Did you like the article?

Saturday, February 24, 2024

मनोहर पर्रीकर 

दिल्लीत ताजे मासे मिळत नाहीत म्हणून मंत्रीपद सोडून गोव्यात परतणारे पर्रीकर...

जवळच्या व्यक्तीने विचारणा केली तर `विसवणाची तळलेली पोस्ता' आणण्यास ते प्रेमाने सांगत असत असे वामन प्रभूंनी लिहिले आहे.
Manohar Parrikar
Manohar Parrikar

आज खूप दिवसांनी खरे तर काही महिन्यांनी सुकटाची चटणी नाश्त्याला खाल्ली. ही चटणी तशी घरी काल रात्रीच तयार झाली होती पण तेव्हाच ठरवलं होतं नाश्त्याला खायची म्हणून. सकाळी श्रीधरनगर बागेत फिरायला गेलो तेव्हा छानपैकी कोवळे ऊन पडले होते आणि बॅडमिंटन खेळण्यासाठी एक ताज्या दमाचा पार्टनर गडीसुद्धा मिळाला. छान घामाघूम झालो होतो पण तेव्हाही मनात घरी असलेल्या सुकटाच्या चटणीची आठवण होतीच. मला स्वतःलाच त्याबद्दल हसूही आले होते.

लहानपणापासून माझ्या एक अत्यंत आवडीचा असलेला हा पदार्थ आजही खास आवडीचा आहे. सुकट आणि बोंबलाची चटणी हे दोन्ही पदार्थ बरोबरीने येतात, ज्याला सुकट आवडते त्याला बोंबीलसुद्धा आवडणार असे मला वाटते. इथे मी सुके बोंबीलबद्दल बोलतो आहे, ओले बोंबील हा वेगळा खाद्यपदार्थ आणि वेगळा विषय आहे. आठवड्यातून किमान एकदोनदा आमच्याकडे रात्रीला तळलेले ओले बोंबिल असतातच. त्याबद्दल नंतर कधीतरी स्वतंत्रपणे लिहिता येईल.

चिकनच्या दुकानांच्या मानाने मासळीची दुकाने तुरळक असतात. मात्र आमच्या कॉलनीच्या तोंडालाच मासळीचे मोठे दुकान आहे. तिथे शनिवारी आणि रविवारी लोकांची झुंबड तुम्ही एकदा पाहायला हवी.

तर श्रीरामपुरला शुक्रवारी दुपारी पाचच्या दरम्यान आठवडी बाजारात बाईचे बोट धरून मी जायचो तेव्हा सर्व पदार्थ घेतल्यानंतर सर्वात शेवटी सुकट आणि सुक्या बोंबलाची खरेदी व्हायची. शुक्रवारी आमच्या घरी कधीही मटण शिजत नसायचे वा खाल्ले जात नसे. त्याला कारण म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारचा संबंध. गंमत म्हणजे मात्र मासे किंवा अंडे या पदार्थांना वशटचा दर्जा नसायचा, त्यामुळे हे पदार्थ शुक्रवारी वर्ज्य नसायचे.

घरी आल्यावर सगळा बाजार पिशवीतून बाहेर काढल्यावर बाई सुके बोंबील साफ करायची, काटेरी डोके आणि शेपूट काढून निम्मे बोंबिल वेगळे काढून ठेवायची आणि बाकीच्या बोंबलाचे त्याच रात्री काळा मसाला घालून कालवण करायची. दर शुक्रवारी आणि शनिवारी बाई आणि दादांचा उपास असायचा, या दिवसभराच्या उपवासाला फक्त पाणी आणि चहा चालायचा. तो उपास बोंबलाच्या या चमचमीत कालवणाने सुटायचा.

मग आठवड्यातून एकदा सुक्या बोंबलाची तर दोनदा सुकटाची चटणी नाश्त्याला असायची. या दोन्ही चटण्या करायची ती पध्दत आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. सुके बोंबील आधी पाट्यावर वरवंट्याने टेचून घ्यायचे, ते बारीक चपटे झाल्यावर हिरव्या किंवा लाल मिरच्या, लसूण घालून पाट्यावर वरवंटा फिरवून एकजिनसी बनवायचे आणि मग तव्यावर तेलाने मस्तपैकी परतून घ्यायचे.

सुकट चटणी करायची पध्दत जवळपास अशीच. बाजरीच्या भाकरीबरोबर मग ही बोंबलाची चटणी किंवा सुकटाची मस्त लागायची.

मी तसा काही `फुडी' वा खवय्या या सदरात मोडणारी व्यक्ती नाही. अशा फूडी लोकांना खाद्यपदार्थांची खास चव असते, खास आवडीनिवडी असतात, त्यांच्या जिभेला विशिष्ट पदार्थांची चव लगेच कळते. माझे तसे नाही. तरीसुद्धा सुकटाची चटणी हा माझा एक खास आवडीचा पदार्थ आहे.

मला आवडते म्हणून एकदा मी श्रीरामपूरहून गोव्याला परत जाण्यासाठी निघालो तेव्हा बाईने सुकटाची चटणी आणि बाजरीची भाकर बरोबर दिली होती. त्यावेळी त्याकाळच्या नॅरो-गेज रेल्वेने प्रवास करताना मिरज- लोंढा स्टेशनच्या दरम्यान रात्री नऊच्या आसपास वर बर्थवर बसलेलो असताना जेवणाचा डबा उघडल्यानंतर माझ्यावर काय प्रसंग गुदरला होता तो किस्सा मागे मी इथे सांगितला होता, त्याची पुनरावृत्ती टाळतो.

