Did you like the article?

Showing posts with label Narendra Chapalgaonkar. Show all posts
Showing posts with label Narendra Chapalgaonkar. Show all posts

Saturday, March 11, 2023



दोनशेदहा वर्षांपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी १८१३ रोजी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या मिशनवर निघालेल्या तीन व्यक्तींनी मुंबई बंदरात पाय ठेवला आणि भारतात एका वेगळ्या पर्वाची सुरुवात झाली.
गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या त्या तीन व्यक्ती होत्या आधुनिक काळात भारतात पाऊल ठेवणारे हे पहिले तीन मिशनरी.
अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते. महाराष्ट्राच्या विविध शहरांत आणि खेड्यापाड्यांत मुलांमुलींसाठी शाळा उघडून, बहुजनांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे उघडून या अमेरिकन मराठी मिशनने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांत अशाप्रकारे आमूलाग्र बदल घडवले आहेत.
ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी या देशात हळूहळू आपला अंमल बसवत होती आणि त्यामुळे आपले इथे कसे स्वागत होईल याची त्यांना धाकधूक वाटत होती. आणि अगदी तसेच झाले. ``तुम्ही इथे मुळीच येऊ नका, आला तसेच परत माघारी जा,'' असेच त्यांना फर्मावण्यात आले.
याचे कारण साहजिकच होते. ईस्ट इंडिया कंपनी खासगी असली तरी तिचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार आणि ब्रिटिश कायद्यानुसार चालत होता आणि ब्रिटिश कायद्यानुसार हिंदुस्थानात मिशनरींना येण्यास चक्क बंदी होती.
याच कारणामुळे विल्यम कॅरी यांना ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल असलेल्या भारतात प्रवेश करण्यापासून रोखले केले होते. त्यामुळे डचांची सत्ता असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्याला मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती.
एक गोष्ट मात्र इथे नमूद केली पाहिजे. ती म्हणजे मिशनरींना भारतात प्रवेश करण्यावर कायद्याने बंदी असली तरी त्याकाळात आणि त्याआधीही इथे ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे होती. कारण ब्रिटिश अधिकारी आणि नोकर ख्रिस्तीधर्मीय होते. त्या चर्चमध्ये असणाऱ्या चॅप्लेन यांच्या तनख्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे मोजला जात असे. पुण्यात पेशव्यांच्या सैन्यात गोव्यातील कॅथोलिक सैनिक आणि अधिकारी होते. त्यांच्यासाठी चर्च बांधण्यासाठी माधवराव पेशवे यांनीं १७९२ साली जमीन दिली, त्यातून कॅम्पातले क्वार्टर गेटपाशी आजचे सिटी चर्च उभे राहिले.
मात्र त्याकाळातल्या या चर्चचे धर्मगुरू `मिशनरी’ नव्हते, म्हणजे ते आपल्या धर्माच्या प्रसाराचे काम करत नसत, कुणा परधर्मीय व्यक्तीचा बाप्तिस्मा करत नसत. त्याउलट आता मुंबईच्या बंदरावर आलेले हे ख्रिस्ती धर्मगुरु `मिशनरी’ होते, धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट्य होते. आणि या उद्दिष्ट्याला ब्रिटिश राज्यकर्त्यांचा - ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरचे ब्रिटिश राज्यकर्ते - यांचा धोरणात्मक सक्त विरोध होता.
त्यावेळचा मुंबईचा गव्हर्नर सर आयव्हन नेपियन हा या तीन मिशनरींना प्रवेश देण्याबाबत अनुकूल असला तरी कायद्यानुसार तसे करणे त्याला शक्य नव्हते.
ब्रिटिश नागरिकांनी आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी निर्माण केलेल्या दबावामुळे ब्रिटिश संसदेने अखेरीस १३ जुलै १८१३ रोजी हिंदुस्थानात मिशनरींच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवली. अर्थात त्यानंतरही या मिशनरींना खुलेआम किंवा सुप्त उत्तेजन देण्याचे ब्रिटिश राजसत्तेने टाळले, कारण इथल्या लोकांच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या. याबाबतीत ब्रिटिशांचे धोरण शेजारी गोव्यात काही शतके सत्ता असलेल्या पोर्तुगिजांहून अगदी वेगळे होते. याचा एक परिणाम म्हणून दीडशे वर्षे ख्रिश्चन ब्रिटिशांची सत्ता असूनही भारतातील ख्रिस्ती धर्मियांचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिले.
अमेरीकन मराठी मिशनचा किंवा इतर कुठल्याही युरोपियन व्यक्ती किंवा संस्थांचा इतिहास चाळताना एक कौतुकास्पद बाब म्हणजे आपल्या अनेक कृत्यांची, घडामोडींची नोंद, नियमित स्वरूपात अहवाल किंवा दस्तऐवज मागे ठेवण्याची त्याची सवय किंवा शिस्त.
उदाहरणार्थ, गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या पहिल्या दिवसापासून त्यांनी लिहिलेल्या अनेक नोंदी, पत्रे, टिपणे आणि त्यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी नाशिकमध्ये कॉलरामुळे झालेल्या निधनापर्यंत अनेक ऐतिहासिक बाबी आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. आपल्याकडे अगदी पुरातन काळापासून याबाबत भयानक अनास्थाच आढळते. त्यामुळे याच काळात किंवा त्यानंतर काही दशकांनी भारतात आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींबाबत, काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जन्ममृत्यूंच्या तारखांबाबत आणि छायाचित्रांबाबत आजही संभ्रमाची स्थिती आहे.
अमेरिकन मराठी मिशनने इंग्रजी आणि मराठीत अशा स्वरुपे दस्तऐवज मागे ठेवल्याने भारतातील आणि महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक गोष्टींवर प्रकाश पडतो.
ख्रिस्ती मिशनरींच्या भारतातील आगमनामुळे सर्वप्रथम ठळकपणे जाणवलेला अनुकूल परिणाम म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांना ख्रिस्ती मिशनरींनी खुले करून दिलेले शिक्षण. भारतात सगळीकडे ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होण्याआधीच म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला कोलकात्याला, मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे मिशनरी लोकांनी मुलां-मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या.
`एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींसाठीं पहिली शाळा कलकत्त्यात अठराशे एकोणीस साली तेथील अमेरिकन मिशनने सुरु केली’’ असे धनंजय कीर यांनी महात्मा फुले गौरवग्रंथातल्या आपल्या लेखात म्हटले आहे.
प्रथम मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनच्या शाळेत मिस सिंथिया फरार या मिशनरी शिकवत असत. भारतात येणाऱ्या त्या `पहिल्यावहिल्या अविवाहित महिला मिशनरी' असे त्यांचे वर्णन केले जाते. इतर ख्रिस्ती मिशनरी महिला या धर्मगुरू असलेल्या आपल्या पतीबरोबर मिशनकामासाठी भारतात आलेल्या होत्या.
