Did you like the article?

Showing posts with label East India Company. Show all posts
Showing posts with label East India Company. Show all posts

Sunday, March 29, 2026

भारतातील आधुनिक शिक्षणपद्धतीचा एक जनक गॉर्डन हॉल

द्विशताब्दी स्मृतीवर्ष २० मार्च २०२६ पासून

दोनशे वर्षांपूर्वी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या कामगिरीवर निघालेल्या तीन व्यक्तींनी १२ फेब्रुवारी १८१३ रोजी मुंबई बंदरात पाय ठेवला. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट  या त्या तीन व्यक्ती होत्या.  त्यांच्या आगमनाने या देशात सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारीक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. ख्रिस्ती धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट्य होते.  

ईस्ट इंडिया कंपनीचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार चालत होता आणि प्रचलीत ब्रिटिश कायद्यानुसार भारतात मिशनरींना येण्यास बंदी होती. त्यामुळेच विल्यम कॅरी यांना डॅनिश वसाहत असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्यांना मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती. ब्रिटिश संसदेने १८१३च्या जुलैत ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण केले आणि त्यानुसार या मिशनरींना भारतात काम करण्याची मुभा देण्यात आली.

गॉर्डन हॉल आणि त्यांच्या सहकारी मिशनरींनी मुंबईत आणि इतरत्र मुलांमुलींसाठी आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडून एक सामाजिक क्रांती घडवली. कॉलऱ्याच्या साथीत रूग्णांना औषधोपचार देताना गॉर्डन हॉल यांचे नाशिकजवळ दोडी दापूर येथे २० मार्च १८२६ रोजी मृत्युमुखी पडले. दिनांक २० मार्च २०२६ पासून त्यांचे द्विशतकी स्मृतीवर्ष सुरु होत आहे.  

श्री. म. पिंगे यांनी `युरोपिअनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' या आपल्या ग्रंथात म्हटले आहे: ``हॉल व नॉट हे मुंबईत राहिल्यानंतर व मराठी शिकल्यानंतर सन १८१५ मध्ये त्यांनी इंग्रजी शाळा काढली. त्यात प्रथम २५ मुले होती. याशिवाय दोन व्हर्नाक्युलर शाळांत ४० मुले होती. पुढील वर्षी शाळांची संख्या वाढली व एकंदर ३०० विद्यार्थी झाले. इ. स. १८१८ मध्ये ११ शाळा व ६०० विद्यार्थी होते. ’’   रेव्हरँड इमॅन्युएल बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या लिहिलेल्या अहवालानुसार १८१५ च्या मे महिन्यात मध्य भारतातील हिंदू मुलांच्या पहिल्याच आणि एकमेव शाळेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या नोंदीनुसार या मिशनरींच्या शाळेत अंदाजे २५ विद्यार्थी होते.  अमेरीकन मिशनच्या शाळांची संख्या १८१८पर्यंत अकरा झाली आणि या शाळांत ६०० विद्यार्थी शिकत होते.

गॉर्डन हॉल यांनी मराठी शिकून नंतर या भाषेत लिहिलेल्या पुस्तकांची विस्तृत माहितीसुद्धा पिंगे यांनी आपल्या ग्रंथात दिली आहे.  ``सामान्य माणसाला लिहितावाचता आले तरच तो बायबल वाचू शकणार होता. त्यासाठी मिशनरी लोकांनी मुद्रणयंत्र आणले, बायबलची छपाई सुरु केली, शाळा सुरु केल्या. अमेरिकन मराठी मिशनच्या या मिशनरींनी आपलया आगमनानंतर केवळ चार वर्षांच्या कालावधीत २५ शाळा सुरु केल्या, त्यात बाराशे मुले होती,’’ असे `अमेरीकन मराठी मिशनची दीडशे वर्षे' या ग्रंथात नमूद केले आहे. 

स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे अशाप्रकारे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती आणि आधुनिक सार्वत्रिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला.

