Did you like the article?

Showing posts with label Padma Bhushan. Show all posts
Showing posts with label Padma Bhushan. Show all posts

Friday, January 19, 2024

फादर कामिल बुल्के !
श्रीरामपूरात आमचे घर मध्यवर्ती भागांत बाजारतळापाशी आहे. शहराची विभागणी रेल्वेच्या अलीकडे आणि पलीकडे अशी होते. दर रविवारी सकाळी आमच्या घरातली सर्व मंडळी देवळाला जाण्यासाठी रेल्वे ओलांडून जर्मन दवाखान्यापाशी म्हणजे संत लूक दवाखान्याकडे जायची.
यानिमित्ताने दर वेळेस आजही बेलापूर रेल्वे स्टेशन असे नाव असलेल्या (`बेलापूर स्टेशन: श्रीरामपूरके लिए यहा उतरीये') रेल्वे प्लॅटफॉर्मवरून जाणे व्हायचे.
साठ आणि सत्तरच्या दशकातली ही घटना आहे. वाचायला शिकल्यापासून मुख्य दरवाज्यापाशी वर असलेल्या एका फलकाकडे माझे नेहेमी लक्ष जायचे.
हिंदी राष्ट्रभाषा म्हणून वापरली जावे यासाठी काही महनीय व्यक्तींची वाक्ये त्या फलकावर लिहिली होती. महात्मा गांधी, आचार्य काका कालेलकर वगैरेंची वाक्ये त्यात होती.
यापैकी आचार्य काका कालेलकर यांचा सातारा जिल्ह्यातील नीरा या गावाविषयीचा एक धडा आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता.
त्या फलकावर असलेल्या एका नावाने मात्र मला अचंबित केले होते.
ते नाव होते फादर कामिल बुल्के !
तोपर्यंत माझ्यासारखे `कामिल' हे नाव असलेली इतर कुठलीही व्यक्ती मी पाहिली नव्हती आणि ऐकली नव्हती.
कोण असतील हे फादर कामिल बुल्के असा प्रश्न मनात यायचा. गोव्यात गेल्यानंतर मात्र कामिल नावाच्या कितीतरी व्यक्ती मला भेटल्या.
नंतर फादर कामिल बुल्के हे नाव मी विसरून गेलो. हिंदी राष्ट्रभाषासंबंधी काहीही विषय निघाला कि मात्र हे नाव लगेचच स्मृतीपटलावर लगेच वर यायचे, अजूनही येत असते.
नंतर मी स्वतःच जेसुईट फादर होण्यासाठी श्रीरामपूर सोडून गोव्यात गेलो, तेथेच अनेक वर्षे स्थिरावलो. जेसुईट असलेल्या आणि तेव्हाही हयात असलेल्या या फादर कामिल बुल्केची मात्र कधीच कुठे, पुस्तकांतसुद्धा गाठभेट झाली नाही.
काही वर्षांपूर्वी `मी ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या विषयावर इंग्रजी आणि मराठी पुस्तके लिहिली, तेव्हा अनेक वर्षे ओळखीचे असूनही गायब झालेल्या या फादर कामिल बुल्के यांची अचानक भेट झाली.
पण तोपर्यंत मी स्वतः संन्याशी जेसुईट होण्याचा विचार सोडून गृहस्थाश्रम स्विकारला होता.
मुळचे बेल्जीयम असलेले फादर कामिल बुल्के हे त्यांच्या हिंदी-इंग्रजी डिक्शनरीसाठी प्रसिद्ध आहेत, संपूर्ण बायबलचा हिंदी अनुवाद त्यानीं केला.
संस्कृत आणि हिंदी या भाषांचे पंडित असलेल्या या प्राच्यविद्या तज्ज्ञाचा भारत सरकारने पद्मभूषण 'किताब देऊन मानसन्मान केला आहे. राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी यांनी हा किताब फादर बुल्के यांना प्रदान केला.
त्याशिवाय भारत पारतंत्र्यात असताना हिंदी भाषेतून हिंदीतून डॉक्टरेट करणारे ते पहिलेच संशोधक.
आणि अलाहाबाद विद्यापीठातून डॉक्टरेट करण्यासाठी फादर कामिल बुल्के यांनीं प्रबंधासाठी विषय निवडला होता " राम कथा : उत्पत्ती और विकास'
ख्रिस्ती धर्मगुरू असलेले फादर कामिल बुल्के हे आजही राम कथा, तुलसी रामायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या राम चरीत मानस या विषयांवरचे तज्ज्ञ समजले जातात.
माझ्या `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या इंग्रजी आणि मराठी पुस्तकांत फादर बुल्के यांच्यावर एक प्रकरण आहे.
रामायणावर संशोधन करणाऱ्या एका ख्रिश्चन धर्मगुरूंचा हा थोडक्यात परिचय

