Did you like the article?

Friday, May 2, 2025

 सायमन मार्टिन

वसईची पहिल्यांदा ओळख झाली ती शालेय पाठ्यपुस्तकातून. चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेला अरबी समुद्रकिनारचा वसईचा किल्ला जिंकून घेते असा इतिहासातील तो एक धडा होता.
त्याआधी वसई येथे सत्ता असलेल्या पोर्तुगीजांनी सात बेटांचे मुंबई बंदर ब्रिटिशांना लग्नात चक्क आंदण किंवा हुंडा म्हणून दिले होते आणि या घटनेने कालांतराने भारतीय उपखंडाचा इतिहास बदलला होता.
लहानपणापासून वसई डोक्यात राहिली होती ती अशा पाठ्यपुस्तकातील नोंदीतून.
नंतर `फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची वसई' अशी एक नवी ओळख निर्माण झाली.
तर या वसईशी नंतर माझे घट्ट ऋणानुबंध निर्माण होतील असे कधी वाटलेही नव्हते, मात्र पुण्यातील मॉडेल कॉलनीतील विद्याभवन शाळेचे प्रिंसिपल फादर नेल्सन मच्याडो यांच्यामुळे असे झाले.
त्यामुळे गेली तिसेक वर्षे वर्षातून किमान एकदा माझी वसईला भेट असतेच.
मागच्या महिन्याअखेरीस पुन्हा एकदा वसईला तीन दिवसांचा दौरा झाला. आम्ही दोघेही गेलो होतो.
आणि यावेळचे निमित्त होते सायमन मार्टिन यांच्या " आत्म्याचे संगीत" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि मार्टिन यांनी २३ फेब्रुवारीला आयोजित केलेला तेरावा वसई साहित्य आणि कला उत्सव.
वसई आणि साहित्य व कला यांचे अत्यंत घट्ट नाते आहे.
तसे पाहिले तर पालघर जिल्ह्यात येणारा वसई हा एक तालुकावजा परीसर. मात्र या चिमुकल्या परिसराचा एक आगळावेगळा ऐतिहासिक अन सांस्कृतिक वारसा आहे.
गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश साडेचार शतके पोर्तुगीजांची वसाहत होता.
त्याचप्रमाणे अरबी समुद्राला लागून असलेला वसई परीसरसुद्धा अनेक वर्षे पोर्तुगालची वसाहत होता.
वसईतला एके काळी बहुसंख्येने असलेला कॅथोलीक किंवा ख्रिस्ती समाज या पोर्तुगालच्या राजवटीचा एक परिणाम.
१९६१ च्या गोवा मुक्तीनंतरसुद्धा तिथल्या निज गोंयकारांच्या तीन पिढयांना पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरीकत्व घेता येतो. यासाठी आजही भली मोठी रांग असते.
वसई काही शतकांआधीच पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त झाल्याने वसईतील लोकांना मात्र ही सुविधा नाही. .
मराठी ख्रिस्ती उपासनेत म्हणजे मिस्साविधींत मराठी गायने पेटी, तबला, किबोर्ड आणि गिटार वगैरे वाद्यांच्या सुरांत ऐकावी तर वसई येथेच. रविवारी आणि सणावारी देवळांत फादरांचे मराठीतील प्रवचनसुद्धा.
इथल्या कॅथोलीक समाजाने महाराष्ट्रातील मराठी साहित्य, आणि संस्कृती बहुविध आणि समृद्ध करण्याचे मोठे योगदान दिले आहे.
वर्षभर वसईत जितके साहित्यिक आणि सांस्कृतिक मेळावे आणि उत्सव होत असतात तितके मला वाटते महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही अशा छोट्याशा परिसरात होत नसतील.
सायमन मार्टिन यांच्या साहित्य मेळाव्यास हजर राहून मी परतत होतो तेव्हाच दुसऱ्या एका साहित्य मेळाव्याचे फलक माझ्या नजरेस पडले होते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मराठी साहित्यातील योगदान सर्वश्रुत आहे.
वसईतील इतर ज्येष्ठ साहित्यिकांमध्ये विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो, फादर फ्रान्सिस कोरीया, सिसिलिया कार्व्हालो, फादर मायकल जी. आणि कवी तसेच हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असलेल्या सायमन मार्टिन यांचा समावेश करता येईल.
नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर वसई परिसरातील एका अनोख्या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.
बिल्डरांच्या विळख्यातून हिरवाईने नटलेल्या वसईचे संरक्षण करावे या हेतूने सुवार्ता मासिकाचे संपादक असलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हरीत वसई हे आंदोलन सुरु केले होते तेव्हा या आंदोलनात सायमन मार्टिन खूप सक्रिय होते.
बिल्डर माफियाकडून जिवाला धोका पोहोचण्याची जोखीम पत्करून हे आंदोलन दीर्घकाळ चालू राहिले आणि काही प्रमाणात तरी वसई आजही हरीत राहिली आहे.
वसईच्या विविध गावांत फेरफटका मारताना तिथली हिरवाई आजही मला खूप आनंदीत करते आणि त्यावेळी हरीत वसई आंदोलनाची आपसूक आठवण येते.
सायमन मार्टिन गेली अनेक वर्षे भुईगाव डोंगरी येथील सहयोग केअर सेंटरच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. त्याशिवाय साहित्यिक आणि कार्यकर्ता म्हणून त्यांची लेखणी आणि वाणीसुद्धा परजत असते .
"आत्म्याचं संगीत " हा त्यांचा अकरावा काव्यसंग्रह.
एका बैठकीतून वाचून व्हावा असा हा काव्यसंग्रह आहे आणि त्यातील सर्वच कविता तर फक्त सात आठ ओळींच्या आहेत मात्र या कविता खूप आशयपूर्ण आहेत,
माझ्यासारखा कवितेशी फारसा किंवा काहीही संबंध नसलेला माणूससुद्धा सायमन मार्टिन यांच्या कविता असलेला हा छोटासा संग्रह एकदा हातात घेतल्यानंतर पूर्णतः वाचून मगच खाली ठेवतो.
सायमन मार्टिन यांच्या कवितांची अशी ताकद आहे.
अष्टगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाचे सुरेख मुखपृष्ठ आणि आतील चित्रे प्रदीप म्हापसेकर यांची आहेत.
या वसई भेटीच्या निमित्ताने आतापर्यंत फक्त इथेच नेहेमी भेटणारे सॅबी परेरा, ख्रिस्तोफर रिबेलो, इमेल अल्मेडा, जेरोम सायमन फर्गोज अशा अनेकांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली. साहजिकच फोटो सेशनही झाले.
साहित्य उत्सव संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी निवांतपणे सायमन मार्टिन यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही झाली.
त्या भेटीगाठी आणि चर्चेसंबंधी नंतर कधीतरी.

