Did you like the article?

Showing posts with label Mahatma Jotiba Phule. Show all posts
Showing posts with label Mahatma Jotiba Phule. Show all posts

Sunday, March 12, 2023

आद्य ख्रिस्ती मिशनरी आणि त्यांचे शिक्षणकार्य

अमेरिकन मराठी मिशनच्या गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या तीन व्यक्ती आधुनिक काळात भारतात मुंबईच्या बंदरावर १२ फेब्रुवारी १८१३ रोजी पाऊल ठेवणारे पहिले तीन मिशनरी होते. अमेरिकन मराठी मिशनने देशात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडण्याचे मोठे योगदान त्यांनी केले. त्यांच्यानंतर काही वर्षांतच स्कॉटिश मिशनरींनीही पश्चिम किनाऱ्यावर, पुण्यात आणि -मुंबईत मुलींच्या शाळा सुरू केल्या.

या शाळा सर्वांना खुल्या होत्या. ख्रिस्ती मिशनरींच्या धोरणांनुसार स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे अशाप्रकारे पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती.
मात्र ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी आलेले मिशनरी आणि त्यांनी मुलांमुलींच्या शाळा सुरु करणे आणि एत्तदेश्शीयांच्या शिक्षणप्रसारात रस घेणे याचा काय संबंध असा प्रश्न उभा राहू शकतो. अमेरिकन मराठी मिशनच्या धर्मप्रसाराच्या कार्याबाबत १८८१च्या मेमोरियल पेपरमध्ये लिहिताना रेव्हरंड एस. बी. फेयरबँक यांनी यासंदर्भांत म्हटले आहे: ``मिशनरी कार्य करताना मिशनरींनीं तीन बाबींवर भर दिला. त्यापैकी पहिले कार्य होते शिक्षण, दुसरे कार्य होते धर्माची शिकवण आणि तिसरे कार्य होते धर्मशास्त्रे आणि ख्रिस्ती साहित्य मराठी भाषेत छापणे. ‘’
श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' या आपल्या ग्रंथात म्हटले आहे : ``हॉल व नॉट हे मुंबईत राहिल्यानंतर व मराठी शिकल्यानंतर सन १८१५ मध्ये त्यांनी इंग्रजी शाळा काढली. त्यात प्रथम २५ मुले होती. याशिवाय दोन व्हर्नाक्युलर शाळांत ४० मुले होती, प्रथम त्यांना शिक्षक मिळण्यात अडचण पडली. पण पुढे दोन ब्राह्मण शिक्षक त्यांना मिळाले व ते व्हर्नाक्युलर शाळांत शिकवू लागले. पुढील वर्षी शाळांची संख्या वाढली व एकंदर ३०० विद्यार्थी झाले. इ. स. १८१८ मध्ये ११ शाळा व ६०० विद्यार्थी होते. ’’ हिंदुस्थानात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व जातीधर्माच्या आणि स्त्री-पुरुषांना साक्षर करणाऱ्या आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला.’’
सरोजिनी बाबर यांनी 'स्त्रीशिक्षणाची वाटचाल' या आपल्या पुस्तकात लिहिले आहे. ``ख्रिश्चन मिशनऱ्यांनीं खाजगी प्रयत्नांचे बळावर बंगाली मुलींना सार्वजनिक शाळा काढून देण्याचा प्रयत्न केला होता (इ. स. १८१९ व १८२४ मध्ये),'' ``इ.स. १८२१ मध्ये स्थापन झालेल्या कलकत्त्यामधील मुलींच्या शाळेत संपूर्ण वेळ शिक्षकाचे काम करण्यासाठी म्हणून कु. मेरीअँन कुक या इंग्लंडहून मुद्दाम आल्या होत्या व याच शाळेतून त्या इ स, १८४५ ला सेवानिवृत्तही झाल्या होत्या.''
सरोजिनी बाबर पुढे लिहितात : इ स १८२४ मध्ये अमेरिकन मिशनऱ्यांनी मुंबईस एतद्देशीय मुलींच्याकरिता म्हणून एक खास अशी स्वतंत्र शाळा स्थापन केली होती. मुंबई इलाख्यातील ही मुलींची पहिलीच शाळा होय. त्यानंतर दोनतीन वर्षांतच मुलींच्या शाळांनीही संख्या नवावर गेली व सुमारे ३०० मुली शिक्षण घेऊ लागल्या. इ स १८२९ मध्ये विद्यार्थिनींची संख्या ४०० वर गेली. त्या वेळच्या एका शाळेस जोडून मुलींचे वसतिगृहदेखील होते हे विशेष होय. ही शाळा मुंबईत भायखळ्यास चालू होती.''
अमेरिकन मराठी मिशनची भायखळ्याची ही शाळा आणि वसतीगृह सिंथिया फरार चालवत होत्या.
``इ स १८३०च्या सुमारास हिंदुस्थानभर खास मुलींच्या अशा तीस एक तरी शाळा स्थापन झाल्या होत्या आणि त्यांमधून ५०० च्या आसपास मुली शिक्षण घेत होत्या ही वस्तुस्थिती आहे. मिस कुक (मिसेस विल्सन ) यांच्या प्रयत्नामुळे इ स १८४० मध्ये बंगाल इलाख्यात ५०० मुली शिक्षण घेत होत्या हेही विशेष होय. त्याच साली प्रसिद्ध झालेल्या शिक्षण खात्याच्या वृत्तांतातील माहितीवरून त्यावेळी पुण्यात मुलींच्या पाच शाळा होत्या असे दिसते,'' असे सरोजिनी बाबर यांनी लिहिले आहे.
नरेंद्र चपळगावकर यांनी `सावलीचा शोध' या पुस्तकात स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन आणि त्याची पत्नी मार्गारेट यांच्या शिक्षणकार्याची माहिती दिली आहे. त्यानुसार ‘’स्कॉटिश मिशनने कोकणात मिशनकार्य सुरु केले होते. डोनाल्ड मिचेल हा मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचला होता, तेथे मराठी शिकून त्याने तेथे लगेच एक मराठी शाळा काढली. जेम्स मिचेल आणि अलेक्झांडर क्रॉफर्ड हे स्कॉटिश मिशनरीहि तेथे त्याच्या कामात सहभागी झाले. बाणकोट आणि हर्णै येथे स्कॉटिश मिशनचे कार्य चालू होते. सन १८२९ च्या दरम्यान या भागातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या. .
विल्सनची पत्नी मार्गारेट हर्णैला असताना स्कॉटिश मिशनने सुरू केलेल्या मुलींच्या शाळांत रस घेऊ लागली. हेच काम मुंबईत सुरु करण्याचे तिने ठरविले. अमेरिकन मराठी मिशनने त्यापूर्वीच मुंबईत मुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या. १८२९च्या सप्टेंबरात विल्सन दाम्पत्य मुंबईत आले आणि अंब्रोळीच्या मिशन हाऊसमध्ये त्यांनी शाळा सुरु केली. मुलींना मार्गारेट शिकवत असे, या शाळेत पहिल्या तीन महिन्यातच ५३ मुली शाळेत दाखल झाल्या होत्या. मार्गारेट विल्सन यांनी आपल्या घरातच मुलींची शाळा चालू केली होते, त्यापैकी काही मुली अपंग तर काही अनाथ होत्या.
मार्गारेटने पुढील सहा महिन्यांत सहा शाळा मुंबईत सुरु केल्या आणि या शाळांत १२५ मुली शिकत होत्या. या शाळांत सर्वाधिक हिंदू मुली होत्या, पारशी आणि मुस्लिम मुस्लीम मुलीही होत्या. प्रामुख्याने मराठी माध्यम होते. विल्सनने २९ मार्च १८३२ रोजी अंब्रोळी इंग्लिश स्कुल सुरु केली. या शाळेची परिक्षा सार्वजनिक रीतीने होई, या शाळेला नंतर कॉलेज डिव्हिजन जोडण्यात आले. या शाळेत इंग्रजी वाचन, व्याकरण, गणित, भूमिती, भूगोल इतिहास बायबल हे विषय शिकवले जात असत. हिंदुस्थानात अशा प्रकारे पहिल्यांदाच आधुनिक शिक्षणाचा पाया रचला जात होता. १९ एप्रिल १८३५ला मार्गारेटचे मुंबईतच निधन झाले.