कहाणी रामायणावर संशोधन करणाऱ्या एका ख्रिश्चन धर्मगुरूंची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 12 h ago
फादर कामिल बुल्के
फादर कामिल बुल्के

 

कामिल पारखे 
 
`रामायण' आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचा एक महान ठेवा. या दोन महाकाव्यांवर विविध दृष्टिकोनांतून आणि पैलूंनी सतत लिहिले गेले आहे. वाल्मिकीकृत रामायण जसे लोकप्रिय आहे तसेच उत्तर भारतात संत तुलसीदास यांनी रचलेले `रामचरितमानस' खूप लोकप्रिय आहे. या काव्याला `तुलसी रामायण' या नावानेही ओळखले जाते. युरोपातून आलेल्या आणि भारतालाच आपली कर्मभूमी बनवणाऱ्या एका ख्रिस्ती धर्मगुरूला या `रामचरितमानस'ने भुरळ घातली अन मग त्यानी अनेक वर्षे या हिंदी काव्यावर मूलभूत स्वरूपाचे मौलिक संशोधन केले. या जेसुईट धर्मगुरूंचे नाव आहे फादर कामिल बुल्के. 

फादर कामिल बुल्के यांचा जन्म १ सप्टेंबर १९०९ रोजी बेल्जियममध्ये झाला. कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी येशूसंघात दाखल होण्यापूर्वी त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. १९३५ मध्ये ते भारतात आले आणि १९४१ मध्ये धर्मगुरू म्हणून त्यांना गुरुदीक्षा देण्यात आली. कलकत्ता विद्यापीठात त्यांनी संस्कृत विषयात पदवी संपादन केली, त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी हिंदी विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’.  

विशेष बाब म्हणजे जन्माने युरोपियन असलेल्या फादर बुल्के यांचा हा प्रबंध अलाहाबाद विद्यापीठातील हिंदी साहित्यावरील पहिलाच हिंदी प्रबंध होता. तोपर्यंत भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये प्रबंध हे केवळ इंग्रजीतूनच लिहिले जात असत. रामकथेवर हिंदीतूनच प्रबंध लिहिण्यावर फादर कामिल बुल्के ठाम होते. अखेरीस विद्यापीठाने प्रचलित नियम बदलून हिंदी भाषेतून संशोधनात्मक प्रबंध लिहिण्यास त्यांना परवानगी दिली.  ही घटना आहे १९४५ ची. 

जन्माने बेल्जियम आणि ख्रिस्ती धर्मगुरु असलेल्या फादर कामिल बुल्के यांना १९४९ मध्ये हिंदी भाषेतील पहिली डॉक्टरेट पदवी मिळवण्याचा मान मिळाला. फादर बुल्के यांचा हा प्रबंध स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास सादर केला गेल्याने त्यांचे नाव प्रकाशझोतात आले. 

आपण हिंदी भाषा आणि तुलसीदासांच्या `रामचरितमानस'कडे कसे आकर्षित झाले याचे स्पष्टीकरण फादर कामिल बुल्के यांनी दिले आहे. त्यांची गुरुदीक्षा होण्याआधी पाच वर्षे ते झारखंड येथे जेसुईट संस्थेच्या एका शाळेत शिक्षक होते. त्यावेळी स्थानिक लोकांना इंग्रजी भाषेत संभाषण करणे अभिमानास्पद वाटे. स्थानिक संस्कृतीचे त्यांना फारसे ज्ञान किंवा अभिमान नव्हता असे त्यांना जाणवले.  त्याचवेळी कामिल बुल्के यांनी भारतीय भाषांमध्ये प्राविण्य मिळवण्याचा निर्धार केला.   

