Did you like the article?

Showing posts with label Narayan Surve. Show all posts
Showing posts with label Narayan Surve. Show all posts

Wednesday, December 29, 2021


तमाशाचे फड बंद पाडणारे औरंगाबाद जिल्ह्यातले जाकियरबाबा
पडघम - सांस्कृतिक      'अक्षरनामा' 
कामिल पारखे
  • डावीकडे जाकियरबाबा. उजवीकडील तमाशाविषयीचं छायाचित्र ‘मराठी विश्वकोशा’तून साभार
  • Mon , 27 December 2021
  • पडघमसांस्कृतिकसांता क्लॉजSanta ClausतमाशाTamashaलोककलाFolk Art

‘सांता क्लॉज या विदेशी काल्पनिक पात्राला उत्तेजन देण्याऐवजी वासुदेव यासारखी आपल्या देशी सांस्कृतिक वैभव असलेल्या लोककला जिवंत ठेवायला हवे’, अशी चर्चा या नाताळ सणानिमित्त सोशल मीडियावर झाली आहे. वासुदेवप्रमाणेच तमाशात विविध कामे करणारे तमासगिर लोक, पोतराज, मसणजोगी, नंदीबैलवाले, ग्रहण सुटल्यावर घरोघरी उरलेले अन्न मागणारे लोक, बहिरूपी, थरारक अंगकसरती करणारे डोंबारी लोक, भविष्य सांगणारे कुडमुडे जोशी, वगैरे विविध समाजघटकांनी या लोककला जिवंत ठेवल्या आहेत. पण या लोककला खरेच अभिमानास्पद आहेत काय, असा प्रश्न वासुदेव आणि देशातील इतर अनेक लोककलांबाबत उपस्थित केला जाऊ शकतो.

......................................................

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीत तमाशाप्रधान चित्रपटांची लाट आली होती. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटाचा नायक असलेला आदर्श शिक्षक गावात आलेला तमाशाचा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. डॉ. श्रीराम लागू यांनी साकारलेला हा शाळामास्तर तमाशाशौकिनांच्या विरोधाची फिकिर न करता आपल्या नैतिक बळावर एकट्याने तमाशाचा रंगात आलेला खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. मुळात तमाशा हा एक अनैतिक प्रकार आहे आणि आपल्या गावच्या लोकांना त्यापासून दूर ठेवणे, हे आपले नैतिक कर्तव्य आहे, या समजापोटी हे मास्तर तमाशा बंद पाडण्याची धडपड करत असतात. तमाशातील नर्तकीच्या प्रेमात पडून या मास्तरांचे नंतर नैतिक अध:पतन होते, ही गोष्ट निराळी. मात्र तमाशाविषयी समाजात काय प्रतिमा होती, हे ‘पिंजरा’तील आदर्श मास्तरांच्या भूमिकेतून स्पष्ट होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील घोगरगावात आणि आसपासच्या परिसरातील अस्पृश्‍य लोकांनी तमाशात काम करू नये, तमाशाच्या फडाला हजेरी लावू नये, असा फादर गुरियन जाकियर ( Fr. Gurien Jacquier, MSFS) उर्फ जाकियरबाबा यांचा आग्रह होता. त्यांच्या विरोधास न जुमानता आसपासच्या एखाद्या गावात तमाशाचा फड भरला, तर ऐन रंगात आलेला प्रयोग ते बंद पाडत असत. तमाशा या लोककलेचे जतन करण्यासाठी आज विविध संस्थांतर्फे आणि शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या शतकात या ख्रिस्ती धर्मगुरूने या लोककलेविरुद्ध भूमिका का घेतली होती, हे जाणून घेण्यासाठी तमाशा या लोककलेचे स्वरूप माहिती करून घेतले पाहिजे. 

माझ्या लहानपणी श्रीरामपुरात आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बाजारतळापाशीच तमाशाचे फड भरत असत. आमच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरील मैदानात तमाशाचे तंबू उभारले जात असत. ज्येष्ठ तमाशाकलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, कांताबाई सातारकर आणि गुलाबबाई संगमनेरकर वगैरेंच्या तमाशाच्या फडांची दिवसभर चाललेली जाहिरात आम्ही मुले पाहत असू. मात्र घरातील वा शेजारपाजारातील कुणी प्रौढमंडळी या तमाशाच्या खेळाला जात नसत. आठवड्याच्या बाजाराला येणारे आसपासच्या खेड्यापाड्यातील लोकच प्रामुख्याने या लोककलेचे आश्रयदाते असत. आम्हा मुलांना सिनेमाला जाण्यास परवानगी असे. मात्र एकदा तरी तमाशा हा काय प्रकार असावा, याचा अनुभव घ्यावा असा विचारही कधी मनात आला नाही, याचे कारण तमाशा म्हणजे एक अश्‍लील कार्यक्रम आणि आंबटशौकीन रसिकांचे करमणुकीचे साधन असा सर्वांचाच समज होता.

“तमाशा कलेत चोरपावलांनी येणारी अनैतिकता हा तर चिंतेचा विषय आहे. महार, मांग, आणि कोल्हाट्याची बाई नाचवणं आणि पैसा फेकून तिला नागवणं, ही उच्चवर्णीय सरंजामी मानसिकता बदलली नाही, तर परंपरा म्हणून तमाशा का टिकवायचा, हाही प्रश्‍न आहे,” असे तमाशा-कलेचे एक अभ्यासक डॉ. मिलिंद कसबे यांनी आपल्या ‘तमाशा : कला आणि कलावंत‘ या पुस्तकात लिहिले आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच तमाशा क्षेत्राची अगदी जवळून ओळख असलेले अभिनेते निळू फुले यांनी म्हटले आहे, ‘‘मागास, अस्पृश्‍य समजल्या जाणाऱ्या महार, मांग, कोल्हाटी, गोपाळ आदी जातीचे कलाकार तमाशात जास्त आहेत. त्यांनीच ही कला टिकवली आहे. तमाशा क्षेत्रात कर्ज हा एक मोठा प्रश्‍न आहे. फडमालक सावकाराकडून कर्ज घेतात. तमाशातला कलाकार फडमालकाकडून कर्ज घेतात. अशा प्रकारे फडमालक कर्जबाजारी, कलाकार-कामगार कर्जबाजारी, कर्जावर चालणारा हा व्यवसाय आहे. कर्जामुळे कोणीही सुखी नाही. तमाशाला पैसे पुरवणारे बहुतेक सवर्ण असतात. तमाशातील स्त्री कलाकार कर्जबाजारी असेल आणि कर्ज फिटले नाही तर तिला भांडवलदाराच्या स्वाधीन व्हावे लागते. सतत दारिद्रयात राहूनही हे कलाकार तमाशाला का चिकटून राहिले, असा प्रश्‍न नेहमी माझ्या मनात येत असे.’’ कदाचित तमाशा कलेवरील प्रेमापोटीच हा वसा त्यांनी स्वीकारला असावा, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

