Did you like the article?

Thursday, December 25, 2025

 


सावित्रीबाई आणि जोतिबांच्या आजही कायम राहिलेल्या काही पाऊलखुणांपैकी एक असलेली पुणे कॅम्पातील घाशीराम कोतवालच्या मध्ययुगीन गढीच्या अगदी समोर असलेली ही सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळा.
सावित्रीबाई आणि जोतिबाचे शिक्षक दाम्पत्य असलेल्या मार्गारेट आणि जेम्स मिचेल या स्कॉटिश मिशनरींचे इथेच वास्तव्य होते, येथील आवारातच फुले दाम्पत्याने शिक्षण घेतले याविषयी आता शंका नसावी
सत्तरच्या दशकात विजया श्यामराव पुणेकर सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेच्या मुख्याधिपिका होत्या. नंतरच्या काळात त्या मुंबईतील जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या सेंट कोलंबा गर्ल्स हायस्कुलच्या आणि पुण्यातीलच एथेल गॉर्डन अध्यापन विद्यालयाच्या प्राचार्य होत्या.
जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी म्हणजेच पूर्वीचे स्कॉटिश मिशन.
मुंबईत १९९० साली भरलेल्या चौदाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे विजया पुणेकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते.
विजया पुणेकर यांनी सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेचा अगदी जुना तसेच गेल्या काही दशकांचा इतिहास संक्षिप्तपणे लिहिला आहे.
अर्थात या लेखात सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचा नामोल्लेखदेखील नाही.
स्कॉटिश मिशनच्या म्हणजेच मुंबईत मुख्यालय असलेल्या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील चारही शाळा सावित्रीबाई आणि जोतीबांचा या शाळेशी असलेल्या निकट संबंधांबद्दल आजही पूर्णतः अनभिज्ञ आहेत.
सन १९८२च्या डिसेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या विजया पुणेकर यांच्या लेखातील काही मजकूर पुढीलप्रमाणे आहे:
स्कॉटिश मिशनची पुण्यातील पहिली शाळा-सेंट मार्गारेट स्कूल अँड चिल्ड्रेन्स होम
भारतातील शैक्षणिक संस्थांच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास स्कॉटिश मिशनरींनी सुरू केलेल्या संस्था दीर्घकाळपर्यंत भव्याहतपणे चालू राहिलेल्या आहेत असे आदळते.
तसेच या संस्थांनी सुरुवातीच्या काळात प्राप्त केलेला उच्च शैक्षणिक दर्जा आजतागायत राखलेला आहे हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
१८२३ साली स्कॉटिश मिशनरी सोसायटीतर्फे पाठविलेले पहिले मिशनरी रेव्ह. डॉनाल्ड मिचेल पश्चिम भारतात आले. केवळ दहा महिन्यांच्या अवधीत त्यांनी कोकणात दहा शाळा सुरू केल्या.
त्यांच्यानंतर आलेल्या मिशनरींनी १८२७ सालाअखेर ८० शाळा सुरू केल्या होत्या. त्यांपैकीच एक शाळा पुढे सेन्ट मार्गारेट शाळा म्हणून ओळखली गेली.
डॉ. जॉन विल्सन हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले स्कॉटिश मिशनरी १८२९ साली आपल्या पत्नी मार्गारेट यांच्यासमवेत पश्चिम भारतात कार्य करण्यासाठी आले.
अगदी थोड्या अवधीत त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. स्त्री-शिक्षणाची आवश्यकता विल्सन दांपत्याला पुरेपूर पटलेली होती. त्यांनी प्रथम कोकणात, नंतर मुंबईत मुलींच्या शाळा सुरू केल्या.
त्याच सुमारास पुणे या ठिकाणी रेव्ह. जेम्स मिचेल भाणि त्यांच्या पत्नीची मिशनरी म्हणून नेमणूक झाली होती. १८४० साली पुण्यामध्ये मुलींच्या एकूण पाच शाळा मिचेल दांपत्य चालवित होते.
त्यानंतर १८४१ साली मिसेस् मिचेल यांनी मार्गारेट विल्सन यांनी सुरू केलेल्या बोर्डिंग स्कुलच्या धर्तीवर स्टेनली रोड या ठिकाणी आपल्या राहत्या बंगल्यात एक बोर्डिंग सुरू केली.
तिला सेन्ट मार्गारेट स्कुल असे नाव देण्यात आले.
मिसेस जेम्स मिचेल स्कॉटलंडदेशी १८६६ साली गेल्यानंतर काही काळ मिसेस (जॉन) मरे मिचेल आणि नंतर मिसेस अँगस आणि मिसेस गार्डनर यांनी शाळा व वसतिगृह यांचे कामकाज पाहिले.
१८६६ साली मिसेस गार्डनरच्या काळात सध्याची शाळेची इमारत बांधली गेली.
स्कॉटलंडमध्ये वार्षिक सेल भरवून स्त्रियांनी ही इमारत बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळविले होते.
१८७२ साली मिसेस बिमॉन्ट यांनी बोर्डिंगची जबाबदारी उचलली. मिसेस मिलर, मिस स्मॉल या मिशनरींनी १८८९ पर्यंत बोर्डिंगचे व इतर काम पाहिले. त्यानंतर मिस पॅक्स्टन आणि मिस लिजरवूड या मिशनरींनी 'पूना विमेन्स वर्क' आणि सेन्ट मागरिट स्कूल आणि बोर्डिंगची जबाबदारी स्वीकारली.
त्यांच्यानंतर अनेक वर्षे या शाळेत काम केलेल्या मिशनरी म्हणजे जेन टेलर. पूर्वी त्या मिस वॉट म्हणून ओळखल्या जात. त्यांची कारकीर्द मोठी होती.
