Did you like the article?

Showing posts with label Indian Express. Show all posts
Showing posts with label Indian Express. Show all posts

Wednesday, May 8, 2024

 

पंडित भीमसेन जोशी

पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या इंडियन एक्सप्रेसला मी रुजू झालो होतो तेव्हाची ही गोष्ट. साल होते १९९०.
गोव्यात पणजीला हायर सेकंडरी, पदवी शिक्षण घेतल्यानंतर तिथेच `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात पत्रकारीतेला सुरुवात केली होती. या दीर्घ कालावधीत महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक घडामोडींशी फारसा संबंध राहिला नव्हता.
पुण्यात तर कधी राहिलोही नव्हतो. या शहरात बातमीदारी करताना हळूहळू येथील लोकजीवनाची आणि विविध क्षेत्रांतली प्रमुख व्यक्तिमत्त्वांची ओळख होत होती.
गोव्याच्या तुलनेत विविध क्षेत्रांत आपापला दबदबा राखून असलेली अशी दिग्गज मंडळी येथे खूप मोठया प्रमाणात होती. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे नरुभाऊ लिमये, पु ल देशपांडे, नानासाहेब गोरे, मोहन धारिया, जयंत नारळीकर, डॉ गोविंद स्वरूप, शकुंतला परांजपे, विद्या बाळ ही त्यापैकी काही ठळक नावे.
त्या एका रविवारच्या संद्याकाळी आम्हा बातमीदाराच्या दैनंदिन डायरीत माझ्या नावावर एक कार्यक्रम लिहिला होता.
पुण्यातल्या आमच्या `इंडियन एक्सप्रेस'मध्ये त्यावेळी मुख्य वार्ताहर नव्हता. आताचे आम्ही सर्व बातमीदार लोक विशीतले होतो, नरेंद्र करुणाकरन, शुभा गडकरी, संगीता जहागिरदार-जैन, अवर्तिन्हो मिरांडा, विश्वनाथ हिरेमठ, माधव गोखले आणि मी स्वतः.
प्रकाश कर्दळे `मास्तर' हे निवासी संपादक होते आणि बातमीदारांची कामकाजाची दैनंदिन डायरी आम्हापैकी एक बातमीदार लिहित असे.
तर शहरातील कन्नड संघ या संस्थेने भरत नाट्य मंडळ येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंडित भीमसेन जोशी होते.
बातमीच्या दृष्टीने भाकड असलेल्या रविवारी शहर आवृत्ती असलेल्या दैनिकांची स्थानिक पाने भरण्यासाठी बातम्या आणि फोटो कमी पडतात, त्यामुळे एक बऱ्यापैकी लांबीची बातमी मिळेल अशा हेतूने मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो होतो.
त्या मोठ्या हॉलमध्ये गर्दी तशी कमीच होती. मला वाटते हॉल निम्मासुद्धा भरला नव्हता, कारण कन्नड संघ या सांस्कृतिक संस्थेची ती सभा होती.
व्यासपीठावर अगदी मोजकीच म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांच्यासह पाचसहा माणसे होती. कन्नड संघाच्या अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेविषयी माहिती दिली, अहवाल वाचले.
कुठल्याही कार्यक्रमाची बातमी घेण्याऱ्या बातमीदाराच्या नशिबी हा रटाळपणा त्याच्या नेहेमीच्या कामकाजाचा भाग असतो, मुख्य वक्ता आपले भाषण सुरू करीपर्यंत बातमीदाराला अशी भाषणे ऐकून घेण्यावाचून इतर काही पर्याय नसतो.