स्वातंत्र्यानंतर तमाशावर अश्‍लीलतेचा आरोप झाला. त्यामुळे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी १९४८ साली तमाशावर बंदी घातली गेली. ही बंदी उठावी म्हणून तमाशा कलावंतांनी प्रयत्न केले.

त्या वेळी खेर यांनी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली ‘तमाशा सुधार समिती’ नेमली होती. या समितीने तमाशाचे संहिता लेखन आणि सादरीकरणाबाबतीत काही अटी घातल्यानंतर तमाशावरील ही बंदी उठवण्यात आली. तमाशात अश्‍लील संवाद नसावेत, दौलतजादा करताना तमासगीर नटीला हात लावू नये वगैरे अटी घालण्यात आल्या.

पुणे विद्यापीठाच्या पवळा पठ्ठेराव बापूराव साहित्य, संगीत, लोककला अकॅडेमी आणि पाथफाइंडर इंटरनॅशनल या संस्थांच्या वतीने पुण्यात २००७च्या ऑक्टोबरात तमाशा महोत्सव व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या कार्यक्रमपत्रिकेत तमाशाबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार ‘तमाशा’ शब्द हा फारशीतून उर्दूत आणि उर्दूतून मराठीत आला आहे, असे दिसते. तमाशा हा प्रकार ज्या शाहिरांनी रूढ केला, तो शाहीर (शाईर हा मूळ शब्द) अरबी भाषेतून मराठीत आला आहे. त्यामुळे तमाशा हा कलाप्रकार मुसलमानांच्या प्रभावातून उदयास आला असावा, असे काही संशोधकांचे मत आहे.

महाराष्ट्रातील जागरण, गोंधळ, भारुड, लळिते आणि दशावतार या लोककलांचाही अर्थातच तमाशावर प्रभाव आहे. साधारणत: तमाशा ही लोककला महाराष्ट्रात महार, मांग, गोंधळी, कोल्हाटी, डोंबारी यांच्याच हाती राहिली, असे या पत्रिकेतही स्पष्ट म्हटले आहे. उल्लेख केलेल्या या सर्व जाती अस्पृश्‍य, गावकुसाबाहेरच्या जातीजमाती. अर्थात या लोककलेचा आस्वाद घेणारे व पर्यायाने या कलाकारांचे विविध प्रकारे लैंगिक शोषण करणारे रसिकजन अर्थातच उच्चवर्णीय होते. तमाशातील स्त्रीकलाकारांचे लैंगिक शोषण करताना मात्र या कलावंतांची अस्पृश्‍यता तेवढ्यापुरती नजरेआड केली जात असे, हे विशेष.

आपल्या देशांत सर्वच पारंपरिक व्यवसाय जातींवर आधारित आहेत आणि सर्व लोककलांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. तमाशा ही लोककला प्रामुख्याने महार आणि मातंग जातीतील लोकांनी विकसित केली. या अस्पृश्‍य जातीतील महिला तमाशात नाचत आणि गात असत, तर पुरुषमंडळी ढोलकी, तुणतुणे, मंजिरा, डफ, हलगी, कड आणि पेटी ही संगीतवाद्ये वाजवत असत. त्यावरून या लोककलेला आणि तिच्याशी संबंधित असलेल्या कलाकारांना उच्चवर्णीयांत काय प्रतिष्ठा असे, याची कल्पना करता येते. तमाशाचा हंगाम पावसाळा आणि शेतीचे कामे संपल्यानंतर दसरा ते अक्षयतृतीया या काळात असतो. लग्नसराईत वाजंत्री काम, यात्रेच्या हंगामात तमाशे इत्यादींतही महार प्रामुख्याने आढळतात. 

मी लहान असताना घोगरगावात माझे मामेभाऊ लग्नसराईत पिपाणी, ढोलकी वगैरे वाद्ये वाजवत असत हे मला आठवते. यामागची कारणमीमांसा वरील संदर्भ वाचल्यानंतरच मला समजली. याचा अर्थ वाद्ये वाजवण्याची कला ते घरातील कुणाकडून किंवा नातेवाईकांकडून शिकले असणार. कुणी सांगावे, कदाचित माझ्या आजोळातील माझे काही नातेवाईकही त्यांच्या तरुणपणात म्हणजे फादर जाकियर यांच्या काळात तमाशातही झीलकरी वा इतर कामे करत असतील.

ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावरील १९६९ साली लिहिलेल्या एका लेखात तमाशाविषयी केलेली टिपण्णीही या संदर्भात पाहता येईल. सुर्वे म्हणतात, “पंचवीस वर्षांपूर्वी तमाशा हा शब्द एखाद्या अस्पृश्‍यासारखा वापरला जाई. तमाशा म्हणजे सभ्य लोकांनी, शिष्ट लोकांनी, अगर पोळीबाळींनी न पाहावा, असा नाटकाचा एक प्रकार. त्यात नाच्यापोऱ्या असतो, तो घाणेरडे व अश्‍लील हावभाव करतो. शृंगारिक व चावट गाणी म्हणतो, त्याने सुसंस्कृत माणसांची अभिरुची बिघडते. तमाशा करणारे अस्पृश्‍य असतात व तो पाहणे पाप आहे, ही प्रचलित भावना त्या काळात होती.”

