Did you like the article?

Showing posts with label Sonia Gandhi. Show all posts
Showing posts with label Sonia Gandhi. Show all posts

Sunday, June 30, 2024

विरोधी पक्षनेता

 भारतात २०१४ सार्वत्रिक निवडणुकीत खूप दीर्घ कालावधीनंतर जनतेने एकाच पक्षाच्या हाती सत्ता दिली. लोकशाही व्यवस्थेत ही निश्चितच चांगली बाब.

टेलिव्हिजनचा जमाना तोपर्यंत रुढ झाला होता, लोकसभेच्या सभागृहात तेव्हा घडत असणारी ती घटना मी छोट्या स्क्रीनवर पाहत होतो ते दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे
नवे सभागृह अस्तित्वात येते त्यावेळी सर्वप्रथम निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी शपथ घेतात. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांना राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याकडून आधीच शपथ दिलेली असते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची आसनव्यवस्थासुद्धा निश्चित झालेली असते.
तर २०१४ साली संसदेच्या नवे सभागृह अस्तित्वात आले तेव्हा विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा प्रश्न आला.
तेव्हा कुठल्याही विरोधी पक्षांकडे राज्यघटनेने ठरवून दिलेली लोकसभा खासदारांची संख्या नसल्याने आता विरोधी पक्षनेता हे पद असणार नाही असा निवाडा लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी दिला.
लोकशाही व्यवस्था आणि अधिकृत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता नाही, असे कधी शक्य तरी आहे का?
हो, तसे शक्य आहे कारण आपल्या राज्यघटनेत तशीच तरतूद आहे.
लोकसभेच्या सभासदांच्या संख्येच्या दहा टक्के सभासद असले तरच त्या पक्षाला अधिकृतपणे विरोधी पक्षाचा दर्जा मिळते आणि त्या पक्षाच्या नेत्याला अधिकृतपणे विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता आणि इतर सर्व हक्क आणि अधिकार मिळतात.
काँग्रेस पक्षाला किंवा इतर कुठल्याही पक्षाला लोकसभेत दहा टक्के म्हणजे ५५ जागा मिळू शकल्या नाही म्हणून कुठलाही पक्ष अधिकृतपणे विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळू शकला नाही.
काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्षाच्या विरोधी आघाडीने दहा टक्क्यांहून अधिक जागा मिळवल्या असल्या तरी ते विचारात घेतले गेले नाही
स्वतंत्र भारताच्या इतिहासात या देशात पहिल्यांदाच.
असे घडत होते, असे नव्हते.
यापूर्वीही असे अनेकदा घडलेले आहे. विशेषतः देशात काँग्रेसला सगळीकडे जनाधार असायचा त्याकाळात.
विरोधी पक्षाचे महत्त्व, हक्क आणि अधिकार याबाबत देशातील लोक अधिक जागरुक झाले ते सत्तरच्या दशकातील आणीबाणी पर्वाच्या अनुभवानंतर.
मात्र त्यानंतर सुद्धा इथला विरोधी पक्षाचा आवाज पुर्णतः गायब होईल अशी कुणी कल्पना केली नव्हती. कारण आणीबाणीनंतर प्रत्येक वेळी मतदारांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला योग्य ते स्थान आणि जागा दाखविली होती.
देशात पुन्हा एकदा पूर्ण बहुमताची म्हणजेच निरंकुश सत्ता येण्यासाठी मोठा कालावधी लागला. हे घडले २०१४ ला
पुढल्या २०१९ च्या निवडणुकीत असेच झाले.
तर २०१४ नंतर इथला लोकशाही कारभार तब्बल दहा वर्षे विरोधी पक्षाविना आणि विरोधी पक्षनेत्याशिवाय चालला.
देशातील जनतेचा हा कौल आहे, सत्ताधारी पक्ष किंवा लोकसभा सभापती याबाबत काहीच करु शकत नाही, असे त्यावेळी म्हटले गेले.
कधीकाळी कुणा राजकीय नेत्याने आपण देश काँग्रेसमुक्त करु असे वक्तव्य केले होते, दुसऱ्या एकाने आपला पक्ष देश विरोधी पक्षमुक्त करु असे म्हटले होते.
त्यामुळे देशात आता विरोधी पक्षच नाही, विरोधी पक्षनेता नाही, याबाबत अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
खरे पाहता काँग्रेस आणि इतर पक्षांच्या आघाडीची एकत्रित संख्या मिळून एका पक्षाला विरोधी पक्ष म्हणून आणि पक्षनेता म्हणून मान्यता देणे फार मोठी अवघड बाब नव्हती.
त्यासाठी कायद्यात असलेल्या दहा टक्क्याची अट बदलता येणे सुद्धा सहजशक्य होते.
राज्यघटनाकारांनी या दहा टक्क्याची अट ठेवली तेव्हा या संख्येपर्यंत कुठलाही राजकीय पक्ष मजल गाठू शकणार नाही असा त्यांनी विचारही केलेला नसणार.
काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या 'सकाळ टाइम्स' या इंग्रजी दैनिकाने मला थायलंड येथे एका आंतरराष्ट्रीय औद्योगिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पाठवले होते. माझ्यासह भारतातले सहा आणि जगातून सत्तरच्या आसपास पत्रकार या परिषदेला हजर होते.
त्यानिमित्ताने वेगवेगळ्या देशांतील पत्रकारांशी मला संवाद साधता आला, अनेकांशी मैत्रीही झाली.
एकदा असेच बसमधून प्रवास करताना आम्ही एका चीनमधील एका तरुण पत्रकाराशी बोलत होतो. संभाषण अचानक लोकशाही व्यवस्थेकडे वळले.
"तुमच्या चीनमध्ये लोकशाही पद्धत नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?" असे एकाने म्हटले.
"लोकशाही? लोकशाही म्हणजे काय?
I have not experienced what is democracy. And so I don't know what you are talking about!" असे त्या विशीतल्या पत्रकाराने म्हटले होते!
यावर लोकशाही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष वगैरे मुद्दे चर्चेत आले अन् बसप्रवास संपला त्यामुळे आमचे संभाषणसुद्धा थांबले.
त्यानंतर त्या तरुण चिनी पत्रकाराशी पुन्हा बोलण्याची मला संधी मिळाली नाही.
तर विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना सभागृहात आणि बाहेर जाब विचारु शकतो, विरोधी मत मांडू शकतो. विरोधी पक्षनेता हे पद केवळ आणि केवळ अस्सल लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशातच असू शकते.
चीनमध्ये, रशियात किंवा इतर तथाकथित लोकशाही असणाऱ्या देशांत तसेच लष्करशाही, राजेशाही किंवा उघडउघड हुकूमशाही असणाऱ्या देशांत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता असूच शकत नाही.
यापैकी काही देशांत विरोध करणाऱ्या नेत्यांची जागा तुरुंगात किंवा अंधारकोठडीत असते. त्यांची सरळसरळ हत्याही होत असते हे आपण वृत्तपत्रांत वाचत असतो.
खोटेनाटे आरोप करुन या विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबले जाते, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान असलेल्या झुल्फिकार अली भुट्टो यांना तर तडकाफडकी फाशीही दिले जाते.
त्यामुळे लोकशाहीत विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता असणे आणि महत्त्वाचे म्हणजे हे पद सन्मानाचे असणे सुद्धा महत्त्वाचे असते.
एक उदाहरण सांगतो. काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातली पिंपरी चिंचवड महापालिका मी बातमीदार म्हणून कव्हर करत होती. आम्ही काही बातमीदार मंडळी कुठल्याशा कारणाने श्रीरंग बारणे यांना भेटायला त्यांच्या कक्षात गेलो. बारणे त्यावेळी महापालिकेत विरोधी पक्षनेता होते
बारणे मूळचे काँग्रेसचे नगरसेवक, नंतर शिवसेनेत जाऊन दोनदा नगरसेवक झाले. शिवसेनेने त्याकाळात महापालिकेत विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या, त्यामुळे बारणे यांना विरोधी पक्षनेता हे पद मिळाले होते.
तर विरोधी पक्षनेता म्हणून बारणे यांना खूप मोठे कशा आणि दालन मिळाले होते, महापालिकेच्या सभागृहात आणि कामकाजात त्यांचा दबदबा होता.
विरोधी पक्षनेता पद किती महत्त्वाचे आणि आवश्यक असते याची जाणीव यावेळी पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली होती. (श्रीरंग बारणे यावेळी तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत).
हिच परिस्थिती लोकशाही व्यवस्थेत राज्यपातळीवर आणि देशपातळीवर असणे आवश्यक असते. विविध देशांतील प्रमुख आणि राजकीय नेते दुसऱ्या देशांच्या भेटीवर येतात तेव्हा सत्ताधारी नेत्यांना भेटून झाल्यावर ते विरोधी पक्षनेत्यांना भेटण्याचा संकेत जरुर पाळत असतात.
सुदृढ लोकशाहीतली ही एक चांगली परंपरा आहे, कारण आजचा विरोधी पक्ष विरोधी पक्षनेता आगामी काळातला सत्ताधारी असू शकते, ही त्यामागची जाणिव असते.
आपल्या देशात इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, राजीव गांधी, पी व्ही. नरसिंह राव, सुषमा स्वराज, शरद पवार, सोनिया गांधी यांना विरोधी पक्षनेता हे पद सन्मानाने देण्यात आले होते.
महाराष्ट्रात शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस वगैरेंनी विरोधी पक्षनेता या पदाची प्रतिष्ठा वाढवली आहे. यात अतिशयोक्ती मुळीच नाही.
दहा वर्षांच्या काळानंतर भारतात पुन्हा एकदा विरोधी पक्षनेता या पदावर एका व्यक्तीची सन्मानपूर्वक नेमणूक होत आहे, ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे.
Camil Parkhe,

