Did you like the article?

Showing posts with label Chicken. Show all posts
Showing posts with label Chicken. Show all posts

Saturday, February 24, 2024

मनोहर पर्रीकर 

दिल्लीत ताजे मासे मिळत नाहीत म्हणून मंत्रीपद सोडून गोव्यात परतणारे पर्रीकर...

जवळच्या व्यक्तीने विचारणा केली तर `विसवणाची तळलेली पोस्ता' आणण्यास ते प्रेमाने सांगत असत असे वामन प्रभूंनी लिहिले आहे.
Manohar Parrikar
Manohar Parrikar

आज खूप दिवसांनी खरे तर काही महिन्यांनी सुकटाची चटणी नाश्त्याला खाल्ली. ही चटणी तशी घरी काल रात्रीच तयार झाली होती पण तेव्हाच ठरवलं होतं नाश्त्याला खायची म्हणून. सकाळी श्रीधरनगर बागेत फिरायला गेलो तेव्हा छानपैकी कोवळे ऊन पडले होते आणि बॅडमिंटन खेळण्यासाठी एक ताज्या दमाचा पार्टनर गडीसुद्धा मिळाला. छान घामाघूम झालो होतो पण तेव्हाही मनात घरी असलेल्या सुकटाच्या चटणीची आठवण होतीच. मला स्वतःलाच त्याबद्दल हसूही आले होते.

लहानपणापासून माझ्या एक अत्यंत आवडीचा असलेला हा पदार्थ आजही खास आवडीचा आहे. सुकट आणि बोंबलाची चटणी हे दोन्ही पदार्थ बरोबरीने येतात, ज्याला सुकट आवडते त्याला बोंबीलसुद्धा आवडणार असे मला वाटते. इथे मी सुके बोंबीलबद्दल बोलतो आहे, ओले बोंबील हा वेगळा खाद्यपदार्थ आणि वेगळा विषय आहे. आठवड्यातून किमान एकदोनदा आमच्याकडे रात्रीला तळलेले ओले बोंबिल असतातच. त्याबद्दल नंतर कधीतरी स्वतंत्रपणे लिहिता येईल.

चिकनच्या दुकानांच्या मानाने मासळीची दुकाने तुरळक असतात. मात्र आमच्या कॉलनीच्या तोंडालाच मासळीचे मोठे दुकान आहे. तिथे शनिवारी आणि रविवारी लोकांची झुंबड तुम्ही एकदा पाहायला हवी.

तर श्रीरामपुरला शुक्रवारी दुपारी पाचच्या दरम्यान आठवडी बाजारात बाईचे बोट धरून मी जायचो तेव्हा सर्व पदार्थ घेतल्यानंतर सर्वात शेवटी सुकट आणि सुक्या बोंबलाची खरेदी व्हायची. शुक्रवारी आमच्या घरी कधीही मटण शिजत नसायचे वा खाल्ले जात नसे. त्याला कारण म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारचा संबंध. गंमत म्हणजे मात्र मासे किंवा अंडे या पदार्थांना वशटचा दर्जा नसायचा, त्यामुळे हे पदार्थ शुक्रवारी वर्ज्य नसायचे.

घरी आल्यावर सगळा बाजार पिशवीतून बाहेर काढल्यावर बाई सुके बोंबील साफ करायची, काटेरी डोके आणि शेपूट काढून निम्मे बोंबिल वेगळे काढून ठेवायची आणि बाकीच्या बोंबलाचे त्याच रात्री काळा मसाला घालून कालवण करायची. दर शुक्रवारी आणि शनिवारी बाई आणि दादांचा उपास असायचा, या दिवसभराच्या उपवासाला फक्त पाणी आणि चहा चालायचा. तो उपास बोंबलाच्या या चमचमीत कालवणाने सुटायचा.

