Did you like the article?

Showing posts with label Diu. Show all posts
Showing posts with label Diu. Show all posts

Friday, July 14, 2023


Portugal Citizenship: फक्त गोवेकरांनाच नाही इतर भारतीयांना सुद्धा पोर्तुगालच्या नागरीकत्वाची संधी

Portugal citizenship for Indian: गोव्यातल्या, तसेच दमण आणि दीव, दादरा, नगर हवेली इथल्या `काही' नागरिकांना, - सर्वांना नव्हे -  पोर्तुगालचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आजसुद्धा मिळू शकतो. मी वर नमूद केलेले प्रदेश एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती होत्या, पोर्तुगाल इंडियाचे भाग होते.दिनांक १९ डिसेंबर १९६१ ला पोर्तुगालची भारतातली सत्ता   संपृष्टात आली,.       

 मात्र १९६१ पूर्वी या पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना आणि त्यांच्या पुढच्या तीन पिढींतील लोकांना आजही पोर्तुगीज नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळू शकते, पोर्तुगालच्या कायद्यानुसार तो त्यांचा एक हक्क आहे. खूप काळापूर्वी म्हणजे  सतराव्या शतकात पोर्तुगीजांचे राज्य असलेल्या वसईतील किंवा पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या  आणि ब्रिटिशांना लग्नात आंदण म्हणून मिळालेल्या सात बेटांच्या मुंबईतील लोकांना अर्थात ही सुविधा मिळणार नाही .

गोवा आणि पोर्तुगीजांची जुन्या वसाहती असलेल्या भारतातील इतर प्रदेशांतील अनेक लोकांनां माहित नसलेला हा विषय आता चर्चेला  आला आहे. तसे गोव्याबाबत इतर भारतीयांना अनेक गोष्टी माहित नसतात, जसे कि २०२४ च्या निवडणुकीसाठी धार्मिक ध्रुवीकरणाच्या उद्दिष्टाने भाजपतर्फे चर्चेला आणला गेलेला  युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा इथे गेली एक शतकापासून विनातक्रार अंमलात आहे ! 

पोर्तुगालने आपल्या जुन्या वसाहतीतील लोकांना किंवा त्यांच्या वंशजांना  पोर्तुगालचे नागरिकत्व बहाल करण्याचा हा विषय आता चर्चेला येण्यासाठी एक निमित्त घडले आहे. आयरिश रॉड्रिग्स या गोव्यातील कार्यकर्ता आणि वकील असणाऱ्या व्यक्तीने लिस्बन येथील आपल्या भेटीत पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरिकत्व  स्वीकारले आणि गोव्यात आणि भारतात या चर्चेला नव्याने तोंड फुटले.

इंडियन एक्सप्रेसने अलीकडेच म्हणजे २७ जून २०२३ ला  पान एकवर अँकरची बातमी या विषयाला धरुन छापली होती.  बातमीचा मथळा होता :

Of 70,000 surrendered passports in Idia in a decade, 40% were in Goa 

तर हे आयरिश रॉड्रिक्स नक्की आहेत तरी कोण कि ज्यांच्या नागरिकत्व बदलाच्या निमित्ताने या मुद्द्यावर राष्ट्रपातळीवर चर्चा व्हावी?

पणजीतल्या मिरामार समुद्रकिनारी असलेल्या धेम्पे कॉलेजात सत्तरच्या दशकात मी बीए च्या पहिल्या वर्षाला होतो, तेव्हा  एक चष्माधारी,कुरळ्या केसांचा आयरीश बारावीला होता. मी कॉलेजच्या आर्ट सर्कल या भित्तिपत्रकाचा संपादक होतो, कॉलेजच्या स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सक्रिय होतो आणि त्यामुळे कॉलेजच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये  आणि अख्ख्या स्टाफमध्ये  पूर्ण परिचित होतो.  कॉलेजच्या वेगवेगळ्या शाखांतील आणि वर्गातील विद्यार्थ्यांशी/ विद्यार्थिनींशी माझाही संपर्क असायचा.

तर तेव्हा हा बंडखोर स्वभावाचा हा मुलगा लक्षात राहिला. नंतरच्या काळात गोवा आणि द नवहिंद टाइम्स सोडून मी पुण्याला आलो, इथल्या इंग्रजी दैनिकांत कामालालागलो तरी  आयरीशचे  नाव गोव्यातल्या बातम्यांतून वाचत राहिलो.

मागे काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमांवर मी त्याच्यावर लिहिले होते. विषय राष्ट्रपातळीवरचा होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणीयांच्या मुलीच्या संदर्भात गोव्यातल्या एका हॉटेलच्या परमिटबाबत वाद होता आणि सामाजिक कार्यकर्ता तसेच वकील या नात्याने आयरीश रॉड्रीक्सने हा मुद्दा लावून धरला होता.

तर गोव्यात एक परिचित नाव असलेल्या  सामाजिक/  माहिती अधिकार  कार्यकर्ता आयरीश रॉड्रीक्सने पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारावे हा अनेकांना धक्का होता, आणि या घटनेला साहजिकच बातमीचे मूल्य होते. वेगवेगळ्या माध्यमांतून, दैनिकांच्या सदरांतून आयरिश रॉड्रीक्स यांच्या या बदललेल्या नागरिकतत्वावर  आणि भारतातील (आणि इतर जुन्या वसाहतींतीलही) लोकांना पोर्तुगालच्या या नागरिकत्व देण्याबाबत लिहिले जात आहे.

गोव्यात मी द नवहिंद टाईम्सला असताना `गोमंतक’ दैनिकात असलेल्या  वामन प्रभू यांनी ``पोर्तुगीज पासपोर्टचे मायाजाल ! याविषयी लिहिले आहे. 

``ॲड आयरिश रॉड्रिग्ज यांच्यासारखा फायरब्रॅन्ड सामाजिक कार्यकर्ताही नुकताच या मायाजालात अडकल्यानंतर नजिकच्या काळात अजून किती गोमंतकीय नागरिक भारतीय नागरिकत्व आणि मताधिकार डावलून तोच मार्ग स्वीकारतील याचा आताच अंदाज बांधता येणार नाही.

पोर्तुगीज पासपोर्टच्या मायाजालात सापडलेल्या अनेकानी त्या संधीचे सोने करून आपली आणि कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारली असेलही परंतु आज सहा दशकानंतरही गोमंतकीयांचे पोर्तुगीज पासपोर्टचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही वा होणारही नाही हेच स्पष्ट चित्र पुढे येत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून ऊपलब्ध करण्यात आलेल्या एका आकडेवारून दिसून येते. २०११ ते २०२२ दरम्यानच्या अकरा वर्षांच्या काळात सत्तर हजारांहून अधिक भारतीय नागरिकानी आपले पासपोर्ट देशातील वेगवेगळ्या विभागीय पासपोर्ट कार्यालयात 'सरेंडर ' केल्याचे ही आकडेवारी सांगते आणि यामध्ये गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू , दिल्ली आणि चंदिगढ या आठ प्रदेशातील नागरिकांची संख्या ९० टक्क्याहून अधिक भरते आणि त्यातही विशेष असे की भारतीय नागरिकत्व सोडून देऊन पोर्तुगीज पासपोर्ट धारण करणाऱ्यांमध्ये गोमंतकीय नागरिकांची संख्या तब्बल ४0 टक्क्याहून अधिक आहे.

