Did you like the article?

Sunday, June 28, 2026

 


पुणे ख्रिस्ती साहित्य संघाच्या काही सदस्यांबरोबर क्वार्टर गेट येथील यंग ख्रिश्चन्स मेन्स असोसिएशन (YMCA) इमारतीत काल शुक्रवारी २६ जून संध्याकाळी जवळजवळ दिडतास खूप चांगली भेट आणि चर्चा झाली.

आठ दिवसांपूर्वीच नियोजन झालेल्या पुणे ख्रिस्ती साहित्य संघाची ही मासिक बैठक चार तासांआधी पुणे कॅम्पातील मिरवणुकीमुळे रद्द करण्यात आली होती.
तरीही हा निरोप वेळेत न पोहोचल्यामुळे काही साहित्यप्रेमी बैठकीला लांबलांबून येतील असे मला वाटले होते.
अगदी तसेच झाले.
संघाचा सचिव या नात्याने कार्यक्रमस्थळी मी पाचच्या दरम्यान आलो होतो, तिथे तळघरातल्या `ओम बुक स्टॉलमध्ये पुस्तके चाळताना वयाची ऐंशी ओलांडलेले आशाकांत रामटेके भेटले.
विमाननगरहून खास रिक्षा करुन साहित्य संघाच्या बैठकीसाठी आले होते. त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून बैठक रद्द झाली नाही हे मी त्यांना सांगितलेच नाही.
आशाकांत रामटेके यांना भेटून, त्यांच्याशी चर्चा करुन खूप आनंद वाटला.
महाराष्ट्र सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास एजन्सी विभागातून निवृत्त झालेले आशाकांत रामटेके सामाजिक कार्यात खूप सक्रिय आहेत.
संघाच्या कालच्या या बैठकीला उपस्थित राहून ते आज शनिवारी पुन्हा YMCA आवारात पूर्ण दिवसीय शिबिरात उपस्थित राहणार आहेत.
ख्रिस्ती धर्माच्या पवित्र भूमीला भेट देऊन त्यावर ११२ पानांचे गुळगुळीत कागदांवर भरपूर रंगीत चित्रांसह छापलेले त्यांचे `होली लँड पिलग्रिमेज' (इस्राएल, जॉर्डन, पॅलेस्टाईन अँड इजिप्त ) हे इंग्रजी पुस्तक या बैठकीत त्यांनी मला दिले.
ही `होली लँड' हल्ली अनहोली लँड बनली आहे असे या पुस्तकाच्याच एका प्रस्तावनेत लिहिले आहे.
मागे एकदा पुण्यात शिवाजीनगरच्या नरवीर तानाजीवाडीमध्ये `सकाळ टाइम्स' हापिसात नागपूरचे विलास शेंडे यांच्यासह ते मला भेटले होते त्यावेळी माझी काही पुस्तके मी त्यांना भेट दिली होती अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
YMCA च्या समोर असलेल्या इराणी हॉटेलात बन मस्का आणि चहावर ताव मारताना आमची ही भेट आणि चर्चा रंगली होती.
आशाकांत रामटेके हल्ली काही महिने आखातात मुलाकडे आणि काही महिने ऑस्ट्रेलियात आपल्या मुलीकडे राहतात. आखातातील ख्रिस्ती समाजाविषयी त्यांनी काही रंजक गोष्टी सांगितल्या.
याविषयी पुणे ख्रिस्ती साहित्य संघाच्या `शब्दसेवा' या अनितकालिकाच्या आगामी अंकात लेख लिहिण्याचा मी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे.
YMCA आवारात परतल्यानंतर इंडियन एक्सप्रेस- लोकसत्ता पत्रकारितेतील माझे सहकारी दयानंद ठोंबरे भेटले. सत्तरी पार केलेले रेव्हरंड सॅम्युएल चोपडे लांब अंतरावरून दुचाकीने या बैठकीला पोहोचले होते.
त्यानंतर YMCA कॅफेटेरियात आम्हा चौघांची बैठक झाली आणि साहित्य, समाज अशा विविध विषयांवर गप्पा आणि चर्चा झाल्या.
आता या पुणे ख्रिस्ती साहित्य संघाविषयी आणि ख्रिस्ती समाजातील मराठी साहित्य चळवळीबाबत.
न्यायमूर्ती म. गो, रानडे यांनी दिडशे वर्षांपूर्वी पहिले मराठी ग्रंथकर्त्यांचे संमेलन भरवले, त्यानंतर या मराठी साहित्य संमेलनांपासून पहिल्यांदा म्हणजे १९२७ साली नाशिक येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाने वेगळी चूल मांडली होती.