राम कथेवर संशोधन पूर्ण केल्यानंतर फादर कामिल बुल्के पुन्हा आपल्या कर्मभूमीकडे म्हणजे झारखंडला परतले. जेसुईट संस्थेच्या तेथे असलेल्या सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये फादर बुल्के यांनी संस्कृत आणि हिंदी विभागाची स्थापना केली.   

ख्रिस्ती धर्मगुरु म्हटले की आपल्या नजरेसमोर ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे लोक अशी प्रतिमा उभी राहते. मात्र सर्वच ख्रिस्ती धर्मगुरु  धर्मप्रसाराचे कार्य करत नाहीत. बहुतांश ख्रिस्ती धर्मगुरु शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, समाजसेवा वगैरे अनेक मिशनकार्यांत गुंतलेले असतात. 
 
कॅथोलिक चर्च ही जगातील एक सर्वांत मोठी संस्था आहे. चर्चच्या विविध कार्यांना वाहून घेणाऱ्या धर्मगुरुंच्या आणि धर्मभगिनींच्या संस्था-संघटनाही आहेत. उदाहरणार्थ, जेसुईट्स, डॉन बॉस्को आणि मदर तेरेसा सिस्टर्स. यापैकी `जेसुईटस' म्हणजे सोसायटी ऑफ जिझस या धर्मगुरूंच्या  संघटनेचे सदस्य. जेसुईट धर्मगुरुंनी शिक्षण, समाजकार्य, साहित्य वगैरे क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.
  
जेसुइट संस्थेचे मुंबईतील सेंट झेव्हियर कॉलेज तसेच जमशेदपूर येथील झेव्हियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट ही भारतातील अग्रगण्य मॅनेजमेंट शैक्षणिक संस्था आहे. पुण्यात लोयोला आणि सेंट व्हिन्सेंट या शाळा आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी आधुनिक शिक्षणसंस्था स्थापन केल्या, त्या जेसुईट मिशनरींच्या मिशनरी कार्याने प्रभावित होऊनच. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना ‘इंडियन जेसुइट्स’ असे संबोधन देण्यात आले आहे ते यामुळेच. फादर कामिल बुल्के याच परंपरेचे पाईक होते.   
 
श्रीरामपूरला दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी स्वतःही  गोव्याला जेसुईट धर्मगुरू होण्यासाठी गेलो होतो. त्या प्रशिक्षणाच्या पाच वर्षांच्या काळात येशूसंघीयांची काम करण्याची तळमळ, धडपड आणि अपार कष्ट घेण्याची, त्रास सहन करण्याची तयारी मी जवळून अनुभवली आहे. आताचे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेचे पहिलेच धर्मगुरु आहेत. 

बेल्जियममधून भारतात आल्यापासूनच फादर कामिल बुल्के या देशाच्या प्रेमात पडले. फादर बुल्के यांनी धर्मगुरुपदाचे कार्य पार पाडण्यासाठी सर्वप्रथम स्थानिक लोकांशी आणि संस्कृतीशी एकरूप होण्यावर अधिक भर दिला. त्यासाठी त्यांनी १९५० मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले.

अलाहाबाद विद्यापीठाने फादर कामिल बुल्के यांचा ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’ हा प्रबंध १९५० मध्ये प्रसिद्ध केला आणि त्या प्रबंधाची विस्तारित म्हणजे ८१८ पानांचे ‘रामकथा’ हे पुस्तक प्रकाशित झाले. रामकथेवर डॉक्टरेट मिळवल्यानंतरसुद्धा अनेक वर्षे  या विषयावर फादर बुल्के यांचे संशोधन सुरूच होते. आणि पुस्तकाच्या सुधारित आवृत्या प्रसिद्ध होत होत्या. या तीन आवृत्तींच्या प्रकाशनांवरुन जवळजवळ पंचवीस वर्षे फादर बुल्के हे रामकथेच्या कसे प्रेमात पडले होते हे दिसून येते.

फादर बुल्के यांची साहित्यक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन १९५० मध्ये बिहार राज्याच्या राज्यपालांनी बिहार साहित्य अकादमीचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य म्हणून केंद्र सरकारतर्फे त्यांची निवृत्ती करण्यात आली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक साहित्य संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. राष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले.