 जगातील जवळपास १८८ देशांचा व्हिसा पोर्तुगीज नागरिकत्व मिळवल्यानंतर आपसूकच विनायासे ऊपलब्ध होतो याच कारणावरून जर भारतीय नागरिकत्व झिडकारून पोर्तुगीज पासपोर्ट त्यानी घेतला असेल तर या पासपोर्टमुळे युरोप वा अन्य काही देशातील मिळणाऱ्या रोजगाराच्या वा अन्य संधी साध्य करून घेण्यासाठी युवा पिढीने पोर्तुगीज पासपोर्ट मिळवला तर त्यांचे चुकतेय असे म्हणता येणार नाही

वंश प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज नागरिक म्हणून आवश्यक प्रमाणपत्रांसह पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी केल्यास लिस्बनमध्ये एक दोन दिवसातच पोर्तुगीज पासपोर्ट कसा ऊपलब्ध होऊ शकतो यावरही आयरिश रॉड्रिग्ज यांनी आपण स्वीकारलेल्या पोर्तुगीज नागरिकत्वाचे समर्थन करताना स्पष्ट केल्याने अनेकांचा ऊत्साह बळावलाही असेल,

पोर्तुगीज पासपोर्ट हा कोणालाही अनेक युरोपियन आणि अन्य ब-याच देशात व्हिसामुक्त प्रवेश देणारा आधार तर आहेच पण त्याचबरोबर पात्रतेच्या वा अफाट गुणवत्तेच्या आधारे कोणीही आपले करियर करायची महत्वाकांक्षा बाळगून योग्य ती संधी साधण्याचा प्रयत्न करत असेल तर पोर्तुगालचे महाद्वार त्यासाठी खूपच ऊपयुक्त ठरू शकते .‘

पोर्तुगालची भारतातली राजवट संपून दहाबारा वर्षे लोटल्यानंतर गोव्यात मी शिकत असताना माझ्या हॉस्टेलमधली काही मुले पोर्तुगीज होती, म्हणजे त्यांचे आईवडील पोर्तुगाल किंवा युरोपात होते आणि या मुलांचे पासपोर्ट्स पोर्तुगीज होते. सज्ञान झाल्यानंतर त्यांना भारतात राहायचे असल्यास पोर्तुगीज पासपोर्टचा त्याग करावा लागणार होता. 

मात्र वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच ही मुले भुर्रकन उडून परदेशात गेली. त्यानंतरही माझ्या बरोबर शिकणारी अनेक मुलेमुली अशाचप्रकारे भारत सोडून पोर्तुगालला आणि नंतर इतरत्र स्थायिक झाली आहेत.  अनेक नातेवाईकांनी पोर्तुगालने दिलेल्या या सुविधेचा वापर करुन युरोपात नागरिकत्व मिळवले आहे.  चारपाच वर्षांनंतर ते गोव्यात, भारतात भेटीगाठीसाठी येत असतात.

कॉमनवेल्थचे सभासद म्हणून किंवा एकेकाळी इंग्लंडची वसाहत असलेल्या भारतातील नागरिकांना युनायटेड किंगडमचे नागरिक  म्हणून हक्क बहाल करण्यात आले तर काय होईल? आपल्या देशातील किती नागरिकांना ब्रिटिश पासपोर्ट म्हणजेच ब्रिटिश नागरीकत्व  घेणे आवडेल?

आमच्या कॉलनीत विसेक इमारती आहेत आणि प्रत्येक इमारतींमध्ये किमान एका  घरातली एक व्यक्ती युरोपात, अमेरिकेत किंवा इतर राष्ट्रांत आहे. यापैकी कुणाचाही कायमस्वरुपी मायदेशी परतण्याचा इरादा नाही. मुंबईत छोट्या घरात राहणारी व्यक्ती ग्रामीण महाराष्ट्रात जेथे पिण्याचे पाणी आठवडातून एकदोनदा येते विजपुरवठ्याबाबत सतत बोंबाबोंब असते  त्या आपल्या गावी परतण्याचा विचारही करत नसतात अगदी तसेच.   

त्याशिवाय अनेक जण या देशांत जाण्याची वाट पाहत आहेत  ते वेगळेच. इकडच्या भेटीत ही मंडळी त्या देशातल्या सार्वजनिक वर्तनाबाबत, शिष्टाचार, सरकारी कामकाज, वगैरेंबाबत कौतुक करत भारतातल्या भ्रष्टाचारावर, सरकारी कामकाजावर आगपापड  करत  असतात.

अशा परिस्थितीत इंग्लंडने भारतीयांसमोर नागरिकत्वाचा प्रस्ताव ठेवला तर काय होईल असे मी विचारले आहे. मला वाटते हे  नागरीकत्व मिळवण्यासाठी रांगच रांगा लागतील, चेंगराचेंगरीही होईल. आयरिश रॉड्रीग्स प्रकरणानंतर हा विषय चर्चेला आला आहे हे खरेच आहे.

 आता पुढच्या गोवा दौऱ्यात आयरिशला मुद्दाम भेटावे असे वाटू लागलेय.  

 https://www.esakal.com/global/portugal-goa-india-citizenship-passport-diu-daman-dadra-dnb8577

Wednesday, October 12, 2022


आज २ ऑगस्ट, सिल्व्हासा चा हा मुक्तीदिन. तिथल्या शाळाकॉलेजांत आणि सरकारी कार्यालयात झेंडावंदन होऊन हा दिवस साजरा केला जाईल.

हल्ली वर्षांतून काही दिवस माझा सिल्व्हासा येथे मुक्काम असतो तरी काही वर्षांपूर्वी सिल्व्हासा हे नक्की कुठे आहे हे मलाही माहित नव्हतं. अनेक जणांना सिल्व्हासा कुठे आहे हे माहित नसेल, आणि स्वातंत्र्यदिनाची तर कल्पनाही नसेल.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा मी अनेक वर्षे रहिवासी होतो, माझे बारावीचे प्रमाणपत्र याच बोर्डाचे आहे. गोवा हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमेवर तर दमण हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमेवर तर दीव हे आणखी तिसऱ्या टोकावर म्हणजे गुजरात आणि राजस्थानच्या सीमेलगत. तिथे मी आजवर एकदाही गेलेलो नाही. पण गोवा, दमण आणि दीव हे एकच केंद्रशासित प्रदेश होते कारण १९६१ पर्यंत साडेचारशे वर्षे ही पोर्तुगीज वसाहत होती.

पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय लष्कराकरवी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव भारताच्या संघराज्यात आणला. या लष्करी कारवाईचा, पोर्तुगिजांच्या शरणागतीचा, तिथल्या युध्दकैद्यांच्या पाठवणीचा खूप मोठा इतिहास आहे, जो आपल्याला माहीतच नसतो. गोव्यातले माझे एक जुने पत्रकार मित्र वाल्मिकी फालेरो ( Valmiki Faleiro ) यांनी यावर संशोधनात्मक खूप लिहिले आहे.
दमणपाशी असणारे मात्र समुद्रकिनारा नसलेले सिल्व्हासा सुद्धा या पोर्तुंगिजांच्या वसाहतीचा एक भाग होते. मात्र दमण आणि सिल्व्हासा यामध्ये दहाबारा किलोमीटरचा भारतीय प्रदेश होता. या कारणामुळे फारसा प्रतीकार न होता २ ऑगस्ट १९५४ रोजी सिल्व्हासा अगदी शांततेत भारतीय संघराज्यात सामील झाले.
म्हणून आज २ ऑगस्ट सिल्व्हासा मुक्ती दिन.
अर्थात या मुक्तिदिनाची त्याकाळात फारसा गाजावाजा झालेलं नाही कारण पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोवा, दमण आणि दीव हे प्रकरण त्याकाळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप तापलेले होते.
आज सिल्व्हासा हे दादरा नगर हवेली दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशात येते.
विकेंड ला दमण येथे प्रचंड ट्रॅफिक जाम होते. कारण या प्रदेशात गोव्याप्रमाणे दारू स्वस्त असते. ड्राय स्टेट असलेल्या गुजरातचे लोक इथे तहान भागवतात.
अलीकडेच हा प्रदेश महाराष्ट्रात बातम्यांमध्ये झळकला कारण येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार भाजपचा पराभव करून निवडून आल्या. त्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी सिल्व्हासा येथेच होतो. ( या खासदार मॅडम सध्या कुठल्या शिवसेनेत आहेत याची मला कल्पना नाही!)
आणि हा दमणगंगेचा फोटो...
Camil Parkhe, August 2, 2022
May be an image of 1 person, standing and road
Bhausaheb Nevarekar, कॉम्रेड भैरवनाथ वाकळे and 210 others
32 comments
1 share
Like
Comment
Share

Sunday, March 27, 2022

गोवा  आणि दादरा, नगर हवेली, दमण  येथील पोर्तुगीज संस्कृती  


Our Lady of Piety Church, Silvassa 

मागच्या आठवड्यात मी दादरा, नगर हवेली, दमण आणि दिव केंद्रशासित प्रदेशात होतो. अनेकांना हा प्रदेश किंवा ही शहरे भारताच्या नकाशात कुठे आहेत ते माहितही नसेल, दोनेक वर्षांपूर्वी मलासुद्धा माहित नव्हते. गोव्याचे या दादरा-नगर हवेली दमण आणि दिव या केंद्रशासित प्रदेशाशी खूप जुने म्हणजे पाच शतकांपासूनचे नाते आहे. एकमेकांपासून शेकडो मैल दूर असल्याने बोलीभाषा, पेहराव, संस्कृती भिन्न असली तरी या प्रदेशांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे तेथे साडेचार शतके असलेली पोर्तुगीज सत्ता.

