Did you like the article?

Thursday, November 27, 2025

 


आज तारीख २५ नोव्हेंबर. आजपासून बरोबर एक महिन्याने ख्रिसमस अर्थात नाताळ.
ख्रिस्तजन्माच्या या सणाला मराठीत नाताळ हा शब्द रुढ झाला तो शेजारच्या गोव्यात तब्बल साडेचारशे वर्षे ठाण मांडून बसलेल्या फिरंगी पोर्तुगिजांमुळे.
अनेक युरोपियन भाषांत वापरल्या जाणाऱ्या नाताळ या शब्दाचे मूळ `Natalis' मात्र लॅटिन आहे.
लॅटिन, पोर्तुगीज आणि इतर युरोपियन भाषांत आपल्या मराठीत आणि दक्षिण भारतीय भाषांत आढळणाऱ्या `ळ' या उच्चाराचे अक्षर आहे कि नाही हे मला माहित नाही.
मात्र पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत अवतार घेताना Natal या शब्दाने `नाताल' न होता मराठमोळे `नाताळ' रूप घेतले हे गमतीदार आहे.
मात्र मला `नाताळ' या शब्दाच्या व्युत्पत्तीशास्त्रात शिरायचे नाही.
नाताळाला एक महिना असताना आता ख्रिसमस विशेषांकांची लगबग सुरु झाली आहे.
यावेळी सातआठ दिवाळी अंकांत माझे लेख होते.
त्यापैकी तीनचार जणांनी बऱ्यापैकी मानधन दिले, एकाने फक्त दिवाळी अंक घरपोच आणून दिला तर इतर दोन जणांनी दिवाळी अंक पोस्टाने पाठविण्याचीसुद्धा तसदी घेतली नाही.
त्या अंकात माझा लेख छापून आला हे एका तिऱ्हाईताने फोन केल्याने कळाले.
नाताळ विशेषांक पुण्यातून नियमितपणे प्रकाशित करणाऱ्या दयानंद ठोंबरे यांनी आपल्या `अलौकिक परीवार' या विशेषांकाच्या प्रकाशन सोहोळ्याला ९ डिसेंबरचा मुहूर्त शोधला आहे.
मात्र त्याआधीच सव्वाशे वर्षे जुन्या (स्थापना एप्रिल १९०३) असलेल्या `निरोप्या' मासिकाचा नाताळ विशेषांक वर्गणीदारांना दोन-तीन डिसेंबरच्या दरम्यान घरपोच मिळणार आहे.
त्याशिवाय पिंपरी चिंचवडचे फ्रान्सिस गजभिव हे `शब्द' नाताळ विशेषांक काढत असतात.
गेली काही वर्षे वसईतून ख्रिस्तोफर रिबेलो 'ख्रिस्तायन' हा ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन प्रकाशित करत आहेत. त्याशिवाय इतरही अनेक जण ख्रिसमस विशेषांक प्रकाशित करत असतात.
ख्रिसमस अंक प्रकाशित करणाऱ्यांमध्ये हौशे, नवसे आणि गवसेही असतात.
प्रत्येक छापील दिवाळी अंकाची आर्थिक उलाढाल तीन ते पाच लाख रुपयांच्या आसपास असते असे म्हणतात. बहुतांश ख्रिसमस विशेषांकांच्या बाबतीतसुद्धा असेच आहे.
माझ्या माहितीनुसार `निरोप्या' मासिकाचे पहिले भारतीय संपादक फादर प्रभुधर यांनी १९७५ साली नाताळ विशेषांकांची परंपरा सुरु केली.
त्यावेळी श्रीरामपुरात दहावीत शिकत असलेल्या माझा एक अर्धा पानभर लेख या अंकात आहे.
`निरोप्या'च्या त्या नाताळ विशेषांकाचे खाली दिलेले खास भारतीय शैलीतले मारियाबाई आणि बाळ येशुचे चित्र असलेले हे कव्हर होते.
चित्रकार कोण असेल बरे? बहुधा अँजेला त्रिन्दाद....


Camil Parkhe



ऐंशीच्या दशकाच्या मध्यात रशिया-बल्गेरिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम करुन मी गोव्याला परतलो ते पत्रकारितेच्या व्यवसायातील दोन अतिशय महत्त्वाची आयुधे घेऊन.

