Did you like the article?

Showing posts with label Mrinal Gore. Show all posts
Showing posts with label Mrinal Gore. Show all posts

Saturday, February 11, 2023

कडेकोट बंदोबस्तात वावरण्याची गरज

श्रीरामपूरला काही मोठ्या व्यक्तींचं आगमन झालं होतं आणि का आणि कसं कुणास ठाऊक मीही त्यावेळी तिथं होतो. सत्तरच्या ट्ट येत होते. व्हीव्हीआयपी हा शब्द खूप नंतर रुढ झाला.त्याकाळात नेते आणि सामान्य लोक यामध्ये फारसे अंतर नसायचे.

तर या महत्त्वाच्या लोकांबरोबर आगेमागे पंन्नास-साठ लोक असतील. शालेय विद्यार्थी असल्याने हाफ पॅन्टमध्ये असलेलो मी पण त्यांच्याबरोबर येत होते. ते लोक बोलतबोलत येत असताना राम मंदिराच्या जवळ असताना त्या गर्दीमध्ये अगदी केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीपाशी मी पोहोचलो. सफारी ड्रेससारखे कपडे घातलेल्या त्या व्यक्तीला मी अक्षरशः खेटलो, म्हणजे त्यांच्या पोशाखाला माझा स्पर्श झाला आणि `आता आपलं काम संपलं' Fate accompli असं स्वतःला बजावून मी झटदिशी बाजूला होऊन पुन्हा त्यांच्याबरोबर चालू लागलो.
ती व्यक्ती त्या दिवशी कुठल्या कार्यक्रमानिमित्त श्रीरामपूरला आली होती हे आता काहीही आठवत नाही. त्या कार्यक्रमाला मी हजेरी लावली असणारच याविषयीसुद्धा मला शंका नाही. याविषयी आता काहीही आठवत नसले तरी ती व्यक्ती आणि त्यांना ओझरता का होईना स्पर्श करण्यासाठी मी केलेली धडपड आणि त्यात मला मिळालेले यश हा दोनतीन मिनिटांपुरता घडलेला प्रसंग तब्ब्ल पन्नास वर्षानंतर मला आजही आठवतो.
याचं कारण म्हणजे त्या गर्दीच्या केंद्रस्थानी असलेली ती व्यक्ती होती त्या काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक.
खूप वर्षांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले सुधाकर नाईक यांच्या काही कार्यक्रमांना पुण्यात इंडियन एक्सप्रेसचा बातमीदार म्हणून मी हजर राहिलो तेव्हा या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. त्याचबरोबर सुधाकर नाईक चुलते असलेल्या वसंतराव नाईक त्यांच्यासारखेच दिसतात हे पण जाणवलं. फरक फक्त एकच, वसंतराव नाईक यांचे अनेक फोटोमध्ये ते हातातल्या चिरुटसह दिसतात, एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि प्रणव मुखर्जी यांच्याही हातात कायम चिरूट दिसायचा.
पण ही खूप खूप वर्षांनंतरची गोष्ट. श्रीरामपूरच्या या घटनेनंतर दोनतीन वर्षातच मला जेसुईट धर्मगुरु होण्याचे वेध लागले आणि दहावीनंतर मी फादर प्रभूधर यांच्याकडे सातारा जिल्ह्यात कराडला आलो आणि तिथल्या टिळक हायस्कुलात अकरावीसाठी प्रवेश घेतला.
साल होतं १९७६ आणि तो काळ होता ऐन आणिबाणीपर्वाचा. पुढच्या वर्षाच्या फेब्रुवारीत इंदिराबाईनीं आणीबाणी शिथिल केली आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. काँग्रेसविरुद्ध वातावरण तापले होते आणि प्रचारसभा सुरु झाल्या. कराड इथल्या प्रचारसभांत कराडच्या आमच्या टिळक हायस्कुलचे माजी विद्यार्थी आणि देशाचे एक ज्येष्ठ केंद्रिय मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधल्या अनेक निवडणूक कोपरा सभांना मी हजर राहिलो. तिथला दोनशेतीनशे लोकांचा जमाव आणि धोतर, सदरा आणि गांधी टोपी घालणारे यशवंतराव आजही माझ्या नजरेसमोर आहेत.
कराडमधून तेव्हा प्रेमलाकाकी चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई, पृथ्वीराज तेव्हा राजकीय क्षितिजावर आलेही नव्हते) काँग्रेसच्या उमेदवार तर यशवंतराव साताऱ्याहून निवडणूक लढवत होते. केंद्रिय मंत्री असले तरी आणि काँग्रेसविरुद्ध देशात (खरं पाहिलं तर गायपट्ट्यात ) आणि महाराष्ट्रात वातावरण तापले होते तरी केंद्रिय मंत्री असलेल्या यशवंतरावांच्या अवतीभोवती एकही सुरक्षारक्षक नव्हता !