सगुणाबाई भिंगारदिवे या मेट्रनबाईचे त्यांना मोठे सहकार्य मिळाले. विल्सन कॉलेजच्या डॉ. टेलर यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या जागी सगुणाबाईच्या कन्या मालतीबाई भिंगारदिवे शाळेच्या प्रमुख झाल्या.
तत्पूर्वी त्या सेंट अँड्र्यूजमध्ये शिक्षिका दोत्या. सखूबाई आढाव आणि कमळाबाई कोहाळकर यांनीही या शाळेत अनेक वर्षे मेटूनचे फाम केले.
या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे कोर्ट कमिटेड आणि अनाथ मुलांसाठी वसतिगृह चालविणे हे होय. जुनी इमारत असूनही मुलींना जास्तीत जास्त सुखसोयी करून दिल्या गेल्या आहेत.
मालतीबाईंच्या काळात एक नवीन डॉर्मेटरी आणि वर्गासाठी दोन खोल्या बांधल्या गेल्या. त्या शिस्तप्रिय आणि उच्च शैक्षणिक दर्जा राखणाऱ्या म्हणून लक्षात राहतील, कृपाबाई पंडित काही काळ शिक्षिका होत्या. नंतर त्या मेट्रनचे काम पाहत.
कृपाबाई कदम या थर्ड इयर उत्तीर्ण झालेल्या शिक्षिकेने दीर्घकाळ तेथे अध्यापन केले. तसेच मेरीबाई गेटस, गेनूबाई शिंदे, मनुबाई पंडित, लीला सेडकर, विमल चव्हाण, गंगूबाई गायकवाड व पद्मा जाधव यांनीही अनेक वर्षे या शाळेत ज्ञानदानाने कार्य केले आहे.
चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनचे पौड या ठिकाणी असलेले अनाथाश्रम बंद करण्यात येऊन तेथील मुले, मुली आणि मेट्रन्स या सर्वांना मागरिट शाळेत आणि वसतिगृहात राहण्यास आणले गेले, त्यावेळी कमळापाई कोहाळकर पौडहून पुण्यास आल्या.
मालतीबाईंनी पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या अनेक संस्थांतून सेवा केली, परंतु त्यांची सेन्ट मार्गारेट शाळेतील सेवा सर्वांत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा शांत आणि प्रेमळ स्वभाव सर्वांची मने जिंकून घेई. त्यांनी शाळेच्या हेडमिस्ट्रेस म्हणूनही काम पाहिले आणि शैक्षणिक दर्जा उच्च प्रतीचा राखला.
मालतीबाईंच्या नंतर माणिकबाई पारधे शाळेच्या प्रमुख म्हणून नेमल्या गेल्या. त्यांना बेने इस्राएल शाळेत शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि ट्रे. कॉलेज वसतिगृहप्रमुख अशा विविध कामांचा अनुभव होता. त्या १९६४ साली प्रमुख झाल्या. त्यावेळी शाळेत इ. १ ते ७ वीचे एकूण ११ वर्ग होते.
१९७१ सालापासून ५ ते ७ या इयत्ता दरवर्षी एक याप्रमाणे कमी केल्या गेल्या. सध्या १ ते ४ इयत्ताच असल्या तरी वसतिगृहात ८२ विद्यार्थिनी आहेत.
वसतिगृहाच्या कामाला या संस्थेत अधिक महत्त्व दिले जाते. सध्या ७५ कोर्ट कमिटेड आणि ७ खाजगी विद्यार्थिनी आहेत.
कोर्ट कमिटेड मुलींसाठी समाज कल्याण खात्याकडून प्रत्येकी मासिक ६५ रु. विद्यावेतन मिळते. भोजन, कपडे, वह्या, पुस्तके, अंथरुण, पांघरुण यासाठी हे अपुरे पडते. तेव्हा ही आर्थिक तूट स्कॉटलंड मिशनकडून मिळणाऱ्या विशेष अनुदानाने भरून काढली जाते.
माणिकवाई पारधे मुलींच्या वैयक्तिक गरजांकडे जातीने लक्ष पुरवीत, वसतिगृह घरासारखे वाटावे म्हणून त्या प्रयत्नशील असत. काही काळ त्यांनी शाळेच्या हेड-मिस्ट्रेसचेही काम पाहिले. ५ ते ७ या इयत्ता बंद केल्यामुळे मोकळ्या झालेल्या खोल्यांचा उपयोग सभा-संमेलनासाठी होई. या कामागाठी माणिकबाईंच्या अनुभवाचा उपयोग झाला. मिस बायर्स यांचेही त्यांना काही वर्षे सहकार्य लाभले.
१९७५ सालापासून सौ. मनोरमा ठाकूर यांनी माझ्या (विजया पुणेकर यांच्या) मार्गदर्शनाखाली हेडमिस्ट्रेसच्या कामाची जबाबदारी स्वीकारली,
पुणे शहरातील मिशनच्या अनेक प्राथमिक शाळांतून त्यांनी काम केले होते. शाळेच्या कामात सरकारी धोरणाप्रमाणे झालेले बदल समजून येऊन त्यांनी काम केले, त्या मे १९८२ मध्ये सेवानिवृत्त झाल्या.
वसतिगृहाच्या कामातून त्यापूर्वी १९८१ मध्ये मानिकबाई सेवानिवृत्त झाल्यावर कु. मंगला सोनतळे यांच्यावर वसतिगृह आणि केंद्र यांच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली. हे जबाबदारीचे आणि त्यांच्यासाठी नवीन असे काम त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
१९८२ सातापासून कु. मार्याबाई सूर्यवंशी मुख्याध्यापिका झाल्या आहेत, सुदिना चक्रनारायण, कमल देठे आणि सरोज क्षीरसागर या त्यांच्या सहाय्यक शिक्षिका आहेत. शाळेत सध्या (१९८२ साली) २१७ मुले आहेत.
जुलै १९८२ मध्ये सेन्ट कोलंबा स्कूल (मुंबई) या ठिकाणी माझी (विजया पुणेकर यांची) नेमणूक झाल्यापासून श्री. मोहन कोतवाल, सेन्ट जॉन स्कूलचे मुख्याध्यापक, या शाळेचे मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत.''
पुण्यातील, महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातली एक सर्वांत जुनी आणि आजतागायत चालू असलेली ही सेंट मार्गारेट बालवाडी आणि मराठी प्राथमिक शाळा उद्या शनिवारी सकाळी डिसेंबर २० रोजी आपला वार्षिक दिन साजरा करत आहे


