Did you like the article?

Thursday, May 1, 2025

अमेरिकन मराठी मिशनचा वर्धानपनदिन

१२ फेब्रुवारी - याच दिवशी १८१३ रोजी मुंबई बंदरावर चार अमेरिकन मिशनरींचे आगमन झाले आणि भारतात सामाजिक क्रांतीचे पर्व सुरु झाले. .

सॅम्युएल नॉट, मिसेस नॉट, गॉर्डन हॉल आणि ल्युथर राईस ही त्या मिशनरींची नावे.
या मिशनरींनी लगेचच आधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळा मुंबईत सुरु केल्या, केवळ मुलींसाठी पहिली शाळा १८२४ साली सुरु केली.
१२ फेब्रुवारी अमेरिकन मराठी मिशनचा वर्धानपनदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मराठी मिशन आणि साप्ताहिक उपदेशक यांच्या विद्यमाने उद्या नगर येथे राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन होत आहे.
सावित्रीबाई फुले यांनी सिंथिया फरार मॅडमच्या ज्या शाळेत अध्यापनाचे धडे घेतले असतील त्या क्लेरा ब्रुस शाळेत हा कार्यक्रम होत आहे.
मुंबईतल्या अमेरिकन मराठी मिशनच्या एका तुकडीने २० डिसेंबर १८३१ रोजी नगर येथे तंबू ठोकला आणि या शहरात अमेरिकन मराठी मिशनचे कार्य सुरु झाले, ते आजतागायत चालू आहे.
या पहिल्या दिवसापासून तो या केंद्राच्या १८८१च्या सुवर्णमहोत्सवापर्यंतच्या कार्याच्या हृदयस्पर्शी आठवणी त्याकाळात अमेरिकेत परतलेल्या रेव्ह. हॉलीस रीड यांनी लिहिल्या होत्या.
पुण्यातील ज्येष्ठ संशोधक अशोक एस हिवाळे यांनी त्या लिखाणाचा मराठीत पुढीलप्रमाणे अनुवाद केला आहे. तो अनुवाद संक्षिप्त रुपात येथे मी देत आहे :
मोहरीचा दाणा वाढला आणि त्याचे मोठे झाड झाले
"१८३१ मध्ये अहमदनगर मिशन ठाणे सुरू करणाऱ्या पहिल्या मिशनरींपैकी रेव्ह. हॉलिस रीड हे एक मिशनरी होते. ते आता वयाच्या ७८ व्या वर्षी अमेरिकेत मिसेस रीड यांच्यासोबत आहेत. त्यांच्या स्मृती अजूनही ताज्या आहेत, त्यांनी आम्हांला त्या सुरुवातीच्या दिवसांत घडलेल्या लहानसहान घटनांच्या विविध आठवणी सांगितल्या आहेत" -
``१८७८ सालच्या मराठी मिशनचा अहवाल दयाळूपणे माझ्याकडे पाठवला आणि गेल्या ५० वर्षांपूर्वीच्या छोट्याशा सुरुवातीची सध्या सुरू असलेल्या विस्तृत आणि उदात्त कामाशी तुलना केली, तेव्हा मी आश्चर्याने आणि निर्विवाद कृतज्ञतेने उद्गारलो, ‘‘पाहा, देवाने केवढे कार्य केले आहे!’’
हा अहवाल पाहून माझे हृदय भरून आले आणि मी म्हटले, अरे! त्या आगामी ५० व्या वर्धापनदिनानिमित्त मला तुमच्याबरोबर असायला पाहिजे होते.
मी तिकडे आलोच तर परत अमेरिकेला माघारी येणार नाही. परंतु माझा प्रिय बंधू हर्वे याच्या नगर येथील कबरेच्या बाजूला मला पुरण्यात यावे अशी मी अपेक्षा करीन.
२० डिसेंबर १८३१ रोजी आमच्या प्रारंभीच्या छोट्या टोळीने अहमदनगरमध्ये आमचे तंबू ठोकले; आमच्या टोळीत मिस्टर आणि मिसेस ग्रेव्हज, मिस्टर हर्वे, आणि मी आणि माझी पत्नी यांचा समावेश होता.
मिस्टर ॲलन आणि मी अशा दोघांनी आधी दख्खन पठाराचा पुनर्विचार केला होता आणि हे ठिकाण पसंतीचे स्थान म्हणून निवडले होते.
आमची सुरुवात आशादायी होती - शनिवारी आम्ही नगरला आलो आणि रविवारी आर्मी सर्जन डॉ. ग्रॅहॅमसोबत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गेलो. ते दर शब्बाथ दिवशी सकाळी आमंत्रण देऊन गरीब, लंगडे, आंधळे आणि कुष्ठरोगी यांना बोलवायचे.