बातमीच्या अनुषंगाने मी मोजकीच टिपणे घेत होतो. रविवार संध्याकाळच्या त्या कार्यक्रमाला बातमीदार असा मी एकटाच होतो. पण अनेक कार्यक्रमांना पुष्कळशी बातमीदार मंडळी फिरकतसुद्धा नसतात असा अनुभव असल्याने त्याबद्दल मला विशेष असे काही वाटले नाही.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य पाहुण्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर पंडित भीमसेन जोशी भाषणासाठी उभे राहिले.
आधी आलेली मरगळ झटकून मी पेन सरसावून मी त्यांच्या संपूर्ण भाषणाचे टिपण काढण्यासाठी सज्ज झालो
खांद्यावर असलेली शाल ठिकठाक करत पंडितजींनी उच्चारलेल्या पहिल्याच वाक्याने मी सर्द झालो.
संगीतातले मला काहीएक कळत नाही. या संस्थेच्या कार्यक्रमात पंडितजी संगीताविषयी बोलतील किंवा श्रोत्यांच्या आवडीचा असलेला एखादा राग किंवा गीत गातील अशी माझी बिलकुल अपेक्षा नव्हती.
त्याआधी पंडितजींची कितीतरी मराठी गीते मी ऐकली होती, त्यापैकी अभंगवाणीसारखी `इंद्रायणीकाठी', `कानडा हो विठ्ठलु', अशी काही लोकप्रिय गायने मला बऱ्यापैकी तोंङपाठसुद्धा होती.
ण तरीसुद्धा पंडितजींनी यावेळी जो राग आळवायला सुरुवात केली होती तो राग खूपच अनपेक्षित होता, एकदम अनोळखी होता. मला आश्चर्याचा धक्काच बसला होता.
पंडितजींनी सुरु केलेल्या त्या रागाने मी वगळता इतर सर्व श्रोते एकदम खुश झाले होते, कान देऊन ते पंडितजींना ऐकत होते.
मोठ्या उत्सुकतेने बातमीसाठी टिपणी घेण्यासाठी पेन सरसावून बसलेलो मी मात्र एकदम दिग्मूढ झालो होतो.
पुढील पाचदहा मिनिटे पंडितजींचा आवाज कानावर पडत होता, काहीच अर्थबोध होत नसल्याने मी चुपचाप होतो.
अर्थात जे काही घडत होते त्यात वावगे असे काहीच नव्हते.
तो कार्यक्रम पुण्यातल्या कन्नड संघाचा होता, पंडितजींसह तिथे हजर असलेली सर्व मंडळी पुणेकर असली तरी मुळची कन्नडभाषिकच होती. त्यामुळेच तर भीमसेनजींनी कन्नड भाषेत बोलणे अगदी सुसंगत होते.
आधीचे सर्व वक्ते स्थानिक मराठी भाषेत बोलले होते तरी पंडितजींना आपल्या मातृभाषेत या कानडी लोकांशी संवाद साधणे उचित वाटले होते.
पुण्यात अनेक वर्षे राहून पुणेकर बनलेल्या कन्नड संघाच्या पदाधिकाऱ्यांना पुण्यातल्या या कार्यक्रमात मराठीतच बोलणे जितके संयुक्तिक वाटले तितकेच कन्नड भाषेत बोलून या लोकांशी असलेली आपली नाळ दाखवणे पंडितजींना संयुक्तिक वाटले असणार.
पंडित भीमसेन जोशी हे मूळचे कर्नाटकातले आणि कन्नडभाषिक आहेत हे मला तोपर्यंत माहित नव्हते आणि गडबड इथेच झाली होती.
पंडितजींचे कन्नड भाषेतले ते भाषण संपताच मी तेथून बाहेर पडलो, रात्रीचे आठ वाजले होते आणि मला पुणे कॅम्पात ऑफिसला जायचे होते.
इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसात परतल्यावर जेमतेम तीनचार परिच्छेदांची एक कॉलमी बातमी मी टाईप केली.
कार्यक्रमाला गेलोच होतो तर निदान तेव्हढी तरी बातमी देणे गरजेचे होते. त्या बातमीत `प्रमुख पाहुणे आणि वक्ते पंडित भीमसेन जोशी होते' असे एक वाक्य होते.
दुसऱ्या दिवशी मी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताच्या बातमीदार सहकाऱ्यांना हा किस्सा सांगितला, माझी कशी फटफजिती झाली हे सांगितले तेव्हा तिथे पिकलेला हंशा आजही माझ्या आठवणीत आहे.

