Did you like the article?

Showing posts with label Christian. Show all posts
Showing posts with label Christian. Show all posts

Sunday, August 3, 2025


वसईतील डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी लिहिलेले ‘प्रसादचिन्हे’ हे पुस्तक आज सकाळी हातात पडले. पुण्यात एका बैठकीसाठी आलेल्या लेखिकेने स्वतः ते पुस्तक मला अभिप्रायासाठी दिले.

ही ओझरती भेट अक्षरशः काही क्षणांची आणि एकदोन वाक्यांच्या संवादांपुरती होती.
त्यामुळे पुस्तक आणि लेखिकेबरोबर एक फोटो काढण्याचे राहून गेले, याची नंतर दिवसभर चुटपुट लागली होती.
या पुस्तकाचे उपशीर्षक ‘मराठी भाषक ख्रिस्ती साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा परिचय’ असे आहे त्यामुळे पुस्तकाच्या आतल्या मजकुराविषयी कल्पना येईल.
मराठी ख्रिस्ती साहित्य सुरु होते ते गोव्यात सोळाव्या शतकात ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांनी लिहिलेल्या `क्रिस्तपुराणा’पासून आणि इतर परदेशी मिशनरींनी केलेल्या साहित्यकृतींपासून.
आशिया खंडात अन भारतात पोर्तुगीजांच्या राजवटीतील गोव्यातच पहिल्यांदा आधुनिक पद्धतीची छपाई यंत्रणा होती आणि तिथेच फादर स्टीफन्स यांचे हे मराठी काव्य रोमी लिपीत १६१६ ला छापले गेले.
मराठीच्या मायदेशी महाराष्ट्रात ख्रिस्ती साहित्य परंपरा सुरु होते ती आधी मुंबईत आणि नंतर नगर जिल्ह्यात अमेरिकन मराठी मिशनचे शिक्षणकार्य आणि मिशनकार्य सुरु झाल्यानंतर.
बंगालमधील सेरामपूरला ब्रिटिश मिशनरी विल्यम कॅरे आणि मुंबईत अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल वगैरेंनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी मराठीत पुस्तके लिहिणे आणि छापणे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरु केले.
नगर आणि नाशिक परिसरात स्थायिक झालेल्या या परदेशी मिशनरींनी आणि त्यांच्या पत्नींनी मराठीत विविध पुस्तके लिहिले आहेत. त्या पुस्तकांची नावे, प्रकाशनवर्षे आणि पानांची संख्या याबाबत आज केवळ माहिती उपलब्ध असली तरी ही आता दुर्मिळ झालेली पुस्तके कुठे कुणाच्या संग्रहांत असतील याबाबत काहीच सांगता येत नाही.
रेव्हरंड बाबा पदमनजी यांची `यमुनापर्यटन’ ही मराठीतली पहिली कादंबरी, विविध परदेशी मिशनरींनी लिहिलेले गद्य आणि पद्य वाङमय, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांचे `स्मृतिचित्रे' पंडिता रमाबाई, कविराज कृष्णाजी सांगळे वगैरेंच्या साहित्य कलाकृती खूप नंतरच्या,
न्यायमूर्ती म गो. रानडे यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवून आताच्या मराठी साहित्य संमेलनाचा पाया रचला.
विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे या संमेलनापासून आपली वेगळी चूल मांडण्याचे, सवतासुभा निर्माण करण्याचे पहिले धाडस ख्रिस्ती साहित्यिकांनी शंभर वर्षांपूर्वीच १९२७ साली नाशिकात पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवून केले होते.
आणि त्यावरही कडी म्हणजे या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनापासून फारकत घेऊन वेगळी विद्रोही म्हणजे मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने १९९२ पासून भरवली जात आहेत. आतापर्यंत अशी तब्बल अकरा संमेलने झाली आहेत आणि बाराव्या संमेलनाची तयारीसुद्धा आता चालू आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरल्यानंतर खूप काळानंतर मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहापासून विद्रोही, ग्रामीण, दलित, वेगवेगळी प्रादेशिक, आणि अगदी अलीकडेच नास्तिक संमेलने भरु लागली आहेत.
आतापर्यंत एकूण २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत, लक्ष्मीबाई नारायण टिळक नागपुरात १९३३ ला भरलेल्या चौथ्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
आतापर्यंत दोन्ही प्रकारची मिळून अशी एकूण छत्तीस ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत आणि यामध्ये महिला साहित्य संमेलनाध्यक्षांची संख्या लक्षणीय आहे.
नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे पुण्यात १९९२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. शांता शेळके त्यावेळी स्वागताध्यक्ष होत्या.
या पुस्तकाच्या लेखिका कार्व्हालोसुद्धा नाशिकच्या २००० सालच्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मराठवाड्यात बीड येथे २०२३ ला झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे होते. या पुस्तकात याबद्दल एक परिशिष्ट आहे.
मी स्वतः मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या तसेच मराठी दलित ख्रिस्ती संमेलनाच्या अशा दोन्ही मांडवांत हजेरी लावत आलो आहे. याबाबतीत सोवळे-बिवळे, मंगल किंवा अमंगल असे काही मी मानत नाही.
मराठी ख्रिस्ती साहित्याला अशी खूप जुनी आणि गौरवी परंपरा आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या साहित्यप्रवाहाबद्दल असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांच्या या पुस्तकातील मजकुराविषयी मला भरपूर उत्सुकता .होती.
त्यामुळे पुणे मेट्रोने संघ्याकाळी घरी परत येताना मेट्रोच्या दाराजवळच्या सपोर्ट हॅण्डलशी रेलून आणि नंतर एका बैठकीत मांड ठोकून ३३२ पानांचे, मोठ्या म्हणजे मासिकाच्या आकाराचे हे हार्डबाऊंड पुस्तक मी शेवट्पर्यंत पूर्ण चाळले अन नंतरच खाली ठेवून लगेचच हे लिहायला बसलो.
पुस्तक वाचनीय झाले आहे.
पेशाने शिक्षिका असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांनी भरपूर श्रम घेऊन हा ग्रंथ तयार केला आहे. त्यासाठी किती कठोर परीश्रम घ्यावे लागतात हे मी स्वतः `महाराष्ट्र चरित्रकोश (इ. स. १८00 ते इ. स. २000' तयार करताना अनुभवले आहे.
याआधी अशाच प्रकारे मराठी ख्रिस्ती साहित्याचा संशोधनात्मक वेध घेणारे काही ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. संशोधकांच्या दृष्टीने असे ग्रंथ खूप मौल्यवान असतात. कारण याच ग्रंथमित्रांना वाट पुसत नंतरचे संशोधक आपली पुढची वाटचाल चालू ठेवत असतात.
`युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा', श्री. म. पिंगे, व्हीनस प्रकाशन, पुणे (१९६०) हे त्यापैकी एक दुर्मिळ ग्रंथ.
त्यानंतर गंगाधर मोरजे यांचे `ख्रिस्ती मराठी वाङमय' (१९८४), अनिल दहिवाडकर यांचे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा' (२०२०) आणि फादर टोनी जॉर्ज (येशूसंघ) यांचा `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची' ग्रंथ (२०२१) याच प्रकारचे आहेत.
कार्व्हालो यांचे हे नवे पुस्तक याच जातकुळातले असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे.
सिसिलिया कार्व्हालो यांचे हे संपूर्ण पुस्तक मी अजून वाचले नाही. त्या पुस्तकाचा हा फक्त परिचय किंवा तोंडओळख.
वाचून झाल्यानंतर अधिक सविस्तर लिहीन.
Camil Parkhe July 29, 2025