अमेरिकन मिशनने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडली. गंगाबाई या नावाची एक स्थानिक तरुणी या शाळेत शिकवत असे. दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली. या रोगाच्या साथीने मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने मुलींची ही शाळा बंद करावी लागली``या पहिल्या मुलींच्या शाळेतल्या पहिल्या एतद्देशीय महिला शिक्षिका असलेल्या या गंगाबाईंबद्दल इतर काहीच माहिती उपलब्ध नाही हे सांगायला आम्हाला खूप खेद होतो,’’ असे रेव्हरंड बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईत १८८१ साली साजरा झालेल्या अर्धशतकी वर्धापनावेळी सांगितले गेले.

सरोजिनी बाबर यांनी 'स्त्रीशिक्षणाची वाटचाल' या पुस्तकात लिहिले आहे.  इ स १८२४ मध्ये अमेरिकन मिशनरींनी मुंबईस एतद्देशीय मुलींच्याकरिता म्हणून एक खास अशी स्वतंत्र शाळा स्थापन केली होती. मुंबई इलाख्यातील ही मुलींची पहिलीच शाळा होय.’’

गॉर्डन हॉल यांचा विवाह मुंबईतच १९ डिसेंबर १८१६ रोजी मार्गारेट लुईस यांच्याशी झाला.  परदेशी मिशनरी कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या मृत्यूंचे दुःख सहन करावे लागत असेप्रत्येक घरात एकतरी अपत्याचे निधन झाले होते. १८३२ पर्यंत जन्मलेल्या ३० अपत्यांपैकी १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. इथल्या आरोग्याच्या समस्येमुळे गॉर्डन हॉल यांच्या पत्नीने आपल्या मुलांसह अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या पतीलासुद्धा त्यांनी तसा आग्रह केला, मात्र मायदेशी जाण्यास हॉल यांनी नकार दिला. गॉर्डन हॉल यांचे एक नातू रेव्हरंड जॉर्ज . हॉल हे अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त १९१३ साली मुंबईत मिशनरी म्हणून आले तेव्हा त्यांनी आपली आजी आणि आजोबा यांच्या शेवटचा निरोप घेतेवेळी झालेल्या हृदयद्रावक संभाषणाचे वर्णन केले आहे.

गॉर्डन हॉल हे नियमितपणे रोजनिशी लिहीत असत. हॉल यांनी आपल्या या रोजनिशीत महाबळेश्वर येथील मंदिरे आणि पाच नद्यांचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या झऱ्याविषयी नोंदी केल्या आहेत. तेथील हवामान उत्कृष्ट असल्याचे त्यांना आढळले; मात्र अन्नसामग्री इमारती महाग होत्या, तसेच तेथे पोहोचण्याचे अंतर अडचणी पाहता, एखाद्या मिशनरी कुटुंबाचे तेथे स्थलांतर करणे खर्चिक ठरेल, असे त्यांना वाटले.

मार्च १८२६ मध्ये हॉल आपल्या दोन तरुण सहकाऱ्यांसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे जाण्यास निघाले. तेथे कॉलऱ्याची तीव्र साथ असल्याने ते काही दिवस तेथेच लोकांची सुश्रुषा करण्यासाठी थांबले. त्यांनी आजारी लोकांना औषधे दिली, पुस्तके वाटली आणि उपदेशसुद्धा केला. मुंबईच्या परतीच्या प्रवासात दोडी दापूर या गावात त्यांनाही कॉलऱ्याची लागण झाली आणि २० मार्च १८२६ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या मिशनकार्याचा काळ केवळ १२ वर्षांचा होता.   




सावलीचा शोध' या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नरेंद्र चपळगावकर लिहितात: ``भारतात ज्या परिस्थितीत मिशनरींना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत. प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनरींना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठी भाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली. स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. ’’ 

``तो आवडता शिष्य, उत्कृष्ट मिशनरी आणि एक आद्य कार्यकर्ता होता', अशा शब्दांत अमेरिकन मराठी मिशनने गॉर्डन हॉल यांचे वर्णन केले आले आहे.  दोडी दापूर येथे त्यांचे दफन करण्यात आले, तेथे एक दगडी कबर बांधण्यात आली. मिशनरी ऍलन ग्रेव्ह्ज यांनी या समाधीला भेट दिल्यानंतर तेथे एक स्मृतीफलक उभारण्यात आला. त्यावर पुढील मजकूर कोरलेला होता :  ख्रिस्ताचा सेवक प्रेषित गॉर्डन हॉल येथे पुरला आहे. हा एकट्याच देवाची भक्ती त्याच्या एकल्या अवताराकडून तारण ही सांगायास येथे फिरत होता. या तारणाविषयी तुम्ही शोध करा. तुम्हासही पाहिजे. ''