ते लोक तेथे जमले की, ते त्यांना जो एकटाच त्यांची आध्यात्मिक दुर्बलता दूर करू शकतो अशा एका महान वैद्याविषयी सांगायचे. आणि त्यांच्या उपासमारीने भुकेजलेल्या कृश शरीरांसाठी तांदूळ आणि धान्याचा पुरवठाही करायचे.
थोडक्यात सांगायचे तर येथे आमचे मिशनकार्य सुरू झाले.
जानेवारी १८३३ चा पहिला सोमवार, हा दिवस माझ्या चांगला आठवणीत राहील. . मला माझ्या जर्नलमध्ये त्या दिवसाविषयी लिहिलेली खालील टिपणी आढळते :
‘‘भारतात मी पाहिलेला हा सर्वांत पवित्र आणि मनोरम दिवस आहे. आमच्या स्थानिक भाषेतील सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी तीन अनोळखी लोक उपस्थित होते. ते म्हणाले की, ‘‘आम्ही ‘नवीन मार्गाविषयी’ विचारपूस करण्यासाठी आलो आहोत.’’
याचा परिणाम असा झाला की, यांपैकी बारा जणांना मंडळीमध्ये सभासद म्हणून स्वीकारण्यात आले - चौघांना फेब्रुवारीमध्ये आणि इतरांना आमची स्वतंत्र मंडळी स्थापन झाल्यावर पुढील मार्चच्या ६ तारखेला.
आम्ही तोपर्यंत मुंबईच्या मिशन चर्चची शाखा म्हणून अस्तित्वात होतो.
मंडळी स्थापन होण्यापूर्वी मिशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात चौदा सदस्य होते. त्यात सर्वांत खालच्या जातीचे दहा हिंदू, गरीब आणि असहाय होते.
आता मला अहमदनगर येथील मंडळीमध्ये सर्व जातींचे तीनशे सदस्य आढळतात आणि त्यात उच्च जातीतील लोकांची संख्याही बऱ्यापैकी आहे.
त्या सुरुवातीच्या काळातील आमचे बहुतेक सत्यशोधक लवकरच हे दाखवून देतील की, आम्ही शिकवलेल्या धर्मात त्यांना जे स्वारस्य होते ते केवळ नोकरी मिळवण्यासाठी किंवा काही आर्थिक लाभ मिळवण्यासाठी नव्हते.
आणि जेव्हा मी तुमच्या तरुण मुलींच्या बोर्डिंग स्कूलकडे पाहतो, तेव्हा त्या बोर्डिंगस्कूलची सर्व सोयींनीयुक्त इमारत, पुस्तके आणि फर्निचर आणि त्यातील आंतरराष्ट्रीय आदर्श पातळीचे (आयएसओ) विद्यार्थी, तेव्हा मला मिसेस रीड यांनी मुलींसाठी पहिली छोटी शाळा सुरू करण्यासाठी केलेले पहिले प्रयत्न आठवले.
मुलींची शाळा सुरू करण्याच्या मिसेस रीडच्या प्रयत्नांकडे मूळ रहिवाशांनी एक परिपूर्ण मूर्खपणा म्हणून पाहिले आणि काहींनी त्यांची खिल्ली उडवली.
त्यांनी तिला विचारले की, ‘‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’’
तर्क आणि मन वळवण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिने शेवटला उपाय म्हणून पैशांचा युक्तिवाद वापरला.
जी मुलगी दररोज शाळेला येईल तिला एक पैसा मिळेल.
या युक्तिवादाचा उपयोग करून एक लहान शाळा स्थापन करण्यात आली. पैसे (कदाचित दहा पैसे) आठवड्याच्या शेवटी प्रत्येकीला दिले गेले.
लवकरच मुलींना शाळेला येण्यात स्वारस्य वाटू लागले - काही वाचायला शिकल्या.
सुरुवातीला त्यांच्या पालकांना आश्चर्य वाटले, परंतु लवकरच या नवीन आणि अनपेक्षित विकासाचा अभिमानही वाटू लागला.
आणि मग पैसा मिळो अगर न मिळो मुली शाळेत नियमितपणे येऊ लागल्या.
परंतु प्रवाह नेहमीच सुरळीत वाहतो असे नाही.
स्त्रीशिक्षण हे ब्राह्मण आणि उच्च जातींनी अतिशय संशयास्पद मानले होते आणि खालच्या जातींनीही ते अत्यंत अनिच्छेने व्यवहार्य किंवा आवश्यक म्हणून स्वीकारले होते.
हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम होता. त्याची उपयुक्तता कोणीही पाहू शकत नव्हते आणि त्याच्या यशामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात अपयश आले नाही.
