Did you like the article?

Showing posts with label Karad. Show all posts
Showing posts with label Karad. Show all posts

Saturday, February 11, 2023

कडेकोट बंदोबस्तात वावरण्याची गरज

श्रीरामपूरला काही मोठ्या व्यक्तींचं आगमन झालं होतं आणि का आणि कसं कुणास ठाऊक मीही त्यावेळी तिथं होतो. सत्तरच्या ट्ट येत होते. व्हीव्हीआयपी हा शब्द खूप नंतर रुढ झाला.त्याकाळात नेते आणि सामान्य लोक यामध्ये फारसे अंतर नसायचे.

तर या महत्त्वाच्या लोकांबरोबर आगेमागे पंन्नास-साठ लोक असतील. शालेय विद्यार्थी असल्याने हाफ पॅन्टमध्ये असलेलो मी पण त्यांच्याबरोबर येत होते. ते लोक बोलतबोलत येत असताना राम मंदिराच्या जवळ असताना त्या गर्दीमध्ये अगदी केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीपाशी मी पोहोचलो. सफारी ड्रेससारखे कपडे घातलेल्या त्या व्यक्तीला मी अक्षरशः खेटलो, म्हणजे त्यांच्या पोशाखाला माझा स्पर्श झाला आणि `आता आपलं काम संपलं' Fate accompli असं स्वतःला बजावून मी झटदिशी बाजूला होऊन पुन्हा त्यांच्याबरोबर चालू लागलो.
ती व्यक्ती त्या दिवशी कुठल्या कार्यक्रमानिमित्त श्रीरामपूरला आली होती हे आता काहीही आठवत नाही. त्या कार्यक्रमाला मी हजेरी लावली असणारच याविषयीसुद्धा मला शंका नाही. याविषयी आता काहीही आठवत नसले तरी ती व्यक्ती आणि त्यांना ओझरता का होईना स्पर्श करण्यासाठी मी केलेली धडपड आणि त्यात मला मिळालेले यश हा दोनतीन मिनिटांपुरता घडलेला प्रसंग तब्ब्ल पन्नास वर्षानंतर मला आजही आठवतो.
याचं कारण म्हणजे त्या गर्दीच्या केंद्रस्थानी असलेली ती व्यक्ती होती त्या काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक.
खूप वर्षांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले सुधाकर नाईक यांच्या काही कार्यक्रमांना पुण्यात इंडियन एक्सप्रेसचा बातमीदार म्हणून मी हजर राहिलो तेव्हा या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. त्याचबरोबर सुधाकर नाईक चुलते असलेल्या वसंतराव नाईक त्यांच्यासारखेच दिसतात हे पण जाणवलं. फरक फक्त एकच, वसंतराव नाईक यांचे अनेक फोटोमध्ये ते हातातल्या चिरुटसह दिसतात, एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि प्रणव मुखर्जी यांच्याही हातात कायम चिरूट दिसायचा.
पण ही खूप खूप वर्षांनंतरची गोष्ट. श्रीरामपूरच्या या घटनेनंतर दोनतीन वर्षातच मला जेसुईट धर्मगुरु होण्याचे वेध लागले आणि दहावीनंतर मी फादर प्रभूधर यांच्याकडे सातारा जिल्ह्यात कराडला आलो आणि तिथल्या टिळक हायस्कुलात अकरावीसाठी प्रवेश घेतला.
साल होतं १९७६ आणि तो काळ होता ऐन आणिबाणीपर्वाचा. पुढच्या वर्षाच्या फेब्रुवारीत इंदिराबाईनीं आणीबाणी शिथिल केली आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. काँग्रेसविरुद्ध वातावरण तापले होते आणि प्रचारसभा सुरु झाल्या. कराड इथल्या प्रचारसभांत कराडच्या आमच्या टिळक हायस्कुलचे माजी विद्यार्थी आणि देशाचे एक ज्येष्ठ केंद्रिय मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधल्या अनेक निवडणूक कोपरा सभांना मी हजर राहिलो. तिथला दोनशेतीनशे लोकांचा जमाव आणि धोतर, सदरा आणि गांधी टोपी घालणारे यशवंतराव आजही माझ्या नजरेसमोर आहेत.
कराडमधून तेव्हा प्रेमलाकाकी चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई, पृथ्वीराज तेव्हा राजकीय क्षितिजावर आलेही नव्हते) काँग्रेसच्या उमेदवार तर यशवंतराव साताऱ्याहून निवडणूक लढवत होते. केंद्रिय मंत्री असले तरी आणि काँग्रेसविरुद्ध देशात (खरं पाहिलं तर गायपट्ट्यात ) आणि महाराष्ट्रात वातावरण तापले होते तरी केंद्रिय मंत्री असलेल्या यशवंतरावांच्या अवतीभोवती एकही सुरक्षारक्षक नव्हता !
गोव्यात द नवहिंद टाइम्सला , औरंगाबादला लोकमत टाइम्सला आणि नंतर पुण्यात इंडियन एक्सप्रेसमध्ये, टाइम्स ऑफ इंडियात आणि अलीकडे सकाळ माध्यमसमूहाच्या महाराष्ट्र हेराल्ड- सकाळ टाइम्समध्ये काम करताना कितीतरी व्हिव्हिआयपी लोकांना अगदी जवळून भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याशी आणि हस्तांदोलन करण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह, महाराष्ट्र जनता दलाच्या प्रदेशाध्यक्ष मृणाल गोरे यांच्याबरोबर मुकुंद संगोराम आणि मी पुण्यातल्या लोहेगाव विमानतळाच्या छोटयाशा केबिनमध्ये ( फक्त चौघे जण ) अर्धापाऊण तास होतो यावर आता माझा स्वतःचा विश्वास बसत नाही, इतरांची काय कथा !
त्याचवर्षी मराठा चेंबरमध्ये राजीव गांधी यांच्याबरोबर इतर पत्रकारांसह मी हस्तांदोलन केलं. त्याच्या नंतरच्या वर्षीच राजीव गांधींची हत्या झाल्यावर जून १९९२ ला मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या गाडीत बीबीसीचे सॅम मिलर, इंडियन एक्सप्रेसचे नरेन करुणाकरण यांच्यासह बसून बारामती ते लोहेगाव विमानतळ असा प्रवास करत पंतप्रधानपदासाठी शर्यतीत उतरलेल्या पवार यांची आम्ही मुलाखत घेतली.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याशी कामशेतपाशी असलेल्या त्यांच्या `भारत यात्रा' केंद्र असलेल्या परंदवाडी येथे हस्तांदोलन करून संवाद साधला. काळाच्या ओघात आणि पत्रकाराच्या भूमिकेत असल्याने विविध क्षेत्रांतील अशा कितीतरी व्हिव्हिआयपी व्यक्तींशी जवळून संबंध आला. अशावेळी सुरक्षेचा कुणीही कधी बाऊ करत नसत. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची स्वतःच्या सुरक्षारक्षकांनी हत्या केल्याची पार्श्वभूमी असतानासुद्धा अशी परिस्थिती होती हे विशेष !
हा, दहा वर्षांपूर्वी एकदा गोव्यात कुठल्याशा बेटावरून फेरीबोटने प्रवास करताना मात्र एक व्हिव्हिआयपी कडक बंदोबस्तात वावरताना दिसली. मात्र त्याबाबत मला मुळीच आश्चर्य वाटलं नव्हतं. त्या फेरीबोटमध्ये एके-४७ बाळगणाऱ्या ब्लॅक कमांडोसह उभे असणातरी ती व्यक्ती होती पंजाबमध्ये अतिरेक्यांच्या कारवायांचा बिमोड करणारे भारतचे सुपरकॉप आणि पंजाबचे माजी राज्यपाल ज्युलियो
रिबेरो!
आपल्या पदावरून निवृत्त होऊनसुद्धा त्यांना कायम कडेकोट बंदोबस्तात वावरण्याची गरज होती (आजही आहे ) याचे कारण म्हणजे अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर ते कायम असणार आहेत. मागे युरोपात रोमानियात भारताचे राजदूत असताना त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून ते वाचले होते. सुवर्ण मंदिरात कारवाई करणारे तेव्हाचे लष्कर प्रमुख जनरल अरुण वैद्य असेच पुण्यात अतिरेक्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले होते.
कायम सुरक्षाव्यवस्थेची खरीखुरी गरज असणारे ज्युलियो रिबेरो हे अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे. केंद्रात किंवा राज्यात एखादे महत्त्वाचे किंवा संवेदनशील पद सोडल्यावर बहुतांश वेळेला त्या नेत्यांना सुरक्षेची गरज भासत नाहीत. देशात आणि राज्यात अशी कितीतरी उदाहरणे आहेत. काही व्यक्तींना मात्र सत्तेत कधीही कुठलेही पद न सांभाळता सुरक्षेची गरज भासते. याचे कारण म्हणजे त्यांचा वाचाळपणा.
हल्ली मात्र परिस्थिती बदलली आहे. सत्तेवर असलेल्या अनेक नेत्यांना सुरक्षारक्षकांच्या गराड्याशिवाय सार्वजनिकरीत्या वावरणे अशक्य झाले आहे. लोकप्रतिनिधींना लोकांचं भय वाटतं. कधी कुणी शाई फेकण्याची शक्यता असते, कधी कुणी काळे शर्ट वा काळी ओढणी फडकावण्याची भिती असते. त्याच्यामुळे कुठेही जमणाऱ्या लोकांची फ्रिस्किंग किंवा अंग चाचपून कडक तपासणी करणे आवश्यक बनले आहे.
वर्ध्याला साहित्य संमेलनाच्या स्थळी व्हिव्हिआयपी लोकांच्या भेटींदरम्यान तिथे पोलीस छावणीचे रुप आले होते, खुद्द संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनाही या सुरक्षाव्यवस्थेचा फटका बसला, अशा बातम्या वाचल्या आणि मागच्या या काही घटना सहज आठवल्या ..

