Did you like the article?

Showing posts with label Missionaries. Show all posts
Showing posts with label Missionaries. Show all posts

Saturday, February 24, 2024

सावित्रीबाई अन् जोतिबा कुठल्या शाळेत शिकले ?

सावित्रीबाईंच्या आणि महात्मा फुले यांच्या जडणघडणीत पुण्यातले स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल, त्यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल, रेव्हरंड जॉन मरे मिचेल आणि त्यांच्या पत्नी मारिया मॅकेंझी मिचेल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

Blog
Blog esakal

कामिल पारखे...

सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या विविध चरित्रांत अमेरीकन मराठी मिशनच्या अहमदनगरच्या सिंथिया फरारबाई, त्याचबरोबर स्कॉटिश मिशनरी जॉन स्टिव्हन्सन, मार्गारेट आणि डॉ. जॉन विल्सन, जेम्स मिचेल, मिसेस मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांची नावे विविध संदर्भांत वारंवार येत असतात.

सावित्रीबाईंच्या आणि महात्मा फुले यांच्या जडणघडणीत पुण्यातले स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल, त्यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल, रेव्हरंड जॉन मरे मिचेल आणि त्यांच्या पत्नी मारिया मॅकेंझी मिचेल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी १८२९ साली पुण्याचा दौरा केला आणि प्रवचने दिली. तेथे त्यांचे चांगले स्वागत झाल्याने स्टीव्हन्सन यांनी १८३० साली पुण्यातच पुण्यात स्कॉटिश मिशनचे शैक्षणिक आणि धार्मिक काम सुरु केले. संस्कृत आणि मराठीवर जॉन स्टिव्हन्सन यांचे कमालीचे प्रभुत्व होते, प्राच्यविद्यापंडित म्हणूनही त्यांची एक वेगळीच ओळख आहे.

पुण्याला स्थायिक झाल्यानंतर जॉन स्टिव्हन्सन यांनी या शहरात एक इंग्रजी शाळा सुरु केली होती. पुण्यातल्या सर्व जातींच्या आणि समाजघटकांनी या शाळेचे कौतुक केले. मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारला मुंबईप्रमाणेच पुण्यातही इंग्रजी शाळा सुरु करायच्या होता. त्यामुळे स्टिव्हन्सन यांनीं आपली शाळा 1833 साली कंपनी सरकारकडे सुपूर्द केली.

विशेष म्हणजे रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन यांनी सुरु केलेल्या आणि नंतर ईस्ट इंडिया सरकारकडे सुपूर्द केलेल्या या शाळेतच जोतिबा फुले आणि त्यांचे सहकारी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर वगैरेंनी आपले शिक्षण घेतले होते. आपल्या विद्यार्थिदशेतच जोतीने सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्याशी अभंग अशी मैत्री जोडली.

जोतीच्या ह्या गोवंडे मित्राचा जन्म १८२४ मध्ये पुण्यात झाला. तो ब्राह्मण कुटुंबातील होता. त्याने दृढनिश्चय आणि अखंड उद्योगशीलता या गुणवत्तेवर आपल्या पुढील आयुष्यात मोठीच प्रगती केली. तो स्कॉटिश मिशन शाळेत असताना जोतीचा स्नेही झाला. आणि पुढे बुधवारवाड्यातील सरकारी शाळेत ते दोघे शिकत असताना त्यांचा स्नेह दृढ होत गेला. ही शाळा स्टिव्हन्सन नावाच्या गृहस्थाने सप्टेंबर १८३२ मध्ये काढली होती. ती पुढे त्याने सरकारच्या स्वाधीन केली’’ असे जोतिबा फुले यांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिले आहे.

'' शाळेत येणान्या उच्चवर्णीय मुलांशी लवकरच त्यांच्या ओळखी झाल्या. त्यांपैकी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे तिघे ब्राह्मण विद्यार्थी त्यांचे जिवलग मित्र बनले आणि त्यांची ही मैत्री दीर्घकाळ टिकून राहिली. वाळवेकर हे तर अखेरपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे होते. 'सदसद्विवेकी सुबोधाचा दाता। गृहिणीचा पिता जोती मित्र अशा शब्दात त्यांनी या आपल्या मित्राचे गुणवर्णन केले आहे.’’ असे गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे.

``जोती आपले शिक्षण पूर्ण करीपर्यंत मिशन शाळेत जात होता. त्या काळी इंग्रजी शिक्षणासाठी महाराष्ट्रात महाविद्यालय नव्हते. इंग्रजी शिक्षण देणारी तशी मोठी एखादी संस्थाही नव्हती. याच दिवसांत सदाशिव गोवंड्यांनी मोरो विठ्ठल वाळवेकर या ब्राह्मण मित्राशी आणि वाळवेकरांचा ब्राह्मणमित्र सखाराम यशवंत परांजपे यांच्याशी मैत्री जोडली.

मोरो वाळवेकर हा गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता. त्याचेही शिक्षण एका मिशनशाळेत झाले होते. वाळवेकर आणि परांजपे हे जोतीचे परम स्नेही झाले. पुढे ते दोघे जोतीच्या कार्यातील मोठे सहकारी म्हणून गाजले''. असेही कीर यांनी लिहिले आहे.

जोतिबांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळा चालवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचा उल्लेख करता येईल. स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत जोतिबांनी १८४१ ते १८४७ या काळात आपले माध्यमिक इंग्रजी शिक्षण पूर्ण केले.

सावित्रीबाईनी पुण्यात मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचे धडे घेतले असा उल्लेख हरी नरके आणि इतर संशोधक करतात त्या मिसेस मिचेल म्हणजे रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल.

जोतिबांनी सावित्रीबाईंच्या मदतीने आपल्या शाळा वेतन न घेता चालू ठेवल्या. त्याकाळात अर्थार्जनासाठी जोतिबा फुले स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या शाळांत अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्य करत होते. मेजर थॉमस कँडी काही काळासाठी मायदेशी गेल्यावर रेव्हरंड जॉन मरे मिचेल हे पुण्यातल्या १८२१ साली स्थापन झालेल्या संस्कृत कॉलेजचे - नंतरच्या पुना कॉलेजचे आणि आजच्या डेक्कन कॉलेजचे - प्राचार्य (व्हिजिटर) आणि संस्कृत-मराठी विभागांचे प्रमुख होते.