मग आठवड्यातून एकदा सुक्या बोंबलाची तर दोनदा सुकटाची चटणी नाश्त्याला असायची. या दोन्ही चटण्या करायची ती पध्दत आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. सुके बोंबील आधी पाट्यावर वरवंट्याने टेचून घ्यायचे, ते बारीक चपटे झाल्यावर हिरव्या किंवा लाल मिरच्या, लसूण घालून पाट्यावर वरवंटा फिरवून एकजिनसी बनवायचे आणि मग तव्यावर तेलाने मस्तपैकी परतून घ्यायचे.

सुकट चटणी करायची पध्दत जवळपास अशीच. बाजरीच्या भाकरीबरोबर मग ही बोंबलाची चटणी किंवा सुकटाची मस्त लागायची.

मी तसा काही `फुडी' वा खवय्या या सदरात मोडणारी व्यक्ती नाही. अशा फूडी लोकांना खाद्यपदार्थांची खास चव असते, खास आवडीनिवडी असतात, त्यांच्या जिभेला विशिष्ट पदार्थांची चव लगेच कळते. माझे तसे नाही. तरीसुद्धा सुकटाची चटणी हा माझा एक खास आवडीचा पदार्थ आहे.

मला आवडते म्हणून एकदा मी श्रीरामपूरहून गोव्याला परत जाण्यासाठी निघालो तेव्हा बाईने सुकटाची चटणी आणि बाजरीची भाकर बरोबर दिली होती. त्यावेळी त्याकाळच्या नॅरो-गेज रेल्वेने प्रवास करताना मिरज- लोंढा स्टेशनच्या दरम्यान रात्री नऊच्या आसपास वर बर्थवर बसलेलो असताना जेवणाचा डबा उघडल्यानंतर माझ्यावर काय प्रसंग गुदरला होता तो किस्सा मागे मी इथे सांगितला होता, त्याची पुनरावृत्ती टाळतो.

गोव्यात पावसाळा सुरू झाला की ताजी मासळी फारशी मिळत नाही तेव्हा मग घरात साठवून ठेवलेली सुकी मासळी जेवणात चव आणते. गोंयकरांच्या दररोजच्या जेवणात मासळी असायलाच हवी. मग ही सुकी मासळी - कधी तळलेली कधी नुसतीच भाजलेली - ताटात येते. हे सुके बोंबिल, तार्ली, बांगडा, सुरमई जेवणात आणि जीवनातसुद्धा चव आणतात.

गोव्यात बहुसंख्य सर्व लोकांना - यात सारस्वत मंडळींसुद्धा आलीच - मासे अत्यंत प्रिय असतात. गोव्यातल्या सारस्वत लोकांत सारस्वत ब्राह्मण तसेच सारस्वत ख्रिश्चनांचाही समावेश होतो. पणजी आणि मडगावसारख्या मतदारसंघांत या दोन्ही सारस्वतांची संख्या लक्षणीय आहे. वर्षातून काही ठराविक दिवशी जेवणात ताजे किंवा सुके मासे नसले तर खाणारे कसे कडू तोंड करतात हे गोव्यात शिकत असताना मी अनुभवले आहे.

गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत संरक्षणमंत्री होण्यासाठी बोलावून घेतले. केन्द्रात फक्त संरक्षणमंत्रीपदासाठी राज्यातील मुख्यमंत्री बोलावून घेण्याची प्रथा तशी यशवंतराव चव्हाण, शरद पवार आदींपासून आहे.

तर संरक्षणमंत्री पर्रीकरांचे मन राजधानीत कधी रमलेच नाही, याचे एक प्रमुख कारण म्हणजे नवी दिल्लीत ताजे मासे मुळी मिळतच नाही असे खुद्द पर्रीकरांनी सांगितले आहे.

त्यामुळे पहिली संधी मिळताच म्हणजे त्यांच्या अपरोक्ष गोव्यातल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे पानिपत झाल्यानंतर सत्तेचे नवी समीकरणे जुळवण्यासाठी पर्रीकर मायभूमीत परतले होते.

गोव्यातले माझे एक मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू यांनी आपल्या `मनोहर पर्रीकर, ऑफ द रेकॉर्ड' या पुस्तकात दिल्लीत माशाविना कासावीस झालेल्या पर्रीकरांचा एक किस्सा लिहिला आहे.

