोपियन लोकांमध्ये खूप आदराची भावना होती,’’ असे जॉन मरे मिचेल यांनी जेम्स मिचेल यांचे वर्णन केले आहे.
रेव्हरंड जेम्स मिचेल यांचे त्यांची कर्मभूमी असलेल्या भारत देशातच माथेरान येथे २८ मार्च १८६६ रोजी वयाच्या ६६ वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्यावेळी त्यांच्याजवळ त्यांची पत्नी मार्गारेट शॉ मिचेल, ज्येष्ठ कन्या डॉ. फ्रेझर आणि रेव्हरंड जॉन स्मॉल उपस्थित होते.



मिचेल यांचा पार्थिव देह माथेरानहून पुण्यात आणण्यात आला आणि तेथेच त्यांना चिरविश्रांती देण्यात आली. या अंत्ययात्रेला मुंबईहून डॉ. जॉन विल्सन आले होते आणि पुण्यातील विविध स्तरांतील अनेक लोक या मिशनरीला अखेरची मानवंदना देण्यासाठी हजर होते.
अलीकडेच म्हणजे दोनेक महिन्यांपूर्वी मला एक सुखद धक्का बसला. रेव्हरंड जेम्स मिचेल हे पुण्यातील क्वार्टर गेटपाशी असलेल्या लक्ष्मी रोडवरील ख्राईस्ट चर्चचे संस्थापक आहेत असा मला अचानक शोध लागला.
जोतिबांचे शिक्षक जेम्स मिचेल याच ख्राईस्ट चर्चचे १८३४ ते १८६३ या दीर्घकाळात धर्मगुरू होते. चर्चच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी असलेल्या त्या संगमरवरी फलकावर त्यांचे अगदी पहिलेच नाव आहे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे हे या ख्राईस्ट चर्चचे सदस्य आहेत.
सावित्रीबाई व जोतिबा फुले यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या या ज्येष्ठ मिशनरी व त्यांच्या पत्नी मिसेस मिचेल यांच्या पाऊलखुणा येथे सापडणे, हा माझ्यासाठी खरोखरच एक आनंददायी अनुभव ठरला.

Camil Parkhe January 3, 2026


Thursday, December 25, 2025

 


