Did you like the article?

Sunday, March 29, 2026

भारतातील आधुनिक शिक्षणपद्धतीचा एक जनक गॉर्डन हॉल

द्विशताब्दी स्मृतीवर्ष २० मार्च २०२६ पासून

दोनशे वर्षांपूर्वी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या कामगिरीवर निघालेल्या तीन व्यक्तींनी १२ फेब्रुवारी १८१३ रोजी मुंबई बंदरात पाय ठेवला. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट  या त्या तीन व्यक्ती होत्या.  त्यांच्या आगमनाने या देशात सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारीक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. ख्रिस्ती धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट्य होते.  

ईस्ट इंडिया कंपनीचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार चालत होता आणि प्रचलीत ब्रिटिश कायद्यानुसार भारतात मिशनरींना येण्यास बंदी होती. त्यामुळेच विल्यम कॅरी यांना डॅनिश वसाहत असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्यांना मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती. ब्रिटिश संसदेने १८१३च्या जुलैत ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण केले आणि त्यानुसार या मिशनरींना भारतात काम करण्याची मुभा देण्यात आली.

गॉर्डन हॉल आणि त्यांच्या सहकारी मिशनरींनी मुंबईत आणि इतरत्र मुलांमुलींसाठी आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडून एक सामाजिक क्रांती घडवली. कॉलऱ्याच्या साथीत रूग्णांना औषधोपचार देताना गॉर्डन हॉल यांचे नाशिकजवळ दोडी दापूर येथे २० मार्च १८२६ रोजी मृत्युमुखी पडले. दिनांक २० मार्च २०२६ पासून त्यांचे द्विशतकी स्मृतीवर्ष सुरु होत आहे.  

श्री. म. पिंगे यांनी `युरोपिअनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' या आपल्या ग्रंथात म्हटले आहे: ``हॉल व नॉट हे मुंबईत राहिल्यानंतर व मराठी शिकल्यानंतर सन १८१५ मध्ये त्यांनी इंग्रजी शाळा काढली. त्यात प्रथम २५ मुले होती. याशिवाय दोन व्हर्नाक्युलर शाळांत ४० मुले होती. पुढील वर्षी शाळांची संख्या वाढली व एकंदर ३०० विद्यार्थी झाले. इ. स. १८१८ मध्ये ११ शाळा व ६०० विद्यार्थी होते. ’’   रेव्हरँड इमॅन्युएल बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या लिहिलेल्या अहवालानुसार १८१५ च्या मे महिन्यात मध्य भारतातील हिंदू मुलांच्या पहिल्याच आणि एकमेव शाळेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या नोंदीनुसार या मिशनरींच्या शाळेत अंदाजे २५ विद्यार्थी होते.  अमेरीकन मिशनच्या शाळांची संख्या १८१८पर्यंत अकरा झाली आणि या शाळांत ६०० विद्यार्थी शिकत होते.

गॉर्डन हॉल यांनी मराठी शिकून नंतर या भाषेत लिहिलेल्या पुस्तकांची विस्तृत माहितीसुद्धा पिंगे यांनी आपल्या ग्रंथात दिली आहे.  ``सामान्य माणसाला लिहितावाचता आले तरच तो बायबल वाचू शकणार होता. त्यासाठी मिशनरी लोकांनी मुद्रणयंत्र आणले, बायबलची छपाई सुरु केली, शाळा सुरु केल्या. अमेरिकन मराठी मिशनच्या या मिशनरींनी आपलया आगमनानंतर केवळ चार वर्षांच्या कालावधीत २५ शाळा सुरु केल्या, त्यात बाराशे मुले होती,’’ असे `अमेरीकन मराठी मिशनची दीडशे वर्षे' या ग्रंथात नमूद केले आहे. 

स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे अशाप्रकारे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती आणि आधुनिक सार्वत्रिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला.

अमेरिकन मिशनने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडली. गंगाबाई या नावाची एक स्थानिक तरुणी या शाळेत शिकवत असे. दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली. या रोगाच्या साथीने मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने मुलींची ही शाळा बंद करावी लागली``या पहिल्या मुलींच्या शाळेतल्या पहिल्या एतद्देशीय महिला शिक्षिका असलेल्या या गंगाबाईंबद्दल इतर काहीच माहिती उपलब्ध नाही हे सांगायला आम्हाला खूप खेद होतो,’’ असे रेव्हरंड बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईत १८८१ साली साजरा झालेल्या अर्धशतकी वर्धापनावेळी सांगितले गेले.