तमाशा या लोककलेचे लोकनाट्यात रूपांतर होण्याआधी पारंपरिक तमाशातील कलाकारांची जातीविषयक पार्श्‍वभूमी, स्त्रिकलाकारांचे लैंगिक शोषण आणि या लोककलेतील प्रयोगांतील संवाद आणि नाचगाण्यांतील अश्‍लीलता वगैरे संदर्भ ध्यानात घेतले म्हणजे जाकियरबाबांनी तमाशाला का विरोध केला हे समजते.

‘पिंजरा’ चित्रपटातील आदर्श मास्तरही नैतिक दृष्टीकोनातूनच तमाशाच्या खेळास विरोध करत असतात. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन राज्यात बियरबारमध्ये महिलांच्या नाचगाण्यांवर बंदी घातली आहे. त्यामागेही स्त्रियांच्या लैंगिक शोषणास आणि अश्‍लीलतेस विरोध अशीच त्यांची भूमिका आहे.

वैजापूर तालुक्यातले घोगरगाव माझे आजोळ. माझ्या आईवडिलांनी जाकियरबाबांना जवळून पाहिले. ''घोगरगावचे जाकियरबाबा (मराठवाड्यातील ख्रिस्ती मिशनकार्य इ. स. १८९२ पासून ) हे मी लिहिलेले जाकियरबाबांचे चरित्र उषाताई आणि विलास वाघ यांच्या सुगावा प्रकाशनाने २००८ साली प्रसिद्ध केले
मिशनरीज ऑफ सेंट फ्रान्सिस डी सेल्स (MSFS) किंवा फ्रान्सलीन या धर्मगुरूंच्या संस्थेचे सदस्य असलेल्या जाकियरबाबांनी १८९२ पासून आपल्या मृत्यूपर्यंत (१९४७) घोगरगावात मिशनकार्य केले. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सरकारने जर्मन शत्रूराष्ट्राचे नागरीक असलेल्या जेसुईट आणि इतर फादरांची हकालपट्टी केली तेव्हा शिर्डीजवळच्या राहाता येथे फादर जाकियर यांनी येशूसंघीय धर्मगुरुंचे काम चालू ठेवले होते. घोगरगावात त्यांची समाधी आहे.
जाकियरबाबांचे या परिसरातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्य पाहून कॅथोलिक चर्चने त्यांना संत म्हणून जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु करावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे.

फादर जाकियर यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या कुठल्याही लिखाणात त्यांनी तमाशाला केलेल्या विरोधाचा उल्लेख माझ्या वाचनात कधी आला नाही. माझ्या आई-वडिलांनी आणि घोगरगावातील माझ्या मामांच्या संभाषणात मात्र याबाबतची चर्चा मी अनेकदा ऐकली आहे. शांत्वन आणि वामन शिनगारे या माझ्या दोन मामांनी जाकियरबाबांच्या छकड्यावर गाडीवान म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेली माहिती, याबाबत विश्‍वासार्ह मानता येईल. जाकियरबाबांविषयी घोगरगाव परिसरात अस्पृश्‍य ख्रिस्ती समाजात तसेच उच्चवर्णीय वगैरे मंडळीत मोठा आदर होता.



सरकारदरबारी कलेक्टर आणि तहसीलदार यासारख्या अधिकाऱ्यांशी आणि शेजारपाजारच्या गावांच्या पाटील वगैरे मंडळींशी त्यांचे खूप चांगले संबंध होते. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील अनेक गावांतील त्यांच्या कामांमुळे, त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे त्यांच्याविषयीचा एक प्रकारचा दराराही असे. उच्चशिक्षित आणि युरोपियन असल्याने ब्रिटिश जमान्यात सरकारदरबारीसुद्धा त्यांचा वचक असे. त्यामुळे जाकियरबाबांनी अस्पृश्‍यतापालनासारख्या एखाद्या अनिष्ट वा अनैतिक सामाजिक रूढीस विरोध केला, तर अशा प्रसंगी त्यांच्या विरोधास जाण्याची कुणाची हिंमत नसायची. जाकियरबाबांनी तमाशाच्या प्रथेस विरोध केला, तेव्हाही असेच झाले असणार.

घोगरगाव आणि आसपासच्या परिसरातील महार समाजातील अनेक ख्रिस्ती स्त्री-पुरुषही त्या काळात तमाशात कलाकार म्हणून काम करत असतील, याविषयी शंकाच नाही. तमाशात नाच्या किंवा मावशीची भूमिका करणाऱ्या पुरुष नटाला लांब केस राखावे लागत. या ग्रामीण भागात अनेक वर्षे राहून या लोककलेचे एकूण स्वरूप समजल्यानंतर कुठल्याही ख्रिस्ती धर्मगुरूने आपल्या धर्मग्रामातील ख्रिस्ती महिलांस तमाशात नाचण्यागाण्यापासून परावृत्त केले असते. ख्रिस्ती पुरुष मंडळींनी तमाशात अश्‍लील स्वरूपाची नाचगाणी म्हणू नये, नाच्याचे काम करू नये, यासाठी त्यांच्यावरही दबाव आणला असता.

जाकियरबाबांनी तर घोगरगाव परिसरात आपल्या आयुष्याची चार दशके घालवली. या फ्रेंच धर्मगुरूने घोगरगावात आल्यानंतर इंग्रजी आणि मराठी भाषांवर चांगले प्रभुत्व मिळवले होते. घोगरगावातील ख्रिस्तराजा मंदिरात त्यांनी अनेक वर्षे नवख्रिस्ती लोकांना मराठी भजने, गायने शिकवली. तमाशाला त्यांनी विरोध करण्याआधी त्यांनी या लोककलेच्या विविध अंगांचा अभ्यास नक्कीच केला असणार.

