Did you like the article?

Showing posts with label Dasara. Show all posts
Showing posts with label Dasara. Show all posts

Wednesday, April 1, 2020

ख्रिस्ती घरात वाढलेली शिवसेना अर्थात मार्शल अखेरपर्यंत सामान्य ‘शिवसैनिक’च राहिला!


ख्रिस्ती घरात वाढलेली शिवसेना 
अर्थात मार्शल अखेरपर्यंत सामान्य ‘शिवसैनिक’च राहिला!

पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
कामिल पारखे
  • बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मार्शन जॉन पारखे
  • Thu , 23 January 2020
  • पडघमकोमविपशिवसेनाShiv Senaबाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackerayमार्शल पारखेMarshal Parkhe
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात श्रीरामपूरला आमच्या घरात ‘जय भवानी, जय शिवाजी’चे गजर घुमायला लागले. माझा थोरला भाऊ, मार्शल मॉडर्न स्कूलमध्ये मॅट्रिकला म्हणजे अकरावीला शिकत होता. त्याला एका विद्यार्थीप्रिय शिक्षकाच्या प्रभावाने शिवसेनेच्या ज्वराची लागण झाली आणि आमच्या घरातले वातावरण शिवसेनामय बनले. त्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच मार्शल पहिल्यांदा आपल्या शाळेच्या आणि नंतर बोरावके कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर आणि इतर मित्रांबरोबर लेझीम खेळू लागला. या खेळाच्या माध्यमातून शिवसेनेचा आमच्या घरात प्रवेश झाला.
मार्शल दररोज भल्या पहाटे तालमीत जायचा, तेथे लंगोट लावून घाम घाळायचा, आपल्या मित्रांबरोबर मल्लखांबावर कसरती करायचा. रात्री भिजवून ठेवलेली हरबऱ्याची डाळ सकाळी खायचा आणि दररोज संध्याकाळी आपल्या वयाच्या तरुणांना घेऊन मैदानावर ढोल-ताशांच्या गजरात ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे गर्जत लेझीम खेळायचा. संगमनेरला येशूसंघीय धर्मगुरूंच्या ज्ञानमाता शाळेच्या बोर्डिंगमध्ये असताना मार्शलने आपल्या नेतृत्वगुणांची झलक दाखवून दिली होती. या गुणांचा विकास या काळात होत गेला. आमच्या घरात लोखंडी पलंगांखाली अनेक लेझीम आणि ताशे असायचे. तेव्हा मार्शल आणि त्याच्या सहकाऱ्यांबरोबर मैदानावर या मर्दानी खेळाचा एक-दोनदा अनुभव घेतल्याचे आठवते. यादरम्यान मार्शलने शिवसेनेचा तो खास पटका आपल्या गळ्याभोवती कधी गुंडाळला आणि भगवा टिळा कपाळावर कधी लावला, हे माझ्या लक्षातही आले नाही. 
याच काळात वयाच्या पंधराव्या वर्षी फादर म्हणजे कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी मी घर आणि कुटुंब सोडले होते. गोव्यात मिरामार येथे प्री-नोव्हिशिएट वा पूर्व-सेमिनरीत राहून हायर सेकंडरीचे आणि नंतर पदवीचे शिक्षण घेताना सुट्टीवर श्रीरामपूरला आलो म्हणजे मार्शलचे ते भगवे रूप मला अचंबित करून जायचे. मार्शल माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा. माझ्याहून धाकट्या दोन बहिणी त्याला ‘आप्पा’ म्हणायच्या आणि मग हळूहळू घरातले सर्वच जण त्याला ‘आप्पा’ म्हणू लागले.  
कॉलेजच्या सुट्टीत गोव्याहून घरी परतलो की, मार्शल आणि त्याच्या मित्रांकडून मुंबईच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या अनेक चुरस आठवणी ऐकवल्या जायच्या. शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा उत्सवानिमित्त होणारे भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिक मुंबईला येत असत. दसऱ्याआधी महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे थवेच्या थवे मुंबईच्या दिशेने रेल्वेने निघायचे. या काळात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांत खच्चून गर्दी असे. “मात्र या दिसांत कुठल्या बी रेल्वे स्टेशनच्या एकाही टिकेट कलेक्टर (टीसी)ची रेल्वे डब्यात चढण्याची वा प्रवाश्यांना तिकीट विचारायची टाप नसते. परतीच्या प्रवासात बी अशीच स्थिती असते!” अशी वाक्ये मी त्या वेळी अनेकदा ऐकत असे.