मिस सिंथिया फरार यांचे नाव घेतल्याशिवाय महात्मा जोतिबा फुले आणि साबित्रीबाई फुले यांची चरित्रे पूर्ण होत नाही. याचे कारण म्हणजे फरार मॅडम यांच्या अहमदनगरच्या शाळेत सावित्रीबाई फुले शिकल्या, नंतर पुण्यात त्यांनी मिचेल मॅडमच्या नॉर्मल शाळेत अद्यापनाचे प्रशिक्षणही घेतले. त्यानंतरच स्वतः फुले दाम्पत्याने पुण्यात मुलींच्या शाळा उघडल्या. फरार मॅडम यांच्या शाळेत सावित्रीबाई यांच्याबरोबर फातिमा शेख यांनीही प्रशिक्षण घेतले.
महात्मा जोतिबा फुले यांनी मिशनरींनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळा पाहून प्रेरणा घेऊन पुण्यात आपण स्वतः मुलींची शाळा सुरु केली असे त्यांनी हंटर कमिशनसमोर मांडलेल्या अहवालात पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे.
``महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा'' या आपल्या संपादित पुस्तकात हरि नरके लिहितात :
''२२ नोव्हेंबर १८५१ च्या बॉंबे गार्डियनने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. ''१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनीं जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते. एके दिवशी ते दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यास गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली.''
पंचकवींमध्ये समावेश असणारे रेव्ह. नारायण वामन टिळक, समाजसुधारक आणि विदुषी पंडिता रमाबाई अशा अनेक धुरिणांना अमेरिकन मराठी मिशनने घडवले आणि या महान व्यक्तींनी विविध क्षेत्रांत मोठे योगदान केले. या मिशनच्या कार्याचा उल्लेखावाचून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.
१८१३च्या अमेरिकन मिशनऱ्यांच्या भारतातल्या आगमनानंतर देशात आणि अमेरिकेतसुद्धा प्रचंड बदल झालेला आहे. अमेरिकेतून किंवा कुठल्याही पाश्चात्य राष्ट्रांतून हल्ली मिशनरी येण्याची शक्यता राहिलेली नाही, याचे कारण त्या देशांत धर्म या संकल्पनेचे तिथल्या समाजातून वेगाने उच्चाटन होत आहे. यांपैकी अनेक देशांत ठिकाणी कट्टरता वाढत चालली असली तरी तिथे ख्रिस्ती मिशनरी किंवा धर्मगुरु होण्याचे प्रमाण गेल्या काही दशकांत झपाट्याने कमी झाले आहे, धर्मगुरु बनवणाऱ्या सेमिनरीज ओस पडत आहेत. त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार किंवा प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा देणे हल्ली जवळजवळ कालबाह्य झाले आहे. तशातच भारतात धर्मांतरविरोधी आणि भिन्नधर्मीय विवाहांबाबत कठोर नियम आणि कायद्यांमुळे अशा गोष्टींना खिळ बसते आहे.
मात्र एखाद्या व्यक्तीने कुठल्याही कारणात्सव आपला वाडवडिलोपार्जित धर्म नाकारून दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे, तसेच इतरांना धर्मांतर करण्याबाबत प्रवृत्त करणे किंवा कुठलाही धर्म नाकारुन सरळसरळ नास्तिक बनणे या प्रक्रिया कितपत योग्य, समर्थनीय, नैतिक किंवा कायदेशीर आहे याबाबत कुठलीही टिपण्णी करणे इथे योग्य ठरणार नाही.
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मुंबईतल्या विल्सन स्कुल आणि विल्सन कॉलेजचे संस्थापक असलेल्या जॉन विल्सन, परळीतले नारायण शेषाद्री, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, इंग्रजीत कादंबरी लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि हरिपंत ख्रिस्ती यांची कन्या कृपा सत्यनाथन, तसेच भारतातल्या पहिल्या स्त्री वकील असलेल्या कॉर्नेलिया सोराबजी यांची चिकित्सक चरित्रे लिहिली आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चपळगावकर लिहितात:
``आपला देश सोडून हजारो मैल लांब आलेल्या मिशनऱ्यांच्या धर्मनिष्ठेबद्दल आणि स्वार्थत्यागाबद्दल कौतुकच केले पाहिजे . भारतात ज्या परिस्थितीत मिशनऱ्यांना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत. प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनऱ्यांना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठीभाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली. स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला रस्तोरस्ती सुवार्ता सांगत फिरणाऱ्या मिशनऱ्यांना टवाळीही सहन करावी लागली. हे त्यांचे जीवन एका अतुलनीय धर्मनिष्ठेचे आणि त्यागाचे द्योतक मानले पाहिजे . ‘’
याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुधीर रसाळ यांनी मिशनरींच्या सेवाभावी कामांमुळे आणि त्यांनी हिंदू धर्मावर केलेल्या टीकेमुळे भारतीय समाजजीवनावर झालेल्या अनेक भल्याबुऱ्या परिणामांबद्दल पुढील शब्दांत वर्णन केले आहे.
''मिशनऱ्यांच्या या धर्मप्रसाराचा मुख्य फायदा असा झाला की महाराष्ट्रातले समाजजीवन त्यामुळे ढवळून निघाले. आपल्या धर्माची कठोर चिकित्सा करायला महाराष्ट्रातील सुशिक्षितांनीं त्यामुळे प्रारंभ केला. ज्या प्रकारची धर्मचिकित्सा आणि समाजचिकित्सा या काळात झाली तशी ती गतेतिहासात कधीही झाली नव्हती. इस्लामच्या धार्मिक आक्रमणाच्या काळात अशी चिकित्सा करण्याचे टाळून हिंदू समाजाने आपल्या भोवती एक सरंक्षक तट उभा केला. आपल्या धर्मातील जे काही बरेवाईट आहे ते सर्वच टिकवून कसे ठेवता येईल, याचीच काळजी वाहिली गेली. मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर जे वैचारिक आक्रमण केले त्याचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना अपरिहार्यपणे आपल्या धर्मातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा शोध घेऊन त्यांची चिकित्सा करावी लागली. या काळात प्रार्थनासमाजासारखे जे नवे धर्मपंथ स्थापन केले गेले त्यावर ख्रिस्ती विचारांचा प्रभाव असल्याचेच दिसून येते. मिशनऱ्यांच्या टीकेमुळे अस्पृश्यतेच्या भीषण स्वरूपाची आम्हाला प्रथमच जाणीव झाली. आम्हाला जातिभेदातित समाज घडवण्याची गरज वाटू लागली. मुख्य म्हणजे पारलौकिकाकडे अतिरिक्तपणे झुकलेल्या समाजाला लौकिकाकडे आणले पाहिजे आणि त्यासाठी समाजाचे ज्यातून कल्याण होईल अशा संस्था उभ्या करुन त्या निरलसपणे चालवल्या पाहिजे असे आम्हाला वाटू लागले. सामान्य माणसाच्या लौकिक जीवनात सुख निर्माण होईल अशा सामाजिक मूल्यांचा स्वीकार करायला आपण केवळ ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे आणि मिशनऱ्यांनीं येथे धर्मातराच्या चालवलेल्या चळवळीमुळे आपण खूप काही मिळवले आणि आपण बऱ्याच प्रमाणात बदललो. ‘’
मिशनरींच्या सेवेबाबत आणि योगदानाबाबत वरील प्रतिपादन प्रातिनिधिक स्वरूपाचेच आहे.