दोडी दापूर येथील  गॉर्डन हॉल यांची कबर आणि त्यावरील स्मृतीफलक अगदी अलीकडच्या काळापर्यंत अगदी सुस्थितीत होती.  दहाबारा वर्षांपूर्वी तो स्मृतीफलक उखडून टाकला गेला होतानाशिक येथील गिरीश भालतिडक यांनी त्या स्मृतीफलकाचे तीनचार तुकडे मिळवले आणि ते एकत्र जोडून शरणपूर येथील आपल्या घरी ठेवले आहेत.

 Camil Parkhe 

 

 

^^^^^

 

 


Sunday, March 12, 2023

आद्य ख्रिस्ती मिशनरी आणि त्यांचे शिक्षणकार्य

अमेरिकन मराठी मिशनच्या गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या तीन व्यक्ती आधुनिक काळात भारतात मुंबईच्या बंदरावर १२ फेब्रुवारी १८१३ रोजी पाऊल ठेवणारे पहिले तीन मिशनरी होते. अमेरिकन मराठी मिशनने देशात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडण्याचे मोठे योगदान त्यांनी केले. त्यांच्यानंतर काही वर्षांतच स्कॉटिश मिशनरींनीही पश्चिम किनाऱ्यावर, पुण्यात आणि -मुंबईत मुलींच्या शाळा सुरू केल्या.