तर मागच्या आठवड्यात या केंद्रशासित प्रदेशात असताना एका मासिक स्मृती म्हणजे `मन्थस माईंड' या विधीसाठी इथल्या चर्चमध्ये अचानक जावे लागले. झटपट तयार होऊन मी त्या चर्चमध्ये पोहोचलो आणि थोडासा शरमिंदा झालो तरी थोडक्यात बचावलो अशीही भावना झाली.
त्या चर्चमध्ये जमलेले सर्व स्त्री-पुरुष हे `मोर्निंग क्लोथ्स' च्या ड्रेस कोडमध्ये म्हणजे सफेद शर्ट किंवा फ्रॉक आणि काळ्या रंगाची पॅन्ट किंवा स्कर्ट, काळ्या रंगाचे पॉलीश केलेले चकाकते बूट किंवा सँडल्स आणि अशाच पद्धतीच्या सुतक दर्शवणाऱ्या पेहेरावात होते. मी स्वतः सफेद शर्ट घातला होता तरी पॅन्ट मात्र करड्या रंगाची होती आणि बुटसुद्धा पूर्णतः काळ्या रंगाचे नव्हते. त्या काँग्रीगेशनमध्ये मी एकटाच अशा पेहेरावात असले तरी हे चालून घेण्यासारखे होते, मी भडक लाल, हिरवा किंवा पिवळा शर्ट घातला नव्हता याबद्दल मी स्वतःलाच मनोमन धन्यवाद दिले.
त्या संध्याकाळी त्या मासिक स्मृतीच्या संपूर्ण मिस्साविधीमध्ये सर्व गायने पोर्तुगीजमध्ये होती ! गिटार, किबोर्ड आणि इतर संगीतवाद्यांच्या साथीत गाणाऱ्या चर्चच्या कॉयर ग्रुपने या गायनासाठी भरपूर मेहनत घेतली होती ते जाणवत होते. त्या पोर्तुगीज गायनाचे शब्द माहित नसल्याने मी लगेचच समोरच्या बाकातल्या शेल्फमधले गायनपुस्तक काढून त्या पोर्तुगीज गायनात सहभागी झालो.
चर्चमधला विधी संपला आणि नंतर त्या दिवशी त्या मिस्साविधीमधली सर्व हिम्स म्हणजे गायने पोर्तुगीज भाषेतली का होती याचा उलगडा झाला.
मागच्या महिन्यात वयाची ऐंशी पार करुन निधन पावलेली महिला त्या चर्चच्या गायकवृदांची सदस्य होती, दमण आणि सिल्व्हासा येथील अनेक ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच पोर्तुगीज बोलणारी होती. त्यामुळॆ त्या महिलेला आदरांजली म्हणून सर्व गायने पोर्तुगीज भाषेतील निवडण्यात आली होती. शक्य असले तर संपूर्ण मिस्साविधी आणि प्रार्थनासुद्धा पोर्तुगीज भाषेत झाल्या असत्या, मात्र तेथे जमलेले फादर आणि सर्व भाविकांना आता पोर्तुगीज येत नसल्याने तसे झालो होते.
भारतातील जनमताच्या रेट्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिणामाची चिंता न करता पंतप्रधान पंडित नेहरू यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी केलेल्या लष्करी कारवाईनंतर गोवा, दमण आणि दीव इथली पोर्तुगीज सत्ता संपली. त्याआधी म्हणजे १९५४मध्ये दादरा-नगर हवेली हे गुजरातच्या सीमेलगतचे चिमुकले प्रदेश भारतात सामिल झाले होते. काश्मीरप्रश्नी चूक केल्याबद्दल पंडित नेहरूंना सतत धारेवर धरले जाते, मात्र गोवा, दमण आणि दीव विना रक्तपात रातोरात पोर्तुगिजांच्या सत्तेतून मुक्त करून भारतात सामिल केल्याबद्दल मात्र त्यांचे कधी कौतुक केले जात नाही.
अलिकडेच म्हणजे २०१९ साली अस्तित्वात आलेल्या या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दमण त्या आहे तर आधीची राजधानी असलेले सिल्व्हासा हे एक मोठे शहर आहे. इथे सांगण्याचे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या केंद्रशासित प्रदेशाचा सर्व भाग साडेचारशे वर्षे पौर्तुगीज वसाहत होती, तर दमण आणि दिव हे १९६१ ते १९८७ पर्यंत गोवा, दमण आणि दिव केंद्रशासित प्रदेशाचा भाग होते.
सिल्व्हासा हे नगर हवेलीमधले मुख्य शहर. पोर्तुगीज काळात दादरा-नगर हवेलीची ती राजधानी होती. विशेष म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले दमण हे समुद्रकाठी असल्याने समुद्रमार्गे पोर्तुगीजांचा या शहराशी थेट संपर्क असे. दादरा-नगर हवेली मात्र समुद्रकिनारी नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय भूमीवरून या पोर्तुगीज प्रदेशात जाणे-येणे भाग असायचे. तरीसुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही, अगदी १९५४पर्यंत दादरा-नगर हवेली हा छोटासा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला, हे विशेषच.
वास्तविक पाहता दमणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेले दादरा-नगर हवेली हे प्रदेशसुद्धा गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे भाग झाले असते, मात्र गोवा मुक्तीआधी केवळ सात वर्षांपूर्वी दादरा-नगर हवेली भारतात सामील झाले आणि गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश लष्करी कारवाईनंतर १९६१ साली.
पणजीतल्या धेम्पे कॉलेजातून मी १९७८ साली बारावीची परीक्षा दिली. त्यामुळे माझ्या बारावीच्या बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आणि प्रमाणपत्रावर गोवा, दमण आणि दीव बोर्डाचे नाव आणि शिक्का आहे. भारताच्या नकाशावर एक नजर टाकून गोव्याचे आणि दमण व दीवचे भौगोलिक स्थान पाहिले तर कुणालाही धक्काच बसेल. गोवा हे एका जिल्ह्याच्या आकाराचे आहे, तर दमण व दीव हे तालुक्याच्या आकाराचे आहेत. हे तीन चिमुकले प्रदेश एकमेकांपासून शेकडो किलोमीटरच्या अंतरावर आहेत.
१२ तालुक्यांचा मिळून एक जिल्हा बनलेल्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे दमण व दीव हे दोन तालुके असायचे. या केंद्रशासित प्रदेशाचे दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेल्या दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर, त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर आणि प्रतापसिंह राणे यांनी मुख्यमंत्री म्हणून कधी या दोन तालुक्यांना भेट दिली असेल, याबद्दल शंका वाटावी इतके ते गोव्यापासून दूर आहेत.
दमण हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यापाशी आणि गुजरातच्या सीमेशेजारी आहे. गोव्याहून रस्तामार्गे दमणला येण्यासाठी १५ तास लागतात, तर दमण येथून दीव येथे जाण्यासाठी आणखी १५ तास लागतात. ते गुजरातच्या दुसऱ्या टोकाला आहे.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे अस्तित्व जेमतेम २५ वर्षांचे म्हणजे डिसेंबर १९६१ ते जून १९८७पर्यंतचे. या काळात माझे गोव्यात उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. माझ्या पत्रकारितेचा पाया तेथेच घातला गेला. त्यामुळे गोवा, दमण आणि दीव माझ्या भूतकाळाचा नव्हे तर आयुष्याचाच एक भाग बनला. गोवा स्वतंत्र राज्य झाल्यावर या केंद्रशासित प्रदेशाचे १९८७ साली विभाजन झाले, हे तीन प्रदेश एकमेकांना परके झाले. त्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी (२०२०) मी दमण येथे पाऊल ठेवले, सिल्व्हासा येथे पोहोचलो, तेव्हा मी भावूक होणे साहजिकच होते.
गोवा आणि दमण येथे खूप जुनी म्हणजे ३००-४०० वर्षांपूर्वी बांधलेली चर्चेस असली तरी सिल्व्हासातले ‘अवर लेडी ऑफ पायटी’ हे त्या मानाने अलीकडच्या काळातले म्हणजे केवळ १२५ वर्षांपूर्वी, १८९७ साली बांधलेले चर्च आहे. पोर्तुगीजांनी दादरा-नगर हवेलीची राजधानी दादराहून सिल्व्हासाला हलवली, त्यानंतर लगेचच हे चर्च बांधण्यात आले.


या चर्चचे युरोपियन गॉथिक शैलीचे बांधकाम अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. चर्चच्या एका लांबलचक आडव्या आणि उघडताना घडी करता येण्यासारख्या पाच-सहा मीटर अंतराच्या धातूच्या दारावर येशू ख्रिस्ताचे आपल्या बारा शिष्यांबरोबरच्या शेवटच्या भोजनाचे म्हणजे ‘द लास्ट सपर’चे अप्रतिम चित्र आहे. या चर्चचे नूतनीकरण आणि विस्तार करण्यात आला, तेव्हा आल्तार म्हणजे वेदी, जुने प्रवेशद्वार आणि इतर काही भाग जसाच्या तसा ठेवण्यात आला. वास्तुशास्त्रीय आणि ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत कॅथोलिक चर्चचा हा सगळीकडे आढळणारा गुण निश्चितच कौतुकास्पद वाटतो.
‘ला पिएता’ हे नाव ऐकल्यावर जगप्रसिद्ध शिल्पकार मायकल अँजेलो यांच्या नावाजलेल्या कलाकृतीची आठवण येते. त्यांच्या खूप गाजलेल्या शिल्पांमध्ये याचा समावेश होतो. ‘पायटी’ (Piety) हा मूळचा लॅटिन शब्द, ‘ला पिएता’ म्हणजे करुणा. ‘अवर लेडी ऑफ पायटी’ या नामाधिनाचे मराठी रूपांतर ‘करुणामय माता’ असे होईल.
रोममधील व्हॅटिकन सिटीच्या सेंट पिटर्स बॅसिलिकामधील तो प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. युरोपच्या सहलीवर असताना व्हॅटिकन सिटीमधल्या सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या भव्य प्रवेशदारात मी पत्नी-मुलीसह पोहोचलो होतो. अनेक वर्षे ज्या ऐतिहासिक वास्तूविषयी खूप काही वाचले-ऐकले होते, तेथे पोहोचल्यावर प्रचंड औत्सुक्य होते. उंच खांब असलेल्या प्रवेशदारातून आत शिरलो, उजव्या बाजूला नजर गेली आणि मी थबकलोच. माझा विश्वासच बसत नव्हता.