गोव्यात पावसाळा सुरू झाला की ताजी मासळी फारशी मिळत नाही तेव्हा मग घरात साठवून ठेवलेली सुकी मासळी जेवणात चव आणते. गोंयकरांच्या दररोजच्या जेवणात मासळी असायलाच हवी. मग ही सुकी मासळी - कधी तळलेली कधी नुसतीच भाजलेली - ताटात येते. हे सुके बोंबिल, तार्ली, बांगडा, सुरमई जेवणात आणि जीवनातसुद्धा चव आणतात.

गोव्यात बहुसंख्य सर्व लोकांना - यात सारस्वत मंडळींसुद्धा आलीच - मासे अत्यंत प्रिय असतात. गोव्यातल्या सारस्वत लोकांत सारस्वत ब्राह्मण तसेच सारस्वत ख्रिश्चनांचाही समावेश होतो. पणजी आणि मडगावसारख्या मतदारसंघांत या दोन्ही सारस्वतांची संख्या लक्षणीय आहे. वर्षातून काही ठराविक दिवशी जेवणात ताजे किंवा सुके मासे नसले तर खाणारे कसे कडू तोंड करतात हे गोव्यात शिकत असताना मी अनुभवले आहे.

गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत संरक्षणमंत्री होण्यासाठी बोलावून घेतले. केन्द्रात फक्त संरक्षणमंत्रीपदासाठी राज्यातील मुख्यमंत्री बोलावून घेण्याची प्रथा तशी यशवंतराव चव्हाण, शरद पवार आदींपासून आहे.

तर संरक्षणमंत्री पर्रीकरांचे मन राजधानीत कधी रमलेच नाही, याचे एक प्रमुख कारण म्हणजे नवी दिल्लीत ताजे मासे मुळी मिळतच नाही असे खुद्द पर्रीकरांनी सांगितले आहे.

त्यामुळे पहिली संधी मिळताच म्हणजे त्यांच्या अपरोक्ष गोव्यातल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे पानिपत झाल्यानंतर सत्तेचे नवी समीकरणे जुळवण्यासाठी पर्रीकर मायभूमीत परतले होते.

गोव्यातले माझे एक मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू यांनी आपल्या `मनोहर पर्रीकर, ऑफ द रेकॉर्ड' या पुस्तकात दिल्लीत माशाविना कासावीस झालेल्या पर्रीकरांचा एक किस्सा लिहिला आहे.

"दिल्लीत त्यांना ताजे मासे मिळणे मुश्किल झाले होते. 'जलबिन मछली' अशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती.'' गोव्यातून त्यांना भेटण्यासाठी दिल्लीचे येणाऱ्या कोणाही जवळच्या व्यक्तीने विचारणा केली तर `विसवणाची तळलेली पोस्ता' (रवा लावून तव्यावर तळलेली सुरमई ) आणण्यास ते प्रेमाने सांगत असत असे वामन प्रभूंनी लिहिले आहे.

पर्रीकरांप्रमाणेच कालपरवा एका जवळच्या व्यक्तीने सुकट आणि बोंबलाची चटणी करून देण्याचा आग्रह केला म्हणून बाजारातून सुकट आणि सुके बोंबील आणले.

आमचे घर अगदी वरच्या मजल्यावर असल्याने या खाद्यपदार्थांचा घमघमाट संपूर्ण इमारतीत पसरत नाही. ज्यांना हे पदार्थ आवडतात त्यांच्या मात्र तोंडाला पाणी सुटत असते.

 

John Murray Mitchell


जॉन मरे मिचेल  दोनशे वर्षांपूर्वी ज्ञानोबा अन् तुकोबांची पाश्चात्य जगाला ओळख करून देणारे जॉन मरे मिचेल कोण होते ?

John Murray Mitchell esakal

संत तुकाराम यांचे अभंग इंग्रजीत भाषांतर करणारे, संत ज्ञानेश्वर यांची आणि तुकोबांची एकोणिसाव्या शतकात पाश्चात्य जगाला ओळख करून देणारे जॉन मरे मिचेल बहुधा पहिलीच युरोपियन व्यक्ती.

महाराष्ट्राचा एकोणिसाव्या शतकाचा इतिहास जॉन मरे मिचेल यांना डावलून पूर्ण होणार नाही इतके या स्कॉटिश मिशनरीने सुरुवातीला मुंबई-पुण्यात आणि नंतर काही वर्षे कोलकात्यात विविध क्षेत्रांत कार्य केले आणि विपुल प्रमाणात विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत.

असे असले तरी जॉन मरे मिचेल हे नाव तसे महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांचे अभ्यासक आणि संशोधक असलेल्या तज्ज्ञांनासुद्धा फारसे परिचित नाही.

खरे सांगायचे झाल्यास मीसुद्धा हे नाव एक वर्षांपूर्वी ऐकलेसुद्धा नव्हते. जॉन मरे मिचेल यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे महात्मा जोतिबा फुले हे पुण्यातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत १८४१ ते १८४७ या काळात शिकले तेव्हा काही काळ मरे मिचेल या शाळेत शिक्षक होते.

अर्थार्जनासाठी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत जोतिबा १८५२ नंतर काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी करत असत.

पुण्यात मरे मिचेल यांनी १८६२च्या सुमारास केवळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा चालवली.

जॉन मरे मिचेल यांना टाळून महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याचे जीवनचरित्र पूर्ण होऊ शकत नाही

एक संदर्भ म्हणून जॉन मरे मिचेल यांनी आपल्या विविध पुस्तकांत लिहिलेल्या या नोंदींना अतोनात महत्त्व आहे.

ही सर्व इंग्रजी पुस्तके अर्थातच स्कॉटलंडमध्ये प्रकाशित झाली होती. त्यामुळेच बहुधा स्थानिक अभ्यासकांचे या मौल्यवान ग्रंथांकडे दुर्लक्ष झाले असावे. .

जॉन मरे मिचेल (१८१५ ते १९०४) असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते.