रामकथेच्या संशोधनानंतर फादर बुल्के यांनी इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती आणि संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करण्याच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. त्यांचा ‘इंग्रजी-हिंदी कोश’ १९६८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर या शब्दकोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. १९७७ मध्ये संपूर्ण नव्या कराराचा म्हणजे बायबलच्या दुसऱ्या खंडाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. संपूर्ण बायबलचा हिंदी अनुवाद १९८६ मध्ये प्रसिद्ध झाला. 

फादर बुल्के हिंदी भाषिक प्रदेशातील बिगर ख्रिस्ती समाजात ‘बाबा बुल्के’म्हणून ओळखले जात. हिंदी आणि संस्कृतव्यतिरिेक्त फादर बुल्के यांना हिब्रू, ग्रीक, लॅटिन भाषा अवगत होत्या. डच, फ्रेंच आणि जर्मन भाषांतसुद्धा ते उत्तमरीत्या संभाषण करत असत.

कॅथोलिक चर्चमध्ये आंतरधर्मीय सामंजस्याचे आणि सुसंवादाचे वारे १९६२मध्ये भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनंतर सुरू झाले, पण या परिषदेपूर्वीच फादर बुल्के यांनी या दिशेने वाटचाल सुरू केली होती. त्यामुळेच त्यांना अनेकदा विरोध आणि टीकेस तोंड द्यावे लागले. आज मात्र फादर बुल्के यांनी केलेल्या कार्यास सगळीकडे मान्यता मिळाली आहे. 

भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन महान कार्य केल्याबद्दल मदर तेरेसा यांना ‘भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सरकारने त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे रामकथेवर मूलभूत स्वरूपाचे संशोधन करणाऱ्या, इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती करणाऱ्या फादर कामिल बुल्के या जन्माने बेल्जियम असणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूचाही १९७४ मध्ये ‘पद्मभूषण' हा सन्मान देऊन गौरव करण्यात आला. 

प्राच्यविद्यापंडित, संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करणारे अनुवादक, हिंदी व संस्कृत भाषेचे पंडित म्हणून फादर बुल्के यांचा खास उल्लेख केला जातो. फादर बुल्के यांचा इंग्रजी-हिंदी शब्दकोश आजही नावाजला जातो. फादर बुल्के १९५० ते १९७७ या काळात यांची येथील सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये हिंदी आणि संस्कृत विषयांचे विभागप्रमुख होते. यावरून त्यांनी या विषयांमध्ये किती प्राविण्य मिळवले होते, याची कल्पना येते.

त्यांच्या निधनानंतर रेडिओवर आणि दूरदर्शनवर या प्राच्यविद्यापंडिताच्या कार्यावर आधारित खास कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता . त्यात एका हिंदी समीक्षकाने म्हटले होते की ‘जोपर्यंत जगात रामकथा सांगितली जाते, तोपर्यंत बाबा बुल्के हे नाव विसरले नाव विसरले जाणार नाही.’ 

फादर कामिल बुल्के यांच्या निधनानंतर पस्तीस वर्षांनी दिल्लीतील त्यांचे अवशेष त्यांच्या कर्मभूमीला म्हणजे रांची येथे नेण्यात आले आणि अनेक लोकांच्या उपस्थितीत तेथे समारंभपूर्वक पुरण्यात आले. रांची येथील सेंट झेव्हियर कॉलेजात त्यांचा एक अर्धपुतळा उभारण्यात आला असून तेथील रस्त्याला त्यांचे नावही देण्यात आले. 

- कामिल पारखे  
(लेखक पत्रकार असून ख्रिस्ती समाज आणि संस्कृती यांवरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.)

Camil Parkhe 

Friday, January 22, 2021

 खुशवंत सिंग - पत्रकारितेतील 'पहिल्या बॉस 'चे 'पहिले बॉस '

"खुशवंत सिं"खुशवंत सिंगांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले. शवंत सिंगांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले. गांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले. शवंत सिंगांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले.