या वार्षिक मुंबई दौऱ्यात शिवसैनिकांना रोमांचित करणारा एक खास अनुभव असे, तो म्हणजे दसऱ्यानंतर मातोश्रीवर होणारी खुद्द बाळासाहेबांची भेट! दसरा मेळाव्याच्या मुंबईच्या वारीत राज्यातील शिवसैनिकांना आपल्या दैवताला भेटण्यासाठी मातोश्रीत मुक्त प्रवेश असे. बाळासाहेबांचे भाषण ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटण्यासाठी, त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी मार्शल आणि त्याच्याबरोबर आलेले त्याचे इतर शिवसैनिक अगदी आतुर असायचे. शिवसेनेची मुंबई महापलिकेत सत्ता येण्यास अजून बराच काळ होता. त्यामुळे त्या काळात मातोश्रीवर आजच्यासारखे सुरक्षेचे अवडंबर नसायचे. बाळासाहेबांना मुंबईबाहेर दौरे करण्याची तोपर्यंत गरज भासली नव्हती. शिवसेनेचा विस्तार तोपर्यंत औरंगाबाद सोडा, ठाण्यातसुद्धा झाला नव्हता. मात्र बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने तेव्हाच्या शहरी आणि गावगाड्यांतील तरुणांमध्ये गारूड निर्माण केले होते. तोपर्यंत शिवसेनेने पूर्ण वेळ राजकारण करण्याचा निर्णय घेतला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जसे आजही स्वत:ला पूर्णत: सांस्कृतिक संघटना म्हणवून घेतो, तसेच शिवसेना त्याकाळी स्वत:ला केवळ एक सामाजिक संघटना, लुंगीवाल्या मद्राशी (दाक्षिणात्र) लोकांविरुद्ध लढणाऱ्या मराठी माणसांची संघटना असे म्हणवून घेत असे. तोपर्यंत शिवसेनेने अधिकृतरित्या हिंदुत्वाचा गंडा स्वत:ला बांधून घेतला नव्हता.
दसरा मेळाव्यानंतरचा सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा मातोश्रीतील दरबार हा एक खास सोहळा असायचा. शिवसैनिकांची त्या वेळी मातोश्रीत अगदी रीघ लागत असे. गेली अनेक वर्षे दिवाळीच्या सणात शरद पवार आपल्या मित्रमंडळीला, पक्ष कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना बारामतीला  आपल्या घरी भेटत असतात. तसलाच हा मातोश्रीवरचा त्या काळातला एक सोहळा होता. मार्शल हा श्रीरामपूरचा म्हणजे एका शहराचा शाखाप्रमुख असल्याने दरवर्षी त्याला आपल्या जोडीदारांबरोबर आपल्या ‘विठ्ठला’चे दर्शन घेण्याची संधी मिळायची. आपल्या आसनावर बसलेल्या बाळासाहेबांना मुजरा करून आम्ही मागे चालत जातो, ही भेट काही क्षणांचीच असते, पण स्मरणीय असते, असे मार्शल म्हणायचा. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीच्या त्या जमान्यात आपली छायाचित्रे काढणे वा इतरांकडून काढून घेणे खूप अशक्यप्राय असायचे. पुढे कलर फोटोग्राफीच्या काळात काही मोजक्या लोकांच्या हातात कॅमेरे आले आणि विशेष घटना कॅमेऱ्यात बंदिस्त करणे शक्य होऊ लागले. याच काळात मार्शलने बाळासाहेबांची मातोश्रीवर घेतलेल्या भेटीचे छायाचित्रे घेण्यात आले. ते त्यानंतर मार्शलच्या जीवनातील एक मोठ्या घटनेचा ऐवज म्हणून जपून ठेवण्यात आले होते.
सत्तरच्या दशकात मुंबईत ‘दलित पँथर’ने दलित तरुणांमध्ये नवे वारे निर्माण केले होते, तसेच त्या नंतरच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेनेचे वारे तयार झाले होते. गावोगावी वेशीपाशी शिवसेनेच्या नव्या शाखांचे बोर्ड लावले जात होते. शिवसेनेच्या शाखा बनवणाऱ्या या तरणाबांड पोरांपैकी बहुसंख्य जण मार्शलसारखेच सुशिक्षित बेरोजगार असायचे. आक्रमकता आणि बेडरपणा हा त्यांचा जणू स्थायीभावच असायचा.