वेगवेगळी साहित्य संमेलनांची अशी प्रथा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाने सुरु केली.
`स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक या नागपूरला १९३३ साली भरलेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या
पुणे ख्रिस्ती साहित्य संघाने १९७२ साली आठवे ख्रिस्ती साहित्य संमेलन नगर रोडला रामवाडीला डी नोबिली कॉलेजात आयोजित केले होते.
`अगा जे कल्पिले नाही' हे मराठी भाषेतले पहिले आत्मकथन लिहिणारे सत्यवान नामदेव सूर्यवंशी या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते तर धर्मगुरु (फादर) होण्याचे प्रशिक्षण पेपल सेमिनरीत घेणारे ब्रदर नेल्सन मच्याडो आयोजक होते.
पुणे ख्रिस्ती साहित्य संघाने पंधरावे ख्रिस्ती साहित्य संमेलन १९९२ साली मॉडेल कॉलनीतल्या विद्या भवन स्कुलमध्ये भरवले होते,
विद्या भवन स्कुलचे प्राचार्य फादर नेल्सन मच्याडो स्वागताध्यक्ष होते तर कवयित्री शांता शेळके उद्घाटक होत्या.
नाशिकमध्ये या जानेवारीत सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली २७वे ख्रिस्ती साहित्य संमेलन पार पडले.
कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट पंथांत विसंवाद नसला तरी संवाद मुळीच नसतो. महाराष्ट्रात मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांनी या समाजातील दोन्ही घटकांना एकत्र आणण्याचे फार मोठे काम केले आहे.
गेल्या शंभर वर्षांच्या या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचा आढावा आणि गेल्या पंचवीस वर्षांतील मराठी ख्रिस्ती आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची भाषणे `शतकातील ख्रिस्ती साहित्य संमेलने' या ग्रंथात मी संग्रहीत केली आहेत.
चेतक बुक्सने प्रकाशित केलेले हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे.
सहा महिन्यांपूर्वी या पुणे ख्रिस्ती साहित्य संघाचा सचिव म्हणून मी सूत्रे घेतली आहे. दर महिन्यात एकदा भेटावे, विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा व्हावी, काही साहित्यिक उपक्रम राबवावे असा या मासिक बैठकीचा माफक उद्देश आहे.
साहित्य संघाच्या प्रत्येक बैठकीला नवनवे लोक हजर असतात. त्यामुळे प्रत्येक बैठकीनंतर हजर असणाऱ्या सर्वांबरोबर एक ग्रुप फोटो घेण्याबाबत मात्र मी आग्रही असतो.
नोंदवहीतल्या इतिवृत्तापेक्षा असे फोटो बरे.
कालच्या बैठकीचा हा फोटो.
गेटपाशी हा ग्रुप फोटो घेत असताना फेसबुकवर मित्र असणारे यवतमाळचे आणि आता मध्य प्रदेशात कार्यरत असणारे प्रतिक विजया सुधाकर यांनी मला पाहिले.
फेसबुकवर वेळोवेळी आपली छबी टाकल्याचा हा एक फायदा.
त्यांनी आपली ओळख करुन दिल्यानन्तर त्यांच्याबरोबर सुद्धा एक वेगळा फोटो काढून झाला.
Camil Parkhe



भारतात पहिल्यांदा आधुनिक शाळा उघडणाऱ्या, सार्वत्रिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या (१८१४-१८१५), मुलींची पहिली  शाळा सुरु करणाऱ्या (१८२४) गॉर्डन हॉल यांची चरित्रकथा त्यांच्या नातवाच्या शब्दांत :  
आद्य अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल यांचे एक नातू रेव्हरंड जॉर्ज ए. हॉल हे अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर्स फॉर फॉरेन मिशन्सचे प्रतिनिधी म्हणून १९१३ साली मुंबईत आले होते. 