सरोजिनी बाबर यांनी 'स्त्रीशिक्षणाची वाटचाल' या पुस्तकात लिहिले आहे.  इ स १८२४ मध्ये अमेरिकन मिशनरींनी मुंबईस एतद्देशीय मुलींच्याकरिता म्हणून एक खास अशी स्वतंत्र शाळा स्थापन केली होती. मुंबई इलाख्यातील ही मुलींची पहिलीच शाळा होय.’’

गॉर्डन हॉल यांचा विवाह मुंबईतच १९ डिसेंबर १८१६ रोजी मार्गारेट लुईस यांच्याशी झाला.  परदेशी मिशनरी कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या मृत्यूंचे दुःख सहन करावे लागत असेप्रत्येक घरात एकतरी अपत्याचे निधन झाले होते. १८३२ पर्यंत जन्मलेल्या ३० अपत्यांपैकी १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. इथल्या आरोग्याच्या समस्येमुळे गॉर्डन हॉल यांच्या पत्नीने आपल्या मुलांसह अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या पतीलासुद्धा त्यांनी तसा आग्रह केला, मात्र मायदेशी जाण्यास हॉल यांनी नकार दिला. गॉर्डन हॉल यांचे एक नातू रेव्हरंड जॉर्ज . हॉल हे अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त १९१३ साली मुंबईत मिशनरी म्हणून आले तेव्हा त्यांनी आपली आजी आणि आजोबा यांच्या शेवटचा निरोप घेतेवेळी झालेल्या हृदयद्रावक संभाषणाचे वर्णन केले आहे.

गॉर्डन हॉल हे नियमितपणे रोजनिशी लिहीत असत. हॉल यांनी आपल्या या रोजनिशीत महाबळेश्वर येथील मंदिरे आणि पाच नद्यांचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या झऱ्याविषयी नोंदी केल्या आहेत. तेथील हवामान उत्कृष्ट असल्याचे त्यांना आढळले; मात्र अन्नसामग्री इमारती महाग होत्या, तसेच तेथे पोहोचण्याचे अंतर अडचणी पाहता, एखाद्या मिशनरी कुटुंबाचे तेथे स्थलांतर करणे खर्चिक ठरेल, असे त्यांना वाटले.

मार्च १८२६ मध्ये हॉल आपल्या दोन तरुण सहकाऱ्यांसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे जाण्यास निघाले. तेथे कॉलऱ्याची तीव्र साथ असल्याने ते काही दिवस तेथेच लोकांची सुश्रुषा करण्यासाठी थांबले. त्यांनी आजारी लोकांना औषधे दिली, पुस्तके वाटली आणि उपदेशसुद्धा केला. मुंबईच्या परतीच्या प्रवासात दोडी दापूर या गावात त्यांनाही कॉलऱ्याची लागण झाली आणि २० मार्च १८२६ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या मिशनकार्याचा काळ केवळ १२ वर्षांचा होता.   




सावलीचा शोध' या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नरेंद्र चपळगावकर लिहितात: ``भारतात ज्या परिस्थितीत मिशनरींना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत. प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनरींना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठी भाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली. स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. ’’ 

``तो आवडता शिष्य, उत्कृष्ट मिशनरी आणि एक आद्य कार्यकर्ता होता', अशा शब्दांत अमेरिकन मराठी मिशनने गॉर्डन हॉल यांचे वर्णन केले आले आहे.  दोडी दापूर येथे त्यांचे दफन करण्यात आले, तेथे एक दगडी कबर बांधण्यात आली. मिशनरी ऍलन ग्रेव्ह्ज यांनी या समाधीला भेट दिल्यानंतर तेथे एक स्मृतीफलक उभारण्यात आला. त्यावर पुढील मजकूर कोरलेला होता :  ख्रिस्ताचा सेवक प्रेषित गॉर्डन हॉल येथे पुरला आहे. हा एकट्याच देवाची भक्ती त्याच्या एकल्या अवताराकडून तारण ही सांगायास येथे फिरत होता. या तारणाविषयी तुम्ही शोध करा. तुम्हासही पाहिजे. ''

