Did you like the article?

Showing posts with label Anupama Ujgare. Show all posts
Showing posts with label Anupama Ujgare. Show all posts

Sunday, December 17, 2023

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक

दिवाळी येण्याआधीच दसऱ्याचा मुहूर्त साधून दिवाळी अंकांचं प्रकाशन केलं जातं. तसं आतापर्यंत डिसेंबरच्या मध्यात कॅरोल सिंगर्स दारापर्यंत पोहोचण्याआधीच दोन नाताळ विशेषांक हाती पडले आहेत.

 मराठी साहित्य विश्वात दिवाळी अंकांना एक वेगळेच महत्त्व आहे. मोबाईल युग सुरु झाल्यापासून आणि त्यानंतरच्या समाजमाध्यमांचं सार्वत्रिकिकरणामुळं पुस्तकं आणि नियतकालिकं वाचणं कमी झालं असलं तरी याहीवर्षी अनेकांनी उत्साहानं दिवाळी अंक काढलीच.

आणि आता गडबड सुरु आहे ती ख्रिसमस विशेषांकांची.

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक काढण्याची परंपरा तशी खूप जुनी असली तरी याविषयी अनेकांना कदाचित माहिती नसेलही.
`निरोप्या' हे १९०३ साली जर्मन धर्मगुरु हेन्री डोरींग यांनी सुरु केलेले मासिक. पहिल्या महायुद्धाचा काही काळ वगळता आजतागायत प्रसिद्ध होते आहे, गेली काही वर्षे या मासिकाचा नाताळ विशेषांक प्रसिद्ध होतो. `निरोप्या' मासिक पुण्यातल्या स्नेहसदनमधून जेसुईट संस्था प्रसिद्ध करते. फादर भाऊसाहेब संसारे निरोप्याचे संपादक आहेत.
माझ्या लिखाणाची सुरुवातच मुळी 'निरोप्या'तून झाली. श्रीरामपुरात मी शाळेत असताना १९७४ साली.
`निरोप्या' च्या या नाताळ विशेषांकात महात्मा जोतिबा फुले यांना आपल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिकवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचे मी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध झाले आहे. महात्मा फुले अभ्यासकांना हे चरित्र उपयुक्त ठरु शकेल.

`ज्ञानोदय' हे मराठीतील सर्वात दीर्घायुष्य लाभलेलं नियतकालिक. स्थापना १८४२.
मराठीतलं पहिलं नियतकालिक बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली सुरु केलं होतं. डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी `ज्ञानोदया'ची संपादकाची धुरा घेतल्यानंतरचा हा पहिलाच नाताळ विशेषांक. कांतिश प्रभाकर तेलोरे अतिथी संपादक आहेत..