Tuesday, October 11, 2022

 
सोनिया गांधी


पुण्यात केदारी ग्राऊंडवर काँग्रेसच्या प्रचारसभेत सोनिया गांधी बोलणार होत्या , सभेची जोरात तयारी चालू होती आणि माझी तगमग होत होती. प्रचार सभेला जाण्याची, सोनिया यांना पाहण्याची आणि ऐकण्याची तीव्र इच्छा होती, मात्र आता मी न्यूज डेस्कवर असल्याने आणि बातमीदार नसल्याने मला जाणे शक्य नव्हते. सोनिया यांना प्रत्यक्ष पाहण्याची, त्यांचे बोलणं ऐकण्याची संधी मला आजपर्यंत मिळाली नाही याची खंत आजही आहे.

पंतप्रधानपदावर असलेल्या किंवा या पदावर नंतर आलेल्या इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, पी व्ही नरसिंह राव, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्र शेखर यांच्याबरोबर हस्तांदोलन करण्याची, त्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांत सहभागी होण्याची, त्यांच्या कार्यक्रमाला हजार राहण्याची संधी गोव्यात आणि पुण्यात मला बातमीदार म्हणून मिळाली आहे. कुणाही व्यक्तीला प्रत्यक्ष पाहण्याचा, भेटण्याचा अनुभव काही औरच असतो.
वृत्तपत्र कामगार चळवळीत पदाधिकारी या नात्याने मी सक्रिय असताना एकेकाळी साथी जॉर्ज फर्नांडिस माझे आणि कामगार चळवळीतल्या अनेकांचे दैवत होते. पत्रकारितेत मी चार दशके असूनही एकदाही जॉर्ज यांना पाहण्याची, त्यांच्याशी बोलण्याची मला संधी मिळाली नाही अशी खंत आहे.
गेली दोन दशके देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या सोनिया गांधी यांच्याविषयीसुद्धा अशीच भावना आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनांनंतर पंतप्रधान म्हणून कामराज,.निजलिंगप्पा वगैरे काँग्रेसच्या दृढाचार्यांनीं इंदिरा गांधी यांची निवड केली कारण त्या `गुंगी गुडिया' आहेत असा त्यांचा समज होता.
मूळच्या इटालियन, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी त्यांच्या बरोबर पंतप्रधान निवासात अनेक वर्षे राहूनसुद्धा सार्वजनिक जीवनापासून चार हात राखून असणाऱ्या सोनिया गांधी यांच्याविषयी असाच समाज प्रचलित होता. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे घेण्यास बराच काळ ठाम नकार दिला होता.
मात्र पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात काँग्रेसला परत सत्तेपासून दूर जावं लागले आणि पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांच्या काळात या पक्षाची पार वाट लागते आहे हे पाहिल्यावर सोनिया यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळेस लोकसभेत त्या आपले हिंदी भाषण वाचून करत असत त्यावेळी त्यांची किती तरी टर उडवली जात असे.
त्याकाळात आजच्या सारखी आयटी सेल्स आणि ट्रोल्स नव्हते तरी सोनिया यांना प्रचंड मानहानी सहन करावी लागली.
विशेषतः समाजवादी पक्षाचे मुलायम सिंग यादव यांचा पाठिंबा गृहीत धरुन त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने १९९९ साली पंतप्रधानपदावर दावा केला आणि मुलायम यांनी नकार दिल्यावर त्या तोंडघशी पडल्या होत्या.
