Did you like the article?

Monday, May 26, 2025

 

अरविंद निर्मळ हे भारतातील दलित थिओलॉजी आणि लिबरेशन थिओलॉजीचे एक प्रमुख प्रणेते.

जालना येथे जन्म झालेल्या निर्मळ यांनी मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि नंतर बेंगलोर येथे युनायटेड थिऑलॉजिकल कॉलेजात (UTC) अनेक वर्षे ईशज्ञानाचे प्राद्यापक म्हणून कार्य केले.
तिथेच त्यांनी आंबेडकरवाद स्वीकारला आणि ख्रिस्ती थिऑलॉजीची त्या दृष्टिकोनातून मांडणी केली.
सुताराचा मुलगा असलेला, कुष्ठरोगी, वेश्या यासारख्या समाजातील उपेक्षित घटकांबद्दल आपुलकी बाळगणारा येशू ख्रिस्त हा दलितच होता अशी त्यांची मांडणी होती.
ख्रिस्ती समाजातील ब्राह्मण्यवादाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.
ख्रिस्ती ईशज्ञानापेक्षा पूर्णतः वेगळे असलेले त्यांचे हे विचार प्रस्थापित धर्माचार्यांच्या दृष्टीने खूप धक्कादायक होते आणि त्यामुळे निर्मळ यांना खूप त्रास सहन करावा लागला.
आजही अरविंद पौलस निर्मळ ( १९३६-१९९५) यांचे दलित थिओलॉजी आणि लिबरेशन थिओलॉजीविषयक विचार जवळजवळ बहिष्कृत करण्यात आले आहेत.
इतकेच नव्हे तर प्रस्थापित ख्रिस्ती - कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट - वर्तुळांत `दलित' हा शब्द किंवा त्यास असलेला कुठलाही पर्यायी शब्द आजही लांच्छनीय किंवा घृणास्पद मानला जातो.
अरविंद निर्मळ यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे बेंगलोरहून महाराष्ट्रात परत आल्यानंतर त्यांनी येथे दलित थिओलॉजी आणि लिबरेशन थिओलॉजीचा प्रसार करण्याचे प्रयत्न केले.
यासाठी त्यांनी १९२७ सालापासून सुरु असलेल्या आणि प्रस्थापित झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनापासून एक वेगळी चूल मांडली.
नगर येथे १९९२ साली त्यांनी पहिले मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवले.
या संमेलनास किती प्रखर विरोध झाला ते त्यावेळच्या बातम्यांमधून दिसते.
आपल्या या चळवळीत अरविंद निर्मळ यांनी सुगावा प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ आणि उषा वाघ, `आपण' साप्ताहिकाचे संपादक सत्यवान नामदेव सूर्यवंशी, वामन निंबाळकर, प्रा. अविनाश डोळस आदींना आपल्याबरोबर घेतले.
स. ना. सूर्यवंशी आणि देवदत्त हुसळे यांच्या अध्यक्षतेखाली इतर मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने आयोजित केली. त्यानंतर निर्मळ यांचे निधन झाले.
मात्र ही पोस्ट मुख्यतो अरविंद निर्मळ यांच्यावर नाही,
निर्मळ यांच्यानंतर महाराष्ट्रात दलित ख्रिस्ती चळवळ आणि संमेलने एकाहाती चालू ठेवणारे सुभाष चांदोरीकर यांच्यावर आहे.
निर्मळ यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या विविध शहरांत दलित ख्रिस्ती संमेलने भरवण्याचे कार्य आणि त्याद्वारे ही चळवळ चालू ठेवण्याचे एक खूप अवघड काम चांदोरीकर यांनी चालू ठेवले आहे.
बिशप प्रदीप कांबळे, डॉ गिल्बर्ट लोंढे,, वसंत म्हस्के, अनुपमा डोंगरे जोशी, जेसुईट फादर ज्यो गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी पुणे, नागपूर, उदगीर, श्रीरामपूर आणि संगमनेर येथे ही संमेलने भरवली.
आतापर्यंत एकूण अकरा दलित ख्रिस्ती संमेलने भरली आहेत. त्यापैकी नागपूर, उदगीर आणि श्रीरामपूर येथे मी हजेरी लावलेली आहे.
यापैकी काही संमेलनाध्यक्षांची भाषणे सुनील आढाव यांच्या `धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा' शतकातील ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा' या ग्रंथात (दिलीपराज प्रकाशन 2003 ) समाविष्ट आहेत.
दलित या शब्दाची अनेकांना अँलर्जी अन वावडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा शब्द वापरु नये असा आदेश काढला आहे.
मात्र त्यासाठी चपखल किंवा पर्यायी असा शब्द अजून तरी शोधण्यात आलेला नाही.
शाहू पाटोळे यांचे `दलित किचन्स इन मराठवाडा' हे इंग्रजी पुस्तक हल्ली गाजते आहे.
आपल्या `भारत यात्रेत' राहुल गांधी यांनीसुद्धा त्यांची या संदर्भात भेट घेतली होती.
`दलित किचन्स' ऐवजी कुठला इतर चपखल बसणारा पर्यायी शब्द वापरता आला असता?
सुगावा प्रकाशनाने २०१८ साली प्रकाशित केलेल्या माझ्या 'डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद' या पुस्तकात ' निग्रो ते आफ्रिकन-अमेरिकन, अस्पृश्य ते दलित' या नावाचे एक प्रकरण आहे.
त्यात दलितांच्या आणि कृष्णवर्णीयांच्या संबोधनात होत गेलेल्या बदलाविषयी डॉ. जनार्दन वाघमारे यांचे एक विधान मी उदगृत केले आहे.
'नावात किती आशय असतो हे यावरून लक्षात येईल. कुणास ठाऊक, हे नावही उद्या बदलेल. 'दलित' हे नावदेखील पुढे कायम राहील ते छातीठोकपणे सांगता येणार नाही.''.
त्यावेळी मलासुद्धा असे वाटले नव्हते.
सुभाष चांदोरीकर हे प्रोटेस्टंटपंथीय मेथॉडिस्ट चर्चचे एक पाळक आणि अधिकारी राहिले आहेत.
आता निवृत्त झाले आहे. दलित चळवळीवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी काही सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत.
काल चांदोरीकर यांची त्यांच्या पुण्यातील नळ स्टॉपजवळील घरी भेट घेतली.
त्यांच्याबरोबर काही फोटोही घेतले.
त्यानिमित्त त्यांची समाजमाध्यमावर ही ओळख.
Camil Parkhe, May 14, 2025

Saturday, May 17, 2025


 व्हॅटिकन सिटीतल्या सिस्टाईन चॅपेलवरील चिमणीतून  बाहेर पडणारा आणि नव्या पोप निवडीचा संदेश देणारा पांढरा धूर नेहेमीच अनपेक्षित बातमी सांगत असतो. अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची म्हणून पोप लिओ चौदावे म्हणून निवड झाल्याने धक्कादायक वृत्त सांगण्याची ही परंपरा आताही कायम राहिली आहे. 