रेव्हरँड आय बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या सुरुवातीपासून १८१३ ते १८८१ पर्यंत शैक्षणिक कार्याच्या लिहिलेल्या अहवालानुसार १८१५ च्या मे महिन्यात हिंदू मुलांच्या पहिल्याच आणि एकमेव शाळेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या नोंदीनुसार या मिशनरींच्या शाळेत अंदाजे २५ विद्यार्थी होते.
सावित्रीबाई फुले यांचे एक चरित्रकार असलेल्या मा. गो. माळी यांनी महात्मा फुले गौरव ग्रंथातल्या `क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले: काळ व कर्तृत्व' या लेखात म्हटले आहे:
`` एकोणिसाव्या शतकात स्त्री व अतिशूद्र यांच्या शिक्षणाचे कार्य करणे किती महाकठीण काम होते याची कल्पना येते. त्यातल्यात्यात पुण्यासारख्या ठिकाणी मुलांसाठी व अतिशूद्रांसाठी शाळा सुरू करणे आणि ती चालवून दाखविणे म्हणजे तर एक दिव्यच होते, प्राणावरचा प्रसंग होता. कारण पुणे म्हणजे एकोणिसाव्या शतकातील भटभिक्षुकांच्या भाकड व भोगळ लोकांचे माहेरघर, भटभिक्षुक निर्मित धर्म व धर्माचाराची राजधानी. मग अशा ठिकाणी स्त्रीशूद्रांना शिक्षण देण्यासाठी शाळा चालू करणे हे तत्कालीन मिशनरी लोकांनासुद्धा जमले नाही. मिस (मेरी अँन ) कुक यांनी १८२० साली बंगालमध्ये काही शाळा चालू केल्या. त्यानंतर त्या १८२९ साली मुंबईस आल्या. त्यांनी मि. वुईल्सन साहेबाशी लग्न केले. त्या मिसेस वुईल्सन झाल्या. मुंबई इलाख्यात त्यांनी सहा शाळा काढल्याची नोंद आढळते. त्या बाई मोठ्या जिद्दीच्या व कल्पक होत्या. पण पुण्यामध्ये मात्र त्याची डाळ शिजली नाही. १८३० साली पुण्यात त्यांनी शनिवारवाडयात शाळा काढल्याचा दाखला मिळतो. सरकारने ही जागा दिली होती. बार्ट फ्रिअर हा मिशनरी म्हणतो की या शाळेत फक्त आठ मुली येत होत्या. त्या ५-६ वर्षांपेक्षा मोठया नव्हत्या. तरीपण त्यांना शिकविण्याचे काम फार गुप्तपणे चाले. त्या शाळेत मुली शिकायला लपत-छपत येत व शाळेतून बाहेर पडताच चोरट्यासारखे घरी निघून जात. ही शाळा कशीबशी १८३२ पर्यंत चालली. शेवटी यशस्वी म्हणून गाजलेल्या मिसेस वुईल्सन हिला ती बंद करावी लागली.
त्या दरम्यान नुकत्याच खिस्ती झालेल्या मोडक नावाच्या व्यक्तीने महार- वाड्यात एक मुलीची शाळा काढली. परंतु कर्मठ भटभिक्षुकांनाही मागे टाकणान्या रुढीप्रिय शूद्र-अतिशूदांनी ती बंद करण्यास भाग पाडले. १८४४ साली चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनने मंगळवार पेठेत एक मुलींची शाळा काढली, तीत पुरोपियन शिक्षिका व पुरेशी साधनसामग्री अशी सर्व सोय केली होती. परंतु १८४७ साली ही शाळा बंद पडली. या तपशीलावरून पुण्यामध्ये एकोणिसाव्या शतकात स्त्री व शूद्र यांच्यासाठी शाळा सुरू करून त्यापुढे चालविण्याचा सर्व प्रयत्न विफल झाल्याचे दिसून येईल.’’
याच काळात अमेरीकन मराठी मिशनचे रेव्हरंड अँलन ग्रेव्हज आणि त्यांच्या पत्नी मेरी हे दाम्पत्य अनेक वर्षे महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी मुलींच्या शाळा चालवत असत.
`सावलीचा शोध' या पुस्तकात नरेंद्र चपळगावकर यांनी स्कॉटिश मिशनच्या शिक्षणकार्याविषयी माहिती दिली आहे. डोनाल्ड मिचेल हा मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचला होता, तेथे मराठी शिकून त्याने तेथे लगेच एक मराठी शाळा काढली. बाणकोट आणि हर्णै येथे १८२९ च्या दरम्यान स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या असे चपळगावकर यांनी लिहिले आहे.
अमेरिकन मराठी मिशनच्या वतीने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडण्यात आली. देशाच्या या भागात मुलीची ही पहिलीच शाळा होती. गंगाबाई या नावाच्या एक भारतीय शिक्षिका या शाळेत शिकवत असत. मुलींची ही शाळा उघडताच मुंबईतल्या दोन ब्रिटिश महिलांनी या शाळेचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली. दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली. या रोगाच्या साथीत मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. मृत गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने ही शाळा बंद करावी लागली.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८८१च्या वर्धापनानिमित्त एका अहवालात मिसेस एल. एस. गेट्स लिहितात : ``माझ्या माहितीनुसार मुलींसाठी पहिली शाळा पश्चिम भारतात १८२४ साली स्थापन करण्यात आली. गंगा या नावाच्या मुलीला मिशनरी महिलांनी शिकवले होते. मुलींच्या या पहिल्या शाळेत शिकवण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. काही ब्रिटिश महिला आणि पुरुषांनी या शाळेचा आर्थिक भर उचलण्याची तयारी दाखवली होती. मात्र कॉलरा साथ आली आणि निष्ठावान गंगा यांचा या प्राणघातक रोगाने बळी घेतला.''
या पहिल्या मुलींच्या शाळेतल्या पहिल्या एतद्देशीय महिला शिक्षिका असलेल्या या गंगाबाईंबद्दल इतर काहीच माहिती उपलब्ध नाही हे सांगायला आम्हाला खूप खेद होतो असे अमेरिकन मराठी मिशनच्या या वर्धापनावेळी सांगितले गेले. या गंगाबाई स्वतः कुठे शिकल्या होत्या? स्त्रीशिक्षणाबाबत प्रचलित समाजात अत्यंत प्रतिकूल भावना असताना या मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्याचे धाडस त्यांनी कसे केले? अशी अनेक प्रश्ने काळाच्या उदरात गडप होऊन आतापर्यंत अनुत्तरित राहिली आहेत असे या अहवालात म्हटले आहे.
यदाकदाचित भविष्यकाळातील संशोधनातून देशातील आधुनिक काळातील या पहिल्यावहिल्या एतद्देशीय शिक्षिकेबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकेल.
अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईत टाऊन हॉल येथे ७ नोव्हेंबर १९१३ रोजी झालेल्या शताब्दीसोहोळ्यात भारतीय ख्रिश्चनांच्या वतीने बोलताना बापुराव एन आठवले (बीए, एलएलबी, जेपी) यांनीं म्हटले होते ``
``भारतीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने येथे बोलताना अमेरीकन मराठी मिशनच्या आमच्या बंधूंनीं केलेल्या कार्याचे आम्ही कौतुक करतो आणि या मिशनच्या शताब्दी सोहोळ्यात आनंदाने सहभागी होत आहोत. या मुद्द्यावर बोलत असताना या देशात स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ करणाऱ्या अमेरिकन मराठी मिशनचे आपण सर्वांनी स्तुती करावी असे मी तुम्हा सर्वांनां आवाहन करत आहे. गॉर्डन हॉल आणि सॅम्युएल नॉट यांच्या १८१३ सालच्या आगमनानंतर केवळ अकरा वर्षातच भायखळा येथे मुलींची पहिली शाळा गंगाबाई नावाच्या महिला शिक्षिकेच्या देखरेखीखाली सुरु झाली.. त्याकाळी अंधश्रद्धेच्या खडकातून बाहेर पडलेला हा पाण्याचा झरा वाढत्या ताकदीने देशाच्या कानाकोपऱ्यांत इतक्या प्रमाणात वाढला आहे कि आता आपण पाहतोच आहे कि महिला हल्ली त्यांच्यासाठी स्वतंत्र कॉलेजेस आणि विद्यापीठे उघडण्यात यावी यासाठी संघर्ष करत आहेत.''