जॅकलिनचा हात पकडून तिचेही मी तिकडे लक्ष वेधले. तेथे अँजेलोचे ‘ला पिएता’ हे संगमरवरातले शिल्प होते. आपल्या पुत्राचे, येशू ख्रिस्ताचे कलेवर मांडीवर घेऊन मारियामाता बसली आहे, असे हे शिल्प.
आपल्या पुत्राचे मृतशरीर न्याहाळणाऱ्या आईचे शिल्प म्हणून ‘ला पिएता’ हे त्याचे नाव. वयाच्या २३व्या वर्षी अँजेलोने संगमरवरी दगडातून ही कलाकृती साकारली. आपल्या तरुण पुत्राचे निस्तेज, अचेतन कलेवर मांडीवर घेऊन शोक करणाऱ्या मारियामातेची भावमुद्रा याविषयी खूप काही लिहिले गेले आहे. जगातील सर्वांत सुंदर आणि अत्यंत मौल्यवान असणाऱ्या कलाकृतींमध्ये या शिल्पाचा समावेश होतो. मात्र १९७२ साली एका माथेफिरू इसमाने हातोड्याच्या साहाय्याने हे शिल्प तोडण्याचा प्रयत्न केला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हे शिल्प असलेल्या आल्तारासमोर आता बॅलेटप्रुफ काच बसवण्यात आली आहे.
‘The Last Supper' किंवा येशू ख्रिस्ताचे आपल्या शिष्याबरोबरचे शेवटचे भोजन हा प्रसंग अँजेलोचा समकालीन असलेल्या लिओनार्दो दा व्हिन्सी या चित्रकारानेही रेखाटला आहे. ‘द लास्ट सपर’ या घटनेला अनेक चित्रकारांनी रेखाटले आहे, अनेक ख्रिस्ती कुटुंबांत जेवण्याच्या खोलीत ‘द लास्ट सपर’ हे चित्र असते. त्याचप्रमाणे या घटनेवर आधारित अनेक चित्रे आणि शिल्पे अनेक चर्चेसमध्ये दिसतात. सिल्व्हासामधील चर्चमध्येही आल्तारावर एक वेगळ्या शैलीतले शिल्प आहेच.