इतिहासात दीर्घकाळ केवळ इटालियन कार्डिनलची पोपपदावर निवड व्हायची.  त्याकाळात इटालियन कार्डिनल्स बहुसंख्य असायचे हे त्यामागचे प्रमुख कारण.  गेल्या शतकात पोलंडचे कार्डिनल कॅरोल वोज्त्याला  यांची पोप जॉन पॉल दुसरे यांची निवड झाल्यापासून ही परंपरा आतापर्यंत खंडित झाली आहे. 

मात्र अमेरिकेतील कार्डिनल या पदावर निवडून येतील कि नाही याबाबत उघड शंका व्यक्त केली जात होती. कॉलेज ऑफ कार्डिनलन्सने याबाबत धक्कादायक निर्णय घेतला हे नक्की. 

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर बुधवारी मार्च सात रोजी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरु झाले तेव्हा जगभरातील सर्व  कार्डीलन्स  संपूर्ण जगाला नैतिकच्या आधारे संदेश देऊ शकेल असे नवे नेतृत्व निवडण्यासाठी  स्वतःला एकत्र कोंडून घेत होते. 

या १३३ कार्डिनलांमध्ये भारतातील चार आणि आणि पाकिस्तानातील एक कार्डिनल्सचा  समावेश होता. . 

दुसऱ्या दिवशी गुरुवारी व्हॅटिकन सिटीतील सेंट पिटर्स बॅसिलिकेतील चिमणीतून दुसऱ्यांदा काळा धूर बाहेर आला.

याचा अर्थ दोनदा निवडणूक पार पडल्यानंतर नूतन पोपबाबत   दोन तृतियांश मतदान कुणाही उमेदवाराला मिळालेले नाही. 

जोपर्यंत दोन तृतियांश मतदान कुणाही कार्डिनलला मिळत नाही, तोपर्यंत  मतदान होत राहते.  

ही निवडणूक प्रक्रिया किती काळ चालेल याविषयी  काहीही  अटकळ बांधता येत नाही. 

त्यामुळे गेले काही दिवस सेंट पिटर्स चौकात मोठ्या औत्सुक्याने जमलेल्या भाविकांना किंवा जगभरातील इतर लोकांना  चिमणीतून पंधरा धूर कधी येईल आणि नवे पोप कोण असतील, युरोप कीं इतर कुठल्या खंडातील आणि कुठल्या देशातील असतील याबाबत जाम औत्सुक्य होते . 

बुधवारी   'Extra omnes', लॅटिन भाषेतील हे परवलीचे वाक्य उच्चारत  'everyone out'  ज्यांनी वयाची ऐशी पार केली आहे अशा सर्व कार्डीलन्सनी आणि इतर संबंधित नसलेल्या लोकांनी आपली रजा घ्यावी असे सांगण्यात आले.   

 त्यानंतर पोपपदाच्या निवडणुकीत आणि या पदासाठी पात्र असलेल्या  जगातील १३३ रेड हॅटधारी कार्डिनल्स हेच फक्त सेंट सिस्टाईन चॅपलमध्ये राहिले.

या प्रकियेचे सूत्रधार असलेल्या कार्डिनलसने चॅपेलच्या प्रवेशद्वार आतून बंद केले. बाहेरच्या लोकांनीसुद्धा ते दार बाहेरुन कुलूपबंद केले. 

आतल्या लोकांचा आणि बाहेरच्या लोकांचा एकमेकांशी संपर्क साधण्याचा कुठलाही मार्ग ठेवलेला नाही. 

पहिल्याच दिवशी या कार्डिनल्सनी मतदान केले आणि हे बाहेर सगळ्या जगाला कळले. 

चिमणीतून बाहेर आलेल्या काळ्या  धुरामुळे. 

पोप निवडण्यासाठी आवश्यक मताधिक्य मिळाले नाही हे सांगण्यासाठी ही पारंपरिक प्रथा आजही पाळली जाते. 

ज्यावेळी नवीन पोप निवडले जातील तेव्हा काही क्षणातच सिस्टाईन चॅपेलच्या  चिमणीतून पांढरा धूर सोडला जातो . 

आपला लाल झगा आणि लाल हॅटऐवजी  शुभ्र झगा घालून नवे पोप बॅसिलिलातील चौकात जमलेल्या लोकांना सामोरे जातात  आणि आपली नवी ओळख - पोप म्हणून आपले नाव - जगाला सांगतात . 

नूतन पोप जगातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. दीर्घकाळानंतर कॅथोलिक चर्चला तळगाळात काम करायचा अनुभव असलेला एक मिशनरी पोप लाभला आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरु या  देशात रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांनी आधी एक धर्मगुरु म्हणून आणि नंतर बिशप म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. 

पेरु इथे कार्यरत असताना या देशाचे ते नॅचरलाईज्ड सिटीझन बनले. त्यामुळे पोपपदी निवड होण्याआधी ते अमेरिकेचे आणि त्याचत्याबरोबर ते पेरु या लॅटिन अमेरिकेतील देशाचेही नागरिक  होते.  पोप लिओ चौदावे बनल्यानंतर त्यांचे या दोन्ही देशांचे नागरीकत्व पूर्णतः अर्थहीन बनले आहे. याचे कारण तहहयात पोप या नात्याने व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात चिमुकल्या राष्ट्राचे ते आता केवळ नागरिक नाही तर राष्ट्रप्रमुख बनले आहेत. 

कॅथोलिक  चर्चमध्ये रिलिजियस आणि सेक्युलर किंवा डायोसिसन म्हणजेच धर्मप्रांतीय असे दोन प्रकारचे धर्मगुरु असतात. सेक्युलर किंवा डायोसिसन (धर्मप्रांतीय) धर्मगुरु स्थानिक धर्मप्रांताचे मुख्य असलेल्या बिशपांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात.  

एखादी व्यक्ती आपल्या देशातील अथवा जगातील कुठलाही धर्मप्रांत आपल्या कार्यासाठी निवडू शकते. उदाहरणार्थ, फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे वसई धर्मप्रांताचे म्हणजे धर्मप्रांतीय धर्मगुरु होते तर नाशिक धर्मप्रांताचे पहिले बिशप बनलेले फादर थॉमस भालेराव हे जेसुईट धर्मगुरु किंवा सोसायटी ऑफ जिझस (येशूसंघ) या संघटनेचे सदस्य होते. 

याउलट  `रिलिजियस' धर्मगुरु आणि नन्स असतात. कॅथोलिक चर्चमध्ये धर्मगुरुंच्या आणि नन्सच्या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ, डॉन बॉस्को किंवा सालेशियन्स, जेसुईट्स,  फ्रान्सलियन्स,  मदर तेरेसा किंवा मिशनरीज ऑफ चॅरीटी सिस्टर्स, फातिमा सिस्टर्स, वगैरे. या संघटनेच्या धर्मगुरुंना आणि धर्मभगिनींना म्हणजे नन्स यांना कॅथॉलिक चर्चमध्ये रिलिजियस असे संबोधले जाते.  संपूर्ण जग म्ह्नणजे जिथेजिथे त्यांच्या संस्थेचे कार्य आहे, तिथपर्यंत त्यांच्या कार्याची सीमा असते. 