यावेळी बोलताना त्यांनी आपली आजी आणि आजोबा यांच्या शेवटचा निरोप घेतेवेळी झालेल्या हृदयद्रावक संभाषणाचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे. 


``या प्रसंगी तुम्ही मला दिलेल्या सन्मानाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. हा सन्मान माझ्या स्वतःच्या गुणवत्तेमुळे नसून माझे आदरणीय आजोबा रेव्हरंड गॉर्डन हॉल यांच्या नावामुळे आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. हा त्यांच्या पवित्र स्मृतीला अर्पण केलेला आदर आहे, म्हणूनच तो मला शब्दात व्यक्त करता येणार नाही इतका अधिक मोलाचा वाटतो.
हा समारंभ माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आज येथे उभे राहून या उल्लेखनीय कार्यक्रमात सहभागी होणे हे माझ्यासाठी अवर्णनीय सौभाग्य आहे. या क्षणाची मी अतिशय उत्कंठेने वाट पाहत होतो. तुम्हा सर्वांना भेटताना माझ्या मनात जे विचार आणि भावना दाटून आले आहेत, त्या व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. 


अनेक वर्षांपासून माझ्या जीवनात एक स्वप्न होते—देवाच्या कृपेने कधीतरी या भारत देशाला भेट देण्याची संधी मला मिळावी. या देशाशी माझ्या अनेक प्रिय आठवणी जोडलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भारत माझ्या मनात आणि हृदयात वसलेला आहे. माझ्या आजोबांच्या मिशनरी जीवनातील प्रसंगांचा मी इतका विचार केला आहे की, मला भारत आणि येथील लोकांविषयी एक आत्मीयतेची भावना निर्माण झाली आहे. जणू मी एखाद्या अपरिचित देशात नव्हे, तर आधीच परिचित असलेल्या भूमीत आलो आहे.


मला असे वाटते की मी यापूर्वी येथे आलो आहे आणि तुम्हा बांधवांना पूर्वीपासून ओळखतो. जसे एखादा मनुष्य आपल्या पूर्वजांच्या घरी परत येतो, आणि त्या जागेशी व लोकांशी पुन्हा संपर्क आल्याने त्याच्या मनात कोमल भावना जागृत होतात, तसेच काहीसे मला आता वाटत आहे आणि या शब्दांमध्ये कल्पनेपेक्षा अधिक सत्य दडलेले आहे.  कारण शंभर वर्षांपूर्वी माझे आजोबा या भारतात आले आणि त्यांनी आपले निवडलेले कार्य सुरू केले. येथेच त्यांनी आपले जीवन व्यतीत केले आणि मिशनकार्य चालवले. येथेच कार्यरत असताना आयुष्याच्या ऐन उमेदीत त्यांचे निधन झाले. येथे या देशातच माझ्या वडिलांचा जन्म झाला होता.
आता मी जे काही सांगणार आहे त्यात कदाचित काही वैयक्तिक बाबी येतील आणि त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करताल अशी मला खात्री आहे; याचे कारण परिस्थितीच अशी आहे की तसे न करणे मी टाळू शकत नाही. जर मी या आद्य मिशनरीबद्दलआदराची भावना ग्याक्त केली नाही आणि त्यांनी जपलेल्या ख्रिस्ती आदर्शांबद्दल माझे वैयक्तिक ऋण व्यक्त केले नाही, तर ते कृतज्ञतेचा अभाव ठरेल.