Tuesday, November 2, 2021

 इंदिरा गांधी


गोव्यातील पणजी येथील मांडवीच्या तिरावर असलेल्या मांडवी हॉटेलसमोर पन्नास-साठ लोकांच्या घोळक्यात मी उभा होतो. थोड्याच वेळात तेथे आलेल्या एका कारमधून इंदिरा गांधी उतरल्या. ती वेळ संध्याकाळ पाचची असेल. त्यांच्या डोक्यावरील केशसंभार पूर्ण सफेद होता. आता अंधुक आठवते त्यांनी प्रिंटेड कॉटनची साडी घातलेली होती रोडच्या प्रवासाने त्यांचा चेहरा थकलेला जाणवत होता. तरीही डोक्यावरील पदर सावरीत स्मित करत त्यांनी समोरच्या लोकांना अभिवादन केले आणि विजेच्या चपळाईने मागे वळत आमच्या समोरच त्या हॉटेलच्या पायऱ्या चढू लागल्या.

१९७९ सालच्या डिसेंबरची ही घटना आहे. दशकभर देशाच्या पंतप्रधान असलेल्या आणि आणीबाणीनंतर सत्तेतून पायउतार झालेल्या इंदिरा गांधींना अनपेक्षितरित्या अगदी जवळून मी पाहत होतो. त्या वेळेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात जराही आदर नव्हता.
आणीबाणीनंतर देशातील इतर लोकांप्रमाणे मीही त्यांचा कडवा विरोधक बनलो होतो.
इंदिराबाईंनी आणीबाणी लादली तेव्हा मी नुकताच दहावीत गेलो होतो. इतक्या लहान वयात असूनही त्याकाळातली ती घोषित आणिबाणी मी अनुभवली आहे, आणीबाणीचा कट्टर विरोधक ,म्हणून जगलो आहे. आणि यात अतिशयोक्ती अजिबात नाही.
सातवी- आठवीपासूनच मी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली होती, त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींची ती 'गरिबी हटाव' घोषणा, १९७१चे युद्ध, त्याकाळात अनेकांच्या घरांत वीज पोहोचली नव्हती तरी युद्धामुळे होणाऱ्या रात्रीच्या`ब्लॅक आऊट'च्या रंगीत तालमी आणि बांगलादेश निर्मिती, शेख मुजीबर रेहमान यांची पाकिस्तानातल्या तुरुंगातून मुक्त झाल्यावर डाक्काला जाण्याआधीची दिल्ली भेट, बांगलादेशी निर्वासितांच्या छावण्या त्यांची आणि सिमला करारानंतरची युद्धकैद्यांचीही परतावणी वगैरे घटना मला आठवतात.
आणिबाणी लागू होण्यापूर्वीच्या घटना म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याविरुद्धचे विद्यार्थ्यांचे आंदोलन, बिहारमधले छात्र सेनेचे आंदोलन, जॉर्ज फर्नांडिस-नेतृत्वाखालील तो देशातील ऐतिहासिक रेल्वेचे चक्का-जाम आंदोलन, पंतप्रधान इंदिरा गांधींना निवडणूक गैरप्रकारप्रकारणी अपात्र ठरवण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा तो निकाल आणि सरतेशेवटी जयप्रकाश नारायण यांनी कायदा अंमलबजावणी करणाऱ्या सेवेतील लोकांना सरकारचे `बेकायदेशीर' आदेश न पाळण्याचेे केलेले ते आवाहन या सर्व सर्व घटना माझ्या आजही नजरेसमोर आहेत.
पंतप्रधान इंदिरा गांधींची निवडणूक रद्दबातलं ठरविण्याचा हायकोर्टाचा तो निकाल आणि त्यानंतरची संपूर्ण देशातील त्या स्फ़ोटक स्थितीचे वर्णन कसे करणार? नव्या पिढीला त्या काळाची कल्पना कशी येणार ? दिल्लीतल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणानंतर किंवा अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे, किरण बेदी आणि बाबा रामदेव प्रभुतींनी जनलोकपाल नेमणूकीसाठी डॉ मनमोहन सिंग सरकारविरोधी देशभर तापवलेले वातावरण यासारखी अत्यंत ज्वालाग्रही स्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. बारीकशा ठिणगीने सुद्धा भयानक स्फ़ोट होऊ शकेल अशी परिस्थिती होती.
आणि अखेरीस तो ऐतिहासिक दिवस उगवला.
तो दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट समजला जातो. मात्र त्या दिवशी म्हणजे २६ जून १९७५ संपूर्ण दिवसभर देशभर काय घडामोडी होत होत्या याची सामान्य लोकांना काहीच कल्पना नव्हती. त्याकाळात दिवसभर जे काय घडायचे ते दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्रातून कळायचे.
त्यावेळी मी नुकताच दहावी इयत्तेत प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जून १९७५ रोजी श्रीरामपुरात सकाळी मी माझ्या वडिलांसह आमच्या `पारखे टेलर्स' दुकानावर पोहोचलो आणि तेथे मी `सकाळ' वर्तमानपत्र वाचण्यास सुरू केले आणि मला धक्काच बसला.
पेपरच्या बातम्यांत म्हटले होते की देशात आणीबाणी लागू करण्यात आली असून सर्व प्रमुख विरोधी राजकीय नेत्यांना म्हणजे जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी वगैरेंना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीच्या आदेशावर २५ जूनला रात्री सही केल्यानंतर पोलिसांनी ऐन मध्यरात्री काही प्रमुख नेत्यांना अटक केली होती आणि अटकेचे हे सत्र दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ जूनला चालूच राहिले होते असे बातम्यांत म्हटले होते. विरोधी राजकीय नेत्यांना कुठे आणि कशा प्रकारे अटक करण्यात आली होती, कुठल्या तुरुंगात नेण्यात आले याचेही या बातमीत वर्णन होते.
आणीबाणीचा पहिलाच दिवस असल्याने त्या बातम्यांत सेन्सारशिप नव्हती.
आणीबाणीनंतर पहिले काही दिवस वा आठवडे अस्वस्थ वातावरण जाणवत होते. खरे सांगायचे म्हणजे श्रीरामपुरात आणीबाणीविरोधी एकही मोर्चा वा निदर्शन झाले असते तर त्यात मी सहभागी झालो असतो. सगळीकडे सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले होते तेव्हा.
सुरुवातीच्या काही क्षीण, मामुली स्वरूपाच्या विरोधानंतर सर्वकाही शांत होत गेले. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. लोक आपापल्या कामधंद्याकडे म्हणजे पोटापाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ लागले. वृत्तपत्रांतून राजकीय स्वरूपाच्या बातम्या पूर्णतः नाहीशा झाल्या होत्या.
पण आणीबाणीमुळे दुसरेही काही लक्षणीय बदल घडले होते आणि हे बदल निश्चितच सामान्यजनांच्या जीवनाशी निगडित होते.
आणीबाणीत मटका किंग रतन खत्रीला अटक झाली आणि मटका बाजार = एक समांतर अर्थव्यवस्था - रातोरात बंद झाला. मटका बाजारावरच्या बंदीचा सामान्य जनतेच्या जीवनावर थेट परिणाम झाला होता. मटक्यामुळे लाखो गरीब कुटुंबे उद्धस्त होत होती, त्यांना हा फार मोठा दिलासा होता.
श्रीरामपूरात आमचे टेलरिंगचे दुकान ` पारखे टेलर्स' मुख्य रस्त्यावर सोनार लेनमध्ये होते. त्याकाळी तेथील बहुतेक सर्व सोनार लोक सावकारीचाही धंदा करत असत.
आणीबाणी लागू झाल्यानंतर काही दिवसातच या गल्लीतील वर्दळ वाढली. येथील सोनारांच्या दुकानात येऊन अनेक लोक, कुटुंबातील पुरुष, बायका आणि मुले त्यांनी तेथे गहाण ठेवलेली सोन्या-चांदीची दागिने, पाणी तापवण्याचा बंब, पाण्याचे घंगाळ, हंडी वगैरे पितळाची आणि तांब्याची भांडीकुंडी आपापल्या घरी घेऊन जाऊ लागले.
आणीबाणीत पंतप्रधान इंदिराबाईंनी खासगी सावकारीवर बंदी घातली होती आणि त्यामुळे कुणीही या सावकाराकडे येऊन गहाणखतात ठरलेली रक्कमेतील एक पैसुद्धा न देता आपली गहाण ठेवलेली दागदागिने आणि भांडीकुंडी परत नेऊ शकत होते. ठरलेले व्याज वसूल न करता गहाण ठेवलेल्या वस्तू सावकार मुकाटपणे या लोकांना परत करत होते. तसा नकार देण्याची कुणाही सावकाराची हिंमतच नव्हती.
आणीबाणी काळाचा हाच तर महिमा होता. एखादा सावकार गहाण वस्तू परत करत नाही अशी कुणी पोलिसांकडे तक्रार केली असती तर त्या सावकाराची ताबडतोब तुरुंग कोठडीत रवानगी झाली असती. समाजाच्या अगदी खालच्या तळागाळातील लोकांना आणीबाणी लागू झाल्यानंतर असा थेट फायदा झाला होता.