दोडी दापूर येथील  गॉर्डन हॉल यांची कबर आणि त्यावरील स्मृतीफलक अगदी अलीकडच्या काळापर्यंत अगदी सुस्थितीत होती.  दहाबारा वर्षांपूर्वी तो स्मृतीफलक उखडून टाकला गेला होतानाशिक येथील गिरीश भालतिडक यांनी त्या स्मृतीफलकाचे तीनचार तुकडे मिळवले आणि ते एकत्र जोडून शरणपूर येथील आपल्या घरी ठेवले आहेत.

 Camil Parkhe 

 

 

^^^^^

 

 


Sunday, March 8, 2026


`टाइम्स ऑफ इंडिया'

 आज थोडं विषयांतर, थोडं स्मरणरंजन आणि

little Narcissism.....
या सहस्रकाच्या सुरुवातीला त्यावेळी नव्यानेच सुरु होणाऱ्या `टाइम्स ऑफ इंडिया'च्या पुणे आवृत्तीत रुजू झालो.

गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी म्हणजे डेक्कन जिमखान्यात ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या (बीसीएल) च्या मागे सडाफटिंग असलेला मी राहायचो आणि त्यावेळी कॅम्पात अरोरा टॉवरमध्ये असलेल्या इंडियन एक्सप्रेसच्या कार्यालयात मी येथून जायचो.

बीसीएल समोरच असलेल्या `टाइम्स ऑफ इंडिया'त लागलो तेव्हा ( लग्नानंतर ! ) थेट चिंचवडहून मी इथं यायचो.
त्यावेळी टाइम्सची ही इमारत अगदी नवीकोरी होती, शिवाजीनगरच्या बैठ्या इमारतीतून कार्यालय नुकतेच स्थलांतरित झाले होते.
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून पालखीची मिरवणूक आम्ही पाहायचो,

संत ज्ञानेश्वरांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन इथून अगदी व्यवस्थित व्हायचे, हे आजही आठवते.
तसे टाइम्सचे माझे संबध अगदी १९९१ च्या पुणे प्लस पासूनचे. पण हे सर्व डिटेल्स नंतर कधीतरी.
परवा एका कामानिमित्त इथं गेलो होतो, राहवले नाही म्हणून . म. टा. च्या एका तरुण पत्रकाराला विनंती करुन स्वतःची ही छबी काढून घेतली..
Camil Parkhe


Thursday, February 26, 2026

 