देवाच्या या साध्या भक्ताने आम्हाकडे सोपवलेल्या आध्यात्मिक वारशामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनात जे आशीर्वाद आले आहेत, त्यांची गणना करणे अशक्य आहे. माझ्या बालपणातील घरात “मिशनरी गॉर्डन हॉल” हे नाव अत्यंत आदराने घेतले जाई आणि भारतातील त्यांच्या जीवनाची कथा, त्यांचा विश्वास, त्याग, आणि ख्रिस्ताच्या कार्याप्रती निष्ठा ही आमच्या बालपणातील परिचित शिकवण होती आणि त्याचा आमच्यावर खोल परिणाम झाला.  त्यांचा वारसा माझ्या वडिलांकडे आला, माझे वडीलसुद्धा सुवार्तेचे सेवक होते आणि परदेशी मिशनच्या कार्याचे ठाम समर्थक होते. 
त्या काळात फारच थोडे ख्रिस्ती लोक या कार्यात रस घेत होते. आमच्या घरी परदेशातून परतलेले मिशनरी नेहमीच आदरणीय पाहुणे असत आणि त्यांचा सन्मान करण्यास आम्हाला आनंद वाटे.



ख्रिस्ताचा सेवक आणि बोर्डाच्या समितीचा सदस्य म्हणून ज्या बोर्डाचे गॉर्डन हॉल यांनी पहिले मिशनरी म्हणून कार्य सुरू केले, त्याच बोर्डाची आता सेवा करताना मला मोठा आनंद होत आहे. जगाच्या सुवार्तिकरणाच्या कार्यात, जे आज आपल्या ख्रिस्ती धर्माचे वैभव आहे, त्यात थोडासा का होईना सहभाग घेणे हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. 


या वेळी मी गॉर्डन हॉल यांच्या जीवनाचा सविस्तर आढावा घ्यावा अशी तुमची निश्चितच अपेक्षा नाही. मात्र त्यांच्या जीवनातील काही ठळक गोष्टींचा थोडक्यात उल्लेख घेणे येथे पुरेसे ठरेल.  
गॉर्डन हॉल यांचा जन्म ८ एप्रिल १७८४ रोजी मॅसॅच्युसेट्समधील टोलंड येथे एका साध्या कुटुंबात झाला. लहानपणी ते खूप अभ्यासू होते आणि पुढे विल्यम्स कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांच्या शिक्षणकाळात  त्यांचे धार्मिक परिवर्तन झाले.
सत्याच्या शोधात असताना ते सॅम्युएल जे. मिल्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रभावाखाली आले. या गटाला “हेस्टॅक बँड” (गवताच्या गंजीची टीम)  म्हणून ओळखले जाते. 


आपल्या मिशनरी इतिहासात प्रसिद्ध असलेल्या या तरुणांनी बिगरख्रिस्ती राष्ट्रांमध्ये मिशनरी कार्य करण्यासाठी एक संस्था स्थापन केली. या तरुणांनी परदेशी मिशनसाठी स्वतःला वाहून घेण्याचा निर्धार केला होता.  या संस्थेच्या नियमांनुसार ज्या व्यक्तीवर अशा मिशनमध्ये सहभागी होण्यास अडथळा असणारी कुठलीही बांधिलकी असेल अशा व्यक्तींना सदस्यत्व दिले जात नसे.  कर्तव्य ज्यावेळी आणि ज्याठिकाणी हाक देईल तेव्हा परदेशी मिशनवर जाण्यास ते सदैव तयार असतील अशी प्रत्येक सदस्याने अशी प्रतिज्ञा केली होती.  