आणीबाणी लागू केल्यानंतर सामान्य माणसाला दिलासा देणारी आणखी एक बाब होती. सरकारी ऑफिसात सर्वसामान्य लोकांची कामे कसल्याही प्रकारची लाच न देता तत्परतेने होऊ लागली. लाच मागण्याची कुणा अधिकाऱ्याची वा कर्मचाऱ्याची हिम्मत होत नसे. मात्र जनतेची कामेही तत्परतेने होत असत.
दिल्लीत नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमध्ये मुख्य सचिवापासून सर्व सरकारी कर्मचारी सकाळी वेळेवर कार्यालयात येऊ लागले आणि शिस्तबद्ध पद्धतीने कामे करू लागले. संपूर्ण देशभर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांत असेच चित्र दिसू लागले.
आणीबाणीत मुंबईत पुन्हा एकदा सर्व लोकल्स आणि इतर रेल्वेगाड्या वेळेवर धावू लागल्या. हे सर्व शिस्तीने आणि नियमानुसार होत असे, याचे कारण म्हणजे सर्वांनी नियमांनुसार वागावे यासाठी सर्वच अधिकारी पाठपुरावा करत असत. त्यांनी तसे न केल्यास त्यांच्याविरुद्ध ताबडतोब कारवाई केली जात असे.
कायद्याची अमलबजावणी करणाऱ्या पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांची समाजकंटक, गुंड लोकांत जरब बसली होती. सामान्य जनतेच्या दृष्टीने हे नक्कीच आश्वासक असे चित्र होते.
आणीबाणीच्या काळास आचार्य विनोबा भावे यांनी 'अनुशासन पर्व' असे संबोधले होते ते यामुळेच.
सतरा महिन्यानंतर म्हणजे १९७७ सालच्या जानेवारीत पंतप्रधान इंदिरा गांधींनीं आणीबाणी शिथिल केली. बहुतांश विरोधी पक्षनेत्यांची तुरुंगातून सुटका केली आणि सार्वत्रिक निवडणुकाही जाहीर केल्या.
या घोषित आणीबाणीला मुदत म्हणजे एक्सपायरी डेट होती.
निवडणूक प्रचाराचा तो दोन महिन्यांचा तो काळ अगदी भारवल्यासारखाच होता. भारताच्या उत्तर आणि मध्य भागांत काँग्रेसविरुद्ध वातावरण तापले होते. ते आणीबाणीविरुद्ध नव्हते तर तेथल्या अतिरेकी कुटुंबनियोजनाच्या मोहिमेमुळे होते ते नंतर स्पष्ट झाले. त्यामुळेच जनता पक्षाच्या राजवटीत नवे मंत्री राज नारायण हे बदनाम झालेले कुटुंब नियोजन (फॅमिली प्लॅनिंन ) खाते घेण्यास नाखुष होते, त्यामुळे त्यांनी मग या खात्याचेच नामकरण करुन टाकले! कुटुंब कल्याण खाते !
त्यावेळी 1978 ला कराडच्या टिळक हायस्कुलात मी अकरावीत शिकत असताना केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या चौकाचौकात होणाऱ्या निवडणूक सभांना उपस्थित होतो. त्यावेळी सातारा येथे झालेल्या लोकसभा निवडणूक मतमोजणीस सज्ञान आणि मतदार नसूनही जनता पक्षाच्या (शेतकरी कामगार पक्षाच्या) उमेदवाराचा पोलिंग एजंट म्हणून मी काम केले.
कराडमधून प्रेमलाकाकी चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री) तर साताऱ्यातून यशवंतराव चव्हाण काँग्रेसचे उमेदवार होते.
रात्री दोन वाजता पंतप्रधान इंदिरा गांधींचा रायबरेली मतदारसंघात पराभव झाल्याची बीबीसीने दिलेली बातमी समजली तेव्हा मतमोजणीच्या त्या मंडपात आम्ही जनता पक्षाच्या समर्थकांनी केलेलाा जल्लोष अजूनही माझ्या कानावर आहे.
या निवडणुकीत जनता पार्टीचा निवडणुकीत विजय झाला. सत्तेतून पायउतार होण्याआधी पंतप्रधान इंदिरा गांधींनी स्वतःच आणीबाणी पूर्णतः उठवली आणि याबाबतचे श्रेय नव्या सरकारला मिळू दिले नाही.
मात्र आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या नेत्यांनी जनतेची घोर निराशा केली होती. मोरारजी देसाईनंतर पंतप्रधान झालेल्या चौधरी चरणसिंगांनी बहुमत नसल्याने राजिनामा दिला होता आणि देशात अडीच वर्षांतच पुन्हा निवडणुका जाहिर झाल्या होत्या.
या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त त्यादिवशी इंदिरा गांधी गोव्यात पणजीत आल्या होत्या.
इंदिरा गांधी पणजीतील मांडवीच्या काठावरच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या मांडवी हॉटेलात उतरल्यामागे काही कारणे होती. सत्तेत नसल्याने डोना पावला येथून जवळ असलेल्या काबो राज निवास येथे त्यांना आतिथ्य मिळणे अशक्य होते.
आणीबाणी पर्वानंतर इंदिरा गांधीविषयी लोकमानसांत प्रचंड घृणा निर्माण झाली होती आणि राजकीयदृष्टया त्या अस्पृश्य बनल्या होत्या. सन १९८० आधी गोव्यात फाइव्ह स्टार हॉटेल अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. हॉटेल मांडवी हे पणजीतील एक मोठे हॉटेल होते.
त्या संध्याकाळी मिरामारशेजारील कंपाल ग्राउंडवर इंदिरा गांधी यांची सभा होती. निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकहून कारने लांबचा प्रवास केल्यानंतर सभेपूर्वी फ्रेश होण्यासाठी मांडवी हॉटेलमध्ये त्या उतरल्या होत्या.
आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाचा भारताच्या उत्तरेतील नऊ राज्यात पार धुव्वा उडाला होता. तेथे या पक्षाला लोकसभेची एकही जागा न मिळाल्याने मोरारजी सरकारने तेथील राज्य सरकारे तडकाफडकी बरखास्त करून नव्याने निवडणुका घेतल्या होत्या. त्या सर्व राज्यांत जनता पक्षाची सरकारे निवडूनही आली होती.
इंदिरा गांधी सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी म्हणजे के ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण वगैरेंनी इंदिराबाईंना पक्षातून काढले होते . काँग्रेस पक्षाची अगदी मूठभर नेतेच त्यांच्याबरोबर राहिली होती.
केंद्रातील आणि महत्वाच्या राज्यांतील सत्ता गमावल्यामुळे इंदिरा गांधींना निवडणूक प्रचारासाठी आर्थिक चणचण भासत होती. त्यांना आर्थिक मदत करण्यास कुणी तयार नव्हते इतक्या त्या राजकीयदृष्ट्या बदनाम झाल्या होत्या. चार्टर्ड फ्लाईट सोडाच पण थोड्या अंतरावर जाण्यासाठी हेलिकॉप्टर घेणेही आर्थिकदृष्ट्या मुश्किल होते. त्यामुळे प्रवासी विमानाने किंवा अनेक किलोमीटरचा प्रवास त्या मोटारीने करता होत्या.
त्या काळात दिवसाच्या चोवीस तासांपैकी अनेक तास त्या मोटारीने प्रवास करायच्या. या प्रवासातच झोपून सभेपूर्वी ताजेतवाने होऊन त्या पुढील सभेच्या तयारीत लागत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण देश अक्षरश: पिंजून काढला होता. त्यांच्याशिवाय त्यांच्या पक्षात दुसरा प्रभावी असा नेता नव्हताच. अशाच एका निवडणूक सभेपूर्वी मला त्यांना जवळून पाहण्याचा योग आला होता.
त्यानंतर एका तासातच इंदिराजींचे भाषण ऐकण्यासाठी मिरामार शेजारव्या कम्पाल ग्राऊण्डवर मी हजर होतो. इंदिरा गांधी या अटल बिहारी वाजपेयी किंवा नरेन्द्र मोदी यांच्यासारख्या वक्त्या नव्हत्या. मात्र त्यांचे भाषण अगदी घणाघाती होते.
इंदिराजी आपल्या भाषणात कुठल्याही एका व्यक्तीचे कधीही नाव घेत नसत. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी जनता पक्षाच्या अंतर्गत लाथाळ्यांवर आणि नाकर्तेपणावर हल्ला चढवत आपणच देशाची स्थिती सुधारू शकतो हे श्रोत्यांला पटवले.
ते भाषण ऐकण्याआधी मी त्यांचा कट्टर विरोधक होतो पण त्यांचे भाषण संपल्यानंतर मी त्यांचा कट्टर समर्थक झालो होतो हे कबूल करायलाच हवे.