‘घाशीराम कोतवाल’ हे विजय तेंडुलकरांचे नाटक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंबंधित रामायणातील ‘रीडल्स’चा वाद आणि त्यानंतरचे मराठवाडा विद्यापीठ नामांतर, यांबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिका वादग्रस्त ठरल्या. बाळासाहेबांविषयीचा कमालीचा आदर असल्याने त्यांचा आदेश पाळणे हे शिवसैनिकांचे कर्तव्यच असायचे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेच्या धोरणास पाठिंबा देण्याबाबत मार्शलही अगदी ठाम असायचा! त्याबाबत कधीही मतांतरे वा दुमत नसायचे. या प्रकरणासंबंधींचे काही वाद अनेक महिने, काही वर्षे चालले होते. एका ख्रिस्ती कुटुंबातील व्यक्तीला शिवसैनिक या नात्याने स्वत:च्या विचारसरणीच्या वा हिताच्या अगदी विरुद्ध भूमिका का घ्यावी, असा माझा त्याला सवाल असायचा. याबाबत आमच्या दोघांच्या नेहमी खडाजंगी व्हायच्या.
सत्तरच्या दशकात ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाविरोधात सनातनी मंडळींनी आवाज उठवला होता. या नाटकावर बंदी घालण्यात यावी यासाठी दबाव आणण्यात आला, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या नाटकाविरोधी भूमिका घेतली. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठे वादळ उभे राहिले होते. शिवसेनेच्या या भूमिकेबाबत मार्शलशी माझा झालेला वाद मला आजही आठवतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अप्रकाशित साहित्यातील ‘रामायणातील रीडल्स’ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करू नये, अशी जोरदार मागणी त्या वेळी करण्यात आली होती. याही वादात उडी घेत शिवसेनेने ‘रीडल्स’विरोधी भूमिका घेतली होती. दीर्घकाळ चाललेल्या मराठवाडा नामांतर आंदोलनातही शिवसेनेने नामांतरविरोधी भूमिका घेऊन दलित संघटनांचा रोष ओढवून घेतला होता. दलित संघटना आणि शिवसेना त्या काळात आमनेसामने उभ्या राहिल्या होत्या.
कॉलेजच्या सुट्टीत आणि नंतर नोकरी लागल्यावर रजा काढून पणजीहून मी श्रीरामपूरला येई, तेव्हा या आंदोलनांच्या काळात दरवेळी मार्शलशी आणि इतर शिवसैनिकांशी माझे खटके उडत असत. आपण स्वत: दलित असताना अशा सरसकट दलितविरोधी भूमिकांचे समर्थन कसे करता येईल, असा माझा मार्शलला सवाल असे. पण मार्शलने नेहमीच बाळासाहेबांच्या भूमिकेची पाठराखण केली. “(शिवाजी) महाराजांनी कधी जाती-धर्माचा बागुलबुवा केला नाही. त्यांच्या मावळ्यांत सगळ्या जातींचे आणि मुसलमान लोकही होते. तसेच साहेब पण (बाळासाहेब ठाकरे) जाती-धर्माचा असा संकुचित विचार करत नाहीत!,” असे मार्शलचे म्हणणे असायचे. शिवरायांच्या अंगरक्षकांमध्ये आणि सैन्यातसुद्धा मुसलमान होते, तसेच शिवसेनेतही आमदार साबिर शेख आहेत, असा तो नेहमी दाखला द्यायचा.
एकदा नाताळाच्या सुट्टीत मी घरी आलो होतो, तेव्हा ओट्यापाशी रस्त्याला लागून खांबावर उंच जागी नेहमीप्रमाणे ख्रिस्तजन्माची शुभवार्ता देणारा तारा लावलेला होता. सारवलेल्या अंगणात  ‘नाताळाच्या शुभेच्छा’ असे रंगीत रांगोळीने लिहिले होते आणि घराच्या पत्र्यावर टांगलेल्या उंच बांबूवर भगवा झेंडाही फडकावलेला होता. मला आठवते- घरावर फडकावलेला तो भगवा झेंडा पाहिल्यावर मी चांगलाच चरफडलो होतो. ओट्यावर थंडीत ऊन खात बसलेल्या दादांना मी त्याबद्दल विचारले, तर हाताच्या दोन्ही मुठी तोंडापाशी धरून हताशपणे ते गप्प राहिले होते. ऐन सणासुदीला मार्शलबरोबर वाद नको म्हणून मीही तेव्हा गप्प राहिलो.
