Did you like the article?

Showing posts with label Aurangabad. Show all posts
Showing posts with label Aurangabad. Show all posts

Wednesday, May 8, 2024

 


इम्तियाझ जलील सईद
ही तशी अगदी अलीकडची बाब, म्हणजे आता मध्यम वयातील लोकांना नक्की माहित असणार.
नगरपालिका आणि महापालिका निवडणुका पार पडल्या, निकाल जाहीर झाले की पुढील काही दिवस आम्ही पत्रकार मंडळी प्रस्थापित लोकांच्या बातम्या छापायचो त्याचप्रमाणे काही एखाद्या एकदम सामान्य व्यक्ती निवडून येत असत, त्यांच्याही बातम्या करत असू.
प्रत्येक गावागावांत आणि शहराशहरांत असे काही धक्कादायक निवडणूक निकाल असायचेच.
एखाद दुसरा/दुसरी जायंट किलर म्हणून नाव कमवायचे.
तिसेक वर्षांपूर्वी गावांत आणि शहरांत एखाद्या प्रमुख ठिकाणी पानटपरी असलेल्या व्यक्तीचे तिथल्या स्थानिक लोकांशी प्रचंड जनसंपर्क असायचा.
तीच गोष्ट चौकात दुचाकींचे पंक्चर काढणाऱ्या, गॅरेज असणाऱ्या व्यक्तींचे असायचे.
यापैकी कुणी एकाने लोकाग्रहास्तव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अर्ज भरला तर तिरंगी, चौरंगी किंवा बहुरंगी आणि त्यामुळे अटीतटीच्या या निवडणुकीत अशा सामान्य लोकांना आजूबाजूचे लोक मत द्यायचे आणि हे अतिसामान्य लोक चक्क निवडूनसुध्दा यायचे.
राज्यात आणि देशात असे जायंट किलर्स आजही परिचित आहेत.
मुंबईत स. का. पाटील यांना १९६७च्या लोक सभा निवडणुकीत हरवणारे समाजवादी, कामगार नेते जॉर्जे फर्नांडिस.
रायबरेलीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना १९७७ साली हरवणारे राज नारायण.
आमच्या शहरात महापालिका निवडणुकीत काही वर्षांपूर्वी असेच एक नाव गाजले. मारुती भापकर.
अण्णा हजारे, अरविंद हजारे, किरण बेदी प्रभुतींनी नवी दिल्लीत २०१४ सालापूर्वी लोक आंदोलन चालवले तेव्हा लोकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
सामान्य लोकांचे खरेखुरे नेते पुढील निवडणुकीत निवडून येऊ शकतील असे वातावरण तेव्हा निर्माण झाले होते.
याच भावनेतून मुंबईत मेधा पाटकर यांनी २०१४ लोकसभेची निवडणूक लढवली,
पुण्यात सुभाष वारे आणि मावळ मतदारसंघात मारुती भापकर यांनी निवडणूक लढवली.
या तिन्हीपैकी कुणीही करोडपती नव्हते.
मात्र हे तिघेही पराभूत झाले होते.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवणारे आणि जिंकणारे बहुतेक जणांनी पोटापाण्यासाठी कधीही नोकरी केलेली नसते, तशी गरज त्यांना कधी भासलेली नसते.
त्यामुळे पत्रकार म्हणून पुण्यात आणि इतरत्र नोकरी केलेल्या इम्तियाझ जलील सईद यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून २०१९ला अत्यंत अटीतटीच्या चौरंगी लढ्यात चार हजारांच्या मतांच्या फरकाने विजय मिळवला तेव्हा ती राष्ट्रीय पातळीवरची बातमी बनली होती.
यंदाच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत असे जायंट किलर्स कुणी असू शकतील काय?
Camil Parkhe,

Sunday, July 16, 2023

पुण्याची खाद्ययात्रा; लक्ष्मी रोडच्या दोन्ही टोकांवर सुखाने नांदणाऱ्या दोन खाद्यसंस्कृती

काल शनिवारी संध्याकाळी पुणे कॅम्पात सहज चक्कर मारायला गेलो होतो. ईस्ट रोडवर पार्किंगला जागा मिळाली नाही म्हणून एम. जी. रोडवर आलो अन वेस्ट एन्डला वळसा घालून परतण्यासाठी पुणे स्टेशनकडे निघालो. डाव्या हाताला `दोराबजी' दिसले अन थोडे पुढे गेल्यावर चौकात आडोशाला चक्क पार्किगसाठी जागा दिसली. तिथे गाडी पार्क करून आम्ही दोघे `दोराबजीं'कडे चालत आलो.

खूप वर्षांपूर्वीच रिनोव्हेट झालेल्या दोराबजी शॉपमध्ये आम्ही दोघे पहिल्यांदाच येत होतो, जवळजवळ तीस वर्षानंतर.

नव्वदच्या दशकात `वेस्ट एन्ड' थिएटर असलेल्या अरोरा टॉवर्समध्ये मी काम करत असलेल्या Indian Express इंग्रजी दैनिकाचे ऑफिस होते. महिन्यातून किमान एक शनिवारी संध्याकाळी छोट्या आदितीला घेऊन जॅकलीन निगडीच्या बसने `वेस्ट एन्ड' बस स्टॉपला उतरायची, माझ्या बातम्या देऊन झाल्यानंतर आम्ही तिघे कॅम्पात भटकंतीला निघायचो.

त्यावेळी `फॅशन स्ट्रीट' एम जी रोडच्या दोन्ही बाजूंच्या फुटपाथवर होता. तिकडे खरेदी व्हायची, दोघी जणी आईस्क्रीम खायच्या, कधी कॅफे महानाझ मध्ये चिकन समोसे आणि बन मस्का हा मेन्यू असायचा.

त्यानंतर एकमजली, बैठे दुकान असलेल्या दोराबजी शॉपमध्ये वेगळॆ खरेदी व्हायची. तिथे काचेच्या पारदर्शी बॉक्समध्ये चिकन सॉसेजेस, फ्रोझन चिकन, चिकन क्युब्स वगैरेची खरेदी व्हायची. हे पदार्थ मिळण्याचे हे एकमेव दुकान आम्हाला माहित होते.

तर आता दोराबजीत प्रवेश केल्यावर काचेच्या कपाटात कितीतरी खाद्यपदार्थ दिसले. केक्स, पेस्ट्रीज, चिकन सामोसे, चिकन कटलेटस, लेग पिसेस आणि काय-काय.

लगेच चिकन समोशांची ऑर्डर देऊन तिथल्या खुर्च्यांवर आम्ही बसलो. त्याशिवाय घरी विकेण्डसाठी लेग पिसेस आणि कटलेट्स पार्सल करण्यासाठी सांगितले.

काही विशिष्ट खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी विशिष्ट जागी जावे लागते.

पुणे कॅम्पातले `वेस्ट एन्ड' थिएटरचा परिसर हे अलका थिएटर चौकापासून सुरु होणाऱ्या लक्ष्मी रोडवरचे दुसरे एक टोक. पुण्यातल्या दोन संस्कृतींची ही दोन विरुध्द टोके. अलका चौक परिसरात वेगळी संस्कृती नांदत असते आणि वेस्ट एन्ड थिएटर परिसरात दुसरी वेगळी संस्कृती.

मागे काही दिवसांपूर्वी म्हणजे आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच रोजी आलेल्या त्या दिवशी मी क्वार्टर गेटपासून अरोरा टॉवर्सकडे पायी येत होतो त्यावेळी हे प्रकर्षाने जाणवले. एरव्ही गर्दीने गजबजलेला असणारा तो परिसर `गार्डन वडा पाव' आणि इतर बहुसंख्य दुकाने बंद असल्याने जवळजवळ निर्मनुष्य होता.

मी राहतो त्या परिसरात पुणे कॅम्पात मिळणारे खाद्यपदार्थ मिळू शकत नाही. गोव्यात पणजीला ऐन चौकात गीता बेकरीमध्ये एग्स पॅटीस मिळायचे तसे एग्स पॅटीस क्वचितच मिळतात. गोव्यात एखाद्या किरिस्तांव दुकानांत मिळणारे चमचमीत `चोरीस पाव' हा खाद्यपदार्थ इतर इतरत्र कुठेही मिळत नाही.

औरंगाबादला The  Lokmat Times ला मी असताना तिथे एस टी डेपोच्या समोर रांगेत असलेल्या हॉटेलांत दहा रुपयांना प्लेटभर बिर्याणी मिळायची ! अर्थात ही गोष्ट आहे १९८८ ची. आमचा क्राईम रिपोर्टर मुस्तफा आलममुळे मला औरंगाबादच्या आगळ्यावेगळ्या खाद्य संस्कृतीची ओळख झाली.

असले खाद्यपदार्थ त्या-त्या परिसराची एक खास ओळख बनतात. अधूनमधून अशा परिसरांना भेट देऊन जिभेचे चोचले पुरवायला हवे.



Wednesday, February 22, 2023

चार दशकांतली माझी पत्रकारिता 

वयाच्या सोळाव्या वर्षी सन्यस्त ख्रिस्ती धर्मगुरु होण्याच्या हेतूने मी माझे श्रीरामपूर येथील घरदार सोडले
वयाच्या सोळाव्या वर्षी सन्यस्त ख्रिस्ती धर्मगुरु होण्याच्या हेतूने मी माझे श्रीरामपूर येथील घरदार सोडले
आणि नंतर गोव्यात जेसुईट धर्मगुरुंच्या पूर्वसेमिनिरीत दाखल झालो . पणजीतल्या धेम्पे कॉलेजात हायर
सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर मात्र माझे जीवनध्येय बदलले आणि मी पत्रकार बनलो.   


एकदा पणजी मार्केट पाशी असलेल्या नवप्रभा या मराठी दैनिकाच्या कार्यालयात नोकरी शोधण्यासाठी

गेलो.   समोरच्या दालनात प्रवेश करुन तिथल्या बाजूच्या छोट्याशा केबिनमध्ये जाऊन नोकरीविषयी

चौकशी केली. नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकांचे वृत्तसंपादक असलेल्या एम. एम. मुदलियार यांनी माझी

जुजबी चौकशी केली आणि नोकरी मिळणे शक्य आहे असे सांगितले. गोमंतकात पाऊल ठेवण्याआधी

इंग्रजी भाषेचा गंधही नसताना चार वर्षांतच ही भाषा शिकून मी इंग्रजी दैनिकातील बातमीदार बनलो होतो.