"दिल्लीत त्यांना ताजे मासे मिळणे मुश्किल झाले होते. 'जलबिन मछली' अशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती.'' गोव्यातून त्यांना भेटण्यासाठी दिल्लीचे येणाऱ्या कोणाही जवळच्या व्यक्तीने विचारणा केली तर `विसवणाची तळलेली पोस्ता' (रवा लावून तव्यावर तळलेली सुरमई ) आणण्यास ते प्रेमाने सांगत असत असे वामन प्रभूंनी लिहिले आहे.

पर्रीकरांप्रमाणेच कालपरवा एका जवळच्या व्यक्तीने सुकट आणि बोंबलाची चटणी करून देण्याचा आग्रह केला म्हणून बाजारातून सुकट आणि सुके बोंबील आणले.

आमचे घर अगदी वरच्या मजल्यावर असल्याने या खाद्यपदार्थांचा घमघमाट संपूर्ण इमारतीत पसरत नाही. ज्यांना हे पदार्थ आवडतात त्यांच्या मात्र तोंडाला पाणी सुटत असते.

Friday, January 19, 2024


बांगडा:

आजकाल बाजारात बांगडा नेहमीपेक्षा खूप मोठ्या आकारात मिळतो आहे. आणि बऱ्यापैकी स्वस्त. इतर कुठल्याही मासळीपेक्षा मला स्वतःला बांगडा अधिक आवडतो.

याचे कारण म्हणजे साफ करायला, तळायला आणि करीमध्ये वापरायला बांगडा मला अधिक सोयिस्कर वाटतो. अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणाजे चवीबद्दल तर काय बोलणार? .
ओले बोंबिल पण मला आवडतात. तेसुद्धा साफ करायला एकदम सोयिस्कर. मात्र तळायला भयंकर वेळ लागतो आणि रात्री आपण घाईत असलो तर अशा प्रकारचे वेळखाऊ मासे नकोच वाटतात.
तर काल संध्याकाळी एक किलो बांगडा घेतले, त्या किंगसाईझ आकारामुळे किलोत जेमतेम सहा आले.
बांगडा मी नेहेमी दुकानातून साफसूफ आणि पूर्ण डोके कापून घेतो, मात्र चिरे न मारता. त्यामुळे घरी आल्यावर पुन्हा एकदा ते साफ करता येतात. कल्ले वगैरे नीट साफ करता येतात,
काल घरी साफ करताना काही बांगड्याच्या पोटांत जाडजूड अंडी मिळाली. ही अंडी सुद्धा तळून चवीने खाल्ली जातात हे मला माहित आहे मात्र मी स्वतः खात नाही. तरीही ती अंडी टाकून देताना वाईट वाटलेच.
मागे एकदा एका जणाला कोंबडीच्या पाचसहा अंडयांतील पिवळे बलक (हानिकारक किंवा कोलेस्ट्रॉल असणारे म्हणून) असेच टाकून देताना पाहिले होते आणि वाईट वाटले होते, त्याची आठवण झाली.
तर मग बांगडे चिरून, त्यावर मस्तपैकी मसाला चोपडून मंद आचेवर तळून घेतले. अन मग ...
यापैकी तळलेले काही बांगडे करीसाठी वापरले. ओले खोबरे घालून तयार केलेली फिशकरी आणि राईस माझी एक आवड आहे.
Camil Parkhe January 18, 2024

Saturday, January 6, 2024

पुणे कॅम्प.


पुण्यात अलका चौकातून पाच रस्ते फुटतात, त्यापैकी लक्ष्मी रोड एक . या लक्ष्मीरोडचे दुसरे तोंड शहराच्या दुसऱ्या एका टोकाला उघडते, हे दुसरे टोक म्हणजे पुणे कॅम्प.