पणजी येथे `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात क्राईम, मुंबई हायकोर्टाचे गोवा खंडपीठ आणि एज्युकेशन कॅम्पस या बिट्स मी हाताळत असताना मला आणि इतर काही सहकाऱ्यांना आमच्या ऑफिसात बसण्यासाठी स्वतंत्र लाकडी टेबल किंवा लाकडी खुर्ची नव्हती.
बसायची जी काही व्यवस्था होती ती सामाईक होती.
त्याचप्रमाणे बातम्या टाईप करण्यासाठी माझ्यासाठी वेगळा असा टाईपरायटरपण नव्हता.
एका जाडजूड आकाराच्या आणि वजनदार गोदरेज कंपनीच्या टाईपरायटरवर मी, ऑफिसातील काही उपसंपादक आणि उशिरा संध्याकाळी अर्धवेळ असलेला स्पोर्ट्स रिपोर्टर काम करत असत.
आता परदेशातून येताना मी बरोबर एक नाजूक, वजनाने अतिशय हलका आणि पाचसहा इंचांची रुंदी असलेला रेमिग्टन कंपनीचा पोर्टेबल टाईपरायटर आणला होता.
रशियन ऐरोफ्लोट विमानाने मॉस्कोतून मी दिल्ली विमानतळावर उतरलो तेव्हा माझ्या थ्री-पिस सुटावरील ओव्हरकोटवर गळ्याभोवती घातलेला एक रशियन-मेड छोटासा कॅमेरासुद्धा होता.
आम्हा पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना बल्गेरियात प्रशिक्षणाच्या काळात छोटासा पॉकेटमनी दिला होता, त्यातून मी ही माझ्या जीवनातली एक अतिशय मौल्यवान खरेदी केली होती.
या दोन उपकरणांचा मी पुढील दहाबारा वर्षे भरपूर वापर केला. पत्रकारितेतील ही दोन वैयक्तिक उपकरणे बाळगणारा त्या काळात गोव्यातला मी एकमेव बातमीदार होतो.
त्यानंतरसुद्धा तीनचार वेळेस नवनवीन कॅमेरे खरेदी केले. बातमीदारी करताना फोटोग्राफर नसल्यास स्वतःच छायाचित्रे घ्यावी हा त्यामागचा हेतू.
त्या जुन्या काळात फोटोग्राफ घेणे, त्यांची प्रिंट्स घेणे हा खूप खर्चिक मामला असायचा.
जग दुसऱ्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर असताना पुण्यात `इंडियन एक्सप्रेस'मध्ये बातमीदार असताना मराठी साहित्यिकांचा एक कार्यक्रम मी कव्हर केला.
मला त्या कार्यक्रमाची असाईनमेन्ट नसताना स्वतःहून मी या कार्यक्रमाला गेलो होतो. याचे कारण तेथे `अगा जे कल्पिले नाही' हे मराठीतील पहिले दलित आत्मकथन (साल १९७५) लिहिणारे सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार होता.
सूर्यवंशी हे सत्तरच्या दशकात नाशिकहून प्रसिद्ध होणाऱ्या 'आपण' या मराठी साप्ताहिकाचे संपादक होते.
मी दहावीला असताना माझ्या दोन लघुकथा 'सूर्यवंशी यांनी `आपण' मध्ये बाल सदरात छापल्या होत्या आणि त्यानंतर श्रीरामपूरच्या माझ्या घराच्या पत्त्यावर पाच-पाच रुपयांच्या दोन मनीऑर्डर्स पाठवल्या होत्या.
पत्रकारितेच्या माझ्या भावी व्यवसायातील ही पहिलीवहिली कमाई.
तर त्या दिवशी सूर्यवंशी यांना पुरस्कार दिला जात असताना मी काही छायाचित्रे घेतली.
व्यासपीठावर इतर जण होते मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे इतर चार माजी संमेलनाध्यक्ष :
पुण्यातल्या नाना पेठेतील एथेल गॉर्डन अध्यापन विद्यालयाच्या प्राचार्य विजया श्यामराव पुणेकर, कर्वे रोडवरील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक जयंतकुमार त्रिभुवन, नगरच्या सेंटर फॉर स्टडीज इन रुरल डेव्हलपमेंटचे डेव्हलपमेंट (सीएसआरडी) चे संचालक आणि `ज्ञानोदय' मासिकाचे संपादक प्रा. सुधीर देवीप्रसाद शर्मा आणि कवी निरंजन उजगरे.
दुसऱ्या दिवशीच्या `इंडियन एक्सप्रेस'च्या न्यूजलाईन मध्ये या कार्यक्रमाची बातमी मी घेतलेल्या छायाचित्रासह माझ्या नावानिशी प्रसिद्ध झाली.
स. ना. सूर्यवंशी यांची जयंतकुमार त्रिभुवन आणि `निरोप्या' मासिकाचे संपादक फादर ज्यो गायकवाड यांनी या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात मी शब्दबध्द केलेला लेखसुद्धा `निरोप्या' मासिकात प्रसिद्ध झाला.
या दोन्हींची कात्रणे आजही माझ्याकडे आहेत.
हे फोटो मी घेतले, कार्यक्रमाच्या बातम्या आणि लेख लिहिले आणि नंतर ते मी विसरून गेलो.
या पाचही मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या एकत्रित फोटोच्या रुपाने माझ्याकडे एक किती मौल्यवान ऐवज राहिला आहे हे मला खूप काळानंतर कळाले.
या पाचही साहित्य संमेलनाध्यक्षांपैकी आज कुणीही हयात नाही.
याआधीही विविध संमेलनांच्या निमित्ताने ते अनेकदा एकत्र आले होते, मात्र त्यांचा असा एकत्रित फोटो कुठेही नसावा.
हा फोटो किती दुर्मिळ आणि त्यामुळे अमूल्य आहे याची जाणीव मला अलीकडच्या काळात प्रकर्षाने झाली.
नूतन २०२६ वर्षांच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यांत सातारा येथे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्याचप्रमाणे सत्ताविसावे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन वसईचे कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे होत आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन एक शतकापूर्वी १९२७ साली नाशिक शहरातच भरले होते हे मराठी साहित्य विश्वात अनेकांना माहिती नसेल.
`स्मृतिचित्रे' कार लक्ष्मीबाई टिळक नागपुरातल्या १९३३सालच्या चौथ्या महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
तर या दोन्ही आगामी साहित्य संमेलनांच्या निमित्ताने गेल्या शतकातील मराठी साहित्य संमेलनांचा संक्षिप्त आढावा घेणारे आणि २००५ ते २०२२ या काळात झालेल्या पंधरा ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या संमेलनाध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे संकलन मी केले आहे.
या आधीच्या काळातील म्हणजे १९२७ ते २००१ सालापर्यंतच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे सुनील श्यामसुंदर आढाव यांनी आपल्या `धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या ग्रंथात संकलीत केली आहेत.
माझ्या या पुस्तकाची सुरुवात होते ती मुळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना १८८५च्या मराठी ग्रंथकारांच्या दुसऱ्या संमेलनास आपण येणार नाही असे सांगणारी, विद्रोहाची भुमिका घेणाऱ्या जोतिबा फुले यांच्या पत्रापासून.
या पुस्तकाची संहिता चेतक बुक्सचे कुणाल हजेरी यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर या पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांध्यक्षांचा हा फोटो कालच मी माझ्या पोतडीतून शोधून काढला आहे.
असाच एकूण पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांचा आणखी एक दुर्मिळ फोटो मला डॉ अनुपमा निरंजन उजगरे यांच्या सौजन्याने मला मिळाला आहे.
वसईत २०१९ साली झालेल्या एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हे पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष एकत्र जमले होते.
ते होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अशोक आंग्रे, डॉ. नाझरेथ मिस्किटा, फादर मायकल जी. आणि स्वतः अनुपमा उजगरे.
या घडीला या सर्वांचे वयमान अवघे सत्तर ते पंच्याऐंशीच्या दरम्यान.
पाच माजी साहित्य संमेलनाध्यक्ष एकत्रित येणे हा तसा एक दुर्मिळ योग आहे याची जाणीव होऊन अनुपमा उजगरे यांनी कुणाला तरी हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची विनंती केली होती.
त्याबद्दल धन्यवाद अनुपमाताई !
मराठी साहित्य संमेलनांविषयीच्या माझ्या या आगामी पुस्तकातील हे दोन फोटो महत्त्वाचे आकर्षण असतील याबद्दल शंकाच नसावी.
Camil Parkhe