Camil Parkhe

 

पुणे मराठी ख्रिस्ती संघाचे कामकाज करोना काळात आणि काही वैयक्तिक कारणांमुळे गेली काही वर्षे ठप्प पडले होते. गेली शतकभर (१९२७पासून) होत असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिकमध्ये जानेवारीत सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

'शतकातील ख्रिस्ती साहित्य संमेलने' या शीर्षकाचे एक जाडजूड पुस्तक मी अलीकडेच लिहून हातावेगळे केले आहे.
या पार्श्वभूमीत शहरातील पुणे मराठी ख्रिस्ती संघाचे अस्तित्व संपल्यासारखे आहे ही बाब मला अस्वस्थ करत होती.
हा विषय मी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष नगर-स्थित पौलस वाघमारे यांच्याबरोबर फोनवर बोलताना काढला आणि ते म्हणाले '' तुम्ही या विषयात पुढाकार घेत असाल तर बोलावू या आपण एक मिटिंग.''
तर ही मिटिंग पुण्यात झाली आणि संघाची जुनी बरीच मंडळी (वय अवघे पन्नास ते नव्वद) जमली, त्यात विद्यमान अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी होते. सचिवाची जागा खाली होती.
सचिव म्हणजे संघाचा कार्यकारी प्रमुख, ते पद कोण घेणार?
मी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अगदी सीमावर्ती भागातला. भामाठाण आणि मुठे वाडगाव या दोन गावांच्या मध्ये वाहणारी गंगा किंवा गोदावरी नदी या दोन प्रदेशांमध्ये विभाजक म्हणुन काम करते.
गंगेच्या एका बाजूला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाहेगाव इथे आम्ही पारखे मंडळी `गाववाले'.
मात्र माझा जन्म आणि बालपण पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथे.
तर आमच्याकडच्या ग्रामीण भाषेत एक जुनी म्हण आहे.. ``पाटील बुवा, आता तरी लग्न करा की..
यावर पाटलांचे उत्तर..`` व्हा तुमीच बायको''...
तर अशीच आफत माझ्यावर यावेळी गुदरली.
कुणीच ते सचिव पद स्वीकारायला तयार नव्हते आणि सभेची सूत्र माझ्या हातात असल्याने मीच ते पद घ्यावे असा आग्रह झाला
आणि पन्नास वर्षांचा इतिहास असलेल्या या पुणे मराठी ख्रिस्ती संघाचा मी सचिव बनलो.
कुठलेही पद, सत्कार किंवा गौरव स्वीकारायचे नाही असे मी ठरवले आहे. या माझ्या निर्णयाला येथे मला मुरड घालावी लागली
या शहरात मी राहत असलो तरी आतापर्यंत पुणे मराठी ख्रिस्ती संघाशी माझा कसलाही संबंध आलेला नाही. तरीसुद्धा मी हा पुढाकार घेतला हे त्यामागचे कारण
पुणे मराठी ख्रिस्ती संघाचा चांगला इतिहास आणि काम आहे. दर महिन्याला या संघाची बैठक होत असे, `शब्दसेवा' हे अनियतकालिक नियमितपणे प्रकाशित केले जात होते.
सन १९७२ साली स्थापन झालेल्या या संघाने ख्रिस्ती साहित्य संमेलनांना आतापर्यंत एकूण सहा अध्यक्ष दिली आहेत.
भास्करराव जाधव (बारामती १९७५), जयंतकुमार त्रिभुवन (कोल्हापूर १९८६), विजया पुणेकर (मुंबई १९९०) , अशोक आंग्रे (अहमदनगर २०१२), अनुपमा डोंगरे जोशी (श्रीरामपूर २०१२) आणि पौलस वाघमारे (बीड २०२२) ही ती नावे.
त्याशिवाय पुणे मराठी ख्रिस्ती संघाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पंधरावे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १९९२ साली भरवले होते.
तर अशा या साहित्य संघाची स्नेहसदनमध्ये काल दुसरी बैठक झाली, त्या बैठकीनंतरचा हा ग्रुप फोटो.