``मराठीत उपलब्ध असलेल्या एकोणिसाव्या शतकाच्या इतिहासाचा जेव्हा आपण मागोवा घेतो तेव्हा भारतात झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या आगमनाने येथील एकूण जीवनांत जे काही बदल झाले त्यांचा सविस्तर, साद्यन्त, तर्कशुद्ध आणि तटस्थ इतिहासच लिहिला गेला नाही याची आपणास जाणीव होते असे ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक सुधीर रसाळ यांनी म्हटले आहे.
`` भारताच्या सामाजिक इतिहासाची कितीतरी सामग्री ख्रिस्ती साहित्यात दडलेली आहे. जोपर्यंत ख्रिस्ती साधनसामुग्रीचा वापर करून एकोणिसाव्या शतकाचा इतिहास लिहिला जात नाही तोपर्यंत तो पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही,’’ असे सुधीर रसाळ यांनी माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या `सावलीचा शोध’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.
ही टिपण्णी सर्वार्थाने खरी आहे याची प्रचिती अमेरीकन मराठी मिशनच्या कार्याचा आणि या संस्थेने मागे ठेवलेल्या अमूल्य दस्तऐवजांचा अभ्यास करताना येते.
मुंबईत भायखळा इथली मुलीची ही पहिली शाळा बंद पडल्यावर लगेचच पुन्हा नव्या जोमाने मुलींची शाळा उघडण्याचे प्रयत्न झाले.
हिंदुस्थानात ब्रिटिश अमदानीत सर्वप्रथम आगमन केलेल्या आणि या देशात पहिल्यांदाच मुलं-मुलींसाठी शाळा सुरु करणाऱ्या आद्य मिशनरी गॉर्डन हॉल यांचे २० मार्च १८२६ रोजी वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी नाशिकजवळ दोडी दापुर या गावी निधन झाले, हा अमेरिकन मराठी मिशनला मोठा धक्का होता.
त्यानंतर अमेरिकेतून या मिशनच्या आणखी काही मिशनरींचे मुंबईत आगमन झाले. डेव्हिड ओ अँलन, त्यांच्या पत्नी एज्युबा अँलन, सायरस स्टोन, त्यांच्या पत्नी अँटोसा स्टोन यांचे २९ डिसेंबर १८२७ रोजी आगमन झाले होते आणि त्यांच्या बरोबर आणखी एक व्यक्ती होती.
ती व्यक्ती म्हणजे स्टोन यांच्या जवळच्या नातेवाईक, बहुधा चुलतबहिण, (कझन ) असलेल्या मिस सिंथिया फरार. हिंदुस्थानात येणाऱ्या पहिल्या अविवाहित महिला ख्रिस्ती मिशनरी.
सिंथिया फरार यांची एक अत्यंत महत्त्वाची ओळख म्हणजे समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख या दोघींच्या या शिक्षिका.
(पूर्वार्ध)

 सिंथिया फरार हे नाव कधी कानांवर पडलं आहे का? कधी, कुठं हे नाव वाचण्यात आले आहे का? सिंथिया फरार यांची एक अत्यंत महत्त्वाची ओळख म्हणजे आज १० मार्च रोजी स्मृतिदिन असलेल्या समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या सिंथिया फरार या शिक्षिका.

या मिस सिंथिया फरार थेट अमेरिकेतून २९ डिसेंबर १८२७ रोजी हिंदुस्थानात आल्या, सुरुवातीला काही वर्षे मुंबईत, अल्पकाळ महाबळेश्वर येथे आणि नंतर अहमदनगर येथे दीर्घकाळ मुलींच्या शिक्षण कार्यात स्वतःला वाहून घेत तेथेच त्यांनी देह ठेवला.
अर्थात मिशनरी रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांच्या पत्नी मिसेस (मारिया हे मॅकेंझी उर्फ फ्लायटर) मिचेल यांनीही पुण्यातल्या आपल्या नॉर्मल स्कुलमध्ये सावित्रीबाई फुलेंना शिकवले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी पुण्यात सुरु केलेल्या मुलींच्या शाळेत शिकवणाऱ्या फातिमा शेख यासुद्धा फरार यांच्या अहमदनगर येथील मुलींच्या शाळेत शिकल्या.
महिलांच्या शिक्षणासाठी आणि उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान केलेल्या सिंथिया फरार आणि मिसेस मिचेल यांची चरित्रे किंवा स्वतंत्र माहिती आतापर्यंत कुठेही लिहिली गेलेली नाही त्यामुळे या दोन समाजसुधारक महिलांची सहसा कुणालाच काही माहिती नसते. असे असले तरी भारतातील आणि महाराष्ट्रातील सामाजिक इतिहास, विशेषतः स्त्रीमुक्ती चळवळीचा आणि शैक्षणिक इतिहास, त्याशिवाय सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांची चरित्रे सिंथिया फरार यांच्या उल्लेखावाचून पूर्ण होऊच शकत नाही, असे त्यांचे भरीव योगदान आहे.
अहमदनगर येथे सिंथिया फरार मॅडम मुलींसाठी शाळा चालवत होत्या. महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या मिंत्रांसह या शाळेला भेट दिली आणि मुलींना शिक्षण देण्याच्या या कार्याबाबत ते प्रभावित झाले. आपली पत्नी सावित्रीबाई यांना त्यांनी अहमदनगर येथे फरार मॅडमच्या शाळेत शिक्षण अद्यापनाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले. फरार मॅडमच्या मुलींच्या शाळेपासून प्रेरणा घेऊन महात्मा फुले यांनीं आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई यांनीं पुण्यात मुलींसाठी शाळा सुरु केली होती असे खुद्द महात्मा फुले यांनी म्हटले आहे.
मात्र एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे ब्रिटिश अमदानीच्या सुरुवातीच्या काळात हिंदुस्थानात आधुनिक शिक्षण देणाऱ्या सिंथिया फरार या पहिल्याच व्यक्ती नाही. मिस सिंथिया फरार यांच्या कितीतरी वर्षे आधीच इतर परदेशी ख्रिस्ती मिशनरींनीं देशांत आधुनिक शिक्षण देणाऱ्या मुलांमुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या.
फरार हिंदुस्थानात येण्याआधी त्यांच्या अमेरिकेतील पुर्वायुष्याची काहीही माहिती उपलब्ध नाही. मुंबईत २९ डिसेंबर १८२७ रोजी आल्यानंतर सुरुवातीच्या त्यांच्या मुंबईतील कार्याविषयी आणि नंतर अहमदनगर येथील त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंतच्या दीर्घ कालावधीतील सेवेबाबत मात्र अनेक उल्लेख अमेरिकन मराठी मिशनच्या वार्षिक अहवालांत आणि इतर कागदपत्रांत आढळतात.
सिंथिया फरार यांचा भारतातील मिशनरी आणि शैक्षणिक क्षेत्रांतील कालखंड १८२७ ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८६२ इतका आहे. अमेरिकन मराठी मिशनच्या १८१३ ते १८८१ या कालखंडात हिंदुस्थानात कार्य केलेल्या सर्व मिशनरींच्या सेवेचा कालखंड देण्यात आला आहे. त्या यादीत `मिस सिंथिया फरार - आगमन २९ डिसेंबर १८२७ , निधन २५ जानेवारी १८६२’ अशी नोंद आहे.