मिस सिंथिया फरार

गेले दोन दिवस नगरला होतो. या महिन्यातील नगर शहराला माझी ही दुसरी भेट.

मी मूळचा नगर जिल्ह्याचाच असलो तरी या शहरात मुक्कामी राहण्याचा याआधी कधीही प्रसंग आला नव्हता.
या दोन्ही वेळी मात्र अगदी मुद्दाम, ठरवून नगरला आलो होतो.
त्यामागचे कारण होते सिंथिया फरार यांच्या या कर्मभूमीतील वास्तूंमधील त्यांच्या पाऊलखुणा शोधण्याचे.
नगर शहरातला माळीवाडा भागातला हा परिसर हल्ली क्लेरा ब्रुस स्कूल या नावाने ओळखला जातो.
हे नामकरण मात्र अगदी अलीकडचे, म्हणजे १९७० सालाचे.
अमेरिकन मिशनच्या नगरमधील तीन शाळा विसाव्या शतकापर्यंत `फरार स्कूल्स' म्हणूनच ओळखल्या जायच्या.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या चरित्रांत फरारबाईंचा हमखास उल्लेख होतो. न झाल्यास ती चरित्रे अपूर्ण ठरतात.
याचे कारण म्हणजे नगर येथे फरार मॅडम यांच्या मुलींच्या शाळेस सदाशिवराव गोवंडे यांच्याबरोबर भेट देऊन, फरार बाईंशी बोलून प्रभावित होऊन आपण पुण्यात परतलो आणि मुलींशी शाळा सुरु केल्या, असे खुद्द जोतिबांनी लिहिले आहे.
सावित्रीबाई फुले यांनी नगरला याच आवारात फरारबाईंकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले, हेसुद्धा सर्वश्रुत आहे.
मिस सिंथिया फरार अमेरिकेतून २९ डिसेंबर १८२७ रोजी भारतात मुंबईत आल्या.
मुंबईत भेंडी बाजार वगैरे ठिकाणी त्यांनी अमेरिकन मिशनच्या मुलींच्या शाळा चालवल्या. आजारपणामुळे त्या १८३७ ला मायदेशी गेल्या मात्र १८३९ साली त्या भारतात परत आल्या.
तेव्हापासून आपली पूर्ण हयात त्यांनी नगर येथे मुलींना ज्ञानदान करण्यात, त्यांना साक्षर आणि सबल कऱण्यात घालवली.
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ जानेवारी १८६२ ला नगर येथेच त्यांचे निधन झाले, इथेच त्यांना चिरविश्रांती देण्यात आली.
भारतात मुलींच्या शिक्षणासाठी अत्यंत मौल्यवान योगदान करणाऱ्या या मिशनरी महिलेच्या कार्याच्या साक्षी असणाऱ्या विविध वास्तू आणि वस्तू काल दिवसभर अगदी निरखून पाहताना मी खरेच भावुक झालो होतो.
मराठी मिशनच्या अध्यक्षा डॉ. विजया जाधव यांच्या सौजन्यामुळे ही भेट शक्य झाली होती.
सावित्रीबाई प्रशिक्षणासाठी इथेच काही महिने राहिल्या होत्या.
आज नगरमध्ये किंवा इतरही ठिकाणी सिंथिया फरार हे नाव फारसे परिचित नाही. इथे त्यांचा एकही फोटो सापडणार नाही.
पंचवीस - तीस एकर परीसर असलेल्या मराठी मिशनच्या या आवारातील एकाही शाळेला किंवा संस्थेला फरारबाईंचे नाव देण्यात आलेले नाही.
असे असले तरी सिंथिया फरारबाईंचे स्त्रीशिक्षण क्षेत्रातील योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
महिला दिनानिमित्त फरारबाईंना आदरांजली !


                                                             अनिल दहिवाडकर

 काल दुपारी २ वाजून २४ मिनिटाला वाजता माझ्या व्हॉटस्अप वर हा मॅसेज आला होता...

