Did you like the article?

Showing posts with label Operation Blue Star. Show all posts
Showing posts with label Operation Blue Star. Show all posts

Tuesday, February 14, 2023

 ``स्टॉप, स्टॉप.. किधर जा रहो हो?''

त्या चारपाच आणि लागोपाठ आलेल्या आवाजांनी मी जागच्या जागी थबकलो. दुसरा पर्यायच नव्हता. पूर्ण काळ्या युनिफॉर्मात असलेल्या त्या लोकांनी त्या जिन्याजवळच्या एका कोपऱ्यात मला पूर्ण घेरले होते आणि सर्वांच्या हातांत माझ्या दिशेने रोखलेल्या स्टेनगन्स होत्या.
तो आवाज ऐकून एव्हाना पणजीतल्या त्या हॉटेल फिदाल्गोच्या रिसेप्शन काऊंटरपाशी आणि आजूबाजूला उभे असलेले इतर युनिफॉर्ममध्ये आणि सध्या पोशाखातले इतर अधिकारी माझ्याभोवती गोळा झाले होते. पण खरे सांगायचे म्हणजे मी अजिबात टरकलेलो नव्हतो.
मी घाबरण्याचा काही प्रश्नच नव्हता. इथे आता माझ्यासमोर उभे असलेल्या गोव्याच्या ज्येष्ठ सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये गोव्याचे सर्वात ज्येष्ठ असलेले इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (आयजीपी) होते, जिल्हाधिकारी होते, पोलिस अधिक्षक होते आणि हे सर्व अधिकारी नवहिंद टाइम्सचा क्राईम आणि कॅम्पस रिपोर्टर म्हणून मला व्यक्तीश: ओळखत होते.
त्यामुळे आज बाहेरुन आलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मला येथे जिन्यातच अडवून धरले असले तरी त्यांना `मी कोण' हे स्थानिक अधिकारी सांगणार होतेच.
ही घटना आहे ऐंशीच्या दशकातली. साल बहुधा १९८६ असावे. पणजी येथल्या १८वा जून रोडवर असलेल्या हॉटेल फिदाल्गो येथे असलेल्या एका कार्यक्रमासाठी वेळेवर येण्यास मला उशीर झाला होता. संध्याकाळचे सहा वाजले होते. माझी दुचाकी हॉटेलच्या दारापाशी लावून घाईघाईने माझी चामडी बॅग खांद्याला लावून हॉटेलात घुसून जिन्याच्या दिशेने मी धाव घेतली त्याचवेळी हा प्रकार घडला होता.
केंद्रिय गृहमंत्री बुटा सिंग यांच्या कार्यक्रमाची असाईनमेंट त्या दिवशी मला लावण्यात आली होती, बहुधा तो दिवस रविवार असावा, कारण त्या दिवशी मुख्य वार्ताहर प्रमोद खांडेपारकर यांची सुट्टी असल्याने तो महत्त्वाचा कार्यक्रम माझ्या नावावर लावण्यात आला होता. कार्यक्रम बहुधा वेळेत सुरु झाला होता आणि मी तेथे उशिरा पोहोचल्यावर या स्टेनगनधारी लोकांनी मला असे घेरले होते.
आता `मी कोण?' हे सांगण्याची पाळी माझ्यावर आली होती.
`I am Camil Parkhe, .. I am a reporter of The Navhind Times and I have this invitation to cover this pogrammeee.'',
माझे आय-कार्ड आणि कार्यक्रमपत्रिका दाखवत मी सांगितले.
एव्हाना गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे आयजीपी आणि कलेक्टरसाहेब माझ्या मदतीला धावले होते आणि माझ्या म्हणण्यास ते दुजोरा देत होते.
मात्र तरीसुद्धा दिल्लीहून आलेल्या साध्या वेशातल्या आणि करड्या नजरेच्या त्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे समाधान झाले नव्हते. माझ्या खांद्यावर अडकवलेली ती बॅग खोलून आतल्या वस्तू दाखवण्यास त्यांनी मला करड्या आवाजात सांगितलेे. त्यात मला काहीच प्रॉब्लेम नव्हता.