त्यामुळे मुलींच्या शाळांकडे पुरोहित फारच संकुचितपणे पाहत. आणि अशा योजनांना मोडून काढण्यासाठी वेळोवेळी सर्व प्रकारची कटकारस्थाने आखली जात.
याचे एक उदाहरण पाहा : एके दिवशी सकाळी मिसेस रीड शाळेला नेहमीप्रमाणे भेट देत असताना, तिला एक वर्ग रिकामा आढळला. एकही विद्यार्थिनी दिसत नव्हती.
बाई आश्चर्यचकित होऊन तेथेच रेंगाळत असताना शिक्षक येऊन हजर झाले.
आणि शाळेचा वर्ग रिकामा का आहे याचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, अशी अफवा पसरली आहे की मुलींना थोडेफार प्रशिक्षण देऊन व त्यांच्यात बदल करून त्यांना दूर पाठवून गुलाम म्हणून विकण्यासाठी त्यांच्या घरातून काढून एकत्र आणण्याचा बाईंचा हेतू होता. त्यामुळे त्यांचे पालक त्यांना शाळेतून घेऊन गेले.
दुसऱ्या एका प्रसंगात असा शोध लावला होता की दुसऱ्या एका शाळेतील पुस्तकात येशू ख्रिस्ताचा धर्म शिकवला जातो आणि आम्ही त्यांना त्यांच्या वडिलांचा धर्म सोडण्यास भाग पाडणार आहोत असा धोक्याचा इशारा दिला होता.
यामुळे एक धोक्याची घंटा वाजली आणि कोकरे पुन्हा विखुरली गेली.
परंतु या प्रकरणात इतरांप्रमाणेच धोक्याच्या घंटेचा हा नाद लवकरच मंदावला.
बहुतेक विद्यार्थी परतले आणि शाळा चालू झाल्या.
आणि आणखी एक बळकट दृष्टान्त मला दिसतो तो म्हणजे अहमदनगरमधील ईश्वरविज्ञान पाठशाळा! माझ्या पहिल्या बॉईज स्कूलशी तुलना करता हे चित्र किती परस्परविरोधी आहे - अर्धा डझन गरीब ओबडधोबड कपडे घातलेले विद्यार्थी जमिनीवर मांडी घालून बसले आहेत आणि वाळूच्या बोर्डवर अ, आ, इ, ई लिहीत आहेत.
मला त्या गावांची (आणि त्यांच्यापलीकडील गावांतील अनेकांची) आठवण होते.
माझ्या पहिल्या भेटीत मी त्यांना पहिल्यांदाच येशूची कथा आणि त्याचे प्रेम सांगितले होते. यांपैकी काही गावांमध्ये लोकांनी पाहिलेला मीच पहिला गोरा माणूस होतो
माझ्या जर्नलमध्ये लिहिले आहे, ‘‘मिशनच्या पहिल्या तीन वर्षांत सोळा प्रचारदौरे करण्यात आले, २२०० मैलांचा प्रवास केला, आणि २३० गावांना भेटी दिल्या, त्यांपैकी बहुतेकांनी मिशनरीचा आवाज यापूर्वी कधीही ऐकला नव्हता.’’
हे दौरे नगर केंद्रातून सुरू करून जुन्नर, औरंगाबाद, जालना, हैद्राबाद, कोल्हापूर, पंढरपूर, सातारा, महाबळेश्वर डोंगर आणि मध्यंतरीच्या सर्व प्रमुख गावांपर्यंत विस्तारले होते.
मी आता लोणी, राहुरी, शिरुर, सातारा, सोलापूर आणि इतर सर्वच गावांत या माझ्या भेटींची पुनरावृत्ती करू शकलो, तर मला किती आनंददायी विरोधाभास आढळेल !
लाल समुद्र पार केला आहे. प्रगतीतील पूर्वीचे अडथळे दूर केले, एवढेच नाही तर त्यांची तीव्रता कमी झाली आहे.
जातीची लोखंडी पकड सैल झाली आहे. निर्दयी भटभिक्षुकांच्या जुलूमजबरदस्तीचे सामर्थ्य खूपच कमी झाले आहे. ख्रिस्ती मंडळीचा आदर केला जात आहे आणि तिच्या सदस्यांना आता वाळीत टाकीत नाहीत.
नंतरच्या तारखेच्या एका पत्रात, जवळ येत असलेल्या सुवर्णमहोत्सवी सम्मेलनाचा संदर्भ देत श्री. रीड म्हणतात :
‘‘ माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी निराशा ही आहे की मी भारतात सुरू केलेल्या कामात पुढे जाऊ शकलो नाही - म्हणजे तेथेच जगलो, मेलो आणि रणांगणावरच पुरला गेलो नाही.''