``आम्ही पाहिलेले फुले'' या हरी नरके संपादित आणि महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सत्यशोधक कार्यकर्ते शास्त्री नारो बाबाजी महाघट पाटील यांनी १८९१ साली लिहिलेले जोतिबांचे अल्पचरित्र समाविष्ट केले आहे. त्यात सावित्रीवाई फुले यांनीं मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असे म्हटले आहे.

``जोतीरावांचे शिक्षण बुडाल्याने सगुणाबाईचा जीव तिळतिळ तूटत होता. तिने लिजिटसाहेबामार्फत गफार बेग मुनशीचे वजन गोविंदरावांवर पाडून त्यांचे मन वळविले. त्यामुळे जोतीराव १-१-१८४३ पासून बुधवारवाड्यातील शाळेत पुन्हा जाऊ लागला.

त्याच वेळेपासून सगुणाबाईच्या आग्रहामुळे ते सगुणाबाईस व सावित्रीबाईस शिकवू लागले. सगुणाबाई पूर्वी जोतीरावांकडून थोडेफार शिकली होती पण ती विसरून गेली होती. दोघीहि एकमेकांच्या सहवासात चढाओढीने शिकत होत्या. जोतीराव अभ्यासू व हुशार मुलगा होता. त्याने प्रत्येक वार्षिक परीक्षेत निरनिराळी पुस्तके बक्षिसे मिळविली होती.

पत्नीला व माईला मराठीचे सर्व शिक्षण दिल्यावर त्यांना मिसेस मिचेल यांच्या अत्याग्रहावरून शिक्षणिकीचा कोर्स देण्यासाठी त्यांनी ठरविले. हा कोर्स नार्मल स्कूलमध्ये मिचेलबाईच चालवीत होत्या. या बाईंनी सावित्रीदेवीची व सगुणाबाईची परीक्षा घेऊन त्यांना तिसऱ्या वर्षाचा प्रवेश दिला.

त्यांचे तिसरे वर्ष (१८४५-१८४६) साली पास झाले. (१८४६-१८४७) साली ४ वर्षाची परीक्षा देऊन त्या स्कूलमधून बाहेर पडल्या. या दोघीही पुढे उत्तम ट्रेड मिस्ट्रेस म्हणून नावाजल्या. १८४७ साली महात्मा जोतीराव इंग्रजी शिक्षणाची शेवटची परीक्षा उत्तम तन्हेने पास झाले

सनातनी मंडळींच्या प्रखर विरोधामुळे ही शाळा जोतीबांना बंद करावी लागली.

``जोतीरावांच्या वडिलांनी तर त्यांना केव्हाच घरातून घालवून दिले होते. ना पित्याचा आश्रय, ना स्वतःचा धंदा. त्यामुळे त्यांची संसारात फारच आर्थिक कुचंबणा झाली. अशा परिस्थितीत त्यांना पुण्यातील स्कॉटिश मिशनऱ्यांचा मुलींच्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करणे भाग पडले. ही शाळा ख्रिस्ती- मिशनऱ्यांनी १८५४ जुलै महिन्यात मिशनच्या आवारात सुरू केली होती. मुलींचे वसतिगृहही तेथेच होते. त्या संस्थेमध्ये टाकलेली मुले, अनाथ मुले आणि ख्रिस्तीधर्म स्वीकारलेल्या गरीब लोकांची मुले आणि ज्यांच्यावर मिशनचा पूर्ण ताबा होता अशी मुले त्या संस्थेत शिकत होती. जेवणाखाण्याची तेथेच व्यवस्था असे’’ असे कीर यांनी आपल्या ,`महात्मा जोतीराव फुले' या पुस्तकात लिहिले आहे.

धनंजय कीर यांनी लिहिले आहे कि ``पुण्यातील स्कॉटिश मिशनऱ्यांचा मुलींच्या शाळेची माहिती देताना एका इतिवृत्तात चालकांनी असे म्हटले आहे की, सध्या आमच्याकडे वसतिगृहामध्ये राहणारी १३ मुले आहेत. दिवसा त्यांचे शिक्षण होत असताना दुसरी ४० मुले त्यांच्याबरोबर शिकतात.

पुण्यातील एक अत्यंत उत्साही आणि निपुण शिक्षक आमच्या शाळेत दररोज चार तास शिक्षणाच्या कार्यात साह्य करावयास लाभला आहे, याविषयी आम्हांला समाधान वाटते. ते म्हणजे परोपकारबुद्धीचे आणि कनिष्ठ जातींच्या मुलींच्या शिक्षणासाठी अविरत झगडणारे आणि ज्यांच्या कार्याची शिक्षामंडळीने आणि स्वतः सरकारने मनापासून प्रशंसा केली, ते जोतीराव फुले होत. त्यांनी आमच्या मोठ्यात मोठ्या शिक्षणविषयक आशा फलद्रूप केल्या. ''

महात्मा फुलें स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत शिक्षक होते याचा उल्लेख ज्ञानोदय या मासिकात जोतिबांच्या निधनानंतर १८ डिसेंबर १८९० रोजी लिहिलेल्या अग्रलेखातसुद्धा पुढीलप्रमाणे आढळतो.:``पुण्यातील मिशनरींनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलीच्या शिक्षणाच्या कामावर पगार देऊन नेमले. येथे कामावर असता त्यांनी मिशनरी लोकांच्या सुचनेवरुन ख्रिस्तीधर्माकडे विशेष लक्ष पुरविले-''

डॉ. विल्यम हंटर शिक्षण आयोगापुढे पुणे येथे १९ ऑकटोबर १८८२ रोजी सादर केलेल्या निवेदनात महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्याला ख्रिस्ती मिशनरींनीं मुलींसाठी सुरु केलेल्या शाळांमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली, आपण आपल्या शाळा नंतर मिसेस मिचेल यांच्याकडे चालवण्यासाठी दिल्या, तसेच ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेत आपण स्वतः शिक्षक होतो असे नमूद केले आहे.

जोतिबांनी या निवेदनाच्या पहिल्या परिच्छेदांत म्हटले आहे :

`` माझा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव पुणे आणि पुण्याच्या परिसरातील खेडी यापुरताच प्रामुख्याने आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीं या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती. म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला सन १८५४ (१८५३) च्या सुमारास झाली व मी आणि माझी पत्नी अशा उभयतांनीं कित्येक वर्षांपर्यंत त्या शाळेत काम केले…… या संथांमध्ये मी सुमारे नऊदहा वर्षे कार्य करीत होतो; पण काही विशिष्ट परिस्थितीमुळे ते कार्य मी सोडले. सध्या समितीने मुलींच्या शाळांची व्यवस्था शिक्षणखात्याकडे सुपूर्द केली असून मिसेस मिचेलच्या देखरेखीखाली त्या शाळा अद्यापही चालू आहेत.’’

