छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
सत्तरच्या दशकापासून आधी मुंबईच्या अन नंतर पूर्ण महाराष्ट्रात गेली पन्नासाहून अधिक वर्षे राजकारणात चमकत राहिलेल्या भुजबळ यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेत आपली ताकद दाखवून दिली आहे.
सत्तरच्या दशकात मनोहर जोशी आणि छगन भुजबळ हेच शिवसेनेचे दोन चेहेरे पूर्ण महाराष्ट्राला परिचित होते.
भुजबळ यांनी नंतर शिवसेनाच सोडली आणि काँग्रेसचा पंजा हाती धरला.
त्यावेळी संतापलेल्या शिवसैनिकांच्या रोषामुळे भुजबळांना अनेक दिवस अज्ञातवासात राहावे लागले होते.
शिवसेनेच्या बाळा नांदगावकर यांनी माझगाव मतरदारसंघात त्यांचा पराभव केला तेव्हा भुजबळ आता संपले असेच चित्र निर्माण झाले होते.
मात्र तसे झाले नाही .
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत भुजबळ कायम सत्तेत होते आणि महत्त्वाची मंत्रीपदे बाळगून होते.
काही काळ तर ते उपमुख्यमंत्रीसुद्धा होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकार आले तेव्हा भुजबळ यांनी त्याच्या आयुष्यातील अत्यंत खडतर काळ अनुभवला.
जवळजवळ अडीच वर्षे त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात ठेवण्यात आले होते.
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील झाली तेव्हा भुजबळसुद्धा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले होते.
महायुती सरकार बहुमताने सत्तेवर आल्यानंतर मात्र गेली काही महिने ते सत्तेबाहेर ताटकळत उभे होते.
सत्त्यात्तर वर्षे वयाच्या छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली.
राज्यातील विविध स्तरांवरच्या सत्तेत सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम करणाऱ्या मोजक्या राजकारणी व्यक्तींमध्ये भुजबळ यांचा समावेश आहे.
Camil Parkhe May 20, 2025