सावित्रीबाई आणि जोतिबांच्या आजही कायम राहिलेल्या काही पाऊलखुणांपैकी एक असलेली पुणे कॅम्पातील घाशीराम कोतवालच्या मध्ययुगीन गढीच्या अगदी समोर असलेली ही सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळा.
सावित्रीबाई आणि जोतिबाचे शिक्षक दाम्पत्य असलेल्या मार्गारेट आणि जेम्स मिचेल या स्कॉटिश मिशनरींचे इथेच वास्तव्य होते, येथील आवारातच फुले दाम्पत्याने शिक्षण घेतले याविषयी आता शंका नसावी
सत्तरच्या दशकात विजया श्यामराव पुणेकर सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेच्या मुख्याधिपिका होत्या. नंतरच्या काळात त्या मुंबईतील जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या सेंट कोलंबा गर्ल्स हायस्कुलच्या आणि पुण्यातीलच एथेल गॉर्डन अध्यापन विद्यालयाच्या प्राचार्य होत्या.
जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी म्हणजेच पूर्वीचे स्कॉटिश मिशन.
मुंबईत १९९० साली भरलेल्या चौदाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे विजया पुणेकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते.
विजया पुणेकर यांनी सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेचा अगदी जुना तसेच गेल्या काही दशकांचा इतिहास संक्षिप्तपणे लिहिला आहे.
अर्थात या लेखात सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचा नामोल्लेखदेखील नाही.
स्कॉटिश मिशनच्या म्हणजेच मुंबईत मुख्यालय असलेल्या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील चारही शाळा सावित्रीबाई आणि जोतीबांचा या शाळेशी असलेल्या निकट संबंधांबद्दल आजही पूर्णतः अनभिज्ञ आहेत.
सन १९८२च्या डिसेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या विजया पुणेकर यांच्या लेखातील काही मजकूर पुढीलप्रमाणे आहे:
स्कॉटिश मिशनची पुण्यातील पहिली शाळा-सेंट मार्गारेट स्कूल अँड चिल्ड्रेन्स होम
भारतातील शैक्षणिक संस्थांच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास स्कॉटिश मिशनरींनी सुरू केलेल्या संस्था दीर्घकाळपर्यंत भव्याहतपणे चालू राहिलेल्या आहेत असे आदळते.
तसेच या संस्थांनी सुरुवातीच्या काळात प्राप्त केलेला उच्च शैक्षणिक दर्जा आजतागायत राखलेला आहे हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
१८२३ साली स्कॉटिश मिशनरी सोसायटीतर्फे पाठविलेले पहिले मिशनरी रेव्ह. डॉनाल्ड मिचेल पश्चिम भारतात आले. केवळ दहा महिन्यांच्या अवधीत त्यांनी कोकणात दहा शाळा सुरू केल्या.
त्यांच्यानंतर आलेल्या मिशनरींनी १८२७ सालाअखेर ८० शाळा सुरू केल्या होत्या. त्यांपैकीच एक शाळा पुढे सेन्ट मार्गारेट शाळा म्हणून ओळखली गेली.
डॉ. जॉन विल्सन हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले स्कॉटिश मिशनरी १८२९ साली आपल्या पत्नी मार्गारेट यांच्यासमवेत पश्चिम भारतात कार्य करण्यासाठी आले.
अगदी थोड्या अवधीत त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. स्त्री-शिक्षणाची आवश्यकता विल्सन दांपत्याला पुरेपूर पटलेली होती. त्यांनी प्रथम कोकणात, नंतर मुंबईत मुलींच्या शाळा सुरू केल्या.