यादरम्यान अमेरिकेतून मुंबईत आल्यावर सिंथिया फरार यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या मुलींच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले. मिशनच्या १८२९ सालच्या अहवालात या शाळांची संख्या वाढत चालली आहे असे नमूद करून विद्यार्थिनींची संख्या चारशेहून अधिक झाली आहे आणि त्यापैकी १२२ मुली चांगल्यापैकी वाचू शकतात, सुंदर अक्षरात लिहू शकतात असे म्हटले आहे.
अमेरिकन मराठी मिशनचे मिशनरी अहमदनगर येथे पोहोचल्यानंतर लगेचच या मिशनरींच्या पत्नींनी तिथल्या स्थानिक मुलींना आपल्याकडे बोलावून शाळा सुरु केल्या. या शाळांत मुलींना लिहिणे, वाचणे शिकले जाई आणि बायबलमधील काही प्राथमिक तत्त्वे शिकवली जाई. मुलींच्या शिक्षणाबाबत समाजात अत्यंत प्रतिकूल मत आणि कडवा विरोध असल्याने या शाळांत मुलींना बोलावण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागायची.
धर्मप्रसार करताना या कार्याचाच एक भाग म्हणून स्थानिक मुलांसाठी शाळा सुरु करणाऱ्या मिशनरींना अनेक समस्यांना तोंड ध्यावे लागले होते. मुलींच्या शाळा सुरु करताना, या मुलींनी शिक्षण सोडू नये यासाठी प्रयत्न करताना अनेक प्रसंगी त्यांना अपयश येत असे.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८३४ सालच्या अहवालात मिशनच्या मुंबईच्या शाळांची माहिती दिलीआहे. त्यात तेथल्या कार्यरत व्यक्तींच्या यादीत मुलींच्या शाळांच्या सुपिरिटेंडंट मिस सी. फरार असा उल्लेख आढळतो. मुंबईत त्यावेळीं मुलांसाठी पाच तर मुलींसाठी तेरा शाळा होत्या, या शाळांत कुठल्याही प्रकारची फी नव्हती. त्याशिवाय इतर ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी बारा शाळा होत्या. अहमदनगरमध्ये १८३५ साली अमेरिकन मराठी मिशनच्या नऊ शाळा होत्या.
आपल्या मिशनरी वृत्तीच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याने आधुनिक काळात भारतातील संपूर्ण समाजजीवन सकारात्मकतेने बदलून टाकणाऱ्या महान आणि द्रष्ट्या समाजसुधारक मिशनरींमध्ये अहमदनगरच्या सिंथिया फरार यांचा समावेश होतो.
अमेरिकन मराठी मिशनतर्फे पहिल्यांदा सुरु केलेल्या मुलांच्या बोर्डिंग स्कुल्स मिशनरी कुटुंबांत चालवल्या जात असत कारण बोर्डिंगमधल्या या मुलांमुलींची काळजी घेणे आणि त्यांना शिकवणे अधिक सोयिस्कर होते. सन १८३६ ला मात्र मुलींची पहिलीवहिली बोर्डिंग स्कुल मिस सिंथिया फरार यांनी चॅपलला लागून असलेल्या मिशन हाऊसमध्ये सुरु केली, या बोर्डिंग स्कुलमध्ये १३ मुली होत्या, त्यापैकी पाच जणी गुलामांच्या जहाजातून मुक्त केलेल्या निग्रो होत्या.
अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईच्या विविध परिसरांत त्यावेळी मुलींसाठी तब्बल १२ शाळा होत्या आणि या शाळांत दोनशे ते तिनशे विद्यार्थिनी होत्या. मात्र कालांतराने या शाळांची संख्या कमी करुन या शाळांचे एकत्रिकरण करून चॅपलसमोर असलेल्या भेंडी बझार केंद्रात आणि भायखळा मॅन्शन येथे या शाळा चालू ठेवण्यात आल्या. मिस सिंथिया फरार अनेक वर्षे या शाळांच्या सुपरिंटेंडेन्ट होत्या,
प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मायदेशी अमेरिकेत परतावे लागले. अमेरिकेतून . 1839 ला पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांचे कार्य महाबळेश्वर येथे आणि त्यांच्या १८६२ सालच्या मृत्यूपर्यंत अहमदनगर येथे चालू राहिले. सिंथिया फरार अमेरिकेत परतल्या होत्या तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत मुलींची ही बोर्डिंग मिसेस ऍलन यांनी चालू ठेवली. ह्युमस दाम्पत्याचे १८३९ साली मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी ही बोर्डिंग चालू ठेवली.
भारतात फरार परत आल्यानंतर अहमदनगर येथेसुद्धा फरार यांनी मुलींच्या शाळांवर आपले लक्ष केंद्रित केले. अमेरिकन मराठी मिशनच्या १८४५ आणि १८४६ सालच्या अहवालात म्हटले होते कि '' मिस फरार यांच्या सुपरिंटेंडंटपदाच्या देखरेखीखाली मुलींच्या चार शाळा सुरु आहेत आणि या शाळांत १०० विधार्थिनी आहेत.''
या शाळांच्या अधिक्षक या नात्याने फरार यांनी केलेल्या परिश्रमामुळे या क्षेत्रात आधी इतरांना अपयश आले होते तसे त्यांच्या बाबतीत झाले नाही. त्यांना ज्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते ते पाहता इतर कुणी असे कष्ट करण्याचे धाडसच केले नसते. मुलींना शिक्षण देण्याबाबत समाजात विरोध असल्याने या शाळांतील मुलींनी शिक्षणात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांच्या पालकांना अजिबात कौतुक नसायचे. त्यामुळे आपल्या मुली नियमितपणे शाळांत जाण्याची गरज आहे असे त्यांना बिलकुल वाटत नसे. या कारणांमुळे या शाळांतील मुलींना कुठल्याही निमित्ताने किंवा कारणाखाली शाळेत पाठवणे अचानक बंद केले जाई किंवा या मुलींना कुठल्याही करण्यासाठी परगावी महिनाभर किंवा थेट काही महिन्यांसाठी पाठवले जाई.
मुलींचे लहानपणीच लग्न लावून देण्याची पद्धत तर त्यांच्या शिक्षणासाठी एक मोठा अडसर होता. या मुलींना त्यांच्या सासूच्या हाताखाली आणि सतत चालणाऱ्या जिभेच्या प्रभावात प्रशिक्षण घेणे शाळेतील शिक्षणापेक्षा महत्त्वाचे समजले जायचे. सिंथिया फरार यांनी त्यांच्या शाळांत शिकणाऱ्या मुलींचे प्रेम संपादन केले, त्यांच्यामध्ये शिकण्याची गोडी निर्माण केली आणि अशाप्रकारे शिक्षणात किमान थोडीफार प्रगती होईल इतका काळ या मुलींना शाळांत येण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात त्या यशस्वी ठरल्या.
तरीसुद्धा आपल्या शाळांतील अनेक मुलींना लवकरच शाळेतून काढले गेले आणि त्यामुळे आंपल्या आयुष्यभरातल्या शैक्षणिक कामात फार थोडे यश मिळाले अशी खंत फरार मॅडम अनेकदा व्यक्त करत असत.