फादर जाकियर यांचा तमाशाला असलेला कडवा विरोध पाहता ते घोगरगावात असताना या लोककलेचे प्रयोग या गावात झाले असतील, याविषयी दाट शंकाच आहे. मात्र आसपासच्या खेड्यांत तमाशाचे खेळ होतच असत. यात्रेच्या वा इतर कुठल्याही निमित्ताने तमाशाचे प्रयोग असले म्हणजे त्या गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील पुरुषमंडळी तेथे आवर्जून हजर राहत असत. तमाशाचे हे प्रयोग रात्रीच रंगत असत. ढोलकीच्या आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर तमासगीर महिला आणि पुरुष गात आणि नाचत असत.

अशा वेळी फादर जाकियर आपली घोडागाडी बाहेर काढून त्या आवाजाच्या दिशेने निघत. रात्रीच्या वेळी नदी किंवा ओढे ओलांडून तमाशाच्या जागी ते पोहोचत असत. त्या अस्पृश्‍य स्त्री-पुरुष कलाकारांनी तमाशाच्या माध्यमातून होणारे त्यांचे स्वत:चे लैंगिक शोषण रोखावे म्हणून त्यांना उपदेश करत असत. अनेकदा उपदेशाऐवजी त्या लोकांची कानउघाडणीच केली जात असणार. तमाशापथक मोगलाई परिसरातील असले तर त्यातील बहुतेक तमासगीर जाकियरबाबांच्या धर्मग्रामातील ख्रिस्ती लोकच असत.

तमाशाचा ऐन रंगात आलेला प्रयोग अशा प्रकारे बंद पाडल्यानंतरही हे तमासगीर दुसरीकडे कुठेतरी तमाशाचे खेळ चालूच ठेवतील म्हणून फादर जाकियर त्यांची ढोलकी, तुणतुणी, डफ वगैरे वाद्ये आपल्या ताब्यात घेत असत. कलावंतिणीच्या पायातील चार-पाच किलो वजनाचे घुंगरूही काढून घेत. त्याशिवाय पुरुष कलाकारांनी नाच्याची किंवा मावशीची भूमिका करू नये, म्हणून त्यांनी लांब वाढवलेल्या केसांनाही कात्री लावत असत.



जाकियरबाबांच्या आठवणींना माझे आईवडील, मामा आणि इतर जुनी मंडळी उजाळा देत, तेव्हा हे फादर तमाशा कसे बंद पाडत असत, हे याविषयी हमखास बोलले जाई. जाकियरबाबांनी तमासगिरांकडून ताब्यात घेतलेल्या आणि आपल्या घोडागाडीतून घोगरगावात आणलेल्या ढोलकी, तमासगीर कलावंतिणींचे घुंगरू, तुणतुणे, डफ वगैरे संगीतवाद्यांनी मिशन कंपाऊंडमधल्या दोन खोल्या भरल्या होत्या, हे माझी आई आजही आवर्जून सांगत असते.

मागे घोगरगावला मी भेट दिली, तेव्हा तेथील मुख्य धर्मगुरू फादर स्टीफन अल्मेडा यांनीही यास दुजोरा दिला. तमासगिरांची ती संगीतवाद्ये दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत मिशन कंपाऊंडमधील काही खोल्यांत सांभाळून ठेवण्यात आली होती, असे त्यांनी ऐकले आहे, असे त्यांनी मला सांगितले.

महार-मांग या अस्पृश्‍य जातीतील लोकांसाठी तमाशा ही लोककला तर उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. समाजातील या सर्वाधिक उपेक्षित घटकांचा तोंडचा घास हिरावून घेण्याचा फादर जाकियर यांचा मुळीच उद्देश नव्हता. तमाशाबाबत जाकियरबाबांची भूमिका समाजसुधारकाची होती. आपल्या धर्मग्रामातील अस्पृश्‍य लोकांच्या आर्थिक आणि उन्नतीसाठी फादर जाकियर यांनी आणि मोगलाईतील किंवा अहमदनगर जिल्ह्यातील इतर मिशनरींनी अनेक प्रकल्प राबवले होते. लोकांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी ते धावून जात असत. आपल्या धर्मग्रामातील खेड्यांतील मुलांनी साक्षर व्हावे म्हणून जाकियरबाबांनी अनेक गावांत शाळा सुरू केल्या होत्या.

या शाळांत सर्व जाती-धर्मांच्या मुलांना फुकट शिक्षण दिले जात असे. या शाळांच्या मास्तरांच्या निवासस्थानांचा आणि पगाराचा खर्चही फादर स्वत: उचलत असत. तमाशातील काम सोडले तर या लोकांसाठी उदरनिर्वाहाची दुसरे पर्यायही त्यांनी उपलब्ध करून दिले होते.

घोगरगावात सध्या उभ्या असलेल्या उंच शिखरवजा ख्रिस्तराजा मंदिराचे काम एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात वीस वर्षे चालू होते. या बांधकामामुळे आसपासच्या अनेक सुतार, गवंडी अशा कुशल कारागिरांना तसेच इतर अनेक अकुशल कामगारांना अनेक वर्षे रोजगार उपलब्ध झाला होता. जाकियरबाबांचा तमाशाला असलेला विरोध आणि या लोककलेचे प्रयोग बंद पाडण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा याला अर्थातच शंभर वर्षांपूर्वीच्या काळाचा संदर्भ आहे. त्या काळात स्त्रियांनी नाटकांत वा चित्रपटांत काम करणेसुद्धा अनैतिक समजले जाई आणि त्यामुळे अगदी बालगंधर्वांच्या काळापर्यंत पुरुषच स्त्रियांच्या भूमिका करत असत.