Tuesday, June 21, 2022

 Manjula Chellur sworn-in as the Chief Justice of Bombay High Court-Politics  News , Firstpost 

 

न्यायमूर्ती सुजाता मनोहर

 

खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. गोव्यातून  The  Navhind Times हे इंग्रजी दैनिक सोडून आणि गोवा सोडून मी महाराष्ट्रात आलो होतो. काही महिन्यांनी औरंगाबादला लोकमत टाइम्स या दर्डा उद्योग समूहाच्या इंग्रजी दैनिकात बातमीदार म्हणून रुजू झालो. पणजीला मी मुंबई हाय कोर्टाचे खंडपीठ कव्हर करत होतो. साहजिकच मग मला औरंगाबाद येथे असलेल्या उच्च न्यायालयाचे खंडपीठाचे बिट देण्यात आले. झाले, माझे रुटीन सुरु झाले. 
 
सकाळी एकदोन ठिकाणी बातम्या गोळा करुन झाल्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास क्रांती चौक ओलांडून मी उच्च न्यायालयाकडे यायचो, तेथे ज्येष्ठ वकील नरेंद्र चपळगावकर वगैरेंना भेटून मग मी तडक खंडपीठाच्या रजिस्ट्रारकडे यायचो. गोव्यातही माझा असाच नित्यक्रम असायचा. रजिस्ट्रारकडे अधिकृत बातमी मिळायची आणि ती गोळा केल्यावर मी निघायचो. 
 
तर त्या दिवशी माझ्याकडे उच्च न्यायालयातली कुठलीही हार्ड बातमी नव्हती. त्याऐवजी एक मोठी पण आम्हा पत्रकारांच्या भाषेत सॉफ्ट बातमी मला मिळाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती आणि या पहिल्या महिला न्यायाधीश नुकत्याच औरंगाबाद खंडपीठात व्हिझिटिंग जज्ज म्हणून आल्या होत्या. त्यांची मला लोकमत टाइम्ससाठी मुलाखत घ्यायची होती. 
 