Camil Parkhe

Thursday, November 27, 2025

 


आज तारीख २५ नोव्हेंबर. आजपासून बरोबर एक महिन्याने ख्रिसमस अर्थात नाताळ.
ख्रिस्तजन्माच्या या सणाला मराठीत नाताळ हा शब्द रुढ झाला तो शेजारच्या गोव्यात तब्बल साडेचारशे वर्षे ठाण मांडून बसलेल्या फिरंगी पोर्तुगिजांमुळे.
अनेक युरोपियन भाषांत वापरल्या जाणाऱ्या नाताळ या शब्दाचे मूळ `Natalis' मात्र लॅटिन आहे.
लॅटिन, पोर्तुगीज आणि इतर युरोपियन भाषांत आपल्या मराठीत आणि दक्षिण भारतीय भाषांत आढळणाऱ्या `ळ' या उच्चाराचे अक्षर आहे कि नाही हे मला माहित नाही.
मात्र पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत अवतार घेताना Natal या शब्दाने `नाताल' न होता मराठमोळे `नाताळ' रूप घेतले हे गमतीदार आहे.
मात्र मला `नाताळ' या शब्दाच्या व्युत्पत्तीशास्त्रात शिरायचे नाही.
नाताळाला एक महिना असताना आता ख्रिसमस विशेषांकांची लगबग सुरु झाली आहे.
यावेळी सातआठ दिवाळी अंकांत माझे लेख होते.
त्यापैकी तीनचार जणांनी बऱ्यापैकी मानधन दिले, एकाने फक्त दिवाळी अंक घरपोच आणून दिला तर इतर दोन जणांनी दिवाळी अंक पोस्टाने पाठविण्याचीसुद्धा तसदी घेतली नाही.
त्या अंकात माझा लेख छापून आला हे एका तिऱ्हाईताने फोन केल्याने कळाले.
नाताळ विशेषांक पुण्यातून नियमितपणे प्रकाशित करणाऱ्या दयानंद ठोंबरे यांनी आपल्या `अलौकिक परीवार' या विशेषांकाच्या प्रकाशन सोहोळ्याला ९ डिसेंबरचा मुहूर्त शोधला आहे.
मात्र त्याआधीच सव्वाशे वर्षे जुन्या (स्थापना एप्रिल १९०३) असलेल्या `निरोप्या' मासिकाचा नाताळ विशेषांक वर्गणीदारांना दोन-तीन डिसेंबरच्या दरम्यान घरपोच मिळणार आहे.
त्याशिवाय पिंपरी चिंचवडचे फ्रान्सिस गजभिव हे `शब्द' नाताळ विशेषांक काढत असतात.
गेली काही वर्षे वसईतून ख्रिस्तोफर रिबेलो 'ख्रिस्तायन' हा ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन प्रकाशित करत आहेत. त्याशिवाय इतरही अनेक जण ख्रिसमस विशेषांक प्रकाशित करत असतात.
ख्रिसमस अंक प्रकाशित करणाऱ्यांमध्ये हौशे, नवसे आणि गवसेही असतात.
प्रत्येक छापील दिवाळी अंकाची आर्थिक उलाढाल तीन ते पाच लाख रुपयांच्या आसपास असते असे म्हणतात. बहुतांश ख्रिसमस विशेषांकांच्या बाबतीतसुद्धा असेच आहे.
माझ्या माहितीनुसार `निरोप्या' मासिकाचे पहिले भारतीय संपादक फादर प्रभुधर यांनी १९७५ साली नाताळ विशेषांकांची परंपरा सुरु केली.
त्यावेळी श्रीरामपुरात दहावीत शिकत असलेल्या माझा एक अर्धा पानभर लेख या अंकात आहे.
`निरोप्या'च्या त्या नाताळ विशेषांकाचे खाली दिलेले खास भारतीय शैलीतले मारियाबाई आणि बाळ येशुचे चित्र असलेले हे कव्हर होते.
चित्रकार कोण असेल बरे? बहुधा अँजेला त्रिन्दाद....


Camil Parkhe



ऐंशीच्या दशकाच्या मध्यात रशिया-बल्गेरिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम करुन मी गोव्याला परतलो ते पत्रकारितेच्या व्यवसायातील दोन अतिशय महत्त्वाची आयुधे घेऊन.

