Did you like the article?

Showing posts with label Niranjan Uzgare. Show all posts
Showing posts with label Niranjan Uzgare. Show all posts

Thursday, November 27, 2025


ऐंशीच्या दशकाच्या मध्यात रशिया-बल्गेरिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम करुन मी गोव्याला परतलो ते पत्रकारितेच्या व्यवसायातील दोन अतिशय महत्त्वाची आयुधे घेऊन.

पणजी येथे `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात क्राईम, मुंबई हायकोर्टाचे गोवा खंडपीठ आणि एज्युकेशन कॅम्पस या बिट्स मी हाताळत असताना मला आणि इतर काही सहकाऱ्यांना आमच्या ऑफिसात बसण्यासाठी स्वतंत्र लाकडी टेबल किंवा लाकडी खुर्ची नव्हती.
बसायची जी काही व्यवस्था होती ती सामाईक होती.
त्याचप्रमाणे बातम्या टाईप करण्यासाठी माझ्यासाठी वेगळा असा टाईपरायटरपण नव्हता.
एका जाडजूड आकाराच्या आणि वजनदार गोदरेज कंपनीच्या टाईपरायटरवर मी, ऑफिसातील काही उपसंपादक आणि उशिरा संध्याकाळी अर्धवेळ असलेला स्पोर्ट्स रिपोर्टर काम करत असत.
आता परदेशातून येताना मी बरोबर एक नाजूक, वजनाने अतिशय हलका आणि पाचसहा इंचांची रुंदी असलेला रेमिग्टन कंपनीचा पोर्टेबल टाईपरायटर आणला होता.
रशियन ऐरोफ्लोट विमानाने मॉस्कोतून मी दिल्ली विमानतळावर उतरलो तेव्हा माझ्या थ्री-पिस सुटावरील ओव्हरकोटवर गळ्याभोवती घातलेला एक रशियन-मेड छोटासा कॅमेरासुद्धा होता.
आम्हा पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना बल्गेरियात प्रशिक्षणाच्या काळात छोटासा पॉकेटमनी दिला होता, त्यातून मी ही माझ्या जीवनातली एक अतिशय मौल्यवान खरेदी केली होती.
या दोन उपकरणांचा मी पुढील दहाबारा वर्षे भरपूर वापर केला. पत्रकारितेतील ही दोन वैयक्तिक उपकरणे बाळगणारा त्या काळात गोव्यातला मी एकमेव बातमीदार होतो.
त्यानंतरसुद्धा तीनचार वेळेस नवनवीन कॅमेरे खरेदी केले. बातमीदारी करताना फोटोग्राफर नसल्यास स्वतःच छायाचित्रे घ्यावी हा त्यामागचा हेतू.
त्या जुन्या काळात फोटोग्राफ घेणे, त्यांची प्रिंट्स घेणे हा खूप खर्चिक मामला असायचा.
जग दुसऱ्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर असताना पुण्यात `इंडियन एक्सप्रेस'मध्ये बातमीदार असताना मराठी साहित्यिकांचा एक कार्यक्रम मी कव्हर केला.
मला त्या कार्यक्रमाची असाईनमेन्ट नसताना स्वतःहून मी या कार्यक्रमाला गेलो होतो. याचे कारण तेथे `अगा जे कल्पिले नाही' हे मराठीतील पहिले दलित आत्मकथन (साल १९७५) लिहिणारे सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार होता.
सूर्यवंशी हे सत्तरच्या दशकात नाशिकहून प्रसिद्ध होणाऱ्या 'आपण' या मराठी साप्ताहिकाचे संपादक होते.
मी दहावीला असताना माझ्या दोन लघुकथा 'सूर्यवंशी यांनी `आपण' मध्ये बाल सदरात छापल्या होत्या आणि त्यानंतर श्रीरामपूरच्या माझ्या घराच्या पत्त्यावर पाच-पाच रुपयांच्या दोन मनीऑर्डर्स पाठवल्या होत्या.
पत्रकारितेच्या माझ्या भावी व्यवसायातील ही पहिलीवहिली कमाई.
तर त्या दिवशी सूर्यवंशी यांना पुरस्कार दिला जात असताना मी काही छायाचित्रे घेतली.
व्यासपीठावर इतर जण होते मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे इतर चार माजी संमेलनाध्यक्ष :
पुण्यातल्या नाना पेठेतील एथेल गॉर्डन अध्यापन विद्यालयाच्या प्राचार्य विजया श्यामराव पुणेकर, कर्वे रोडवरील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक जयंतकुमार त्रिभुवन, नगरच्या सेंटर फॉर स्टडीज इन रुरल डेव्हलपमेंटचे डेव्हलपमेंट (सीएसआरडी) चे संचालक आणि `ज्ञानोदय' मासिकाचे संपादक प्रा. सुधीर देवीप्रसाद शर्मा आणि कवी निरंजन उजगरे.
दुसऱ्या दिवशीच्या `इंडियन एक्सप्रेस'च्या न्यूजलाईन मध्ये या कार्यक्रमाची बातमी मी घेतलेल्या छायाचित्रासह माझ्या नावानिशी प्रसिद्ध झाली.