तिसेक वर्षांपुर्वी गोव्यातून मी पुण्यात राहायला आलो तेव्हा डेक्कनला रानडे इन्स्टिट्यूटसमोर लॉजवर राहायचो आणि कॅम्पात अरोरा टॉवरमध्ये `इंडियन एक्सप्रेस'च्या ऑफिसात कामाला जायचो. दररोज डेक्कनहून सुटणाऱ्या ७४ आणि १७४ या बस नंबरने लक्ष्मी रोडच्या या टोकाहून त्या टोकापर्यंत जायचो.
कामानिमित्त आजही शहराच्या या दोन्ही भागांना मला जावे लागते.
एक्सप्रेसला असताना दुपारी साडेचारनंतर चहासाठी `महानाझ'ला जाणे व्हायचे. इराणी हॉटेल म्हणजे काय हे मला तेव्हा पहिल्यांदा कळाले. श्रीरामपुरात किंवा गोव्यात इराणी हॉटेल असण्याचा संबंधच नव्हता. माझे अत्यंत आवडीचे हाफ फ्राईड एग किंवा बुल्स आय `महानाझ'ला मिळायचे. तिथे चिकन समोसेसुद्धा मिळायचे. त्याकाळात म्हणजे १९८९ ला एक चिकन समोसा फक्त दहा रुपयाला.
माझ्या लॉजवर मी आणि एक्सप्रेसमधली इतर बातमीदार जोडीदारांनीं जेवणाचे डबे लावले होते पण महिन्यातून अनेकदा हॉटेलांत जेवण व्हायचे.
रुपाली हॉटेलात चारपाच पुऱ्या, दाल, सुकी भाजी आणि दही असलेली राईस प्लेट (किंमत २० रुपये) आणि क्वचितच दाल- राईस (किंमत १२ रुपये).
कधीतरी रात्री बातम्या देऊन झाल्यानंतर एका इराणी हॉटेलात चिकन बिर्याणी किंवा चिकन मसाला यावर ताव मारला जायचा. डेक्कनला गुडलक हॉटेलसमोर इराणी `लकी' हॉटेलांत असेच चिकनचे अनेक चविष्ट पदार्थ खायला मिळायचे.
या झाल्या खूप जुन्या गोष्टी.
अलिकडच्या काळात माझा पुन्हा डेक्कन जिमखाना, टिळक चौक आणि पुणे कॅम्पातला वावर वाढला आहे. पुणे कॅम्पचे एक प्रवेशद्वार असलेल्या क्वार्टर गेटपासून मी चालायला सुरुवात करतो आणि वेस्ट एन्डला पोहोचतो. इथे लक्ष्मी रोड संपतो.
क्वार्टर गेटपासून खऱ्या अर्थाने पुणे कॅम्पची संस्कृती सुरु होते.
त्यादिवशी संध्याकाळी खूप भूक लागली आणि एका कोपऱ्यात एक बेकरी दिसली. पॅटिस किंवा समोसा खाण्याच्या इराद्याने तिथे गेलो तर एक सुखद धक्का बसला. तिथे चक्क एग पॅटीस होते !
मला एकदम पणजीतल्या एग पॅटीसबद्दल प्रसिद्ध असलेल्या गीता बेकरीची आठवण झाली. एग पॅटीस विकणाऱ्या किती बेकरी तुम्हाला माहित आहेत?
इथला हा सगळा परिसर चक्क खाऊ गल्ली असावी असा समज होईल इतक्या संख्येने येथे अनेक इटिंग जॉइंट्स आहेत. रस्त्यावरच असलेल्या `गार्डन वडा पाव' येथे लोक चक्क रांगा लावून कुपन घेऊन किंग साईझ वडा पाव घेत असतात.
शहरात पेठांमध्ये जागोजागी अमृततुल्य हॉटेल्स दिसतात येथे कँपात बन मस्का वगैरे पदार्थ असणारी इराणी हॉटेल्स आहेत. त्यांचे फर्निचर खुर्च्या असा काही जुना वेगळाच थाट अजूनही राखला आहे.
काही आठवड्यापूर्वी मेट्रोने वनाज स्टेशनवर उतरलो होतो, भूक लागली म्हणून एखाद्या हॉटेलचा, डिसेंट स्नॅक्स जॉईन्टचा शोध घेऊ लागलो तर एक किलोमीटर अंतरापर्यंत काहीच दिसले नाही. त्यावेळी पुणे कॅम्प किती खवैय्येप्रेमी आहे याची जाणिव झाली होती.
या पुणे कॅम्पातले एक वैशिष्ट्य म्हणजे इथली ही हॉटेल्स आणि इतर दुकाने चालवणारी किंवा दुकानांची मालक असणारे अनेक लोक मुस्लीम आहेत, मूळचे इथलेच आहेत आणि आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पुढारलेले आहेत.
एमजी रोडला `मार्झोरिन' मध्ये आवडीची नॉन व्हेज पदार्थ मिळतात. स्नॅक्सऐवजी भरपेट खायचे असले तर `दोराबजी' मध्ये गरमागरम चिकन समोसे, चिकन कटलेट्सआणि कबाब असे जिभेला तृप्त करतील कितीतरी पदार्थ मिळतात.
पुणे कॅम्पात गेलो आणि रिकामीपोटी घरी परतलो असे सहसा कधी होत नाही. अनेकदा घरी पार्सलसुद्धा आणले जाते..
असे `पुणे कँम्प' जागोजागी उभे राहायला हवेत.
Camil Parkhe January 4, 2024

