Did you like the article?

Showing posts with label Anil Dahiwadkar. Show all posts
Showing posts with label Anil Dahiwadkar. Show all posts

Sunday, August 3, 2025


वसईतील डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी लिहिलेले ‘प्रसादचिन्हे’ हे पुस्तक आज सकाळी हातात पडले. पुण्यात एका बैठकीसाठी आलेल्या लेखिकेने स्वतः ते पुस्तक मला अभिप्रायासाठी दिले.

ही ओझरती भेट अक्षरशः काही क्षणांची आणि एकदोन वाक्यांच्या संवादांपुरती होती.
त्यामुळे पुस्तक आणि लेखिकेबरोबर एक फोटो काढण्याचे राहून गेले, याची नंतर दिवसभर चुटपुट लागली होती.
या पुस्तकाचे उपशीर्षक ‘मराठी भाषक ख्रिस्ती साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा परिचय’ असे आहे त्यामुळे पुस्तकाच्या आतल्या मजकुराविषयी कल्पना येईल.
मराठी ख्रिस्ती साहित्य सुरु होते ते गोव्यात सोळाव्या शतकात ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांनी लिहिलेल्या `क्रिस्तपुराणा’पासून आणि इतर परदेशी मिशनरींनी केलेल्या साहित्यकृतींपासून.
आशिया खंडात अन भारतात पोर्तुगीजांच्या राजवटीतील गोव्यातच पहिल्यांदा आधुनिक पद्धतीची छपाई यंत्रणा होती आणि तिथेच फादर स्टीफन्स यांचे हे मराठी काव्य रोमी लिपीत १६१६ ला छापले गेले.
मराठीच्या मायदेशी महाराष्ट्रात ख्रिस्ती साहित्य परंपरा सुरु होते ती आधी मुंबईत आणि नंतर नगर जिल्ह्यात अमेरिकन मराठी मिशनचे शिक्षणकार्य आणि मिशनकार्य सुरु झाल्यानंतर.
बंगालमधील सेरामपूरला ब्रिटिश मिशनरी विल्यम कॅरे आणि मुंबईत अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल वगैरेंनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी मराठीत पुस्तके लिहिणे आणि छापणे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरु केले.
नगर आणि नाशिक परिसरात स्थायिक झालेल्या या परदेशी मिशनरींनी आणि त्यांच्या पत्नींनी मराठीत विविध पुस्तके लिहिले आहेत. त्या पुस्तकांची नावे, प्रकाशनवर्षे आणि पानांची संख्या याबाबत आज केवळ माहिती उपलब्ध असली तरी ही आता दुर्मिळ झालेली पुस्तके कुठे कुणाच्या संग्रहांत असतील याबाबत काहीच सांगता येत नाही.
रेव्हरंड बाबा पदमनजी यांची `यमुनापर्यटन’ ही मराठीतली पहिली कादंबरी, विविध परदेशी मिशनरींनी लिहिलेले गद्य आणि पद्य वाङमय, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांचे `स्मृतिचित्रे' पंडिता रमाबाई, कविराज कृष्णाजी सांगळे वगैरेंच्या साहित्य कलाकृती खूप नंतरच्या,
न्यायमूर्ती म गो. रानडे यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवून आताच्या मराठी साहित्य संमेलनाचा पाया रचला.
विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे या संमेलनापासून आपली वेगळी चूल मांडण्याचे, सवतासुभा निर्माण करण्याचे पहिले धाडस ख्रिस्ती साहित्यिकांनी शंभर वर्षांपूर्वीच १९२७ साली नाशिकात पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवून केले होते.
आणि त्यावरही कडी म्हणजे या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनापासून फारकत घेऊन वेगळी विद्रोही म्हणजे मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने १९९२ पासून भरवली जात आहेत. आतापर्यंत अशी तब्बल अकरा संमेलने झाली आहेत आणि बाराव्या संमेलनाची तयारीसुद्धा आता चालू आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरल्यानंतर खूप काळानंतर मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहापासून विद्रोही, ग्रामीण, दलित, वेगवेगळी प्रादेशिक, आणि अगदी अलीकडेच नास्तिक संमेलने भरु लागली आहेत.