चर्चमधील धर्मगुरुंच्या आणि धर्मभगिनींच्या सर्व संघटना  पोप यांच्या संमतीनेच स्थापन होऊ शकतात.  कॅथोलिक परमाचार्य म्हणून  २०१३ साली निवड झालेले  पोप फ्रान्सिस हे येशूसंघ किंवा जेसुईट या धर्मगुरुंच्या संस्थेचे पहिले पोप होते. त्याचप्रमाणे पोप लिओ चौदावे हे कॅथोलिक धर्मगुरुंच्या ऑर्डर ऑफ सेन्ट ऑगस्टीन (ओएसए) या  संस्थेचे आता पहिले पोप बनले आहेत.  

पोप लिओ चौदावे यांना भारत मुळीच अपरिचित नाही.  देशातील अनेक कॅथोलिक धर्मगुरुंना आणि बिशपांना नूतन पोप चांगले परिचित आहे. याचे कारण बिशप असताना रॉबर्ट फ्रान्सिस प्रीहोस्ट यांनी भारताला दोनदा भेट दिलेली आहे. 

ऑर्डर ऑफ सेंट ऑगस्टीन  (ओएसए ) या आपल्या धर्मगुरुंच्या संघटनेचे प्रमुख या नात्याने भारतातील या संघटनेच्या केरळ आणि तामिळनाडू येथील विविध संस्थांना २००४ आणि २००६ साली त्यांनी भेटी दिल्या होत्या. 

या दौऱ्यांच्या वेळी त्यांचे यजमान असणाऱ्या धर्मगुरुंनी प्रीहोस्ट यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.  पोपपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या भारतभेटीतील अनेक छायाचित्रे समाजमाध्यमांवर  झळकली आहेत. उदाहरणार्थ, नाशिकचे त्यावेळचे बिशप लुर्डस डॅनियल यांच्यासमवेत बिशप प्रीहोस्ट यांनी मिस्साविधी साजरा केला होता. 

जगभरातील कॅथोलिक समुदायाचे पोप हे प्रमुख आहेत. ऐतिहासिक कारणांमुळे पोपपदाला भारतासह विविध राष्ट्रांनी  व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख  म्हणूनही मान्यता दिलेली आहे.  त्यामुळेच पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यविधीला जगभरातील दिडशेहून अधिक राष्ट्रांचे नेते उपस्थित होते, या नेत्यांमध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा समावेश होता.  

कार्डिनलांच्या कॉन्क्लेव्हमध्ये नवीन पोपबाबत निर्णायक मतैक्य झाल्यानंतर सिस्टाईन चॅपेलच्या चिमणीमधून काळ्या धुराऐवजी पांढरा धूर सोडला जातो आणि काही क्षणातच सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या मुख्य गॅलरीत निर्वाचित पोपना आणले जाते.  लॅटिनमध्ये `"हॅबेमस पापम"  (वूइ हॅव्ह अ पोप)  असे  संपूर्ण जगाला सांगून नवीन पोपची ओळख करुन देण्यात येते. त्याचवेळी नवीन पोप आपल्या जुन्या नावाचा त्याग करुन आपली नवी ओळख सांगतात. 

परंपरेनुसार आपले मूळ नाव म्हणजे बारशाच्या  किंवा बाप्तिस्मावेळी मिळालेले नाव वगळून दुसरे इतर कुठलेही नाव नूतन पोपना घ्यावे लागते.  येशू ख्रिस्ताचा शिष्य आणि पहिले पोप असलेल्या पहिला पोप असलेल्या सेंट पिटरचे मूळचे नाव सायमन (शिमोन) असे होते. हिच प्रथा आजही पाळली जाते.  

तेरा वर्षांपूर्वी अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बेर्गोग्लीओ यांची पोप म्हणून निवड झाली तेव्हा त्यांनी फ्रान्सिस हे नाव धारण केले. फ्रान्सिस या नावाचे ते पहिलेच पोप.

सेंट पिटर यांचा २६७वे  वारसदार म्हणून निवड झाल्यानंतर कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीहोस्ट यांनी पोप लिओ चौदावे असे नाव धारण केले.  पोप लिओ तेरावे यांचा कार्यकाळ फेब्रुवारी १८७८ ते जुलै १९०३ असा पंचवीस वर्षांचा होता.  तात्कालीन औद्योगिक क्रांती आणि कामगारांची स्थिती  याबाबत पोप लिओ तेरावे यांनी महत्त्वाचा सिद्धांत मांडला होता. 

सद्याची औद्योगिक परिस्थिती  आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण केलेली आव्हाने यामुळे आजची स्थिती तेव्हापेक्षा फारशी वेगळी नाही, त्यामुळे आपण लिओ हे नाव धारण करत आहोत असे नूतन पोप यांनी त्यांना निवडणाऱ्या सहकारी कार्डिनल्सना सांगितले आहे.  

विशेष म्हणजे पोपपदावर येण्याआधीच समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले पोप लिओ चौदावे पहिलेच आहेत. आधी ट्विटर  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्स समाजमाध्यमावर कार्डिनल प्रीहोस्ट यांचे स्वतःचे अकाऊंट  होते. अलीकडेच सिस्टाईन चॅपेलच्या चिमणीतून बाहेर पडणारा पांढरा धूर आणि त्यानंतर नव्या पोपची जगाला करुन दिलेली ओळख असे ऐतिहासिक क्षण माझ्यासह जगभरातील असंख्य  लोकांनी समाजमाध्यमांवर पहिल्यांदाच अनुभवले असतील. या प्रभावशील समाजमाध्यमांचा नवीन पोप पुरेपूर उपयोग करतील असे दिसते.

रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५५ रोजी शिकागो, इलिनॉय येथे झाला होता. मिश्र वांशिक वारसा त्यांना लाभलेला आहे.  फ्रेंच आणि इटालियन वंशाचे लुई मारियस प्रीव्होस्ट आणि स्पॅनिश वंशाच्या मिल्ड्रेड मार्टिनेझ हे त्यांचे आईवडील.  रोम येथेच १९८२ साली त्यांना धर्मगुरुपदाची दीक्षा मिळाली. पोप फ्रान्सिस यांनी प्रीव्होस्ट यांची बिशपपदावर २०१५ साली नियुक्ती केली आणि केवळ दोन वर्षाआधीच २०२३ ला पोप फ्रान्सिस यांनी  त्यांना कार्डिनलपदाची `रेड हॅट'  दिली होती.