Monday, November 3, 2025

 

                                                                            Jemimah Rodrigues

झेनिया डिकुन्हा ESPN Sports Media Ltd.

एक सामना अजून बाकी आहे, पण वांद्रे गर्ल जेमिमा रॉड्रिग्ज त्याआधीच एक दंतकथा बनली आहे. 
नवी मुंबईत जेमिमा रॉड्रिग्जने भारताला महिला क्रिकेटच्या विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचवले, ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत एक क्रिकेटिंग चमत्कार घडवला.

नवी मुंबई तिच्यासाठी “घरचं मैदान” असलं तरी ती मनाने वांद्रेचीच आहे. तिच्या वांद्रे ओळखीत काही गुण ठळक आहेत — घट्ट कौटुंबिक नाती, प्रगाढ श्रद्धा (बांद्रात १६व्या शतकात पहिलं चर्च बांधलं गेलं) आणि संगीताची आवड.

गेले दोन दिवस तिच्याबद्दल समाजमाध्यमांत चर्चा चालली आहे. ती एक सोशल मीडिया सेलेब्रिटी बनली आहे.

पण याचबरोबर ती वारंवार ऑनलाईन ट्रोलिंगची बळीसुद्धा ठरली आहे, विशेषतः तिच्या धार्मिक श्रद्धांमुळे — कारण ती अल्पसंख्याक समुदायातील आहे.

जेमिमा तिच्या श्रद्धा आणि आत्मविश्वास अभिमानाने दाखवते. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, “बायबल म्हणतं, ‘रात्री रडणं असतं, पण सकाळी आनंद येतो.’ आज आनंद आला, पण मी अजूनही रडते आहे.”

ती एकटी नाही — तिचं संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत आहे. तिचे वडील इव्हान तिच्या सातव्या वर्षापासून तिचे प्रशिक्षक आहेत. तिचे भाऊ इनॉक व एली, यांच्याकडून तिने क्रिकेट शिकायला सुरुवात केली.

ह्याच कुटुंबातून तिला शक्ती मिळाली — प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी, प्रत्येक ट्रोलिंगनंतर हसण्यासाठी.

जेमिमा तिच्या जीवनाबद्दल उघडपणे बोलते — तिचं संगीत, तिची श्रद्धा, तिचं चर्चमधील गायन, आणि बायबलमधील वचने ती खुलेपणाने शेअर करते. ती गिटार वाजवते.