 जोतिबांच्या शाळा 

जोतिबा अणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिक्षण घेतले हे सर्वमान्य आहे.
मात्र ते दोघे नेमक्या कुठल्या शाळेत शिकले हे आजही निश्चित नाही. याबाबत संशोधकांमध्ये उत्सुकता असेलच.
सावित्रीबाईंनी नगर येथील अमेरिकन मराठी मिशनच्या मिस सिंथिया फरार यांच्याकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले ती शिक्षणसंस्था म्हणजे या शहरातील माळीवाड्यात आजही चालू असलेली क्लारा ब्रूस स्कुल.
येथेच जोतिबांनी फरार मॅडमची भेट घेतली होती, त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन पुण्यात येऊन त्यांनी तेथे लगेच मुलींसाठी शाळा सुरु केली होती. खुद्द जोतीबांनीच असे लिहिले आहे.
अर्थात क्लारा ब्रूस हे नाव त्यानंतर खूप वर्षांनी या शाळेला देण्यात आले. क्लारा ब्रूस या शाळेच्या अनेक वर्षे प्राचार्य होत्या.
पुण्यात फुले दाम्पत्य जिथे शिकले त्या शाळांबाबत मात्र अशी सुस्पष्टता नाही. जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात स्कॉटिश मिशनच्या शाळांत शिकले, नंतर याच शाळांत ते काही काळ शिक्षक होते.
सावित्रीबाईंनी पुण्यात स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट मिचेल यांच्याकडे अध्यापनाचे शिक्षण घेतले होते.
सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात जोतिबांनी आपण सुरु केलेल्या शाळा नंतर कमिटीकडे देण्यात आल्या आणि त्या शाळा मिसेस मिचेल चालवत होत्या असे म्हटले आहे.
कुठे आहेत आता त्या शाळा आणि शिक्षणसंस्था ?
अपार उत्सुकतेने काही वर्षांपूर्वी याबाबत सुरु झालेल्या माझ्या शोधाला आता एक निश्चित दिशा मिळते आहे असे वाटत आहे.
फुले दाम्पत्याच्या चरित्राशी आणि कार्याशी निगडित असलेल्या या शिक्षणसंस्थांच्या शोधाला अचानक गती मिळाली ती या पंधरवड्यातच.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शाळांबाबत कुतूहल असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक विश्वस्त दीपक गिरमे यांनी माझा मोबाईल नंबर मिळवून याबाबत माझ्याकडे चौकशी केली तेव्हा.
त्यानंतर समाज कार्यकर्त्या आणि वकील असलेल्या असुंता पारधे यांनी मला पुण्यातील स्कॉटिश संस्थांबाबत काही माहिती पुरवली आणि या तपासाला गती मिळत गेली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत स्कॉटिश मिशनरी मार्गारेट आणि जॉन विल्सन हे दाम्पत्य, जॉन मरे मिचेल आणि रॉबर्ट नेस्बिट त्याचप्रमाणे पुण्यात मार्गारेट आणि जेम्स मिचेल हे दाम्पत्य शिक्षणकार्य करत होते.
मात्र या स्कॉटिश मिशनचे पुण्यात आता मुळी अस्तित्वच नाही असा माझा कालपरवापर्यंत ठाम समज होता.
स्कॉटिश मिशनरींशी संबंध असलेल्या चार नावाजलेल्या शिक्षणसंस्था पुण्यात आजही आहेत हे समजले तेव्हा माझ्या या अज्ञानाबद्दल मला खूप शरमल्यासारखे झाले.
आणि त्याबरोबरच एक सुखद धक्काही बसला होता.
जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचा ज्या शिक्षणसंस्थाशी अतूट आणि दीर्घकाळ संबंध होते त्या याच संस्था असतील हे निःसंशय आहे.
घाशीराम कोतवाल उत्तर पेशवाई काळातील एक वादग्रस्त पात्र. विजय तेंडुलकरांच्या नाटकाने हे नाव अनेकांना परिचित झाले आणि अगदी सातासमुद्रापार पोहोचले.
पुणे कॅम्पात असलेला घाशीराम कोतवालचा ऐतिहासिक वाडा अनेक वर्षांपूर्वी जमीनदोस्त झाला. मात्र या वाड्याची माहिती आणि एक छायाचित्र त्या जागी उभे करण्यात आले.
आता अस्तित्वात नसलेल्या या घाशीराम कोतवालच्या वाड्याच्या बाजूला आजही एक जुनी वास्तू आणि शिक्षणसंस्था तग धरुन आहे.
ही शिक्षणसंस्था म्हणजे जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीची सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा. बालवाडी व इयत्ता पहिली ते चौथी.
स्थापना सहा जानेवारी १८२७.
याचा अर्थ भारतात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या काही शाळांपैकी ही एक शाळा आहे.
लवकरच सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा २०० वर्षे पूर्ण करणार आहे.
भारतात सर्वप्रथम प्राथमिक शाळा उघडण्यात आल्या त्या बंगाल इलाख्यात.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला.
त्यानंतर मिस मेरी अँन कुक यांनी 1822 मध्ये कोलकात्यात मुलींच्या शाळा सुरु केल्या.
अमेरीकन मराठी मिशनच्या मिशनरींनी भारतात - मुंबईत - १८१२ साली प्रवेश केल्यानंतर लगेच तेथे शाळा स्थापन केल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे १८२३ साली शाळा सुरु केल्या होत्या.
मार्गारेट आणि जॉन विल्सन हे नवविवाहित जोडपे स्कॉटलंडहून भारतात १८२८ साली आले, कोकणात मराठी शिकल्यानंतर मुंबईत येऊन १८३२ साली त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरु केल्या.
मुंबईत आजही असलेली सेंट कोलंबा गर्ल्स स्कुल आणि विल्सन कॉलेज त्यांनीच स्थापन केले.
पुण्यातील या प्राथमिक शाळेची मालकी आता जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीकडे असली तरी ही शाळा जॉन विल्सन किंवा स्कॉटिश मिशनरींनी सुरु केलेली नसणार.
याचे कारण स्कॉटिश मिशनरी तोपर्यंत १८२७ साली दख्खनेत - पुण्यात - पोहोचलेसुद्धा नव्हते.
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मार्गारेट आणि जॉन विल्सन आणि इतर स्कॉटिश मिशनरींवर एक प्रकरण लिहिले आहे.
स्कॉटिश मिशनरींशी निगडीत असलेल्या पुण्यातील इतर शिक्षणसंस्था म्हणजे रास्ता पेठेतील एथेल गॉर्डन अध्यापन कॉलेज, लाल देवळामागे पेट्रोल पंपाशेजारी असलेली सेंट अँड्रयूज मराठी स्कुल आणि पुणे कॅम्पात शिवाजी मार्केटपाशी असलेले सेंट जॉन स्कुल.

Tuesday, January 28, 2025

 