मात्र तिथेच घात झाला !
युरोपात बल्गेरिया इथे पत्रकारितेचा अभ्यासक्रमासाठी गेल्यावर तेथून परतताना बरोबर आणलेल्या माझ्या मौल्यवान संग्रहात एक नाजूकसा पोर्टेबल टाईपरायटर, एक छोटासा रशियन-मेड कॅमेरा आणि ही आकर्षक चामडी बॅग होती. ही बॅग घेतल्यानंतर लगेचच बातमीदाराच्या त्या पारंपारिक शबनम बॅगला मी लगेच निरोप दिला होता.
गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टसचा (गुज) सरचिटणीस आणि वृत्तपत्र कामगार चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून माझी युरोपच्या बल्गेरिया आणि सोव्हिएत रशियाच्या या दौऱ्यासाठी माझी अग्रक्रमाने निवड करण्यात आली होती . `गुज'चा जनरल सेक्रेटरी म्हणून दररोज माझे काही ना काही काम असायचेच. त्यामुळे आज माझ्या त्या बॅंगमध्ये `त्या' दोन गोष्टी सापडणे साहजिकच होते.
`त्या' दोन गोष्टी होत्या, गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टर्सचा लालभडक रंगातील एकदिड मिटर आकाराचा बॅनर आणि `गुज'चे एक लेटरपॅड.
त्याकाळात देशातील सर्वच कामगार चळवळीत डाव्यांचा आणि समाजवाद्यांचा प्रभाव असायचा आणि युनियनचा झेंडा हमखास क्रांतीचे चिन्ह असणाऱ्या लाल रंगात असायचा ! जॉर्ज फर्नांडिस हे तर त्यावेळी माझे दैवत होते.
`गुज'चे म्हणजे एका कामगार संघटनेचा लाल रंगातला तो फलक पाहिल्यावर त्या सुरक्षा अधिकाऱ्यांची मुद्रा अधिकच कठोर झाली.
केंद्रिय गृहमंत्र्यांच्या भर कार्यक्रमात असा लाल फलक फडकवण्याचा माझा हेतू असेल तर आता ते शक्य होणार नव्हते.
माझ्या बॅगमधील तो लाल फलक पाहून माझ्या मदतीला धावून आलेल्या गोव्यातील ते सनदी आणि पोलीस अधिकारी आता दोन पावले मागे सारले. त्यांचे चेहेरे आता साफ पडले होते.
अर्थात माझ्या हेतूंबद्दल त्यांना काहीही शंका नसली तरी माझ्या मदतीसाठी आता ते फार काही करु शकत नव्हते हे मलाही कळून चुकले होते.
``हो, मी `गुज'चा - गोव्यातल्या पत्रकारांच्या युनियनचा - जनरल सेक्रेटरी आहे, हे माझे त्यासंबंधीचे ओळखपत्र..त्यामुळे माझ्याजवळ हा फलक आणि लेटरहेड नेहेमीच असते, '' या माझ्या स्पष्टीकरणाने त्या दिल्लीतल्या अधिकाऱ्यांचे समाधान झाल्याचे दिसले आणि मग त्यांनी लगेच तोडगा काढला.
कामगार संघटनेचा तो लाल फलक, लेटरहेड आणि इतर वस्तू असलेली माझी ती बॅग मी हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरपाशी ठेवावी आणि बातमीदार या नात्याने केवळ नोटपॅड आणि पेन घेऊन मी पहिल्या मजल्यावर सुरु असलेल्या कार्यक्रमास जावे अशी त्यांची सूचना होती.
कार्यक्रम तर कधीच सुरु झाला होता, त्यामुळे ती सूचना मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. केंद्रिय गृहमंत्र्यांच्या भाषणाची बातमी चुकवणे माझ्यासारख्या ज्युनियर रिपोर्टरला महाग पडले असते.
हातात स्टेनगन्स घेतलेल्या त्या ब्लॅक कॅट्स कमांडोजच्या माझ्यावर रोखलेल्या नजरा सांभाळत मी जिन्याच्या आठदहा पायऱ्या चढलो आणि त्या हॉलमध्ये प्रवेश केला.