गॉर्डन हॉल या संस्थेत सामील झाले होते की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही.  परंतु य संस्थेच्या उद्दिष्टांशी ते मनापासून सहमत होते.  त्यांच्या पुढील जीवनातील घटनांमधून त्या भावनेची प्रचीती येते. कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अँडोव्हर सेमिनरीत शिक्षण घेतले.  येथे सॅम्युएल जे. मिल्स, ल्युथर राईस, अडोनिरम जडसन आणि इतर सहकाऱ्यांसोबत शिकत असताना परदेशात येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याची तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  


अमेरिकेत ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून सेवा करण्यासाठी अनेक आकर्षक संधी असूनही गॉर्डन हॉल यांनी त्या नाकारल्या आणि ठामपणे म्हटले:  “नाही, ख्रिस्ती जगातील कुठल्याही ठिकाणी वा धर्मग्रामात मी स्थायिक होणार नाही. येथे स्वगृही सेवा करण्यासाठी खूप लोक आहेत. देव मला बाहेर परदेशी जाण्यासाठी बोलावत आहे. जर बिगरख्रिस्ती जनांस मी सुवार्ता सांगितली नाही तर माझ्यावर शाप येईल.”


सॅम्युएल मिल्स यांनी आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे: “गॉर्डन हॉल यांना देवाने निवडून स्वहस्ते दीक्षा दिली आहे आणि मिशनरी  म्हणून नियुक्त केले आहे.”
गॉर्डन हॉल यांनी बोस्टन आणि फिलाडेल्फिया येथे वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. दिनांक ६ फेब्रुवारी १८१२ रोजी सालेम, मॅसेच्युसेट्स येथे त्यांच्या चार सहकाऱ्यांसह त्यांचा धर्मगुरु म्हणून दीक्षाविधी झाला.  त्यानंतर लवकरच ल्युथर राईस आणि सॅम्युएल नॉट (ज्युनियर)   यांच्यासह ते फिलाडेल्फियाहून जहाजाने निघाले व ८ ऑगस्ट रोजी कोलकात्यास पोहोचले.


यानंतर त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले, त्यांच्या देवावरील विश्वासाची अशाप्रकारे कठोरपणे परीक्षा घेतली जात होती.त्याना मिळालेल्या संधीची द्वारे आता पूर्णतः बंद झाली असावी अशीच सर्व चिन्हे होती.  त्यांना भारतात राहण्याची परवानगी दिली जात नव्हती. मुंबईत स्थायिक होण्यासाठी आणि आपले मिशनकार्य सुरू ठेवण्यासाठी ब्रिटिश संसदेच्या औपचारिक कायद्याने परवानगी मिळेपर्यंत त्यांना जो दीर्घ विलंब सहन करावा लागला ती तर अगदी वेगळीच, रोमहर्षक कथा आहे.


ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या देखरेखीखाली कायम ठेवण्यात आल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळून जाण्याचे वारंवार प्रयत्न केल्यानंतरसुद्धा त्यांना पुन्हापुन्हा अटक करण्यात आली. आपल्या कार्यास प्रारंभ करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीला स्थानिक जनतेकडून नव्हे तर ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विरोध केला गेला आणि त्यांना भारताबाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला.  विविध प्रकारच्या अडचणींना आणि विरोधास धैर्याने तोंड देत कधीही माघार न घेता गॉर्डन हॉल यांनी अमेरिकन मिशनच्या अगदी सुरुवातीला जे यश मिळवले ते माझ्या मते त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठे यश होते. 


ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या मुंबईतील गव्हर्नरसमोर त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपली बाजू मांडली आणि त्यामुळे अमेरीकन मिशनची भक्कम पायावर उभारणी आणि स्थापना करणे शक्य झाले.
त्यांनी याहून अधिक फारसे यश मिळवले नसते तरी त्यांचे मिशनरी कार्य व्यर्थ ठरले नसते.  तसे पाहिले तर त्यांच्या मिशनरी कालावधीचे केवळ वर्षे विचारात घेतल्यास त्यांचे मिशन फार अल्पावधीचे ठरते.   
दिनांक २० मार्च १८२६ रोजी नाशिकजवळ अचानक आजारी पडून ते निधन पावले तेव्हा त्यांचे वय फक्त ४१ वर्षे होते.