Tuesday, January 28, 2025

 

Shut up ! Don’t sermon me !!
कुणी एखाद्याने आगाऊपणा करत सल्ले देण्यास सुरुवात केली कि असे म्हटले जाते.
Sermon म्हणजे प्रवचन म्हणता येईल पण इंग्रजीतल्या Sermon चा एक वेगळाच अर्थ आहे.
Sermon म्हणजे ख्रिस्ती देवळांत धर्मगुरु देतात ते प्रवचन.
ख्रिस्ती चर्चमध्ये - मग ते कॅथोलिक, प्रोटेस्टंट किंवा ऑर्थोडॉक्स असो - रविवारच्या किंवा इतर दिवसांच्या उपासनेची एक ठराविक पद्धत असते.
बायबलचे वाचन झाल्यानंतर धर्मगुरु sermon ( प्रवचन) देतात आणि जमलेले सर्व भाविक ते मुकाट्याने ऐकतात.
त्या फादरांच्या किंवा पास्टरच्या उपदेशावर प्रतिवाद करता येत नाही.
अमेरिकेचे आताच पायउतार झालेले राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चर्चला नियमितपणे जात असतात.
मागे बायडेन भारतभेटीला आले होते तेव्हा त्यांची रविवारची उपासना व्हावी यासाठी अमेरिकन वकिलातीने त्यांच्यासाठी खास धर्मगुरुची नवी दिल्लीत नियुक्ती केली. होती.
आताच राष्ट्राध्यक्षपदावर आलेले डोनाल्ड ट्रम्पसुद्धा असेच नुसतेच जन्माने ख्रिस्ती नाहीत तर church goer आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाची शपथ त्यांनी बायबलला स्मरुन घेतली.
ट्रम्प यांनी फक्त पुरुष आणि स्त्री या दोनच लिगांना अमेरिकेत मान्यता असेल, बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल अशी घोषणा केली आहे.
तर नूतन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना याबद्दल दुसऱ्याच दिवशी म्हणजे कालच असे मुकाट्याने sermon ऐकून घेण्याची पाळी आली.
वॉशिंग्टनच्या डायोसिसच्या बिशपपदावर नेमणूक झालेल्या पहिल्याच महिला असलेल्या मॅरियन एडगर बड्डे (Marianne Edgar Budde ) यांनी हे धाडस केले आहे.
ट्रम्प यांच्या धोरणाबद्दल कडक शब्दांत बिशप मॅरियन यांनी नापसंती व्यक्त केली आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दयेची भूमिका घ्यावी असे त्यांना तोंडावर सुनावले.
महिलांना धर्मगुरुपद, बिशप यासारखे महत्त्वाचे पद देण्यास प्रोटेस्टंट पंथियांनी आघाडी घेतली आहे.
उदाहरणार्थ, पुण्यातल्या सर्वांत जुन्या (दोनशे वर्षे) असलेल्या सेंट मेरीज चर्चच्या प्रमुख धर्मगुरु म्हणून रेव्हरंड सोफिया मकासरे यांची दोन वर्षांपूर्वी नेमणूक झाली आहे.
वादग्रस्त समलिंगी संबंधांसंदर्भात चर्चच्या भूमिकेबाबत पोप फ्रान्सिस यांना काही वर्षांपूर्वी एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला होता.
तेव्हा " Who am to judge?'' असा प्रतिसवाल करुन तिरस्करणीय गणल्या गेलेल्या समाजघटकांतील अनेकांची पोप फ्रान्सिस यांनी वाहवा मिळवली होती.
वॉशिंग्टनच्या नॅशनल कॅथेड्रलमध्ये प्रवचन देताना बायबलच्या उताऱ्यांचा आधार घेत पासष्टवर्षीय बिशपमहोदयांनी ट्रम्प यांना म्हटले :
“Our God teaches us that we are to be merciful to the stranger, for we were once strangers in this land,” she said.
She told Trump: 'I ask you to have mercy upon the people in our country that are scared now. There are gay, lesbian, and transgender children in Democratic, Republican, and Independent families, some who fear for their lives.'
``राजा, तू चुकतो आहेस'', असे त्यांना एका महिलेने त्यांच्या तोंडावर सांगितले तेव्हा चुपचाप राहावे लागणाऱ्या ट्रम्प यांचा काय जळफळाट झाला असेल याची आपण केवळ कल्पना करु शकतो.
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलॅनिया ट्रम्प यावेळी आपल्या पतीशेजारीच बसल्या होत्या
आपला संताप ट्रम्प यांनी चर्चबाहेर आल्याआल्या लगेच शेलक्या शब्दांत शिव्या देऊन व्यक्त केला.
ट्रम्प यांची भाषाच तशी आहे.
बराक ओबामा किंवा आपल्याकडचे डॉ मनमोहन सिंग यांच्यासारखी त्यांची शब्दसंपदा किंवा सुसंस्कृतपणा त्यांच्याकडे नाही.
पुढील काही वर्षे अमेरिकेत आणि जगभर अशीच खडाजंगी दिसेल अशी चिन्हे आहेत.
Camil Parkhe January 23, 2025

Friday, April 23, 2021

पंडिता रमाबाई

अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या `समाजस्वास्थ'कार रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या चरित्रावरच्या 'ध्यासपर्व' या डाक्युमेंटरीमधील हा अगदी सुरुवातीचा प्रसंग. पांढरीशुभ्र साडी घातलेली आणि केशसंभार पूर्ण धवल असलेली उतारवयाची एक स्त्री केक कापत आहे असा तो सीन आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीे बालविधवा असलेल्या गोदूबाईशी विवाह केला आहे आणि त्यांच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा रघुनाथ खिन्न मनाने हे सगळे पाहतो आहे असे हे दृश्य.

यातली केक कापणारी महिला आहे पंडिता रमाबाई, कारण बालविधवा गोदूबाई ही त्यांच्याच अनाथाश्रमातली मुलगी आणि बालविधवेचा हा पहिला पुनर्विवाह ही भारतातली एक सामाजिक क्रांतीच होती. पंडिता रमाबाईंची भूमिका साकारली आहे विजयाबाई मेहता यांनीं.

मात्र गोदूबाईचे किरकोळ प्रकृतीच्या कर्वे यांच्याशी लग्न ठरवताना रमाबाईंनी अट घातली होती, आपल्या या 'जावईबापूं'नी आधी स्वतःचा विमा उतरवून घ्यावा, उगाच गोदू पुन्हा बालविधवा झाल्यास तिचे हाल व्हायला नको ! गंमतीचा भाग म्हणजे महर्षी कर्वे यांनी पुढे आयुष्याची शंभरी पार केली ! लक्ष्मीबाई आणि रेव्ह. नारायण वामन टिळकांचे चिरंजीव देवदत्त टिळक यांनी `पंडिता रमाबाई - महाराष्ट्राची तेजस्विनी' या चरित्रात हा प्रसंग रेखाटला आहे.

एक अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व असलेल्या पंडिता रमाबाई यांचा २३ एप्रिल हा जन्मदिन.