ती ज्या वांद्रे वेस्ट भागात वाढली, तिथे श्रद्धा सर्वत्र आहे — रस्त्यांवरील क्रॉस, मारियामातेच्या उत्सवातले जल्लोष, ख्रिसमसचा आनंद आणि उपवासकाळ लेन्ट सिझनचे गांभिर्य — हे सर्व तिथे एकत्र अनुभवले जाते.

तिचा गिटार आणि बॅट दोन्ही तिच्या ओळखीचा भाग आहेत. ती परदेशी लीगमध्ये सहकाऱ्यांसोबत गाणी गाते, नाचते, रील्स बनवते — अगदी कोणत्याही तरुण भारतीयासारखी.

तिने उपांत्य फेरीतील पत्रकार परिषदेत रडत सांगितलं, “मी हे बोलते कारण जर कोणीतरी हेच अनुभवत असेल, तर त्यांना समजेल की एकटी नाही. स्पर्धेच्या सुरुवातीला मला प्रचंड चिंता होती.”

त्या वेळीच तिने बायबलमधील वचन उद्धृत केलं — “रात्री रडणं असतं, पण सकाळी आनंद येतो.”

शतकानंतर मातीने माखलेली तिची जर्सी, अश्रूंनी भरलेला चेहरा — हीच खरी जेमिमा आहे. एकेकाळची हसरी, ब्रेसेस घातलेली मुलगी आता भावनांनी ओथंबलेली योद्धा बनली आहे.

एक सामना अजून बाकी आहे, पण जेमिमा रॉड्रिग्ज आधीच एक दंतकथा बनली आहे. आणि हे सर्व तिने जेमिमा स्टाईलमध्ये केलं आहे.

Camil Parkhe  

Monday, October 6, 2025

 

                                                                        राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

आता निर्माण झाले आहे जवळपास अगदी तसेच वातावरण सहासात वर्षांपूर्वी निर्माण झाले होते.
राष्ट्रपती सदनातून नुकतेच पायउतार झालेले महामहिम प्रणवदा मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्विकारले आहे असे वृत्त झळकले तेव्हा आतासारखाच पुरोगामी गटात सन्नाटा पसरला होता आणि प्रतिगामी म्हणा किंवा उजव्या गटात म्हणा आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या.
प्रणवदा यांच्या रुपाने संघाच्या गळाला खूप मोठा देवमासा लागला होता यात शंकाच नव्हती.
इंदिराबाईंच्या हत्येनंतर मॅडमच्या मंत्रिमंडळात दोन क्रमांकाचे स्थान असलेल्या मुखर्जी यांनी लगेच एक क्रमांकाच्या जागेवर आपला हक्क सांगितला होता. त्यामुळे पंतप्रधान पदावर आलेल्या राजीव गांधी यांनी त्यांना सत्तेबाहेर ठेवले होते.
विजनवासाचा तो अल्पकाळ वगळता त्यांची संपूर्ण कारकीर्द सत्तेच्या उबेत गेलेली होती. स्वबळावर आपल्या पश्चिम बंगाल राज्यात कुठल्याही पदावर निवडून येण्याची क्षमता नसतानासुद्धा.
नवलाची बाब म्हणजे नंतर सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आल्या आणि नंतर त्यांनी आपल्या पक्षाला महाराष्ट्रासह विविध राज्यांत पुन्हा सत्तेवर आणले, केंद्रातही सलग दोनदा सत्तेवर आणले.
या काळात प्रणवदा त्यांचे सर्वांत अधिक विश्वासू सहकारी होते. त्यामुळेच मुखर्जी देशाच्या सर्वोच्च म्हणजे राष्ट्रपतीपदावर पोहोचले.
काँग्रेस सत्तेतून पायउतार झाल्यानंतर हेच प्रणव मुखर्जी संघाच्या गळी लागले. प्रणवदा यांनी संघाच्या मंचावर जाण्याचे निमंत्रण स्विकारले यावरुन त्यावेळी मोठे वादंग निर्माण झाले होते.
असे असतानाही मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात हजर राहिले, तेथे त्यांनी भाषणा केले. ही बाब संघाने आपलीच पाठ थोपटून घेण्यासारखी होती यात वादच नव्हता.
नंतर प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या हयातीतच आणि सर्व संवेदना शाबूत असताना भारतरत्न मिळाले.
त्याबद्दलसुद्धा त्यांना अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटले असेल.
हे भाग्य तर भाजपच्या इतर कुठल्याही नेत्याला आजतागायत लाभलेले नाही.
संघाला आणि भाजपला आपले नेते आणि आदर्श नेहेमीच आयात करावे लागतात, हल्ली आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा.
आपल्या घरातील व्यक्तीने - मग ते पंतप्रधान का असेनात - आपले कौतुक करावे यात काय ते विशेष?
आपल्याला कधीकाळी पाण्यात पाहणार्या लोकांनी आपल्या मांडवात येऊन, आपल्या झेंड्याखाली येऊन, आपल्या प्रतिमांना वंदन करणे निश्चितच अभिमानास्पद असते.
त्यामुळेच खासदारबाईंची कार्यक्रमात हजेरी, जुन्या काँग्रेस नेत्यांचे गणवेशातले संचलन आणि झेंड्याला सलामी याला महत्त्व आणि बातमीमुल्य प्राप्त होते.