त्याकाळात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आणि आता आपणांस उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा तुलना केल्यास त्यांनी केलेल्या त्यागाची आणि तोंड दिलेल्या आव्हानांची कल्पना येऊ शकेल. त्यावेळी वाफेचे आणि विजेचे अद्भुत शोध, तसेच आधुनिक विज्ञानामुळे शक्य झालेल्या सर्व सोयी-सुविधांनी आणि सुरक्षिततेच्या साधनांनी सुसज्ज अशा विशाल जहाजांद्वारे जलद प्रवासाची साधने नव्हती. 


अशावेळी आपले घरदार, मित्रमंडळी आणि मातृभूमी सोडून, महिनोनमहिने चालणाऱ्या प्रवासासाठी एका असुरक्षित नौकेवर बसून अज्ञात आणि दूरदेशी जाणे या लोकांसाठी किती मोठे धाडस असेल ! 
गॉर्डन हॉल आणि त्यांचे मिशनरी सहकारी यांनी हाती घेतलेला उपक्रम खूप आव्हानात्मक होता.  अशा साहसाचा सामान्य लोकांनी अगदी स्वप्नातही विचार केला नसता. पण हे सर्व मिशनरी  दूरदृष्टी, श्रद्धा आणि समर्पणाची भावना असलेले लोक होते.  एका खूप विलक्षण उदात्त हेतूने प्रेरित होऊन त्यांनी आपले जीवन देवाच्या हातात सोपवण्याची तयारी दाखवली, देवाने त्यांना या महान कार्यासाठी निवडले होते.  


गॉर्डन हॉल यांनी आपले कार्य सुरू केले, तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी एकही भारतीय ख्रिस्ती नव्हता आणि खूप कमी भारतीय लोकांनी येशू ख्रिस्ताचे नाव ऐकले होते. त्यांच्या कार्याच्या बाह्य परिणामांचा विचार केल्यास गॉर्डन हॉल यांचे मिशन कार्य आज आपण मराठी मिशनच्या भव्य कार्याशी तुलना केल्यास अत्यंत अल्प वाटते.
गॉर्डन हॉल यांचे कार्य हे एका अग्रदूताचे होते. त्यांच्यामागून श्रद्धा आणि संयमाने येणाऱ्यांसाठी त्यांनी पायाभरणीचे काम केले.  त्यांच्या जीवनात रोमांचकारी साहसे नव्हती किंवा इतरांना सांगण्यासारख्या चमत्कारिक यशोगाथासुद्धा नव्हत्या. त्याचा जीवनप्रवास कठोर आणि सततच्या परिश्रमांनी भरलेला होता, आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत यशाची एखादी किरकोळ झलकही त्यांना क्वचितच दिसली असेल.  असे असले तरी त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या सर्व अडीअडचणी आणि संकटांमध्ये त्यांनी आपल्या कामाच्या अंतिम परिणामाबद्दलचा विश्वास कधीही गमावला नाही.


गॉर्डन हॉल यांच्यासाठी ते खरोखर देवाचेच कार्य होते आणि म्हणून ते यशस्वी होणारच, असा त्याचा ठाम विश्वास होता. 



शेतात बी पेरण्यात ते समाधानी होते आणि त्याचा अंतिम परिणाम ते देवावर सोपवत असत. त्यांच्या दैनंदिन कार्याच्या नोंदींच्या प्रत्येक पानातून आपल्या भावंडांच्या उद्धारासाठी जीवन अर्पण करण्याचा महान सन्मान मिळाल्याबद्दल देवाबद्दलचा आनंद आणि कृतज्ञता स्पष्टपणे दिसून येते.  माझ्या आजोबांचा आत्मा आजही आपल्याबरोबर आहे असे आपल्याला मानता येणार नाही का ?  तसेच त्यानंतरच्या या अनेक वर्षांत देवाच्या कृपेने त्यांनी सुरू केलेल्या त्या लहान कामातून आज जे भव्य यश मिळाले आले आहेत ते पाहून त्यांना किती आनंद होत असेल!