Thursday, February 22, 2024

नोकरीतील `दि एन्ड

वयाच्या सोळाव्या वर्षी सन्यस्त ख्रिस्ती धर्मगुरु होण्याच्या हेतूने मी माझे श्रीरामपूर येथील घरदार सोडले आणि नंतर गोव्यात जेसुईट धर्मगुरुंच्या पूर्वसेमिनिरीत दाखल झालो . पणजीतल्या धेम्पे कॉलेजात हायर सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर मात्र माझे जीवनध्येय बदलले आणि मी पत्रकार बनलो.

एकदा पणजी मार्केट पाशी असलेल्या दैनिकाच्या कार्यालयात नोकरी शोधण्यासाठी गेलो. नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकांचे वृत्तसंपादक असलेल्या एम. एम. मुदलियार यांनी माझी जुजबी चौकशी केली आणि नोकरी मिळणे शक्य आहे असे सांगितले. गोमंतकात पाऊल ठेवण्याआधी इंग्रजी भाषेचा गंधही नसताना चार वर्षांतच ही भाषा शिकून मी इंग्रजी दैनिकातील बातमीदार बनलो होतो.
नवहिंद टाइम्समध्ये नऊ वर्षांच्या नोकरीत मी क्राईम- कोर्ट, लष्कर, शिक्षण, जनरल, गोवा मेडीकल कॉलेज अशा अनेक बीट्स सांभाळल्या. त्यानंतर औरंगाबादच्या लोकमत टाइम्स, इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तींत आणि सकाळ माध्यमाच्या महाराष्ट्र हेराल्ड-सकाळ टाइम्समध्ये सोळा वर्षे अशी इंग्रजी भाषेतील पत्रकारितेची चाळीस वर्षांची कारकीर्द केली.
माझ्या कॅम्पस रिपोर्टींगचा हा कालावधी होता १९८१ नंतरचा. त्याकाळात महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही दहावीचा पूर्ण निकाल लिस्टसह सर्व दैनिके छापत असत. विद्यार्थ्यांना नंतर त्यांच्या शाळेतून मार्कशीट्स दिली जात असत. निकालाची प्रत हातात पडल्यानंतर मेरीट लिस्टमध्ये झळकलेल्या पहिल्या दहा
विद्यार्थाना त्यावेळच्या गोवा केंद्रशासित प्रदेशातील त्यांच्या शहरांत आणि गावांत जाऊन, त्यांची मुलाखत आणि फोटो मिळवण्याची माझी जबाबदारी होती.
आपल्या शबनम बॅगेत निकालाची प्रत टाकून मी ताबडतोब जवळचाच एक मोटारसायकल पायलट गाठत असे. पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या घरी जाण्यास प्राधान्य असे, त्यानुसार म्हापसा, मडगाव, डिचोली, वॉस्को अशा ठिकाणी जायचे असे सांगून सुसाट वेगाने आम्ही निघत असू.
विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचल्यानंतर होणारा सवाल-जबाब आणि त्यानंतरची प्रतिक्रिया अगदी स्मरणीय असे.
‘नमस्कार, मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार. गोवा दहावी परिक्षेत तू बोर्डात पहिला आला आहेस. त्याबद्दल अभिनंदन !’
त्यानंतर त्याघरात होणारे प्रथम विस्मयाचे आणि नंतर आनंदाचे चित्कार, गडबड अनुभवण्यासारखी असे. त्या कुटुंबात काही गोड पदार्थ खाण्याचा जाई. कॅथॉलिक कुटुंब असल्यास त्या उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रिजमधली थंडगार बीअर आणि केकचा आस्वाद घ्यावा लागे.
कालांतराने एससीसी बोर्ड परीक्षांचा पूर्ण निकाल दोन-तीन पानांत छापण्याची पद्धत सर्वच दैनिकांनी बंद केली. आज इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जमान्यात महत्त्वाच्या सर्व परीक्षांचा निकाल तो वेबसाईटवर अपलोड होताक्षणी कुठेही पाहणे शक्य झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच पत्रकारीतेचेही स्वरूप बदलत
आहे.
१९८०च्या दशकात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) आणि युनायटेड न्युज ऑफ इंडिया (यूएनआय ) ही दोन वृत्तसंस्था वृत्तपत्रांचे एका मोठे आधारस्तंभ असत. एखादी खूप मोठी महत्त्वाची बातमी असेल तर टेलिप्रिंटरवर लागोपाठ बेल वाजू लागेल. एके दिवशी सकाळी मी नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात असताना सकाळी दहाच्या दरम्यान टेलिप्रिंटरची घंटा सारखी वाजू लागली तेव्हा मी तिकडे सहज गेलो आणि मला धक्काच बसला. केवळ एकच वाक्य पुन्हापुन्हा टाईप करत टेलिप्रिंटरवर घंटा वाजत होती.
तो दिवस होता ३१ ऑक्टोबर १९८४ आणि ते धक्कादायक वाक्य होते :
Prime Minister Indira Gandhi shot at ....