त्याच सुमारास पुणे या ठिकाणी रेव्ह. जेम्स मिचेल भाणि त्यांच्या पत्नीची मिशनरी म्हणून नेमणूक झाली होती. १८४० साली पुण्यामध्ये मुलींच्या एकूण पाच शाळा मिचेल दांपत्य चालवित होते.
त्यानंतर १८४१ साली मिसेस् मिचेल यांनी मार्गारेट विल्सन यांनी सुरू केलेल्या बोर्डिंग स्कुलच्या धर्तीवर स्टेनली रोड या ठिकाणी आपल्या राहत्या बंगल्यात एक बोर्डिंग सुरू केली.
तिला सेन्ट मार्गारेट स्कुल असे नाव देण्यात आले.
मिसेस जेम्स मिचेल स्कॉटलंडदेशी १८६६ साली गेल्यानंतर काही काळ मिसेस (जॉन) मरे मिचेल आणि नंतर मिसेस अँगस आणि मिसेस गार्डनर यांनी शाळा व वसतिगृह यांचे कामकाज पाहिले.
१८६६ साली मिसेस गार्डनरच्या काळात सध्याची शाळेची इमारत बांधली गेली.
स्कॉटलंडमध्ये वार्षिक सेल भरवून स्त्रियांनी ही इमारत बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळविले होते.
१८७२ साली मिसेस बिमॉन्ट यांनी बोर्डिंगची जबाबदारी उचलली. मिसेस मिलर, मिस स्मॉल या मिशनरींनी १८८९ पर्यंत बोर्डिंगचे व इतर काम पाहिले. त्यानंतर मिस पॅक्स्टन आणि मिस लिजरवूड या मिशनरींनी 'पूना विमेन्स वर्क' आणि सेन्ट मागरिट स्कूल आणि बोर्डिंगची जबाबदारी स्वीकारली.
त्यांच्यानंतर अनेक वर्षे या शाळेत काम केलेल्या मिशनरी म्हणजे जेन टेलर. पूर्वी त्या मिस वॉट म्हणून ओळखल्या जात. त्यांची कारकीर्द मोठी होती.
सगुणाबाई भिंगारदिवे या मेट्रनबाईचे त्यांना मोठे सहकार्य मिळाले. विल्सन कॉलेजच्या डॉ. टेलर यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या जागी सगुणाबाईच्या कन्या मालतीबाई भिंगारदिवे शाळेच्या प्रमुख झाल्या.
तत्पूर्वी त्या सेंट अँड्र्यूजमध्ये शिक्षिका दोत्या. सखूबाई आढाव आणि कमळाबाई कोहाळकर यांनीही या शाळेत अनेक वर्षे मेटूनचे फाम केले.
या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे कोर्ट कमिटेड आणि अनाथ मुलांसाठी वसतिगृह चालविणे हे होय. जुनी इमारत असूनही मुलींना जास्तीत जास्त सुखसोयी करून दिल्या गेल्या आहेत.
मालतीबाईंच्या काळात एक नवीन डॉर्मेटरी आणि वर्गासाठी दोन खोल्या बांधल्या गेल्या. त्या शिस्तप्रिय आणि उच्च शैक्षणिक दर्जा राखणाऱ्या म्हणून लक्षात राहतील, कृपाबाई पंडित काही काळ शिक्षिका होत्या. नंतर त्या मेट्रनचे काम पाहत.
कृपाबाई कदम या थर्ड इयर उत्तीर्ण झालेल्या शिक्षिकेने दीर्घकाळ तेथे अध्यापन केले. तसेच मेरीबाई गेटस, गेनूबाई शिंदे, मनुबाई पंडित, लीला सेडकर, विमल चव्हाण, गंगूबाई गायकवाड व पद्मा जाधव यांनीही अनेक वर्षे या शाळेत ज्ञानदानाने कार्य केले आहे.
चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनचे पौड या ठिकाणी असलेले अनाथाश्रम बंद करण्यात येऊन तेथील मुले, मुली आणि मेट्रन्स या सर्वांना मागरिट शाळेत आणि वसतिगृहात राहण्यास आणले गेले, त्यावेळी कमळापाई कोहाळकर पौडहून पुण्यास आल्या.