खुशवंत सिंगांनीं आपला सन्मान निषेध म्हणून परत करणे आमच्या दृष्टीने एक मोठी बातमी होती. पीटीआयची ती बातमी पाहताच ऑफिसमधले वातावरण बदलणे साहजिकच होते.
ते १९८४ साल होतं. नवहिंद टाइम्स या गोव्यातल्या इंग्रजी दैनिकातील मी एक तरुण वार्ताहर ऑफिसातील ते पेटलेले वातावरण आणि त्या अनुषंगाने झालेले गरमा-गरम संभाषण अगदी कुतूहलाने ऐकत होतो.
खुशवंत सिंग यांच्याविषयी ती बातमी ऐकल्यानंतर नवहिंद टाईम्समधील न्युजरूम मधील सर्वांनी उत्तेजित होणे तसे अगदी साहजिकच होते. खुशवंत सिंग यांच्याविषयी त्या दैनिकातील आम्ही बातमीदार आणि डेस्कवरची मंडळी गेली काही वर्षे खूप काही ऐकत होतो. इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाचे संपादक म्हणून खुशवंत सिंग यांची कारकिर्द देशभर गाजली होती.
त्या काळी बेनेट अँड कोलमन ह्या टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक असणाऱ्या कंपनीच्या मालकीच्या द इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाला देशातील सर्वांत लोकप्रिय साप्ताहिक बनविण्यात संपादक खुशवंत सिंग यांचा मोलाचा वाटा होता. खुशवंत यांनी इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया'चे संपादक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केल्यावर ते एकदम प्रकाशझोतात आले. इल्लस्ट्रेटेड विकली या पूर्णतः कौटुंबिक आणि पारंपरिक नियतकालिकाचे वितरण कित्येक पटींनी वाढविण्यास खुशवंत यांनी मोठा हातभार लावला. हे साप्ताहिक जास्तीत-जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक अपारंपरिक पद्धतीचा वापर केला. तोडक्या कपड्यांतील युवतींचे छायाचित्र त्यांनी `इलेस्ट्रेटेड विकली'त छापले तेव्हा मोठी खळबळ उडाली होती. त्या जमान्यात हे साप्ताहिक जवळ-जवळ सर्व नामांकित शिक्षणसंस्थांत तसेच अभिजन वर्गात वाचले जात असे.(आता बंद पडलेल्या साप्ताहिकाच्या काही मोजक्या कृष्णधवल प्रती माझ्याकडे अजूनही आहेत.)
खुशवंत सिंग यांच्या 'विथ मॅलिस टुवॉर्डस वन अँड ऑल' या सिंडिकेटेड आणि देशभरातील विविध भाषांतील वृत्तपत्रांत दर आठवड्याला प्रसिद्ध होणाऱ्या स्तंभलेखनाने त्यांना देशभर लोकप्रियता मिळवून दिली होती. बल्बमध्ये बसलेले खुशवंत सिंग पानाच्या भेंडोळ्यावर लिहित आहेत असे एक चित्र या स्तंभलेखासह प्रसिद्ध व्हायचे. देशातील इतर दैनिकांप्रमाणे नवहिंद टाइम्ससुद्धा खुशवंत सिंग यांचे हे सदर दर सोमवारी छापत असे. अनेक मराठी वर्तमानपत्रांतही हे सदर प्रसिद्ध व्हायचे.
या स्तंभात खुशवंत सिंग आपल्या खुसखुशीत शैलीत कुणाचाही मुलाहिजा न ठेवता विविध क्षेत्रांत संचार करत चौफेर टोलेबाजी करत असत. त्याकाळी एकाच वेळी अनेक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होणारे (सिंडिकेटेड) ते सर्वांत लोकप्रिय सदर होते. मला वाटते त्यांच्या या स्तंभलेखासारखा इतर कुठलाही स्तंभलेख त्याआधी इतका गाजला नव्हता आणि आताही त्यांच्या तोडीचा देशपातळीवरचा दुसरा स्तंभलेखक माझ्या नजरेसमोर नाही.