मूळच्या कर्नाटकातल्या असलेल्या रमाबाई डोंगरे यांची महाराष्ट्र हीच कर्मभूमी. महाराष्ट्रातील काही अगदी मोजक्या म्हणजे एका हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा काही विदुषींमध्ये मी त्यांचा समावेश करील. महाराष्ट्र ही तशी संशोधक आणि विद्वानांची खाण. `महाराष्ट्र चरित्रकोश : इ. स. १८०० ते इ.स. २०००’ या माझ्या चरित्रकोशात मी अनेक विद्वानांची अल्पचरित्रे दिली आहे, त्यात विदुषी म्हणता येईल अशी फारच कमी व्यक्तिमत्वे मला आढळली.

इरावती कर्वे, दुर्गाबाई देशमुख (सी. डी देशमुख यांच्या पत्नी), दुर्गा भागवत अशा त्या नावे घेण्यासारख्या महाराष्ट्रातील इतर काही विदुषी. यांमध्ये पंडिता रमाबाईंचे फार वरचे स्थान आहे.

पंडिता रमाबाई म्हटले कि ब्राह्मण समाजातून ख्रिस्ती होऊन या धर्माचा प्रचार करणारी महिला असेच चित्र समोर येते. पण पंडिता रमाबाई यांनी याहून खूप काही केले आहे. काँग्रेसच्या १८८०च्या दशकात सुरुवातीच्या अधिवेशनात हजेरी लावणाऱ्या मोजक्या महिलांमध्ये त्या होत्या, हंटर शिक्षण आयोगासमोर त्यांनी भारतीय महिलांच्या शिक्षणाच्या गरजेची जोरदार बाजू मांडली. बालविधवा, परित्यक्त्या आणि अनाथ मुलींसाठी त्यांनी किती कार्य केले हेसुद्धा समजून घेतले पाहिजे. त्या तरुण वयात विधवा झाल्या, शिवाय त्या ख्रिस्ती मिशनरी, म्हणून पुण्यातील आघाडीच्या दैनिकात त्यांची 'रेव्हरांडा' असा द्विअर्थी शब्द वापरुन म्हणून संभावना, हेटाळणी केली गेली, जसे मिशनरींच्या जवळ गेल्याने महात्मा फुले यांना 'रेव्हरंड फुले' असे म्हणले गेले.

काम करणाऱ्या, घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी नऊवारी साडी ऐवजी सहावारी गोल साडी चांगली, असा प्रचार करणाऱ्या पंडिता रमाबाई. त्यांची मुलगी मनोरमा मेधावी यांनी केडगावात अंधांसाठी भारतातील पहिली शाळा सुरु केली आणि तिथे ब्रेल लिपी शिकवली. केडगावातून पुण्यात डेक्कन कॉलेजात चारचाकी वाहन चालवत येणारी मनोरमा मेधावी महाराष्ट्रातील किंवा पुण्यातील बहुधा पहिली महिला. नंतरच्या काळात इरावती कर्वे यांनी पुण्यातील पेठेंत स्कुटरवरुन प्रवास करत असाच विक्रम केला होता.

पंडिता रमाबाई यांनी मराठी आणि इंग्रजी भाषांत विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली, बायबलचे मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून भाषांतर करणाऱ्या त्या जगातील पहिला महिला. आजही बायबलचे मराठीत भाषांतर करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. पंडिता रमाबाईंवर आजवर मराठी, इंग्रजी आणि इतर भाषांत जितकी चरित्रे आणि पुस्तके लिहिली गेली आणि आजही लिहिली जाताहेत, तितकी पुस्तके महाराष्ट्रातील कुणाही महिलेवर आतापर्यंत लिहिली गेलेली नाहीत.

ज्योत्स्ना देवधर (पॉप्युलर प्रकाशन १९९०) यांचे `रमाबाई' , सिसिलिया कार्व्हालो यांचे 'महाराष्ट्राचे शिल्पकार: पंडिता रमाबाई' (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (२००७) आणि अनुपमा निरंजन उजगरे यांचे `पंडिता रमाबाई' (साहित्य अकादमी २०११) ही अगदी अलिकडची त्यांची प्रसिद्ध झालेली काही चरित्रे.

पंडिता रमाबाईंनी आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात अनेक वादळांना तोंड दिले. त्यांचे एकूण व्यक्तिमत्व कुणालाही अचंबित करेल असेच आहे. 'ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' (2003 ) या माझ्या पुस्तकाची सुरुवातच या विदुषी आणि समाजसुधारक व्यक्तिमत्वाच्या प्रकरणाने होते.

या थोर व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

Camil Parkhe 23 April 2021

Wednesday, April 1, 2020

ख्रिस्ती घरात वाढलेली शिवसेना अर्थात मार्शल अखेरपर्यंत सामान्य ‘शिवसैनिक’च राहिला!


ख्रिस्ती घरात वाढलेली शिवसेना 
अर्थात मार्शल अखेरपर्यंत सामान्य ‘शिवसैनिक’च राहिला!

पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
कामिल पारखे
  • बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मार्शन जॉन पारखे
  • Thu , 23 January 2020
  • पडघमकोमविपशिवसेनाShiv Senaबाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackerayमार्शल पारखेMarshal Parkhe
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात श्रीरामपूरला आमच्या घरात ‘जय भवानी, जय शिवाजी’चे गजर घुमायला लागले. माझा थोरला भाऊ, मार्शल मॉडर्न स्कूलमध्ये मॅट्रिकला म्हणजे अकरावीला शिकत होता. त्याला एका विद्यार्थीप्रिय शिक्षकाच्या प्रभावाने शिवसेनेच्या ज्वराची लागण झाली आणि आमच्या घरातले वातावरण शिवसेनामय बनले. त्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच मार्शल पहिल्यांदा आपल्या शाळेच्या आणि नंतर बोरावके कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर आणि इतर मित्रांबरोबर लेझीम खेळू लागला. या खेळाच्या माध्यमातून शिवसेनेचा आमच्या घरात प्रवेश झाला.
मार्शल दररोज भल्या पहाटे तालमीत जायचा, तेथे लंगोट लावून घाम घाळायचा, आपल्या मित्रांबरोबर मल्लखांबावर कसरती करायचा. रात्री भिजवून ठेवलेली हरबऱ्याची डाळ सकाळी खायचा आणि दररोज संध्याकाळी आपल्या वयाच्या तरुणांना घेऊन मैदानावर ढोल-ताशांच्या गजरात ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे गर्जत लेझीम खेळायचा. संगमनेरला येशूसंघीय धर्मगुरूंच्या ज्ञानमाता शाळेच्या बोर्डिंगमध्ये असताना मार्शलने आपल्या नेतृत्वगुणांची झलक दाखवून दिली होती. या गुणांचा विकास या काळात होत गेला. आमच्या घरात लोखंडी पलंगांखाली अनेक लेझीम आणि ताशे असायचे. तेव्हा मार्शल आणि त्याच्या सहकाऱ्यांबरोबर मैदानावर या मर्दानी खेळाचा एक-दोनदा अनुभव घेतल्याचे आठवते. यादरम्यान मार्शलने शिवसेनेचा तो खास पटका आपल्या गळ्याभोवती कधी गुंडाळला आणि भगवा टिळा कपाळावर कधी लावला, हे माझ्या लक्षातही आले नाही. 
याच काळात वयाच्या पंधराव्या वर्षी फादर म्हणजे कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी मी घर आणि कुटुंब सोडले होते. गोव्यात मिरामार येथे प्री-नोव्हिशिएट वा पूर्व-सेमिनरीत राहून हायर सेकंडरीचे आणि नंतर पदवीचे शिक्षण घेताना सुट्टीवर श्रीरामपूरला आलो म्हणजे मार्शलचे ते भगवे रूप मला अचंबित करून जायचे. मार्शल माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा. माझ्याहून धाकट्या दोन बहिणी त्याला ‘आप्पा’ म्हणायच्या आणि मग हळूहळू घरातले सर्वच जण त्याला ‘आप्पा’ म्हणू लागले.  
कॉलेजच्या सुट्टीत गोव्याहून घरी परतलो की, मार्शल आणि त्याच्या मित्रांकडून मुंबईच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या अनेक चुरस आठवणी ऐकवल्या जायच्या. शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा उत्सवानिमित्त होणारे भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिक मुंबईला येत असत. दसऱ्याआधी महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे थवेच्या थवे मुंबईच्या दिशेने रेल्वेने निघायचे. या काळात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांत खच्चून गर्दी असे. “मात्र या दिसांत कुठल्या बी रेल्वे स्टेशनच्या एकाही टिकेट कलेक्टर (टीसी)ची रेल्वे डब्यात चढण्याची वा प्रवाश्यांना तिकीट विचारायची टाप नसते. परतीच्या प्रवासात बी अशीच स्थिती असते!” अशी वाक्ये मी त्या वेळी अनेकदा ऐकत असे.
या वार्षिक मुंबई दौऱ्यात शिवसैनिकांना रोमांचित करणारा एक खास अनुभव असे, तो म्हणजे दसऱ्यानंतर मातोश्रीवर होणारी खुद्द बाळासाहेबांची भेट! दसरा मेळाव्याच्या मुंबईच्या वारीत राज्यातील शिवसैनिकांना आपल्या दैवताला भेटण्यासाठी मातोश्रीत मुक्त प्रवेश असे. बाळासाहेबांचे भाषण ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटण्यासाठी, त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी मार्शल आणि त्याच्याबरोबर आलेले त्याचे इतर शिवसैनिक अगदी आतुर असायचे. शिवसेनेची मुंबई महापलिकेत सत्ता येण्यास अजून बराच काळ होता. त्यामुळे त्या काळात मातोश्रीवर आजच्यासारखे सुरक्षेचे अवडंबर नसायचे. बाळासाहेबांना मुंबईबाहेर दौरे करण्याची तोपर्यंत गरज भासली नव्हती. शिवसेनेचा विस्तार तोपर्यंत औरंगाबाद सोडा, ठाण्यातसुद्धा झाला नव्हता. मात्र बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने तेव्हाच्या शहरी आणि गावगाड्यांतील तरुणांमध्ये गारूड निर्माण केले होते. तोपर्यंत शिवसेनेने पूर्ण वेळ राजकारण करण्याचा निर्णय घेतला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जसे आजही स्वत:ला पूर्णत: सांस्कृतिक संघटना म्हणवून घेतो, तसेच शिवसेना त्याकाळी स्वत:ला केवळ एक सामाजिक संघटना, लुंगीवाल्या मद्राशी (दाक्षिणात्र) लोकांविरुद्ध लढणाऱ्या मराठी माणसांची संघटना असे म्हणवून घेत असे. तोपर्यंत शिवसेनेने अधिकृतरित्या हिंदुत्वाचा गंडा स्वत:ला बांधून घेतला नव्हता.
दसरा मेळाव्यानंतरचा सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा मातोश्रीतील दरबार हा एक खास सोहळा असायचा. शिवसैनिकांची त्या वेळी मातोश्रीत अगदी रीघ लागत असे. गेली अनेक वर्षे दिवाळीच्या सणात शरद पवार आपल्या मित्रमंडळीला, पक्ष कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना बारामतीला  आपल्या घरी भेटत असतात. तसलाच हा मातोश्रीवरचा त्या काळातला एक सोहळा होता. मार्शल हा श्रीरामपूरचा म्हणजे एका शहराचा शाखाप्रमुख असल्याने दरवर्षी त्याला आपल्या जोडीदारांबरोबर आपल्या ‘विठ्ठला’चे दर्शन घेण्याची संधी मिळायची. आपल्या आसनावर बसलेल्या बाळासाहेबांना मुजरा करून आम्ही मागे चालत जातो, ही भेट काही क्षणांचीच असते, पण स्मरणीय असते, असे मार्शल म्हणायचा. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीच्या त्या जमान्यात आपली छायाचित्रे काढणे वा इतरांकडून काढून घेणे खूप अशक्यप्राय असायचे. पुढे कलर फोटोग्राफीच्या काळात काही मोजक्या लोकांच्या हातात कॅमेरे आले आणि विशेष घटना कॅमेऱ्यात बंदिस्त करणे शक्य होऊ लागले. याच काळात मार्शलने बाळासाहेबांची मातोश्रीवर घेतलेल्या भेटीचे छायाचित्रे घेण्यात आले. ते त्यानंतर मार्शलच्या जीवनातील एक मोठ्या घटनेचा ऐवज म्हणून जपून ठेवण्यात आले होते.
सत्तरच्या दशकात मुंबईत ‘दलित पँथर’ने दलित तरुणांमध्ये नवे वारे निर्माण केले होते, तसेच त्या नंतरच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेनेचे वारे तयार झाले होते. गावोगावी वेशीपाशी शिवसेनेच्या नव्या शाखांचे बोर्ड लावले जात होते. शिवसेनेच्या शाखा बनवणाऱ्या या तरणाबांड पोरांपैकी बहुसंख्य जण मार्शलसारखेच सुशिक्षित बेरोजगार असायचे. आक्रमकता आणि बेडरपणा हा त्यांचा जणू स्थायीभावच असायचा.
‘घाशीराम कोतवाल’ हे विजय तेंडुलकरांचे नाटक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंबंधित रामायणातील ‘रीडल्स’चा वाद आणि त्यानंतरचे मराठवाडा विद्यापीठ नामांतर, यांबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिका वादग्रस्त ठरल्या. बाळासाहेबांविषयीचा कमालीचा आदर असल्याने त्यांचा आदेश पाळणे हे शिवसैनिकांचे कर्तव्यच असायचे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेच्या धोरणास पाठिंबा देण्याबाबत मार्शलही अगदी ठाम असायचा! त्याबाबत कधीही मतांतरे वा दुमत नसायचे. या प्रकरणासंबंधींचे काही वाद अनेक महिने, काही वर्षे चालले होते. एका ख्रिस्ती कुटुंबातील व्यक्तीला शिवसैनिक या नात्याने स्वत:च्या विचारसरणीच्या वा हिताच्या अगदी विरुद्ध भूमिका का घ्यावी, असा माझा त्याला सवाल असायचा. याबाबत आमच्या दोघांच्या नेहमी खडाजंगी व्हायच्या.
सत्तरच्या दशकात ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाविरोधात सनातनी मंडळींनी आवाज उठवला होता. या नाटकावर बंदी घालण्यात यावी यासाठी दबाव आणण्यात आला, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या नाटकाविरोधी भूमिका घेतली. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठे वादळ उभे राहिले होते. शिवसेनेच्या या भूमिकेबाबत मार्शलशी माझा झालेला वाद मला आजही आठवतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अप्रकाशित साहित्यातील ‘रामायणातील रीडल्स’ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करू नये, अशी जोरदार मागणी त्या वेळी करण्यात आली होती. याही वादात उडी घेत शिवसेनेने ‘रीडल्स’विरोधी भूमिका घेतली होती. दीर्घकाळ चाललेल्या मराठवाडा नामांतर आंदोलनातही शिवसेनेने नामांतरविरोधी भूमिका घेऊन दलित संघटनांचा रोष ओढवून घेतला होता. दलित संघटना आणि शिवसेना त्या काळात आमनेसामने उभ्या राहिल्या होत्या.