पणजी येथे `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात क्राईम, मुंबई हायकोर्टाचे गोवा खंडपीठ आणि एज्युकेशन कॅम्पस या बिट्स मी हाताळत असताना मला आणि इतर काही सहकाऱ्यांना आमच्या ऑफिसात बसण्यासाठी स्वतंत्र लाकडी टेबल किंवा लाकडी खुर्ची नव्हती.
बसायची जी काही व्यवस्था होती ती सामाईक होती.
त्याचप्रमाणे बातम्या टाईप करण्यासाठी माझ्यासाठी वेगळा असा टाईपरायटरपण नव्हता.
एका जाडजूड आकाराच्या आणि वजनदार गोदरेज कंपनीच्या टाईपरायटरवर मी, ऑफिसातील काही उपसंपादक आणि उशिरा संध्याकाळी अर्धवेळ असलेला स्पोर्ट्स रिपोर्टर काम करत असत.
आता परदेशातून येताना मी बरोबर एक नाजूक, वजनाने अतिशय हलका आणि पाचसहा इंचांची रुंदी असलेला रेमिग्टन कंपनीचा पोर्टेबल टाईपरायटर आणला होता.
रशियन ऐरोफ्लोट विमानाने मॉस्कोतून मी दिल्ली विमानतळावर उतरलो तेव्हा माझ्या थ्री-पिस सुटावरील ओव्हरकोटवर गळ्याभोवती घातलेला एक रशियन-मेड छोटासा कॅमेरासुद्धा होता.
आम्हा पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना बल्गेरियात प्रशिक्षणाच्या काळात छोटासा पॉकेटमनी दिला होता, त्यातून मी ही माझ्या जीवनातली एक अतिशय मौल्यवान खरेदी केली होती.
या दोन उपकरणांचा मी पुढील दहाबारा वर्षे भरपूर वापर केला. पत्रकारितेतील ही दोन वैयक्तिक उपकरणे बाळगणारा त्या काळात गोव्यातला मी एकमेव बातमीदार होतो.
त्यानंतरसुद्धा तीनचार वेळेस नवनवीन कॅमेरे खरेदी केले. बातमीदारी करताना फोटोग्राफर नसल्यास स्वतःच छायाचित्रे घ्यावी हा त्यामागचा हेतू.
त्या जुन्या काळात फोटोग्राफ घेणे, त्यांची प्रिंट्स घेणे हा खूप खर्चिक मामला असायचा.
जग दुसऱ्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर असताना पुण्यात `इंडियन एक्सप्रेस'मध्ये बातमीदार असताना मराठी साहित्यिकांचा एक कार्यक्रम मी कव्हर केला.
मला त्या कार्यक्रमाची असाईनमेन्ट नसताना स्वतःहून मी या कार्यक्रमाला गेलो होतो. याचे कारण तेथे `अगा जे कल्पिले नाही' हे मराठीतील पहिले दलित आत्मकथन (साल १९७५) लिहिणारे सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार होता.
सूर्यवंशी हे सत्तरच्या दशकात नाशिकहून प्रसिद्ध होणाऱ्या 'आपण' या मराठी साप्ताहिकाचे संपादक होते.
मी दहावीला असताना माझ्या दोन लघुकथा 'सूर्यवंशी यांनी `आपण' मध्ये बाल सदरात छापल्या होत्या आणि त्यानंतर श्रीरामपूरच्या माझ्या घराच्या पत्त्यावर पाच-पाच रुपयांच्या दोन मनीऑर्डर्स पाठवल्या होत्या.
पत्रकारितेच्या माझ्या भावी व्यवसायातील ही पहिलीवहिली कमाई.
तर त्या दिवशी सूर्यवंशी यांना पुरस्कार दिला जात असताना मी काही छायाचित्रे घेतली.
व्यासपीठावर इतर जण होते मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे इतर चार माजी संमेलनाध्यक्ष :
पुण्यातल्या नाना पेठेतील एथेल गॉर्डन अध्यापन विद्यालयाच्या प्राचार्य विजया श्यामराव पुणेकर, कर्वे रोडवरील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक जयंतकुमार त्रिभुवन, नगरच्या सेंटर फॉर स्टडीज इन रुरल डेव्हलपमेंटचे डेव्हलपमेंट (सीएसआरडी) चे संचालक आणि `ज्ञानोदय' मासिकाचे संपादक प्रा. सुधीर देवीप्रसाद शर्मा आणि कवी निरंजन उजगरे.
दुसऱ्या दिवशीच्या `इंडियन एक्सप्रेस'च्या न्यूजलाईन मध्ये या कार्यक्रमाची बातमी मी घेतलेल्या छायाचित्रासह माझ्या नावानिशी प्रसिद्ध झाली.
स. ना. सूर्यवंशी यांची जयंतकुमार त्रिभुवन आणि `निरोप्या' मासिकाचे संपादक फादर ज्यो गायकवाड यांनी या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात मी शब्दबध्द केलेला लेखसुद्धा `निरोप्या' मासिकात प्रसिद्ध झाला.
या दोन्हींची कात्रणे आजही माझ्याकडे आहेत.
हे फोटो मी घेतले, कार्यक्रमाच्या बातम्या आणि लेख लिहिले आणि नंतर ते मी विसरून गेलो.
या पाचही मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या एकत्रित फोटोच्या रुपाने माझ्याकडे एक किती मौल्यवान ऐवज राहिला आहे हे मला खूप काळानंतर कळाले.
या पाचही साहित्य संमेलनाध्यक्षांपैकी आज कुणीही हयात नाही.
याआधीही विविध संमेलनांच्या निमित्ताने ते अनेकदा एकत्र आले होते, मात्र त्यांचा असा एकत्रित फोटो कुठेही नसावा.
हा फोटो किती दुर्मिळ आणि त्यामुळे अमूल्य आहे याची जाणीव मला अलीकडच्या काळात प्रकर्षाने झाली.
नूतन २०२६ वर्षांच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यांत सातारा येथे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्याचप्रमाणे सत्ताविसावे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन वसईचे कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे होत आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन एक शतकापूर्वी १९२७ साली नाशिक शहरातच भरले होते हे मराठी साहित्य विश्वात अनेकांना माहिती नसेल.
`स्मृतिचित्रे' कार लक्ष्मीबाई टिळक नागपुरातल्या १९३३सालच्या चौथ्या महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
तर या दोन्ही आगामी साहित्य संमेलनांच्या निमित्ताने गेल्या शतकातील मराठी साहित्य संमेलनांचा संक्षिप्त आढावा घेणारे आणि २००५ ते २०२२ या काळात झालेल्या पंधरा ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या संमेलनाध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे संकलन मी केले आहे.
या आधीच्या काळातील म्हणजे १९२७ ते २००१ सालापर्यंतच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे सुनील श्यामसुंदर आढाव यांनी आपल्या `धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या ग्रंथात संकलीत केली आहेत.
माझ्या या पुस्तकाची सुरुवात होते ती मुळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना १८८५च्या मराठी ग्रंथकारांच्या दुसऱ्या संमेलनास आपण येणार नाही असे सांगणारी, विद्रोहाची भुमिका घेणाऱ्या जोतिबा फुले यांच्या पत्रापासून.
या पुस्तकाची संहिता चेतक बुक्सचे कुणाल हजेरी यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर या पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांध्यक्षांचा हा फोटो कालच मी माझ्या पोतडीतून शोधून काढला आहे.
असाच एकूण पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांचा आणखी एक दुर्मिळ फोटो मला डॉ अनुपमा निरंजन उजगरे यांच्या सौजन्याने मला मिळाला आहे.
वसईत २०१९ साली झालेल्या एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हे पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष एकत्र जमले होते.
ते होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अशोक आंग्रे, डॉ. नाझरेथ मिस्किटा, फादर मायकल जी. आणि स्वतः अनुपमा उजगरे.
या घडीला या सर्वांचे वयमान अवघे सत्तर ते पंच्याऐंशीच्या दरम्यान.
पाच माजी साहित्य संमेलनाध्यक्ष एकत्रित येणे हा तसा एक दुर्मिळ योग आहे याची जाणीव होऊन अनुपमा उजगरे यांनी कुणाला तरी हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची विनंती केली होती.
त्याबद्दल धन्यवाद अनुपमाताई !
मराठी साहित्य संमेलनांविषयीच्या माझ्या या आगामी पुस्तकातील हे दोन फोटो महत्त्वाचे आकर्षण असतील याबद्दल शंकाच नसावी.
Camil Parkhe