त्या काळात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या दलित पँथर आणि शिवसेनेच्या अनेक सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांना जे काही भोगावे लागले, ते सर्व मार्शलच्याही वाट्याला आले. मोर्चे, दमदाटी, सरकारी कामकाजामध्ये आडकाठी वगैरे अनेक आरोपांत तो अनेकदा गुंतला गेला. पोलिसचौकशा आणि कोर्टकचेऱ्यांचा त्याच्यामागे ससेमिरा सुरू झाला. मी गोव्यात असल्याने सटी-सहामाही श्रीरामपूरला आल्यावर यासंबंधीची अगदी तुरळक माहिती बाईकडून मला मिळायची. (अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आईला ‘बाई’ हेच संबोधन असते!) डोळ्यातील पाणी पदराने टिपत बाई मला ही माहिती सांगायची, तेव्हा माझाही थरकाप उडायचा. त्या काळात मार्शलच्या तुरुंगाच्या किती वाऱ्या झाल्या असतील, याची मला आजही कल्पना नाही. त्याला ताबडतोब जामीन मिळवून त्याची सुटका करणारे शिवसेनेचे इतर नेते, त्या वेळी आजच्याइतके प्रस्थापित झालेले नव्हते.
मार्शलचे शिवसेनेचे हे प्रकरण कुठल्या पातळीवर पोहोचले असेल याची अंधुकशी कल्पना मला त्या दिवशी आली. यादरम्यान पणजीत ब्रदर म्हणून प्राथमिक दीक्षाविधी होऊन सफेद झगा मिळण्याआधीच फादर होण्याचा निर्णय मी बदलला होता. मात्र मी गोव्यातच स्थायिक झालो होतो. पणजीतील ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात मी त्या वेळी बातमीदार होतो. “इथल्या पोलिसांनी जारी केलेली तडीपार नोटीस रद्द करण्यासाठी तू काही करू शकशील काय?” असे मार्शलने मला विचारले होते. गोव्यात मी क्राईम रिपोर्टर असलो तरी अहमदनगर जिल्ह्यात पोलीस खात्यात मला कोण ओळखणार किंवा कोण माझे ऐकणार होते? मी त्याला अहमदनगरचे शिवसेना नेते अनिल राठोड यांना याबाबत भेट असे सांगितले. यावर मार्शल नुसताच हसला. त्यानंतर मार्शलच्याच एका सहकाऱ्याने मला सांगितले की, मार्शल आणि राठोड या दोघांची चांगली ओळख आहे. 
एकदा बाई सांगत होती. बहुधा १९८४ला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर श्रीरामपुरात बाजारपेठेत झालेल्या जाळपोळ आणि लुटालुटीनंतरची ही घटना असावी. “गेल्या महिन्यात ऐन मध्यरात्री घराच्या मागल्या आणि पुढच्या दारांवर जोरदार थापा पडल्या, काठ्यांचे आवाज आले... पोलिसांची पुन्हा एकदा धाड पडली होती. उघडलेल्या दोन्ही दारांतून काठ्यांचा आवाज करत पोलिसांनी झोपलेल्या सर्वांच्या अंगावरच्या गोधड्या आणि चादरी दूर केल्या होत्या. मोठी बाया-माणसं आवाजानं जागी झाली तरी पोरंसुरं झोपलेलीच होती. पोलिसांनी मग दोन्ही-तिन्ही खोल्यांतील पलंगांखाली वाकून, तिथल्या सामानांत आणि भरलेल्या बोचक्यांत काठ्या फिरवल्या. मग परत जाताना त्या पोलिसांचा सायब तुझ्या दादांकडे वळून म्हणाला, ‘पारखे टेलर, माफ करा, घरातल्या तुम्हा सगळ्यांना रात्री-अपरात्री हा तरास होतो. पन यावेळी आम्हाला मार्शलला पकडायचेच आहे!’ ते पुलिस गेल्यानंतर एक तास उलटला तरी पलंगाखाली गोवऱ्या आणि ऊसांच्या खोडक्यांच्या पोत्यांमागे लपलेला मार्शल बाहेर आला नाही. पहाटे बाहेर आला आणि काही दिवस पुन्ना गायबच झाला.” असे प्रकार अनेकदा होत असत, असे बाईच्या बोलण्यावरून लक्षात आले.