Friday, July 14, 2023

May be an image of biryani

खरेखुरे मटणजीवी. दोनेक वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानीत शांततामय आंदोलन करणाऱ्या शेतकरी लोकांना `आंदोलनजीवी' अशी शेलकी पदवी प्रदान केली होती. त्यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अनिल दहिवाडकर यांनी काही समाजमाध्यम गृप्सवर `ख्रिस्ती लोक मटनजीवी आहेत' असा एक शेरा मारला होता.

या टिपण्णीबद्दल आणि नंतर झालेल्या काही आदानप्रदानानंतर दहिवाडकर सरांना त्या ग्रुपमधून काढून टाकण्यात आले होते.
आज का कुणास ठाऊक, काही तरी कारणामुळे `मराठी ख्रिस्तीजनांचे मटणप्रेम' हा विषय एका ग्रुपवर पुन्हा चर्चिला गेला अन् त्या ग्रुपवर आपल्याच समाजातील या खास प्रेमाबद्दल खूप काही विनोद आणि गंमतीदार प्रसंग सांगितले गेले.
एकाच समाजघटकाच्या खाद्यसंस्कृतीबद्दल त्याच समाजघटकाचे लोक हास्यविनोद करत असल्याने सुदैवाने यात कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच नव्हता.
त्यानंतर डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी खालील एक प्रसंग सांगितला होता:
``माझ्या आत्याचे यजमान चांगला उपदेश करीत असले तरी चर्चला जाण्यापूर्वी ती त्यांना तंबी देत असे :
"उपदेश फार लांबवू नका. तुम्हांला मटन आणायला जायचंय. घरी याल, झगा उतरवाल मग जाल. उशीर होईल. मटन चांगलं मिळणार नाही. तुम्ही काय, तो देईल ते मुकाट्याने घेऊन याल. ते शिजेपर्यंत पोरं भूक भूक करून मला भंडावून सोडतील!"
आत्याच्या यजमानाइतका स्थितप्रज्ञ चेहरा मी दुसरा पाहिला नाही आणि न कंटाळता दर रविवारी नवऱ्याला हेच ऐकवणारी पाळकीणही मी पाहिली नाही.
तरीही माझी खात्री आहे, त्याकाळी घरोघरी पळसाला पानं तीनच असणार!--''
अनुपमा उजगरे"
कुठल्यातरी पुस्तकात वाचलेले आठवते. एका चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेत प्रवचनादरम्यान या मटण प्रेमाबद्दल बोलताना धर्मगुरू सात्विक रागाने कडाडले होते.
``आपले लोक एकवेळ रविवारच्या प्रार्थनेला येण्याचे चुकतील, पण या दिवशी मटण खाण्याचे कधीही विसरणार नाहीत.''
फादरांचे हे वाक्य किती तंतोतंत खरे होते याचा प्रत्यय अनेकदा येत असतो.
रविवार म्हणजे पवित्र दिवस. देवाने आठवडाभर श्रम करून अनुक्रमे प्रकाश, अंधार, महासागर, जमीन, महासागरातील जीव आणि पृथ्वीवरील सरपटणारे आणि इतर प्राणी, आकाशात उडणारे पक्षी निर्माण केले आणि सातव्या दिवशी थकल्याभागल्या देवाने आराम केला तो पवित्र दिवस, शब्बाथ.