त्यामुळे पोपपदासाठी यावेळी निवडणुकीत सहभागी होणाऱ्या कॉलेज ऑफ कार्डिनल्समध्ये प्रीहोस्ट तसे खूप ज्युनियर होते. तरीसुद्धा त्यांची पोपपदी निवड झाली याचा अर्थ केवळ ज्येष्ठतेपेक्षा इतर अनेक महत्त्वाचे निकष त्यांच्या निवडीसाठी वापरले गेले होते.  कॅथोलिक धर्मपिठाने युरोपकेंद्रित न राहता इतर जगाकडेही  लक्ष द्यावे असा स्पष्ट संदेश चर्चच्या कॉलेज ऑफ कर्डिनल्सने सलग दुसयांदा दिलेला आहे.  

सत्तर देशांतील १३३ कर्डिनल्सनी हा निर्णय घेतला आहे, त्या कार्डिनल्समध्ये भारतातील  गोवा आणि दमणचे कार्डिनल फिलिप नेरी फेराव (वय ७२), वंचित समाजातील पहिलेच असलेले हैदराबादचे कार्डिनल अँथनी पुला (६३), केरळमधील सिरो मलांकार कॅथोलिक चर्चचे कार्डिनल बॅसिलिओस क्लिमिस  (६४) आणि  कार्डिनल जॉर्ज जेकब कुव्वाकड (५१) यांचा समावेश होता. यंदाच्या पेपल कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वाधिक तरुण कार्डिनल्समध्ये  नुकतीच पन्नाशी ओलांडलेल्या  जॉर्ज जेकब कुव्वाकड होते.  

नूतन पोप यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. जगभरात युद्धे, अतिरेकी कारवाया अशा कारणांमुळे होणारा हिंसाचार, स्थलांतरीतांचे प्रश्न, मानवी मूलभूत हक्क, आर्थिक विषमता, वंचित आणि उपेक्षित समाजघटक यासंदर्भात  पोप यांनी ठाम भूमिका घ्यावी अशी नेहेमीच अपेक्षा असते.  त्याशिवाय चर्चअंतर्गत अनेक समस्यांना पोप लिओ यांना सामोरे जावे लागेल.

नवीन पोप उदारमतवादी, सनातनी कि मध्यममार्गी आहेत ?  गेल्या शतकाच्या मध्यंतरानंतर पार पडलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनंतर झालेल्या बहुतेक सर्व पोपमहाशयांनी सुधारणावादी भूमिका घेतलेली दिसते. साठच्या दशकात पोप पॉल सहावे यांनी जगभ्रमंतीला सुरुवात केली ती जॉन पॉल दुसरे आणि अलीकडे पोप फ्रान्सिस यांनी चालू ठेवली होती. 

एकोणसाठ वयाचे पोप लिओ तसे तुलनेने वयाने तरुण आहेत. ऑगस्टीन फादरांच्या संघटनेचे सलग दोनदा प्रमुख या नात्याने भारताबरोबरच विविध देशांत त्यांचा संचार राहिलेला आहे. त्यामुळे कॅथोलिक चर्चला  भेडसावणाऱ्या विविध समस्यांची त्यांना  पुरती जाणीव असेल.  

कॅथोलिक चर्चचे अनेक धर्मसिद्धांत आणि परंपरा आज कालबाह्य झालेल्या आहेत.  याबाबत नवीन पोप काय करतात याकडे चर्चमधील आणि चर्चबाबत अपेक्षा बाळगणाऱ्या बाहेरच्या लोकांचेही लक्ष असेल. चर्चच्या दैनंदिन आणि इतर कारभारांत स्त्रियांचा सहभाग, स्त्रियांना पौरोहित्याचे अधिकार याबाबत प्रागतिक म्हणून गणल्या जाणाऱ्या  जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिकट आणि पोप फ्रान्सिस या सर्वांची भूमिका मात्र  'जैसे थे' वादी होती,   पोप लिओ यांनी याबाबत उदारमत स्वीकारावे अशा चर्चमधील आणि बाहेरील अनेक लोकांचा सूर आहे. नूतन पोप याबाबत काय भूमिका घेतात याबाबत जगभर औत्सुक्य असेल.

 Camil Parkhe 

^^^^

Monday, May 12, 2025


 फुले' चित्रपट पाहिला.

चित्रपट तसा मी सिनेमागृहात किंवा घरीही कधी पाहत नाही.
गेली तिनेक वर्षे सावित्रीबाई आणि जोतिबा फुले या क्रांतिकारक दाम्पत्याला शिकवणाऱ्या आणि घडवणाऱ्या नगरच्या सिंथिया फरार, पुण्यातले स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल, त्यांच्या पत्नी मार्गारेट मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्याविषयी मी वाचत आणि लिहित असल्याने या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता होती.
`फुले' चित्रपटाने निराश केले नाही.
ऐतिहासिक व्यक्तींच्या फोटोअभावी प्रत्यक्षात त्या कशा दिसत असतील, त्यांचा कसला पेहेराव असेल याविषयी आपल्या मनात काहीच आखाडे नसतात.
ही पात्रे पडद्यावर जिवंत होऊन वावरतात तेव्हा त्यांच्याविषयी मनात वेगळीच प्रतिमा निर्माण होते.
मराठी चित्रपट `सत्यशोधक' ची सुरुवातच होते ते जोतीबा आणि त्याचे सवंगडी स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या शाळेत शिकतात अशा प्रसंगाने.
हिंदी `फुले' चित्रपटात सावित्रीबाई ज्यांच्याकडे अध्यापनाचे धडे शिकतात त्या नगरच्या अमेरिकन मिशनरी मिस सिंथिया फरार यांच्यावर अनेक दृश्ये चित्रित केली आहेत.
या सिंथिया फरारबाईंचे पहिलेवहिले चरित्र मी मराठी आणि इंग्रजीत लिहिले असल्याने ही दृश्ये पाहताना विशेष आनंद वाटला.
जोतिबा आणि सावित्रीबाईंच्या शाळेतील निबंध लिहिणारी विद्यार्थीनी मुक्ता हिच्यावरसुद्धा या चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
हा निबंध जोतिबांकडून मिळवून नगरच्या `ज्ञानोदय' मासिकाने १८५५ सालीच छापला होता आणि त्यामुळे या पहिल्यावहिल्या दलित लेखिकेची कलाकृती जतन झाली.
यशवंत जोतिबा फुले यांचाही चित्रपटात वावर आहे.
हा चित्रपट हिंदीत आहे याबद्दल विशेष आनंद, जोतिबांचे कर्तृत्व राष्ट्रीय पातळीवर नेण्यास त्यामुळे निश्चितच मदत होईल .
चित्रपटगृहात बऱ्यापैकी गर्दी होती. चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.
Camil Parkhe May 4, 2025

Sunday, May 11, 2025

 माझा एक खूप जुना छंद आहे. माझी बाग फुलवण्याच्या, झाडे लावण्याच्या आणि त्यांची देखभाल करण्याच्या आवडीशी संबंधित हा छंद आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर दोनतीन मोठे पाऊस होऊन गेले की फिरायला गेल्यावर किंवा रस्त्याने कुठेही चालत असलो की माझी नजर रस्त्याच्या कडेला आजूबाजूला भिरभिरत असते.