या शाळा सर्वांना खुल्या होत्या. ख्रिस्ती मिशनरींच्या धोरणांनुसार स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे अशाप्रकारे पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती.
मात्र ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी आलेले मिशनरी आणि त्यांनी मुलांमुलींच्या शाळा सुरु करणे आणि एत्तदेश्शीयांच्या शिक्षणप्रसारात रस घेणे याचा काय संबंध असा प्रश्न उभा राहू शकतो. अमेरिकन मराठी मिशनच्या धर्मप्रसाराच्या कार्याबाबत १८८१च्या मेमोरियल पेपरमध्ये लिहिताना रेव्हरंड एस. बी. फेयरबँक यांनी यासंदर्भांत म्हटले आहे: ``मिशनरी कार्य करताना मिशनरींनीं तीन बाबींवर भर दिला. त्यापैकी पहिले कार्य होते शिक्षण, दुसरे कार्य होते धर्माची शिकवण आणि तिसरे कार्य होते धर्मशास्त्रे आणि ख्रिस्ती साहित्य मराठी भाषेत छापणे. ‘’
श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' या आपल्या ग्रंथात म्हटले आहे : ``हॉल व नॉट हे मुंबईत राहिल्यानंतर व मराठी शिकल्यानंतर सन १८१५ मध्ये त्यांनी इंग्रजी शाळा काढली. त्यात प्रथम २५ मुले होती. याशिवाय दोन व्हर्नाक्युलर शाळांत ४० मुले होती, प्रथम त्यांना शिक्षक मिळण्यात अडचण पडली. पण पुढे दोन ब्राह्मण शिक्षक त्यांना मिळाले व ते व्हर्नाक्युलर शाळांत शिकवू लागले. पुढील वर्षी शाळांची संख्या वाढली व एकंदर ३०० विद्यार्थी झाले. इ. स. १८१८ मध्ये ११ शाळा व ६०० विद्यार्थी होते. ’’ हिंदुस्थानात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व जातीधर्माच्या आणि स्त्री-पुरुषांना साक्षर करणाऱ्या आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला.’’
सरोजिनी बाबर यांनी 'स्त्रीशिक्षणाची वाटचाल' या आपल्या पुस्तकात लिहिले आहे. ``ख्रिश्चन मिशनऱ्यांनीं खाजगी प्रयत्नांचे बळावर बंगाली मुलींना सार्वजनिक शाळा काढून देण्याचा प्रयत्न केला होता (इ. स. १८१९ व १८२४ मध्ये),'' ``इ.स. १८२१ मध्ये स्थापन झालेल्या कलकत्त्यामधील मुलींच्या शाळेत संपूर्ण वेळ शिक्षकाचे काम करण्यासाठी म्हणून कु. मेरीअँन कुक या इंग्लंडहून मुद्दाम आल्या होत्या व याच शाळेतून त्या इ स, १८४५ ला सेवानिवृत्तही झाल्या होत्या.''
सरोजिनी बाबर पुढे लिहितात : इ स १८२४ मध्ये अमेरिकन मिशनऱ्यांनी मुंबईस एतद्देशीय मुलींच्याकरिता म्हणून एक खास अशी स्वतंत्र शाळा स्थापन केली होती. मुंबई इलाख्यातील ही मुलींची पहिलीच शाळा होय. त्यानंतर दोनतीन वर्षांतच मुलींच्या शाळांनीही संख्या नवावर गेली व सुमारे ३०० मुली शिक्षण घेऊ लागल्या. इ स १८२९ मध्ये विद्यार्थिनींची संख्या ४०० वर गेली. त्या वेळच्या एका शाळेस जोडून मुलींचे वसतिगृहदेखील होते हे विशेष होय. ही शाळा मुंबईत भायखळ्यास चालू होती.''
अमेरिकन मराठी मिशनची भायखळ्याची ही शाळा आणि वसतीगृह सिंथिया फरार चालवत होत्या.
``इ स १८३०च्या सुमारास हिंदुस्थानभर खास मुलींच्या अशा तीस एक तरी शाळा स्थापन झाल्या होत्या आणि त्यांमधून ५०० च्या आसपास मुली शिक्षण घेत होत्या ही वस्तुस्थिती आहे. मिस कुक (मिसेस विल्सन ) यांच्या प्रयत्नामुळे इ स १८४० मध्ये बंगाल इलाख्यात ५०० मुली शिक्षण घेत होत्या हेही विशेष होय. त्याच साली प्रसिद्ध झालेल्या शिक्षण खात्याच्या वृत्तांतातील माहितीवरून त्यावेळी पुण्यात मुलींच्या पाच शाळा होत्या असे दिसते,'' असे सरोजिनी बाबर यांनी लिहिले आहे.