महारमांगादी कनिष्ठ वर्गीयांची शाळासुद्धा आजपर्यंत चालू असली तरी तिची स्थिती फारशी समाधानकारक नाही. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीं चालविलेल्या वसतिगृही शाळॆत मी काही वर्षे शिक्षकाचे काम केलेले आहे. आता उल्लेखिलेल्या शाळांमध्ये मी जे कार्य केले, तोच शैक्षणिक क्षेत्रातला माझा महत्त्वाचा अनुभव म्हणता येईल.'' जोतिबांचे दत्तकपुत्र यशवंत फुले यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या अल्पचरित्रात म्हटले आहे.

``जोतीराव यांचे तीर्थरूप वारल्यामुळे त्यांस बरीच दीनावस्था प्राप्त झाली. इतक्यात त्यांची ही भरभराटी पाहून पुण्यातील काही मिशनरी लोकांनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलींस शिक्षण देण्याच्या कामावर नेमले. या कामावर असता परोपकारी मरे मिचेल वगैरे युरोपियन सद्गृहस्थाच्या सूचनेवरून जोतीराव यांनी आपले लक्ष ख्रिस्तीधर्माकडे विशेष पुरविले.’’ जोतिबांचे हे अल्पचरित्र’ 'आम्ही पाहिलेले फुले' या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे.

स्कॉटिश मिशनरी आणि विशेषतः जॉन मरे मिचेल आणि जोतिबा फुले यांच्या नातेसंदर्भात ज्येष्ठ संशोधक रा ना. चव्हाण यांनी पुढील शब्दांत लिहिले आहे:

``इंग्लंड आणि स्कॉटलंडमधून प्रोटेस्टंट मिशनऱ्यांच्या तुकड्या भारतात आल्या. मुंबईस डॉ. विल्सन, कलकत्यास डॉ. डफ. पुण्यास डॉ. मिचेल येऊन थडकले. हे सारे स्कॉच होते. हे लोक मराठी शिकले. कमीअधिक संस्कृत शिकले आणि धर्मप्रचार करू लागले. तरुणांच्या ओळखी करायच्या, त्यांना घरी बोलवायचे, शक्य झाल्यास त्यांच्या घरी जायचे, स्वतःच्या घरात लहानलहान चर्चा मंडळे काढायची, पाहुण्यांना ख्रिस्ताच्या तत्त्वज्ञानाचा परिचय करून द्यायचा, अशी या मिशनऱ्यांची पद्धत होती. अजून आहे.

या पद्धतीस अनुसरून मिचेलसाहेबांनी तरूण फुल्यांची ओळख करून घेतली, दोघांचा खूपच परिचय वाढला. चर्चा झाल्या. मिचेलच्या चरित्रात फुल्यांचे उल्लेख येतात. गाठीभेटीत काय घडले हे समजण्यास मार्ग नाही. परंतु अंदाज करण्यास पुष्कळच आधार आहेत.’’

ख्रिस्ती मिशनरी आणि महात्मा फुले दाम्पत्य यांचे अशाप्रकारचे अतूट नाते आणि ऋणानुबंध होते. जोतिबा फुले अनेकदा हे ऋणानुबंध व्यक्त करतात.

या मिशनरींनीं सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची व्यक्तिमत्वे घडवण्यात आपल्या परीने योगदान केले. मात्र गेल्या दोनशे वर्षांच्या कालखंडानंतर आजही या व्यक्तींविषयी, महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासांत या मिशनरींच्या वैयक्तिक चरित्रांवर, कार्यांवर आणि योगदानांवर आजही पुरेसा प्रकाश पाडला गेलेला नाही.

कामिल पारखे...

Tuesday, February 20, 2024

 

जॉन मरे मिचेल

``स्कॉटलंडमध्ये (रॉबर्ट ) बर्न्स इतका लोकप्रिय नसेल जितके तुकाराम ( ते स्वतःला तुका असेच संबोधतात) महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.'' इति जॉन मरे मिचेल