स. ना. सूर्यवंशी यांची जयंतकुमार त्रिभुवन आणि `निरोप्या' मासिकाचे संपादक फादर ज्यो गायकवाड यांनी या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात मी शब्दबध्द केलेला लेखसुद्धा `निरोप्या' मासिकात प्रसिद्ध झाला.
या दोन्हींची कात्रणे आजही माझ्याकडे आहेत.
हे फोटो मी घेतले, कार्यक्रमाच्या बातम्या आणि लेख लिहिले आणि नंतर ते मी विसरून गेलो.
या पाचही मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या एकत्रित फोटोच्या रुपाने माझ्याकडे एक किती मौल्यवान ऐवज राहिला आहे हे मला खूप काळानंतर कळाले.
या पाचही साहित्य संमेलनाध्यक्षांपैकी आज कुणीही हयात नाही.
याआधीही विविध संमेलनांच्या निमित्ताने ते अनेकदा एकत्र आले होते, मात्र त्यांचा असा एकत्रित फोटो कुठेही नसावा.
हा फोटो किती दुर्मिळ आणि त्यामुळे अमूल्य आहे याची जाणीव मला अलीकडच्या काळात प्रकर्षाने झाली.
नूतन २०२६ वर्षांच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यांत सातारा येथे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्याचप्रमाणे सत्ताविसावे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन वसईचे कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे होत आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन एक शतकापूर्वी १९२७ साली नाशिक शहरातच भरले होते हे मराठी साहित्य विश्वात अनेकांना माहिती नसेल.
`स्मृतिचित्रे' कार लक्ष्मीबाई टिळक नागपुरातल्या १९३३सालच्या चौथ्या महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
तर या दोन्ही आगामी साहित्य संमेलनांच्या निमित्ताने गेल्या शतकातील मराठी साहित्य संमेलनांचा संक्षिप्त आढावा घेणारे आणि २००५ ते २०२२ या काळात झालेल्या पंधरा ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या संमेलनाध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे संकलन मी केले आहे.
या आधीच्या काळातील म्हणजे १९२७ ते २००१ सालापर्यंतच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे सुनील श्यामसुंदर आढाव यांनी आपल्या `धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या ग्रंथात संकलीत केली आहेत.
माझ्या या पुस्तकाची सुरुवात होते ती मुळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना १८८५च्या मराठी ग्रंथकारांच्या दुसऱ्या संमेलनास आपण येणार नाही असे सांगणारी, विद्रोहाची भुमिका घेणाऱ्या जोतिबा फुले यांच्या पत्रापासून.
या पुस्तकाची संहिता चेतक बुक्सचे कुणाल हजेरी यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर या पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांध्यक्षांचा हा फोटो कालच मी माझ्या पोतडीतून शोधून काढला आहे.
असाच एकूण पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांचा आणखी एक दुर्मिळ फोटो मला डॉ अनुपमा निरंजन उजगरे यांच्या सौजन्याने मला मिळाला आहे.
वसईत २०१९ साली झालेल्या एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हे पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष एकत्र जमले होते.
ते होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अशोक आंग्रे, डॉ. नाझरेथ मिस्किटा, फादर मायकल जी. आणि स्वतः अनुपमा उजगरे.
या घडीला या सर्वांचे वयमान अवघे सत्तर ते पंच्याऐंशीच्या दरम्यान.
पाच माजी साहित्य संमेलनाध्यक्ष एकत्रित येणे हा तसा एक दुर्मिळ योग आहे याची जाणीव होऊन अनुपमा उजगरे यांनी कुणाला तरी हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची विनंती केली होती.
त्याबद्दल धन्यवाद अनुपमाताई !
मराठी साहित्य संमेलनांविषयीच्या माझ्या या आगामी पुस्तकातील हे दोन फोटो महत्त्वाचे आकर्षण असतील याबद्दल शंकाच नसावी.
Camil Parkhe