नरेंद्र चपळगावकर यांनी `सावलीचा शोध' या पुस्तकात स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन आणि त्याची पत्नी मार्गारेट यांच्या शिक्षणकार्याची माहिती दिली आहे. त्यानुसार ‘’स्कॉटिश मिशनने कोकणात मिशनकार्य सुरु केले होते. डोनाल्ड मिचेल हा मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचला होता, तेथे मराठी शिकून त्याने तेथे लगेच एक मराठी शाळा काढली. जेम्स मिचेल आणि अलेक्झांडर क्रॉफर्ड हे स्कॉटिश मिशनरीहि तेथे त्याच्या कामात सहभागी झाले. बाणकोट आणि हर्णै येथे स्कॉटिश मिशनचे कार्य चालू होते. सन १८२९ च्या दरम्यान या भागातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या. .
विल्सनची पत्नी मार्गारेट हर्णैला असताना स्कॉटिश मिशनने सुरू केलेल्या मुलींच्या शाळांत रस घेऊ लागली. हेच काम मुंबईत सुरु करण्याचे तिने ठरविले. अमेरिकन मराठी मिशनने त्यापूर्वीच मुंबईत मुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या. १८२९च्या सप्टेंबरात विल्सन दाम्पत्य मुंबईत आले आणि अंब्रोळीच्या मिशन हाऊसमध्ये त्यांनी शाळा सुरु केली. मुलींना मार्गारेट शिकवत असे, या शाळेत पहिल्या तीन महिन्यातच ५३ मुली शाळेत दाखल झाल्या होत्या. मार्गारेट विल्सन यांनी आपल्या घरातच मुलींची शाळा चालू केली होते, त्यापैकी काही मुली अपंग तर काही अनाथ होत्या.
मार्गारेटने पुढील सहा महिन्यांत सहा शाळा मुंबईत सुरु केल्या आणि या शाळांत १२५ मुली शिकत होत्या. या शाळांत सर्वाधिक हिंदू मुली होत्या, पारशी आणि मुस्लिम मुस्लीम मुलीही होत्या. प्रामुख्याने मराठी माध्यम होते. विल्सनने २९ मार्च १८३२ रोजी अंब्रोळी इंग्लिश स्कुल सुरु केली. या शाळेची परिक्षा सार्वजनिक रीतीने होई, या शाळेला नंतर कॉलेज डिव्हिजन जोडण्यात आले. या शाळेत इंग्रजी वाचन, व्याकरण, गणित, भूमिती, भूगोल इतिहास बायबल हे विषय शिकवले जात असत. हिंदुस्थानात अशा प्रकारे पहिल्यांदाच आधुनिक शिक्षणाचा पाया रचला जात होता. १९ एप्रिल १८३५ला मार्गारेटचे मुंबईतच निधन झाले.
रेव्हरँड आय बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या सुरुवातीपासून १८१३ ते १८८१ पर्यंत शैक्षणिक कार्याच्या लिहिलेल्या अहवालानुसार १८१५ च्या मे महिन्यात हिंदू मुलांच्या पहिल्याच आणि एकमेव शाळेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या नोंदीनुसार या मिशनरींच्या शाळेत अंदाजे २५ विद्यार्थी होते.
सावित्रीबाई फुले यांचे एक चरित्रकार असलेल्या मा. गो. माळी यांनी महात्मा फुले गौरव ग्रंथातल्या `क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले: काळ व कर्तृत्व' या लेखात म्हटले आहे:
`` एकोणिसाव्या शतकात स्त्री व अतिशूद्र यांच्या शिक्षणाचे कार्य करणे किती महाकठीण काम होते याची कल्पना येते. त्यातल्यात्यात पुण्यासारख्या ठिकाणी मुलांसाठी व अतिशूद्रांसाठी शाळा सुरू करणे आणि ती चालवून दाखविणे म्हणजे तर एक दिव्यच होते, प्राणावरचा प्रसंग होता. कारण पुणे म्हणजे एकोणिसाव्या शतकातील भटभिक्षुकांच्या भाकड व भोगळ लोकांचे माहेरघर, भटभिक्षुक निर्मित धर्म व धर्माचाराची राजधानी. मग अशा ठिकाणी स्त्रीशूद्रांना शिक्षण देण्यासाठी शाळा चालू करणे हे तत्कालीन मिशनरी लोकांनासुद्धा जमले नाही. मिस (मेरी अँन ) कुक यांनी १८२० साली बंगालमध्ये काही शाळा चालू केल्या. त्यानंतर त्या १८२९ साली मुंबईस आल्या. त्यांनी मि. वुईल्सन साहेबाशी लग्न केले. त्या मिसेस वुईल्सन झाल्या. मुंबई इलाख्यात त्यांनी सहा शाळा काढल्याची नोंद आढळते. त्या बाई मोठ्या जिद्दीच्या व कल्पक होत्या. पण पुण्यामध्ये मात्र त्याची डाळ शिजली नाही. १८३० साली पुण्यात त्यांनी शनिवारवाडयात शाळा काढल्याचा दाखला मिळतो. सरकारने ही जागा दिली होती. बार्ट फ्रिअर हा मिशनरी म्हणतो की या शाळेत फक्त आठ मुली येत होत्या. त्या ५-६ वर्षांपेक्षा मोठया नव्हत्या. तरीपण त्यांना शिकविण्याचे काम फार गुप्तपणे चाले. त्या शाळेत मुली शिकायला लपत-छपत येत व शाळेतून बाहेर पडताच चोरट्यासारखे घरी निघून जात. ही शाळा कशीबशी १८३२ पर्यंत चालली. शेवटी यशस्वी म्हणून गाजलेल्या मिसेस वुईल्सन हिला ती बंद करावी लागली.