`चर्चबेल' वाचायला घेतले.'
'चर्चबेल, पोळा सण, ख्रिसमस ,डान्स आणि सोरपोतेल' असे लांबलचक नाव असलेले माझे नवे पुस्तक (चेतक प्रकाशन) अलीकडेच अनिल दहिवाडकर यांना दिले होते.
त्यांच्या प्रतिसादाची मला उत्सुकता होतीच.
तो मॅसेज थेट संध्याकाळी सातला पाहिल्यानंतर आनंदून मी स्म्यायली इमोजी डकवली होती.
मात्र त्यानंतर पाचेक मिनिटांत अनिल दहिववाडकरांचा उत्तरादाखल मॅसेज आला अन् माझा आनंद खरोखरच द्विगुणित झाला.
कोण आहेत हे अनिल दहिवाडकर ?
माझ्या फेसबुक मित्रांच्या यादीतल्या अनेक लोकांना त्यांची माहिती नसणार म्हणून हा माझा प्रपंच..
दहिवाडकर सर याबद्दल राग मानून घेणार नाही याची मला खात्री आहे.
वयाची ऐंशी पार केलेले अनिल दहिवाडकर ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक आहेत.
पंचाहत्तरी पार केल्यानंतर त्यांनी पूर्ण केलेला ३८० पानांचा एक मोठा प्रकल्प म्हणजे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा'. (प्रकाशक ख्रिस्ती साहित्य प्रसारक)
या सूचीत सतराव्या शतकात मराठीतील पहिले मुद्रीत पुस्तक ( रोमन लिपीत ) लिहिणारे फादर थॉमस स्टीफन्स आणि विल्यम कॅरी यांच्यासारख्या अनेक परदेशी व्यक्ती आणि आजघडीला साहित्यरचना करणाऱ्या देशी व्यक्ती यांची संक्षिप्त चरित्रे, लिहिलेली पुस्तके, प्रकाशने, किंमत वगैरेची माहिती देण्यात आली आहे.
श्री. म. पिंगे यांच्या 'युरोपियनांचा मराठीचा अभ्यास' (व्हीनस प्रकाशन -१९५९) आणि गंगाधर नारायण मोरजे यांच्या 'ख्रिस्ती मराठी वाड्मय' - फादर स्टीफन्स ते १९६० अखेर' (प्रकाशक: अहमदनगर कॉलेज आणि स्नेहसदन, पुणे - १९८४ ) या दोन अमूल्य ग्रंथांच्या तोडीचे दहिवाडकर यांचे हे पुस्तक आहे.
मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या कुठल्याही संशोधकाला या ग्रंथाची खूप मदत होणार आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे गेली तीन दशके जेव्हाजेव्हा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावाची चर्चा होत असते, तेव्हा दोन नावे अग्रस्थानी असतात.
पुण्याचे अनिल दहिवाडकर आणि मुंबईतील विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो.
दोघांनाही या पदाने आतापर्यंत हुलकावणी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शेतकरी आदोलकांना 'आंदोलनजीवी' असा शब्द वापरल्यानंतर दहिवाडकर यांनी एका लेखात त्याच शैलीत 'ख्रिस्ती लोक मटणजीवी' आहेत' असा उल्लेख समाजमाध्यमात केला होता.
त्यावर मोठा गदारोळ झाला होता. यासंबंधी माझ्या या पुस्तकात छोटासा लेख आहे.
तर आता दहिवाडकर सरांनी पाठवलेला मॅसेज असा होता :
`` `चर्चबेल' एका दमात वाचून संपविले.
ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, व्यक्तिचित्रण आणि माहितीपूर्ण खुशखुशीत स्फुट लेखांचा हा संग्रह केवळ वाचनीयच नव्हे तर त्यातील विविध विषयांमुळे संग्रहणीयही झाला आहे.
पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक केवळ ख्रिस्ती असल्यामुळेच अडगळीत टाकले जातात हे आजचे वास्तव आहे.
`ख्रिस्ती माणूस मटणजीवी' आहे हे प्रथम मी म्हटले. त्यामुळे एका ख्रिस्ती माणसाचा फार संताप झाला.
आपल्या लोकांना तशी विनोदबुद्धी कमीच..
पंचहौदच्या चहा बिस्कीट समारंभात सौ. दहिवाडकर यांचे आजोबा प्रा.ना.स.पानसे आणि त्यांचे लेखक मित्र (`पण लक्षात कोण घेतो' फेम) ह. ना. आपटे हेही उपस्थित होते.
असो.
पुस्तक रोचक झाले आहे
अनिल दहिवाडकर''

Thursday, May 1, 2025

 