कॉलेजच्या सुट्टीत आणि नंतर नोकरी लागल्यावर रजा काढून पणजीहून मी श्रीरामपूरला येई, तेव्हा या आंदोलनांच्या काळात दरवेळी मार्शलशी आणि इतर शिवसैनिकांशी माझे खटके उडत असत. आपण स्वत: दलित असताना अशा सरसकट दलितविरोधी भूमिकांचे समर्थन कसे करता येईल, असा माझा मार्शलला सवाल असे. पण मार्शलने नेहमीच बाळासाहेबांच्या भूमिकेची पाठराखण केली. “(शिवाजी) महाराजांनी कधी जाती-धर्माचा बागुलबुवा केला नाही. त्यांच्या मावळ्यांत सगळ्या जातींचे आणि मुसलमान लोकही होते. तसेच साहेब पण (बाळासाहेब ठाकरे) जाती-धर्माचा असा संकुचित विचार करत नाहीत!,” असे मार्शलचे म्हणणे असायचे. शिवरायांच्या अंगरक्षकांमध्ये आणि सैन्यातसुद्धा मुसलमान होते, तसेच शिवसेनेतही आमदार साबिर शेख आहेत, असा तो नेहमी दाखला द्यायचा.
एकदा नाताळाच्या सुट्टीत मी घरी आलो होतो, तेव्हा ओट्यापाशी रस्त्याला लागून खांबावर उंच जागी नेहमीप्रमाणे ख्रिस्तजन्माची शुभवार्ता देणारा तारा लावलेला होता. सारवलेल्या अंगणात  ‘नाताळाच्या शुभेच्छा’ असे रंगीत रांगोळीने लिहिले होते आणि घराच्या पत्र्यावर टांगलेल्या उंच बांबूवर भगवा झेंडाही फडकावलेला होता. मला आठवते- घरावर फडकावलेला तो भगवा झेंडा पाहिल्यावर मी चांगलाच चरफडलो होतो. ओट्यावर थंडीत ऊन खात बसलेल्या दादांना मी त्याबद्दल विचारले, तर हाताच्या दोन्ही मुठी तोंडापाशी धरून हताशपणे ते गप्प राहिले होते. ऐन सणासुदीला मार्शलबरोबर वाद नको म्हणून मीही तेव्हा गप्प राहिलो.
त्या काळात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या दलित पँथर आणि शिवसेनेच्या अनेक सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांना जे काही भोगावे लागले, ते सर्व मार्शलच्याही वाट्याला आले. मोर्चे, दमदाटी, सरकारी कामकाजामध्ये आडकाठी वगैरे अनेक आरोपांत तो अनेकदा गुंतला गेला. पोलिसचौकशा आणि कोर्टकचेऱ्यांचा त्याच्यामागे ससेमिरा सुरू झाला. मी गोव्यात असल्याने सटी-सहामाही श्रीरामपूरला आल्यावर यासंबंधीची अगदी तुरळक माहिती बाईकडून मला मिळायची. (अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आईला ‘बाई’ हेच संबोधन असते!) डोळ्यातील पाणी पदराने टिपत बाई मला ही माहिती सांगायची, तेव्हा माझाही थरकाप उडायचा. त्या काळात मार्शलच्या तुरुंगाच्या किती वाऱ्या झाल्या असतील, याची मला आजही कल्पना नाही. त्याला ताबडतोब जामीन मिळवून त्याची सुटका करणारे शिवसेनेचे इतर नेते, त्या वेळी आजच्याइतके प्रस्थापित झालेले नव्हते.
मार्शलचे शिवसेनेचे हे प्रकरण कुठल्या पातळीवर पोहोचले असेल याची अंधुकशी कल्पना मला त्या दिवशी आली. यादरम्यान पणजीत ब्रदर म्हणून प्राथमिक दीक्षाविधी होऊन सफेद झगा मिळण्याआधीच फादर होण्याचा निर्णय मी बदलला होता. मात्र मी गोव्यातच स्थायिक झालो होतो. पणजीतील ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात मी त्या वेळी बातमीदार होतो. “इथल्या पोलिसांनी जारी केलेली तडीपार नोटीस रद्द करण्यासाठी तू काही करू शकशील काय?” असे मार्शलने मला विचारले होते. गोव्यात मी क्राईम रिपोर्टर असलो तरी अहमदनगर जिल्ह्यात पोलीस खात्यात मला कोण ओळखणार किंवा कोण माझे ऐकणार होते? मी त्याला अहमदनगरचे शिवसेना नेते अनिल राठोड यांना याबाबत भेट असे सांगितले. यावर मार्शल नुसताच हसला. त्यानंतर मार्शलच्याच एका सहकाऱ्याने मला सांगितले की, मार्शल आणि राठोड या दोघांची चांगली ओळख आहे. 
एकदा बाई सांगत होती. बहुधा १९८४ला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर श्रीरामपुरात बाजारपेठेत झालेल्या जाळपोळ आणि लुटालुटीनंतरची ही घटना असावी. “गेल्या महिन्यात ऐन मध्यरात्री घराच्या मागल्या आणि पुढच्या दारांवर जोरदार थापा पडल्या, काठ्यांचे आवाज आले... पोलिसांची पुन्हा एकदा धाड पडली होती. उघडलेल्या दोन्ही दारांतून काठ्यांचा आवाज करत पोलिसांनी झोपलेल्या सर्वांच्या अंगावरच्या गोधड्या आणि चादरी दूर केल्या होत्या. मोठी बाया-माणसं आवाजानं जागी झाली तरी पोरंसुरं झोपलेलीच होती. पोलिसांनी मग दोन्ही-तिन्ही खोल्यांतील पलंगांखाली वाकून, तिथल्या सामानांत आणि भरलेल्या बोचक्यांत काठ्या फिरवल्या. मग परत जाताना त्या पोलिसांचा सायब तुझ्या दादांकडे वळून म्हणाला, ‘पारखे टेलर, माफ करा, घरातल्या तुम्हा सगळ्यांना रात्री-अपरात्री हा तरास होतो. पन यावेळी आम्हाला मार्शलला पकडायचेच आहे!’ ते पुलिस गेल्यानंतर एक तास उलटला तरी पलंगाखाली गोवऱ्या आणि ऊसांच्या खोडक्यांच्या पोत्यांमागे लपलेला मार्शल बाहेर आला नाही. पहाटे बाहेर आला आणि काही दिवस पुन्ना गायबच झाला.” असे प्रकार अनेकदा होत असत, असे बाईच्या बोलण्यावरून लक्षात आले.
सुरुवातीच्या काळात शिवसेनेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असे प्रमाण होते. मुंबईत केवळ छगन भुजबळ आणि मनोहर जोशी हे या संघटनेचे प्रमुख राजकीय चेहरे होते.  हळूहळू शिवसेनेचा राज्यभर विस्तार होत गेला. मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या आणि राजकारण वर्ज्य मानणाऱ्या या संघटनेने राजकीय पक्ष म्हणून वावर सुरू केला, तेव्हा मार्शलनेसुद्धा राजकारणात उडी घेतली. श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तो उभा राहिला. ‘मार्शल जॉन पारखे’ या नावाचा युवक बहुसंख्य हिंदू असलेल्या वार्डातून खुल्या वर्गातून उमेदवार म्हणून उभा राहिला होता. दलित असला तरी ख्रिस्ती धर्मीय असल्याने त्याला आरक्षण नव्हते. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. मार्शलचा पराभव झाला. आमच्याच चाळीतील एक उमेदवार निवडून आला आणि त्यानंतर तो प्रस्थापित नगरसेवक बनला.
या निवडणुकीचा धडा घेऊन पुढच्या पालिका निवडणुकीत जर्मन दवाखान्याच्या परिसरातील वार्डातून मार्शल उभा राहिला. जर्मन मिशनरींनी उभारलेला तो दवाखाना, तेथील ख्रिस्ती देऊळ, येशूसंघीय फादरांतर्फे चालवल्या जाणाऱ्या आरटीआर, सोशल सेंटर वगैरे संस्थांच्या आसपासच्या त्या परिसरातील ख्रिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय होती. पण येथेही माशी शिंकली. मार्शल हा त्या परिसरातील सर्वांना परिचित असणाऱ्या पारखे टेलरांचा मुलगा होता, त्यालाही बहुतेक सर्व ख्रिस्ती मतदार ओळखत होते. मात्र या ख्रिस्ती तरुणाने शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या वार्डात मते मागावीत, हे त्या लोकांच्या पचनी पडले नाही. ‘ना घरका, ना घाटका’ असे बनलेल्या मार्शलचा त्या निवडणुकीतही पराभव झाला. 
त्यानंतर मार्शल निवडणुकीच्या फंदात पडलाच नाही. या क्षेत्रात आपल्याला फार मजल मारता येणार नाही, हे त्याच्या लक्षात आले होते. पैशाचे आणि आपापल्या ज्ञातबांधवांचे पाठबळ असलेल्या शिवसेनेतील त्याच्या बरोबरीच्या इतरांना मात्र हे शक्य झाले. श्रीरामपूर शहरातला शिवसेनेचा एक संस्थापक सभासद असलेला मार्शल अखेरपर्यंत सामान्य शिवसैनिकच राहिला. त्याच्याबरोबर असलेल्या आणि त्याच्यानंतर या संघटनेत आलेल्या अनेक जणांनी नंतर राजकारणात जम बसवला, काहीजण तर आमदार आणि मंत्रीही झाले. मार्शलने स्वत: कुठलीही नोकरी केली नाही, कुठल्याही व्यवसायात त्याला कधी यश आले नाही. आयुष्यभर त्याच्या वाटेला परवडच आली, कुटुंबाला तो आर्थिक स्थैर्य देऊ शकला नाही.
दहा-बारा वर्षांपूर्वी प्रदीर्घ आजाराने मार्शलचे निधन झाले, तेव्हा श्रीरामपूर आणि अहमदनगरहून प्रसिद्ध होणाऱ्या विविध दैनिकांत छोट्याशा एक कॉलममध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांत ‘एक जुने, कट्टर शिवसैनिक’ म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्याच्या चाळीसाव्यानिमित्त कबरीपाशी प्रार्थना झाल्या, फुले वाहण्यात आली. यानिमित्त जमलेल्या लोकांना बसण्यासाठी मार्शलच्या घराभोवती छोटासा मांडव घालण्यात आला होता. घराच्या पहिल्याच खोलीत दोन्ही हात जोडून आपल्या दैवताला - बाळासाहेब ठाकरेंना - दंडवत घालणाऱ्या मार्शलचे ‘ते’ छायाचित्र होते. मांडवात जेवणासाठी मांडी घालून बसल्यावर घराच्या पत्र्यांवर उंचावर उभारलेल्या त्या भगव्या झेंड्याकडे माझे सहज लक्ष गेले. खूप दिवसांपूर्वी उभारलेल्या त्या भगव्या झेंड्याचा रंग आता मूळ रंग ओळखू न यावा इतका फिका पडला होता.
................................................................................................................
.....................................................................................