Shut up ! Don’t sermon me !!
कुणी एखाद्याने आगाऊपणा करत सल्ले देण्यास सुरुवात केली कि असे म्हटले जाते.
Sermon म्हणजे प्रवचन म्हणता येईल पण इंग्रजीतल्या Sermon चा एक वेगळाच अर्थ आहे.
Sermon म्हणजे ख्रिस्ती देवळांत धर्मगुरु देतात ते प्रवचन.
ख्रिस्ती चर्चमध्ये - मग ते कॅथोलिक, प्रोटेस्टंट किंवा ऑर्थोडॉक्स असो - रविवारच्या किंवा इतर दिवसांच्या उपासनेची एक ठराविक पद्धत असते.
बायबलचे वाचन झाल्यानंतर धर्मगुरु sermon ( प्रवचन) देतात आणि जमलेले सर्व भाविक ते मुकाट्याने ऐकतात.
त्या फादरांच्या किंवा पास्टरच्या उपदेशावर प्रतिवाद करता येत नाही.
अमेरिकेचे आताच पायउतार झालेले राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चर्चला नियमितपणे जात असतात.
मागे बायडेन भारतभेटीला आले होते तेव्हा त्यांची रविवारची उपासना व्हावी यासाठी अमेरिकन वकिलातीने त्यांच्यासाठी खास धर्मगुरुची नवी दिल्लीत नियुक्ती केली. होती.
आताच राष्ट्राध्यक्षपदावर आलेले डोनाल्ड ट्रम्पसुद्धा असेच नुसतेच जन्माने ख्रिस्ती नाहीत तर church goer आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाची शपथ त्यांनी बायबलला स्मरुन घेतली.
ट्रम्प यांनी फक्त पुरुष आणि स्त्री या दोनच लिगांना अमेरिकेत मान्यता असेल, बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल अशी घोषणा केली आहे.
तर नूतन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना याबद्दल दुसऱ्याच दिवशी म्हणजे कालच असे मुकाट्याने sermon ऐकून घेण्याची पाळी आली.
वॉशिंग्टनच्या डायोसिसच्या बिशपपदावर नेमणूक झालेल्या पहिल्याच महिला असलेल्या मॅरियन एडगर बड्डे (Marianne Edgar Budde ) यांनी हे धाडस केले आहे.
ट्रम्प यांच्या धोरणाबद्दल कडक शब्दांत बिशप मॅरियन यांनी नापसंती व्यक्त केली आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दयेची भूमिका घ्यावी असे त्यांना तोंडावर सुनावले.
महिलांना धर्मगुरुपद, बिशप यासारखे महत्त्वाचे पद देण्यास प्रोटेस्टंट पंथियांनी आघाडी घेतली आहे.
उदाहरणार्थ, पुण्यातल्या सर्वांत जुन्या (दोनशे वर्षे) असलेल्या सेंट मेरीज चर्चच्या प्रमुख धर्मगुरु म्हणून रेव्हरंड सोफिया मकासरे यांची दोन वर्षांपूर्वी नेमणूक झाली आहे.
वादग्रस्त समलिंगी संबंधांसंदर्भात चर्चच्या भूमिकेबाबत पोप फ्रान्सिस यांना काही वर्षांपूर्वी एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला होता.
तेव्हा " Who am to judge?'' असा प्रतिसवाल करुन तिरस्करणीय गणल्या गेलेल्या समाजघटकांतील अनेकांची पोप फ्रान्सिस यांनी वाहवा मिळवली होती.
वॉशिंग्टनच्या नॅशनल कॅथेड्रलमध्ये प्रवचन देताना बायबलच्या उताऱ्यांचा आधार घेत पासष्टवर्षीय बिशपमहोदयांनी ट्रम्प यांना म्हटले :
“Our God teaches us that we are to be merciful to the stranger, for we were once strangers in this land,” she said.
She told Trump: 'I ask you to have mercy upon the people in our country that are scared now. There are gay, lesbian, and transgender children in Democratic, Republican, and Independent families, some who fear for their lives.'
``राजा, तू चुकतो आहेस'', असे त्यांना एका महिलेने त्यांच्या तोंडावर सांगितले तेव्हा चुपचाप राहावे लागणाऱ्या ट्रम्प यांचा काय जळफळाट झाला असेल याची आपण केवळ कल्पना करु शकतो.
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलॅनिया ट्रम्प यावेळी आपल्या पतीशेजारीच बसल्या होत्या
आपला संताप ट्रम्प यांनी चर्चबाहेर आल्याआल्या लगेच शेलक्या शब्दांत शिव्या देऊन व्यक्त केला.
ट्रम्प यांची भाषाच तशी आहे.
बराक ओबामा किंवा आपल्याकडचे डॉ मनमोहन सिंग यांच्यासारखी त्यांची शब्दसंपदा किंवा सुसंस्कृतपणा त्यांच्याकडे नाही.
पुढील काही वर्षे अमेरिकेत आणि जगभर अशीच खडाजंगी दिसेल अशी चिन्हे आहेत.
Camil Parkhe January 23, 2025

Friday, January 17, 2025

 परवाच्या भोगी आणि कालच्या संक्रान्त सणांनिमित्ताने एकच गोष्ट करण्याच्या तीन अगदी वेगळ्या तऱ्हा नजरेस आल्या.

