Did you like the article?

Showing posts with label Portugal. Show all posts
Showing posts with label Portugal. Show all posts

Friday, May 2, 2025

 सायमन मार्टिन

वसईची पहिल्यांदा ओळख झाली ती शालेय पाठ्यपुस्तकातून. चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेला अरबी समुद्रकिनारचा वसईचा किल्ला जिंकून घेते असा इतिहासातील तो एक धडा होता.
त्याआधी वसई येथे सत्ता असलेल्या पोर्तुगीजांनी सात बेटांचे मुंबई बंदर ब्रिटिशांना लग्नात चक्क आंदण किंवा हुंडा म्हणून दिले होते आणि या घटनेने कालांतराने भारतीय उपखंडाचा इतिहास बदलला होता.
लहानपणापासून वसई डोक्यात राहिली होती ती अशा पाठ्यपुस्तकातील नोंदीतून.
नंतर `फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची वसई' अशी एक नवी ओळख निर्माण झाली.
तर या वसईशी नंतर माझे घट्ट ऋणानुबंध निर्माण होतील असे कधी वाटलेही नव्हते, मात्र पुण्यातील मॉडेल कॉलनीतील विद्याभवन शाळेचे प्रिंसिपल फादर नेल्सन मच्याडो यांच्यामुळे असे झाले.
त्यामुळे गेली तिसेक वर्षे वर्षातून किमान एकदा माझी वसईला भेट असतेच.
मागच्या महिन्याअखेरीस पुन्हा एकदा वसईला तीन दिवसांचा दौरा झाला. आम्ही दोघेही गेलो होतो.
आणि यावेळचे निमित्त होते सायमन मार्टिन यांच्या " आत्म्याचे संगीत" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि मार्टिन यांनी २३ फेब्रुवारीला आयोजित केलेला तेरावा वसई साहित्य आणि कला उत्सव.
वसई आणि साहित्य व कला यांचे अत्यंत घट्ट नाते आहे.
तसे पाहिले तर पालघर जिल्ह्यात येणारा वसई हा एक तालुकावजा परीसर. मात्र या चिमुकल्या परिसराचा एक आगळावेगळा ऐतिहासिक अन सांस्कृतिक वारसा आहे.
गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश साडेचार शतके पोर्तुगीजांची वसाहत होता.
त्याचप्रमाणे अरबी समुद्राला लागून असलेला वसई परीसरसुद्धा अनेक वर्षे पोर्तुगालची वसाहत होता.
वसईतला एके काळी बहुसंख्येने असलेला कॅथोलीक किंवा ख्रिस्ती समाज या पोर्तुगालच्या राजवटीचा एक परिणाम.
१९६१ च्या गोवा मुक्तीनंतरसुद्धा तिथल्या निज गोंयकारांच्या तीन पिढयांना पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरीकत्व घेता येतो. यासाठी आजही भली मोठी रांग असते.
वसई काही शतकांआधीच पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त झाल्याने वसईतील लोकांना मात्र ही सुविधा नाही. .
मराठी ख्रिस्ती उपासनेत म्हणजे मिस्साविधींत मराठी गायने पेटी, तबला, किबोर्ड आणि गिटार वगैरे वाद्यांच्या सुरांत ऐकावी तर वसई येथेच. रविवारी आणि सणावारी देवळांत फादरांचे मराठीतील प्रवचनसुद्धा.
इथल्या कॅथोलीक समाजाने महाराष्ट्रातील मराठी साहित्य, आणि संस्कृती बहुविध आणि समृद्ध करण्याचे मोठे योगदान दिले आहे.
वर्षभर वसईत जितके साहित्यिक आणि सांस्कृतिक मेळावे आणि उत्सव होत असतात तितके मला वाटते महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही अशा छोट्याशा परिसरात होत नसतील.
सायमन मार्टिन यांच्या साहित्य मेळाव्यास हजर राहून मी परतत होतो तेव्हाच दुसऱ्या एका साहित्य मेळाव्याचे फलक माझ्या नजरेस पडले होते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मराठी साहित्यातील योगदान सर्वश्रुत आहे.
वसईतील इतर ज्येष्ठ साहित्यिकांमध्ये विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो, फादर फ्रान्सिस कोरीया, सिसिलिया कार्व्हालो, फादर मायकल जी. आणि कवी तसेच हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असलेल्या सायमन मार्टिन यांचा समावेश करता येईल.
नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर वसई परिसरातील एका अनोख्या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.
बिल्डरांच्या विळख्यातून हिरवाईने नटलेल्या वसईचे संरक्षण करावे या हेतूने सुवार्ता मासिकाचे संपादक असलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हरीत वसई हे आंदोलन सुरु केले होते तेव्हा या आंदोलनात सायमन मार्टिन खूप सक्रिय होते.
बिल्डर माफियाकडून जिवाला धोका पोहोचण्याची जोखीम पत्करून हे आंदोलन दीर्घकाळ चालू राहिले आणि काही प्रमाणात तरी वसई आजही हरीत राहिली आहे.
वसईच्या विविध गावांत फेरफटका मारताना तिथली हिरवाई आजही मला खूप आनंदीत करते आणि त्यावेळी हरीत वसई आंदोलनाची आपसूक आठवण येते.
सायमन मार्टिन गेली अनेक वर्षे भुईगाव डोंगरी येथील सहयोग केअर सेंटरच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. त्याशिवाय साहित्यिक आणि कार्यकर्ता म्हणून त्यांची लेखणी आणि वाणीसुद्धा परजत असते .
"आत्म्याचं संगीत " हा त्यांचा अकरावा काव्यसंग्रह.
एका बैठकीतून वाचून व्हावा असा हा काव्यसंग्रह आहे आणि त्यातील सर्वच कविता तर फक्त सात आठ ओळींच्या आहेत मात्र या कविता खूप आशयपूर्ण आहेत,
माझ्यासारखा कवितेशी फारसा किंवा काहीही संबंध नसलेला माणूससुद्धा सायमन मार्टिन यांच्या कविता असलेला हा छोटासा संग्रह एकदा हातात घेतल्यानंतर पूर्णतः वाचून मगच खाली ठेवतो.
सायमन मार्टिन यांच्या कवितांची अशी ताकद आहे.
अष्टगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाचे सुरेख मुखपृष्ठ आणि आतील चित्रे प्रदीप म्हापसेकर यांची आहेत.
या वसई भेटीच्या निमित्ताने आतापर्यंत फक्त इथेच नेहेमी भेटणारे सॅबी परेरा, ख्रिस्तोफर रिबेलो, इमेल अल्मेडा, जेरोम सायमन फर्गोज अशा अनेकांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली. साहजिकच फोटो सेशनही झाले.
साहित्य उत्सव संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी निवांतपणे सायमन मार्टिन यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही झाली.
त्या भेटीगाठी आणि चर्चेसंबंधी नंतर कधीतरी.