Monday, November 3, 2025

 

                                                                            Jemimah Rodrigues

झेनिया डिकुन्हा ESPN Sports Media Ltd.

एक सामना अजून बाकी आहे, पण वांद्रे गर्ल जेमिमा रॉड्रिग्ज त्याआधीच एक दंतकथा बनली आहे. 
नवी मुंबईत जेमिमा रॉड्रिग्जने भारताला महिला क्रिकेटच्या विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचवले, ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत एक क्रिकेटिंग चमत्कार घडवला.

नवी मुंबई तिच्यासाठी “घरचं मैदान” असलं तरी ती मनाने वांद्रेचीच आहे. तिच्या वांद्रे ओळखीत काही गुण ठळक आहेत — घट्ट कौटुंबिक नाती, प्रगाढ श्रद्धा (बांद्रात १६व्या शतकात पहिलं चर्च बांधलं गेलं) आणि संगीताची आवड.

गेले दोन दिवस तिच्याबद्दल समाजमाध्यमांत चर्चा चालली आहे. ती एक सोशल मीडिया सेलेब्रिटी बनली आहे.

पण याचबरोबर ती वारंवार ऑनलाईन ट्रोलिंगची बळीसुद्धा ठरली आहे, विशेषतः तिच्या धार्मिक श्रद्धांमुळे — कारण ती अल्पसंख्याक समुदायातील आहे.

जेमिमा तिच्या श्रद्धा आणि आत्मविश्वास अभिमानाने दाखवते. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, “बायबल म्हणतं, ‘रात्री रडणं असतं, पण सकाळी आनंद येतो.’ आज आनंद आला, पण मी अजूनही रडते आहे.”

ती एकटी नाही — तिचं संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत आहे. तिचे वडील इव्हान तिच्या सातव्या वर्षापासून तिचे प्रशिक्षक आहेत. तिचे भाऊ इनॉक व एली, यांच्याकडून तिने क्रिकेट शिकायला सुरुवात केली.

ह्याच कुटुंबातून तिला शक्ती मिळाली — प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी, प्रत्येक ट्रोलिंगनंतर हसण्यासाठी.