संत तुकाराम यांचे अभंग इंग्रजीत भाषांतर करणारे, संत ज्ञानेश्वर यांची आणि तुकोबांची एकोणिसाव्या शतकात पाश्चात्य जगाला ओळख करून देणारे जॉन मरे मिचेल बहुधा पहिलीच युरोपियन व्यक्ती.
महाराष्ट्राचा एकोणिसाव्या शतकाचा इतिहास जॉन मरे मिचेल यांना डावलून पूर्ण होणार नाही इतके या स्कॉटिश मिशनरीने सुरुवातीला मुंबई-पुण्यात आणि नंतर काही वर्षे कोलकात्यात विविध क्षेत्रांत कार्य केले आणि विपुल प्रमाणात विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत.
असे असले तरी जॉन मरे मिचेल हे नाव तसे महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांचे अभ्यासक आणि संशोधक असलेल्या तज्ज्ञांनासुद्धा फारसे परिचित नाही.
खरे सांगायचे झाल्यास मीसुद्धा हे नाव एक वर्षांपूर्वी ऐकलेसुद्धा नव्हते.
जॉन मरे मिचेल यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे महात्मा जोतिबा फुले हे पुण्यातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत १८४१ ते १८४७ या काळात शिकले तेव्हा काही काळ मरे मिचेल या शाळेत शिक्षक होते.
अर्थार्जनासाठी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत जोतिबा १८५२ नंतर काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी करत असत.
पुण्यात मरे मिचेल यांनी १८६२च्या सुमारास केवळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा चालवली.
जॉन मरे मिचेल यांना टाळून महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याचे जीवनचरित्र पूर्ण होऊ शकत नाही
एक संदर्भ म्हणून जॉन मरे मिचेल यांनी आपल्या विविध पुस्तकांत लिहिलेल्या या नोंदींना अतोनात महत्त्व आहे.
ही सर्व इंग्रजी पुस्तके अर्थातच स्कॉटलंडमध्ये प्रकाशित झाली होती. त्यामुळेच बहुधा स्थानिक अभ्यासकांचे या मौल्यवान ग्रंथांकडे दुर्लक्ष झाले असावे. .
जॉन मरे मिचेल (१८१५ ते १९०४) असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते.
जोतिबांचे दत्तकपुत्र यशवंत फुले यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या अल्पचरित्रात म्हटले आहे :
``जोतीराव यांचे तीर्थरूप वारल्यामुळे त्यांस बरीच दीनावस्था प्राप्त झाली. इतक्यात त्यांची ही भरभराटी पाहून पुण्यातील काही मिशनरी लोकांनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलींस शिक्षण देण्याच्या कामावर नेमले. या कामावर असता परोपकारी मरे मिचेल वगैरे युरोपियन सद्गृहस्थाच्या सूचनेवरून जोतीराव यांनी आपले लक्ष ख्रिस्तीधर्माकडे विशेष पुरविले.’’
पुण्यात १८२१ साली स्थापन झालेल्या संस्कृत कॉलेजचे मरे मिचेल हे या संस्कृत कॉलेजचे (नंतरच्या पुना कॉलेजचे आणि आजच्या डेक्कन कॉलेजचे ) काही काळ प्राचार्य (व्हिजिटर) आणि संस्कृत-मराठी विभागांचे प्रमुख होते.
रेव्हरंड जॉन मरे मिचेल हे १८३८ च्या नोव्हेंबर भारतात आले. मुंबईत आल्यावर त्यांनी कृष्णशास्त्री यांच्या हाताखाली मराठीचा अभ्यास केला. रेव्ह. जॉन स्टिव्हन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतचा अभ्यास केला.
प्राचीन मराठी वाड्यमयाचा अभ्यास करून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली. बायबलचे मराठी भाषांतर सुधारण्यात त्यानीं मोठे योगदान दिले.
स्कॉटिश मिशनरी अलेक्झांडर डफ १८३५ ला विश्रांतीसाठी मायदेशी परतले त्यावेळी एडिनबर्ग कॉलेजात शिकत असलेल्या जॉन मरे मिचेल त्यांना भेटले.
या तरुणाला मिशनकार्याची आवड आहे हे पाहून `आता लगेच माझ्याबरोबर भारतात ये' असे रेव्ह. डफ मरे मिचेल यांना म्हणाले. मात्र मरे मिचेल यांनीं एडिनबर्ग येथील आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर तीन वर्षांनी मरे मिचेल यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर स्कॉटलंडच्या मिशन अधिकाऱयांनी मरे मिचेल यांना कोलकात्याऐवजी मुंबईत मिशनकार्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. कोलकात्यात रेव्हरंड अलेक्झांडर डफ यांच्याबरोबर काम करण्याची आपली इच्छा पूर्ण होणार नाही हे कळून मरे मिचेल काहीसे नाराज झाले होते.
मात्र भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कधी कुणाला कल्पना असते?
स्कॉटलंडमध्ये कॉलेजात शिकत असताना आलेल्या एका अनुभवाचे जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' या आपल्या आत्मचरित्रात पुढील शब्दांत वर्णन केले आहे :
``माझ्या या ईशज्ञानाच्या चौथ्या किंवा अखेरच्या वर्षाला मी ग्रामर स्कुलच्या एका वर्गाला शिकवले. शाळेतल्या एका शिक्षकाने अचानक काम सोडले होते आणि दुसऱ्या शिक्षकाची लगेच नेमणूक करणे नव्हते. रेक्टर डॉ. मेल्विन यांनी मला एक वर्षासाठी त्या एका वर्गात शिकवण्याची मला विनंती केली.. मला ते काम खूपच आवडले आणि त्या वर्गात मला कधीही कुणाही व्रात्य विद्यार्थ्याला बडवण्याची वेळ आली नाही याचा मला विशेष अभिमान वाटला. वर्गातल्या त्या छोट्या मुलांना हाताळणे मला सहज शक्य झाले.''
स्कॉटलंडमधील हा अनुभव मरे मिचेल यांना पुण्यात आणि शेजारच्या परिसरांत ख्रिस्ती धर्माची लोकांना शिकवण देण्याच्या कामात फायदेशीर ठरला असावा.