Thursday, December 21, 2023

 फ्रान्सिस्को लुईस गोम्स

गोव्यात पणजीला तुम्ही गेला तर दयानंद बांदोडकर मार्गावर कला अकादमीजवळ कंपाल गार्डनमध्ये एक पूर्णाकृती पुतळा दिसतो.
पणजीत असे पुतळे फार कमी आहेत, पोर्तुगीज वसाहतीच्या खुणा असलेल्या बहुतेक जुन्या पुतळ्यांची रवानगी खूप वर्षांपूर्वी वस्तूसंग्रहालयात करण्यात आली आहे.
आदिलशहा पॅलेस किंवा जुन्या सेक्रेटरीएटजवळ असलेला ऍबे फरिया यांचा पुतळा त्यातून वाचला, तसाच कंपाल गार्डनमधला हा पुतळासुद्धा.
दोन्हीबाबत कारण एकच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या दोन्ही व्यक्ती `निज गोंयकार' आहेत.
पणजीला नेहेमी येणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तींचे कंपाल गार्डनमधील या पुतळ्याकडे सहसा लक्ष नाही. अनेक वर्षे मी मिरामार बिचजवळ आणि नंतर ताळगावला राहिलो, बसने आणि दुचाकीने येता-जाताना या पुतळ्याविषयी कुतूहल वाटायचे.
अगदी गोव्यातील अनेक लोकांनासुद्धा या फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याविषयी फार माहिती असण्याची शक्य कमीच आहे. हा पुतळा शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९२९ साली पोर्तुगाल राजवटीतच गोम्स यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उभारला गेला होता.
गोव्यात आणि भारताच्या इतर भागांत पोर्तुगालची साडेचारशे वर्षे सत्ता होती. या काळात गोव्यातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क होते.
पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून लिस्बनला दोनदा गेले होते.
त्यानंतर कितीतरी वर्षांनी म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीला दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश संसदेचे सदस्य म्हणून निवडले गेले होते.
नौरोजी हे ब्रिटिश संसदेवर निवडून गेलेले एकमेव भारतीय. त्यानंतर ब्रिटिश भारतात स्थानिक संसदीय मंडळे स्थापन झाली.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स ( `फ्रान्सिश्कु लुईश गॉमीश' असा पोर्तुगीज भाषेत उच्चार) यांच्याप्रमाणेच अनेक गोमंतकियांना पोर्तुगाल संसदेचे सदस्य होण्याचा सन्मान मिळाला, काही जण पोर्तुगीज मंत्रीमंडळात होते.
सद्याचे पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनिओ कोस्टा ( पोर्तुगीज भाषेत आंतोनियु कॉश्ता) तर मूळचे गोंयकार, मडगावचे.
काल पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तिथे ओलिव्हियानो जे एफ गोम्स (ओलीव्हिन्यु गॉमीश) यांनी फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे लिहिलेले, नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले, हे चरित्र दिसले आणि पटकन विकत घेतले.
वाचल्यानंतर लिहिन त्यांच्यावर.
आज डिसेंबर १९ गोवा मुक्तीदिन.. गोंय मुक्ती दिसाची परबीं....
Camil Parkhe

Friday, July 14, 2023


Portugal Citizenship: फक्त गोवेकरांनाच नाही इतर भारतीयांना सुद्धा पोर्तुगालच्या नागरीकत्वाची संधी

Portugal citizenship for Indian: गोव्यातल्या, तसेच दमण आणि दीव, दादरा, नगर हवेली इथल्या `काही' नागरिकांना, - सर्वांना नव्हे -  पोर्तुगालचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आजसुद्धा मिळू शकतो. मी वर नमूद केलेले प्रदेश एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती होत्या, पोर्तुगाल इंडियाचे भाग होते.दिनांक १९ डिसेंबर १९६१ ला पोर्तुगालची भारतातली सत्ता   संपृष्टात आली,.       