जोतिबांचे दत्तकपुत्र यशवंत फुले यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या अल्पचरित्रात म्हटले आहे :

``जोतीराव यांचे तीर्थरूप वारल्यामुळे त्यांस बरीच दीनावस्था प्राप्त झाली. इतक्यात त्यांची ही भरभराटी पाहून पुण्यातील काही मिशनरी लोकांनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलींस शिक्षण देण्याच्या कामावर नेमले. या कामावर असता परोपकारी मरे मिचेल वगैरे युरोपियन सद्गृहस्थाच्या सूचनेवरून जोतीराव यांनी आपले लक्ष ख्रिस्तीधर्माकडे विशेष पुरविले.’’

पुण्यात १८२१ साली स्थापन झालेल्या संस्कृत कॉलेजचे मरे मिचेल हे या संस्कृत कॉलेजचे (नंतरच्या पुना कॉलेजचे आणि आजच्या डेक्कन कॉलेजचे ) काही काळ प्राचार्य (व्हिजिटर) आणि संस्कृत-मराठी विभागांचे प्रमुख होते.

रेव्हरंड जॉन मरे मिचेल हे १८३८ च्या नोव्हेंबर भारतात आले. मुंबईत आल्यावर त्यांनी कृष्णशास्त्री यांच्या हाताखाली मराठीचा अभ्यास केला. रेव्ह. जॉन स्टिव्हन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतचा अभ्यास केला.

प्राचीन मराठी वाड्यमयाचा अभ्यास करून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली. बायबलचे मराठी भाषांतर सुधारण्यात त्यानीं मोठे योगदान दिले.

स्कॉटिश मिशनरी अलेक्झांडर डफ १८३५ ला विश्रांतीसाठी मायदेशी परतले त्यावेळी एडिनबर्ग कॉलेजात शिकत असलेल्या जॉन मरे मिचेल त्यांना भेटले.

या तरुणाला मिशनकार्याची आवड आहे हे पाहून `आता लगेच माझ्याबरोबर भारतात ये' असे रेव्ह. डफ मरे मिचेल यांना म्हणाले. मात्र, मरे मिचेल यांनीं एडिनबर्ग येथील आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर तीन वर्षांनी मरे मिचेल यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर स्कॉटलंडच्या मिशन अधिकाऱ्यांनी मरे मिचेल यांना कोलकात्याऐवजी मुंबईत मिशनकार्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. कोलकात्यात रेव्हरंड अलेक्झांडर डफ यांच्याबरोबर काम करण्याची आपली इच्छा पूर्ण होणार नाही हे कळून मरे मिचेल काहीसे नाराज झाले होते.

मात्र भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कधी कुणाला कल्पना असते?

स्कॉटलंडमध्ये कॉलेजात शिकत असताना आलेल्या एका अनुभवाचे जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' या आपल्या आत्मचरित्रात पुढील शब्दांत वर्णन केले आहे :

``माझ्या या ईशज्ञानाच्या चौथ्या किंवा अखेरच्या वर्षाला मी ग्रामर स्कुलच्या एका वर्गाला शिकवले. शाळेतल्या एका शिक्षकाने अचानक काम सोडले होते आणि दुसऱ्या शिक्षकाची लगेच नेमणूक करणे नव्हते. रेक्टर डॉ. मेल्विन यांनी मला एक वर्षासाठी त्या एका वर्गात शिकवण्याची मला विनंती केली.. मला ते काम खूपच आवडले आणि त्या वर्गात मला कधीही कुणाही व्रात्य विद्यार्थ्याला बडवण्याची वेळ आली नाही याचा मला विशेष अभिमान वाटला. वर्गातल्या त्या छोट्या मुलांना हाताळणे मला सहज शक्य झाले.''

स्कॉटलंडमधील हा अनुभव मरे मिचेल यांना पुण्यात आणि शेजारच्या परिसरांत ख्रिस्ती धर्माची लोकांना शिकवण देण्याच्या कामात फायदेशीर ठरला असावा.

मरे मिचेल आणि इतर ख्रिस्ती मिशनरी प्रवचनासाठी बाहेर पडत असत तेव्हा त्यांची टिंगलटवाळी होत असे.

भारतात आल्यानंतर आपण खिस्ती धर्मप्रसार करण्यासाठी कायकाय प्रयोग केले याचे वर्णन जॉन मरे मिचेल यांनी केले आहे :

``आपल्या स्वतःच्या घराच्या आवारात इतरांना आपला धर्म शिकवताना आपण आपले स्वतःचे नियम आणि अटी लागू करू शकता. अशावेळी तुम्हाला कुणी व्यक्ती त्रास देण्याची शक्यता नसते. मात्र आपल्या घरापासून दूर, परक्या स्थळी आणि रस्त्यांवर ख्रिस्ती धर्माची शिकवण देण्यासाठी इतरांना न दुखावण्याचे खास कसब, अमर्याद सहनशीलता आणि खूप संयम असणे अत्यावश्यक असते.

यासाठी मी एक मार्ग निवडला होता. समुद्रकिनाऱ्यावर सकाळी लोक जमलेले असताना घोड्यावर बसून मी तेथे जात असे आणि त्या लोकांना प्रवचन देत असे. जोपर्यंत तो जमाव शांतपणे माझे बोलणे ऐकत असे तोपर्यंत माझे प्रवचन चालू असायचे. त्या लोकांनी गोंधळ करायला सुरु केले तर मी लगेच माझा घोडा दुसरीकडे नेऊन तेथे पुन्हा नव्याने प्रवचन सुरु करत असे.