आज शासन आणि विविध संस्था-संघटना तमाशासारख्या लोककलांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तमाशा या लोककलेने सातासमुद्रापार, पाश्‍चिमात्य देशापर्यंत मजल मारली आहे. मात्र अजूनही या लोककलेचा जातीय संदर्भ नाहीसा झालेला नाही. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतर, अस्पृश्‍यता कायद्याने बंद झाल्यानंतर आजही सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयांत सफाई कामगार, भंगी, शिपाई वगैरे कामे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्‍य समाजातीलच लोक करतात. तसेच खेड्यापाड्यांत होणाऱ्या तमाशातील बहुसंख्य स्त्री-पुरुष कलाकार आजही महार, मांग, कोल्हाटी या समाजातीलच आहेत.

‘आजही तमाशात गायक म्हणून महार कलावंताची संख्या जास्त प्रमाणात आहे’, असे डॉ. कसबे यांनी म्हटले आहे. या लोककलेशी निगडित असलेले दलित जातींविषयक संदर्भ अजूनही पुसले गेलेले नाहीत. ‘ब्राह्मणाघरी लिव्हनं, महाराघरी गाणं आणि मांगाघरी वाजवणं’ किंवा ‘महाराचं गाणं आणि मांगाचं डफडं‘ अशा म्हणी प्रचलित आहेत. या जातींविषयक संदर्भांमुळे आणि इतरही काही कारणांमुळे चित्रपटसृष्टीतील आणि रंगभूमीवरील स्त्री-पुरुष कलाकारांना हल्ली मिळणारी प्रतिष्ठा, धनप्राप्ती आणि ग्लॅमरचे वलय तमासगिरांच्या नशिबी अजून तरी नाही.

तमासगीर कलावंतांचे होणारे लैंगिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण आजही पूर्णत: बंद झालेले नाही. हे शोषण बंद करण्यासाठी तमाशाचे प्रयोग बंद करण्याची मुळीच जरुरी नाही. मात्र तोंडाला रंग फासून रंगमंचावरून, छोट्या वा मोठ्या पडद्यांवरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांच्या वाट्याला येणारे आर्थिक आणि इतर लाभ दलित समाजातील या लोककलाकारांनाही मिळावेत, अशी माफक अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

आपल्या मुलांनी आपला व्यवसाय पुढे चालू ठेवावा असे प्रथितयश डॉक्टरांना, राजकीय पुढाऱ्यांना आणि इतर काही क्षेत्रांतील लोकांना वाटत असते. तमाशा ही लोककला म्हणून टिकून राहायला हवी, असे म्हणणाऱ्या आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या लोकांनाही आपल्या मुलाबाळांनी या क्षेत्रात पैसा आणि नाव कमवावे असे मनापासून वाटले, तरच या लोककलेला समाजमान्यता आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली असे म्हणता येईल.

नजिकच्या काळात तमासगिरांच्या नशिबी ही प्रतिष्ठा आणि सुख मिळण्याची शक्यता नसेल तर हे कलाकार तमाशाला का चिकटून राहिले, असा अभिनेते निळू फुले यांना पडलेला प्रश्‍न इतर कुणालाही पडू शकेल.

पण या लोककला खरेच अभिमानास्पद आहेत काय, असा प्रश्न वासुदेव आणि देशातील इतर अनेक लोककलांबाबत उपस्थित केला जाऊ शकतो.

Thursday, April 8, 2021

काही घटना कायम आठवणीत राहतात. त्याचे कारण त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती

 काही घटना अगदी काही क्षणांच्या, किंवा एक-दोन तासांच्या असतात, पण कायम आठवणीत राहतात. त्याचे कारण त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती

पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे

नारायण सुर्वे, एन.डी. पाटील, जयंत नारळीकर, अण्णा हजारे, बा. भ. बोरकर, सय्यदभाई, मोहन धारिया आणि किरण बेदी
  • Tue , 06 April 2021

“नारायण सुर्वे सपत्नीक पणजीला आले आहेत, अल्तिनोला गेस्ट हाऊसवर उतरले आहेत. त्यांना ‘गोवादर्शन’ घडवून आणशील का?”

एक दिवस गोव्यातल्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी अनुराधा आठवले यांचा निरोप आला. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीची ही घटना असावी. लँडलाईन फोन दुर्मीळ आणि मोबाईलची संकल्पनाही अस्तित्वात नसलेल्या त्या काळात हा निरोप माझ्यापर्यंत कसा आला आता आठवत नाही. त्या वेळी मी पणजीतल्या ‘नवहिंद टाइम्स’ या दैनिकात नवशिखा बातमीदार होतो. गंमतीची बाब म्हणजे अनुराधा आठवले या पणजीतल्याच ‘गोमंतक’ या मराठी दैनिकाचे संपादक असलेल्या नारायण आठवले यांच्या पत्नी. त्यामुळे इंग्रजी दैनिकात काम करणाऱ्या माझ्यासारख्या नवख्या बातमीदाराकडे या कामगिरीसाठी अनुराधाबाईंनी विचारणा करावी, याचे आश्चर्य वाटले. आमचे वृत्तसंपादक एम. एम. मुदलीयार या कामगिरीसाठी परवानगी देतील, याची खात्री असल्याने मीही लगेच होकार कळवला.

महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्राबाहेर ‘महाराष्ट्र परिचय केंद्रे’ चालवली जातात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा इतर राज्यांतील लोकांना परिचय व्हावा, या हेतूने या केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात. महाराष्ट्रातील साहित्यिकांची व्याख्याने आयोजित करणे हा त्यापैकीच एक. त्याआधी महाराष्ट्र परिचय केंद्राने पु.ल. देशपांडे यांची तीन व्याख्याने आयोजित केली होती. साहित्यरसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी माझी अनुराधा आठवले यांच्याशी पहिल्यांदा गाठभेट झाली होती.

ठरल्याप्रमाणे सकाळीच मी अल्तिनोवर गेस्ट हाऊसवर गेलो, तेव्हा कवीमहाशय आणि त्यांच्या पत्नी कृष्णाबाई तयारच होत्या. सुर्वे यांचे ‘माझे विद्यापीठ’ आणि ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हे दोन्ही काव्यसंग्रह माझ्याकडे होते.  त्या दोन दिवसांत मी सुर्वे दाम्पत्याला गोव्याच्या काही प्रसिद्ध ठिकाणी घेऊन गेलो.  