टेलिप्रिंटरच्या मशिनमधून सतत बाहेर पडणाऱ्या कागदांवरच्या बातम्या वाचायची माझी सवय खूप काळ टिकली.
नंतर बातम्या टाईप करताना ऑफिसांतल्या टेलिव्हिजनवरील बातम्यांकडे मी लक्ष ठेवू लागलो.
प्रादेशिक बातमीदारांसाठी त्याकाळात टेलिग्राम हे एक महत्त्वाचे साधन होते. गोव्यात मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना कोल्हापुरच्या `;पुढारी' या वृत्तपत्राचा पणजी येथील स्ट्रींगर बातमीदारसुद्धा होतो.
बातम्या पाठविण्यासाठी `पुढारी' ने मला टेलिग्राम कार्ड दिले होते. यासाठी मात्र मराठी बातम्या रोमन लिपीमध्ये लिहाव्या लागत. पोस्टात टेलिग्राम ऑपरेटर मग त्या संबंधित वृत्तपत्राला पाठवत असे.
गोव्यातून पुण्याला आल्यावर इंडियन एक्सप्रेसने सुद्धा मला टेलिग्राम कार्ड दिले होते. `कामिल पारखे, इंडियन एक्सप्रेस (पुणे) , टेलिग्राम कार्ड एक वर्षासाठी (१९८९) '' असे लिहिलेले ते कार्ड मी अजून जपून ठेवले आहे.
१९८०च्या दशकापर्यंत केवळ अतिश्रीमंत लोकांकडे आणि वरच्या हुद्द्याच्या सरकारी अधिकाऱ्यांकडे लँडलाईन टेलिफोन असायचे. पत्रकार वगैरेंना खास बाब म्हणून टेलिफोन दिले जायचे. गोव्यात आमच्या नवहिंद टाइम्समध्ये केवळ म्हापसा, मडगाव आणि वॉस्को शहरांत स्ट्रिंगर बातमीदार होते, त्यांच्याशी
आणि पणजीबाहेरील पोलीस आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बोलण्याची गरज असे.
त्याकाळात एसटीडी (म्हणजे सबस्क्रायबर ट्रँक डायलिन्ग) सुविधा नसल्यास बीएसएनलच्या ऑपरेटरशी बोलून ऑर्डीनरी, अर्जंट किंवा लायटनिंग कॉल बुक करावा लागे. ऑर्डिनरी कॉल कधी लागेल याची खात्री नसायची, लायटनिंग कॉल खूप महाग असायचा, मात्र नोंद होताक्षणी बोलणे शक्य असायचे.
पुण्यात मी इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हाची गोष्ट. त्याकाळात म्हणजे १९८९ साली नव्यानेच सुरु झालेल्या `इंडियन एक्सप्रेस’ आणि `लोकसत्ता’च्या पुणे आवृतींचे बातमीदार पुण्यात तर डेस्कचा स्टाफ मुंबईत असायचा. आमच्या इंग्रजीतल्या बातम्या टेलिप्रिंटरमार्फत मुंबईला पाठवल्या जायच्या.
मात्र मुंबईतल्या डेस्कवरच्या आणि इतर लोकांशी संभाषण करण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्रणा होती, ती म्हणजे हॉटलाईन. लॅण्डलाइनसारखेच असणारे ते उपकरण उचलले कि तिकडे मुंबईत घंटी वाजायची आणि कुणीतरी तिकडे ते उपकरण उचलले तर लगेच संभाषण व्हायचे.
गोव्यात टेलिव्हिजनचे युग यायला तसा उशीरच लागला. मुंबईतल्या टेलिव्हिजन टॉवर आल्यानंतर काही काळानंतर पणजीत अल्तिन्हो येथे टेलिव्हिजन टॉवर उभारला गेला आणि आम्ही पहिल्यांदाच ब्लँक अँड व्हाईट का होईना पण टेलीव्हिजनच्या पडद्यावर वर धावती चित्रे पाहू लागलो.
त्याकाळात नवहिंद टाइम्सचे फोटोजर्नालिस्ट असलेले सुनील नाईक हे मुंबई दूरदर्शनसाठी व्हिडीओजर्नालिस्ट (आधुनिक तंत्रज्ञान, त्यानुसार नवे पद !) म्हणूनही काम करत असत. खांद्यावर एक छोटासा कॅमेरा खांद्यावर घेऊन नाईक एखाद्या कार्यक्रमाची शूटींग करत असत, त्यावेळी त्या कॅमेरातून घर्रघर्र असा आवाज येत असे. शूटींग काही सेकंदांचेच असायचे.
अनेकदा नाईक प्रेसकक्षात बसलेल्या आम्हा लोकांवरूनसुद्धा कॅमेरा फिरवत असत. दुसऱ्या दिवशी त्या शुटिंगचे रील्स विमानाने मुंबई दूरदर्शनच्या कार्यालयात पाठविले जाई आणि संध्याकाळच्या सात वाजताच्या प्रादेशिक बातम्यांत त्या कार्यक्रमाची झलक दिसायची, क्वचित त्यात आमचीही छबी झळकायची.
विशेष म्हणजे त्याकाळात खासगी टेलिव्हिजन चॅनेल्स किंवा न्यूज चॅनेल्सही नव्हते आणि राष्ट्रीय व प्रादेशिक बातम्या दिवसातून एकदोनदाच दाखविल्या जायच्या !
१९८६ साली मला पत्रकारितेच्या सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी रशिया,-बल्गेरिया येथे जाण्याची संधी मिळाली होती. परत येताना मी दोन अत्यंत मूल्यवान वस्तू घेऊन आलो होतो. या वस्तू म्हणजे अडीच किलो वजनाचा एक नाजुकसा आकर्षक पोर्टेबल टाईपरायटर आणि एक कॅमेरा.
