Did you like the article?

Showing posts with label Christi Marathi Sahitya Sammelan. Show all posts
Showing posts with label Christi Marathi Sahitya Sammelan. Show all posts

Thursday, May 1, 2025

राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन

कोण असतील बरे या वेगवेगळ्या वेशभूषेतील मुली?

पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणाऱ्या त्या शालेय मुलींची उत्सुकता लपत नव्हती.
बुधवारच्या 12 February 2025 नगर येथील ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनातील ग्रंथ दिंडीतील या तीन व्यक्तिरेखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
त्या तीन व्यक्तिरेखा होत्या:
समाजसुधारक, विदुषी पंडिता रमाबाई,
भारतात विशेषतः महाराष्ट्रात मुंबई आणि नगर येथे स्त्रीशिक्षणाची मुहुर्तवेढ रोवणाऱ्या सिंथिया फरार
आणि अर्थातच मदर तेरेसा..

अलीकडे मराठी विश्वात वेगवेगळी संमेलने होताहेत.
काही विश्व संमेलने असतात जिथे विश्वातल्या अतिश्रीमंत लोकांना रक्कम मोजुन येण्यासाठी आवतण दिले जाते.
काही साहित्य संमेलने मराठी नगरीचियेची सीमा पार करुन थेट देशाच्या राजधानीत भरवली जातात.
अशा संमेलनांचा थाट खास असतो आणि यात सहभागी होणाऱ्या निमंत्रित लोकांची खूप चांगली ठेप राखली जाते असे ऐकून आहे.
कालच दिल्लीतल्या साहित्य संमेलनाची लांबलचक कार्यक्रमपत्रिका पाहिली, विविध सत्रांमधल्या निमंत्रित लोकांची नावे वाचली आणि डोळे दिपले.
दोनेक दिवसांपूर्वी मी एका संमेलनाला हजर होते ते मात्र पूर्णतः वेगळ्या स्वरुपाचे होते.
ग्रामीण साहित्य संमेलन असल्याने आपला खास गावरान आब राखून होते.
नगरला १२ फेब्रुवारीला झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाविषयी मी हे सांगतो आहे.
नावातच `ग्रामीण' बिरुद अभिमानाने मिरवत असल्याने या मांडवाखालची सगळीच मंडळी रांगडी होती, `आत एक आणि बाहेर दुसरे' असे काही त्यांचे वागणे नव्हते.
एक उदाहरण देतो.
या ग्रामीण संमेलनाला नगर शहराबाहेरुन आलेल्या लोकांची संख्या बऱ्यापैकी होती तरी त्यापैकी कुणालाही - अगदी विविध सत्रांच्या अध्यक्षांनाही - येण्याजाण्यासाठी मानधन दिले नव्हते.
मला स्वतःलाही आमंत्रण नव्हते.
पण आमच्या मूळ जिल्ह्यात होणाऱ्या संमेलनाची माहिती मिळाल्यावर मी आपणहून आयोजकांशी संपर्क साधला आणि स्वतःसाठी निमंत्रण मिळवले होते.
संमेलनाच्या आदल्या रात्री राहण्यासाठी फक्त दोन रुम्स बुक करण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी एका रूममध्ये मी राहिलो होतो.
बाकी सर्व जण - पुणे, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर वगैरे ठिकाणांहून स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने आले होते.
इथेही काव्यवाचन करायला अनेक हौशी आणि नवोदित कवी होते, त्यापैकी काहींच्या नावांवर एकही काव्यसंग्रह नव्हता.
श्रोत्यांतले रसिक मात्र त्यांना मनापासून दाद देत होते.
या ग्रामीण संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुपारच्या जेवणाला एकच मेन्यू होता.
तो म्हणजे मांसाहारी.
भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खाद्यपदार्थ अर्थातच चिकन बिर्याणी.
या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाला येणाऱ्या सर्वांची खाद्य संस्कृती समान असेल, आणि त्यापैकी प्रत्येकाला चिकन बिर्याणी आणि सोबत खोशिंबर हमखास आवडेल, हे आयोजकांनी गृहीतच धरले होते.
भुकेल्या पोटी चिकन बिर्याणी आणि कोशिंबरीचा आस्वाद घेताना आयोजकांच्या या गृहितकाला मी मनापासून दाद दिली.
इकडच्या ग्रामीण लग्न आणि इतर समारंभांत असणारे इतर खाद्यपदार्थ म्हणजे शिरासुद्धा अर्थातच होता.
बस्स तेव्हढेच, जेवणानंतर आईस्क्रीम किंवा तोंड रंगवण्यासाठी पान वगैरे कुछ नाही.
जेवण्याच्या ठिकाणी हातातल्या पत्रावळीत हे खाद्यपदार्थ घेऊन पाहुणेमंडळी दिसेल तिथे फतकल मारुन किंवा पत्रावळी उंचवट्यावर ठेऊन उभ्याउभ्याने गप्पा मारत जेवत होती.
प्रस्थापित संमेलनादी कार्यक्रमांत मान्यवर व्यासपीठावरचा आपला सहभाग संपला कि ठरलेल्या बिदागीचा चेक घेऊन तत्परतेने तेथून पाय काढत असतात.
इथे मात्र उशिरा संध्याकाळपर्यंत तेथून पाय काढता घेणे नकोसे वाटत होते.
पुण्यात रामवाडी स्टेशनमधली रात्रीची शेवटची मेट्रो चुकेल म्हणून मी तेथून जरा लवकर निघालो होतो.
गावाकडच्या मंडळींनी अशी संमेलने वारंवार घ्यावीत.