आठवले यांच्यामुळेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन. डी. पाटील आणि त्यांच्या पत्नी यांना कारमधून गोव्यात फिरवून आणण्याची अशीच एक संधी मिळाली. आता नारायण सुर्वे किंवा एन. डी. पाटील यांच्याशी काय गप्पा झाल्या, ते काही आठवत नाही, पण त्या भेटींची स्मरणचित्रे अजूनही ताजी आहेत. 

असेच एकदा कुठल्याशा एका साहित्य संमेलनासाठी पणजीहून आम्ही काही बातमीदार कारने निघालो होतो. बहुधा रणजित देसाई उद्घाटक असलेले म्हापसा येथील ते कोकणी साहित्य संमेलन असावे. संमेलनासाठी पत्रकारांना घेऊन जाणाऱ्या आयोजकांनी आमच्या गाडीत एका महनीय पाहुण्यालाही घेतले होते. ही व्यक्ती होती मानेपर्यंत रुळणारे केस असणारे आणि खांद्यावर घडी केलेली शाल टाकलेले ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर!

‘बाकीबाब बोरकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या कवीच्या कविता आपण शाळेत शिकलो, तो कवी आज आपल्यासोबत बसून गप्पा मारतो आहे, हे माझ्यासारख्या तरुण बातमीदारासाठी अविश्वसनीय होते. त्याआधी काही काळ बाकीबाब बातम्यांच्या केंद्रस्थानी आले होते, ते दुसऱ्या एका कारणाने. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची त्यांनी लढवलेली निवडणूक अटीतटीची आणि व्यक्तीगत आणि प्रादेशिक पातळीवर तेढ आणि कटुता निर्माण करणारी झाली होती. त्या निवडणुकीत बोरकरांचा पराभव करून गजमल माळी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष झाले होते. बाकीबाब यांना आणि अनेकांना हा पराभव जिव्हारी लागला होता. त्यानंतर बाकिबाब ‘कोकणीवादी’ बनले असे म्हटले गेले. त्या कारच्या अर्ध्या तासांच्या प्रवासात मी बाकीबाब यांच्याशी एक शब्दही बोललो नव्हतो. माझ्याकडे त्यांच्याशी बोलण्यासारखे काही नव्हतेच. या ज्येष्ठ कविवर्यांचा आपल्याला काही क्षणांचा सहवास लाभला, हे मात्र आजही मी विसरलेलो नाही.

पणजीला कंपाल येथे कला अकादमीचे भव्य, देखणे संकुल उभारले, त्यानंतर लवकरच तेथे गोवा, दमण आणि दीव सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे एक नाट्यक्षेत्रातील लोकांसाठी चार दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बाकीचे बातमीदार उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर राहून नंतर आपल्या नेहमीच्या कामाला लागले होते. बातमीदार म्हणून मला मात्र त्या चारही दिवसांच्या कार्यशाळेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. रंगभूमीविषयी मला आताही फारसे काही माहीत नाही, तेव्हा तर काही माहिती असणे शक्यच नव्हते. पण तरीही आपण रंगभूमीवरील काही मोठ्या व्यक्तींबरोबर वावरत आहोत, याची मला लगेचच जाणीव झाली होती.  

रंगभूमीवर मोठे योगदान आणि वावर असलेल्या त्या व्यक्तींपैकी केवळ एकच नाव मला तेव्हा परिचित होते. ते म्हणजे रोहिणी हट्टंगडी. सर रिचर्ड अटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट त्या वेळी नुकताच प्रदर्शित झाला होता. गोव्यात तोपर्यंत टेलिव्हिजनचा जमाना सुरू झालेला नव्हता. ‘नवहिंद टाइम्स’चे संपादक बिक्रम व्होरा यांनी आमच्या दैनिकाच्या ऑफिसात एका चौकोनी बॉक्सवर तो कृष्णधवल चित्रपट सर्वांना दाखवला होता. धावती चित्रे दाखवणारा आणि आवाज असणारा चौकोनी बॉक्स असलेला व्हिडिओ सेट पाहण्याची आम्हा अनेकांची ती पहिलीच वेळ. या ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबा गांधी यांची भूमिका केल्याने रोहिणी हट्टंगडी या एकदम प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांचे पती जयदेव हट्टंगडीसुद्धा या कार्यशाळेला उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी इथे मराठी रंगभूमीवरील दादा मंडळी आहेत, हे लक्षात आले होते. त्यापैकी एक होत्या विजया मेहता, दुसरे होते महेश एलकुंचवार. महाराष्ट्रातील विविध शहरांतील ज्येष्ठ रंगकर्मीही होते, पण इतरांची नावे मला आज आठवत नाहीत.

कार्यशाळेत चर्चा होत असताना अधूनमधून एक ज्येष्ठ व्यक्ती बोलायला उभी राहायची, तेव्हा इतर सर्व मंडळी त्यांना अदबीने ऐकून घेत असत. नंतर समजले की, ते मराठी रंगभूमीवरील खूप ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहे, त्यांचे नाव दामू केंकरे. मूळ गोव्याचे असलेल्या केंकरे यांनीच या कार्यशाळेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती, असे नंतर समजले. 

त्या चार दिवसांच्या कार्यशाळेवर नंतर मी काय बातमी वा वार्तापत्र लिहिले ते आता आठवत नाही. मी स्वतः त्या वेळी नुकतीच विशी ओलांडली होती आणि रोहिणी आणि जयदेव हट्टंगडी, निळ्या जिन्सवर इन-शर्ट असणारे महेश एलकुंचवार हे लोकसुद्धा त्या वेळी ऐन तरुणाईतच होते. मात्र वास्तुशिल्पकार चार्ल्स कोरिया अफ़ॉन्सो यांनी डिझाईन केलेल्या कला अकादमीच्या त्या नव्या संकुलातील अम्फी थिएटरमध्ये, खुल्या जागेत, हिरवळीवर झालेल्या त्या चर्चांची चित्रे आजही माझ्या नजरेसमोर आहेत. त्यानंतर एलकुंचवार यांची ‘गार्बो’ आणि इतर काही नाटकांची पुस्तके मी आवर्जून विकत घेऊन संग्रही ठेवली होती.    