प्रवचनाच्या दरम्यान अधेमध्ये एखाददुसरा प्रश्न आला तरी काही बिघडत नसे. मात्र हे लोकसुद्धा गडबडगोंधळ करू लागले कि मी माझा घोडा पुन्हा एकदा नव्या दिशेने नेत असे. ‘’

भारतात लोकांचा मुलींच्या शिक्षणाबाबत असलेल्या दृष्टिकोनाबाबत आणि स्कॉटिश मिशनच्या मुस्लीम मुलींसाठी चालवलेल्या स्वतंत्र शाळेबाबत जॉन मरे मिचेल लिहितात :

``मिशनरींच्या आणि स्टुडंट्स सोसायटी ऑफ बॉम्बेच्या उदाहरणामुळे स्थानिक लोकांनी याबाबत पुढारी घेतला आणि सरकारने त्यांना सर्व प्रकारचे उत्तेजन दिले. यासाठी सरकारने दक्षिणा फंडातून दरवर्षी सहाशे रुपयांची रक्कम पुरवली. मात्र या शाळांत मुलींची संख्या फक्त दिडशे होती. सरकारने आमच्या मिशनला रक्कम दिली नव्हती तरी आमच्या शाळेत १८६२ च्या मे महिन्यात मुलींची संख्या तिनशेपर्यंत वाढली होती.

सर्वांत खास बाब म्हणजे आमच्या मिशनची एक मुस्लिम मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा होती आणि या शाळेचा संपूर्ण खर्च या विद्यार्थिनींनी दिलेल्या फिमधून चालवला जात होता. या शाळेत विद्यार्थिनींची संख्या सत्तर होती.

त्याकाळात केवळ मुस्लिम मुलींसाठी चालवली जाणारी पुण्यातील ही एकमेव शाळा होती, ‘’ असे जॉन मरे मिचेल यांनी म्हटले आहे.

मात्र, केवळ मुस्लीम मुलींसाठी पुण्यात चालवली जाणारी ही तशी अगदी पहिलीवहिली शाळा नव्हती. रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी १८३०ला पुण्यात स्कॉटिश मिशनचे काम सुरु केले. त्यानंतर स्कॉटिश मिशनच्या सुरुवातीच्या काळात पुण्यात रेव्हरंड वजिर बेग यांनी मुस्लीम मुलींसाठी एक शाळा सुरु केली होती.

पुना कॉलेजचे प्राचार्य असलेले मेजर थॉमस कँडी काही काळासाठी आपल्या मायदेशी जाणार होते, कँडी यांच्या गैरहजेरीत यांनी या कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारण्याची ईस्ट इंडिया कंपनी सरकारने त्यांना विनंती केली.

आपल्या आत्मचरित्रात जॉन मरे मिचेल लिहितात:

``हो-ना असे करत अखेरीस करत मी ते पद स्वीकारण्याचे ठरवले. कॉलेजच्या इंग्रजी विभागात मी आठवड्यातून दोनदा नैतिक तत्त्वज्ञान शिकवत असे. माझ्या या वर्गांत हजेरी ऐच्छिक होती. असे असले तरी प्रगतशील असलेले तीस लोक या व्याख्यानाला नियमितपणे उपस्थित राहत असत आणि ते सर्वच जण खूपच .चांगले वागत असत.

मी असे ऐकले होते कि पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा या संस्कृत कॉलेजचे प्रिंसिपल म्हणून एक युरोपियन (मेजर थॉमस कँडी) व्यक्तीची नेमणूक करण्यात आली तेव्हा त्यांच्या आगमनाच्यावेळी प्रवेशद्वारात अडथळे उभारण्यात आले होते. आणि आता माझी म्हणजे एका मिशनरीची अधिकृत व्हिझिटर म्हणून नेमणूक झाली असताना या लोकांचा प्रतिसाद वेगळा असा काय असणार होता?

मात्र या संस्कृत कॉलेजातील पंडित माझ्याशी खूपच अगत्याने वागले आणि या अगत्याचा प्रतिसाद अगत्यानेच द्यायचा असेच माझे धोरण होते. ‘’ .

महात्मा जोतिबा फुले यांनी रेव्ह. जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत एक महार मुलगा पाठवला होत्या, त्या अस्पृश्य मुलाची हृदयदावक कहाणी मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे.

जोतिबा आणि जॉन मरे मिचेल यांच्या संदर्भातील ``चटईचाही विटाळ’ ही घटना धनंजय कीर यांनी महात्मा फुले चरित्रात पुढील शब्दांत सांगितली आहे:

``माझे स्नेही जोतीराव गोविंदराव फुले ही एक मोठी उल्लेखनीय अशी व्यक्ती होती. महारांचे हित व्हावे म्हणून ते अत्यंत परिश्रम घेत असत. महार हे हीन जातीचे.

जोतीरावांनी एकदा त्या जातीचा मुलगा आमच्याकडे पाठविला. त्याला इंग्रजीच्या प्रारंभीच्या वर्गात घालण्याइतका त्याचा देशी अभ्यास झालेला होता.

त्याला शाळेत प्रवेश देताच ब्राह्मण मुलांचे एक शिष्टमंडळ माझ्याकडे आले. त्या मुलांचे काळेभोर डोळे चकाकत होते आणि त्यांचे हावभाव मनातील हेतू प्रदर्शित करीत होते.

ते म्हणाले, "तुमच्या शाळेत महार मुले असल्यामुळे आम्ही शाळा सोडणार आहोत.'

मी म्हणालो, "अरे, मला वाटते एकच मुलगा आहे."

"होय. एक काय आणि दहा काय, सारखेच."

"मग काय त्या मुलाला हाकलून देऊ?"

"ते आम्हाला काय सांगता? आमचे म्हणणे एवढेच की, तो राहिला तर आम्ही जाणार!"

"तुमची इच्छा नसेल तर त्याला तुम्ही शिवू नका. तुम्ही वर्गातील हुशार मुले आहात, तुमचा क्रमांक नेहमी वरच असणार, तो वेगळ्या बाकावर बसतो.'