  नवहिंद टाइम्समध्ये नऊ वर्षांच्या नोकरीत  मी क्राईम- कोर्ट, लष्कर, शिक्षण, जनरल, गोवा

मेडीकल कॉलेज अशा अनेक बीट्स सांभाळल्या. त्यानंतर औरंगाबादच्या लोकमत टाइम्स, इंडियन

एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तींत आणि सकाळ माध्यमाच्या  महाराष्ट्र हेराल्ड-सकाळ

टाइम्समध्ये सोळा  वर्षे अशी इंग्रजी भाषेतील  पत्रकारितेची चाळीस वर्षांची कारकीर्द केली.



गोव्यात कॅम्पस रिपोर्टर नात्याने मे महिन्याचा अखेरचा आठवडा माझ्या दृष्टीने अगदी तणावाचा

असायचा. या काळात काही वर्षांपूर्वीच स्थापन झालेले गोवा, दमण आणि दीव एसएससी बोर्ड दहावीचा

निकाल जाहीर करत असे. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होई. दुदैवाने एसएससी बोर्डाची ही पत्रकार परिषद मला कधीच एन्जॉय करता आली नाही. याचे कारण परीक्षेच्या निकालाची छापील प्रत हातात पडतात मला तातडीने ते हॉटेल सोडून बातमीसाठी बाहेर पडावे लागायचे.

माझ्या कॅम्पस रिपोर्टींगचा हा कालावधी होता १९८१ नंतरचा. त्याकाळात महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही

दहावीचा पूर्ण निकाल लिस्टसह सर्व दैनिके छापत असत. विद्यार्थ्यांना नंतर त्यांच्या शाळेतून मार्कशीट्स

दिली जात असत. निकालाची प्रत हातात पडल्यानंतर मेरीट लिस्टमध्ये झळकलेल्या पहिल्या दहा

विद्यार्थाना त्यावेळच्या गोवा केंद्रशासित प्रदेशातील त्यांच्या शहरांत आणि गावांत जाऊन, त्यांची मुलाखत

आणि फोटो मिळवण्याची माझी जबाबदारी होती.

त्या हॉटेलातून बाहेर पडताच आपल्या शबनम बॅगेत निकालाची प्रत टाकून मी ताबडतोब जवळचाच एक

मोटारसायकल पायलट गाठत असे. (मोटारसायकल पायलट ही प्रवासाची आगळीवेगळी सुविधा भारतात

फक्त गोव्यातच आढळते. पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या घरी जाण्यास

प्राधान्य असे, त्यानुसार म्हापसा, मडगाव, डिचोली, वॉस्को अशा ठिकाणी जायचे असे सांगून सुसाट वेगाने

आम्ही निघत असू.

गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या गावी पोहोचल्यावर पहिल्यांदा मी त्यांच्या

शाळेत जात असे, तेथून त्या विद्यार्थ्यांचा निवासी पत्ता घेतल्यानंतर त्या मुलाचा/मुलीचा फोटो शाळेच्या

दप्तरातून उचकटून घेऊन मार्गस्थ होत असे.

विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचल्यानंतर होणारा सवाल-जबाब आणि त्यानंतरची प्रतिक्रिया अगदी स्मरणीय

असे.

‘नमस्कार, मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार. गोवा दहावी परिक्षेत तू बोर्डात पहिला आला आहेस.

त्याबद्दल अभिनंदन !’

त्यानंतर त्याघरात होणारे प्रथम विस्मयाचे आणि नंतर आनंदाचे चित्कार, गडबड अनुभवण्यासारखी असे.

त्या कुटुंबात काही गोड पदार्थ खाण्याचा जाई. कॅथॉलिक कुटुंब असल्यास त्या उन्हाळ्याच्या दिवसांत

फ्रिजमधली थंडगार बीअर आणि केकचा आस्वाद घ्यावा लागे.

कालांतराने एससीसी बोर्ड परीक्षांचा पूर्ण निकाल दोन-तीन पानांत छापण्याची पद्धत सर्वच दैनिकांनी बंद

केली. आज इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जमान्यात महत्त्वाच्या सर्व परीक्षांचा निकाल तो वेबसाईटवर

अपलोड होताक्षणी कुठेही पाहणे शक्य झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच पत्रकारीतेचेही स्वरूप बदलत आहे.

१९८०च्या दशकात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) आणि युनायटेड न्युज ऑफ इंडिया (यूएनआय ) ही

दोन वृत्तसंस्था वृत्तपत्रांचे एका मोठे आधारस्तंभ असत. एखादी खूप मोठी महत्त्वाची बातमी असेल तर

टेलिप्रिंटरवर लागोपाठ बेल वाजू लागेल.  एके दिवशी सकाळी मी नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात असताना

सकाळी दहाच्या दरम्यान टेलिप्रिंटरची घंटा सारखी वाजू लागली तेव्हा मी तिकडे सहज गेलो आणि मला

धक्काच बसला. केवळ एकच वाक्य पुन्हापुन्हा टाईप करत टेलिप्रिंटरवर घंटा वाजत होती.

तो दिवस होता ३१ ऑक्टोबर १९८४ आणि ते धक्कादायक वाक्य होते : प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी शॉट

अँट ....'';

टेलिप्रिंटरच्या मशिनमधून सतत बाहेर पडणाऱ्या कागदांवरच्या बातम्या वाचायची माझी सवय खूप काळ

टिकली.  नंतर बातम्या टाईप करताना ऑफिसांतल्या टेलिव्हिजनवरील बातम्यांकडे मी लक्ष ठेवू लागलो.

`टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुण्यातल्या ऑफिसांत एका रविवारच्या संध्याकाळी टेलिव्हिजनच्याबी एका

दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले. त्या बातम्यांत मध्येच असे काय दाखवतात तेच  क्षणभर कळेना.

टेलिव्हिजन म्यूट मोडमध्ये होता, त्यानंतर तसेच आणखी एक दृश्य दाखविले गेले. आपण काय पाहतो

आहे याबाबत  स्वतःवर विश्वास न बसल्याने मी इतर पत्रकारी सहकाऱ्यांचे  त्या बातम्यांकडे लक्ष वेधले.

ती  त्या दिवसाची नव्हे तर आगामी दोन दशकांतील सर्वांत मोठी ब्रेकिंग न्यूज होती.

काही क्षणांपूर्वी अमेरिकेत न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर दहशतवाद्यांनी दोन विमाने  हायजॅक करुन

आत्मघाती हल्ला केला होता. मागच्या महिन्यातच ११ सप्टेंबर २००१ च्या या घटनेचा विसाव्या वर्षांचा

स्मृतिदिन पाळला गेला. . 

प्रादेशिक बातमीदारांसाठी त्याकाळात टेलिग्राम हे एक महत्त्वाचे साधन होते. गोव्यात मी नवहिंद टाइम्सचा

बातमीदार असताना कोल्हापुरच्या 'पुढारी' या वृत्तपत्राचा पणजी येथील स्ट्रींगर बातमीदारसुद्धा होतो.

बातम्या पाठविण्यासाठी 'पुढारी'ने मला टेलिग्राम कार्ड दिले होते. यासाठी मात्र मराठी बातम्या रोमन लिपीमध्ये लिहाव्या लागत. पोस्टात टेलिग्राम ऑपरेटर मग त्या संबंधित वृत्तपत्राला पाठवत असे.

गोव्यातून पुण्याला आल्यावर इंडियन एक्सप्रेसने सुद्धा मला टेलिग्राम कार्ड दिले होते. 'कामिल पारखे, इंडियन एक्सप्रेस (पुणे) , टेलिग्राम कार्ड एक वर्षासाठी (१९८९) ' असे लिहिलेले ते कार्ड मी अजून जपून ठेवले आहे.

काही घटना अगदी काही क्षणांच्या, मिनिटांच्या किंवा एक-दोन तासांच्याच असतात, पण कायम

आठवणीत राहतात. त्याचे कारण म्हणजे त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती.

असेच एकदा कुठल्याशा एका साहित्य संमेलनासाठी पणजीहून आम्ही काही बातमीदार कारने निघालो

होतो. बहुधा रणजित देसाई उद्घाटक असलेले म्हापसा येथील ते कोकणी साहित्य संमेलन असावे.

संमेलनासाठी पत्रकारांना घेऊन जाणाऱ्या आयोजकांनी आमच्या गाडीत एका महनीय पाहुण्यालाही घेतले

होते. ही व्यक्ती होती मानेपर्यंत रुळणारे केस असणारे आणि खांद्यावर घडी केलेली शाल टाकलेले ज्येष्ठ

कवी बा. भ. बोरकर!

‘बाकीबाब बोरकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या कवीच्या कविता आपण शाळेत शिकलो, तो कवी

आज आपल्यासोबत बसून गप्पा मारतो आहे, हे माझ्यासारख्या तरुण बातमीदारासाठी अविश्वसनीय होते.

पणजीला कंपाल येथे कला अकादमीचे भव्य, देखणे संकुल उभारले, त्यानंतर लवकरच तेथे गोवा, दमण

आणि दीव सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे एक नाट्यक्षेत्रातील लोकांसाठी चार दिवसांची कार्यशाळा

आयोजित करण्यात आली होती.  बातमीदार म्हणून मला मात्र त्या चारही दिवसांच्या कार्यशाळेला

उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आपण रंगभूमीवरील काही मोठ्या व्यक्तींबरोबर वावरत आहोत, याची

मला लगेचच जाणीव झाली होती. 

रंगभूमीवर मोठे योगदान आणि वावर असलेल्या त्या व्यक्तींपैकी केवळ एकच नाव मला तेव्हा परिचित

होते. ते म्हणजे रोहिणी हट्टंगडी. सर रिचर्ड अटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट त्या वेळी नुकताच प्रदर्शित

झाला होता. या ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबा गांधी यांची भूमिका केल्याने रोहिणी हट्टंगडी या एकदम

प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांचे पती जयदेव हट्टंगडीसुद्धा या कार्यशाळेला उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी इथे मराठी रंगभूमीवरील दादा मंडळी आहेत, हे लक्षात आले होते. त्यापैकी एक होत्या

विजया मेहता, दुसरे होते महेश एलकुंचवार. मी स्वतः त्या वेळी नुकतीच विशी ओलांडली होती आणि

रोहिणी आणि जयदेव हट्टंगडी, निळ्या जिन्सवर इन-शर्ट असणारे महेश एलकुंचवार हे लोकसुद्धा त्या

वेळी ऐन तरुणाईतच होते. मूळ गोव्याचे असलेल्या दामू केंकरे यांनी या कार्यशाळेच्या आयोजनात

महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

गोव्यात १९८३ साली राष्ट्रकुलातील ३९ देशांतील प्रमुखांची - राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान- यांची

अनौपचारिक बैठक (कॉमनवेल्थ हेडस ऑफ गव्हर्नमेंट मिटिंग - चोगम रिट्रीट) पार पाडली, तेव्हा

गोव्यातील वाहतूक नियोजनाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक (वाहतूक) किरण बेदी यांच्याकडे होती. बेदी या भारतीय पोलीस दलातील (आयपीएस) पहिल्या महिला अधिकारी. ‘नवहिंद टाइम्स’चा क्राईम रिपोर्टर म्हणून बेदी यांच्याशी त्या काळात जवळपास रोजच संबंध आला. या काळात वॉकी-टॉकीचा अवजड बॉक्स असलेल्या जिप्सी जीपमधून त्यांच्यासह मी दाबोळी विमानतळ ते आग्वाद ताज व्हिलेजपर्यंत रंगीत तालमीसाठी फिरायचो. पुढे देशभर नाव कमावलेल्या या पोलीस अधिकाऱ्याशी बातमीदार म्हणून एकेकाळी अगदी वैयक्तिक  संबंध होते, याचा आज मागे वळून पाहताना आनंद वाटतो.