गोव्यात द नवहिंद टाइम्सला , औरंगाबादला लोकमत टाइम्सला आणि नंतर पुण्यात इंडियन एक्सप्रेसमध्ये, टाइम्स ऑफ इंडियात आणि अलीकडे सकाळ माध्यमसमूहाच्या महाराष्ट्र हेराल्ड- सकाळ टाइम्समध्ये काम करताना कितीतरी व्हिव्हिआयपी लोकांना अगदी जवळून भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याशी आणि हस्तांदोलन करण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह, महाराष्ट्र जनता दलाच्या प्रदेशाध्यक्ष मृणाल गोरे यांच्याबरोबर मुकुंद संगोराम आणि मी पुण्यातल्या लोहेगाव विमानतळाच्या छोटयाशा केबिनमध्ये ( फक्त चौघे जण ) अर्धापाऊण तास होतो यावर आता माझा स्वतःचा विश्वास बसत नाही, इतरांची काय कथा !
त्याचवर्षी मराठा चेंबरमध्ये राजीव गांधी यांच्याबरोबर इतर पत्रकारांसह मी हस्तांदोलन केलं. त्याच्या नंतरच्या वर्षीच राजीव गांधींची हत्या झाल्यावर जून १९९२ ला मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या गाडीत बीबीसीचे सॅम मिलर, इंडियन एक्सप्रेसचे नरेन करुणाकरण यांच्यासह बसून बारामती ते लोहेगाव विमानतळ असा प्रवास करत पंतप्रधानपदासाठी शर्यतीत उतरलेल्या पवार यांची आम्ही मुलाखत घेतली.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याशी कामशेतपाशी असलेल्या त्यांच्या `भारत यात्रा' केंद्र असलेल्या परंदवाडी येथे हस्तांदोलन करून संवाद साधला. काळाच्या ओघात आणि पत्रकाराच्या भूमिकेत असल्याने विविध क्षेत्रांतील अशा कितीतरी व्हिव्हिआयपी व्यक्तींशी जवळून संबंध आला. अशावेळी सुरक्षेचा कुणीही कधी बाऊ करत नसत. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची स्वतःच्या सुरक्षारक्षकांनी हत्या केल्याची पार्श्वभूमी असतानासुद्धा अशी परिस्थिती होती हे विशेष !
हा, दहा वर्षांपूर्वी एकदा गोव्यात कुठल्याशा बेटावरून फेरीबोटने प्रवास करताना मात्र एक व्हिव्हिआयपी कडक बंदोबस्तात वावरताना दिसली. मात्र त्याबाबत मला मुळीच आश्चर्य वाटलं नव्हतं. त्या फेरीबोटमध्ये एके-४७ बाळगणाऱ्या ब्लॅक कमांडोसह उभे असणातरी ती व्यक्ती होती पंजाबमध्ये अतिरेक्यांच्या कारवायांचा बिमोड करणारे भारतचे सुपरकॉप आणि पंजाबचे माजी राज्यपाल ज्युलियो
रिबेरो!
आपल्या पदावरून निवृत्त होऊनसुद्धा त्यांना कायम कडेकोट बंदोबस्तात वावरण्याची गरज होती (आजही आहे ) याचे कारण म्हणजे अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर ते कायम असणार आहेत. मागे युरोपात रोमानियात भारताचे राजदूत असताना त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून ते वाचले होते. सुवर्ण मंदिरात कारवाई करणारे तेव्हाचे लष्कर प्रमुख जनरल अरुण वैद्य असेच पुण्यात अतिरेक्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले होते.
कायम सुरक्षाव्यवस्थेची खरीखुरी गरज असणारे ज्युलियो रिबेरो हे अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे. केंद्रात किंवा राज्यात एखादे महत्त्वाचे किंवा संवेदनशील पद सोडल्यावर बहुतांश वेळेला त्या नेत्यांना सुरक्षेची गरज भासत नाहीत. देशात आणि राज्यात अशी कितीतरी उदाहरणे आहेत. काही व्यक्तींना मात्र सत्तेत कधीही कुठलेही पद न सांभाळता सुरक्षेची गरज भासते. याचे कारण म्हणजे त्यांचा वाचाळपणा.
हल्ली मात्र परिस्थिती बदलली आहे. सत्तेवर असलेल्या अनेक नेत्यांना सुरक्षारक्षकांच्या गराड्याशिवाय सार्वजनिकरीत्या वावरणे अशक्य झाले आहे. लोकप्रतिनिधींना लोकांचं भय वाटतं. कधी कुणी शाई फेकण्याची शक्यता असते, कधी कुणी काळे शर्ट वा काळी ओढणी फडकावण्याची भिती असते. त्याच्यामुळे कुठेही जमणाऱ्या लोकांची फ्रिस्किंग किंवा अंग चाचपून कडक तपासणी करणे आवश्यक बनले आहे.
वर्ध्याला साहित्य संमेलनाच्या स्थळी व्हिव्हिआयपी लोकांच्या भेटींदरम्यान तिथे पोलीस छावणीचे रुप आले होते, खुद्द संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनाही या सुरक्षाव्यवस्थेचा फटका बसला, अशा बातम्या वाचल्या आणि मागच्या या काही घटना सहज आठवल्या ..