"ते खरे, परंतु चटई जमिनीवर असते ना? तिचा विटाळ आम्हांस होतो. आता सर्वांना विटाळ झाला आहे. आता घरी जेवणापूर्वी स्नान करून हा विटाळ घालविला पाहिजे."

"मी ती चटई काढून टाकावी अशी तुमची इच्छा आहे का ?"

"आम्ही वर्गातच नसतो तर बरे झाले असते."

"ठीक तर. काही झाले तरी मी त्या मुलाला वर्गाबाहेर हाकलून देऊ शकत नाही."

मी अगदी गोंधळून गेलो. एक तर ब्राह्मण मुलांना हाकलून देण्याची माझी इच्छा नव्हती आणि माझ्या सदसदविवेकबुद्धीप्रमाणे मी त्या महार मुलालाही शाळेतून बाहेर काढू शकत नव्हतो.

मी म्हणालो, "उद्यापर्यंत थांबा. वर्गांची उद्या फेररचना करू आणि तशातही तुम्ही आता वरच्या वर्गात उत्तीर्ण होऊन जाणार."

हा ना करता ब्राह्मण मुले दुर्मुखलेल्या चेहेऱ्यांनी निघून गेली.

तो महार मुलगा शाळेत फिरून आलाच नाही.

पाण्याच्या बाहेर माशाची जशी स्थिती होते तशीच त्याची हया शाळेत झाली. इतर उच्चवर्णीय व मध्यमवर्गीय मुलगे या बाबतीत अचल राहिले. ’’

जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्रातली दुसरी एक घटना धनंजय कीर यांनी आपल्या जोतिबा फुले यांच्या चरित्रात सांगितली आहे. कीर यांनी लिहिले आहे :

``कनिष्ठ वर्गाच्या उद्धाराविषयी उदासीनवृत्ती दिसून येत होती, तरी त्या वर्गातील काही मुलांनी त्या काळी शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांना ब्राह्मणांनी अत्यंत निर्दयपणे वागवून त्यांचा छळ केला.. रेव्हरंड आदम व्हाईट यांनी एकदा पुण्याजवळील सरकारी शाळेला भेट दिली.

त्या शाळेतील ब्राह्मण पंतोजीजवळ एक वेताची छडी होती. तिचा उपयोग ते पंतोजी अधूनमधून चांगलाच करीत.

आदम व्हाईट यांनी त्या ब्राह्मण पंतोजीला विचारले की, 'ही ढेकळं तुमच्याजवळ कशाकरिता ठेवली आहेत?"

पंतोजी उत्तरले, "स्पृश्य मुलांच्याबाबतीत मी छडी वापरतो. जर मी छडीने महार मुलास मारले तर तो अस्पृश्य असल्यामुळे काठीबरोबर विटाळ येईल आणि माझे सर्व शरीर विटाळेल. म्हणून जेव्हा महार मुलगा मूर्खपणाने वागतो तेव्हा मी एक ढेकूळ घेतो आणि त्याच्याकडे फेकतो. जर चुकलं तर दुसरं मारतो."

मरे मिचेल १८६३ साली कोलकात्याला अलेक्झांडर डफ यांच्याबरोबर मिशनकार्य करण्यासाठी गेले होते. आता खूप वर्षानंतर मरे मिचेल यांना आपली मनिषा पूर्ण करण्याची संधी मिळाली होती.

भारतातील म्हणजे मुंबई, पुणे आणि नंतर कोलकाता येथील आपल्या मिशनकार्यांची समाप्ती करुन जॉन मरे मिचेल आपल्या पत्नीसह मायदेशी स्कॉटलंडला परतले. त्यानंतरसुद्धा भारतातील अनेक व्यक्तींशी आणि जोतिबा फुले यांच्याशी त्यांनी संपर्क ठेवला होता.

आपल्या आयुष्याच्या अखेरीस जोतिबा अर्धांगवायुने बिछान्याला खिळले तेव्हाही मरे मिचेल यांनी त्यांना स्कॉटलंडहून पत्र लिहिले होते.

जोतिबा, जेम्स मिचेल आणि मरे मिचेल या तिघांचेही स्नेही असलेल्या बाबा पद्मनजी यांनी जोतिबांवर लिहिलेल्या मृत्युलेखात जोतीरावांचे जेम्स मिचेल आणि मरे मिचेल यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाविषयी पुढील शब्दांत लिहिले आहे :

``त्यास (जोतिबा फुले यांना) ख्रिस्ती धर्माविषयी पुष्कळ ज्ञान होते, ते त्यास त्यांचे जुने मित्र रे. जेम्स मिचेल व डॉ.मरे मिचेल व त्यांची पत्नी हयांपासून प्राप्त झाले होते. डॉ.मिचेलसाहेब हयांनी तर थोडया महिन्यामागे स्कॉटलंडांतून त्यांस पत्र पाठवून त्यात त्यांच्या आत्म्याच्या कल्याणाची कळकळ दर्शविली होती. ‘’

रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांना ८९ वर्षे इतके दीर्घायुष्य लाभले. मायदेशी परतल्यावरही त्यांनी भारताविषयी पुस्तके लिहिणे चालू ठेवले.

एका पुस्तकाच्या अखेरीस ताजा कलम म्हणून काही शब्द..

``ताजा कलम''

या पुस्तकात वर्णन केलेल्या लोकांपैकी हारमदजी पेस्तनजी आणि डॉ नारायण शेषाद्री यांचे त्यांच्या श्रद्धापूर्वक परिश्रमानंतर निधन झाले आहे. सन १८३९ साली ज्यांचा बाप्तिस्मा झाला होता ते धनजीभाई नौरोजी ते आजही हयात असून ज्येष्ठ मिशनरींमध्ये त्यांच्या समावेश होतो, सगळीकडे त्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली जात असते.