Clara Bruce Girls School
आम्हा पत्रकारांच्या विशेषतः बातमीदारांच्या परिभाषेत अवचित, अगदी अचानक बातमीचे मोठे घबाड मिळणे आणि इंग्रजी पत्रकारितेत scoop हाती लागणे असे वाक्प्रचार आहेत.
असे बातम्यांचे स्कुप वारंवार किंवा नियमितपणे मिळत नसतात, त्यामुळेच या बातम्या,हे स्कूप बातमीदारांच्या आयुष्याची बेगमी होतात.
असेच बातमीचे एक मोठे घबाड किंवा स्कूप मला माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला गोव्यात मिळाले होते.
तिहार तुरुंगातून पळालेला खतरनाक गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला मुंबई पोलिसांनी गोव्यात पर्वरीच्या हॉटेलात शिताफीने अटक केली, ही बातमी मला अशीच अगदी अपघाताने कळली होती.
नोकरीतून केव्हाच निवृत्त झालो असली तरी समाजमाध्यमच्या फ्लॅटफॉर्मवर निरनिराळ्या विषयांवरचे लेख, विविध घटनांचा वृत्तांत वगैरे विविध रुपांत माझी पत्रकारिता अव्याहत चालू राहिली.आहे.
इथे याच फेसबुकवर असे सक्रिय असताना तिनेक वर्षांपुर्वी अचानक `मिस सिंथिया फरार' या नावाने माझी उत्सुकता चाळवली गेली.
या उत्सुकतेमुळे मी शोध घेत असता अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांचे चरित्र आणि कार्याबाबत तसेच जोतिबा फुले आणि `फरार मॅडम' यांची नगरला झालेली भेट आणि संभाषण याबाबत मला विस्तृत माहिती मिळाली.
यातून सावित्रीबाईंच्या शिक्षिका सिंथिया फरार यांचे छोटेखानी चरित्र मी लिहिले. चाळीसगावच्या गौतम निकम यांच्या विमलकीर्ती प्रकाशनाने ते प्रसिध्द केले.
हे प्रकरण इथेच संपेल असे मला तेव्हा वाटले होते.
पण तसे झाले नाही.
त्यानंतर सुरु झाला माझा सावित्रीबाई आणि जोतिबांच्या पाऊलखुणांचा शोध.
'सत्यशोधक ' चित्रपटात लहानगा जोतिबा आणि त्याचे मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे ही मुले 'स्कॉटिश मिशनरी स्कूल पुणे' या नावाची गोलाकार कमान असलेल्या शाळेत दौडत जातात असे एक सुरुवातीचे दृश्य आहे.
या शाळेत मिशनरी `जेम्स साहेब' त्यांचे शिक्षक आहेत.
पुण्यात आता कुठे असेल ती स्कॉटिश मिशनची शाळा? आणि हे रेव्हरंड जेम्स मिचेल कोण ?
आणि सावित्रीबाईंना अध्यापनाचे धडे देणाऱ्या त्यांच्या पत्नी मिसेस मार्गारेट मिचेल?
याबाबतसुद्धा मला विविध दस्तऐवजांतून अनेक संदर्भ मिळाले.
सावित्रीबाई आणि जोतिबा यांना शिकवणाऱ्या, त्यांचे आयुष्य घडवणाऱ्या तसेच भारतात स्त्रीशिक्षण क्षेत्रात त्यांचे पूर्वसुरी असणाऱ्या काही व्यक्तींची छोटेखानी चरित्रे मी दरम्यानच्या काळात लिहिली.
फुले दाम्पत्याच्या चरित्रांत आणि कार्यात महत्त्वाचे योगदान असलेल्या या व्यक्तींच्या आयुष्याबद्दल आणि कार्याबाबत अशाप्रकारे पहिल्यांदाच स्वतंत्ररित्या लिहिले गेले आहे.
सावित्रीबाई आणि जोतिबा यांच्या पाऊलखुणा शोधत असताना या पंधरवड्यात अचानक स्कॉटिश मिशनच्या पुण्यात आजही कार्यरत असलेल्या शाळा आणि कॉलेजांची माहिती मिळाली.
याच शिक्षणसंस्थांमध्ये आधी जोतिबा आणि नंतर सावित्रीबाई शिकल्या होत्या.
जोतिबा तर काही काळ या शाळांत शिक्षक म्हणूनही नोकरी करत होते, असे त्यांनीच सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
परवा नगरला दोन दिवस होतो.
त्यापैकी एक पूर्ण दिवस तिथल्या माळीवाड्यातल्या दोन शतके जुने असलेल्या क्लेरा ब्रुस गर्ल्स स्कूलच्या आवारात घालवला.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेले हे विस्तीर्ण आवार आहे.
विस्तीर्ण म्हणजे तीस एकरांहून अधिक मोठा परिसर. शहराच्या ऐन मध्यवस्तीत. आणि या परिसरात अनेक छोट्यामोठ्या आकाराच्या बैठ्या वास्तू.
त्यापैकी एकही वास्तू अलीकडच्या काळातली, पन्नाससाठ वर्षे आयुर्मान असलेली, आधुनिक किंवा दुमजली नाही.
काही वर्षांपूर्वी रंग दिलेली केवळ एकच वास्तू मला दिसली.
इथल्या आता या भकास, पडक्या, भग्न झालेल्या आणि त्यामुळे उदास भासणाऱ्या वास्तूंमध्ये एकेकाळी सावित्रीबाई आणि जोतिबांनी सिंथिया फरारबाईंची वाणी ऐकली होती.
धनंजय कीर यांनी जोतिबांच्या चरित्रात जोतिबा आणि फरार मॅडमच्या भेटीबाबत आणि त्यांच्या संभाषणाबाबत विस्तृतपणे लिहिले आहे.
सावित्रीबाईंच्या आणि जोतिबांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्याच्या माझ्या ध्यासानेच मला नगरला या आवारात आणि या वास्तूंकडे ओढून आणले होते.
नगरच्या या क्लेरा ब्रुस गर्ल्स स्कुलमध्ये बुधवारी १२ फेब्रुवारीला मराठी मिशनच्या २१२ व्या वर्धापनानिमित्त पार पडलेल्या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या पावन भूमीत मी पोहोचलो होतो.
सावित्रीबाई आणि जोतिबांना आणि पर्यायाने अख्ख्या देशाला या शाळेच्या आवाराने प्रकाशाची एक नवी वाट दाखवली होती.
या शाळेच्या आवारात शिरत असताना तिथल्या फलकाने माझे लक्ष वेधून घेतले.
स्थापना १८३८..
भारतात मुंबई बंदरात २९ डिसेंबर १८२७ रोजी पहिल्यांदा पाऊल ठेवणाऱ्या सिंथिया फरारबाई नगरला १८३९ साली आल्या.
त्यानंतर मायदेशी कधीही न परतता आयुष्याच्या अखेरपर्यंत मुलींना विद्यादान करत इथेच त्यांनी आपला देह ठेवला.
फरारबाईंबाबत आणि त्यांच्या इथल्या या शाळांविषयी आजही लोकांना फारसे माहित नाही.
फरारबाईंच्या १८६२ सालच्या निधनानंतर साठसत्तर वर्षानंतरसुद्धा म्हणजे किमान १९२० पर्यंत `फरार स्कूल्स' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीन शाळा नगर शहरात होत्या.
या `फरार शाळां'तील मुलींचा एक फोटो अमेरिकन मराठी मिशनच्या एका वार्षिक अहवालात छापला होता.
कालांतराने फरारबाईंची ही ओळखसुद्धा पुसून गेली.
नगरच्या शाळा नंतरच्या काळात अमेरिकन मिशनच्या शाळा म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या.
यापैकी एका शाळेचे क्लेरा ब्रुस गर्ल्स स्कुल असे नामकरण झाले ते अलीकडच्या काळात.
१९७० साली.
अमेरिकेतून इथे येणाऱ्या आणि शाळेत प्राचार्य असणाऱ्या क्लेरा ब्रुस या शेवटच्या परदेशी मिशनरी. अनेक वर्षे त्या मुलींच्या शाळेच्या प्राचार्य होत्या.
या आवारात अनेक शाळा आणि शिक्षणसंस्था आहेत, त्यापैकी एकाही संस्थेला किंवा दालनाला सिंथिया फरार यांचे नाव देण्यात आलेले नाही.
फरारबाईंचा एकही फोटो आतापर्यंत मी कुठेही पाहिला नाही.
नगरच्या कबरस्थानात असलेल्या त्यांच्या चिरविश्रांतीची जागा शोधणे तर दुरापास्त आहे.
मात्र फरारबाईंचे खरेखुरे स्मारक आहेत सावित्रीबाई आणि जोतिबांनी शिक्षण आणि इतर क्षेत्रांत केलेले महान कार्य.


