फुले यांच्यासह अनेकांना रानडे यांनी असे पत्र पाठवले होते.
या संमेलनास तीनशे ग्रंथकार हजर होते. जे उपस्थित राहिले नाही अशांपैकी काहींनी पत्रे पाठवली होती.
फुले यांनी या संमेलनास येण्यास नकार दिला आणि त्याबाबतची कारणे स्पष्ट करणारे पत्रसुद्धा रानडे यांना लिहिले.
संमेलनात इतर पत्रांसोबत फुले यांचे हे पत्रसुद्धा वाचण्यात आले.
न्यायमूर्ती रानडे यांच्याशी जोतिबा फुले यांचे चांगले संबंध होते. फुले यांच्या सत्यशोधक मंडळाच्या पुण्यातील १८८५च्या गुडीपाडव्यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत रानडेसुद्धा सहभागी झाले होते.
संमेलनास हजर न राहता पत्रे पाठवणाऱ्या इतरांनी काय मत मांडले होते हे आता कळणे शक्य नाही.
जोतिबांच्या या संमेलनाविषयीच्या विद्रोही भावना मात्र आपल्याला कळतात, याचे कारण म्हणजे अमेरिकन मराठी मिशनच्या `ज्ञानोदय' मासिकाने हे पत्र ११ जून, १८८५ च्या अंकात छापले होते.
जोतिबांच्या या पत्रावर काही नियतकालिकांत फार संतापून लिहिण्यात आले होते. त्याविषयी `ज्ञानोदय' संपादक लिहितात:
``ते पाहून कित्येक लोकांस ते पत्र आपल्या अवलोकनास यावे अशी इच्छा झाली. आम्हांसही झाली. यास्तव आम्ही ते पत्र उतरुन घेतो. ''
धनंजय कीरलिखित फुले यांच्या चरित्रात जोतिबांचे हे पत्र आहे.
जोतिबांच्या या पत्रातील काही भाग पुढीलप्रमाणे:
``विनंती विशेष. आपले ता १३ माहे मजकुराचे कृपापत्रसोबतचे विनंतीपत्र पावले यावरुन मोठा परमानंद झाला.
परंतु माझ्या घालमोड्या दादा, ज्या गृहस्थांकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्कांविषयी वास्तविक विचार केला जाऊन त्यांस ते हक्क, त्यांच्यानें खुषीने व उघडपणे देववत नाहीत व चालू वर्तनावरुन अनुमान केले असता पुढेही देववणार नाहीत,
तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांशी व त्यांनी केलेल्या पुस्तकांतील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही.
कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हांवर सूड उगविण्याच्या इराद्याने, आम्हांस दास केल्याचे प्रकर्ण त्यांनी आपलया बनावट धर्मपुस्तकांत कृत्रिमाने दडपले. याविषयी त्यांच्यातील जुनाट खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत.
यावरुन आम्हा शुद्रादी अतिशुद्रांस काय काय विपत्ती व त्रास सोसावे लागले व हल्ली सोसावे लागतात ते त्यांच्यातील उंटावरुन शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस व मोठमोठ्या सभांस्थानी आगंतुक भाषण करणारांस कोठून कळणार ?
सारांश, त्यांच्यात मिसळण्याने आम्हा शूद्रादी अतिशुद्रांचा काहीएक फायदा होणे नाही. याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे.
अहो, त्या दादांना जर सर्वांची एकी करणे असेल तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यांस परस्पर अक्षय बंधुप्रीती काय केल्याने वाढेल याचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकद्वारे प्रसिद्ध करावे.
अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही. या उप्पर त्या सर्वांची मर्जी.
हे माझे अभिप्रायादाखल छोटेखानी पत्र त्या मंडळींच्या विचाराकरिता तिजकडे पाठविण्याची मेहेबानी करावी,
साधे होके बुढढेका येह ये पहिला सलाम लेव.
आपला दोस्त
जोतीराव गो. फुले