बाबा पद्मनजी आज खूप वयोवृद्ध झालेले असले तरी त्यांची लेखणी आजही थकलेली नाही. मराठी बायबलच्या सुधारित आवृती आणण्यासाठी ते कार्य करत आहेत.

आमच्या शाळेचे दुसरे एक विद्यार्थी गणपतराव आर नवलकर यांनी भरपूर आणि उत्तम साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेले मराठीचे व्याकरण खूप विस्तृत स्वरूपाचे आणि चांगल्या दर्जाचे आहे.

माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तींचे निधन होऊन मी मात्र अजूनही हयात आहे याबद्दल कधीकधी मला आश्चर्य वाटते. उदाहरणार्थ, गार्डनर, स्टोथर्ट आणि स्मॉल हे खूपच आदरणीय मिशनरी होते.

पुण्यात मी दुसऱ्यांदा राहायला आलो तेव्हा श्रीयुत गार्डनर हे खूप जवळच्या नात्याचे माझे सहकारी होते.''

एडिनबर्ग, १८९९


Thursday, February 22, 2024

नोकरीतील `दि एन्ड

वयाच्या सोळाव्या वर्षी सन्यस्त ख्रिस्ती धर्मगुरु होण्याच्या हेतूने मी माझे श्रीरामपूर येथील घरदार सोडले आणि नंतर गोव्यात जेसुईट धर्मगुरुंच्या पूर्वसेमिनिरीत दाखल झालो . पणजीतल्या धेम्पे कॉलेजात हायर सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर मात्र माझे जीवनध्येय बदलले आणि मी पत्रकार बनलो.