Saturday, August 30, 2025

 

                                                                    पौलस वाघमारे 

त्या दिवशी सकाळीसकाळी फोन लावला. ``गुड मॉर्निंग पौलस, कवी `विश्वासकुमार' हे नाव ऐकले आहे का?''


``हो, त्यांचे पूर्ण नाव संपत विश्वास गायकवाड. केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) आणि केशवकुमार (आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे) यांच्या धर्तीवर त्यांचे नाव विश्वासकुमार. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात ते शिक्षक होते.

``पाणी लाजलं, `जाता साताऱ्याला' या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती. ``सशाचे कान, झालेत लांब'' ही त्यांची बालभारती पाठ्यपुस्तकात असलेली कविता आम्हाला शाळेत होती, '' पौलस वाघमारे सांगत होते अन फोनच्या या बाजूला अवाक होऊन मी ऐकत होतो.

कधी काही अडचण झाली, आतासारखा असाच लेख लिहिताना लॅपटॉपवर माऊस अडखळला, पुस्तकांत शोधूनसुद्धा संदर्भ न सापडल्यामुळे आणि आठवण न राहिल्यामुळे गाडी अडली, पुढे जाईना कि पौलस वाघमारे यांना मग मी फोन करतो.

एकतर ते त्या शंकेचे समाधान करतात किंवा कुठे आणि कुणाकडे पाहिजे असलेली माहिती मिळू शकेल हे सांगतात.

पौलस वाघमारे हे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे (२०२३) विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्षही आहेत.

गंमत म्हणजे त्यांची आणि माझी पहिली गाठभेट मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या निमित्तानेच झाली आणि आतापर्यंत आमचे सर्व समोरासमोरचे आणि फोनवरचे संभाषण आणि चर्चा ख्रिस्ती साहित्य आणि ख्रिस्ती साहित्य संमेलनांबाबतच असते.

पुण्यात मॉडेल कॉलनीत चर्चच्या विद्याभवन स्कुलमध्ये १९९२ साली मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवण्यात येणार होते.

शाळेचे प्रिन्सिपल फादर नेल्सन मच्याडो स्वागताध्यक्ष होते, फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलानाध्यक्ष होते, शांता शेळके संमेलनाच्या उदघाटक होत्या आणि पुणे ख्रिस्ती साहित्य संघाचे पदाधिकारी म्हणून पौलस वाघमारे यजमान समितीत होते.

त्यानिमित्त त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि आम्हा दोघांची अशी पहिली मुलाखत झाली.

साहित्य संमेलनाचे ते प्रवक्ते आणि मी एक पत्रकार, आमच्या दोघांमध्ये असलेले हे नाते गेली तीस वर्षे आजतागायत कायम राहिले आहे.

ख्रिस्ती संमेलनांबाबत किंवा ख्रिस्ती साहित्यिकांबाबत कसलीही माहिती हवी असली कि पहिला फोन मी वाघमारे याना लावत असतो,

त्यानंतर मालवणला झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात आमची दुसऱ्यांदा गाठभेट झाली. निरंजन उजगरे त्यावेळी अध्यक्ष होते, मिलाग्रिस चर्चचे फादर गॅब्रिएल डिसिल्व्हा स्वागताध्यक्ष होते. शिवसेनेचे त्यावेळचे स्थानिक आमदार नारायण राणे उदघाटक होते.