गोवा, दमण, दीव आणि दादरा, नगर हवेली येथील अल्पसंख्य ख्रिस्ती समाजाचा धर्म, पेहराव, आहारपद्धती, भाषा आणि संस्कृती पोर्तुगीज राजसत्तेचा वारसा आहे. गोव्याचे दमणशी साडेचारशे वर्षे असलेले नाते संपलेले असले तरी त्याचा एक बारीकसा धागा अस्तित्वात आहे. तो म्हणजे गोव्यातील कॅथोलिक चर्च. आजही दमण आणि दादरा, नगर हवेली हे प्रदेश गोवा आर्चडायोसिस म्हणजे महाधर्मप्रांताचा भाग असून गोव्याचे आर्चबिशप व पॅट्रियार्क दमण आणि दादरा, नगर हवेली येथील चर्चमधील धर्मगुरूंची नेमणूक करतात.
गोव्याचे आर्चबिशप यांच्या या प्रदेशात वेळोवेळी भेटी होत असणार. कारण कॅथोलिक पंथामध्ये कन्फर्मेशन किंवा दृढीकरण हा स्नानसंस्कार किंवा सांक्रामेंत या विधीचे पौराहित्य फक्त बिशपच करू शकतात.
कॅथोलिक चर्चअंतर्गत ज्युरिसडिक्शन म्हणजे सीमाहद्द हा नेहमीच गंमतीदार आणि तितकाच वादग्रस्त विषय राहिलेला आहे. यासंदर्भात दुसरे माधवराव पेशवे यांनी दिलेल्या जमिनीवर १७९२ साली बांधण्यात आलेल्या पुण्यातल्या सिटी चर्चचे उदाहरण देता येईल. मराठा सैन्यात असलेल्या गोव्यातल्या पोर्तुगीज किंवा कॅथोलिक सोल्जरांसाठी हे चर्च बांधण्यात आले होते. भारतावर ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतरही पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्यातील चर्चचा या सिटी चर्चवरचा मालकीहक्क कायम राहिला. या चर्चच्या धर्मगुरूंची नेमणूक गोव्यातल्या बिशपांकडून व्हायची. हा प्रकार १९५३पर्यंत चालू होता. त्यानंतरच हे चर्च पुणे धर्मप्रांताचा भाग बनले.
दमण आणि सिल्व्हासा येथील अल्पसंख्य ख्रिस्ती समाज आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक वारसा टिकवून धरण्याचा एक क्षीण, केविलवाणा प्रयत्न या नॉव्हेना प्रार्थनेच्या दरम्यान करत होता. त्या प्रसंगास मी अनपेक्षितपणे साक्षीदार होतो. तो प्रसंग खरे तर खूप आनंददायी होता. तरी पण ऐतिहासिक वारशासंदर्भातला जुना इतिहास, गेल्या काही दशकातील त्याबाबतचा अनुभव आणि भविष्यातले अटळ सत्य यांची जाणीव होऊन माझे मन गलबलून गेले होते.
नॉव्हेनाच्या वेळी दररोज रोझरी प्रार्थना म्हणजे पवित्र माळेची प्रार्थना होते. त्यात येशू आणि आई मारिया यांच्या जीवनासंबंधीच्या पाच घटनांची (रहस्यांची) उजळणी केली जाते. त्यातल्या चार प्रार्थना इंग्रजीत झाल्यानंतर पाचवी प्रार्थना गायनाने सुरू झाली. आणि ती चक्क पोर्तुगीज भाषेत होती.
‘Ave Maria ...’ अशी सुरुवात ऐकताच ती ‘नमो मारीया’ किंवा इंग्रजीतील ‘Hail Mary ’ ही प्रार्थना होती हे माझ्या लक्षात आले. पोर्तुगीज आणि लॅटिन भाषेतील काही शब्द माहीत असल्याने ती मला समजत होती.
पाचही कवने पोर्तुगीज भाषेत म्हणण्याऐवजी केवळ शेवटचे कवन म्हणण्याचे कारण सहज समजण्यासारखे होते, तेथे जमलेल्या सर्वच कॅथोलिक भाविकांना पोर्तुगीज अवगत नव्हती. बहुधा गोव्यातून नेमणूक होणाऱ्या त्या चर्चच्या धर्मगुरूंनासुद्धा पोर्तुगीज येत असेल याचीही मला शंकाच आहे. कारण गोवामुक्तीनंतर १०-१५ वर्षांतच तिथून पोर्तुगीजचे उच्चाटन करण्यात आले. दमण, दादरा आणि नगर हवेली येथे मात्र आजही कॅथोलिक समाजात पोर्तुगीज बोलली जाते. दादरा, नगर हवेली, दीव आणि दमण येथली स्थानिक भाषा गुजराती आहे.
दमणमध्ये पोर्तुगीज भाषा ख्रिस्ती शाळांतून अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे २००५पर्यंत दुसरी भाषा म्हणून शिकवली जायची, आता तेही बंद झाले आहे. नव्या पिढीला ही भाषा लिहिता आणि वाचता यावी यासाठी ही भाषा निदान शाळांत तरी शिकवणे आवश्यक असते. गोव्याप्रमाणेच इथेही पोर्तुगीज भाषा शाळा-कॉलेजांच्या अभ्यासक्रमांतून हद्दपार झाली आहे.
डिसेंबर १९६१च्या आधी दमणमध्ये जन्मलेल्या सर्वांना पोर्तुगीज पासपोर्ट मिळायचा. या सुविधेचा लाभ घेऊन अनेकांनी पोर्तुगालमार्गे युरोपियन राष्ट्रांचे नागरिकत्व मिळवले आहे, आजही त्या प्रयत्नात शेकडो जण असतात. गोव्यातही असाच प्रकार मी अनुभवला आहे. आपण फार वेगाने अल्पसंख्य होत चाललो आहोत आणि काही काळानंतर या प्रदेशातील आपले अस्तित्व व संस्कृती दखल घेण्यासारखी राहणार नाही, अशी भावना गोव्यातील कॅथोलिक लोकांमध्ये आढळते. कारण या समाजातील लोक मोठ्या संख्येने युरोपात आणि इतर पाश्चात्य देशांत स्थायिक झाले आहेत.
दमण आणि दादरा, नगर हवेलीमध्ये नेमणूक झालेल्या फादरांना पोर्तुगीजचे धडे शिकावे लागायचे. कारण येथील कॅथोलिक भाविक पोर्तुगीज बोलणारे, त्यांच्या प्रार्थना आणि इतर धार्मिक व्यवहार पोर्तुगीजमध्येच असायचे. मात्र गोव्यात आता या भाषेचा मागमूसही दिसत नाही. त्यामुळे ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ या न्यायाने गोव्यातून नेमणुकीवर येणाऱ्या धर्मगुरूंना पोर्तुगीजचे ज्ञान नसते. परिणामी दमण आणि सिल्व्हासामधील चर्चमध्ये मिस्सा आणि सर्व प्रार्थनाही इंग्रजीतच होतात.
कुठलीही भाषा नाहीशी होते, तेव्हा ती बोलणाऱ्यांची संस्कृतीही नामशेष होते, असे म्हटले जाते. म्हणूनच काही लोक खानदेशी किंवा अहिराणी भाषा बोलली जावी आणि या भाषेत लिहिले जावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात याविषयी कौतुक वाटते. माझ्या लहानपणी श्रीरामपुरात आमच्या दुकानाच्या मासिक भाड्याची पावती एक म्हातारे `दिवाणजी' मोडी लिपीत देत असत हे आठवते. आज मोडी लिपीचे अस्तित्व नाहिसे झाले आहे.
गोव्यातून पोर्तुगीज भाषा कधीच हद्दपार झाली आहे. पोर्तुगीज संस्कृती आणि इतिहासाचे अनेक अवशेष मात्र गोव्यात आजही आढळतात. दमण आणि दादरा, नगर हवेली येथील परिस्थितीसुद्धा काहीशी अशीच आहे. येथील कॅथोलिक समाजाची संख्या अगदीच कमी असल्याने पोर्तुगीज भाषा आणि इतरही अनेक वारसे येत्या काही वर्षांतच नाहीसे होणार आहेत, असे मला इथे आल्यापासून वाटते आहे.
त्यामुळेच रोझरी माळेचे पोर्तुगीजमधले ते शेवटचे कवन मधुर सुरात गायले जात असताना आणि मासिक स्मृतीनिमित्त पोर्तुगीज गायने गायली जात असताना पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती जपवून ठेवण्याची त्यांची धडपड दाखवत होती. या प्रयत्नांत त्यांना कितपत यश मिळेल याबाबत मात्र मी साशंक आहे.


Sunday, June 28, 2020

स्मगलर किंग बाखियाची गोव्याच्या तुरुंगातून पलायनाची बातमी चुकली तेव्हा...