एकदा पणजी मार्केट पाशी असलेल्या दैनिकाच्या कार्यालयात नोकरी शोधण्यासाठी गेलो. नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकांचे वृत्तसंपादक असलेल्या एम. एम. मुदलियार यांनी माझी जुजबी चौकशी केली आणि नोकरी मिळणे शक्य आहे असे सांगितले. गोमंतकात पाऊल ठेवण्याआधी इंग्रजी भाषेचा गंधही नसताना चार वर्षांतच ही भाषा शिकून मी इंग्रजी दैनिकातील बातमीदार बनलो होतो.
नवहिंद टाइम्समध्ये नऊ वर्षांच्या नोकरीत मी क्राईम- कोर्ट, लष्कर, शिक्षण, जनरल, गोवा मेडीकल कॉलेज अशा अनेक बीट्स सांभाळल्या. त्यानंतर औरंगाबादच्या लोकमत टाइम्स, इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तींत आणि सकाळ माध्यमाच्या महाराष्ट्र हेराल्ड-सकाळ टाइम्समध्ये सोळा वर्षे अशी इंग्रजी भाषेतील पत्रकारितेची चाळीस वर्षांची कारकीर्द केली.
माझ्या कॅम्पस रिपोर्टींगचा हा कालावधी होता १९८१ नंतरचा. त्याकाळात महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही दहावीचा पूर्ण निकाल लिस्टसह सर्व दैनिके छापत असत. विद्यार्थ्यांना नंतर त्यांच्या शाळेतून मार्कशीट्स दिली जात असत. निकालाची प्रत हातात पडल्यानंतर मेरीट लिस्टमध्ये झळकलेल्या पहिल्या दहा
विद्यार्थाना त्यावेळच्या गोवा केंद्रशासित प्रदेशातील त्यांच्या शहरांत आणि गावांत जाऊन, त्यांची मुलाखत आणि फोटो मिळवण्याची माझी जबाबदारी होती.
आपल्या शबनम बॅगेत निकालाची प्रत टाकून मी ताबडतोब जवळचाच एक मोटारसायकल पायलट गाठत असे. पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या घरी जाण्यास प्राधान्य असे, त्यानुसार म्हापसा, मडगाव, डिचोली, वॉस्को अशा ठिकाणी जायचे असे सांगून सुसाट वेगाने आम्ही निघत असू.
विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचल्यानंतर होणारा सवाल-जबाब आणि त्यानंतरची प्रतिक्रिया अगदी स्मरणीय असे.
‘नमस्कार, मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार. गोवा दहावी परिक्षेत तू बोर्डात पहिला आला आहेस. त्याबद्दल अभिनंदन !’
त्यानंतर त्याघरात होणारे प्रथम विस्मयाचे आणि नंतर आनंदाचे चित्कार, गडबड अनुभवण्यासारखी असे. त्या कुटुंबात काही गोड पदार्थ खाण्याचा जाई. कॅथॉलिक कुटुंब असल्यास त्या उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रिजमधली थंडगार बीअर आणि केकचा आस्वाद घ्यावा लागे.
कालांतराने एससीसी बोर्ड परीक्षांचा पूर्ण निकाल दोन-तीन पानांत छापण्याची पद्धत सर्वच दैनिकांनी बंद केली. आज इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जमान्यात महत्त्वाच्या सर्व परीक्षांचा निकाल तो वेबसाईटवर अपलोड होताक्षणी कुठेही पाहणे शक्य झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच पत्रकारीतेचेही स्वरूप बदलत
आहे.
१९८०च्या दशकात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) आणि युनायटेड न्युज ऑफ इंडिया (यूएनआय ) ही दोन वृत्तसंस्था वृत्तपत्रांचे एका मोठे आधारस्तंभ असत. एखादी खूप मोठी महत्त्वाची बातमी असेल तर टेलिप्रिंटरवर लागोपाठ बेल वाजू लागेल. एके दिवशी सकाळी मी नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात असताना सकाळी दहाच्या दरम्यान टेलिप्रिंटरची घंटा सारखी वाजू लागली तेव्हा मी तिकडे सहज गेलो आणि मला धक्काच बसला. केवळ एकच वाक्य पुन्हापुन्हा टाईप करत टेलिप्रिंटरवर घंटा वाजत होती.
तो दिवस होता ३१ ऑक्टोबर १९८४ आणि ते धक्कादायक वाक्य होते :
Prime Minister Indira Gandhi shot at ....
टेलिप्रिंटरच्या मशिनमधून सतत बाहेर पडणाऱ्या कागदांवरच्या बातम्या वाचायची माझी सवय खूप काळ टिकली.
नंतर बातम्या टाईप करताना ऑफिसांतल्या टेलिव्हिजनवरील बातम्यांकडे मी लक्ष ठेवू लागलो.
प्रादेशिक बातमीदारांसाठी त्याकाळात टेलिग्राम हे एक महत्त्वाचे साधन होते. गोव्यात मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना कोल्हापुरच्या `;पुढारी' या वृत्तपत्राचा पणजी येथील स्ट्रींगर बातमीदारसुद्धा होतो.
बातम्या पाठविण्यासाठी `पुढारी' ने मला टेलिग्राम कार्ड दिले होते. यासाठी मात्र मराठी बातम्या रोमन लिपीमध्ये लिहाव्या लागत. पोस्टात टेलिग्राम ऑपरेटर मग त्या संबंधित वृत्तपत्राला पाठवत असे.
गोव्यातून पुण्याला आल्यावर इंडियन एक्सप्रेसने सुद्धा मला टेलिग्राम कार्ड दिले होते. `कामिल पारखे, इंडियन एक्सप्रेस (पुणे) , टेलिग्राम कार्ड एक वर्षासाठी (१९८९) '' असे लिहिलेले ते कार्ड मी अजून जपून ठेवले आहे.
१९८०च्या दशकापर्यंत केवळ अतिश्रीमंत लोकांकडे आणि वरच्या हुद्द्याच्या सरकारी अधिकाऱ्यांकडे लँडलाईन टेलिफोन असायचे. पत्रकार वगैरेंना खास बाब म्हणून टेलिफोन दिले जायचे. गोव्यात आमच्या नवहिंद टाइम्समध्ये केवळ म्हापसा, मडगाव आणि वॉस्को शहरांत स्ट्रिंगर बातमीदार होते, त्यांच्याशी
आणि पणजीबाहेरील पोलीस आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बोलण्याची गरज असे.
त्याकाळात एसटीडी (म्हणजे सबस्क्रायबर ट्रँक डायलिन्ग) सुविधा नसल्यास बीएसएनलच्या ऑपरेटरशी बोलून ऑर्डीनरी, अर्जंट किंवा लायटनिंग कॉल बुक करावा लागे. ऑर्डिनरी कॉल कधी लागेल याची खात्री नसायची, लायटनिंग कॉल खूप महाग असायचा, मात्र नोंद होताक्षणी बोलणे शक्य असायचे.
पुण्यात मी इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हाची गोष्ट. त्याकाळात म्हणजे १९८९ साली नव्यानेच सुरु झालेल्या `इंडियन एक्सप्रेस’ आणि `लोकसत्ता’च्या पुणे आवृतींचे बातमीदार पुण्यात तर डेस्कचा स्टाफ मुंबईत असायचा. आमच्या इंग्रजीतल्या बातम्या टेलिप्रिंटरमार्फत मुंबईला पाठवल्या जायच्या.