Saturday, October 27, 2018

पत्रकारितेतील स्त्रिया Women in Journalism





शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८




पत्रकारितेतील स्त्रिया
गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१८      goo.gl/ixK7Tp कामिल पारखे
पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रियांचा मोठ्या संख्येने प्रवेश तसेच त्यांनी वरिष्ठ पदांपर्यंत केलेला प्रवास हे सगळे जवळून बघण्याची संधी मिळाल्यामुळे स्त्रियांच्या या वाटचालीचा घेतलेला आढावा.
मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात प्रवेश केला १९८१ साली. पणजी येथे मुंबई विद्यापीठाची बीएची परीक्षा दिल्यानंतर निकाल लागण्याआधीच बातमीदार म्हणून रुजू झालो. त्याकाळात आणि त्यानंतर पुढील चारपाच वर्षे तरी गोव्यात एकही महिला बातमीदार नव्हती. आमच्या नवहिंद टाइम्समध्ये संपादकांकडून डिक्टेक्शन घेण्यासाठी आणि इतर टाइपिंगची कामे  करण्यासाठी दोन महिला सेक्रेटरी म्हणून होत्या. तळमजल्यावर असलेल्या लायनो टाईप ऑपरेटिंग सेक्शनमध्ये ऑपरेटर, फोरमन  वगैरे सर्व पदांवर केवळ पुरुषमंडळीच होती. 

आमच्याबरोबरच पहिल्या मजल्यावर असलेल्या मराठी नवप्रभा दैनिकात तर सर्व पत्रकार, खिळ्यांची देवनागरी अक्षरे जुळवणारे आणि इतर सर्व कर्मचारी फक्त पुरुषच होते. त्याकाळात बातमीदार म्हणून क्राईम रिपोर्टर म्हणून पोलीस स्टेशनांत, दवाखान्यांत वेळीअवेळी जावे लगे, राजकारण बीटवर गोवा विधानसभेत हजेरी लावी लागे, डिफेन्स क्षेत्रात असले तर नौदलाच्या, हवाई दलाच्या सकाळी सातच्या कार्यक्रमासाठी भल्या पहाटेच उठून जीपने जावे लागे. 

नवहिंद टाइम्स त्यावेळी गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक होते, या दैनिकात तसेच गोमंतक, नवप्रभा, राष्ट्रमत वगैरे मराठी दैनिकांत एकही महिला फिल्डवर बातमीदार म्हणून नव्हती. मराठी दैनिकांत एकदोन महिला मात्र डेस्कवर दिवसाच्या शिफ्टवर असायच्या.  