तेव्हा मी मिरामारच्या धेम्पे कॉलेजात बी. ए. च्या शेवटच्या वर्षाला होतो, एकवीस वर्षे पूर्ण केली नसल्याने मला मतदानाचा अधिकार नव्हता. नाहीतर माझे मत इंदिराजींच्या पक्षालाच दिले असते.
त्याकाळात देशातील राजकीय स्थिती पाहता कुणीही इंदिराजींवर विश्वास ठेविल अशी परिस्थिती होती. त्यानंतर निवडणुका पार पडल्या आणि आणीबाणीत अगदी पानिपत झालेल्या इंदिरा गांधींच्या पक्षाला आधी कधीही मिळाल्या नव्हत्या इतक्या लोकसभेच्या जागा मिळाल्या. इंदिराजी पुन्हा पंतप्रधान बनल्या. उत्तर भारतात गाय पट्ट्यातल्या नऊ राज्यांत त्यांना लोकसभेच्या शून्य मिळाल्या होत्या. तिथल्या राज्यांत जनता पक्षाचे सरकार आली होती तिथल्या जनतेने पुन्हा इंदिराबाईंच्या पक्षाला सत्तेवर आणले.
आज पैशाच्या बळाशिवाय निवडणुका जिंकणे शक्य नाही असे म्हटले जाते. वृत्तपत्रांत पहिल्या पानांवर सतत जाहिरातीचा न्यूज चॅनेल्सवर जाहिरातींचा भडीमार याशिवाय निवडणुका जिंकता येईल का अशी शंका येते. मात्र प्रचंड परिश्रम, विरोधकांच्या मर्मस्थळांवर हल्ला करण्याची हातोटी, जनतेमधील असंतोषास वाट देऊन लोकमानस आपल्या बाजुने वळवण्याची कला या जोरावर इंदिराजींनी राजकीय आणि आर्थिक सत्तेचे पाठबळ नसता केंद्रात सत्तेवर दमदार पुनरागमन करून दाखवले होते.
इंदिराबाई या हुकूमशहा नव्हत्या तर खऱ्याखुऱ्या अर्थाने डेमॉक्रॅट होत्या हे त्यांनी निवडणुकीतला पराभव मान्य करुन, हा पराजय पचवून आणि परत लोकशाहीमार्गे, मतपेटीद्वारे सत्तेवर येऊन दाखवून दिले. त्यांच्या राजकीय जीवनात जेवढे चढउतार आले तितके इतर कुणा राजकीय नेत्याच्या आयुष्यात आले नाहीत . मात्र त्यामुळे सत्तेवर असतानाही त्यांनी भारतीय लोकशाही किंवा लोकशाहीचे इतर स्तंभ कमजोर केले नाहीत किंवा या स्तंभांना स्वतःच्या ताब्यात तर मुळीच घेतले नाहीत.
आणीबाणीत तुरुंगात टाकलेल्या आपल्या राजकीय विरोधकांना ( शत्रूंना नव्हे) इंदिराबाईनी सन्मानाची वागणूक दिली. हे विरोधक राजबंदी होते, गुन्हेगार नव्हते, तुरुंगात सुद्धा एकमेकांना भेटण्याची त्यांना मुभा होती. यामुळेच तुरुंगात असलेल्या संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी नेते मधू दंडवते, मधू लिमये, संघटना काँग्रेस पक्षाचे नेते मोरारजी देसाई यांच्यात सुसंवाद, चर्चा झाल्या, परस्परांविषयी असलेले त्यांचे वैचारिक मतभेद, अढी आणि पूर्वग्रह पूर्णतः नाहीसे झाले.
आणीबाणी शिथिल होऊन हे नेते तुरुंगाबाहेर आल्यावर लगेच आठदहा दिवसांतच आपापले पक्ष आणि विचारधारा विसर्जित करुन नव्या जनता पक्षाची अनौपचारिक स्थापना करण्याचा निर्णय या सर्व नेत्यांनी घेतला.
बडोदा डायनामाईट प्रकरणात अडकलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांचीच केवळ गुन्हेगारी कलमांनुसार अटक झाली होती, त्यामुळे ते बिहारमधल्या मुझ्झाफरपूर तुरुंगातून निवडणूक लढले आणि भरघोस मतांनी निवडूनही आले!.
इंदिरा गांधींना अलाहाबाद हायकोर्टाने रायबरेली मतदारसंघात सरकारी यंत्रणांचा गैरवापर केल्याबद्दल त्यांची निवडणूक रद्दबातल ठरविली. हा कसला गैरवापर होता हे राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी जरुर पाहिले पाहिजे. आज निवडणूक यंत्रणा, प्रसारमाध्यमे, न्यायसंस्था तसेच विविध सरकारी यंत्रणांचा निवडणूक काळातली भूमिका आणि वापर पाहिला तर त्या काळातले इंदिरा गांधींचे सरकार आणि सत्ताधारी पक्ष खूपच बुळा, नेभळट होते असाच निष्कर्ष कुणीही काढील. रणरागिणी, दुर्गा, मार्गारेट थॅचरप्रमाणेच `द आयर्न लेडी' , द ओन्ली मॅन इन हर कॅबिनेट अशा उपाध्या इंदिरा गांधी यांना उगाचच दिल्या आहेत असेही म्हणता येईल.
एक मात्र खरे कि इंदिराबाईंना जनता जनार्दनाने आणीबाणीबद्दल अडीच वर्षांतच माफ केले आणि त्यांना आधीपेक्षा सर्वाधिक लोकसभा जागा देऊन सत्तेवर पुन्हा आणले. .
" हिस्टरी विल बी काइन्ड टू मी " असे डॉ मनमोहन सिंग यांनी म्हटले होते आणि गेल्या काही वर्षांतच त्यांचे हे भाष्य खरे ठरले आहे हे पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांच्या काळातले टु जी वगैरे घोटाळे आणि त्यांच्या सरकारवरचे आरोप यावर हल्ली प्रकाश पडतो आहे. त्याकाळात आपण उगाचच वाहवत गेलो याची अनेकांना जाणीव झाली आहेच. यात अर्थातच माझाही समावेश आहेच, कारण पत्रकार असूनसुद्धा मीसुद्धा त्या सरकारविरोधी मोहिमेत एकदा "मै भी...'' सांगणारी गांधी टोपी घातली होती. आणीबाणीनंतरसुद्धा इंदिरा गांधींना त्यांच्या हयातीतच असे जनतेचे अलोट प्रेम लाभले, आधीच्या कारकिर्दीपेक्षाही अधिक !
इंदिरा गांधींना राजकीय दृष्ट्या संपविण्यासाठी नव्या राजकीय सत्तेधाऱ्यांनी काय काय नाही केले ? आणिबाणीतील दुष्कृत्यांसाठी त्यांना अटक करण्यात आली, शाह कमिशनचा ससेमिरा लावला, `इंदिरा अम्मा' कर्नाटकातील चिक्कमंगळूर येथून निवडून आली तर संसदेत ठराव आणून त्यांचे पद रद्द करण्याचा प्रयत्न झाला.
यापैकी प्रत्येक हल्ले नव्या सत्ताधाऱ्यांवरच उलटले ! जखमी झालेल्या या वाघिणीला शेवटी जनतेने परत सत्तेवर आणले तेव्हा तिने कुणाविरुद्ध साधी चौकशी सुरु केली नाही ना कुणाला तुरुंगात पाठवले !
इंदिरा गांधींना भरघोस मतांनी पुन्हा सत्तेवर आणून जनतेने त्यांच्यावरील विश्वास दाखवून दिला. सत्तेवर पुनरागमन केल्यावर इंदिराबाईंनी आपल्या कुठल्याही - पक्षातर्गत किंवा बाहेरच्या - विरोधकांविरोधी खूनशीपणा किंवा आकस दाखवला नाही हे खूप विशेष म्हटले पाहिजे. ही बाब आजच्या युगात खूप उल्लेखनीय वाटते.
यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, के ब्रह्मानंद रेड्डी, सरदार स्वर्णसिंग, बाळासाहेब विखे, चिक्कमंगरुळमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी विरेंद्र पाटील , जगजीवन राम ही मंडळी त्या अडीच वर्षांच्या काळात इंदिराबाईंशी कसे वागले हे सर्वांनी पाहिले आहे. मात्र उपरती होऊन ते स्वगृही आले तेव्हा इंदिरा गांधींनीं त्यांना माफ केले आणि पक्षात आणि सरकारमध्ये पुनर्वसन सुद्धा केले. हा इतिहास अनेकदा सांगावा लागतो.
भारतातल्या नव्हे जगातल्या प्रमुख नेत्यांमध्ये इंदिरा गांधींचा समावेश होतो तो उगाच नव्हे.
गोव्यात १९८३ साली कॉमनवेलथ राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक झाली, ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर, ऑस्ट्रेलियाचे बॉब (रॉबर्ट ) हॉक, झिम्बाबेचे रॉबर्ट मुगाबे आदी ३९ राष्ट्रप्रमुख होते आणि या रिट्रिटच्या यजमान होत्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी !
यावेळी मीसुद्धा पणजीतल्या नवहिंद टाइम्सच्या क्राईम रिपोर्टरच्या अवतारात होतो. गोव्याच्या वाहतूक उपाधिक्षक किरण बेदींच्या जिप्सी जीपमधून दाबोळी विमानतळापासून आग्वाद फोर्ट जवळच्या ताज व्हिलेजपर्यंत मी फेऱ्या मारायचो, पण सुरक्षेच्या कारणांमुळे या एकाही राष्ट्रप्रमुखाचे साधे नखही आम्हा बातमीदारांना दिसले नाही. पण इंदिराजींचेही हे न पाहिलेले रुप मला भूतकाळातल्या या कितीतरी घटनांकडे घेऊन गेले.
इंदिराजींना त्यांच्या हुतात्म्यादिनी आदरांजली !
बदलती पत्रकारिता - कामिल पारखे - सुगावा प्रकाशन (२०१९) मधील काही भाग