 मात्र १९६१ पूर्वी या पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना आणि त्यांच्या पुढच्या तीन पिढींतील लोकांना आजही पोर्तुगीज नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळू शकते, पोर्तुगालच्या कायद्यानुसार तो त्यांचा एक हक्क आहे. खूप काळापूर्वी म्हणजे  सतराव्या शतकात पोर्तुगीजांचे राज्य असलेल्या वसईतील किंवा पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या  आणि ब्रिटिशांना लग्नात आंदण म्हणून मिळालेल्या सात बेटांच्या मुंबईतील लोकांना अर्थात ही सुविधा मिळणार नाही .

गोवा आणि पोर्तुगीजांची जुन्या वसाहती असलेल्या भारतातील इतर प्रदेशांतील अनेक लोकांनां माहित नसलेला हा विषय आता चर्चेला  आला आहे. तसे गोव्याबाबत इतर भारतीयांना अनेक गोष्टी माहित नसतात, जसे कि २०२४ च्या निवडणुकीसाठी धार्मिक ध्रुवीकरणाच्या उद्दिष्टाने भाजपतर्फे चर्चेला आणला गेलेला  युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा इथे गेली एक शतकापासून विनातक्रार अंमलात आहे ! 

पोर्तुगालने आपल्या जुन्या वसाहतीतील लोकांना किंवा त्यांच्या वंशजांना  पोर्तुगालचे नागरिकत्व बहाल करण्याचा हा विषय आता चर्चेला येण्यासाठी एक निमित्त घडले आहे. आयरिश रॉड्रिग्स या गोव्यातील कार्यकर्ता आणि वकील असणाऱ्या व्यक्तीने लिस्बन येथील आपल्या भेटीत पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरिकत्व  स्वीकारले आणि गोव्यात आणि भारतात या चर्चेला नव्याने तोंड फुटले.

इंडियन एक्सप्रेसने अलीकडेच म्हणजे २७ जून २०२३ ला  पान एकवर अँकरची बातमी या विषयाला धरुन छापली होती.  बातमीचा मथळा होता :

Of 70,000 surrendered passports in Idia in a decade, 40% were in Goa 

तर हे आयरिश रॉड्रिक्स नक्की आहेत तरी कोण कि ज्यांच्या नागरिकत्व बदलाच्या निमित्ताने या मुद्द्यावर राष्ट्रपातळीवर चर्चा व्हावी?

पणजीतल्या मिरामार समुद्रकिनारी असलेल्या धेम्पे कॉलेजात सत्तरच्या दशकात मी बीए च्या पहिल्या वर्षाला होतो, तेव्हा  एक चष्माधारी,कुरळ्या केसांचा आयरीश बारावीला होता. मी कॉलेजच्या आर्ट सर्कल या भित्तिपत्रकाचा संपादक होतो, कॉलेजच्या स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सक्रिय होतो आणि त्यामुळे कॉलेजच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये  आणि अख्ख्या स्टाफमध्ये  पूर्ण परिचित होतो.  कॉलेजच्या वेगवेगळ्या शाखांतील आणि वर्गातील विद्यार्थ्यांशी/ विद्यार्थिनींशी माझाही संपर्क असायचा.

तर तेव्हा हा बंडखोर स्वभावाचा हा मुलगा लक्षात राहिला. नंतरच्या काळात गोवा आणि द नवहिंद टाइम्स सोडून मी पुण्याला आलो, इथल्या इंग्रजी दैनिकांत कामालालागलो तरी  आयरीशचे  नाव गोव्यातल्या बातम्यांतून वाचत राहिलो.

मागे काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमांवर मी त्याच्यावर लिहिले होते. विषय राष्ट्रपातळीवरचा होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणीयांच्या मुलीच्या संदर्भात गोव्यातल्या एका हॉटेलच्या परमिटबाबत वाद होता आणि सामाजिक कार्यकर्ता तसेच वकील या नात्याने आयरीश रॉड्रीक्सने हा मुद्दा लावून धरला होता.

तर गोव्यात एक परिचित नाव असलेल्या  सामाजिक/  माहिती अधिकार  कार्यकर्ता आयरीश रॉड्रीक्सने पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारावे हा अनेकांना धक्का होता, आणि या घटनेला साहजिकच बातमीचे मूल्य होते. वेगवेगळ्या माध्यमांतून, दैनिकांच्या सदरांतून आयरिश रॉड्रीक्स यांच्या या बदललेल्या नागरिकतत्वावर  आणि भारतातील (आणि इतर जुन्या वसाहतींतीलही) लोकांना पोर्तुगालच्या या नागरिकत्व देण्याबाबत लिहिले जात आहे.