आतापर्यंत एकूण २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत, लक्ष्मीबाई नारायण टिळक नागपुरात १९३३ ला भरलेल्या चौथ्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
आतापर्यंत दोन्ही प्रकारची मिळून अशी एकूण छत्तीस ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत आणि यामध्ये महिला साहित्य संमेलनाध्यक्षांची संख्या लक्षणीय आहे.
नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे पुण्यात १९९२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. शांता शेळके त्यावेळी स्वागताध्यक्ष होत्या.
या पुस्तकाच्या लेखिका कार्व्हालोसुद्धा नाशिकच्या २००० सालच्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मराठवाड्यात बीड येथे २०२३ ला झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे होते. या पुस्तकात याबद्दल एक परिशिष्ट आहे.
मी स्वतः मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या तसेच मराठी दलित ख्रिस्ती संमेलनाच्या अशा दोन्ही मांडवांत हजेरी लावत आलो आहे. याबाबतीत सोवळे-बिवळे, मंगल किंवा अमंगल असे काही मी मानत नाही.
मराठी ख्रिस्ती साहित्याला अशी खूप जुनी आणि गौरवी परंपरा आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या साहित्यप्रवाहाबद्दल असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांच्या या पुस्तकातील मजकुराविषयी मला भरपूर उत्सुकता .होती.
त्यामुळे पुणे मेट्रोने संघ्याकाळी घरी परत येताना मेट्रोच्या दाराजवळच्या सपोर्ट हॅण्डलशी रेलून आणि नंतर एका बैठकीत मांड ठोकून ३३२ पानांचे, मोठ्या म्हणजे मासिकाच्या आकाराचे हे हार्डबाऊंड पुस्तक मी शेवट्पर्यंत पूर्ण चाळले अन नंतरच खाली ठेवून लगेचच हे लिहायला बसलो.
पुस्तक वाचनीय झाले आहे.
पेशाने शिक्षिका असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांनी भरपूर श्रम घेऊन हा ग्रंथ तयार केला आहे. त्यासाठी किती कठोर परीश्रम घ्यावे लागतात हे मी स्वतः `महाराष्ट्र चरित्रकोश (इ. स. १८00 ते इ. स. २000' तयार करताना अनुभवले आहे.
याआधी अशाच प्रकारे मराठी ख्रिस्ती साहित्याचा संशोधनात्मक वेध घेणारे काही ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. संशोधकांच्या दृष्टीने असे ग्रंथ खूप मौल्यवान असतात. कारण याच ग्रंथमित्रांना वाट पुसत नंतरचे संशोधक आपली पुढची वाटचाल चालू ठेवत असतात.
`युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा', श्री. म. पिंगे, व्हीनस प्रकाशन, पुणे (१९६०) हे त्यापैकी एक दुर्मिळ ग्रंथ.
त्यानंतर गंगाधर मोरजे यांचे `ख्रिस्ती मराठी वाङमय' (१९८४), अनिल दहिवाडकर यांचे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा' (२०२०) आणि फादर टोनी जॉर्ज (येशूसंघ) यांचा `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची' ग्रंथ (२०२१) याच प्रकारचे आहेत.
कार्व्हालो यांचे हे नवे पुस्तक याच जातकुळातले असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे.
सिसिलिया कार्व्हालो यांचे हे संपूर्ण पुस्तक मी अजून वाचले नाही. त्या पुस्तकाचा हा फक्त परिचय किंवा तोंडओळख.
वाचून झाल्यानंतर अधिक सविस्तर लिहीन.
Camil Parkhe July 29, 2025