Monday, January 18, 2021

“पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग बरोबर मुलाखत

पंतप्रधानांची आचारसंहिता : पक्षीय आणि शासकीय कार्यक्रम   

पडघम - देशकारण
कामिल पारखे

  • विश्वनाथ प्रताप सिंग
  • Sat , 23 March 2019
  • पडघमदेशकारणविश्वनाथ प्रताप सिंगVishwanath Pratap Singhइंदिरा गांधीIndira Gandhiनरेंद्र मोदीNarendra Modiजनता दलJanta Dal

“पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग आज दुपारी बारा वाजता पुणे विमानतळावर काही वेळ थांबणार आहेत. त्यांना भेटायचं असेल तर लगेच अमुक अमुक ठिकाणी पत्रकारांसाठी वाहन व्यवस्था व्यवस्था केली आहे. तिथं ताबडतोब या!” एका रविवारी सकाळी हा निरोप मला मिळाला. त्या वेळी म्हणजे १९९० मध्ये मोबाइल फोन नव्हते. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या त्यावेळच्या पुणे कॅम्पातील अरोरा टॉवर्सच्या ऑफिसात हा निरोप मिळाल्यानंतर मी ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलो. माझ्याबरोबर  ज्येष्ठ  बातमीदार मुकुंद संगोराम होते. पण ठरलेल्या जागी प्रेस इन्फॉरर्मेशन ब्युरो (पीआयबी)चे कुणीही अधिकारी नव्हते आणि विमानतळाकडे पत्रकारांना नेण्यासाठी वाहनही नव्हतं. थोडा वेळ वाट पाहून नंतर आम्ही दोघांनी संगोराम यांच्या दुचाकीनंच विमानतळावर जाण्याचं ठरवलं.

विमानतळावर आम्ही पोहोचलो आणि पत्रकार म्हणून आम्हाला लगेच तेथील व्हीआयपी कक्षाकडे नेण्यात आलं. त्या वेळी म्हणजे तीस वर्षांपूर्वी विमानतळावर आजच्यासारखी कडक सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्या व्हीआयपी कक्षात पोहोचलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या अत्यंत छोट्याशा काचेच्या कक्षात दोनच व्यक्ती बसल्या होत्या. पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग आणि जनता दलाच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा मृणाल गोरे!