न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ग्रंथकारांचे दुसरे संमेलन पुण्यात २४ मे, १८८५ रोजी भरवले. या संमेलनात सहभागी होण्यासंबंधी रानड्यांनी जोतीराव फुले यांना १३ मे, १८८५ रोजी पत्र पाठवले होते.

फुले यांच्यासह अनेकांना रानडे यांनी असे पत्र पाठवले होते.
या संमेलनास तीनशे ग्रंथकार हजर होते. जे उपस्थित राहिले नाही अशांपैकी काहींनी पत्रे पाठवली होती.
फुले यांनी या संमेलनास येण्यास नकार दिला आणि त्याबाबतची कारणे स्पष्ट करणारे पत्रसुद्धा रानडे यांना लिहिले.
संमेलनात इतर पत्रांसोबत फुले यांचे हे पत्रसुद्धा वाचण्यात आले.
न्यायमूर्ती रानडे यांच्याशी जोतिबा फुले यांचे चांगले संबंध होते. फुले यांच्या सत्यशोधक मंडळाच्या पुण्यातील १८८५च्या गुडीपाडव्यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत रानडेसुद्धा सहभागी झाले होते.
संमेलनास हजर न राहता पत्रे पाठवणाऱ्या इतरांनी काय मत मांडले होते हे आता कळणे शक्य नाही.
जोतिबांच्या या संमेलनाविषयीच्या विद्रोही भावना मात्र आपल्याला कळतात, याचे कारण म्हणजे अमेरिकन मराठी मिशनच्या `ज्ञानोदय' मासिकाने हे पत्र ११ जून, १८८५ च्या अंकात छापले होते.
जोतिबांच्या या पत्रावर काही नियतकालिकांत फार संतापून लिहिण्यात आले होते. त्याविषयी `ज्ञानोदय' संपादक लिहितात:
``ते पाहून कित्येक लोकांस ते पत्र आपल्या अवलोकनास यावे अशी इच्छा झाली. आम्हांसही झाली. यास्तव आम्ही ते पत्र उतरुन घेतो. ''
धनंजय कीरलिखित फुले यांच्या चरित्रात जोतिबांचे हे पत्र आहे.
जोतिबांच्या या पत्रातील काही भाग पुढीलप्रमाणे:
``विनंती विशेष. आपले ता १३ माहे मजकुराचे कृपापत्रसोबतचे विनंतीपत्र पावले यावरुन मोठा परमानंद झाला.
परंतु माझ्या घालमोड्या दादा, ज्या गृहस्थांकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्कांविषयी वास्तविक विचार केला जाऊन त्यांस ते हक्क, त्यांच्यानें खुषीने व उघडपणे देववत नाहीत व चालू वर्तनावरुन अनुमान केले असता पुढेही देववणार नाहीत,
तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांशी व त्यांनी केलेल्या पुस्तकांतील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही.
कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हांवर सूड उगविण्याच्या इराद्याने, आम्हांस दास केल्याचे प्रकर्ण त्यांनी आपलया बनावट धर्मपुस्तकांत कृत्रिमाने दडपले. याविषयी त्यांच्यातील जुनाट खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत.
यावरुन आम्हा शुद्रादी अतिशुद्रांस काय काय विपत्ती व त्रास सोसावे लागले व हल्ली सोसावे लागतात ते त्यांच्यातील उंटावरुन शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस व मोठमोठ्या सभांस्थानी आगंतुक भाषण करणारांस कोठून कळणार ?
सारांश, त्यांच्यात मिसळण्याने आम्हा शूद्रादी अतिशुद्रांचा काहीएक फायदा होणे नाही. याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे.
अहो, त्या दादांना जर सर्वांची एकी करणे असेल तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यांस परस्पर अक्षय बंधुप्रीती काय केल्याने वाढेल याचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकद्वारे प्रसिद्ध करावे.
अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही. या उप्पर त्या सर्वांची मर्जी.
हे माझे अभिप्रायादाखल छोटेखानी पत्र त्या मंडळींच्या विचाराकरिता तिजकडे पाठविण्याची मेहेबानी करावी,
साधे होके बुढढेका येह ये पहिला सलाम लेव.
आपला दोस्त
जोतीराव गो. फुले

राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन

कोण असतील बरे या वेगवेगळ्या वेशभूषेतील मुली?

पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणाऱ्या त्या शालेय मुलींची उत्सुकता लपत नव्हती.
बुधवारच्या 12 February 2025 नगर येथील ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनातील ग्रंथ दिंडीतील या तीन व्यक्तिरेखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
त्या तीन व्यक्तिरेखा होत्या:
समाजसुधारक, विदुषी पंडिता रमाबाई,
भारतात विशेषतः महाराष्ट्रात मुंबई आणि नगर येथे स्त्रीशिक्षणाची मुहुर्तवेढ रोवणाऱ्या सिंथिया फरार
आणि अर्थातच मदर तेरेसा..