ही घटना आहे १९८८ ची. त्याआधी ऐंशीच्या दशकात गोव्यात जवळजवळ सातआठ वर्षे मी उच्च न्यायालयाची जबाबदारी सांभाळली होती. त्याकाळात पणजीला मिरामार येथे नुकतेच व्ही एम साळगावकर लॉ कॉलेज सुरु झाले होते. गोव्यातले हे बहुधा पहिलेच लॉ कॉलेज. मात्र कायद्याचा पदवीधर नसतानाही मी हाय कोर्टाच्या बातम्या व्यवस्थित दिल्या होत्या. फिलिप कुटो या नावाचे ज्येष्ठ न्यायाधीश त्यावेळी पणजी इथल्या खंडपीठात होते, बाकीचे एकदोन न्यायाधीश मुंबई किंवा इतर खंडपीठांतून व्हिजिटिंग जज्ज म्हणून काही महिन्यांसाठी येत असत. 
 
एक मात्र खरे कि हाय कोर्टाच्या बातम्या देणे हे अत्यंत जबाबदारीचे आणि जोखमीचे काम होते. यात चुकीला क्षमा नसायची. दुसरे म्हणजे हाय कोर्टाच्या बिट्सचा इतका अनुभव गाठीला असताना एकदाही कुणाही न्यायाधिशाच्या चेंबरमध्ये जाण्याचा, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा कधी प्रसंग आला नव्हता. 
 
रजिस्ट्रार ओळखीचे होतेच, त्यांनी लगेच नव्या न्यायाधीश मॅडमची मला भेटण्यासाठी परवानगी मागितली आणि मी त्या चेंबरकडे वळालो. 
 
सुजाता मनोहर हे त्या मुंबई हाय कोर्टाच्या पहिल्यावहिल्या महिला न्यायाधिशांचे नाव होते. मुंबई हाय कोर्ट हे भारतातील एक सर्वात जुने उच्च न्यायालय, या न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हती. मूळच्या नागपूरच्या असलेल्या सुजाता मनोहर यांच्याकडे उच्च न्यायालयातील वकिलीचा अनुभव होता. 
 
हातात बातमीदाराचे नोटपॅड आणि दुसऱ्या हातात पेन घेऊन त्या मोठ्या दालनात मी त्या न्यायाधिशांसमोर आलो. न्यायमूर्तींना युवर लॉर्डशिप म्हणायचे असते. या पहिल्या युवर लेडीशिप बनल्या. न्यायाधीश मॅडम टेबलावरच्या फिती बांधलेल्या फाईल्स पाहत होत्या. आपले काम चालू ठेवत त्यांनी माझ्याकडे पाहिले, मला खुर्चीवर बसण्यास हातानेच सुचना केली. 
 
खुर्चीवर 'बसा' म्हणून स्पष्ट सूचना झाल्याशिवाय कुठल्याही कार्यालयात स्थानापन्न व्हायचे नाही हा नियम मी नेहेमीच पाळत आलो आहे, शिष्टाचाराचे नियम यजमानाने आणि पाहुण्याने दोघांनीही पाळायचे असतात. 
 
न्यायाधीश सुजाता मनोहर यांनी फाईलींमधून डोके वर काढून माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि आता संभाषण सुरु करणे मला भाग होते. `लोकमत टाइम्स'चे माझे व्हिझिटिंग कार्ड रजिस्टारमार्फत त्यांच्याकडे त्याआधीच पोहोचले होते. 
 
मुंबई हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधिश म्हणून त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी आलो आहे असे मी त्यांना सांगितले. सुजाता मनोहर या औरंगाबाद खंडपीठात यावेळी पहिल्यादांच आल्या होत्या तरी मुंबई न्यायालयात त्यांनी बरेच दिवस काम होते, अनेक पत्रकारांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या असणार. पहिल्या महिला न्यायाधीश असण्याची नवलाई त्यांना आता वाटतही नसणार किंवा त्याबाबतचे नाविन्य मिरवायची गरज त्यांना वाटत नसावी हे त्यांच्या चेहेऱ्याकडे पाहताच मला जाणवले. 
 
झाले, माझ्या मुलाखतीची हवा मुलाखत सुरु होण्याआधीच निघून गेली होती. 
 
त्यावेळी पत्रकारितेत येऊन मला सात-आठ वर्षे झाली होती तरी तिशीच्या आत असलेला मी अनुभवाने आणि वयाने तसा कोवळाच होतो. आता कसे तरी वेळ मारुन जाणे भाग होते. 
 
पत्रकारितेतील माझ्या दीर्घ कारकिर्दीतील ही एक फसलेली मुलाखत. कारण मुंबई हाय कोर्टाच्या आपण पहिल्या महिला न्यायाधीश असलो तरी त्यामुळे आपण काही फार मोठी मर्दुमकी गाजवली आहे अशी जस्टिस सुजाता मनोहर यांची भावना नव्हती. `SO What..? '' this was her attitude, I realised it. 
 
त्यामुळे एक महिला न्यायाधीश म्हणून त्यांची मुलाखत घेण्यात काहीच अर्थ नाही हे माझ्या वेळीच लक्षात आले. 
 