रस्त्याच्या कडेला इमारतींच्या कुंपणांच्या भितीला लागून असलेल्या मातीत भरपूर गवत असते, त्याचबरोबर तेथे उगवलेली अनेक छोटीछोटी रोपटी वाऱ्याच्या झुळुकीने डोलावत असतात.
यापैकी काही रोपे मला आकर्षित करत असतात.
त्यात हमखास काही झेंडूच्या, अबोलीच्या किंवा गुलबकावलीच्या फुलांची रोपे असतात, काही टमाट्याची तर काही मिरच्यांची रोपे असतात.
सणावाराला वापरलेली झेंडूची फुले सुकल्यानंतर अशीच कुठेतरी पडतात आणि त्यातील काही बिया पावसानंतर मग अशा रोपांच्या अवतारात प्रकटतात. मिरच्या आणि टमाट्याच्या बियांचेही असेच होत असते.
पिंपळ, वड, उंबर आणि कडुनिंबांच्या अतिशय चिवट असणाऱ्या रोपांबद्दल तर बोलायलाच नको. जिथेतिथे मातीचा आसरा मिळेल तिथे या झाडांची रोपे आपली मुळे घट्ट रोवत असतात.
यापैकी झेंडू, टमाटे आणि मिरच्यांची रोपे अलगद मातीसह उपटून मी घरी आणतो आणि छोट्यामोठ्या कुंड्यांत ती लावतो. यानंतर काही दिवसांत या नव्या जागेत ही रोपे तरारतात आणि गणपती उत्सवात आणि त्यानंतरच्या नवरात्र- दसरा सणांत इमारतींमधल्या अनेक शेजाऱ्यांना वेगवेगळ्या रंगांतल्या ही झेंडूची टपोरी फुले खुणावत असतात. फुले वाढवण्याची माझीही तपस्या सार्थकी झालेली असते. त्यामुळे एखाददुसरे फुल कोणी माझ्या नकळत कुणी नेले तरी अशावेळी फार त्रागा करायचा नसतो हे मी शिकलो आहे.
पण आता मी सांगत असलेला माझा हा छंद लवकरच भुतकाळ होईल कि काय अशी भीती मला गेली काही दिवस वाटते आहे.
याचे कारण आमचे शहर हे महाराष्ट्रातल्या स्मार्ट सिटींपैकी एक आहे आणि देशांतल्या स्मार्ट सिटींच्या स्पर्धेत वरचा क्रमांक गाठण्यासाठी येथे नवनवीन विकासाचे प्रयोग हाती घेतले जात आहेत.
एक मात्र मान्य करायलाच हवे कि या स्मार्ट सिटी कार्यक्रमामुळे शहरात खूप बऱ्यापैकी स्वच्छता दिसायला लागली आहे. मात्र याच अभियानातर्गत शहरात ठिकठिकाणी काँक्रिटचे रस्ते बांधण्यात येत आहेत, या रस्त्यांलागूनच सगळीकडे पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत, त्यामुळे रस्त्यांवरची धूळ आता कमी झाली आहे.
याचीच एक उणी बाजू म्हणजे जोरदार फटका असा कि या रस्त्यांच्या आजूबाजूच्या परीसरात जमीन आणि माती आता अजिबात दिसेनाशी झाली आहे. या रस्त्यांवर जी काही झाडी आधीच होती त्यांच्या आळ्याभोवती नरडे दाबावे अशा पद्धतीने झाडाच्या मुळाभोवती काँक्रीट लावले आहे कि एक थेंब पाणीही जमिनीत झिरपू नये.
सुरुवातीला हे काँक्रिट रस्ते काही ठराविक भागांतच असतील असे वाटले होते पण महापालिकेने ही मोहीम सर्व शहरभर राबवण्याचा धडाका लावला आहे आणि त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असू शकेल असे वाटते आहे.
आता पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होणार आहे. त्याऐवजी पावसाचे पाणी काँक्रिटच्या रस्त्यांवरुन आणि पेव्हर ब्लॉकवरुन वाहून थेट नाल्यात आणि जवळच्या नदींत मिळणार आहे.
याचाच अर्थ शहरातील जमिनीखालील पाण्याची पातळीही कमी होणार आहे आणि शहराच्या अनेक भागांत बाराही महिने बऱ्यापैकी पाणी असणाऱ्या बोअर वेल्स आता कोरड्या राहणार आहेत.
शहरात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने मोकळी जागा असेल तिथे कितीतरी प्रकारची रोपे आणि झाडे उगवतात, काही छानपैकी तग धरून राहतात आणि मग चांगली मोठी होतात. अशाप्रकारची नैसर्गिक वृक्षारोपणाची प्रक्रिया आता मोकळी जमीन आणि मातीच शिल्लक नसल्याने ठप्प होणार आहे आणि त्यामुळे पर्यायाने हिरवे आच्छादन कमीकमी होत जाणार आहे.
एक झाड किती पक्षांना, प्राण्यांना आसरा देते, अन्न देते हे सांगायलाच नको. मी शहरात राहत असलो तरी तीसपस्तीस वर्षे जुन्या असलेल्या आमच्या कॉलनीत आजही गर्द झाडी आहेत. त्या झाडांवर दिवसरात्र अनेक पक्षी - कोकिळ, पोपट, बुलबुल, खंड्या आणि हॉर्नबिल वगैरे - कायम संचार करत असतात.
माझ्या कॉलनीसमोरच असलेल्या टाटा मोटार्स या वाहननिर्मितीच्या कारखान्यात असलेल्या झाडांमध्ये वटवाघळांची मोठी वसाहत आहे, सुर्यास्तानंतर हे निशाचर पक्षी आपली वसाहत सोडून अन्नाच्या,भक्ष्याच्या शोधात मोठ्या संख्येने बाहेर पडताना रोज दिसतात. दिवसभर पाचसहा खारुताई जमिनीवरुन, इमारतींच्या बाल्कनीच्या सज्ज्यांवरुन या झाडांवरून त्या झाडांवर सारख्या फिरत असतात,