अलीकडे मराठी विश्वात वेगवेगळी संमेलने होताहेत.
काही विश्व संमेलने असतात जिथे विश्वातल्या अतिश्रीमंत लोकांना रक्कम मोजुन येण्यासाठी आवतण दिले जाते.
काही साहित्य संमेलने मराठी नगरीचियेची सीमा पार करुन थेट देशाच्या राजधानीत भरवली जातात.
अशा संमेलनांचा थाट खास असतो आणि यात सहभागी होणाऱ्या निमंत्रित लोकांची खूप चांगली ठेप राखली जाते असे ऐकून आहे.
कालच दिल्लीतल्या साहित्य संमेलनाची लांबलचक कार्यक्रमपत्रिका पाहिली, विविध सत्रांमधल्या निमंत्रित लोकांची नावे वाचली आणि डोळे दिपले.
दोनेक दिवसांपूर्वी मी एका संमेलनाला हजर होते ते मात्र पूर्णतः वेगळ्या स्वरुपाचे होते.
ग्रामीण साहित्य संमेलन असल्याने आपला खास गावरान आब राखून होते.
नगरला १२ फेब्रुवारीला झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाविषयी मी हे सांगतो आहे.
नावातच `ग्रामीण' बिरुद अभिमानाने मिरवत असल्याने या मांडवाखालची सगळीच मंडळी रांगडी होती, `आत एक आणि बाहेर दुसरे' असे काही त्यांचे वागणे नव्हते.
एक उदाहरण देतो.
या ग्रामीण संमेलनाला नगर शहराबाहेरुन आलेल्या लोकांची संख्या बऱ्यापैकी होती तरी त्यापैकी कुणालाही - अगदी विविध सत्रांच्या अध्यक्षांनाही - येण्याजाण्यासाठी मानधन दिले नव्हते.
मला स्वतःलाही आमंत्रण नव्हते.
पण आमच्या मूळ जिल्ह्यात होणाऱ्या संमेलनाची माहिती मिळाल्यावर मी आपणहून आयोजकांशी संपर्क साधला आणि स्वतःसाठी निमंत्रण मिळवले होते.
संमेलनाच्या आदल्या रात्री राहण्यासाठी फक्त दोन रुम्स बुक करण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी एका रूममध्ये मी राहिलो होतो.
बाकी सर्व जण - पुणे, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर वगैरे ठिकाणांहून स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने आले होते.
इथेही काव्यवाचन करायला अनेक हौशी आणि नवोदित कवी होते, त्यापैकी काहींच्या नावांवर एकही काव्यसंग्रह नव्हता.
श्रोत्यांतले रसिक मात्र त्यांना मनापासून दाद देत होते.
या ग्रामीण संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुपारच्या जेवणाला एकच मेन्यू होता.
तो म्हणजे मांसाहारी.
भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खाद्यपदार्थ अर्थातच चिकन बिर्याणी.
या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाला येणाऱ्या सर्वांची खाद्य संस्कृती समान असेल, आणि त्यापैकी प्रत्येकाला चिकन बिर्याणी आणि सोबत खोशिंबर हमखास आवडेल, हे आयोजकांनी गृहीतच धरले होते.
भुकेल्या पोटी चिकन बिर्याणी आणि कोशिंबरीचा आस्वाद घेताना आयोजकांच्या या गृहितकाला मी मनापासून दाद दिली.
इकडच्या ग्रामीण लग्न आणि इतर समारंभांत असणारे इतर खाद्यपदार्थ म्हणजे शिरासुद्धा अर्थातच होता.
बस्स तेव्हढेच, जेवणानंतर आईस्क्रीम किंवा तोंड रंगवण्यासाठी पान वगैरे कुछ नाही.
जेवण्याच्या ठिकाणी हातातल्या पत्रावळीत हे खाद्यपदार्थ घेऊन पाहुणेमंडळी दिसेल तिथे फतकल मारुन किंवा पत्रावळी उंचवट्यावर ठेऊन उभ्याउभ्याने गप्पा मारत जेवत होती.
प्रस्थापित संमेलनादी कार्यक्रमांत मान्यवर व्यासपीठावरचा आपला सहभाग संपला कि ठरलेल्या बिदागीचा चेक घेऊन तत्परतेने तेथून पाय काढत असतात.
इथे मात्र उशिरा संध्याकाळपर्यंत तेथून पाय काढता घेणे नकोसे वाटत होते.
पुण्यात रामवाडी स्टेशनमधली रात्रीची शेवटची मेट्रो चुकेल म्हणून मी तेथून जरा लवकर निघालो होतो.
गावाकडच्या मंडळींनी अशी संमेलने वारंवार घ्यावीत.

अमेरिकन मराठी मिशनचा वर्धानपनदिन

१२ फेब्रुवारी - याच दिवशी १८१३ रोजी मुंबई बंदरावर चार अमेरिकन मिशनरींचे आगमन झाले आणि भारतात सामाजिक क्रांतीचे पर्व सुरु झाले. .