सोनिया राजकारणात सक्रिय झाल्या आणि लगेचच संसदेत त्यांच्या पक्षाचे नेते असलेल्या शरद पवार यांनी सोनियांच्या विदेशी असण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी चूल मांडली.
हा सोनियांना मोठा धक्का होता. मात्र केवळ सहा महिन्यातच पवारांच्या पक्षाने काँग्रेसचा हात जवळ केला, महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांच्या आघाडीनं सत्ता स्थापन केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसचा साथीदार बनला तो आजतागायत.
त्यानंतर खंबीरपणे लढून सोनिया यांनी एकामागे एकेक राज्यांत पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यात सुरुवात केली तेव्हा मग त्यांच्या विरोधकांची वाचा काही प्रमाणात बंद झाली.
विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात `शायनिंग इंडिया' आणि लाल कृष्ण अडवाणी यांच्या शब्दांत `फिल गुड' वातावरण असल्याने २००४ साली सहा महिने आधीच लोकसभेच्या निवडणूक घेण्यात आल्या आणि सर्वांना - राजकीय निरीक्षकांनासुद्धां - धक्का देत काँग्रेसने केंद्रात सत्तेवर पुनरागमन केले.
नंतर २००९ ला सोनिया यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पुन्हा आणि अधिक जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्ता मिळवली.
या काळात सोनिया गांधी यांच्या कर्तृत्वाने शिखर गाठले. दीडशे वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासात त्या सर्वाधिक काळ पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत,
दोनदा पंतप्रधानपदी आणि दोनदा राष्ट्रपतिपदी एखाद्या व्यक्तींची निवड करण्याची त्यांना संधी लाभली. विशेष म्हणजे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या दोन मुदतीच्या कालखंडात त्यांचे आणि सोनिया यांचे अत्यंत सौहार्दाचे संबंध राहिले आणि आजही तसेच आहेत हे आपण पाहतो आहेच.
काही वर्षांपूर्वी `मौत का सौदागर' असं त्यांनी विशेषण वापरलं तेव्हा सोनिया यांच्या विरोधात केवढी मोठी राळ उडवण्यात आली होती. याच सोनिया यांना `पांढऱ्या चामडीची' आणि `काँग्रेसची विधवा' असं विशेषण भर सभेत लावलं गेलं तेव्हा मात्र सूचक मौन राखले गेले होते.
गेल्या वीस वर्षांच्या काळात सोनिया यांच्याबद्दल प्रचंड विषारी प्रचार झालेला असला तरी त्यांची जनमानसातली प्रतिमा आजही आदराची राहिलेली आहे हे अनेकदा दिसून आले आहे.
गेली काही वर्षे आजाराशी सामना करत असलेल्या सोनिया खूप दिवसांनी जाहीर कार्यक्रमात सामील झाल्या. देशात प्रेमाचे, सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी बाहेर पडलेल्या आपल्या मुलाला राहुल गांधी यांना नैतिक बळ देण्यासाठी त्या पायी चालल्या.
वृत्तपत्रांत, मुख्य प्रसारमाध्यमांत या भारत जोडो यात्रेची दखल घेत जात नसली तरी सोशल मिडियावर सोनिया आणि राहुल गांधी यांचे कौतुक होत आहे हे स्पष्ट जाणवते.

