Did you like the article?

Wednesday, April 6, 2022

 `टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती.

टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा.
अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो.
तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यूज डेस्ककडे सोपवून झाल्यावर ''पान दोनसाठी एडिटिंग करण्यासाठी अजूनही काहीच स्टोऱ्या नाही'' असे आपले दोन्ही हात वर उंचावून उपसंपादक संजय पेंडसे याने मोठ्याने सांगितले. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता माझा तो मजकूर आतल्या पानासाठी नसून पान एकच्या अँकरची ती बातमी आहे असे तो म्हणाला.
''बातमीचा पहिला पॅरा वाचताच ती पान एकचे मॅटर आहे हे कळाले , इट इज अ पेज वन मटेरियल ! पण एडिट मिटिंगमध्ये काय होते ते पाहू,'' असे तो म्ह्टल्यावर पान दोनसाठी मी दुसरे मजकूर तयार करू लागलो.
पत्रकारितेत तोपर्यंत दोन तपांहून अधिक काळ घातलेले असल्याने मी मनातल्या मनात संजय पेंडसेच्या न्यूज सेन्सबद्दल कौतुक केले.
आणि अखेर संजय म्हणाला होता तसेच झाले. 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये दाखल झाल्यानंतर पान एकवर प्रसिद्ध झालेली माझी ती पहिली बातमी.
त्याकाळात टाइम्स ऑफ इंडियात डेस्कवर काम करणाऱ्या उपसंपादकाने व इतरांनी पान एकसाठी बायलाईनची बातमी लिहिल्यास उत्तेजनार्थ वाढिव दिडशे रुपये पगारासोबत मिळायचे. शिवाय फोटोसाठी पन्नास रुपये वेगळे ! या वाढिव मानधनाऐवजी टाइम्स ऑफ इंडिया'च्या पान एकवर बायलाईनची बातमी छापून येण्याचे अधिक अप्रूप होते.
काय होती ती पान एकची बातमी ?
Marathi monthly Niropya enters 100th year
Camil Parkhe,TNN | Dec 26, 2002
''पुणे: एका जर्मन जेसुईट फादरांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका आडवळणाच्या खेड्यात - राहुरीजवळच्या वळण या गावात - १९०३ साली सुरु केलेल्या मराठी मासिकाने 'निरोप्या'ने आज मराठी नियतकालिकांत एक वैशिष्ठपूर्ण स्थान मिळविले आहे. पुणे शहरातून प्रकाशित होत असलेले हे मासिक शतक पूर्ण केलेल्या मराठीतील काही अगदी मोजक्या नियतकालिकांपैकी आहे.
या मासिकाचे संस्थापक-संपादक फादर हेन्री डोरींग यांची नंतर पुण्याचे बिशप आणि काही काळ जपानमधील हिरोशिमा शहरात व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली होती.''
टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत २६ डिसेंबर २००२च्या अंकात म्हणजे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी प्रसिद्ध झाली. टाइम्सच्या आर्किव्हमधून आजही ही बातमी वाचता येते.
या बातमीबरोबर बिशपमहोदयांचा अर्धा कॉलम रंगीत फोटोही छापण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडियाने पान एक आणि शेवटचे पान रंगीत छापण्यास त्यावेळी नुकतीच सुरुवात केली होती.
( माझ्या इतर बायलाईनच्या अनेक बातम्यांप्रमाणे याही बातमीचे कात्रण मी आजही जपून ठेवले आहे. इतरांच्या दृष्टीने ही जीर्ण झालेली कात्रणे तद्दन रद्दी असली तरी फ्लॅटच्या माळ्यावर मी ती ठेवली आहेत. )
वृत्तपत्रीय जगतात विविध पानांच्या पानांच्या वेगवेगळ्या ढंगात लिहिल्या जातात. त्यातही कुठली बातमी आपल्या वाचकांना आवडेल याचे काही खास निकष असतात. उदाहरणार्थ, व्हॅलेंटाईन डे निमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात होणाऱ्या गुलाबाच्या उत्पादनाची आणि युरोपला निर्यात होणाऱ्या फुलांच्या मी दिलेल्या बातम्या दरवर्षी महाराष्ट्र हेराल्ड- नंतर सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकात कायम पान एकवर अँकर म्हणून वापरल्या जातात. या काळात दैनिकाचे संपादक बदलले तरी व्हॅलेंटाईन डे च्या विशिष्ट शैलीत लिहिलेल्या ह्या बातम्या पान एकवरच अँकरच्या जागा पटकावत असत !
टाइम्स ऑफ इंडिया'त त्या दिवशी पान एकवर छापून आलेल्या माझ्या त्या पहिल्या बायलाईनचे कारण म्हणजे जर्मन असलेल्या बिशप डोरींग यांचे मराठी पत्रकारितेतील आणि मराठी भाषेतील महत्त्वाचे योगदान.
'निरोप्या' या मासिकाने मराठीतल्या अजूनही हयात असलेल्या नियतकालिकांत अगदी वरचा क्रमांक मिळवलेला आहे.
मराठी पत्रकारितेचा इतिहास १८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलेल्या `दर्पण' पासून सुरु होतो. त्यानंतर सुरु झालेली अनेक मराठी नियतकालिके अल्पजीवी ठरली. शतकायुषी असून आजही प्रसिद्ध होणाऱ्या काही मोजक्या मराठी नियतकालिकांत १८८१ सालापासून लोकमान्य टिळकांच्या 'केसरी' चा समावेश होतो. मात्र यापैकी बहुतेक नियतकालिके ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरवर तग धरुन आहेत.