गोव्यात १९८३ साली राष्ट्रकुलातील ३९ देशांतील प्रमुखांची - राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान- यांची अनौपचारिक बैठक (कॉमनवेल्थ हेडस ऑफ गव्हर्नमेंट मिटिंग - चोगम रिट्रीट) पार पाडली, तेव्हा गोव्यातील वाहतूक नियोजनाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक (वाहतूक) किरण बेदी यांच्याकडे होती. बेदी या भारतीय पोलीस दलातील (आयपीएस) पहिल्या महिला अधिकारी. ‘नवहिंद टाइम्स’चा क्राईम रिपोर्टर म्हणून बेदी यांच्याशी त्या काळात जवळपास रोजच संबंध आला. या काळात वॉकी-टॉकीचा अवजड बॉक्स असलेल्या जिप्सी जीपमधून त्यांच्यासह मी दाबोळी विमानतळ ते आग्वाद ताज व्हिलेजपर्यंत रंगीत तालमीसाठी फिरायचो. एक बातमी देण्यावरून आमच्यात एकदा खडाजंगीही झाली होती. मात्र पुढे देशभर नाव कमावलेल्या या पोलीस अधिकाऱ्याशी बातमीदार म्हणून एकेकाळी अगदी वैयक्तिक  संबंध होते, याचा आज मागे वळून पाहताना आनंद वाटतो.

आपल्या ‘भारत जोडो’ या अभियानाच्या निमित्ताने गोव्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या दौऱ्याचे वार्तांकन केले, नोबेल पारितोषक विजेत्या आणि भारतरत्न किताबाच्या मानकरी मदर तेरेसा यांच्या गोवा दौऱ्यात त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. भारताच्या दहा दिवसांच्या पाळकीय दौऱ्यावर असताना पोप जॉन पॉल दुसरे १९८६मध्ये पणजीला आले होते. तेव्हा बुलेटप्रूफ पोपमोबाईलमधून गर्दीतून हिंडत, उजवा हात उंचावून क्रुसाची खूण करून भाविकांना आशीर्वाद देताना त्यांना मी अगदी जवळून पाहिले. 

अशीच गोष्ट सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याबाबाबत. गोवा सोडून पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’ला रुजू झाल्यानंतर हजारे यांच्या राळेगण सिद्धीला अनेकदा गेलो, तेथे काही दिवस मुक्कामही केला. अण्णा पुण्यात शनिवार पेठेतल्या राष्ट्रभाषा भवनात राहायला आल्यावर हमखास आमच्या भेटी व्हायच्या, पत्रव्यवहारही असायचा. नंतर या भेटी विरळ होत गेल्या, गेली कित्येक वर्षे तर प्रत्यक्ष भेट किंवा फोनवरही संभाषण नाही. मात्र राळेगण आणि हजारे यांच्याशी असलेले जुने संबंध आजही विसरलेलो नाही. आम्हां दोघांचे कृष्णधवल, काही रंगीत फोटो आणि काही पत्रव्यवहार आजही मी जपून ठेवले आहेत.  

औरंगाबादला ‘लोकमत टाइम्स’ला असताना तेथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे बिट माझ्याकडे होते. या खंडपीठातील ज्येष्ठ वकील नरेंद्र चपळगावकर माझे सर्वांत महत्त्वाचे सोर्स. त्यांनी इंग्रजीत डिक्टेट केलेली खटल्याची ब्रिफिंग मी अगदी जशीच्या बातमीत वापरायचो, इतकी त्यांची वैचारिक स्पष्टता आणि अचूकता असायची. हे चपळगावकर नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले, त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. माझ्या बातमीदारीतील कारकिर्दीतील न्यायमूर्ती चपळगावकर हे एक अत्यंत आदरणीय सोर्स आणि व्यक्ती आहेत.

पुण्यात बातमीदारी करताना कुटुंबनियोजनाच्या चळवळीत रघुनाथ धोंडो कर्वे यांना मदतीचा हात देणाऱ्या रँग्लर परांजपे यांच्या कन्या शकुंतला परांजपे यांच्याशी त्यांच्या अखेरच्या काळात म्हणजे १९९०च्या सुरुवातीला माझे जवळकीचे संबंध निर्माण झाले. मिठाईचा डबा हातात घेऊन मांजरांना खेळवत, पनामा सिगारेट पित, निरागस हसत माझ्याशी गप्पा मारणाऱ्या लेखिका, माजी राज्यसभा सभासद, पद्मविभूषण सन्मानित शकुंतलाबाई आजही माझ्या नजरेसमोर आहेत. 

काही घटना अगदी काही क्षणांच्या, मिनिटांच्या किंवा एक-दोन तासांच्याच असतात, पण कायम आठवणीत राहतात. त्याचे कारण म्हणजे त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी शिथिल करून निवडणुका जाहीर केल्या तेव्हाची ही घटना. तुरुंगातून राजकीय नेत्यांच्या सुटका झाल्यावर निवडणूक प्रचारावर येणाऱ्या नेत्यांचे देशभर उत्साहाने स्वागत केले जात होते. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असूनही आणीबाणीला विरोध करून तुरुंगात जाणारे, तरुण तुर्कांपैकी एक असणारे मोहन धारिया श्रीरामपूरला आले, तेव्हा झालेल्या त्यांच्या जंगी स्वागताला आणि नंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेला मी हजर होतो. त्या वेळी मी नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर १२ वर्षांनी ‘इंडियन एक्सप्रेस’चा पुण्यातील बातमीदार म्हणून मी मोहन धारिया यांना भेटलो, तेव्हा पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कुठल्याशा निर्णयाला विरोध करण्यासाठी गोळीबार मैदानापाशी अण्णा बेमुदत उपोषणाला बसलेले होते.