आपल्या भारतीय संस्कृतीतील संक्रांत हा पोंगल, पोळा, ओणम, भाऊबीज, नारळी किंवा राखी पौर्णिमा या सणांसारखा निधर्मी सण असावा.
एक तर पाश्चात्य मूळ असलेल्या ग्रेगरीयन कॅलेंडरनुसार हा सण १४ जानेवारीला आणि लिप वर्षात १५ जानेवारीला साजरा होतो.
दुसरे म्हणजे या सणाचे मूळ पुर्णतः भौगोलिक स्वरुपाचे आहे. उत्तरायण आणि दक्षिणायन.
त्यानिमित्त आज मी माझ्या एक मित्राला यानिमित्त चक्क इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या शरपंजरी भीष्माचार्यांची कथा ऐकवली.
भोगीनिमित्त आमच्याही घरी बाजरीची भाकर आणि चवदार मिश्र भाजींचे जेवण होते.
संक्रांतीनिमित्त तिळ आणि गुळाच्या चपात्या होत्या.
तर त्या दिवशी सकाळी फिरायला गेलो असताना मोटारसायकलवर आलेले तीन तरुण दिसले. डोक्याला कानटोपी असलेल्या त्या तिन्ही तरुणांच्या अंगांत वासुदेवाचे अंगरखे होते.
आपल्या गाड्या एका ठिकाणी पार्क करून गोल कानटोपीवर जिरेटोपासारखी वासुदेवाची टोपी चढवून `वासुदेव आला, वासुदेव आला, दान करा' अशी गाणी म्हणत रस्त्यांवरील लोकांकडून, दुकानदारांकडून ते भोगी सणानिमित्त पैसे मागत होते.
त्या तिन्ही वासुदेवांना लोकांकडून बऱ्यापैकी प्रतिसाद होता, काहीजण त्यांच्याकडून भविष्य ऐकत होते, त्याबद्दल काही रक्कम देत होते. त्या तिन्हीही वासुदेवांचे सफेद आणि रंगीत कपडे बऱ्यापैकी स्वच्छ होते.
विशिष्ट जमातीचे ते असले तरी ते अगदीच भिकारी दिसत नव्हते. त्यांची सांपत्तिक परिस्थिती बऱ्यापैकी असावी, त्यांचे शालेय शिक्षण झालेले असणार.
चौकांत एकमेकांना भेटल्यानंतर ते काही हास्यविनोदसुद्धा करत होते.
त्यांच्या खानदानीत आणि त्यांच्या जमातीत पिढीजात असलेली वासुदेवाची ही भूमिका ते वर्षातून काही दिवस पार्टटाइम करत असावेत हेही उघड होते.
काल संक्रांतीच्या दिवशी सकाळी त्याच ठिकाणी त्या सणानिमित्त लोकांकडून पैसे मागणारी एक बाई दिसली.
कमरेपाशी असलेल्या डोलकीवर गुबुगुबू आवाज करत ती येणाऱ्याजाणाऱ्या लोकांसमोर पैशासाठी हात पुढे करत होती.
पाचसहा वर्षांची असलेली त्या बाईची मुलगी रस्त्यावर इकडेतिकडे पळत येणाऱ्याजाणाऱ्या लोकांचे हात पकडून भीक मागत होती.
बहुतेक लोक त्या दोघींना टाळण्याचे प्रयत्न करत होती. ती मुलगी जवळ येण्याआधीच मी एका कॉर्नरपाशी माझी वाट बदलली होती.
वयाच्या विशीत असली तरी आता कालबाह्य होत आलेले नऊवारी लुगडे त्या बाईने नेसले होते. ती पूर्णतः निरक्षर होती आणि तिची मुलगी कुठल्याही शाळेत जात नव्हती हे उघडच होते.
लाचारी आणि अगतिकता त्यांच्या चेहेऱ्यांवर स्पष्टच जाणवत होती. समाजाच्या अगदी खालच्या थरातील त्या दोघी होत्या अन त्यांना मदत करण्यास कुणी पुढे आलेले मला तरी दिसले नाही.
आज दुपारी घरीच होतो. बेल वाजली म्हणून पुढे आलो तो डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर गंध आणि शुभ्र कपडे घातलेला एक तरुण दिसला.
``मी अमुक अमुक जातीचा आहे, शेजारच्या देवळातून आलो आहे. संक्रांत सणानिमित्त भिक्षा द्या !''
मी त्याकडे निरखून पाहिले.
भिक्षा मागत असला तरी तेजस्वी आणि करारी चेहरा असलेल्या त्या तरुणाची मान ताठ होती. लाचारीचा त्या नजरेत लवलेशसुद्धा नव्हता.
इमारतीच्या लिफ्टचा वापर करुन तो आमच्या मजल्यावर पोहोचला होता. सहसा सेल्सवाले लोकसुद्धा असे धाडस करत नाही, वासुदेव आणि इतर लोकांबद्दल तर बोलायलाच नको.
वासुदेव आणि त्या बाईसारखा हा तरुणसुद्धा पैसे मागत असला तरी त्यासाठी त्याने भिकेऐवजी 'भिक्षा' असा अधिक प्रतिष्ठित शब्द वापरला होता.
भिक्षा देण्यास अर्थातच मी सरळसरळ नकार दिला, इतर शेजाऱ्यांनीही तसेच केले.
आपल्या भारतीय संस्कृतीत बहुतेक सर्वच धर्मांत जातीजमाती अजूनही आपले पाय घट्ट रोवून आहेत.
असे जातीनिहाय जगणे, वागणे आणि व्यवसायसुद्धा आजही तसेच कायम राहिले आहेत. त्यात कालपरत्वे अगदी थोडाबहुत फरक होत असेल इतकेच.
Camil Parkhe, January 15, 2025

Sunday, December 8, 2024


श्रीरामपूरला आमच्या आजूबाजूला साजरा होणाऱ्या अनेक सणांपैकी काही सण आमच्याही घरात साजरे व्हायचे, पोळा हा त्यापैकी एक.