सिंथिया फरार आणि त्यांच्याप्रमाणेच इतर मिशनरी महिलांनी भारतात मुलींच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेल्या कामामुळे हळूहळू मुलींच्या शिक्षणाबाबत त्यांच्या पालकांचा आणि एकूणच संपूर्ण समाजाचा असलेला विरोध मावळत गेला आणि मग मुली अधिक संख्येने शाळांत येऊ लागल्या.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८८१च्या वर्धापनानिमित्त मिसेस एल एस गेट्स मिसेस लेखात लिहितात:
"सन १८२७ ला महिलांसाठी कार्य करण्यासाठी मिस सिंथिया फरार हिंदुस्थानात आल्या. मुंबईत त्यांनी मुलींसाठी अनेक शाळा सुरु केल्या. दयाळू वृत्तीच्या मित्र असलेल्या ब्रिटिशांसह उच्च पदांवरील अनेक भारतीय सद्गृहस्थांनी मुलींच्या या शाळांना पाठबळ पुरवले. याचे कारण म्हणजे या शाळांतील मुलींनीं केलेली प्रगती त्यांनी पाहिली होती. ब्रिटिश लोकांच्या मदतीवर चाललेल्या काही शाळांच्या सुपरिंटेंडंट म्हणून त्यांनी काम पाहिले. आपल्या कामावर त्यांनीं अलोट प्रेम केले. भौतिक साधने मिळवण्याची त्यांना संधी असतानाही त्यांनी या भौतिक सुखाकडे पाठ फिरवली आणि पवित्र ध्येयाने प्रेरित होऊन त्त्यांनी नम्र वृत्तीने आपले कार्य सुरु ठेवले. आपल्या प्रभूसाठी कार्य करण्यासाठी त्या सदैव उत्सुक असायच्या. आपल्या स्वतःबद्दल त्यांनीं म्हटले आहे: ''मी माझे निरुपयोगी आणि अगदी हलके असलेले श्रम (आपल्या श्रमाबद्दल त्यांची अशी धारणा होती) माझ्या तारणहार प्रभूच्या चरणापाशी प्रत्य्येक रात्री ठेवत होते, माझ्या या अपर्णाचा त्याने स्वीकार करावा अशी मी प्रार्थना करत असे.'' अशा भावनेने फरार यांनीं काम केले. आपल्या कामाबाबत त्या सतत उत्साहाने असायच्या. त्यांच्या विद्यार्थिनी त्यांची अत्यंत प्रेमाने आणि कृतज्ञतापूर्वक आठवण करत असत.
सन १८५२ ला मिस फरार यांना अहमदनगर शहरातल्या आणि नजिकच्या परिसरातील काही सद्गृहस्थांचे बोलावणे आले. आपल्या कुटुंबियांना आणि महिलांना शिक्षण कसे द्यायचे याबाबत फरार यांनी मार्गदर्शन करावे अशी त्यांनी विनंती केली. अहमदनगर येथील दोन शाळांना ब्राह्मणांचे पाठबळ होते, आणि यापैकी एका शाळेतील एक ब्राह्मण शिक्षक ख्रिस्ती झाल्यानंतर या शाळांतील मुलांना पालकांनी काढून घेतेले आणि त्यामुळे या शाळा बंद पडल्या.
मिस फरार यांच्याविषयी स्थानिक लोकांमध्ये खूप आदराची भावना होती. त्यांच्याकडे हे लोक एक दैवत म्हणूनच पाहायचे. इथला समाज महिलांकडे एक दुय्यम, हलकी व्यक्ती अशा नजरेने पाहत असायचा, त्या लोकांसाठी फरार यांची निष्ठा, जीवनातील पावित्र्य, मनातील चांगुलपणा आणि स्त्रियांसाठी त्यांनीं घेतलेले परिश्रम खूप नवलाईची बाब होती.
अहमदनगर येथील मुलींच्या शाळेबद्दलची माहिती ऐकून महात्मा जोतिबा फुले यांनी या शाळेला भेट दिली आणि त्यानंतर आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना या शाळेत दाखल केले.
सिंथिया फरार यांच्या स्त्रीशिक्षणविषयक कार्याचा महात्मा फुले यांच्यावर गाढ प्रभाव पडला होता असे त्यांनीं स्वतः लिहिले आहे. अहमदनगर येथे नोकरीला लागलेले त्यांचे मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्यामुळे ते फरार मॅडमच्या शाळेत गेले होते. याबाबत धनंजय कीर यांच्या `महात्मा जोतीराव फुले’ या पुस्तकात खालील उल्लेख आहे.
''नोकरीवर रुजू होण्यासाठी सदाशिवराव गोवंडे अहमदनगरला गेले तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर जोतिबांना नेले. त्याकाळी अहमदनगर हे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालविलेल्या शिक्षणकार्याचे एक मोठे केंद्र बनले होते. तेथे गेल्यावर एके दिवशी सदाशिवराव गोवंडे व जोतिबा ह्यांनीं अमेरिकन मिशनमधील मिस फरारबाईंच्या शाळेला भेट दिली.
मुलींची शाळा काढण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी केल्या ह्याविषयी जोतिबा म्हणतात: माझ्या देशबांधवांपैकी महारमांगचांभार ह्या कनिष्ठ जातींतील बंधू हे दुःख आणि अज्ञान यांत साफ बुडालेले आहेत. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी दयाळू देवाने मला प्रेरणा दिली. स्त्रियांच्या शाळेने प्रथम माझे लक्ष वेधले. पूर्ण विचारांती माझे असे मत झाले कि, पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची अधिक गरज आवश्यकता आहे. स्त्रिया आपल्या मुलांना त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांत जे वळण लावतात त्यातच त्यांच्या शिक्षणाची बीजे असतात. अशा विचारात मी असताना अहमदनगर येथील अमेरीकन मिशनमधील मिस फरार या बाईने चालविलेल्या शाळा मी एका मित्रांसमवेत पाहिल्या. ज्या पद्धतीने त्या मुलींना शिक्षण देण्यात येत होते ती पद्धत पाहून मी फार खुश झालो.
हिंदुस्थानात स्त्रीशिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येते याबद्दल जोतिबा आणि गोवंडे यांच्याजवळ मिस फरारने अत्यंत दुःख व्यक्त केले. आपल्या देशाची सुधारणा करण्यासाठी [परकीय लोक जे चिकाटीने प्रयत्न करीत होते ते पाहून जोतिबा आणि गोवंडे यांचा मनावर फारच चांगला परिणाम झाला. आपल्या देशबांधवांच्या सुधारणेकडे आपले लोक दुर्लक्ष करतात याविषयी त्यांना खंत वाटली. यास्तव प्रत्येकाने आपल्या पत्नीस शिक्षण देऊन शिक्षणप्रसाराच्या कार्यात तिचे साहाय्य घ्यावे, असे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे जोतीराव पुण्यास परत आल्यावर त्यांची पत्नी सावित्रीबाई ह्यांचे शिक्षण सुरु करण्यात आले आणि त्यांनी स्वतः कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी . एक शाळा उघडली. जोतिबा म्हणतात : ''मी पुण्यास येताच कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी एक शाळा सुरु केली. मात्र त्या शाळेत ज्या मुलांना शिक्षण घेण्याची आवड असेल त्यांनाही प्रवेश दिला. या शाळेत मी वाचन, अंकगणित आणि व्याकरणाची मूलतत्त्वे हे विषय शिकवीत असे''.
ख्रिस्ती मिशनरींतर्फे चालवल्या जाणाऱ्या `ज्ञानोदय मासिकात जोतिबांचे हे मनोगत १८५३ साली प्रसिद्ध झाले होते. जोतिबा लिहितात :
`` अतिशूद्रादिकांस विद्या शिकविण्याविषयांची मंडळी
या मंडळीचे पुढारी जोतिराव गोविंद फुले आहेत आणि अलीकडे जेव्हा या शाळेची परीक्षा झाली तेव्हा त्यांनी बोलणे लावले की महार, मांग, चांभार हे या देशात फार असून ते अगदी नीचावस्थेत आहेत. हे पाहून ईश्वराच्या प्रेरणेने माझ्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली असल्यास सुशिक्षित करण्याविषयी काहीतरी उपाय योजावा. प्रथम मनात आले की आईच्या योगाने मुलांची जी सुधारणूक होते ती फारच चांगली आहे म्हणून त्या लोकांच्या मुलींचीच शाळा प्रथम घालावी आणि असा विचार करता करता मी एका मित्रालासुद्धा अहमदनगरात जाऊन तेथे अमेरिकन मिशन खात्यातील फारा मडमीच्या कन्याशाळा पाहिल्या आणि पाहून मला मोठा आनंद झाला कारण की त्या चांगल्या रीतीने चालल्या होत्या. मग मी पुण्यास परत येऊन लागलीच एक मुलींची शाळा घातली व तिथे वाचणे लिहिणे, गणित, व्याकरण असा अभ्यास चालविला.’’.