पुण्यातील ‘आयुका’चे संचालक असलेले डॉ. जयंत नारळीकरांची खूप वर्षांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’च्या संगीता जैन-जहागिरदार आणि मी मुलाखत घेतली. त्या वेळी मुलाखतीस वेळेवर यावे, नारळीकर वक्तशीरपणाबाबत किती जागरूक याविषयी त्यांच्या सचिव महिलेने वारंवार बजावले होते, ते आजही आठवते. एक तास चाललेल्या या मुलाखतीत नारळीकर यांनी विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज त्यांना जगातील कुठल्याही व्यक्तीचा शोधनिबंध ‘इलेक्ट्रॉनिक मेल’मुळे काही क्षणात उपलब्ध होतो, असे म्हटले तेव्हा मला काहीच अर्थबोध झाला नव्हता. ते साल होते १९९१ आणि सर्व क्षेत्रांत इंटरनेटचा वापर होण्यासाठी आणखी काही वर्षे जाणार होते. त्या वेळी माझ्या अगदी डोक्यावरून गेलेल्या ‘ई-मेल’शिवाय आज कुणाचे चालू शकणार आहे का? छापलेल्या मुलाखतीची वृत्तपत्रांतील कात्रणे मी डॉ. नारळीकरांना एक छोटेशा पत्रासह पोस्टाने पाठवली, तेव्हा उलटटपाली मला पाठवलेल्या माझ्या त्याच टाईप केलेल्या पत्रावर नारळीकरांनी दोन ओळींत धन्यवाद दिले होते. नारळीकरांच्या स्वाक्षरीचा तो ३० वर्षांपूर्वीचा तो कागद आजही माझ्या संग्रही आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. नारळीकरांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याची बातमी ऐकली, तेव्हा त्या भेटीची चित्रफित नजरेसमोर  झळकली.

पुणे जिल्ह्यातल्या आंबेठाण गावातून शेतकरी संघटनेच्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या शरद जोशींना भेटण्यासाठी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अभय वैद्यसह मी १९९१ साली गेलो होतो, ती भेट विसरणे तर अशक्य. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या नावावर निवडणूक प्रचार करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांविरुद्ध शरद जोशी यांनी त्या खेड्यात राहून जोरदार मोहीम राबवली होती. काही काळानंतर धर्माच्या नावाने निवडणुकीत मते मागितल्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे माजी महापौर आमदार रमेश प्रभू यांच्यांवर निवडणूक आयोगाने सहा वर्षांसाठी मतदान करण्यावर आणि निवडणुकीत भाग घेण्यावर बंदी आणली होती. स्वतः शरद जोशीच नंतर भाजपचे खासदार बनले, पण तो वेगळा विषय आहे.   

मुस्लीम समाजात सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी पुण्यातील सय्यदभाई यांनी केलेल्या कामाबाबत दोन-तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारने त्यांना पद्मश्री प्रदान केली. त्या वेळी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात प्रसिद्ध शाह बानो प्रकरणात सय्यदभाईंनी केलेल्या चळवळीचा बहुतेकांना माहितीही नव्हती. त्या काळात म्हणजे १९९०ला ‘इंडियन एक्सप्रेस’साठी मी त्यांची मुलाखत घेतली होती, हे या पदमश्री पुरस्काराच्या निमित्ताने आठवले. याच दरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, बोहरी समाजातील कार्यकर्ते ताहेर पूनावाला यांच्याही मुलाखती ‘इंडियन एक्सप्रेस’साठी घेतल्या होत्या.

सत्ताधारी आणि इतर राजकिय नेत्यांशी आम्हा पत्रकारांचा नेहमीच संबंध येतो. मात्र समाजमनावर राज्य करणाऱ्यांमध्ये, समाजाला प्रेरित करणारी सामान्यांमधील असामान्यजनही असतात. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी मृतदेहाचा तुटवडा पडतो, हे लक्षात आल्यावर आपल्या वृद्धापकाळी देहदानाची चळवळ राबवणारे पुण्यातील ग. म. सोहोनी अशांपैकी एक. त्यांच्यावरही मी अनेक बातम्या केल्या. समाजवादी नेते नानासाहेब गोरे आणि उद्योगपती शंतनुराव किर्लोस्करांनी स्वतः देहदानाच्या अर्जावर सह्या करून या सोहोनींना नैतिक पाठबळ दिले. नानासाहेबांची देहदानाची इच्छा त्यांच्या अमेरिकास्थित मुलीच्या प्रखर विरोधामुळे साकार होऊ शकली नाही, हा भाग वेगळा.  

गोवा आणि महाराष्ट्रातील माझ्या पत्रकारितेच्या व्यवसायातील या काही आठवणी. ३०-४० वर्षांच्या कालखंडातील घटना आणि व्यक्तींबद्दलच्या या आठवणी काही नव्या, ताज्या घडामोडींमुळे परत ताज्यातवान्या होतात. काळाचा महिमा असा की, त्याबद्दल आता खेद किंवा खंत नसते, क्वचित त्या घटनेवरून स्वतःशीच हसणे होते. एकतर त्या घटनेत आपल्यासह सहभागी असणारे आता आपल्याशी संपर्कात नसतात किंवा काळाच्या पडद्याआड गेलेले असतात. भूतकाळातल्या या आठवणींना ऐतिहासिक मूल्यही असू शकेल, असे म्हणणे आत्मप्रौढीचे ठरू शकते. या घटनांना आणि व्यक्तींना अशा प्रकारे उजळणी देताना त्या काळात पुन्हा वावरल्याची आणि त्या व्यक्तींना पुन्हा एकदा भेटल्याची अनुभूती येते, हे मात्र खरे!