आचार्य अत्रे यांच्याप्रमाणेच विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ऑबिट किंवा मृत्युलेख लिहिताना खुशवंत यांची प्रतिभा अधिक बहरत असायची. जिवंत असताना ज्या व्यक्तीला आपल्या अग्रलेखातून धारदार टीकेने झोडपले अशा काही व्यक्तींच्या निधनानंतर आचार्य अत्रे यांनी मृतलेखांत त्यांचे खूप गुणगान केले आहे. अत्रे यांनी तर पंडित नेहरूसारख्या अनेक लोकांवर मृत्युलेखांची मालिकाच लिहिली आहे.
याच्या अगदी उलट खुशवंत सिंगांची पद्धत.
खुशवंत सिंगांची मृत्युलेखाची शैलीच अफलातून होती. मृत व्यक्तींचे अनेक वादग्रस्त किस्से आणि विविध लफडी ते या मृत्युलेखातून बाहेर काढायचे. मृत व्यक्ती बदनामीचा दावा दाखल करू शकत नाही, अशी त्यांची यावरची मल्लीनाथी असायची. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रजनी पटेल यांच्यावरच्या खुशवंत यांच्या मृत्युलेखाने तर १९८२ साली मोठे वादळ निर्माण केले होते. खुशवंत यांच्यावरील चरित्रलेख रजनी पटेल यांच्यावरील त्या गाजलेल्या मृत्युलेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
पण खुशवंत सिंग यांच्या पद्मभूषण किताब परत करण्याच्या बातमीने आमच्या वृत्तपत्र ऑफिसातले वातावरण तापण्याचे कारण दुसरेच होते.
माझ्या बीए परिक्षेचा निकाल लागायच्या आधीच नवहिंद टाइम्स मध्ये बातमीदार म्हणून मी ऑगस्ट १९८१ला रुजू झालो होतो. त्याआधी जेमतेम काही महिने आधी बिक्रम व्होरा संपादक म्हणून आणि एम. एम. मुदलियार वृत्तसंपादक ही जोडगोळी गोव्याबाहेरुन आली होती. या दरम्यानच्या काळात आम्हां सर्वांना माहित झाले होते कि संपादक बिक्रम व्होरा यांनी पत्रकारितेची सुरुवात खुशवंत सिंग यांच्या हाताखाली केली होती. व्होरा यांनी ' इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया'त १९७० च्या दशकात काम केले होते आणि तेथे खुशवंत सिंग हे त्यांचे पहिले बॉस होते.
सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या लष्करी कारवाईचा निषेध म्हणून पद्मभूषण हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान परत करण्याचा खुशवंत सिंग यांचा निर्णय योग्य कि नाही यावर आमच्या दैनिकातील पत्रकारांत चर्चा सुरु झाली होती. खरे पहिले तर याबाबत मुळी दुमत नव्हतेच. आमच्या दैनिकातील न्युज डेस्कच्या लोकांत आणि बातमीदारांत सुवर्णमंदिरात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या लष्करी कारवाईला पूर्ण समर्थन होते. या पवित्र स्थानी अतिरेक्यांनी कबजा घेतल्याने या कारवाईची गरज होती, असेच सर्वांचे म्हणणे होते.
पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचे कट्टर समर्थक असलेल्या खुशवंत सिंग यांना मात्र शीख समाजाच्या या अतिपवित्र स्थानाच्या अगदी गाभाऱ्यात शिरुन केलेली लष्करी कारवाई मुळीच आवडली नव्हती. त्या रागात त्यांनी तडकाफडकी पद्मभूषण परत करण्याचा निर्णय घेतला होता. अलिकडच्या काळात सरकारी मानसन्मान परत देऊन सरकारच्या काही निर्णयांचा निषेध करण्याची टूम निघाली असली तरी खुशवंत सिंग यांचा हा त्यावेळचा निर्णय नक्कीच धक्कादायक होता. मला वाटते स्वातंत्र्योत्तर काळात असे पहिल्यांदाच घडत होते. (त्यानंतर बऱ्याच काही वर्षांनी अण्णा हजारे यांनी आपली पदमश्री परत करण्याची धमकी देण्याचे आणि ९ ऑगस्ट क्रांतिदिनीं उपोषण सुरु करण्याचे सत्र सुरु केले.)