मालतीबाईंनी पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या अनेक संस्थांतून सेवा केली, परंतु त्यांची सेन्ट मार्गारेट शाळेतील सेवा सर्वांत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा शांत आणि प्रेमळ स्वभाव सर्वांची मने जिंकून घेई. त्यांनी शाळेच्या हेडमिस्ट्रेस म्हणूनही काम पाहिले आणि शैक्षणिक दर्जा उच्च प्रतीचा राखला.
मालतीबाईंच्या नंतर माणिकबाई पारधे शाळेच्या प्रमुख म्हणून नेमल्या गेल्या. त्यांना बेने इस्राएल शाळेत शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि ट्रे. कॉलेज वसतिगृहप्रमुख अशा विविध कामांचा अनुभव होता. त्या १९६४ साली प्रमुख झाल्या. त्यावेळी शाळेत इ. १ ते ७ वीचे एकूण ११ वर्ग होते.
१९७१ सालापासून ५ ते ७ या इयत्ता दरवर्षी एक याप्रमाणे कमी केल्या गेल्या. सध्या १ ते ४ इयत्ताच असल्या तरी वसतिगृहात ८२ विद्यार्थिनी आहेत.
वसतिगृहाच्या कामाला या संस्थेत अधिक महत्त्व दिले जाते. सध्या ७५ कोर्ट कमिटेड आणि ७ खाजगी विद्यार्थिनी आहेत.
कोर्ट कमिटेड मुलींसाठी समाज कल्याण खात्याकडून प्रत्येकी मासिक ६५ रु. विद्यावेतन मिळते. भोजन, कपडे, वह्या, पुस्तके, अंथरुण, पांघरुण यासाठी हे अपुरे पडते. तेव्हा ही आर्थिक तूट स्कॉटलंड मिशनकडून मिळणाऱ्या विशेष अनुदानाने भरून काढली जाते.
माणिकवाई पारधे मुलींच्या वैयक्तिक गरजांकडे जातीने लक्ष पुरवीत, वसतिगृह घरासारखे वाटावे म्हणून त्या प्रयत्नशील असत. काही काळ त्यांनी शाळेच्या हेड-मिस्ट्रेसचेही काम पाहिले. ५ ते ७ या इयत्ता बंद केल्यामुळे मोकळ्या झालेल्या खोल्यांचा उपयोग सभा-संमेलनासाठी होई. या कामागाठी माणिकबाईंच्या अनुभवाचा उपयोग झाला. मिस बायर्स यांचेही त्यांना काही वर्षे सहकार्य लाभले.
१९७५ सालापासून सौ. मनोरमा ठाकूर यांनी माझ्या (विजया पुणेकर यांच्या) मार्गदर्शनाखाली हेडमिस्ट्रेसच्या कामाची जबाबदारी स्वीकारली,
पुणे शहरातील मिशनच्या अनेक प्राथमिक शाळांतून त्यांनी काम केले होते. शाळेच्या कामात सरकारी धोरणाप्रमाणे झालेले बदल समजून येऊन त्यांनी काम केले, त्या मे १९८२ मध्ये सेवानिवृत्त झाल्या.
वसतिगृहाच्या कामातून त्यापूर्वी १९८१ मध्ये मानिकबाई सेवानिवृत्त झाल्यावर कु. मंगला सोनतळे यांच्यावर वसतिगृह आणि केंद्र यांच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली. हे जबाबदारीचे आणि त्यांच्यासाठी नवीन असे काम त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
१९८२ सातापासून कु. मार्याबाई सूर्यवंशी मुख्याध्यापिका झाल्या आहेत, सुदिना चक्रनारायण, कमल देठे आणि सरोज क्षीरसागर या त्यांच्या सहाय्यक शिक्षिका आहेत. शाळेत सध्या (१९८२ साली) २१७ मुले आहेत.
जुलै १९८२ मध्ये सेन्ट कोलंबा स्कूल (मुंबई) या ठिकाणी माझी (विजया पुणेकर यांची) नेमणूक झाल्यापासून श्री. मोहन कोतवाल, सेन्ट जॉन स्कूलचे मुख्याध्यापक, या शाळेचे मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत.''
पुण्यातील, महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातली एक सर्वांत जुनी आणि आजतागायत चालू असलेली ही सेंट मार्गारेट बालवाडी आणि मराठी प्राथमिक शाळा उद्या शनिवारी सकाळी डिसेंबर २० रोजी आपला वार्षिक दिन साजरा करत आहे