त्यानंतर लवकरच पणजीतील  'ओ  हेराल्डो'  हे शंभराहून अधिक वर्षे जुने असलेल्या पोर्तुगीज नियतकालिक इंग्रजीतून दैनिक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. या इंग्रजी  'ओ  हेराल्डो'चे  संपादक राजन नायर यांनी पहिल्यांदाच अनेक तरुण मुलींना बातमीदार म्हणून संधी दिली आणि स्थानिक पत्रकारीतेच्या क्षेत्रात एका प्रकारे क्रांतीच केली. 
माझ्याच वयाच्या असणाऱ्या या मुली पणजीतील मांडवीच्या तीरावरील सचिवालयातील प्रेसरूमवर यायला लागल्या तेव्हा पहिले काही दिवस तेथील अगदी मध्यमवयीन पुरुष बातमीदार मंडळींचीही  झालेली अवघडल्यासारखी स्थिती अगदी पाहण्यासारखी होती. 
इंग्रजी, मराठी आणि कोकणी दैनिकांतील  या बातमीदार मुली पोलीस चौकीवर, गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलात तेथील अधिकारीवर्ग,  तृतीय, चतुर्थ श्रेणीवरील कर्मचाऱ्यांना भेटू लागल्या तेव्हा तेथे त्यांना बातमी मिळवणे जमेल की  नाही अशी इतरांना शंका वाटायची. मात्र लवकरच या मुली बातम्या पुरुष बातमीदारांप्रमाणे बातम्या आणू लागल्या, काही वेळेस जेथे पुरुष बातमीदारांना बातमी काढणे, एखाद्या स्रोताला बोलते करणे शक्य नव्हते तेथूनही या महिला बातमीदारांनी बातम्या आणल्या असेही अनुभव येऊ लागले. 
पणजीतील प्रेसरूममध्ये आम्हा पुरुषांबरोबर महिला पत्रकार पत्रकार परिषदा आणि  इतर कार्यक्रमास हजार राहू लागल्या, तसे महिलांचे या क्षेत्रातील असणे नाविन्यपूर्ण राहिले नाही. मात्र नवहिंद टाइम्समध्ये माझ्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत एकही महिला बातमीदार वा  उपसंपादक म्हणून रुजू झाली नव्हती हे मात्र खरे. 
औरगांबादला लोकमत टाइम्स या इंग्रजी दैनिकांत मी रुजू झालो तेव्हा मात्र तेथे डेस्कवर मुख्य उपसंपादकासारख्या वरच्या, जबाबदार पदांवर महिला होत्या. त्या शहरातील लोकमत, मराठवाडा वगैरे मराठी दैनिकांत मात्र केवळ एकदोन महिला डेस्कवर होत्या. 
एका वर्षानंतर  पुण्यात इंडियन एक्सप्रेसला बातमीदार म्हणून आलो तेव्हा तिथे स्थानिक  आणि राष्ट्रीय पातळीच्या सर्व इंग्रजी दैनिकांत आणि वृत्तसंस्थांत अनेक महिला बातमीदार आणि डेस्कवर जबाबदार पदांवर होत्या. मराठी दैनिकांत नोकरीस असलेल्या महिला मात्र केवळ डेस्कवर होत्या आणि महिलाविषयक पुरवण्या, रविवार पुरवणी किंवा सांस्कृतिक अशा  सॉफ्ट असाईनमेंट आणि  दिवसाच्या शिफ्टमधील जबाबदाऱ्या सांभाळत होत्या.
इंग्रजी भाषेतील महिला पत्रकारांचा सर्व पातळीवरील सहभाग आणि वावर मात्र पुरुष पत्रकारांप्रमाणेच तेव्हाही होता. रात्रपाळीच्या ड्युटीवरील पुरुष बातमीदाराला रात्री नऊ पर्यंत तर महिला बातमीदाराला रात्री आठपर्यंत ऑफिसात थांबवावे लागे. मोबाईलचा जमाना आल्यानंतर तर रात्रपाळीची  ड्युटीच बंद झाली याचे कारण म्हणजे काही महत्त्वाची घटना झाली तर त्या बीटवरचा बातमीदार घरूनच वा कुठूनही ती बातमी देऊ लागला. 
डेस्कवर रात्रीच्या पाळीवर म्हणजे रात्री बारा-एक पर्यंत आणि त्यानंतरही काम करणाऱ्या महिला होत्या आणि त्यांना घरी सोडण्यासाठी कार्यालयातर्फे वाहनव्यवस्था होती. पुरुषांना मात्र अशी कार्यालयीन वाहनव्यवस्था नसायची  अजूनही अशीच स्थिती आहे. 
पुण्यात जवळजवळ पंचवीस वर्षे महाराष्ट्र हेराल्ड हे एकमेव इंग्रजी दैनिक होते. तिथे संपादकीय पानाच्या आणि रविवार पुरवणीच्या प्रमुख गौरी आगटे आठल्ये होत्या. इंडियन एक्सप्रेसची पुणे आवृत्ती सुरू झाल्यापासून म्हणजे १९८९ पासून तेथील फिचर्स विभागात पूर्ण महिला राजच होते आणि त्या विभागाच्या प्रमुख विनिता देशमुख या होत्या. त्यानंतर लवकरच निदान पुण्यांत तरी सर्वच इंग्रजी वृत्तपत्रांतील फिचर्स विभागात पूर्ण महिलाराजचीच प्रथा रुढ झाली. बातमीदारीत आणि डेस्कवर महिलांची संख्या बऱ्यापैकी असायची. त्यामुळे पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ सारखीच झाली. त्यामुळे काम करताना, महिलांशी बोलताना, चेष्टा-मस्करी करताना एखाद्या पुरुष सहकाऱ्यांची जीभ जरा घसरली तर अष्टावधानी आणि  तीक्ष्ण कान असणाऱ्या त्याच विभागातील वा पार्टिशनच्या पलीकडील शेजारच्या विभागातील एखाद्या वरच्या पदावरील महिलेकडून जरबेच्या स्वरात लगेच  'माईंड युवर लँग्वेज' अशी  ताकीद मिळायची आणि पुरुषांच्या स्वैर, बेताल  बोलण्या-वागण्यास लगेच लगाम बसायचा. 
पुरुष आणि महिलांचे एकमेकांशी बोलणे आणि इतर कामासंबंधीचे बोलणे देवाणघेवाण असली तरी कॅंटिनमध्ये जेवताना, बाहेर चहाला जाण्यासाठी महिलांचे आपोआप वेगळे गट व्हायचे. त्याचे कारण कदाचित त्यांना तेथे अधिक मोकळे,सहज व्यक्त होता येत असावे. बहुधा हे नैसर्गिक असावे, कारण आजही तसे होतेच  
 