आज आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अनेक मर्यादांनी त्यांचे जीवन सीमित होते, तरीही केवळ दोन वर्षांत त्यांनी मराठी भाषेवर इतके प्रभुत्व मिळवले की लवकरच ते लोकांना त्यांच्या भाषेत आणि अत्यंत प्रभावीपणे सुवार्ता सांगू शकले. 


काही वर्षांपूर्वी कोणीतरी लिहिले होते:  “पश्चिम भारतात कुणाही मिशनरीला ब्राह्मण आणि उच्चवर्गीयांमध्ये चर्चासत्रे आणि व्यासपीठावरील प्रवचनांसाठी त्यांच्यापेक्षा अधिक मान कधीच मिळाला नाही.”


बायबलच्या नव्या कराराचा एक मोठा भाग त्यांनी मराठीत अनुवादित केला आणि शुभवर्तमानांबद्दलची आणि इतर अनेक धार्मिक पुस्तके लिहिली.  


अमेरिकेतील चर्चच्या जीवनावर त्याच्या प्रभावाबद्दल येल विद्यापीठाचे डॉ. बीच म्हणतात:  “अँडोव्हर सेमिनरीतील विद्यार्थ्यांना हॉल यांनी लिहिलेली पत्रे, तसेच त्यांची पुस्तिका गेल्या शतकाच्या प्रारंभी अमेरिकेला तिच्या मिशनरी कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी सर्वात प्रभावी ठरलेल्या घटकांपैकी होती.”


माझ्या आजोबांच्या कार्याच्या सुरुवातीला आलेल्या विविध संकटांचा मी याआधीच उल्लेख केला आहे. या संकटांत त्यांनी आपल्या ध्येयात आणि कृतीत दाखवलेला निर्धार पुढील मिशनरी कार्यासाठी मार्ग मोकळा करणारा ठरला. आता त्यांच्या जीवनातील एक-दोन प्रसंगांचा मी थोडक्यात उल्लेख करू इच्छितो. माझ्या मते हे प्रसंग ख्रिस्ताच्या कार्याचा एक समर्थ मिशनरी या नात्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणांचे दर्शन घडवतात.
``माझ्या आजोबांच्या आयुष्यातील एकदोन प्रसंग मी येथे सांगेल.  सर्वप्रथम ती घटना जेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबापासून वेगळे व्हावे लागले. त्यावेळी हयात असलेल्या त्यांच्या दोन मुलांची प्रकृती खूपच नाजूक होती. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना अमेरिकेला नेणे आवश्यक असल्याचे ठरले होते.


निरोप घेण्याची वेळ जवळ येत असताना माझ्या आजीने आपल्या पतीला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली.


त्यावर गॉर्डन हॉल यांनी उत्तर दिले: ''“तू काय म्हणते आहेस हे तुला माहीत आहे ना ? मी निरोगी आहे. माझ्या आसपास असलेल्या आत्म्यांना मी ख्रिस्ताचा संदेश सांगू शकतो. मी माझ्या स्वामीचे काम सोडून तुमच्यासोबत अमेरिकेत यावे असे तुला वाटते का?  तर मग तू आपल्या या आजारी बाळांना घेऊन अमेरिकेत जा. मी स्वतः येथेच राहून तुंम्हा सर्वांसाठी प्रार्थना करीन आणि आपल्या प्रभूच्या कार्यात येथे परिश्रम करीन.  आपण अशी आशा करु या की आपल्या या प्रिय मुलांचे जीवन वाचवण्यासाठी देव आशीर्वाद देईल.”