त्याकाळात पत्रकारितेत उपयुक्त ठरणाऱ्या या दोन वस्तू असणारा गोव्यातील मी एकमेव बातमीदार होतो !
याच काळात कृष्णधवल फोटोग्राफी मागे पडून रंगीत फोटोग्राफी सुरु झाली.
१९८०च्या दशकाअखेरीस दैनिकांनी आपला कृष्णधवल रंग बदलून रविवारच्या पुरवण्यांसाठी रंगीत पाने देण्यास सुरुवात केली. मी १९८८ ला औरंगाबादला `लोकमत टाइम्स’ला रुजू झालो तेव्हा `लोकमत’च्या रविवार पुरवण्यांची सर्व रंगीत पाने मुंबईत तयार होऊन छपाईसाठी दोनतीन दिवस आधी औरंगाबादला
येत असत. या वृत्तपत्र समूहात औरंगाबादला रंगीत पानांसाठी मोठे महागडे स्कॅनर मशिन आणले गेले, तेव्हाचा जल्लोष आणि कौतुकाचे वातावरण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे.
एखाद्या पत्रकार परिषदेतून, राजकिय किंवा इतर कार्यक्रमांनंतर दैनिकाच्या कार्यालयाकडे परतताना त्या बातमीची लीड किंवा इंट्रॉ काय करावा असा विचार मनात घोळत असे. हल्ली मोठी किंवा लहान बातमी हाती पडली कि लगेच मोबाईलवर ऑनलाईन आवृत्तीसाठी एकदोन वाक्यांची बातमी पाठवली जाते,
बातमीदार ऑफिसांत पोहोचेपर्यंत त्या बातम्या कधीच वेबसाईटवर अपलोडसुद्धा झालेल्या असतात.
टेलिव्हिजनच्या आउट ब्रॉडकास्टिंग व्हॅन्समुळे (ओबीव्ही ) घटना किंवा कार्यक्रम होत असताना थेट लाईव्ह प्रक्षेपण आता केले जाते याचे आता आपलयाला नाविण्य वाटत नाही.
दहा वर्षांपूर्वी जॅकलिन आणि आमची मुलगी आदिती यांच्यासह युरोपमध्ये सहलीवर असताना तेथे प्रवासवर्णन लिहिण्याची उबळ मला स्वस्थ बसू देईना. आम्ही राहत होतो त्या हॉटेलांत लॉबीमध्ये पाहुण्यांना मोफत इंटरनेट सुविधा असायचे किंवा तासाला एक युरो फी असायची.
तीन आठवड्यांच्या त्या सुट्टीत मी तीनचार लेख लिहिले आणि ईमेलने पुण्याला `सकाळ टाइम्स’ला पाठवून दिले. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हे लेख प्रसिद्ध व्हायचे, ते आमच्या दैनिकाच्या वेबसाईटवर, ईपेपरवर मला युरोपमध्ये पॅरीस, रोम आणि व्हेनिस या शहरांत दिसायचे, ते पाहून खूप आनंद व्हायचा, वेगाने प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी कौतुक वाटायचे. `
फेब्रुवारी २०१७ ला म्हणजे थायलंडमध्ये दहा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय पत्रकार दौऱ्यात भारताचा आणि `सकाळ टाइम्स’चा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी झालो. `सकाळ’ समूहाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होण्याच्या केवळ सहा महिने आधी हा दौरा पार पडाला. जगभरातून सत्तरच्या आसपास पत्रकार असलेल्या त्या परीषदेत माझ्यासह भारताचे फक्त सहा प्रतिनिधी होते.
`कामिल पारखे, सकाळ टाइम्स, पुणे, इंडिया'' असे छापलेले माझे ते गळ्यात अडकवण्याचे ओळखपत्र मी आजही जपून ठेवले आहे.
पत्रकारितेमधला माझा अनुभव चाळीस वर्षांचा. इतकी वर्षे सहसा कुणी नोकरीत नसतात, पण मी वयाच्याएकविसाव्या वर्षीच पणजीला कामाला लागलो होतो.
कोरोना साथीने थैमान मांडले तेव्हा एप्रिल २०२० ला सकाळ टाइम्स बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.
त्या दिवशी पिंपर चिंचवडच्या `सकाळ’च्या ऑफिसात जाऊन `pcamil’ या नावाने लॉग इन केले. डेस्क टॉपवर असलेला माझा वैयक्तिक मराठी आणि इंग्रजी मजकूर, लेख, वगैरे स्वतःला मेल केला, त्या जवळजवळ नव्या, वातानुकूलित ऑफिसमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत, मधल्या त्या माझ्या आवडत्या टिव्हीसेटकडे, स्वतःच्या खुर्चीवरुन एकदाचे भरभरुन पाहून घेतले.
पुन्हा एकदा आता कोऱ्या झालेल्या डेस्कटॉपवर अखेरची नजर टाकली आणि `pcamil’ या सकाळ माध्यमसमूहातील एका व्यक्तीला कायमसाठी लॉगआऊट केले.
पत्रकारितेच्या मासिक पगारी नोकरीतील `दि एन्ड’ अखेरीस असा अवचित आला होता, खूप खूप अनुभवले होते या व्यवसायात. आनंदी आठवणीच जास्त. अपेक्षाही केली नव्हती असे खूप काही !
मात्र खंत, खेद ठेवण्यासारखे प्रसंग तसे मला या क्षणाला मुळी आठवतच नव्हते..
Camil Parkhe