अशीच गोष्ट सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याबाबाबत. गोवा सोडून पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’ला

रुजू झाल्यानंतर हजारे यांच्या राळेगण सिद्धीला अनेकदा गेलो, तेथे काही दिवस मुक्कामही केला. अण्णा

पुण्यात शनिवार पेठेतल्या राष्ट्रभाषा भवनात राहायला आल्यावर हमखास आमच्या भेटी व्हायच्या,

पत्रव्यवहारही असायचा. नंतर या भेटी विरळ होत गेल्या, गेली कित्येक वर्षे तर प्रत्यक्ष भेट किंवा

फोनवरही संभाषण नाही. मात्र राळेगण आणि हजारे यांच्याशी असलेले जुने संबंध आजही विसरलेलो नाही.

आम्हां दोघांचे कृष्णधवल, काही रंगीत फोटो आणि काही पत्रव्यवहार आजही मी जपून ठेवले आहेत. 

पुण्यातील ‘आयुका’चे संचालक असलेले डॉ. जयंत नारळीकरांची खूप वर्षांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’च्या संगीता

जैन-जहागिरदार आणि मी मुलाखत घेतली.  एक तास चाललेल्या या मुलाखतीत नारळीकर यांनी

विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज त्यांना जगातील कुठल्याही व्यक्तीचा शोधनिबंध ‘इलेक्ट्रॉनिक मेल’मुळे काही

क्षणात उपलब्ध होतो, असे म्हटले तेव्हा मला काहीच अर्थबोध झाला नव्हता. ते साल होते १९९१ आणि

सर्व क्षेत्रांत इंटरनेटचा वापर होण्यासाठी आणखी काही वर्षे जाणार होते.

त्या वेळी माझ्या अगदी डोक्यावरून गेलेल्या ‘ई-मेल’शिवाय आज कुणाचे चालू शकणार आहे का?

छापलेल्या मुलाखतीची वृत्तपत्रांतील कात्रणे मी डॉ. नारळीकरांना एक छोटेशा पत्रासह पोस्टाने पाठवली,

तेव्हा उलटटपाली मला पाठवलेल्या माझ्या त्याच टाईप केलेल्या पत्रावर नारळीकरांनी दोन ओळींत

धन्यवाद दिले होते. नारळीकरांच्या स्वाक्षरीचा तो ३० वर्षांपूर्वीचा तो कागद आजही माझ्या संग्रही आहे.

काही महिन्यांपूर्वी डॉ. नारळीकरांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याची बातमी

ऐकली, तेव्हा त्या भेटीची चित्रफित नजरेसमोर झळकली.

शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेत म्हणून बीबीसीचे दिल्लीतील वार्ताहर पुण्यात आले आहेत.

उद्या पुणे आणि बारामतीच्या लोकसभा निवडणूक मतदानाच्या बातम्या ते देणार आहेत. त्यांना एक

स्थानिक बातमीदार मदतीला हवाय. तुला हे काम करायला आवडेल काय?

पुण्यातील इंडियन एक्सप्रेसचे वार्ताहर नरेन करुणाकरन याने मला विचारले आणि मी ताबडतोब होकार

दिला. बीबीसीचे दिल्लीतील प्रतिनिधी सॅम मिलर यांच्या पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील

निवडणुकीच्या वृत्तसंकलनाच्या कामात असा मी सहभागी झालो.

ही घटना जून १९९१ मधली आहे. दिनांक २० मेला लोकसभा निवडणुकांच्या मतदानाच्या पहिल्या फेरीतील

मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीव गांधींची हत्या झाली होती. राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसचे

अध्यक्षपद रिते झाले आणि या पक्षाला पंतप्रधानपदासाठीही उमेदवार राहिला नाही.  राजकारणातून निवृत्ती

जाहीर केलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. व्ही. नरसिंह राव अचानक काँग्रेसचे अध्यक्षच बनले. त्याकाळात

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते काँग्रेसला सत्ता मिळाल्यास आपण पंतप्रधानपदासाठी उमेदवार असू

शकतो हे पवारांनी जाहीर केले होते. त्यामुळे शरद पवारांवर संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रित झाले होते.

बारामतीत आम्हा पत्रकारांशी बोलणे संपवून शरद पवार आपल्या गाडीकडे वळणार तोच सॅम मिलर आणि आमच्याबरोबर असणाऱ्या काही पत्रकारांनी त्यांना इंग्रजीत मुलाखत देण्याची विनंती केली. बीबीसी आणि राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींकडून ही विनंती आल्यावर पवारांनी क्षणभरच विचार केला.

''मी पुण्यातून दुपारच्या विमानाने दिल्लीला जात आहे, त्यामुळे घाईत आहे. तुम्ही असे करा, तुम्ही माझ्या गाडीतच बसा. लोहगाव विमानतळापर्यंत माझ्याबरोबर या. प्रवासात आपल्याला बोलता येईल

आणि माझे विमानही चुकणार नाही.' पवार यांनी सुचविले.

हे ऐकताच आम्ही त्यांच्या गाडीच्या दिशेने अक्षरश: झेपावलोच.

पवार स्वतः: गाडीत पुढे ड्रायव्हरशेजारी बसले. त्यांचा स्टेनगनधारी बॉडीगार्ड ड्रायव्हरच्या सिटमागे बसला

होता. मी स्वत: पवारांच्या मागे, माझ्याशेजारी सॅम आणि पुण्याच्या इंडियन एक्सप्रेसचे नरेन करुणाकरण

बसले होते. मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसण्याचा असा योग्य क्वचित कुणाला लाभतो.

बारामती ते लोहेगाव विमानतळापर्यंत प्रवास करत पवार यांची मुलाखत घेण्याची  संधी मिळाली. त्यानंतर

पवार यांची विस्तृत मुलाखत मी माझ्या पोर्टबल टाईपरायटरवर टाईप केली आणि पोस्टाने गोव्यात

पणजीला `नवहिंद टाइम्स’ला पाठवून दिली. मुलाखतीच्या घटनेनंतर सहासात दिवसांनी ही मुलाखत 

माझ्या बायलाईन म्हणजे नावानिशी पान एकवर आठ कलमांत प्रसिद्ध झाली. इतक्या दिवसांच्या

उशिरानेसुद्धा त्या मुलाखतीचे बातमीमूल्य संपले नव्हते.  

आज वृत्तपत्रांकडे कुठलीही बातमी, पत्र किंवा लेख  पाठविण्यासाठी पोस्टाच्या सेवेची गरज भासत नाही. ईमेलच्या मदतीने काही क्षणात हा मजकूर हव्या त्या वृत्तपत्रांत आणि योग्य व्यक्तींकडे पाठवता येतो, याबद्दल माझ्यासारख्या व्यक्तीला अजूनही नवल वाटते. 

प्रिन्स  चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न ठरले, तेव्हाच ते विसाव्या शतकातील सर्वांत मोठे शाही,

सेलेब्रिटी लग्न असेल असे म्हटले जात असे.  दिनांक २९ जुलै १९८१ला पार पडलेला हा शाही विवाह त्या

काळात सर्वाधिक लोकांनी टेलिव्हिजनवर पाहिलेली घटना होती.

जगभर लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलेली या घटनेचा वृत्तांत देण्याबाबत पणजी येथे 'नवहिंद

टाइम्स'मधील आमच्या संपादकांनी मोठी व्यूहरचना केली होती. लग्नाची बातमी पीटीआय वगैरे

वृत्तसंस्थांकडून ताबडतोब मिळणे शक्य होते. मात्र छायाचित्रांच्या बाबतीत तसे नव्हते.

१९८०च्या दशकाच्या सुरुवातीस  लंडन येथील या शाही विवाहसोहळ्याची छायाचित्रे त्याच दिवशी भारतात

मिळणे अशक्यच होते.

जवळपास कुठे टेलिव्हिजन टॉवर्स नसल्याने गोव्यात टेलिव्हिजनचे कार्यक्रम पाहता येत नसे. असे असले

तरी 'द नवहिंद टाइम्स'चे संपादक बिक्रम व्होरा हे मिरामार येथील आपल्या बंगल्यात  गोव्यात

टेलिव्हिजन सुविधा असणाऱ्या अगदी मोजक्या व्यक्तींमध्ये होते.

गोव्यात असलेल्या या दुर्मिळ सुविधेचा वापर करून या लग्नाचे छायाचित्र वापरण्याचे संपादक व्होरांनी

ठरविले होते. त्यानुसार लग्नाच्या तारखेच्या आधी काही दिवस फोटोग्राफर संदिप नायक याने संपादकांच्या

घरी जाऊन रंगीत तालीम घेतली.

लग्नाच्या दिवशी संध्याकाळी  त्या शाही लग्नाच्या बातम्या आणि चित्रे दाखविली जाऊ लागली तसे

संदिप कॅमेराची बटणे खटाखट दाबू लागला. लग्नाचे व्हिजुल्स  संपेपर्यंत संदिप तणावाने घामाघूम झाला

होता.

त्यानंतर . एक तासानंतर संदिप फोटोंच्या प्रिन्टस घेऊन आला तेव्हा एकदम खुशीत होता. संपादकांनी

त्यापैकी एका फोटोची छापण्यासाठी निवड केली.

दुसऱ्या दिवशीच्या नवहिंद टाइम्सच्या पान एकवर लग्नाच्या बातमीसह तो फोटो प्रसिद्ध झाला  आणि

फोटो कॅप्शनवर दूरदर्शन फोटो संदिप नाईक यांचा' अशी बायलाइनही होती !

त्याकाळात द नवहिंद टाइम्स हे गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक होते. दुसऱ्या दिवशी गोव्यातील सर्वच

मराठी वृत्तपत्रांनीं चार्ल्स-डायनाच्या लग्नाची बातमी छापली पण त्या लग्नाचा फोटो केवळ नवहिंद

टाइम्सकडेच होता !