गोव्यात मी द नवहिंद टाईम्सला असताना `गोमंतक’ दैनिकात असलेल्या  वामन प्रभू यांनी ``पोर्तुगीज पासपोर्टचे मायाजाल ! याविषयी लिहिले आहे. 

``ॲड आयरिश रॉड्रिग्ज यांच्यासारखा फायरब्रॅन्ड सामाजिक कार्यकर्ताही नुकताच या मायाजालात अडकल्यानंतर नजिकच्या काळात अजून किती गोमंतकीय नागरिक भारतीय नागरिकत्व आणि मताधिकार डावलून तोच मार्ग स्वीकारतील याचा आताच अंदाज बांधता येणार नाही.

पोर्तुगीज पासपोर्टच्या मायाजालात सापडलेल्या अनेकानी त्या संधीचे सोने करून आपली आणि कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारली असेलही परंतु आज सहा दशकानंतरही गोमंतकीयांचे पोर्तुगीज पासपोर्टचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही वा होणारही नाही हेच स्पष्ट चित्र पुढे येत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून ऊपलब्ध करण्यात आलेल्या एका आकडेवारून दिसून येते. २०११ ते २०२२ दरम्यानच्या अकरा वर्षांच्या काळात सत्तर हजारांहून अधिक भारतीय नागरिकानी आपले पासपोर्ट देशातील वेगवेगळ्या विभागीय पासपोर्ट कार्यालयात 'सरेंडर ' केल्याचे ही आकडेवारी सांगते आणि यामध्ये गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू , दिल्ली आणि चंदिगढ या आठ प्रदेशातील नागरिकांची संख्या ९० टक्क्याहून अधिक भरते आणि त्यातही विशेष असे की भारतीय नागरिकत्व सोडून देऊन पोर्तुगीज पासपोर्ट धारण करणाऱ्यांमध्ये गोमंतकीय नागरिकांची संख्या तब्बल ४0 टक्क्याहून अधिक आहे.

 जगातील जवळपास १८८ देशांचा व्हिसा पोर्तुगीज नागरिकत्व मिळवल्यानंतर आपसूकच विनायासे ऊपलब्ध होतो याच कारणावरून जर भारतीय नागरिकत्व झिडकारून पोर्तुगीज पासपोर्ट त्यानी घेतला असेल तर या पासपोर्टमुळे युरोप वा अन्य काही देशातील मिळणाऱ्या रोजगाराच्या वा अन्य संधी साध्य करून घेण्यासाठी युवा पिढीने पोर्तुगीज पासपोर्ट मिळवला तर त्यांचे चुकतेय असे म्हणता येणार नाही

वंश प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज नागरिक म्हणून आवश्यक प्रमाणपत्रांसह पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी केल्यास लिस्बनमध्ये एक दोन दिवसातच पोर्तुगीज पासपोर्ट कसा ऊपलब्ध होऊ शकतो यावरही आयरिश रॉड्रिग्ज यांनी आपण स्वीकारलेल्या पोर्तुगीज नागरिकत्वाचे समर्थन करताना स्पष्ट केल्याने अनेकांचा ऊत्साह बळावलाही असेल,

पोर्तुगीज पासपोर्ट हा कोणालाही अनेक युरोपियन आणि अन्य ब-याच देशात व्हिसामुक्त प्रवेश देणारा आधार तर आहेच पण त्याचबरोबर पात्रतेच्या वा अफाट गुणवत्तेच्या आधारे कोणीही आपले करियर करायची महत्वाकांक्षा बाळगून योग्य ती संधी साधण्याचा प्रयत्न करत असेल तर पोर्तुगालचे महाद्वार त्यासाठी खूपच ऊपयुक्त ठरू शकते .‘

पोर्तुगालची भारतातली राजवट संपून दहाबारा वर्षे लोटल्यानंतर गोव्यात मी शिकत असताना माझ्या हॉस्टेलमधली काही मुले पोर्तुगीज होती, म्हणजे त्यांचे आईवडील पोर्तुगाल किंवा युरोपात होते आणि या मुलांचे पासपोर्ट्स पोर्तुगीज होते. सज्ञान झाल्यानंतर त्यांना भारतात राहायचे असल्यास पोर्तुगीज पासपोर्टचा त्याग करावा लागणार होता. 

मात्र वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच ही मुले भुर्रकन उडून परदेशात गेली. त्यानंतरही माझ्या बरोबर शिकणारी अनेक मुलेमुली अशाचप्रकारे भारत सोडून पोर्तुगालला आणि नंतर इतरत्र स्थायिक झाली आहेत.  अनेक नातेवाईकांनी पोर्तुगालने दिलेल्या या सुविधेचा वापर करुन युरोपात नागरिकत्व मिळवले आहे.  चारपाच वर्षांनंतर ते गोव्यात, भारतात भेटीगाठीसाठी येत असतात.