Camil Parkhe

 

पुणे मराठी ख्रिस्ती संघाचे कामकाज करोना काळात आणि काही वैयक्तिक कारणांमुळे गेली काही वर्षे ठप्प पडले होते. गेली शतकभर (१९२७पासून) होत असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिकमध्ये जानेवारीत सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

'शतकातील ख्रिस्ती साहित्य संमेलने' या शीर्षकाचे एक जाडजूड पुस्तक मी अलीकडेच लिहून हातावेगळे केले आहे.
या पार्श्वभूमीत शहरातील पुणे मराठी ख्रिस्ती संघाचे अस्तित्व संपल्यासारखे आहे ही बाब मला अस्वस्थ करत होती.
हा विषय मी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष नगर-स्थित पौलस वाघमारे यांच्याबरोबर फोनवर बोलताना काढला आणि ते म्हणाले '' तुम्ही या विषयात पुढाकार घेत असाल तर बोलावू या आपण एक मिटिंग.''
तर ही मिटिंग पुण्यात झाली आणि संघाची जुनी बरीच मंडळी (वय अवघे पन्नास ते नव्वद) जमली, त्यात विद्यमान अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी होते. सचिवाची जागा खाली होती.
सचिव म्हणजे संघाचा कार्यकारी प्रमुख, ते पद कोण घेणार?
मी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अगदी सीमावर्ती भागातला. भामाठाण आणि मुठे वाडगाव या दोन गावांच्या मध्ये वाहणारी गंगा किंवा गोदावरी नदी या दोन प्रदेशांमध्ये विभाजक म्हणुन काम करते.
गंगेच्या एका बाजूला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाहेगाव इथे आम्ही पारखे मंडळी `गाववाले'.
मात्र माझा जन्म आणि बालपण पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथे.
तर आमच्याकडच्या ग्रामीण भाषेत एक जुनी म्हण आहे.. ``पाटील बुवा, आता तरी लग्न करा की..
यावर पाटलांचे उत्तर..`` व्हा तुमीच बायको''...
तर अशीच आफत माझ्यावर यावेळी गुदरली.
कुणीच ते सचिव पद स्वीकारायला तयार नव्हते आणि सभेची सूत्र माझ्या हातात असल्याने मीच ते पद घ्यावे असा आग्रह झाला
आणि पन्नास वर्षांचा इतिहास असलेल्या या पुणे मराठी ख्रिस्ती संघाचा मी सचिव बनलो.
कुठलेही पद, सत्कार किंवा गौरव स्वीकारायचे नाही असे मी ठरवले आहे. या माझ्या निर्णयाला येथे मला मुरड घालावी लागली
या शहरात मी राहत असलो तरी आतापर्यंत पुणे मराठी ख्रिस्ती संघाशी माझा कसलाही संबंध आलेला नाही. तरीसुद्धा मी हा पुढाकार घेतला हे त्यामागचे कारण
पुणे मराठी ख्रिस्ती संघाचा चांगला इतिहास आणि काम आहे. दर महिन्याला या संघाची बैठक होत असे, `शब्दसेवा' हे अनियतकालिक नियमितपणे प्रकाशित केले जात होते.
सन १९७२ साली स्थापन झालेल्या या संघाने ख्रिस्ती साहित्य संमेलनांना आतापर्यंत एकूण सहा अध्यक्ष दिली आहेत.
भास्करराव जाधव (बारामती १९७५), जयंतकुमार त्रिभुवन (कोल्हापूर १९८६), विजया पुणेकर (मुंबई १९९०) , अशोक आंग्रे (अहमदनगर २०१२), अनुपमा डोंगरे जोशी (श्रीरामपूर २०१२) आणि पौलस वाघमारे (बीड २०२२) ही ती नावे.
त्याशिवाय पुणे मराठी ख्रिस्ती संघाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पंधरावे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १९९२ साली भरवले होते.
तर अशा या साहित्य संघाची स्नेहसदनमध्ये काल दुसरी बैठक झाली, त्या बैठकीनंतरचा हा ग्रुप फोटो.

Camil Parkhe

Thursday, November 27, 2025

 