Saturday, January 6, 2024

पुणे कॅम्प.


पुण्यात अलका चौकातून पाच रस्ते फुटतात, त्यापैकी लक्ष्मी रोड एक . या लक्ष्मीरोडचे दुसरे तोंड शहराच्या दुसऱ्या एका टोकाला उघडते, हे दुसरे टोक म्हणजे पुणे कॅम्प.

तिसेक वर्षांपुर्वी गोव्यातून मी पुण्यात राहायला आलो तेव्हा डेक्कनला रानडे इन्स्टिट्यूटसमोर लॉजवर राहायचो आणि कॅम्पात अरोरा टॉवरमध्ये `इंडियन एक्सप्रेस'च्या ऑफिसात कामाला जायचो. दररोज डेक्कनहून सुटणाऱ्या ७४ आणि १७४ या बस नंबरने लक्ष्मी रोडच्या या टोकाहून त्या टोकापर्यंत जायचो.
कामानिमित्त आजही शहराच्या या दोन्ही भागांना मला जावे लागते.
एक्सप्रेसला असताना दुपारी साडेचारनंतर चहासाठी `महानाझ'ला जाणे व्हायचे. इराणी हॉटेल म्हणजे काय हे मला तेव्हा पहिल्यांदा कळाले. श्रीरामपुरात किंवा गोव्यात इराणी हॉटेल असण्याचा संबंधच नव्हता. माझे अत्यंत आवडीचे हाफ फ्राईड एग किंवा बुल्स आय `महानाझ'ला मिळायचे. तिथे चिकन समोसेसुद्धा मिळायचे. त्याकाळात म्हणजे १९८९ ला एक चिकन समोसा फक्त दहा रुपयाला.
माझ्या लॉजवर मी आणि एक्सप्रेसमधली इतर बातमीदार जोडीदारांनीं जेवणाचे डबे लावले होते पण महिन्यातून अनेकदा हॉटेलांत जेवण व्हायचे.
रुपाली हॉटेलात चारपाच पुऱ्या, दाल, सुकी भाजी आणि दही असलेली राईस प्लेट (किंमत २० रुपये) आणि क्वचितच दाल- राईस (किंमत १२ रुपये).
कधीतरी रात्री बातम्या देऊन झाल्यानंतर एका इराणी हॉटेलात चिकन बिर्याणी किंवा चिकन मसाला यावर ताव मारला जायचा. डेक्कनला गुडलक हॉटेलसमोर इराणी `लकी' हॉटेलांत असेच चिकनचे अनेक चविष्ट पदार्थ खायला मिळायचे.
या झाल्या खूप जुन्या गोष्टी.
अलिकडच्या काळात माझा पुन्हा डेक्कन जिमखाना, टिळक चौक आणि पुणे कॅम्पातला वावर वाढला आहे. पुणे कॅम्पचे एक प्रवेशद्वार असलेल्या क्वार्टर गेटपासून मी चालायला सुरुवात करतो आणि वेस्ट एन्डला पोहोचतो. इथे लक्ष्मी रोड संपतो.
क्वार्टर गेटपासून खऱ्या अर्थाने पुणे कॅम्पची संस्कृती सुरु होते.
त्यादिवशी संध्याकाळी खूप भूक लागली आणि एका कोपऱ्यात एक बेकरी दिसली. पॅटिस किंवा समोसा खाण्याच्या इराद्याने तिथे गेलो तर एक सुखद धक्का बसला. तिथे चक्क एग पॅटीस होते !
मला एकदम पणजीतल्या एग पॅटीसबद्दल प्रसिद्ध असलेल्या गीता बेकरीची आठवण झाली. एग पॅटीस विकणाऱ्या किती बेकरी तुम्हाला माहित आहेत?
इथला हा सगळा परिसर चक्क खाऊ गल्ली असावी असा समज होईल इतक्या संख्येने येथे अनेक इटिंग जॉइंट्स आहेत. रस्त्यावरच असलेल्या `गार्डन वडा पाव' येथे लोक चक्क रांगा लावून कुपन घेऊन किंग साईझ वडा पाव घेत असतात.
शहरात पेठांमध्ये जागोजागी अमृततुल्य हॉटेल्स दिसतात येथे कँपात बन मस्का वगैरे पदार्थ असणारी इराणी हॉटेल्स आहेत. त्यांचे फर्निचर खुर्च्या असा काही जुना वेगळाच थाट अजूनही राखला आहे.
काही आठवड्यापूर्वी मेट्रोने वनाज स्टेशनवर उतरलो होतो, भूक लागली म्हणून एखाद्या हॉटेलचा, डिसेंट स्नॅक्स जॉईन्टचा शोध घेऊ लागलो तर एक किलोमीटर अंतरापर्यंत काहीच दिसले नाही. त्यावेळी पुणे कॅम्प किती खवैय्येप्रेमी आहे याची जाणिव झाली होती.
या पुणे कॅम्पातले एक वैशिष्ट्य म्हणजे इथली ही हॉटेल्स आणि इतर दुकाने चालवणारी किंवा दुकानांची मालक असणारे अनेक लोक मुस्लीम आहेत, मूळचे इथलेच आहेत आणि आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पुढारलेले आहेत.
एमजी रोडला `मार्झोरिन' मध्ये आवडीची नॉन व्हेज पदार्थ मिळतात. स्नॅक्सऐवजी भरपेट खायचे असले तर `दोराबजी' मध्ये गरमागरम चिकन समोसे, चिकन कटलेट्सआणि कबाब असे जिभेला तृप्त करतील कितीतरी पदार्थ मिळतात.
पुणे कॅम्पात गेलो आणि रिकामीपोटी घरी परतलो असे सहसा कधी होत नाही. अनेकदा घरी पार्सलसुद्धा आणले जाते..
असे `पुणे कँम्प' जागोजागी उभे राहायला हवेत.
Camil Parkhe January 4, 2024

Saturday, June 17, 2023

Sunny Leone  सनी लिऑनचा प्रवास प्रौढ करमणूक क्षेत्र ते कान्स फेस्टिवल - 


सनी लिऑन.. सनी लिऑन  नावाभोवती एक वेगळेच वलय आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरची  प्रौढ करमणूक क्षेत्रातील भारतीय वंशाची एक व्यक्ती  म्हणून सुरुवातीची तिची ओळख भारतीयांना दोन दशकांपूर्वी झाली. कांहींनी तिच्याकडे डोळे विस्फारुन तर बहुतेकांनी तिला  कुचेष्ठेने पाहिले होते.