Friday, May 2, 2025

                                                             अनिल दहिवाडकर

 काल दुपारी २ वाजून २४ मिनिटाला वाजता माझ्या व्हॉटस्अप वर हा मॅसेज आला होता...

`चर्चबेल' वाचायला घेतले.'
'चर्चबेल, पोळा सण, ख्रिसमस ,डान्स आणि सोरपोतेल' असे लांबलचक नाव असलेले माझे नवे पुस्तक (चेतक प्रकाशन) अलीकडेच अनिल दहिवाडकर यांना दिले होते.
त्यांच्या प्रतिसादाची मला उत्सुकता होतीच.
तो मॅसेज थेट संध्याकाळी सातला पाहिल्यानंतर आनंदून मी स्म्यायली इमोजी डकवली होती.
मात्र त्यानंतर पाचेक मिनिटांत अनिल दहिववाडकरांचा उत्तरादाखल मॅसेज आला अन् माझा आनंद खरोखरच द्विगुणित झाला.
कोण आहेत हे अनिल दहिवाडकर ?
माझ्या फेसबुक मित्रांच्या यादीतल्या अनेक लोकांना त्यांची माहिती नसणार म्हणून हा माझा प्रपंच..
दहिवाडकर सर याबद्दल राग मानून घेणार नाही याची मला खात्री आहे.
वयाची ऐंशी पार केलेले अनिल दहिवाडकर ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक आहेत.
पंचाहत्तरी पार केल्यानंतर त्यांनी पूर्ण केलेला ३८० पानांचा एक मोठा प्रकल्प म्हणजे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा'. (प्रकाशक ख्रिस्ती साहित्य प्रसारक)
या सूचीत सतराव्या शतकात मराठीतील पहिले मुद्रीत पुस्तक ( रोमन लिपीत ) लिहिणारे फादर थॉमस स्टीफन्स आणि विल्यम कॅरी यांच्यासारख्या अनेक परदेशी व्यक्ती आणि आजघडीला साहित्यरचना करणाऱ्या देशी व्यक्ती यांची संक्षिप्त चरित्रे, लिहिलेली पुस्तके, प्रकाशने, किंमत वगैरेची माहिती देण्यात आली आहे.
श्री. म. पिंगे यांच्या 'युरोपियनांचा मराठीचा अभ्यास' (व्हीनस प्रकाशन -१९५९) आणि गंगाधर नारायण मोरजे यांच्या 'ख्रिस्ती मराठी वाड्मय' - फादर स्टीफन्स ते १९६० अखेर' (प्रकाशक: अहमदनगर कॉलेज आणि स्नेहसदन, पुणे - १९८४ ) या दोन अमूल्य ग्रंथांच्या तोडीचे दहिवाडकर यांचे हे पुस्तक आहे.
मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या कुठल्याही संशोधकाला या ग्रंथाची खूप मदत होणार आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे गेली तीन दशके जेव्हाजेव्हा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावाची चर्चा होत असते, तेव्हा दोन नावे अग्रस्थानी असतात.
पुण्याचे अनिल दहिवाडकर आणि मुंबईतील विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो.
दोघांनाही या पदाने आतापर्यंत हुलकावणी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शेतकरी आदोलकांना 'आंदोलनजीवी' असा शब्द वापरल्यानंतर दहिवाडकर यांनी एका लेखात त्याच शैलीत 'ख्रिस्ती लोक मटणजीवी' आहेत' असा उल्लेख समाजमाध्यमात केला होता.
त्यावर मोठा गदारोळ झाला होता. यासंबंधी माझ्या या पुस्तकात छोटासा लेख आहे.
तर आता दहिवाडकर सरांनी पाठवलेला मॅसेज असा होता :
`` `चर्चबेल' एका दमात वाचून संपविले.
ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, व्यक्तिचित्रण आणि माहितीपूर्ण खुशखुशीत स्फुट लेखांचा हा संग्रह केवळ वाचनीयच नव्हे तर त्यातील विविध विषयांमुळे संग्रहणीयही झाला आहे.
पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक केवळ ख्रिस्ती असल्यामुळेच अडगळीत टाकले जातात हे आजचे वास्तव आहे.
`ख्रिस्ती माणूस मटणजीवी' आहे हे प्रथम मी म्हटले. त्यामुळे एका ख्रिस्ती माणसाचा फार संताप झाला.
आपल्या लोकांना तशी विनोदबुद्धी कमीच..
पंचहौदच्या चहा बिस्कीट समारंभात सौ. दहिवाडकर यांचे आजोबा प्रा.ना.स.पानसे आणि त्यांचे लेखक मित्र (`पण लक्षात कोण घेतो' फेम) ह. ना. आपटे हेही उपस्थित होते.
असो.
पुस्तक रोचक झाले आहे
अनिल दहिवाडकर''

Friday, July 14, 2023

May be an image of biryani

खरेखुरे मटणजीवी. दोनेक वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानीत शांततामय आंदोलन करणाऱ्या शेतकरी लोकांना `आंदोलनजीवी' अशी शेलकी पदवी प्रदान केली होती. त्यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अनिल दहिवाडकर यांनी काही समाजमाध्यम गृप्सवर `ख्रिस्ती लोक मटनजीवी आहेत' असा एक शेरा मारला होता.