                            विश्रामबागवाडा

पुण्यात विश्रामबागवाडा येथे १८२१ साली संस्कृत (हिंदु) कॉलेज स्थापन झाले तेव्हा पुढील अनेक वर्षे ते केवळ ब्राह्मण लोकांसाठीच होते.
या कॉलेजातील शिक्षक आणि विद्यार्थीदेखील फक्त ब्राह्मणच असतील असा एक नियमच होता.
याचे कारण म्हणजे पुण्यातील पेशवाई नुकतीच - तीन वर्षांपूर्वीच - संपली होती आणि उच्च शिक्षण समाजातील सर्व घटकांना खुले करुन शहरात बहुसंख्य असलेल्या ब्राह्मण समाजाचा राग ओढवून घेण्याची ईस्ट इंडिया कंपनी सरकारची मुळीच इच्छा नव्हती.
त्यावेळी भारतातील विविध प्रांतांत ईस्ट इंडिया कंपनीचा सत्तेचा अंमल हळूहळू वाढत होता. असे असले तरी इथल्या समाजातील सामाजिक चालीरीतींमध्ये ढवळाढवळ करण्याचे कंपनी सरकारने हेतुपुरस्पर टाळले होते.
या देशात आधुनिक शिक्षण पद्धत आणण्यामागे कंपनी सरकारचे विशिष्ट हेतू आणि धोरण होते.
जोतिबा फुले यांच्या काळात स्कॉटिश मिशनरी जॉन मरे मिचेल हे मुंबई-पुण्यात कार्यरत होते. मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' हे त्यांचे आत्मचरित्र १८९८ साली स्कॉटलंडहून प्रकाशित केले.
या आत्मचरित्रात एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाजजीवनाचे, विविध घटनांचे चित्रण केले आहे.
ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याच्या हेतूने ब्रिटिश भारतात आलेल्या या मिशनरीने मायदेशी स्कॉटलंडला परतल्यानंतर हे पुस्तक लिहून पाश्चात्य जगताला संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांची ओळख करून दिली, त्याशिवाय देहू, आळंदी, पंढरपूर आणि जेजुरी या तीर्थक्षेत्रांविषयी लिहिले.
संत तुकारामांविषयी तर रेव्हरंड मरे मिचेल यांनी खूपच कौतुकास्पद लिहिले आहे.
``स्कॉटलंडमध्ये (रॉबर्ट ) बर्न्स इतका लोकप्रिय नसेल जितके तुकाराम ( ते स्वतःला तुका असेच संबोधतात) महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत,'' असे त्यांनी या आत्मचरित्रात लिहिले आहे.
हे जॉन मरे मिचेल तर जोतिबा फुले यांचे वैचारीक मार्गदर्शकसुद्धा होते. जोतिबांविषयी आणि पुण्यातील अनेक नामवंतांविषयी त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे.
विशेष म्हणजे संस्कृत कॉलेजचे प्रमुख मेजर थॉमस कँडी रजा घेऊन युरोपला परतले होते तेव्हा अल्पकाळासाठी जॉन मरे मिचेल संस्कृत कॉलेजचे प्राचार्य (व्हिझिटर) आणि मराठी-संस्कृत विभागाचे प्रमुख होते.
मरे मिचेल यांच्या शाळेत शिकण्यासाठी जोतिबांनी एका महार मुलाला पाठवले होते, त्याची हृदयद्रावक शोकांतिका `चटईचा विटाळ' मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात दिली आहे. धनंजय किर यांनी महात्मा फुले चरित्रात ही घटना सांगितली आहे.
जॉन मरे मिचेल यांनी पुण्यातील संस्कृत कॉलेजच्या ( आजचे डेक्कन कॉलेज ) जन्माची कहाणी पुढील शब्दांत सांगितली आहे:
``भारतात दिवाणी आणि फौजदारी न्यायालये चालवण्यासाठी भारतातील हिंदु आणि मुस्लीम कायदे माहिती असणे आवश्यक असल्याने गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने कोलकात्यात १७८२ला मुस्लीम कॉलेज आणि वाराणशी येथे १७९१ला संस्कृत कॉलेज सुरु केले.
पुण्यात विश्रामबागवाड्यात १८२१ साली संस्कृत कॉलेज सुरु झाले तेव्हा वाराणशी कॉलेजप्रमाणे हेसुद्धा केवळ ब्राह्मण लोकांसाठीच होते. ’’
काही काळानंतर मात्र ही परिस्थिती बदलली.
संस्कृत आणि मराठी भाषा तज्ज्ञ मेजर थॉमस कँडी यांची १८३७ साली संस्कृत कॉलेजचे प्राचार्य म्हणून नेमणूक झाली आणि वर्षभरातच या कॉलेजात समाजाच्या सर्व जातीधर्माच्या लोकांना शिक्षण खुले करण्याचा निर्णय झाला.
या निर्णयाने अपेक्षेप्रमाणे हाहाकार उडाला. या निर्णयाचा सर्वांत मोठा फ़टका आणि रोष प्राचार्य थॉमस कँडी यांनाच सोसावा लागला.