Camil Parkhe


Monday, September 22, 2025

 

                                                       सायमन मार्टिन

यंदा फार जुनी परंपरा असलेल्या दोन साहित्य संमेलनांचे बार पुढील वर्षांरंभात लागोपाठ उडणार आहेत.
शतकाच्या उंबरठ्यावरचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर शंभर वर्षांची परंपरा असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला नऊ ते अकरा जानेवारीला होणार आहे.
दोन्ही साहित्य संमेलनांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे.
`पानिपत'कार पाटील यांच्या अलिकडच्या आरक्षणाबाबतच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवडीबद्दल साहजिकच संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
असल्या वादांमुळेच खरे तर मराठी साहित्य संमेलनांत रंगत आणि मजा येते असे म्हटले जाते.
माझ्या आठवणीप्रमाणे वादाची ही गौरवशाली परंपरा घोषित आणीबाणीपर्वात कराड येथे दुर्गाबाई भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पुल देशपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या 1975 सालच्या संमेलनापासून सुरु झाली आहे. असो.
तर मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेने आपल्या घटनेनुसार संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करुन, इच्छूक उमेदवारांकडून रितसर अर्ज मागवून, त्यांच्या मुलाखती वगैरे असे सर्व सोपस्कार पार पाडून संमेलनाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे.
बीड येथे झालेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आणि परिषदेचे विद्यमान अध्यक्ष पौलस वाघमारे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
वसईचे फादर विजय गोन्साल्विस अध्यक्षपदी असलेला नाशिक ख्रिस्ती साहित्य संघ नियोजित सत्ताविसाव्या संमेलनाचा यजमान आहे.
किमान दहा पुस्तके आपल्या नावावर असलेल्या व्यक्तीच यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी पात्र होत्या. याचे कारण एकही साहित्यकृती नसलेले लोक यापूर्वी संमेलनाध्यक्ष झालेले आहेत.
दुसऱ्या एका अलिखित संकेतानुसार यावेळचे साहित्य संमेलनाध्यक्षपद कॅथोलिक व्यक्तीसाठी राखीव होते. दोन वर्षानंतर होणाऱ्या संमेलनासाठी हे पद प्रोटेस्टंट साहित्यिकांसाठी राखीव असेल.
मार्टिन यांच्याव्यतिरिक्त यंदा दोन इतर साहित्यिक रिंगणात होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक हेमंत घोरपडे आणि वसई येथील आणि संध्या नागालँड येथे कार्यरत असलेले सालेशियन किंवा डॉन बॉस्को संस्थेचे फादर नेल्सन फलकाव यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते.
निवड समितीने यापैकी मार्टिन आणि घोरपडे यांच्या मुलाखती घेतल्या, फादर फालकाव मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत येऊ न शकल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता.
मराठी साहित्य परिषदेने फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ जयंत नारळीकर यांच्याबाबतीतला अनुभव लक्षात घेऊन आता धट्टाकट्टा, चालताबोलता आणि हिंडूफिरु शकणारा संमेलनाध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेनेसुद्धा यावेळी असाच निकष घेतला असावा.
ऐंशीच्या उंबरठ्यावरील घोरपडे यांना त्यांचे वय बहुधा प्रतिकूल ठरले. निवडणुकीचा आग्रह त्यांनी टाळल्याने राज्यातील पात्र मतदारांचा मात्र हिरमोड झाला असेल.
मराठी खिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला एक वेगळेच वलय आहे.
सन १९२७ पासून नाशिक येथूनच सुरु झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद याआधी `स्मृतीचित्रे'कार लक्ष्मीबाई टिळक (नागपूर १९३३), प्रा. जयंतकुमार त्रिभुवन (कोल्हापूर १९८६), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे १९९२), डॉ. सिसिलिया कार्व्हालो (नाशिक २०००) आणि डॉ.अनुपमा निरंजन उजगरे (मुंबई २००५) यांनी भूषविले आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचा आणि माझा परिचय अगदी अलिकडचा. काही महिन्यांपूर्वीचा.
मात्र साहित्यविश्वातील त्यांच्या कामगिरीबाबत फार आधीपासून मला माहिती आहे.
सायमन मार्टिन यांच्या निवडीमुळे नाशिकमधील नियोजित संमेलन मोठ्या उत्साहात होईल यात शंका नाही.
ख्रिस्ती साहित्य संमेलनांतील माझा सहभाग तसा मर्यादित राहिला आहे.
तिसेक वर्षांपूर्वी कवि निरंजन उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथे झालेल्या आणि अशोक आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे २०१२ साली झालेल्या संमेलनास मी एक श्रोता म्हणून हजर होतो.
सातारा आणि नाशिक या दोन्ही साहित्य संमेलनांशी निगडीत असलेल्या बातम्या आणि घडामोडींकडे एक साहित्यप्रेमी म्हणून इतरांप्रमाणे माझेही लक्ष असणार आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