या सणाच्या काही दिवस आधीच आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानापाशी असलेल्या मेनरोडला मातीपासून बनवलेल्या रंगीबेरंगी बैलांच्या जोड्या विक्रीला ठेवलेल्या असत.
पोळ्याच्या आदल्या दिवशी यापैकी मग पांढऱ्या, उंचच उंच खिलारी बैलांच्या एकदोन जोडी घरात यायच्या.
त्या बैलांची आमच्या घरात पूजा होत नसायची, मात्र दिवसभर मग या बैलजोड्यांशी माझा खेळ चालायचा.
पोळा संपल्यानंतर अनेक दिवस या बैलजोड्या भिंतीवरच्या फळ्यांवर असायच्या, होली विकमध्ये झावळ्यांचा रविवारी (Palm Sunday) घरी आणलेल्या झावळ्या अनेक दिवस अल्तारापाशी असायच्या, अगदी तसेच.
काही दिवसांनी शिंगे मोडलेली किंवा एखादा पाय मोडलेल्या बैलांच्या जोड्या मग आम्हा मुलांच्या नकळत अचानक गायब व्हायच्या.
श्रीरामपुरात शहरी वातावरणात वाढलेल्या आमचा बैलांशी वा इतर कुठल्याही प्राण्यांशी यायचा तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या घोगरगावातल्या आमच्या आजोळामुळे. तिथे शिनगारे आडनाव असलेल्या मामांकडे गेले म्हणजे या प्राणिमात्रांशी जवळून संबंध यायचा.
आम्हाला आजोळी नेण्यासाठी घोगरगावाहून शांत्वन मामाची तरणीताठी मुलं शाहू, अंतोन किंवा मार्शल बैलगाडी घेऊन श्रीरामपुरला यायची. शांत्वनमामाकडे खिलाऱ्या बैलांच्या दोनतीन जोड्या होत्या. सर्वांत लहान असलेल्या शिवराममामाकडे लहानखुऱ्या बैलांची एकच जोडी होती. येताना बैलगाडीत दोन दिवस भरपूर पुरेल इतका ज्वारीचा कडबा आणलेला असायचा.
रात्री मुक्काम केल्यावर सकाळी बाई आणि आम्ही काही पोरं बैलगाडीत बसून निघायचो. बरोबर दुपारच्या जेवण्यासाठी कपड्यांत बांधलेल्या भाकरी आणि बेसनाचे कोरडे पिठले किंवा बटाट्याची सुकी भाजी असायची. , पिण्याच्या पाण्यासाठी फिरकीचा पितळी तांब्या बरोबर असायचा.
भामाठाणला आले कि मग बैलगाड्या गंगेच्या उथळ पाण्याच्या खोऱ्यात विसाव्यासाठी थांबायच्या. औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरचा हा भाग. मामाची मुले तहानलेल्या बैलांना पाणी दाखवून यायचे आणि मग बैलांसमोर कडबा टाकायचे. आम्ही पण मग जेवायच्या तयारीला लागायचो.
गोदावरीच्या पात्रातली वाळू थोडी वर काढली कि खाली निथळ पाणी लागायचे, तोंड धुवून ते थंड गार पाणी प्यायचे आणि भाकरी पिठल्यावर ताव मारायचा.
शिवराम मामा, शाहू, अंतोन आणि मार्शल यांनी कधी आपल्या बैलांवर चाबूक मारल्याचे आठवत नाही. बैल सावकाश चालले कि त्यांच्या शेपट्या जरा पिरगळल्या कि बैलगाडीच्या प्रवासाची गती वाढायची. कधी हातातल्या काठीने बैलांना ढुशी दिली तरी काम भागायचे .
एक गोष्ट मात्र आजही कित्येक वर्षानंतर स्पष्टपणें आठवते ती म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासातला त्या बैलजोडींचा प्रवास. घोगरगाव जवळ येत आहे याची जणू त्या मुक्या जनावरांना माहित असायचे अशा जलद गतीनं ते बैल चालत असायचे.
घोगरगावात शांत्वनमामा, वामनमामा, शिवराममामा यांच्याकडे बैलांना वर्षभर काही ना काही काम असायचे.
शिवराममामा आणि शाहू शेतावरच्या विहिरीवर चार बैल लावून मोट चालवायचे तेव्हा खळाळते पाणी वर येताना मी अचंबून पाहत राहायचो. विहिरीवर प्रत्यक्ष मोट चालवली जाताना मी पहिल्यांदा आणि शेवटी तिथेच पाहिली.
शेतात अनेक ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या थापलेल्या असायच्या, बैलांकडे गेले कि एखादा बैल शिंगे हलवून आगंतुक जवळकीबद्दल नापसंती व्यक्त करायचा.
`हा मारका बैल हाय, फार जवळ जाऊ नकोस,'' असे कुणी म्हणायचे.
शिवराम मामांकडे एक शेळीसुद्धा होती. त्यामुळे शहरातील आम्ही मुले आजोळी आल्यानंतर त्यांच्याकडे कोरा चहाऐवजी दुधाचा चहा मिळायचा हे मला आजही आठवते.
शेतकऱ्यांना शेतकामांसाठी बैलांची जास्त गरज भासायची, तशी गायांना फारशी मागणी नसायची. एखाददुसरी गाय मात्र प्रत्येकाकडे असायची. त्यामुळं जन्माला आलेलं गोऱ्ह शेतकरी स्वतःजवळ ठेवत, मात्र कालवड कुणाला तरी देत.
एकदा अशीच एक कालवड कुठल्या तरी मामानं श्रीरामपूरला आमच्याकडे बाईला पाठवून दिली होती. कालवड विकायची नसते, असा एक संकेत असायचा, जसं दुधाच्या घट्ट मलईतून लोणी काढून झाल्यावर निघालेलं ताकसुद्धा कधी विकायचे नसते .
श्रीरामपुरला बैलपोळ्याच्या दिवशी रेल्वेस्टेशन आणि बस स्टॅन्डपाशी असलेल्या छोट्याशा मारुतीच्या देवळापाशी सजवलेले बैल आणले जात, तिथे मारुतीला वंदन केल्यानंतर गळ्यातल्या घुंगरांचा मोठ्याने आवाज करत या बैलजोड्या जात असत.
हरेगाव येथे संत तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगात मी असताना बैलपोळ्याच्या वेगळ्याच आठवणी आहेत.
पोळ्याच्या संध्याकाळी हरेगावातले आणि आसपास असलेल्या एकवाडी, दोनवाडी अशा नावांच्या वाड्यांतले शेतकरी आपले सजवलेले बैल घेऊन तिथल्या उंच शिखर असलेल्या चर्चकडे येत.
त्याकाळात म्हणजे सत्तरच्या दशकात हरेगावला फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वासरर, फादर फ्रान्सिस झेम्प, फादर बेन्झ अशी युरोपियन धर्मगुरु असत.
देवळाच्या पायऱ्यांवर पांढरे झगे आणि गळ्याभोवती स्ट्रोल घालून हे फादर लोक उभे राहत आणि ख्रिस्ती भाविक शेतकरी आपल्या बैलांसह आल्यावर हातातले पवित्र पाणी बैलांवर आणि त्या शेतकऱ्यांवर शिंपडवून आशीर्वादित करत.
बैलांना वर्षातून एकदा अशा प्रकारे सन्मानित करणे, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणे धर्मविरोधी किंवा पवित्र शास्त्रविरोधी आहे असे त्यावेळी कुणाला वाटले नाही. आजही तसे वाटत नाही.
आज संध्याकाळी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत बैलांच्या मिरवणुकी अनेक चर्चमध्ये येतील आणि पोळा हा सण साजरा होईल.
भारतातील अनेक सण धर्म आणि जातिनिरपेक्ष आहेत, पोळा, भाऊबीज, रक्षाबंधन, पोंगल, ओणम वगैरे सणांचा धर्माशी संबंध नसतो.
अहमदनगर आणि इतर काही भागात आजच्या श्रावणी अमावास्येला पोळा साजरा करतात, पुण्यासारख्या काही भागात भाद्रपद महिन्यात पोळा साजरा होतो.
पोळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा...
(फोटोओळी : स्व. फादर जेम्स शेळके पोळा सणानिमित्त सजवलेल्या खिलारी बैलजोडीला आशिर्वादित करताना )
Camil Parkhe,