मानवी वसाहत वाढत गेल्याने काही वर्षांपासून तळमजल्यांवरच्या फ्लॅट्समध्ये नाग-साप सापडण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे. शहरातले हरीत आच्छादन असे कमी होत गेल्याने अशा कितीतरी पक्ष्यांना आणि प्राण्यांचे अस्तित्वच नाहिसे होत जाणार आहे.
वाघ, सिंह, हत्ती, गेंडा, गवा वगैरे प्राणी त्यांच्या राहण्याच्या नैसर्गिक जागा कमी होत असल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी शहरांत आणि गावांत मानवी वसाहतीचा अविभाज्य भाग असलेले गायबैल, म्हशी, घोडे, कोंबड्या, गाढव असे पाळीव प्राणीही संख्येने कमी होत चालले आहेत.
खूप वर्षांपूर्वी मी या शहरात राहायला आलो तेव्हा कॉलनीतल्या इतर इमारतींच्या बांधकामासाठी माती, मुरुम वगैरे सामानाच्या वाहतुकीसाठी गाढवांचा सर्रासपणे वापर होत असे. ती वाहतूक पाहताना ' गाढव मेले ओझ्याने आणि शिंगरु मेले हेलपाट्याने' ही म्हण हमखास आठवायची.
महाबळेश्वरसारख्या परिसरांत वर्षभर डांबरी रस्त्यावर धावत्या वाहनांच्या चाकांखाली चिरडले गेलेले अनेक साप, आणि इतर सरपटणारे प्राणी दिसतात. काही वेळेस हरणासारखे प्राणी वाहनांच्या धडकेने जखमी होऊन रस्त्यावर निपचितपणे पडलेले दिसतात.
परवा आमच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पूर्ण वाढ झालेला एक बेडूक सलग दुसऱ्या दिवशी दिसला तेव्हा कितीतरी वेळ मी त्या टुणकन उड्या मारणाऱ्या प्राण्याकडे कौतुकाने पाहत राहिलो.
मनात म्हटल पावसाच्या आगमनाची वर्दी द्यायला महाशय आपला सुप्तावस्थेचा काळ संपवून जमिनीवर आलेले दिसतात.
आजकाल आपल्या कांतीचा रंग बदलणारे सरडे, घोरपडीसारखे सरपटणारे प्राणी, ऊन आणि पावसाच्या लपंडावाच्या खेळात उडणारी फुलपाखरे , मुंगूस अशा सजिवांचे दर्शन किती दुर्लभ झाले आहे.
आज शहरात घोड्यांप्रमाणे गाढव हा प्राणी नाहीसा झाला आहे. गुजरातच्या सीमेवर असलेल्या दादरा, नगर हवेली या प्रदेशात मी राहायला गेलो कि तिथे रस्त्यांवर आणि सगळीकडे `चिवचिव' करत उडणाऱ्या चिमण्या मी पाहतच राहतो.
आमच्या शहरात चिमणी कितीतरी वर्षांपासून हद्दपार झाली आहे.
आणि हे सर्व होत आहे ते मानवजातीच्या विकासाच्या आणि सुखसोयींच्या नावाखाली. यात पृथ्वीतलावरच्या इतर छोट्यामोठ्या प्राणिमात्रांना, वृक्षवल्लींना अजिबात स्थान नाही. मध्ययुगीन काळात हे संपूर्ण विश्व पृथ्वीकेंद्रित आणि मानवकेंद्रित आहे असा समज होता.
या विश्वात कितीतरी सुर्यमालिका आणि आकाशगंगा आहेत या सिद्ध झाल्याने आज हा समज गैरलागू ठरतो. मात्र मानवजात आपल्या सुखसोयी आणि विकास यांचा पाठलाग करताना आजही हे विश्व मानवकेंद्रित आहेत असेच गृहित धरले जाते हे खूप वाईट आहे.
बायबलमध्ये महाप्रलयाची किंवा जगबुडीची एक कथा आहे. देवाच्या संकेतानुसार आधीच एक महाकाय नौका बांधलेला नोहा आणि त्याने आपल्याबरोबर घेतलेल्या प्रत्येक प्राण्याच्या आणि पक्ष्यांच्या नर-मादीच्या जोड्या या जगबुडीतून वाचतात.
पाऊस आणि प्रलय ओसरल्यानंतर बाहेर काय स्थिती आहे हे जाणण्यासाठी नोहा एका कबुतराला नौकेबाहेर सोडतो.
हे कबुतर काही काळाने आपल्या चोचीत ऑलिव्ह वृक्षाची काही पाने घेऊन परतते.
जगभर आजही ऑलिव्ह वृक्षाची फांदी चोचीत असलेले कबुतर सुख-शांतीचे प्रतिक समजले जाते ते या कथेमुळेच.
आपल्या स्वतःच्या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा आणि इतर प्राणिजनांचा समूळ नाश करत मानवजात आपल्या विनाशाच्या दिशेने जात आहोत याबाबतची धोक्याची घंटा पर्यावरणवादी आणि इतरजण वाजवत असतात.
अशावेळी या विश्वाच्या एखाद्या कोपऱ्यात, दूरच्या कुठल्यातरी परग्रहावर आश्रयासाठी आणि जिवंत राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे का याची चाचपणी करण्यासाठी प्रयत्न खरे तर कधीच सुरु झाले आहेत.
नोहाकडे ऑलिव्ह वृक्षाची फांदी घेऊन परतलेल्या कबुतराने नौकेबाहेर आता सगळे काही अलबेल आहे अशी शुभवार्ता आणली होती. पर्यावरणाचा नाश करण्याच्या मोहिमेला मानवाने वेळीच थांबवले नाही तर अगदी हताश होऊन अशाच प्रकारच्या दूरवरच्या एखाद्या परग्रहावरून येणाऱ्या संकेतांची, शुभवार्तेची पुढच्या पिढयांना वाट पाहावी लागणार आहे.
त्या वार्तेची अगदी आतुरतेने प्रतिक्षा करण्याची वेळ लवकर न येवो ! मात्र त्यासाठी मानवाने आपला विनाश जवळ आणण्यासाठी सद्या चालू ठेवलेल्या प्रयत्नांस तातडीने आवर घालायला हवा.
---