आज तारीख २५ नोव्हेंबर. आजपासून बरोबर एक महिन्याने ख्रिसमस अर्थात नाताळ.
ख्रिस्तजन्माच्या या सणाला मराठीत नाताळ हा शब्द रुढ झाला तो शेजारच्या गोव्यात तब्बल साडेचारशे वर्षे ठाण मांडून बसलेल्या फिरंगी पोर्तुगिजांमुळे.
अनेक युरोपियन भाषांत वापरल्या जाणाऱ्या नाताळ या शब्दाचे मूळ `Natalis' मात्र लॅटिन आहे.
लॅटिन, पोर्तुगीज आणि इतर युरोपियन भाषांत आपल्या मराठीत आणि दक्षिण भारतीय भाषांत आढळणाऱ्या `ळ' या उच्चाराचे अक्षर आहे कि नाही हे मला माहित नाही.
मात्र पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत अवतार घेताना Natal या शब्दाने `नाताल' न होता मराठमोळे `नाताळ' रूप घेतले हे गमतीदार आहे.
मात्र मला `नाताळ' या शब्दाच्या व्युत्पत्तीशास्त्रात शिरायचे नाही.
नाताळाला एक महिना असताना आता ख्रिसमस विशेषांकांची लगबग सुरु झाली आहे.
यावेळी सातआठ दिवाळी अंकांत माझे लेख होते.
त्यापैकी तीनचार जणांनी बऱ्यापैकी मानधन दिले, एकाने फक्त दिवाळी अंक घरपोच आणून दिला तर इतर दोन जणांनी दिवाळी अंक पोस्टाने पाठविण्याचीसुद्धा तसदी घेतली नाही.
त्या अंकात माझा लेख छापून आला हे एका तिऱ्हाईताने फोन केल्याने कळाले.
नाताळ विशेषांक पुण्यातून नियमितपणे प्रकाशित करणाऱ्या दयानंद ठोंबरे यांनी आपल्या `अलौकिक परीवार' या विशेषांकाच्या प्रकाशन सोहोळ्याला ९ डिसेंबरचा मुहूर्त शोधला आहे.
मात्र त्याआधीच सव्वाशे वर्षे जुन्या (स्थापना एप्रिल १९०३) असलेल्या `निरोप्या' मासिकाचा नाताळ विशेषांक वर्गणीदारांना दोन-तीन डिसेंबरच्या दरम्यान घरपोच मिळणार आहे.
त्याशिवाय पिंपरी चिंचवडचे फ्रान्सिस गजभिव हे `शब्द' नाताळ विशेषांक काढत असतात.
गेली काही वर्षे वसईतून ख्रिस्तोफर रिबेलो 'ख्रिस्तायन' हा ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन प्रकाशित करत आहेत. त्याशिवाय इतरही अनेक जण ख्रिसमस विशेषांक प्रकाशित करत असतात.
ख्रिसमस अंक प्रकाशित करणाऱ्यांमध्ये हौशे, नवसे आणि गवसेही असतात.
प्रत्येक छापील दिवाळी अंकाची आर्थिक उलाढाल तीन ते पाच लाख रुपयांच्या आसपास असते असे म्हणतात. बहुतांश ख्रिसमस विशेषांकांच्या बाबतीतसुद्धा असेच आहे.
माझ्या माहितीनुसार `निरोप्या' मासिकाचे पहिले भारतीय संपादक फादर प्रभुधर यांनी १९७५ साली नाताळ विशेषांकांची परंपरा सुरु केली.
त्यावेळी श्रीरामपुरात दहावीत शिकत असलेल्या माझा एक अर्धा पानभर लेख या अंकात आहे.
`निरोप्या'च्या त्या नाताळ विशेषांकाचे खाली दिलेले खास भारतीय शैलीतले मारियाबाई आणि बाळ येशुचे चित्र असलेले हे कव्हर होते.
चित्रकार कोण असेल बरे? बहुधा अँजेला त्रिन्दाद....


Camil Parkhe



ऐंशीच्या दशकाच्या मध्यात रशिया-बल्गेरिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम करुन मी गोव्याला परतलो ते पत्रकारितेच्या व्यवसायातील दोन अतिशय महत्त्वाची आयुधे घेऊन.