एव्हढे सांगून जॉर्ज हॉल म्हणतात: ``माझ्या आजीने म्हटले कि “त्या क्षणापासून मी त्यांना आमच्याबरोबर येण्याची विनंती करणे थांबवले.”
अशा प्रकारच्या अनुभवातून जाण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना लाभते. निव्वळ मानवी दृष्टिकोनातून पाहता गॉर्डन हॉल यांचे मिशनकार्य त्या वेळी पूर्णपणे निष्फळ आणि भविष्यासाठी आशादायक नसल्यासारखे दिसत होते. अशा परिस्थितीत हॉल यांनी जर आपली पत्नी आणि मुलांच्या विनवण्यांना मान देऊन भारतातील मिशनकार्य सोडून दिले असते तर त्याच्या निर्णयाच्या शहाणपणावर प्रश्न उपस्थित करण्याचा विचार तरी कुणाच्या मनात आला असता काय?


परंतु त्यांच्या मते त्यांनी करावयाची केवळ एकच गोष्ट होती आणि ते साध्य करण्यासाठी पुष्कळ प्रार्थनेद्वारे त्यांना सामर्थ्य मिळाले. असे करून त्यांनी केवळ या मिशनच्या कार्यात सातत्य राखले नाही तर ख्रिस्तामधील त्यांच्या सर्व बांधवांनी अनुसरण्यासारखा आपल्या प्रभूप्रती प्रेमपूर्ण समर्पणाचा एक आदर्श निर्माण केला आहे. आणि त्याच्या जीवनातील तो अंतिम प्रसंग तर या मिशनच्या इतिहासात सदैव स्मरणीय राहील. त्या प्रसंगाचे वर्णन करण्याचा मी प्रयत्न करणार नाही; हा प्रसंग तर सौंदर्याने उजळलेला आहे.
विश्वासाचा हा सैनिक आपल्या जीवनाबाबत किती उदार होता! अनेक दिवस  आजारी आणि मरणासन्न लोकांमध्ये राहून गॉर्डन हॉल त्यांच्या शरीर आणि आत्म्याच्या गरजांची सेवा करत होते. त्यांच्यासाठी आपले स्वतःचे जीवन मुक्तहस्ताने अर्पण करत होते. आता त्यांच्याकडे असलेला औषधांचा साठा संपत आला होता आणि अविरत श्रमांनी ते थकले होते.  पुन्हा औषधे मिळवून पुन्हा गरजूंना मदत करण्यासाठी ते  जात असतानाच ते  स्वतःच आजारी पडले.


प्रभूबद्दल बोलले गेलेले शब्द येथे आपण आदरपूर्वक वापरू शकत नाही का ?


“त्याने इतरांना वाचविले, मात्र स्वतःला तो वाचवू शकला नाही?” 
ख्रिस्ताशी असलेल्या त्यांच्या निकट सहवासाची जाणीवच त्यांच्या मरणाच्या क्षणी त्यांच्या आत्म्याला परम आनंदाने भरून टाकत होती. आठ तासांच्या वेदनेनंतर, आपल्या सोबत असलेल्या दोन भारतीय मुलांसाठी, अमेरिकेतील आपल्या प्रियजनांसाठी आणि भारतातील लोकांसाठी उत्कटतेने प्रार्थना करत, त्यांनी म्हटले: “हे देवा, तुझा गौरव असो.”


अशा प्रकारे त्या रात्रीसाठी आश्रय घेतलेल्या एका मंदिराच्या ओट्यावर त्यांचे निधन झाले. ज्या भीषण रोगाच्या घातक परिणामांपासून इतरांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली होती त्याच रोगाचे ते बळी ठरले होते.

 
एक सरळ, एकनिष्ठ मनाचे, आपल्या प्रभूप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणामुळे ते कोणत्याही प्रयत्नासाठी किंवा कोणत्याही त्यागासाठी समर्थ ठरले. आपल्या कार्यात मग्न असताना आणि सेवा करत असताना आणि अगदी त्यांनी स्वतःच  निवडले असते अशाचप्रकारे या जगाचा  त्यांनी निरोप घेतला. देवाच्या सेवकाची अशीच वृत्ती असते. ‘’ 

Camil Parkhe