*****

Saturday, August 14, 2021

 

ऑलिम्पिक स्पर्धा, चिमुकले देश आणि आपला बलाढ्य भारत…     एक चमत्कारिक वास्तव  सत्य!
पडघम - क्रीडानामा
कामिल पारखे
‘अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 09 August 2021
  • पडघमक्रीडानामाखाशाबा जाधवKhashaba Jadhavऑलिम्पिकOlympicलियंडर पेसLeander PaesफुटबॉलFootball

युरोपातल्या दीड-दोन महिन्यांच्या वास्तव्यात जाणवले की, आता डोक्यावरचे केस कापण्याची गरज आहे. आमच्या रोजच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाची वेळ संपल्यावर निवासस्थानापासून जवळ असलेल्या बांकिया येथून रेल्वेने राजधानी सोफिया शहरात गेलो आणि एक केशकर्तनालय शोधून काढले. सोफिया शहरात आणि इतरही बल्गेरियन शहरांत दुकानांतील पारदर्शक काचांमुळे बाहेरून आतील सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होते. त्यामुळे मी हबकून गेलो होतो.     

आत सात-आठ खुर्च्यांवर बसलेल्या लोकांचे केस कापले जात होते आणि या केस कापणाऱ्या सर्व व्यक्ती चक्क विविध वयाच्या महिला होत्या!