कॉमनवेल्थचे सभासद म्हणून किंवा एकेकाळी इंग्लंडची वसाहत असलेल्या भारतातील नागरिकांना युनायटेड किंगडमचे नागरिक  म्हणून हक्क बहाल करण्यात आले तर काय होईल? आपल्या देशातील किती नागरिकांना ब्रिटिश पासपोर्ट म्हणजेच ब्रिटिश नागरीकत्व  घेणे आवडेल?

आमच्या कॉलनीत विसेक इमारती आहेत आणि प्रत्येक इमारतींमध्ये किमान एका  घरातली एक व्यक्ती युरोपात, अमेरिकेत किंवा इतर राष्ट्रांत आहे. यापैकी कुणाचाही कायमस्वरुपी मायदेशी परतण्याचा इरादा नाही. मुंबईत छोट्या घरात राहणारी व्यक्ती ग्रामीण महाराष्ट्रात जेथे पिण्याचे पाणी आठवडातून एकदोनदा येते विजपुरवठ्याबाबत सतत बोंबाबोंब असते  त्या आपल्या गावी परतण्याचा विचारही करत नसतात अगदी तसेच.   

त्याशिवाय अनेक जण या देशांत जाण्याची वाट पाहत आहेत  ते वेगळेच. इकडच्या भेटीत ही मंडळी त्या देशातल्या सार्वजनिक वर्तनाबाबत, शिष्टाचार, सरकारी कामकाज, वगैरेंबाबत कौतुक करत भारतातल्या भ्रष्टाचारावर, सरकारी कामकाजावर आगपापड  करत  असतात.

अशा परिस्थितीत इंग्लंडने भारतीयांसमोर नागरिकत्वाचा प्रस्ताव ठेवला तर काय होईल असे मी विचारले आहे. मला वाटते हे  नागरीकत्व मिळवण्यासाठी रांगच रांगा लागतील, चेंगराचेंगरीही होईल. आयरिश रॉड्रीग्स प्रकरणानंतर हा विषय चर्चेला आला आहे हे खरेच आहे.

 आता पुढच्या गोवा दौऱ्यात आयरिशला मुद्दाम भेटावे असे वाटू लागलेय.  

 https://www.esakal.com/global/portugal-goa-india-citizenship-passport-diu-daman-dadra-dnb8577

Wednesday, October 12, 2022


आज २ ऑगस्ट, सिल्व्हासा चा हा मुक्तीदिन. तिथल्या शाळाकॉलेजांत आणि सरकारी कार्यालयात झेंडावंदन होऊन हा दिवस साजरा केला जाईल.

हल्ली वर्षांतून काही दिवस माझा सिल्व्हासा येथे मुक्काम असतो तरी काही वर्षांपूर्वी सिल्व्हासा हे नक्की कुठे आहे हे मलाही माहित नव्हतं. अनेक जणांना सिल्व्हासा कुठे आहे हे माहित नसेल, आणि स्वातंत्र्यदिनाची तर कल्पनाही नसेल.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा मी अनेक वर्षे रहिवासी होतो, माझे बारावीचे प्रमाणपत्र याच बोर्डाचे आहे. गोवा हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमेवर तर दमण हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमेवर तर दीव हे आणखी तिसऱ्या टोकावर म्हणजे गुजरात आणि राजस्थानच्या सीमेलगत. तिथे मी आजवर एकदाही गेलेलो नाही. पण गोवा, दमण आणि दीव हे एकच केंद्रशासित प्रदेश होते कारण १९६१ पर्यंत साडेचारशे वर्षे ही पोर्तुगीज वसाहत होती.

पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय लष्कराकरवी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव भारताच्या संघराज्यात आणला. या लष्करी कारवाईचा, पोर्तुगिजांच्या शरणागतीचा, तिथल्या युध्दकैद्यांच्या पाठवणीचा खूप मोठा इतिहास आहे, जो आपल्याला माहीतच नसतो. गोव्यातले माझे एक जुने पत्रकार मित्र वाल्मिकी फालेरो ( Valmiki Faleiro ) यांनी यावर संशोधनात्मक खूप लिहिले आहे.
दमणपाशी असणारे मात्र समुद्रकिनारा नसलेले सिल्व्हासा सुद्धा या पोर्तुंगिजांच्या वसाहतीचा एक भाग होते. मात्र दमण आणि सिल्व्हासा यामध्ये दहाबारा किलोमीटरचा भारतीय प्रदेश होता. या कारणामुळे फारसा प्रतीकार न होता २ ऑगस्ट १९५४ रोजी सिल्व्हासा अगदी शांततेत भारतीय संघराज्यात सामील झाले.
म्हणून आज २ ऑगस्ट सिल्व्हासा मुक्ती दिन.
अर्थात या मुक्तिदिनाची त्याकाळात फारसा गाजावाजा झालेलं नाही कारण पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोवा, दमण आणि दीव हे प्रकरण त्याकाळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप तापलेले होते.
आज सिल्व्हासा हे दादरा नगर हवेली दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशात येते.
विकेंड ला दमण येथे प्रचंड ट्रॅफिक जाम होते. कारण या प्रदेशात गोव्याप्रमाणे दारू स्वस्त असते. ड्राय स्टेट असलेल्या गुजरातचे लोक इथे तहान भागवतात.
अलीकडेच हा प्रदेश महाराष्ट्रात बातम्यांमध्ये झळकला कारण येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार भाजपचा पराभव करून निवडून आल्या. त्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी सिल्व्हासा येथेच होतो. ( या खासदार मॅडम सध्या कुठल्या शिवसेनेत आहेत याची मला कल्पना नाही!)
आणि हा दमणगंगेचा फोटो...
Camil Parkhe, August 2, 2022
May be an image of 1 person, standing and road
Bhausaheb Nevarekar, कॉम्रेड भैरवनाथ वाकळे and 210 others
32 comments
1 share
Like
Comment
Share