^^^^
Camil Parkhe, October 7. 2022

Wednesday, February 23, 2022

गोवामुक्तीचे हिरकमहोत्सवी वर्ष आणि अंतोनियो कोस्टा पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी


Caption : Portuguese\ Prime Minister Antonio Costa during his Goa visit in 2017

गेल्या महिन्यात पोर्तुगालच्या मतदारांनी अंतोनियो कोस्टा यांना बहुमताने पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून दिले आहे.

पोर्तुगिजांची तब्बल साडेचारशे वर्षे वसाहत असलेल्या गोव्यात तसेच दमण आणि दीव येथे भारतीय लष्कर पाठवून पंतप्रधान पंडित नेहरुंनी हा चिमुकला प्रदेश भारतीय संघराज्यात सामील केला, या घटनेससुद्धा गेल्या डिसेंबरात साठ वर्षे पूर्ण झाली.
गोवामुक्तीचे यंदाचे हे हिरकमहोत्सवी वर्ष आणि अंतोनियो कोस्टा यांची पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी फेरनिवड यात एक महत्त्वाचा संबंध आहे.
कोस्टा यांची पंतप्रधानपदी निवड ही केवळ गोव्यातील नव्हे तर तमाम भारतीयांना अभिमान वाटेल अशीच घटना आहे. युरोपातील या देशातील निवडणुकीच्या या बातमीने गोव्यातसुद्धा जल्लोष केला गेला.
याचे कारण म्हणजे पंतप्रधान अंतोनियो कोस्टा उर्फ बाबुश हे मूळचे गोव्यातले आहेत. `बाबुश’ गोव्यातील एक आवडते टोपण नाव आहे. उदाहरणार्थ, पणजी मतदारसंघातून निवडणूक लढणारे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 'बाबुश' मोन्सेरात आहेत आणि त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपचे बंडखोर उमेदवार मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर आहेत.
अंतोनियो कोस्टा सरचिटणीस असलेल्या सोशालिस्ट पार्टीला पोर्तुगालच्या या मध्यावधी निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळाले आहे. पंतप्रधान कोस्टा यांनी गोव्याला २०१७ साली भेट दिली तेव्हा मडगाव येथील त्यांच्या वाडवडिलांच्या घरी ते गेले होते, आपल्या जवळच्या नातेइकांना ते भेटले होते.

Portuguese Prime Minister Antonio Costa during his visit to Mangueshi in Goa in 2017