जेमिमा तिच्या जीवनाबद्दल उघडपणे बोलते — तिचं संगीत, तिची श्रद्धा, तिचं चर्चमधील गायन, आणि बायबलमधील वचने ती खुलेपणाने शेअर करते. ती गिटार वाजवते.

ती ज्या वांद्रे वेस्ट भागात वाढली, तिथे श्रद्धा सर्वत्र आहे — रस्त्यांवरील क्रॉस, मारियामातेच्या उत्सवातले जल्लोष, ख्रिसमसचा आनंद आणि उपवासकाळ लेन्ट सिझनचे गांभिर्य — हे सर्व तिथे एकत्र अनुभवले जाते.

तिचा गिटार आणि बॅट दोन्ही तिच्या ओळखीचा भाग आहेत. ती परदेशी लीगमध्ये सहकाऱ्यांसोबत गाणी गाते, नाचते, रील्स बनवते — अगदी कोणत्याही तरुण भारतीयासारखी.

तिने उपांत्य फेरीतील पत्रकार परिषदेत रडत सांगितलं, “मी हे बोलते कारण जर कोणीतरी हेच अनुभवत असेल, तर त्यांना समजेल की एकटी नाही. स्पर्धेच्या सुरुवातीला मला प्रचंड चिंता होती.”

त्या वेळीच तिने बायबलमधील वचन उद्धृत केलं — “रात्री रडणं असतं, पण सकाळी आनंद येतो.”

शतकानंतर मातीने माखलेली तिची जर्सी, अश्रूंनी भरलेला चेहरा — हीच खरी जेमिमा आहे. एकेकाळची हसरी, ब्रेसेस घातलेली मुलगी आता भावनांनी ओथंबलेली योद्धा बनली आहे.

एक सामना अजून बाकी आहे, पण जेमिमा रॉड्रिग्ज आधीच एक दंतकथा बनली आहे. आणि हे सर्व तिने जेमिमा स्टाईलमध्ये केलं आहे.

Camil Parkhe  

Monday, October 6, 2025

 

                                                                        राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

आता निर्माण झाले आहे जवळपास अगदी तसेच वातावरण सहासात वर्षांपूर्वी निर्माण झाले होते.
राष्ट्रपती सदनातून नुकतेच पायउतार झालेले महामहिम प्रणवदा मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्विकारले आहे असे वृत्त झळकले तेव्हा आतासारखाच पुरोगामी गटात सन्नाटा पसरला होता आणि प्रतिगामी म्हणा किंवा उजव्या गटात म्हणा आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या.
प्रणवदा यांच्या रुपाने संघाच्या गळाला खूप मोठा देवमासा लागला होता यात शंकाच नव्हती.
इंदिराबाईंच्या हत्येनंतर मॅडमच्या मंत्रिमंडळात दोन क्रमांकाचे स्थान असलेल्या मुखर्जी यांनी लगेच एक क्रमांकाच्या जागेवर आपला हक्क सांगितला होता. त्यामुळे पंतप्रधान पदावर आलेल्या राजीव गांधी यांनी त्यांना सत्तेबाहेर ठेवले होते.
विजनवासाचा तो अल्पकाळ वगळता त्यांची संपूर्ण कारकीर्द सत्तेच्या उबेत गेलेली होती. स्वबळावर आपल्या पश्चिम बंगाल राज्यात कुठल्याही पदावर निवडून येण्याची क्षमता नसतानासुद्धा.
नवलाची बाब म्हणजे नंतर सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आल्या आणि नंतर त्यांनी आपल्या पक्षाला महाराष्ट्रासह विविध राज्यांत पुन्हा सत्तेवर आणले, केंद्रातही सलग दोनदा सत्तेवर आणले.
या काळात प्रणवदा त्यांचे सर्वांत अधिक विश्वासू सहकारी होते. त्यामुळेच मुखर्जी देशाच्या सर्वोच्च म्हणजे राष्ट्रपतीपदावर पोहोचले.
काँग्रेस सत्तेतून पायउतार झाल्यानंतर हेच प्रणव मुखर्जी संघाच्या गळी लागले. प्रणवदा यांनी संघाच्या मंचावर जाण्याचे निमंत्रण स्विकारले यावरुन त्यावेळी मोठे वादंग निर्माण झाले होते.
असे असतानाही मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात हजर राहिले, तेथे त्यांनी भाषणा केले. ही बाब संघाने आपलीच पाठ थोपटून घेण्यासारखी होती यात वादच नव्हता.
नंतर प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या हयातीतच आणि सर्व संवेदना शाबूत असताना भारतरत्न मिळाले.
त्याबद्दलसुद्धा त्यांना अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटले असेल.
हे भाग्य तर भाजपच्या इतर कुठल्याही नेत्याला आजतागायत लाभलेले नाही.
संघाला आणि भाजपला आपले नेते आणि आदर्श नेहेमीच आयात करावे लागतात, हल्ली आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा.
आपल्या घरातील व्यक्तीने - मग ते पंतप्रधान का असेनात - आपले कौतुक करावे यात काय ते विशेष?
आपल्याला कधीकाळी पाण्यात पाहणार्या लोकांनी आपल्या मांडवात येऊन, आपल्या झेंड्याखाली येऊन, आपल्या प्रतिमांना वंदन करणे निश्चितच अभिमानास्पद असते.
त्यामुळेच खासदारबाईंची कार्यक्रमात हजेरी, जुन्या काँग्रेस नेत्यांचे गणवेशातले संचलन आणि झेंड्याला सलामी याला महत्त्व आणि बातमीमुल्य प्राप्त होते.