ही घटना तशी खूप जुनी आहे. सोव्हिएत रशियाचा दौरा आणि त्यानंतर बल्गेरियातील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी भारतातून निवडल्या गेलेल्या तीस पत्रकारांमध्ये ‘गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट’चा सरचिटणीस आणि ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून माझाही समावेश होता. युरोपातील कम्युनिस्ट राजवटींचा डोलारा एकापाठोपाठ वेगाने खाली कोसळण्याआधी केवळ तीन-चार वर्षे आधी म्हणजे १९८६ साली मी या साम्यवादी देशांत वावरत होतो आणि त्यांच्या  आगळ्यावेगळ्या जीवनप्रणालीचा अनुभव घेत होतो. हेअर कटिंग सलून दुकानातला प्रसंग त्यापैकीच. 

थक्क होऊन मी आणि माझ्याबरोबरचा एक पत्रकार सहकारी दाराबाहेरच घुटमुळत होतो. आम्ही आशियाई व्यक्ती अशा प्रकारे दरवाजाबाहेर विचारात पडलेलो असताना कुणीतरी आम्हाला आत येण्याची खूण केली. आम्ही दोघे आत शिरलो. आमच्या डोक्यावरच्या वाढलेल्या केसांकडे पाहून आम्ही त्यांचे ग्राहक आहेत, हे स्पष्ट दिसतच होते. 

दाखवलेल्या एका रिकाम्या खुर्चीवर मी बसलो आणि एका तरुणीने माझे केस कापले. त्या वेळी माझे वय होते अवघे सव्वीस. एक तरुणी आपले केस कापत आहे, या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवणे अवघड जात होते. बल्गेरियन भाषेची रशियन किंवा सिरिलिक लिपी वाचण्यास मी शिकलो होतो, तरी संभाषण करणे शक्य नव्हते. त्यामुळे मुकाट्याने मान व डोके त्या केस कापणाऱ्या तरुणीकडे सोपवून शांत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

दहा-वीस मिनिटांतच केस कापून आम्ही दोघेही बाहेर पडलो, ते अगदी हवेत तरंगतच. त्या वेळी केस कापण्यासाठी मी बल्गेरियन चलन असलेले किती लेव्ह दिले असतील, हे आता स्पष्ट आठवत नाही. यजमान ‘बल्गेरियन युनियन ऑफ जर्नालिस्ट’ने आम्हाला शिष्यवृत्ती म्हणून बाराशे लेव्ह दिले असल्याने त्याबद्दल फारशी चिंता नव्हती.

निवासस्थानी पोहोचल्यावर तर गंमतच झाली. केशकर्तनालयात आमचे केस महिलांनी कापले, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी अनेक जणांनी सोफियाला जाऊन आपले केस कापून घेतले, हे सांगायलाच नको. मात्र ज्यांचे केस मध्यमवयीन किंवा वयस्कर महिलांनी कापले त्यांचा खूप हिरमोड झाला होता, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होते.    

कुठल्याही साम्यवादी देशांत एकही महिला राष्ट्रप्रमुखपदावर कधी आली नव्हती. असे असले तरी या कम्युनिस्ट राष्ट्रांत लिंगाधारित शोषणाचे प्रमाण तसे कमी होते आणि महिला सबलीकरण मोठ्या प्रमाणात झाले होते हे नक्की. त्या केशकर्तनायालयात महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती हे त्याचेच एक द्योतक होते. तिथल्या हॉटेलांत पुरुष आणि महिला वेटर्ससुद्धा असायचे. आम्हा पत्रकारांना विविध ठिकाणी नेण्यासाठी आरामदायी आणि उबदार बसेस होत्या. त्यांच्या ड्रायव्हर महिलाही असत. ते पाहूनही मला धक्का बसला होता.

याचे कारण म्हणजे आपल्याकडे खूप वर्षांपूर्वी सरकारी वाहतूक सेवेत भरपूर गाजावाजा करून सुरू केलेली महिला कंडक्टरांची भरती आजही केवळ प्रतीकात्मक स्वरूपाची राहिलेली आहे. आपल्याला आजही महिला बस ड्रायव्हर ही संकल्पना धक्कादायक वाटते. आमच्या सहा अनुवादकांत पुरुष व महिलांचे प्रमाण समान होते आणि ते सर्व जण आपल्या स्वतःच्या कारने येत असत. त्यावरून त्यांच्या सांपत्तिक स्थितीचा आनंदच येत होता. बल्गेरियात लोकसंख्येचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने अविवाहित मुलींनी गर्भपात टाळावेत म्हणून भरपूर सवलती असायच्या, दाम्पत्यांनी दुसरे व तिसरे  मूल होऊ द्यावे, यासाठीही भरपूर आमिषे असायची.     

आपल्याकडे कल्पनाही करू शकणार नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी मी रशियात आणि बल्गेरियात अनुभवल्या. त्यापैकीच ही पुढील एक घटना.     

पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा भाग आटोपल्यानंतर नंतर काही आठवडे बसने प्रवास करत आम्ही बल्गेरियाच्या विविध शहरांना, योजनांना आणि प्रकल्पांना भेटी देत होते. साम्यवादी राज्यकर्त्यांच्या वैचारिक विचारसरणीच्या प्रचाराचाच तो एक भाग होता, हे उघड होते. या दौऱ्यादरम्यान आएके दिवशी आम्हाला एका शाळेत नेण्यात आले.

त्या शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावरच्या मोठ्या हॉलमध्ये अनेक छोटी छोटी मुले-मुली विविध खेळ खेळत होती, वेगवेगळ्या कसरती करत होती. ती मुले शाळेच्या पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक वर्गांतली म्हणजे तीन ते दहा-बारा वयोगटांतील होती. अ‍ॅथलेटिक खेळाडू घालतात, तसे बिकिनीसारखे कपडे त्यांच्या अंगांवर होते.

हे सर्व मी पहिल्यांदाच पाहत होतो. आपल्याकडे रस्त्यांवर डोंबारी लोक आपल्या बायका-मुलांसह ज्या प्रकारचे थरारक कसरती करतात, आपले शिडशिडीत शरीर रबरासारखे विविध कोनांत वाकवतात, शरीराची अक्षरशः घडी करून दाखवतात, अगदी तशाच पण आधुनिक, अतिशय सफाईदार, शैलीदार शारिरीक करामती  ती मुलं-मुली करत होती.

काही मुली अंगाभोवती रंगीबेरंगी कापडाच्या रिबिनी फिरवून कसरती करत होत्या, काही मुले अडथळ्यांची शर्यंत पार करत होते, काही मुले-मुली रंगीत फुग्यांभोवती आपले शरीर विविध कोनांत वाकवत होती, काही मुले नुसत्याच लांब उड्या मारत होती. कुणी आपल्या हातात असलेले गोल कडे स्वतःभोवती गरागरा फिरवत होते, त्या कड्यांमधून आपले शरीर आत-बाहेर नेत होते. तिथली वेगवेगळी छोटी-मोठी उपकरणे मी पहिल्यांदाच पाहत होतो. एक खेळ झाल्यावर ती मुले दुसऱ्या खेळांकडे वळत होती. त्यांचे प्रशिक्षक त्यांना विविध कसरती करण्याचे शिक्षण देत होते.       

श्रीरामपूरला माझ्या लहानपणी खास मुलांना खेळण्यासाठी, बागडण्यासाठी मैदाने, बगीचे वा जिमन्यॅशियम असायला पाहिजे, असे स्थानिक नगरपालिकेला व राजकीय पुढाऱ्यांना कधीच वाटले नाही. नगरपालिकेची एक तालीमशाळा होती, तिथे तरणीबांड मुले लाल मातीत कुस्ती खेळायची, मल्लखांबावर कसरती करायची. त्यामुळे माझ्या वयाची मुले-मुली क्रिकेट, पतंग उडवणे, सागरगोटे, विट्टी-दांडू, गोट्या खेळणे, दगड की माती किंवा चोर-शिपाई असे खेळ खेळायचे. यात कुठल्याही खेळांत खूप पारंगत व्हावे किंवा प्रावीण्य मिळवावे असे ना आम्हा मुलांना वाटायचे, ना आमच्या पालकांना. 