त्याआधी हे थॉमस कॅंडी हे कोण हे जाणून घेऊ या.
इंग्लंडमध्ये १३ डिसेंबर १८०४ रोजी जन्म झालेल्या थॉमस कँडी यांची ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात नेमणूक झाली आणि त्यानंतर भारतात त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्य केले.
मराठी भाषातज्ज्ञ म्हणून नाव कमावलेल्या थॉमस कँडी तयार केलेला इंग्रजी मराठी शब्दकोश आणि मराठी भाषेतील शुद्धलेखनाचे नियम यामुळे त्यांचे योगदान विशेष मोलाचे ठरते.
मराठी भाषेत इंग्रजीच्या धर्तीवर विरामचिन्हे रुढ करण्याचे श्रेय कँडी यांना दिले जाते
थॉमस कँडी यांचे `विरामचिन्हांची परिभाषा' हे मराठी भाषेतील हे शुद्धलेखनावरील १६ पानांचे पुस्तक सन १८५० मध्ये प्रकाशित झाले होते.
कँडी यांचे महाबळेश्वर येथे २६ फेब्रुवारी १८७७ रोजी निधन झाले. आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ पासून थॉमस कँडी यांचे १५० वे स्मृतीवर्ष सुरु होत आहे
विश्रामबागवाडा येथील संस्कृत कॉलेजात प्राचार्य थॉमस कँडी आणि कॉलेजातील ब्राह्मण शिक्षकवर्ग यांच्यात सोवळ्याओवळ्याच्या प्रश्नावर अनेक चकमकी उडाल्या.
नारायण विष्णू जोशी यांनी लिहिलेल्या `पुणे शहरचे वर्णन' (प्रकाशन १८६८ साल) या पुस्तकात याबाबत विस्तृत माहिती दिली आहे :
आपल्या या छोटेखानी पुस्तकात नारायण विष्णू जोशी लिहितात:
``मेहरबान मिस्तर चापलेन साहेब चीफ कमिशनर (मुख्य कारभारी ) यांस असे वाटले की काही तरी पुण्यातील लोकांस विद्याधन द्यावे म्हणून त्यांनी सरकारांत असे लिहिले की "हिंदूच्या विद्येचे जे उपयोगी भाग आहेत चांगले वृद्धिंगत करण्याकरिता एक विद्यालय घालावे. त्यास पैसे दक्षिणेसाठी जे ५००,००० रुपये आहेत. त्यांपैकी वीस हजार रुपये निराळे काढून विद्या खात्याकडे द्यावे. "
हे मंजूर होऊन आल्यावर सन १८२१ म्हणजे शा. शके १७४३ येथे पाठशाळा स्थापिली. त्यात न्यायशास्त्र, वेद ऋग्वेद व यजुर्वेद, धर्म शास्त्र व्याकरण, वैद्य, अलंकार इत्यादि विषय शिकविण्याकरितां गुरु व उपगुरु नेमले.
शंभर विद्यार्थी जमवून शाळा वाडा विश्रामबाग येथे स्थापित केली. त्यावर मुक्तसर न्यायशास्त्राचे शाळेचे गुरु रा. राघवाचार्य यांस नेमले. व त्यांनी गुरुचे काम चालवून खेरीज सर्वांवर अधिकाराचें (मुक्तसरीचे) काम त्यांनीच करावे असे ठरविले.
पाठशाळेची देखरेख कमिशनर साहेबच काहीं दिवस पहात होते. पुढे काम कलेक्टर साहेबाकडे आले.तरी काम बरोबर चालेना म्हणून त्यावर एका निराळ्याच मनुष्याची योजना करावी, असे ठरवून सन १८३७ चे फेब्रुवारी महिन्यात मेजर कँडी साहेबाची योजना केली.
यावेळेपासून काम फार सुरळीत रीतीने चालले.
ह्या शाळेत गणपतीच्या उत्साहासही फार खर्च होत असे. कथा, चक्री (ब्राह्मणांचे म्हणणे), खेरीज रोषणाई सर्व मिळून दोनशे रुपये खर्च होता असे सांगतात. दिपवाळीत सर्व विद्यार्थ्यांस तेथे अभ्यंगस्नान, खेरीज फराळास करंज्या, लाडू, अनारसे, कोडबुळी इत्यादि मिळत असे.
असा पेशवाईथाट त्यावेळेस या पाठशाळेत चालला होता. काही विद्यार्थ्यास दरमाहा पगार मिळत असे.
या पाठशाळेवर ज्या (कॅंडी ) साहेबाची नेमणूक झाली होती त्यास वाड्यात येण्याची परवानगी नसे.