त्यावेळी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी हवाई दलाच्या खास विमानानं दिल्लीहून पुण्याला येण्यास नकार दिला होता. यासंबंधात आधी दोन दिवस वृत्तपत्रात बातम्या येत असल्यानं त्यामागील कारणांची आम्हाला माहिती होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या एका लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत जनता दलाच्या प्रचारासाठी पंतप्रधान सिंग आले होते आणि हा निवडणूक प्रचार दौरा, हे पक्षाचं काम असल्यानं त्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्यास सिंग यांनी नकार दिला होता. त्यामुळे प्रवासी विमानानं एक सामान्य नागरीक म्हणून ते आले होते. या प्रचारदौऱ्यासाठी एखाद्या जवळच्या ठिकाणी शासकीय भेट आयोजित करून नंतर कारनं ते निवडणूक सभेस जाऊ शकले असते. पण ते सिंग यांनी टाळलं होतं.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ साली रायबरेली मतदारसंघातून राजनारायण यांना प्रचंड मत्तांधिक्यांनी पराभूत केलं होतं, मात्र या निवडणुकीत त्यांनी शासकीय यंत्रणेचा वापर केला या मुद्दयावर अलाहाबाद उच्च न्यायालयानं जून  १९७५ मध्ये त्यांची निवडणूकच रद्द ठरवली होती आणि त्यामुळे इंदिरा गांधींचं पंतप्रधानपदच धोक्यात आलं होतं, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. असं असलं तरी पंतप्रधान सिंग यांच्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीनं आणि देशाच्या कार्यकारी प्रमुखानं आचारसंहिता आणि नीतीमूल्यांच्या नावाखाली नागरी विमान आणि रस्त्यावरील प्रवासात अशा प्रकारे अनेक तास वाया घालावे, यावरही अनेकांनी कडक टीका केली होती.        

विमानतळावर गेल्यानंतर आम्हा पत्रकारांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी नेण्यासाठी प्रेस इन्फॉरर्मेशन ब्युरोचं वाहन का आलं नाही याचा उलगडा झाला. पंतप्रधान पक्षाच्या कामासाठी आल्यानं त्यांच्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लावल्यानं आचारसंहितेचा भंग होणार होता. ऐनवेळी बोलावणं आल्यानं आणि वाहनव्यवस्था नसल्यानं इतर पत्रकार आले नव्हते. (त्या वेळी माझ्याकडेही एखादी दुचाकीसुद्धा नव्हती.) व्ही. पी. सिंग यांचं सरकार सत्तेवर आलं, त्यावेळी त्या काळात सुरुवातीच्या काही महिन्यांत सिंग यांनी आपण नैतिक मूल्यांचा मूर्तीमंत पुतळा आहोत, अशीच हवा निर्माण केली होती. ‘मिस्टर क्लीन’ आणि ‘भ्रष्टाचारविरोधी’ अशीच त्या वेळी त्यांची प्रतिमा होती. बोफोर्स तोफेच्या खरेदीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजीव गांधींना सत्ताभ्रष्ट करून ते स्वतः पंतप्रधान बनले होते. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या व्ही पी सिंग यांनी काही उद्योगपतीविरुद्ध धाडींचं सत्र सुरू केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून नंतर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्करांना पुण्यात एका आर्थिक गैरव्यवहारावरून पुण्यात अटक केली, तेव्हा मोठा गदारोळ उडाला होता.

असो. पंतप्रधान सिंग आणि  मृणालताई गोरेंसमोर आम्ही दोघं बसलो, तेव्हा माझी अगदी अवघडल्यासारखी स्थिती झाली होती. पत्रकारितेत मुकुंद संगोराम  माझ्यापेक्षा कितीतरी अधिक अनुभवी होते. ऐनवेळी ठरवण्यात आलेल्या या मुलाखतीत पंतप्रधानांना प्रश्न तरी काय विचारणार? पूर्वतयारी करायला वेळच मिळालेला नसल्यानं उगीच काहीही प्रश्न विचारून आपलं हसं तर होणार नाही ना, अशी मला भीती वाटत होती. सुदैवानं देशाच्या पंतप्रधानांच्या ऐनवेळी बोलावण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत संगोराम आणि मी असे केवळ दोघंच होतो. पंतप्रधानांसमोर असं आमनेसामने बसण्याचा असा प्रसंग कधी येईल असं कधी वाटलं नव्हतं.