महाराष्ट्र सरकारच्या महात्मा जोतीराव फुल चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे प्रकाशित केलेल्या ``महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा'' या पुस्तकाच्या संपादकियात हरि नरके यांनी लिहिले आहे: ``२२ नोव्हेंबर १८५१ च्या `बॉंबे गार्डियन’ने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. ``१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनीं जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते. एके दिवशी हे दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यात गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली. पण पुढे सहाच महिन्यांत दुदैव ओढवले. लोकांच्या मूर्ख पूर्वग्रहाचा प्रभाव पडून त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले व शाळा बंद पडली. गोवंडे पुण्यात आले व त्यांनी सावित्रीबाईंना नगरास नेले. पावसाळ्याच्या प्रारंभी त्या परत आल्या. मग केशव शिवराम भवाळकर यांनी त्यांना शिक्षण द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. शाळातून शिकविण्यात उपयोगी होतील अशा तरुण स्त्री शिक्षकांचा वर्गही घेण्याचे ठरले. भवाळकरांनीं खटपट करून पुण्यात स्त्रिया जमवून त्यांना शिक्षण दिले.’’
याच प्रस्तावनेत नरके यांनी म्हटले आहे कि ‘’ ``सावित्रीबाईनी अहमदनगर येथे फरार बाईच्या व पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले होते.’’
अमेरीकन मराठी मिशनच्या वतीने मिस सिंथिया फरार यांच्यावर १८६२ साली लिहिलेल्या मृत्युलेखात महात्मा जोतिबा फुले यांचे प्रत्यक्ष नाव न घेता पुढील संदर्भ देण्यात आला आहे :
` मुलींना शिक्षण देण्याची खूप इच्छा असलेल्या पुणे शहरातील एका तरुण सद्गृहस्थाला मिस फरार यांनी आनंदाने सल्ला आणि मार्गदर्शन पुरवले. मुलींच्या शाळा सुरु करण्याबाबत आणि या शाळांचे व्यवस्थापन करण्याबाबत फरार यांनी या तरुणाला मार्गदर्शन केले. अहमदनगरहून पुण्याला परतल्यावर या तरुणाने हिंदू मुलींना शिक्षण देण्यासाठी तेथे शाळा सुरु केल्या. मुलींच्या या शाळांना स्थानिक लोकांनी तसेच काही सत्प्रवृत्त ब्रिटिश लोकांनीं मदत केली आणि या शाळांनी पुढील काही वर्षांत खूप प्रगती केली. ‘’
अमेरिकन मराठी मिशनच्या सिथिया फरार यांच्याबाबत अमेरिकन मराठी मिशनच्या १९२०च्या अहवालात खालील माहिती आढळते :
``या मिशनच्या कार्यात सहभागी होणाऱ्या सिंथिया फरार या पहिल्या अविवाहित अमेरिकन महिला होत्या. शंभर वर्षांपूर्वी, २९ डिसेंबर १८२७ रोजी, त्याचे येथे आगमन झाले. अहमदनगर येथे पहिल्यांदाच त्यांनी मुलींच्या शाळा सुरु केल्या. त्यांनी ही सेवा सुरु केली तेव्हा काही हिंदू लोकांनी तिरस्कारयुक्त शब्दांत त्यांना सुनावले. '' आधी गाढवांना वाचण्याचे धडे ध्या आणि मग आमच्या मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करा !'' मिस फरार यांच्यासाठी हा नक्कीच खूप कष्टाचा मार्ग होता. मात्र हिंदुस्थानातल्या महिला आणि मुलींसाठी त्यांनी आपले कार्य त्यांना २५ जानेवारी १८६२ रोजी बढती मिळेपर्यंत ( निधनापर्यंत) सतत चालूच ठेवले. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ, या मिशनने अहमदनगर येथील मुलींच्या तीन डे -स्कुल्सचे नाव - द फरार स्कुल्स' असेच ठेवले आहे.
या तीन फरार शाळांच्या आता सुपिरिटेंडंट असलेल्या मिसेस एच फेयरबॅक यांनी लिहिले आहे ``मागील वर्षाकडे वळून पाहताना आणि सर्व बाबी विचारात घेता, फरार स्कुल्समध्ये चालू असलेल्या चांगल्या कार्याबाबत आनंद आहे. शाळांचे शिक्षक प्रामाणिक आहेत आणि शाळेतल्या छोट्या मुलींशी प्रेमाचे नाते आहे. गेल्या वर्षी या तिन्ही शाळांना याआधी कधीही मिळाले नव्हते अशा मोठ्या रकमेचे सरकारी अनुदान मिळाले आहे.''
याच अहवालात अहमदनगर येथील फरार स्कुलच्या मुलींचा एक फोटो छापण्यात आला होता. विशेष म्हणजे अमेरीकन मराठी मिशनच्या वेळोवेळीच्या अहवालांत आणि इतर दस्तऐवजांत विविध मिशनरींचे, इतर व्यक्तीचे स्वतंत्र किंवा समूह फोटो प्रकाशित केलेले आहेत, मिस सिंथिया फरार यांचा मात्र त्यांच्या नावानिशी एकही स्वतंत्र फोटो दिसत नाही. कदाचित काही समूह फोटोंमध्ये फरार मॅडम असण्याची शक्यता आहे.
अमेरीकन मराठी मिशनच्या दस्तऐवजांत मिस सिंथिया फरार यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी आणि कार्याविषयी पुढील टिपण्णी आढळते :
‘’ फरार यांच्या पूर्वायुष्याबद्दल सांगण्यासाठी आवश्य

क ती माहिती आमच्याकडे नाही. रेव्हरंड सायरस स्टोन या आपल्या चुलतभावासह त्या हिंदुस्थानात १८२७ साली आल्या होत्या इतकेच आम्हाला माहित आहे. त्यावर्षी मुंबईत डिसेंबर अखेरीस पोहोचल्यानंतर लगेचच त्यांनी त्या शहरातील हिंदू मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनीं मुलींच्या अनेक शाळा स्थापन केल्या आणि या शाळांत सर्वांत उच्च जातींच्या मुलीसुद्धा होत्या. या शाळांच्या त्या सुपरिंटेंडेंट म्हणून अनेक वर्षे कार्य करत असतानाच त्या शाळांत शिकवतसुद्धा असत. त्यांच्या या कार्यात मुंबईतील उच्चपदांवरील महिलांचे आणि सद्गृहस्थांचे त्यांना प्रोत्साहन आणि मदत मिळत असे. आर्चडिकन (नंतरचे बिशप ) कार, सर रॉबर्ट ग्रांट यांच्या निधनानंतर मुंबईचे गव्हर्नर बनलेले जेम्स फारीश आणि त्याशिवाय इतर कितीतरी व्यक्तींनीं फरार यांना विविध प्रकारे मदत केली, त्यांना कौतुकाच्या शब्दांसह आपल्या कृतीनेही खूप प्रोत्साहन दिले. आदरणीय आर्चडिकन कार यांच्यामार्फत एका इंग्लिश सोसायटीने अर्थसहाय्य पुरवलेल्या अनेक शाळांच्या फरार सुपरिंटेंडंट होत्या.
फरार यांना आपल्या कामाची आवड होती आणि कुठलीही भौतिक सुखासाठी त्यांनी आपले हे कार्य सोडले नसते. कठीण परिश्रमांमुळे त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे .१८३७ साली त्यांना आपल्या मायदेशी, अमेरिकेत, परतावे लागले होते, मात्र रेव्हरंड बर्जेस यांच्या कुटुंबासह त्या १८३९ साली हिंदुस्थानात परतल्या. या देशातल्या आगमनानंतर लगेचच त्या बर्जेस दाम्पत्यासह अहमदनगर येथे आल्या. काही महिन्यांचा अपवाद वगळता या शहरातच त्यांचे कायम वास्तव्य होते आणि इथेच प्रामाणिकपणे आपले कार्य करत असताना त्यांचे निधन झाले.
आपल्या तारणारा प्रभूसाठी सतत काही तरी करत राहण्याची त्यांची धडपड असायची. मृत्युशय्येवर असताना त्यांनीं म्हटले कि आपले दररोजचे परिश्रम (त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने अगदी सामान्य आणि हलक्या दर्जाचे ) दररोज रात्री आपल्या प्रभूच्या चरणी ठेवत त्यांचा स्वीकार व्हावा अशी प्रार्थना करत असत .