समोरच पहिल्या रांगेतल्या पत्रकार कक्षात माझे पत्रकार सहकारी नवप्रभाचे गुरुदास सावळ, गोमंतकचे सुरेश काणकोणकर, राष्ट्रमतचे बालाजी गावणेकर वगैरे बसले होते, त्या पहिल्या रांगेत मी बसलो तरी प्रचंड रागाने मी धुमसतच होतो.
कार्यक्रमाचे आयोजक त्यावेळी बोलत होते. व्यासपीठावर केंद्रिय गृहमंत्री बुटा सिंग आणि इतर व्यक्ती बसल्या होत्या आणि स्टेजवर दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन असे चार ब्लॅक कॅट्स कमांडोज होते, मला जिन्यात ज्यांनी अडवले होते त्यांच्याचसारखे.
मुख्य पाहुणे बुटा सिंग बोलण्यासाठी पुढे आले तेव्हा लगेचच दोन ब्लॅक कॅट्सनी त्यांच्यापुढे स्टेनगन्स घेऊन पोझिशन घेतली आणि भाषण संपेपर्यंत ते तिथेच उभे राहिले.
ह्या नॅशनल सेक्युरिटी गार्डसच्या (एनएसजी ) किंवा ब्लॅक कॅट्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुरक्षायंत्रणेविषयी मी वाचले होते, पण आता पहिल्यांदाच या ब्लॅक कॅट्सना मी असे प्रत्यक्षात पाहत होतो.
पंजाबमध्ये सुवर्णमंदिरात ऑपेरेशन ब्ल्यु स्टार मोहिमेनंतर तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या सुरक्षासैनिकांकडून हत्या झाल्यावर व्हीआयपींसाठी या अत्यंत दक्ष आणि कार्यक्षम असलेल्या ब्लॅक कॅट्सची खास सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्यात आली होती.
कार्यक्रम संपल्यावर केंद्रिय मंत्री बुटा सिंग हॉलच्या बाहेर जाईपर्यंत आम्हा सर्वांना आपल्या जागीच थांबण्याची सूचना केली होती, मुख्य पाहुणे गेले, त्यांच्याबरोबर ते ब्लॅक कॅट्सही गेले आणि वातावरण एकदम सैल झाले.
काही आठवड्यांपूर्वी पंजाब येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत मोठा बाका प्रसंग घडला. आपण `थोडक्यात जिवानिशी वाचलो' अशी खुद्द पंतप्रधानांची भावना झाली.
पंजाबच्या निवडणुक दौऱ्यातल्या सभेत आजही पंतप्रधानांनी त्यांच्या त्या भयकथेला उजाळा दिला
माझ्याबाबत अशीच घडलेली ही घटना मग मलाही आठवली.

Friday, January 22, 2021

 खुशवंत सिंग - पत्रकारितेतील 'पहिल्या बॉस 'चे 'पहिले बॉस '

"खुशवंत सिं"खुशवंत सिंगांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले. शवंत सिंगांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले. गांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले. शवंत सिंगांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले.

खुशवंत सिंगांनीं आपला सन्मान निषेध म्हणून परत करणे आमच्या दृष्टीने एक मोठी बातमी होती. पीटीआयची ती बातमी पाहताच ऑफिसमधले वातावरण बदलणे साहजिकच होते.
ते १९८४ साल होतं. नवहिंद टाइम्स या गोव्यातल्या इंग्रजी दैनिकातील मी एक तरुण वार्ताहर ऑफिसातील ते पेटलेले वातावरण आणि त्या अनुषंगाने झालेले गरमा-गरम संभाषण अगदी कुतूहलाने ऐकत होतो.
खुशवंत सिंग यांच्याविषयी ती बातमी ऐकल्यानंतर नवहिंद टाईम्समधील न्युजरूम मधील सर्वांनी उत्तेजित होणे तसे अगदी साहजिकच होते. खुशवंत सिंग यांच्याविषयी त्या दैनिकातील आम्ही बातमीदार आणि डेस्कवरची मंडळी गेली काही वर्षे खूप काही ऐकत होतो. इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाचे संपादक म्हणून खुशवंत सिंग यांची कारकिर्द देशभर गाजली होती.