मराठी पत्रकारितेच्या आणि नियतकालिकांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेली मराठीतील सर्वांत जुनी असलेली ही दोन्ही नियतकालिके ही ख्रिस्ती संस्थांमार्फत चालवली जातात हे विशेष.
अर्थात या संस्थांचं पाठबळ हे यामागचे प्रमुख कारण.
यापैकी निदान `निरोप्या' तरी स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे हे या अंकाच्या रंगीत आणि कृष्णधवल जाहिरातींतून दिसते.
वसईतून प्रसिद्ध होणाऱ्या `सुवार्ता' मासिकाचा सुद्धा नाताळ विशेषांक असतो. फादर डॉ अनिल परेरा `सुवार्ता'चे संपादक आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो अनेक वर्षे - जवळजवळ पंचवीस वर्षे - सुवार्ताचे संपादक होते.
इतर नाताळ विशेषांक आणि या नियकालिकांचे संपादक पुढीलप्रमाणे आहेत
*सुवार्ता* (मासिक) - फा. (डॉ.) अनिल परेरा संपादक आहेत
*कादोडी* (वार्षिक) - ख्रिस्तोफर रिबेलो संपादक आहेत
*ख्रिस्तायन* (ऑनलाइन नाताळ अंक) - ख्रिस्तोफर रिबेलो संपादक आहेत
*गीत* (वार्षिक नाताळ अंक) - लेस्ली डायस संपादक आहेत
*जनपरिवार* (साप्ताहिक) - अँड्र्यू कोलासो संपादक आहेत
*कॅथॉलिक* (त्रैमासिक) - स्टीफन आय परेरा संपादक आहेत
*निर्भय आंदोलन* (द्वैमासिक) - मनवेल तुस्कानो संपादक आहेत.
दयानंद ठोंबरे हे नव्वदच्या दशकापासून माझे सहकारी, मी पुण्याला इंडियन एक्सप्रेसमध्ये १९८९ ला रुजू झालो आणि लवकरच ठोंबरेसुद्धा एक्सप्रेस ग्रुपच्या लोकसत्ता दैनिकात आले. माझ्या अनेक मराठी पुस्तकांचे ते पहिले वाचक, ही पुस्तकं त्यांच्या चिकित्सक नजरेखालून गेली आहेत. गेली अकरा वर्षे दयानंद ठोंबरे अलौकिक या नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत. काही वर्षांपूर्वी एका विशेषांकासाठी मी लिहिलेही आहे.
पिंपरी चिंचवड येथील फ्रान्सिस गजभिव गेली सात वर्षे 'शब्द' नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत. या विशेषांकात वैचारीक, ललित, कविता वगैरे विविध साहित्य प्रकार असतात.
नव्या डिजिटल युगात काही ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन असतात.
गेली ११ वर्षे प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) ह्या स्वरुपात वसई येथून ‘कादोडी’ अंकाचे प्रकाशन ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांच्या संपादानाखाली होत आहे. या अंकांची जन्मकथा संपादक ख्रिस्तोफर रिबेलो यांच्याच या शब्दांत: .
``एका फेसबुक ग्रुपवर काही साहित्यप्रेमींची एकत्र येण्याविषयी चर्चा झाली, त्यानंतर “कुपारी कट्टा” या त्यांच्या स्थानिक समाजाच्या नावाने ते महिन्याला एकदा एकत्र भेटू लागले, जमणारे सर्व साहित्यप्रेमी हे एकाच, “कुपारी” समाजाचे आणि “कादोडी” (वसईच्या उत्तर पट्ट्यातील सामवेदी कुपारी समाजाची बोलीभाषा) ही एक भाषा बोलणारे असल्यामुळे ह्या भाषेच्या उद्धारासाठी काहीतरी केले पाहिजे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यातच ह्या भाषेच्या साहित्याला वाव देणारा अंक प्रकाशित करण्याची कल्पना पुढे आली.
“कादोडी” या भाषेला व्याकरण नाही, या भाषेत उत्तम गोडवा आहे, खूप सुंदर अशा कथा आहेत, अनेक प्रकारची गीते आहेत, पण हे सगळे मौखिक स्वरुपात आहेत. नव्या पिढीला हे सगळे अज्ञात आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचविता यावे, तसेच मौखिक स्वरुपात स्वरुपात असलेला साहित्याचा खजिना कुपारी समाजाच्या तळागाळात नेता यावा तसेच तरुण वर्गात आपल्या भाषेत नवीन लिहिण्याची आवड निर्माण व्हावी आणि यादृष्टीने प्रयत्न व्हावेत म्हणून गेली ११ वर्षे प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) ह्या स्वरुपात ‘कादोडी’ अंकाचे प्रकाशन ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांच्या संपादनाखाली होत आहे. ''
यावर्षी काही दिवाळी अंकात मी लिहिलं आहे, तसंच एका नाताळ अंकातही माझा एक लेख असणार आहे.
नेहेमीप्रमाणं इथं मी नंतर तो टाकणार आहेच. लेखाचा विषय अगदी वेगळाच आहे, इथं टाकल्यावर मी काय म्हणतो यावर तुमचंही कदाचित एकमत होईल.
दिवाळी अंकांतून जशा मोठ्या आर्थिक उलाढाली होतात तशाच या नाताळ अंकांतून सुद्धा होतातच.
अपवाद काही हौशी संपादकांचा जे निव्वळ निखळ आनंदासाठी आपलं काम, नोकरी सांभाळून यासाठी वेळ देत असतात. आणि नाताळाच्या सणानिमित्त वैचारिक फराळ पुरवत असतात.
पंचवीस डिसेंबर तोंडावर आला आहे. नाताळची तयारी घरोघरी होत आहेत. काही नाताळ विशेषांक गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले आहेत.
या दिवसांत आणि या क्षणाला यापैकी अनेक नाताळ विशेषांकांचे संपादक अक्षरशः लगीनघाईत असतील. त्यांच्याशी फोनवर संवाद साधताना हे लक्षात आले.
ख्रिसमसबरोबरच या नाताळ विशेषांकांचीही मी वाट पाहत आहे.