सुरुवातीच्या काळात शिवसेनेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असे प्रमाण होते. मुंबईत केवळ छगन भुजबळ आणि मनोहर जोशी हे या संघटनेचे प्रमुख राजकीय चेहरे होते.  हळूहळू शिवसेनेचा राज्यभर विस्तार होत गेला. मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या आणि राजकारण वर्ज्य मानणाऱ्या या संघटनेने राजकीय पक्ष म्हणून वावर सुरू केला, तेव्हा मार्शलनेसुद्धा राजकारणात उडी घेतली. श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तो उभा राहिला. ‘मार्शल जॉन पारखे’ या नावाचा युवक बहुसंख्य हिंदू असलेल्या वार्डातून खुल्या वर्गातून उमेदवार म्हणून उभा राहिला होता. दलित असला तरी ख्रिस्ती धर्मीय असल्याने त्याला आरक्षण नव्हते. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. मार्शलचा पराभव झाला. आमच्याच चाळीतील एक उमेदवार निवडून आला आणि त्यानंतर तो प्रस्थापित नगरसेवक बनला.
या निवडणुकीचा धडा घेऊन पुढच्या पालिका निवडणुकीत जर्मन दवाखान्याच्या परिसरातील वार्डातून मार्शल उभा राहिला. जर्मन मिशनरींनी उभारलेला तो दवाखाना, तेथील ख्रिस्ती देऊळ, येशूसंघीय फादरांतर्फे चालवल्या जाणाऱ्या आरटीआर, सोशल सेंटर वगैरे संस्थांच्या आसपासच्या त्या परिसरातील ख्रिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय होती. पण येथेही माशी शिंकली. मार्शल हा त्या परिसरातील सर्वांना परिचित असणाऱ्या पारखे टेलरांचा मुलगा होता, त्यालाही बहुतेक सर्व ख्रिस्ती मतदार ओळखत होते. मात्र या ख्रिस्ती तरुणाने शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या वार्डात मते मागावीत, हे त्या लोकांच्या पचनी पडले नाही. ‘ना घरका, ना घाटका’ असे बनलेल्या मार्शलचा त्या निवडणुकीतही पराभव झाला. 
त्यानंतर मार्शल निवडणुकीच्या फंदात पडलाच नाही. या क्षेत्रात आपल्याला फार मजल मारता येणार नाही, हे त्याच्या लक्षात आले होते. पैशाचे आणि आपापल्या ज्ञातबांधवांचे पाठबळ असलेल्या शिवसेनेतील त्याच्या बरोबरीच्या इतरांना मात्र हे शक्य झाले. श्रीरामपूर शहरातला शिवसेनेचा एक संस्थापक सभासद असलेला मार्शल अखेरपर्यंत सामान्य शिवसैनिकच राहिला. त्याच्याबरोबर असलेल्या आणि त्याच्यानंतर या संघटनेत आलेल्या अनेक जणांनी नंतर राजकारणात जम बसवला, काहीजण तर आमदार आणि मंत्रीही झाले. मार्शलने स्वत: कुठलीही नोकरी केली नाही, कुठल्याही व्यवसायात त्याला कधी यश आले नाही. आयुष्यभर त्याच्या वाटेला परवडच आली, कुटुंबाला तो आर्थिक स्थैर्य देऊ शकला नाही.
दहा-बारा वर्षांपूर्वी प्रदीर्घ आजाराने मार्शलचे निधन झाले, तेव्हा श्रीरामपूर आणि अहमदनगरहून प्रसिद्ध होणाऱ्या विविध दैनिकांत छोट्याशा एक कॉलममध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांत ‘एक जुने, कट्टर शिवसैनिक’ म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्याच्या चाळीसाव्यानिमित्त कबरीपाशी प्रार्थना झाल्या, फुले वाहण्यात आली. यानिमित्त जमलेल्या लोकांना बसण्यासाठी मार्शलच्या घराभोवती छोटासा मांडव घालण्यात आला होता. घराच्या पहिल्याच खोलीत दोन्ही हात जोडून आपल्या दैवताला - बाळासाहेब ठाकरेंना - दंडवत घालणाऱ्या मार्शलचे ‘ते’ छायाचित्र होते. मांडवात जेवणासाठी मांडी घालून बसल्यावर घराच्या पत्र्यांवर उंचावर उभारलेल्या त्या भगव्या झेंड्याकडे माझे सहज लक्ष गेले. खूप दिवसांपूर्वी उभारलेल्या त्या भगव्या झेंड्याचा रंग आता मूळ रंग ओळखू न यावा इतका फिका पडला होता.
................................................................................................................
.....................................................................................