नोव्हेंबर १९८९च्या निवडणुकीनंतर सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काही महिन्यानंतर राजीव गांधी यांनी

पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत मी हजर होतो. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वतीने मीही माझा प्रश्न

वाचला होता आणि त्यास राजीव यांनी उत्तर दिले होते.

पत्रकार परिषदेनंतर राजीव गांधी हॉलच्या दरवाज्यापाशी उभे राहिले आणि आम्हा प्रत्येक बातमीदारांशी

हस्तांदोलन केले. सफेद कपडे आणि गळ्याभोवती उपरणे असलेल्या राजीव गांधींशी हस्तांदोलन करताना

‘कामिल पारखे फ्रॉम इंडियन एक्सप्रेस’ अशी मी स्वतःची ओळख करून दिली, तेव्हा मंद स्मितहास्य

करणाऱ्या राजीव यांचा चेहरा आजही माझ्या नजरेसमोर ताजातवाना राहतो.

पंतप्रधानांबरोबर अर्धा तास बोलत बसण्याची एक संधी मला अचानक मिळाली.  त्याची कथा अशी :  


 “पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग आज दुपारी बारा वाजता पुणे विमानतळावर काही वेळ थांबणार आहेत.

त्यांना भेटायचं असेल तर पत्रकारांसाठी वाहन व्यवस्था व्यवस्था केली आहे.!” एका सकाळी हा निरोप

मला मिळाला. त्या वेळी म्हणजे १९९० मध्ये मोबाइल फोन नव्हते.

इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसात हा निरोप मिळाल्यानंतर मी ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलो.

माझ्याबरोबर बातमीदार मुकुंद संगोराम होते. पण ठरलेल्या जागी प्रेस इन्फॉरर्मेशन ब्युरो (पीआयबी)चे

कुणीही अधिकारी नव्हते. थोडा वेळ वाट पाहून संगोराम यांच्या दुचाकीनेच विमानतळावर आम्ही पोहोचलो.

पत्रकार म्हणून आम्हाला लगेच तेथील व्हीआयपी कक्षाकडे नेण्यात आलं  आणि मला आश्चर्याचा धक्काच

बसला. त्या अत्यंत छोट्याशा काचेच्या कक्षात दोनच व्यक्ती बसल्या होत्या. पंतप्रधान विश्वनाथ प्रताप

सिंग आणि जनता दलाच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा मृणाल गोरे !

त्यावेळी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी हवाई दलाच्या खास विमानानं दिल्लीहून पुण्याला येण्यास नकार

दिला होता.. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या एका लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत

जनता दलाच्या प्रचारासाठी पंतप्रधान सिंग आले होते आणि हा निवडणूक प्रचार दौरा, हे पक्षाचं काम

असल्यानं त्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्यास सिंग यांनी नकार दिला होता.

पंतप्रधान सिंग आणि मृणालताई गोरेंसमोर आम्ही दोघं बसलो. त्या कक्षात पंतप्रधानांचे कुणीही सचिव,

शासकीय अधिकारी वा शरीररक्षकही नव्हते. त्या दृष्टीनं ही एक अभूतपूर्ण प्रेस कॉन्फरन्स म्हणावी

लागेल! असा अनुभव एखाद्या पत्रकारास क्वचितच आला असेल असं मला वाटतं. यापुढे तर असा प्रसंग

कधीही येणार नाही, असं आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आणि सुरक्षेच्या समस्येच्या

कारणामुळे वाटतं. 

१९८०च्या दशकापर्यंत केवळ अतिश्रीमंत लोकांकडे आणि वरच्या हुद्द्याच्या सरकारी अधिकाऱ्यांकडे

लँडलाईन टेलिफोन असायचे. पत्रकार वगैरेंना खास बाब म्हणून टेलिफोन दिले जायचे.  गोव्यात आमच्या

नवहिंद टाइम्समध्ये केवळ म्हापसा, मडगाव आणि वॉस्को शहरांत स्ट्रिंगर बातमीदार होते, त्यांच्याशी

आणि पणजीबाहेरील पोलीस आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बोलण्याची गरज असे. .

त्याकाळात एसटीडी (म्हणजे सबस्क्रायबर ट्रँक डायलिन्ग) सुविधा नसल्यास  बीएसएनलच्या ऑपरेटरशी

बोलून ऑर्डीनरी, अर्जंट किंवा  लायटनिंग कॉल बुक करावा लागे. ऑर्डिनरी कॉल कधी लागेल याची खात्री

नसायची, लायटनिंग कॉल खूप महाग असायचा, मात्र नोंद होताक्षणी बोलणे शक्य असायचे.     

पुण्यात मी इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हाची गोष्ट. त्याकाळात म्हणजे १९८९ साली नव्यानेच सुरु

झालेल्या `इंडियन एक्सप्रेस’ आणि `लोकसत्ता’च्या पुणे आवृतींचे  बातमीदार पुण्यात तर डेस्कचा स्टाफ

मुंबईत असायचा. आमच्या इंग्रजीतल्या बातम्या टेलिप्रिंटरमार्फत मुंबईला पाठवल्या जायच्या. मात्र

मुंबईतल्या डेस्कवरच्या आणि इतर लोकांशी संभाषण करण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्रणा होती, ती

म्हणजे हॉटलाईन. लॅण्डलाइनसारखेच असणारे ते उपकरण उचलले कि तिकडे मुंबईत घंटी वाजायची आणि

कुणीतरी तिकडे ते उपकरण उचलले तर लगेच संभाषण व्हायचे.


मोबाईलचा जमाना येण्याच्या दोन दशके आधीची ही सुविधा, त्यामुळे या हॉटलाईनचे खूपच अप्रूप

वाटायचे. त्याआधी पाचसहा वर्षे आधी गोव्यात कॉमनवेल्थ राष्ट्रप्रमुखांची फोर्ट आग्वाद येथे शिखरपरिषद

झाली तेव्हा ताज कॉटेजमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी, ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट  थॅचर,ऑस्ट्रेलियाचे

पंतप्रधान रॉबर्ट (बॉब) हॉक  वगैरेसाठी त्यांच्या सुसज्ज कॉटेजेसमध्ये त्यांच्या-त्यांच्या देशांशी संपर्क

साधणारी हॉटलाईन्स नावाच्या संपर्काच्या अत्याधुनिक यंत्रणा देण्यात आल्या होत्या हे बातमीदार या

नात्याने केवळ ऐकून होते, इंडियन एक्सप्रेसमध्ये आता हॉटलाईन म्हणजे नक्की काय, ती कशी

वापरायची याचे प्रात्यक्षिक मिळाले. 

गोव्यात टेलिव्हिजनचे युग यायला तसा उशीरच लागला. मुंबईतल्या टेलिव्हिजन टॉवर आल्यानंतर काही

काळानंतर पणजीत अल्तिन्हो येथे टेलिव्हिजन टॉवर उभारला गेला आणि आम्ही पहिल्यांदाच ब्लँक अँड

व्हाईट का होईना पण टेलीव्हिजनच्या पडद्यावर वर धावती चित्रे पाहू लागलो. त्याकाळात नवहिंद

टाइम्सचे फोटोजर्नालिस्ट असलेले सुनील नाईक हे मुंबई दूरदर्शनसाठी व्हिडीओजर्नालिस्ट (आधुनिक

तंत्रज्ञान, त्यानुसार नवे पद !) म्हणूनही काम करत असत. खांद्यावर एक छोटासा कॅमेरा खांद्यावर घेऊन

नाईक एखाद्या कार्यक्रमाची शूटींग करत असत, त्यावेळी त्या कॅमेरातून घर्रघर्र असा आवाज येत असे.

शूटींग काही सेकंदांचेच असायचे.

अनेकदा नाईक प्रेसकक्षात बसलेल्या आम्हा लोकांवरूनसुद्धा कॅमेरा फिरवत असत. दुसऱ्या दिवशी त्या

शुटिंगचे रील्स विमानाने मुंबई दूरदर्शनच्या कार्यालयात पाठविले जाई आणि संध्याकाळच्या सात

वाजताच्या प्रादेशिक बातम्यांत त्या कार्यक्रमाची झलक दिसायची, क्वचित त्यात आमचीही छबी

झळकायची. विशेष म्हणजे त्याकाळात खासगी टेलिव्हिजन चॅनेल्स किंवा न्यूज चॅनेल्सही नव्हते आणि

राष्ट्रीय व प्रादेशिक बातम्या दिवसातून  एकदोनदाच दाखविल्या  जायच्या !

१९८६ साली मला पत्रकारितेच्या सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी रशिया,-बल्गेरिया येथे

जाण्याची संधी मिळाली होती.  परत येताना मी दोन अत्यंत मूल्यवान वस्तू घेऊन आलो होतो. या वस्तू

म्हणजे अडीच किलो वजनाचा एक नाजुकसा आकर्षक पोर्टेबल टाईपरायटर आणि एक कॅमेरा. त्याकाळात

पत्रकारितेत उपयुक्त ठरणाऱ्या या दोन वस्तू असणारा गोव्यातील मी एकमेव बातमीदार होतो ! याच

काळात कृष्णधवल फोटोग्राफी मागे पडून रंगीत फोटोग्राफी सुरु झाली.

१९८०च्या दशकाअखेरीस दैनिकांनी आपला कृष्णधवल रंग बदलून रविवारच्या पुरवण्यांसाठी रंगीत पाने 

देण्यास सुरुवात केली. मी १९८८ ला औरंगाबादला `लोकमत टाइम्स’ला रुजू झालो तेव्हा `लोकमत’च्या

रविवार पुरवण्यांची सर्व रंगीत पाने मुंबईत तयार होऊन छपाईसाठी दोनतीन दिवस आधी औरंगाबादला

येत असत. या वृत्तपत्र समूहात औरंगाबादला रंगीत पानांसाठी मोठे महागडे स्कॅनर मशिन आणले गेले,

तेव्हाचा जल्लोष आणि कौतुकाचे वातावरण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. 

एखाद्या पत्रकार परिषदेतून,  राजकिय किंवा इतर कार्यक्रमांनंतर दैनिकाच्या कार्यालयाकडे परतताना त्या

बातमीची लीड किंवा इंट्रॉ काय करावा असा विचार मनात घोळत असे. हल्ली मोठी किंवा लहान बातमी

हाती पडली कि लगेच मोबाईलवर ऑनलाईन आवृत्तीसाठी एकदोन वाक्यांची बातमी पाठवली जाते,

बातमीदार ऑफिसांत पोहोचेपर्यंत त्या बातम्या कधीच वेबसाईटवर अपलोडसुद्धा झालेल्या असतात.  