Camil Parkhe 

Wednesday, November 2, 2022

धर्मांतर कशासाठी ? आत्मसन्मानासाठी कि विद्रोहासाठी ?  



अलीकडच्या काळात धर्मांतर हा कायद्याच्या दृष्टीने फार मोठा गंभीर गुन्हा केला गेला असला आणि धर्मांतर (धाकटपटश्यानं, आमिषानं वगैरे वगैरे .) घडवून आणणाऱ्या व्यक्तीला मोठी शिक्षा होत असली तरी मानवी इतिहासात शतकोनुशतको धर्मांतरे होत आली आहेत. अव्वल इंग्रजी अमदानीत देशभर भल्याभल्या लोकांना ख्रिस्ती धर्माने आकर्षित केलं होतं. धर्मांतरांची कारणं मात्र व्यक्तिगणिक आणि समाजागणिक वेगवेगळी होती. पंडिता रमाबाई आणि नारायण वामन टिळक अशा संस्कृत पंडितांनी ख्रिस्ती धर्म कवटाळला त्यामागची कारणं वेगळी आणि समाजातील बहिष्कृत घटकांनी हा धर्म सामुदायिकरीत्या स्वीकारला यामागची कारणं पूर्णतः वेगळी होती.
केरळमधल्या नाडर समाजाने ख्रिस्ती धर्म का स्वीकारला यामागच्या सामाजिक कारणांची समाजमाध्यमात चर्चा झाली. थोड्याबहुत अशाच कारणांनी महाराष्ट्रात आणि देशातील इतर प्रदेशांत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथे जर्मन जेसुईट फादर ओटो वाईसहौप्ट हे हातात घंटी घेऊन गावातल्या मुलांना आपल्या शाळेत शिकण्यासाठी बोलावत असत. काळ होता १८९२चा. विशेष म्हणजे ही शाळा समाजातल्या सगळ्या घटकातील मुलांमुलींसाठी खुली होती, महार, मांग, चांभार आणि धनगर यांच्यासाठीसुद्धा !
असाच प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात फ्रेंच धर्मगुरु फ्रांसलियन फादर गुरियन जाकियर यांच्या घोगरगावच्या आणि आजूबाजूंच्या शाळांत होता. संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात त्याकाळात हजारो कुटुंबांनी सामुदायिकरीत्या ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला याबद्दल मग आश्चर्य कसले ?
पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात, मराठवाड्याच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत एकोणिसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात सामुदायिक धर्मांतरे झाली. त्यामागे केवळ आध्यात्मिक प्रेरणा होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पंडिता रमाबाई, रेव्ह्. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक, रेव्ह. नीळकंठशास्त्री नेहेम्या गोर्हे, बाबा पदमनजी वगैरे सुशिक्षित व्यक्तींच्या धर्मांतरात अध्यात्मिक परिवर्तन घडले हे नि:संशय. अस्पृश्य जातीजमातींच्या सामुदायिक धर्मांतराबाबत मात्र असे म्हणता येणार नाही.
ज्या लोकांच्या वैयक्तिक वा सामाजिक जीवनात देव-धर्म, देऊळ, धर्मग्रंथ या संकल्पनांना कधीही प्रवेश नव्हता, अशा समाजातून वाळीत टाकलेल्या लोकांनी ख्रिस्ती धर्माचे अध्यात्म आधी समजून घेऊन नंतर हा धर्म स्वीकारला असे म्हणणे वास्तव्यास धरून होणार नाही.
धर्मांतरे का होतात? आपल्या वाडवडिलांपासून आलेला धर्म सोडून दुसरा धर्म कवटाळण्याची पाळी एखाद्या व्यक्तीवर वा समाजावर का येते? व्यक्तीगत धर्मांतर अर्थातच पूर्णत: त्या व्यक्तीशी संबंधीत असलेल्या मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. मात्र जेव्हा एखादा मोठा समूह आपला धर्म सोडून दुसर्या धर्मात जातो, त्यावेळी या धर्मांतरामागची कारणे समजून घेणे आवश्यक ठरते. .
धर्मांतरामागची कारणे आणि प्रेरणा यांचे अविनाश डोळस यांनी पुढील शब्दांत विश्लेषण केले आहे.