नारायण राणे यांचे जोश निर्माण करणारे भाषण, संमेलनाच्या तीन दिवसांत माशांच्या जेवणाची मेजवानी आणि पौलस वाघमारे यांची भेट अशा काही या संमेलनाच्या आठवणी आहेत.

ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवणाऱ्या मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे गेली खूप वर्षे पौलस वाघमारे सचिव वगैरे पदांवर सतत राहिले आहेत आणि त्यामुळे साहजिकच कधी ना कधी आपण मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊच अशी मनीषा आणि आकांक्षा बाळगून होते.

दरम्यानच्या काळात सिसिलिया कार्व्हालो यांची प्रस्तावना असलेला `मोगळ्यांचा कळ्यांचा सुवास' हा एक काव्यसंग्रह (साल २०००) त्यांच्या नावावर जमा झाला होता. अर्थात एकही साहित्य कलाकृती नसलेल्या काही व्यक्ती ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी लोक कायकाय खटपटी करतात हे त्यांनी जवळून पाहिले आणि एकदा त्यावर पदरमोड करून अनेक जणांची नावे देऊन एक पुस्तिकाच छापली आणि भरपूर लोकांना वाटली.

याची पौलस वाघमारे यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली.

एका व्यक्तीने त्यांच्यावर पुण्यात शिवाजीनगर कोर्टात बदनामीचा दावा दाखल केला, सुनावणी काही वर्षे चालली, वाघमारे यांच्या बाजूने निकाल लागला तर अर्जदाराने मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले, तिथेही वाघमारे यांच्या बाजूने निकाल लागला.

त्या अर्जदाराने सुदैवाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले नाही आणि वाघमारे यांची अशाप्रकारे या कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यांतून सुटका झाली.

त्यांचे एक वकील मित्र असलेल्या मराठी साहित्य परिषदेचे एक पदाधिकारी प्रमोद आडकर यांनी न्यायालयात वाघमारे यांची बाजू लढवली होती.

हे प्रकरण ऐकले तेव्हा खूप वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या असलेल्या एका साहित्यिकाने राबवलेल्या जोरदार प्रचार मोहिमेबद्दल वृत्तपत्रांत टीका वाचल्याचे आठवले.

उमेदवार असलेल्या त्या नामदार महोदयांनी चक्क विमानप्रवास दौरे केले होते असे काहीसे आठवते.

त्यानंतर लगेचच पौलस वाघमारे यांनी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली, तो पण एक वेगळाच किस्सा आहे. असो.

बीड येथे २०२३ साली पार पडलेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती संमेलनाचे अध्यक्षपद पौलस वाघमारे यांनी भूषवले.

तीन दशकांपूर्वी झालेल्या मालवणच्या संमेलनानंतर आतापर्यंत एकही संमेलनाला मी हजर राहिलो नाही आणि वाघमारे यांनी एकही संमेलन चुकवलेले नाही.

फादर दिब्रिटोंच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांच्या आग्रहास्तव मला ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या समितीत घेतले होते, मी एकाही बैठकीला गेलो नव्हतो.

ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे एक पदाधिकारी म्हणून वाघमारे यांची सगळीकडे मांडवात आणि मंचावरसुद्धा उपस्थिती असते.

आता होऊ घातलेल्या नाशिक येथील संमेलनाचे अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत आणि संमेलनाची तयारी करण्यात ते गर्क आहेत.

नंतरच्या भावी संमेलनांत एक माजी संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना सन्मान असणार आहेच.

तर सांगायचा मुद्दा असा कि पौलस वाघमारे साहित्य संमेलने असे प्रत्यक्ष जगत आले आहेत.

त्यांच्याकडे मराठी पुस्तकांचा मोठा साठा आहे, अनेक पुस्तके वाळवीला भक्ष्य पडली आहेत तरी रस्त्यावर नवनवी दुर्मिळ पुस्तके घेण्याची त्यांची हौस थांबत नाही.

विशेष म्हणजे पुस्तकांचा संग्रह बाळगणारे वाघमारे स्वतः ही पुस्तके वाचत नाहीत. त्यांना फक्त पुस्तक संग्रहाचा छंद आहे. काही हजार पुस्तके त्यांच्याकडे असतील.