मरे मिचेल आणि इतर ख्रिस्ती मिशनरी प्रवचनासाठी बाहेर पडत असत तेव्हा त्यांची टिंगलटवाळी होत असे.
भारतात आल्यानंतर आपण खिस्ती धर्मप्रसार करण्यासाठी कायकाय प्रयोग केले याचे वर्णन जॉन मरे मिचेल यांनी केले आहे :
``आपल्या स्वतःच्या घराच्या आवारात इतरांना आपला धर्म शिकवताना आपण आपले स्वतःचे नियम आणि अटी लागू करू शकता. अशावेळी तुम्हाला कुणी व्यक्ती त्रास देण्याची शक्यता नसते. मात्र आपल्या घरापासून दूर, परक्या स्थळी आणि रस्त्यांवर ख्रिस्ती धर्माची शिकवण देण्यासाठी इतरांना न दुखावण्याचे खास कसब, अमर्याद सहनशीलता आणि खूप संयम असणे अत्यावश्यक असते.
यासाठी मी एक मार्ग निवडला होता. समुद्रकिनाऱ्यावर सकाळी लोक जमलेले असताना घोड्यावर बसून मी तेथे जात असे आणि त्या लोकांना प्रवचन देत असे. जोपर्यंत तो जमाव शांतपणे माझे बोलणे ऐकत असे तोपर्यंत माझे प्रवचन चालू असायचे. त्या लोकांनी गोंधळ करायला सुरु केले तर मी लगेच माझा घोडा दुसरीकडे नेऊन तेथे पुन्हा नव्याने प्रवचन सुरु करत असे.
प्रवचनाच्या दरम्यान अधेमध्ये एखाददुसरा प्रश्न आला तरी काही बिघडत नसे. मात्र हे लोकसुद्धा गडबडगोंधळ करू लागले कि मी माझा घोडा पुन्हा एकदा नव्या दिशेने नेत असे. ‘’
भारतात लोकांचा मुलींच्या शिक्षणाबाबत असलेल्या दृष्टिकोनाबाबत आणि स्कॉटिश मिशनच्या मुस्लीम मुलींसाठी चालवलेल्या स्वतंत्र शाळेबाबत जॉन मरे मिचेल लिहितात :
``मिशनरींच्या आणि स्टुडंट्स सोसायटी ऑफ बॉम्बेच्या उदाहरणामुळे स्थानिक लोकांनी याबाबत पुढारी घेतला आणि सरकारने त्यांना सर्व प्रकारचे उत्तेजन दिले. यासाठी सरकारने दक्षिणा फंडातून दरवर्षी सहाशे रुपयांची रक्कम पुरवली. मात्र या शाळांत मुलींची संख्या फक्त दिडशे होती. सरकारने आमच्या मिशनला रक्कम दिली नव्हती तरी आमच्या शाळेत १८६२ च्या मे महिन्यात मुलींची संख्या तिनशेपर्यंत वाढली होती.
सर्वांत खास बाब म्हणजे आमच्या मिशनची एक मुस्लिम मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा होती आणि या शाळेचा संपूर्ण खर्च या विद्यार्थिनींनी दिलेल्या फिमधून चालवला जात होता. या शाळेत विद्यार्थिनींची संख्या सत्तर होती.
त्याकाळात केवळ मुस्लिम मुलींसाठी चालवली जाणारी पुण्यातील ही एकमेव शाळा होती, ‘’ असे जॉन मरे मिचेल यांनी म्हटले आहे.
मात्र केवळ मुस्लीम मुलींसाठी पुण्यात चालवली जाणारी ही तशी अगदी पहिलीवहिली शाळा नव्हती. रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी १८३०ला पुण्यात स्कॉटिश मिशनचे काम सुरु केले. त्यानंतर स्कॉटिश मिशनच्या सुरुवातीच्या काळात पुण्यात रेव्हरंड वजिर बेग यांनी मुस्लीम मुलींसाठी एक शाळा सुरु केली होती.
पुना कॉलेजचे प्राचार्य असलेले मेजर थॉमस कँडी काही काळासाठी आपल्या मायदेशी जाणार होते, कँडी यांच्या गैरहजेरीत यांनी या कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारण्याची ईस्ट इंडिया कंपनी सरकारने त्यांना विनंती केली.
आपल्या आत्मचरित्रात जॉन मरे मिचेल लिहितात:
``हो-ना असे करत अखेरीस करत मी ते पद स्वीकारण्याचे ठरवले. कॉलेजच्या इंग्रजी विभागात मी आठवड्यातून दोनदा नैतिक तत्त्वज्ञान शिकवत असे. माझ्या या वर्गांत हजेरी ऐच्छिक होती. असे असले तरी प्रगतशील असलेले तीस लोक या व्याख्यानाला नियमितपणे उपस्थित राहत असत आणि ते सर्वच जण खूपच .चांगले वागत असत.
मी असे ऐकले होते कि पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा या संस्कृत कॉलेजचे प्रिंसिपल म्हणून एक युरोपियन (मेजर थॉमस कँडी) व्यक्तीची नेमणूक करण्यात आली तेव्हा त्यांच्या आगमनाच्यावेळी प्रवेशद्वारात अडथळे उभारण्यात आले होते. आणि आता माझी म्हणजे एका मिशनरीची अधिकृत व्हिझिटर म्हणून नेमणूक झाली असताना या लोकांचा प्रतिसाद वेगळा असा काय असणार होता?
मात्र या संस्कृत कॉलेजातील पंडित माझ्याशी खूपच अगत्याने वागले आणि या अगत्याचा प्रतिसाद अगत्यानेच द्यायचा असेच माझे धोरण होते. ‘’ .
महात्मा जोतिबा फुले यांनी रेव्ह. जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत एक महार मुलगा पाठवला होत्या, त्या अस्पृश्य मुलाची हृदयदावक कहाणी मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे.
जोतिबा आणि जॉन मरे मिचेल यांच्या संदर्भातील ``चटईचाही विटाळ’ ही घटना धनंजय कीर यांनी महात्मा फुले चरित्रात पुढील शब्दांत सांगितली आहे:
``माझे स्नेही जोतीराव गोविंदराव फुले ही एक मोठी उल्लेखनीय अशी व्यक्ती होती. महारांचे हित व्हावे म्हणून ते अत्यंत परिश्रम घेत असत. महार हे हीन जातीचे.
जोतीरावांनी एकदा त्या जातीचा मुलगा आमच्याकडे पाठविला. त्याला इंग्रजीच्या प्रारंभीच्या वर्गात घालण्याइतका त्याचा देशी अभ्यास झालेला होता.
त्याला शाळेत प्रवेश देताच ब्राह्मण मुलांचे एक शिष्टमंडळ माझ्याकडे आले. त्या मुलांचे काळेभोर डोळे चकाकत होते आणि त्यांचे हावभाव मनातील हेतू प्रदर्शित करीत होते.
ते म्हणाले, "तुमच्या शाळेत महार मुले असल्यामुळे आम्ही शाळा सोडणार आहोत.'
मी म्हणालो, "अरे, मला वाटते एकच मुलगा आहे."
"होय. एक काय आणि दहा काय, सारखेच."
"मग काय त्या मुलाला हाकलून देऊ?"