“धर्मांतर हा आपल्या देशातील एक युगा-युगापासून चालत आलेला प्रयोग आहे. हिंदू धर्माच्या जाचाला कंटाळून आपल्या उध्दारासाठी अनेकांनी धर्मांतर केले आहे. मुस्लिम राजवटीत अस्पृश्यांतील बहुसंख्य लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारून समतेकडे धाव घेतली. त्याचप्रमाणे ब्रिटिश राजवटीत अनेकांनी जातीव्यवस्थेने दिलेले नीचपण झुगारून त्यातून मुक्त होण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. अनेक आदिवासी लोकांनीही शिक्षणासाठी, आपुलकीच्या मिळणार्या वागणुकीसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. मिशनरी लोकांनी उपेक्षित, गरीब लोकांसाठी डोंगरदर्यात शाळांची स्थापना करून त्यांच्यापर्यंत शिक्षण नेऊन एक ऐतिहासिक कार्य केले आहे. या सार्यांचा परिणाम म्हणून भारतात अधिकाधिक दलित, आदिवासी मंडळी ख्रिस्ती झाली आहेत. ” 1
दुसर्या एका लेखात डोळस यांनी असे म्हटले आहे: ”वेगवेगळ्या राजवटीतील धर्मांतराचा संदर्भ बदलला तरी त्यामागील धर्मांतरितांची भावना एकसारखीच राहत आली आहे. जातिव्यवस्था, अस्पृश्यता, शूद्र या जोखंडातून मुक्त होण्यासाठी लोकांनी धर्मांतरे केली. कधी ते मुस्लीम झाले, कधी ते ख्रिश्चन झाले. नंतर डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. समतेची शिकवण व वागणूक जेथे मिळेल त्या धर्माला आपलेसे करून या लोकांनी प्रस्थापित धर्माविरुध्दचा आपला निषेध नोंदविला आहे.”2
महाराष्ट्रातील वा इतर कुठल्याही ठिकाणी सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे अद्यात्मिक परिवर्तनाने झाली असा दावा खुद्द ख्रिस्ती धर्मगुरू किंवा चर्चही करत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील प्रेषितकार्याचा इतिहास लिहिणार्या फादर डॉ ख्रिस्तोफर शेळके यांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे:
”कॅथोलिक श्रध्देचा निरनिराळ्या भागात कसा प्रारंभ झाला हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. क्वचित प्रसंगीच अध्यात्म्याने सुरूवात झालेली दिसते असे खुद्द पवित्र शुभसंदेशातही आपल्याला दुसरं दिसत नाही. लोक येशूच्या भोवती गर्दी करू लागले. कारण त्याने आजार्यांना बरे केले, मेलेल्यांना पुन्हा उठविले, अशुध्दांना त्याने शुध्द केले आणि भाकरी वाढविल्या. लोकांचा जमाव त्याच्याकडे आल्यानंतरच त्याने त्यांचे लक्ष शाश्वत मुल्यांकडे ओढून घेतले. ”तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवता म्हणून तुम्ही माझ्याकडे आला असे नाही, तर मी तुम्हांला भाकर दिली म्हणून तुम्ही आलात.” त्यानंतरच मग येशू अध्यात्म्याकडे वळून ’नश्वर अन्नासाठी झटू नका. त्याऐवजी चिरकालीन अन्नासाठी प्रयत्न करा’ असे त्या लोकांना सांगतो.”3 ख्रिस्ती मिशनरींनी सर्वप्रथम भुकेल्या लोकांची भूक भागविली, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले आणि नंतरच ते अध्यात्म्याकडे वळाले. ’आधी पोटोबा, मग विठोबा’ अशी म्हण या भागात प्रचलित आहे. ती म्हण या मिशनरी लोकांनी आपल्या प्रेषितकार्यात प्रत्यक्षात उतरविली.
धर्मांतरामागची कारणमीमांसा स्पष्ट करताना एकोणिसाव्या शतकात सामाजिक अन्यायाचे, छळवणुकीचे बळी ठरलेल्या दलित समाजाच्या दृष्टीने ख्रिस्ती मिशनरी देवदूतच ठरले असे नाशिकच्या फिलोमिना बागूल यांनी म्हटले आहे.