Camil Parkhe


Monday, September 22, 2025

 

                                                       सायमन मार्टिन

यंदा फार जुनी परंपरा असलेल्या दोन साहित्य संमेलनांचे बार पुढील वर्षांरंभात लागोपाठ उडणार आहेत.
शतकाच्या उंबरठ्यावरचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर शंभर वर्षांची परंपरा असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला नऊ ते अकरा जानेवारीला होणार आहे.
दोन्ही साहित्य संमेलनांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे.
`पानिपत'कार पाटील यांच्या अलिकडच्या आरक्षणाबाबतच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवडीबद्दल साहजिकच संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
असल्या वादांमुळेच खरे तर मराठी साहित्य संमेलनांत रंगत आणि मजा येते असे म्हटले जाते.
माझ्या आठवणीप्रमाणे वादाची ही गौरवशाली परंपरा घोषित आणीबाणीपर्वात कराड येथे दुर्गाबाई भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पुल देशपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या 1975 सालच्या संमेलनापासून सुरु झाली आहे. असो.
तर मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेने आपल्या घटनेनुसार संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करुन, इच्छूक उमेदवारांकडून रितसर अर्ज मागवून, त्यांच्या मुलाखती वगैरे असे सर्व सोपस्कार पार पाडून संमेलनाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे.
बीड येथे झालेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आणि परिषदेचे विद्यमान अध्यक्ष पौलस वाघमारे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
वसईचे फादर विजय गोन्साल्विस अध्यक्षपदी असलेला नाशिक ख्रिस्ती साहित्य संघ नियोजित सत्ताविसाव्या संमेलनाचा यजमान आहे.
किमान दहा पुस्तके आपल्या नावावर असलेल्या व्यक्तीच यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी पात्र होत्या. याचे कारण एकही साहित्यकृती नसलेले लोक यापूर्वी संमेलनाध्यक्ष झालेले आहेत.
दुसऱ्या एका अलिखित संकेतानुसार यावेळचे साहित्य संमेलनाध्यक्षपद कॅथोलिक व्यक्तीसाठी राखीव होते. दोन वर्षानंतर होणाऱ्या संमेलनासाठी हे पद प्रोटेस्टंट साहित्यिकांसाठी राखीव असेल.
मार्टिन यांच्याव्यतिरिक्त यंदा दोन इतर साहित्यिक रिंगणात होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक हेमंत घोरपडे आणि वसई येथील आणि संध्या नागालँड येथे कार्यरत असलेले सालेशियन किंवा डॉन बॉस्को संस्थेचे फादर नेल्सन फलकाव यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते.
निवड समितीने यापैकी मार्टिन आणि घोरपडे यांच्या मुलाखती घेतल्या, फादर फालकाव मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत येऊ न शकल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता.
मराठी साहित्य परिषदेने फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ जयंत नारळीकर यांच्याबाबतीतला अनुभव लक्षात घेऊन आता धट्टाकट्टा, चालताबोलता आणि हिंडूफिरु शकणारा संमेलनाध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेनेसुद्धा यावेळी असाच निकष घेतला असावा.
ऐंशीच्या उंबरठ्यावरील घोरपडे यांना त्यांचे वय बहुधा प्रतिकूल ठरले. निवडणुकीचा आग्रह त्यांनी टाळल्याने राज्यातील पात्र मतदारांचा मात्र हिरमोड झाला असेल.
मराठी खिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला एक वेगळेच वलय आहे.
सन १९२७ पासून नाशिक येथूनच सुरु झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद याआधी `स्मृतीचित्रे'कार लक्ष्मीबाई टिळक (नागपूर १९३३), प्रा. जयंतकुमार त्रिभुवन (कोल्हापूर १९८६), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे १९९२), डॉ. सिसिलिया कार्व्हालो (नाशिक २०००) आणि डॉ.अनुपमा निरंजन उजगरे (मुंबई २००५) यांनी भूषविले आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचा आणि माझा परिचय अगदी अलिकडचा. काही महिन्यांपूर्वीचा.
मात्र साहित्यविश्वातील त्यांच्या कामगिरीबाबत फार आधीपासून मला माहिती आहे.
सायमन मार्टिन यांच्या निवडीमुळे नाशिकमधील नियोजित संमेलन मोठ्या उत्साहात होईल यात शंका नाही.
ख्रिस्ती साहित्य संमेलनांतील माझा सहभाग तसा मर्यादित राहिला आहे.
तिसेक वर्षांपूर्वी कवि निरंजन उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथे झालेल्या आणि अशोक आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे २०१२ साली झालेल्या संमेलनास मी एक श्रोता म्हणून हजर होतो.
सातारा आणि नाशिक या दोन्ही साहित्य संमेलनांशी निगडीत असलेल्या बातम्या आणि घडामोडींकडे एक साहित्यप्रेमी म्हणून इतरांप्रमाणे माझेही लक्ष असणार आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

Camil Parkhe September 22, 2025