याच भावनेने त्यांनी आयुष्यभर खूप परिश्रम केले. फरार यांच्या शाळांतले अनेक माजी विद्यार्थिनी पत्नी आणि माता बनल्यानंतर आपल्या या शिक्षिकेची आठवण करत असत. फरार यांच्याविषयी प्रेम व्यक्त करणारी आणि त्यांनीं दिलेल्या ज्ञानदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी या विद्यार्थिनींची पत्रे फरार यांना वेळोवेळी यायची.
मिस फरार यांच्याविषयी स्थानिक लोकांमध्ये खूप आदर होता. या लोकांच्या त्यांच्या स्वतःच्या स्त्रियांबाबत असलेल्या दृष्टिकोनामुळे फरार यांना हे लोक एखादी दैवी व्यक्तीच मानत असत. फरार यांच्या जीवनातली शुद्धता आणि पावित्र्य, त्यांच्या हृदयाचा चांगुलपणा आणि स्त्रियांच्या कल्याणासाठी त्या करत असलेले परिश्रम या लोकांसाठी एक अत्यंत नवलाची बाब होती.
सन १८६० च्यानंतर सिंथिया फरार यांची प्रकृती ढासळत गेली. लष्कर लाईन्समधल्या मुलींची शाळा आणि कॅथेखिस्ट शाळेशी संबंधित असलेल्या मुलांची शाळा मिस फरार यांच्या देखरेखीखाली चालू राहिल्या. त्यांची प्रकृती बिघडल्यामुले या शाळांचे काम त्यांना थांबवणे भाग पडले. ते काम पुन्हा सुरु करणे त्यांना शक्यच झाले नाही. ‘’
सिथिया फरार यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी २५ जानेवरी १८६२ रोजी अहमदनगर येथे निधन झाले
फरार यांच्या निधनामुळे स्थानिक महिलांना धक्का बसला. यापैकी शेकडो महिला त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्या होत्या, त्याआधी या महिलांनीं कधीही कुठल्याही ख्रिस्ती विधीला हजेरी लावली नव्हती. त्यांच्या नेहेमीच्या परिचयाच्या चेहेऱ्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी या महिला शवपेटीजवळ आल्या तेव्हा एखाद्या दैवताचे दर्शन घ्यावे अशा पद्धतीने त्यांनी मान लववून वंदन केले. या लोकांना नेहेमी जात येईल अशा ठिकाणी जर फरार यांना दफन केले असते तर कदाचित यापैकी अनेक महिलांनीं एखाद्या पवित्र तिर्थक्षेत्राप्रमाणे त्या ठिकाणी भेट देऊन त्या कबरीवर फुले वाहिली असती.
विशेष म्हणजे मिस फरार यांच्या निधनाच्या वेळी वीस वर्षे आधी अहमदनगर येथील अमेरिकन मराठी मिशनच्या कुठल्याही मिशनरीचे किंवा सहाय्यक मिशनरींचे कार्य करत असताना निधन झाले नव्हते. अहमदनगर येथील कबरस्थानात त्यावेळी आधीच्या केवळ तीन मिशनरींच्या कबरी होत्या. त्यापैकी एक रेव्हरंड हर्व्हे यांची होती, अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनचे केन्द्र स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांतच १८३२ला त्यांचे निधन झाले होते. दुसरी कंबर १८४२ साली निधन झालेल्या मिसेस बर्जेस यांची होती आणि तिसरी कबर आता १८६२ साली निधन झालेल्या मिस फरार यांची होती.
मिस फरार यांच्या निधनानंतर त्यांनीं अनेक वर्षे चालवलेल्या लष्कर लाईनमधल्या मुलींची शाळा बंद करणे भाग पडले. याचे कारण म्हणजे दोन वर्षांपूर्वी या परिसरातला आर्टिलरी आणि इंस्ट्रक्शन डेपो दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आला आणि त्यामुळे तेथील अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आणि फरार त्यांच्या या शाळेतील मुलींची संख्या एकदम घटली. फरार यांच्या निधनाआधीच या शाळेत नियमितपणे येणाऱ्या फक्त तेरा-चौदा मुली होत्या.
फरार यांच्या मुलींच्या शाळेपाशी एक मुलांची शाळा होती. मुलांच्या या शाळेच्या सुपरिंटेंडंट म्हणूनही त्यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली होती. फरार त्यांच्या निधनानंतर त्यांच्यामागे राहिलेली रक्कम लष्कर लाईन्स मधल्या मुलींच्या आणि मुलांच्या शाळांसाठी वापरली जात होती. सिंथिया फरार यांची मुलींची ही शाळा बंद करण्याचा दुःखद निर्णय अमेरिकन मराठी मिशनला घ्यावा लागला, मात्र दुसरा काही पर्याय नव्हता. मुलांच्या शाळेने मात्र नंतर खूप प्रगती केली.
फरार यांच्या मागे राहिलेल्या रकमेचा विनियोग शाळांतीळ मुलांसाठी करण्याचा निर्णय मिशनने घेतला.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८६३ च्या अहवालानुसार, ``अहमदनगर येथील मिसेस बॅलेन्टाईन यांच्या देखरेखीखाली असलेल्या शाळेची प्रगती होत आहे., या शाळेतील पाच मुलींना त्यावर्षी ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्यात आली. त्याशिवाय वयाने मोठ्या असलेल्या तीन विद्यार्थिनींची स्थानिक ख्रिश्चनांशी विवाह झाले आहेत. उच्च जातींतील मुलांसाठी आम्ही दोन शाळा चालवत आहोत. यापैकी एक शाळा अहमदनगर येथे आहे आणि दिवंगत मिस फरार यांच्या मागे राहिलेल्या निधीतून लष्कर लाईन्समध्ये आहे. या दोन्ही शाळांची भरभराट होत आहे.’’
मिस सिंथिया फरार यांच्या चरित्राविषयी आणि कार्याविषयी त्रोटक माहिती अमेरिकन मराठी मिशनच्या इतिहासात आणि गॅझेट्स मध्ये शोधावी लागते.
सिंथिया फरार यांच्या विद्यार्थी असलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव आता पुणे विद्यापिठाला देण्यात आले आहे. एकोणिसाव्या शतकात स्त्रीशिक्षणाबाबत त्यांनी केलेल्या महान योगदानाबद्दल तो त्यांचा उचित सन्मानच आहे. मात्र सिंथिया फरार यांचे नाव किंवा त्यांचे स्त्रीशिक्षणाबाबत योगदान याबद्दल आजही लोकांना काहीच माहिती नसते.
महात्मा फुले यांना प्रेरणा देणाऱ्या सिंथिया फरार यांच्याविषयीचे फुले यांच्या वेगवेगळ्या चरित्रांत ओझरते उल्लेख वाचून फरार मॅडमच्या चरित्राबाबत उत्सुकता माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मात्र भारतीय स्त्रीशिक्षणात अत्यंत मोलाचे योगदान असणाऱ्या फरार मॅडमबाबत इतर कुठेही काही माहिती उपलब्ध नाही असे आढळले. मिस सिंथिया फरार यांच्या चरित्राविषयी आणि कार्याविषयी त्रोटक माहिती अमेरिकन मराठी मिशनच्या इतिहासात आणि गॅझेट्स मध्ये शोधावी लागते.
अमेरिकन मराठी मिशनच्या गेल्या दोनशे वर्षांची कागदपत्रे, पुस्तके आणि अहवाल मी नजरेखालून घातले तेव्हा या दस्तऐवजांत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली फरारबाईंची ही माहिती सापडली, त्यातून मिस सिंथिया फरार यांचे हे पहिलेच छोटेखानी चरित्र उभे राहिले आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या शिक्षिकेचे आणि महात्मा फुले यांना प्रेरित करणाऱ्या सिंथिया फरारबाईंचे हे पहिलेवहिले चरित्र वाचकांसमोर ठेवताना मला खूप आनंद होतो आहे. फरार मॅडमचा खराखुरा फोटो मात्र अजूनतरी माझ्या पाहण्यात आलेला नाही.