''This is just a courtesy call. Thanks for permitting this visit'' असे बोलून मी ही मुलाखत आणि भेट आवरती घेतली. 
 
सुजाता मनोहर नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आणि फातिमा बी यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश बनल्या. 
 
या घटनेनंतर गेल्या तीस वर्षांत बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत, या काळात अनेक महिला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदांवर अजूनही महिलांची ने
 
महिलांच्या कर्तबगारीचा आणि कर्तृत्वाचा विषय निघाला कि मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश सुजाता मनोहर यांच्याशी झालेल्या या अल्पकालीन मुलाखतीची मला हमखास आठवण येते. 
 
परवा भाजपचे महाराष्ट्र्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना 'राजकारण सोडून स्वयंपाकघरात किंवा मसणात जा' असा सल्ला दिला तेव्हाही हा खूप जुना प्रसंग माझ्या नजरेसमोर तरळला.  
 

Thursday, April 8, 2021

काही घटना कायम आठवणीत राहतात. त्याचे कारण त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती

 काही घटना अगदी काही क्षणांच्या, किंवा एक-दोन तासांच्या असतात, पण कायम आठवणीत राहतात. त्याचे कारण त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती

पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे

नारायण सुर्वे, एन.डी. पाटील, जयंत नारळीकर, अण्णा हजारे, बा. भ. बोरकर, सय्यदभाई, मोहन धारिया आणि किरण बेदी
  • Tue , 06 April 2021

“नारायण सुर्वे सपत्नीक पणजीला आले आहेत, अल्तिनोला गेस्ट हाऊसवर उतरले आहेत. त्यांना ‘गोवादर्शन’ घडवून आणशील का?”

एक दिवस गोव्यातल्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी अनुराधा आठवले यांचा निरोप आला. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीची ही घटना असावी. लँडलाईन फोन दुर्मीळ आणि मोबाईलची संकल्पनाही अस्तित्वात नसलेल्या त्या काळात हा निरोप माझ्यापर्यंत कसा आला आता आठवत नाही. त्या वेळी मी पणजीतल्या ‘नवहिंद टाइम्स’ या दैनिकात नवशिखा बातमीदार होतो. गंमतीची बाब म्हणजे अनुराधा आठवले या पणजीतल्याच ‘गोमंतक’ या मराठी दैनिकाचे संपादक असलेल्या नारायण आठवले यांच्या पत्नी. त्यामुळे इंग्रजी दैनिकात काम करणाऱ्या माझ्यासारख्या नवख्या बातमीदाराकडे या कामगिरीसाठी अनुराधाबाईंनी विचारणा करावी, याचे आश्चर्य वाटले. आमचे वृत्तसंपादक एम. एम. मुदलीयार या कामगिरीसाठी परवानगी देतील, याची खात्री असल्याने मीही लगेच होकार कळवला.

महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्राबाहेर ‘महाराष्ट्र परिचय केंद्रे’ चालवली जातात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा इतर राज्यांतील लोकांना परिचय व्हावा, या हेतूने या केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात. महाराष्ट्रातील साहित्यिकांची व्याख्याने आयोजित करणे हा त्यापैकीच एक. त्याआधी महाराष्ट्र परिचय केंद्राने पु.ल. देशपांडे यांची तीन व्याख्याने आयोजित केली होती. साहित्यरसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी माझी अनुराधा आठवले यांच्याशी पहिल्यांदा गाठभेट झाली होती.

ठरल्याप्रमाणे सकाळीच मी अल्तिनोवर गेस्ट हाऊसवर गेलो, तेव्हा कवीमहाशय आणि त्यांच्या पत्नी कृष्णाबाई तयारच होत्या. सुर्वे यांचे ‘माझे विद्यापीठ’ आणि ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हे दोन्ही काव्यसंग्रह माझ्याकडे होते.  त्या दोन दिवसांत मी सुर्वे दाम्पत्याला गोव्याच्या काही प्रसिद्ध ठिकाणी घेऊन गेलो.  

आठवले यांच्यामुळेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन. डी. पाटील आणि त्यांच्या पत्नी यांना कारमधून गोव्यात फिरवून आणण्याची अशीच एक संधी मिळाली. आता नारायण सुर्वे किंवा एन. डी. पाटील यांच्याशी काय गप्पा झाल्या, ते काही आठवत नाही, पण त्या भेटींची स्मरणचित्रे अजूनही ताजी आहेत. 

असेच एकदा कुठल्याशा एका साहित्य संमेलनासाठी पणजीहून आम्ही काही बातमीदार कारने निघालो होतो. बहुधा रणजित देसाई उद्घाटक असलेले म्हापसा येथील ते कोकणी साहित्य संमेलन असावे. संमेलनासाठी पत्रकारांना घेऊन जाणाऱ्या आयोजकांनी आमच्या गाडीत एका महनीय पाहुण्यालाही घेतले होते. ही व्यक्ती होती मानेपर्यंत रुळणारे केस असणारे आणि खांद्यावर घडी केलेली शाल टाकलेले ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर!