त्या काळी बेनेट अँड कोलमन ह्या टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक असणाऱ्या कंपनीच्या मालकीच्या द इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाला देशातील सर्वांत लोकप्रिय साप्ताहिक बनविण्यात संपादक खुशवंत सिंग यांचा मोलाचा वाटा होता. खुशवंत यांनी इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया'चे संपादक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केल्यावर ते एकदम प्रकाशझोतात आले. इल्लस्ट्रेटेड विकली या पूर्णतः कौटुंबिक आणि पारंपरिक नियतकालिकाचे वितरण कित्येक पटींनी वाढविण्यास खुशवंत यांनी मोठा हातभार लावला. हे साप्ताहिक जास्तीत-जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक अपारंपरिक पद्धतीचा वापर केला. तोडक्या कपड्यांतील युवतींचे छायाचित्र त्यांनी `इलेस्ट्रेटेड विकली'त छापले तेव्हा मोठी खळबळ उडाली होती. त्या जमान्यात हे साप्ताहिक जवळ-जवळ सर्व नामांकित शिक्षणसंस्थांत तसेच अभिजन वर्गात वाचले जात असे.(आता बंद पडलेल्या साप्ताहिकाच्या काही मोजक्या कृष्णधवल प्रती माझ्याकडे अजूनही आहेत.)
खुशवंत सिंग यांच्या 'विथ मॅलिस टुवॉर्डस वन अँड ऑल' या सिंडिकेटेड आणि देशभरातील विविध भाषांतील वृत्तपत्रांत दर आठवड्याला प्रसिद्ध होणाऱ्या स्तंभलेखनाने त्यांना देशभर लोकप्रियता मिळवून दिली होती. बल्बमध्ये बसलेले खुशवंत सिंग पानाच्या भेंडोळ्यावर लिहित आहेत असे एक चित्र या स्तंभलेखासह प्रसिद्ध व्हायचे. देशातील इतर दैनिकांप्रमाणे नवहिंद टाइम्ससुद्धा खुशवंत सिंग यांचे हे सदर दर सोमवारी छापत असे. अनेक मराठी वर्तमानपत्रांतही हे सदर प्रसिद्ध व्हायचे.
या स्तंभात खुशवंत सिंग आपल्या खुसखुशीत शैलीत कुणाचाही मुलाहिजा न ठेवता विविध क्षेत्रांत संचार करत चौफेर टोलेबाजी करत असत. त्याकाळी एकाच वेळी अनेक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होणारे (सिंडिकेटेड) ते सर्वांत लोकप्रिय सदर होते. मला वाटते त्यांच्या या स्तंभलेखासारखा इतर कुठलाही स्तंभलेख त्याआधी इतका गाजला नव्हता आणि आताही त्यांच्या तोडीचा देशपातळीवरचा दुसरा स्तंभलेखक माझ्या नजरेसमोर नाही.
आचार्य अत्रे यांच्याप्रमाणेच विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ऑबिट किंवा मृत्युलेख लिहिताना खुशवंत यांची प्रतिभा अधिक बहरत असायची. जिवंत असताना ज्या व्यक्तीला आपल्या अग्रलेखातून धारदार टीकेने झोडपले अशा काही व्यक्तींच्या निधनानंतर आचार्य अत्रे यांनी मृतलेखांत त्यांचे खूप गुणगान केले आहे. अत्रे यांनी तर पंडित नेहरूसारख्या अनेक लोकांवर मृत्युलेखांची मालिकाच लिहिली आहे.
याच्या अगदी उलट खुशवंत सिंगांची पद्धत.