Thursday, September 22, 2022

 फादर थॉमस स्टीफन्स ‘क्रिस्तपुराण’

जैसी हरळांमाजी रत्नकिळा की रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ॥
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी । की पदिमळांमाजी कस्तुरी ।
तैसी भाषांमाजी साजिरी । मराठिया ॥
पखिया माजी मयोरू । वृखिआंमध्ये कल्पतरू ।
भाषांमध्ये मानु थोरू । मराठियेसी ॥
तारांमध्ये बारा रासी । सप्तवारांमाजी रवी शशी ।
या दीपीचेआ भाषांमध्ये तैसी । बोली मराठिया ॥
 
मराठी भाषेची अशा प्रकारे स्तुती करून सतराव्या शतकाच्या सुरुवातीस फादर थॉमस स्टीफन्स यांनी आपल्या ‘क्रिस्तपुराण’ या ग्रंथाची निर्मिती केली. ‘ओं नमो विश्वभरिता’ या नमनापासून सुरू होणारे हे पुराण पुढील दहा हजार ओव्यांमध्ये आपला हा एतद्देशीय थाट कायम राखते.
 
इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि वयाच्या तिशीनंतर गोमंतकात आलेल्या फादर स्टीफन्स यांना पूर्णतः देशी अवतारातील क्रिस्तपुराणाची निर्मिती शक्य झाली हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. 
 
क्रिस्तपुराण वाचताना या ग्रंथाची भाषाशैली, म्हणी आणि वाक्‌प्रचार, हिंदू धर्म आणि संस्कृतीतील अनेक संदर्भांचा मुबलक वापर यामुळे परदेशातून आलेल्या धर्माचा ग्रंथ आहे असे जाणवतदेखील नाही. 
 
अकराव्या शतकात महानुभाव पंथाच्या चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रापासून सुरू झालेल्या ग्रांथिक मराठी भाषेच्या इतिहासातील क्रिस्तपुराण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
.
बायबलमधील अनेक संकल्पना, ग्रीक पारिभाषिक शब्द, बायबलच्या जुन्या आणि नव्या करारामधील अनेक घटना मध्ययुगीन काळातील गोमंतकीय सामान्य जनतेला समजतील अशा शब्दांत सांगण्याचा यशस्वी प्रयत्न फादर स्टीफन्स यांनी केला आहे. हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये वाढलेल्या नवख्रिस्ती लोकांची धर्मग्रंथाची गरज लक्षात घेऊन फादर स्टीफन्स यांनी क्रिस्तपुराणाची रचना केली.
.
फादर थॉमस स्टीफन्स यांचा जन्म इंग्लंडमधील विल्टशायर परगण्यात बुशटन गावी 1549 साली झाला. थॉमस स्टीफन्सने 20 ऑक्टोबर 1575 रोजी रोम येथे संत इग्नाती लोयोलाकर यांनी स्थापन केलेल्या येशूसंघात प्रवेश केला. फादर थॉमस स्टिफन्स हे गोव्यात येणारे पहिले ब्रिटिश जेसुईट फादर. 24 ऑक्टोबर 1579 रोजी थॉमस स्टीफन्सने आपले मिशनकार्य सुरू केले.
 
फादर स्टीफन्स यांचे गोव्यातील सासष्टी भागात धर्मगुरुपदाचे कार्य सुरू झाले. गोव्यातील रायतूर येथील येशूसंघाच्या कॉलेजचे रेक्टर म्हणून 1590 ते 1594 या काळात त्यांनी काम पाहिले. वसईतील 1611-12 या काळातील मराठी अध्यापनाचा काळ वगळता स्टीफन्स यांनी भारतातील आपली सर्व हयात गोव्यातच घालविली. 35 वर्षे त्यांनी मडगाव, बेनावली आणि नावेली या भागात धर्मगुरू म्हणून काम केले.
 
`दौत्रिना क्रिस्ता’ किंवा `क्रिस्तीधर्मतत्त्वसार, आर्त द लिंग्वा कानारी हे कोकणी भाषेचे व्याकरण आणि क्रिस्तपुराण यांचा फादर स्टीफन्स यांच्या साहित्यसंपदेत समावेश होतो.
या साहित्यकृतीपैकी दौत्रिना क्रिस्ता हे पुस्तक कॅथेकिझम स्वरूपाचे म्हणजे कॅथोलिक धर्माची मूळ तत्त्वे समजावून सांगणारे आहे. मात्र गोमंतकीय कोकणीचे हे पहिलेच ज्ञानपुस्तक असल्याने भाषिक इतिहासाच्या संदर्भात हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. दौत्रिना क्रिस्ता लिंग्वा ब्रामण कानारी या शीर्षकाखाली हे पुस्तक सर्व प्रथम 1622 साली छापण्यात आले. 
 