‘बाकीबाब बोरकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या कवीच्या कविता आपण शाळेत शिकलो, तो कवी आज आपल्यासोबत बसून गप्पा मारतो आहे, हे माझ्यासारख्या तरुण बातमीदारासाठी अविश्वसनीय होते. त्याआधी काही काळ बाकीबाब बातम्यांच्या केंद्रस्थानी आले होते, ते दुसऱ्या एका कारणाने. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची त्यांनी लढवलेली निवडणूक अटीतटीची आणि व्यक्तीगत आणि प्रादेशिक पातळीवर तेढ आणि कटुता निर्माण करणारी झाली होती. त्या निवडणुकीत बोरकरांचा पराभव करून गजमल माळी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष झाले होते. बाकीबाब यांना आणि अनेकांना हा पराभव जिव्हारी लागला होता. त्यानंतर बाकिबाब ‘कोकणीवादी’ बनले असे म्हटले गेले. त्या कारच्या अर्ध्या तासांच्या प्रवासात मी बाकीबाब यांच्याशी एक शब्दही बोललो नव्हतो. माझ्याकडे त्यांच्याशी बोलण्यासारखे काही नव्हतेच. या ज्येष्ठ कविवर्यांचा आपल्याला काही क्षणांचा सहवास लाभला, हे मात्र आजही मी विसरलेलो नाही.

पणजीला कंपाल येथे कला अकादमीचे भव्य, देखणे संकुल उभारले, त्यानंतर लवकरच तेथे गोवा, दमण आणि दीव सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे एक नाट्यक्षेत्रातील लोकांसाठी चार दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बाकीचे बातमीदार उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर राहून नंतर आपल्या नेहमीच्या कामाला लागले होते. बातमीदार म्हणून मला मात्र त्या चारही दिवसांच्या कार्यशाळेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. रंगभूमीविषयी मला आताही फारसे काही माहीत नाही, तेव्हा तर काही माहिती असणे शक्यच नव्हते. पण तरीही आपण रंगभूमीवरील काही मोठ्या व्यक्तींबरोबर वावरत आहोत, याची मला लगेचच जाणीव झाली होती.  

रंगभूमीवर मोठे योगदान आणि वावर असलेल्या त्या व्यक्तींपैकी केवळ एकच नाव मला तेव्हा परिचित होते. ते म्हणजे रोहिणी हट्टंगडी. सर रिचर्ड अटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट त्या वेळी नुकताच प्रदर्शित झाला होता. गोव्यात तोपर्यंत टेलिव्हिजनचा जमाना सुरू झालेला नव्हता. ‘नवहिंद टाइम्स’चे संपादक बिक्रम व्होरा यांनी आमच्या दैनिकाच्या ऑफिसात एका चौकोनी बॉक्सवर तो कृष्णधवल चित्रपट सर्वांना दाखवला होता. धावती चित्रे दाखवणारा आणि आवाज असणारा चौकोनी बॉक्स असलेला व्हिडिओ सेट पाहण्याची आम्हा अनेकांची ती पहिलीच वेळ. या ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबा गांधी यांची भूमिका केल्याने रोहिणी हट्टंगडी या एकदम प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांचे पती जयदेव हट्टंगडीसुद्धा या कार्यशाळेला उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी इथे मराठी रंगभूमीवरील दादा मंडळी आहेत, हे लक्षात आले होते. त्यापैकी एक होत्या विजया मेहता, दुसरे होते महेश एलकुंचवार. महाराष्ट्रातील विविध शहरांतील ज्येष्ठ रंगकर्मीही होते, पण इतरांची नावे मला आज आठवत नाहीत.

कार्यशाळेत चर्चा होत असताना अधूनमधून एक ज्येष्ठ व्यक्ती बोलायला उभी राहायची, तेव्हा इतर सर्व मंडळी त्यांना अदबीने ऐकून घेत असत. नंतर समजले की, ते मराठी रंगभूमीवरील खूप ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहे, त्यांचे नाव दामू केंकरे. मूळ गोव्याचे असलेल्या केंकरे यांनीच या कार्यशाळेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती, असे नंतर समजले. 

त्या चार दिवसांच्या कार्यशाळेवर नंतर मी काय बातमी वा वार्तापत्र लिहिले ते आता आठवत नाही. मी स्वतः त्या वेळी नुकतीच विशी ओलांडली होती आणि रोहिणी आणि जयदेव हट्टंगडी, निळ्या जिन्सवर इन-शर्ट असणारे महेश एलकुंचवार हे लोकसुद्धा त्या वेळी ऐन तरुणाईतच होते. मात्र वास्तुशिल्पकार चार्ल्स कोरिया अफ़ॉन्सो यांनी डिझाईन केलेल्या कला अकादमीच्या त्या नव्या संकुलातील अम्फी थिएटरमध्ये, खुल्या जागेत, हिरवळीवर झालेल्या त्या चर्चांची चित्रे आजही माझ्या नजरेसमोर आहेत. त्यानंतर एलकुंचवार यांची ‘गार्बो’ आणि इतर काही नाटकांची पुस्तके मी आवर्जून विकत घेऊन संग्रही ठेवली होती.    