अभ्यास सोडून याच बाबतीत अधिक गुण उधळले तर कौतुक, प्रोत्साहन होण्याऐवजी फटके मिळण्याची, शिक्षा होण्याचीच शक्यता अधिक असायची.

बल्गेरियातील शाळेतील त्या लहानग्यांचे त्या विविध खेळांतील प्रावीण्य पाहून आम्ही सर्व पत्रकार थक्क झालो होतो. त्यानंतर आम्हा पत्रकारांच्या प्रत्येक भेटीच्या शेवटी जो कार्यक्रम व्हायचा, तो सुरू झाला. हा कार्यक्रम म्हणजे त्या-त्या संस्थेचे प्रमुख किंवा प्रतिनिधींनी संस्थेच्या किंवा प्रकल्पाची माहिती देणे. तिथल्या संस्थेच्या प्रतिनिधींनी आम्हाला जे काही सांगितले, त्यामुळे मी तर थक्कच झालो.

त्या संस्थेत मुला-मुलींना वयाच्या तीन वर्षांपासून ते दहाबारा वर्षांपर्यंत विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते आणि एखाद्या मुलाने किंवा मुलीने विशिष्ट खेळांत असाधारण प्रगती दाखवली तर त्यांना त्याच खेळांत तरबेज बनवले जात होते.

या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता बल्गेरियन देशातर्फे जागतिक पातळीवरच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आणि इतर स्पर्धांसाठी खेळांडूचा चमू पाठवणे. या उद्देशाने कोवळ्या वयापासून या मुला-मुलींना प्रशिक्षण दिले जात होते.

तेव्हापासून प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत रशिया, बल्गेरिया आणि इतर छोट्या युरोपियन राष्ट्रांतील सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदक विजेत्यांची संख्या किती आहे, हे आजपर्यंत आवर्जून पाहतो. या चिमुकल्या राष्ट्रांनी पदकांच्या यादीत मिळवलेले स्थान पाहून बल्गेरियातील ती शाळाभेट आठवते!   

शीतयुद्धाच्या काळात ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांच्या यादीत अनेक वर्षे अमेरिका आघाडीवर असायची, नंतरच्या काळात सोव्हिएत रशिया असायचा. त्याशिवाय युरोपातील अनेक छोटी छोटी कम्युनिस्ट आणि इतर राष्ट्रे या यादीत चमकायची. या राष्ट्रांची नावे आणि त्यांचे नकाशावरचे स्थान भारतातील लोकांना माहितीही नसायचे. गेल्या काही वर्षांत चीनने पदकांच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे, त्यामागे या देशाचे अनेक वर्षांचे नियोजन असणार हे नक्की. 

अत्यंत प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारत किती मागे आहे, हे देशातील जनतेला सर्वांत पहिल्यांदा समजले १९९६ साली. या वर्षी लियंडर पेसने टेनिस या खेळात आपले पहिले कास्य पदक मिळवले आणि त्या वेळी देशातील खूप जणांना कळाले की, सातारा जिल्ह्यातील खाशाबा दादासाहेब जाधव या तरुणाने चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९५२   साली झालेल्या हेलसिंकी येथील ऑलिम्पिक स्पर्धेत  कुस्तीमध्ये कास्य पदक जिंकून भारताला पहिलेवहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले होते.

१९५२ ते १९९६ या काळात कुणाही भारतीयाला ऑलिम्पिक स्पर्धेत कुठल्याही खेळांत वैयक्तिक पदक मिळू शकले नव्हते. आणि याबद्दल ना कुणाला खंत होती, ना पश्चात्ताप. लियंडर पेसने क्रीडाक्षेत्रातली ही जखम भळभळती केली आणि आपण क्रीडा क्षेत्रात किती मागास आहोत, याची देशाच्या राज्यकर्त्यांना व जनतेलाही जाणीव करून दिली. 

लियंडर पेसमुळे भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांची ओळख झाली. विशेष म्हणजे देशासाठी हा सर्वोच्च सन्मान मिळवून देणारे खाशाबा जाधव हे नंतर सरकारी सेवेत होते आणि अखेरच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती.              

हॉकीपटू ध्यानचंद यांच्यावर आम्हाला शाळेत एक हिंदी भाषेतला धडा होता, पण स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच भारताचे नाव ऑलिम्पिकच्या इतिहासात कोरणाऱ्या इथल्या मातीतल्या आणि त्या वेळी हयात असलेल्या खाशाबा जाधव यांच्यावर मराठीतसुद्धा एकही धडा नव्हता! मी कराडला अकरावीला १९७६ साली शिकत होतो, तेव्हा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव आसपास राहत होते, याची मला कल्पनाही नव्हती. एका दुचाकी अपघातात त्यांचे १९८४ साली निधन झाले. जिवंत असताना त्यांची कुणी दखलही घेतली नाही, मात्र मरणोत्तर त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘छत्रपती शिवाजी पुरस्कार’ मिळाला आणि  २००१ साली ‘अर्जुन पारितोषक’ देण्यात आले.

नव्वदच्या दशकात मी ‘महाराष्ट्र चरित्रकोश’ संकलित करत होतो, तेव्हा खाशाबा जाधव यांच्या चरीत्राविषयी खात्रीशीर माहिती उपलब्ध नव्हती आणि अखेरीस मला वृत्तपत्रांच्या कात्रणांवर अवलंबून राहावे लागले होते.

या आठवड्यात भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली, इतर काही तरुण-तरुणींनी वैयक्तिक स्पर्धेत देशाला पदके मिळवून दिली. याच दरम्यान पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांची पुन्हा आठवण होऊन त्यांच्यावर विविध लेख छापून आले...

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटूंच्या संघांचे प्रायोजकत्व स्वीकारले. त्यामुळे या दोन्ही संघांना ऑलिम्पिक स्पर्धेत ही मजल गाठता आली. नाहीतर क्रिकेट वगळता इतर  क्रीडांना उत्तेजन देण्याविषयी आपल्याकडे आनंदीआनंदच असतो.

शालेय पातळीवर काही संस्था आपल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक स्तरावर अग्रक्रम मिळवावा, अशी अपेक्षा ठेवत असतात, त्यामुळे प्रत्येक शाळांच्या आवारात क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, कबड्डी, बास्केटबॉल वगैरे मैदाने असली पाहिजेत, याबद्दल ना शिक्षणसंस्था जागरूक असतात, ना पालक. ‘कॉन्व्हेंट’ म्हणून गणल्या जाणाऱ्या शाळांत याकडे पूर्वी ध्यान दिले जात असे, आता महागड्या इंटरनॅशनल स्कुलचा जमाना सुरू आहे, पण याही शिक्षणसंस्था मुलांचा क्रीडाक्षेत्रासह सर्वांगीण विकास व्हावा, याविषयी फारशा जागरूक दिसत नाहीत.  

गोव्यात मात्र क्रीडाक्षेत्राविषयी सरकार आणि लोकही खूप वर्षांपासून जागरूक आहेत. अर्थात यास पोर्तुगीज राजवटीचा साडेचारशे वर्षांचा दीर्घ वारसासुद्धा कारणीभूत आहे. गोव्यात तुम्ही खेडोपाडी हिंडताना बारकाईने पाहिले तर शाळा सुटल्यानांतर मुले शाळांच्या मैदानांवर आणि मोकळ्या भाताच्या शेतांत फुटबॉल खेळताना दिसतील. त्यांना शिकवणारा प्रशिक्षकसुद्धा असतो. त्याशिवाय अनेक गावांत स्पोर्ट्स क्लबसुद्धा आहे. त्यांच्या स्वतःच्या इमारती आणि खेळांची मैदानेसुद्धा असतात.  