स्मगलर किंग बाखियाची गोव्याच्या तुरुंगातून पलायनाची बातमी चुकली तेव्हा...
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
  • स्मगलर किंग सुकुर नारायण बाखिया
  • Fri , 29 May 2020
  • पडघममाध्यमनामासुकुर नारायण बाखियाSukur Narain Bakhia
अडतीस वर्षांपूर्वी बरोबर या दिवशी म्हणजे २९ मे  १९८२ रोजी गोव्यातील मध्यवर्ती तुरुंग असलेल्या फोर्ट आग्वादमध्ये एक खूप नाट्यमय घटना घडली होती. शनिवारी रात्री घडलेल्या त्या घटनेची पूर्वतयारी निश्चितच काही दिवस किंवा काही तास आधी करण्यात आली होती. अरबी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या फोर्ट आग्वादच्या मोठ्या बुरुजाजवळ आणि आसपासच्या परिसरात रविवारी पहाटेपर्यंत कुणीही नव्हतं. नाही तरी १९८०च्या दशकात फोर्ट आग्वादपाशी तशी वस्तीही नव्हती आणि लोकांची वर्दळ तर अजिबात नव्हती. शनिवारी रात्रीच्या अंधारातच एक अगदी मोठ्या किमतीचं पाखरू पिंजऱ्यातून अलगद उडून पसार झालं होतं. फोर्ट आग्वाद तुरुंगात, तुरुंगाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि मुख्य म्हणजे तुरुंगाच्या मागच्या उंच बुरुजापाशी त्या चोवीस तासांत काय शिजत होतं वा सरकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये काय खडाजंगी होत होत्या, ते गोव्यातील आम्हा पत्रकारांना रविवारी आख्ख्या दिवसभर कळालंही नव्हतं.
सोमवारच्या म्हणजे ३१ मे १९८२च्या अंकात ‘दमणचा स्मगलर किंग सुकुर नारायण बाखिया याचे फोर्ट आग्वाद तुरुंगातून पलायन’ अशी दैनिक ‘गोमंतक’ने आठ कलमी बातमी देऊन सर्वांना धक्का दिला होता. गोमंतकचे वार्ताहर सुरेश काणकोणकर यांनी दिलेली ती ‘एक्स्ल्युझिव्ह’ बातमी होती.
पणजी येथील ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात बातमीदार म्हणून मी वर्षभरापूर्वी रुजू झालो होतो. आमच्या  दैनिकातील इतर दोन ज्येष्ठ बातमीदार २० वर्षं या क्षेत्रात होते. मी  नुकतंच विशीत पदार्पण केलं होतं, तर ते दोघं पंचेचाळीसच्या आसपास होते. नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर मला तोपर्यंत मिळालं नव्हतं. दरमहा साडेतीनशे रुपये पगार व्हॉउचरवर मिळायचा, म्हणजे इतरांसारखा न्या. पालेकर वेतन आयोगानुसार पगार मला अजून मिळत नव्हता. त्यामुळे तेथील बातमीदारीत मला तेव्हा लिंबूटिंबूचंच स्थान होतं.
आदल्या दिवशी म्हणजे रविवारी दोन्ही ज्येष्ठ बातमीदारांपैकी एकजण साप्ताहिक सुट्टीवर होते. मी रविवारी कामावर होतो, तरी नेहमीप्रमाणे नसल्यासारखाच होतो. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मी ऑफिसला आलो, आमचा पेपर वाचला. गोमंतक, नवप्रभा आणि मडगावहून प्रसिद्ध होणारे ‘राष्ट्रमत’ ही मराठी दैनिकं चाळली. तोपर्यंत आमच्या ऑफिसातील सन्नाटा आणि तणाव माझ्यापर्यंत पोहोचला नव्हता. मुख्य संपादक बिक्रम व्होरा, वृत्तसंपादक एम. एम. मुदलीयार आणि ते दोन ज्येष्ठ वार्ताहर यांच्यात काय गरमागरम चर्चा झाली, ते मला कळणं शक्य नव्हतं.
दुपारी डेस्कवरचे, समवयस्क सहकारी आणि इतर कर्मचारी येऊ लागले, तेव्हाच ऑफिसातील तापलेल्या वातावरणाची मला जाणीव झाली. त्या काळात गोवा, दमण आणि दीव एक केंद्रशासित प्रदेश होता. सुकुर नारायण बाखिया हा दमण येथील स्मगलर मुंबईतील हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार आणि करीम लाला यांच्याबरोबरीनं तस्करी जगात दरारा राखून होता. आखाती आणि इतर देशांतून समुद्रमार्गानं सोन्याची तस्करी हा त्यांचा एकमेव उद्योग असायचा. दाऊद  इब्राहिम, अरुण गवळी वगैरे डॉन यांचा तोपर्यंत उदय झाला नव्हता. आपल्याला कोणी पकडू शकत नाही, कारण आपल्यावर कुठलेच आरोप नाहीत, कुठलेही गुन्हे सिद्ध झालेले नाहीत, अशी दर्पोक्ती मिरवणाऱ्या बाखियाला दोन महिन्यांपूर्वीच अटक करण्यात गोवा पोलिसांना यश मिळालं होतं. Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कायद्यांतर्गत बाखियाला अटक करण्यात आली होती.
पोर्तुगीजांच्या गोव्यातील राजवटीत मोठे गुन्हेगार आणि गोवा मुक्तीसाठी झगडणारे गोव्यातील आणि भारतातील राजकीय नेते याच हाय सेक्युरिटी तुरुंगात डांबले जात असत. गोवामुक्तीसाठी भारतातील कार्यकर्त्यांची तुकडी घेऊन गोव्याच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या ना. ग. गोरे, शिरुभाऊ लिमये वगैरे समाजवादी नेत्यांना १९५५च्या नंतर या फोर्ट आग्वाद तुरुंगातच दीर्घ कारावासात ठेवण्यात आले होते. गोवा सोडून मी पुण्याला स्थायिक झालो आणि १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला नानासाहेब आणि शिरुभाऊंच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा या दोघांनीही फोर्ट आग्वाद तुरुंगाच्या करावासातील आपल्या आठवणी सांगितल्या होत्या. ‘गोमंतक’ने तसेच औरंगाबादच्या दैनिक ‘मराठवाडा’च्या रविवारच्या पुरवणीत जयदेव डोळे यांनी त्या मुलाखती प्रसिद्ध केल्या होत्या.
तस्करीसम्राट सुकुर नारायण बाखियाच्या पलायनामागे फार मोठं नाट्य घडलं होतं. हे पलायन ही गोव्यासाठीच नव्हे तर मुंबई आणि संपूर्ण देशासाठी मोठी खळबळजनक आणि सनसनाटी बातमी होती. दुदैवानं डेम्पो उद्योगसमूहाच्या मालकीच्या असलेल्या आमच्या ‘नवहिंद टाइम्स’ आणि मराठी जुळं भावंड ‘नवप्रभा’ या दैनिकांत यासंदर्भात एकही ओळ छापून आली नव्हती! आमची खूपच नाचक्की झाली होती.
या स्मगलर किंगच्या पलायनामागचा कालक्रम आणि त्यातील नाट्य नंतर काही दिवसानंतर हळूहळू उलघडत गेलं.
बाखियाने आपल्या अटकेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्याला तुरुंगात डांबण्यासाठी पोलिसांकडे सबळ पुरावे नाहीत असं न्यायालयाने म्हटलं होतं. त्यामुळे बाखियाची सुटका होणं अटळ होतं. मात्र बाखियासारखा मोठा मासा गळाला लागल्यावर तो सोडणं गोवा पोलिसांच्या अगदी जीवावर आलं होतं. त्याशिवाय गुजरात पोलिसांनाही अनायासे प्रगट झालेला हा स्मगलर आपल्या ताब्यात घ्यायचा  होता. त्यामुळे अटक वॉरंट घेऊन गुजरात पोलिसांची एक तुकडी शनिवार २९ मे १९८२ रोजी फोर्ट आग्वाद तुरुंगाच्या मुख्य दरवाजापाशी बाखियाची वाट पाहत ठाण मांडून होती.