सॅम्युएल नॉट, मिसेस नॉट, गॉर्डन हॉल आणि ल्युथर राईस ही त्या मिशनरींची नावे.
या मिशनरींनी लगेचच आधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळा मुंबईत सुरु केल्या, केवळ मुलींसाठी पहिली शाळा १८२४ साली सुरु केली.
१२ फेब्रुवारी अमेरिकन मराठी मिशनचा वर्धानपनदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मराठी मिशन आणि साप्ताहिक उपदेशक यांच्या विद्यमाने उद्या नगर येथे राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन होत आहे.
सावित्रीबाई फुले यांनी सिंथिया फरार मॅडमच्या ज्या शाळेत अध्यापनाचे धडे घेतले असतील त्या क्लेरा ब्रुस शाळेत हा कार्यक्रम होत आहे.
मुंबईतल्या अमेरिकन मराठी मिशनच्या एका तुकडीने २० डिसेंबर १८३१ रोजी नगर येथे तंबू ठोकला आणि या शहरात अमेरिकन मराठी मिशनचे कार्य सुरु झाले, ते आजतागायत चालू आहे.
या पहिल्या दिवसापासून तो या केंद्राच्या १८८१च्या सुवर्णमहोत्सवापर्यंतच्या कार्याच्या हृदयस्पर्शी आठवणी त्याकाळात अमेरिकेत परतलेल्या रेव्ह. हॉलीस रीड यांनी लिहिल्या होत्या.
पुण्यातील ज्येष्ठ संशोधक अशोक एस हिवाळे यांनी त्या लिखाणाचा मराठीत पुढीलप्रमाणे अनुवाद केला आहे. तो अनुवाद संक्षिप्त रुपात येथे मी देत आहे :
मोहरीचा दाणा वाढला आणि त्याचे मोठे झाड झाले
"१८३१ मध्ये अहमदनगर मिशन ठाणे सुरू करणाऱ्या पहिल्या मिशनरींपैकी रेव्ह. हॉलिस रीड हे एक मिशनरी होते. ते आता वयाच्या ७८ व्या वर्षी अमेरिकेत मिसेस रीड यांच्यासोबत आहेत. त्यांच्या स्मृती अजूनही ताज्या आहेत, त्यांनी आम्हांला त्या सुरुवातीच्या दिवसांत घडलेल्या लहानसहान घटनांच्या विविध आठवणी सांगितल्या आहेत" -
``१८७८ सालच्या मराठी मिशनचा अहवाल दयाळूपणे माझ्याकडे पाठवला आणि गेल्या ५० वर्षांपूर्वीच्या छोट्याशा सुरुवातीची सध्या सुरू असलेल्या विस्तृत आणि उदात्त कामाशी तुलना केली, तेव्हा मी आश्चर्याने आणि निर्विवाद कृतज्ञतेने उद्गारलो, ‘‘पाहा, देवाने केवढे कार्य केले आहे!’’
हा अहवाल पाहून माझे हृदय भरून आले आणि मी म्हटले, अरे! त्या आगामी ५० व्या वर्धापनदिनानिमित्त मला तुमच्याबरोबर असायला पाहिजे होते.
मी तिकडे आलोच तर परत अमेरिकेला माघारी येणार नाही. परंतु माझा प्रिय बंधू हर्वे याच्या नगर येथील कबरेच्या बाजूला मला पुरण्यात यावे अशी मी अपेक्षा करीन.
२० डिसेंबर १८३१ रोजी आमच्या प्रारंभीच्या छोट्या टोळीने अहमदनगरमध्ये आमचे तंबू ठोकले; आमच्या टोळीत मिस्टर आणि मिसेस ग्रेव्हज, मिस्टर हर्वे, आणि मी आणि माझी पत्नी यांचा समावेश होता.
मिस्टर ॲलन आणि मी अशा दोघांनी आधी दख्खन पठाराचा पुनर्विचार केला होता आणि हे ठिकाण पसंतीचे स्थान म्हणून निवडले होते.
आमची सुरुवात आशादायी होती - शनिवारी आम्ही नगरला आलो आणि रविवारी आर्मी सर्जन डॉ. ग्रॅहॅमसोबत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गेलो. ते दर शब्बाथ दिवशी सकाळी आमंत्रण देऊन गरीब, लंगडे, आंधळे आणि कुष्ठरोगी यांना बोलवायचे.
ते लोक तेथे जमले की, ते त्यांना जो एकटाच त्यांची आध्यात्मिक दुर्बलता दूर करू शकतो अशा एका महान वैद्याविषयी सांगायचे. आणि त्यांच्या उपासमारीने भुकेजलेल्या कृश शरीरांसाठी तांदूळ आणि धान्याचा पुरवठाही करायचे.
थोडक्यात सांगायचे तर येथे आमचे मिशनकार्य सुरू झाले.
जानेवारी १८३३ चा पहिला सोमवार, हा दिवस माझ्या चांगला आठवणीत राहील. . मला माझ्या जर्नलमध्ये त्या दिवसाविषयी लिहिलेली खालील टिपणी आढळते :
‘‘भारतात मी पाहिलेला हा सर्वांत पवित्र आणि मनोरम दिवस आहे. आमच्या स्थानिक भाषेतील सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी तीन अनोळखी लोक उपस्थित होते. ते म्हणाले की, ‘‘आम्ही ‘नवीन मार्गाविषयी’ विचारपूस करण्यासाठी आलो आहोत.’’
याचा परिणाम असा झाला की, यांपैकी बारा जणांना मंडळीमध्ये सभासद म्हणून स्वीकारण्यात आले - चौघांना फेब्रुवारीमध्ये आणि इतरांना आमची स्वतंत्र मंडळी स्थापन झाल्यावर पुढील मार्चच्या ६ तारखेला.
आम्ही तोपर्यंत मुंबईच्या मिशन चर्चची शाखा म्हणून अस्तित्वात होतो.
मंडळी स्थापन होण्यापूर्वी मिशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात चौदा सदस्य होते. त्यात सर्वांत खालच्या जातीचे दहा हिंदू, गरीब आणि असहाय होते.
आता मला अहमदनगर येथील मंडळीमध्ये सर्व जातींचे तीनशे सदस्य आढळतात आणि त्यात उच्च जातीतील लोकांची संख्याही बऱ्यापैकी आहे.
त्या सुरुवातीच्या काळातील आमचे बहुतेक सत्यशोधक लवकरच हे दाखवून देतील की, आम्ही शिकवलेल्या धर्मात त्यांना जे स्वारस्य होते ते केवळ नोकरी मिळवण्यासाठी किंवा काही आर्थिक लाभ मिळवण्यासाठी नव्हते.