पणजी येथे `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात क्राईम, मुंबई हायकोर्टाचे गोवा खंडपीठ आणि एज्युकेशन कॅम्पस या बिट्स मी हाताळत असताना मला आणि इतर काही सहकाऱ्यांना आमच्या ऑफिसात बसण्यासाठी स्वतंत्र लाकडी टेबल किंवा लाकडी खुर्ची नव्हती.
बसायची जी काही व्यवस्था होती ती सामाईक होती.
त्याचप्रमाणे बातम्या टाईप करण्यासाठी माझ्यासाठी वेगळा असा टाईपरायटरपण नव्हता.
एका जाडजूड आकाराच्या आणि वजनदार गोदरेज कंपनीच्या टाईपरायटरवर मी, ऑफिसातील काही उपसंपादक आणि उशिरा संध्याकाळी अर्धवेळ असलेला स्पोर्ट्स रिपोर्टर काम करत असत.
आता परदेशातून येताना मी बरोबर एक नाजूक, वजनाने अतिशय हलका आणि पाचसहा इंचांची रुंदी असलेला रेमिग्टन कंपनीचा पोर्टेबल टाईपरायटर आणला होता.
रशियन ऐरोफ्लोट विमानाने मॉस्कोतून मी दिल्ली विमानतळावर उतरलो तेव्हा माझ्या थ्री-पिस सुटावरील ओव्हरकोटवर गळ्याभोवती घातलेला एक रशियन-मेड छोटासा कॅमेरासुद्धा होता.
आम्हा पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना बल्गेरियात प्रशिक्षणाच्या काळात छोटासा पॉकेटमनी दिला होता, त्यातून मी ही माझ्या जीवनातली एक अतिशय मौल्यवान खरेदी केली होती.
या दोन उपकरणांचा मी पुढील दहाबारा वर्षे भरपूर वापर केला. पत्रकारितेतील ही दोन वैयक्तिक उपकरणे बाळगणारा त्या काळात गोव्यातला मी एकमेव बातमीदार होतो.
त्यानंतरसुद्धा तीनचार वेळेस नवनवीन कॅमेरे खरेदी केले. बातमीदारी करताना फोटोग्राफर नसल्यास स्वतःच छायाचित्रे घ्यावी हा त्यामागचा हेतू.
त्या जुन्या काळात फोटोग्राफ घेणे, त्यांची प्रिंट्स घेणे हा खूप खर्चिक मामला असायचा.
जग दुसऱ्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर असताना पुण्यात `इंडियन एक्सप्रेस'मध्ये बातमीदार असताना मराठी साहित्यिकांचा एक कार्यक्रम मी कव्हर केला.
मला त्या कार्यक्रमाची असाईनमेन्ट नसताना स्वतःहून मी या कार्यक्रमाला गेलो होतो. याचे कारण तेथे `अगा जे कल्पिले नाही' हे मराठीतील पहिले दलित आत्मकथन (साल १९७५) लिहिणारे सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार होता.
सूर्यवंशी हे सत्तरच्या दशकात नाशिकहून प्रसिद्ध होणाऱ्या 'आपण' या मराठी साप्ताहिकाचे संपादक होते.
मी दहावीला असताना माझ्या दोन लघुकथा 'सूर्यवंशी यांनी `आपण' मध्ये बाल सदरात छापल्या होत्या आणि त्यानंतर श्रीरामपूरच्या माझ्या घराच्या पत्त्यावर पाच-पाच रुपयांच्या दोन मनीऑर्डर्स पाठवल्या होत्या.
पत्रकारितेच्या माझ्या भावी व्यवसायातील ही पहिलीवहिली कमाई.
तर त्या दिवशी सूर्यवंशी यांना पुरस्कार दिला जात असताना मी काही छायाचित्रे घेतली.
व्यासपीठावर इतर जण होते मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे इतर चार माजी संमेलनाध्यक्ष :
पुण्यातल्या नाना पेठेतील एथेल गॉर्डन अध्यापन विद्यालयाच्या प्राचार्य विजया श्यामराव पुणेकर, कर्वे रोडवरील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक जयंतकुमार त्रिभुवन, नगरच्या सेंटर फॉर स्टडीज इन रुरल डेव्हलपमेंटचे डेव्हलपमेंट (सीएसआरडी) चे संचालक आणि `ज्ञानोदय' मासिकाचे संपादक प्रा. सुधीर देवीप्रसाद शर्मा आणि कवी निरंजन उजगरे.
दुसऱ्या दिवशीच्या `इंडियन एक्सप्रेस'च्या न्यूजलाईन मध्ये या कार्यक्रमाची बातमी मी घेतलेल्या छायाचित्रासह माझ्या नावानिशी प्रसिद्ध झाली.
स. ना. सूर्यवंशी यांची जयंतकुमार त्रिभुवन आणि `निरोप्या' मासिकाचे संपादक फादर ज्यो गायकवाड यांनी या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात मी शब्दबध्द केलेला लेखसुद्धा `निरोप्या' मासिकात प्रसिद्ध झाला.