"ते आम्हाला काय सांगता? आमचे म्हणणे एवढेच की, तो राहिला तर आम्ही जाणार!"
"तुमची इच्छा नसेल तर त्याला तुम्ही शिवू नका. तुम्ही वर्गातील हुशार मुले आहात, तुमचा क्रमांक नेहमी वरच असणार, तो वेगळ्या बाकावर बसतो.'
"ते खरे, परंतु चटई जमिनीवर असते ना? तिचा विटाळ आम्हांस होतो. आता सर्वांना विटाळ झाला आहे. आता घरी जेवणापूर्वी स्नान करून हा विटाळ घालविला पाहिजे."
"मी ती चटई काढून टाकावी अशी तुमची इच्छा आहे का ?"
"आम्ही वर्गातच नसतो तर बरे झाले असते."
"ठीक तर. काही झाले तरी मी त्या मुलाला वर्गाबाहेर हाकलून देऊ शकत नाही."
मी अगदी गोंधळून गेलो. एक तर ब्राह्मण मुलांना हाकलून देण्याची माझी इच्छा नव्हती आणि माझ्या सदसदविवेकबुद्धीप्रमाणे मी त्या महार मुलालाही शाळेतून बाहेर काढू शकत नव्हतो.
मी म्हणालो, "उद्यापर्यंत थांबा. वर्गांची उद्या फेररचना करू आणि तशातही तुम्ही आता वरच्या वर्गात उत्तीर्ण होऊन जाणार."
हा ना करता ब्राह्मण मुले दुर्मुखलेल्या चेहेऱ्यांनी निघून गेली.
तो महार मुलगा शाळेत फिरून आलाच नाही.
पाण्याच्या बाहेर माशाची जशी स्थिती होते तशीच त्याची हया शाळेत झाली. इतर उच्चवर्णीय व मध्यमवर्गीय मुलगे या बाबतीत अचल राहिले. ’’
जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्रातली दुसरी एक घटना धनंजय कीर यांनी आपल्या जोतिबा फुले यांच्या चरित्रात सांगितली आहे. कीर यांनी लिहिले आहे :
``कनिष्ठ वर्गाच्या उद्धाराविषयी उदासीनवृत्ती दिसून येत होती, तरी त्या वर्गातील काही मुलांनी त्या काळी शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांना ब्राह्मणांनी अत्यंत निर्दयपणे वागवून त्यांचा छळ केला.. रेव्हरंड आदम व्हाईट यांनी एकदा पुण्याजवळील सरकारी शाळेला भेट दिली.
त्या शाळेतील ब्राह्मण पंतोजीजवळ एक वेताची छडी होती. तिचा उपयोग ते पंतोजी अधूनमधून चांगलाच करीत.
आदम व्हाईट यांनी त्या ब्राह्मण पंतोजीला विचारले की, 'ही ढेकळं तुमच्याजवळ कशाकरिता ठेवली आहेत?"
पंतोजी उत्तरले, "स्पृश्य मुलांच्याबाबतीत मी छडी वापरतो. जर मी छडीने महार मुलास मारले तर तो अस्पृश्य असल्यामुळे काठीबरोबर विटाळ येईल आणि माझे सर्व शरीर विटाळेल. म्हणून जेव्हा महार मुलगा मूर्खपणाने वागतो तेव्हा मी एक ढेकूळ घेतो आणि त्याच्याकडे फेकतो. जर चुकलं तर दुसरं मारतो."
मरे मिचेल १८६३ साली कोलकात्याला अलेक्झांडर डफ यांच्याबरोबर मिशनकार्य करण्यासाठी गेले होते. आता खूप वर्षानंतर मरे मिचेल यांना आपली मनिषा पूर्ण करण्याची संधी मिळाली होती.
भारतातील म्हणजे मुंबई, पुणे आणि नंतर कोलकाता येथील आपल्या मिशनकार्यांची समाप्ती करुन जॉन मरे मिचेल आपल्या पत्नीसह मायदेशी स्कॉटलंडला परतले. त्यानंतरसुद्धा भारतातील अनेक व्यक्तींशी आणि जोतिबा फुले यांच्याशी त्यांनी संपर्क ठेवला होता.
आपल्या आयुष्याच्या अखेरीस जोतिबा अर्धांगवायुने बिछान्याला खिळले तेव्हाही मरे मिचेल यांनी त्यांना स्कॉटलंडहून पत्र लिहिले होते.
जोतिबा, जेम्स मिचेल आणि मरे मिचेल या तिघांचेही स्नेही असलेल्या बाबा पद्मनजी यांनी जोतिबांवर लिहिलेल्या मृत्युलेखात जोतीरावांचे जेम्स मिचेल आणि मरे मिचेल यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाविषयी पुढील शब्दांत लिहिले आहे :
``त्यास (जोतिबा फुले यांना) ख्रिस्ती धर्माविषयी पुष्कळ ज्ञान होते, ते त्यास त्यांचे जुने मित्र रे. जेम्स मिचेल व डॉ.मरे मिचेल व त्यांची पत्नी हयांपासून प्राप्त झाले होते. डॉ.मिचेलसाहेब हयांनी तर थोडया महिन्यामागे स्कॉटलंडांतून त्यांस पत्र पाठवून त्यात त्यांच्या आत्म्याच्या कल्याणाची कळकळ दर्शविली होती. ‘’
रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांना ८९ वर्षे इतके दीर्घायुष्य लाभले. मायदेशी परतल्यावरही त्यांनी भारताविषयी पुस्तके लिहिणे चालू ठेवले.
एका पुस्तकाच्या अखेरीस ताजा कलम म्हणून काही शब्द..
``ताजा कलम''
या पुस्तकात वर्णन केलेल्या लोकांपैकी हारमदजी पेस्तनजी आणि डॉ नारायण शेषाद्री यांचे त्यांच्या श्रद्धापूर्वक परिश्रमानंतर निधन झाले आहे. सन १८३९ साली ज्यांचा बाप्तिस्मा झाला होता ते धनजीभाई नौरोजी ते आजही हयात असून ज्येष्ठ मिशनरींमध्ये त्यांच्या समावेश होतो, सगळीकडे त्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली जात असते.
बाबा पद्मनजी आज खूप वयोवृद्ध झालेले असले तरी त्यांची लेखणी आजही थकलेली नाही. मराठी बायबलच्या सुधारित आवृती आणण्यासाठी ते कार्य करत आहेत.
आमच्या शाळेचे दुसरे एक विद्यार्थी गणपतराव आर नवलकर यांनी भरपूर आणि उत्तम साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेले मराठीचे व्याकरण खूप विस्तृत स्वरूपाचे आणि चांगल्या दर्जाचे आहे.
माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तींचे निधन होऊन मी मात्र अजूनही हयात आहे याबद्दल कधीकधी मला आश्चर्य वाटते. उदाहरणार्थ, गार्डनर, स्टोथर्ट आणि स्मॉल हे खूपच आदरणीय मिशनरी होते.
पुण्यात मी दुसऱ्यांदा राहायला आलो तेव्हा श्रीयुत गार्डनर हे खूप जवळच्या नात्याचे माझे सहकारी होते.''
एडिनबर्ग, स्कॉटलंड १८९९
^^^^
Camil Parkhe,