सत्तरच्या दशकांत शहराशहरांत, गावोगावी  बस स्टॅंडपाशी, थिएटरपाशी नियतकालिकांची आणि पुस्तकांची दुकाने असायची, किरकोळ वर्गणीवर चालणारी खासगी ग्रंथालये असायची.   तिथे पुस्तकांमध्ये अर्धवट झाकलेली पण तरीही अनेकांचे लक्ष  घेणारी काही पुस्तके असायची. तरुणांमध्ये आणि इतर वयोगटाच्या आंबटशौकिनांमध्ये  या पुस्तकांना खूप  मागणी असायची. वाचायची इच्छा असुनही ही पुस्तके घेण्याचे धाडस  अनेकांमध्ये नसायचे. प्रौढ करमणूक क्षेत्रातील ही पुस्तके होती.

नव्वदच्या दशकात गोव्यातून पुण्याला मी आलो तेव्हा  आमच्या इंडियन एक्सप्रेस-लोकसत्ता वृत्तपत्र समुहाच्या आम्हा बातमीदारांची  एका बातमीदाराच्या घरी एकदा  पार्टी झाली. तो बातमीदार विवाहित होता तरी त्यांचे कुटुंब यावेळी घरी नव्हते. बाकीचे आम्ही सर्व पुरुष बातमीदार सडेफटिंग होतो.   पार्टीच्या अखेरीस त्याने टेलिव्हिजन संचावर एक  डीव्हीडी  सीडी किंवा लावली. चित्रे अगदी अस्पष्ट होती.  

त्यानंतरच्या काळात जागोजागी सीडी आणि डीव्हीडी दुकानांत अशा सी-डीज  आणि डीव्हीडी खुल्लमखुलला  मिळू लागल्या. काही काळापूर्वी पुस्तकांच्या दुकानांत `पिवळी पुस्तके’ मिळायचे तसेच. अधूनमधून पोलिसांनी धड टाकून अशा आक्षेपार्ह डिव्हीडीजचा साठा ताब्यात घेतला अशा बातम्या वृत्तपत्रांतून झळकायच्या.

याच काळात विकेन्डच्या पुर्वसंध्येला - खरे म्हटले तर शुक्रवारी - शनिवारी मध्यरात्रीला - सर्व लोक झोपायला गेले असताना टीव्हीवर अचानक दुसरीच दृश्ये दिसायला लागायची.  अनेक ठिकाणी  स्थानिक केबल ऑपरेटर्स  आपल्या ग्राहकांसाठी ही खास सेवा पुरवत असत. या गोष्टीचा खूप बोलबाला झाल्याने ही सेवा खंडीत झाली आणि अनेकांचा रसभंग झाला, मात्र तोपर्यंत इतर कितीतरी पर्याय उपलब्ध झाले होते.

तर अशा या उघडपणे त्याज्य असलेल्या प्रौढ करमणूक क्ष्रेत्रातील सनी लिऑन हे भारतात माहित झालेले एक प्रमुख नाव.     

 या सनी लिऑनला जवळून प्रत्यक्ष पाहण्याचा योग अलीकडेच काही वर्षांपूर्वी आला होता  

आपल्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्या चित्रपटाचे अभिनेते आणि अभिनेत्री आमच्या इंग्रजी दैनिकाच्या  कार्यालयात येत असत. अशा मुलाखती देणे हा त्या चित्रपट कलावंतांनी चित्रपट निर्मात्यांशी केलेला कराराचा भागच असतो, हे चित्रपट कलाकार अशा मुलाखतीला सामोरे जाण्यास नकार देऊ शकत नाही हे नंतर लक्षात आले.

विशेष म्हणजे सर्वच दैनिके आणि नियतकालिके अशा प्रकारच्या अरेंजड मुलाखतीसाठी काही लाख रुपयांचे पॅकेज निर्मात्यांकडून घेत असतात. नियतकालिकांमधून आलेली सिनेमापरीक्षणे आणि वाहिन्यांमधून आलेले कार्यक्रम हे पेड न्यूज असतात हे आता सगळ्यांना माहित झाले आहेच. 

अशा प्रकारच्या जाहिराती सॉफ्ट बातम्यांच्या स्वरूपांत देण्याची परंपरा पुण्यात सर्वप्रथम 'टाइम्स ऑफ इंडिया' ग्रुपने म्हणजे बेनेट अँड कोलेमान वृत्तसमुहाने सुरु केली आणि हे अभिनव आर्थिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर धोरण मग इतर वृत्त समुहांनीसुद्धा लगेचच आपलेसे केले

अशा प्रकारच्या प्रायोजित मुलाखती संपादकीय विभागातील फीचर्स टीममधले सहकारी घ्यायचे. फीचर्स विभाग म्हणजे सॉफ्ट बातम्या देणारे लोक.