देवाने मोझेसला लिहून दिलेल्या दहा आज्ञांमध्ये पाचवी आज्ञा `शब्बाथ पवित्र पाळ' ही आहे.
या शब्बाथ दिवशी काहीही करायचे नसते असे ज्यू लोक मानत असत. ``शब्बाथ दिवशी कुणी व्यक्ती विहिरीत पडली तर तुम्ही तिला बाहेर काढणार कि नाही? असा एक प्रश्न त्यामुळे येशू ख्रिस्ताने सनातनी लोकांना विचारला होता.
इस्राएलच्या पवित्र भूमीला भेट देऊन आलेल्या एका मित्राने जेरुसलेम येथे शब्बाथ दिवशी काय भोगावे लागले होते याचे अनुभव मला सांगितले होते.
ज्यू आणि इस्लाम धर्मियांच्या दृष्टीने शब्बाथ म्हणजे पवित्र वार वेगवेगळे आहेत, ख्रिस्तीजन रविवार हा पवित्र दिवस मानतात.
``रविवार पवित्र पाळ '' असे लहानपणी आम्ही शिकलो. (माझ्या लहानपणी माझी आई रविवारला `आईतवार' (आदित्यवार?) आणि गुरुवारला `बस्तरवार' (बृहस्पतीवार ?) म्हणायची, हळूहळू हे शब्द तिच्या शब्दकोशातून बारगळले. ) त्यानुसार रविवारी श्रीरामपुरला आमचे `पारखे टेलर्स' दुकान बंद असायचे, लगीनसराई आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांचा अपवाद वगळता.
त्याशिवाय दर रविवारी सकाळी आमच्या घरापासून दीडदोन किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळात जाणे होई आणि परत येताना बरोबर नेलेल्या पिशवीतल्या डब्यातून घरी मटण आणले जाई. पाऊस असो, थंडी असो, या दोन्ही गोष्टी कधी चुकल्या असे मला आठवत नाही.
(` मटण' हा शब्द मराठीतील सर्वसामान्य शब्द म्हणून वापरला आहे, जसे `कोंबडीचे मटण .. )
गोव्यातल्या कॉलेजजीवनात आणि नंतर नोकरीच्या दीर्घ वास्तव्यात तर जेवणात दररोज आणि दोन्ही वेळेस मटण किंवा मासे असायचे. ख्रिसमस आणि इस्टर या सारख्या फेस्तांना पोर्क विंदालू, पोर्क सोरपोतेर सारख्या चमचमित पदार्थांची मेजवानी..
`रविवार पवित्र पाळ' या आज्ञेत ` या दिवशी मटण खा' अशी उपसूचना कुणी, कधी घुसडवली याची मला कल्पना नाही. मात्र अनेक ठिकाणी ही आज्ञा इमानेइतबारे पाळली जाते हे खरेच आहे.
त्यातच हल्ली जगाच्या अनेक भागांत रविवारी साप्ताहिक सुट्टी दिली जात असल्याने हल्ली जवळजवळ बहुतेक मांसाहारी लोक या दिवशी मटणसेवन किंवा नॉनव्हेज खात असतात.
माझ्या घराशेजारीच असलेल्या मासळीच्या आणि मटणाच्या दुकानांत रविवारी सकाळपासून लोकांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या असतात.
खरेखुरे मटणजीवी.