Friday, May 2, 2025

 सायमन मार्टिन

वसईची पहिल्यांदा ओळख झाली ती शालेय पाठ्यपुस्तकातून. चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेला अरबी समुद्रकिनारचा वसईचा किल्ला जिंकून घेते असा इतिहासातील तो एक धडा होता.
त्याआधी वसई येथे सत्ता असलेल्या पोर्तुगीजांनी सात बेटांचे मुंबई बंदर ब्रिटिशांना लग्नात चक्क आंदण किंवा हुंडा म्हणून दिले होते आणि या घटनेने कालांतराने भारतीय उपखंडाचा इतिहास बदलला होता.
लहानपणापासून वसई डोक्यात राहिली होती ती अशा पाठ्यपुस्तकातील नोंदीतून.
नंतर `फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची वसई' अशी एक नवी ओळख निर्माण झाली.
तर या वसईशी नंतर माझे घट्ट ऋणानुबंध निर्माण होतील असे कधी वाटलेही नव्हते, मात्र पुण्यातील मॉडेल कॉलनीतील विद्याभवन शाळेचे प्रिंसिपल फादर नेल्सन मच्याडो यांच्यामुळे असे झाले.
त्यामुळे गेली तिसेक वर्षे वर्षातून किमान एकदा माझी वसईला भेट असतेच.
मागच्या महिन्याअखेरीस पुन्हा एकदा वसईला तीन दिवसांचा दौरा झाला. आम्ही दोघेही गेलो होतो.
आणि यावेळचे निमित्त होते सायमन मार्टिन यांच्या " आत्म्याचे संगीत" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि मार्टिन यांनी २३ फेब्रुवारीला आयोजित केलेला तेरावा वसई साहित्य आणि कला उत्सव.
वसई आणि साहित्य व कला यांचे अत्यंत घट्ट नाते आहे.
तसे पाहिले तर पालघर जिल्ह्यात येणारा वसई हा एक तालुकावजा परीसर. मात्र या चिमुकल्या परिसराचा एक आगळावेगळा ऐतिहासिक अन सांस्कृतिक वारसा आहे.
गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश साडेचार शतके पोर्तुगीजांची वसाहत होता.
त्याचप्रमाणे अरबी समुद्राला लागून असलेला वसई परीसरसुद्धा अनेक वर्षे पोर्तुगालची वसाहत होता.
वसईतला एके काळी बहुसंख्येने असलेला कॅथोलीक किंवा ख्रिस्ती समाज या पोर्तुगालच्या राजवटीचा एक परिणाम.
१९६१ च्या गोवा मुक्तीनंतरसुद्धा तिथल्या निज गोंयकारांच्या तीन पिढयांना पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरीकत्व घेता येतो. यासाठी आजही भली मोठी रांग असते.
वसई काही शतकांआधीच पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त झाल्याने वसईतील लोकांना मात्र ही सुविधा नाही. .
मराठी ख्रिस्ती उपासनेत म्हणजे मिस्साविधींत मराठी गायने पेटी, तबला, किबोर्ड आणि गिटार वगैरे वाद्यांच्या सुरांत ऐकावी तर वसई येथेच. रविवारी आणि सणावारी देवळांत फादरांचे मराठीतील प्रवचनसुद्धा.
इथल्या कॅथोलीक समाजाने महाराष्ट्रातील मराठी साहित्य, आणि संस्कृती बहुविध आणि समृद्ध करण्याचे मोठे योगदान दिले आहे.
वर्षभर वसईत जितके साहित्यिक आणि सांस्कृतिक मेळावे आणि उत्सव होत असतात तितके मला वाटते महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही अशा छोट्याशा परिसरात होत नसतील.
सायमन मार्टिन यांच्या साहित्य मेळाव्यास हजर राहून मी परतत होतो तेव्हाच दुसऱ्या एका साहित्य मेळाव्याचे फलक माझ्या नजरेस पडले होते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मराठी साहित्यातील योगदान सर्वश्रुत आहे.
वसईतील इतर ज्येष्ठ साहित्यिकांमध्ये विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो, फादर फ्रान्सिस कोरीया, सिसिलिया कार्व्हालो, फादर मायकल जी. आणि कवी तसेच हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असलेल्या सायमन मार्टिन यांचा समावेश करता येईल.
नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर वसई परिसरातील एका अनोख्या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.
बिल्डरांच्या विळख्यातून हिरवाईने नटलेल्या वसईचे संरक्षण करावे या हेतूने सुवार्ता मासिकाचे संपादक असलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हरीत वसई हे आंदोलन सुरु केले होते तेव्हा या आंदोलनात सायमन मार्टिन खूप सक्रिय होते.
बिल्डर माफियाकडून जिवाला धोका पोहोचण्याची जोखीम पत्करून हे आंदोलन दीर्घकाळ चालू राहिले आणि काही प्रमाणात तरी वसई आजही हरीत राहिली आहे.
वसईच्या विविध गावांत फेरफटका मारताना तिथली हिरवाई आजही मला खूप आनंदीत करते आणि त्यावेळी हरीत वसई आंदोलनाची आपसूक आठवण येते.
सायमन मार्टिन गेली अनेक वर्षे भुईगाव डोंगरी येथील सहयोग केअर सेंटरच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. त्याशिवाय साहित्यिक आणि कार्यकर्ता म्हणून त्यांची लेखणी आणि वाणीसुद्धा परजत असते .
"आत्म्याचं संगीत " हा त्यांचा अकरावा काव्यसंग्रह.
एका बैठकीतून वाचून व्हावा असा हा काव्यसंग्रह आहे आणि त्यातील सर्वच कविता तर फक्त सात आठ ओळींच्या आहेत मात्र या कविता खूप आशयपूर्ण आहेत,
माझ्यासारखा कवितेशी फारसा किंवा काहीही संबंध नसलेला माणूससुद्धा सायमन मार्टिन यांच्या कविता असलेला हा छोटासा संग्रह एकदा हातात घेतल्यानंतर पूर्णतः वाचून मगच खाली ठेवतो.
सायमन मार्टिन यांच्या कवितांची अशी ताकद आहे.
अष्टगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाचे सुरेख मुखपृष्ठ आणि आतील चित्रे प्रदीप म्हापसेकर यांची आहेत.
या वसई भेटीच्या निमित्ताने आतापर्यंत फक्त इथेच नेहेमी भेटणारे सॅबी परेरा, ख्रिस्तोफर रिबेलो, इमेल अल्मेडा, जेरोम सायमन फर्गोज अशा अनेकांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली. साहजिकच फोटो सेशनही झाले.
साहित्य उत्सव संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी निवांतपणे सायमन मार्टिन यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही झाली.
त्या भेटीगाठी आणि चर्चेसंबंधी नंतर कधीतरी.

मिस सिंथिया फरार

गेले दोन दिवस नगरला होतो. या महिन्यातील नगर शहराला माझी ही दुसरी भेट.