आणि जेव्हा मी तुमच्या तरुण मुलींच्या बोर्डिंग स्कूलकडे पाहतो, तेव्हा त्या बोर्डिंगस्कूलची सर्व सोयींनीयुक्त इमारत, पुस्तके आणि फर्निचर आणि त्यातील आंतरराष्ट्रीय आदर्श पातळीचे (आयएसओ) विद्यार्थी, तेव्हा मला मिसेस रीड यांनी मुलींसाठी पहिली छोटी शाळा सुरू करण्यासाठी केलेले पहिले प्रयत्न आठवले.
मुलींची शाळा सुरू करण्याच्या मिसेस रीडच्या प्रयत्नांकडे मूळ रहिवाशांनी एक परिपूर्ण मूर्खपणा म्हणून पाहिले आणि काहींनी त्यांची खिल्ली उडवली.
त्यांनी तिला विचारले की, ‘‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’’
तर्क आणि मन वळवण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिने शेवटला उपाय म्हणून पैशांचा युक्तिवाद वापरला.
जी मुलगी दररोज शाळेला येईल तिला एक पैसा मिळेल.
या युक्तिवादाचा उपयोग करून एक लहान शाळा स्थापन करण्यात आली. पैसे (कदाचित दहा पैसे) आठवड्याच्या शेवटी प्रत्येकीला दिले गेले.
लवकरच मुलींना शाळेला येण्यात स्वारस्य वाटू लागले - काही वाचायला शिकल्या.
सुरुवातीला त्यांच्या पालकांना आश्चर्य वाटले, परंतु लवकरच या नवीन आणि अनपेक्षित विकासाचा अभिमानही वाटू लागला.
आणि मग पैसा मिळो अगर न मिळो मुली शाळेत नियमितपणे येऊ लागल्या.
परंतु प्रवाह नेहमीच सुरळीत वाहतो असे नाही.
स्त्रीशिक्षण हे ब्राह्मण आणि उच्च जातींनी अतिशय संशयास्पद मानले होते आणि खालच्या जातींनीही ते अत्यंत अनिच्छेने व्यवहार्य किंवा आवश्यक म्हणून स्वीकारले होते.
हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम होता. त्याची उपयुक्तता कोणीही पाहू शकत नव्हते आणि त्याच्या यशामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात अपयश आले नाही.
त्यामुळे मुलींच्या शाळांकडे पुरोहित फारच संकुचितपणे पाहत. आणि अशा योजनांना मोडून काढण्यासाठी वेळोवेळी सर्व प्रकारची कटकारस्थाने आखली जात.
याचे एक उदाहरण पाहा : एके दिवशी सकाळी मिसेस रीड शाळेला नेहमीप्रमाणे भेट देत असताना, तिला एक वर्ग रिकामा आढळला. एकही विद्यार्थिनी दिसत नव्हती.
बाई आश्चर्यचकित होऊन तेथेच रेंगाळत असताना शिक्षक येऊन हजर झाले.
आणि शाळेचा वर्ग रिकामा का आहे याचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, अशी अफवा पसरली आहे की मुलींना थोडेफार प्रशिक्षण देऊन व त्यांच्यात बदल करून त्यांना दूर पाठवून गुलाम म्हणून विकण्यासाठी त्यांच्या घरातून काढून एकत्र आणण्याचा बाईंचा हेतू होता. त्यामुळे त्यांचे पालक त्यांना शाळेतून घेऊन गेले.
दुसऱ्या एका प्रसंगात असा शोध लावला होता की दुसऱ्या एका शाळेतील पुस्तकात येशू ख्रिस्ताचा धर्म शिकवला जातो आणि आम्ही त्यांना त्यांच्या वडिलांचा धर्म सोडण्यास भाग पाडणार आहोत असा धोक्याचा इशारा दिला होता.
यामुळे एक धोक्याची घंटा वाजली आणि कोकरे पुन्हा विखुरली गेली.
परंतु या प्रकरणात इतरांप्रमाणेच धोक्याच्या घंटेचा हा नाद लवकरच मंदावला.
बहुतेक विद्यार्थी परतले आणि शाळा चालू झाल्या.
आणि आणखी एक बळकट दृष्टान्त मला दिसतो तो म्हणजे अहमदनगरमधील ईश्वरविज्ञान पाठशाळा! माझ्या पहिल्या बॉईज स्कूलशी तुलना करता हे चित्र किती परस्परविरोधी आहे - अर्धा डझन गरीब ओबडधोबड कपडे घातलेले विद्यार्थी जमिनीवर मांडी घालून बसले आहेत आणि वाळूच्या बोर्डवर अ, आ, इ, ई लिहीत आहेत.
मला त्या गावांची (आणि त्यांच्यापलीकडील गावांतील अनेकांची) आठवण होते.
माझ्या पहिल्या भेटीत मी त्यांना पहिल्यांदाच येशूची कथा आणि त्याचे प्रेम सांगितले होते. यांपैकी काही गावांमध्ये लोकांनी पाहिलेला मीच पहिला गोरा माणूस होतो
माझ्या जर्नलमध्ये लिहिले आहे, ‘‘मिशनच्या पहिल्या तीन वर्षांत सोळा प्रचारदौरे करण्यात आले, २२०० मैलांचा प्रवास केला, आणि २३० गावांना भेटी दिल्या, त्यांपैकी बहुतेकांनी मिशनरीचा आवाज यापूर्वी कधीही ऐकला नव्हता.’’
हे दौरे नगर केंद्रातून सुरू करून जुन्नर, औरंगाबाद, जालना, हैद्राबाद, कोल्हापूर, पंढरपूर, सातारा, महाबळेश्वर डोंगर आणि मध्यंतरीच्या सर्व प्रमुख गावांपर्यंत विस्तारले होते.
मी आता लोणी, राहुरी, शिरुर, सातारा, सोलापूर आणि इतर सर्वच गावांत या माझ्या भेटींची पुनरावृत्ती करू शकलो, तर मला किती आनंददायी विरोधाभास आढळेल !
लाल समुद्र पार केला आहे. प्रगतीतील पूर्वीचे अडथळे दूर केले, एवढेच नाही तर त्यांची तीव्रता कमी झाली आहे.
जातीची लोखंडी पकड सैल झाली आहे. निर्दयी भटभिक्षुकांच्या जुलूमजबरदस्तीचे सामर्थ्य खूपच कमी झाले आहे. ख्रिस्ती मंडळीचा आदर केला जात आहे आणि तिच्या सदस्यांना आता वाळीत टाकीत नाहीत.
नंतरच्या तारखेच्या एका पत्रात, जवळ येत असलेल्या सुवर्णमहोत्सवी सम्मेलनाचा संदर्भ देत श्री. रीड म्हणतात :
‘‘ माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी निराशा ही आहे की मी भारतात सुरू केलेल्या कामात पुढे जाऊ शकलो नाही - म्हणजे तेथेच जगलो, मेलो आणि रणांगणावरच पुरला गेलो नाही.''