मात्र फोर्ट आग्वाद तुरुंगाधिकाऱ्यांनी बाखियाला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यास आधी सरळसरळ ठाम नकार दिला आणि त्यानंतर  टाळाटाळ करायला सुरुवात केली. बाखियाला सोडण्यासाठी आवश्यक असलेली गोवा प्रशासनाची रिलीज ऑर्डर अजून आपल्याकडे आली नाही, असं तुरुंगाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. गुजरातच्या पोलिसांना तुरुंगात येऊन बाखियाला ताब्यात घेण्याची मागणी फेटाळण्यास आली. त्यासाठी कोर्टाची ट्रान्सफर ऑर्डर असायला हवी होती, असा दुसरा आक्षेप होता. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 कायद्यांतर्गंत तुरुंगात असलेल्या काहींची सुटका करण्यात आली. मात्र सुटका झालेल्या त्या कैद्यांमध्ये बाखिया नव्हता! गुजरातच्या पोलिसांनी याबाबत चौकशी केली, तेव्हा बाखियाची कधीच सुटका करण्यात आली आहे, असं तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगून बॉम्बगोळा टाकला आणि आपले हात झटकले!!
तुरुंगाधिकाऱ्यांच्या त्या घोषणेनं मोठा हल्लाकल्लोळ माजला. बाखिया कधी आणि कसा बाहेर पडला, तो आता कुठे आहे, याविषयी कुणालाच काहीही माहिती नव्हती. गुजरात पोलिसांबरोबरच गोवा पोलीस अधिकारीसुद्धा याविषयी पूर्ण अंधारात होते.
नंतर उघडकीस आलेली माहिती आताच्या टीव्ही चॅनेलच्या भाषेत बोलायची झाल्यास अत्यंत धक्कादायक होती. शनिवारी रात्रीच फोर्ट आग्वाद तुरुंगाधिकाऱ्यांच्या संगनमतानं बाखियाला तुरुंगाच्या एका बाजूला नेऊन तिथं शिडी लावून त्या किल्ल्याच्या बुरुजाच्या बाहेर जाण्यास मदत करण्यात आली होती. तुरुंगाबाहेर वाट पाहत असलेल्या एका टॅक्सीनं बाखिया कळंगुट बिचवर पोहोचला. तेथून एका छोट्याशा नावेनं प्रवास करत एका ठिकाणी रात्रभर मुक्काम करून तो अज्ञातस्थळी रवाना झाला.
जवळजवळ चोवीस तास घडत असलेल्या या नाट्यमय घडामोडींनी रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान गोवा प्रशासन आणि पोलीस खातं अगदी खडबडून जागं झालं. रविवार सुट्टीचा दिवस असूनही सरकारी वरिष्ठ अधिकारी बाखियाचं नेमकं झालं काय याची चौकशी करत होते.
आणि या खळबळजनक घडामोडींचा बहुधा रविवार असल्यानं गोव्यातील आम्हा पत्रकारांना मात्र थांगपत्ताही नव्हता. रविवारी निम्मे पत्रकार साप्ताहिक सुट्टीवर होते आणि ड्युटीवर असलेले पत्रकार आपल्या हातातल्या स्टोरी बँकमधल्या शिल्लक बातम्या देण्यात आणि संध्याकाळी पोलीस राऊंडच्या बातम्यांवर अवलंबून होते. त्या काळात मोजक्याच पत्रकारांकडे लँडलाईन फोन होते. शिवाय कुठल्याही सरकारी वा पोलीस अधिकाऱ्यांकडे सुट्टीच्या दिवशी अगदी किरकोळ चौकशीसाठी फोन करणं शिष्टाचाराला धरून नव्हतं. ते अधिकारी घरी असतीलच वा फोन घेतीलच याची काही शाश्वती नसायची.
नेमक्या याच गोष्टींनी गोव्यातील त्यावेळच्या मोजून चार असलेल्या इंग्रजी आणि मराठी दैनिकांच्या बहुसंख्य वार्ताहारांचा घात केला आणि गोमंतकच्या सुरेश काणकोणकर यांना वगळता कुणालाही ही देशपातळीवरची मोठी खळबळजनक घटना कळली नाही! त्यामुळेच गोमंतक वगळता तस्करीसम्राट सुकुर नारायण बाखियाचं पलायन ही बातमी गोव्यातील इतर कुठल्याही दैनिकात नव्हती.
त्या सोमवारी म्हणजे ३१ मे रोजी गोमंतक वगळता इतर दैनिकांच्या कार्यालयात फटाक्यांची किती आतषबाजी झाली याची मला कल्पना नाही. या प्रकरणात गोवा सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले होते. त्याचाच परिपाक म्हणून बाखियाच्या पलायनानंतर तीन-चार दिवसांतच फोर्ट आग्वाद तुरुंगाच्या मुख्य अधिक्षकांच्या घरी लाचलुचपत खात्यानं धाड टाकली. त्यांच्याकडील लाखभर रोकड रक्कम आणि काही सोनं जप्त करून त्यांना अटक केली. त्या वेळी फोर्ट आग्वाद तुरुंगातच कैदी म्हणून काही महिने राहण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. मात्र बाखियाला तुरुंगातून मुक्त करण्यात आपण कायद्यानुसार आणि तुरुंगाच्या नियमानुसार कारवाई केली, असाच त्यांचा दावा होता. या प्रकरणात त्यांच्यावर दोषारोप दाखल झाल्याचे वा कुठलीही कारवाई झाल्याचे मला आठवत नाही.
यथावकाश सुकुर नारायण बाखियाला पुन्हा अटक करण्यात आली. काही काळाने स्मगलर हाजी मस्तानप्रमाणेच बाखियानेही गुन्हेगारी जगातून स्वेच्छानिवृत्ती घेतली.
बाखिया पलायन प्रकरणानंतर मी ‘नवहिंद टाइम्स’मध्ये नऊ वर्षं आणि औरंगाबादच्या ‘लोकमत टाइम्स’मध्ये एक वर्ष क्राईम रिपोर्टरची जबाबदारी सांभाळली. मात्र रविवारी आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी क्राईमच्या आणि इतर बातम्या मिळवताना बाखियाचं पलायन आठवून पोटात नेहमी गोळा यायचा. गोव्यात काम आटोपून रात्री घरी जाण्याआधी पोलिसांकडे फोन केल्यावर तिकडून ‘पात्राव, सोगळे शांत असा मरे, आज कायच ना, तू काळजी करू नाका, हांव नायटींक ड्युटीवर असा, कितें गडबड झाल्याक आंव तुका सांगता’ असं उत्तर येऊनही शंकेची पाल कायम चुकचुकायची. घरी लँडलाईन फोन नसल्यानं सायकलनं ताळेगावला रात्री साडेआठला घरी परतल्यावर इतरांशी संपर्क पूर्ण तुटायचा.
त्यातच पाच वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार फरारी चार्ल्स शोभराजला गोव्यात पकडल्याची बातमी नेमकी रविवारी रात्री उशिरा साडेनऊ वाजता सुदैवानं मला मिळाली होती आणि माझी नोकरी शाबूत राहिली होती!
आजच्या टेलिव्हिजन न्यूज चॅनेलच्या जमान्यात ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी तरुण आणि इतर वयाच्या बातमीदारांचा चाललेला आटापिटा पाहताना स्मगलर किंग सुकुर नारायण बाखियाचं ते पलायन आणि फरारी चार्ल्स शोभराजची रात्री झालेली अटक या दोन्ही बातम्या अनेकदा हमखास आठवतात. 
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com