कोस्टा यांची २०१५ला पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदा निवड झाली होती. त्यावेळी त्यांचे सरकार अल्पमतातले होते. एकेकाळी एक बलवान राष्ट्र असलेले पोर्तुगाल आज युरोपमधले एक सर्वांत गरीब राष्ट्र गणले जाते. पंतप्रधान झाल्यानंतर कोस्टा यांनी पोर्तुगालची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केलेली उपाययोजना खूप लाभदायक ठरली. मात्र त्यानंतर युरोपातल्या कोविड साथीमुळे या देशातील अर्थव्यवस्थेतर खूप वाईट परिणाम झाला आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी पोर्तुगालला आजही युरोपियन युनियनच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे .
मूळचे गोव्यातील असलेल्या व्यक्तीची पोर्तुगालच्या मंत्रिमंडळात निवड होण्याची मात्र ही पहिलीच वेळ नाही. ऐंशीच्या दशकात मी गोव्यात पणजी येथे बातमीदार असताना मूळचे गोमंतकीय असलेले पोर्तुगालचे मंत्री किंवा खासदार गोव्याच्या दौऱ्यावर येत असत तेव्हा त्यांच्या या भेटीच्या बातम्या मी अनेकदा दिल्या आहेत. हे पोर्तुगीज मंत्रीमहोदय किंवा संसदसदस्य कुटुंबियांबरोबर आपल्या पूर्वजांच्या घरी आल्यावर नातेवाईकांना भेटत, स्थानिक चर्चला प्रार्थनेला जात अशा बातम्या आणि फोटो आम्ही वृत्तपत्रांत छापत असू.
पोर्तुगालची वसाहत असलेल्या `पोर्तुगीज इंडिया' म्हणून ओळखल्या गोवा, दमण आणि दीव येथील नागरिकांना पोर्तुगालचे नागरिक म्हणून हक्क होते. गेल्या तिनशे-चारशे वर्षांच्या पोर्तुगीज वसाहतीच्या काळात गोव्यातील अनेक लोक विविध कारणांनी पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे गेले, तेथेच स्थायिक झाले किंवा तेथून इतर युरोपियन देशांत गेले.
पंतप्रधान अंतोनियो कोस्टा यांचे आजोबा गोव्यातल्या मडगाव इथले, अंतोनियो यांचा जन्म पोर्तुगालमध्ये झाला होता, त्यांचे वडील ओर्लांदो यांचा जन्म पोर्तुगालची दुसरी वसाहत असलेल्या मोझाम्बिक येथे झाला होता.
माझ्याबरोबर पणजी येथे कॉलेजला शिकणाऱ्या माझ्या अनेक मित्रांकडे पोर्तुगीज पासपोर्ट होते. त्यापैकी नंतर काही जण पोर्तुगालला गेले आणि तेथून मग इतर पाश्चात्य राष्ट्रांत स्थायिक झाले आहेत.
विदेशांत जन्मलेल्या व्यक्तींविषयी किंवा इतकेच नव्हे भारतातल्याच मात्र मूळचे इतर राज्यांतल्या व्यक्तीविषयी आपली मते फारशी सहिष्णू नसतात. मात्र भारतीय वंशाच्या व्यक्तीने परदेशात महत्त्वाचे पद मिळवल्यास आपल्याला अभिमान वाटतो.
जन्माने इटालियन असलेल्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस २००४ साली सत्तेवर आली. त्यावेळी खासदार असलेल्या सोनिया या घटनात्मक तरतुदीनुसार पंतप्रधान होणार हे निश्चित झाल्यावर सत्तेतून पराभूत झालेल्या भाजपच्या खासदार सुषमा स्वराज आणि उमा भारती यांनी काय वक्तव्ये केली हे जाणून घेण्यासाठी त्याकाळची वृत्तपत्रे पुन्हा चाळता येतील.
गोव्यातही आज काय वास्तव आहे ? तिथे 'भायलो' ही संज्ञा आजही वारंवार ऐकायला येतेच. दहा मार्चच्या निवडणुकीनंतर गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन 'भायलो' आमदार असण्याची शक्यता सोशल मिडीयावर व्यक्त केली गेली आहे कारण दोन संभाव्य आमदार दाक्षिणात्य आडनावांचे आहेत, मात्र. जन्माने ते गोमंतकीय आणि कोकणी बोलणारे आहेत !
दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश संसदेचे पहिले भारतीय सदस्य. ब्रिटिश काळातच गोपाळ कृष्ण गोखले यांची निवड मुंबई विधिमंडळावर आणि केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली होती, म्हणून त्यांना `नामदार' हे संबोधन वापरले जाते..
ब्रिटनचे पंतप्रधान बॉरीस जॉन्सन यांचे आईवडील ब्रिटिश, मात्र बॉरीस जॉन्सन हे जन्माने अमेरिकन आहेत ! भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून गेल्या वर्षी सूत्रे हाती घेतली. अमेरिकेत, इंग्लंडमध्ये आणि इतर युरोपियन राष्ट्रांतसुद्धा भारतीय वंशाच्या अनेक व्यक्ती विविध महत्वाच्या पदांवर आहेत.