सुवर्णमंदिरातील कारवाईवरील मुद्द्याची जागा आता दुसऱ्याच एका वादाने घेतली. आता कळीचा मुद्दा असा होता कि खुशवंत सिंग हे आपला पद्मभूषण 'किताब परत देत आहेत ही बातमी आमच्या दैनिकात कुठल्या पानावर घ्यावी.
नवहिंद टाइम्स किंवा त्याकाळात बहुतेक सर्वच स्थानिक आणि प्रादेशिक वृत्तपत्रांत पान एकवर बहुतांश वेळेस राष्ट्रीय म्हणजे दिल्लीतल्या आणि अगदी आंतरराष्ट्रीय बातम्यांनाच जागा मिळायची. त्याकाळात वृत्तपत्राचे पान एक आणि संपादकीय पान ही दोन्ही पाने अत्यंत महत्त्वाची म्हणजे पवित्र मानली जात असत. गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक असलेल्या आमच्या नवहिंद टाइम्स मध्ये पान एकवर स्थानिक बातम्या क्वचितच असायच्या. आम्हा बातमीदारांना आमच्या बातम्यांना पान एकवर जागा मिळाली तर त्या दिवशी फार काही कमावले असे वाटायचे.
खुशवंत सिंग यांची पुरस्कार वापसीची ( 'घर वापसी' मुळे तयार झालेला हा शब्द त्याकाळी अर्थातच रुढ नव्हता) बातमी देऊन त्यांचे उगाचच उदात्तीकरण होईल आणि सुवर्णमंदिरावरील कारवाई अयोग्य होती असा संदेश दिला जाईल असा त्या न्यूजरुममधील मतप्रवाह होता.
चिरुट ओढणाऱ्या आणि बिक्रम व्होरांपेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे असणाऱ्या आमच्या वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांनी सौम्यपणे म्हटले कि ही बातमी आतल्या पानावर घ्यावी. तेथे उपस्थित असलेल्या इतरांनीही त्यांच्या म्हणण्याला ताबडतोब पुस्ती जोडली.
संपादकांच्या केबिन मध्ये उपस्थित असलेल्या जवळ-जवळ सर्वांचं याबाबत एकमत होतं कि खुशवंत सिंगांची पद्मभूषण परत करण्यासंबंधीची बातमी आतील पानावर इतर राष्ट्रीय बातम्यांबरोबर घ्यावी.
संपादक बिक्रम व्होरा यांना मात्र ही बातमी पान एकच्या लायकीची आहे असे वाटत होते. पण संपादकिय बैठकीत असे मत असणारे ते एकटेच होते. ते अल्पमतात गेले होते.
अखेरीस बिक्रम व्होरा यांनी हताशपणे आपले हात वर केले आणि संपादक या नात्याने आपल्याकडे असणारे ब्रह्मास्त्र आपण आता वापरणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.
"कम ऑन एव्हरी वन , हॅव्ह सम हार्ट ! तुम्हा सगळ्यांना चांगलं माहित आहे कि खुशवंत सिंग हे पत्रकारितेतील माझे पहिले बॉस होते. आणि तरीसुद्धा तुम्ही सगळे एक होऊन ही बातमी आतल्या पानावर ढकलण्याचा प्रयत्न करताय का? ठीक आहे, तर मग मी माझा नकाराधिकार वापरत आहे. ही बातमी उद्याच्या अंकात पान एक वर जाईल, पानाच्या फोल्डच्या खाली पण फक्त कॉलम विथ खुशवंतस फोटो !" त्यांनी जाहीर केले. आता यावर चर्चा शक्य नव्हती.
संपादक बिक्रम व्होरा आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले मुदलियार हे आमच्या दैनिकातील स्वभावाने आणि वृत्तीने दोन अगदी दोन विरुद्ध टोके असली तरी ती दोन आपसांत सतत भांडणारी सत्ताकेंद्रे नव्हती. व्होरा यांच्या व्हेटो वापरण्याच्या निर्णयावर सर्वानी अगदी हसत हसत शिक्कामोर्तब केले आणि सगळे आपापल्या कामाला लागले.
या सर्व निर्णयप्रक्रियेत सर्वात ज्युनियर असल्याने माझा काहीही सक्रिय सहभाग नसला तरी एक साक्षीदार म्हणून माझी भूमिका होती. चार दशकांपूर्वी त्यादिवशी हे जे काही घडले ते मला आजही असे ठळकपणे आठवतेय. .