वृत्तपत्रांतील पुरुषप्रधान संस्कृतीस हादरा बसला तो जेव्हा महिलांनी वेगवेगळ्या विभागातील प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली आणि त्यांच्या हाताखाली अनेक पुरुष आणि महिला काम करू लागली तेव्हा. तोपर्यंत अनेक पुरुषांनी बॉस महिलाच्या हाताखाली काम केलेले नसायचे. त्यामुळे अनेक पुरुषांना महिलांच्या हाताखाली काम करणे, एक महिला आपली बॉस  असणे अशी कल्पनाच भयानक वाटत असे. 
मी स्वतः  विविध वृत्तपत्रांत वयाने ज्येष्ठ असलेल्या  वा समवयस्क असलेल्या महिला बॉसच्या हाताखाली अनेकदा काम केले आहे. पुण्यात महाराष्ट्र इंडियन एक्सप्रेसला विनिता देशमुख, टाइम्स ऑफ इंडियाच्या 'पुणे प्लस' पुरवणीला प्रथम नीता थॉमस आणि नंतर फरीदा मास्टर प्रमुख होत्या.  टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत  मी १९९९ ला दाखल झालो तेव्हा तिथे शेरना गांधी या निवासी संपादक होत्या. 'सकाळ टाइम्स'मध्ये  ब्युरो चिफ मीरा जोशी यांच्या नेतृत्वाखालीही मी काम केले.  
एक घटना आठवते. मी एका इंग्रजी दैनिकात ब्युरो चीफ म्हणून काम करत असताना बातमीदाराच्या पदासाठी मी आणि मुख्य संपादक मुलाखती घेत होतो. त्यावेळी एका उमेदवाराची निवड निश्चित झाली होती. गुणवत्तेच्या आधारावर इतरांच्या तुलनेत तो उमेदवार नक्कीच उजवा होता. मुख्य संपादकाच्या मते त्याची बाजू त्याशिवाय आणखी एका दृष्टीने सरस होती. तो उमेदवार मुसलमान होता. 'कामिल, यू  आर दे फेस द ख्रिश्चन कम्युनिटी इन अवर न्यूजपेपर. आय वॉन्ट हिम अॅज द फेस ऑफ द मुस्लीम कम्युनिटी!' 
संपादकांचे ते वाक्य ऐकून मी भारावून गेलो होतो.  यात अर्थात व्यावसायिकतेचा भाग होताच. प्रत्येक वृत्तपत्र आपले वाचक नजरेसमोर ठेवून त्यानुसार आपल्या बातम्या, लेख आणि धोरणे ठरवत असते. 
उदाहरणार्थ, पुण्यातील महाराष्ट्र हेराल्ड (पूर्वाश्रमीचा पुना हेराल्ड)  हा एकेकाळी पुणे कॅम्पातील गोवन कॅथोलिक, सिंधी, इराणी  लोकांमध्ये वाचला जायचा आणि त्यानुसार त्या वृत्तपत्रातील पत्रकारमंडळी आणि मजकूरही  असायचा. (पुना हेराल्ड आणि नंतरच्या महाराष्ट्र हेराल्डमध्ये अनेक वर्षे एकत्र काम करणाऱ्या वाय. व्ही. कृष्णमूर्ती,  ताहेर शेख आणि हॅरी डेव्हिड या पत्रकारांची त्रयी अमर, अकबर आणि अँथनी म्हणून ओळखली जायची!)  
मग याच दृष्टिकोनातून प्रत्येक वृत्तपत्राच्या वाचकांमध्ये ५० टक्के महिला असताना वृत्तपत्रांत पुरेशा संख्येने महिला बातमीदार, वृत्तसंपादक आणि मुख्य संपादक का नसावेत याचे आश्चर्य वाटते. 
मी सहाय्यक संपादक/ ब्युरो चीफ असताना आमच्या टीममध्ये निम्म्याहन अधिक बातमीदार महिला होत्या. नवीन बातमीदाराची, उपसंपादकाची  नेमणूक करताना जवळजवळ सर्वच पुरुष संपादक पुरुष आणि महिलांना समान तागडीत तोलत असत, कुणाला पुरुष व महिला म्हणून झुकते माप नसायचे असा माझा अनुभव आहे. ब्युरो चीफ म्हणून  या पुरुष आणि महिला बातमीदारांनां कामे नेमून देताना आणि त्यांच्याकडून त्यांच्या बीटची कामे करवून घेताना केवळ लिंगभेदामुळे या बातमीदारांच्या कामाच्या बाबतीत फरक पडला वा तडजोड झाली असे मात्र मला कधीही जाणवले नाही.  
इंग्रजीत अनेक वृत्तपत्रांत, मासिकांत महिला मुख्य वार्ताहर, वृत्तसंपादक,  मुख्य संपादक वगैरे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना दिसतात. इंग्रजी भाषेतील महिला पत्रकारांची संख्या जवळजवळ पुरुषांच्या संख्येइतकी असते. ही परंपरा अनेक वर्षांपूर्वीपासून आहे.  
सन १९९३च्या आसपास पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत मी अध्यक्षपदापासून इतर सर्व पदांसाठी एका पॅनल उभे केले होते आणि ते निवडूनही आले होते. त्यावेळी इंग्रजी पत्रकारीतेतील गौरी आगटे आठल्ये या पत्रकार संघाच्या पहिल्या महिला सरचिटणीस झाल्या. तेव्हापासून गेल्या पंचवीस वर्षांत एकही महिला  पत्रकार या संघटनेची सरचिटणीस वा अध्यक्ष झालेली नाही.
नागपुरातील नागपूर युनियन ऑफ जर्नालिस्टस आणि मुंबईतील बोंबे युनियन ऑफ जर्नालिस्टस या दोन ट्रेड युनियन्समध्ये  आणि बहुचर्चित मुंबई प्रेस क्लबमध्येही किती महिला पत्रकारांनी आतापर्यंत अध्यक्ष आणि इतर  महत्त्वाच्या  पदांवर काम केले आहे याची मला कल्पना नाही.  
इंग्रजी पत्रकारीतेत महिला अनेक आघाडीवर महत्त्वाच्या पदांवर असल्यातरी याच्या अगदी विरुद्ध स्थिती मराठी पत्रकारीतेत आढळते. मुख्य संपादक, ब्युरो चिफ, निवासी संपादक या महत्त्वाच्या पदांवर त्या सहसा नसतात.  मराठी पत्रकारीतेत महिला आजही सॉफ्ट असाईनमेंट करताना आढळतात. क्राईम, महापालिका, राजकारण, डिफेन्स,  उद्योग, क्रीडा वगैरे बिट्स मराठी महिला पत्रकारांच्या वाटेला येत नाही किंवा त्या स्वतः त्या वाटेला जात नाहीत. 
देवयानी चौबळ, शोभा (राजाध्यक्ष) डे या मराठी महिलांनीं पत्रकारीतेत देशपातळीवर नाव कमावले ते मात्र इंग्रजी नियतकालिकांच्याच माध्यमातून.  बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली सुरु केलेल्या दर्पण या वृत्तपत्रापासून सुरु झालेल्या मराठी पत्रकारीतेत अशा प्रकारे नाव कमावलेल्या महिलेचे नाव मात्र चटकन आठवत नाही. 
बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली सुरु केलेल्या दर्पण या वृत्तपत्रापासून सुरु झालेल्या मराठी पत्रकारीतेत अशा प्रकारे नाव कमावलेल्या महिलेचे नाव मात्र चटकन आठवत नाही. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत वा पुढारी यासारख्या कितीतरी दशकांच्या परंपरांचा अभिमान बाळगणाऱ्या दैनिकांत आजपर्यंत निवासी संपादक वा मुख्य संपादक पदांवर आणि अगदी मुख्य वार्ताहर या पदांवरही एकाही महिलेची नेमणूक झालेली नाही ! या प्रतिष्ठित दैनिकांच्या फक्त साप्ताहिकसारख्या नियतकालिकांच्या संपादनाची जबाबदारी महिलांकडे नेण्याची लक्ष्मणरेखा आखण्यात आली आहे.
याला एकमेव अपवाद म्हणजे राही भिडे. पुण्यनगरी या आघाडीच्या दैनिकाच्य्या संपादक राहिल्या आहेत त्याआधी त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. राजकारण वगैरे विविध बिट्स त्यांनी हाताळल्या आहेत.
मोदी सरकारमधील मंत्री एम. जे अकबर यांना ते दोन दशकांपूर्वी संपादक असताना महिला पत्रकारांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर गेली काही दिवस सोशल मीडियावर पत्रकारीतेच्या क्षेत्रातील  'मी टू' चळवळीवर विचारमंथन चालू आहे. काही ज्येष्ठ महिला पत्रकारांनी हा विषय उचलून धरला आहे तर काही महिला पत्रकारांनी या चळवळीबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.  या वादविवादाच्या निमित्ताने  चार दशकांपूर्वी वृत्तपत्र  उद्योगात माझ्या नजरेसमोर झालेले महिलांचे आगमन, त्यानंतरच्या काळात महिलांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी आणि त्यांची आजची स्थिती या गोष्टींना मनातल्या मनात उजळणी मिळाली.