दरवाजाच्या बाहेरून एक रस्ता पुढले दिवाणखान्यात जातो त्या वाटेने त्याने येऊन त्या दरवाज्यावरील दिवाणखान्यात बसावे. कोणास साहेबाचा विटाळ झाला असता त्याने घरी जाऊन सचैल स्नान करून यावे.
असे सांगतात की एक वेळ साहेब वाड्यात गेला म्हणून उदकशांति केली.
याप्रमाणे पूर्वी या शाळेत सोवळ्याचे माहात्म्य होते.
पुढे साहेबास शिवल्याशिवाय अथवा वाड्यात येऊ दिल्याशिवाय गत्यंतर नाहीं असे पाहून वस्त्रांतर करू लागले. पुढे राजास विटाळ मुळीच नाही, साहेबाने वाड्यात यावे पण बैठकीवर मात्र येऊ नये असे शास्त्रार्थ काढले.
या वर सांगितलेल्या गोष्टी म्हणजे गणपतीचा उत्साह (उत्सव), दिपवाळीचा थाट, सोवळ्या ओवळ्याचा बेत इत्यादि गोष्टींवरून आताच्या सर्व लोकांस आश्चर्य वाटेल.
त्या वेळेस हे जे सरकाराने केले ते मोठे शहाणपणाचे काम होते. जर या वेळेस इंग्रज लोक शास्त्री पंडित यांच्या मताप्रमाणे न वागते तर त्यांस सुधारायास फार दुःखे सोसावी लागती. त्याअर्थी त्यांनी या गोष्टी या वेळेस सहन केल्या म्हणून आता आपण आनंदाचीं फळे खाऊन सुख भोगीत आहो.
या वेळेस दयाळू कॅंडी साहेबांस किती बरे दुःखे सोसावी लागली असतील व किती सहनशिलता धरावी लागली असेल.
शास्त्र्यांनी सांगितले की आपण बूट घालून आमचे जाजमावर येऊ नये, वाड्यात नाष्टा करू नये, तर त्यानी त्यांचे ऐकावे.
आता जे विद्येचे सुख पुण्यातील लोक भोगितात त्यांचे मूळ हे साहेबच आहेत. त्यांनीच लोकांस गुलवून गुलवून त्यांची वेडीं मते इतकी फिरविली की, जे शास्त्री कॅंडी साहेबास शिवले असता स्नान करीत, त्यांचेच वंशजांस त्यांच्या डोक्यांतील वेडी मते काढून महारास शास्त्रे शिकविण्यास लाविले.
एतदर्थ ब्राह्मणांनी व विशेषेकरून अन्य जातीच्या लोकांनी ह्या दयाळू प्रामाणिक साहेबाचे उपकार कधीही विसरू नयेत.
येवढंच नव्हे, तर त्यांची स्मारक मूर्त्ति करून पुण्यात प्रसिद्ध स्थली उभी करावी.‘’
संस्कृत कॉलेजात यावेळी निर्माण झालेल्या वादळाविषयी धनंजय कीर यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या चरित्रात पुढील शब्दांत लिहिले आहे :
`` चॅप्लिन नावाच्या इंग्रज आयुक्ताने स्थापन केलेल्या पुणे संस्कृत पाठशाळेत फक्त ब्राह्मणांनाच प्रवेश मिळे. इतर जातींच्या हिंदूंना तीत प्रवेश नसे. ती पाठशाळा निरुपयोगी आहे असे १८३८ साली ठरले.
बराच विचारविनिमय करून आणि ब्राह्मणांची संमती घेऊन, पुढे १८५१ साली तिचे रूपांतर पुणे महाविद्यालयात करून, ते महाविद्यालय सर्व हिंदूंना खुले करण्यात आले. त्यामुळे पुणे शहरातील ब्राह्मणांचा संताप अनावर झाला.
त्याविषयी लिहिताना ``ज्ञानोदयाने असे म्हटले आहे की, ``ब्राह्मण भूदेव हे शिक्षणाचे दरवाजे सर्वांना सारखे उघडे झाले आहेत असे पाहून अत्यंत नाखूष झाले आहेत’’.
पुण्यातील ब्राह्मण पंडित भीतीने आणि रागाने थरथरत होते. त्यांनी सरकारच्या या धोरणाला कसून विरोध करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केला.