Saturday, March 11, 2023



दोनशेदहा वर्षांपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी १८१३ रोजी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या मिशनवर निघालेल्या तीन व्यक्तींनी मुंबई बंदरात पाय ठेवला आणि भारतात एका वेगळ्या पर्वाची सुरुवात झाली.
गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या त्या तीन व्यक्ती होत्या आधुनिक काळात भारतात पाऊल ठेवणारे हे पहिले तीन मिशनरी.
अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते. महाराष्ट्राच्या विविध शहरांत आणि खेड्यापाड्यांत मुलांमुलींसाठी शाळा उघडून, बहुजनांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे उघडून या अमेरिकन मराठी मिशनने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांत अशाप्रकारे आमूलाग्र बदल घडवले आहेत.
ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी या देशात हळूहळू आपला अंमल बसवत होती आणि त्यामुळे आपले इथे कसे स्वागत होईल याची त्यांना धाकधूक वाटत होती. आणि अगदी तसेच झाले. ``तुम्ही इथे मुळीच येऊ नका, आला तसेच परत माघारी जा,'' असेच त्यांना फर्मावण्यात आले.
याचे कारण साहजिकच होते. ईस्ट इंडिया कंपनी खासगी असली तरी तिचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार आणि ब्रिटिश कायद्यानुसार चालत होता आणि ब्रिटिश कायद्यानुसार हिंदुस्थानात मिशनरींना येण्यास चक्क बंदी होती.
याच कारणामुळे विल्यम कॅरी यांना ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल असलेल्या भारतात प्रवेश करण्यापासून रोखले केले होते. त्यामुळे डचांची सत्ता असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्याला मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती.
एक गोष्ट मात्र इथे नमूद केली पाहिजे. ती म्हणजे मिशनरींना भारतात प्रवेश करण्यावर कायद्याने बंदी असली तरी त्याकाळात आणि त्याआधीही इथे ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे होती. कारण ब्रिटिश अधिकारी आणि नोकर ख्रिस्तीधर्मीय होते. त्या चर्चमध्ये असणाऱ्या चॅप्लेन यांच्या तनख्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे मोजला जात असे. पुण्यात पेशव्यांच्या सैन्यात गोव्यातील कॅथोलिक सैनिक आणि अधिकारी होते. त्यांच्यासाठी चर्च बांधण्यासाठी माधवराव पेशवे यांनीं १७९२ साली जमीन दिली, त्यातून कॅम्पातले क्वार्टर गेटपाशी आजचे सिटी चर्च उभे राहिले.
मात्र त्याकाळातल्या या चर्चचे धर्मगुरू `मिशनरी’ नव्हते, म्हणजे ते आपल्या धर्माच्या प्रसाराचे काम करत नसत, कुणा परधर्मीय व्यक्तीचा बाप्तिस्मा करत नसत. त्याउलट आता मुंबईच्या बंदरावर आलेले हे ख्रिस्ती धर्मगुरु `मिशनरी’ होते, धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट्य होते. आणि या उद्दिष्ट्याला ब्रिटिश राज्यकर्त्यांचा - ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरचे ब्रिटिश राज्यकर्ते - यांचा धोरणात्मक सक्त विरोध होता.
त्यावेळचा मुंबईचा गव्हर्नर सर आयव्हन नेपियन हा या तीन मिशनरींना प्रवेश देण्याबाबत अनुकूल असला तरी कायद्यानुसार तसे करणे त्याला शक्य नव्हते.
ब्रिटिश नागरिकांनी आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी निर्माण केलेल्या दबावामुळे ब्रिटिश संसदेने अखेरीस १३ जुलै १८१३ रोजी हिंदुस्थानात मिशनरींच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवली. अर्थात त्यानंतरही या मिशनरींना खुलेआम किंवा सुप्त उत्तेजन देण्याचे ब्रिटिश राजसत्तेने टाळले, कारण इथल्या लोकांच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या. याबाबतीत ब्रिटिशांचे धोरण शेजारी गोव्यात काही शतके सत्ता असलेल्या पोर्तुगिजांहून अगदी वेगळे होते. याचा एक परिणाम म्हणून दीडशे वर्षे ख्रिश्चन ब्रिटिशांची सत्ता असूनही भारतातील ख्रिस्ती धर्मियांचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिले.
अमेरीकन मराठी मिशनचा किंवा इतर कुठल्याही युरोपियन व्यक्ती किंवा संस्थांचा इतिहास चाळताना एक कौतुकास्पद बाब म्हणजे आपल्या अनेक कृत्यांची, घडामोडींची नोंद, नियमित स्वरूपात अहवाल किंवा दस्तऐवज मागे ठेवण्याची त्याची सवय किंवा शिस्त.
उदाहरणार्थ, गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या पहिल्या दिवसापासून त्यांनी लिहिलेल्या अनेक नोंदी, पत्रे, टिपणे आणि त्यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी नाशिकमध्ये कॉलरामुळे झालेल्या निधनापर्यंत अनेक ऐतिहासिक बाबी आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. आपल्याकडे अगदी पुरातन काळापासून याबाबत भयानक अनास्थाच आढळते. त्यामुळे याच काळात किंवा त्यानंतर काही दशकांनी भारतात आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींबाबत, काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जन्ममृत्यूंच्या तारखांबाबत आणि छायाचित्रांबाबत आजही संभ्रमाची स्थिती आहे.
अमेरिकन मराठी मिशनने इंग्रजी आणि मराठीत अशा स्वरुपे दस्तऐवज मागे ठेवल्याने भारतातील आणि महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक गोष्टींवर प्रकाश पडतो.
ख्रिस्ती मिशनरींच्या भारतातील आगमनामुळे सर्वप्रथम ठळकपणे जाणवलेला अनुकूल परिणाम म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांना ख्रिस्ती मिशनरींनी खुले करून दिलेले शिक्षण. भारतात सगळीकडे ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होण्याआधीच म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला कोलकात्याला, मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे मिशनरी लोकांनी मुलां-मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या.
`एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींसाठीं पहिली शाळा कलकत्त्यात अठराशे एकोणीस साली तेथील अमेरिकन मिशनने सुरु केली’’ असे धनंजय कीर यांनी महात्मा फुले गौरवग्रंथातल्या आपल्या लेखात म्हटले आहे.
प्रथम मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनच्या शाळेत मिस सिंथिया फरार या मिशनरी शिकवत असत. भारतात येणाऱ्या त्या `पहिल्यावहिल्या अविवाहित महिला मिशनरी' असे त्यांचे वर्णन केले जाते. इतर ख्रिस्ती मिशनरी महिला या धर्मगुरू असलेल्या आपल्या पतीबरोबर मिशनकामासाठी भारतात आलेल्या होत्या.