त्या म्हणतात: ” मिशनरींनी आम्हाला ख्रिस्ताबरोबर ऐहिक सुखाचा मार्ग दाखविला. दोन हजार वर्षापुर्वी प्रभू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, मिशनरींनीही आमच्यासाठी अनेक चमत्कार केले. त्यानी प्रतिकूल परिस्थितीत केलेले कार्य कोणत्याही चमत्कारापेक्षा क़मी नव्हते. प्रभू ख्रिस्ताने लोकांना जेवण देऊन तृप्त केले. त्याचप्रमाणे मिशनरींनी अनेकांना अन्न देऊन तृप्त केले. प्रभू ख्रिस्ताने अंधांना दृष्टी दिली,त्याचप्रमाणे मिशनरींनी ज्ञान देऊन आम्हाला नवदृष्टी दिली. प्रभू ख्रिस्ताने मुक्यांना वाचा दिली, त्याचप्रमाणे मिशनरींनी हजारो वर्षे वाचा बंद असलेल्या आम्हाला वाचा दिली. ख्रिस्ताने दुखणाइतांना बरे केले, तद्वत मिशनरींनी औषधोपचारांनी रोग्यांना बरे केले. प्रभू ख्रिस्ताने मेलेल्यांना जिवंत केले. मिशनरींनी मृत्युपंथास टेकलेल्यांना जीवदान दिले. मिशनरींचे हे कार्य आमच्यासाठी एकाएका मोठ्या चमत्काराप्रमाणेच होते. मिशनरींनी आम्हाला क़ाय दिले नाही? त्यांनी आम्हाला विश्वास दिला, प्रेम दिले, धर्म दिला, भाकर दिली, आत्मविश्वास दिला, स्वाभिमान दिला, आत्मसन्मान दिला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उच्चवर्णिर्याच्या गुलामगिरीतून मुक्त करुन आमचा कोंडलेला श्वास मुक्त केला.”4
उच्चवर्णियांनी पायंदळी तुडवलेल्या, रोजची भाकरी मिळवण्यासाठी धडपडणार्या अस्पृश्य लोकांना परदेशी मिशनरींनी मायेने जवळ केले. दुष्काळाच्या आणि दोन महायुध्दांच्या काळात आणि इतरही वेळी अन्नपाणी, कपडालत्ता पुरवला. गावाच्या वेशीबाहेर हाकललेल्या या दलित लोकांच्या दृष्टीने तर हे मिशनरी देवदूतच ठरले. या मिशनरींनी दाखवलेल्या देवाचा, धर्माचा आणि ग्रंथाचा त्यांनी कुठल्याही शंकाकुशंका न काढता स्वीकार केला. अशाप्रकारे अनेक गावांतील सर्वच्या सर्व महार वा मांग कुटुंबे काही वर्षांच्या काळात ख्रिस्ती झाली.
गोव्यात ज्या पध्दतीने धर्मांतर झाले तसे महाराष्ट्रात झाले नाही असे अनुपमा उजगरे यांनी म्हटले आहे. ” कोणी बाप्तिस्मा द्या म्हटलं तर मिशनरी त्याला आतून पारखून घेत. तसंच, बाहेर काही काळंबेरं तर नाही ना हेही तपासून बघत. जातिभेदाच्या छळापायी जीव मेटाकुटीला आलेल्या तळागाळातल्यांना, मिशनरींनी देऊ केलेल्या जीवनस्तराचा मोह झाला. त्यामुळे सामूहिक धर्मांतरंही झाली.’‘5
’कॅथोलिक मिशनरींकडे लोक प्रथम वळले ते धर्म भावना मनात ठेवून नव्हे’ असे पुण्यातील सेंट विन्सेंट स्कूलचे माजी प्राचार्य फादर केनेथ मिस्किटा आणि फादर थॉमस साळवे यांनीही ’जेसुईट 2005’ या वार्षिक अंकात स्पष्ट म्हटले आहे.
मिशनरींकडे वळण्याचा त्यांचा हेतू पोटापाण्याचा व सामाजिक मानसन्मान हा होता असे या धर्मगुरूंनी म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे ऐहिक आणि सामाजिक प्रश्न हाताळण्याचा मिशनरींनी प्रयत्न केला. अहमदनगर हा कायमचा दुष्काळी जिल्हा. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेसाठी मिझरियोर, कारितास, सीआरएस यासारख्या सेवाभावी संस्थांच्या मदतीने मिशनरींनी विहिरी खोदण्यास, पंप आणि बियाणे खरिदण्यास स्थानिक लोकांना मदत केली. सामाजिक आणि धार्मिक कामांची गल्लत होऊ नये, आध्यात्मिक बाबींकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून सामाजिक कामांसाठी प्रथम श्रीरामपूर येथे आणि नंतर अहमदनगर येथे सोशल सेंटरची स्थापना करण्यात आली.