Camil Parkhe September 22, 2025

Monday, September 8, 2025

 


कॅथोलिक चर्चमध्ये `संत' हा सन्मान मिळण्याबाबत भारी कडक, किचकट, वेळकाढू नियम आणि प्रक्रिया आहेत.
तिथे संतपदाची पायरी गाठण्याची अनेक लोक दोनशे-तीनशे वर्षे वाट पाहत आहेत.
यापैकी अनेकांना त्याआधीच्या पायरीवर म्हणजे व्हेनरेबल (आदरणीय), बिऍटीफाईड (धन्यवादित) अशा पहिल्या आणि दुसर्या पायरीवरच कायमस्वरुपी समाधान मानावे लागणार आहे.
भारतात विविध ठिकाणी कार्य केलेल्या आणि संतपदाचा सन्मान मिळवण्याच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या मिशनरींची संख्या फार मोठी आहे.
गोव्यातील फादर अग्नेलो डिसोझा, संगमनेरचे स्विस जेसुईट फादर फ्रान्सिस शुबिगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलया माळीघोगरगावचे फ्रेंच फ्रान्सलियन मिशनरी गुरियन जाकियरबाबा ही माझ्या माहितीतील काही नावे.
अर्थात संतपदाची ही प्रक्रिया अलीकडच्या काळात राबवली गेली आहे.
प्राचीन काळात येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी अकरा जणांना आपोपाप संत मानले गेले. गालावर चुंबन घेऊन येशूचा विश्वासघात करणाऱ्या ज्युडास इस्किर्योतचा याला अपवाद.
येशूची आई मदर मेरीसुद्धा, त्यानंतर सेंट पॉल, आणि इतर सेंट ऑगस्टीन, सेंट थॉमस आक्वीनाससारखे धर्मपंडित संत बनवले गेले.
मध्ययुगात उदयास आलेल्या प्रोटेस्टंट पंथांत मात्र नव्याने संत बनवण्याची प्रक्रिया अजिबात नाही.
मात्र विविध सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान असलेल्या व्यक्तींना कॅथोलिक चर्चचे संतपद मिळेलच असे नाही.
भारतात गोव्यात मिशनरी कार्य केलेल्या फ्रान्सिस झेव्हियर यांना संतपद मिळाले आहे.
मात्र सतराव्या शतकात मदुराईत आणि दक्षिण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे, ख्रिस्ती धर्मात विविध जातींना मागच्या दाराने प्रवेश देणारे आणि 'व्हाईट ब्राह्मण' म्हणून ओळखले जाणारे इटालियन मिशनरी रॉबर्ट डी नोबिली आणि गोव्यात `ख्रिस्तपुराण' हे मराठी महाकाव्य १६१६ साली रोमी लिपीत छापणारे ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स हे संतपदापासून आजही वंचित राहिले आहेत.
कॅथोलिक चर्चमध्ये एखाद्या व्यक्तीला संत बनवण्याच्या प्रक्रियेत आधी त्या व्यक्तीचे जीवन, चारित्र्य यावर संशोधन केले जाते, त्यानंतरच संतपदाच्या प्रक्रिया सुरु करायची कि नाही याचा निर्णय घेतला जातो.
त्या मृत व्यक्तीच्या माध्यमातून किमान एकदोन चमत्कार झाले आहेत याची वैद्यकीय अहवालांनुसार शहानिशा केली जाते.
ज्यांना त्यांच्या हयातीत संत मानले गेले अशा मदर तेरेसांच्या संतपदाबाबतसुद्धा अशीच प्रक्रिया राबवली गेली होती
आजच्या युगात देव, धर्म आणि चमत्कार या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे तरी कॅथोलिक चर्चच्या संतपदाच्या प्रक्रियेत चमत्काराला आजही स्थान आहे.
आपल्या श्रद्धा आणि कार्यामुळे तुरुंगांत हुतात्मे झालेल्या जगभरातील अनेक लोकांना कॅथोलिक चर्चने संतपदाचा सन्मान बहाल केला आहे.
ओडिशा राज्यात आदिवासी आणि कृष्टरोग्यांमध्ये कार्य करणारे ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांची दोन कोवळी मुले रात्री जीपमध्ये झोपलेली असता एका जमावाने त्यांना १९९९ साली जिवंत जाळले.
ग्रॅहॅम स्टेन्स जर कॅथोलिक मिशनरी असते तर संतपदाच्या प्रक्रियेसाठी ते हुतात्मा होण्यामुळे नक्कीच नैसर्गिकरित्या पात्र ठरले असते.
ग्रॅहॅम स्टेन्स हे प्रोटेस्टंट मिशनरी होते.
`अर्बन नक्सल' आणि `देशद्रोही कारवायां'च्या आरोपाखाली भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी मुंबई तुरुंगात असलेले वयोवृद्ध जेसुईट फादर स्टॅन स्वामी जामिनाची सुनावणी चालू असताना २०२१ साली मरण पावले.
झारखंडमधील आदिवासी लोकांमध्ये काम करणारे आणि आता `कॉम्रेड', `शहिद' म्हणून गणले जाणारे फादर स्टॅन स्वामी कॅथोलिक चर्चच्या संत प्रक्रियेसाठी भविष्यकाळात नक्कीच पात्र ठरु शकतात.
सतराव्या शतकात श्रीलंकेत मिशनरी कार्य करणार्या मूळचे गोव्यातले फादर जुझे किंवा जोसेफ वाझ यांना तीन शतकांनंतर पोप फ्रान्सिस यांनी २०१५ साली सिलोन येथे समारंभपूर्वक संतपदाचा सन्मान दिला.
संतपदाच्या प्रक्रियेबाबत `भारतरत्न' मदर तेरेसा अणि पोप जॉन पॉल दुसरे हे अपवाद अणि सर्वाधिक नशिबवान ठरले आहेत त्यांच्या मृत्यूनंतर अल्पावधीत अनेक नियम बाजूला सारुन चर्चने त्यांना संत म्हणून जाहीर केले.
संतपद प्रधान करण्याच्या या सोहोळ्याला `कॅननायझेशन (canonisation) असे म्हणतात.
पोप फ्रान्सिस यांनी २०१६ साली व्हॅटिकन सिटीत मदर तेरेसा यांना संत म्हणून जाहीर केले त्या खास विधीला भारताच्या तत्कालीन परदेश मंत्री सुषमा स्वराज भारतीय प्रतिनिधींसह खास निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या.
अशीच एक संतपदाची प्रक्रिया आज रविवारी व्हॅटिकन सिटीत पार पडली आहे.
अवघे पंधरा वर्षांचे आयुर्मान लाभलेल्या कार्लो अकुटिस (Carlo Acutis) या मुलाला पोप लिओ यांनी सेंट पिटर्स बॅसिलिकातल्या झालेल्या खास विधीमध्ये संत म्हणून जाहीर केले आहे.
रविवारच्या या सोहळ्यात तरुणपणीच पोलिओने निधन झालेल्या इटालियन पियर जॉर्जियो फ्रासाती पियर जॉर्जियो फ्रासाती (१९०१–१९२५) यांनाही संतपदाचा बहुमान देण्यात आला.
`इंडियन एक्सप्रेस'च्या काल सात सप्टेंबरच्या अंकात कार्लो अकुटिस (३ मे १९९१ - १२ ऑकटोबर २००६) याच्या संतपदाबाबत पान दोनवर अँकरची बातमी होती.
लंडन येथे इटालियन कुटुंबात १९९१ साली कार्लो अकुटिस याचा जन्म झाला होता. त्याच्या जन्मानंतर त्याचे आईवडील अंतोनिया सालझानो आणि अँड्रयू अकुटिस मिलानला स्थलांतरित झाले होते.
कार्लो याला फुटबॉल, व्हिडिओ गेम्स आणि पाळीव प्राणी यांची आवड होती. धार्मिक कार्यासाठी तो इंटरनेटचा वापर करत असे.
कार्लो अकुटिस याने आपल्या स्थानिक चर्च किंवा पॅरिशसाठी आणि कॅथोलिक चर्चसाठी संकेतस्थळे विकसित केली होती. आपल्या डिजिटल कौशल्यांचा वापर करून कॅथोलिक शिकवणींचा या मुलाने ऑनलाइन प्रसार केला होता.
`गॉड्स इन्फ्ल्यूनसर' असे कार्लो अकुटिसचे वर्णन करण्यात आले आहे.