गोव्यात १९८३ साली राष्ट्रकुलातील ३९ देशांतील प्रमुखांची - राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान- यांची अनौपचारिक बैठक (कॉमनवेल्थ हेडस ऑफ गव्हर्नमेंट मिटिंग - चोगम रिट्रीट) पार पाडली, तेव्हा गोव्यातील वाहतूक नियोजनाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक (वाहतूक) किरण बेदी यांच्याकडे होती. बेदी या भारतीय पोलीस दलातील (आयपीएस) पहिल्या महिला अधिकारी. ‘नवहिंद टाइम्स’चा क्राईम रिपोर्टर म्हणून बेदी यांच्याशी त्या काळात जवळपास रोजच संबंध आला. या काळात वॉकी-टॉकीचा अवजड बॉक्स असलेल्या जिप्सी जीपमधून त्यांच्यासह मी दाबोळी विमानतळ ते आग्वाद ताज व्हिलेजपर्यंत रंगीत तालमीसाठी फिरायचो. एक बातमी देण्यावरून आमच्यात एकदा खडाजंगीही झाली होती. मात्र पुढे देशभर नाव कमावलेल्या या पोलीस अधिकाऱ्याशी बातमीदार म्हणून एकेकाळी अगदी वैयक्तिक  संबंध होते, याचा आज मागे वळून पाहताना आनंद वाटतो.

आपल्या ‘भारत जोडो’ या अभियानाच्या निमित्ताने गोव्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या दौऱ्याचे वार्तांकन केले, नोबेल पारितोषक विजेत्या आणि भारतरत्न किताबाच्या मानकरी मदर तेरेसा यांच्या गोवा दौऱ्यात त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. भारताच्या दहा दिवसांच्या पाळकीय दौऱ्यावर असताना पोप जॉन पॉल दुसरे १९८६मध्ये पणजीला आले होते. तेव्हा बुलेटप्रूफ पोपमोबाईलमधून गर्दीतून हिंडत, उजवा हात उंचावून क्रुसाची खूण करून भाविकांना आशीर्वाद देताना त्यांना मी अगदी जवळून पाहिले. 

अशीच गोष्ट सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याबाबाबत. गोवा सोडून पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’ला रुजू झाल्यानंतर हजारे यांच्या राळेगण सिद्धीला अनेकदा गेलो, तेथे काही दिवस मुक्कामही केला. अण्णा पुण्यात शनिवार पेठेतल्या राष्ट्रभाषा भवनात राहायला आल्यावर हमखास आमच्या भेटी व्हायच्या, पत्रव्यवहारही असायचा. नंतर या भेटी विरळ होत गेल्या, गेली कित्येक वर्षे तर प्रत्यक्ष भेट किंवा फोनवरही संभाषण नाही. मात्र राळेगण आणि हजारे यांच्याशी असलेले जुने संबंध आजही विसरलेलो नाही. आम्हां दोघांचे कृष्णधवल, काही रंगीत फोटो आणि काही पत्रव्यवहार आजही मी जपून ठेवले आहेत.  

औरंगाबादला ‘लोकमत टाइम्स’ला असताना तेथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे बिट माझ्याकडे होते. या खंडपीठातील ज्येष्ठ वकील नरेंद्र चपळगावकर माझे सर्वांत महत्त्वाचे सोर्स. त्यांनी इंग्रजीत डिक्टेट केलेली खटल्याची ब्रिफिंग मी अगदी जशीच्या बातमीत वापरायचो, इतकी त्यांची वैचारिक स्पष्टता आणि अचूकता असायची. हे चपळगावकर नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले, त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. माझ्या बातमीदारीतील कारकिर्दीतील न्यायमूर्ती चपळगावकर हे एक अत्यंत आदरणीय सोर्स आणि व्यक्ती आहेत.

पुण्यात बातमीदारी करताना कुटुंबनियोजनाच्या चळवळीत रघुनाथ धोंडो कर्वे यांना मदतीचा हात देणाऱ्या रँग्लर परांजपे यांच्या कन्या शकुंतला परांजपे यांच्याशी त्यांच्या अखेरच्या काळात म्हणजे १९९०च्या सुरुवातीला माझे जवळकीचे संबंध निर्माण झाले. मिठाईचा डबा हातात घेऊन मांजरांना खेळवत, पनामा सिगारेट पित, निरागस हसत माझ्याशी गप्पा मारणाऱ्या लेखिका, माजी राज्यसभा सभासद, पद्मविभूषण सन्मानित शकुंतलाबाई आजही माझ्या नजरेसमोर आहेत. 

काही घटना अगदी काही क्षणांच्या, मिनिटांच्या किंवा एक-दोन तासांच्याच असतात, पण कायम आठवणीत राहतात. त्याचे कारण म्हणजे त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी शिथिल करून निवडणुका जाहीर केल्या तेव्हाची ही घटना. तुरुंगातून राजकीय नेत्यांच्या सुटका झाल्यावर निवडणूक प्रचारावर येणाऱ्या नेत्यांचे देशभर उत्साहाने स्वागत केले जात होते. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असूनही आणीबाणीला विरोध करून तुरुंगात जाणारे, तरुण तुर्कांपैकी एक असणारे मोहन धारिया श्रीरामपूरला आले, तेव्हा झालेल्या त्यांच्या जंगी स्वागताला आणि नंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेला मी हजर होतो. त्या वेळी मी नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर १२ वर्षांनी ‘इंडियन एक्सप्रेस’चा पुण्यातील बातमीदार म्हणून मी मोहन धारिया यांना भेटलो, तेव्हा पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कुठल्याशा निर्णयाला विरोध करण्यासाठी गोळीबार मैदानापाशी अण्णा बेमुदत उपोषणाला बसलेले होते.