टेलिव्हिजनच्या आउट ब्रॉडकास्टिंग व्हॅन्समुळे (ओबीव्ही ) घटना किंवा कार्यक्रम होत असताना थेट लाईव्ह

प्रक्षेपण आता केले जाते याचे आता आपलयाला नाविण्य वाटत नाही इतकी तंत्रज्ञानाच्या बाबतीत

मानवाने मोठी मजल मारली आहे.

दहा वर्षांपूर्वी जॅकलिन आणि आमची मुलगी आदिती यांच्यासह युरोपमध्ये सहलीवर असताना तेथे

प्रवासवर्णन लिहिण्याची उबळ मला स्वस्थ बसू देईना. आम्ही राहत होतो त्या हॉटेलांत लॉबीमध्ये

पाहुण्यांना मोफत इंटरनेट सुविधा असायचे किंवा तासाला एक युरो फी असायची. तीन आठवड्यांच्या त्या

सुट्टीत मी तीनचार लेख लिहिले आणि ईमेलने पुण्याला `सकाळ टाइम्स’ला पाठवून दिले. तिसऱ्या  किंवा

चौथ्या दिवशी हे लेख प्रसिद्ध व्हायचे, ते आमच्या दैनिकाच्या वेबसाईटवर, ईपेपरवर मला युरोपमध्ये

पॅरीस, रोम आणि व्हेनिस या शहरांत दिसायचे, ते पाहून खूप आनंद व्हायचा, वेगाने प्रगत होणाऱ्या

तंत्रज्ञानाविषयी कौतुक वाटायचे.     `

फेब्रुवारी २०१७ ला म्हणजे थायलंडमध्ये दहा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय पत्रकार दौऱ्यात भारताचा आणि

`सकाळ टाइम्स’चा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी झालो. `सकाळ’ समूहाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या

निवृत्त होण्याच्या केवळ सहा महिने आधी हा दौरा पार पडाला. जगभरातून सत्तरच्या आसपास पत्रकार

असलेल्या त्या परीषदेत माझ्यासह भारताचे फक्त सहा प्रतिनिधी होते.

`कामिल पारखे, सकाळ टाइम्स, पुणे, इंडिया' असे छापलेले माझे ते गळ्यात अडकवण्याचे ओळखपत्र मी

आजही जपून ठेवले आहे. 

पत्रकारितेमधला माझा अनुभव चाळीस वर्षांचा. इतकी वर्षे सहसा कुणी नोकरीत नसतात, पण मी वयाच्या

एकविसाव्या वर्षीच पणजीला कामाला लागलो होतो.

कोरोना साथीने थैमान मांडले तेव्हा एप्रिल २०२० ला सकाळ टाइम्स बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने

घेतला. त्या दिवशी पिंपरी चिंचवडच्या `सकाळ’च्या ऑफिसात जाऊन `pcamil’ या नावाने लॉग इन केले.

डेस्क टॉपवर असलेला माझा वैयक्तिक मराठी आणि इंग्रजी मजकूर, लेख, वगैरे स्वतःला मेल केला, काही

मजकूर आणि फोटो पेन ड्राईव्हवर सेव्ह करुन मग तिथले सर्व डिलीट केले. डेस्कमधील सगळ्या

ड्रॉवर्सतील पुस्तके वगैरे बॅगांत भरल्या. त्या जवळजवळ नव्या, वातानुकूलित ऑफिसमध्ये या टोकापासून

त्या टोकापर्यंत, मधल्या त्या माझ्या आवडत्या टिव्हीसेटकडे, स्वतःच्या खुर्चीवरुन एकदाचे भरभरुन पाहून

घेतले.

पुन्हा एकदा आता कोऱ्या झालेल्या डेस्कटॉपवर अखेरची नजर टाकली आणि `pcamil’ या सकाळ

माध्यमसमूहातील एका व्यक्तीला कायमसाठी लॉगआऊट केले.

पत्रकारितेच्या मासिक पगारी नोकरीतील `दि एन्ड’ अखेरीस असा अवचित आला होता, खूप खूप अनुभवले

होते या व्यवसायात. आनंदी आठवणीच जास्त. अपेक्षाही केली नव्हती असे खूप काही !
ओ, व्हॉट अ फिलिंग !  
मात्र खंत, खेद ठेवण्यासारखे प्रसंग तसे मला या क्षणाला मुळी आठवतच नव्हते..


Wednesday, November 2, 2022

धर्मांतर कशासाठी ? आत्मसन्मानासाठी कि विद्रोहासाठी ?  