त्यांची ही बाब आता कळल्यामुळेच त्यांना सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचे शिक्षक असलेल्या मिचेल दाम्पत्य आणि सिंथिया फरार यांचे माझे नवे पुस्तक काल मी त्यांना दिले नाही.

त्यांनी त्यांचा `व्यक्त सत्य' हा नवा लघुकथासंग्रह मला दिला, तो मात्र मी स्विकारला. अर्थात मी हे पुस्तक वाचणार आहे. कालच्या भेटीतील भर पावसात रस्त्यावर घेतलेला हा फोटो.

साहित्य वाचण्याऐवजी साहित्यिक आणि माणसे वाचण्याची, जोडण्याची त्यांची प्रचंड हौस आहे.

या साहित्य संमेलनांकडे मी फिरकत नसतो तसेच पत्रकार असलो तरीही नामवंत साहित्यिकांशी माझा कधी संबंधसुद्धा आलेला नाही.

माजी संमेलनाध्यक्ष असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हरेगावच्या मतमाऊलीच्या यात्रेसाठी प्रवचनाला आले होते तेव्हा शाळेत असताना त्यांना मी पहिल्यांदा ऐकले होते.

तेव्हापासून फादरांना मी जेमतेम तीनवेळा भेटलो. संभाषण असेल केवळ पाचसहा वाक्यांपुरते.

जवळपास अशीच बाब इतर साहित्य संमेलनाध्यक्षांबाबत.

वाघमारे यांचे अगदी याउलट आहे.

सत्यवान नामदेव सुर्यवंशी हे `अगा जे कल्पिले नाही' हे मराठीतले पहिले दलित आत्मकथन (साल १९७५) लिहिणारे लेखक. सिसिलिया कार्व्हालो यांनी आपल्या `प्रसादचिन्हे' या ग्रंथात हे स्पष्ट केले आहे.

पत्रकारितेची माझी सुरुवात मुळी स. ना. सूर्यवंशींच्या आपण साप्ताहिकातून झाली असे म्हणायला हरकत नाही.

श्रीरामपूरला मी दहावीत शाळेत असताना सूर्यवंशींच्या नाशिक येथल्या `आपण' साप्ताहिकात माझ्या दोन कथा बाल सदरात छापल्या होत्या आणि पाच-पाच रुपयांच्या दोन मनीऑर्डर्स पोस्टाने मला घरी पाठवल्या होत्या.

लिखाणाचा हा माझा पहिला मोबदला.

त्यानंतर दैनिकांत बातम्या लिहितच माझी संपूर्ण कारकिर्द झाली.

सूर्यवंशींचे अल्पचरित्र माझ्या `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांत आहे.

तर या सूर्यवंशींना मी एकदाच पाहिले आणि ऐकले, त्यांच्या निधनापूर्वी सहा महिने आधी पुण्यात २००० ला.

या सुर्यवंशी यांच्या भेटीचा वाघमारे यांनी एक अनुभव काल सांगितला तेव्हा मी थक्क होऊन मी ऐकत होतो.

वाघमारे यांचा संमेलने आणि साहित्यिक त्यांच्याबाबत असा अगदी समृद्ध अनुभव आहे

हे सर्वच कडूगोड अनुभव लिहिण्यासारखे नसले तरी त्यांव्याकडून ऐकण्यासारखे निश्चितच आहेत.

सन १८२७ पासून सुरु झलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षस्थानी थोर लोक राहिलीयेत,

`स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, स. ना. सूर्यवंशी, निरंजन उजगरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो ही त्यापैकी काही नावे.

पौलस वाघमारे या यादीतील अलीकडचे शेवटचे नाव.

या लोंकांसारखे आपण बुद्धिमान, थोर साहित्यिक नाही याची जाणीव वाघमारे यांना आहे. तरी संमेलनाध्यक्ष झाल्याबद्दल ते कृतार्थ आहेत.

अलीकडेच पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात सत्कार झाला. तिथे लोक त्यांच्याविषयी भरभरून बोलले.

लेखक, कवी आणि एक साधा, निर्मळ मनाचा माणूस म्हणून अनेक लोक पौलस वाघमारे यांना ओळखतात.

अशी माणसे विरळ असतात.

Camil Parkhe August 30, 2025