ब्राह्मण शिक्षकांनी ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकविण्यास नकार दिला; कारण त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्याचा अधिकार नव्हता. ती पडली देवभाषा, पवित्र वेदाची. ती अब्राह्मणांच्या जिव्हांनी विटाळविण्यास त्यांचा विरोध होता.
सनातनी हिंदूंनी पुणे महाविद्यालयाच्या चालकांस धमकी दिल्यावर त्या महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांनी त्या प्रकरणासंबंधी विचार करण्यासाठी ब्राह्मण पंडितांना काही दिवस सवड दिली. त्यामुळे सोनार, प्रभू, आणि इतर ब्राह्मणेतर जातींतील विद्यार्थी ह्यांना ते स्वतःच संस्कृत शिकवू लागले.
ब्राह्मण पंडित मात्र ब्राह्मण विद्यार्थ्यांना शिकवीत असत. बहुतेक ब्राह्मण पंडितांनी ``;ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत ही पवित्र भाषा शिकविण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊ,’’ अशी सरकारला धमकी दिली.
त्यावर ``ज्ञानोदया’ने असे लिहिले की, या प्रश्नाचा निर्णय भारतातील भागांत केव्हाच होऊन गेला आहे. कलकत्ता महाविद्यालयात सर्व जातींच्या मुलांना प्रवेश मिळतो, असे सांगून ज्ञानोदयाने पुढे म्हटले की, ब्राह्मणांनी अशा विचित्र कल्पनेत रममाण होण्याचे दिवस आता गेले आहेत. सार्वजनिक पैशातून आपली स्वतंत्र शिक्षणव्यवस्था व्हावी, आपणच देवाचे मोठे लाडके आहोत, नव्हे भूदेव आहोत असे म्हणणे, अशा कल्पनेत त्यांनी दंग होण्याचे दिवस आता राहिले नाहीत.
जर त्यांनी स्वत:च्या खर्चाने अशा शाळा चालविल्या तर आपल्या इच्छेप्रमाणे आणि भावनेप्रमाणे वागण्यास अर्थातच ते मोकळे आहेत. परंतु सरकारने या पोकळ मानापमानाच्या कल्पनेचे लाड करण्यासाठी आपल्या उत्पन्नातून पैसे खर्च करावे हे अयोग्य आहे. सार्वजनिक संस्था या सर्व वर्गाना खुल्या असल्याच पाहिजेत. ’’
धनंजय कीर पुढे लिहितात: ``ब्राह्मणांच्या ह्या स्वार्थपरायण अन् असहिष्णू वृत्तीचा धिक्कार करून, मुंबईतील 'प्रभाकर' साप्ताहिकाने असे म्हटले की, 'पुण्यातील ब्राह्मण पंडितांचे हे वर्तन अयोग्य आणि मूर्खपणाचे आहे. मुंबईत शेकडो ब्राह्मण पंडित प्रभूच्या, सोनारांच्या आणि तसेच युरोपियनांच्या घरी संस्कृत शिकवितात व वेदपठणही करतात,
पुण्यातील ब्राह्मण पंडितांनी ऋग्वेदाची प्रत सुधारून देऊन ती इंग्लंडमध्ये छापण्याकरिता सरकारकडे पाठविली याची आठवण 'प्रभाकर' साप्ताहिकाने ब्राह्मणांना करून दिली.
शेवटी 'प्रभाकर'ने पुण्यातील ब्राह्मण पंडितांना असा इशारा दिला की, 'त्यांच्या जागा दुसऱ्या विद्वान पंडितांकडून भरल्या जातील आणि ते कमी पगारावर काम करण्यास तयार आहेत.''
या घडामोडींबाबत धनंजय कीर यांनी यावर शेवटी पुढील शब्दांत टिपण्णी केली आहे:
``गंमत कशी आहे पाहा. याच सनातनी ब्राह्मण पंडितांनी गोमांस खाणाऱ्या मेजर थॉमस कँडींच्या हाताखाली संस्कृत शिकविण्यासाठी नोकरी धरली.
परंतु आपल्या धर्मबंधूंना संस्कृत शिकविले, तर धर्मच बुडेल अशी त्यांची समजूत होती.
त्यांच्या अडाणी समजुतीमुळे मेजर कँडींदेखील जेरीस आले. मेजर कँडीं हे परम दयाळू आणि अत्यंत शांत वृत्तीचे अधिकारी होते. परंतु त्याचा अर्थ ते मूर्ख किंवा अर्धवट आहेत, असा हे शहाणे करीत असत.’’
Camil Parkhe