अलीकडच्या काळात धर्मांतर हा कायद्याच्या दृष्टीने फार मोठा गंभीर गुन्हा केला गेला असला आणि धर्मांतर (धाकटपटश्यानं, आमिषानं वगैरे वगैरे .) घडवून आणणाऱ्या व्यक्तीला मोठी शिक्षा होत असली तरी मानवी इतिहासात शतकोनुशतको धर्मांतरे होत आली आहेत. अव्वल इंग्रजी अमदानीत देशभर भल्याभल्या लोकांना ख्रिस्ती धर्माने आकर्षित केलं होतं. धर्मांतरांची कारणं मात्र व्यक्तिगणिक आणि समाजागणिक वेगवेगळी होती. पंडिता रमाबाई आणि नारायण वामन टिळक अशा संस्कृत पंडितांनी ख्रिस्ती धर्म कवटाळला त्यामागची कारणं वेगळी आणि समाजातील बहिष्कृत घटकांनी हा धर्म सामुदायिकरीत्या स्वीकारला यामागची कारणं पूर्णतः वेगळी होती.
केरळमधल्या नाडर समाजाने ख्रिस्ती धर्म का स्वीकारला यामागच्या सामाजिक कारणांची समाजमाध्यमात चर्चा झाली. थोड्याबहुत अशाच कारणांनी महाराष्ट्रात आणि देशातील इतर प्रदेशांत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथे जर्मन जेसुईट फादर ओटो वाईसहौप्ट हे हातात घंटी घेऊन गावातल्या मुलांना आपल्या शाळेत शिकण्यासाठी बोलावत असत. काळ होता १८९२चा. विशेष म्हणजे ही शाळा समाजातल्या सगळ्या घटकातील मुलांमुलींसाठी खुली होती, महार, मांग, चांभार आणि धनगर यांच्यासाठीसुद्धा !
असाच प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात फ्रेंच धर्मगुरु फ्रांसलियन फादर गुरियन जाकियर यांच्या घोगरगावच्या आणि आजूबाजूंच्या शाळांत होता. संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात त्याकाळात हजारो कुटुंबांनी सामुदायिकरीत्या ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला याबद्दल मग आश्चर्य कसले ?
पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात, मराठवाड्याच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत एकोणिसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात सामुदायिक धर्मांतरे झाली. त्यामागे केवळ आध्यात्मिक प्रेरणा होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पंडिता रमाबाई, रेव्ह्. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक, रेव्ह. नीळकंठशास्त्री नेहेम्या गोर्हे, बाबा पदमनजी वगैरे सुशिक्षित व्यक्तींच्या धर्मांतरात अध्यात्मिक परिवर्तन घडले हे नि:संशय. अस्पृश्य जातीजमातींच्या सामुदायिक धर्मांतराबाबत मात्र असे म्हणता येणार नाही.
ज्या लोकांच्या वैयक्तिक वा सामाजिक जीवनात देव-धर्म, देऊळ, धर्मग्रंथ या संकल्पनांना कधीही प्रवेश नव्हता, अशा समाजातून वाळीत टाकलेल्या लोकांनी ख्रिस्ती धर्माचे अध्यात्म आधी समजून घेऊन नंतर हा धर्म स्वीकारला असे म्हणणे वास्तव्यास धरून होणार नाही.
धर्मांतरे का होतात? आपल्या वाडवडिलांपासून आलेला धर्म सोडून दुसरा धर्म कवटाळण्याची पाळी एखाद्या व्यक्तीवर वा समाजावर का येते? व्यक्तीगत धर्मांतर अर्थातच पूर्णत: त्या व्यक्तीशी संबंधीत असलेल्या मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. मात्र जेव्हा एखादा मोठा समूह आपला धर्म सोडून दुसर्या धर्मात जातो, त्यावेळी या धर्मांतरामागची कारणे समजून घेणे आवश्यक ठरते. .
धर्मांतरामागची कारणे आणि प्रेरणा यांचे अविनाश डोळस यांनी पुढील शब्दांत विश्लेषण केले आहे.
“धर्मांतर हा आपल्या देशातील एक युगा-युगापासून चालत आलेला प्रयोग आहे. हिंदू धर्माच्या जाचाला कंटाळून आपल्या उध्दारासाठी अनेकांनी धर्मांतर केले आहे. मुस्लिम राजवटीत अस्पृश्यांतील बहुसंख्य लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारून समतेकडे धाव घेतली. त्याचप्रमाणे ब्रिटिश राजवटीत अनेकांनी जातीव्यवस्थेने दिलेले नीचपण झुगारून त्यातून मुक्त होण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. अनेक आदिवासी लोकांनीही शिक्षणासाठी, आपुलकीच्या मिळणार्या वागणुकीसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. मिशनरी लोकांनी उपेक्षित, गरीब लोकांसाठी डोंगरदर्यात शाळांची स्थापना करून त्यांच्यापर्यंत शिक्षण नेऊन एक ऐतिहासिक कार्य केले आहे. या सार्यांचा परिणाम म्हणून भारतात अधिकाधिक दलित, आदिवासी मंडळी ख्रिस्ती झाली आहेत. ” 1
दुसर्या एका लेखात डोळस यांनी असे म्हटले आहे: ”वेगवेगळ्या राजवटीतील धर्मांतराचा संदर्भ बदलला तरी त्यामागील धर्मांतरितांची भावना एकसारखीच राहत आली आहे. जातिव्यवस्था, अस्पृश्यता, शूद्र या जोखंडातून मुक्त होण्यासाठी लोकांनी धर्मांतरे केली. कधी ते मुस्लीम झाले, कधी ते ख्रिश्चन झाले. नंतर डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. समतेची शिकवण व वागणूक जेथे मिळेल त्या धर्माला आपलेसे करून या लोकांनी प्रस्थापित धर्माविरुध्दचा आपला निषेध नोंदविला आहे.”2
महाराष्ट्रातील वा इतर कुठल्याही ठिकाणी सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे अद्यात्मिक परिवर्तनाने झाली असा दावा खुद्द ख्रिस्ती धर्मगुरू किंवा चर्चही करत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील प्रेषितकार्याचा इतिहास लिहिणार्या फादर डॉ ख्रिस्तोफर शेळके यांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे:
”कॅथोलिक श्रध्देचा निरनिराळ्या भागात कसा प्रारंभ झाला हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. क्वचित प्रसंगीच अध्यात्म्याने सुरूवात झालेली दिसते असे खुद्द पवित्र शुभसंदेशातही आपल्याला दुसरं दिसत नाही. लोक येशूच्या भोवती गर्दी करू लागले. कारण त्याने आजार्यांना बरे केले, मेलेल्यांना पुन्हा उठविले, अशुध्दांना त्याने शुध्द केले आणि भाकरी वाढविल्या. लोकांचा जमाव त्याच्याकडे आल्यानंतरच त्याने त्यांचे लक्ष शाश्वत मुल्यांकडे ओढून घेतले. ”तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवता म्हणून तुम्ही माझ्याकडे आला असे नाही, तर मी तुम्हांला भाकर दिली म्हणून तुम्ही आलात.” त्यानंतरच मग येशू अध्यात्म्याकडे वळून ’नश्वर अन्नासाठी झटू नका. त्याऐवजी चिरकालीन अन्नासाठी प्रयत्न करा’ असे त्या लोकांना सांगतो.”3 ख्रिस्ती मिशनरींनी सर्वप्रथम भुकेल्या लोकांची भूक भागविली, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले आणि नंतरच ते अध्यात्म्याकडे वळाले. ’आधी पोटोबा, मग विठोबा’ अशी म्हण या भागात प्रचलित आहे. ती म्हण या मिशनरी लोकांनी आपल्या प्रेषितकार्यात प्रत्यक्षात उतरविली.
धर्मांतरामागची कारणमीमांसा स्पष्ट करताना एकोणिसाव्या शतकात सामाजिक अन्यायाचे, छळवणुकीचे बळी ठरलेल्या दलित समाजाच्या दृष्टीने ख्रिस्ती मिशनरी देवदूतच ठरले असे नाशिकच्या फिलोमिना बागूल यांनी म्हटले आहे.
त्या म्हणतात: ” मिशनरींनी आम्हाला ख्रिस्ताबरोबर ऐहिक सुखाचा मार्ग दाखविला. दोन हजार वर्षापुर्वी प्रभू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, मिशनरींनीही आमच्यासाठी अनेक चमत्कार केले. त्यानी प्रतिकूल परिस्थितीत केलेले कार्य कोणत्याही चमत्कारापेक्षा क़मी नव्हते. प्रभू ख्रिस्ताने लोकांना जेवण देऊन तृप्त केले. त्याचप्रमाणे मिशनरींनी अनेकांना अन्न देऊन तृप्त केले. प्रभू ख्रिस्ताने अंधांना दृष्टी दिली,त्याचप्रमाणे मिशनरींनी ज्ञान देऊन आम्हाला नवदृष्टी दिली. प्रभू ख्रिस्ताने मुक्यांना वाचा दिली, त्याचप्रमाणे मिशनरींनी हजारो वर्षे वाचा बंद असलेल्या आम्हाला वाचा दिली. ख्रिस्ताने दुखणाइतांना बरे केले, तद्वत मिशनरींनी औषधोपचारांनी रोग्यांना बरे केले. प्रभू ख्रिस्ताने मेलेल्यांना जिवंत केले. मिशनरींनी मृत्युपंथास टेकलेल्यांना जीवदान दिले. मिशनरींचे हे कार्य आमच्यासाठी एकाएका मोठ्या चमत्काराप्रमाणेच होते. मिशनरींनी आम्हाला क़ाय दिले नाही? त्यांनी आम्हाला विश्वास दिला, प्रेम दिले, धर्म दिला, भाकर दिली, आत्मविश्वास दिला, स्वाभिमान दिला, आत्मसन्मान दिला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उच्चवर्णिर्याच्या गुलामगिरीतून मुक्त करुन आमचा कोंडलेला श्वास मुक्त केला.”4
उच्चवर्णियांनी पायंदळी तुडवलेल्या, रोजची भाकरी मिळवण्यासाठी धडपडणार्या अस्पृश्य लोकांना परदेशी मिशनरींनी मायेने जवळ केले. दुष्काळाच्या आणि दोन महायुध्दांच्या काळात आणि इतरही वेळी अन्नपाणी, कपडालत्ता पुरवला. गावाच्या वेशीबाहेर हाकललेल्या या दलित लोकांच्या दृष्टीने तर हे मिशनरी देवदूतच ठरले. या मिशनरींनी दाखवलेल्या देवाचा, धर्माचा आणि ग्रंथाचा त्यांनी कुठल्याही शंकाकुशंका न काढता स्वीकार केला. अशाप्रकारे अनेक गावांतील सर्वच्या सर्व महार वा मांग कुटुंबे काही वर्षांच्या काळात ख्रिस्ती झाली.
गोव्यात ज्या पध्दतीने धर्मांतर झाले तसे महाराष्ट्रात झाले नाही असे अनुपमा उजगरे यांनी म्हटले आहे. ” कोणी बाप्तिस्मा द्या म्हटलं तर मिशनरी त्याला आतून पारखून घेत. तसंच, बाहेर काही काळंबेरं तर नाही ना हेही तपासून बघत. जातिभेदाच्या छळापायी जीव मेटाकुटीला आलेल्या तळागाळातल्यांना, मिशनरींनी देऊ केलेल्या जीवनस्तराचा मोह झाला. त्यामुळे सामूहिक धर्मांतरंही झाली.’‘5
’कॅथोलिक मिशनरींकडे लोक प्रथम वळले ते धर्म भावना मनात ठेवून नव्हे’ असे पुण्यातील सेंट विन्सेंट स्कूलचे माजी प्राचार्य फादर केनेथ मिस्किटा आणि फादर थॉमस साळवे यांनीही ’जेसुईट 2005’ या वार्षिक अंकात स्पष्ट म्हटले आहे.
मिशनरींकडे वळण्याचा त्यांचा हेतू पोटापाण्याचा व सामाजिक मानसन्मान हा होता असे या धर्मगुरूंनी म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे ऐहिक आणि सामाजिक प्रश्न हाताळण्याचा मिशनरींनी प्रयत्न केला. अहमदनगर हा कायमचा दुष्काळी जिल्हा. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेसाठी मिझरियोर, कारितास, सीआरएस यासारख्या सेवाभावी संस्थांच्या मदतीने मिशनरींनी विहिरी खोदण्यास, पंप आणि बियाणे खरिदण्यास स्थानिक लोकांना मदत केली. सामाजिक आणि धार्मिक कामांची गल्लत होऊ नये, आध्यात्मिक बाबींकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून सामाजिक कामांसाठी प्रथम श्रीरामपूर येथे आणि नंतर अहमदनगर येथे सोशल सेंटरची स्थापना करण्यात आली.
लोकांच्या गरजा भागवून, त्यांच्याविषयी आस्था दाखवून जर्मन आणि एतद्देशीय येशूसंघीय व्रतस्थांनी येथील लोकांची श्रध्दा जोपासली. ’प्रारंभी शाळेसाठी एकही विद्यार्थी मिळत नसे. पण आज नगर जिल्ह्यातील येशूसंघीयांच्या व धर्मप्रांतियांच्या शाळात हजारो काथोलिक व अख्रिस्ती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.पहिल्या महायुध्दाच्या सुरुवातीस नगर जिल्ह्यात 10,000 ख्रिस्ती होते व फक्त चार मिशन स्टेशन होती. आज वीस मिशन स्टेशन आहेत व 60,000 ख्रिस्ती लोकांची व अख्रिस्ती जनतेची आध्यात्मिक व ऐहिक गरज भागविली जाते,” असे फादर मिस्किटा आणि साळवे यांनी या लेखात म्हटले आहे.6
धर्मांतरामागची कारणे काहीही असोत, ही सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक मोठी सामाजिक क्रांती होती. प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्दचा तो एक मोठा विद्रोह होता. त्यावेळच्या अन्याय्य स्थितीतून सुटका करून घेण्याचा धर्मांतर एक मार्ग होता.
विशेष म्हणजे या दलितांना मुक्तीचा हा मार्ग दाखविणारा त्यांच्यामध्ये कुणीही मोझेस नव्हता. एका गावात एक धर्मांतर झाले आणि त्या धर्मांतराचे ऐहिक, सामाजिक आणि आर्थिकही फायदे त्याच्या नातेवाईकांना, भाऊबंदांना लक्षात आले आणि त्यांनीही तोच मार्ग पत्करला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतराची ही लाट महाराष्ट्रात वर नमूद केलेल्या जिल्ह्यांत चालू राहिली.
खेड्यापाड्यांत, आडवळणाच्या छोट्याशा वस्तींवर अहिंसेच्या मार्गाने अगदी संथपणे झालेल्या या क्रांतीची त्यावेळच्या उ?वर्णियांनी साधी दखलही घेतली नाही. या सामाजिक क्रांतीमागची बहुविविध कारणे, त्याचा समाजाच्या इतर घटकांवर झालेला परिणाम आणि वरच्या जातींच्या अरेरावीस आणि सर्वच क्षेत्रांतील मक्तेदारीस अनेक शतकांनंतर पहिल्यांदाच मिळालेले आव्हान याचे समाजशास्त्रज्ञांनी व इतर संशोधकांनी आतापर्यंत विश्लेषण केलेले नाही.
हे धर्मांतर रोखण्यासाठी त्या अस्पृश्य जातींना त्यांना हवा तो आत्मसन्मान द्यावा किंवा अन्याय्य समाजव्यवस्था बदलावी असेही त्यावेळच्या समाजधुरिणांना वाटले नाही.
त्यानंतर काही वर्षांनंतर येवल्यात 1935 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची गर्जना केली तेव्हाही हे सामुदायिक धर्मांतर रोखण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीच. धर्मांतराच्या घोषणेनंतर अखेरीस दोन दशकांनंतर बुध्द धर्माचा स्वीकार करून डॉ आंबेडकरांनी आणि त्यांच्या अनुयायांनी एक अभिनव सामाजिक स्थित्यंतर घडवून आणले.
संदर्भ:
1) अविनाश डोळस, ”आंबेडकरी चळवळ: परिवर्तनाचे संदर्भ” , सुगावा प्रकाशन( पान 46), 2) उपरोक्तप्रमाणे, (पान 136)
3) फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके, ’ निरोप्या’ मासिक, ऑक्टोवर 1977 (पान क्रमांक 33)
4) फिलोमिना बागूल, ’मिशन कार्य 150 वर्षे: सामाजिक विकास’, नाशिक कॅथोलिक धर्मप्रांत स्मरणिका (1878-2003), पान 23)
5) डॉ. अनुपमा उजगरे, ’मराठी प्रोटेस्टंट ख्रिस्ती समाज’, प्रकाशक: ग्रंथाली ज्ञानयज्ञ, , (पान 22)
6) ’जेसुईटस 2005’, इयर बुक ऑफ द सोसायटी ऑफ जिझस, प्रकाशक : सोसायटी ऑफ जिझस, (पान 135), आणि ’ निरोप्या’ मासिक, फेब्रुवारी 2005 (पान 26)
^^^
(गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज - लेखक कामिल पारखे , चेतक बुक्स, पुणे मधील एक प्रकरण _

Sunday, August 28, 2022

 

बैलपोळा - बैलपोळ्याच्या वेगळ्याच आठवणी

 

श्रीरामपूरला आमच्या आजूबाजूला साजरा होणाऱ्या अनेक सणांपैकी काही सण आमच्याही घरात साजरे व्हायचे, बैलपोळा हा त्यापैकी एक. 