त्या कक्षात पंतप्रधानांचे कुणीही सचिव, शासकीय अधिकारी वा शरीररक्षकही नव्हते. त्या दृष्टीनं ही एक अभूतपूर्ण प्रेस कॉन्फरन्स म्हणावी लागेल! असा अनुभव एखाद्या पत्रकारास क्वचितच आला असेल असं मला वाटतं. यापुढे तर असा प्रसंग कधीही येणार नाही, असं आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आणि सुरक्षेच्या समस्येच्या कारणामुळे वाटतं.  

मात्र मृणालताई गोरे यांचीही अवस्था माझ्यासारखीच अवघडल्यासारखी झालेली असेल, असं नंतर माझ्या लक्षात आलं. मुंबईच्या आमदार आणि खासदार म्हणून अनेक वर्षं काम केलेल्या मृणालताईंचा उत्तर प्रदेशातील काँग्रेसनेते असलेल्या व्ही. पी. सिंग यांच्याशी काही संबंध येण्याची शक्यताच नव्हती. मुंबईत पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे ‘पाणीवाली बाई’ हे बिरुद कमावलेल्या मृणालताई या पूर्णतः समाजवादी कार्यकर्त्या, तर मांडा संस्थानचे राजे असलेले व्ही. पी. सिंग  हे  काँग्रेसी  संस्कृतीत वाढलेले! एके काळी राजीव गांधी यांचे उजवे हात असणाऱ्या सिगांनी काँग्रेस सोडल्यानंतर आधी जन मोर्चा स्थापला आणि नंतर जनता दलाची सत्ता आल्यावर ते पंतप्रधान बनले. जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, मृणाल गोरे वगैरे समाजवादी नेते त्या वेळी जनता दलात असल्यानं आणि मृणालताई महाराष्ट्र जनता दलाच्या अध्यक्षा असल्यानं आता पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिष्टाचार म्हणून त्या जनता दलाच्याच असलेल्या पंतप्रधानांबरोबर होत्या एवढंच.

भिन्न पक्षीय  आणि राजकीय संस्कृतीच्या सिंग यांच्याशी बोलण्यासाठी मृणालताई यांच्याकडे काय समानधागा असणार होता? याउलट इथं सिंग यांच्याऐवजी जनता दलातीलच जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते, मधू लिमये  वगैरे नेते असते तर या साथी मंडळींबरोबर त्यांना संभाषणासाठी विषय कमी पडले नसते. (विशेष म्हणजे जनता दलाची सत्ता येऊनही या पक्षाच्या जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते यांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ समाजवादी नेत्यांना पंतप्रधानपदानं हूल दिली आणि त्यांच्याऐवजी याच पक्षाच्या मात्र काँग्रेसी परंपरेतील चंद्रशेखर आणि कालांतरानं एच.  डी.  देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांना हे पद लाभलं!)  

पंतप्रधान व्ही. पी. सिंग या पोटनिवडणूक दौऱ्यात हवाईदलाचं विमान इतर कुठलीही शासकीय यंत्रणा वापरणार नाही, अशी बातमी आमच्या ‘इंडियन एक्सप्रेस’नं त्याच दिवशी पहिल्या पानावर अगदी ठळकपणे वापरली होती. संभाषणाच्या सुरुवातीला त्या विषयाला धरून काही प्रश्न झाले. मात्र याच मुद्द्यावर चर्चा रेटण्यात काही अर्थ नव्हता. त्यांनतर इतर काही रुटीन विषयांवर प्रश्न झाले. मला अंधुक आठवतं की, पंतप्रधान व्ही. पी. सिंग पुण्यात फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते, हा विषयसुद्धा या संभाषणात निघाला होता. 