त्या दरम्यान नुकत्याच खिस्ती झालेल्या मोडक नावाच्या व्यक्तीने महार- वाड्यात एक मुलीची शाळा काढली. परंतु कर्मठ भटभिक्षुकांनाही मागे टाकणान्या रुढीप्रिय शूद्र-अतिशूदांनी ती बंद करण्यास भाग पाडले. १८४४ साली चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनने मंगळवार पेठेत एक मुलींची शाळा काढली, तीत पुरोपियन शिक्षिका व पुरेशी साधनसामग्री अशी सर्व सोय केली होती. परंतु १८४७ साली ही शाळा बंद पडली. या तपशीलावरून पुण्यामध्ये एकोणिसाव्या शतकात स्त्री व शूद्र यांच्यासाठी शाळा सुरू करून त्यापुढे चालविण्याचा सर्व प्रयत्न विफल झाल्याचे दिसून येईल.’’
याच काळात अमेरीकन मराठी मिशनचे रेव्हरंड अँलन ग्रेव्हज आणि त्यांच्या पत्नी मेरी हे दाम्पत्य अनेक वर्षे महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी मुलींच्या शाळा चालवत असत.
`सावलीचा शोध' या पुस्तकात नरेंद्र चपळगावकर यांनी स्कॉटिश मिशनच्या शिक्षणकार्याविषयी माहिती दिली आहे. डोनाल्ड मिचेल हा मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचला होता, तेथे मराठी शिकून त्याने तेथे लगेच एक मराठी शाळा काढली. बाणकोट आणि हर्णै येथे १८२९ च्या दरम्यान स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या असे चपळगावकर यांनी लिहिले आहे.
अमेरिकन मराठी मिशनच्या वतीने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडण्यात आली. देशाच्या या भागात मुलीची ही पहिलीच शाळा होती. गंगाबाई या नावाच्या एक भारतीय शिक्षिका या शाळेत शिकवत असत. मुलींची ही शाळा उघडताच मुंबईतल्या दोन ब्रिटिश महिलांनी या शाळेचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली. दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली. या रोगाच्या साथीत मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. मृत गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने ही शाळा बंद करावी लागली.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८८१च्या वर्धापनानिमित्त एका अहवालात मिसेस एल. एस. गेट्स लिहितात : ``माझ्या माहितीनुसार मुलींसाठी पहिली शाळा पश्चिम भारतात १८२४ साली स्थापन करण्यात आली. गंगा या नावाच्या मुलीला मिशनरी महिलांनी शिकवले होते. मुलींच्या या पहिल्या शाळेत शिकवण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. काही ब्रिटिश महिला आणि पुरुषांनी या शाळेचा आर्थिक भर उचलण्याची तयारी दाखवली होती. मात्र कॉलरा साथ आली आणि निष्ठावान गंगा यांचा या प्राणघातक रोगाने बळी घेतला.''
या पहिल्या मुलींच्या शाळेतल्या पहिल्या एतद्देशीय महिला शिक्षिका असलेल्या या गंगाबाईंबद्दल इतर काहीच माहिती उपलब्ध नाही हे सांगायला आम्हाला खूप खेद होतो असे अमेरिकन मराठी मिशनच्या या वर्धापनावेळी सांगितले गेले. या गंगाबाई स्वतः कुठे शिकल्या होत्या? स्त्रीशिक्षणाबाबत प्रचलित समाजात अत्यंत प्रतिकूल भावना असताना या मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्याचे धाडस त्यांनी कसे केले? अशी अनेक प्रश्ने काळाच्या उदरात गडप होऊन आतापर्यंत अनुत्तरित राहिली आहेत असे या अहवालात म्हटले आहे.