या आवृत्तीची एक प्रत सध्या पोर्तुगालमधील लिस्बन सरकारी ग्रंथालयात असून दुसरी प्रत रोमच्या व्हॅटिकन ग्रंथालयात आहे.
 
कोकणी भाषेतील पहिले व्याकरण लिहिण्याचे श्रेय फादर स्टीफन्स यांना दिले जाते. ‘आर्त द लिंग्वा कानारी’ या नावाने हे व्याकरण प्रसिद्ध आहे. ‘कानारी’ म्हणजे कन्नड भाषा नव्हे. त्याकाळात कोकणी भाषा कानारी म्हणून ओळखली जात असे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांची भाषा म्हणजे कानारी भाषा असे स्पष्टीकरण इतिहाससंशोधक अ.का. प्रियोळकर यांनी दिले आहे. अतिपूर्वेकडील भाषेचे एका युरोपियन व्यक्तीने रचलेले हे पहिलेच व्याकरण. 
 
‘क्रिस्तपुराण’ ही फादर थॉमस स्टीफन्स यांची सर्वात महत्त्वाची साहित्यकृती. पूर्णतः भारतीय पारंपरिक शैलीत लिहिलेल्या या क्रिस्तपुराणामुळे फादर स्टीफन्स यांचे नाव मराठी भाषेच्या इतिहासात चिरंतन राहणार आहे. या पुराणाचे लेखन फादर स्टीफन्स यांनी 1614 साली पूर्ण केले आणि या ग्रंथाची पहिली आवृत्ती 1616 साली छापण्यात आली.
त्याकाळात देवनागरी लिपीत मुद्रणकला विकसित न झाल्याने हा ग्रंथ त्यांना रोमन लिपीत छापावा लागला. 
 
क्रिस्तपुराण ज्यांच्यासाठी लिहिले गेले त्यांना मूळचा आशियाई असणाऱ्या परंतु पाश्चात्यांमार्फत भारतात पोहोचलेल्या ख्रिस्ती धर्माचा परिचय व्हावा यासाठी फादर स्टीफन्स यांनी आपल्या या पुराणाला पूर्ण भारतीय पेहराव दिला. या पेहरावामुळे ख्रिस्ती धर्माची ओळख करून घेण्यास स्थानिक लोकांना अडचण आली नाही. 
 
उदा. स्वर्ग, सैतान, नरक या संकल्पना स्थानिक जनतेला समजणे शक्यच नव्हते. फादर स्टीफन्स यांनी त्यासाठी वैकुंठ, देवचर, यमपुरी अशा सर्वांनाच सुपरिचित असलेल्या संकल्पनांचा वापर करून वाचकांशी अधिक जवळीक साधली. 
 
येशूच्या नावाचे देशीकरण करण्यासाठी या ग्रंथकर्त्याने स्वामी, तारक, आनंदनिधी, परमेश्वर, जगद्गुरू, मोक्षराज, गोसावी अशा अनेक उपाधींचा आधार घेतला.
फादर स्टीफन्स यांनी आपल्या पुराणाची सुरुवात पुढील ओवींनी केली आहे.
 
ओ नमो विश्वभरिता । देवा बापा सर्वसमर्था ।
परमेश्वरा सत्यवंता । स्वर्ग पृथ्वीचा रचणारा ॥1॥
तूं ॠद्धिसिद्धिचा दातारू । कृपानिधी करूणा करू
तूं सर्व सुखाचा सागरू । आदि अंतु नातुडे ॥2॥
तूं परमानंदु सर्वस्वरूपु । विश्वव्यापकु ज्ञानदिपु ॥
तूं सर्वगुणी निर्लेपु । निर्मळू निर्विकारू स्वामिया ॥3॥
तूं अदृष्टु तूं अव्यक्तू ।समदयाळू सर्वप्राप्तु ।
सर्वज्ञानु सर्वनितीवंतू । एकूची देवो तूं ॥4॥
तू साक्षात परमेश्वरू । अनादसिद्धू अपरांपरू ।
आदि अनादि अविनाशु अमरू । तुजें स्तवन त्रिलोंकी ॥5॥
 
शांताराम बंडेलू संपादित क्रिस्तपुराणात एकूण 10 हजार 962 ओव्या आहेत, तर लंडन येथील स्कूल ऑफ ओेरिएंटल ॲन्ड आफ्रिकन स्टडीज येथील विल्यम मर्सडन यांच्या संग्रहातील क्रिस्तपुराणात एकूण 10 हजार 641 ओव्या आहेत.
 
या पुराणग्रंथात ग्रंथकर्त्याने ओवी छंदाचा वापर केला आहे. ओवी छंदात चार पंक्ती असून पहिल्या तीन पंक्तीत यमक साधलेले असते.
 