ल्यूकेमियामुळे २००६ साली निधन झालेला कार्लो अकुटिस हा आता मिलेनियल पिढीतला पहिला कॅथोलिक संत ठरला आहे.
कार्लो अकुटिस याच्या माध्यमातून दोन चमत्कार झाले आहेत असे कॅथोलिक चर्चने म्हटले आहे.
पोप फ्रान्सिस यांनी या मुलाच्या संतपदास मंजुरी दिली होती. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर पोप लिओ यांनी संतपदाची ही प्रक्रिया आज रविवारी पूर्ण केली.
काल रविवारच्या कॅननायझेशन समारंभात एक ऐतिहासिक घटना घडली.
व्हॅटिकनच्या त्या प्रसिद्ध सेंट पिटर्स चौकात कॅथोलिक चर्चच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या संतपदाच्या समारंभाला त्याचे आईवडील, मिचेल आणि फ्रान्सेसा हे जुळे बहीणभाऊ असे संपूर्ण कुटुंब जातीने हजर राहून या अभिमानास्पद घटनेचे साक्षीदार ठरले आहे.
चर्चच्या इतिहासात केवळ दोनच आयांना आपल्या लेकरांना संत घोषित होताना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले आहे.
याआधी १९५० साली मारिया गोरेत्ती यांना पोप बारावे पायस यांनी संतपदाचा सन्मान देण्यात आला तेव्हा त्या समारंभाला त्यांची आई असुंता कार्लिनी सेंट पिटर्स चौकात उपस्थित होत्या.
या मिस्साविधीमध्ये मिचेल या कार्लो अकुटिसच्या धाकट्या भावाने बायबलमधील एक उतारा असलेले पहिले वाचन वाचले.
कार्लो अकुटिसच्या निधनानंतर चार वर्षांनी त्याच्या या जुळ्या बहीणभावांचा जन्म झाला होता.
तरुण कॅथोलिकांसाठी जवळचा आणि समजण्यासारखा असे एक आधुनिक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून व्हॅटिकन सिटीने कार्लो अकुटिसला म्हणून सादर केले आहे.
तरुण पिढीला चर्चकडे आकर्षित करण्यासाठी हे एक पाऊल आहे हे नक्की.

