Did you like the article?

Saturday, February 24, 2024

मनोहर पर्रीकर 

दिल्लीत ताजे मासे मिळत नाहीत म्हणून मंत्रीपद सोडून गोव्यात परतणारे पर्रीकर...

जवळच्या व्यक्तीने विचारणा केली तर `विसवणाची तळलेली पोस्ता' आणण्यास ते प्रेमाने सांगत असत असे वामन प्रभूंनी लिहिले आहे.
Manohar Parrikar
Manohar Parrikar

आज खूप दिवसांनी खरे तर काही महिन्यांनी सुकटाची चटणी नाश्त्याला खाल्ली. ही चटणी तशी घरी काल रात्रीच तयार झाली होती पण तेव्हाच ठरवलं होतं नाश्त्याला खायची म्हणून. सकाळी श्रीधरनगर बागेत फिरायला गेलो तेव्हा छानपैकी कोवळे ऊन पडले होते आणि बॅडमिंटन खेळण्यासाठी एक ताज्या दमाचा पार्टनर गडीसुद्धा मिळाला. छान घामाघूम झालो होतो पण तेव्हाही मनात घरी असलेल्या सुकटाच्या चटणीची आठवण होतीच. मला स्वतःलाच त्याबद्दल हसूही आले होते.

लहानपणापासून माझ्या एक अत्यंत आवडीचा असलेला हा पदार्थ आजही खास आवडीचा आहे. सुकट आणि बोंबलाची चटणी हे दोन्ही पदार्थ बरोबरीने येतात, ज्याला सुकट आवडते त्याला बोंबीलसुद्धा आवडणार असे मला वाटते. इथे मी सुके बोंबीलबद्दल बोलतो आहे, ओले बोंबील हा वेगळा खाद्यपदार्थ आणि वेगळा विषय आहे. आठवड्यातून किमान एकदोनदा आमच्याकडे रात्रीला तळलेले ओले बोंबिल असतातच. त्याबद्दल नंतर कधीतरी स्वतंत्रपणे लिहिता येईल.

चिकनच्या दुकानांच्या मानाने मासळीची दुकाने तुरळक असतात. मात्र आमच्या कॉलनीच्या तोंडालाच मासळीचे मोठे दुकान आहे. तिथे शनिवारी आणि रविवारी लोकांची झुंबड तुम्ही एकदा पाहायला हवी.

तर श्रीरामपुरला शुक्रवारी दुपारी पाचच्या दरम्यान आठवडी बाजारात बाईचे बोट धरून मी जायचो तेव्हा सर्व पदार्थ घेतल्यानंतर सर्वात शेवटी सुकट आणि सुक्या बोंबलाची खरेदी व्हायची. शुक्रवारी आमच्या घरी कधीही मटण शिजत नसायचे वा खाल्ले जात नसे. त्याला कारण म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारचा संबंध. गंमत म्हणजे मात्र मासे किंवा अंडे या पदार्थांना वशटचा दर्जा नसायचा, त्यामुळे हे पदार्थ शुक्रवारी वर्ज्य नसायचे.

घरी आल्यावर सगळा बाजार पिशवीतून बाहेर काढल्यावर बाई सुके बोंबील साफ करायची, काटेरी डोके आणि शेपूट काढून निम्मे बोंबिल वेगळे काढून ठेवायची आणि बाकीच्या बोंबलाचे त्याच रात्री काळा मसाला घालून कालवण करायची. दर शुक्रवारी आणि शनिवारी बाई आणि दादांचा उपास असायचा, या दिवसभराच्या उपवासाला फक्त पाणी आणि चहा चालायचा. तो उपास बोंबलाच्या या चमचमीत कालवणाने सुटायचा.

मग आठवड्यातून एकदा सुक्या बोंबलाची तर दोनदा सुकटाची चटणी नाश्त्याला असायची. या दोन्ही चटण्या करायची ती पध्दत आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. सुके बोंबील आधी पाट्यावर वरवंट्याने टेचून घ्यायचे, ते बारीक चपटे झाल्यावर हिरव्या किंवा लाल मिरच्या, लसूण घालून पाट्यावर वरवंटा फिरवून एकजिनसी बनवायचे आणि मग तव्यावर तेलाने मस्तपैकी परतून घ्यायचे.

सुकट चटणी करायची पध्दत जवळपास अशीच. बाजरीच्या भाकरीबरोबर मग ही बोंबलाची चटणी किंवा सुकटाची मस्त लागायची.