गोव्यातील वादग्रस्त ठरलेल्या इन्क्विझिशनच्या काळात प्रत्येक साहित्याचा मजकूर काळजीपूर्वक तपासला जात असे, आक्षेपार्ह मजकूर ताबडतोब नष्ट केला जाई. इन्क्विझिशन मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय कुठलाही मजकूर प्रसिद्ध करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे इन्क्विझिशन मंडळाची परवानगी मिळाल्यानंतरच क्रिस्तपुराण छापण्यात आले. 
 
इंग्रजी भाषेतील अनेक म्हणी आणि वाक्‌प्रचारांचे क्रिस्तपुराणातील मराठी भाषेत भाषांतर करण्यात आले आहे. उदा. ‘Rome was not built in a day' े’ या सुपरिचित म्हणीचे क्रिस्तपुराणात ‘एके दिवशी रोमनगरी । उभविली नाही’ असे भाषांतर करण्यात आले आहे. ‘वार्म लव्ह’ या वाक्‌प्रचारास ‘उन्हु मोहो’ असे संबोधण्यात आले आहे.
 
फादर स्टीफन्स यांनी आपल्या या पुराणाच्या तीन आवृत्त्या 1616,1649 आणि 1654 साली प्रसिद्ध केल्या. आज यापैकी कुठल्याही आवृत्तीची एकही प्रत कुठेही उपलब्ध नाही. 
 
गोव्याचा व्हाईसरॉय फ्रान्सिस द लाव्होर याने 1648 साली कायदा करून तीन वर्षांच्या आत गोव्यातील सर्व स्थानिक भाषांची हकालपट्टी करून सर्व व्यवहार पोर्तुगीज भाषेतच करण्याचा निर्णय घेतला. या धोरणानुसार मराठी भाषेतील सर्व पुस्तके जप्त करण्यात आल्यामुळे फादर स्टीफन्स यांचे क्रिस्तपुराणही लोकांच्या नजरेआड झाले. पोर्तुगीजांच्या या धोरणामुळे क्रिस्तपुराणाच्या वापरावर बंदी आली. 
 
व्हॉईसरॉयच्या या आदेशामुळे गोव्यातील मराठी आणि कोकणी भाषेची आणि त्याचबरोबर तेथील मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचीही वाढ खुंटली. 
 
क्रिस्तपुराणाच्या आणि मराठी भाषेच्या सुदैवाने गोव्याबाहेर मेंगलोर वगैरे भागातील ख्रिस्ती समाजात क्रिस्तपुराणाचे वाचन आणि निरूपण कायम राहिले आणि या साहित्यिक ऐवजाचे अशाप्रकारे जतन झाले. या क्रिस्तपुराणाची अनेक हस्तलिखिते तयार झाली. अशी अनेक हस्तलिखिते जमवून त्यांच्या साहाय्याने 1907 साली मेंगलोर येथे जोसेफ साल्ढाणा यांनी क्रिस्तपुराणाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली.
 
क्रिस्तपुराणाच्या वरील चारही आवृत्त्या रोमन लिपीत छापलेल्या होत्या. त्यामुळे मराठीतील या श्रेष्ठ साहित्यकृतीकडे मराठी सारस्वतांचे लक्ष गेले नव्हते. त्यामुळे क्रिस्तपुराण मराठी साहित्यक्षेत्रात पूर्णतः दुर्लक्षित राहिले. 
 
दरम्यान पुणे धर्मप्रांताचे आर्चबिशप हेन्री डोरिंग यांनी क्रिस्तपुराणातील येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील काही भाग देवनागरी लिपीत आणला. आर्चबिशप डोरिंग हे मूळचे जर्मनीचे. आर्चबिशप डोरिंग यांनी क्रिस्तपुराणाच्या देवनागरीत आणलेल्या काही भागांच्या तीन पुस्तिका छापल्या होत्या. 
 
संपूर्ण क्रिस्तपुराण मराठीच्या देवनागरी लिपीत प्रकाशन होण्यासाठी मात्र 1956 साल उजाडावे लागले. त्यावेळी शांताराम बंडेलू यांनी संपादित केलेली ही देवनागरी आवृत्ती य. गो. जोशींच्या प्रसाद प्रकाशनने प्रसिद्ध केली.
 
फादर स्टीफन्स यांचे वयाच्या 70 व्या वर्षी ओल्ड गोव्यातील बॉम जेजू या चर्चच्या आवारातील धर्मगुरू निवासात निधन झाले. संत फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष असलेल्या या चर्चशेजारील हे धर्मगुरू निवास अजूनही आपल्याला पाहायला मिळते. 
 
फादर स्टीफन्स यांच्या स्मारकाची मात्र नक्कीच गरज नाही. ‘क्रिस्तपुराण’ या आपल्या वाङ्मयकृतीमुळे मराठी साहित्यात त्यांना चिरंतन स्थान लाभले आहे.

^^^

शांताराम बंडेलूकृत 'क्रिस्तपुराण' ग्रंथाचे कव्हर - मूळ चित्र " द मास्टर - अँजेलो डी फोन्सेका 
 
---
`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ - लेखक कामिल पारखे (सुगावा प्रकाशन- २००३) या पुस्तकातील एक प्रकरण
 
Camil Parkhe