या दोन्हींची कात्रणे आजही माझ्याकडे आहेत.
हे फोटो मी घेतले, कार्यक्रमाच्या बातम्या आणि लेख लिहिले आणि नंतर ते मी विसरून गेलो.
या पाचही मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या एकत्रित फोटोच्या रुपाने माझ्याकडे एक किती मौल्यवान ऐवज राहिला आहे हे मला खूप काळानंतर कळाले.
या पाचही साहित्य संमेलनाध्यक्षांपैकी आज कुणीही हयात नाही.
याआधीही विविध संमेलनांच्या निमित्ताने ते अनेकदा एकत्र आले होते, मात्र त्यांचा असा एकत्रित फोटो कुठेही नसावा.
हा फोटो किती दुर्मिळ आणि त्यामुळे अमूल्य आहे याची जाणीव मला अलीकडच्या काळात प्रकर्षाने झाली.
नूतन २०२६ वर्षांच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यांत सातारा येथे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्याचप्रमाणे सत्ताविसावे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन वसईचे कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे होत आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन एक शतकापूर्वी १९२७ साली नाशिक शहरातच भरले होते हे मराठी साहित्य विश्वात अनेकांना माहिती नसेल.
`स्मृतिचित्रे' कार लक्ष्मीबाई टिळक नागपुरातल्या १९३३सालच्या चौथ्या महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
तर या दोन्ही आगामी साहित्य संमेलनांच्या निमित्ताने गेल्या शतकातील मराठी साहित्य संमेलनांचा संक्षिप्त आढावा घेणारे आणि २००५ ते २०२२ या काळात झालेल्या पंधरा ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या संमेलनाध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे संकलन मी केले आहे.
या आधीच्या काळातील म्हणजे १९२७ ते २००१ सालापर्यंतच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे सुनील श्यामसुंदर आढाव यांनी आपल्या `धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या ग्रंथात संकलीत केली आहेत.
माझ्या या पुस्तकाची सुरुवात होते ती मुळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना १८८५च्या मराठी ग्रंथकारांच्या दुसऱ्या संमेलनास आपण येणार नाही असे सांगणारी, विद्रोहाची भुमिका घेणाऱ्या जोतिबा फुले यांच्या पत्रापासून.
या पुस्तकाची संहिता चेतक बुक्सचे कुणाल हजेरी यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर या पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांध्यक्षांचा हा फोटो कालच मी माझ्या पोतडीतून शोधून काढला आहे.
असाच एकूण पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांचा आणखी एक दुर्मिळ फोटो मला डॉ अनुपमा निरंजन उजगरे यांच्या सौजन्याने मला मिळाला आहे.
वसईत २०१९ साली झालेल्या एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हे पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष एकत्र जमले होते.
ते होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अशोक आंग्रे, डॉ. नाझरेथ मिस्किटा, फादर मायकल जी. आणि स्वतः अनुपमा उजगरे.
या घडीला या सर्वांचे वयमान अवघे सत्तर ते पंच्याऐंशीच्या दरम्यान.
पाच माजी साहित्य संमेलनाध्यक्ष एकत्रित येणे हा तसा एक दुर्मिळ योग आहे याची जाणीव होऊन अनुपमा उजगरे यांनी कुणाला तरी हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची विनंती केली होती.
त्याबद्दल धन्यवाद अनुपमाताई !
मराठी साहित्य संमेलनांविषयीच्या माझ्या या आगामी पुस्तकातील हे दोन फोटो महत्त्वाचे आकर्षण असतील याबद्दल शंकाच नसावी.
Camil Parkhe