सिंग आणि मृणालताई यांनी उत्तरं दिल्यावर काही मिनिटांत पंतप्रधानांनी आम्हा दोघांना आमच्यासमोर ठेवलेल्या चहा आणि बिस्किटं घेण्याचा आग्रह केला. बोलण्याचे विषय संपले होते! पंतप्रधानांचे विमान लागण्यास अजून बराच वेळ होता. त्यामुळे त्यांनतर काही वेळ चक्क हवापाण्याविषयी बोलणं झालं... 

मात्र पंतप्रधानांच्या विमानाची वेळ होईपर्यंत तिथं थांबून राहणं प्रशस्त नव्हतं. जवळपास अर्ध्या तासानंतर पंतप्रधानांची आणि मृणालताईंची रजा घेऊन आम्ही त्या कशाबाहेर आलो आणि आमच्या कार्यालयाकडे निघालो. 

आजच्या युगात अशा प्रकारची पंतप्रधांनांबरोबर पत्रकारांची मुलाखत होणं अशक्यच बनलं आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रकार परिषदेचंच वावडं आहे ही गोष्ट अलाहिदा! त्यामुळे गेल्या पाच वर्षांत देशातील पत्रकारांची सध्याची पिढी विद्यमान पंतप्रधानांशी हस्तांदोलन, परदेश दौऱ्यावरून परतताना पत्रकारांचा पंतप्रधानांशी विमानप्रवासातील होणारी तो वैशिष्टपूर्ण चर्चा-संवाद, पत्रकार परिषदेतील सवाल-जबाब यासारख्या त्यांच्या व्यवसायातील एका फार दुर्मीळ  आणि महत्त्वाच्या अनुभवाला मुकली आहेत.  

वरील घटनेनंतर काही महिन्यातच पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचा जनता दल पक्षनेता म्हणून नव्हे तर पंतप्रधान या नात्यानं पुण्यात एका  कार्यक्रमाला  मी ‘इंडियन एक्सप्रेस’चा  बातमीदार म्हणून हजार होतो. तिथंही समाजवादी नेते मात्र पक्षीय राजकारणातून अलिप्त  झालेले डॉ. बाबा आढाव यजमान होते. डॉ. आढाव यांनी मार्केटयार्डातील माथाडी भवनात पंतप्रधानांचा माथाडी कामगारांबरोबर रात्री जेवणाचा कार्यक्रम ठरवला होता. 

यावेळेस मागच्या काही महिन्यापूर्वीच्या घटनेपेक्षा अगदी उलट परिस्थिती होती. इथं अत्यंत कडेकोट बंदोबस्त होता. पीआयबीनं आणि पुणे पोलीस खात्यानं खास बनवलेल्या ओळखपत्राच्या आधारेच आत प्रवेश मिळाला. इथं पत्रकारांना हस्तांदोलन, मुलाखत वा प्रश्नोत्तरांना मुळीच वाव नव्हता. पंतप्रधानांच्या बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांना मुख्य राजकीय बातमी मिळालीच  होती. पंतप्रधानांची माथाडी भवनमध्ये सर्वसामान्य लोकांबरोबर जेवणाची पंगत, ही तशी आतल्या पानावरची फोटोसह जाणारी सॉफ्ट बातमी असणार होती. 

त्या भोजनावळीचं सर्व पत्रकारांना आमंत्रण असलं तरी वेगवेगळ्या दैनिकांत काम करणाऱ्या आम्हा पत्रकारांना जेवणाचा आस्वाद घेणं शक्यच नव्हतं. पंतप्रधान आणि इतर व्हीआयपी मंडळी तिथं जेवण करताना पंतप्रधानांच्या थाळीत कुठले पदार्थ आहेत, कुठला पदार्थ त्यांना अधिक आवडला, याकडेच आमचं सर्वाधिक लक्ष होते. जेवण करून पंतप्रधान सिंग माथाडी भवनाच्या बाहेर पडले आणि त्यांच्यापाठोपाठ बातमी  देण्याची डेडलाईन गाठण्यासाठी आम्हीही सर्व पत्रकार घाईनं बाहेर पडलो.