पोर्तुगालमध्ये मात्र ही परंपरा फार जुनी आहे. पंतप्रधान अंतोनियो कोस्टा यांच्याच मंत्रिमंडळात मूळ गोव्याच्या इतर दोन व्यक्ती आहेत.
महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गोवा या चिमुकल्या राज्यात सहलीसाठी, पर्यटनासाठी अनेक लोक जात असतात. समुद्रकिनारी असलेला एक सुंदर प्रदेश अशीच गोव्याची ओळख असली तरी गोव्याविषयीच्या अनेक नाविन्यपूर्णगोष्टी आपण कधी ऐकलेल्याही नसतात.
उदाहरणार्थ, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकदाच आणि केवळ गोवा, दमण आणि दीव येथेच सार्वमत घेण्यात आले आहे. हा प्रदेश पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केल्यानंतर या प्रदेशाचे भवितव्य काय असावे याबाबत तेथील लोकांचे मत जाणून घेण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत १९६७च्या जानेवारीत तिथे चक्क मतदान घेण्यात आले होते.
गोव्याचे महाराष्ट्रात विलीन करावे कि गोवा स्वतंत्र असावा याबाबत बहुसंख्य लोकांनी स्वतंत्र गोव्यासाठी अनुकूल मतदान केले. महाराष्ट्रात विलीन न होता गोवा अशाप्रकारे स्वतंत्र प्रदेश राहिला.
गोव्याबाबतची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे संपूर्ण भारतात केवळ याच राज्यात समान नागरी कायदा किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड गेल्या शतकापासून अस्तित्वात आहे.
येथील हिंदू, ख्रिस्ती, मुस्लीम व इतर कुठल्याही धर्माच्या लोकांना लग्न, घटस्फोट, वारसाहक्क वगैरे विविध कायदेकानूंसाठी हा समान नागरी कायदा लागू आहे.
शंभर वर्षांपूर्वी पोर्तुगाल राजवटीने गोव्यात हा कायदा आणला आणि आतापर्यंत तो बिनबोभाट, विनातक्रार पाळला जात आहे. धर्मविरहित आणि लिंगाधारित भेद न करणारा समान नागरी कायदा भारताच्या एका राज्यात खूप वर्षांपासून अस्तित्वात आहे याची देशातील अनेक लोकांना कल्पनाही नसेल.
पणजीला मी कॉलेजात आणि नोकरीला असताना अनेकदा मित्रमैत्रिणींकडून ऐकायचो कि त्यांचे `सिव्हिल मॅरेज’ झाले आहे आणि एकदोन महिन्यांत चर्च मॅरेजही होईल. नंतर लक्षात आले कि युनिफॉर्म सिव्हिल कोडनुसार गोव्यात सिव्हिल मॅरेज वा नोंदणी विवाह बंधनकारक होता.
भारताच्या उर्वरित राज्यांतही आता लग्नाचे नोंदणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
गोवा म्हणजे सुंदर समुद्रकिनारे, हिरवागार निसर्ग,सुट्टी आणि पर्यटनासाठी एक उत्तम आणि जवळचा प्रदेश अशी अनेकांची समजूत असते. गोवा याहून खूप काही आहे, गोव्याची स्वतःची अशी खास संस्कृती आहे, इतिहास आहे. साहित्य, संगीत, क्रीडा वगैरे अनेक क्षेत्रांत गोव्याने खूप मोठे योगदान दिले आहे.
सत्तरच्या दशकात `बॉबी' या गाजलेल्या चित्रपटात राज कपूरने गोव्यातील `देखणी' या लोकप्रिय लोकगीतातील 'घे घे घे घेरे, घेरे सायबा' या ओळी वापरल्या होत्या. चित्रकार मारिओ मिरांडा यांनी आपल्या कुंचल्याच्या रेषांतून गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला असणाऱ्या मंदिरांची आणि चर्चेसची तसेच या प्रदेशाच्या बहुअंगी संस्कृतीची देशभर आणि जगभर ओळख करुन दिली.
गोव्याच्या बहुअंगी सांस्कृतिक अंतरंगात डोकावून पाहिले तर अशा कितीतरी गोष्टींची ओळख होते
गोवामुक्तीचा यावर्षी सुवर्णमहोत्सव साजरा करणारे गोव्यातील लोक गेली काही आठवडे एका वेगळ्याच म्हणजे लोकशाहीच्या उत्सवात गर्क होते.
१४ फेब्रुवारी रोजी गोव्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले आणि यावेळी इतर पक्षांप्रमाणेच तृणमूल काँग्रेस आणि आप आदमी पक्ष सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
`गोवाके लोग अजिब है'' असे पंडित नेहरुंचे वाक्य प्रसिद्ध आहे. दहा मार्चला जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालात पंडितजींच्या विधानाचे कसे पडसाद पडतात हे आता पाहायचे .
`दिव्यमराठी' तला लेख