खुशवंत सिंग यांनी जरी १९८४ साली पद्मभूषण सन्मान परत केला होता तरी भारत सरकारने २००७ साली त्यांना देशातील द्वितीय सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला.
माजी राज्यसभा सदस्य खुशवंत सिंग यांचे २०१४ साली वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी मी ऐकली तेंव्हा हा सारा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. बिक्रम व्होरा हे पत्रकारितेतील माझे पहिले बॉस होते. १९८५ साली त्यांनी ते गोव्याचं दैनिक सोडलं आणि आखाती देशात खलीज टाइम्स आणि इतर अनेक प्रतिष्ठेच्या दैनिकांत त्यांनी अनेक वर्षे मोठ्या पदांवर काम केले. आजही `टाइम्स ऑफ इंडिया'त ते स्तंभलेख लिहित असतात. .
खुशवंत सिंग यांनी पत्रकार आणि लेखक म्हणून आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केले आहे. एक पत्रकार आणि लेखक म्हणून खुशवंत सिंग त्यांच्या आयुष्यात एक असामान्य व्यक्तित्व होते. ते खूपच वादग्रस्त होते. जीवनविषयक त्यांचा दृष्टीकोण आणि त्यांच्या लिखाणासाठी त्यांचा जेव्हढा तिरस्कार केला गेला, अगदी तेव्हढेच प्रेमदेखील त्यांना मिळाले.
खलिस्तानी नेते जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि इतर खलिस्तान्यांच्या हिटलिस्टवर खुशवंत सिंग होते. त्यामुळे त्यांना खूप वर्षे सुरक्षा पुरवण्यात आली होती. टीकेबाबाबत खुशवंत यांनी कोणालाही मोकळे सोडले नाही, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांचे ते कडवे समर्थक आणि स्वयंघोषित चाहते होते, (नंतर मनेका गांधी यांचे ते पाठीराखे बनले ). मात्र त्यांनी या व इतर राजकीय नेत्यांचाही कधी मुलाहिजा ठेवला नाही.
खुशवंत सिंग आजच्या घडीला एक संपादक, स्तंभलेखक, लेखक असते तर त्यांना किती गोष्टींना सामोरे जावे लागले असते याची नुसती कल्पनाच केलेली बरे. समाज माध्यमांवर ते किती 'ट्रोल' झाले असते, त्यांच्यावर किती वेळा बदनामीचे आणि राष्ट्रद्रोहाचे खटले चालविले गेले असते वा न्यायालयांचा अवमान केल्याप्रकरणी चौकशीस सामोरे जावे लागले असते याचा नुसता अंदाज करता येईल.
खुशवंत सिंग एक सृजनशील लेखक होते. मला त्यांची पुस्तके वाचल्यानंतर त्यांच्याविषयी बरेच काही समजले आणि माझी खात्री झाली कि ते लोक समजत तसे अथवा त्यांनी स्वतःविषयी लिहिले तसे व्यक्तिमत्व नव्हते. त्यांची दिनचर्या ठरलेली असे व याबाबत ते खूप काटेकोर असत. रात्री नऊला झोपायला जाऊन पहाटे लवकर उठून ते लिखाण करत असत. त्यांची ही दिनचर्या पाळण्यासाठी आणि आगंतुक लोकांपासून त्यांचे सरंक्षण करण्याबाबत त्यांच्या पत्नीने मोलाची भुमिका पार पाडली. नव्वदी पार केल्यानंतरसुद्धा खुशवंत स्विमिंग पूलमध्ये पोहत असत. त्यांची शंभरी केवळ एका वर्षाने हुकली !
खुशवंत सिंग हे पत्रकारितेतील माझ्या पहिले बॉस असलेल्या बिक्रम व्होरा यांचे पहिले बॉस होते. हा खरे तर खुशवंत सिंगांशी माझा ओढूनताडून जोडलेला म्हणजे बादरायण संबंध वा व्हेरी रिमोट कनेक्शन ! पण खुशवंत सिंग आणि बिक्रम व्होरा या दोघांनीही पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले म्हणून त्यांच्याशी असलेले माझे हे संबंध माझ्या दृष्टीने अभिमानानेच आहे. खुशवंत सिंग हे खरे तर सर्व पत्रकारांचे आणि संशोधनात्मक लिखाण करणाऱ्या सर्वांचे स्फूर्तिस्थान आणि आदर्श आहेत.