यदाकदाचित भविष्यकाळातील संशोधनातून देशातील आधुनिक काळातील या पहिल्यावहिल्या एतद्देशीय शिक्षिकेबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकेल.
अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईत टाऊन हॉल येथे ७ नोव्हेंबर १९१३ रोजी झालेल्या शताब्दीसोहोळ्यात भारतीय ख्रिश्चनांच्या वतीने बोलताना बापुराव एन आठवले (बीए, एलएलबी, जेपी) यांनीं म्हटले होते ``
``भारतीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने येथे बोलताना अमेरीकन मराठी मिशनच्या आमच्या बंधूंनीं केलेल्या कार्याचे आम्ही कौतुक करतो आणि या मिशनच्या शताब्दी सोहोळ्यात आनंदाने सहभागी होत आहोत. या मुद्द्यावर बोलत असताना या देशात स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ करणाऱ्या अमेरिकन मराठी मिशनचे आपण सर्वांनी स्तुती करावी असे मी तुम्हा सर्वांनां आवाहन करत आहे. गॉर्डन हॉल आणि सॅम्युएल नॉट यांच्या १८१३ सालच्या आगमनानंतर केवळ अकरा वर्षातच भायखळा येथे मुलींची पहिली शाळा गंगाबाई नावाच्या महिला शिक्षिकेच्या देखरेखीखाली सुरु झाली.. त्याकाळी अंधश्रद्धेच्या खडकातून बाहेर पडलेला हा पाण्याचा झरा वाढत्या ताकदीने देशाच्या कानाकोपऱ्यांत इतक्या प्रमाणात वाढला आहे कि आता आपण पाहतोच आहे कि महिला हल्ली त्यांच्यासाठी स्वतंत्र कॉलेजेस आणि विद्यापीठे उघडण्यात यावी यासाठी संघर्ष करत आहेत.''
``मराठीत उपलब्ध असलेल्या एकोणिसाव्या शतकाच्या इतिहासाचा जेव्हा आपण मागोवा घेतो तेव्हा भारतात झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या आगमनाने येथील एकूण जीवनांत जे काही बदल झाले त्यांचा सविस्तर, साद्यन्त, तर्कशुद्ध आणि तटस्थ इतिहासच लिहिला गेला नाही याची आपणास जाणीव होते असे ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक सुधीर रसाळ यांनी म्हटले आहे.
`` भारताच्या सामाजिक इतिहासाची कितीतरी सामग्री ख्रिस्ती साहित्यात दडलेली आहे. जोपर्यंत ख्रिस्ती साधनसामुग्रीचा वापर करून एकोणिसाव्या शतकाचा इतिहास लिहिला जात नाही तोपर्यंत तो पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही,’’ असे सुधीर रसाळ यांनी माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या `सावलीचा शोध’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.
ही टिपण्णी सर्वार्थाने खरी आहे याची प्रचिती अमेरीकन मराठी मिशनच्या कार्याचा आणि या संस्थेने मागे ठेवलेल्या अमूल्य दस्तऐवजांचा अभ्यास करताना येते.
मुंबईत भायखळा इथली मुलीची ही पहिली शाळा बंद पडल्यावर लगेचच पुन्हा नव्या जोमाने मुलींची शाळा उघडण्याचे प्रयत्न झाले.
हिंदुस्थानात ब्रिटिश अमदानीत सर्वप्रथम आगमन केलेल्या आणि या देशात पहिल्यांदाच मुलं-मुलींसाठी शाळा सुरु करणाऱ्या आद्य मिशनरी गॉर्डन हॉल यांचे २० मार्च १८२६ रोजी वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी नाशिकजवळ दोडी दापुर या गावी निधन झाले, हा अमेरिकन मराठी मिशनला मोठा धक्का होता.
त्यानंतर अमेरिकेतून या मिशनच्या आणखी काही मिशनरींचे मुंबईत आगमन झाले. डेव्हिड ओ अँलन, त्यांच्या पत्नी एज्युबा अँलन, सायरस स्टोन, त्यांच्या पत्नी अँटोसा स्टोन यांचे २९ डिसेंबर १८२७ रोजी आगमन झाले होते आणि त्यांच्या बरोबर आणखी एक व्यक्ती होती.
ती व्यक्ती म्हणजे स्टोन यांच्या जवळच्या नातेवाईक, बहुधा चुलतबहिण, (कझन ) असलेल्या मिस सिंथिया फरार. हिंदुस्थानात येणाऱ्या पहिल्या अविवाहित महिला ख्रिस्ती मिशनरी.
सिंथिया फरार यांची एक अत्यंत महत्त्वाची ओळख म्हणजे समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या या शिक्षिका.
(पूर्वार्ध)