 

या सणाच्या काही दिवस आधीच आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानापाशी असलेल्या मेनरोडला मातीपासून बनवलेल्या रंगीबेरंगी बैलांच्या जोड्या विक्रीला ठेवलेल्या असत. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी यापैकी मग पांढऱ्या, उंचच उंच खिलारी बैलांची एक जोडी घरात यायची. त्या बैलांची आमच्या घरात पूजा होत नसायची, मात्र दिवसभर मग या बैलजोड्यांशी माझा खेळ चालायचा. 

 

बैलपोळा संपल्यानंतर अनेक दिवस या बैलजोड्या भिंतीवरच्या फळ्यांवर असायच्या, झावळ्यांचा रविवारी (Palm Sunday) घरी आणलेल्या झावळ्या अनेक दिवस अल्तारापाशी असायच्या, अगदी तसेच. काही दिवसांनी शिंगे मोडलेली किंवा एखादा पाय मोडलेल्या बैलांच्या जोड्या मग आम्हा मुलांच्या नकळत अचानक गायब व्हायच्या.

शहरी वातावरणात वाढलेल्या आमचा बैलांशी वा इतर कुठल्याही प्राण्यांशी यायचा तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या घोगरगावातल्या आमच्या आजोळामुळे. तिथे शिनगारे आडनाव असलेल्या मामांकडे गेले म्हणजे या प्राणिमात्रांशी जवळून संबंध यायचा. 

 

आम्हाला आजोळी नेण्यासाठी घोगरगावाहून शांत्वन मामाची तरणीताठी मुलं शाहू किंवा मार्शल बैलगाडी घेऊन श्रीरामपुरला यायची. शांत्वनमामाकडे खिलाऱ्या बैलांच्या दोनतीन जोड्या होत्या. सर्वांत लहान असलेल्या शिवराममामाकडे लहानखुऱ्या बैलांची एकच जोडी होती. 

 

येताना बैलगाडीत दोन दिवस भरपूर पुरेल इतका ज्वारीचा कडबा आणलेला असायचा. रात्री मुक्काम केल्यावर सकाळी बाई आणि आम्ही काही पोरं बैलगाडीत बसून निघायचो. बरोबर दुपारच्या जेवण्यासाठी कपड्यांत बांधलेल्या भाकरी आणि बेसनाचे कोरडे पिठले असायचे, पिण्याच्या पाण्यासाठी फिरकीचा पितळी तांब्या बरोबर असायचा. 

 

भामाठाणला आलं कि मग बैलगाड्या गंगेच्या उथळ पाण्याच्या खोऱ्यात विसाव्यासाठी थांबायच्या. मामाची मुलं बैलांना पाणी दाखवून यायचे आणि मग बैलांसमोर कडबा टाकायचे. आम्ही पण मग जेवायच्या तयारीला लागायचो. नदीच्या पात्रातली वाळू थोडी वर काढली कि खाली निथळ पाणी लागायचे, तोंड धुवून ते थंड गार पाणी प्यायचे आणि भाकरी पिठल्यावर ताव मारायचा. 

 

शिवराम मामा, शाहू आणि मार्शल यांनी कधी आपल्या बैलांवर चाबूक मारल्याचं आठवत नाही. बैल सावकाश चालले कि त्यांच्या शेपट्या जरा पिरगळल्या कि बैलगाडीच्या प्रवासाची गती वाढायची. कधी हातातल्या काठीने बैलांना ढुशी दिली तरी काम भागायचं. 

 

एक गोष्ट मात्र आजही कित्येक वर्षानंतर स्पष्टपणें आठवते ती म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासातला त्या बैलजोडींचा प्रवास. घोगरगाव जवळ येत आहे याची जणू त्या मुक्या जनावरांना माहित असायचे अशा जलद गतीनं ते बैल चालत असायचे. 

 

घोगरगावात शांत्वनमामा, वामनमामा, शिवराममामा यांच्याकडे बैलांना वर्षभर काही ना काही काम असायचं. शिवराममामा आणि शाहू शेतावरच्या विहिरीवर चार बैल लावून मोट चालवायचे तेव्हा पाणी वर येताना मी आचंबून पाहत राहायचो. 

 

शेतात अनेक ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या थापलेल्या असायच्या, बैलांकडे गेले कि एखादा बैल शिंगं हलवून आगंतुक जवळकीबद्दल नापसंती व्यक्त करायचा. 

 

`हा मारका बैल हाय, फार जवळ जाऊ नकोस,'' असं कुणी म्हणायचं 

 

शेतकऱ्यांना शेतकामांसाठी बैलांची जास्त गरज भासायची, तशी गायांना फारशी मागणी नसायची. एखाददुसरी गाय मात्र प्रत्येकाकडं असायची. त्यामुळं जन्माला आलेलं गोऱ्ह शेतकरी स्वतःजवळ ठेवत, मात्र कालवड कुणाला तरी देत. 

 

एकदा अशीच एक कालवड कुठल्या तरी मामानं श्रीरामपूरला आमच्याकडं बाईला पाठवून दिली होती. कालवड विकायची नसते असा एक संकेत असायचा, जसं दुधाच्या घट्ट मलईतून लोणी काढून झाल्यावर निघालेलं ताकसुद्धा कधी विकायचं नसतं. 

 

श्रीरामपुरला बैलपोळ्याच्या दिवशी रेल्वेस्टेशन आणि बस स्टॅन्डपाशी असलेल्या मारुतीच्या देवळापाशी सजवलेले बैल आणले जात, तिथं मारुतीला वंदन केल्यानंतर गळ्यातल्या घुंगरांचा मोठ्याने आवाज करत या बैलजोड्या जात असत. 

 

हरेगाव येथे संत तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगात मी असताना बैलपोळ्याच्या वेगळ्याच आठवणी आहेत. 

 

बैलपोळ्याच्या संध्याकाळी हरेगावातले आणि आसपास असलेल्या एकवाडी, दोनवाडी अशा नावांच्या वाड्यांतले शेतकरी आपले सजवलेले बैल घेऊन तिथल्या उंच शिखर असलेल्या चर्चकडे येत. 

 

त्याकाळात म्हणजे सत्तरच्या दशकात हरेगावला फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वासरर, फादर फ्रान्सिस झेम्प, फादर बेन्झ अशी युरोपियन धर्मगुरु असत. देवळाच्या पायऱ्यांवर पांढरे झगे आणि गळ्याभोवती स्ट्रोल घालून हे फादर्स उभे राहत आणि भाविक शेतकरी आपल्या बैलांसह आल्यावर हातातले पवित्र पाणी बैलांवर आणि त्या शेतकऱ्यांवर शिंपडवून आशीर्वादित करत. 

 

बैलांना वर्षातून एकदा अशा प्रकारे सन्मानित करणे, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणे धर्मविरोधी किंवा पवित्र शास्त्रविरोधी म्हणजे Sacrilege आहे असं त्यावेळी कुणाला वाटलं नाही. आजही तसं वाटत नाही.

 

आज संध्याकाळी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत बैलपोळ्यानिमित्त बैलांच्या मिरवणुकी अनेक चर्चमध्ये येतील आणि हा सण साजरा होईल.

 

अहमदनगर आणि इतर काही भागात आजच्या श्रावणी अमावास्येला बैलपोळा साजरा करतात, पुण्यासारख्या काही भागात भाद्रपद महिन्यात बैलपोळा साजरा होतो.

 

बैलपोळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा

 

 वरच्या आणि खालच्या जातींतील प्रेमप्रकरण आणि शोकांतिका

 

आज सकाळचीच घटना. घरी काही सुतारकाम चालू आहे.. मध्यंतरी सिल्व्हासातील घरची माणसे सुट्टीचा मोसम साधून आली होती त्यामुळे हाती घेतलेलं फर्निचरचं खंडीत झाले होते. आज पुन्हा आमचे नेहेमीचे कंत्राटदार मिस्त्री कामगार घेऊन आले होते. 

 

थोड्या वेळाने त्यांनीच तो विषय काढला. "आमच्याकडं ते प्रकरण झालं ते तुम्हाला कळलं असल ना?"'

मी म्हटलं " नाही.. काय झालं?"

 

मिस्त्री आमच्या इमारतीला लागून असलेल्या रस्त्याच्या पलिकडच्या चाळीत राहतात. पण ही मोठी घटना माझ्या कानावर आली नव्हती.

 

"आमच्याशेजारी आलेल्या नात्यातल्या एका तरण्याताठ्या मुलीनं गळफास घेतला..तीनचार दिवस झालेत..काही पाहूणेरावळे अजून आमच्याकडेच हायत.."

 

अन् मग मिस्त्री सुरुवातीपासून ती घटना सांगू लागले.

 

दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या जावयाकडची एक मुलगी उस्मानाबादहून अचानक इकडं शहरात शिकायला आली होती. चौदावी की पंधरावीला होती. ॲडमिशन फी भरली, वह्या पुस्तकं पण घेतली.

 

"तरी मी पाहुण्याला विचारलं .." मिस्त्री सांगत होते

 

"अचानक गावाहून या पोरीला का आणलं..? काही प्रॉब्लेम हाय का? विचारपूस करून घ्या आणि काही विषय असला तरी सामोपचाराने मिटवून घ्या..'

 

आठ दिवसांपूर्वी त्या मुलीला गावाकडच्या तिच्या बहिणीचा फोन आला.

 

गेली काही वर्षे तिच्या प्रेमात असलेल्या गावातल्या त्या पोरानं गळफास लावून घेतला होता.

 

ही मुलगी तिच्या घरच्या लोकांनी लांबवरच्या शहरात पाठवून दिल्यानं तो तरुण अस्वस्थ झाला होता. तो स्वतः वरच्या जातीतला तर ही पोरगी खालच्या जातीतली..... गावातल्या सगळ्या लोकांना त्याचं प्रेमप्रकरण माहित झालं होतं.. म्हणून तर त्या पोरीच्या घरच्या लोकांनी तिला गावातून तिच्या मामाकडे आमच्या शहरात शिक्षणासाठी पाठवून दिलं होत.