लोकांच्या गरजा भागवून, त्यांच्याविषयी आस्था दाखवून जर्मन आणि एतद्देशीय येशूसंघीय व्रतस्थांनी येथील लोकांची श्रध्दा जोपासली. ’प्रारंभी शाळेसाठी एकही विद्यार्थी मिळत नसे. पण आज नगर जिल्ह्यातील येशूसंघीयांच्या व धर्मप्रांतियांच्या शाळात हजारो काथोलिक व अख्रिस्ती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.पहिल्या महायुध्दाच्या सुरुवातीस नगर जिल्ह्यात 10,000 ख्रिस्ती होते व फक्त चार मिशन स्टेशन होती. आज वीस मिशन स्टेशन आहेत व 60,000 ख्रिस्ती लोकांची व अख्रिस्ती जनतेची आध्यात्मिक व ऐहिक गरज भागविली जाते,” असे फादर मिस्किटा आणि साळवे यांनी या लेखात म्हटले आहे.6
धर्मांतरामागची कारणे काहीही असोत, ही सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक मोठी सामाजिक क्रांती होती. प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्दचा तो एक मोठा विद्रोह होता. त्यावेळच्या अन्याय्य स्थितीतून सुटका करून घेण्याचा धर्मांतर एक मार्ग होता.
विशेष म्हणजे या दलितांना मुक्तीचा हा मार्ग दाखविणारा त्यांच्यामध्ये कुणीही मोझेस नव्हता. एका गावात एक धर्मांतर झाले आणि त्या धर्मांतराचे ऐहिक, सामाजिक आणि आर्थिकही फायदे त्याच्या नातेवाईकांना, भाऊबंदांना लक्षात आले आणि त्यांनीही तोच मार्ग पत्करला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतराची ही लाट महाराष्ट्रात वर नमूद केलेल्या जिल्ह्यांत चालू राहिली.
खेड्यापाड्यांत, आडवळणाच्या छोट्याशा वस्तींवर अहिंसेच्या मार्गाने अगदी संथपणे झालेल्या या क्रांतीची त्यावेळच्या उ?वर्णियांनी साधी दखलही घेतली नाही. या सामाजिक क्रांतीमागची बहुविविध कारणे, त्याचा समाजाच्या इतर घटकांवर झालेला परिणाम आणि वरच्या जातींच्या अरेरावीस आणि सर्वच क्षेत्रांतील मक्तेदारीस अनेक शतकांनंतर पहिल्यांदाच मिळालेले आव्हान याचे समाजशास्त्रज्ञांनी व इतर संशोधकांनी आतापर्यंत विश्लेषण केलेले नाही.
हे धर्मांतर रोखण्यासाठी त्या अस्पृश्य जातींना त्यांना हवा तो आत्मसन्मान द्यावा किंवा अन्याय्य समाजव्यवस्था बदलावी असेही त्यावेळच्या समाजधुरिणांना वाटले नाही.
त्यानंतर काही वर्षांनंतर येवल्यात 1935 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची गर्जना केली तेव्हाही हे सामुदायिक धर्मांतर रोखण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीच. धर्मांतराच्या घोषणेनंतर अखेरीस दोन दशकांनंतर बुध्द धर्माचा स्वीकार करून डॉ आंबेडकरांनी आणि त्यांच्या अनुयायांनी एक अभिनव सामाजिक स्थित्यंतर घडवून आणले.
संदर्भ:
1) अविनाश डोळस, ”आंबेडकरी चळवळ: परिवर्तनाचे संदर्भ” , सुगावा प्रकाशन( पान 46), 2) उपरोक्तप्रमाणे, (पान 136)
3) फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके, ’ निरोप्या’ मासिक, ऑक्टोवर 1977 (पान क्रमांक 33)
4) फिलोमिना बागूल, ’मिशन कार्य 150 वर्षे: सामाजिक विकास’, नाशिक कॅथोलिक धर्मप्रांत स्मरणिका (1878-2003), पान 23)
5) डॉ. अनुपमा उजगरे, ’मराठी प्रोटेस्टंट ख्रिस्ती समाज’, प्रकाशक: ग्रंथाली ज्ञानयज्ञ, , (पान 22)
6) ’जेसुईटस 2005’, इयर बुक ऑफ द सोसायटी ऑफ जिझस, प्रकाशक : सोसायटी ऑफ जिझस, (पान 135), आणि ’ निरोप्या’ मासिक, फेब्रुवारी 2005 (पान 26)
^^^
(गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज - लेखक कामिल पारखे , चेतक बुक्स, पुणे मधील एक प्रकरण _