मात्र मुंबईतल्या डेस्कवरच्या आणि इतर लोकांशी संभाषण करण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्रणा होती, ती म्हणजे हॉटलाईन. लॅण्डलाइनसारखेच असणारे ते उपकरण उचलले कि तिकडे मुंबईत घंटी वाजायची आणि कुणीतरी तिकडे ते उपकरण उचलले तर लगेच संभाषण व्हायचे.
गोव्यात टेलिव्हिजनचे युग यायला तसा उशीरच लागला. मुंबईतल्या टेलिव्हिजन टॉवर आल्यानंतर काही काळानंतर पणजीत अल्तिन्हो येथे टेलिव्हिजन टॉवर उभारला गेला आणि आम्ही पहिल्यांदाच ब्लँक अँड व्हाईट का होईना पण टेलीव्हिजनच्या पडद्यावर वर धावती चित्रे पाहू लागलो.
त्याकाळात नवहिंद टाइम्सचे फोटोजर्नालिस्ट असलेले सुनील नाईक हे मुंबई दूरदर्शनसाठी व्हिडीओजर्नालिस्ट (आधुनिक तंत्रज्ञान, त्यानुसार नवे पद !) म्हणूनही काम करत असत. खांद्यावर एक छोटासा कॅमेरा खांद्यावर घेऊन नाईक एखाद्या कार्यक्रमाची शूटींग करत असत, त्यावेळी त्या कॅमेरातून घर्रघर्र असा आवाज येत असे. शूटींग काही सेकंदांचेच असायचे.
अनेकदा नाईक प्रेसकक्षात बसलेल्या आम्हा लोकांवरूनसुद्धा कॅमेरा फिरवत असत. दुसऱ्या दिवशी त्या शुटिंगचे रील्स विमानाने मुंबई दूरदर्शनच्या कार्यालयात पाठविले जाई आणि संध्याकाळच्या सात वाजताच्या प्रादेशिक बातम्यांत त्या कार्यक्रमाची झलक दिसायची, क्वचित त्यात आमचीही छबी झळकायची.
विशेष म्हणजे त्याकाळात खासगी टेलिव्हिजन चॅनेल्स किंवा न्यूज चॅनेल्सही नव्हते आणि राष्ट्रीय व प्रादेशिक बातम्या दिवसातून एकदोनदाच दाखविल्या जायच्या !
१९८६ साली मला पत्रकारितेच्या सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी रशिया,-बल्गेरिया येथे जाण्याची संधी मिळाली होती. परत येताना मी दोन अत्यंत मूल्यवान वस्तू घेऊन आलो होतो. या वस्तू म्हणजे अडीच किलो वजनाचा एक नाजुकसा आकर्षक पोर्टेबल टाईपरायटर आणि एक कॅमेरा.
त्याकाळात पत्रकारितेत उपयुक्त ठरणाऱ्या या दोन वस्तू असणारा गोव्यातील मी एकमेव बातमीदार होतो !
याच काळात कृष्णधवल फोटोग्राफी मागे पडून रंगीत फोटोग्राफी सुरु झाली.
१९८०च्या दशकाअखेरीस दैनिकांनी आपला कृष्णधवल रंग बदलून रविवारच्या पुरवण्यांसाठी रंगीत पाने देण्यास सुरुवात केली. मी १९८८ ला औरंगाबादला `लोकमत टाइम्स’ला रुजू झालो तेव्हा `लोकमत’च्या रविवार पुरवण्यांची सर्व रंगीत पाने मुंबईत तयार होऊन छपाईसाठी दोनतीन दिवस आधी औरंगाबादला
येत असत. या वृत्तपत्र समूहात औरंगाबादला रंगीत पानांसाठी मोठे महागडे स्कॅनर मशिन आणले गेले, तेव्हाचा जल्लोष आणि कौतुकाचे वातावरण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे.
एखाद्या पत्रकार परिषदेतून, राजकिय किंवा इतर कार्यक्रमांनंतर दैनिकाच्या कार्यालयाकडे परतताना त्या बातमीची लीड किंवा इंट्रॉ काय करावा असा विचार मनात घोळत असे. हल्ली मोठी किंवा लहान बातमी हाती पडली कि लगेच मोबाईलवर ऑनलाईन आवृत्तीसाठी एकदोन वाक्यांची बातमी पाठवली जाते,
बातमीदार ऑफिसांत पोहोचेपर्यंत त्या बातम्या कधीच वेबसाईटवर अपलोडसुद्धा झालेल्या असतात.
टेलिव्हिजनच्या आउट ब्रॉडकास्टिंग व्हॅन्समुळे (ओबीव्ही ) घटना किंवा कार्यक्रम होत असताना थेट लाईव्ह प्रक्षेपण आता केले जाते याचे आता आपलयाला नाविण्य वाटत नाही.
दहा वर्षांपूर्वी जॅकलिन आणि आमची मुलगी आदिती यांच्यासह युरोपमध्ये सहलीवर असताना तेथे प्रवासवर्णन लिहिण्याची उबळ मला स्वस्थ बसू देईना. आम्ही राहत होतो त्या हॉटेलांत लॉबीमध्ये पाहुण्यांना मोफत इंटरनेट सुविधा असायचे किंवा तासाला एक युरो फी असायची.
तीन आठवड्यांच्या त्या सुट्टीत मी तीनचार लेख लिहिले आणि ईमेलने पुण्याला `सकाळ टाइम्स’ला पाठवून दिले. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हे लेख प्रसिद्ध व्हायचे, ते आमच्या दैनिकाच्या वेबसाईटवर, ईपेपरवर मला युरोपमध्ये पॅरीस, रोम आणि व्हेनिस या शहरांत दिसायचे, ते पाहून खूप आनंद व्हायचा, वेगाने प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी कौतुक वाटायचे. `
फेब्रुवारी २०१७ ला म्हणजे थायलंडमध्ये दहा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय पत्रकार दौऱ्यात भारताचा आणि `सकाळ टाइम्स’चा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी झालो. `सकाळ’ समूहाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होण्याच्या केवळ सहा महिने आधी हा दौरा पार पडाला. जगभरातून सत्तरच्या आसपास पत्रकार असलेल्या त्या परीषदेत माझ्यासह भारताचे फक्त सहा प्रतिनिधी होते.
`कामिल पारखे, सकाळ टाइम्स, पुणे, इंडिया'' असे छापलेले माझे ते गळ्यात अडकवण्याचे ओळखपत्र मी आजही जपून ठेवले आहे.
पत्रकारितेमधला माझा अनुभव चाळीस वर्षांचा. इतकी वर्षे सहसा कुणी नोकरीत नसतात, पण मी वयाच्याएकविसाव्या वर्षीच पणजीला कामाला लागलो होतो.
कोरोना साथीने थैमान मांडले तेव्हा एप्रिल २०२० ला सकाळ टाइम्स बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.
त्या दिवशी पिंपर चिंचवडच्या `सकाळ’च्या ऑफिसात जाऊन `pcamil’ या नावाने लॉग इन केले. डेस्क टॉपवर असलेला माझा वैयक्तिक मराठी आणि इंग्रजी मजकूर, लेख, वगैरे स्वतःला मेल केला, त्या जवळजवळ नव्या, वातानुकूलित ऑफिसमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत, मधल्या त्या माझ्या आवडत्या टिव्हीसेटकडे, स्वतःच्या खुर्चीवरुन एकदाचे भरभरुन पाहून घेतले.
पुन्हा एकदा आता कोऱ्या झालेल्या डेस्कटॉपवर अखेरची नजर टाकली आणि `pcamil’ या सकाळ माध्यमसमूहातील एका व्यक्तीला कायमसाठी लॉगआऊट केले.
पत्रकारितेच्या मासिक पगारी नोकरीतील `दि एन्ड’ अखेरीस असा अवचित आला होता, खूप खूप अनुभवले होते या व्यवसायात. आनंदी आठवणीच जास्त. अपेक्षाही केली नव्हती असे खूप काही !
मात्र खंत, खेद ठेवण्यासारखे प्रसंग तसे मला या क्षणाला मुळी आठवतच नव्हते..
Camil Parkhe