या एप्रिल २०२२ महिन्यात निरोप्याने ११९ वर्षे पूर्ण करुन १२० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. या मासिकाच्या रंगीत पानभर जाहिराती पाहून या नियतकालिकाने आर्थिकदृष्ट्या चांगलेच बाळसे धरले आहे येऊ लक्षात येते.
स्थापनेपासून म्हणजे १९०३ पासून 'निरोप्या' हे मासिक सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट्स) वा येशूसंघीय फादरांच्या संस्थेतर्फे चालविले जाते. पुण्याचे दुसरे बिशप म्हणून डोरींग यांची १९०७ साली नेमणूक झाल्यावर हे मासिक पुण्यातून प्रसिद्ध होऊ लागले. पोपमहाशयांना भेटण्यासाठी बिशप डोरींग रोमला गेले आणि पहिले महायुद्ध सुरु झाले. ते जर्मन असल्यामुळे ब्रिटिश भारतात त्यांचे परतणे अवघड झाले. कारण जर्मनी व इंग्लंड ही शत्रुराष्ट्रे होती. याकाळात डोरींग यांची जपानमध्ये हिरोशिमाचे आर्चबिशप पदावर व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली. आता त्यांना आर्चबिशप पदावर बढती मिळाली होती. त्यांच्या अनुपस्थितीत `निरोप्या'चे प्रकाशन थांबले.
महायुद्धाच्या समाप्तीनंतर डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला १९२६ साली परतले. पुणे धर्मप्रांत मुंबई-नागपूरप्रमाणे आर्चडायोसिस नसला तरी त्यांचे आर्चबिशप हे वैयक्तिक सन्मानपद म्हणून कायम राहिले. वसईचे सद्याचे प्रमुख आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांच्याबाबतीत असेच आहे, नाशिक धर्मप्रांताचें बिशप म्हणून नेमणूक होण्याआधीच व्हॅटिकन सिटीत असताना त्यांना आर्चबिशप पद मिळाले होते, ते पद आता कायम राहिले आहे
आर्चबिशप डोरींग यांनी याकाळात बंद पडलेल्या आणि आपले अपत्य असलेल्या ‘निरोप्या’ मासिकाचे १९२७ साली पुनरुज्जीवन केलं. तेव्हापासून आजतागायत ‘निरोप्या’चं प्रकाशन (अलिकडचा कोरोना काळाचा अपवाद वगळता) अखंडितपणे चालू आहे.
पुण्यातल्या रामवाडी इथल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पेपल सेमिनरीचे रेक्टर असलेले फादर भाऊसाहेब संसारे हे जेसुईट धर्मगुरु निरोप्याचे आताचे संपादक आहेत. नारायण पेठेत स्नेहसदन येथे निरोप्याचे कार्यालय आहे.
.
ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स लिखित महाकाव्य 'ख्रिस्तपुराण' हे मराठीतील पहिलेवहिले मुद्रित साहित्य. हे मराठी महाकाव्य पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात १६०४ साली रोमन लिपीत छापले गेले, कारण त्यावेळी देवनागरी छपाई साठी लागणारे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या 'ख्रिस्तपुराणा'तील काही भाग रोमन लिपीतून देवनागरी लिपीत छापण्याचे श्रेय आर्चबिशप डोरींग यांच्याकडेच जाते.
मात्र संपूर्ण ख्रिस्तपुराण रोमन लिपीतून देवनागरीत आणण्यास १९५६ साल उजाडले. लिप्यांतराचे हे महत्त्वाचे काम अहमदनगरच्या प्राध्यापक शांताराम बंडेलू यांनी आणि पुण्याच्या य. गो. जोशींच्या `प्रसाद प्रकाशना'ने केले.
निवृत्त आर्चबिशप डोरींग यांचे १९५१ साली वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांची कबर वा समाधी पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी आजही आहे. चर्च किंवा कॅथेड्रल मध्ये समाधीचा हा मान हा फक्त बिशप, कार्डिनल अशा वरीष्ठ धर्माचार्यांनाच मिळतो.
व्हॅटिकन सिटीतले सेंट पिटर्स बॅसिलिका ही पहिले पोप आणि येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या सेंट पिटर याच्या कबरीवर बांधली आहे. या चर्चच्या भव्य संग्रहालयातच अनेक पोप चिरनिद्रा घेत आहेत,. या भव्यदिव्य सेंट पिटर्स बॅसिलिकाला भेट देण्याचा मला योग आला याचा आजही आनंद वाटतो
आर्चबिशप डोरींग यांच्या समाधीवरील शिलालेख आर्चबिशपांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी माहिती देतोो. परंतु,`निरोप्या'चे संस्थापक-संपादक म्हणून अथवा मराठी पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्द्ल ह्या शिलालेखात उल्लेख नाही.
मी लिहिलेल्या `ख्रिस्ती मिशनरीचे योगदान' या मराठी (सुगावा प्रकाशन ) आणि इंग्रजी (गुजरात साहित्य प्रकाश - २००३) या पुस्तकात आर्चबिशप हेन्री डोरींग यांच्यावर एक प्रकरण आहे.
आणि आता ही मन कि बात .
निरोप्या'विषयी मला विशेष आत्मियता असण्याचे एक कारण म्हणजे माझा पहिला लेख आणि पहिली बायलाईन याच मासिकात १९७० च्या दशकात मी श्रीरामपुरात शाळेत शिकत असताना प्रसिद्ध झाली. वि स. खांडेकरांच्या 'ययाती' कादंबरीच्या रुपाने मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्याविषयी १९७४ साली `निरोप्या'त माझा पन्नासेक शब्दांचा लेख प्रसिद्ध झाला, ती माझी पहिली बायलाईन.
त्यावेळी भविष्यात पत्रकार म्हणून लिखाण हाच माझा पोटापाण्याचा व्यवसाय असेल याची मी कल्पनाही केली नव्हती.

No comments:

Post a Comment