खुशवंत सिंगांची मृत्युलेखाची शैलीच अफलातून होती. मृत व्यक्तींचे अनेक वादग्रस्त किस्से आणि विविध लफडी ते या मृत्युलेखातून बाहेर काढायचे. मृत व्यक्ती बदनामीचा दावा दाखल करू शकत नाही, अशी त्यांची यावरची मल्लीनाथी असायची. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रजनी पटेल यांच्यावरच्या खुशवंत यांच्या मृत्युलेखाने तर १९८२ साली मोठे वादळ निर्माण केले होते. खुशवंत यांच्यावरील चरित्रलेख रजनी पटेल यांच्यावरील त्या गाजलेल्या मृत्युलेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
पण खुशवंत सिंग यांच्या पद्मभूषण किताब परत करण्याच्या बातमीने आमच्या वृत्तपत्र ऑफिसातले वातावरण तापण्याचे कारण दुसरेच होते.
माझ्या बीए परिक्षेचा निकाल लागायच्या आधीच नवहिंद टाइम्स मध्ये बातमीदार म्हणून मी ऑगस्ट १९८१ला रुजू झालो होतो. त्याआधी जेमतेम काही महिने आधी बिक्रम व्होरा संपादक म्हणून आणि एम. एम. मुदलियार वृत्तसंपादक ही जोडगोळी गोव्याबाहेरुन आली होती. या दरम्यानच्या काळात आम्हां सर्वांना माहित झाले होते कि संपादक बिक्रम व्होरा यांनी पत्रकारितेची सुरुवात खुशवंत सिंग यांच्या हाताखाली केली होती. व्होरा यांनी ' इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया'त १९७० च्या दशकात काम केले होते आणि तेथे खुशवंत सिंग हे त्यांचे पहिले बॉस होते.
सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या लष्करी कारवाईचा निषेध म्हणून पद्मभूषण हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान परत करण्याचा खुशवंत सिंग यांचा निर्णय योग्य कि नाही यावर आमच्या दैनिकातील पत्रकारांत चर्चा सुरु झाली होती. खरे पहिले तर याबाबत मुळी दुमत नव्हतेच. आमच्या दैनिकातील न्युज डेस्कच्या लोकांत आणि बातमीदारांत सुवर्णमंदिरात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या लष्करी कारवाईला पूर्ण समर्थन होते. या पवित्र स्थानी अतिरेक्यांनी कबजा घेतल्याने या कारवाईची गरज होती, असेच सर्वांचे म्हणणे होते.
पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचे कट्टर समर्थक असलेल्या खुशवंत सिंग यांना मात्र शीख समाजाच्या या अतिपवित्र स्थानाच्या अगदी गाभाऱ्यात शिरुन केलेली लष्करी कारवाई मुळीच आवडली नव्हती. त्या रागात त्यांनी तडकाफडकी पद्मभूषण परत करण्याचा निर्णय घेतला होता. अलिकडच्या काळात सरकारी मानसन्मान परत देऊन सरकारच्या काही निर्णयांचा निषेध करण्याची टूम निघाली असली तरी खुशवंत सिंग यांचा हा त्यावेळचा निर्णय नक्कीच धक्कादायक होता. मला वाटते स्वातंत्र्योत्तर काळात असे पहिल्यांदाच घडत होते. (त्यानंतर बऱ्याच काही वर्षांनी अण्णा हजारे यांनी आपली पदमश्री परत करण्याची धमकी देण्याचे आणि ९ ऑगस्ट क्रांतिदिनीं उपोषण सुरु करण्याचे सत्र सुरु केले.)
सुवर्णमंदिरातील कारवाईवरील मुद्द्याची जागा आता दुसऱ्याच एका वादाने घेतली. आता कळीचा मुद्दा असा होता कि खुशवंत सिंग हे आपला पद्मभूषण 'किताब परत देत आहेत ही बातमी आमच्या दैनिकात कुठल्या पानावर घ्यावी.