मुंबईत निधन झालेल्या आणि तेथेच स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहाचे दहन झालेल्या रेव्हरंड नारायण वामन टिळक यांची कबर अहमदनगर येथेच आहे. सिंथिया फरार यांची अहमदनगर येथे असलेल्या कबरीचा कधीकाळी शोध लागेल अशी शक्यता आता राहिलेली नाही.
एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरवातीस कोलकाता येथे मेरी अँन कुक, मुंबईत मार्गारेट विल्सन, महाबळेश्वर येथे मिसेस मेरी ग्रेव्ह्ज, आणि मुंबई व अहमदनगर येथे मिस सिंथिया फरार या महिलांनी स्त्रीशिक्षणासाठी आणि महिला सबलीकरणासाठी मोठे योगदान दिले. या महिलांच्या या कार्यांची नोंद घेणे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे योग्य ठरेल.
(लेखाचा दुसरा आणि अंतिम भाग)

 फेसबुकवर मित्र असलेले अहमदनगरचे संजय आढाव गेली तीनचार वर्षे दर ३ जानेवारीला एक पोस्ट हमखास टाकायचे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना अहमदनगर येथे आपल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाईंना शिकवणाऱ्या मिस सिंथिया फरार यांची ते या दिवशी आठवण करून द्यायचे. दोन वर्षांपूर्वी त्यांची ही पोस्ट मी स्वतः शेअर केली होती.

सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आढाव यांनी अशी एक पोस्ट टाकल्यानंतर इथे इनबॉक्समध्ये येऊन एकाने मला विचारले: ``अहो हे खरं आहे का?''
मी म्हटलं. ''हो खरं आहे ते. काही शंका आहे का याबाबत ?''

``तसं नाही हो , एका मित्रानं तसा प्रश्न मला विचारला म्हणून मी तुमच्याकडून खात्री करून घेण्यासाठी विचारलं..''
हे संभाषण संपल्यानंतर मी मात्र विचारात पडलो. सिंथिया फरार यांनी सावित्रीबाईंना शिकवलं हे खरे आहे काय? याबाबत काही पुरावे आहेत का? सिंथिया फरार यांची व्यक्तिगत आणि कार्याबाबत काही माहिती उपलब्ध आहे का?
शंकेचा किडा असा मनात वळवळायला लागल्यानंतर मी लगेच संजय आढाव यांना फोन केला आणि त्यांच्याकडे याबाबत मी विचारले.
``गुगलवर ही सर्व माहिती, सिंथिया फरार यांचे फोटोसुद्धा आहेत.''
त्यांचे ते उत्तर ऐकून मी चमकलो.
गुगलवर? गुगलवरच्या माहितीची विश्वासार्हता, त्याबाबतचे खरेखोटे कसे शाबित करणार?
आणि त्या दिवसापासून `कोण या सिंथिया फरार ?' फरार या खऱ्याच ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहेत का? असल्या तर त्यांचा काळ कुठला? त्यांच्याविषयी कुठे संदर्भ आहेत का? याचा मी शोध घेऊ लागलो.
कुठलीही व्यक्ती ऐतिहासिक आहे हे ठरवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचे कार्य निश्चित करण्यासाठी काही ठोकताळे किंवा मानदंड असतात. एक म्हणजे त्या व्यक्तींबाबत समकालीन किंवा नंतरच्या लोकांनी केलेली नोंद. त्याशिवाय त्या व्यक्तीच्या चरित्रात आलेले ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ.
उदाहरणार्थ, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्यावेळी तत्कालीन रोमन सम्राटाने शिरगणती हाती घेतली होती आणि इस्राएल रोमन साम्राज्याचा भाग असल्याने जोसेफ आपल्या गरोदर पत्नीला - मारियेला - घेऊन आपल्या मूळगावी बेथलेहेम येथे पोहोचला होता. अर्थात हे झाले एक उदाहरण. गौतम बुद्ध वगैरेसारख्या व्यक्तीं ऐतिहासिक असणे किंवा त्यांचा काळ निश्चित करणे यासाठीसुद्धा असेच परिमाण वापरले जातात.
तर मग सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी १८४७च्या सुमारास ज्यांच्याकडे अद्यापनाचे धडे घेतले त्या मिस सिंथिया फरार यांच्याबाबत तशा काही ऐतिहासिक नोंदी आणि क्रॉस रेफरेन्सेस असणे आवश्यक होते.
अहमदनगर येथील भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी स्थापन केलेल्या अहमदनगर कॉलेजशी संबधित असलेल्या, या ऐतिहासिक शहरातील ख्रिस्ती मिशनकेंद्रांशी संबंध असलेल्या लोकांशी, संशोधकांशी मी या फरार मॅडमबाबत चौकशी करू लागलो. महात्मा फुले यांचे एक चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यांनी तसेच हरि नरके यांनी आपल्या फुले दाम्पत्याच्या संदर्भातील लिखाणात फरारबाईंचा उल्लेख केल्याचे मला आठवत होते.
तर अशाप्रकारे मिस सिंथिया फरार त्यांच्या चरित्राचा आणि कार्याचा शोध घेण्याचं काम मी सुरू केलं.
सतराव्या शतकातल्या `क्रिस्तपुराण'कार फादर थॉमस स्टिफनपासून `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथ संपदा' ही सूची करणारे पुण्यातले अनिल दहिवाडकर, संशोधक अशोक हिवाळे, अहमदनगरचे विनोद शिंदे आणि पौलस वाघमारे, सातारा येथील तरुण संशोधक सुबोध क्षेत्रे, सोलापूरचे सुहास वाघमारे यांच्याशी चर्चा केली.
जे समजले ते धक्कादायक होते.
स्त्रीशिक्षणाबाबत महात्मा फुले यांना प्रभावित करणाऱ्या सिंथिया फरार यांच्याविषयी कुणालाच काहीच माहिती नव्हती. मात्र अमेरिकन मराठी मिशनबाबत माहिती असणारी पुस्तके आणि इतर साहित्य मिळवून देण्यात वरील सर्वांनी अगदी मनापासून मदत केली.
सुरुवातीला काही दिवस पुण्यातल्या `सकाळ' दैनिकाच्या मुख्यालयातल्या वाचनालयात खुर्चीवर मांड ठोकून मी य दि फडके, हरी नरके, स. गं. मालशे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पंढरीनाथ सीताराम पाटील, रा, ना. चव्हाण यांनी लिहिलेली किंवा संपादित केलेली महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या कार्याबाबत असलेली अनेक लेख आणि पुस्तके नजरेखालून घातली. `सकाळ' वाचनालयात ग्रंथपाल सुरेश खराटे यांनी संदर्भयोग्य पुस्तके मिळवून दिली.
अन या प्रयत्नांतून साकार होत गेले अमेरिकेतून हिंदुस्थानात येणाऱ्या पहिल्यावहिल्या अविवाहित महिला मिशनरी, मुंबईत आणि नंतर अहमदनगरमध्ये मुलींसाठी डे-स्कुल आणि बोर्डिंगा चालवणाऱ्या मिस सिंथिया फरार यांचे व्यक्तिमत्त्व आणि स्त्रीशिक्षणासाठी आणि महिला सबलीकरणासाठी त्यांनी अनेक वर्षे केलेली धडफड.
फरार मॅडमचा खराखुरा फोटो मात्र अजूनतरी माझ्या पाहण्यात आलेला नाही.
माझ्या या प्रयत्नांतून उभे राहिले सिंथिया फरार यांचे छोटेखानी का होईना पण पहिलेवहिले चरित्र.
सन १८२७ ला अमेरिकेतून येऊन या देशातील स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खाणाऱ्या आणि तीसपस्तीस वर्षांनंतर येथेच देह ठेवणाऱ्या जन्माने परदेशी असलेल्या या समाजसुधारक महिलेच्या व्यक्तिगत जीवनाची आणि कार्याची आजच्या महिलादिनी ओळख देणे ही माझ्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.
आजच्या या महिलादिनी फरारबाईंना माझी हिच आदरांजली.