मी मूळचा नगर जिल्ह्याचाच असलो तरी या शहरात मुक्कामी राहण्याचा याआधी कधीही प्रसंग आला नव्हता.
या दोन्ही वेळी मात्र अगदी मुद्दाम, ठरवून नगरला आलो होतो.
त्यामागचे कारण होते सिंथिया फरार यांच्या या कर्मभूमीतील वास्तूंमधील त्यांच्या पाऊलखुणा शोधण्याचे.
नगर शहरातला माळीवाडा भागातला हा परिसर हल्ली क्लेरा ब्रुस स्कूल या नावाने ओळखला जातो.
हे नामकरण मात्र अगदी अलीकडचे, म्हणजे १९७० सालाचे.
अमेरिकन मिशनच्या नगरमधील तीन शाळा विसाव्या शतकापर्यंत `फरार स्कूल्स' म्हणूनच ओळखल्या जायच्या.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या चरित्रांत फरारबाईंचा हमखास उल्लेख होतो. न झाल्यास ती चरित्रे अपूर्ण ठरतात.
याचे कारण म्हणजे नगर येथे फरार मॅडम यांच्या मुलींच्या शाळेस सदाशिवराव गोवंडे यांच्याबरोबर भेट देऊन, फरार बाईंशी बोलून प्रभावित होऊन आपण पुण्यात परतलो आणि मुलींशी शाळा सुरु केल्या, असे खुद्द जोतिबांनी लिहिले आहे.
सावित्रीबाई फुले यांनी नगरला याच आवारात फरारबाईंकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले, हेसुद्धा सर्वश्रुत आहे.
मिस सिंथिया फरार अमेरिकेतून २९ डिसेंबर १८२७ रोजी भारतात मुंबईत आल्या.
मुंबईत भेंडी बाजार वगैरे ठिकाणी त्यांनी अमेरिकन मिशनच्या मुलींच्या शाळा चालवल्या. आजारपणामुळे त्या १८३७ ला मायदेशी गेल्या मात्र १८३९ साली त्या भारतात परत आल्या.
तेव्हापासून आपली पूर्ण हयात त्यांनी नगर येथे मुलींना ज्ञानदान करण्यात, त्यांना साक्षर आणि सबल कऱण्यात घालवली.
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ जानेवारी १८६२ ला नगर येथेच त्यांचे निधन झाले, इथेच त्यांना चिरविश्रांती देण्यात आली.
भारतात मुलींच्या शिक्षणासाठी अत्यंत मौल्यवान योगदान करणाऱ्या या मिशनरी महिलेच्या कार्याच्या साक्षी असणाऱ्या विविध वास्तू आणि वस्तू काल दिवसभर अगदी निरखून पाहताना मी खरेच भावुक झालो होतो.
मराठी मिशनच्या अध्यक्षा डॉ. विजया जाधव यांच्या सौजन्यामुळे ही भेट शक्य झाली होती.
सावित्रीबाई प्रशिक्षणासाठी इथेच काही महिने राहिल्या होत्या.
आज नगरमध्ये किंवा इतरही ठिकाणी सिंथिया फरार हे नाव फारसे परिचित नाही. इथे त्यांचा एकही फोटो सापडणार नाही.
पंचवीस - तीस एकर परीसर असलेल्या मराठी मिशनच्या या आवारातील एकाही शाळेला किंवा संस्थेला फरारबाईंचे नाव देण्यात आलेले नाही.
असे असले तरी सिंथिया फरारबाईंचे स्त्रीशिक्षण क्षेत्रातील योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
महिला दिनानिमित्त फरारबाईंना आदरांजली !


                                                             अनिल दहिवाडकर

 काल दुपारी २ वाजून २४ मिनिटाला वाजता माझ्या व्हॉटस्अप वर हा मॅसेज आला होता...

`चर्चबेल' वाचायला घेतले.'
'चर्चबेल, पोळा सण, ख्रिसमस ,डान्स आणि सोरपोतेल' असे लांबलचक नाव असलेले माझे नवे पुस्तक (चेतक प्रकाशन) अलीकडेच अनिल दहिवाडकर यांना दिले होते.
त्यांच्या प्रतिसादाची मला उत्सुकता होतीच.
तो मॅसेज थेट संध्याकाळी सातला पाहिल्यानंतर आनंदून मी स्म्यायली इमोजी डकवली होती.
मात्र त्यानंतर पाचेक मिनिटांत अनिल दहिववाडकरांचा उत्तरादाखल मॅसेज आला अन् माझा आनंद खरोखरच द्विगुणित झाला.
कोण आहेत हे अनिल दहिवाडकर ?
माझ्या फेसबुक मित्रांच्या यादीतल्या अनेक लोकांना त्यांची माहिती नसणार म्हणून हा माझा प्रपंच..
दहिवाडकर सर याबद्दल राग मानून घेणार नाही याची मला खात्री आहे.
वयाची ऐंशी पार केलेले अनिल दहिवाडकर ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक आहेत.
पंचाहत्तरी पार केल्यानंतर त्यांनी पूर्ण केलेला ३८० पानांचा एक मोठा प्रकल्प म्हणजे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा'. (प्रकाशक ख्रिस्ती साहित्य प्रसारक)
या सूचीत सतराव्या शतकात मराठीतील पहिले मुद्रीत पुस्तक ( रोमन लिपीत ) लिहिणारे फादर थॉमस स्टीफन्स आणि विल्यम कॅरी यांच्यासारख्या अनेक परदेशी व्यक्ती आणि आजघडीला साहित्यरचना करणाऱ्या देशी व्यक्ती यांची संक्षिप्त चरित्रे, लिहिलेली पुस्तके, प्रकाशने, किंमत वगैरेची माहिती देण्यात आली आहे.
श्री. म. पिंगे यांच्या 'युरोपियनांचा मराठीचा अभ्यास' (व्हीनस प्रकाशन -१९५९) आणि गंगाधर नारायण मोरजे यांच्या 'ख्रिस्ती मराठी वाड्मय' - फादर स्टीफन्स ते १९६० अखेर' (प्रकाशक: अहमदनगर कॉलेज आणि स्नेहसदन, पुणे - १९८४ ) या दोन अमूल्य ग्रंथांच्या तोडीचे दहिवाडकर यांचे हे पुस्तक आहे.
मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या कुठल्याही संशोधकाला या ग्रंथाची खूप मदत होणार आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे गेली तीन दशके जेव्हाजेव्हा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावाची चर्चा होत असते, तेव्हा दोन नावे अग्रस्थानी असतात.
पुण्याचे अनिल दहिवाडकर आणि मुंबईतील विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो.
दोघांनाही या पदाने आतापर्यंत हुलकावणी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शेतकरी आदोलकांना 'आंदोलनजीवी' असा शब्द वापरल्यानंतर दहिवाडकर यांनी एका लेखात त्याच शैलीत 'ख्रिस्ती लोक मटणजीवी' आहेत' असा उल्लेख समाजमाध्यमात केला होता.
त्यावर मोठा गदारोळ झाला होता. यासंबंधी माझ्या या पुस्तकात छोटासा लेख आहे.
तर आता दहिवाडकर सरांनी पाठवलेला मॅसेज असा होता :
`` `चर्चबेल' एका दमात वाचून संपविले.
ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, व्यक्तिचित्रण आणि माहितीपूर्ण खुशखुशीत स्फुट लेखांचा हा संग्रह केवळ वाचनीयच नव्हे तर त्यातील विविध विषयांमुळे संग्रहणीयही झाला आहे.
पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक केवळ ख्रिस्ती असल्यामुळेच अडगळीत टाकले जातात हे आजचे वास्तव आहे.
`ख्रिस्ती माणूस मटणजीवी' आहे हे प्रथम मी म्हटले. त्यामुळे एका ख्रिस्ती माणसाचा फार संताप झाला.
आपल्या लोकांना तशी विनोदबुद्धी कमीच..
पंचहौदच्या चहा बिस्कीट समारंभात सौ. दहिवाडकर यांचे आजोबा प्रा.ना.स.पानसे आणि त्यांचे लेखक मित्र (`पण लक्षात कोण घेतो' फेम) ह. ना. आपटे हेही उपस्थित होते.
असो.
पुस्तक रोचक झाले आहे
अनिल दहिवाडकर''