नवहिंद टाइम्स किंवा त्याकाळात बहुतेक सर्वच स्थानिक आणि प्रादेशिक वृत्तपत्रांत पान एकवर बहुतांश वेळेस राष्ट्रीय म्हणजे दिल्लीतल्या आणि अगदी आंतरराष्ट्रीय बातम्यांनाच जागा मिळायची. त्याकाळात वृत्तपत्राचे पान एक आणि संपादकीय पान ही दोन्ही पाने अत्यंत महत्त्वाची म्हणजे पवित्र मानली जात असत. गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक असलेल्या आमच्या नवहिंद टाइम्स मध्ये पान एकवर स्थानिक बातम्या क्वचितच असायच्या. आम्हा बातमीदारांना आमच्या बातम्यांना पान एकवर जागा मिळाली तर त्या दिवशी फार काही कमावले असे वाटायचे.
खुशवंत सिंग यांची पुरस्कार वापसीची ( 'घर वापसी' मुळे तयार झालेला हा शब्द त्याकाळी अर्थातच रुढ नव्हता) बातमी देऊन त्यांचे उगाचच उदात्तीकरण होईल आणि सुवर्णमंदिरावरील कारवाई अयोग्य होती असा संदेश दिला जाईल असा त्या न्यूजरुममधील मतप्रवाह होता.
चिरुट ओढणाऱ्या आणि बिक्रम व्होरांपेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे असणाऱ्या आमच्या वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांनी सौम्यपणे म्हटले कि ही बातमी आतल्या पानावर घ्यावी. तेथे उपस्थित असलेल्या इतरांनीही त्यांच्या म्हणण्याला ताबडतोब पुस्ती जोडली.
संपादकांच्या केबिन मध्ये उपस्थित असलेल्या जवळ-जवळ सर्वांचं याबाबत एकमत होतं कि खुशवंत सिंगांची पद्मभूषण परत करण्यासंबंधीची बातमी आतील पानावर इतर राष्ट्रीय बातम्यांबरोबर घ्यावी.
संपादक बिक्रम व्होरा यांना मात्र ही बातमी पान एकच्या लायकीची आहे असे वाटत होते. पण संपादकिय बैठकीत असे मत असणारे ते एकटेच होते. ते अल्पमतात गेले होते.
अखेरीस बिक्रम व्होरा यांनी हताशपणे आपले हात वर केले आणि संपादक या नात्याने आपल्याकडे असणारे ब्रह्मास्त्र आपण आता वापरणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.
"कम ऑन एव्हरी वन , हॅव्ह सम हार्ट ! तुम्हा सगळ्यांना चांगलं माहित आहे कि खुशवंत सिंग हे पत्रकारितेतील माझे पहिले बॉस होते. आणि तरीसुद्धा तुम्ही सगळे एक होऊन ही बातमी आतल्या पानावर ढकलण्याचा प्रयत्न करताय का? ठीक आहे, तर मग मी माझा नकाराधिकार वापरत आहे. ही बातमी उद्याच्या अंकात पान एक वर जाईल, पानाच्या फोल्डच्या खाली पण फक्त कॉलम विथ खुशवंतस फोटो !" त्यांनी जाहीर केले. आता यावर चर्चा शक्य नव्हती.
संपादक बिक्रम व्होरा आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले मुदलियार हे आमच्या दैनिकातील स्वभावाने आणि वृत्तीने दोन अगदी दोन विरुद्ध टोके असली तरी ती दोन आपसांत सतत भांडणारी सत्ताकेंद्रे नव्हती. व्होरा यांच्या व्हेटो वापरण्याच्या निर्णयावर सर्वानी अगदी हसत हसत शिक्कामोर्तब केले आणि सगळे आपापल्या कामाला लागले.
या सर्व निर्णयप्रक्रियेत सर्वात ज्युनियर असल्याने माझा काहीही सक्रिय सहभाग नसला तरी एक साक्षीदार म्हणून माझी भूमिका होती. चार दशकांपूर्वी त्यादिवशी हे जे काही घडले ते मला आजही असे ठळकपणे आठवतेय. .
खुशवंत सिंग यांनी जरी १९८४ साली पद्मभूषण सन्मान परत केला होता तरी भारत सरकारने २००७ साली त्यांना देशातील द्वितीय सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला.