आम्हा बातमीदारांचा विभाग फीचर्स टीमला लागून असायचा आणि त्यामुळे शेजारच्या कॉन्फरन्स रुममधल्या या मुलाखतीला बसता यायचे किंवा हे नट आणि नट्या येताना आणि जाताना त्यांचे दर्शन घडायचे.

 नाना पाटेकर आणि इतर काही कलाकार मंडळी `नटसम्राट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती.  इरफान खान हा या असल्या एका प्रमोशन मुलाखतीला आलेला माझा अत्यंत आवडता अभिनेता.

 मात्र या काळात मुलाखतीला आलेल्या चित्रपट कलावंताला पाहण्यास ऑफिसच्या गेटबाहेरआणि आत सर्वाधिक गर्दी झाली ती फक्त एकदाच. 

त्यावेळी ऑफिसबाहेर लोकांची प्रचंड गर्दी झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असे दिसले. शेवटी जवळच्या पोलिस चौकीला फोन करून वाढीव सुरक्षा कुमक बोलावी लागली होती

 आणि यावेळी मुलाखतीसाठी आली होती सनी लिऑन. आपल्या नवऱ्यासह चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती आली होती.

भरपूर उंची आणि उत्तम फिगर राखून असलेली सनी लिऑन. गेटपासून कॉन्फरन्स रूमकडे येऊ लागली तेव्हा तिच्यावर खिळलेल्या सर्वांच्या नजरा माझ्या आजही आठवणीत आहे. भरपूर संख्येने असलेले तिचे बॉडी गार्ड्स आगंतुक लोकांना तिच्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवत होते.

 त्यावेळी कॉन्फरन्स रुम तर फीचर्स टीम मधल्या सहकाऱ्यांसह बातमीदार, जाहिरात आणि इतर विभागांतील लोकांनी गच्च भरली होती.

मुलाखत कशी झाली आणि सनी लिऑन नेमकी काय बोलली हे आता आठवत नाही. मात्र मुलाखतीनंतर तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी झालेली गर्दी आणि तिच्या बॉडीगार्डसनी काही लोकांना दाखवलेला हिसका मला आजही आठवतो.

 काही लोकांनी सनी लिऑनबरोबरच्या गर्दीत असलेले आपले  सेल्फीज आंणि इतर फोटो समाज माध्यमांवर टाकले होते आणि या फोटोंना प्रचंड लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या होत्या.

तर अशी आगळीवेगळी कीर्ती असलेल्या या सनी लिऑनला अलिकडेच जागतिक चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या फ्रान्समधल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर स्वागत होण्याच्या सन्मान मिळाला.

` कान्स फेस्टिव्हल २०२३’ साठी नामांकन कमावलेल्या अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेल्या `केनेडी' चित्रपटातील एक कलाकार म्हणून सनी लिऑन या समारंभात सहभागी झाली होती. असा सन्मान खूप दुर्लभ  असतो हे सांगायलाच नको.    

या निमित्त सनी लिऑन हिची अनेक वृत्तपत्रांनी खास दाखल घेतली आहे.  

या चित्रपटाच्या एका प्रमुख भुमिकेसाठी सनी लिऑन हिची  अनुराग कश्यप यांनी  निवड केली याचे अनेकांना आश्चर्य वाटणे साहजिकच होते. सनी लियॉनचे काही चित्रपट याआधी झळकले असले तरी तिच्या अभिनयाऐवजी इतर बाबींचीच अधिक चर्चा झाली होती.

``
सनी लिऑन यांचे आधीचे चित्रपट आपण पाहिलेले नाही, मात्र तिच्या काही मुलाखती आपण पाहिल्या होत्या. सनीच्या डोळ्यांत मला दुःखाची छटा दिसली.'' असे अनुराग कश्यप यांनी सांगितले आहे.

अनुराग कश्यप यांनी याबाबत म्हटले आहे:

“I swear I have never seen her films, ever. I have seen her interviews. There is a certain sadness in her eyes. There has been a life in the past. I needed a woman over 40, who is sexualised by men around her, men who are in their 50s and 60s. I don't need to see the act of sex and all that. I need to see this woman who is also dealing with it, also handling it, also using it all in order to survive and navigate. In Sunny, I found a woman who came with all those things inbuilt."

या रविवारच्या इंडियन एक्सप्रेसच्या  Eye पुरवणीत (जून  ११. २०२३)  सनी लियॉनची विस्तृत, पाऊण पानभर मुलाखत आहे. कान्स फेस्टिव्हल झाल्यानंतर ही मुलाखत घेतली होती आणि चांगल्या, संयत  पद्धतीने लिहिली गेली आहे.  

प्रौढ करमणूक क्षेत्रातील कलाकार ते कान्स फेस्टिव्हल असा प्रवास केलेल्या सनी लिऑन साठी तो किती स्मरणीय अनुभव असेल याची कल्पना करता येईल.

Camil Parkhe