 

ते अखेरचं पाऊल उचलण्याआधी त्या तरुणाने आपल्या घरच्या लोकांना त्यांचा 'शेवटचा निर्णय काय ? 'असं विचारलं होतं..

 

"तुमचा फायनल निर्णय काय आहे ते सांगा मला.. मला त्या मुलीशीच लग्न करायचे आहे.. "असं त्यानं स्पष्ट केलं होतं.

 

"ते शक्य नाही.. त्या जातीतली मुलगी लग्न करून आपल्या घरात येऊ शकणार नाही.." घरच्यांनी पण आपला निर्वाणीचा निर्णय त्याला सांगितला होता.

 

त्या दिवशी दुपारी साडेतीनच्या आसपास त्या तरुणानं घरातल्या पंख्यास गळपास लावून मग आपला स्वतःचा निर्णयसुद्धा जगजाहीर केला होता..

 

अठरावीस एकर जमीनजुमला असलेल्या त्या घरातला तो एकुलता मुलगा होता..

ही बातमी तिच्या बहिणीने फोनवरून लगेच कळवल्यावर शहरातली ही मुलगी भयंकर अस्वस्थ झाली होती.. दोन दिवस तिचं मानसिक स्वास्थ बिघडलं होतं.

 

तिसऱ्या दिवशी दुपारी चाळीतल्या तिच्या घरी कुणीच नव्हतं. काही वेळानं कुणी तरी घरी परतलं तेव्हा ही पंख्याला लटकलेली दिसली. घाईघाईनं तिला खाली उतरवलं आणि दवाखान्यात नेलं. पण खूप उशीर झाला होता.

 

घरी तिनं लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं होतं..

 

"त्याला जाळलं तिथंच मला पण जाळा.. माझी एव्हढी इच्छा पुरी करा..'"

 

उस्मानाबाद, औरंगाबाद आणि इतर ठिकाणाहून शे-दिडशे लोक मयतीला शहरात आली होती.

 

तिची शेवटची इच्छा पूर्ण करणं अर्थातच शक्य नव्हतं..

 

इतकं बोलून मिस्त्रींनी आपल्या मोबाईलवरचा अठरा वर्षांच्या त्या सुंदर तरुणीचा फोटो दाखवला. डोळ्यात चटकन पाणी आलं..

 

"आमच्यात दहावा-तेरावा नसतो. आमच्या रीतिरिवाजानुसार दोन दिवसांत सर्व क्रियाक्रम इथं शहरातच आटोपून घेतली.. आमच्या जवळची चारदोन पाहुणे मंडळी अजून आहेत..उद्या परवा जातील. ""

 

मिस्त्री मला सांगत होते..

Tuesday, June 21, 2022

 Manjula Chellur sworn-in as the Chief Justice of Bombay High Court-Politics  News , Firstpost 

 

न्यायमूर्ती सुजाता मनोहर

 

खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. गोव्यातून  The  Navhind Times हे इंग्रजी दैनिक सोडून आणि गोवा सोडून मी महाराष्ट्रात आलो होतो. काही महिन्यांनी औरंगाबादला लोकमत टाइम्स या दर्डा उद्योग समूहाच्या इंग्रजी दैनिकात बातमीदार म्हणून रुजू झालो. पणजीला मी मुंबई हाय कोर्टाचे खंडपीठ कव्हर करत होतो. साहजिकच मग मला औरंगाबाद येथे असलेल्या उच्च न्यायालयाचे खंडपीठाचे बिट देण्यात आले. झाले, माझे रुटीन सुरु झाले. 
 
सकाळी एकदोन ठिकाणी बातम्या गोळा करुन झाल्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास क्रांती चौक ओलांडून मी उच्च न्यायालयाकडे यायचो, तेथे ज्येष्ठ वकील नरेंद्र चपळगावकर वगैरेंना भेटून मग मी तडक खंडपीठाच्या रजिस्ट्रारकडे यायचो. गोव्यातही माझा असाच नित्यक्रम असायचा. रजिस्ट्रारकडे अधिकृत बातमी मिळायची आणि ती गोळा केल्यावर मी निघायचो. 
 
तर त्या दिवशी माझ्याकडे उच्च न्यायालयातली कुठलीही हार्ड बातमी नव्हती. त्याऐवजी एक मोठी पण आम्हा पत्रकारांच्या भाषेत सॉफ्ट बातमी मला मिळाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती आणि या पहिल्या महिला न्यायाधीश नुकत्याच औरंगाबाद खंडपीठात व्हिझिटिंग जज्ज म्हणून आल्या होत्या. त्यांची मला लोकमत टाइम्ससाठी मुलाखत घ्यायची होती. 
 
ही घटना आहे १९८८ ची. त्याआधी ऐंशीच्या दशकात गोव्यात जवळजवळ सातआठ वर्षे मी उच्च न्यायालयाची जबाबदारी सांभाळली होती. त्याकाळात पणजीला मिरामार येथे नुकतेच व्ही एम साळगावकर लॉ कॉलेज सुरु झाले होते. गोव्यातले हे बहुधा पहिलेच लॉ कॉलेज. मात्र कायद्याचा पदवीधर नसतानाही मी हाय कोर्टाच्या बातम्या व्यवस्थित दिल्या होत्या. फिलिप कुटो या नावाचे ज्येष्ठ न्यायाधीश त्यावेळी पणजी इथल्या खंडपीठात होते, बाकीचे एकदोन न्यायाधीश मुंबई किंवा इतर खंडपीठांतून व्हिजिटिंग जज्ज म्हणून काही महिन्यांसाठी येत असत. 
 
एक मात्र खरे कि हाय कोर्टाच्या बातम्या देणे हे अत्यंत जबाबदारीचे आणि जोखमीचे काम होते. यात चुकीला क्षमा नसायची. दुसरे म्हणजे हाय कोर्टाच्या बिट्सचा इतका अनुभव गाठीला असताना एकदाही कुणाही न्यायाधिशाच्या चेंबरमध्ये जाण्याचा, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा कधी प्रसंग आला नव्हता. 
 
रजिस्ट्रार ओळखीचे होतेच, त्यांनी लगेच नव्या न्यायाधीश मॅडमची मला भेटण्यासाठी परवानगी मागितली आणि मी त्या चेंबरकडे वळालो. 
 
सुजाता मनोहर हे त्या मुंबई हाय कोर्टाच्या पहिल्यावहिल्या महिला न्यायाधिशांचे नाव होते. मुंबई हाय कोर्ट हे भारतातील एक सर्वात जुने उच्च न्यायालय, या न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हती. मूळच्या नागपूरच्या असलेल्या सुजाता मनोहर यांच्याकडे उच्च न्यायालयातील वकिलीचा अनुभव होता. 
 
हातात बातमीदाराचे नोटपॅड आणि दुसऱ्या हातात पेन घेऊन त्या मोठ्या दालनात मी त्या न्यायाधिशांसमोर आलो. न्यायमूर्तींना युवर लॉर्डशिप म्हणायचे असते. या पहिल्या युवर लेडीशिप बनल्या. न्यायाधीश मॅडम टेबलावरच्या फिती बांधलेल्या फाईल्स पाहत होत्या. आपले काम चालू ठेवत त्यांनी माझ्याकडे पाहिले, मला खुर्चीवर बसण्यास हातानेच सुचना केली. 
 
खुर्चीवर 'बसा' म्हणून स्पष्ट सूचना झाल्याशिवाय कुठल्याही कार्यालयात स्थानापन्न व्हायचे नाही हा नियम मी नेहेमीच पाळत आलो आहे, शिष्टाचाराचे नियम यजमानाने आणि पाहुण्याने दोघांनीही पाळायचे असतात. 
 
न्यायाधीश सुजाता मनोहर यांनी फाईलींमधून डोके वर काढून माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि आता संभाषण सुरु करणे मला भाग होते. `लोकमत टाइम्स'चे माझे व्हिझिटिंग कार्ड रजिस्टारमार्फत त्यांच्याकडे त्याआधीच पोहोचले होते. 
 
मुंबई हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधिश म्हणून त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी आलो आहे असे मी त्यांना सांगितले. सुजाता मनोहर या औरंगाबाद खंडपीठात यावेळी पहिल्यादांच आल्या होत्या तरी मुंबई न्यायालयात त्यांनी बरेच दिवस काम होते, अनेक पत्रकारांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या असणार. पहिल्या महिला न्यायाधीश असण्याची नवलाई त्यांना आता वाटतही नसणार किंवा त्याबाबतचे नाविन्य मिरवायची गरज त्यांना वाटत नसावी हे त्यांच्या चेहेऱ्याकडे पाहताच मला जाणवले. 
 
झाले, माझ्या मुलाखतीची हवा मुलाखत सुरु होण्याआधीच निघून गेली होती. 
 
त्यावेळी पत्रकारितेत येऊन मला सात-आठ वर्षे झाली होती तरी तिशीच्या आत असलेला मी अनुभवाने आणि वयाने तसा कोवळाच होतो. आता कसे तरी वेळ मारुन जाणे भाग होते. 
 
पत्रकारितेतील माझ्या दीर्घ कारकिर्दीतील ही एक फसलेली मुलाखत. कारण मुंबई हाय कोर्टाच्या आपण पहिल्या महिला न्यायाधीश असलो तरी त्यामुळे आपण काही फार मोठी मर्दुमकी गाजवली आहे अशी जस्टिस सुजाता मनोहर यांची भावना नव्हती. `SO What..? '' this was her attitude, I realised it. 
 
त्यामुळे एक महिला न्यायाधीश म्हणून त्यांची मुलाखत घेण्यात काहीच अर्थ नाही हे माझ्या वेळीच लक्षात आले. 
 
''This is just a courtesy call. Thanks for permitting this visit'' असे बोलून मी ही मुलाखत आणि भेट आवरती घेतली. 
 
सुजाता मनोहर नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आणि फातिमा बी यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश बनल्या. 
 
या घटनेनंतर गेल्या तीस वर्षांत बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत, या काळात अनेक महिला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदांवर अजूनही महिलांची ने
 
महिलांच्या कर्तबगारीचा आणि कर्तृत्वाचा विषय निघाला कि मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश सुजाता मनोहर यांच्याशी झालेल्या या अल्पकालीन मुलाखतीची मला हमखास आठवण येते. 
 
परवा भाजपचे महाराष्ट्र्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना 'राजकारण सोडून स्वयंपाकघरात किंवा मसणात जा' असा सल्ला दिला तेव्हाही हा खूप जुना प्रसंग माझ्या नजरेसमोर तरळला.