माजी राज्यसभा सदस्य खुशवंत सिंग यांचे २०१४ साली वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी मी ऐकली तेंव्हा हा सारा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. बिक्रम व्होरा हे पत्रकारितेतील माझे पहिले बॉस होते. १९८५ साली त्यांनी ते गोव्याचं दैनिक सोडलं आणि आखाती देशात खलीज टाइम्स आणि इतर अनेक प्रतिष्ठेच्या दैनिकांत त्यांनी अनेक वर्षे मोठ्या पदांवर काम केले. आजही `टाइम्स ऑफ इंडिया'त ते स्तंभलेख लिहित असतात. .
खुशवंत सिंग यांनी पत्रकार आणि लेखक म्हणून आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केले आहे. एक पत्रकार आणि लेखक म्हणून खुशवंत सिंग त्यांच्या आयुष्यात एक असामान्य व्यक्तित्व होते. ते खूपच वादग्रस्त होते. जीवनविषयक त्यांचा दृष्टीकोण आणि त्यांच्या लिखाणासाठी त्यांचा जेव्हढा तिरस्कार केला गेला, अगदी तेव्हढेच प्रेमदेखील त्यांना मिळाले.
खलिस्तानी नेते जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि इतर खलिस्तान्यांच्या हिटलिस्टवर खुशवंत सिंग होते. त्यामुळे त्यांना खूप वर्षे सुरक्षा पुरवण्यात आली होती. टीकेबाबाबत खुशवंत यांनी कोणालाही मोकळे सोडले नाही, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांचे ते कडवे समर्थक आणि स्वयंघोषित चाहते होते, (नंतर मनेका गांधी यांचे ते पाठीराखे बनले ). मात्र त्यांनी या व इतर राजकीय नेत्यांचाही कधी मुलाहिजा ठेवला नाही.
खुशवंत सिंग आजच्या घडीला एक संपादक, स्तंभलेखक, लेखक असते तर त्यांना किती गोष्टींना सामोरे जावे लागले असते याची नुसती कल्पनाच केलेली बरे. समाज माध्यमांवर ते किती 'ट्रोल' झाले असते, त्यांच्यावर किती वेळा बदनामीचे आणि राष्ट्रद्रोहाचे खटले चालविले गेले असते वा न्यायालयांचा अवमान केल्याप्रकरणी चौकशीस सामोरे जावे लागले असते याचा नुसता अंदाज करता येईल.
खुशवंत सिंग एक सृजनशील लेखक होते. मला त्यांची पुस्तके वाचल्यानंतर त्यांच्याविषयी बरेच काही समजले आणि माझी खात्री झाली कि ते लोक समजत तसे अथवा त्यांनी स्वतःविषयी लिहिले तसे व्यक्तिमत्व नव्हते. त्यांची दिनचर्या ठरलेली असे व याबाबत ते खूप काटेकोर असत. रात्री नऊला झोपायला जाऊन पहाटे लवकर उठून ते लिखाण करत असत. त्यांची ही दिनचर्या पाळण्यासाठी आणि आगंतुक लोकांपासून त्यांचे सरंक्षण करण्याबाबत त्यांच्या पत्नीने मोलाची भुमिका पार पाडली. नव्वदी पार केल्यानंतरसुद्धा खुशवंत स्विमिंग पूलमध्ये पोहत असत. त्यांची शंभरी केवळ एका वर्षाने हुकली !
खुशवंत सिंग हे पत्रकारितेतील माझ्या पहिले बॉस असलेल्या बिक्रम व्होरा यांचे पहिले बॉस होते. हा खरे तर खुशवंत सिंगांशी माझा ओढूनताडून जोडलेला म्हणजे बादरायण संबंध वा व्हेरी रिमोट कनेक्शन ! पण खुशवंत सिंग आणि बिक्रम व्होरा या दोघांनीही पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले म्हणून त्यांच्याशी असलेले माझे हे संबंध माझ्या दृष्टीने अभिमानानेच आहे. खुशवंत सिंग हे खरे तर सर्व पत्रकारांचे आणि संशोधनात्मक लिखाण करणाऱ्या सर्वांचे स्फूर्तिस्थान आणि आदर्श आहेत.