या टिपण्णीबद्दल आणि नंतर झालेल्या काही आदानप्रदानानंतर दहिवाडकर सरांना त्या ग्रुपमधून काढून टाकण्यात आले होते.
आज का कुणास ठाऊक, काही तरी कारणामुळे `मराठी ख्रिस्तीजनांचे मटणप्रेम' हा विषय एका ग्रुपवर पुन्हा चर्चिला गेला अन् त्या ग्रुपवर आपल्याच समाजातील या खास प्रेमाबद्दल खूप काही विनोद आणि गंमतीदार प्रसंग सांगितले गेले.
एकाच समाजघटकाच्या खाद्यसंस्कृतीबद्दल त्याच समाजघटकाचे लोक हास्यविनोद करत असल्याने सुदैवाने यात कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच नव्हता.
त्यानंतर डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी खालील एक प्रसंग सांगितला होता:
``माझ्या आत्याचे यजमान चांगला उपदेश करीत असले तरी चर्चला जाण्यापूर्वी ती त्यांना तंबी देत असे :
"उपदेश फार लांबवू नका. तुम्हांला मटन आणायला जायचंय. घरी याल, झगा उतरवाल मग जाल. उशीर होईल. मटन चांगलं मिळणार नाही. तुम्ही काय, तो देईल ते मुकाट्याने घेऊन याल. ते शिजेपर्यंत पोरं भूक भूक करून मला भंडावून सोडतील!"
आत्याच्या यजमानाइतका स्थितप्रज्ञ चेहरा मी दुसरा पाहिला नाही आणि न कंटाळता दर रविवारी नवऱ्याला हेच ऐकवणारी पाळकीणही मी पाहिली नाही.
तरीही माझी खात्री आहे, त्याकाळी घरोघरी पळसाला पानं तीनच असणार!--''
अनुपमा उजगरे"
कुठल्यातरी पुस्तकात वाचलेले आठवते. एका चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेत प्रवचनादरम्यान या मटण प्रेमाबद्दल बोलताना धर्मगुरू सात्विक रागाने कडाडले होते.
``आपले लोक एकवेळ रविवारच्या प्रार्थनेला येण्याचे चुकतील, पण या दिवशी मटण खाण्याचे कधीही विसरणार नाहीत.''
फादरांचे हे वाक्य किती तंतोतंत खरे होते याचा प्रत्यय अनेकदा येत असतो.
रविवार म्हणजे पवित्र दिवस. देवाने आठवडाभर श्रम करून अनुक्रमे प्रकाश, अंधार, महासागर, जमीन, महासागरातील जीव आणि पृथ्वीवरील सरपटणारे आणि इतर प्राणी, आकाशात उडणारे पक्षी निर्माण केले आणि सातव्या दिवशी थकल्याभागल्या देवाने आराम केला तो पवित्र दिवस, शब्बाथ.
देवाने मोझेसला लिहून दिलेल्या दहा आज्ञांमध्ये पाचवी आज्ञा `शब्बाथ पवित्र पाळ' ही आहे.
या शब्बाथ दिवशी काहीही करायचे नसते असे ज्यू लोक मानत असत. ``शब्बाथ दिवशी कुणी व्यक्ती विहिरीत पडली तर तुम्ही तिला बाहेर काढणार कि नाही? असा एक प्रश्न त्यामुळे येशू ख्रिस्ताने सनातनी लोकांना विचारला होता.
इस्राएलच्या पवित्र भूमीला भेट देऊन आलेल्या एका मित्राने जेरुसलेम येथे शब्बाथ दिवशी काय भोगावे लागले होते याचे अनुभव मला सांगितले होते.
ज्यू आणि इस्लाम धर्मियांच्या दृष्टीने शब्बाथ म्हणजे पवित्र वार वेगवेगळे आहेत, ख्रिस्तीजन रविवार हा पवित्र दिवस मानतात.
``रविवार पवित्र पाळ '' असे लहानपणी आम्ही शिकलो. (माझ्या लहानपणी माझी आई रविवारला `आईतवार' (आदित्यवार?) आणि गुरुवारला `बस्तरवार' (बृहस्पतीवार ?) म्हणायची, हळूहळू हे शब्द तिच्या शब्दकोशातून बारगळले. ) त्यानुसार रविवारी श्रीरामपुरला आमचे `पारखे टेलर्स' दुकान बंद असायचे, लगीनसराई आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांचा अपवाद वगळता.
त्याशिवाय दर रविवारी सकाळी आमच्या घरापासून दीडदोन किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळात जाणे होई आणि परत येताना बरोबर नेलेल्या पिशवीतल्या डब्यातून घरी मटण आणले जाई. पाऊस असो, थंडी असो, या दोन्ही गोष्टी कधी चुकल्या असे मला आठवत नाही.
(` मटण' हा शब्द मराठीतील सर्वसामान्य शब्द म्हणून वापरला आहे, जसे `कोंबडीचे मटण .. )
गोव्यातल्या कॉलेजजीवनात आणि नंतर नोकरीच्या दीर्घ वास्तव्यात तर जेवणात दररोज आणि दोन्ही वेळेस मटण किंवा मासे असायचे. ख्रिसमस आणि इस्टर या सारख्या फेस्तांना पोर्क विंदालू, पोर्क सोरपोतेर सारख्या चमचमित पदार्थांची मेजवानी..
`रविवार पवित्र पाळ' या आज्ञेत ` या दिवशी मटण खा' अशी उपसूचना कुणी, कधी घुसडवली याची मला कल्पना नाही. मात्र अनेक ठिकाणी ही आज्ञा इमानेइतबारे पाळली जाते हे खरेच आहे.
त्यातच हल्ली जगाच्या अनेक भागांत रविवारी साप्ताहिक सुट्टी दिली जात असल्याने हल्ली जवळजवळ बहुतेक मांसाहारी लोक या दिवशी मटणसेवन किंवा नॉनव्हेज खात असतात.
माझ्या घराशेजारीच असलेल्या मासळीच्या आणि मटणाच्या दुकानांत रविवारी सकाळपासून लोकांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या असतात.
खरेखुरे मटणजीवी.