मिस सिंथिया फरार यांचे नाव घेतल्याशिवाय महात्मा जोतिबा फुले आणि साबित्रीबाई फुले यांची चरित्रे पूर्ण होत नाही. याचे कारण म्हणजे फरार मॅडम यांच्या अहमदनगरच्या शाळेत सावित्रीबाई फुले शिकल्या, नंतर पुण्यात त्यांनी मिचेल मॅडमच्या नॉर्मल शाळेत अद्यापनाचे प्रशिक्षणही घेतले. त्यानंतरच स्वतः फुले दाम्पत्याने पुण्यात मुलींच्या शाळा उघडल्या. फरार मॅडम यांच्या शाळेत सावित्रीबाई यांच्याबरोबर फातिमा शेख यांनीही प्रशिक्षण घेतले.
महात्मा जोतिबा फुले यांनी मिशनरींनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळा पाहून प्रेरणा घेऊन पुण्यात आपण स्वतः मुलींची शाळा सुरु केली असे त्यांनी हंटर कमिशनसमोर मांडलेल्या अहवालात पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे.
``महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा'' या आपल्या संपादित पुस्तकात हरि नरके लिहितात :
''२२ नोव्हेंबर १८५१ च्या बॉंबे गार्डियनने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. ''१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनीं जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते. एके दिवशी ते दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यास गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली.''
पंचकवींमध्ये समावेश असणारे रेव्ह. नारायण वामन टिळक, समाजसुधारक आणि विदुषी पंडिता रमाबाई अशा अनेक धुरिणांना अमेरिकन मराठी मिशनने घडवले आणि या महान व्यक्तींनी विविध क्षेत्रांत मोठे योगदान केले. या मिशनच्या कार्याचा उल्लेखावाचून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.
१८१३च्या अमेरिकन मिशनऱ्यांच्या भारतातल्या आगमनानंतर देशात आणि अमेरिकेतसुद्धा प्रचंड बदल झालेला आहे. अमेरिकेतून किंवा कुठल्याही पाश्चात्य राष्ट्रांतून हल्ली मिशनरी येण्याची शक्यता राहिलेली नाही, याचे कारण त्या देशांत धर्म या संकल्पनेचे तिथल्या समाजातून वेगाने उच्चाटन होत आहे. यांपैकी अनेक देशांत ठिकाणी कट्टरता वाढत चालली असली तरी तिथे ख्रिस्ती मिशनरी किंवा धर्मगुरु होण्याचे प्रमाण गेल्या काही दशकांत झपाट्याने कमी झाले आहे, धर्मगुरु बनवणाऱ्या सेमिनरीज ओस पडत आहेत. त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार किंवा प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा देणे हल्ली जवळजवळ कालबाह्य झाले आहे. तशातच भारतात धर्मांतरविरोधी आणि भिन्नधर्मीय विवाहांबाबत कठोर नियम आणि कायद्यांमुळे अशा गोष्टींना खिळ बसते आहे.
मात्र एखाद्या व्यक्तीने कुठल्याही कारणात्सव आपला वाडवडिलोपार्जित धर्म नाकारून दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे, तसेच इतरांना धर्मांतर करण्याबाबत प्रवृत्त करणे किंवा कुठलाही धर्म नाकारुन सरळसरळ नास्तिक बनणे या प्रक्रिया कितपत योग्य, समर्थनीय, नैतिक किंवा कायदेशीर आहे याबाबत कुठलीही टिपण्णी करणे इथे योग्य ठरणार नाही.
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मुंबईतल्या विल्सन स्कुल आणि विल्सन कॉलेजचे संस्थापक असलेल्या जॉन विल्सन, परळीतले नारायण शेषाद्री, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, इंग्रजीत कादंबरी लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि हरिपंत ख्रिस्ती यांची कन्या कृपा सत्यनाथन, तसेच भारतातल्या पहिल्या स्त्री वकील असलेल्या कॉर्नेलिया सोराबजी यांची चिकित्सक चरित्रे लिहिली आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चपळगावकर लिहितात:
``आपला देश सोडून हजारो मैल लांब आलेल्या मिशनऱ्यांच्या धर्मनिष्ठेबद्दल आणि स्वार्थत्यागाबद्दल कौतुकच केले पाहिजे . भारतात ज्या परिस्थितीत मिशनऱ्यांना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत. प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनऱ्यांना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठीभाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली. स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला रस्तोरस्ती सुवार्ता सांगत फिरणाऱ्या मिशनऱ्यांना टवाळीही सहन करावी लागली. हे त्यांचे जीवन एका अतुलनीय धर्मनिष्ठेचे आणि त्यागाचे द्योतक मानले पाहिजे . ‘’
याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुधीर रसाळ यांनी मिशनरींच्या सेवाभावी कामांमुळे आणि त्यांनी हिंदू धर्मावर केलेल्या टीकेमुळे भारतीय समाजजीवनावर झालेल्या अनेक भल्याबुऱ्या परिणामांबद्दल पुढील शब्दांत वर्णन केले आहे.
''मिशनऱ्यांच्या या धर्मप्रसाराचा मुख्य फायदा असा झाला की महाराष्ट्रातले समाजजीवन त्यामुळे ढवळून निघाले. आपल्या धर्माची कठोर चिकित्सा करायला महाराष्ट्रातील सुशिक्षितांनीं त्यामुळे प्रारंभ केला. ज्या प्रकारची धर्मचिकित्सा आणि समाजचिकित्सा या काळात झाली तशी ती गतेतिहासात कधीही झाली नव्हती. इस्लामच्या धार्मिक आक्रमणाच्या काळात अशी चिकित्सा करण्याचे टाळून हिंदू समाजाने आपल्या भोवती एक सरंक्षक तट उभा केला. आपल्या धर्मातील जे काही बरेवाईट आहे ते सर्वच टिकवून कसे ठेवता येईल, याचीच काळजी वाहिली गेली. मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर जे वैचारिक आक्रमण केले त्याचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना अपरिहार्यपणे आपल्या धर्मातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा शोध घेऊन त्यांची चिकित्सा करावी लागली. या काळात प्रार्थनासमाजासारखे जे नवे धर्मपंथ स्थापन केले गेले त्यावर ख्रिस्ती विचारांचा प्रभाव असल्याचेच दिसून येते. मिशनऱ्यांच्या टीकेमुळे अस्पृश्यतेच्या भीषण स्वरूपाची आम्हाला प्रथमच जाणीव झाली. आम्हाला जातिभेदातित समाज घडवण्याची गरज वाटू लागली. मुख्य म्हणजे पारलौकिकाकडे अतिरिक्तपणे झुकलेल्या समाजाला लौकिकाकडे आणले पाहिजे आणि त्यासाठी समाजाचे ज्यातून कल्याण होईल अशा संस्था उभ्या करुन त्या निरलसपणे चालवल्या पाहिजे असे आम्हाला वाटू लागले. सामान्य माणसाच्या लौकिक जीवनात सुख निर्माण होईल अशा सामाजिक मूल्यांचा स्वीकार करायला आपण केवळ ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे आणि मिशनऱ्यांनीं येथे धर्मातराच्या चालवलेल्या चळवळीमुळे आपण खूप काही मिळवले आणि आपण बऱ्याच प्रमाणात बदललो. ‘’
मिशनरींच्या सेवेबाबत आणि योगदानाबाबत वरील प्रतिपादन प्रातिनिधिक स्वरूपाचेच आहे.