आचारसंहितेचा भंग


पंतप्रधान इंदिरा गांधी यांची रायबरेली मतदारसंघातून १९७१ साली झालेली निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९७५ साली रद्द ठरवली ती निवडणुक प्रचारात त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला म्हणून आणि आचारसंहितेचा भंग झाला होता म्हणून.

त्यानंतर मोठा गदारोळ झाला, त्याचीच परिणती आणीबाणी लादण्यात झाली हे सर्वांना माहिती आहेच.
त्यानंतर इंदिराबाईंचा निवडणुकीत पराभव झाला पण त्या हिरीरीने परत जनतेकडे गेल्या.
त्यावेळी १९७९च्या डिसेंबरात या खवळलेल्या जखमी वाघिणीला गोव्यात पणजीतल्या हॉटेल मांडवीपाशी मी खूप जवळून पाहिले.
नंतर मिरामार बिचजवळच्या कंपाल ग्राऊंडवर त्यांचे भाषण ऐकले.
आजी आणि माजी पंतप्रधान असलेल्या इंदिराबाई यांच्यासह राजीव गांधी, व्ही पी सिंग, चंद्रशेखर, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी हस्तांदोलन करण्याची, पत्रकार परिषदेत संवाद साधण्याची आणि सभेत त्यांचे भाषण ऐकण्याची मला संधी मिळाली आहे.
मात्र पंतप्रधानपदी असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याबरोबर अर्धा पाऊण तास पुणे विमानतळावरच्या एका छोट्याशा केबिनमध्ये बोलण्याची संधी मला मिळाली.
बरोबर फक्त ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम होते, आणि पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्र जनता दलाच्या अध्यक्ष मृणाल गोरे होत्या.
साल होते १९९०.
पंतप्रधान व्ही. पी. सिंग एअर इंडियाच्या प्रवाशी विमानाने पुण्याला आले होते.
निवडणुक आचार संहितेचा भंग होऊ नये म्हणून.
सोलापूर जवळ कर्नाटकमधील एका पोटनिवडणुकीच्या आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी ते आले होते. पंतप्रधान म्हणून सरकारी विमानाचा वापर त्यांनी टाळला होता.
दिल्लीचे विमान संध्याकाळी होते म्हणून पंतप्रधान विमानतळावर ताटकळत बसले होते.
पंतप्रधान आपल्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी आले असल्याने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) पत्रकारांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी वाहन व्यवस्थाही केली नव्हती.
त्यावेळी मी इंडीयन एक्स्प्रेसला होतो. मुकुंद संगोराम यांच्या स्कूटर वर बसून त्या रविवारी दुपारी एकच्या आसपास घाईघाईत मी विमानतळावर पोहोचलो होतो.
बोफोर्स प्रकरण उचलून धरणारे सिंग हे त्याकाळी `मिस्टर क्लीन' म्हणून प्रसिद्ध होते.
प्रवाशी विमानाने प्रवास करून पंतप्रधानांनी आपला वेळ वाया घालवू नये असे त्यावेळी काही वृत्तपत्रांनी म्हटले होते.
लोकशाही प्रथेत निवडणुक आचार संहिता हा तसा एक खूप मोठा प्रभावी वचक आहे..
Camil Parkhe