Camil Parkhe, September 8, 2025


Saturday, September 6, 2025


अरुंधती रॉय यांची `द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स' ही कादंबरी प्रकाशित होऊन आणि त्या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळून अनेक वर्षे झालीयेत. पण अजून ते पुस्तक मी वाचले नाही.

पुढे कधी ते वाचेल असेही वाटत नाही.
हे खूप विचित्र वर्तन असेल हे मला ठाऊक आहे. पण एखाद्या साहित्यिकाची मूळ कादंबऱ्या वाचण्याऐवजी त्या साहित्यिकावर लिहून आलेले लिखाण वाचण्याची मला अधिक हौस आहे.
कादंबऱ्या किंवा फिक्शन वाचणे मी खूप वर्षांपूर्वी बंद केले आहे.
अरुंधती रॉय यांचे नवे ताजे पुस्तक `मदर मेरी कम्स टू मी' हे पुस्तक काल केरळमध्ये कोची शहरात सेंट तेरेजा कॉलेजमध्ये भरगच्च गर्दीत प्रकाशित झाले.
मात्र त्याआधीच या भारतातील एक सर्वाधिक जगप्रसिद्ध असलेल्या लेखिकेच्या मुलाखती अनेक इंग्रजी दैनिकांत छापून आल्या आहेत, त्या मी उत्सुकतेने वाचल्या आहेत.
`मदर मेरी कम्स टू मी ' हे पुस्तक येशूची आई मदर मेरीवर नसून अरुंधती रॉय यांच्याच आई असलेल्या मेरी रॉय यांच्यावर आहे.
या मायलेकींचे आयुष्यभर कधीच जमले नाही, त्या तणावपूर्ण आणि प्रेमाच्या नातेसंबंधी या पुस्तकात अरुंधती रॉय यांनी लिहिले आहे.
प्रकाशनप्रसंगी आपल्या भाषणात अरुंधती रॉय हसतहसत म्हणाल्या : "ज्यांच्यावर मी सर्वाधिक प्रेम करते असे जवळपास सर्व लोक या सभागृहात जमले आहेत. आपल्या सरकारचा विचार करता, ही खूपच धोकादायक गोष्ट आहे..'
आपल्या नेहेमीच्या स्वभावानुसार रॉय यांनी लगेचच जगभरातील आणि देशातील दु:खद घटनांवर टिपण्णी केली. .
“आता मी मंचावर येण्याची तयारी करत असतानाच दिल्ली उच्च न्यायालयाने गेली पाच वर्षे तुरुंगात असलेल्या उमर खालिद आणि माझ्या अनेक मित्रांना पुन्हा एकदा जामीन नाकारला आहे,” असे त्या म्हणाल्या.
अरुंधती रॉय यांची ओळख करून देताना मल्याळम साहित्यिक के. आर. मीरा यांनी त्यांचे वास्तुविशारद, अभिनेत्री, पटकथालेखिका, कादंबरीकार, निबंधकार, कार्यकर्त्या असे वर्णन केले.
मात्र या वर्णनांत सर्वाधिक टाळ्या मिळाल्या त्या मीरा यांनी रॉय त्यांची “एक अधिकृत `अर्बन नक्सल' आणि व्यावसायिक देशद्रोह प्रेरक' अशी ओळख करून दिली तेव्हा.
“त्या भारतातील एकमेव लेखिका आहेत ज्यांच्या बोलण्याकडे जगातील सर्व फॅसिस्ट सरकारे लक्ष देत आहेत. त्या खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय भारतीय लेखिका आहेत,” असे मीरा यांनी अरुंधती रॉय यांचे वर्णन केले, असे `प्रिंट' वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
पुस्तक प्रकाशनाआधीच त्यांच्या पुस्तकांना मिळालेली प्रसिद्धी त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जाते.
अर्थात रॉय यांच्या पुस्तकांची व्यावसायिक पद्धतीने मार्केटिंग केली जाते, यासाठी इतर अनेक लेखकांप्रमाणे त्यांचा स्वतःचाही एजंट आहेच.
याबाबत भारतीय किंवा मराठी प्रकाशन व्यवसाय खूप, खूप मागे आहे हे सांगायलाच नको.
अरुंधती रॉय यांच्या पुस्तकांना वाचकांचा मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. `क्रॉस वर्ल्ड'च्या बुक गॅलरींत जगातील प्रसिद्ध लेखकांच्या फोटोमध्ये अरुंधती रॉय यांचाही हमखास समावेश असतो.

Camil Parkhe September 4, 2025