संतोष ट्रॉफी या देशपातळीवरच्या प्रतिष्ठेच्या चषकासाठी गोवा नेहमी स्पर्धेत असतो. मी कॉलेजात असताना ब्रह्मानंद शंकवाळकरच्या नेतृत्वाखाली गोवा संघाने हा चषक जिंकला, तेव्हा पणजीला या संघाचे उत्साहात झालेले स्वागत आजही आठवते. गोव्याच्या या क्रीडाप्रेमामुळे या चिमुकल्या राज्यात पर्यटन खात्याबरोबरच क्रीडाखातेही प्रतिष्ठेचे मानले जाते.          

देशपातळीवर यदाकदाचित फुटबॉल या खेळाची आवड निर्माण झाली, तरच विविध राज्यांमधील खेळाडूंचा तगडा फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांत उतरण्यासाठी पात्र ठरू शकेल, अन्यथा नाही. सध्या या खेळाची लोकप्रियता आणि प्रायोजन गोवा, केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल वगैरे काही राज्यांपुरती मर्यादित आहे. 

हीच बाब इतर सांघिक आणि वैयक्तिक खेळांनाही लागू होते. 

Sunday, October 4, 2020

  •  MESMERIZING ALLURE OF MIRAMAR BEACH, GOA
  • Mesmerizing Allure Of Miramar Beach, Goa

    Miramar beach in Goa

    Camil Parkhe

    Pune, October 5, 2020: It has been more than a year and a half since I visited Goa. I am missing what I loved the most during my Goa visit – swimming in the sea. I was a 16-year-old lad when for the first time, I stood at Miramar beach, watching in awe the waters spread before me reaching right up to the horizon. “Oh, what a huge river !” I had exclaimed, only to be shot back with an answer .. “River..? This is not a river, This is a sea, the Arabian Sea!”

    The answer had left my mouth wide open…I had studied geography in the school but had never imagined that I would be at the seashore during our vocational tour to Goa. This was in May 1977. I had appeared for the 11th standard examination at Tilak High School in Karad in Satara district and had joined this vocational tour organised by the Goa-Pune-Belgaum Jesuit Province for the young prospective candidates for the priesthood.

    Watching the Arabian Sea for the first time, I held my breath. It was a sight I had never imagined. Yes, there were waves crashing at the shore, making roaring noises at regular intervals of a few minutes. Yes, that explained it. There were many ships (iron ore carrying barges actually) in the long-distance, moving speedily in the deep sea waters. The fresh air was really soothing in that hot season. Standing there with my mouth wide open, little did I realise that the very site and the area where I was standing would be my home soon for the next several years!

    And so, within a month, just before the monsoon, I was back in Miramar, staying at Loyola Hall, the pre-novitiate the Jesuits had opened that year for higher secondary and college students who may wish to be priests after their graduation. The one-storeyed tiled-roof building with traditional Goan style architecture and balconies was located along the Dayanand Bandodkar Road and only a few meters away from the beach. The nightmares began within a few days. The monsoon had set in and the loud roaring of the rough sea, especially at night, kept me awake for a few days. Soon, I got used to the roaring and it became a part of me. Dhempe College of Arts and Science where I had taken admission for standard XII is located right-facing the Miramar beach.

    The sea turned friendly around October. And thus began our football playing sessions. The higher secondary section in our college had morning session classes. Therefore, every afternoon, after the mandatory an-hour-long siesta and the 4 pm tea, all of us Loyolites pre-novices would move towards Miramar beach to play football. There was fun playing football in the white clean sand. None of us wore shoes as there were no risks of injuries after falling into the smooth sand.

    Goa is one of the few states in India where football is a popular sport. In this tiny state, gold-coloured paddy fields turn football grounds after the harvest in September-October. In every village, you will find young boys every day honing their football skills under the guidance of a tough youthful coach. This was for the first time that I was playing football but soon learnt the rules of this game and was often chosen by my team for the goalkeeper’s role. It was during these years that I watched a huge gathering of football fans welcoming Goa Football team captain Brahmanand Shankwalkar and his team members in Panjim after they had won the prestigious national-level Santosh Trophy.

    While playing football, sometimes someone would have a long shot and the football would land in the sea waters. One of us would run towards the sea and take a dip in the waters before returning with the football. By this time, I had lost the fear of the sea. Now I knew where it was safe to enter the sea waters, how far to go inside the sea and learnt to judge whether it was low tide or high tide and to check whether the tide was receding or coming in.

    And how can I forget the day when the road leading towards Dhempe College near Miramar traffic island was literally painted with my name with chalks during the prestigious college students council elections. There was a tie in the Class Representative election with me and my rival- who was aiming to be the General Secretary – securing equal votes. There was a frantic re-campaigning with huge posters with my name on the first floor for the repoll held in which I lost by a couple of votes. But there was so much excitement in Dhempe College that week and I became famous among all college students and teaching staff for the next three graduation years in that college.

    Two years later, Loyola Hall moved to its own present spacious building near Dhempe College and thus our residence moved much closer to the beach. (At the site of the old Loyola Hall premises today stands the office of The Times of India, Goa edition.) It was great fun living so close to Miramar, known for its clean, white sand. After the supper, around 8.30 pm, we boys would come for a night stroll at the beach, some would sit at the benches. A few people would light candles near the holy cross altar at the traffic island and recite prayers and the rosary there.

    One of our Loyolites, Benedict Faria, was a guitarist, and sometimes during those post-supper walks, he would come to the beach along with his guitar. Sitting on the benches facing the sea, Benny would strum the guitar, singing those popular sings, ‘Can you hear the drums, Fernando?’ or ‘Country roads, take me home’, ‘The Bachelor boy’ and some of us would join the chorus. Writing these lines, I have really turned nostalgic as I realise that I remember words of these songs now even 40 years later!

    Fr. Teotonio R de Souza, founder of the Xavier Centre of Historical Research, who then had the institute premises at Loyola Hall building, sometimes would join us for the night walk and there would be very interesting philosophical thoughts sharing. Fr. Teo who would end his sharing with an anecdote and a loud laugh left a deep impact on us, especially on the majority of us who did not continue religious life. Looking at the space which we occupied at the Miramar traffic island, I am often reminded of Fr. Teo.

    The family of Remo Fernandes had their bungalow near Miramar traffic island bus stand. Sitting at the bus stand, sometimes we could listen to Remo and others singing at his house.

    On Sundays and other holidays, we boys would go for a swim at Miramar beach. It was great fun to swim when the high tide was nearing its peak and most risky when the tide was receding. The people in the sea are pushed towards the shore when there is high tide and there is a forceful pull towards the deep sea when there is low tide. But one also needs to take precautions even during the high tide. During those days, there were no lifeguards or security personnel at Miramar or at any other beaches in Goa. But we learnt to take the necessary precautions.

    Entering the sea during the monsoon season was strictly NO, NEVER. I also knew never to venture into the shallow, ankle-deep waters during the low tide, even when one sees raised sand ground in the middle of the Mandovi river towards Panjim. There was no way to know when the water around one would suddenly rise to an alarming height as the high tide set in. The four years at the Jesuit pre-novitiate at Miramar were adequate enough for me to fall in love with the sea.

    During the summer season, buses with senior citizens – male and female- would arrive in the morning at Miramar beach. The elder persons would sit in the shallow sea waters, allowing the water on their feet and thighs. After basking in the sun and sprinkling the seawater on their legs and hands for nearly two hours, they would return to their buses and homes. The salty seawater is believed to be good especially for those suffering from arthritis and other bone ailments.

    After graduation, I chose not to be a priest and instead turned a journalist. Staying at Taleigao, I travelled from my home to The Navhind Times in Panjim Market by bus, thus daily crossing Miramar beach. My association with Miramar beach thus remained strong for the 13 years I spent in Goa and has also continued to this date.

    A visit to Miramar beach and a long stroll in the shallow waters especially at sunset is a MUST for me whenever I am holidaying in Goa or visiting my sister who is based in Goa.

    Camil Parkhe

    (Camil Parkhe is a senior journalist based in Pune. He started his journalism career in Goa and worked various newspapers in different capacities.)