Monday, October 10, 2016

Church call for Special prayer for peace and safety on borders

Special prayer for peace and safety on borders
CAMIL PARKHE | Monday, 10 October 2016 AT 11:24 AM IST
Send by email    Printer-friendly version
goo.gl/DPXqO7
PUNE: The Catholic Bishops Conference of India (CBCI) has called for a day of prayer all over the country on Sunday, October 16, in view of the ongoing religious events of various communities and the ‘extraordinary challenges’ on the country’s borders.

The CBCI is the apex body of the Catholic Church in the country.

CBCI President Cardinal Baselios Cleemis has issued a circular to the church hierarchy in the country, asking them to conduct special religious services for the nation on October 16.

Cardinal Cleemis in his circular has referred to Dasara festival on October 11, Muharram, a day of special significance to the Muslims, on October 12, and the birth of Guru Granth commemorated by the Sikhs on October 20 and the forthcoming Diwali festival.

“Amidst all these festivals, our beloved country is going through extraordinary challenges especially on its borders. The Catholic church prays for our beloved country, for justice, peace, prosperity and welfare, harmony and unity,” Cardinal Cleemis said.

While urging the church leaders to conduct special liturgies and prayers for the nation on this day, the CBCI President has also invited people of goodwill to join in praying for the country.

“May every place of worship chime with prayers for our beloved nation, its leaders and its people,” the cardinal has said.