मी तसा काही `फुडी' वा खवय्या या सदरात मोडणारी व्यक्ती नाही. अशा फूडी लोकांना खाद्यपदार्थांची खास चव असते, खास आवडीनिवडी असतात, त्यांच्या जिभेला विशिष्ट पदार्थांची चव लगेच कळते. माझे तसे नाही. तरीसुद्धा सुकटाची चटणी हा माझा एक खास आवडीचा पदार्थ आहे.

मला आवडते म्हणून एकदा मी श्रीरामपूरहून गोव्याला परत जाण्यासाठी निघालो तेव्हा बाईने सुकटाची चटणी आणि बाजरीची भाकर बरोबर दिली होती. त्यावेळी त्याकाळच्या नॅरो-गेज रेल्वेने प्रवास करताना मिरज- लोंढा स्टेशनच्या दरम्यान रात्री नऊच्या आसपास वर बर्थवर बसलेलो असताना जेवणाचा डबा उघडल्यानंतर माझ्यावर काय प्रसंग गुदरला होता तो किस्सा मागे मी इथे सांगितला होता, त्याची पुनरावृत्ती टाळतो.

गोव्यात पावसाळा सुरू झाला की ताजी मासळी फारशी मिळत नाही तेव्हा मग घरात साठवून ठेवलेली सुकी मासळी जेवणात चव आणते. गोंयकरांच्या दररोजच्या जेवणात मासळी असायलाच हवी. मग ही सुकी मासळी - कधी तळलेली कधी नुसतीच भाजलेली - ताटात येते. हे सुके बोंबिल, तार्ली, बांगडा, सुरमई जेवणात आणि जीवनातसुद्धा चव आणतात.

गोव्यात बहुसंख्य सर्व लोकांना - यात सारस्वत मंडळींसुद्धा आलीच - मासे अत्यंत प्रिय असतात. गोव्यातल्या सारस्वत लोकांत सारस्वत ब्राह्मण तसेच सारस्वत ख्रिश्चनांचाही समावेश होतो. पणजी आणि मडगावसारख्या मतदारसंघांत या दोन्ही सारस्वतांची संख्या लक्षणीय आहे. वर्षातून काही ठराविक दिवशी जेवणात ताजे किंवा सुके मासे नसले तर खाणारे कसे कडू तोंड करतात हे गोव्यात शिकत असताना मी अनुभवले आहे.

गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत संरक्षणमंत्री होण्यासाठी बोलावून घेतले. केन्द्रात फक्त संरक्षणमंत्रीपदासाठी राज्यातील मुख्यमंत्री बोलावून घेण्याची प्रथा तशी यशवंतराव चव्हाण, शरद पवार आदींपासून आहे.

तर संरक्षणमंत्री पर्रीकरांचे मन राजधानीत कधी रमलेच नाही, याचे एक प्रमुख कारण म्हणजे नवी दिल्लीत ताजे मासे मुळी मिळतच नाही असे खुद्द पर्रीकरांनी सांगितले आहे.

त्यामुळे पहिली संधी मिळताच म्हणजे त्यांच्या अपरोक्ष गोव्यातल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे पानिपत झाल्यानंतर सत्तेचे नवी समीकरणे जुळवण्यासाठी पर्रीकर मायभूमीत परतले होते.

गोव्यातले माझे एक मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू यांनी आपल्या `मनोहर पर्रीकर, ऑफ द रेकॉर्ड' या पुस्तकात दिल्लीत माशाविना कासावीस झालेल्या पर्रीकरांचा एक किस्सा लिहिला आहे.

"दिल्लीत त्यांना ताजे मासे मिळणे मुश्किल झाले होते. 'जलबिन मछली' अशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती.'' गोव्यातून त्यांना भेटण्यासाठी दिल्लीचे येणाऱ्या कोणाही जवळच्या व्यक्तीने विचारणा केली तर `विसवणाची तळलेली पोस्ता' (रवा लावून तव्यावर तळलेली सुरमई ) आणण्यास ते प्रेमाने सांगत असत असे वामन प्रभूंनी लिहिले आहे.

पर्रीकरांप्रमाणेच कालपरवा एका जवळच्या व्यक्तीने सुकट आणि बोंबलाची चटणी करून देण्याचा आग्रह केला म्हणून बाजारातून सुकट आणि सुके बोंबील आणले.

आमचे घर अगदी वरच्या मजल्यावर असल्याने या खाद्यपदार्थांचा घमघमाट संपूर्ण इमारतीत पसरत नाही. ज्यांना हे पदार्थ आवडतात त्यांच्या मात्र तोंडाला पाणी सुटत असते.

No comments:

Post a Comment