पुण्यातील ‘आयुका’चे संचालक असलेले डॉ. जयंत नारळीकरांची खूप वर्षांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’च्या संगीता जैन-जहागिरदार आणि मी मुलाखत घेतली. त्या वेळी मुलाखतीस वेळेवर यावे, नारळीकर वक्तशीरपणाबाबत किती जागरूक याविषयी त्यांच्या सचिव महिलेने वारंवार बजावले होते, ते आजही आठवते. एक तास चाललेल्या या मुलाखतीत नारळीकर यांनी विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज त्यांना जगातील कुठल्याही व्यक्तीचा शोधनिबंध ‘इलेक्ट्रॉनिक मेल’मुळे काही क्षणात उपलब्ध होतो, असे म्हटले तेव्हा मला काहीच अर्थबोध झाला नव्हता. ते साल होते १९९१ आणि सर्व क्षेत्रांत इंटरनेटचा वापर होण्यासाठी आणखी काही वर्षे जाणार होते. त्या वेळी माझ्या अगदी डोक्यावरून गेलेल्या ‘ई-मेल’शिवाय आज कुणाचे चालू शकणार आहे का? छापलेल्या मुलाखतीची वृत्तपत्रांतील कात्रणे मी डॉ. नारळीकरांना एक छोटेशा पत्रासह पोस्टाने पाठवली, तेव्हा उलटटपाली मला पाठवलेल्या माझ्या त्याच टाईप केलेल्या पत्रावर नारळीकरांनी दोन ओळींत धन्यवाद दिले होते. नारळीकरांच्या स्वाक्षरीचा तो ३० वर्षांपूर्वीचा तो कागद आजही माझ्या संग्रही आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. नारळीकरांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याची बातमी ऐकली, तेव्हा त्या भेटीची चित्रफित नजरेसमोर  झळकली.

पुणे जिल्ह्यातल्या आंबेठाण गावातून शेतकरी संघटनेच्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या शरद जोशींना भेटण्यासाठी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अभय वैद्यसह मी १९९१ साली गेलो होतो, ती भेट विसरणे तर अशक्य. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या नावावर निवडणूक प्रचार करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांविरुद्ध शरद जोशी यांनी त्या खेड्यात राहून जोरदार मोहीम राबवली होती. काही काळानंतर धर्माच्या नावाने निवडणुकीत मते मागितल्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे माजी महापौर आमदार रमेश प्रभू यांच्यांवर निवडणूक आयोगाने सहा वर्षांसाठी मतदान करण्यावर आणि निवडणुकीत भाग घेण्यावर बंदी आणली होती. स्वतः शरद जोशीच नंतर भाजपचे खासदार बनले, पण तो वेगळा विषय आहे.   

मुस्लीम समाजात सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी पुण्यातील सय्यदभाई यांनी केलेल्या कामाबाबत दोन-तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारने त्यांना पद्मश्री प्रदान केली. त्या वेळी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात प्रसिद्ध शाह बानो प्रकरणात सय्यदभाईंनी केलेल्या चळवळीचा बहुतेकांना माहितीही नव्हती. त्या काळात म्हणजे १९९०ला ‘इंडियन एक्सप्रेस’साठी मी त्यांची मुलाखत घेतली होती, हे या पदमश्री पुरस्काराच्या निमित्ताने आठवले. याच दरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, बोहरी समाजातील कार्यकर्ते ताहेर पूनावाला यांच्याही मुलाखती ‘इंडियन एक्सप्रेस’साठी घेतल्या होत्या.

सत्ताधारी आणि इतर राजकिय नेत्यांशी आम्हा पत्रकारांचा नेहमीच संबंध येतो. मात्र समाजमनावर राज्य करणाऱ्यांमध्ये, समाजाला प्रेरित करणारी सामान्यांमधील असामान्यजनही असतात. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी मृतदेहाचा तुटवडा पडतो, हे लक्षात आल्यावर आपल्या वृद्धापकाळी देहदानाची चळवळ राबवणारे पुण्यातील ग. म. सोहोनी अशांपैकी एक. त्यांच्यावरही मी अनेक बातम्या केल्या. समाजवादी नेते नानासाहेब गोरे आणि उद्योगपती शंतनुराव किर्लोस्करांनी स्वतः देहदानाच्या अर्जावर सह्या करून या सोहोनींना नैतिक पाठबळ दिले. नानासाहेबांची देहदानाची इच्छा त्यांच्या अमेरिकास्थित मुलीच्या प्रखर विरोधामुळे साकार होऊ शकली नाही, हा भाग वेगळा.  

गोवा आणि महाराष्ट्रातील माझ्या पत्रकारितेच्या व्यवसायातील या काही आठवणी. ३०-४० वर्षांच्या कालखंडातील घटना आणि व्यक्तींबद्दलच्या या आठवणी काही नव्या, ताज्या घडामोडींमुळे परत ताज्यातवान्या होतात. काळाचा महिमा असा की, त्याबद्दल आता खेद किंवा खंत नसते, क्वचित त्या घटनेवरून स्वतःशीच हसणे होते. एकतर त्या घटनेत आपल्यासह सहभागी असणारे आता आपल्याशी संपर्कात नसतात किंवा काळाच्या पडद्याआड गेलेले असतात. भूतकाळातल्या या आठवणींना ऐतिहासिक मूल्यही असू शकेल, असे म्हणणे आत्मप्रौढीचे ठरू शकते. या घटनांना आणि व्यक्तींना अशा प्रकारे उजळणी देताना त्या काळात पुन्हा वावरल्याची आणि त्या व्यक्तींना पुन्हा एकदा भेटल्याची अनुभूती येते, हे मात्र खरे!